Monday 30 December 2013

थोडं थांबण्यापूर्वीची नोंद

१६ ऑक्टोबरला 'रेघे'वर नोंद केल्यानंतर दोन महिने कुठलीही नोंद केली नव्हती. ज्या नोंदीवर आपण थांबलेलो ती नोंद माध्यमांसंबंधी आर्थिक संदर्भात एखादा बिंदू नोंदवण्याच्या इच्छेने झालेली. त्यानंतर करण्यासारख्या काही नोंदी होत्या, पण काही कारणांमुळे त्या जमल्या नाहीत, मग पुन्हा २५ डिसेंबरला एक नोंद केली. आणि आता ही नोंद आज होतेय.

दरम्यानच्या दोन महिन्यांमधे आपल्याला वाचकांच्या काही प्रतिक्रिया प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळाल्या. कधी कौतुक आणि क्वचित व्यक्तिगत पातळीवरची निंदा, अशा स्वरूपातल्या प्रतिक्रिया. यातल्या पहिल्या प्रकारातल्या प्रतिक्रियांबद्दल आपल्याला काही प्रमाणात आश्चर्य वाटतं आणि दुसऱ्या प्रकारातल्या प्रतिक्रियांबद्दल काहीच आश्चर्य वाटण्यासारखं नाही. आश्चर्य वाटण्यासारख्या ज्या कौतुक प्रकारातल्या प्रतिक्रिया आहेत त्या ज्यांच्याकडून आल्या त्यामुळे आश्चर्य! म्हणजे इतिहासात संशोधन करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला 'रेघे'वर काय सापडत असेल किंवा साहित्याबद्दल काही संशोधन करणाऱ्या कुणाला इथे काय सापडत असेल, अशा शंका आपल्या मनात आहेत. अर्थात, काहीच न सापडता नुसता वाचून आनंद होत असेल अशीही शक्यता आहे. पण जे आहे ते ठीक आहे.

आणखी एका प्रकारातल्या वाचक-प्रतिक्रियांचीसुद्धा मुद्दाम दखल घ्यायला हवी ती पत्रकारांमधून आलेल्या. यातही काही वरिष्ठ पदावरच्या व्यक्ती आणि काही उप-संपादकीय काम करणाऱ्या व्यक्ती अशा ठिकाणांहून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिक्रिया 'रेघे'पर्यंत आल्या. हेही बरं. आणखी खोलातलं सांगायचं तर यातल्या उप-संपादकीय मंडळींच्या असण्यातून रेघेची सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात तशी पाचेक वर्षांपूर्वी आणि आत्ता ह्या पत्त्यावर तीन वर्षांपूर्वी झाली. ह्या उप-संपादकीय पातळीवर काम करणाऱ्या उदास मंडळींसाठी रेघेचा काही उपयोग झाला असेल तर बरंय. उदास म्हणजे तशी चोवीस तास उदासी असेल असं नाही, पण एक ती सांगता न येण्यासारखी गोष्ट ही मंडळी आजच्या मराठी वर्तमानपत्रांमधे अनुभवतायंत. ते त्यांना तसं का होत असावं, याचे काही संदर्भ रेघेवरच्या नोंदींमधे सापडू शकतील. अर्थात, तरीही ती खूश असतात नि त्या उदासीन खुशीतच रेघेचं मूळ आहे. ह्यातल्या काही मंडळींना तरी रेघेमुळे काही बरं वाटलं असेल असं त्यांच्या प्रतिक्रियांवरून वाटतं आणि ते चांगलं झालं. 

हे मुद्दाम आज बोलण्याचं कारण काय? तर आपण वास्तविक ऑक्टोबरच्या नोंदीसोबत रेघेला थोडं थांबवणार होतो, पण नंतर एक नोंद करण्याची वेळ आली. आणि आता ही नोंदसुद्धा करण्याची वेळ आली म्हणून. वाचकांच्या प्रतिक्रियांची दखल घेण्याच्या इच्छेमुळे वेळ आली. आणि त्यासोबत गो. पु. देशपांड्यांची आठवण ठेवण्याचीही एक इच्छा जाता जाता लक्षात आली. नाटककार म्हणून मराठीत जास्त ओळख असलेल्या गो. पु. देशपांडे यांचं १६ ऑक्टोबरला निधन झालं. म्हणजे आपण ज्या दिवशी एक नोंद प्रसिद्ध केली त्याच दिवशी. त्यानंतर थोडा काही काळ नोंदींविना गेला नि आता पुन्हा थोडा काही काळ नोंदींविना जाणार आहे, त्यापूर्वी गो.पुं.ची आठवण ठेवू नि वाचकांनाही रेघेच्या थोड्या थांबण्याविषयी कळवू, या हेतूनं ही नोंद.

