![]() |
| आवरण : अकिला शेषशायी / नवयान पब्लिशिंग |
![]() |
| रामचंद्र सिंग (आभार : नवयान पब्लिशिंग) |
![]() |
| अकिला शेषशायी / नवयान पब्लिशिंग |
![]() |
| आवरण : अकिला शेषशायी / नवयान पब्लिशिंग |
![]() |
| रामचंद्र सिंग (आभार : नवयान पब्लिशिंग) |
![]() |
| अकिला शेषशायी / नवयान पब्लिशिंग |
वृत्तछायाचित्रकार किंवा फोटोजर्नलिस्ट रघू राय यांचं काल (२६ एप्रिल) वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झालं. ते एक महान फोटोग्राफर होते. त्यांनी शब्दांच्या भाषेचा वापर करून मांडलेली काही मतं न पटणारी असली तरी कॅमेऱ्याचा वापर करून प्रकाश नि सावल्या यांच्या साक्षीने मांडलेली निरीक्षणं बरीचशी पटत राहिली, भावत राहिली. त्यामुळे ते गेल्यामुळे एक प्रकारचा अभाव जाणवला.
![]() |
| रघू राय (१९४२ - २०२६) छायाचित्र सौजन्य : इंडिया टुडे |
'खिडकीचा आरसा' या नावाच्या कादंबरीत एक फोटोग्राफर असतो. हळूहळू त्याच्या फोटोग्राफीविषयीच्या धारणा कोलमडतात आणि तो आधी मनापासून करत असलेली पत्रकारी फोटोग्राफी सोडतो आणि फक्त पैशापुरती लग्नसमारंभांपुरती फोटोग्राफी सुरू करतो. त्याचा एक संदर्भ रघू राय यांच्याशी जोडलेला असतो, तो असा (मूळ मजकुरात थोडा बदल केला आहे) :
रघू रायचं ‘एक्स्पोजर: पोर्ट्रेट ऑफ ए कॉर्पोरेट क्राइम’ नावाचं एक फोटोंचं पुस्तक आहे. ते त्याला एका प्रदर्शनात स्वस्तात मिळालं. त्यातले फोटो बघून तो हलला होता. १९८०च्या दशकात भोपाळमध्ये युनियन कार्बाइड या कंपनीच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली. घटना घडली तेव्हा त्याचे दुष्परिणाम लोकांवर झालेच, पण नंतरही तसे परिणाम होत राहिले. रायने घटना घडल्यावर लगोलग काढलेले काही फोटो आणि सतरा वर्षांनी पुन्हा भोपाळमध्ये जाऊन काढलेले फोटो, असं ते पुस्तक. सर्व फोटो काळे-पांढरे.
Raghu Rai / Greenpeace असे फोटो आपण काढावेत, असं त्याला वाटलं. हे का वाटत असतं? असे फोटो बघून बघणारे हेलावतील, त्यांच्या संवेदनांना हात घातला जाईल, कुठल्या तरी समस्येकडे लक्ष वेधलं जाईल, ती समस्या सुटेल, किमान त्याबद्दल बोललं जाईल- ही बाहेरची कारणंच फक्त असतील? आपण चांगले फोटो काढतोय, समोरच्या दुःखालाही सुंदर चौकट देऊ पाहतोय, आपलं फोटोग्राफर म्हणून कुठेतरी नाव नोंदवलं जाईल, आपल्याला आत्ताच्याआत्ता समोरच्या परिस्थितीत हवा तसा तत्काळ बदल करता येत नसेल तर परिस्थिती गोठवण्याची महत्त्वाकांक्षा- ही आतली कारणंही असतील? त्याने पंधरा वर्षांपूर्वी या प्रश्नांचा विचार केला नव्हता. पहिल्यांदा त्याने रघू रायचं पुस्तक बघितलं, इतर फोटोग्राफरांनी काढलेले फोटो बघितले, तेव्हा हा विचार त्याच्या मनात आला नव्हता. आपल्याला शब्द न वापरता काहीतरी सांगायला मिळतंय, जगाशी संवाद साधायचं माध्यम मिळतंय, असा त्याचा फोटो काढतानाचा समज होता. पण तो समज हळूहळू विरत गेला.
रघू राय भोपाळमधे रघू रायने काढलेला एक फोटो खूप गाजला. गॅस गळती झाली तेव्हा तत्काळ तीनेक हजारांहून अधिक लोक मेले, नंतरही त्या परिणामांनी किमान तितकेच लोक मेले, मग नंतरच्या काळात मरतही राहिले, इतरही लाखो लोकांच्या आरोग्यावर त्या आपत्तीचे विपरित परिणाम होत राहिले. या सगळ्या परिणामांची ठोस प्रतीकात्मक प्रतिमा म्हणून रघू रायचा एक फोटो ओळखला गेला. फोटो काळा-पांढरा. दोन डिसेंबर १९८४ला गॅसगळती झाली, चार डिसेंबरला काढलेला हा फोटो आहे. पाचेक वर्षांच्या एका मुलीचं प्रेत पुरलं जातंय. अर्धं मातीतच आहे. थोडा पोटाचा भाग, आणि चेहरा, कपाळ, डोक्याचा काही भाग वर आहे- दिसतंय. ओठ किंचित विलग. डोळे उघडे स्फटिकासारखे पांढरे मोठे. कपाळापाशी कोणत्यातरी माणसाचा उलटा पंजा तेवढा दिसतो. ते मूल कोणाचं होतं, हे कळू शकलं नाही. पुस्तकात फोटोखालच्या ओळींमध्ये लिहिलं होतं: ‘बरिअल ऑफ अॅन अननोन चाइल्ड: हे अनोळखी मूल युनियन कार्बाइड या अमेरिकी रासायनिक कंपनीमुळे घडलेल्या जगातील सर्वांत भयंकर औद्योगिक आपत्तीची खूण ठरली. या मुलाचे पालक कोणालाही माहीत नाहीत आणि कोणीही या छायाचित्रावर दावा सांगण्यासाठी पुढे आलेलं नाही.’मेलेलं मूल हा मुलगा असल्याचं त्या पुस्तकातल्या उल्लेखावरून वाटतं. प्रत्यक्षात ती मुलगी असल्याचं इतर ठिकाणी नोंदवलेलं आढळतं. लिंग काहीही असलं तरी ते मूल कोणाचं होतं, हे कळलं नाही. अज्ञात, निनावी मेलेली मुलगी. राय या अनुभवाबद्दल म्हणाले, 'आम्ही, छायाचित्रकार गिधाडांसारखे मृतदेहांच्या शोधात होतो. नाट्यमय छायाचित्रं तिथेच मिळत होती.'
वरच्या उद्गारांसारखी भावना त्याला स्वतःबाबत जाणवायला लागली, तेव्हा तो उदासीन होत गेला.
![]() |
| मुखपृष्ठ : अवधूत डोंगरे / प्रफुल्लता प्रकाशन |
रघू राय २०२३ साली दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले :
तुम्ही संबंधित गोष्टीच्या पुरेसे जवळ नसाल, तर तुमचं छायाचित्र पुरेसं चांगलं येणं शक्य नाही.
पण एखाद्या माणसाला क्लिक करण्यासाठी आवश्यक 'पुरेसं' अंतर गाठलं गेल्याचं वाटलंच नाही तर काय होईल? असे प्रश्न आता रघू राय गेल्यावर आणि अधिकाधिक हातांमध्ये स्मार्टफोनांच्या माध्यमातून कॅमेरा असल्यावर नोंदवण्यात कितपत अर्थ आहे, माहीत नाही. रघू राय यांनी कित्येक छायाचित्रं काढली आहेत, त्यांच्याबद्दल आता बरंच लिहूनही आलं आहे. त्यांच्या नावाचं सर्च मारल्यावर अनेक छायाचित्रंही गुगलवर पाहायला मिळतात. ही नोंद फक्त त्यांचा परिणाम झालेल्या एका कोपऱ्याबद्दलची.
यापूर्वी रेघेवर आलेले रघू राय यांचे फोटो :
जानेवारीत करायची नोंद आता एप्रिलमध्ये होते आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे उशीर झाला.
'अॅमेझॉन इंडिया'ने सध्या 'और दिखाओ' अशा घोषवाक्यासह काही जाहिराती केलेल्या दिसतात. आधीही केल्या होत्या काही वर्षांपूर्वी. या जाहिरातींमध्ये तरुण मुलं-मुली अॅमेझॉनची वेबसाइट उघडून स्वतःला काय विकत घेता येईल, ते बघत असतात. मग त्यांना सतत काही ना काही वस्तू दिसतच राहते, त्याने कधी त्यांचे डोळे चमकतात, कधी त्यांना अत्यानंद होऊन ते हसत सुटतात, कधी नाचत राहतात. एकंदर आनंदच आनंद आत-बाहेर सर्वत्र. आपल्या पसंतीचं, आपल्या खिश्याला परवडेलसं आणि अगदी वेळेत आपल्यापर्यंत पोचवणारं संकेतस्थळ म्हणून अॅमेझॉनची ही जाहिरात समोर येते. तसं म्हटलं तर, काही वस्तूंबाबत तिथून खरेदी सोयीस्कर असल्याचा अनुभव येतोही. पण त्याची वखवख सुटण्याचीही शक्यता असते- जाहिरातीत वखवख दाखवलेली आहे, सोय नाही.

