Sunday 16 December 2012

कुमार केतकरांना गहिवरून का आलं?

ही नोंद कुठल्याही वैयक्तिक आकसातून केलेली नाही. ज्यांना केतकरांची वैयक्तिक टिंगल इथे सापडेल असं वाटत असेल त्यांच्यासाठी ही नोंद नाही. मराठी पत्रकारितेशी संबंधित कोणत्याही चर्चेत टाळता न येणारं एक नाव आणि ज्यांना त्यांच्या या क्षेत्रातील अनुभवामुळे प्रतिनिधी मानता येईल अशी व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याबद्दल ही नोंद करत आहोत.

यातला मुख्य संदर्भ आहे तो शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या निधनानंतरच्या केतकरांच्या लेखांतून आणि टीव्हीवरच्या चर्चेतून व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया. (यात बाळ ठाकऱ्यांबद्दलही आपण जे बोलू ते फक्त केतकरांच्या संदर्भातले विरोधाभास दाखवण्यापुरतंच असेल. अन्यथा टीका करायची तर बाळ ठाकरेच का, अमुक का नाहीत, तमुक का नाहीत, शरद पवार का नाहीत - असलं काहीतरी सुरू होतं.)

आणि अजून मुख्य संदर्भ म्हणजे कुमार केतकर ही व्यक्ती असं न पाहाता मराठी पत्रकारितेचं सध्याचं प्रातिनिधिक व्यक्तिमत्त्व म्हणून या नोंदीतल्या केतकरांच्या उल्लेखांकडे पाहावं.

केतकरांबद्दल (किंवा खरंतर कोणाहीबद्दल) वाट्टेल त्या खालच्या थराला येऊन बोलणारी व्यासपीठ इंटरनेटवर कमी नाहीत. तसं तर नकोच. पण काही गोष्टी नोंदवणं भाग आहे. यापूर्वीच्या 'रेघे'वरच्या नोंदीत जो तीन इंग्रजी छापील नियतकालिकांमधे आलेल्या माध्यमांसंबंधीच्या लेखांचा उल्लेख केला, तसं मराठीत कुठल्याही छापील व्यासपीठावर करणं अवघड असल्यामुळे आपण 'रेघे'वर ही नोंद करत आहोत.
***

एक

आता 'आयबीएन लोकमत' या वाहिनीवर निखील वागळे यांनी कुमार केतकरांशी मारलेल्या गप्पांकडे वळूया. बाळ ठाकरे यांच्या निधनानंतरची ही गोष्ट. १९ नोव्हेंबर २०१२ रोजी यू-ट्यूबवर हे व्हिडियो पोस्ट झाल्याची तारीख.

''कुमार केतकर इथे आल्याशिवाय आजचा कार्यक्रम संपणार नाही असा माझा आग्रह होता.'' असं म्हणून वागळे केतकरांना ठाकरे यांच्या निधनावरची प्रतिक्रिया विचारतात त्यावर केतकर म्हणतात, ''पहिली प्रतिक्रिया, म्हणजे मला आत्ता सांगतानासुद्धा गहिवरून आलंय, इतकी तीव्र होती.''

इथून सुरू झालेली ही दोन संपादकांमधली चर्चा 'यू ट्यूब'वर चार भागांमधे पाहाता येते.

 

 

 



पहिल्या भागात अनेक उल्लेख आलेत. केतकर 'मार्मिक'च्या सुरुवातीच्या काळात त्याचे वाचक कसे होते, तेव्हा 'मार्मिक'मधे कसं 'वाचा आणि थंड बसा' आणि नंतर 'वाचा आणि उठा' अशा घोषणा यायला लागल्या, त्यातून शिवसेनेचा जन्म, शिवसेनेच्या सहासष्ट सालच्या पहिल्या मेळाव्याला ते कसे उपस्थित होते - असं सगळं आलंय.

इथपर्यंत सगळं ठीक होतं.

यापुढे प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या प्रभावातून आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या डाव्या विचारांमधून शिवसेनेचा जन्म कसा झाला हेही केतकरांच्या बोलण्यात आलंय.

दुसऱ्या भागात, मराठी समाजाला ठाकऱ्यांचं काय योगदान आहे, असा प्रश्न वागळे विचारतात त्यावर बोलताना केतकर म्हणतात की, '..ज्या मराठी माणसाच्या नावाने संयुक्त महाराष्ट्र होतोय, त्याच्या भवितव्याचा काय विचार आहे, काय योजना आहे, काय नियोजन आहे, अशा प्रकारची कोणतीही भूमिका संयुक्त महाराष्ट्र समितीने घेतली नाही. की संयुक्त महाराष्ट्रात उद्योग मराठी माणसांकडे.. आम्ही मराठी माणसांना उद्योगाचं ट्रेनिंग देऊ. पण ते भांडवलशाहीच्या विरोधात असल्यामुळे उद्योगाचं ट्रेनिंग देऊ असं म्हणूच शकत नव्हते. त्यामुळे भांडवलशाही एका अर्थी नॉन-मराठी वर्गाकडे आणि कामगार वर्ग मराठी माणसाकडे होता पण त्याला मराठी म्हणून आयडेन्टिटी दिल्यामुळे त्याच्या वर्गजाणिवेला छेद गेला. आणि मराठी कामगार आणि नॉन-मराठी कामगार असं द्वंद्व सुरू झालं. नॉन-मराठी कामगार खूप कमी होता. त्या द्वंद्वातून मराठी अस्मिता अतिशय उग्रपणे, प्रखरपणे, कधीकधी अतिशय वाईटपणे पुढे आली त्याच्यामुळे मराठी अस्मितेचा चांगला परिणाम झाला. हा आत्मविश्वास द्यायला बाळासाहेबांनी मदत केली आणि दुसरीकडे राडा करणारा, भांडखोर, उग्रपणे दंगली करणारा, अशा मराठी माणसाच्या दोन विरोधी प्रतिमा तयार झाल्या.'