गो. पु. देशपांडे (२ ऑगस्ट १९३८ - १६ ऑक्टोबर २०१३)
[फोटो : 'नाटकी निबंध'च्या मलपृष्ठावरून]

गो. पु. देशपांडे यांचं रेघेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं काम सांगायचं तर त्यांनी 'रहिमतपुरकरांची निबंधमाला' या मालिका शीर्षकाखाली 'नाटकी निबंध' आणि 'चर्चक निबंध' अशी दोन पुस्तकं उभी केली. गो.पु. हे एक मिश्कील विद्वान होते, अशी त्यांची प्रतिमा या निबंधांमधून वाचकाच्या मनात आपसूक तयार होऊ शकते. हा मिश्किलपणा 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'मधे प्रसिद्ध झालेल्या लिखाणात एवढा असा नव्हता, असं आपलं सर्वसामान्य वाचक म्हणून मत आहे. पण त्यांच्या मराठी निबंधांमधे मात्र तो मुबलक सापडतो आणि प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काळ घालवलेले लोक त्यांच्याबद्दल नंतर जे बोलले त्यावरून प्रत्यक्ष त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही तो मुबलक सापडत असावा.

'चर्चक निबंधां'मधे एका ठिकाणी गो.पु. मराठी साहित्याबद्दल एक ढोबळ निरीक्षण मांडतात ते असंय पाहा :
आजचे लोकप्रिय मराठी साहित्य 'लोकप्रिय' चित्रपटापेक्षा फारसे निराळे नाही. लोकांना वाचून वाचून (पाहून पाहून) काही संकेतांची, मांडणीची काही तऱ्हांची सवय झालेली असते. त्यात अगदी सामान्य आशय व्यवस्थितपणे बसविता येण्याचे तंत्र माहिती असले तर 'लोकप्रिय' होणे फारसे अवघड नाही. मर्ढेकरांनी लय तोंडवळणी पडली आणि शब्दावर थोडी हुकमत असली की कविता लिहिणे फार अवघड नसते असे म्हणून या प्रक्रियेचे साररूप वर्णन केलेच आहे.

त्याच्या जोडीला उच्चर्गीय-उच्चवर्णीय भावभावना दुखावतील असे काही लिहू नये, शक्यतो त्यांच्या भावभावना, त्यांचे पूर्वग्रह जोपासतील असेच लिहावे हा मराठी साहित्याचा एक नियम होऊन बसला आहे. काही वैचारिक लिहायचे असेल तर गांधी थोर, मार्क्स थोर, सावरकर थोर, गोळवलकर थोर, राष्ट्र सेवादलही थोर, अशी सबगोलंकार उदारमतवादी-मानवतावादी या सर्वसाधारण शीर्षकाखाली येऊ शकेल अशी भूमिका घेतली की काम झाले. हे करणारा थोर चिंतक, विचारवंत अशी आजकाल चलती आहे.

त्याचा परिणाम नाही म्हटले तरी सार्वजनिक अभिरूचीवर होतोच. हिंदी चित्रपटाला इतके जण नावे ठेवतात म्हणून हिंदी चित्रपट बघणे कोणी सोडून देते का? ते शक्य नसते. विशुद्ध कलावादी विचारवंताला पटणार नाही इतकी कलेची आणि (दुर्दैवाने) अपकलेची ताकद असते. त्यामुळे माल विकला जातो. त्यात कमी अधिक कस असतो यात शंका नाहीय. पण 'लोकप्रिय' लेखनाचा सध्या माल (कमॉडिटी) झालेला आहे. त्याला इलाज नाही. मी त्याच्याविरुद्ध तक्रार करीत नाही. परंतु बाजारावर आधारलेल्या या समाजात ते अटळ आहे एवढेच मी म्हणतो आहे.

