Thursday 14 April 2016

आंबेडकर आणि दोषाचं एकक

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या पुस्तकातील एका उताऱ्याचा संदर्भ देऊन त्यात आंबेडकरांनी ‘दोषाचं एकक’ ही संकल्पना कशी मांडलेय, हे अनिकेत जावऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ('फुको आणि आंबेडकर', काळे पांढरे अस्फुट लेख, हर्मिस प्रकाशन, २०११: एक जुनी नोंद). जावरे लिहितात:
आता आपण आंबेडकरांच्या 'हू वेअर द शूद्राज्'मधल्या एका सुंदर आणि फुकोसदृश क्षणाकडे वळू या. ते एका विचित्र कल्पनेबद्दल लिहितात. कदाचित त्या काळच्या न्यायविचारात आणि कायदाव्यवस्थेत ती रूढही असेल. या कल्पनेत आपल्याला आंबेडकरांच्या न्यायाच्या जाणिवेची तीक्ष्णता दिसते. ते सामाजिक न्यायाबद्दल लिहिताना अचानक 'दोषाचे एकक' (unit of guilt)बद्दल लिहितात. या शब्दसमूहाचा अर्थ काय? दोष मोजता येतो काय? दोषाचा जर एकक असेल, असे एककीकरण करता येत असेल, व्यक्तिकरण करता येत असेल तर दोष विभाज्य असला पाहिजे. दोषाची विभागणी कशी करायची?

