२४ जुलै २०२६

रत्नागिरीतील मोर्च्याचा सचित्र वृत्तान्त

'झुरळांच्या काळात राजकारणाची भुरळ आणि जिज्ञासा' या नोंदीत कॉक्रोच जनता पार्टी आणि त्या संदर्भात पुढे घडत गेलेल्या घटनांबद्दल काही बोलणं झालेलं आहे. या घडामोडींबद्दल गेले काही दिवस विविध मंडळी विविध मंचांवर आपापल्या दृष्टीने काही अंदाज बांधतच आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंस्था असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनीच हे आंदोलन लोकांच्या संतापाला थोडीशी वाट मिळावी म्हणून उभं केलं आहे- अशा कटकारस्थानाची शंका व्यक्त करणारे लोक एकीकडे आहेत. मग, विविध विरोधी पक्षांनीही या आंदोलन पाठिंबा दिला आणि शेवटी प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने पाठिंबा दिला, त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आता या आंदोलनाला योग्य वळण देतील, अशा दिशेने बोलत जाणारे आहेत! काँग्रेस आणि राहुल गांधी या मुद्द्यांवर आधीपासूनच बोलत होते, त्यांना टाळून 'कॉक्रोच जनता पार्टी'ला श्रेय देणं चुकीचं आहे, असाही काहींचा  सूर दिसतो. दिल्लीतील आंदोलनात सोनम वांगचुक यांच्या व्यतिरिक्त डाव्या विद्यार्थी संघटनांचे काही विद्यार्थीही उपोषणाला बसले, तिथल्या आंदोलनात डाव्या संघटनांचा पाठिंबा ठळकपणे दिसला, त्यामुळे या संघटनांचा सहभाग अधोरेखित करणारेही लेख आलेत. तसंच, दुसरीकडे भाजप आणि पंतप्रधान यांच्या समर्थनार्थही बोलणारे आहेत. उदाहरणार्थ, पेपर फोडणाऱ्यांबरोबरच पेपर विकत घेणारे दोषी नाहीत का, आपण व्यक्ती म्हणून नैतिक वागलो तर देश नैतिक होईल, तोवर अशा आंदोलनांच्या समर्थनार्थ 'सोशल मीडिया स्टेटस'वर बोलणं म्हणजे दिखाऊ देशभक्ती आहे, वगैरे स्वरूपाचं पुन्हा 'स्टेटस'च ठेवणारेही आहे. यू-ट्यूबवरच्या वाहिन्यांपासून सुट्या-सुट्या व्यक्तींच्या समाजमाध्यमांवरच्या कृतींपर्यंत हा गदारोळ दिसतोय.

आधीच्या नोंदीत म्हटल्याप्रमाणे, हाच शेवटी 'सार्वजनिक चर्चावकाश' असेल, तर त्याची उकल करायचा प्रयत्न करायला हवा. ही उकल करण्यासाठीचे शब्द केवळ आक्रस्ताळे असून पुरणार नाहीत, त्यासाठी जमलं तर काही संकल्पनाही समजून घ्यायला हव्यात, असं त्या नोंदीतलं म्हणणं. पण या संकल्पनांची सांगड 'सर्वसामान्य' अवकाशातल्या म्हणण्याशी घातली तर एकंदर सार्वजनिक चर्चावकाशाचा कानोसा घेतल्याचं म्हणता येईल. नाहीतर नुसतं साचेबद्ध संकल्पनांचं बोलणं होतं. त्यामुळे ही नोंद आधीच्या नोंदीला पूरक, पण रस्त्यावरच्या अवकाशाची दखल घेणारी आहे. लोक काय म्हणतायंत, हे शक्य तितकं तटस्थपणे नोंदवायचा पत्रकारी पातळीवरचा हा प्रयत्न आहे. 

दिल्लीत २० जुलै रोजी संसदेच्या दिशेने मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. या कठोर कारवाईच्या निषेधार्थ रत्नागिरी इथे २३ जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी दीड या वेळेत एक मोर्चा काढण्यात आला (या वृत्तान्तातील सर्व फोटो आणि व्हिडिओ या मार्गावर काढलेले आहेत). जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन निषेधाचं निवेदन देण्यात आलं. 'शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचा'च्या वतीने या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), थोडंफार काँग्रेस, अशा विरोधी पक्षांची मंडळी; समाजवादी विचारसरणीचे शिक्षणसंस्थांचे संचालक, त्यांचा कर्मचारीवर्ग, विद्यार्थी; काही मुस्लीम मोहल्ल्यांमधील नागरिक- यांची ठळक उपस्थिती होती. पण या व्यतिरिक्त स्वयंप्रेरणेनेच यात दाखल झालेले इतर संस्थांमधले विद्यार्थी आणि नागरिकसुद्धा लक्षणीय प्रमाणात होते. त्यामुळे मोर्चा अपेक्षेपेक्षा खूपच मोठा निघाल्याचं मत ठिकठिकाणी व्यक्त होताना दिसलं. केवळ काही पक्षांच्या नि संस्थांच्या सहभागाने हे घडलं नसतं. एक हजारांच्या आसपास लोक यासाठी येतील, असा अंदाज मोर्च्याची सुरुवात झाली तिथे तैनात असलेल्या एका पोलिसाने अनौपचारिक बोलण्यात वर्तवला. पण प्रत्यक्षात अडीच हजार ते तीन हजार लोक या मोर्च्यासाठी हजर होते.

या मोर्च्याने शहरातील मारुती मंदिरच्या चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुमारे सव्वादोन ते अडीच किलोमीटरची वाटचाल तुलनेने शांततेने केली. क्वचित काही वेळा पंतप्रधानांच्या नावाने एकदम थेट शिवराळ घोषणा देण्यात आल्या, तेव्हा पोलिसांनी आणि आयोजकांनीही सूचना करून या घोषणा शमवण्याचा प्रयत्न केला. (तरीही, तुरळकपणे काही मंडळी मधेच अशा घोषणा देत राहिली). पण त्याहून मोठ्या प्रमाणात घोषणा लोकशाही, हुकूमशाही, शिक्षणाचं क्षेत्र, लोकांशी संवाद न साधणाऱ्या सरकारची वृत्ती, अशा सूत्रांना धरून होत्या. याच सूत्रांसंबंधी विविध प्रकारचे फलक मोर्चेकरी तरुण-तरुणींनी हातात धरलेले होते. त्याचे दाखले इथे चिकटवलेल्या छायाचित्रांवरून मिळतील.

मोर्चेकरी तरुणी (फोटो : अश्विनी कांबळे)


लोकमत, २३ मे २०२६ (पुणे आवृत्ती)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलनी यांच्या नावांना धरून 'मेलडी' असा एक हॅशटॅग समाजमाध्यमांवर चालतो. आंतरराष्ट्रीय बैठकांमधील त्यांच्यातल्या स्नेहाचं सूचन करणारा हा हॅशटॅग आणखी अधोरेखित करत खुद्द मोदींनी मेलनी यांना 'मेलडी' या चॉकलेटचं पाकीटच मे २०२६मध्ये भेट दिलं, त्याचा फोटो स्वतः सोशल मीडियावर टाकला, त्याबद्दल दोघं हसत बोलले. याला धरून त्या चॉकलेटच्या मालककंपनीने त्याच महिन्यात पेपरांमध्ये पानभर जाहिरातीसुद्धा केल्या. उदाहरणार्थ, शेजारी चिकटवलेल्या जाहिरातीत 'भारताने जगाला एक प्रश्न भेट केला आहे' असं सांगत पंतप्रधानांचं नाव घेत त्यांचे आभार मानलेले आहेत. शिवाय, 'आता जगही ह्यात सहभागी झालं आहे,' अशी जोडही दिली आहे. एका अर्थी राजकीय अवकाशातल्या वक्तव्यं / कृती किती उथळ पातळीला जाऊ शकतात, आणि त्यातून राजकीय व्यक्ती स्वतःचंच विडंबन कसं करू शकतात, याचा हा नमुना होता.

त्यामुळे या घडामोडींची टर उडवणारीही काही पोस्टरं कालच्या मोर्च्यात होती. "न्याय? (तो कुठे मिळणार आहे!) मेलडी हवी तर सांगा" असं इंग्रजी पोस्टर घेतलेला (आणि सोबत काही मेलडी ही चॉकलेटंही वाटणारा) मोर्चेकरी तरुण राजापूर या दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणावरून रत्नागिरीत केवळ या मोर्च्यासाठी आला होता. वातावरण बऱ्यापैकी पावसाचं होतं, सकाळी बराच पाऊस पडून गेला होता, तरी बसने प्रवास करून हा तरुण रत्नागिरीपर्यंत आला. त्यामुळे त्याला विचारलं, "एवढ्यासाठी आलात का?" तर तो म्हणाला, "एवढ्यासाठी!" विद्यार्थ्यांच्या मागण्या बरोबर आहेत, सरकारने त्यासंबंधी कार्यवाही करायला हवी, असं त्याचं म्हणणं होतं. या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांशी सरकारने संवाद न साधता पोलिसी कारवाई केली, यामुळे तो अस्वस्थ होता. कोणत्याही संघटनेशी थेट संबंध नसतानाही केवळ स्वतःच्याच इच्छेपोटी तो या मोर्च्यात सहभागी झाला. 
  

"मेलडी खा, पण देशाचं भवितव्य खाऊ नका" अशीही घोषणा काही पोस्टरांवर होती :

मोर्चेकरी विद्यार्थिनी (फोटो : अश्विनी कांबळे)

वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या नावाने घोषणा दिल्या जात होत्या. काहींच्या हातात संविधानातील उद्देशिका होती, काहींनी या आंदोलनाच्या निमित्ताने 'संविधान वाचवा'चाही नारा दिला. 'संविधान वाचवा, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवा', अशाही घोषणांचे फलक दिसत होते. एकूण मिळून विद्यमान सरकारी व्यवस्था अपेक्षेनुसार (म्हणजे संविधानात म्हटलंय त्यानुसार) काम करत नसल्याची धारणा सूचित करणारी ही विधानं होती. मोर्च्याच्या वाटेत आंबेडकरांचा पुतळा लागतो, तिथेही काही मिनिटं मोर्चा थांबवून आंबेडकरांच्या पुतळ्याला हार वगैरे घालून घोषणा देण्यात आल्या.




आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चेकरी (फोटो : रेघ)

मोर्चेकरी तरुण (फोटो : रेघ)
शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ही दिल्लीतील आंदोलनातली मागणी ठिकठिकाणी मोर्चेकऱ्यांनी हातात धरलेल्या फलकांवर लिहिलेली होती, घोषणांमध्ये ती दिली जात होती. एका मंत्र्यासाठी सरकार इतकी जोखीम का उचलतंय, असाही प्रश्न मोर्चेकऱ्यांच्या बोलण्यात आला. यासंबंधीची पोस्टरंही पॉप्युलर कल्चरमधल्या काही खुणांचा वापर करणारी होती. 'तू झूठा मैं मक्कार' या चित्रपटाचा संदर्भ देत पंतप्रधान आणि शिक्षण मंत्र्यांची टर उडवणारं पोस्टर; किंवा 'माझ्या आधीच्या प्रियकराला/प्रेयसीला (नातं तोडण्यासंबंधीचा इशारा) वेळीच कळला, पण शिक्षण मंत्र्यांना मात्र (पद सोडण्यासंबंधीचे) इशारे कळेना झालेत' असं सुचवणारं पोस्टर, इत्यादी या मोर्च्यात पाहायला मिळालं.

तानाशाही सें आझादी, भ्रष्टाचार सें आझादी, इत्यादी घोषणाही या वेळी दिल्या जात होत्या. (याचा व्हिडिओ रेघेच्या यूट्यूबवरच्या पानावर दिला आहे). काही वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 'आझादी'ची घोषणा वादग्रस्त ठरली. पण ती घोषणा (काश्मीर इत्यादी संदर्भात) देश फोडण्याशी संबंधित नसून विविध समस्यांपासून 'आझाद' होण्याशी संबंधित असल्याचं अधोरेखित करत रत्नागिरीतील कालच्या मोर्च्यात ती घोषणा दिली जात होती, असं या मंडळींच्या बोलण्यात आलं.

मोर्चेकरी विद्यार्थी (फोटो : रेघ)

अकरावीत शिकणाऱ्या एका मुलीने सोनम वांगचुक यांचं छायाचित्र असलेलं पोस्टर हातात घेतलं होतं. तिच्या मते, वांगचुक यांच्यासारखा संशोधक उपोषणाला बसतो आणि फारसं शिक्षण नसलेला माणूस शिक्षण मंत्री होतो, हे बरोबर नाही. पंधरा-सोळा वर्षांच्या मुलीचं हे मत आहे, इतपत लक्षात घेऊन तिचं म्हणणं रेघेच्या यूट्यूबवरच्या पानावर पाहता येईल. ही मुलगी तिच्या आईसोबत मोर्च्यात सहभागी झाली होती. दुसरी एक, शिक्षण पूर्ण झालेली आणि आता नोकरी करणारी फार्मसिस्ट तरुणी रजा घेऊन तिच्या वडिलांसोबत या मोर्च्यात सहभागी व्हायला आली होती. तिने स्वतः आधी वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेशपरीक्षा (नीट) दिलेली होती, तसंच तिच्या भावानेही ही परीक्षा दिली आणि तो सध्या वैद्यकीय शिक्षण घेतो आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांना समर्थन द्यावं, असं आवाहन तिने केलं. 

या मोर्च्यामध्ये सहभागी नसलेली, पण त्या रस्त्यावरून कॉलेजला जाणारी चार-पाच अकरावीतल्या मुलं-मुली दिसली. त्यातल्या एका मुलाला या मोर्च्याबद्दल मत विचारलं. तो म्हणाला, "मुद्दा बरोबर आहे. त्या मुलांचं नुकसान झालं. काहींनी आत्महत्या केल्या. मग त्यावर कारवाई तर व्हायला हवी. असं घडायला नको"

दुसरे एक पन्नाशी ओलांडलेले गृहस्थ काही सामान घेऊन चालत जात होते. ते म्हणाले, "आपले लोक थोडे कमी दिसतायंत (मोर्च्यामध्ये मुस्लिमांच्या तुलनेत हिंदूंची संख्या कमी असल्याचा संदर्भ)." असं मत मोर्च्यात सहभागी एका शिक्षिकेनेही व्यक्त केलं. या भागातील मुस्लीम महिलांचं बुरखा वापरण्याचं प्रमाण आणि मुस्लीम पुरुषांचा विशिष्ट पायजमा, मोठा कुर्ता आणि गोल टोपी घालण्याचं प्रमाण दोनेक दशकांपूर्वी अत्यल्प होतं- गेल्या काही काळात ते वाढलं- त्याचा एक परिणाम असा होतो की, मुस्लीम व्यक्तींची संख्या पोशाखातील सारखेपणामुळे सार्वजनिक ठिकाणी अधिक उठून दिसते. या भागातील मुस्लीम समूहातले अंतर्गत बदल, हा या नोंदीचा विषय नाही. पण या मोर्च्यासंदर्भात आलेल्या बातम्यांमध्येही मुस्लिमांची उपस्थिती अधोरेखित केलेली आहे आणि काही मोर्चेकऱ्यांच्या बोलण्यातही हे आलं (त्यातला सूर शत्रुभावी नव्हता. आजूबाजूला काय दिसतंय याबद्दल ते बोलत होते), म्हणून फक्त इथे हा मुद्दा नोंदवला आहे. केवळ पोशाखामुळे उपस्थिती जास्त दिसत नव्हती, उपस्थिती जास्त होतीच, पोशाखामुळे ती उठून दिसली.