त्यामुळेही कदाचित् ही मरगळ जात नसावी. या सांस्कृतिकदृष्ट्या मंद, बाजारी पण उच्चभ्रू समाजाला एखादी कॅसेट लावून ऐकण्याव्यतिरिक्त साहित्यादी गोष्टीत रस राहिलेला नाही.
यावरून गो.पुं.च्या म्हणण्याचा आणि एकूणच आपण ही नोंद का करतोय याचा काहीसा अंदाज यावा. प्रसारमाध्यमांबद्दल आपण मर्यादित क्षमतेच्या का होईना पण ज्या नोंदी रेघेवर करू पाहत आलोय, त्याचा संबंध वरच्या परिच्छेदाशी आहेच आहे. गो.पुं.चे या पुस्तकांमधले निबंध काहीसे खेळकर पद्धतीचेही वाटू शकतील कोणाला, आणि त्यामुळे मतभेदालाही जागा राहते. पण ती कुठे नसते? आणि ती असते हे बरंच एका अर्थी, नायतर मतभेदालाही जागा नसणं म्हणजे डेंजर अवस्था!
संध्याकाळी 'वॉश' घेऊन 'फ्रेश' झाल्यानंतर 'कॉर्नर'वरच्या एका 'जॉईन्ट'वर 'तंदूरी' खायची त्याच्याआधी जरा 'ड्रिंक्स' घेऊ. नंतर एखादं हिंदी 'पिक्चर' आणि रात्री झोपण्यापूर्वी भीमसेन जोशींच्या 'अभंगवाणी'ची 'कॅसेट' ऐकू! सध्या लोकांच्या कलेविषयी वेगळ्या अपेक्षा नसतात. वेळ जात नाही मग कळले तर थोडे साहित्य. पु.ल. वाचू किंवा सोप्पं म्हणजे ऐकू! म्हणजे हे 'सपर' नंतर 'बेड टाईम'पर्यंतचे 'लाँगएज' जरा सुसह्य होईल.
असं गो.पुं.नी लिहिलं त्याला झाली आता बरीच वर्षं. शिवाय हे एक ठराविक आर्थिक वर्गापुरतंच निरीक्षण म्हणता येईल, पण उर्वरित जनतेच्या बाबतीत कदाचित यातले काहीच तपशील बदलतील. आणि वरचं निरीक्षण लिहिलं गेलं तेव्हा आजच्यासारख्या विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरती इतक्या अशा मराठी मालिकांच्या मालिकांवर मालिकाही सुरू नव्हत्या. तरीही आपण हे इथे रेघेवर कायतरी बडबडत बसलो. काय म्हणायचं ह्याला!

Wednesday 25 December 2013

'अन्वीक्षण' त्रैमासिकाच्या निमित्ताने नोंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६) यांनी मनुस्मृतीची प्रत जाळली ती तारीख होती २५ डिसेंबर १९२७. आजही २५ डिसेंबर आहे, आणि त्यानिमित्ताने ही नोंद 'रेघे'वर होते आहे. नोंद फक्त ओळखीच्या पातळीवरची आहे आणि रेघेपर्यंत स्वतःहून आलेल्या एका त्रैमासिकाबद्दल ती असली तरी त्यांनी पाठवलं म्हणून आपण ओळख करून दिली एवढाच नोंदीमागचा हेतू नाही. तरीही, माध्यमांशी संबंधित ह्या वेगळ्या प्रवाहातल्या घडामोडी रेघेच्या वाटचालीत स्वतःहून तिच्यापर्यंत येतायंत, त्याअर्थी आपलं बरं चाललं असावं. ही नोंद 'अन्वीक्षण' या त्रैमासिकाच्या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका विशेषांकाबद्दल आहे. 'जातीचे मानसशास्त्र आणि जात्यंताचा प्रश्न' याभोवती गुंफलेला हा अंक आहे. मुळात अंक 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक' म्हणून एप्रिल ते जून २०१३ या तीन महिन्यांसाठीचा आहे, पण प्रसिद्ध व्हायला उशीर झाल्यामुळे बहुतेक तो आपल्यापर्यंतही उशिरा पोचला असावा.

अंकाचा विषय सांगितल्यानंतर त्याबद्दल रेघेवर नोंद का व्हावी हेही स्पष्ट करता येईल. जात आणि माध्यमं यासंबंधी आपण रेघेवर फार काही बोलू शकलेलो नाही, याचा उल्लेख पूर्वीही आलेला आहे. आणि हे होऊ न शकण्यामागे आपली मर्यादा एवढंच मुख्य कारण आहे. ही मर्यादा अजूनही कायम आहे, पण तरी या विषयाशी संबंधित काम करणाऱ्यांची ओळख करून देणं तरी आपल्याला शक्य आहे. आणि तसं करणं आपल्याला आवश्यक वाटतं.

