०३ सप्टेंबर २०२६

दुर्गा भागवतांच्या भाषांतरात 'वॉल्डन'ची विल्हेवाट

दुर्गा भागवतांच्या भाषांतरात 'वॉल्डन'चा विपर्यास- असं शीर्षक दिलं असतं, तर थोडं संयमी, समतोल टीकेसारखं वाटलं असतं. पण 'विल्हेवाट' शब्दामुळे आक्रमक पवित्रा घेतल्यासारखं वाटू शकतं. पण इथे जमेल तितपत विचार करून खरोखरचं वर्णन करण्यापुरताच हा शब्द वापरला आहे. त्यामागे अवाजवी पवित्रा नाही किंवा दुर्गा भागवतांविषयीची तुच्छताही नाही. भाषांतराच्या प्रक्रियेकडे निरनिराळ्या दृष्टिकोनांमधून बघता येतं. इथे साधारण सर्वांची सहमती होऊ शकेल असेच दाखले देऊन काही बोलायचा प्रयत्न केला आहे. 

हेन्‍री डेव्हिड थोरो
हेन्‍री डेव्हिड थोरो (१८१७ - १८६२) हा अमेरिकेत होऊन गेलेला विख्यात लेखक आणि विचारवंत होता. त्याने पर्यावरण, औद्योगिकीकरण, नागरी सभ्यता, बाजार, इथपासून आधुनिक राज्यसंस्थेपर्यंत विविध मुद्द्यांवर मांडलेली मतं वादग्रस्त नि प्रभावशाली ठरली. मोहनदास करमचंद गांधींपासून मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांच्यापर्यंत अनेक व्यक्तींवर त्याच्या विचारांचा प्रभाव पडला. मराठी लेखिका दुर्गा भागवत यांच्यावरही हा प्रभाव पडला. त्यांनी त्याचं 'वॉल्डन' हे पुस्तक 'वॉल्डनकाठी विचारविहार' या शीर्षकासह मराठीत भाषांतरित केलं. शिवाय, 'सविनय कायदेभंगा'सह त्याच्या इतर काही निवडक निबंधांचं एक पुस्तक आणि त्याचं एक चरित्र- अशीही दोन पुस्तकं त्यांनी मराठीत आणली. त्यांनी केलेलं 'वॉल्डन'चं भाषांतर १९६५ साली पहिल्यांदा प्रकाशित झालं (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस; इथे दिलेले सर्व पानक्रमांक या आवृत्तीतले). नवीन आवृत्ती २०२१ साली आली, ती सध्या बाजारात मिळते.

थोरोने आधुनिक जीवनव्यवहारापासून अंतर राखून जगण्याचा प्रयोग म्हणून कॉन्कॉर्ड, मॅसेच्युसेट्स इथल्या वॉल्डन तळ्याकाठी स्वतः बांधलेल्या घरात दोन वर्षं राहून पाहिलं. स्वतःच पिकवलेलं खायचं, इत्यादी. या प्रयोगाबद्दल त्याने १८५४ साली प्रकाशित केलेलं 'वॉल्डन' हे पुस्तक गाजलं. त्याबद्दल वेगळं काही इथे बोलायला नको. व्यक्तीशः त्याच्या आयुष्यातले अंतर्विरोधही नोंदवले गेले आहेत- म्हणजे तो सांगतो तितका निरपवाद एकांतवासात जगला नाही, कपडे आई धुवून द्यायची, इत्यादी. तो हयात असतानाही ते आक्षेप नोंदवले जात होते, त्यानेही त्याची अप्रत्यक्ष दखल 'वॉल्डन'मध्ये घेतली. एका ठिकाणी तो म्हणतो, "माझ्या त्रुटी आणि विसंगती काहीही असल्या तरी त्यामुळे माझ्या विधानामधला सत्यांश उणावत नाही. माझ्या बोलण्यातही बरीच दांभिकता आणि ढोंगीपणा आहे. धान्य पाखडून भुसकट वेगळं करावं लागतं, तसंच बोलताना विचारांमधली दांभिकता बाजूला करता यायला हवी. पण मला ते करणं अवघड जातं, आणि इतर लोकांप्रमाणे मलाही त्याबद्दल खेद वाटतो. तरीसुद्धा, मी मोकळा श्वास घेऊन या संदर्भातले माझे विचार मुक्तपणे मांडणार आहे." हे विचार का मांडायचे नि कसे मांडायचे, याबद्दलचा त्याचा पवित्रा त्याने असा स्पष्ट केलेला आहे : "मी काही रडगाणं लिहायला बसलेलो नाही. खुराड्यावर उभं राहून आरवणाऱ्या पहाटेच्या कोंबड्यासारखं बिनदिक्कतपणे शक्य तितक्या जोरात ओरडून माझ्या शेजाऱ्यांना जागं करणं, हाच माझा उद्देश आहे." या प्रतिमेतून एकंदर त्याची भूमिका लक्षात यावी. 

