देरसू
सूर्य उगवला. एखाद्या सजीवाप्रमाणे आधी त्याची एक कडा पाण्यावर डोकावत आली, आणि मग पूर्ण सूर्य क्षितिजावर दिसू लागला. मग स्वर्गापर्यंत चढत जाण्याचा त्याचा रोजचा प्रवास सुरू झाला.
"किती सुंदर दिसतंय!" मी भारावून म्हणालो.
"हा सगळ्यांत महत्त्वाचा माणूस. तो गेला की बाकीचं सगळं जाणार", देरसू म्हणाला. थोडं थांबून तो पुढे बोलायला लागला : "पृथ्वीही माणूस..." ईशान्येकडे बोट करून म्हणाला- "तिचं डोकं तिथे", मग नैऋत्येला बोट करून म्हणाला- "पाय तिकडे." मग म्हणाला- "आग नि पाणी ताकदीची माणसं. आग नि पाणी गेले की सगळ्या गोष्टी गेल्या.. सगळं संपलं."
रेखाचित्र: व्लादिमीर आर्सेन्येव्ह (बहुतेक)
[वादळ सुटलेलं तेव्हा] देरसू म्हणाला, "का चिडलाय? आपण त्याला दुखावलं का?"
"कोणाला?" कझाक सैनिकांनी विचारलं.
देरसू म्हणाला, "त्याला रस्कीमधे (रशियन भाषेत) काय म्हणतात ते मला ठाऊक नाही. तो लहान देव, लहान माणूस, डोंगर सगळा जिवंत आहे. तो वारा फुंकू शकतो, झाडं मोडू शकतो. आम्ही त्याला कांगू म्हणतो."
कॅप्टन व्लादिमीर आर्सेन्येव्ह या रशियन लष्करी अधिकाऱ्याला १९०२च्या दरम्यान सायबेरियाच्या वाळवंटातील काही भागांचे नकाशे तयार करायला पाठवण्यात आलं. त्याच्यासोबत मोजक्या सैनिकांचं पथकही होतं. या प्रवासात त्यांना देरसू उझाला हा नानई जमातीतला माणूस भेटला. जंगलात शिकार करून तो गुजराण करायचा. देरसूची सृष्टीविषयीची नि सभ्यतेविषयीची दृष्टी आर्सेन्येव्हवर भुरळ घालणारी ठरली. मग त्याने देरसूसोबत घालवलेल्या दिवसांविषयी पुस्तक लिहिलं, त्यातून वरचे दोन प्रसंग नोंदवले (इंग्रजी भाषांतर : माल्कम बर, १९४१, ई. पी. डटन अँड कंपनी. रेखाटनही याच आवृत्तीतलं). जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांनी १९७५ साली या पुस्तकावर तयार केलेला ‘देरसू उझाला’ हा चित्रपट प्रसिद्ध आहे. परंपरा आणि आधुनिकता, गाव आणि शहरं, निसर्ग आणि माणूस यातल्या द्वंद्वावर (किंवा परस्परावलंबित्वावर) भाष्य करणारं देरसूचं कथन कोकणात अलीकडे निघालेल्या ‘राखणदार यात्रे’च्या निमित्ताने आठवतं.
राखणदार यात्रा आणि मुंबईचा विस्तार
राखणदार यात्रेचा पहिला टप्पा गोवा-कर्नाटक सीमेवरील कणकुंबी या गावापासून सिंधुदुर्गातील बांदा शहराजवळच्या सोनुर्ली या गावापर्यंत होता. त्यानंतर दुसरा टप्पा जुलै महिन्यात रेडी ते तळाशीळ या सिंधुदुर्गातील गावांदरम्यान झाला. तिसरा टप्पा १५ ते १७ ऑगस्ट असे तीन दिवस मुणगे (तालुका- देवगड, जिल्हा- सिंधुदुर्ग) ते बारसू (जिल्हा-रत्नागिरी) या गावांदरम्यान पार पडला. यातील तिसऱ्या टप्प्यात तिसऱ्या दिवशी पूर्ण वेळ या यात्रेसोबत प्रवास करून लिहिलेला हा वृत्तान्त आहे.