मुळात हा विषय आताच्या काळात फार महत्त्वाचाच नाही, आताच्या पिढीतले बहुतेक लोक असलं काही मानतच नाही, अशा आशयाचा मजकूर वर्तमानपत्रांमधील सदरांमधून किंवा कदाचित 'फेसबुक'वरूनही आपल्या पाहण्यात आला असू शकेल. उदाहरणार्थ, प्रसिद्ध मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक असलेले सचिन कुंडलकर यांनी काही काळापूर्वी त्यांच्या एका सदरात असं लिहिलेलं : 'नशिबाने मला आणि माझ्या पिढीच्या अनेक भारतीय तरुणांना आडनावावरून जात ओळखता येत नाही.' 'आजच्या काळातही आपण जातींच्या आधारावर आपापले गट पाडणार असू तर ज्या इतिहासामुळं आपण ते करतो आहोत, त्या इतिहासाची पर्वा न करणं, त्याकडं दुर्लक्ष करणं, हेच आपल्या हिताचं आहे. हे म्हणजे 'रिअर व्ह्यू मिरर'मध्ये बघून कार चालवण्यासारखं आहे.' (लेखाचं शीर्षक- 'इथे कुणाला हवेत पुतळे?', सदराचं नाव- 'अलिखित', प्रसिद्धी - 'सकाळ'ची रविवार पुरवणी 'सप्तरंग' १६ जानेवारी २०११.)

पण प्रत्यक्षात जातवास्तव हा आपल्या एकूण वास्तवाचा किती प्रमाणात भाग आहे, याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. नायतर नेणीव आहेच, असं कोणतरी म्हणेल. ही जाणीव ठेवण्याची आवश्यकता विलास सारंगांनी त्यांच्या 'मॅनहोलमधला माणूस : मराठी वाङ्मय, समाज व जातिवास्तव' (मौज प्रकाशन) या पुस्तकात अशी सांगितलेय :
लेखकाला विविध प्रकारच्या वास्तवाला सामोरं जावं लागतं. काही प्रकारचं वास्तव लेखकाला नकोसं वाटलं, त्याचं समूळ उच्चाटण झालं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटलं, तरी मानवी वास्तव- सार्त्र आपल्याला आठवण करून देतो त्याप्रमाणे- आपल्या स्थानाचा स्वीकार करायला बांधील असतं. त्या एका गोष्टीवर आपल्या मानवी वास्तवाचं काहीच नियंत्रण नसतं.
म्हणूनच कदाचित काही अप्रिय वास्तवाला टाळणारा लेखक झुकत्या वयांत त्या वास्तवाची अधिकृत दखल घ्यायला राजी होतो. तो प्रामाणिक, अवधानी लेखक असेल, तर त्याने अशा वास्तवाला आपल्या सर्जनशील लेखनात कुठेतरी स्थान दिलेलं असतंच. पण आता जरा पुढे जाऊन तो या वास्तवाची बुद्धिनिष्ठ रीतीने चिकित्सा करायला तयार होतो. वय होण्याचं एक बरं असतं; बऱ्याचशा गोष्टी अशा भासू लागतात, की आपला त्यांच्याशी काही आता विशेष संबंध नाही; त्यांच्याशी आपलं काही प्राणांतिक सोयरसुतक नाही. 'आपलं स्थान' म्हणून कित्येक वर्षं- बहुतांश जीवनभर- ज्याचा आपण विचार करत असतो, ते स्थान 'आपलं' फार काळ राहण्याची शक्यता नसली, तर आपण आपोआपच त्याकडे परकेपणाने पाहू लागतो.
टाळता आलं असतं तर बरं असं वाटण्याजोगं वास्तव म्हणजे जातिवास्तव.
सारंगांच्या ज्या पुस्तकातला उतारा आपण वर दिला त्या पुस्तकात सारंगांनी जातवास्तवाच्या संदर्भात लेखकपणाचे व्यक्तिगत अनुभव आणि मराठी साहित्यव्यवहाराबद्दलची त्यांची यासंबंधीची चिकित्सा असा मेळ घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. पण हा विषय एवढा आणि इतका गुंतागुंतीचा आहे की याबद्दल कोणताही एक माणूस काही परिपूर्ण बोलू शकेल असं एक सर्वसामान्य वाचक म्हणून आपल्याला वाटत नाही. पण म्हणून हे वास्तवच नाकारण्यात काहीच अर्थ नाही. मग त्या वास्तवाचा अर्थ लावायचा कसा?