थोरो म्हणतोय म्हणून त्याच्या प्रत्येक बोलण्यात 'सत्यांश' आहे असं आपण मानायची गरज नाही, तसंच कधीकधी कोंबडा जवळपास मध्यरात्री, म्हणजे आपल्याला नको वाटेल अशा वेळीही आरवतो, हेसुद्धा लक्षात घेता येतं. पण म्हणून कोंबड्याचं आरवणं निरर्थक ठरत नाही आणि 'वॉल्डन'मधे काहीच सत्यांश नाही, किंवा त्याने खरोखर प्रयोग केले नाहीत, असंही नाही. या पुस्तकात एकीकडे टोकाची अराज्यवादी (अनार्किस्ट) भूमिका ठामपणे मांडलेली आहे, तसंच निसर्ग-माणूस यांच्यातल्या नात्याच्या विविध बाजू धुंडाळण्याचाही प्रयत्न आहे. आता आपलं जगणं राज्यसंस्थेभोवती (शासन-प्रशासन, पॅन, आधार, जनगणना, 'अधिकृत ओळख', इत्यादी) आणखी गुरफटत चाललेलं आहे, निसर्ग-मानव यांच्यातलं नातंही अधिक गुंतागुंतीचं झालेलं आहे. अशा वेळी थोरोचं म्हणणं आजही कमी-अधिक चर्चेचा विषय ठरतं, हे स्वाभाविक. त्यातले प्रश्न आजच्या आणखी 'पुढे' निघून गेलेल्या जगण्यालाही लागू पडणारे आहेत. आपण त्या प्रश्नोत्तरांमध्ये जाणार नाही. पण पुस्तकाचा पोत लक्षात येण्यापुरतं हे नोंदवलं. आता दुर्गा भागवतांनी केलेल्या या पुस्तकाच्या भाषांतराकडे वळू.

आरवणारा कोंबडा. रेखाटन : थोरो
('वॉल्डन'च्या एका हस्तलिखितातून. स्त्रोत : द हंटिंग्टन लायब्ररी)

भाषांतराची प्रक्रिया विविध कारणांमुळे इतकी जटिल असते की त्यात केवळ व्यक्तिसापेक्ष मतानुसार 'या शब्दाऐवजी तो शब्द योग्य' अशा वरवरच्या 'चुका' शोधून खूप गंभीर दोष दाखवल्यासारखं करणं फसवं असतं. तसंच, 'हे भाषांतर नाही अनुवाद / भावानुवाद / हृदयांतर आहे', असली स्तुतीही त्या जटिलतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे होते. इथे हे टाळलं आहे. शिवाय, साडेतीनशे पानांचा मजकूर लिहायचा म्हटल्यावर अनावधानाने, नजरचुकीने काही चुका राहून जातात, काही छपाईदोष राहातात, हेही स्वाभाविक. त्यामुळे अशा गोष्टींबद्दल न बोलता त्यापलीकडे काही तपासणी करता येते का ते पाहू. इंग्रजी वाक्यं संदर्भापुरती चौकोनी कंसात दिली आहेत. त्याशिवायही मुद्दे कळतील.

शीर्षक

थोरोने पहिल्या आवृत्तीत 'वॉल्डन' या मुख्य शीर्षकासोबत 'Or, Life in the Woods' (अर्थात, रानातलं जगणं) असं उपशीर्षक ठेवलं होतं. ते १८६२ साली आलेल्या दुसऱ्या आवृत्तीत काढण्यात आलं (त्या वर्षी नंतर तो वारला). साधारणपणे पुढील बहुतेक आवृत्त्यांमध्ये उपशीर्षक नाही. भाषांतर करताना शीर्षकाबाबत निवड करणं, किंवा काही कारणाने शीर्षक बदलणं, हे सगळं रास्तच आहे. पण बदल किंवा निवड कशा तऱ्हेची आहे, यावर चर्चा होऊ शकते. आपण थोरोची भूमिका वर थोडक्यात पाहिली. आरवणाऱ्या कोंबड्याचं वाक्य त्याने पुस्तकात शीर्षक-पानावर टाकलं होतं. इतकं त्याला त्या भूमिकेचं महत्त्व वाटलं. दुर्गा भागवतांनी मात्र शीर्षकात 'विचारविहार' अशी जोड दिली. यातून काय होतं? मूळ पुस्तकातला उग्रपणा शीर्षकापासूनच पातळ व्हायला लागतो. स्वतःला जगवण्यासाठी आवश्यक असणारे प्राथमिक श्रम न करताच नुसते उनाड विचार कशाला करायचे, या पुस्तकात वारंवार मांडलेल्या भूमिकेचा बोऱ्या वाजतो. किंबहुना, त्यातली भौतिक बाजू लंगडी करून 'विचार' नि 'विहार' असा आधिभौतिक पिसारा तयार होतो. थोरोला आरवणारा कोंबडा व्हायचा होतं, दुर्गा भागवतांनी शीर्षकापासून त्याला रंगीबेरंगी पिसांचा अनोळखी पक्षी करायला सुरुवात केली.