राजापूर तालुक्यातील आडिवरे इथे यात्रेकरूंनी आदल्या दिवशी रात्री मुक्काम केला होता. त्यामुळे तिसऱ्या दिवसाची सुरुवात या गावातील महाकाली मंदिरात दर्शन घेऊन आणि नारळ वाढवून झाली. ‘कोकणी रानमाणूस’ या यू-ट्यूब चॅनलद्वारे लोकप्रियता लाभलेले प्रसाद गावडे, गेली सुमारे वीस वर्षं या कोकण पट्ट्यातील विविध पर्यावरणविषयक प्रश्नांवर काम करत आलेले सत्यजित चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते शशी सोनावणे, लेखक अविनाश उषा वसंत, वन्यजीव संवर्धनासंबंधी काम करणारे मल्हार इंदुलकर, योगेश कांबळे, विनीत विचारे, यांच्यासोबतच इतरही पंधराएक मंडळी या वेळी हजर होती. यात्रेच्या निरनिराळ्या टप्प्यांवर, निरनिराळ्या दिवशी यात इतरही व्यक्ती सहभागी होत आल्या.
‘राखणदार यात्रा’ आडिवऱ्यातून वाडा-तिवरे या गावी असलेल्या कांदळवनाच्या दिशेने गेली (या कांदळवनातील गाऱ्हाण्याचा व्हिडिओ.) आणि तिथून जवळच असलेल्या आंबोळगडच्या समुद्रकिनाऱ्यावर उभं राहून यात्रेत सहभागी मंडळींनी राखणदार प्रवृत्तीला साद घालत निसर्ग वाचवण्यासंदर्भात प्रतिज्ञा केली (खालचा व्हिडिओ).
अशा समुद्रकिनाऱ्यांजवळची कांदळवनं, म्हणजेच खारफुटीची जंगलं सागरी जैवविविधता टिकवण्यासोबतच किनाऱ्यावरील रहिवाशांना नैसर्गिक सुरक्षाकवच पुरवतात. महाराष्ट्रातील कांदळवनांमध्ये सुमारे वीस निरनिराळ्या प्रजातींच्या वनस्पती आढळतात. या संदर्भात संवर्धनाकरता महाराष्ट्र शासनाने २०१२ साली ‘कांदळवन कक्ष’ सुरू केला. पण प्रत्यक्षात मुंबईसारखं शहर वाढत जाताना कांदळवनांमधली हजारो झाडं वेळोवेळी कापली जात आली आहेत.
![]() |
| आंबोळगड समुद्रकिनाऱ्याजवळच्या कांदळवनात प्रार्थना (फोटो : रेघ) |
मुंबई, नवी मुंबई, यानंतर आता रायगड जिल्ह्याच्या दिशेने सुमारे १२४ गावांच्या भागात ‘तिसरी मुंबई’ वसवण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलं आणि त्यानुसार काही ठिकाणी भूसंपादनालाही सुरुवात झाली. ‘तिसऱ्या मुंबई’चं क्षेत्र नवी मुंबईपासून अलीबागपर्यंतचं सुमारे पावणेचारशे चौरस किलोमीटरांचं असल्याचं दिसतं. त्यात मोठ्या प्रमाणात खारफुटीची जंगलं आणि इतर वनक्षेत्रं आहेत.
मुंबईचा विस्तार शेवटी कोकण किनारपट्टीच्या मुळावर उठेल, अशी भीती राखणदार यात्रेत वेळोवेळी बोलून दाखवण्यात आली. पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराचा आणि तिथे स्थानिकांकडून सुरू असलेल्या विरोधाचाही उल्लेख या वेळी झाला. वाढवण बंदराला केंद्रस्थानी ठेवून ‘चौथी मुंबई’ उभारण्याचीही योजना राज्य सरकारने आखली आहे. सुमारे साडेपाचशे चौरस किलोमीटरांचा हा परिसर असून त्यात १०७ गावांचा समावेश होतो (‘वाढवण बंदराला जोडून आकाराला येणार चौथी मुंबई’, पुढारी, १ डिसेंबर २०२५).