![]() |
| अॅमेझॉन जाहिरात |
असं बरंच काही बघायला असण्याच्या काळात रेघेवर लिहून केलेल्या नोंदी आहेत. तीस वर्षांपूर्वी अॅमेझॉनची सुरुवात झाली तेव्हा ते मुळात पुस्तकविक्रीचं ऑनलाइन दुकान होतं. मग हळूहळू इतर वस्तूंचा विस्तार त्यात केला गेला. आत्ताही अनेक पुस्तकं इतर कुठे मिळणं शक्य होत नाही ती तिथे मिळतात, स्वस्तात मिळतात. पण पुस्तकंही कदाचित इतर वस्तूंसारखीच होऊन जाण्याची शक्यता आहेच (किंबहुना खुद्द लिहिणंच तसं होण्याची शक्यता उघडच आहे). नुसतं विकत घेत सुटायचं, बघायचं त्यांच्याकडे, सोशल मीडियावर त्यांचे फोटो टाकायचे, मग पुन्हा इतर वस्तूंकडे किंवा प्रतिमांकडे किंवा पॉडकास्टांकडे किंवा नुसतंच इकडून तिकडे कुठेतरी कशाततरी वळायचं. (त्यात आज 'पुस्तक दिन' आहे!) पण हे सगळं बहुधा 'और दिखाओ'च्या काळात स्वाभाविकच.
त्याआधी जून महिन्यात छत्तीसगढमधील बस्तर इथले आदिवासी नेते मनिष कुंजाम यांची खास 'रेघे'साठी फोनवरून घेतलेली मुलाखत प्रसिद्ध केली. कुंजाम हे छत्तीसगढमधील बस्तर भागात गेली जवळपास चार दशकं राजकीय-सामाजिक कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहेत. छत्तीसगढ राज्याची निर्मिती होण्याआधी तत्कालीन मध्य प्रदेश विधानसभेमध्ये ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) वतीने दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेले. त्यांनी आदिवासी प्रदेशांमध्ये विकासाच्या नावाखाली विध्वंस होऊ नये, याबद्दल काही सावधानतेच्या सूचना देत मत मांडलं. ती नोंद अशी : आदिवासी गावाच्या गोष्टीतून विकासाची दृष्टी यावी : मनिष कुंजाम. मध्य भारतातल्या नक्षलवादी चळवळीचा जवळपास बिमोड होत आला असतानाच्या परिस्थितीविषयी त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली.
या व्यतिरिक्त केलेल्या नोंदींचा तपशील असा :
एकीकडे गडचिरोली हे पोलादाचं केंद्र होऊ घातल्याच्या जाहिराती बघितल्या आणि दुसरीकडे 'जोरम' नावाचा एक चित्रपट बघितला, मग बस्तरमध्ये पत्रकाराची हत्या झाल्याची बातमी वाचली, आणि मराठीतले आद्य पत्रकार गणले गेलेले बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण'चा पहिला अंक काढला त्या ६ जानेवारीचं निमित्त आलं, मग नोंद केली : जाहिराती, 'जोरम', जर्नलिस्ट, जांभेकर.
किंवा, गडचिरोलीतच गोंडी माध्यमाची शाळा सुरू करायचा प्रयत्न मोहगावच्या ग्रामसभेने केला, तर त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी प्रशासनाने त्यावर कारवाईचा बडगा का उचलला, याबद्दलची नोंद : गोंडी शाळेला प्रति दिवस १० हजार रुपये दंडाची नोटीस कशासाठी?
किंवा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, त्या संदर्भात केलेल्या तीन नोंदी : (१) 'हिंदीसक्ती'बाबत एक निवेदन, (२) 'मराठमोळ्या माधुरीचं मराठी' ऐकणारे एंगूगींचं म्हणणं ऐकतील काय? आणि (३) आदिभारती : सक्तीऐवजी सह-अनुभूती राखणारं भाषाशिक्षण!
माध्यमांविषयी अधूनमधून नोंदी करत राहाव्या असं आधीपासूनच ठरून गेलेलं असल्यामुळे त्यासंबंधीच्या दोन नोंदी : (१) तुकाराम बीज : माध्यमांच्या 'मसाजा'मध्ये माणूस मश्गुल! आणि (२) मोदी, मुस्लीम, माओवादी, मेकॉले आणि माध्यमं. यातली एक नोंद एकंदरच माध्यमव्यवहारासंबंधीची होती, तर दुसरी नोंद सध्याच्या राजकीय वातावरणाच्या संदर्भात माध्यमांबद्दल टीकाटिप्पणी करू पाहणारी होती.
दरम्यान, साहित्याविषयीच्या काही नोंदी केल्या. शरद् पाटलांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि व्यंकटेश माडगूळकरांच्या स्मृतिदिनानिमित्त ''माणदेशी माणसे'मधल्या 'मी'च्या मर्यादा' अशी नोंद केली. काफ्काची शेवटची प्रेयसी ठरलेल्या डोरा डायमन्टच्या चरित्राला धरून केलेली 'काफ्काच्या शेवटच्या प्रेयसीने सांगितलेली गोष्ट' ही एक नोंद; अरविंद कृष्ण मेहरोत्रांनी कबिराच्या काही रचनांचं इंग्रजी भाषांतर केलंय, त्याबद्दल काही टीकात्मक निरीक्षणं नोंदवण्याचा प्रयत्न करणारी 'अरविंद कृष्ण मेहरोत्रांच्या कबिराचं कवित्व' ही नोंद; आणि भाऊ पाध्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं, त्या निमित्ताने केलेली 'भाऊ पाध्यांच्या सुंदर 'बगीचा'तलं सौंदर्य' ही नोंद, असाही काही मजकूर लिहिला गेला.
बेला भाटिया यांच्या 'इंडियाज् फरगॉटन कंट्री' या पुस्तकाचं परीक्षण 'विस्मृतीच्या विरोधात' या शीर्षकाखाली लिहिलं. वृत्तवाहिन्यांच्या, वृत्तपत्रांच्या, किंवा आपल्या एकंदरच माध्यमव्यवहाराच्या प्रकाशाबाहेर राहणाऱ्या, आणि मुख्यप्रवाही राजकीय-अर्थकारणामध्ये विसर पडलेल्या काही भागांविषयीचे आणि प्रश्नांविषयीचे लेख भाटियांच्या पुस्तकात आहे. त्यात कुठे क्वचित मतभिन्नताही वाटली, तरी त्यासकट त्यांचं काम आपला परिसर समजून घेण्यासाठी महत्त्वाचं असल्यामुळे या पुस्तकाबद्दल लिहिलं.
या सगळ्यांत काही सूत्रं समान असल्याचं दिसतं. ती सूत्रं 'दिसणं', 'दाखवणं', 'बघणं', या कृतींशीही जोडलेली आहेत. माध्यमांनी या कृतींबाबतीत घडवलेले बदल गुंतागुंतीचे आहेत, त्यामुळे त्याबद्दल इथे बोललं जातं. तसंच, या प्रक्रियेत मग कोणत्या गोष्टी नजरेआड होतात, याबद्दल थोडं बोलून आपल्या मर्यादित समजुतीनुसार काही गोष्टींकडे लक्ष वेधायचाही प्रयत्न केला जातो. त्यासाठी आपण भाषा वापरतो, म्हणून भाषावापराचा मुद्दा येतो. तर, भाषा नि अर्थ यांचं सहितपण साहित्यात अपेक्षित असल्यामुळे साहित्य तर आहेच आहे. कोणी ना कोणी या सहितपणाशी संवाद साधू पाहतं. वेळ घालवायला बोलण्यापुरतं तरी.
नवीन नोंद इथे प्रसिद्ध झाल्याचं कळण्यासाठी व्हॉट्स-अॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक इथे रेघेची पानं उघडली. पण साधारपणे सतत सक्रिय राहिलं तर यांचा उपयोग होतो. तेवढी सक्रियतेची सक्ती स्वतःवर नि वाचकांवरही शक्य नसल्यामुळे फेसबुक-पानाचा काहीच उपयोग नाही खरं म्हणजे. त्या तुलनेत व्हॉट्स-अॅप नि इन्स्टाग्राम इथल्या पानांवरून इच्छुक वाचकांना रेघेच्या नोंदींची माहिती मिळू शकेल. उजव्या समासात त्यांच्याकडे जायचे दुवे दिले आहेतच, इथे हे परत.