'निसर्गोपासक', 'निसर्गपूजक' अशी थोरोची प्रतिमा मराठीत अधिक प्रचलित होण्यामागेही भागवतांच्या समजुतीचा हातभार किती आहे, हा एक वेगळा तपासण्यासारखा मुद्दा आहे. राजकारणाविषयीच्या भूमिका एकीकडे आणि निसर्गासोबत जगण्याचं सूक्ष्म-सुंदर वर्णन दुसरीकडे, अशी फारकत थोरो करत नाही. तो दोन्ही एकत्र गुंफतो. ती गुंफण उसवायची सुरुवात 'वॉल्डनकाठी विचारविहार' अशा शीर्षकातून होते.

'सन्माननीय' पोशाखातलं बुजगावणं आणि नागडी माणसं

मुखपृष्ठ : दिनानाथ दलाल / मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

जगाच्या लेखी कोण मान्यवर ठरतं याचा विचार करण्यापेक्षा खरं सन्मानजनक काय आहे, याचा विचार करावा, असं थोरो पहिल्या प्रकरणात म्हणतो. मान्यवर असल्याचं प्रदर्शन अंगावरच्या कपड्यांमधून केलं जातं, तेव्हा आपली ओळख आतल्या माणसाशी होत नाही, तर वरच्या पोशाखाशी होते, असं त्याचं म्हणणं. हा मुद्दा पटवून देण्यासाठी तो बुजगावण्याचं उदाहरण देतो. "समजा, तुम्ही तुमचे सगळ्यांत नवीन कपडे एखाद्या बुजगावण्याला घातलेत आणि स्वतः कपडे न घालता शेजारी उभे राहिलात, तर लोक आधी बुजगावण्यालाच नमस्कार करतील ना? परवा मी एका मक्याच्या शेताजवळून जात होतो. तिथे एका काठीवर हॅट ठेवलेली होती आणि खाली कोट लटकावलेला होता. तेवढ्यावरून तोच त्या शेताचा मालक असल्याचं मी ओळखलं! बदललेल्या वातावरणाचा त्याच्यावर काय परिणाम झाला असेल तेवढाच." [Dress a scarecrow in your last shift, you standing shiftless by, who would not soonest salute the scarecrow? Passing a cornfield the other day, close by a hat and coat on a stake, I recognized the owner of the farm. He was only a little more weather-beaten than when I saw him last.]

यातल्या शेवटच्या वाक्यांचं भाषांतर दुर्गा भागवत असं करतात : "परवाच एका शेतावरून मी चाललो होतो, तेव्हा एका काठीवरच्या कोट व टोपीच्या जवळच असलेल्या त्यांच्या मालकाला मी ओळखले. गेल्या वेळी पाहिले होते त्यापेक्षा या वेळी त्याच्यावर हवेचा परिणाम जास्त झाला होता एवढेच काय ते" (पान १८).

इथे मालक काठीजवळ उभा नसून कोट-टोपी घातलेली ती प्रत्यक्ष काठी, म्हणजे बुजगावणंच 'मालक' असल्याचा उपहासात्मक शेरा थोरोने मारलाय. भागवतांनी मात्र बुजगावण्याच्या शेजारी माणूस मालक उभा करून त्याच्यावर हवेचा परिणाम जास्त झाल्याचं निरर्थक विधान लिहिलं! मूळ आशयातला उपहास घालवणं, तपशील पूर्ण निरर्थक किंवा विपर्यस्त करून टाकणं, हे या भाषांतरात पानोपानी दिसतं. 

कपड्यांबद्दल बोलून झाल्यावर थोरो निवाऱ्याबद्दल बोलतो. त्यासंबंधीच्या परिच्छेदात तो ख्रिस्ती धर्मपरंपरेत आरंभिक जोडपं मानलं गेलेल्या ॲडम आणि इव्हचा दाखला देतो : "दंतकथेनुसार, ॲडम आणि ईव्ह यांनी आधी निवारा म्हणून पाना-फांद्यांची कुटी तयार केली, त्यानंतर अंग झाकण्यासाठीचे कपडे वापरायला लागले. माणसाला आधी भौतिक ऊब मिळावी म्हणून आणि नंतर नातेसंबंधांमधील ऊब मिळावी म्हणून घराचा सुखकर अवकाश हवासा वाटला." [Adam and Eve, according to the fable, wore the bower before other clothes. Man wanted a home, a place of warmth, or comfort, first of physical warmth, then the warmth of the affections.]