अन्वीक्षण (वर्ष : ३, अंक : ४), एप्रिल ते जून २०१३
[मूळ मुखपृष्ठाचे छायाचित्र इथे तांत्रिक अडचणीमुळे खराब]
ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात 'अन्वीक्षण'चा ताजा अंक उपयोगी पडू शकतो. सेंट अँड्र्यूज विद्यापीठातल्या (स्कॉटलंड) 'स्कूल ऑफ सायकॉलॉजी अँड न्यूरोसायन्स'मधे पीएच.डी. संशोधन करत असलेले यशपाल जोगदंड या अंकाचे अतिथी संपादक आहेत. आणि अंकामधे डॉ. रावसाहेब कसबे (जातिअंत आणि जातीच्या मानसशास्त्राची शक्यता), कॉम्रेड शरद् पाटील (जात्यन्ताची दिग्नागीय 'स्व-लक्षणी' समाजक्रांती), डॉ. आनंद तेलतुंबडे (जातीच्या सातत्यामागचे मानसशास्त्रीय घटक), गौतमीपुत्र कांबळे (जातीचे मानसशास्त्र आणि जातिनिर्मूलनाचा प्रश्न), ललित जोशी (हिंदी सिनेमातील दलित प्रतिमा : नवी सामाजिक जाणीव हवी), विलास पाध्ये (जातिविषयक मनोबिंब व बोधात्मक संसाधनांचा अभाव), डॉ. राजू जाधव (आशिस नंदी, भ्रष्टाचाराची जात आणि दलित सेन्सरशिप), शमशुद्दीन तांबोळी (भारतीय मुसलमानांतील जातिव्यवस्था), राजू अडागळे (जातिअंतातील अडथळे : ग्रामीण महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील अनुभव), भीमराव हटकर (अनुसूचित जाती ह्या मूळच्या 'बौद्ध' : एक इतिहाससिद्ध सत्य), पांडुरंग भोये (भारतीय स्वातंत्र लढ्यातील आदिवासी स्वातंत्र्यवीर जननायक तंट्या भिल्ल), दत्ता भगत (बिसापाच्या गोष्टी) असे एकूण बारा लेख आहेत. यातल्या लेखांचे तपशील कंसांमधल्या शीर्षकांमधून कळतायंत त्या पलीकडे देणं या नोंदीच्या मर्यादेत शक्य नाही.

या अंकामधल्या आपल्या अतिथी संपादकीयामध्ये जोगदंडांनी 'अन्वीक्षण'च्या या अंकाची एक मर्यादा सांगितलेय ती अशी :
... या विशेषांकातील सर्व लेखांच्या गुणवत्तेची खात्री असतानाही जातीच्या मानसशास्त्रासंबंधी वाचकांच्या मनातील प्रश्नांना कितपत उत्तरे मिळतील याबद्दल मी साशंक आहे. या ठिकाणी मला थॉमस पिंचोन (Thomas Pynchon) या कादंबरीकाराचे एक वाक्य आठवते आहे जे कदाचित शोषक त्यांच्या हातातील शोषितांच्या मनाचे प्रभावी हत्यार कसे वापरतात हेही दर्शविते. थॉमस पिंचोन म्हणतात, 'If they can get you asking wrong questions, they don't have to worry about the answers.' अर्थात, जर तुम्हाला त्यांनी चुकीचे प्रश्न विचारायला लावले तर त्यांना उत्तरांची चिंता करावी लागत नाही. शोषकांनी जर शोषितांना चुकीचे प्रश्न विचारायला लावले तर शोषितांना उत्तरे अचूक मिळूनही काय उपयोग आहे? कारण सर्व प्रश्नच चुकीचे होते. उत्तरांची आम्ही काही हमी देत नाहीयोत हे कदाचित चांगले आहे. कारण उत्तरापेक्षा आपण प्रश्न कोणता विचारता हे अधिक अर्थपूर्ण आहे. दलित-शोषित समाजाने प्रश्न विचारूच नयेत अशीच आजवर तजवीज केली गेली आहे, असे आम्हाला वाटते. या पानाच्या पल्याड वाचकांना सुटसुटीत उत्तरे कदाचित मिळणार नाहीत पण एक नवीन दिशा आणि नवोन्मेषी प्रश्न विचारणारी प्रज्ञा जरूर भेटेल याची आम्हाला खात्री आहे.
रेघेवर या अंकाच्या निमित्ताने 'अन्वीक्षणा'बद्दल नोंद करण्याचं हेही एक कारण आहे. आपण रेघेवरच्या नोंदींमधे अनेकदा उत्तरापेक्षा प्रश्न जरा नीट लिहायचा प्रयत्न केलाय. पण एखाद्या प्रश्नाच्या वेगवेगळ्या मांडण्या समजून घेण्यासाठी आपल्यासारख्या सर्वसामान्य मराठी वाचकांना उपलब्ध असलेले नियतकालिक स्वरूपातले मार्ग दिवसेंदिवस कमी होत जातील, असं दिसतंय. आणि म्हणून आपण 'अन्वीक्षण' या त्रैमासिकाबद्दल ही नोंद केली. (अन्वीक्षण : अनुवेख म्हणजे अन्वीक्षण हा शब्द अशोकाच्या शिलालेखात वारंवार आढळतो. ईश म्हणजे पहाणे. त्याला अनु हे विशेषण जोडून 'अन्वीक्षण' हा शब्द बनला आहे. हे दोन्ही अर्थ एकत्र केले तर अन्वीक्षणचा अर्थ होतो- पहाणे, जाणणे, गहन, आत्मपरिक्षण, चिंतन, पुनर्विचार, अर्थ व कारणांचा विचार, परीक्षा करणे किंवा तपासून पहाणे आणि शेवटी सहमती. --- अंकाच्या मलपृष्ठावरून)