कोकणी माणूस उपजीविकेसाठी मुंबईवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहात आला आहे. रोजगारासाठी मुंबईच्या दिशेने होणारं स्थलांतर कोकणात सर्रास दिसतं. अशा वेळी मग मुंबईच कोकणात आली तर काय बिघडलं, असा जटिल प्रश्न कोणी विचारू शकतं. पण उपजीविका पुरवायला हवी, तिथे महानगरीकरण पुरवणं, हा उपाय असू शकतो का- या दिशेने चर्चा आवश्यक असल्याचं राखणदार यात्रेदरम्यान स्थानिकांच्या बोलण्यातून जाणवलं.
विकासाची संकल्पना
“आमचा विकासाला विरोध नाही, पण विकास स्थानिक लोकांच्या गरजा आणि निसर्गपूरक शक्यता लक्षात घेऊन करण्याऐवजी बड्या उद्योगांच्या सोयीने होताना दिसतो. या पार्श्वभूमीवर होणारा विरोध विकास प्रकल्पांना नसून विनाशकारी प्रकल्पांना आहे,” असा मुद्दा सत्यजित चव्हाण यांनी मांडला. वाडातिवरे इथे भंडार पुरुष देवस्थानात गाऱ्हाणं घालताना कोणीतरी ‘कोकणातील विकास प्रकल्पांचं संकट दूर होऊ दे रे म्हाराजा’ असं म्हटलं, तेव्हा त्यात ‘विनाशकारी’ अशी भर घालण्याची आठवण त्यांनी करून दिली.
![]() |
| तबरेझ सायेकर यांच्या कबरीपाशी प्रार्थना (फोटो : रेघ) |
राखणदार यात्रेचा पुढील थांबा साखरी नाटे या गावात होता. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यात अग्रेसर असणाऱ्या या गावात मुस्लीम मच्छिमारांची संख्या मोठी आहे. एप्रिल २०११मध्ये अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनावरील पोलिसी गोळीबारात तबरेझ सायेकर या स्थानिक तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या कबरीपाशी राखणदार यात्रेतील सहभागींनी गावकऱ्यांसह प्रार्थना केली. या वेळी ‘राखणदार तबरेझ’ असा उल्लेख करून घोषणाही देण्यात आल्या. यानंतर संवादबैठक झाली.
वाढवण बंदराच्या उभारणीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी शशी सोनावणे म्हणाले, “सध्याच्या विनाशकारी विकास संकल्पनेचा परिणाम सागरी, डोंगरी आणि नागरी अशा तीन पातळ्यांवर होतो. पालघर भागात आदिवासी समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा डोंगर पोखरून समुद्रात भर टाकली जाते. त्याचा फटका समुद्रावर अवलंबून असणाऱ्या मच्छिमारांना बसतो. पुढे समुद्र शहरात घुसून नागरी रहिवाशांवरही परिणाम होतो.”
गावात रंगारी म्हणून काम करणारे फिरोझ म्हणाले, “आत्मनिर्भर भारताबद्दल सध्या बोललं जातं. पण आम्ही आत्ताच आत्मनिर्भर आहोत. आमच्या इथे एखाद्या मच्छिमाराकडे आधी एक जाळं असेल तर आता सहा जाळी झाली आहेत. या जाळं विणण्यातून रोज सहाशे ते साडेसहाशे मजुरी मिळवणारे अनेक लोक आहेत.” रंगारी म्हणूनही पंचक्रोशीत बरंच काम मिळत राहातं, त्यामुळे बाहेर जायची वेळ आली नाही, असं त्यांनी प्रस्तुत लेखकाला सांगितलं.