भागवतांचं भाषांतर असं : "पुराणकथेप्रमाणे आदम आणि ईव्ह दुसरी वस्त्रे मिळवण्यापूर्वी लताकुंज नेसूनच राहिली होती. माणसाला घराची, उबदार आणि सुखकारक जागेची जी आवश्यकता भासली ती त्याला ऊब हवी होती म्हणून. पण मागाहून भाषेची ऊब देखील त्याला हवीशी झाली" (पान २२).

थोरोची इंग्रजी भाषा १८५०च्या दशकातली, अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स भागातली. त्या भाषेतला मजकूर भागवतांनी जवळपास नव्वद वर्षांनी १९६०च्या दशकारंभी मराठीत करायला घेतला आणि आता आपण आणखी साठ-सत्तर वर्षांनी त्याबद्दल बोलू पाहतोय. काळाचं नि प्रदेशांचं अंतर मोठं असल्यामुळे भाषावापरात बराच फरक पडतो. अनेकदा भाषा कळणंच मुश्कील होऊन जातं. त्यामुळे भाषांतरात 'चुका' होण्याच्या शक्यता वाढतात, हे समजून घेऊ. पण कुठपर्यंत समजून घ्यायचं! भाषा कळणं अवघड जातं, अशा वेळी आपण शब्दकोश बघतो, पूरक पुस्तकं बघतो, आता इंटरनेटवर शोधाशोध करून अर्थ लावायचा प्रयत्न करतो. दुर्गा भागवतांनी भाषांतर केलं तेव्हा इंटरनेट नव्हतं, पण त्या मुंबईतल्या विख्यात एशियाटिक लायब्ररीत दिवसभर वाचन-लेखन करत बसायच्या त्या काळात त्यांनी हे भाषांतर केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या हाताशी पुस्तकांचा, नियतकालिकांचा, संदर्भग्रंथांचा प्रचंड साठा होता. आजूबाजूला वाचणारी माणसं होती, तसंच वेगवेगळ्या विषयातले अभ्यासक ओळखीच्या वर्तुळात होते. स्वतः भागवतांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून थोरोचं नि त्याच्याबद्दलचं वाचायला सुरुवात केलेली होती आणि भाषांतर करताना त्या साधारण ५५ वर्षांच्या होत्या. तरीही वरच्या परिच्छेदाची अवस्था पाहावी.

त्यात wore the bower या शब्दांचा अर्थ शब्दशः 'लताकुंज नेसली' असा नाही, तर 'लताकुंजामध्ये राहिली' असा आहे. समजा, भागवतांनी मूळ इंग्रजीलाच धरून नव्वद वर्षांनी मराठी लिहायचं ठरवलं असेल, त्यामुळे 'लताकुंज नेसली' असा शब्दप्रयोग केला असेल, तर समजून घेऊ. शेवटी घर हा शरीराला लागून असलेल्या कपड्यांबाहेरचा पोशाखच आहे, तो माणसाला आधी हवासा वाटला, मग शरीर झाकण्यासाठीचे कपडे गरजेचे वाटले, असं थोरो त्या 'wear' क्रियापदाच्या वापरातून सुचवतो आहे. ती सूचकता नव्वद किंवा दीडशे वर्षांनी जशीच्यातशी पोचणं अवघड असलं तरी तो भाषांतरकाराच्या निवडीचा अधिकार म्हणून मान्य करू. पण भागवतांच्या वाक्यरचनेतून थोरोची ही मांडणी समोर येतेय का? घरातून मिळणारी भौतिक ऊब आणि नात्यांची ऊब, हा भाग तर भागवतांनी पूर्ण संपवून टाकला, तसंच त्यात मूळ आशयात नसलेली 'भाषेची ऊब' घुसवली. भाषेच्या मुद्द्याचा काहीही संबंध या परिच्छेदाशी किंवा पुढे-मागे आलेल्या परिच्छेदांशी नाही. 

इंग्रजी-मराठी शब्दांची गचाळ गुंतवळ

'वॉल्डन'च्या पहिल्या आवृत्तीचं शीर्षकपान

एखाद्या भाषाप्रयोगातली सूचकता शंभर वर्षांनी तशीच राहील असं नाही, तसंच खुद्द भाषावापराची धाटणीही बदलत असते. अशा वेळी शक्यतो भाषांतरकाराने आपल्या सवयीच्या चालण्या-बोलण्या-लिहिण्याच्या भाषेनुसार आशय मांडायचा प्रयत्न करावा, हा एक उपाय आहे. हे काही काटेकोर गणित नाही, त्यामुळे व्यक्तिसापेक्ष दृष्टिकोनानुसार यात थोडाफार फरक पडेल. पण भागवतांचा दृष्टिकोन नक्की काय आहे, याबद्दलच शंका येते.