जाता जाता एक सांगण्यासारखं म्हणजे, आता समजा आपल्याला प्रश्न पडलाच की डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं, त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या बाजू कोणत्या? तर ह्यावर वाचण्यासारखं एक पुस्तक म्हणून आपल्याला कोणीतरी सांगेल की, नरहर कुरुंदरकरांनी लिहिलंय ना, 'मनुस्मृती : काही विचार' (लोकवाङ्मय गृह, १९८३) असं पुस्तक. पण मग आपल्याला असंही कळेल की, हे पुस्तक आता बाजारात उपलब्ध नाही. मग आपल्याला कोणी असं सांगेल की, मग त्यासंबंधी शरद् पाटलांनी लिहिलंय ना परीक्षण स्वरूपात, कुठे लिहिलंय बरं.. 'सत्यशोधक मार्क्सवादी'च्या अंकात असेल कुठेतरी (कुरुंदकरांची स्मृती व मनुस्मृती : सत्यशोधक मार्क्सवादी, जुलै-ऑगस्ट १९८३). पण हा अंकही आपल्याला सहजी उपलब्ध होऊ शकणार नाही. मग कोणीतरी सांगेल की, अरे पण पुणे विद्यापीठाशी संलग्न असा कायतरी दस्तावेजीकरणाचा उपक्रम आहे, त्यात सापडेल तुम्हाला या अंकाची पीडीएफ प्रत. मग तसं शोधलं कोणी तर कळेल की ह्या दस्तावेजीकरणात अजून पाटलांच्या अंकांचं दस्तावेजीकरण झालेलं नाही. तरी एक सापडेल ते म्हणजे याच विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे काढल्या जाणाऱ्या 'परामर्श' ह्या त्रैमासिकाच्या १९८३ सालच्या एका अंकात कुरुंदकरांच्या पुस्तकाचं परीक्षण आलेलं आहे. मग त्यावर आपण समाधान मानू. किंवा असेल हिंमत तर उदास, भकास मराठी ग्रंथालयांच्या कपाटांमधे शोधाशोध करू.

अशा ह्या मराठीतल्या चर्चापीठांच्या कमी होत जाण्याच्या काळाचीही नोंद ह्या निमित्ताने झाली. जाता जाता एक प्रश्न : छापील नियतकालिकांच्या रूपातल्या चर्चापीठांची मराठीतली कमतरता काही मराठी संकेतस्थळांमधून वेगळ्या प्रकारे भरून निघू शकेल का?
एक उत्तर : शक्यता आहे.
***

अन्वीक्षण : कार्यालयीन पत्ता-
द्वारा - सी. पी. थोरात, सं. नं. ७४अ, प्लॉट नं. १३, कॉलनी नं. ४, श्रावस्तीनगर, घोरपडी, पुणे - ४११ ००१.
फोन : ०२० - २६८१४३५३