मोर्चा पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतले दोन जण एकमेकांशी बोलत होते. त्यांच्या बोलण्यात एकंदर उदासीनता दिसत होती. त्यामुळे "प्रत्येक जण आपापल्या फायद्याचं बघतो", असं म्हणून त्यातला एक जण निघूून गेला. त्या-त्या वेळी सत्तेवर येणाऱ्या सरकारांबद्दलचा त्याचा शेरा होता. वर उल्लेख आलेले पन्नाशी ओलांडलेले गृहस्थ म्हणाले, "मी गेली पस्तीस वर्षं खाजगी शाळेत नोकरी करतोय (शिपाई म्हणून). माझं काय झालं? सरकारला एवढं या मुलांचं ऐकून घ्यायला काय होतंय! कामं नकोत द्यायला माणसांना!"

मोर्च्याच्याच रस्त्यावर एका ठिकाणी बीएस.सी. झालेला पंचविशीतला तरुण फळांचं दुकान चालवतो. सगळं शांत झाल्यावर, संध्याकाळी त्याला या मोर्च्याबद्दल मत विचारलं. तो म्हणाला, "बरोबर आहे ना. एका माणसासाठी सरकारपण का अडून बसलंय? मोर्चा बराच मोठा होता. अपेक्षेपेक्षा मोठा होता. दहा-बारा वर्षं असंच वागतायंत. काय एका माणसाला राजीनामा द्यायला सांगितलं तर!" या आंदोलनात गेले काही दिवस विरोधी राजकीय पक्षही उतरताना दिसतात, पण राजकारण्यांना सोडून द्या, त्याआधी महिनाभर मुलं मागणी करत होती, तेव्हा का ऐकलं नाही, असा प्रश्न त्याने नोंदवला.
पंतप्रधानांनी काल मध्यरात्री एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकला- पेपरफुटीसंदर्भात जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील, आणि यासंबंधी अधिक कठोर कारवाईसाठीची तरतूद करणारं विधेयक संसदेत मांडलं जाईल, इत्यादी गोष्टी या अडीच मिनिटांच्या व्हिडिओत ते बोलले. वांगचुक यांनी यानंतर काही वेळाने केंद्रीय मंत्र्यांच्या हजेरीत उपोषण सोडलं. मग त्यांच्या नावाचा उल्लेख करत परत पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर काही आश्वासनपर विधान प्रसिद्ध केलं. विरोधी पक्षांचे विविध नेतेही जंतर-मंतरवर ये-जा करत आहेत, तसंच देशभरात ठिकठिकाणी कमी-अधिक तीव्रतेची आंदोलनं होत असल्याच्या बातम्या आहेत. पुढेही काही ना काही घडत राहील. यातूनही अर्थ-अनर्थ लावले जातील. पण हा फक्त नेत्यांच्या वागणुकीचा किंवा वैयक्तिक लहरीपणाचा मुद्दा नाही.

इथे आपण केलेला प्रयत्न लोकांमध्ये विशिष्ट आंदोलनाबद्दल कोणते पडसाद उमटतात, ते समजून घेण्याचा आहे. या आंदोलनांबद्दल कोणत्या भाषेत बोलावं आणि ऐकावं, याबद्दलचा हा प्रयत्न होता. या आंदोलनाला विशिष्ट चेहरा नाही, दीर्घ काळ प्रस्थापित झालेलं नेतृत्व नाही, विशिष्ट विचारसरणी नाही- त्यामुळे बहुधा विश्लेषक किंवा पत्रकार आपापला आशय त्यात भरत राहतात. कॉक्रोच जनता पार्टीच्या दिपके यांनी त्यांची विचारसरणी म्हणून 'गांधी-आंबेडकर' यांची नावं घेतली आणि ते खरंही असेल, तरी ते एक व्यक्तिगत विधान उरतं. ते या संदर्भात तरी त्यांच्या निमित्ताने सुरू झालेल्या आंदोलनाचं विधान ठरेलच असं नाही. (वांगचुक हेही एक निमित्त असल्यासारखे यात दिसतात. काल त्यांनी उपोषण सोडलं तरी त्यामुळे या घडामोडींवर थेट काहीच परिणाम झाला नाही, हा याचा एक दाखला म्हणता येईल. त्यांच्या वैयक्तिक निर्णयांबद्दलच तर्कवितर्कही सुरूच राहिले आहेत). व्यापक स्तरावर संघटना, तिची विचारसरणी, त्यानुसार होणारी उभारणी- असा या आंदोलनाचा प्रवास नाही. पेपरफुटीसारख्या एका विशिष्ट मुद्द्याच्या निमित्ताने राज्यसंस्थेविरोधातला रोष वेगवेगळ्या तऱ्हेने उत्स्फूर्तपणे व्यक्त करणारं हे आंदोलन दिसतं. 

शिक्षणाचा आणि रोजगाराचा प्रश्न इतर अनेक सामाजिक चिरफळ्यांना पुरून उरत असल्यामुळे लोक यात उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसतात. याचा शेवट काय होईल, त्याबद्दल भाकित वर्तवणारी ही नोंद अर्थातच नाही.  पण आधी नोंदवल्याप्रमाणे, लोकशाही व्यवस्थेचं रूप कसं असायला हवं, त्यातील राज्यसंस्थेने उत्तरदायित्व राखलं नाही तर त्याचा कोणता परिणाम होऊ शकतो, याबद्दलचे प्रश्न अत्यंत ठळकपणे या आंदोलनाच्या निमित्ताने आपल्या सार्वजनिक अवकाशात विचारले जात आहेत. लोक आपापल्या परीने त्यावर काही उत्तरं देत आहेत, आपापली मतं मांडत आहेत, हेच रत्नागिरी इथल्या कालच्या मोर्च्यातही दिसलं. अशा घडामोडींबाबत त्या घडत असताना बरीच उत्तेजीत विधानं होतच असतात. पण त्या विधानांपलीकडे काही थांग लावायचा प्रयत्न आधीच्या नोंदीत आणि या वृत्तान्तात केला. 
मोर्च्याच्या आसपास पोलीस कर्मचारी तैनात होतेच. तसंच मोर्च्यापाठोपाठ बरीच सामग्री असणारी पोलिसांची गाडी संथपणे जात होती. त्यातल्या सामग्रीचा वापर करायची वेळ आली नाही. 

०४ जुलै २०२६

'सेक्युलर' : शब्दाचा साचा नि कोंबलेले अर्थ

'फ्रंटलाइन' या पाक्षिकाच्या १५-३० जूनच्या अंकात 'द सेक्युलर सेफ स्पेस' हा हुझैफुल रियाझ यांचा लेख छापून आला. त्याला प्रतिसाद म्हणून लिहिलेल्या इंग्रजी टिपणाचं हे मराठीकरण आहे. मूळ टिपणाचं संपादकांनी संक्षिप्त केलेलं रूप 'फ्रंटलाइन'च्या १-१५ जुलैच्या अंकात वाचक-पत्रांमध्ये प्रसिद्ध झालं (मूळ टिपण नोंदीखाली प्रतिक्रिया म्हणून दिलंय). या मुद्द्यावर स्वतंत्रपणे वेगवेगळी म्हणणी मांडली गेली आहेत, याची कल्पना असूनही एका पाक्षिकात लेख आल्यावर त्यावर वाचक म्हणून प्रतिक्रिया द्यावी वाटली, म्हणून हे पत्र लिहिलं. तितपतच त्याकडे पाहावं.
Frontline, 15 July 2026

"सेक्युलर" मुस्लीम विचारवंतांनी इस्लामी परंपरेतून मिळालेली दृष्टीभूमी (व्हॅन्टेज पॉइन्ट) सोडून दिली, पण प्रत्यक्षात "आधुनिकतेत स्वतंत्रपणे ज्या संसाधनांचा ठळक अभाव जाणवतो ती या परंपरेमध्ये आहेत", असा युक्तिवाद हुझयफुल रियाझ यांनी 'द सेक्युलर सेफ स्पेस' (फ्रंटलाइन, ३० जून) या लेखात केला. त्यांच्या मते, अशा "सेक्युलर" मुस्लीम विचारवंतांनी परंपरेतून येणारी दृष्टीभूमी सोडून दिल्यामुळे कोणताही "अस्सल" विचार शोधण्याची शक्यताही त्यांच्या हातून निसटली, कारण "अस्सल विचारासाठी अस्सल दृष्टीभूमी लागते, आपल्याला उभं राहता येईल अशी स्वतःची जागा लागते."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली वैचारिक मांडणी अशा दृष्टीभूमीतून असल्याचा दावा रियाझ करतात. आंबेडकरांचा विचार "दलित समुदायाच्या अनुभवाधारित परंपरेवर उभारण्यात आला," असं त्यांचं म्हणणं आहे. पण आंबेडकरांनी केवळ अनुभवजन्य ज्ञानाच्या आधारे सैद्धान्तिक मांडणी केली नाही, तर पाश्चात्त्य राजकीय विचारपरंपरांमधली काही सूत्रं आणि बौद्ध परंपरा यांचाही आधार त्यांनी घेतला. यातील कोणत्याही परंपरेत ते जन्माला आलेले नव्हते, त्या अर्थी या परंपरा त्यांच्या "स्वतःच्या" / जन्मजात नव्हत्या. याउलट, रियाझ यांनी मात्र आपण ज्या परंपरेत जन्माला आलो तीच परंपरा आपलीशी करण्याच्या कल्पनेवर भर दिला आहे. असा युक्तिवाद करायचा तरी मग त्याच्या विविध नैतिक व अस्तित्वलक्ष्यी आयामांबाबत चर्चा करायला हवी. (आपण स्वतःची परंपरा खऱ्या अर्थाने सोडू शकतो का आणि कितपत सोडू शकतो, याचीही चर्चा कदाचित त्यात करता आली असती). पण तसं न करता रियाझ यांनी अस्सल सत्व नि स्वत्व यांबाबतीत निरपवाद आग्रह धरणारी भूमिका घेतल्याचं दिसतं. सेक्युलर मुस्लीम विचारवंतांनी कधीही "भारतातील मुस्लीम परिस्थितीशी अनुरूप स्वायत्त राजकीय सिद्धान्त" मांडण्याचा प्रयत्न केला नाही, अशी खंतही ते नोंदवतात. हे तर आंबेडकरांच्या विचारव्यूहाला छेद देणारं आहे.

आंबेडकरांनी स्वतःच्या जन्मजात समुदायाच्या परिस्थितीशी "अनुरूप" ठरेल असा "स्वायत्त" राजकीय सिद्धान्त मांडायचा प्रयत्न केला की, त्यांच्या दृष्टीनुसार आधुनिक लोकशाही जगण्यासाठी आवश्यक वाटणारे विचार उभारण्याची त्यांची खटपट होती? 'बुद्ध अँड हिज् धम्म' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आंबेडकर लिहितात : "विज्ञान येणाऱ्या आधुनिक माणसाला धर्म हवाच असेल तर, त्याला केवळ बुद्धाचाच धर्म आपलासा करण्याजोगा आहे. [...] आधुनिक जगाला स्वतःचा बचाव करायचा असेल तर त्याला बौद्ध धर्माशिवाय दुसरा पर्याय नाही." आंबेडकरांच्या या दाव्याशी सहमत व्हायचं की नाही, हा वेगळा मुद्दा. पण आधुनिक माणसाने स्वतःची परंपरा निवडायला हवी, ही त्यांची इच्छा त्यांच्या लेखनात आणि भाषणांमध्ये सातत्याने व्यक्त झालेली दिसते. किंबहुना, बौद्ध धर्मात प्रवेश करण्यासंबंधी अनुयायांना आवाहन करत असतानाही ते 'स्वतः विचार करून' परंपरा निवडण्याचा मुद्दा अधोरेखित करत होते. (बौद्ध धर्म हाच आधुनिकतेचा एकमेव तारणहार असल्याचा आग्रह वेगळ्या वादाचा विषय होऊ शकतो, पण तो निराळा मुद्दा). शिवाय, आंबेडकरांच्या मांडणीमधल्या सामाजिक लोकशाही व सामाजिक सद्सद्विवेकबुद्धी यांसारख्या संकल्पना सर्व समाजघटकांना संबोधून मांडलेल्या होत्या, केवळ त्यांनी जन्म घेतलेल्या समुदायाबद्दलचा तो "स्वायत्त" विचार नव्हता.

भारतीय संदर्भात "सेक्युलर" या शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा, हाही प्रश्न इथे कळीचा ठरतो. उदाहरणार्थ, मराठीत "सेक्युलॅरिझम"साठी अनेक पर्यायी, किंबहुना मूळच्या म्हणाव्यात अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. भारतीय संविधानाच्या अधिकृत मराठी भाषांतरात 'धर्मनिरपेक्षता' हा शब्द येतो- यात राज्यसंस्था कोणत्याही विशिष्ट धार्मिकतेशी जोडून न घेता स्वतंत्रपणे कार्यरत राहील, असा गर्भितार्थ आहे. या व्यतिरिक्त 'इहवाद' ही संज्ञा 'या लौकिक जगातल्या' घडामोडींना केंद्रस्थानी ठेवणारा अर्थ मांडते. 'सर्वधर्मसमभाव' हा सर्व धर्मांना समान अंतरावरून किंवा समान जवळिकीने समजून घेण्याची इच्छा मांडणारा शब्द आहेच. तर, काही जण 'निधर्मीवाद' असाही शब्द यासाठी वापरतात- त्यातून कोणत्याच धर्माशी काही देणंघेणं नसल्याचा अर्थ सूचित होतो. 'धर्मनिरपेक्षते'सह यातील सर्व संज्ञांचा विचार केला तर, रियाझ यांना खटकणाऱ्या पाश्चात्त्य आधुनिकतेतील 'सेक्युलर' या संकल्पनेपेक्षा काही वेगळे (आणि काही सारखे) अर्थ हाताला लागतात.

अशा वेळी आपण "आपल्या स्वतःच्या" भाषांची दृष्टीभूमी वापरून या गुंतागुंतींकडे पाहिलं तर कदाचित या वैविध्यपूर्ण परंपरेकडे पाहण्याचा अधिक धड दृष्टीकोन सापडण्याची शक्यता आहे. नाहीतर, वारकरी परंपरेत मुस्लीम संत असणं आणि सुफी दर्ग्यांवर दर्शनासाठीच्या रांगेत हिंदूही असणं, यांसारख्या घडामोडींचं वर्णन करणारे शब्द कुठून सापडतील? यात फक्त सरमिसळच आहे की अधिक काही 'भाव' व्यक्त होतो? या परंपरा आहेत म्हणून वैरभाव नसतो, असंही नाही. तोही असतोच. पूर्वग्रह असतात, त्यानुसार आग्रह धरले जातात, अन्यायही होतात. पण परंपरेतला दुसराही एक भाव आहे, तो कोणता? यावर बोलण्याऐवजी "स्वायत्त" राजकीय विचार मांडण्यासाठी स्वतःच्या जन्मजात परंपरेलाच प्राधान्य देण्याचा मुद्दा रियाझ यांच्या लेखात मांडलेला आहे. हाच मुद्दा कमी-अधिक प्रमाणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा विनायक दामोदर सावरकरांच्या हिंदुत्ववादात अनुस्यूत आहे. त्यात बहुसंख्याक हिंदू समुदाय "आपला" असल्याचं सांगितलं जातं आणि आता या विचारसरणीला आपलं मानणारं सरकार देशात बहुसंख्य ठिकाणी सत्तेत आहे. हिंदू धर्मपरंपरेसंदर्भात "स्वायत्त" राजकीय विचारांची इच्छा धरणारा लेख कोणी लिहिला, तर तो 'फ्रंटलाइन'मध्ये छापून येईल का, असा आक्षेप हिंदुत्ववाद्यांनी घेतला, तर त्यावर काय उत्तर देणार? मग 'सेक्युलर' शब्दावरून टिंगलटवाळीही सुरू राहते. हे इंग्रजी शब्दामुळे अधिक सोयीचं होतं. तसंच, यातून काही सरधोपट पुरोगामी वाटणारे साचेही तयार होतात.