उदाहरणार्थ, काही ठिकाणी भागवतांनी मराठी शब्दांसोबत इंग्रजी शब्द मुख्य मजकुरातच 'किंवा' आणि 'ऊर्फ' अशी जोड टाकून, किंवा कधी नुसता स्वल्पविराम टाकून दिलेले आहेत. परिभाषेबाबत काही वेळा असं करावं लागतं. उदाहरणार्थ, निम्नस्तरीय (subaltern), किंवा विरोधविकासवाद (dialectics). एखादी संकल्पना मराठीत रुळली नाहीये, किंवा नुसत्या मराठी शब्दातून संदर्भ बहुधा स्पष्ट होणार नाही, तर इंग्रजी शब्दही कंसात राहू दे, असा सावधपणा त्यामागे असतो. भागवत मात्र अगदी साध्या शब्दांसाठी सर्रास हे करत सुटतात. काही उदाहरणं- 'लोगॅरिदमची किंवा लघुगणिताची कोष्टके' (पान १७), 'यांकी किंवा अमेरिकन' (पान २३, पान ७६), 'नॉर्थ अमेरिकन ऊर्फ उत्तर अमेरिकन' (पान २८), 'सदर्न स्टेट्स ऊर्फ दक्षिण संस्थानं' (पान २८), 'सायन्स किंवा शास्त्रीय विषय किंवा आर्ट्स ऊर्फ साहित्य विषय' (पान ४१), 'पोलिटिकल एकॉनॉमी, राजकीय अर्थशास्त्र'  (पान ४२), 'लोहचुंबकीय टेलिग्राफ किंवा तारायंत्र' (पान ४२), 'एव्हरग्रीन किंवा सदाहिरवी', इतकंच नव्हे तर, 'हॉल' शब्दालाही त्या असं करतात- 'भव्य गृहे, किंवा हॉल' (पान ४६). ही इंग्रजी-मराठी शब्दांची गचाळ गुंतवळ पुरत नाही म्हणूून की काय, काही वेळा त्या एकसारख्या मराठी-मराठी शब्दांचीही गुंतवळ तयार करतात. उदाहरणार्थ, "भाजायचे अर्थात् भाजण्याच्या पात्रांत ठेवूनच भाजून काढायचे," असं एका ठिकाणी लिहितात (पान ५१). इथे मूळ इंग्रजी वाक्य, 'भाजण्यासाठी मातीचं भांडं असावं' अशा आशयाचं आहे, त्याला भागवतांनी भाजून-भाजून करपवून टाकलेलं आहे.

भाषांतरात खचून गेलेले शब्द

पूर्वी मध्य आशिया, पूर्व युरोप, सायबेरिया वगैरेंना जोडून पसरलेल्या विशाल गवताळ प्रदेशासाठी तार्तरी हे नाव प्रचलित होतं. त्याचा उल्लेख वॉल्डनमध्ये 'Tartary steppe' असा येतो. steppeचं भाषांतर गवताळी प्रदेश असं सहज मराठीत शक्य असतानाही भागवतांनी 'तार्तरीच्या स्टेपेचं अफाट ओसाड मैदान' असं विचित्र केलंय. म्हणजे मूळ 'स्टेप' हे विशेषनाम भासावं अशा रीतीने कायम ठेवून पुन्हा अर्धामुर्धा मराठी अर्थ त्याला जोडून ठेवलेला आहे (पान ७२). पुढे एकदा तर, "रेल्वेमार्ग बांधले गेले नाहीत तर आपण वेळेत स्वर्गापर्यंत पोचणार कसं?" असा उपहासात्मक प्रश्न थोरो लिहितो, तेव्हा भागवत "रेल्वेमार्ग नसते तर आपण हेवनला योग्य काळी कसं पोचणार?" असं करतात (पान ७६). इथे 'हेवन' आणि 'स्वर्ग' या संकल्पनांमधल्या फरकावर किंवा ख्रिस्ती नि हिंदू धर्मविचारातल्या तफावतीवर खल करण्यात अर्थ नाही. इतर कित्येक ठिकाणी भागवतांनी नको तिथेही हास्यास्पद मराठीकरण केलेलं आहे. आंघोळीच्या टबाचं त्यांना 'स्नानाचं पिंप' करावं वाटतं! (पान ७२) तिथे 'टब' चालत नाही, पण 'हेवन' मात्र तसाच मराठीत येतो!