तिसऱ्या भागात, ठाकरे आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि भारतीय जनता पक्षाची आणि हिंदुत्त्वाची कशी टिंगल करायचे आणि नंतर त्यांनी टॅक्टिकल भाग म्हणून भाजपशी युती कशी केली - हे सांगून केतकर म्हणतात की, 'पण यात त्यांच्या उत्स्फूर्ततेचा भाग होता, त्या अर्थी त्यांनी हिंदुत्त्ववाद स्वीकारला होता असं मला दिसलेलं नाही.. नायतर ते बाबरी मशिदीच्या जागी हॉस्पिटल बांधा म्हणाले नसते.'

'बाळासाहेबांच्या भाषणांमधे जात आणि धर्म सर्वसाधारणपणे यायचेच नाहीत. मतांपुरते बोलायचे ते सोड. त्यांच्या मनात तो मुद्दा नव्हताच. कोणत्याही भाषणांमधे बघ. ते हिंदुत्त्व वगैरे मधूनमधून बोलायचे ते सोड, असंही केतकर म्हणतात. आणि शेवटच्या भागात तर बाळासाहेब हळूहळू वैराग्याकडे झुकत होते, त्यांच्या कपड्यांमधे झालेला फरक बघ, आधी सफारी, नंतर कुडता आणि शेवटी तर भगवे कपडे', असंही केतकर बोलता बोलता बोलून गेलेत.

''निखील हे बघ, माझे त्यांच्याशी काय मतभेद होते तुला पूर्ण माहितेय. तुझेही मतभेद, तू तर मार खाल्लेला आहेस. तू पण समाजवादी परंपरेत वाढलेला आहेस, त्यामुळे तुझाही, म्हणजे त्या अर्थी वैश्विक डावा म्हणता येईल असा विचार आहे. म्हणजे कोणत्याही संकुचित विचारांमधे न बसणारा. पण मराठी म्हणून वाटत असतं ना आपली भाषा आपली संस्कृती आपला महाराष्ट्र या भावनेचा आधार बाळासाहेब ठाकरेच होते'', असं केतकर या भागात म्हणतात.

उत्स्फूर्ततेतून आलेली सामाजिक बांधिलकी हेच ठाकरे यांचं तत्त्वज्ञान असल्याचं केतकरांनी वारंवार या गप्पांमधे सांगितलंय. आणि या उत्स्फूर्ततेचे नकारात्मक परिणाम म्हणून कृष्णा देसाई खून, ९३च्या दंगली या गोष्टी झाल्या आणि तशा त्या जगभर झाल्यात, असंही सांगितलंय. पण नंतर ठाकऱ्यांनी उत्स्फूर्ततेतली नकारात्मकता कमी केली, असंही केतकरांच्या बोलण्यात आलंय.

हे सगळं आपण ऐकलं. त्यातलं थोडंच निवडून काढल्यासारखं नको, म्हणून मूळ व्हिडियो आणि शिवाय त्यातला आपल्याला बोलायचाय तो भाग तपशिलात वेगळा लिहून दिला.
***

दोन

केतकरांनी ठाकऱ्यांच्या निधनानंतर 'तेहेलका'त लिहिलेल्या लेखाचं शीर्षक आहे - 'हाऊ टायगर गॉट हिज सॅफ्रॉन स्ट्रिप्स'. (वाघाला भगवे पट्टे कसे मिळाले)

यात केतकर म्हणतात-
''जर्मनीत नाझींचा उदय झाला तो आर्थिक अडचणीच्या काळातच. शिवसेनाही आर्थिक समस्या भडकली असतानाच स्थापन झाली. त्यावेळी काँग्रेसमधे मोरारजी देसाई, स. का. पाटील, अतुल्य घोष आणि अशी मंडळी (जी पुढे 'सिंडीकेट' म्हणून ओळखली गेली) उजव्या विचारांची उद्घोषणा करत होती. नेहरूंच्या मृत्यूनंतर स्वतंत्र पार्टी, जनसंघ आणि रामराज्य परिषद अशा उजव्या विचारांच्या पक्षांना राजकीय पाठिंबा मिळू लागला. काँग्रेसमधेही डावे आणि उजवे अशी सरळ विभागणी होत होती. यातूनच शीतयुद्धासारखं राजकारण सुरू झालं- काँग्रेसमधले डावे आणि कम्युनिस्ट पक्ष हे शक्यतो सोव्हिएत युनियनच्या बाजूने असत तर उजवे अमेरिकेकडे झुकलेले होते. याच वादातून १९६९मध्ये काँग्रेस फुटली. शिवसेनेने उजवी बाजू पकडली, पण क्वचित डाव्या घोषणा मात्र दिल्या!