उदाहरणार्थ, परवाच एका पत्रकाराने राज्याचे विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना असा प्रश्न विचारला : "हा शाहू-फुले-आंबेडकरांचा, किंवा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र, धर्मनिरपेक्षता मांडणारा सेक्युलर महाराष्ट्र अशी ओळख आहे, अशा महाराष्ट्रात या विचाराला टक्कर देणारा उजवा विचार इतक्या स्टाँगपणे प्रस्थापित होईल, नव्हे पंधरा-पंधरा वर्षं सत्तेत राहील, असा विचार तुम्ही कधी केला होतात का?" भुजबळांनी शांतपणे बोलायला सुरुवात केली आणि व्यवहारामध्ये हा विचार मागे पडत नसल्याचं सांगितलं. त्यांच्या उत्तरानंतर पुन्हा 'सेक्युलर' हा शब्द वापरून पत्रकाराने साधारण तोच प्रश्न उत्कटपणे विचारला. त्यावरही भुजबळांनी काही तथ्यं मांडून उत्तर दिलं. साधारणपणे, पत्रकार ज्या सरकारला 'प्रतिगामी', 'उजव्या विचारां'चं, 'सेक्युलर वा धर्मनिरपेक्ष विचारांच्या विरोधी विचारां'चं म्हणत होता, ते सरकार व्यवहारामध्ये काही तसं विपरित करत नसून अनेक गोष्टी आमच्या (म्हणजे शाहू-फुले-आंबेडकरी) विचारांनुसार होत असल्याची ग्वाही भुजबळांनी दिली. त्यासाठी त्यांनी दाखलेही दिले. मग मधे एकदा पत्रकाराने काही धार्मिक उन्मादाची उदाहरणं देऊन थोडी स्पष्टता आणली. पण या घडामोडी आधीपासूनच घडत असल्याचं आणि प्रत्येक काळात असे प्रतिगामी लोकही असतात, असं सांगून मुद्दा पुढे नेण्यासाठी फारसा वाव उरणार नाही, अशी काळजी भुजबळांनी सफाईदारपणे घेतली. तरीही, पत्रकार शेवटी म्हणाला, "आजचा विषय थोडासा अकॅडमिक वाटला असेल, पण तो अत्यंत महत्त्वाचा विषय होता." मग त्याने उपस्थित प्रेक्षकांना आणि एकंदरच तरुणाईला संदेश दिला की, त्यांनी नुसतं रीलमध्ये अडकून राहू नये, पुस्तकं वाचावीत! जाताजाता, "आपण या पेहरावामध्ये.. मॉडर्न अंदाजामध्ये आहोत", त्याचं श्रेय या आधीच्या मंडळींना आहे, असाही उल्लेख त्याने केला. थोडक्यात- आपल्या आत्ताच्या आधुनिकतेची पायाभरणी केलेला विचार सध्या मागे पडतोय, असं हे धडपणे मांडलं न गेलेलं सूत्र होतं. पण, शेवटी आधुनिकतेचा सकारात्मक अर्थ म्हणून पेहरावाकडे बोट दाखवण्यात जी मर्यादा आहे, तशी विचारसरणीच्या मुद्द्याची मर्यादा 'सेक्युलर' या शब्दाने सुरुवातीलाच निश्चित केली. सुमारे अर्धा तासाचा हा संपूर्ण कार्यक्रम 'सेक्युलर विचारसरणी' या मुद्द्यावरचा होता (मधेच थोडा वेळ संदर्भाशिवाय समताही येऊन गेली). पण खुद्द त्या मुद्द्यावर स्पष्टता येण्याकडे बोलणं गेलं का?

शाहू महाराज ब्राह्मणांचं वर्चस्व टाळून वैदिक धर्माचा व्यवहार उभा करता येईल का, असा कृतीच्या पातळीवरचा प्रयत्न करत होते. शिवाय, त्यांची राज्य हाकतानाची धोरणं सर्वधर्मसमभाव राखणारी होती. जोतीराव फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्माच्या रूपात काही कल्पक मांडणी करून पुरोहित वर्गाची मध्यस्थी नसलेलं, 'निर्मिका'शी थेट नातं सांगणारं असं एक सामाजिक अध्यात्म मांडलं. आंबेडकरांनी त्याही पलीकडे विविधांगी धार्मिक विश्लेषण केलं आणि शेवटी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माचा विचार स्वीकारून तोच आधुनिक युगात योग्य मार्ग असल्याचं प्रतिपादन केलं. या तिघांच्याही विचार-व्यवहारात धर्म ही संकल्पना होतीच. यात रूढार्थाने पाश्चात्य 'सेक्युलॅरिझम' नाही! मग तो शब्द वापरून आपण खोलात विचार करणंच टाळतो का, हे पाहायला हवं.

दुसरीकडे, सावरकरांचा हिंदुत्ववाद 'इहवादी' आहे (म्हणजे त्यात कर्मकांडाला नि पारलौकिकतेला मध्यवर्ती स्थान नाही), पण तो विचार 'धर्मनिरपेक्ष' किंवा 'सर्वधर्मसमभाव' या संज्ञांशी जोडता येत नाही. त्यात एका विशिष्ट धर्मपरंपरेशी जोडलेली बहुसंख्याक वंशसांस्कृतिक राष्ट्रीयत्वाची मांडणी आहे. याउलट, गांधींचं स्वतःला हिंदू म्हणवून घेत असतानाच सर्वधर्म प्रार्थना करणं, आणि त्यांचेच सहप्रवासी असणाऱ्या विनोबांचं 'सर्व धर्म प्रभूचे पाय' असं म्हणणं, हे 'सर्वधर्मसमभाव' राखणारं, पण काटेकोरपणे 'इहवादी' दृष्टीवर भर न देणारं होतं. तर, आंबेडकरांनी 'सर्व धर्म एकसारखेच सत्य नि चांगले असल्याची धारणा धडधडीतपणे चुकीची' असल्याची भूमिका घेतली (बुद्ध अँड हिज् धम्म, पान २४) आणि आधुनिक लोकशाही समाजातल्या माणसाने स्वतःचा धर्म स्वतः निवडायला हवा, असं मत मांडलं. त्यानुसार त्यांनी बौद्ध धम्मापर्यंतची वाटचाल केली. पण ते या धर्मविचारावर राज्यसंस्थेच्या कारभाराचा सिद्धान्त मांडत नव्हते किंवा यानुसार त्यांनी राष्ट्रीयत्वासंबंधीचे आग्रह धरले नाहीत. शिवाय, यात काही विधींना जागा असली तरी पारलौकिकतेला जवळपास वाव नसल्यामुळे इहवादी बाजू होतीच. या व्यतिरिक्तही नंतरच्या काळात हमीद दलवाईंसारखे 'इंडियन सेक्युलर सोसायटी'चे सदस्य असणारे आणि 'मुस्लीम सत्यशोधक मंडळा'ची स्थापन करणारे लोकही झाले. यात सांस्कृतिक अंगाने स्वतःचं मुसलमान असणं मोकळेपणाने स्वीकारताना धार्मिक बाजूच्या काही सुधारणा अभिप्रेत होत्या. या सगळ्या विचार-व्यवहाराला फक्त 'सेक्युलर' या एका शब्दात कसं गुंफणार. त्यात गुंफण्यापेक्षा कोंबणंच होतं आणि ते फक्त शब्दापुरतं न उरता विचारही कोंबले जातात. 'सेक्युलर' हा शब्दच वापरू नये, अशा अर्थाने हे टिपण लिहिलेलं नाही, पण त्याचे आपल्या परिसरातले अनेकरंगी अर्थ विसरून जाण्याइतका एकसाची वापर बरा वाटत नाही. 
नवीन नोंदींच्या माहितीसाठी : व्हॉट्स-ॲपइन्स्टाग्राम 
ऐच्छिक वर्गणीसाठी उजवीकडचा समास पाहावा

२३ जून २०२६

एम, नो, नहीं, नाही : नकारामागचा सखोल स्वीकार आणि राखणदार

कोंग स्पिलिटी लिंगडोह लँगरीन यांचं छायाचित्र : तरुण भारतीय । त्यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ । राखणदार चिन्ह : राखणदार संघ । मांडणी : रेघ

डोमिस्याट, वेस्ट खासी हिल्स, मेघालय

मेघालयाची राजधानी शिलाँगपासून सुमारे दीडशे किलोमीटरांवर असणाऱ्या डोंगराळ भागात डोमिस्याट नावाचं गाव. त्या गावात राहणाऱ्या कोंग स्पिलिटी लिंगडोह लँगरीन यांचं २८ ऑक्टोबर २०२०मध्ये त्यांच्या वयाच्या पंच्याण्णवाव्या वर्षी निधन झालं. तेव्हापासून खासी स्टुडन्ट्स युनियन या संघटनेच्या पुढाकाराने स्थानिक लोक २८ ऑक्टोबर हा युरेनियमविरोधी दिवस म्हणून साजरा करत आले आहेत. अणुऊर्जेसाठीचा प्रमुख कच्चा पदार्थ युरेनियम हा असतो.

कोंग स्पिलिटी यांनी त्या हयात असताना कायमच युरेनियमच्या खाणींसाठी स्वतःची जमीन विकायला ठाम नकार दिला, त्याची गोष्ट तरुण भारतीय यांच्या 'एम, नो, नहीं' या छायाचित्रांच्या पुस्तकातून उलगडते (यारबाल बुक्स, डिसेंबर २०२५). खासी भाषेत 'एम'चा अर्थ 'नाही' असा होतो. डोमिस्याट गावात सातच घरं आणि ती सर्व कोंग स्पिलिटी यांच्याच विस्तारित कुटुंबाची. तिथल्या दोनेक टेकड्यांचा विशाल परिसर या कुटुंबाच्या 'मालकी'चा आणि कुटुंबातील अशा निर्णयाची धुरा कोंग स्पिलिटी या वृद्ध स्त्रीकडे. या भागातील जमिनीखाली युरेनियमचे साठे असल्याचा तपास १९७०च्या दशकात लागला असला तरी डोमिस्याट गावाखालच्या प्रचंड साठ्यांचा शोध पहिल्यांदा १९८६-९२ या दरम्यान घेतला गेला. "या शोधकामासाठी सरकारच्या आण्विक खनिजं विभागाचे लोक यायचे. या कामादरम्यान कोंग स्पिलिटी यांच्याकडची एकोणनव्वद गुरं मेली. गावात काही स्त्रियांची मुलं जन्मतःच मृत असल्याचं लक्षात आलं. शोधकामाला येणाऱ्या लोकांनी स्त्रियांना छळल्याच्याही काही तक्रारी आल्या. त्यामुळे कोंग स्पिलिटी यांनी या सरकारी माणसांना हाकलून लावलं. करार नको. कसल्या भूलथापाही नकोत," अशी भूमिका कोंग स्पिलिटी यांनी घेतली (पान ३९). शिलाँगमध्ये आपल्या कुटुंबासह राहणारे तरुण भारतीय २००७ साली पहिल्यांदा या भागात गेले आणि मग पुढे दोन-अडीच दशकं काही वेळा जात राहिले, तिथली छायाचित्रं काढत राहिले, कोंग स्पिलिटी यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत राहिले. त्यातून आलेले थोडेसे शब्द आणि बरीचशी छायाचित्रं सुमारे २०० पानांच्या या पुस्तकात आहेत.

कोंग स्पिलिटी लिंगडोह लँगरीन (१९२५-२०२०)
छायाचित्र : तरुण भारतीय (एम, नो, नहीं- पानं ६४-६५)
यातील काही छायाचित्रं- विशेषतः भौगोलिक अवकाशाची छायाचित्रं- स्वतंत्रपणेही लक्षवेधी आहेत (त्यातलीच निवडक इथे लेखासोबत दिली आहेत), तर काही छायाचित्रं मुख्यत्वे पुस्तकातलं कथन पुढे नेण्यासाठीचा तपशीलच देऊन थांबतात. या कथनाची सुरुवात २०२० साली कोंग स्पिलिटी यांच्या अंत्यसंस्कारापासून होते, त्यानंतर तरुण भारतीय या भागात जायला लागले त्या प्रवासाला धरून तिथल्या प्रदेशाची, कोंग स्पिलिटी यांच्या घराची व कुटुंबियांची छायाचित्रं येतात. तसंच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन उभ्या राहिलेल्या काही आंदोलनांची छायाचित्रं येतात. काही ठिकाणी खाणकाम सुरू झालं, तिथल्या खाणींची छायाचित्रं येतात. 

दोन डोंगरांची मालकीण असूनही "मी श्रीमंत नाही", असं कोंग स्पिलिटी तरुण यांना एकदा सांगतात. पण मग युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिलेला प्रस्ताव त्यांनी का नाकारला? कोंग स्पिलिटी यांनी स्वतःची जमीन तीस वर्षांच्या भाडेकरारावर खाणकामासाठी उपलब्ध करून दिली तर त्यासाठी ४५ कोटी रुपयांचा प्रस्ताव कंपनीने त्यांच्या समोर ठेवला होता. तरुण यांच्या प्रश्नावर त्या उत्तर देत नाहीत. न बोलता त्यांना झाडांच्या राईमध्ये घेऊन जातात. तिथे एक धबधबा नि पाण्याचा डोह असतो. कोंग स्पिलिटी म्हणतात, "पैशाने ही नदी विकत घेता येईल का? ही जमीन? हे स्वातंत्र्य विकत घेता येईल?" (पान ४९)

डोमिस्याट गावाचा भाग
छायाचित्र : तरुण भारतीय (एम, नो, नहीं : पान ३१)

तरुण यांची युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी ओळख होते. त्याला ते खाणकामामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांविषयी विचारतात. यावर तो चकित होऊन त्यांना म्हणतो की, कसलं विस्थापन? आम्ही त्यांचं पुनर्वसन करू. अगदीच सोपं आहे ते. किती जणांचं पुनर्वसन करावं लागेल? जास्तीत जास्त एक हजार. आम्ही त्यांना पैसे देऊ, त्यांच्यासाठी घरंही बांधू, काही पगारी नोकरी देऊ. तसंही या लोकांकडे जमीन असली तरी त्यांना तिची किंमत कळत नाही (पान ९३).