या प्रश्नांना आंबेडकरांकडे उत्तर आहे. त्यांचे म्हणणे संक्षेपात असे आहे: अशा घटनेचा विचार करा की एक शूद्र, ब्राह्मणी किंवा इतर सामाजिक संकेत पाळत नाही. किंवा अधिक सोप्या शब्दात सांगायचे झाले तर असे: कल्पना करा, तुम्ही शाळेत शिक्षक/ शिक्षिका आहात. वर्गात गेल्यावर तुमच्या असे लक्षात येते की कुणी तरी विद्यार्थ्याने फळ्यावर काही तरी अश्लील लिहिलेले आहे. तुम्ही मुलांकडे वळून म्हणता 'कोणी लिहिलंय हे?' तुम्हाला या कृतीला जबाबदार असणारी व्यक्ती हवी आहे. पण मुले काही सांगत नाहीत. बराच प्रयत्न केल्यानंतर तुमचा हमखास उपाय काय असणार? तुम्ही म्हणता की ज्याने हे लिहिलेय त्याने कबूल केले नाही तर सर्व वर्गाला शिक्षा करीन. आता तुमचे दोषाचे एकक म्हणजे संपूर्ण वर्ग! एक व्यक्ती पायात चप्पल तशीच ठेवून मंदिरात आत जाते आणि पाहा! एक वस्ती जाळली जाते, एखादे कुटुंब नष्ट करण्यात येते.
यानंतर जावऱ्यांनी 'हू वेअर द शूद्राज्'मधल्या एका उताऱ्याचं भाषांतर दिलंय. काही विशिष्ट शूद्र राजांशी झालेल्या संघर्षात ब्राह्मण समूहाचं प्रत्युत्तर संपूर्ण शूद्र समूहाला दिलेलं होतं, परिणामी ब्राह्मणांनी अनेक (धर्मशास्त्रीय) क्लृप्त्या लढवून शूद्र हा वर्ण ‘खाली’ ढकलला- असं आंबेडकरांचं म्हणणं. त्यासंबंधी जावऱ्यांनी ‘शूद्र पूर्वी कोण होते?’मधला जो परिच्छेद दिलाय, त्यातला काही भाग असा:
“... हा संघर्ष प्राचीन भूतकाळात झाला, जेव्हा जीवन हे कृती आणि विचाराने आदिवासी होते, आणि नियम असा होता की जमातीतल्या एका व्यक्तीने जे केले ते संपूर्ण जमातीने केले असे समजायचे. सर्व प्राचीन समाजांमध्ये जमात किंवा समाज हेच एकक होते, व्यक्ती हे नव्हे, परिणामतः एका व्यक्तीचा दोष हा पूर्ण समाजाचा दोष होता, आणि पूर्ण समाजाचा दोष हा त्या समाजातील प्रत्येक आणि एकूणएक व्यक्तींचा दोष होता. हे सत्य जर ध्यानात ठेवले तर असे म्हणणे साहजिकच आहे की ब्राह्मणांनी त्यांचा द्वेष फक्त काही राजांपुरता मर्यादित ठेवला नाही, तर पूर्ण शूद्र समाजापर्यंत वाढवला आणि उपनयनाचा प्रतिरोध सर्व शूद्रांना लागू केला”. (आंबेडकरांच्या या मूळ इंग्रजी उताऱ्याचं भाषांतर जावऱ्यांचं. 'आदिवासी'ऐवजी 'जमातीय' असा शब्द कदाचित अधिक रास्त झाला असता. 'आदिवासी' शब्द इथे अप्रस्तुत वाटतो).
जावरे पुढं म्हणतात:
आंबेडकरांच्या वर्णनात हे स्पष्ट आहे. न्यायाचे, न्यायव्यवस्थेतले एकक व्यक्ती हेच आहे, किंवा व्यक्तींचे गट असेच आहे. परंतु समाजात वापरले जाणारे न्यायाचे एकक म्हणजे संपूर्ण जात हे आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने सामाजिक संकेत मोडले तर संपूर्ण जातीला शिक्षा होते. [...] न्यायव्यवस्थेत-कोर्ट-कचेऱ्यात- न्यायाचे एकक व्यक्ती हेच आहे, आणि बराच काळ तसेच राहिले आहे. परंतु आपल्या समाजात व्यक्ती हे एकक नक्कीच नाही.
मोठ्या सामाजिक-राजकीय घडामोडी तर सुरूच असतात, आपण इथं या नोंदीपुरतं रोजच्या जगण्याच्या पातळीवरच बोलू शकतो. त्यातही आपण आपल्या आसपासाकडे बघण्यासाठी कोणतं एकक वापरतो? माणूस सोडून बाकीच्या जीवांसाठी तर असं एकेकट्याचं एकक क्वचितच वापरलं जातं. पाळीव प्राणी असेल घरात, तर त्याला काही नाव देऊन त्याला 'स्वतंत्र' एकक मिळतं, किंवा गोठ्यातल्या गाईला ती संधी मिळेल; पण बाकी कबुतरानं आपल्या खिडकीत शी केली, तर ती एका विशिष्ट कबुतरानं अशी केलेली नसते, सगळ्या कबुतरांना त्याचा साहजिकपणे दोष जातो. किंवा मुंग्या, डास वगैरे मंडळींचं एककही त्यांचा अख्खा वंश एवढंच असतं आपल्या लेखी. बाकीच्या जीवांचं खूपच झेपण्यापलीकडचं होईल, पण माणसांपुरतं तरी एकक व्यक्तीचं असावं, असं जमेल का, असा आंबेडकरांच्या मांडणीतला अर्थ आपल्याला कळतो.

व्यक्ती आणि समाज यांच्यातल्या द्वंद्वाचा उल्लेख त्यांच्या लिखाणात कुठंकुठं सापडतो आणि त्यातून हा दोषाच्या एककाचा मुद्दा कसा आणखी खोलात शोधता येईल, हे अभ्यासकांचं काम आहे. आपण इथं पत्रकारी नोंदी करतो, तर आंबेडकरांनी त्यांच्या 'बहिष्कृत भारत' या वर्तमानपत्रामध्ये १५ जुलै १९२७ रोजी एका लेखात मांडलेलं मत नोंदवू, ते असं:
समाजाच्या अस्तित्वासाठी समाजबंधने जरी आवश्यक असली तरी व्यक्तीच्या परिपोषाला अशी बंधने बाधक होतात. जोपर्यंत समाजाचे मत आणि व्यक्तीचे मत यांत एकतानता असते, तोपर्यंत लढा उत्पन्न होत नाही. परंतु जेव्हा समाजाच्या मतांत आणि व्यक्तीच्या मनांत भिन्नता दिसून येते तेव्हा ओढाताण सुरू होते, आणि व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य जर प्राप्त झाले नाही तर त्याचे नैतिक परिणाम उभयतांवर सारखेच अनिष्ट होतात. त्यातल्यात्यात सामाजिक बंधनाने व्यक्तीचा कोंडमारा झाला म्हणजे ज्या गोष्टी मनापासून कराव्याशा वाटतात, परंतु त्या समाज उघडपणे करू देत नाही, त्याच गोष्टी मनुष्य छपवून करावयास लागतो. अशा प्रकारची सवय माणसास एकदा जडली म्हणजे तो सहजच दांभिक वृत्तीचा, दुहेरी वर्तनाचा, असत्य बोलणारा, अप्रामाणिक मनुष्य बनतो.
('व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही तर त्याचे नैतिक परिणाम व्यक्ती व समाज यांच्यावर सारखेच अनिष्ट होतात', डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता: १९२० ते १९२८, डॉ. आंबेडकर लेखन व भाषणे खंड १९, महाराष्ट्र शासन, २००५: पान १९९).