हिटलरची स्तुती करण्याव्यतिरिक्त, बाळासाहेब महात्मा गांधी आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाविरोधातही बोलले होते. स्वातंत्र्यादरम्यान जन्माला आलेल्या पिढीला गांधी-नेहरूंच्या वारशाची खूपच अल्प जाणीव होती. श्रमिक वर्गाचे केंद्र असलेल्या मुंबईतून महाराष्ट्राच्या चळवळीचं नेतृत्त्व केलेली संयुक्त महाराष्ट्र समिती कोणतीही दीर्घकालीन योजना किंवा कामगारांसाठी एखादा डाव्या विचारांचा कार्यक्रम उभा करण्यात अपयशी ठरली होती, आणि महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तिने स्वतःला बरखास्तच केले. स्वांतत्र्य चळवळीचा वारसा कमकुवत झाला असताना आणि काँग्रेस दुर्बलावस्थेत असूनही उजव्या शक्तींचं प्राबल्य दिसत असताना, तयार झालेल्या पोकळीत शिवसेना उदयाला आली; नव्याने तयार झालेल्या बेरोजगारांच्या आणि श्रमिक वर्गाच्या रस्त्यांवरील निदर्शनांतून. अस्थिर झालेल्या तरुणाईला हिंसेसाठी प्रोत्साहित करणं हा राजकाराणाचा भाग म्हणून स्वीकारला गेला होता. शिवसेनेचे अनेक नेते, आमदार, अगदी खासदारही त्या काळी रस्त्यावरच्या लढाईत होते.

या पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट नेते आणि आमदार कृष्णा देसाई यांचा खून झाला. महाराष्ट्रातली ही पहिली राजकीय हत्या होती. देसाईंना मारणाऱ्या टोळीत तरुण शिवसैनिक होते आणि त्यांना खुद्द शिवसेनाप्रमुखांनी प्रोत्साहन दिलं होतं. त्यांनी आरोपींना पाठीशीही घातलं आणि त्यांचं संरक्षणही केलं. इतर डाव्या कामगार नेत्यांना ही एक सूचना होती.''
***

तीन

'फोर्ब्स'मधेही केतकरांनी ठाकऱ्यांवर लेख लिहिलेला. या लेखाचं शीर्षक आहे, 'बाळ ठाकरेज् फ्रॅक्चर्ड लीगसी'. (बाळ ठाकरे यांचा खंडित वारसा)

यात केतकर म्हणतात -
''हे खरंतर विचित्र आहे की जो माणूस स्वतःच्या मराठीपणाबद्दल अभिमान बाळगतो, मराठी अस्मितेसाठी लढतो, मराठी संस्कृतीचा पुरस्कार करतो आणि मराठी इतिहासाला जवळ करतो, त्याने शिवाजी महाराजांचे काही सोपे संदर्भ देण्यापलीकडे कधीच ऐतिहासिक संशोधनाला प्रोत्साहन देण्यात रस दाखवला नाही. त्यांच्यासाठी फक्त राजकारण महत्त्वाचं होतं, तेही विषयानुरूप नव्हे तर गर्दीला उसकवणारं तंत्र म्हणून. मुंबईतल्या परिघाबाहेर ढकलल्या गेलेल्या सामान्य लोकांना या मराठी अस्मितेच्या मुद्द्याने स्पर्श केला. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरातही क्वचितच एखादी मोठी कंपनी मराठी माणसाच्या हातात होती, क्वचितच एखादा जागतिक आकांक्षा असणारा मोठा मराठी उद्योजक होता आणि शेअर बाजारातही आणखीच कमी संख्येने मराठी माणसं होती.

दुसऱ्या बाजूला, अमिताव घोष किंवा विक्रम सेठ यांच्या पातळीला पोहोचू शकतील असे कोणी मराठी लेखक नव्हते, अमर्त्य सेनांप्रमाणे नोबेल विजेते नव्हते, सत्यजीत राय यांच्या दर्जाचे मराठी चित्रपट दिग्दर्शक नव्हते. शिवसेना-भाजप युती सत्तेवर असताना बाळासाहेब सहजी काही चांगल्या संस्था उभारू शकले असते, ज्यातून या सगळ्याला प्रोत्साहन मिळू शकलं असतं. मराठीला वैश्विक भाषा बनवण्यासाठी ते प्रयत्न करू शकले असते. पण असला कसलाही प्रयत्न झाला नाही. कोणतीही दृष्टी नव्हती, कोणताही कार्यक्रम नव्हता, कोणतीही योजना नव्हती. त्यासाठी खरोखरच काही बौद्धिक काम करावं लागलं असतं. यातलं काही ना बाळासाहेबांना महत्त्वाचं वाटलं, ना त्यांच्या मुलाला, ना त्यांच्या पुतण्याला. त्यांच्या नावाने एखादी कला अकादमी सुरू करावी असंही त्यांच्यापैकी एकाला वाटलं नाही. (कदाचित त्यांना आता तसं वाटेल, बाळासाहेबांच्या प्रतिमेचा वापर करायचा असेल तर.)''