जमीन, किंमत, मूल्य, परिसर याच्याबद्दलचे निरनिराळे प्रश्न आणि या गोष्टींकडे पाहण्याचे भिन्न दृष्टिकोन वरच्या उद्गारांमधून समोर येतात, तसेच या पुस्तकातल्या छायाचित्रांमधूनही काही प्रमाणात समोर येतात. काही छिन्नविछिन्न झालेले भूप्रदेश त्यात आहेत, तर काही दूरदूरपर्यंत 'मोकळी' असणारी जमीन आहे. 

पुस्तिका (Yaarbal Books, 2025)
पुस्तकाला शेवटी तरुण यांच्या पत्नी आणि राजकीय-सामाजिक कार्यकर्त्या अँजेला रंगद यांनी लिहिलेलं टिपण जोडलं आहे. त्यात या छायाचित्रांमधून उलगडणाऱ्या कथनाची पार्श्वभूमी सांगताना तरुण यांच्याविषयीच्या आठवणीही थोडक्यात नोंदवल्या आहेत. तरुण यांचं जानेवारी २०२५मध्ये निधन झालं. त्यामुळे त्या वर्षअखेरीला प्रकाशित होऊ घातलेलं हे पुस्तक त्यांना पाहायला मिळालं नाही. 

या पुस्तकासोबत रंगद यांनी युरेनियम आणि अणुऊर्जा या संदर्भात लिहिलेली वीस पानांची प्राथमिक माहितीपर पुस्तिकाही आहे- त्यात मुद्देसूदपणे युरेनियमचं खाणकाम आणि अणुऊर्जा या संदर्भात मांडणी केली आहे. हे प्रकल्प परिसरातील जलस्त्रोत प्रदूषित करतात, त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट दीर्घकालीन पातळीवर लावता येत नाही, किरणोत्साराचा धोका सतत असतो, आणि यातून बाहेर पडणारे कण शरीरात गेल्यास माणसांमध्ये ल्यूकेमियासारख्या आजारांच्या शक्यता वाढतात, इत्यादी माहिती आकडेवारीसहित सोप्या भाषेत या पुस्तिकेत दिली आहे. अशा आर्थिकदृष्ट्या महागड्या आणि प्रत्यक्षात त्या प्रमाणात परतावा न देणाऱ्या, तसंच सजीव सृष्टीवर दीर्घकालीन घातक परिणाम करू शकणाऱ्या प्रकल्पांपेक्षा पवनऊर्जा, सौरऊर्जा यांसारख्या स्त्रोतांसंदर्भातील संशोधनावर अधिक खर्च केल्यास हितकारक ठरेल, असा निष्कर्ष त्यांनी शेवटी नोंदवला आहे. तरुण यांचं पुस्तक आणि ही पुस्तिका यातल्या इंग्रजी मजकुरासोबतच त्याचं खासी भाषांतरही समांतरपणे त्या-त्या पानांवर किंवा पानांशेजारी दिलं आहे.

एम, नो, नहीं : मुखपृष्ठ
मेघालय राज्यातील बहुतांश भागांप्रमाणे खासी हिल्सचा भाग संविधानाच्या सहाव्या सूचीअंतर्गत येतो. त्यामुळे तिथे तुलनेने अधिक प्रमाणात प्रशासकीय, कायदेमंडळीय व न्यायिक स्वायत्तता लाभलेली 'ऑटोनॉमस डिस्ट्रीक्ट कौन्सिलं' आहेत. तर, खासी हिल्समधल्या अशा कौन्सिलने काही गावांमधून युरेनियमच्या खाणकामासाठी परवानगी मिळवली आणि त्यातून गावा-गावांमध्येही संघर्षाचं वातावरण निर्माण झालं, इत्यादी तपशील या पुस्तकाअखेरीच्या टिपणात आला आहे. यातले काही गुंते आणखी शोधण्यासारखे आहेत. पण तो निराळा विषय होईल. या पुस्तकात मुख्यत्वे कोंग स्पिलिटी यांनी दिलेल्या ठाम नकाराची गोष्ट सांगण्याला प्राधान्य आहे. त्यामुळे त्यातला भावात्मक आशय अधिक ठसेल अशा पद्धतीने आला आहे.

सप्टेंबर २०२५मध्ये पर्यावरण, वनं व हवामान बदल मंत्रालयाने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या, आण्विक प्रकल्पांसाठी गरजेच्या खनिजांचं उत्खनन करण्यासंदर्भात जनसुनावणी घेण्याची गरज नसल्याचा निर्णय 'कार्यकारी आदेशा'द्वारे घेऊन टाकला (डाउन टू अर्थ, ११ सप्टेंबर २०२५). इथे या पुस्तकातलं कथन संपतं. आता कोंग स्पिलिटीसारख्या लोकांनी कितीही 'नकार' दिला, तरी त्याकडे काणाडोळा करत प्रकल्प पुढे नेणं सत्ताधाऱ्यांना अधिक सोयीचं झालं, असा या निर्णयाचा अर्थ आहे.

असं होणार असेल तर मग कोंग स्पिलिटी यांच्या नकारामागे मुळात कोणता सखोल स्वीकार असतो, त्याचा विचार होण्याची शक्यता आणखी मंदावते. विकासाच्या प्रस्थापित कल्पनेबाबत प्रश्न उपस्थित करणं हे अव्यवहार्य, अप्रस्तुत किंवा थेट विकासविरोधीच ठरवण्याकडे कल असतो. तरीही, असे प्रश्न विचारणारी मंडळी पुढे येतच राहतात. 

कोकण किनारपट्टी, महाराष्ट्र

महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा यांच्या सीमेवरील कणकुंबी या गावापासून सिंधुदुर्गातील बांदा शहराजवळच्या सोनुर्ली या गावापर्यंत एक ‘राखणदार यात्रा’ १३ जूनपासून सुरू झाली . ‘जल-जंगल-जमीन’ ही मध्य भारतातील आदिवासी समुदायांनी रूढ केलेली घोषणा स्वीकारत कोकणातील स्थानिक परंपरांमधील निसर्गपूरक खुणा ठळक करू पाहणारी, ‘विकासा’च्या प्रश्नांबाबत लोकसंवादाचा प्रयत्न करणारी ही यात्रा असल्याचं संयोजकांशी बोलल्यावर लक्षात येतं. यू-ट्यूबवर 'कोकणी रानमाणूस' या नावाने चॅनल चालवणाऱ्या प्रसाद गावडे यांनी यात पुढाकार घेतला आहे, तसंच निसर्गसंवर्धनासंबंधी दीर्घ काळ काम करणारे तरुण, काही शेतकरी आणि कार्यकर्ते यांचाही या यात्रेत  तितकाच सहभाग आहे.

श्रेय : राखणदार संघ
'राखणदार' ही कोकणातली संकल्पना आपल्या परिसराचं रक्षण करणाऱ्या एका अदृश्य शक्तीचा निर्देश करते. त्या संकल्पनेला सध्याच्या काळानुरूप विकासाच्या चर्चेत केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न या यात्रेच्या निमित्ताने होताना दिसतो. आपल्याच परंपरेतील काही गोष्टींचा स्वीकार करून वर्तमानातल्या विशिष्ट समस्यांवर पर्यायी दृष्टिकोन मांडणारी ही भूमिका आहे. त्यावर पुढे चर्चा होत राहिली तर काही टीकेचे मुद्देही समोर येऊ शकतातच. पण 
या संकल्पनेच्या राजकीय-आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आयामांवर चिकित्सक चर्चा करण्यासाठी तिची दखल तरी घ्यावी लागेल. आता या यात्रेचा दुसरा टप्पा आणखी वरच्या दिशेने जाईल तेव्हा तरी मुख्यप्रवाही माध्यमांनी ही दखल घेतली, तर त्यावर काही बोलणं होण्याची शक्यता आहे. 

मे महिन्यात महाराष्ट्र शासनाने कोकणातील साडेपंचवीस हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रस्तावित आण्विक ऊर्जाप्रकल्पांसाठी विविध खाजगी व सरकारी कंपन्यांशी सुमारे साडेसहा लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले (हिंदुस्तान टाइम्स, २० मे २०२६). वास्तविक, जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असलेला इथला सुमारे ६० ते ७० टक्के भाग ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ असल्याचं गाडगीळ आयोगाने (२०११) नमूद केलं होतं. त्यामुळे इथे खाणकाम, मोठे ऊर्जाप्रकल्प आणणं विध्वंसक ठरेल; त्याऐवजी इथे निसर्गपूरक उद्योजकतेची वाट चोखाळावी, त्यासंबंधीच्या निर्णयप्रक्रियेत स्थानिकांचा अधिकाधिक सहभाग असावा, इत्यादी शिफारसी आयोगाने केल्या. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. 

या पार्श्वभूमीवर 'राखणदार यात्रे'च्या निमित्ताने 'विकासा'बद्दल पर्यायी चर्चा घडवण्याचा प्रयत्न दखलपात्र आहे. यात विकासाच्या विशिष्ट प्रस्थापित रूपाला नकार देतानाच काहीएका पर्यायी कल्पनेचा स्वीकार आहे, असं सध्या दिसतं. त्यासाठी जाणीपूर्वक वापरलेली चिन्हं परंपरेतली आहेत. या यात्रेचं बोधचिन्ह कोकणात काही ठिकाणी सापडलेल्या आदिम कातळशिल्पांचा सर्जक वापर करणारं आहे. ही चिन्हं, त्यासोबत येणारी भाषा वर्तमानातल्या सामाजिक-राजकीय-आर्थिक घडामोडींवरच्या चर्चेसाठी आणि पर्यायी विकासाची दृष्टी मांडण्यासाठी करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. एका अर्थी कोंग स्पिलिटी लिंगडोह लँगरीन याही 'राखणदारा'चीच भूमिका मांडत होत्या (त्यामागेही तिथली परंपरा होतीच), त्यामुळे या यात्रेचं नातं त्यांच्याशीही असल्याचं म्हणता येईल.

कोंग स्पिलिटी लिंगडोह लँगरीन (१९२५-२०२०)
छायाचित्र : तरुण भारतीय (एम, नो, नहीं : पानं १७२-१७३)

१० जून २०२६

झुरळांच्या काळात राजकारणाची भुरळ आणि जिज्ञासा

मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी / साधना प्रकाशन

सुहास पळशीकर यांचं 'राजकारण जिज्ञासा' नावाचं पुस्तक अलीकडे प्रकाशित झालं (साधना प्रकाशन, डिसेंबर २०२५). सुमारे दोनशे पानांच्या या पुस्तकात प्रत्येकी पाच-सात पानांचे अठ्ठावीस लेख आहेत. 

राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून पळशीकर गेल्या चार दशकांहून अधिक काळ निरनिराळ्या स्वरूपाचं लेखन मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून करत आलेत. यात अकादमिक निबंधांपासून वृत्तपत्रीय लेखांपर्यंत आणि दिवाळी अंकांमधल्या विचारांना मुद्दाम चिथावू पाहणाऱ्या लेखांपर्यंत वेगवेगळ्या लेखनाचा समावेश होतो. साधारण २००० सालापासून ते इंग्रजी वृत्तपत्रांमधूनही नियमितपणे लिहीत आलेत. गेल्या दीडेक दशकात ते वृत्तवाहिन्या आणि अलीकडे दशकभरात यू-ट्यूबवरच्या वाहिन्यांवरही बोलताना दिसतात- हेही मराठी नि इंग्रजी दोन्हींतून सुरू आहे. शिवाय, ट्विटरवर (म्हणजे आता एक्सवर) ते छोटेखानी मुद्दे लिहीत असतात. त्या-त्या माध्यमावकाशाची एक भाषा असते, तिच्याशी जुळवून घेत पुन्हा स्वतःची भाषा त्यात टाकून आपल्या अभ्यासविषयाबद्दल सार्वजनिक संवाद साधत राहण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.

स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारण आणि लोकशाही, हे सूत्र पळशीकरांच्या या दीर्घ लेखनकाळात मध्यवर्ती राहिलंय. 'राजकारण जिज्ञासा'मध्येसुद्धा हेच सूत्र आहे. लोकशाहीशी संबंधित काही प्रमुख राजकीय संज्ञा-संकल्पनांची ओळख आणि त्यांचं भारतीय अवकाशातलं उपयोजन कसं राहिलंय याची थोडक्यात चर्चा, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. त्यात 'राजकारण म्हणजे काय?' अशा अगदी प्राथमिक प्रश्नापासून सुरुवात करत पुढे लोकशाही, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, नागरिकत्व, प्रतिनिधित्व, संसदीय शासनव्यवस्था, धर्मनिरपेक्षता, राज्यसंस्था (तिची आधुनिक काळात बदललेली रूपं), लोकैकवाद ('पॉप्युलिझम'साठी या पुस्तकात आलेला शब्दप्रयोग), राष्ट्रवाद (आणि नव-राष्ट्रवाद), बहुसंख्याकवाद, इथपर्यंत निरनिराळ्या संकल्पनांची चर्चा येते. या चर्चेमागचा हेतू प्रस्तावनेत असा नोंदवला आहे : "सार्वजनिक चर्चेत अनेक वेळा पुरेशा बारकाव्यांच्या अभावी ढोबळ शब्दप्रयोग केले जातात, पूर्वग्रहांच्या आधारे निष्कर्ष काढले जातात आणि टीकाटिप्पणी केली जाते. त्यामुळे सार्वजनिक विवेक वाढीला न लागता पूर्वग्रहच पक्के होतात आणि सगळी चर्चा वाद-प्रतिवादात भरकटते. या पुस्तकातील लेखन अशा सार्वजनिक चर्चेला काही प्रमाणात अभ्यासाचं वळण लावू शकेल, या हेतूने केलेलं आहे" (पान ३).

पळशीकरांनी उल्लेख केलेल्या ढोबळ वाद-प्रतिवादाचे दाखले रोज मिळतात. उदाहरणार्थ, 'कॉक्रोच जनता पार्टी'बद्दल गेल्या आठवड्यात एका ज्येष्ठ पत्रकार-संपादकाची सुमारे अर्धा तासाची मुलाखत झाली. त्यात ते सुरुवातीला, त्यांची 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याशी ओळख असल्याचं सांगतात, मग ते स्वतः आंदोलनांच्या बाजूने असणारे पत्रकार राहिल्याचं दिपके यांना कसं माहीत आहे हे सांगतात, आणि बाकी सार्वजनिकरीत्या उपलब्ध असणारीच माहिती परत देऊन म्हणतात की, याबाबतीत 'वेट अँड वॉच हेच माझं धोरण आहे'. मग या आंदोलनाबद्दल आस्थेने, तरीही काही सावध विचार नोंदवणाऱ्यांना, 'तुम्ही आयुष्यात किती आंदोलनं केलीत' असा उलटा सवाल हे ज्येष्ठ पत्रकार विचारतात (याच न्यायाने, 'तुम्ही किती निवडणुका लढवल्यात, मग निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर टीका कशी करता', असा प्रश्न त्यांना विचारणं रास्त होईल का!). एकंदर मिळून अर्धा तासाच्या मुलाखतीत मुद्दा 'वेट अँड वॉच' इतकाच, तो मुलाखतीच्या मथळ्यात येऊन जातो, बाकी उत्तेजित हातवारे, मधेच किंचित तिरकस शेऱ्यांसोबतचं स्मितहास्य, असं काही सादरीकरण उरतं. या ज्येष्ठ पत्रकारांनी पळशीकरांचीही मुलाखत अनेकदा वृत्तवाहिनीसाठी किंवा इतर एखाद्या कार्यक्रमात घेतलेली आहे, तरी एकंदर ही स्थिती आहे. पत्रकार म्हणून नवीन माहितीही नाही किंवा भाष्यकार म्हणावं तर विश्लेषणही नाही. फक्त भाषा आहे, मुद्दा नाही. हे एका व्यक्तीपुरतं नसून साधारण अशा धाटणीचं बोलणं अनेकदा समोर येत राहतं.