एक बुजुर्ग संवादबैठकीमध्ये म्हणाले, “अणुऊर्जा प्रकल्पांच्या बाजूने प्रगत देशांनीही शंभर टक्के कौल दिलेला नाही, मग आमच्यासारख्या लोकांवर हे प्रकल्प का थोपवले जातात? आमची प्रशासनाला एकच सूचना आहे- आमचा विकासाला विरोध नाही. मासे-आंबा-काजू याच्याशी संबंधित प्रकल्प आणलेत तर आम्ही स्वागतच करू. पण आत्ता आमच्या हातात असलेला रोजगार अजून बळकट होईल, असे प्रकल्प न आणता आत्ता हातात असलेला रोजगार काढून मग पर्याय देऊ असं सांगू नका.”
साखरी नाटे इथे संवादबैठकीनंतर राखणदार यात्रेतील कार्यकर्त्यांनी जेट्टीवर जाऊन गिटारीच्या साथीमध्ये एक गाणं म्हटलं. “गाव सोडूचो नाय, जंगल सोडूचो नाय, माय-माती सोडूचो नाय, लढाई सोडूचो नाय. बिरसा तंट्या हाक मारिता लढाई दर्यासाठी, मच्छिमार यावा, दलित यावा, यावा आदिवासी.” या वेळी मोठ्या लोकांसोबतच शाळकरी मुलंही त्यांच्या आसपास कुतूहलाने जमा झाली होती. हे गाणं ओडिशापासून मध्य भारतातल्या आदिवासी पट्ट्यात हिंदीसदृश रूपात गाजलेलं आहे. इथे त्याला स्थानिक भाषेचा आणि तपशिलांचा साज चढवण्यात आला. राखणदार यात्रेने स्वीकारलेली ‘जल-जंगल-जमीन’ ही घोषणाही अशीच मध्य भारतातील आदिवासी पट्ट्यातून आलेली आणि इथे पहिल्यांदाच ठळकपणे वापरली गेलेली दिसते.
देवाचे गोठणेमधील देवराईत हसळा देवीचं मंदिर आहे. तिथेही राखणदार यात्रेच्या वतीने नारळ वाढवून गाऱ्हाणं घालण्यात आलं. या देवळाशी संबंधित दंतकथा आणि श्रद्धेवर आधारित अनुभवही गावकऱ्यांनी सांगितले. आपापल्या श्रद्धेनुसार या अनुभवांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, पण यातून निसर्गरक्षणाबद्दलचं एक “नैतिक आवाहन” वातावरणात टिकून राहातं, असं मत सत्यजीत यांनी नोंदवलं. आधी या मंदिराचं बांधकाम चिऱ्याचं नि कौलांचं होतं, पण अलीकडे त्यावर आधुनिक गिलावा आणि मेटल टाइलचं छप्पर असं कलम झालेलं दिसतं.
यानंतर यात्रा सोलगाव इथे गेली. तीन वर्षांपूर्वी सोलगाव, बारसू, देवाचे गोठणे, गोवळ, धोपेश्वर, धाऊलवल्ली, इत्यादी गावांनी मिळून ‘रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ या कंपनीच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला यशस्वीरीत्या विरोध केला. (तीन भारतीय सरकारी ऊर्जा कंपन्या आणि आखातातील दोन तेल कंपन्या यांचा हा संयुक्त उपक्रम होता). त्या वेळी पोलीस कारवाईसाठी आले असताना त्यांच्या मार्गात आडव्या झालेल्या स्थानिक स्त्रियांची आणि नागरिकांची छायाचित्रं, तसंच लाठीमाराचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे हा विषय मुख्यप्रवाही माध्यमांमध्ये काही दिवस गाजला. (जुनी नोंद : 'पाडा'तले प्रश्न, पालघर, बारसू आणि पश्चिम पापुआ). त्या आंदोलनाच्या आठवणी जागवून कार्यकर्त्यांनी इथल्या लोकांचे आभार मानले. गावातील गांगेश्वर मंदिरात संवादसभा भरली. “राजापूरच्या जनतेने राखणदार प्रवृत्ती दाखवून विनाशकारी प्रकल्प थोपवून धरले, त्यामुळे ते आमच्यापर्यंत (सिंधुदुर्गात) आले नाहीत. एकदा ही कीड लागली तर ती खालपर्यंत जाईल,” असं प्रसाद म्हणाले.