या लेखात शेवटच्या आधीचा परिच्छेद आहे-
''बाळासाहेबांनी मराठी लोकांमधे अभिमान जागृत केला हे आहेच, पण त्यांनी दुसऱ्यांबद्दल पूर्वग्रहही निर्माण केले. देदिप्यमान मराठी इतिहासाच्या बळावर त्यांनी लोकांमधे अभिमान जागा केला, पण इतिहास संकुचित पातळीवर आणून ठेवला. फक्त उच्चभ्रूंनाच स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालता यायचं. वर्गभेद तयार झाला.. मराठी माध्यमांच्या शाळांमधे सुविधा अपुऱ्या असतात, शिक्षण दुय्यम दर्जाचं असतं, शिक्षक फारसे उच्चशिक्षित नसतात. शिवसेनेच्या नेतृत्त्वाने त्यांच्या मुलांना उच्चभ्रू इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधे घातलं, आणि इंग्रजी नि हिंदीच्या प्रभावाबद्दल आक्रमकपणे बोलत राहिले''
***

चार

वरती जो मजकूर आणि केतकरांची जी विधानं दिल्येत ती मुद्दामहून जास्त तपशिलात दिल्येत, कारण सुटी वाक्यं उचलून टीका केलेय असं वाटू नये. शिवाय मूळ व्हिडियोंच्या, लेखांच्या लिंकही आहेत.

पहिला भाग आहे तो केतकरांच्या मराठी अभिव्यक्तीचा आहे आणि दुसरा नि तिसरा भाग हा केतकरांच्या इंग्रजी अभिव्यक्तीचा आहे. मराठी व इंग्रजी केतकरांमधला हा विरोधाभास यापूर्वीही 'रेघे'च्या एका खूप जुन्या नोंदीत नोंदवला होता. ही नोंद खाली प्रतिक्रियेच्या रूपात पूर्ण वाचायला मिळेल. यात वेगळं काही बोलायलाच नको एवढा विरोधाभास दिसतो.

वागळ्यांबरोरच्या गप्पांमधे ठाकऱ्यांच्या 'उत्स्फूर्त सामाजिक बांधिलकीवर' पूर्ण जोर आहे, आपल्या भावनिक आधाराचा उल्लेख आहे. 'तेहेलका' व 'फोर्ब्स'मधल्या लेखांमधे ठाकऱ्यांच्या हुकूमशाही वृत्तीचा आणि भावना उचकवणाऱ्या पण प्रत्यक्षात काहीच बदल न घडवणाऱ्या राजकारणाभोवती मांडणी केलेय.

ठाकऱ्यांनी जातीचं राजकारण केलं नाही, असे केतकर म्हणतात तेव्हा कोणाला मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळचं 'घरात नाही पीठ तर कशाला पाहिजे विद्यापीठ' हे विधान आठवू शकेल. किंवा रिडल्सच्या आंदोनावेळी दलित जनतेच्या मोर्चानंतर हुतात्मा चौकात शिवसेनेच्या नेत्यांनी गोमूत्र शिंपडून 'शुद्धीकरण' केलेलं आठवू शकेल.

केतकर उत्स्फूर्ततेच्या काहीशा नकारात्मक भागाचा उल्लेख करतात तेव्हा कोणाला, मेलेली माणसं आठवू शकतील. किंवा वरळीच्या दलित पँथरच्या मोर्चावेळी डोक्यात दगड पडून मेलेला माणूस. 'तुमचा दाऊद तर आमचा गवळी' असल्या घोषणा आठवू शकतील. असं किती काय काय आठवू शकेल.

कामगार आणि मराठी यांच्या संदर्भात किंवा एकूण मराठी भाषा, मराठी संस्कृती यासंदर्भात केतकरांना बाळ ठाकरे जवळचे वाटतात. कामगार-मराठी संदर्भात नारायण सुर्वे नाहीत. किंवा जागतिक पातळीवर मराठीच्या संदर्भात अरुण कोलटकर नाहीत, किंवा असं हे कितीही सांगता येईल. मुळात असं जागतिक पातळीवर भाषा वगैरे बोलणं म्हणजेच उथळ आहे. पण साधा मुद्दा आहे, बंगाली भाषा म्हटली की, त्यातलं काहीही न वाचलेल्याच्याही समोर कोण येईल, तर रवींद्रनाथ टागोर. इंग्रजी म्हटलं की, साम्राज्यवाद पसरवणारी ईस्ट इंडिया कंपनी आठवेल की शेक्सपियर. दर्जा, मूळ आशय या बाजूने नाही म्हणत, पण भाषा-संस्कृती म्हटली की त्या भाषेचं काम केलेला माणूस कोणालाही पहिला आठवेल. पण यांना हे काय आठवतंय!
हे फार वाढवत नेणं महत्त्वाचं असलं तरी हा आपल्या नोंदीचा उद्देश नाही.

साडेचार
आपल्या नोंदींचा उद्देश आहे, तो केतकर मराठीत एवढं वेगळं आणि इंग्रजीत एवढं वेगळं का बोलतात?
आणि हा विरोधाभास तपासला का जात नाही? केतकर जे मराठी चॅनलवर बोलले ते सर्वसामान्य म्हणवल्या जाणाऱ्या मराठी माणसांनी ऐकलं. शिवाजी पार्कवर जमलेल्या लाखो लोकांपैकी बहुतेक लोकांना मराठी येतं, ते 'फोर्ब्स' किंवा 'तेहेलका' वाचत नाहीत. यावर आता कोणी असंही म्हणेल- केतकर तसलेच आहेत. पण मग आपण कसले आहोत?