![]() |
| गजानन बुक डेपो, १९९० |
![]() |
| मा. प. मंगुडकर (१९२९-२०२३) |
जॉन ड्युईचं तत्त्वज्ञान फलप्रामाण्यवादावर उभारलं आहे. किंवा ड्युईच्या शब्दांत सांगायचं झालं तर ते साधनवादावर (Instrumentalism) उभारलं आहे. एकोणिसाव्या शतकातील उपयुक्ततावाद वा अनुभवप्रामाण्यवाद यांच्यापेक्षा हे तत्त्वज्ञान काही मूलभूत प्रश्नांबाबत वेगळं आहे. डॉ. आंबेडकरांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, ऐतिहासिक प्रश्नांची जी चिकित्सा केली आहे, त्या चिकित्सा पद्धतीचा तात्त्विक पाया ‘साधनवाद’ आहे असं दिसून येईल. हा एकाच विचाराचा पाया त्यांच्या सर्व तत्त्वचर्चेतून धावताना आढळेल. [...] या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणारे व या दृष्टिकोनातून विविध भारतीय प्रश्नांची उत्तरं शोधणारे एक नामवंत भारतीय विचारवंत म्हणून जगाच्या इतिहासात त्यांचा उल्लेख करावा लागेल.
![]() |
| HarperCollins, 2023 |
They may be devils. But they have got good ideas! [ते सैतान असतीलही, पण त्यांच्याकडे काही चांगल्या कल्पना आहेत!]. पण ठराविक चाकोरीतून समाजाला विशिष्ट तत्त्वज्ञानाने वळण लावण्याची कल्पना मला पसंत नाही. नेहमी समाज experimental stageमधे (प्रयोगावस्था) असला पाहिजे. नव्या कल्पनांना, विचारांना आणि प्रयोगांना त्यात वाव असला पाहिजे. एका लेखणीच्या फटकाऱ्यानं आदर्श असा समाज कुणालाही निर्माण करता येणार नाही. प्रयोगावस्थेतूनच आदर्श जग हळूहळू निर्माण होत असतं. [...] माणसाच्या मनाचा विकास होण्याला स्वातंत्र्य पाहिजे. एका ठराविक ठशानं माझ्या खुर्च्या कुणी तयार केल्या तर त्या मला आवडणार नाहीत. माझ्या खुर्च्या थोड्या वेगळ्या असलेल्या मला आवडतील!
![]() |
| डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६). मुंबईतल्या घरामध्ये खुर्चीत, १९४६ साली. छायाचित्र : मार्गारेट बर्क-व्हाइट / लाइफ मॅगेझिन |
![]() |
| थ्री-डी चित्रपट पाहणारे प्रेक्षक, २६ नोव्हेंबर १९५२ (छायाचित्र : जे. आर. आयरमन; 'लाइफ') |
अमेरिका-व्हेनेझुएला
या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात अमेरिकेच्या सैनिकांनी व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना त्यांच्या घरात घुसून पत्नीसह उचललं आणि अमेरिकेत अटकेमध्ये ठेवलं. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष अमेरिकेच्या दिशेने अंमली पदार्थांची तस्करी करत होते, असा साधारण ढोबळ आरोप अमेरिकेच्या अध्यक्षांनी केला. शिवाय, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष अवैध पद्धतीने सत्तेवर आले, इत्यादी आरोपही स्वतंत्रपणे होत आलेले आहेत. त्यावरचा उपाय म्हणून ही 'कारवाई' केल्याचा अमेरिकी अध्यक्षाचा दावा. आता एका सार्वभौम राष्ट्राच्या अध्यक्षावर अमेरिकेत न्यायालयीन कामकाज चालेल! त्यातल्या राजकारणाचा भाग किंवा तेलाच्या साठ्यांसाठी होणारं सत्ताकारण साधारणपणे आपल्याला माहीत असेल किंवा नसेल. पण या कारवाईबद्दल अमेरिकी अध्यक्ष काय म्हणाले ते बघण्यासारखं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, "मी ते अगदी एखादा टीव्हीवरचा कार्यक्रम बघावा तसं बघितलं. त्यातला वेग, हिंसा, तुम्ही बघितलं असतंत तर लक्षात आलं असतं... मी असं काही आधी कधीच बघितलेलं नाही. मला ते प्रत्यक्ष सुरू असताना त्याच वेळी बघायला मिळालं, आणि त्यातली प्रत्येक गोष्ट मी बघितली. त्यातली व्यावसायिक सफाई, नेतृत्वाची गुणवत्ता, हे सगळं चकित करणारं होतं. अमेझिंग!" एकंदर यातला वेग बघता बहुतेकांनी अशा मोहिमेचा भाग होणं टाळलं असतं, असं अमेरिकी अध्यक्ष म्हणतात. पुढे ते वृत्तवाहिनीच्या निवेदकांपैकी चार्ली या निवेदकाचा उल्लेख करत म्हणतात, "पण चार्ली खूप शूर आहे, तो गेला असता तिथे. हे टीव्हीवर बघायला हवं." (फॉक्स न्यूज, ३ जानेवारी २०२६). व्हेनेझुएलातल्या या मोहिमेचं 'थेट प्रक्षेपण' अमेरिकी अध्यक्ष बघत असतानाचे फोटोही 'व्हाइट हाउस'ने प्रसिद्ध केले.
![]() |
| अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांवरील कारवाईचं 'थेट प्रक्षेपण' पाहत असताना |
चित्रपटाच्या पहिल्या भागात मुख्य खलनायक म्हणून दाखवलेलं पात्र ल्यारीमधील एका गुंड-टोळीच्या म्होरक्याचं आहे. हे पात्र एका अरबी गाण्यावर मिनिटभर विशिष्ट 'मस्तमौला' शैलीत हात-पाय हलवतं, त्यातला काही सेकंदांचा भाग प्रचंड व्हायरल झाला (मूळ गाणं बहारीनमधल्या अरबी बँडचं, त्याचं चित्रपटातलं चित्रण मात्र बलोचिस्तानातलं एखादं लोकगीत असावं अशा तऱ्हेने केलेलं. पण असले तर्क याबाबतीत निरर्थकच). हा खलनायक बलोच आहे. पाकिस्तानात नैऋत्येला असणाऱ्या, स्वायत्ततेची मागणी करणाऱ्या बलोचिस्तान प्रदेशाशी त्याची काहीएक बांधिलकी आहे, पण तरी पाकिस्तानी मुख्य धारेतल्या राजकारण्यांशी साटंलोटं असल्यामुळे शेवटी त्याची कृत्यं बलोच लोकांशीही प्रतारणा करणारी ठरतात. त्याने पुरवलेल्या शस्त्रांचा वापर मुंबईतील २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात झाल्याचं चित्रपटात दाखवलं आहे. या खलनायकाच्या हाताखालील पहिल्या फळीत भारतीय गुप्तहेर घुसलेला असतो. २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचं थेट प्रक्षेपण तेव्हा वृत्तवाहिन्यांनी केलं, ती दृश्यं भारतीयांप्रमाणे पाकिस्तानातही पाहिली गेली. वर उल्लेख आलेल्या पाकिस्तानी गुंड-टोळ्यांचे धुरीण, राजकीय-गुप्तचर रचनांमधले धुरीणही ही दृश्यं पाहत असल्याचं या चित्रपटात आपण बघतो. त्यांना हे पाहून आनंद होतो. पण ते पाहून नायक असणारा भारतीय गुप्तहेर हादरतो. मग तो ही रचना कोसळवण्याचा निर्धार करतो.
![]() |
| 'धुरंधर'मधील एक दृश्य (श्रेय : चित्रपटाचे निर्माते) |
आपल्या युगामध्ये प्रत्यक्ष गोष्टीपेक्षा तिच्या प्रतिमेला पसंती दिली जाते. मूळ गोष्टीपेक्षा तिची नक्कल पसंत केली जाते, वास्तवापेक्षा प्रतिमा, असतेपणापेक्षा दाखवलेपणा.. यांना पसंती मिळते... या युगाला केवळ भ्रामकता पवित्र वाटते, आणि सत्य अपवित्र वाटतं. त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या दृष्टीमध्ये ही पावित्र्याची धारणा इतकी मिसळून जाते की सत्य विरून जातं आणि भ्रामकता वाढत जाते. यातून भ्रामकता सर्वोच्च पातळी गाठते आणि तीच पावित्र्याची सर्वोच्च पातळी मानली जाऊ लागते.