अशी शब्दांची किंवा वाक्यांशांची कित्येक उदाहरणं आहेत. रेल्वेरुळांखाली आताआतापर्यंत लाकडी पट्ट्या टाकायचे, आता काँक्रिटच्या पट्ट्या टाकतात. त्यांना 'sleeper' असं म्हटलं जातं. थोरो लिहीत होता तेव्हा त्या भागामध्ये नुकतीच रेल्वे सुरू झालेली. त्याबद्दल त्याने बरीच टीकाटिप्पणी केली आहे. त्याचं म्हणणं असं की, काही माणसांना रेल्वेगाडीतून निवांत प्रवास करायला मिळतो तर अनेक लोकांना मात्र रुळांखालचे 'स्लीपर' व्हावं लागतं, चिरडून घ्यावं लागतं. तिथे भागवतांनी 'स्लीपर' या शब्दाचं 'पट्टीचे झोपाळू गडी', 'निद्रावस्थेत चालणारा माणूस' असं दिशाभूल करणारं भाषांतर केलेलं आहे (पान ७६). त्यासंबंधीच्या वाक्यांना तर त्यामुळे काही अर्थच उरत नाही. शरीराच्या अवयवांवरचं नियंत्रण सुटतं नि मान हलत राहाते, कंप सुटल्यासारखे हात हलतात, त्या कंपवाताच्या आजाराला 'Saint Vitus' dance' असा इंग्रजीतला शब्दप्रयोग आहे. आपण एका ठिकाणी डोकं / विचार स्थिर ठेवू शकत नाही, याबद्दल बोलताना थोरो या आजाराचा उल्लेख करतो. त्या वेळी भागवत लिहितात : "आम्ही रोग बरा व्हावा म्हणून सेंट व्हिटसपुढे नवसाचा नाच नाचतो आणि आमची डोकी त्यामुळे क्वचितच स्थिर असतात." (पान ७६). कुठलाही संदर्भ शोधला किंवा कुठलाही अर्थ लावला, तरी या वाक्याला आधार सापडणार नाही (सेंट व्हिटस / व्हायटस याच्या मूर्तीसमोर नाचलं तर हा कंपवात बरा होईल, अशी श्रद्धा होती). भागवतांनी या भाषांतरावेळी प्राथमिक पातळीवरही डिक्शनरी वापरली नसेल का, अशी शंका येते.

पूर्ण निरर्थक शब्द नि वाक्यं

आधी म्हटल्याप्रमाणे दूरचा प्रदेश, दूरचा काळ, यामुळे भाषावापरात फरक पडतो. पण या काळाच्या किंवा प्रदेशाच्या अंतराचा परिणाम न झालेल्या शब्दांनाही भागवतांनी निरर्थक करून टाकलंय. 

थोरोने पहिल्या प्रकरणाच्या शेवटाकडे दानधर्म, परोपकार, इत्यादी गोष्टींवर टीका केली आहे. जगाला सुधारायला जाण्याआधी स्वतःला सुधारावं, असं साधारण तो सुचवतो. त्यात एक साधंसं वाक्य आहे- "If I were to preach at all in this strain, I should say rather, Set about being good." याचं साध्या मराठीत इतपत होऊ शकेल : "अशाच सुरात काही उपदेश करायचा झालाच तर मी इतकंच म्हणेन की, भला माणूस  होण्यासाठी प्रयत्न सुरू करावा." किंवा आणखी काही वेगळं करता येईल. पण भागवत असं करतात: "मलासुद्धा जर अशाच सुरांत उपदेश करायचा असता, तर मी म्हटले असते, 'तू चांगला होण्यासाठीच बाहेर पड; मावळण्यासाठीच बाहेर पड कसा." (पान ५९). यात 'set about'चा शब्दशः अर्थही 'मावळणं' असा होत नाही. याच्या लगेच पुढच्या वाक्यांमध्ये थोरोने सूर्याचं रूपक माणसाचं आंतरिक तेज वाढवण्यासंदर्भात वापरलेलं आहे. पण भागवत आधीच ते तेज मावळवून टाकतात! 

याच प्रकरणात पुढे एकदा 'set about' येतं, तेव्हा 'सज्ज व्हा' असं भाषांतर त्या करतात. ते शब्दशः चुकीचं नाही, पण तिथेही एकंदर वाक्य निरर्थकच होऊन जातं. इंग्रजी वाक्य असं आहे : "Rescue the drowning and tie your shoe-strings. Take your time, and set about some free labor." इथे काळ-प्रदेश यांमुळे बदललेल्या भाषावापराचा ठळक दाखला मिळतो. पण एकंदर परिच्छेदाची धाटणी लक्षात घेऊन, अधिक शोधाशोध करून आपण ही वाक्यं आजच्या मराठीत अशी करू शकतो : "कोणी बुडत असेल तर त्या माणसाला जरूर वाचवा, पण त्याचसोबत आपण स्वतःच्या बुटांची नाडी धड बांधतोय ना याचीही खात्री करा. विचार करायला पुरेसा वेळ घ्या, आणि मग स्वतःच्या स्वतंत्र वाटेवरून जाणारं काही काम सुरू करा." भागवत काय करतात पाहा : "बुडत्याला वाचवा आणि आपले बुटाचे बंद बांधा. आपल्या वेतनाबद्दल जागरूक राहा आणि मोफत श्रमांसाठी सज्ज व्हा."