'रेघे'वरची या पूर्वीची नोंद होती, त्यात इंग्रजी माध्यमांमधले बदल, त्यात नक्की काय चाललंय, सध्याची परिस्थिती काय आहे, माध्यमांची जी अवस्था आहे ती तशी का आहे, याबद्दल काहीतरी बोललं जातंय आणि तेही इंग्रजी भाषेतच, याबद्दल लिहिलं होतं. 'न्यूयॉर्कर' अमेरिकेतलं आहे, ते जरा बाजूला ठेवू. पण 'कॅरव्हॅन' किंवा 'तेहेलका'मधे किमान ह्या गोष्टींची दुसरी बाजू मांडली गेली. ढोंगीपणाबद्दल लिहिलं गेलं. शिवाय काही वेबसाईटींवरही अशी बाजू, तपासणी, चर्चा हे होतं. एक किमान पातळी सांभाळून हे होऊ शकतं. मराठीत असा विचार करणारे लोक आहेत, पण तरी मराठीत असं का होत नाही?

एकदम खालच्या थराला येऊन शिव्या घालणं किंवा मग गॉसिपच्या पातळीवर पेपरांच्या आतल्या बातम्या पत्रकारांच्या रोचक चर्चांपुरत्या देत राहाणं - या पलीकडे मराठीत थेट सवाल का विचारले जात नाहीत? सोशल नेटवर्किंगचा एवढा गवगवा होतोय, ब्लॉग आदी गोष्टी आहेत, पण एक चोख प्रश्न विचारायचं छापील किंवा ऑनलाईन व्यासपीठ मराठीत का नाही?

याची काय उत्तरं असतील. 
एक, आर्थिकदृष्ट्या मराठी ही वर्षानुवर्षं खंगलेली भाषा आहे.
दोन, आदरबिदर, मैत्रीबित्री, हितसंबंधबितसंबंध, असंच आहे ओ हे, सगळीकडे असंच असतं - अशी काही कारणं असतील.
उत्तरं माहीत नाहीत, पण ह्यामुळे किंमत कमी होते एकूणच सगळ्या बोलण्याची.
निखळ पातळीवर विरोध होईल इतपत माध्यमं सक्षम हवीत, ती नाहीत - असं आहे? की
निखळ पातळी म्हणजे काय, निखळ पातळीवर विरोध म्हणजे काय, हे आपल्याला माहीत नाही?
***

पाच

राडा - भाऊ पाध्ये
किंमत- १५० रुपये

क्लिक
ब्लर्बवरून-
१९७५ साली अलिबागमधून प्रकाशित झालेली ही कादंबरी वाचकांपुढे येण्यापूर्वीच शिवसेनेने तिची गळचेपी केली. हा सगळा प्रकार भाऊ पाध्यांनी एका लेखात नोंदवून ठेवला आहे - ''असं समजलं की प्रकाशकाला शिवसेनेच्या मंडळींकडून दम बसला होता आणि त्यामुळे त्याने 'राडा'च्या प्रती बाजारात विकायला काढल्या नाहीत. हीपण एक सेन्सॉरशिपच आहे. अर्थात माझ्यासाठी कोण आवाज उठवणार म्हणा.''

***



करविली तैसी केली कटकट।
वाकडे की नीट देव जाणे।।
- तुकाराम
***

16 comments:

  1. Brilliant...had not read such an analytical article in Marathi outside Samaj-prabodhan-patrika (SMP) for a very long time.

    But I read it only because it appears on "Ek Regh". Otherwise, I do not take the subject of this post seriously and hence almost never read him or about him or listen to him.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Aniruddha. On Vidyadhar Date's article that appeared on Regh few days back, you had commented, ''The real question, I have often asked, is why is otherwise kind and intelligent 'Marathi mind' so much attracted to fascism''. I think hypocritical intelligentsia can be a reason for that. There must be many more of course.
      Most of the journalists either keep mum when it comes to self-criticism or they get aggressive & there is a third category who live in a different world altogether, where nothing needs to be criticised, not at least themselves.

      Delete
  2. हा सगळा प्रकार समजून घ्यायला मोठा कठीण आहे. फोर्ब्समधल्या लेखाबद्दल कुमार केतकर यांना म्हणे पोलिस संरक्षण देण्यात आले होते. कारण त्यात जातीय उल्लेख आहेत. एकीकडे कोणी आपल्या जातीचे कौतुक उच्च रवाने गाऊ लागले की, ही मंडळी (म्हणजे कोणती, ते सर्वांच्याच ध्यानात येईल.) मानववंशशास्त्राचा हवाला देतात आणि सांगतात गेल्या दीड-दोन सहस्रकांमध्ये एवढा वर्णसंकर झाला आहे की, कोणताच वंश, वर्ण, जात शुद्ध (PURE) राहिलेला नाही. मग इथे एका विशिष्ट जातीत फार उंचीचे कोणी तयारच झाले नाही, असे कसे म्हणता येईल?
    केतकर मराठीत एक बोलतात आणि इंग्रजीत `कॉमी`साठी वेगळेच लिहितात, हा अनुभव नवा नाही. बाळ ठाकरे यांच्या निधनानंतर सगळ्यांनाच फार गहिवरून आलं होतं. ते भीतीपोटी होतं की प्रेम-आदरापोटी हा संशोधनाचा विषय आहे. विलासराव देशमुखांच्या निधनानंतर एका टीव्ही.च्या संपादकानं ते शिवसेनेत का गेले नाहीत, याचा किस्सा सांगितला होता. त्यात मातोश्रीवर जाऊन मुजरा वगैरे करावा लागतो, हे विलासरावांना पटलं नव्हतं, हे त्यांनी अगदी आवर्जून सांगितलं होतं. विलासराव आणि ठाकरे ही अलीकडच्या काळातली दोन मोठी निधनं. ती टीव्ही वाहिन्यांनी कशा पद्धतीनं साजरी केली, त्यात कोण कोण काय काय बोललं हे अगदी पाहण्यासारखं-वाचण्यासारखं-ऐकण्यासारखं आहे. सगळ्यांनाच धंदा करायचा आहे. मग तो छापील, ऐकीव वा वाचीव कोणतंही माध्यम असो. केतकर दी ग्रेट आहेत, असं म्हणणारे होते. अलीकडच्या काळात त्यांचा आवाज थोडा बसलेला आहे.
    खरं सांगायचं तर हे सगळं गँगवॉर आहे. तुम्ही कोणाच्या गँगमध्ये आहात, यावर तुम्ही दखलपात्र आहात की नाही, हे ठरतं. पण केतकर यांचा हा दुटप्पीपणा दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन. अर्थात तो नवा नाहीच मुळी.