![]() |
| 'द सोसायटी ऑफ द स्पेक्टॅकल'- ब्लॅक अँड रेड यांनी प्रकाशित केलेल्या पहिल्या आवृत्तीचं पूर्ण आवरण (श्रेय : pleasures of the past times) |
देबो यांनी मार्क्सवादी दृष्टीने सूत्ररूपात मांडणी केली आहे. यातली अनेक सूत्रं आजच्या जगण्याकडे बघताना लागू होणारी वाटतात. उदाहरणार्थ, 'आपलं (आधुनिक उत्पादनसंबंध राखणाऱ्या समाजांचं) जगणं म्हणजे देखाव्यांचा प्रचंड मोठा संचय असतो. प्रत्यक्ष जगण्याने माघार घेतली असून त्याची जागा प्रतिमांनी घेतली आहे', हे या पुस्तकातलं पहिलंच सूत्र. हा प्रतिमांचा संचय म्हणजे देखावा, पण 'केवळ प्रतिमांना गोळा केलं की झाला देखावा असं नसतं, तर प्रतिमांच्या मध्यस्थीने घडणारे लोकांमधील सामाजिक संबंध म्हणजे देखावा', असं देबो म्हणतो. 'देखावा स्वतःला विशाल दुर्दम्य वास्तव म्हणून सादर करतो. तो एकच संदेश देत असतो : "दिसतंय ते चांगलं आहे; चांगलं आहे ते दिसतं." काय दिसायला हवं यावर देखाव्याची मक्तेदारी असते आणि त्यातून निष्क्रिय स्वीकार लादला जातो, त्यावर काही प्रतिक्रिया द्यायला वाव नसतो.'
देखावा म्हणजे आपल्या आर्थिक-राजकीय रचनेने निर्माण केलेला वास्तवाचा भास. पण शेवटी हा भास भास न उरता वास्तवाचा भागच होऊन जातो, आणि तो वास्तवाचं विभाजन करत करत वास्तव इतकं विखंडित करतो की आपण निव्वळ निष्क्रिय होत या विखंडित वास्तवाचे, निरनिराळ्या बुडबुड्यांमध्ये जगणारे ग्राहक तेवढे होऊन बसतो- असं साधारण देबोच्या सोबतीने म्हणता येईल. आपण 'वास्तव वास्तव' म्हणतो तोही मुळात एक भासच असतो, असंही थेट अध्यात्मिक कोणी म्हणू शकेल. तो वेगळाच मुद्दा झाला. पण इथला मुद्दा साधारण आपण सर्वांनी किमान वास्तव म्हणून स्वीकारलेल्या गोष्टींचं आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक देखाव्यात रूपांतर कसं होतं, याबद्दलचा आहे. आपल्या परिसरातलं एक उदाहरण पाहू.
कुलभूषण जाधव
मार्च २०१६मध्ये कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील बलुचिस्तान भागात अटक करण्यात आल्याची बातमी आली. जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी असून भारतीय गुप्तचर यंत्रणेसाठी हेर म्हणून ते काम करत होते, बलुचिस्तानातील बंडखोरीला पाठबळ पुरवणं, चीनच्या 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह' या दीर्घ पल्ल्याच्या मार्ग उभारणीला खीळ घालण्याचा प्रयत्न करणं (हा मार्ग चीनच्या झिनजिआँग प्रांतापासून इराणमधील ग्वादार बंदरापर्यंत जातो. वाटेत पाकव्याप्त काश्मीर लागतं) यासाठी ते प्रयत्नशील होते, असा आरोप पाकिस्तानी सरकारने केला. तर, जाधव पूर्वी भारतीय नौदलात असले तरी त्यांनी २००२-०३दरम्यानच मुदतपूर्व निवृत्ती घेतली असून ते इराणमध्ये व्यावसायिक कारणाने राहत असताना तिथून पाकिस्तानने त्यांचं अपहरण केलं, असा भारत सरकारचा यावरचा खुलासा होता. जाधव यांची व्यावसायिक कंपनी इराणमधील ग्वादार इथे कार्यरत असल्याचं सांगितलं जातं; तिचा व्यवहार फारसा नाही. बाकी, बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या इराणलगतच्या सीमेवरचा प्रदेश आहे आणि ग्वादार बंदराच्या बांधकामात भारताचाही अधिकृत सहभाग आहे, हे भूराजकीय तथ्यही इथे लक्षात घेण्याजोगं.
![]() |
| डिसेंबर २०१७मध्ये जाधव यांची आई व पत्नी यांना त्यांची मर्यादित भेट घेण्याची परवानगी मिळाली. |
एप्रिल २०१७मध्ये पाकिस्तानातील न्यायालयाने जाधव यांना देहदंडाची शिक्षा सुनावली, पण काहीच दिवसांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात हे प्रकरण गेलं आणि तिथे जाधव यांच्या देहदंडाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. जाधव यांच्या या न्यायालयातील बचावासाठी भारत सरकारने वकील पुरवले. पाकिस्तानी न्यायव्यवस्थेने या संदर्भात पुनर्विचार करावा, असं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सुचवलं. तसंच, जाधव यांच्याशी संपर्क साधण्याची मुभा भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर जाधव पाकिस्तानी तुरुंगात आहेत. त्यांच्या प्रकरणाचं पुढे काय होईल, याबद्दलचे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत. दोन्ही देशांच्या सरकारांना यासंबंधीचं सत्य माहीत असतं, दोन्ही बाजूंकडे अशा काही व्यक्ती हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगत असतात, त्यामुळे कदाचित अशा एखाद्या पाकिस्तानी व्यक्तीची देवाणघेवाण करून जाधव यांची सुटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं या विषयावर लक्ष ठेवणाऱ्या पत्रकारांनी नोंदवलं होतं. आपल्याला या संदर्भात सार्वजनिक स्तरावर उपलब्ध असणारी माहिती, निरनिराळे कल असणाऱ्या पत्रकारांची वार्तांकनं पाहिली तर साधारण यासंबंधीचा अंदाज बांधता येतो. तो आपला आत्ताचा विषय नाही, पण कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात एकाच वेळी धाडस, शौर्य, सरकारी पातळीवर वाजवी-अवाजवी जोखीम, भय, गोपनीयता आणि व्यक्तीच्या पातळीवरची शोकांतिका दिसते. या घटनाक्रमाला कल्पिताची जोड देऊन खरोखर काही कथानक रचायचं तर त्यात 'धुरंधर'मध्ये दिसते तशी प्रचंड हिंसक हाणामारी दाखवता येणार नाही, बाळबोध संवाद दाखवता येणार नाहीत, केवळ शारीरिक बळाच्या आधारावर सगळ्याची उलथापालथ करू शकणारा नायक उभा करता येणार नाही. पण आपण देखाव्यांच्या काळात जगतो आहोत, तिथे अनेक व्यक्तींच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या शोकांतिकांना थारा नाही. कुलभूषण जाधव यांच्या अटकेला येत्या मार्चमध्ये दहा वर्षं होतील. त्याच महिन्यात 'धुरंधर'चा पुढचा भाग प्रदर्शित होणार आहे.
नोम चॉम्स्की
दरम्यान, अमेरिकेत जेफ्री एपस्टीन या व्यक्तीशी संबंधित कागदपत्रं काही दिवसांपूर्वी तिथल्या प्रशासनाने सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून दिली. हा गडगंज श्रीमंत असणारा मनुष्य एकीकडे आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होता, आणि दुसरीकडे लैंगिक सुखोपभोगासाठी अल्पवयीन मुलींची तस्करीही करत होता. अमेरिकेच्या दक्षिणेला असणाऱ्या कॅरेबियन समुद्रात त्याने स्वतःचं एक बेट विकत घेतलं. तिथल्या आलिशान महालात यासंबंधी पार्ट्या होत असत. या संदर्भात २००५-०६च्या दरम्यान तपास सुरू झाला, त्यानंतर २००८मध्ये एपस्टीनने स्थानिक न्यायालयीन व्यवस्थेशी साटंलोटं केलं आणि किरकोळ गुन्ह्यांची कबुली दिली. तेव्हा त्याला १८ महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा झाली, आणि १३ महिन्यांची शिक्षा भोगल्यावर तो सुटला. त्यानंतरच्या काळात तो पुन्हा उजळ माथ्याने वावरू लागला, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे मालक बिल गेट्स इत्यादींपर्यंत अनेकांशी त्याचा संपर्क होता, संबंध होते. राजकीय, सामाजिक, अकादमिक, सांस्कृतिक अवकाशातल्या अनेक व्यक्तींची नावं यातून समोर आली. पण यातली प्रत्येक व्यक्ती एपस्टीनने केलेल्या गुन्ह्यांशी संबंधित होती, असा याचा अर्थ नाही. काही नावं निव्वळ संपर्काच्या संदर्भात आलेली असू शकतील, काही थोडे अधिक संबंध असलेल्यांची असू शकतील, किंवा काही उल्लेख निव्वळ इतरांच्या संवादाचा भाग म्हणून आलेली असतील. पण एकंदर अमेरिकी समाजातल्या अनेक ख्यातनाम व्यक्तींशी त्याची जवळीक होती, एवढं लक्षात येतं. एपस्टीनच्या कृत्यांमधील काही पीडित मुली पुढे टिकल्या, त्यांचे अनुभव बाहेर आले, 'मिआमी हेराल्ड' या वृत्तपत्राच्या काही पत्रकारांनी चिकाटीने या प्रकरणाचा माग घेतला (Perversion of Justice) आणि २०१८ साली या वृत्तपत्रात त्यासंबंधी सखोल वार्तांकन प्रकाशित होऊ लागलं. दरम्यान, अमेरिकेतील केंद्रीय तपास संस्थांनी हे प्रकरण हातात घेतलं, जुलै २०१९मध्ये एपस्टीनला अटक होऊन खटला उभा राहिला, पण त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात तो त्याच्या कोठडीत मृतावस्थेत आढळला. त्याने कोठडीतल्या पांघरुणांचा वापर करून स्वतःला गळफास लावून घेतल्याचं तपाससंस्थांनी सांगितलं. यासंबंधीही अनेक खरी-खोटी माहिती आणि व्हिडिओ इत्यादी उपलब्ध आहेतच. आपण इथे त्यातल्या एकाच छोट्या बाजूला धरून ही नोंद संपवणार आहोत.