म्हणजे, त्या वाऱ्यावर उडणाऱ्या म्हातारीप्रमाणे व्यक्ती समाजापासून तुटलेल्या अवस्थेत असावी, असं आंबेडकरांचं म्हणणं दिसत नाही. पण तरी व्यक्तीची तिची तिची ओळख फक्त जन्मजात पारंपरिक ओळखीवर आधारलेल्या एककाची राहू नये, असं त्यांचं म्हणणं दिसतंय. जातीचं तर झालंच, पण बाकी अनेक ओळखींच्या बाबतीत हे लागू होऊ शकतं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याच घडामोडींशी हे जोडून पाहता येतंच. अगदीच प्रत्येक वेळी आपल्याला व्यक्तीच्या एककानं वागणं-पाहणं शक्य नाही. म्हणजे बोलताना 'लोक' असा शब्द न वापरता कोण कुठं बोलू शकतं? कधीतरी ते होतंच. आपलं व्यक्ती असणं ठसवताना आपण असं बाकीचे 'लोक' म्हणतो तो भाग वेगळा. सामाजिक अभ्यासासांठीही तसं सामूहिक एकक आवश्यक राहतंच. पण सर्वसाधारणपणे दोष वगैरे देताना तरी हे एकक असं सरसकट वापरू नये, असं आंबेडकरांच्या चष्म्यातून आपल्याला दिसतं. बाहेर देशाच्या न्यायव्यवस्थेसमोर किमान कागदावर तरी व्यक्तीचं एकक असल्याचं वरच्या उताऱ्यांमधून आपल्याला कळतं, पण आपल्या मनातल्या न्यायव्यवस्थेसमोर तसं होतं का? हा प्रश्न आज आंबेडकरांच्या १२५व्या जयंती निमित्तानं नोंदवून ठेवू.

डॉ. बाबासाहेब आंंबेडकर
[१४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६]

टीप: 'हू वेअर द शूद्राज्'मधला आंबेडकरांचा मूळ परिच्छेद असा:
“We have no direct evidence, but there would be nothing unnatural in supposing that in these conflicts with the Brahmins, the whole Shudra community, not merely a few Shudra kings, was involved. This conflict, it must be remembered, has taken place in the ancient past when life was tribal in thought and in action, and when the rule was that what was done by one individual belonging to the tribe was deemed to be done by the whole tribe. In all ancient societies the unit was the tribe or the community and not the individual, with the result that the guilt of the individual was the guilt of the community and the guilt of the community was the guilt of every individual belonging to it. If this fact is borne in mind, then it would be quite natural to say that the Brahmins did not confine their hatred to the offending kings, but extended it to the whole of the Shudra community and applied the ban against Upanayana to all the Shudras.

2 comments:

  1. डॉ.आंबेडकर यांनी केलेल्या मांडणीचे काही विशिष्ट पैलूच आपण पुढे करत असतो, अर्थात ते आवश्यकही आहेत...तरी सुद्धा त्यांचे अलक्षित असे काही पैलू आहेत..त्यातील "व्यक्ती" आणि "समाज" यामधील प्रवाहीपणाचा त्यांच्या शब्दात आपण घेतलेला वेध छान आहे...!

    ReplyDelete
  2. Clashes of a single identity with the whole mankind is described since ancient times. Liberty to raise Q and demand right A is way to look various horizons for human. Galilio conducted experiments lonely for well being of society.This historic clashes now raising a Q in mind again...
    Are the clashes in my age are as meaningful as latter ones?

    ReplyDelete