    ReplyDelete
  3. वाचक-प्रेक्षक बघून काय बोलायचं ते ठरवून स्वतःची लोकप्रियता टिकवण्यासाठी किंवा स्वतःची 'इंटलेक्चूअल' अशी प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी केतकर आणि अजून बरेच जण असं करत असणार, असा माझा समज आहे. केतकरांच्या दुटप्पीपणा जाहीर नोंद केल्याबद्दल दाद. हे तसं तू आधीही केलंयस, हे विशेष .....अश्विनी

    ReplyDelete
  4. छान आहे नोंद. पत्रकारितेतील सध्याच्या अनेक बाबी गोंधळात टाकणाऱ्या आणि पत्रकारितेच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण करणाऱ्या आहेत यात शंका नाही.

    ReplyDelete
  5. आजकाल सगळ्या ठिकाणी व्यावसायिकपणा आला आहे.
    आपण ज्या माधामांच्या पुढे बोलत आहोत किंवा लिहित आहोत , त्याचा श्रोता व वाचकास नक्की आपल्याकडून काय ऐकायला आवडेल ह्याचा अंदाज मुरब्बी पत्रकार लावून त्याप्रमाणे लिखाण किंवा वक्तव्य करतात.
    गंदा हे पर धंदा हे ये
    सर्व हिंदू विचारवंत नसतात पण बहुतेक विचारवंत हे हिंदू द्वेष्टे असतात,

    ReplyDelete
  6. Superb,as always! well done....काळ तर मोठा कठीण आला भाऊ.... हा पण एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे..आणि तो आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा भयंकर आहे....केतकरांनी असं करण्यामागचं कारण काय असावं? ही केतकरांची शिवसेनेप्रति चमचेगिरी आहे का? कशासाठी...तशी बऱ्यापैकी प्रसिद्धी,पैसा ,नाव तर त्यांना मिळालेलं आहेच..मी IBN वरचा कार्यक्रम पाहिलेला नव्हता.धन्यवाद.

    ReplyDelete
  7. या गोष्टीचे स्वागत यासाठी की, व्यासपीठाचा रंग पाहून विचाराचा रंग बदलणारे लोक कोणत्या तोंडाने कोणाला काही विचारू शकतील? नैतिकता, विचार या गोष्टींचा उठता बसता जप काणारे लोक काय आणि कसे आहेत, हे जाहीरपणे तुम्ही सांगितलेत. फारच छान केलेय हे. मराठी पत्रकारितेतील 'केतकर संप्रदायाला' कदाचित हे मानवणार नाही. यांचे मातीचे पाय तुम्ही दाखवून दिलेत. लिखाणात कुठेही प्रचारकीपणा-बाणा नाही, हा आणखीन एक महत्त्वाचा विशेष.