एपस्टीनला २००८ साली शिक्षा झाली त्यानंतरच्या काळात त्याचा अमेरिकेतील ज्येष्ठ भाषावैज्ञानिक आणि राजकीय-सांस्कृतिक व्यवहारांसंबंधीचे सखोल भाष्यकार नोम चॉम्स्की यांच्याशी संपर्क आला. चॉम्स्की व त्यांची पत्नी व्हॅलेरिया यांच्यासोबत एपस्टीनचा ई-मेलद्वारे झालेला पत्रव्यवहार आणि त्यांची काही छायाचित्रं या प्रकरणात समोर आली. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाशी चॉम्स्की दाम्पत्याचा संबंध असल्याचं यातून सूचितही झालेलं नाही. चॉम्स्की यांना पहिल्या पत्नीपासून झालेल्या अपत्यांचा आणि चॉम्स्की यांचा मालमत्तेसंदर्भात काही वाद सुरू होता, त्या काळात एपस्टीनकडून त्यांनी आर्थिक मुद्द्यांवर बराच संवाद साधल्याचं या कागदपत्रांवरून दिसतं. त्यापलीकडे जात चॉम्स्की दाम्पत्य एपस्टीनला भेटत असे, वाढदिवस सोबत साजरा करणं, जेवण्यासाठी भेटणं, इत्यादी स्वरूपाचे संवादही यात दिसतात.
चॉम्स्की यांनी अनेक जगडव्याळ सत्तारचनांवर मर्मग्राही टीका करणारं लेखन केलं आणि आता तेच या सत्तारचनेचा गैरवापर करणाऱ्या एका गुन्हेगाराशी इतकी घसट कशी काय करू शकतात, याचं नैतिक मोजमाप कसं करायचं, याबद्दल इंटरनेटवर वेगवेगळी मंडळी बोलत आहेत. रेघेवर आपण आपल्या चौकटीपुरतंच याची दखल घेणार आहोत. जगात बऱ्याच भयंकर गोष्टी सुरू असतात, आपला त्यातल्या काहींशीच संबंध येतो, इतर काही जण स्वतःच अशा भयंकर गोष्टी करत असतील तरी त्या माणसांशीही आपला संबंध येण्याची शक्यता असते किंवा नसते. चॉम्स्की हे सार्वजनिक ख्याती मिळालेलं व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचा असा संबंध-संपर्क आणखीच विस्तारलेला होता. त्यात ते काय निवडी करायचे किंवा व्यक्तीशः ते किती नैतिक होते, याचं मोजमाप करण्यासाठीची माहिती माझ्याकडे नाही आणि ते करण्याची इथे गरजही नाही, असं वाटतं (स्वतंत्रपणे त्याचा शोध घेण्यासाठी 'डिकोडिंग चॉम्स्की : सायन्स अँड रिव्होल्यूशनरी पॉलिटिक्स' हे ख्रिस नाइट यांनी लिहिलेलं पुस्तक उपलब्ध आहे. तसंच, अलीकडच्या प्रकरणासंदर्भातही नाइट यांनी 'द चॉम्स्की / एपिस्टीन पझल' हा लेख लिहिला आहेच. चॉम्स्की ज्या व्यवस्थेवर टीका करत आले त्या व्यवस्थेमध्ये थेट गुंतलेल्या माणसांशी त्यांचे जवळचे संबंध आले, अशा माणसांची त्यांनी वेळप्रसंगी प्रशंसाही केली, काही बाबतीत स्वतः चॉम्स्की यांच्या कामाशी संबंधित निधीपुरवठाही या व्यवस्थेतून येणारा होता, इत्यादी गोष्टी इथे सापडतील. पण तरी, चॉम्स्कींचं लेखन स्वतंत्रपणे वाचण्यासाठी उरतंच). त्यांनी केलेलं लेखन प्रत्येक वेळी पटणारं नसेल तरीही त्यातून आपल्याला आपल्या सध्याच्या सत्तारचनांबद्दल संवाद साधल्याचं समाधान मिळतं. अशाच स्वरूपाचा त्यांचा 'व्हॉट मेक्स मेनस्ट्रीम मीडिया मेनस्ट्रीम?' हा लेख तेरा वर्षांपूर्वी संबंधित प्रकाशकांची परवानगी घेऊन मराठीत केला होता- 'मुख्यप्रवाही माध्यमं असतात तशी का असतात?'
पण तरी एपस्टीन प्रकरणात चॉम्स्की यांची प्रतिमा डागाळली हे खरं आहे. नोम चॉम्स्की यांना जून २०२३मध्ये पक्षाघाताचा झटका आल्यामुळे तेव्हापासून ते सार्वजनिक अवकाशामध्ये बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांच्या पत्नी व्हॅलेरिया यांनी या संदर्भात खुलासा करणारं निवेदन ८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलं. एपस्टीनच्या गुन्हेगारी बाजूची आपल्याला काहीही माहिती नव्हती, त्याचा चॉम्स्कींशी झालेला परिचय वैज्ञानिक उपक्रमांना अर्थसहाय्य करणारा आणि आर्थिक सल्लागार म्हणून होता. तसंच, चॉम्स्कींना रस असलेल्या राजकीय-सामाजिक विषयांशी निगडीत व्यक्तींच्या गाठीभेटी घडवून देण्यासाठीही त्याने पुढाकार घेतला, त्यामुळेही त्याच्यासोबतचा चॉम्स्कींचा संपर्क वाढला, अशा स्वरूपाची स्पष्टीकरणं व्हॅलेरिया यांनी दिली आहेत. चॉम्स्की सध्या ९७ वर्षांचे आहेत आणि चालण्या-बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. पण हे प्रकरण आत्ताइतकं प्रकाशात येण्याआधीच चॉम्स्की यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते, तेव्हाची त्यांची उत्तरंही फारशी समाधानकारक नव्हती. तसंच, एपस्टीनची दुसरी बाजू माहीत नसण्याचा खुलासा कमकुवत आहे.
नोव्हेंबर २०१८पासून 'मिआमी हेराल्ड' या वृत्तपत्रात एपस्टीनने केलेल्या अल्पवयीन मुलींच्या तस्करीसंबंधी वार्तांकन यायला लागलं त्यानंतर फेब्रुवारी २०१९मध्ये एपस्टीनने चॉम्स्कींना पाठवलेली मेल वाचायला मिळते. त्यात एपस्टीन विचारतो :
माझ्या विरोधात वर्तमानपत्रांमधून येणाऱ्या कुजक्या वार्तांकनाचं काय करावं, याबद्दल तुमचा सल्ला मिळाला तर बरं होईल. हे आता हाताबाहेर जातं आहे. मी कोणाकडून संपादकीय लेख लिहून घेऊ का? माझ्या बचावासाठी. की, याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करू. झुंडी धोकादायक असतात, हे लक्षात घेऊन काही करायला हवं!
यावर पाठवलेल्या उत्तरात चॉम्स्की म्हणतात :
तुझ्याविरोधात वर्तमानपत्रांमध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या गोष्टी भयंकर आहेत. यावर बोलणं वेदनादायक आहे, पण मला वाटतं, या गोष्टींकडे दुर्लक्ष करणंच उत्तम. मला याचा बराच अनुभव आलेला आहे, पण अर्थात त्याची व्याप्ती इतकी प्रचंड नव्हती. विशिष्ट विषयावर टिप्पणीसाठी विचारणा झाल्याशिवाय मी याकडे लक्षही देत नाही. [...] थेट प्रश्न विचारल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये, खासकरून सध्याच्या वातावरणात तर नकोच. माझ्या अंदाजाप्रमाणे हे विरून जाईल, पण तोवर काहीएक छळ सहन करावा लागेल.