भारताच्या सरन्यायाधीशांनी एका याचिकेसंदर्भात टिप्पणी करताना प्रस्थापित व्यवस्थेवर हल्ला चढवणारी 'बांडगुळं' समाजात अस्तित्वात असल्याचं विधान १५ मे रोजी केलं. शिवाय, "काही तरुण झुरळांसारखे असतात, त्यांना नोकरी-धंदा मिळत नाही. त्यातले काही मग माध्यमांमध्ये जातात, काही समाजमाध्यमांवर जातात, काही माहिती अधिकार कार्यकर्ते होतात, काही इतर कार्यकर्ते होतात, आणि ते सगळ्यांवर टीका करू लागतात," असंही ते म्हणाले (इंडियन एक्सप्रेस, १७ मे २०२६). यातला झुरळांचा उल्लेख वापरून अभिजीत दिपके यांनी 'कॉक्रोच जनता पार्टी' नावाचं पान समाजमाध्यमांवर सुरू केलं, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याला धरून ६ जून रोजी त्यांनी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन केलं. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे त्या परीक्षेचा निकाल रद्द केल्यावर झालेला गोंधळ आणि काही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या, केंद्रीय शालेय शिक्षण मंडळाच्या ऑनलाइन गुणांकनामधील गफलती उघडकीस आल्यानंतर झालेली टीका, इत्यादी पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलनातून सध्या पुढे आल्याचं दिसतं. व्यवस्थेवर टीका करणाऱ्यांना 'झुरळ' संबोधलं गेल्यावर सुरू झालेल्या व्यंग्यात्मक ऑनलाइन घडामोडीचं रूपांतर आता व्यवस्थेवर टीका करणाऱ्या प्रत्यक्ष आंदोलनाच्या दिशेने होतं आहे. यातलं संघटन आधी दोनेक कोटी ऑनलाइन फॉलोअरांचं होतं, ते स्वाभाविकपणे प्रत्यक्षात तितक्या संख्येने दिसणार नाही; पण तरी, जंतर-मंतरवर तरुण मंडळी काहीएका संख्येने जमली आणि ती संख्या दुर्लक्षिण्याजोगी नव्हती, एवढं तरी निरनिराळ्या स्त्रोतांवरून लक्षात येतं. दोन-तीन आठवड्यांच्या अवधीत अचानकपणे घडलेल्या या घडामोडी आहेत. आता त्यातले पुढाकार घेणारे लोक पुढचं नियोजन कसं करत जातील, त्यांचे आपापासातले संबंध, त्यांच्या संभाव्य भूमिका आणि हेतू, राज्यसंस्थेची प्रतिक्रिया इत्यादी गोष्टी आपल्यासमोर उलगडत जातीलच. त्याचं रूप पुढे कसं होईल, यावर बोलणारे बोलू शकतील (वर उल्लेख केलेल्या संपादक-पत्रकारांनी या घडामोडींच्या बाजूने हातवारे केले, तर त्याहून चमत्कारिक सनसनाटीच्या पातळीवर जाऊन या घडामोडींच्या विरोधात ठोसपणे बोलणारेही आहेत. पत्रकारी माहितीही नाही, भाष्यही नाही, फक्त व्यक्तिगत शेरेबाजीचं सुमारे पन्नास मिनिटांचं बोलणं!), पण ही नोंद त्यासाठी नाही. 'झुरळां'च्या या घडामोडी लोकशाही राजकारणाचा आजच्या काळातला एक कमी-अधिक व्याप्तीचा आविष्कार आहेत, एवढं सध्या दिसतं आणि 'राजकारण जिज्ञासा'चा विषय हाच आहे, म्हणून त्याचा उल्लेख. असे आविष्कार सकारात्मक-नकारात्मक यांदरम्यानच्या अनेक छटा राखणारे असू शकतात. त्याचीही चर्चा या पुस्तकात आहे.

मूळ मुखपृष्ठात फेरफार : रेघ
प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर टीका करणारे तरुण 'बांडगुळं' आणि 'झुरळं' आहेत, या सरन्यायाधीशांच्या विधानात 'चांगल्या नागरिका'बद्दलचा एक पूर्वग्रह अनुस्यूत आहे. तसंच, या अशा कमी-अधिक व्याप्तीच्या आंदोलनांमध्ये भाग घेणारे 'देशद्रोही' किंवा 'पाकिस्तानी' आहेत, या म्हणण्यातही 'अस्सल' भारतीय नागरिकाबद्दलचा एक सोयीस्कर पूर्वग्रह अनुस्यूत आहे. तो पूर्वग्रह उलटा फिरवून व्यवस्थेतल्या उणिवांवर बोट ठेवणं आणि त्या उणिवांची जबाबदारी व्यवस्थेतल्या संबंधित पदाधिकाऱ्यांना घ्यायला लावणं, असा 'कॉक्रोच जनता पार्टी'चा सध्याचा मुद्दा दिसतो. आत्ता त्याची व्याप्ती शिक्षणव्यवस्था, त्यातील काही घोळ आणि त्या संदर्भात शिक्षण मंत्र्याची जबाबदारी, इतपतच आहे. नागरिकत्वाबद्दल शंका घेणारे प्रश्न सध्याच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विविध स्तरांमधील प्रतिनिधींकडून वारंवार उपस्थित केले जातात. सरन्यायाधीशांची विधानंही नागरिकत्वाबद्दलच्या अशाच भ्रामक प्रश्नाचा निर्देश करणारी होती. असे प्रश्न आपल्या राजकीय अवकाशाबद्दल नक्की काय सांगतात, याचा अंदाज बांधायचा असेल आणि त्याबद्दल परस्परांशी बोलायचं असेल तर त्यासाठी 'राजकारण जिज्ञासा' हे पुस्तक उपयोगी ठरणारं आहे. कारण, अशा राजकारणातून नागरिकत्वाची विशिष्ट कल्पना कशी प्रचलित केली जाते; त्यातलं कोण चांगलं, कोण वाईट, कोण अस्सल, कोण कमअस्सल, याचे ठोकताळे कसे उभे केले जातात, याकडेसुद्धा हे पुस्तक लक्ष वेधतं (पानं ६७-६९). 

पळशीकरांनी त्या-त्या संकल्पनांचा भारतातला राजकीय व्यवहार कोणता आहे, याचीही संक्षिप्त चर्चा या पुस्तकात केली आहे. उदाहरणार्थ, 'सामाजिक न्याय' ही संकल्पना मुख्यत्वे इतर मागास वर्गीयांच्या राजकारणापुरती किंवा आरक्षणाच्या चौकटीपुरती कशी मर्यादित राहिली, याबद्दल ते बोलतात (पानं ४९, ५५). तसंच, 'धर्मनिरपेक्षता' हे तत्त्व भारतात केवळ समाजातील धर्मव्यवहाराविषयी 'तटस्थ' राहणारी राज्यसंस्था, असं न उरता त्याचा वेगळा आकृतिबंध कसा तयार झाला, याकडेही ते लक्ष वेधतात (पानं १२१-१२२). इथे राज्यसंस्था धर्मव्यवहारापासून पूर्ण फारकत न घेता काही ठराविक मूल्यांबाबतीत त्या व्यवहाराचं नियमनही करते. त्या नियमनामागचा विवेक कसा असावा, याची काही आखणी भारतीय संविधानाने करून दिली. 'राष्ट्रवाद' या संकल्पनेबाबतही भारतात युरोपाप्रमाणे वंशसांस्कृतिकता केंद्रस्थानी आली नाही, तर स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य-समता-सहभाव ही मूल्यत्रयी ढोबळमानाने संविधानाच्या रूपात केंद्रस्थानी आली, असं पळशीकर नोंदवतात (पान १७६). या पुस्तकात 'लोकशाही' ही संकल्पना जवळपास एक मुख्य आशयसूत्र म्हणून आलेली आहे. या संकल्पनेच्या व्यवहारामध्ये 'बहुसंख्याकवाद', 'लोकैकवाद' (पॉप्युलिझम : फक्त 'लोक' हाच सर्व व्यवहाराचा केंद्रबिंदू असल्याचं राजकारण), तसंच 'बहुमताची दादागिरी' यांचे अंश कसे असतात, याचीही सखोल चर्चा या पुस्तकात शेवटच्या चार प्रकरणांमध्ये येते. 

काही बाबतीत या पुस्तकात अधिक चर्चा चालली असती. उदाहरणार्थ, 'समानता' या संकल्पनेच्या चर्चेत भारतीय संदर्भात जोतीराव फुले यांच्या अग्रणी स्थानाचा उल्लेख येतो (पान ४१), पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा येत नाही. सर्वच उल्लेख अशा मर्यादित शब्दसंख्येच्या लेखनात शक्य नसले, तरी 'राजकारण जिज्ञासा'मधल्या विषयसूत्रांमध्ये हा संदर्भ तसा टाळण्याजोगा नाही. आंबेडकरांच्या या संदर्भातील योगदानाचा उहापोह करणारा स्वतंत्र आणि सुंदर लेख पळशीकरांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथा'त (१९९३) 'स्वातंत्र्य, समता, बंधुभाव' या शीर्षकाखाली लिहिला होता. 'स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारण आणि लोकशाही' हा त्यांचा मुख्य अभ्यासविषय राहिला असला तरी, तरी यामागच्या वैचारिक स्त्रोतांचा मागोवा घेणारं त्यांचं लेखनही वाचायला मिळतं, पण ते विखुरलेलं आहे आणि त्यातलं काही आता मिळतही नाही. आंबेडकरांबद्दलच्या लेखाचा उल्लेख वर केला, तसे आंबेडकरांच्या विचारव्यूहाबद्दलचे त्यांचे आणखीही काही लेख आहेत (त्यातल्या दोनेक लेखांच्या स्वतंत्र पुस्तिका झाल्या), गांधी-आंबेडकर वाद-संवादाबद्दलचे इंग्रजी लेख आहेत, तसंच बाळ गंगाधर टिळक (आधुनिक लोकशाहीसंदर्भातल्या त्यांच्या योगदानाची दखल आणि मर्यादांची नोंद), आचार्य जावडेकर (सत्याग्रही समाजवाद), मार्क्सची 'क्रांती' संकल्पना, इत्यादींबाबतही त्यांनी लिहिलं आहे. फुल्यांवर स्वतंत्र लेख त्यांनी लिहिला नसला तरी भारतातल्या 'लोकशाही राजकारणा'ची सुरुवात फुल्यांच्या जातविरोधी कामापासून झाल्याचं त्यांनी इतरत्र नमूद केलंय ('राजकारणाचा ताळेबंद', साधना प्रकाशन, २०१३, पान ७)- या मार्मिक निरीक्षणाचा लेखरूपात विस्तार होऊ शकेल बहुधा. या व्यतिरिक्त 'लोकशाही समाजवादा'बद्दल मांडणी करणारा लेखही त्यांनी लिहिला होता ('साधना' साप्ताहिकाचे १० ऑगस्ट व १७ ऑगस्ट २००२मधील दोन विशेषांक). या व्यतिरिक्तही काही असेल. अशा भारतीय लोकशाहीशी संबंधित विचारप्रवाहांवरच्या लेखनाचं (लागेल तिथे पुनर्लेखन करून) एक स्वतंत्र पुस्तक झालं तर तेही त्यांच्या समकालीन राजकारणावरच्या लेखनाशी जुळणारं ठरेल.

आणखी एक उदाहरण : 'सार्वभौमत्व' या संकल्पनेच्या चर्चेमध्ये पळशीकर नोंदवतात की, "संसद सार्वभौम असते म्हणून तिला संविधान हवं तसं बदलता येईल, असा युक्तिवाद १९६०च्या दशकात केला गेला, पण न्यायालयाने अनेक निर्णयांमधून या युक्तिवादाला खो दिलेला दिसतो. संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे ही कल्पना १९७३च्या केशवानंद खटल्यानंतर स्थिरावलेली दिसते" (पान १२७). इथे या खटल्याचा नुसता उल्लेख करून थांबण्याऐवजी त्याबद्दल दोनेक वाक्यं सदर पुस्तकाच्या अपेक्षित वाचकांसाठी (राज्यशास्त्राचे विद्यार्थी नसणारे) गरजेची वाटतात. 'केशवानंद भारती' खटल्याने संविधानाच्या 'पायाभूत संरचने'चं तत्त्व मांडलं आणि त्यात संसदेलाही बदल करता येणार नाही, असा निर्वाळा दिला; पण या पायाभूत संरचनेसंबंधीचा अर्थ लावण्याची जबाबदारी किंवा विशेषाधिकार न्यायालयाने अप्रत्यक्षपणे स्वतःकडेच ठेवला. त्यातून पुन्हा लोकशाहीविषयीचे अंतर्विरोध तयार होतातच. इतपत काही उलगडा खटल्याच्या उल्लेखासोबत असणं आवश्यक वाटतं.

'राजकारण जिज्ञासा' हे साधारणपणे अकादमिकविश्वात अभ्यासल्या जाणाऱ्या संकल्पनांविषयीचं पुस्तक असलं तरी, "बिगर-विशेषज्ञ पण चौफेर नजर असलेल्या सुजाण वाचकांसाठी" ते लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यात "अर्थ, संदर्भ, सर्व सिद्धांन्तांची पुरेशी वैचारिक पूर्वपीठिका, असे तपशील दिलेले नाहीत," असं मनोगतात पळशीकर स्पष्ट करतात. हे रास्त आहे. पण पुस्तकात निरनिराळ्या ठिकाणी काही अभ्यासकांची आणि विचारवंतांची नावं येतात, तेव्हा त्याबद्दल पुस्तकाच्या शेवटी 'अधिक वाचनासाठी' म्हणून एकत्र काही संक्षिप्त ग्रंथसूची दिली तर उपयोगी होऊ शकतं. तसंही काही ठिकाणी मोजकेच संदर्भ नावासह आले आहेत. उदाहरणार्थ, लोकैकवादावरच्या चर्चेत डच राज्यशास्त्रज्ञ कास मूड (Cas Mudde) यांचा उल्लेख येतो, आणि त्यांच्या एका लेखाच्या संदर्भाची ऑनलाइन लिंकही दिलेली आहे (पान १६७). तसंच, साधारणपणे संदर्भग्रंथांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला असला तरी, 'सत्ताधारी श्रेष्ठजनां'विषयीच्या चर्चेत सी. राइट मिल्स यांच्या 'द पॉवर एलिट' या पुस्तकाचाच तेवढा उल्लेख एका ठिकाणी आहे (पान १४५). असे संदर्भ अगदीच एक-दोन ठिकाणी त्रोटकपणे आलेत, मग त्यापेक्षा सरळ संदर्भसूची किंवा ग्रंथसूची शेवटी दिली तर उपयोगीच पडलं असतं, असं वाटतं. 