    ReplyDelete
  8. कुमार केतकरांनी मराठी माध्यमांसमोर एक भूमिका मांडली आणि इंग्रजी माध्यमांमध्ये त्याच भूमिकेची दुसरी बाजू मांडली. केतकरांचा सामान्यपणे असा प्रयत्न असतो की जे लोकप्रिय आहे त्याला पूर्णपणे नाकारण्यात अर्थ नाही. या लोकप्रियतेला विधायक रस्त्याकडे वळवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुत्ववादी पठडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एस.एम.जोशी, भाई डांगे, आचार्य अत्रे, जॉर्ज फर्नांडिस अशा डाव्या नेत्यांचा प्रभाव ठाकरे यांच्यावर होता, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. मला केतकरांच्या भूमिकेमध्ये विरोधाभास दिसत नाही, चतुराई दिसते. त्याला धूर्तपणा म्हणणं चुकीचं ठरेल कारण अशी भूमिका मांडून केतकरांनी आपला स्वार्थ साधलेला नाही.
    परंतु या चतुराईला फारसा अर्थ नसतो. बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीमत्वाचं शिवसैनिकांचं आकलन हेच निर्णायक ठरतं. शिवसेना हीच बाळासाहेबांची शक्ती होती. त्यामुळेच अशी मांडणी केल्यावरही, इंग्रजी भाषेत लिहीलेल्या लेखामुळे, केतकरांना पोलीस संरक्षणात फिरावं लागलं.
    राजकारणावर लिहीत असताना, वाचकवर्ग ध्यानी घेऊन कोणत्या मुद्द्यावर जोर द्यायचा वा कोणता मुद्दा गाळायचा हे ठरवावं लागतंच. मला त्यामध्ये विरोधाभास दिसत नाही.
    संयुक्त महाराष्ट्र समिती बरखास्त झाली त्यामुळे शिवसेना जन्म अटळ ठरला या केतकरांच्या विश्लेषणातलं तथ्य नाकारण्यात अर्थ नाही. कम्युनिस्ट आणि समाजवादी यांच्यातील मतभेद आंतरराष्ट्रीय प्रश्नासंबंधात होते. उदा. इम्रे नाझ या हंगेरीतील कम्युनिस्ट नेत्याला फासावर लटकवण्यात आलं हा मुद्दा मुंबई महापालिकेत आणण्याची गरज नव्हती. या विषयावर प्रजा सोशलिस्ट, संयुक्त सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट यांच्यामध्ये टोकाचे मतभेद होते. संयुक्त महाराष्ट्राशी या प्रश्नाचा काय संबंध होता? त्या काळातला कामगार वर्ग आणि मराठी अस्मितेचा पेचही केतकरांनी अतिशय मोजक्या शब्दांमध्ये अचूकपणे मांडला.
    केतकरांच्या चतुराईला मी दाद देतो पण तुम्ही राजकीय नेते असाल तरच अशी चतुराई उपयोगी पडते वा विधायक वळण देऊ शकते. कारण चतुराईच्या म्हणजेच आपल्या भूमिकेच्या मागे राजकीय शक्ती उभी करणं गरजेचं असतं. पत्रकाराला ते शक्य नसतं. आणि महाराष्ट्रातील हल्लीच्या राजकीय नेत्यांमध्ये केतकरांचं म्हणणं कळण्याइतकी प्रगल्भता नाही आणि असली तर तीही चुकीच्या पक्षात असलेल्या नेत्यांकडे असेल.

    ReplyDelete
    Replies
    1. http://regh1.blogspot.in/2010/05/blog-post_25.html

      Delete
    2. १. जी गर्दी जमलेली त्यांच्यातल्या किती जणांना 'एस.एम.' माहीत असतील? 'मी एस. एम.' असलं काहीतरी पुस्तक आहे हे कितींना माहीत असेल? पण 'सामना' मात्र रोजच्यारोज कित्येक पटींनी खपतो. प्रसिद्धी ही अशी आहे. अशा पार्श्वभूमीवर ठाकऱ्यांवर 'एस.एम.'चा प्रभाव होता असलं बोलून काय होणार आहे? आणि समजा तसं काही सिद्ध झालं तरी ही वेळ अशी होती की तेव्हा बहुतेकांना ठाकऱ्यांवर प्रभाव होता म्हणजे 'एस.एम.' हेच कोणीतरी हिंदुत्त्ववादी नेते आहेत असं वाटायला लागलं असतं. त्यामुळे वेळ असेल तेव्हा एस.एम.चं महत्त्व सांगणं किंवा ठाकऱ्यांचे दोष (किंवा महत्त्व) सांगणं एवढंच पत्रकार आणि संपादक म्हणून केतकरांचं काम होतं असं वाटतं. त्यापलीकडे त्यावेळी राजकीय चतुराई दाखवून काय मिळालं? एस.एम.चा, डांग्यांचा प्रभाव ठाकऱ्यांवर आहे असं अगदी सिद्ध जरी झालं, तरी ठाकऱ्यांच्या विचारसरणीला मानणारे ठाकऱ्यांचंच म्हणणं ऐकणार, मग असल्या मांडणीने साध्य काय होतं? तसं म्हटलं तर ठाकऱ्यांवर शिवाजी महाराजांचा प्रभाव होता असंही म्हणतात, त्याने या सगळ्या गदारोळाला शिवाजीसारख्या खऱ्याखुऱ्या थोर राजाच्या नावामुळे काही विधायक वळण मिळालं का कधी? मुळात ठाकऱ्यांचा प्रभाव हेच त्यांच्या अनुयायांचं मुख्य वैचारिक खाद्य असताना ठाकऱ्यांवर कोणाचा प्रभाव होता हे सिद्ध झाल्याने काय फरक पडणार आहे? त्यापेक्षा ठाकऱ्यांचं काय पटत नाही ते इंग्रजीत सांगितलं तसं ते इकडे सांगायला जमत असेल तर सांगावं ना.
      उलट केतकर ज्या पद्धतीने बोलले त्यामुळे अशा गर्दीला आपण ठीकच आहोत आणि ठाकरे हेच मराठीपणाचा आधार होते यावर आणखी विश्वास बसेल. बाकी काय होणार? पत्रकार-संपादक म्हणून केतकरांचं काम राजकीय चतुराई दाखवणं होतं की (राजकीय विश्लेषणाची तुम्ही म्हणताय तशी दृष्टी ठेवून का होईना) जे त्यांचं खरं मत आहे ते देणं हे त्यांचं काम आहे?
      २. आणि केतकर फक्त ठाकऱ्यांच्याच बाबतीतच नव्हे तर इतर बाबतीतही असं करतात त्याचं एक उदाहरण घेऊन पूर्वी रेघेवर नोंद केली होती, ती वर दिली आहे. पुण्यातल्या भाषणात तरुण पत्रकारांसमोर सांगायचं, मराठी मीडियाचं मार्केट भविष्यात वाढेल आणि इंग्रजी पाक्षिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगायचं की, twenty years from now there will be no Loksatta. हे सगळं मुळातूनच वाचता येईल.
      ३. ते हे सगळं वैयक्तिक स्वार्थासाठी करतात किंवा नाही, हे मला माहीत नाही. मी एक प्राथमिक पातळीवरचा वाचक आहे असं गृहीत धरलं तर जे विरोधाभास दिसतील, ज्या गोष्टी चुकीच्या वाटतील ते नोंदवण्याचा फक्त हा प्रयत्न आहे. 'सर्वसामान्य' असं ज्यांना म्हटलं जातं त्यांची ही फसवणूक आहे असं वाटतं. ती ते अजाणता करत असतील तरी ती होते असं वाटतं.