२०१८ साली एपस्टीनच्या गुन्हेगारी बाजूसंबंधी झालेलं वार्तांकन बरंच स्पष्ट होतं. त्यावरून सर्वसामान्य वाचकही किमान अंदाज बांधू शकतो, पण चॉम्स्की मात्र या सर्व वार्तांकनाने सावध झाले नाहीत. उलट, एपस्टीनने त्यावर काय करावं, याचा सल्ला ते देत होते. थेट प्रश्न विचारला तरच उत्तर द्यावं, असं सुचवत होते. पण एपस्टीन यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने चॉम्स्की यांना मे २०२३मध्ये ई-मेलद्वारे प्रश्न विचारले, तेव्हा चॉम्स्कींनी दिलेलं उत्तर असं होतं :
तुमचा, किंवा खरंतर कोणाचाच या गोष्टींशी काडीचाही संबंध नाही, हे माझं यावरचं पहिलं उत्तर आहे. दुसरं, मी त्याला ओळखत होतो आणि आम्ही काही वेळा भेटलो होतो.
या उर्मट उत्तराचं काय करायचं?
हार्वर्ड कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून चालवल्या जाणाऱ्या 'द हार्वर्ड क्रिमसन' या वृ्त्तपत्रानेही मे २०२३मध्ये या संदर्भात चॉम्स्कींची प्रतिक्रिया विचारली. चॉम्स्की दीर्घ काळ मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेशी संलग्न होते आणि त्या संस्थेला एपस्टीनने भरघोस देणगी दिली होती, तसंच हार्वर्ड कॉलेजलाही त्याने बरीच देणगी दिली. या संदर्भात चॉम्स्की म्हणाले, "आधुनिक जगातल्या अत्यंत वाईट कृत्यं केलेल्या काही गुन्हेगारांच्या देणग्यांवर उभारलेल्या प्रयोगशाळांमध्ये आणि सुविधाकेंद्रांमध्ये होणाऱ्या बैठकांना मी अनेकदा उपस्थित राहिलो आहे, तिथे सहकाऱ्यांशी चर्चा केल्या आहेत. अशा काही गुन्हेगारांच्या सन्मानार्थ इमारतींना त्यांची नावं देण्यात आली आहेत आणि इतर मार्गांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनंही उधळण्यात आली आहेत. देणग्या स्वीकारण्यापेक्षा हे अर्थातच जास्त गंभीर आहे."
एपस्टीनशी संबंध ठेवल्याचा खेद वाटतो का, या प्रश्नावर चॉम्स्कींनी लिहिलं, "मी सर्व प्रकारच्या लोकांना भेटलो आहे. यात युद्ध गुन्हेगारही होते. यातल्या कोणालाही भेटल्याचा मला खेद वाटत नाही." तसंच, एखादा गुन्हेगार शिक्षा भोगून समाजात परत सामावला जात असेल तर 'मुक्त समाजांमध्ये ही सर्वसामान्य बाब असते,' असंही या संदर्भात चॉम्स्कींनी स्पष्ट केलं. इथपर्यंत ठीक आहे- म्हणजे हे एक राखाडी छटांमधल्या जगण्याचं स्वाभाविक वर्णन झालं. पण अशा गुन्हेगाराला पुरेशी शिक्षा झालेली नाही, किंबहुना त्याचा गुन्हा पुरेसा प्रकाशात आलेला नाही, असं कोणी सांगत असेल (मिआमी हेराल्डच्या २०१८चं वार्तांकन); आणि अशा वेळी तो गुन्हेगार स्वतःची प्रतिमा वधारण्यासाठी, म्हणजे देबो म्हणतायंत तसा 'देखावा' निर्माण करण्यासाठी सल्ला विचारत असेल, तर चॉम्स्कींसारख्या व्यक्तीने काय करायला हवं? हा यातला प्रश्न आहे.
अमेरिकेने व्हिएतनामविरोधात पुकारलेल्या युद्धावेळी चॉम्स्कींनी 'बुद्धिजीवींची जबाबदारी' सांगणारा लेख लिहिला होता (द न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स, २३ फेब्रुवारी १९६७). त्यात त्यांनी लिहिलं होतं की :
शासनव्यवस्थांचा खोटेपणा उघडकीस आणणं, विविध कृतींमागच्या कारणांचं आणि हेतूंचं, अनेकदा त्यामागच्या छुप्या उद्देशांचं विश्लेषण करणं, यासाठीची उसंत बुद्धीजीवींना लाभलेली असते. किमान पाश्चात्त्य जगात तरी राजकीय स्वातंत्र्यामुळे, माहितीच्या उपलब्धतेमुळे आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्यामुळे बुद्धिजीवींकडे ही ताकद असते. वर्तमान इतिहासातील घडामोडी आपल्यासमोर विपर्यास करून, गैरचित्रणाच्या माध्यमातून, विचारसरणी आणि वर्गीय हितसंबंधांच्या आधारे सादर केल्या जातात. या पडद्यामागे लपलेलं सत्य शोधण्यासाठीचा फावला वेळ, सोयीसुविधा आणि प्रशिक्षण पाश्चात्त्य लोकशाहीमध्ये काही विशेषाधिकारी अल्पसंख्यांना मिळतं. बुद्धिजीवींना असे अनन्यसाधारण विशेषाधिकार उपभोगायला मिळत असल्यामुळे [...] 'लोकांच्या जबाबदारी'पेक्षा बुद्धिजीवींची जबाबदारी आणखी सखोल स्वरूपाची असते.
'पडद्यामागे लपलेलं सत्य' शोधणं ही बुद्धिजीवींची जबाबदारी असल्याचं चॉम्स्की सांगतायंत. पण सत्य झाकणारा पडदा कसा तयार करूया, याबद्दल बुद्धिजीवींचेच सल्ले घेतले जातात, तेव्हा बुद्धिजीवींनी काय करायचं, याबद्दलही काही बोलणं गरजेचं आहे. शिवाय, बुद्धिजीवी असणं, हाच एक देखावा असेल तर सर्वसामान्य मानल्या गेलेल्या लोकांनी काय करायचं, हाही एक प्रश्न आहे. आपल्या भोवतीचा बुडबुडा फोडता येतोय का ते पाहायचं नि समोरचा पडदा थोडा बाजूला सारता येतोय का तेही पाहायचं, असं बहुधा यावर म्हणता येईल. पण आता मार्च महिन्यात 'धुरंधर-२' येईल, तोवर हे सगळं ओसरेल. दरम्यान पडद्यावर इतर प्रतिमा उमटत आहेतच.
![]() |
| नोम चॉम्स्की Requiem for the American Dream या माहितीपटातून कापलेलं दृश्य (लिंक) |
![]() |
| भाऊ पाध्ये (१९२६ - १९९६) [छायाचित्र : आरती साळुंके यांच्या संग्रहातून] |
लेखक भाऊ पाध्ये यांचं जन्मशताब्दी वर्ष परवाच्या २९ नोव्हेंबरपासून सुरू झालं. काही ठिकाणी ६ नोव्हेंबरला त्यांचा जन्मदिवस असल्याचं गृहित धरून लेख वा सोशल-मीडियावरच्या पोस्टी प्रसिद्ध झाल्याचं दिसतं. पण स्वतः भाऊंनीच एका मुलाखतीत त्यांची जन्मतारीख २९ नोव्हेंबर १९२६ अशी नोंदवलेली होती. शिवाय, भाऊंची मुलगी आरती साळुंके यांच्याकडेही याबाबत विचारणा करून पुन्हा खात्री केली. तर, भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या 'बगीचा' या कथेबद्दलची ही नोंद.
०
भाऊ पाध्ये यांच्या ‘बगीचा’ (समाविष्ट : 'भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा', संपादक - दिलीप पुरुषोत्तम चित्रे, लोकवाङ्मय गृह) या कथेच्या सुरुवातीला दादरच्या टिळक ब्रिजवरून रोज संध्याकाळी एक ‘चारचौघात खपून जाण्यासारखा’, ‘कुटुंबवत्सल’, ‘अगदी सामान्य इसम’ चालत जात असल्याचं वर्णन येतं. हे वर्णन साध्या वर्तमानकाळात आहे. पुढे भाऊ लिहितात, “संध्याकाळी कचेऱ्यांतून घरी परतणाऱ्यांची बेसुमार गर्दीही ब्रिजवर असते. त्या गर्दीत कुणाचं त्या इसमाकडे लक्षही जात नाही. पण चालता चालता मध्येच तो माणूस दणकून ओरडतो ‘केकू दमाणिया की माss की च्यूत!’ तेव्हा त्याच्या आजूबाजूची माणसं दचकतात.” एकमेकांना कोण ओरडलं ते विचारू लागतात, वगैरे. भास्कर राणे या कापड गिरणीतल्या कारकुनाच्या तोंडची ही शिवी वाचकांना कथेच्या सुरुवातीला ऐकू येते, आणि मग गर्दीला दचकवणाऱ्या त्या शिवीची पार्श्वभूमी उर्वरित कथेत आपल्या समोर उलगडत जाते.