![]() |
| सोलगाव इथल्या गांगेश्वर मंदिरातील संवादबैठक (फोटो: रेघ) |
या वेळी गावपातळीवर असणाऱ्या रोजगाराच्या शक्यतांबद्दलही मत मांडलं गेलं. वावडिंग या औषधी वनस्पतीची फळं विकून काही स्थानिक लोकांनी २०-३० हजारांपर्यंत उत्पन्न कमावल्याचा अनुभव पंडित नावाच्या ज्येष्ठ व्यक्तीने नमूद केला. या निसर्गपूरक उद्योगांबाबत प्रशिक्षण देऊन जागरूकता निर्माण करायला हवी, अशी सूचना त्यांनी केली. चंद्रकांत बंडबे यांनी गावाच्या परिसरात सत्तर ते ऐंशी प्रजातींच्या औषधी वनस्पती असल्याचं सांगितलं. ते गेली अनेक वर्षं या संदर्भात माहिती गोळा करत आले आहेत. “कोव्हिडच्या वेळी बंडबेकाकांनी या वनस्पतींच्या माध्यमातून गावाचं आरोग्य निरोगी ठेवण्याची मोठी भूमिका निभावली,” असं एका तरुणाने संवादसभेदरम्यान सांगितलं. (याचा अर्थ रोगप्रतिकारक लशी घेतल्या नाहीत, असा नाही).
बारसू
राखणदार यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचा शेवट संध्याकाळी बारसू (जिल्हा- रत्नागिरी) या गावात झाला. सोलगाव ते बारसू यातलं अंतर तेरा-चौदा किलोमीटरांचं आहे. या रस्त्यावर ‘तथास्तु ग्लोबल व्हेन्चर्स’ या कंपनीने प्रत्येकी सुमारे दोन-अडीच गुंठ्याचे पंचावन्न भूखंड विक्रीला काढले आहेत. त्यांचे ‘सात्त्विक जीवन जगा’, ‘स्वतःमधली शांतता शोधा- दररोज’, अशा आशयाच्या इंग्रजी ओळी असणारे फलक रस्त्याला लागून दिसले (सोबतच्या छायाचित्रात संपर्काचा तपशील खोडला आहे). या प्रकल्पाच्या व्हिडिओ जाहिरातींमध्ये ‘फाइड यूअर सोल इन सोलगाव’ अशी ओळ आहे! यातून बाहेरगावच्या ‘गुंतवणूकदारां’ना साद घातलेली आहे. पण या परिसरात रिफायनरीविरोधी आंदोलनावेळी घडलेल्या घटना किंवा बारसूत येऊ घातलेला अणुऊर्जा प्रकल्प, या पार्श्वभूमीवर अशा जाहिराती अजाणतेपणी स्वतःचाच उपहास करणाऱ्या वाटतात.
![]() |
| सोलगाव-बारसू रस्त्यावर (फोटो : रेघ) |
याआधी राखणदार यात्रा देवगड (जिल्हा- सिंधुदुर्ग) आणि पूर्णगड (जिल्हा- रत्नागिरी) या गावांमधून जाऊन आली. या दोन गावांसह बारसूमध्ये एकूण २५ हजार मेगावॅट क्षमतेचे तीन अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहेत. संसदेने डिसेंबर २०२५मध्ये ‘सस्टेनेबल हार्नेसिंग अँड अॅडव्हान्समेन्ट ऑफ न्युक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्फॉर्मिंग इंडिया (शांती)” [भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती] विधेयक मंजूर केलं. त्यामुळे अणुऊर्जा क्षेत्रामधील खाजगी गुंतवणुकीला आता मोकळी वाट मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाने मे २०२६मध्ये विविध कंपन्यांशी सामंजस्य करार केले. त्यानुसार, देवगडमध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ही सरकारी कंपनी ७,२०० मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प उभा करेल, रिलायन्स इंडस्ट्रीज पूर्णगडमध्ये तितक्याच क्षमतेचा प्रकल्प उभारेल आणि बारसूमध्ये अदानी पॉवर ६,००० मेगावॅटचा प्रकल्प उभारेल, असं सध्या ठरलं आहे (‘Maharashtra signs MoUs for generating 25,000 MW from nuclear power’, Hindustan Times, 20 May 2025). पण तेलशुद्धीकरण प्रकल्पाला झालेला विरोध बघता भविष्यात असेच प्रकल्प इथे आणले, तर आणखी संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.