यात वेतन कुठून आलं? मोफत श्रमांसाठी सज्ज राहण्याचा इथे काय संबंध आहे? स्वतःचं स्वतः वाचून तरी त्यांना हे कळलं असेल का? इंग्रजी वाक्यात 'free labour' शब्दप्रयोग आल्यामुळे आपण गोंधळू शकतो. पण भागवत गोंधळेलेल्या नाहीत, त्यांनी शब्दाला शब्द लावून भाषांतर करून टाकलं. गोंधळलेला माणूस अख्खा परिच्छेद परत वाचेल, त्याचा संदर्भ समजून घेईल, त्या काळच्या भाषेचा नि थोरोच्या भाषावापराचा अंदाज बांधू पाहील. हे कष्टाचे उपाय भाषांतरकाराला करावे लागतात. दुर्गा भागवतांनी हे केलं असेल का?

होडी : बिंब आणि प्रतिबिंब (रेखाटन : थोरो, १८५४)
स्त्रोत : नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी / हेन्‍री डेव्हिड थोरो'ज् जर्नल ड्रॉइंग्ज

अमेरिकेतील मूळच्या इंडियन आदिवासी लोकांना त्यांचे शत्रू जाळायचे. पण त्या छळाने या लोकांना वेदना कशा होत नाहीत, हे पाहून तिथे 'येशूचा संदेश' पोचवायला गेलेल्या जेसुआइट ख्रिस्ती धर्मप्रसारकांना आश्चर्य वाटलं. हा एक दाखला देऊन थोरो दानधर्मासंदर्भातला स्वतःचा मुद्दा पटवू पाहतो. मुळातच वेदना नि दुःख याबद्दल वेगळ्या धारणा राखणाऱ्या या आदिवासी लोकांना ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या सांत्वनाची गरजच नसायची. "दुसरे लोक त्यांच्याशी कसे वागतायंत याने आदिवासींना काहीच फरक पडत नव्हता, ते शत्रूवरही निराळ्याच तऱ्हेने प्रेम करत असत आणि शत्रूच्या सर्व क्रूर कृत्यांनंतरही त्यांना हे लोक मनापासून माफ करून टाकत. त्यामुळे ‘दुसऱ्यांनी आपल्याशी जसं वागावंसं आपल्याला वाटतं, तसंच आपण त्यांच्याशी वागावं’, असले [बायबलमधील] सल्ले त्यांच्या लेखी निरुपयोगी होते," असं थोरो म्हणतो. इंग्रजी वाक्यं अशी : "the law to do as you would be done by fell with less persuasiveness on the ears of those, who, for their part, did not care how they were done by, who loved their enemies after a new fashion, and came very near freely forgiving them all they did." हे वाचून प्रत्येक माणसाला बायबलच आठवेल असं नाही. तरी, शब्दरचनेवरून काही अंदाज बांधता येऊ शकतात. विशेषतः दुर्गा भागवत तर स्वतः धर्म-संस्कृती इत्यादींच्या अभ्यासक मानल्या जात होत्या. पण त्या इथे कसं भाषांतर करतात पाहा : "... हम करे सो कायदा, त्या इंडियनांच्या कानी मिनतवारी करूनसुद्धा पुरता पोचू शकला नाही; कारण आपले काय होईल याची फिकीरच मुळी त्यांनी कधी केली नाही. त्यांनी आपल्या शत्रूंवरही आपल्या पद्धतीने प्रेम केले; आणि त्यांनी जे काही केले, त्याबद्दल शत्रूंना क्षमा करण्यापर्यंत मजल गाठली" (पान ६१).

The law to do as you would be done- याचं 'हम करे सो कायदा', असं पूर्णपणे संदर्भहीन भाषांतर भागवतांनी केलं, इतकंच नव्हे तर हा संदेश 'मिनतवाऱ्या करूनसुद्धा' इंडियनांपर्यंत पोचू शकला नाही, असंही ठोकून दिलं. त्याहून भयंकर म्हणजे या परिच्छेदाच्या सुरुवातीला इंडियनांना जळताना 'पाहणारे' जेसुआइट मिशनरी आहेत, पण भागवतांनी "जेसुइटांनी ज्या इंडियनांना खांबाला बांधून जिवंत जाळले" अशी सुरुवात केलेय. म्हणजे आधी इंडियनांना जाळून मग त्यांचं (म्हणजे त्यांच्या जळलेल्या देहांचं?) सांत्वन करायला जाळणारेच लोक गेले आणि त्यांनी 'हम करे सो कायदा' हा संदेश मिनतवाऱ्या करून दिला, असल्या मजकुराचा स्वतंत्रपणे तरी काही अर्थ लागतो का!