एकीकडे, गेली काही वर्षं मुख्यप्रवाही वृत्तवाहिन्या इतर कोणत्याही गोष्टींचं नियमित वार्तांकन जवळपास अजिबातच न करता केवळ राजकारणावर (पक्षीय आणि निवडणुकीचं राजकारण) भर देणारं वार्तांकन करू लागल्या आहेत. अगदी खेळांच्या आणि चित्रपटांच्याही बातम्या आता वृत्तवाहिन्यांवर जवळपास येतच नाहीत. रोज उठून राजकीय विधानबाजीबद्दल अथकपणे बोलत राहणं, हीच पत्रकारिता असल्यासारखा हा प्रकार आहे. आता यू-ट्यूबवर काही वाहिन्याही जवळपास पूर्ण वेळ हेच करतात. राजकारणाची ही भुरळ माध्यमव्यवहाराला मोठ्या प्रमाणात व्यापून आहे. पण या बडबडीच्या प्रचंड प्रवाहामधला आशय कोणता आहे, हे तपासण्यासारखं आहे. दुसरीकडे, हे सगळं परस्परांशी शेअर करणारे आपण वाचक-प्रेक्षक आहोतच. अशात राजकारणाची भुरळ पाडून घेण्याऐवजी त्याबद्दल जिज्ञासा वाटावी, त्याबद्दलच्या संवादात सार्वजनिक विवेक निर्माण व्हावा, अशी इच्छा राखणारं हे पुस्तकही आहे. तसंच 'झुरळां'चं वर्तमानात उलगडणारं राजकारणही आहे. हे आपण 'बघत-ऐकत' तर आहोतच, पण त्याचा अर्थही आपण लावू पाहणार असू, त्यामागचा आकृतिबंध समजून घ्यायचा प्रयत्न करणार असू, तर 'राजकारण जिज्ञासा' हे पुस्तक संवादासाठीचा आधार पुरवतं. पूर्वी 'समकालीन भारतीय राजकारण : काँग्रेस वर्चस्व ते हिंदू जमातवाद' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पळशीकरांनी उपरोधाने व्यक्त केलेली खंत अशी होती : "ह्या लेखांवर फारशी टीका वगैरे न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून माझा उत्साह टिकविणाऱ्या मित्र-मंडळींचेही आभार" (प्रतिमा प्रकाशन, २००४, पान ४). एकंदर परिस्थिती बघता, त्यांचा हा 'उत्साह' टिकूनच राहील बहुतेक. तरीही, 'वाचकमंडळी'चा भाग म्हणून इथे ही नोंद करून ठेवली आहे.

मांडणी : रेघ
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतर इथल्या मंचावर लडाखमधील संशोधक सोनम वांगचुक उपोषणाला बसले. ही टीप लिहीत असताना या उपोषणाचा विसावा दिवस सुरू आहे. मागण्या कॉक्रोच जनता पार्टीने नोंदवलेल्या त्याच. गेल्या दोनेक दिवसांपासून यावर अधिक प्रमाणात चर्चा होताना दिसते. यावर वेगळं काही बोलण्यासारखं माझ्याकडे नाही. पण या नोंदीचा विषय, आणि ही नवीन घडामोड यांच्यात काही सांगड घातली जाताना दिसली, म्हणून फक्त ही छोट्या निवेदनाची भर.

लोकशाही आणि सार्वजनिक संवादाच्या वाटा, या वाटांवरच्या संकल्पना, त्यात अभिप्रेत असणारा विवेक, इत्यादी सूत्रांवरची ही नोंद आहे. आपापली मतं काय आहेत, तो इथला मुख्य मुद्दा नाही. या मतांविषयी सार्वजनिक अवकाशात काय आणि कसं बोललं जातं, कोणत्या कृती होत असतात, त्या आपण कशा समजून घेऊ शकतो, हा मुद्दा आहे. त्यामुळे वांगचुक यांच्या व्यक्तिगत मतांपुरतं हे मर्यादित नाही, तर त्यांच्या कृतीचा आणि आपल्या सार्वजनिक अवकाशाचा संबंध कसा आहे, हे पाहता येईल. या निवेदनात म्हणूनच 'सार्वजनिक चर्चावकाश' ही संकल्पना वापरून बोलायचा प्रयत्न केला आहे.


मांडणी : रेघ
या नोंदीत उल्लेख केलेल्या घटनाक्रमाला काल (२० जुलै) आणखी पुढचं वळण मिळालं. आंदोलनकर्त्या तरुण-तरुणींनी ठरल्यानुसार संसदभवनाच्या दिशेने मोर्चा काढला. मागण्या त्याच आहेत- केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई, आणि आता सोनम वांगचुक यांची रुग्णालयातून सुटका. कालच संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं. त्यापूर्वी पंतप्रधानांनी संसदभवनाबाहेर पत्रकारांना एकतर्फी संबोधित केलं. त्याच वेळी जंतर मंतरवरून आंदोलक विद्यार्थी संसदभवनाच्या दिशेने मोर्चा घेऊन येत होते. त्यांची संख्या आठ-दहा हजारांदरम्यान असल्याचं बातम्यांवरून दिसतं. शिवाय, दिल्लीत इतर ठिकाणी आणि इतरत्र जमलेले आंदोलक वेगळे.

या मोर्चेकऱ्यांच्या दोन प्रतिनिधींना केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्र्यांनी भेटीची वेळ दिली आणि त्यांच्याकडून वरील तीन मागण्यांचं निवेदन स्वीकारलं. या संदर्भात कोणतंही आश्वासन देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आंदोलन कालही पुढे सुरू राहिलं आणि आताही जंतर मंतरवर आंदोलक आहेत. काल आंदोलनकर्त्यांवर लाठीमार झाला, अश्रुधूर सोडण्यात आला, यात जीवितहानी झाली नाही पण रक्तपात झाला. काही पोलीसही जखमी झाल्याचं दिसतं, काही विद्यार्थ्यांना ताब्यातही घेण्यात आलं. तरुण-तरुणींना मार लागल्याची छायाचित्रं विविध माध्यमांमधून पसरत आली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मोर्चेकरी तरुणाईशी बोलायचं टाळून तरुणाईच्याच नवशोधक वृत्तीचं कौतुक कालच्या भाषणात केलं, यातल्या विनोदाला आणखी किती करूण रूप येईल, ते माहीत नाही. पण या कालच्या घडामोडींना धरून फक्त छोटी भर घालण्याचा प्रयत्न शेजारच्या निवेदनात आहे.

 ०

काही जुन्या पूरक नोंदी :

१६ मे २०२६

थिजून गेलेली तेरा वर्षं

आवरण : अकिला शेषशायी / नवयान पब्लिशिंग

रामचंद्र सिंग यांचं 'थर्टीन इअर्स: अ नक्सलाइट'स् प्रिझन डायरी' या नावाचं पुस्तक नवयान पब्लिशिंगने २०१८ साली प्रकाशित केलं. मूळ हिंदी मजकूर १९८४च्या दरम्यान एका नियतकालिकात लेखमाला स्वरूपात प्रकाशित झाला. नंतर १९९१ साली 'समकालीन दस्तावेज' या नियतकालिकाचा पूर्ण विशेषांक या मजकुराला वाहिलेला होता- त्यात याचं शीर्षक 'ठेहरे हुए तेराह साल' असं देण्यात आलं. तो अंक वाचनात आल्यावर लखनौ विद्यापीठातील इंग्रजीच्या प्राध्यापिका मधू सिंग यांनी लेखकाची परवानगी घेऊन त्याचं इंग्रजी भाषांतर केलं. 

रामचंद्र सिंग उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यात बंगारमाऊ या गावी लहानपणीच डाव्या राजकारणाच्या संपर्कात आले. १९६०च्या आसपासच्या या काळात एकसंध 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष' (भाकप) सक्रिय होता. त्या दशकाच्या उत्तरार्धात भाकप फुटला आणि '(मार्क्सवादी) भारतीय कम्युनिस्ट पक्ष' (माकप) हा नवीन पक्ष सुरू झाला. हे सर्व संसदीय मार्गावरचे प्रयत्न पुरेसे नाहीत, असं वाटून 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष- मार्क्सवादी-लेनिनवादी'ची स्थापना १९६९च्या दरम्यान झाली.  सुरुवातीला हा नक्षलवादी विचारांचा मुख्य पक्ष होता, त्यातूनही अनेक गट-तट होत गेले. रामचंद्र सिंग यांनी जिल्हा पातळीवरचा कार्यकर्ता म्हणून, काही प्रमाणात नेता म्हणून हा प्रवास अनुभवला आणि ते अधिक डाव्या प्रवाहाच्या जवळ जात राहिले. नक्षलवादी पक्षाच्या स्थापनेवेळचे नेते चारू मुजुमदार यांनी 'वर्गशत्रूंच्या व्यक्तिगत निर्मूलना'ला प्राधान्य दिलं. अशाच एका जमीनदाराला मारण्याच्या मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल रामचंद्र  सिंग यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्या शिक्षेचा भाग म्हणून त्यांना १९७० ते १९८३ अशी तेरा वर्षं उत्तर प्रदेशातल्या पाचेक तुरुंगांत घालवावी लागली. त्या दरम्यानचे अनुभव आणि एकंदर तुरुंगजीवनाविषयी, नक्षलवादी राजकारणाविषयी, स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी नोंदवलेली निरीक्षणं या पुस्तकात येतात. साध्या-सरळ भाषेत, कोणताही पवित्रा न घेता लिहिलेलं हे कथन आहे. त्यातला हा साधेपणा इंग्रजी भाषांतरातही टिकलेला जाणवतो.

मानवी जगण्याविषयी विशिष्ट ठाशीव तत्त्वज्ञानाची दृष्टी स्वीकारलेल्या रामचंद्र यांचं पुस्तक या दृष्टीपलीकडच्याही काही गोष्टी पाहताना दिसतं. सुट्या-सुट्या व्यक्तींचा जीव घेऊन समाजात बदल घडेल, या समजुतीबद्दल त्यांना सुरुवातीपासूनच शंका वाटत होती. पण पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानुसार आपण कृती करायला हवी, म्हणून ते या मोहिमेत सहभागी झाले. संबंधित जमीनदाराची हत्या झाली, पण शेवटी गावातल्या लोकांनीच या नक्षलवादी कार्यकर्त्यांना पकडून दिलं, त्यामुळे व्यापक समाजापासून तुटून अशा कृती करणं परिणामकारक ठरत नसल्याचं रामचंद्र यांचं मत पक्कं होत गेलं. त्याबद्दलचं आत्मचिंतन या पुस्तकात येतं. नक्षलवाद म्हणजे काय, याबद्दल इतर कोणी कैदी प्रश्न विचारायचं, तेव्हा सुरुवातीला त्यांना आपण मूर्ख समजायचो, पण नंतर आपणच मूर्ख असल्याचं वाटू लागलं, अशी कबुली ते देतात. आपण 'राजकीय' कृती खरंच करत होतो का, या गुंतागुंतीच्या प्रश्नाला ते सामोरे जातात, आणि त्यातून गोंधळायला व्हायचं, असंही नोंदवतात (पानं ३३-३४). 

इतर व्यक्तींच्या जगण्याकडे बघतानासुद्धा रामचंद्र यांनी असे सहजसोपी उत्तरं नसणारे प्रश्न स्वतःला पडू दिल्याचं जाणवतं. "प्रत्येक कैदी वरकरणी गुन्हेगार असला तरी, प्रत्येकाच्या तुरुंगातील जगण्यामागे कोणती ना कोणती आणखी दुःखद कहाणी होती", असं लिहून रामचंद्र सिंग जसवंत नावाच्या एका कैद्याचा अनुभव सांगतात. जसवंत लक्ष्मी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो, पण त्याचं कुटुंब वरचढ सामाजिक स्थान राखून असल्यामुळे या नात्याला ते विरोध करतात. हे प्रेम पुढे जाऊ नये म्हणून जसवंतचे कुटुंबीय त्याला मध्य प्रदेशात एका कामासाठी पाठवून देतात. तिथे तो एका दरोड्याच्या घटनेत गुंततो. पोलीस त्याला पकडतात. पण एकदा तो पोलिसांच्या ताब्यातून पळून परत उत्तर प्रदेशातल्या गावी जातो. काही काळ तो पोलिसांना हुलकावणी देतो, लक्ष्मीला भेटायचा प्रयत्न करतो. पण तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न ठरवलं जातं. याच दरम्यान पोलिसांना जसवंतचा ठावठिकाणा लागतो आणि ते त्याला पकडतात. सर्व गावासमोरून त्याची धिंड काढली जाते, तेव्हा लक्ष्मी लग्न ठरलेलं असतानाही जाहीरपणे त्याच्यासाठी रडते. या नाट्यमय प्रसंगाची आठवण जसवंतसोबत कायम राहते. आता तुरुंगातून सुटल्यावर काय करणार, असं रामचंद्र विचारतात, तेव्हा तो "दरोडे टाकणार", असं उत्तर देतो (पानं २९-३०). 

जसवंतच्या गुन्हेगारीला जबाबदार कोण- तो एकटाच की, वेगाने श्रीमंत होण्याची हाव, इच्छाआकांक्षा कोणत्याही मार्गाने पू्र्ण करण्याला उद्युक्त करणारी संस्कृती, भांडवलशाही, वर्गीय उतरंड, तसंच केवळ सामाजिक स्थानातील भेदामुळे लग्नात खोडा घालणारी जातीय सरंजामी मानसिकता? असा प्रश्न रामचंद्र त्यांच्या विचारसरणीच्या दृष्टिकोनातून नोंदवतात (पान ३०). पुढच्या पानावर कैदी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या ठरलेल्या भेटींवेळी काय घडायचं, याचं वर्णन येतं. कैदी मुलासमोर मूकपणे बसलेले वृद्ध वडील, त्यांच्या डोळ्यांमधले अश्रू. रांगती मुलं घट्ट कुशीत धरून कैदी नवऱ्यांच्या पायाशी डोकं आपटून घेणाऱ्या, धाय मोकलून रडणाऱ्या स्त्रिया. हे सर्व पाहून रामचंद्र लिहितात, "या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा? अशा गोष्टी का होतात?" (पान ३१).

तुरुंगात चळवळीविषयीचं आत्मचिंतनही होत राहिलं. 'व्यक्तिगत निर्मूलना'च्या धोरणाची चिकित्सा झाली. "वरिष्ठ कॉम्रेडांनाही आमच्या चळवळीच्या विचारसरणीय दिशेविषयी बरीचशी अस्पष्टता असल्याचं आता आमच्या लक्षात आलं," अशीही कबुली रामचंद्र देतात (पान ५७). पण असं काही मत मांडलं तर संबंधित व्यक्ती भ्याड आणि विश्वासघातकी असल्याचा आरोप काही ज्येष्ठ सहकारी करत (पान ५८). तरीही, काही जण या धोरणाला विरोध करत राहिले, त्यावर वादचर्चा तुरुंगात होत राहिल्या, तशा बाहेरही होत होत्या. काही वेळा चोर, दरोडेखोर एखाद्या माणसाविरोधातला सूड उगवण्याकरता चळवळीत येत. 'वर्गशत्रूचं निर्मूलन' करण्याच्या नावाखाली व्यक्तिगत सूड उगवले जात, ही क्रांतिकारक तत्त्वांची थट्टाच होती, असं रामचंद्र स्पष्टपणे नोंदवतात (पान ६०).