      Delete
  9. सूचना पहिली- कोणाचीही व्यक्तिगत नाचक्की करणं, अनादर करणं हा या नोंदीचा उद्देश नाही, फक्त एक विरोधाभास दाखवून देणं एवढाच उद्देश.

    सूचना दुसरी- 'रेघ'वर इतर ज्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे त्यांच्यावर या नोंदीची कोणतीही जबाबदारी नाही. म्हणजे ज्याने ही नोंद लिहिल्येय त्याचीच फक्त जबाबदारी.

    सूचना तिसरी- फुटकळ राजकारणं, किंवा अनावश्यक चिखलफेक असाही उद्देश नाही.

    सूचना चौथी- खोटी चर्चा, त्यातून मिळणारा आनंद यांचाही या नोंदीशी काही संबंध नाही.

    सूचना पाचवी- वर दिलेल्या सूचनांचा असा अर्थ नाही की, आपण चेपून बोलतोय. पण माणूस महत्त्वाचा आहे, आणि बाकीच्यांना अनुल्लेखाने मारता येईल म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलणार?, पण ह्यांना नाही, कारण हे खरे अभ्यासू आहेतच. किंबहूना म्हणूनच त्यांच्याकडून अशा विरोधाभासांची अपेक्षा नाही.

    मराठी लोकांशी बोलताना सगळ्या गोष्टी अति स्पष्ट करून सांगाव्या लागतात. नाहीतर कशातून काय अर्थ काढतील सांगता येत नाही.
    __________________

    १० सप्टेंबर २००९ रोजी 'पुणे श्रमिक पत्रकार संघा'त झालेल्या कुमार केतकर यांच्या भाषणाची ही बातमी.

    सुरुवातच अशी आहे- "मराठी भाषक वृत्तपत्रांचे भविष्यात ‘मार्केट’ वाढेल"

    पुढे- "भविष्यात मराठी माध्यमांचा व्यवसाय कमी होऊन तो अन्य भाषांच्या वृत्तपत्रांकडे जाण्याची भीती आहे, परंतु तसे झाले तरी त्यांचे ‘मार्केट’ वाढेल."

    आणखी पुढे- "महाराष्ट्रात १० कोटी जनता मराठी भाषा बोलते. ती इंग्लंडच्या लोकसंख्येच्या दुप्पट आहे. त्यामुळे मराठी भाषेला तसेच मराठी माध्यमांनाही मरण नाही, असे म्हणावे लागेल’, असेही ते म्हणाले."

    पूर्ण बातमी दिलेल्या लिंकवर जाऊन वाचता येईल.
    __________________

    फ्रंटलाईन पाक्षिकाच्या (८ मे - ) २१ मेच्या अंकात महाराष्ट्र राज्याला पन्नास वर्षं पूर्ण झाल्याबद्दल कुमार केतकर यांची मुलाखत छापली आहे. या मुलाखतीत मुलाखतकाराच्या दहाव्या प्रश्नाला उत्तर देताना केतकर म्हणतात, ". . . आजपासून वीस वर्षांनी लोकसत्ता नसेल- ते आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. खरंतर तेव्हा कोणताच मराठी पेपर नसेल. पुस्तिका किंवा तत्सम काही असेल. लोक मराठी बोलतील पण वर्तमानपत्र परवडणार नाही."
    (Twenty years from now there will be no Lok Satta – it will not be economically viable. In fact there will be no Marathi paper. There may be pamphlets or something. People will speak Marathi but the newspaper will not be viable.)
    __________________

    आता अजून काय बोलणार?

    पुण्यातल्या भाषणाच्या वेळी जे श्रोते होते ते बहुसंख्य मराठी, त्यात बरेच विद्यार्थी, त्यातले बहुसंख्य ग्रामीण किंवा निमशहरी भागांतून आलेले.

    फ्रंटलाईनचे वाचक कोणते आहेत?

    कोण कोणाला फसवतंय? काय चाललंय? कोणी कोणाला प्रश्न विचारत नाही, मग उत्तरं कोण देणार? मुळात उत्तरं कोणाला हव्येत?

    ReplyDelete
  10. Initially I used to think that bears & bulls are two parties in Share Market. (Like Kabaddi) but subsequently knew that One person can be bear & Bull at the same time. Both Balasaheb & Kumar fit perfectly in this shoe.

    ReplyDelete
  11. You seems serious about Journalism and Media. Will watch it.and Read it.

    ReplyDelete
  12. Actually even today if you watch or listen to Mr. Ketakar on various debates on TV, you will find him totally confused. I think to get confused and confuse others is his characteristic. That is why I have found him unfortunately in laughable situations in many debates...

    ReplyDelete