सतत पोरं जन्माला घालून कंटाळलेली, चाळीतल्या अपुऱ्या जागेत न मावणारं कुटुंब सावरत बसलेली, आणि आर्थिक चणचणीवर स्वतःहून काहीच उपाय न करणाऱ्या, घरी असताना सतत आरामखुर्चीत बसून असलेल्या नवऱ्यामुळे आणखी चिडचिड होणारी बायको- अनूही यात आहे. घरात काहीही अडचण असली तरी आरामखुर्चीतून न उठणारा भास्कर राणे चाळीच्या कॉमन गॅलरीत त्याने लावलेल्या गुलाबाच्या झाडांची पानं चिमणी खातेय असं कळल्यावर मात्र चमकून उठतो, पानं निरखून बघतो. झाडांभोवती जाळी बांधण्यासाठी स्वतः हालचाल करायला लागतो- फळ्या, खिळे गोळा करतो, बाजारातून जाळी आणायला निघतो. भास्करने चाळीत केलेल्या या गुलाबांच्या छोटेखानी बगीच्याची काहीएक ख्यातीही त्याच्या ऑफिसात पसरलेली असते. त्यातूनच केकू दमाणिया हा पारशी माणूस त्याच्या आयुष्यात येतो. दमाणिया आणि त्याची बायको 'रोझ सोसायटी'चे सदस्य असतात आणि त्या सोसायटीच्या स्पर्धांमध्ये जिंकेल असं गुलाबाचं रोपटं शोधताना ते भास्कर राणेपर्यंत पोचतात, त्याला त्याच्या बगीचातली रोपटी विकत देण्याची विनंती करतात. यावर भास्कर लगेच काही बोलू शकत नाही. दमाणिया त्याला विचार करून निर्णय कळवायला सांगून स्वतःचं कार्ड देऊन जातो.
या दरम्यान भास्कर राणेला स्वप्न पडतं. त्यात एक सुंदर बाई दिसते आणि म्हणते, “उद्या जर तू मला भेटलास तर तुझ्या सगळ्या काळज्या दूर होतील!” आपल्याला पडलेली स्वप्नं खरी होतात, याची भास्करला आधीच्या काही अनुभवांमुळे खात्री वाटत असते. आता या नवीन स्वप्नातल्या बाईला भेटण्यासाठी तो तयार होतो. त्याच्या वागणुकीतला बदल घरच्यांना आश्चर्यकारक वाटतो. तो दाढी करतो, टापटीप तयार होतो आणि स्वप्नातली बाई भेटेल या आशेने बाहेर पडतो. प्रत्यक्षात त्याला बाई भेटत नाही. स्वप्न प्रत्यक्षात येत नाही. आपली परिस्थिती सुधारणार नाही, याबद्दल त्याची खात्री पटते. मग तो केकू दमाणियाला पाचशे रुपयांना त्याचा बगीचा विकतो. पण घरी येतो तर त्याच्या एका मुलीचा अपघात झाल्याचं कळतं, मग तिच्या उपचारांमध्येच पाचशे रुपये खर्च होतात. दुसऱ्या दिवशी भास्करच्या खोलीत आग लागते. त्यात त्याची बायको अनू, मोठी मुलगी सीमा आणि अगदी धाकटी- सहा महिन्यांची- मुलगी राजश्री होरपळून मरतात. बाकीची मुलं कमी-अधिक जखमी होऊन वाचतात. भास्करनेच डोकं सणकून ही आग लावलेली असते. मरण्यापूर्वी अनू मात्र आपल्याच हातून स्टोव्ह पेटवताना गफलत होऊन आग लागल्याची जबानी देते. भास्कर निर्दोष सुटतो. मुलं नातेवाईकांमध्ये वाटली जातात. भास्करची नोकरी जाते. पण बाकी त्याची वागणूक सर्वसामान्य चारचौघांसारखीच राहते. शेजारचे खायला आणून देतात, ते खाऊन तो बसून राहतो. रोज संध्याकाळी टिळक ब्रिजवरून जातो, आणि तेव्हा ती शिवी ऐकू येते.
मुंबईसारख्या महानगरातल्या निम्नस्तरीय कारकुनी कुटुंबाची विविध पातळ्यांवरची कुचंबणा या कथेत दिसते, हे उघड वर्णन झालं. भाऊ पाध्यांच्या कथनशैलीत बरेचदा दिसणारं धक्कातंत्र याही कथेत सुरुवातीलाच सार्वजनिक ठिकाणी लोकांना दचकवणाऱ्या शिवीच्या रूपात येऊन जातं. महानगरी जीवनाचं चित्रण आणि रोजमर्राची भाषा, ही भाऊंच्या लेखनातली वैशिष्ट्यं साधारणपणे नोंदवली जातात. ते बाहेरून होणारं वर्णन म्हणून रास्त आहे. पण त्याच्या आत काही आणखी खोलातले प्रश्नही आहेत का, ते पडताळायला हवं. भाऊ पाध्यांच्या साहित्यात चिंतनशीलतेचा अभाव होता, असं वाक्य मध्यंतरी वाचायला मिळालं. पण हे असं सरसकटीकरण बरं नाही. भाऊ स्वतः काय चिंतन करायचे किंवा त्यांची पात्रं उघडपणे काही चिंतनशील बोलतात का, यापेक्षा त्यांचं साहित्य वाचकाला चिंतनशील व्हायला भाग पाडतं का, काही चिकित्सक टीका करण्यासाठी किंवा काहीएक नवीन शोधण्यासाठी प्रवृत्त करतं का, असे प्रश्न विचारात घेणं अधिक बरं.
उदाहरणार्थ, 'बगीचा'मध्ये प्रत्यक्षात चाळीतल्या कॉमन गॅलरीमधली काही गुलाबाची रोपटी आहेत. त्या रोपट्यांचं सौंदर्य ठराविक सार्वजनिक स्तरावरही नावाजलं गेलंय. भास्कर राणेच्या ऑफिसात, आणि तिथून बाहेर निराळ्या आर्थिक स्तरातल्या कुटुंबापर्यंत या सौंदर्याची चर्चा पोचलेय. अशा सौंदर्याच्या स्पर्धेत- म्हणजे रोझ सोसायटीच्या स्पर्धेत- सहभागी होणारं दमाणियांचं जोडपं कथेत येतं, तसंच या रोज या रोपट्यांपासून काही फुटांवर जगणारं राण्यांचं जोडपं (आणि पूर्ण कुटुंब) कथेत येतं. त्यांचं-त्यांचं जगणं सुरू आहे. त्यातलं राणे कुटुंबाचं जगणं उद्ध्वस्त होतं. कथेचं शीर्षक 'बगीचा' असं आहे. सुंदर गुलाबांचा हा 'बगीचा' सौंदर्याविषयी काही अवघड प्रश्न उभे करतो.
सौंदर्याची निर्मिती कशी आणि का होते? सौंदर्यावरची मालकी कशी ठरते? सौंदर्य टिकवणं कोणाला शक्य होतं आणि कोणाला शक्य होत नाही? सर्वसामान्य, कोरड्या भासणाऱ्या, अभावाच्या जगण्यात सौंदर्याचं स्थान काय असतं? सौंदर्याचा आस्वाद कोणाला परवडू शकतो? कोणतीही अलंकारिकता नसलेल्या, अधूनमधून धक्कादायक वाटतील असे उद्गार असलेल्या भाषाशैलीतून इतक्या खोलापर्यंत जाणारे प्रश्न म्हणजे आशयसूत्रं हाताळण्याची भाऊंची हातोटी या कथेत विलक्षण रीतीने पाहायला मिळते.
भाऊ पाध्यांच्या साहित्यात बहुतेकदा निवेदक किंवा इतर पात्रं सर्वमान्य नैतिकतेची किंवा बौद्धिकतेचीही भूमिका घेणारी नसतात, त्या दृष्टिभूमीवरून ती जगाकडे पाहत नाहीत. त्यामुळे ती उघड-उघड काही चिंतनशील वक्तव्यं करण्याची शक्यताही कमीच असते (तशी चिंतनशीलता उघडपणे व्यक्त करणारी पात्रंही साहित्यात सहजपणे अर्थातच असू शकतात; भाऊंच्या साहित्यात ती बहुतांशाने नसतात, इतकाच इथला वस्तुस्थितीपुरता मुद्दा). पण त्यांच्या साहित्यातून निर्माण होणारे प्रश्न मात्र अशा नैतिकतेला आणि बौद्धिकतेला आव्हान देणारे, किंबहुना त्यांना अधिक खोलवर धक्के देणारे असतात, हे यातून जाणवतं.