शिवाय, 'क्रांतिकारक' असल्याचा पवित्रा घेऊन मानवी भावभावनांचा अव्हेर करणाऱ्या मतांबद्दलही रामचंद्र नाराजी व्यक्त करतात. न्यायालयात सुनावणीवेळी आलेल्या पित्याने त्यांच्या कपाळावर मारुतीच्या नावाने टिळा लावला, लोकांना प्रसाद वाटून मुलगा सुटावा म्हणून देवाची प्रार्थना केली. तेव्हा, साम्यवादी क्रांतिकारकाने असा टिळा लावून घेता कामा नये, अशी टीका चळवळीतील एका सह-आरोपीने रामचंद्र यांच्यावर केली. "ही प्रतिक्रिया ऐकून मला खूप वाईट वाटलं. अशा भावनिक क्षणी ईश्वरावरची किंवा प्रथांवरची श्रद्धा किंवा अश्रद्धा अजिबातच महत्त्वाची नसते. माझ्या पित्याच्या इच्छेचा मान राखणं आणि तो मुलाविषयी दाखवत असलेलं प्रेम कृतज्ञतेने स्वीकारणं, हे मला जास्त महत्त्वाचं वाटलं. मग त्या प्रेमाची अभिव्यक्ती कशीही असो," असं रामचंद्र लिहितात (पानं ४८-४९). इथे त्यांच्यावर टीका करणारा चळवळीतला सहकारी कालांतराने तुरुंगात एक छोटं देऊळ बांधतो आणि 'बाबा' म्हणून ओळखला जाऊ लागतो (पान १४२). 

तसंच, तुरुंगात येण्याआधी रामचंद्र यांचं मुन्नी / रामदुलारी नावाच्या एका मुलीवर प्रेम होतं. कार्यकर्ता म्हणून त्या मुलीच्या कुटुंबाला रामचंद्र यांनी काही सहाय्य केलं होतं, त्या दरम्यान त्यांची भेट झाली. पुढे तुरुंगातही ती मुलगी त्यांना भेटायला यायची. "एका मुलीबद्दल इतकं चिंतातुर होणं हे काही अस्सल क्रांतिकारकाचं लक्षण नाही", असं त्यांना काही जण चिडवतात (पान ६८). पण "अंधारलेल्या, अवघड काळात प्रेमामुळेच मला जगण्याचं सौंदर्य आणि साधेपणा जाणवला, आणि माझ्या उद्दिष्टापासून विचलित न होता मी पूर्ण बांधिलकीनिशी त्या वाटेवरून चालत राहिलो," अशी रामचंद्र यांची धारणा होती. तरीही, मुन्नीच्या बाबतीत काही वेळा त्यांचा 'राजकीय' दृष्टिकोन वरचढ ठरल्याचं दिसतं. "तिची अभिरुची सुधारण्याचा मी प्रयत्न केला आणि तिला वाचण्यासाठीही प्रवृत्त केलं. लवकरच तिने मॅक्सिम गॉर्कीची 'मदर' ही कादंबरी वाचली. त्यातल्या पावेलचं पात्र तिला खूप आवडलं," असं ते नोंदवतात. पावेल हे डाव्या क्रांतिकारकाचं पात्र आहे. पण मुन्नी काही या राजकीय तत्त्वज्ञानाच्या अवकाशात खऱ्या अर्थाने रुळत नाही. काळ सरत जातो. तेव्हा एकदा ती तुरुंगात रामचंद्र यांना भेटायला येते, तेव्हा ते तिला बाहेर सुरू असलेल्या निवडणुकांविषयी विचारतात. ती काही बोलत नाही, कदाचित तिला निवडणुकांचं विश्लेषण करता येत नसेल म्हणून ती गप्प असेल, असं रामचंद्र यांना वाटतं. तरीही ते आणखी काही विचारतात, तेव्हा ती ताडकन म्हणते, "मी काय राजकारणासाठी जगते का?" हे ऐकल्यावर "माझ्यावर तर आकाशच कोसळलं. माझं संपूर्ण जीवन सर्वोच्च अर्थाने राजकारणासाठी वाहिलेलं होतं, तर इथे माझी आयुष्याची जोडीदारीण राजकारणालाच झिडकारत होती", अशी खंत ते व्यक्त करतात (पान १२५). काही काळ मुन्नी रामचंद्र यांच्या कुटुंबियांसोबत सून असल्याप्रमाणे राहतेसुद्धा, पण कालांतराने ती रामचंद्र यांच्यापासून दुरावते. त्यांच्या प्रेमाचा शोकांत होतो. ते तुरुंगात असतानाच ती दुसऱ्या एका विवाहित माणसाची 'रखेल' म्हणून राहू लागते. पण मुन्नीसमोर तरी भविष्यासंबंधीचे कोणते पर्याय होते, ती शेवटी दिल्लीला नाव बदलून का राहू लागली, एक मूल जन्माला घालून कशी जगू पाहत होती, या निराळ्या शोकांतिकेचं ओझरतंच सूचन या कथनात होतं. 

या सर्व सूत्रांसोबतच तुरुंगात होणाऱ्या भीषण अत्याचारांचंही वर्णन रामचंद्र यांनी केलं आहे (पान ९१). शिवाय, १९७५-७७ची दोन वर्षं देशात आणीबाणी होती, तेव्हा तुरुंगात आलेल्या राजकीय कैद्यांसंबंधीचे काही अनुभव आहेत. व्यक्तिगत पातळीवर तुरुंगातील खडतर जगण्याला सामोरं जाताना आपण काही वेळा मार्क्सविचारातील भौतिकवादी दृष्टिकोनापासून दूर जात अध्यात्मिकता आणि ईश्वरी श्रद्धेकडेही वळल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे (पान १३७). पण तरी ते अध्यात्मिकतेमध्ये रमले नाहीत, मार्क्सवादी विचाराच्या वाटेवरच पुढेही चालत राहिले. एकंदर व्यवस्थेविषयीचं त्यांचं आकलनही मार्क्सवादी दृष्टीतून आलेलं आहे. पण त्यासोबत इतरही काही गोष्टी पाहणारी दृष्टी त्यांनी राखल्यामुळे हे पुस्तक दखलपात्र वाटलं.

रामचंद्र सिंग
(आभार : नवयान पब्लिशिंग)
तुरुंगात असताना आणि तिथून सुटल्यानंतरही रामचंद्र डाव्या राजकारणाशी संबंधित राहिले. फक्त त्यांच्या राजकारणाने नंतर संसदीय मार्ग स्वीकारला. शेतमजुरांच्या, कामगारांच्या प्रश्नांवर होणाऱ्या कामामध्ये सहभाग घेत राहिले. मार्च २०१८मध्ये त्यांचं निधन झालं तेव्हा ते 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष- मार्क्सवादी लेनिनवादी (रेड स्टार)'च्या केंद्रीय समितीचे सदस्य होते. काही प्रमाणात दक्षिण भारतात आणि तुरळक पातळीवर उत्तर प्रदेश, हरयाणा इथे सक्रिय असणारा हा छोटा पक्ष आहे. रामचंद्र यांच्या तुरुंगवासाव्यतिरिक्त झालेल्या प्रवासाचा काही अंदाज या पुस्तकाला जोडलेल्या सुमारे चाळीस पानी संवादाच्या परिशिष्टातून येतो. प्रकाशक एस. आनंद आणि भाषांतरकार मधू सिंग यांनी बंगारमाऊला रामचंद्र यांच्या घरी जाऊन साधलेल्या संवादाचं हे शब्दांकन आहे. तेही मुख्य कथनाला पूरक ठरणारं आहे. शेवटी, मधू सिंग यांनी भाषांतरकाराची छोटी टीप लिहिली आहे- त्यात हिंदी मजकूर त्यांना कसा सापडला आणि तो का महत्त्वाचं वाटला, इत्यादीची नोंद आहे. त्या स्वतः नक्षलवादी विचारसरणीशी वा चळवळीशी जवळीक राखून नाहीत.

पुस्तक प्रकाशित व्हायच्या बेतात असताना मानधनाचे पैसे पाठवण्याकरता प्रकाशकाने 'पॅन' क्रमांकाची चौकशी केली, तर रामचंद्र यांच्याकडे पॅन कार्डच नसल्याचं त्याला कळलं. मग त्याच्या आग्रहावरून रामचंद्र यांनी पॅन कार्ड काढून घेतलं. पण मग त्यांचं निधन झालं. इंग्रजी पुस्तक त्यांना पाहायला मिळालं नाही. प्रकाशकाला त्यांचा धडसा फोटोही मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या पॅनकार्डवरचा फोटोच प्रकाशनाच्या वेबसाइटवर देण्यात आला. 

भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शंभर वर्षं झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही गेल्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात शंभर वर्षं पूर्ण झाली. आत्ता देशात संघ परिवाराशी संलग्न भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य आहे, स्वाभाविकपणे उजव्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रभाव आणि दबाव अनेक संस्थांवर, तसंच एकंदर सार्वजनिक अवकाशावर आहे. कम्युनिस्ट पक्षांची मोजक्या राज्यांमध्ये असणारी सत्ताही गेल्या पंधराएक वर्षांमध्ये ढासळत गेली. संसदीय राजकारणाची निंदा करत सशस्त्र मार्गानेच राज्यसंस्था उलथवू पाहणाऱ्या माओवादी / नक्षलवादी राजकारणाचीही गेल्या वर्षा-दोन वर्षांत निर्णायक माघार झाली. काही नेत्यांचे मृत्यू, काही नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी पत्करलेली शरणागती, यामुळे सध्या ही चळवळ किमान सशस्त्र पातळीवर तरी बळ गमावून बसलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतातल्या डाव्या विचारप्रवाहासंबंधीचा दस्तावेज म्हणून हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. कारण- त्यात सरधोपट निष्कर्ष नाहीत, आपल्या राजकारणातल्या उणिवा शोधण्याची इच्छा आहे, केवळ तात्त्विक कलह उभा करण्याऐवजी जगण्यातल्या छोट्या-मोठ्या अनुबंधांची दखल घेऊन काही बोलायचा प्रयत्न आहे. 

अलीकडे ओडिशात जितू मुंडा या ६५ वर्षांच्या आदिवासी माणसाने स्वतःच्या मृत बहिणीचा सांगाडा बँकेत दाखवायला नेला, ती बातमी गाजली. बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या बचत खात्यावर जमा असणारे १९,३०० रुपये काढण्यासाठी जितू यांनी बँकेत खेटे घातले, पण बहिणीच्या मृत्यूचा दाखला मिळाल्याशिवाय पैसे देता येणार नाहीत, असं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. इतरही शासकीय संस्थांकडून व प्रतिनिधींकडून असा दाखला मिळवण्याचे जितू यांचे प्रयत्न फोल ठरले. तेव्हा शेवटी तडकून त्यांनी बहीण मेल्याचा पुरावा म्हणून तिचा सांगाडा बँकेत नेला. लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी असणारी व्यवस्थाच या योजना लोकांना नाकारण्यासाठी कार्यरत कशी होते, याचा हा एक दाखला होता (या संदर्भात अन्न अधिकार अभियान आणि रिथिंक आधार अभियान यांनी प्रसिद्ध केलेला तथ्यशोधन अहवाल पाहता येईल). अशी एकंदर परिस्थिती कुठे ना कुठे कायम राहते, तोवर रामचंद्र सिंग यांना पडलेले 'राजकीय' प्रश्न गैरलागू नसल्याची आठवणसुद्धा हे पुस्तक करून देतं. त्या प्रश्नांबद्दलचं आपलं उत्तर त्यांच्याशी जुळणारं आहे की नाही, हा वेगळा मुद्दा.
*
या पुस्तकाची कागदी बांधणीतली आवृत्ती २०२२ साली प्रकाशित झाली, ती मी पाहिलेली नाही. पुठ्ठा बांधणीमधली पहिली आवृत्तीच पाहिली आहे- त्याच्या निर्मितीबद्दल थोडं बोलणं गरजेचं वाटतं. या आवृत्तीच्या आवरणावर दगडी भिंतीची आठवण करून देणारा खरखरीत स्पर्श असणारा पोत वापरला आहे. त्यात येणारं लांब देठांच्या फुलांचं चित्र मात्र गुळगुळीत पोताचं आहे. त्यामुळे पुस्तक हातात घेतल्यावर सतत वाचकाला कथनातल्या खरखरीत अनुभवांच्या अवकाशाची आठवण होत राहावी, आणि तरीही त्यात रामचंद्र यांच्या दृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या काहीशा मृदूपणाचा नि ताजेपणाचाही अनुभव यावा, असं या पुस्तकाचं सुंदर आवरण आहे. 

अकिला शेषशायी / नवयान पब्लिशिंग

२७ एप्रिल २०२६

फोटोजर्नलिस्ट रघू राय आणि फोटोग्राफी सोडलेला माणूस

वृत्तछायाचित्रकार किंवा फोटोजर्नलिस्ट रघू राय यांचं काल (२६ एप्रिल) वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झालं. ते एक महान फोटोग्राफर होते. त्यांनी शब्दांच्या भाषेचा वापर करून मांडलेली काही मतं न पटणारी असली तरी कॅमेऱ्याचा वापर करून प्रकाश नि सावल्या यांच्या साक्षीने मांडलेली निरीक्षणं बरीचशी पटत राहिली, भावत राहिली. त्यामुळे ते गेल्यामुळे एक प्रकारचा अभाव जाणवला.

रघू राय (१९४२ - २०२६) छायाचित्र सौजन्य : इंडिया टुडे

'खिडकीचा आरसा' या नावाच्या कादंबरीत एक फोटोग्राफर असतो. हळूहळू त्याच्या फोटोग्राफीविषयीच्या धारणा कोलमडतात आणि तो आधी मनापासून करत असलेली पत्रकारी फोटोग्राफी सोडतो आणि फक्त पैशापुरती लग्नसमारंभांपुरती फोटोग्राफी सुरू करतो. त्याचा एक संदर्भ रघू राय यांच्याशी जोडलेला असतो, तो असा (मूळ मजकुरात थोडा बदल केला आहे) :

रघू रायचं ‘एक्स्पोजर: पोर्ट्रेट ऑफ ए कॉर्पोरेट क्राइम’ नावाचं एक फोटोंचं पुस्तक आहे. ते त्याला एका प्रदर्शनात स्वस्तात मिळालं. त्यातले फोटो बघून तो हलला होता. १९८०च्या दशकात भोपाळमध्ये युनियन कार्बाइड या कंपनीच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली. घटना घडली तेव्हा त्याचे दुष्परिणाम लोकांवर झालेच, पण नंतरही तसे परिणाम होत राहिले. रायने घटना घडल्यावर लगोलग काढलेले काही फोटो आणि सतरा वर्षांनी पुन्हा भोपाळमध्ये जाऊन काढलेले फोटो, असं ते पुस्तक. सर्व फोटो काळे-पांढरे.