राखणदार यात्रा हळूहळू मुंबईच्या दिशेने सरकत जाणार आहे. आधी सुटे-सुटे संघर्ष अनुभवलेल्या या पट्ट्यात भविष्यातील संघर्षाचं स्वरूप एकसंध असावं, तरच राज्यसंस्था स्थानिक लोकांचं म्हणणं ऐकून घेईल, असं मत दोन्ही संवादबैठकांमध्ये व्यक्त झालं.
बारसू इथे सापडलेल्या प्रागैतिहासिक कातळशिल्पांपाशी येऊन राखणदार यात्रेचा तिसरा टप्पा संपला. एक माणूस आणि दुतर्फा दोन वाघ, अशा स्वरूपाचं एक कातळशिल्प तिथे आहे. या आकृत्या आपल्या सरासरी उंचीच्या नजरेतून सहजपणे कळत नाहीत. उंचावरून कळतात. पण अजून त्यांचे अर्थ अभ्यासकांना पुरेसे स्पष्ट झालेले नाहीत. या भागातल्या आदिम संस्कृतीच्या या खुणा असल्याचं मानलं जातं. त्याच धारणेला मध्यवर्ती ठेवून इथल्या संस्कृतीमधील ‘राखणदार प्रवृत्ती’ला साद घालण्याचा आपला प्रयत्न असल्याची भावना ‘राखणदार यात्रे’च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
![]() |
| बारसू इथल्या कातळशिल्पापाशी राखणदार यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता |
यात्रेची दिशा
पर्यावरणाच्या प्रश्नांवर यात्रा / पदयात्रा काढून लोकसंवाद साधण्याचे प्रयत्न भारतात याआधीही झाले आहेत. गांधीविचारातून प्रेरणा घेऊन (विनोबा भाव्यांचे अनुयायी) सुंदरलाल बहुगुणा यांनी १९८०च्या दशकारंभी काश्मीर ते कोहिमा अशी हिमालयातून एक पदयात्रा काढली. त्याच दशकाअखेरीला महाराष्ट्रात नवापूर ते गोवा अशी ‘पश्चिम घाट बचाव मोहिमे’ची पदयात्राही गाजली. १९९०च्या दशकारंभी आंध्र प्रदेश आणि ओडिशा या दरम्यान ‘वन्य प्रांत चैतन्य यात्रा’ काढण्यात आली. ही चळवळीची रीत गांधीविचारातून आलेली आहे, तसंच त्यातलं संस्कृतीबद्दलचं आवाहनही प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे त्याच विचारातून आलेलं आहे. गाव हे राजकीय-अर्थकारणाच्या केंद्रस्थानी ठेवणं, सांस्कृतिक खुणा राजकीय व्यवहारात धर्म-जातीपलीकडचं प्रतीक म्हणून वापरण्याचा प्रयत्न (गांधींचं ‘रामराज्य’), तसंच उपजीविकेची साधनं परिसरातून शोधण्याला प्राधान्य देणारं अर्थकारण (बुद्धविचारापासून गांधींपर्यंतच्या प्रेरणा सांगणारी ई. एफ. शुमाकर यांचं ‘स्मॉल इज ब्यूटिफूल’ ही मांडणी), इत्यादी सूत्रं त्यात दिसतात.