भास्कर राणे बायको-मुलांना खोलीत कोंडून आग लावतो, त्यात आई नि लहान बहिणीसह मरण पावलेली थोरली मुलगी सीमा हिचा खुद्द कथेतला वावर मर्यादित आहे. पण हीच सीमा तिच्या आईला घरकामात थोडीफार मदत करत असते. भास्करचा बगीचातल्या गुलाबाची पानं चिमण्या खात असल्याचं लक्षात आणून देणारीही सीमाच असते. शिवाय, आपली स्वप्नं काही खरी ठरणार नाहीत हे जाणवल्यावर भास्कर अंधारात उभा असतो, तेव्हा त्याच्या बाजूला उभं राहून हीच सीमा म्हणते, “आबा, तुमी गुलाबाची झाडं विकू नका!. तुम्हाला त्यांची जोपासना नाय करता आली तर मी करीन! रोज पाणी घालीन! चहाची भुकटी पण आणीन कोठून तरी आणि घालीन!” यावर भास्कर चिडचिड करतो. झाडं विकली तर निदान मुलांना कपडे येतील, वगैरे चिडून बोलतो (पुढे ही रोपटी रोझ सोसायटीच्या स्पर्धेतही गेली असतील). मग सीमा हिरमुसते नि अंथरुणावर जाऊन पडते. दोन दिवसांनी ती तिच्या बापाने खोलीला लावलेल्या आगीत मरण पावते.
सौंदर्याविषयी इतकं करुण काही म्हणू पाहणारी ही कथा लेखकाने खूप सुंदर तऱ्हेने लिहिलेय, असं म्हणायचं तरी अवघड, अशी परिस्थिती. कथेच्या सुरुवातीला येणारी शिवी आणि शेवटाकडे येणारा सौंदर्याचा करुण शेवट, यांची सांगड भाऊंना घालता आली. भास्करइतपतही सौंदर्याची जोपासना करण्याचा वाव सीमाला का मिळत नाही, या अंगाने पाहिलं तर ही कथा आणखीच खतरनाक प्रश्न उभे करणारी वाटते. हे प्रश्न एकीकडे काही उघड सामाजिक पेचांशी जोडलेले आहेत, तसेच त्यापलीकडच्या काही अधिक दीर्घ पल्ल्याच्या गुंतागुंतीचा निर्देशही करणारे आहेत.
![]() |
| फोटो : रेघ, २००६ |
०
भाऊ पाध्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथे १२-१३ डिसेंबर २०२५ या दिवसांमध्ये 'भाऊ पाध्ये यांचं वाङ्मय : आकलन आणि पुनर्विचार' असं एक चर्चासत्र झालं. त्यात आयोजकांनी काही बोलायला सुचवलं, तेव्हा 'भाऊ पाध्ये यांच्या कथेतलं धक्कातंत्र' या शीर्षकाचा निबंध वाचला. त्या निबंधातल्या एका तुकड्यावर आधारित वरची नोंद आहे. भाऊंचं भाषाशैलीचं धक्कातंत्र त्यांच्या विषयाशी आणि आशयसूत्रांशी मिळून-मिसळून गेलं, तिथे त्यांचं लेखन सखोल नेणारं ठरलं, याचा दाखला द्यायचा प्रयत्न वरच्या नोंदीत आहे. काही वेळा, या भाषाशैलीची नि विषय-आशयाची सांगड बसत नाही, तिथे लेखन फिकं ठरण्याचा धोका असतो : हे भाऊंच्या काही कथांमध्ये सापडतं. उदाहरणार्थ, 'राजीनामा' ('दावेदार' या संग्रहात समाविष्ट, शब्दालय प्रकाशन, २०२०). एका ऑफिसात स्त्री कर्मचाऱ्यावर कसं विनाकारण बालंट आणलं जातं, याबद्दलची ही कथा. शेवटी, ही बाई तिच्यावर आरोप करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संध्याकाळी ऑफिस रिकामं असताना बाहेर आणते आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या टेबलावर असणारे भ्रष्टाचाराचे 'पुरावे' दाखवते. ‘कुणाच्या टेबलावर पडलेली चोरलेली स्टेशनरी’, ‘कुणाच्या टेबलावर नग्न देहाचं प्रदर्शन करणारी मासिकं’, ‘एका टेबलावर दोन दारूच्या बाटल्या’, ‘एका टेबलावर चक्क कंपनीच्या बिलात फेरबदल केलेली बिलं’, वगैरे. अनेक ऑफिसांमध्ये भ्रष्टाचार-घोटाळे होतात, पण त्याचे पुरावे इतक्या बटबटीतपणे माणसं टेबलांवर ठेवून जातात, हे साधारण सरधोपट चित्रपटांमध्ये शक्य आहे. भाऊंच्या कथेत ते घडल्यावर मग त्यांच्या भाषाशैलीतला ओघवतेपणा तेवढा उरतो, पण कथा पडते. मूळ निबंधात भाऊंच्या कथांचे दाखले देऊन त्यांच्या धक्कातंत्राबाबत बरी-वाईट निरीक्षणं नोंदवायचा प्रयत्न केला.
०
'बगीचा'ला धरून यापूर्वीही एक नोंद केली होती : एक शिवी आणि भाऊ पाध्यांचा 'बगीचा'.
०
सुमारे सोळा-सतरा वर्षांपूर्वी भाऊ पाध्यांबद्दल इंटरनेटवर फारशी काही माहिती नसल्याचं दिसलं तेव्हा त्यांच्याबद्दलचे लेख नि त्यांच्या काही मुलाखती मिळवून टाइप करून एका ब्लॉगवर चिकटवल्या, त्यांची छायाचित्रं मिळवून चिकटवली, पुस्तकांची मुखपृष्ठं मिळतील तितपत तिथे एकत्र केली; तो कात्रणवहीसारखा ब्लॉग इथे पाहता येईल - https://bhaupadhye.blogspot.com/. ही २००९च्या दरम्यानची गोष्ट आहे. त्या वेळी त्यांच्या बहुतांश पुस्तकांच्या आवृत्त्या सहज उपलब्ध नव्हत्या. आता तुलनेने काही पुस्तकांच्या आवृत्त्या मिळतात. या ब्लॉगवरचे फोटो भाऊ पाध्ये आरती साळुंके यांच्याकडून मिळाले आणि त्यांच्या परवानगीने ते तिथे प्रसिद्ध केले. त्यातला एक फोटो परवा 'हिंदुस्तान टाइम्स'मध्ये आलेल्या भाऊ पाध्यांवरच्या इंग्रजी लेखासोबत छापलेला दिसतो. 'बाई माणूस' या मराठी संकेतस्थळावर भाऊंवर एक लेख आलाय त्यात दिलीप चित्रे यांचं एक विधान दिलंय. 'नोबेल पुरस्कारासाठी एखाद्या भारतीय लेखकाचं नाव सुचवायचं झालं तर बिनदिक्कत मी भाऊंचं नाव सुचवीन. दुर्दैव हेच की मराठीतही भाऊंचं महात्म्य कोणी ओळखत नाही', हे चित्र्यांचं विधान त्यांच्या कुठल्याही प्रकाशित मजकुरात आलेलं नाही. चित्र्यांच्या खाजगी संग्रहातल्या भाऊंच्या एका पुस्तकाच्या प्रतीवर लिहिलेल्या मजकुरात हे विधान होतं. तो मजकूर २०१० साली विजया चित्रे यांच्याकडून मिळाला आणि त्यांच्या परवानगीने तो टाइप करून ब्लॉगवर प्रसिद्ध केला. तसंच लोकसत्तेच्याही वेबसाइटवर भाऊंच्या एका लेखाचं पुनर्प्रकाशन झालेलं दिसतंय, त्यासोबत याच ब्लॉगवरचा फोटो आहे, तिथे "(छायाचित्र : लोकसत्ता टीम)" असा श्रेयनिर्देश आहे. यात कुठेच भाऊंच्या किंवा चित्र्यांच्या कुटुंबियांचा, आणि ब्लॉगचा सौजन्य म्हणून उल्लेख नाही. हे अर्थात वेगवेगळ्या संदर्भांमध्ये होत आलेलंच आहे. इंटरनेटच्या युगात यावर काही हक्क गाजवणं बरोबरही नाही. उलट पसरतंय ते बरंच आहे, असं म्हणायला हवं. पण कुटुंबीय हयात आहेत त्यांचा तरी उल्लेख खरं म्हणजे करायला हवा. (बाकी, खुद्द मोठी प्रकाशनं अशी मोकळीक दाखवत नाहीत, असा अनुभव अनेकदा येतो. परवानगी मागितली तरी फोटो किंवा लेख वापरण्यासाठी प्रचंड मोठी फी मागतात). थोडक्यात, कात्रणवहीसारख्या या कामांचा बऱ्यापैकी उपयोग होत आला आहे.