Raghu Rai / Greenpeace

असे फोटो आपण काढावेत, असं त्याला वाटलं. हे का वाटत असतं? असे फोटो बघून बघणारे हेलावतील, त्यांच्या संवेदनांना हात घातला जाईल, कुठल्या तरी समस्येकडे लक्ष वेधलं जाईल, ती समस्या सुटेल, किमान त्याबद्दल बोललं जाईल- ही बाहेरची कारणंच फक्त असतील? आपण चांगले फोटो काढतोय, समोरच्या दुःखालाही सुंदर चौकट देऊ पाहतोय, आपलं फोटोग्राफर म्हणून कुठेतरी नाव नोंदवलं जाईल, आपल्याला आत्ताच्याआत्ता समोरच्या परिस्थितीत हवा तसा तत्काळ बदल करता येत नसेल तर परिस्थिती गोठवण्याची महत्त्वाकांक्षा- ही आतली कारणंही असतील? त्याने पंधरा वर्षांपूर्वी या प्रश्नांचा विचार केला नव्हता. पहिल्यांदा त्याने रघू रायचं पुस्तक बघितलं, इतर फोटोग्राफरांनी काढलेले फोटो बघितले, तेव्हा हा विचार त्याच्या मनात आला नव्हता. आपल्याला शब्द न वापरता काहीतरी सांगायला मिळतंय, जगाशी संवाद साधायचं माध्यम मिळतंय, असा त्याचा फोटो काढतानाचा समज होता. पण तो समज हळूहळू विरत गेला.

रघू राय

भोपाळमधे रघू रायने काढलेला एक फोटो खूप गाजला. गॅस गळती झाली तेव्हा तत्काळ तीनेक हजारांहून अधिक लोक मेले, नंतरही त्या परिणामांनी किमान तितकेच लोक मेले, मग नंतरच्या काळात मरतही राहिले, इतरही लाखो लोकांच्या आरोग्यावर त्या आपत्तीचे विपरित परिणाम होत राहिले. या सगळ्या परिणामांची ठोस प्रतीकात्मक प्रतिमा म्हणून रघू रायचा एक फोटो ओळखला गेला. फोटो काळा-पांढरा. दोन डिसेंबर १९८४ला गॅसगळती झाली, चार डिसेंबरला काढलेला हा फोटो आहे. पाचेक वर्षांच्या एका मुलीचं प्रेत पुरलं जातंय. अर्धं मातीतच आहे. थोडा पोटाचा भाग, आणि चेहरा, कपाळ, डोक्याचा काही भाग वर आहे- दिसतंय. ओठ किंचित विलग. डोळे उघडे स्फटिकासारखे पांढरे मोठे. कपाळापाशी कोणत्यातरी माणसाचा उलटा पंजा तेवढा दिसतो. ते मूल कोणाचं होतं, हे कळू शकलं नाही. पुस्तकात फोटोखालच्या ओळींमध्ये लिहिलं होतं: ‘बरिअल ऑफ अ‍ॅन अननोन चाइल्ड: हे अनोळखी मूल युनियन कार्बाइड या अमेरिकी रासायनिक कंपनीमुळे घडलेल्या जगातील सर्वांत भयंकर औद्योगिक आपत्तीची खूण ठरली. या मुलाचे पालक कोणालाही माहीत नाहीत आणि कोणीही या छायाचित्रावर दावा सांगण्यासाठी पुढे आलेलं नाही.’ 

मेलेलं मूल हा मुलगा असल्याचं त्या पुस्तकातल्या उल्लेखावरून वाटतं. प्रत्यक्षात ती मुलगी असल्याचं इतर ठिकाणी नोंदवलेलं आढळतं. लिंग काहीही असलं तरी ते मूल कोणाचं होतं, हे कळलं नाही. अज्ञात, निनावी मेलेली मुलगी. राय या अनुभवाबद्दल म्हणाले, 'आम्ही, छायाचित्रकार गिधाडांसारखे मृतदेहांच्या शोधात होतो. नाट्यमय छायाचित्रं तिथेच मिळत होती.'

वरच्या उद्गारांसारखी भावना त्याला स्वतःबाबत जाणवायला लागली, तेव्हा तो उदासीन होत गेला.

मुखपृष्ठ : अवधूत डोंगरे / प्रफुल्लता प्रकाशन

रघू राय २०२३ साली दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले : 

तुम्ही संबंधित गोष्टीच्या पुरेसे जवळ नसाल, तर तुमचं छायाचित्र पुरेसं चांगलं येणं शक्य नाही.

पण एखाद्या माणसाला क्लिक करण्यासाठी आवश्यक 'पुरेसं' अंतर गाठलं गेल्याचं वाटलंच नाही तर काय होईल? असे प्रश्न आता रघू राय गेल्यावर आणि अधिकाधिक हातांमध्ये स्मार्टफोनांच्या माध्यमातून कॅमेरा असल्यावर नोंदवण्यात कितपत अर्थ आहे, माहीत नाही. रघू राय यांनी कित्येक छायाचित्रं काढली आहेत, त्यांच्याबद्दल आता बरंच लिहूनही आलं आहे. त्यांच्या नावाचं सर्च मारल्यावर अनेक छायाचित्रंही गुगलवर पाहायला मिळतात. ही नोंद फक्त त्यांचा परिणाम झालेल्या एका कोपऱ्याबद्दलची. 

यापूर्वी रेघेवर आलेले रघू राय यांचे फोटो :

रेघेबाहेरचं :

२३ एप्रिल २०२६

'और दिखाओ'च्या काळात लिहून केलेल्या नोंदी

जानेवारीत करायची नोंद आता एप्रिलमध्ये होते आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे उशीर झाला.

'अ‍ॅमेझॉन इंडिया'ने सध्या 'और दिखाओ' अशा घोषवाक्यासह काही जाहिराती केलेल्या दिसतात. आधीही केल्या होत्या काही वर्षांपूर्वी. या जाहिरातींमध्ये तरुण मुलं-मुली अ‍ॅमेझॉनची वेबसाइट उघडून स्वतःला काय विकत घेता येईल, ते बघत असतात. मग त्यांना सतत काही ना काही वस्तू दिसतच राहते, त्याने कधी त्यांचे डोळे चमकतात, कधी त्यांना अत्यानंद होऊन ते हसत सुटतात, कधी नाचत राहतात. एकंदर आनंदच आनंद आत-बाहेर सर्वत्र. आपल्या पसंतीचं, आपल्या खिश्याला परवडेलसं आणि अगदी वेळेत आपल्यापर्यंत पोचवणारं संकेतस्थळ म्हणून अ‍ॅमेझॉनची ही जाहिरात समोर येते. तसं म्हटलं तर, काही वस्तूंबाबत तिथून खरेदी सोयीस्कर असल्याचा अनुभव येतोही. पण त्याची वखवख सुटण्याचीही शक्यता असते- जाहिरातीत वखवख दाखवलेली आहे, सोय नाही.

अ‍ॅमेझॉन जाहिरात

असं बरंच काही बघायला असण्याच्या काळात रेघेवर लिहून केलेल्या नोंदी आहेत. तीस वर्षांपूर्वी अ‍ॅमेझॉनची सुरुवात झाली तेव्हा ते मुळात पुस्तकविक्रीचं ऑनलाइन दुकान होतं. मग हळूहळू इतर वस्तूंचा विस्तार त्यात केला गेला. आत्ताही अनेक पुस्तकं इतर कुठे मिळणं शक्य होत नाही ती तिथे मिळतात, स्वस्तात मिळतात. पण पुस्तकंही  कदाचित इतर वस्तूंसारखीच होऊन जाण्याची शक्यता आहेच (किंबहुना खुद्द लिहिणंच तसं होण्याची शक्यता उघडच आहे). नुसतं विकत घेत सुटायचं, बघायचं त्यांच्याकडे, सोशल मीडियावर त्यांचे फोटो टाकायचे, मग पुन्हा इतर वस्तूंकडे किंवा प्रतिमांकडे किंवा पॉडकास्टांकडे किंवा नुसतंच इकडून तिकडे कुठेतरी कशाततरी वळायचं. (त्यात आज 'पुस्तक दिन' आहे!) पण हे सगळं बहुधा 'और दिखाओ'च्या काळात स्वाभाविकच. 

असं एकंदरित असतानाृ आदल्या वर्षी (जानेवारी ते डिसेंबर २०२५) केलेल्या नोंदींची यादी इथे द्यावी, असं वाटलं. काही मागे पडलेल्या नोंदींकडे लक्ष जाण्याची शक्यता. काही नोंदींसाठी विशेष खटपट झालेली असते, त्यामुळेही हे वाटत असेल. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील कोलाम समुदायाच्या काही गावांमध्ये स्वतः जाऊन लिहिलेला एक वार्तालेख 'कोलामगुड्यांमधून काही नोंदी' म्हणून प्रसिद्ध केला. या लेखात वाचण्यासाठीच्या मजकुरासोबत तुलनेने अधिक प्रमाणात फोटो आणि काही व्हिडिओही दिले.

त्याआधी जून महिन्यात छत्तीसगढमधील बस्तर इथले आदिवासी नेते मनिष कुंजाम यांची खास 'रेघे'साठी फोनवरून घेतलेली मुलाखत प्रसिद्ध केली. कुंजाम हे छत्तीसगढमधील बस्तर भागात गेली जवळपास चार दशकं राजकीय-सामाजिक कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहेत. छत्तीसगढ राज्याची निर्मिती होण्याआधी तत्कालीन मध्य प्रदेश विधानसभेमध्ये ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) वतीने दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेले. त्यांनी आदिवासी प्रदेशांमध्ये विकासाच्या नावाखाली विध्वंस होऊ नये, याबद्दल काही सावधानतेच्या सूचना देत मत मांडलं. ती नोंद अशी : आदिवासी गावाच्या गोष्टीतून विकासाची दृष्टी यावी : मनिष कुंजाम. मध्य भारतातल्या नक्षलवादी चळवळीचा जवळपास बिमोड होत आला असतानाच्या परिस्थितीविषयी त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली.

या व्यतिरिक्त केलेल्या नोंदींचा तपशील असा :

एकीकडे गडचिरोली हे पोलादाचं केंद्र होऊ घातल्याच्या जाहिराती बघितल्या आणि दुसरीकडे 'जोरम' नावाचा एक चित्रपट बघितला, मग बस्तरमध्ये पत्रकाराची हत्या झाल्याची बातमी वाचली, आणि मराठीतले आद्य पत्रकार गणले गेलेले बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण'चा पहिला अंक काढला त्या ६ जानेवारीचं निमित्त आलं, मग नोंद केली : जाहिराती, 'जोरम', जर्नलिस्ट, जांभेकर.

किंवा, गडचिरोलीतच गोंडी माध्यमाची शाळा सुरू करायचा प्रयत्न मोहगावच्या ग्रामसभेने केला, तर त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी प्रशासनाने त्यावर कारवाईचा बडगा का उचलला, याबद्दलची नोंद : गोंडी शाळेला प्रति दिवस १० हजार रुपये दंडाची नोटीस कशासाठी?

किंवा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, त्या संदर्भात केलेल्या तीन नोंदी : (१) 'हिंदीसक्ती'बाबत एक निवेदन, (२) 'मराठमोळ्या माधुरीचं मराठी' ऐकणारे एंगूगींचं म्हणणं ऐकतील काय? आणि (३) आदिभारती : सक्तीऐवजी सह-अनुभूती राखणारं भाषाशिक्षण!

माध्यमांविषयी अधूनमधून नोंदी करत राहाव्या असं आधीपासूनच ठरून गेलेलं असल्यामुळे त्यासंबंधीच्या दोन नोंदी : (१) तुकाराम बीज : माध्यमांच्या 'मसाजा'मध्ये माणूस मश्गुल! आणि (२) मोदी, मुस्लीम, माओवादी, मेकॉले आणि माध्यमं. यातली एक नोंद एकंदरच माध्यमव्यवहारासंबंधीची होती, तर दुसरी नोंद सध्याच्या राजकीय वातावरणाच्या संदर्भात माध्यमांबद्दल टीकाटिप्पणी करू पाहणारी होती.

दरम्यान, साहित्याविषयीच्या काही नोंदी केल्या. शरद् पाटलांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि व्यंकटेश माडगूळकरांच्या स्मृतिदिनानिमित्त ''माणदेशी माणसे'मधल्या 'मी'च्या मर्यादा' अशी नोंद केली. काफ्काची शेवटची प्रेयसी ठरलेल्या डोरा डायमन्टच्या चरित्राला धरून केलेली 'काफ्काच्या शेवटच्या प्रेयसीने सांगितलेली गोष्ट' ही एक नोंद; अरविंद कृष्ण मेहरोत्रांनी कबिराच्या काही रचनांचं इंग्रजी भाषांतर केलंय, त्याबद्दल काही टीकात्मक निरीक्षणं नोंदवण्याचा प्रयत्न करणारी 'अरविंद कृष्ण मेहरोत्रांच्या कबिराचं कवित्व' ही नोंद; आणि भाऊ पाध्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं, त्या निमित्ताने केलेली 'भाऊ पाध्यांच्या सुंदर 'बगीचा'तलं सौंदर्य' ही नोंद, असाही काही मजकूर लिहिला गेला.

बेला भाटिया यांच्या 'इंडियाज् फरगॉटन कंट्री' या पुस्तकाचं परीक्षण 'विस्मृतीच्या विरोधात' या शीर्षकाखाली लिहिलं. वृत्तवाहिन्यांच्या, वृत्तपत्रांच्या, किंवा आपल्या एकंदरच माध्यमव्यवहाराच्या प्रकाशाबाहेर राहणाऱ्या, आणि मुख्यप्रवाही राजकीय-अर्थकारणामध्ये विसर पडलेल्या काही भागांविषयीचे आणि प्रश्नांविषयीचे लेख भाटियांच्या पुस्तकात आहे. त्यात कुठे क्वचित मतभिन्नताही वाटली, तरी त्यासकट त्यांचं काम आपला परिसर समजून घेण्यासाठी महत्त्वाचं असल्यामुळे या पुस्तकाबद्दल लिहिलं.

या सगळ्यांत काही सूत्रं समान असल्याचं दिसतं. ती सूत्रं 'दिसणं', 'दाखवणं', 'बघणं', या कृतींशीही जोडलेली आहेत. माध्यमांनी या कृतींबाबतीत घडवलेले बदल गुंतागुंतीचे आहेत, त्यामुळे त्याबद्दल इथे बोललं जातं. तसंच, या प्रक्रियेत मग कोणत्या गोष्टी नजरेआड होतात, याबद्दल थोडं बोलून आपल्या मर्यादित समजुतीनुसार काही गोष्टींकडे लक्ष वेधायचाही प्रयत्न केला जातो. त्यासाठी आपण भाषा वापरतो, म्हणून भाषावापराचा मुद्दा येतो. तर, भाषा नि अर्थ यांचं सहितपण साहित्यात अपेक्षित असल्यामुळे साहित्य तर आहेच आहे. कोणी ना कोणी या सहितपणाशी संवाद साधू पाहतं. वेळ घालवायला बोलण्यापुरतं तरी. 

नवीन नोंद इथे प्रसिद्ध झाल्याचं कळण्यासाठी व्हॉट्स-अ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक इथे रेघेची पानं उघडली. पण साधारपणे सतत सक्रिय राहिलं तर यांचा उपयोग होतो. तेवढी सक्रियतेची सक्ती स्वतःवर नि वाचकांवरही शक्य नसल्यामुळे फेसबुक-पानाचा काहीच उपयोग नाही खरं म्हणजे. त्या तुलनेत व्हॉट्स-अ‍ॅप नि इन्स्टाग्राम इथल्या पानांवरून इच्छुक वाचकांना रेघेच्या नोंदींची माहिती मिळू शकेल. उजव्या समासात त्यांच्याकडे जायचे दुवे दिले आहेतच, इथे हे परत. 


आणि हा ऐच्छिक वर्गणीसाठीचा कोड-