गांधी हयात असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तींनी यातील काही अंतर्विरोध दाखवले. गांधींचे शिष्य असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंनी देशाचं पंतप्रधानपद स्वीकारल्यावर भिन्न विकासाची वाट चोखाळली. हे सर्व वादविवाद वेगळे दखलपात्रच आहेत. पण या घडामोडींना पाऊण शतकाचा काळ उलटून गेला आहे. तंत्रज्ञानापासून बाजारपेठेपर्यंत अनेक बाबतीत बरेच बदलही झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या अंतर्विरोधांकडे नव्याने पाहण्याची गरज कायमच असते. या नव्याने पाहण्यातसुद्धा अंतर्विरोध नसतात असं नाही. खुद्द राखणदार यात्रेमध्येही काही वेळा असे विचारांचे आणि व्यवहारांचे अंतर्विरोध दिसू शकतील. पण त्यातला सध्याचा मुद्दा अटीतटीचा आहे. कोकण किनारपट्टीत येऊ घातलेल्या अणुऊर्जेपासून खाणकामांपर्यंतच्या विविध प्रकल्पांचा प्रतिकार करणं, हे त्यात स्वाभाविकपणे प्राधान्यावर आहे.
‘शाश्वत कोकण परिषदे’ने २०२४ सालच्या निवडणुकांवेळी चार पानांचा एक जाहीरनामा काढला. त्यात ‘काय नको’ हे सांगताना ‘काय हवं’ याबद्दलही त्रोटक सूचना होत्या. जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असलेला इथला सुमारे ६० ते ७० टक्के भाग ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ असल्याचं माधव गाडगीळ आयोगानेही (२०११) नमूद केलं होतं. त्यामुळे इथे खाणकाम, मोठे ऊर्जाप्रकल्प विध्वंसक ठरतील; त्याऐवजी इथे निसर्गपूरक उद्योजकतेची वाट चोखाळावी, त्याच्या निर्णयप्रक्रियेत स्थानिकांचा अधिक सहभाग असावा, इत्यादी शिफारसी आयोगाने केल्या. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. राखणदार यात्रेची दिशा प्रतिकाराच्या पलीकडे पर्यायी विकासदृष्टीकडेही जाऊ पाहते. आत्ताही त्याबद्दल अनौपचारिकपणे बोललं जात असलं तरी त्याची आणखी सविस्तर मांडणी आवश्यक वाटते. एखादी गोष्ट ‘जतन’ करायची म्हणजे काय करायचं, परंपरेतलं काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं, याचा ‘जतनविचार’ मांडून कदाचित ते शक्य होईल. (असा एक प्रयत्न ‘परंपरेचं अरण्य आणि आधुनिकतेचं अभयारण्य’ या एका भाषांतरित पुस्तकाला जोडलेल्या दीर्घ टिपणात केला- ‘अबुझमाडचे अनुनाद’, नरेन्द्र, पपायरस प्रकाशन, २०२५). वर उल्लेख केलेल्या संभाव्य अंतर्विरोधांची, तसंच विचारसरणीसारख्या मुद्द्यांची दखल त्यात प्रांजळपणे आणि चिकित्सकपणे घेणं उपयोगी ठरेल.
बाकी, देरसूला सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी ‘कांगू’ साद घालत होता, तसा कोकणात ‘राखणदार’ साद घालतो, अशी धारणा आहे. याकडे मिथक म्हणून पाहायचं ठरवलं तरीही ती साद ऐकून त्यावर प्रतिसाद तरी द्यायला हरकत नसावी.
![]() |
| अकिरा कुरोसावा यांच्या चित्रपटातलं दृश्य |
जुन्या पूरक नोंदी-
- आदिवासी गावाच्या गोष्टीतून विकासाची दृष्टी यावी : मनिष कुंजाम (मुलाखत)
- तोडगट्ट्यातल्या आदिवासींचं म्हणणं काय होतं? (वार्तालेख)






