आत्तापर्यंतच्या उदाहरणांमध्ये फक्त भाषा निरर्थक ठरली. पण काही ठिकाणी तर प्रत्यक्ष भौतिक पातळीवरच्या व्यवहारांनाही निरर्थक ठरवणारी वाक्यं भागवतांनी लिहिली आहेत. राहत्या घरापेक्षा वरवरच्या संपन्नतेला आपण जास्त भाव देतो, याबद्दल नाराजी व्यक्त करताना थोरोने शेतकऱ्याचं घर नि गोठा याबद्दलचं उदाहरण दिलंय. तो लिहितो : "Though we have many substantial houses of brick or stone, the prosperity of the farmer is still measured by the degree to which the barn overshadows the house." इथे काही भाषेचा गोंधळ होण्यासारखं नाही. मराठीत हे साधारणपणे असं सहज करता येतं : "आपल्याकडे दगडा-विटांची अनेक दणकट घरं असली तरी, शेतकऱ्याची सुबत्ता अजूनही त्याच्या घरापेक्षा त्याचा गोठा वा तबेला किती मोठा आहे यावरून मोजली जाते."

पण भागवतांचं भाषांतर असं आहे : "जरी आपल्याजवळ दगडविटांची पुष्कळ घरे असली तरीही शेतकऱ्याच्या सुबत्तेची मोजदाद त्याच्या कोठाराची किंवा मागरघराची सावली त्याच्या घरावर कितपत पडते यावर अवलंबून असते" (पान ४६). इथे overshadowsचा इतका शब्दशः अर्थ घेतलाय की गोठ्याची घरावर 'सावली पडतेय'.  भाषांतराचा मुद्दा सोडून दिला तरीसुद्धा हे हास्यास्पद ठरतं. घरापेक्षा गोठा मोठा असला तरी त्याचा मोठेपणा आडव्या विस्ताराचा असणंच व्यावहारिक आहे. कोणी गुरं ठेवायला बहुमजली गोठा बांधेल का? तसं नसेल तर घरावर त्याची प्रत्यक्ष सावली पडण्याची शक्यता किती? मुद्दाम ठरवून बांधला तरच घरावर सावली पाडणारा गोठा किंवा तबेला बांधला जाईल.

सगळ्या गोष्टींकडे फक्त आर्थिक मिळकतीची साधनं म्हणून पाहायला नको, असं थोरोला वाटतं. त्या संदर्भात तो शेताच्या आवारात राहून गेलेला कवी आणि शेतमालक यांचं उदाहरण देतो. कवी शेतातून फक्त काही सफरचंद घेऊन गेला असेल असं शेतमालकाला वाटतं, पण प्रत्यक्षात कवीने ते शेतच स्वतःच्या कवितांच्या रूपात सोबत नेलेलं असतं, वगैरे तो लिहितो. त्यात तो दुधाचं रूपक वापरून म्हणतो की, "कवी शेतातलं दूध काढतो, त्या दुधातून साय काढतो. ही सगळी साय कवीला मिळते. शेतमालकाला मात्र साय नसलेलं सत्त्वहीन दूध तेवढं मिळतं." इथे आता इंग्रजी वाक्य देत नाही. ते न देताही भागवतांच्या भाषांतरातला निरर्थकपणा, उथळपणा कळेल. भागवत लिहितात : "त्याने त्याला [शेताला] दोहले आहे. मंथले आहे. त्याची सारी मलई काढून घेतलेली आहे आणि शेतकऱ्याला फक्त घुसळून उरलेले निःसत्त्व दूध बाकी ठेवले आहे."

दुर्गा भागवत ('खमंग' पुस्तकाचं मलपृष्ठ, पॉप्युलर प्रकाशन

'दोहणं' म्हणजे गायीचं दूध काढणं. ठीक आहे. पण साय किंवा मलई काढायला दूध मंथावं किंवा घुसळावं लागत नाही, तर तापवावं लागतं. किंवा अगदी थंड हवेच्या प्रदेशात न तापवता साय मिळवली, तरीही त्यात घुसळण्याचा काही संबंध नसतो. मग भागवतांनी ते इथे का घुसळलं? 'मंथलं' वगैरे तर विनाकारण उड्या! आणि त्यांना पाककलेतही रुची होती, त्यावर त्यांचं 'खमंग' हे पुस्तक आत्ताही बाजारात मिळतं! तरीही, इथे त्या फक्त भाषाच नव्हे तर दूध नि साय हा साधा समोर दिसणारा भौतिक व्यवहारही निरर्थक करून टाकतात.

भाषांतरकाराला समोरच्या संहितेत उल्लेख येणाऱ्या प्रत्येक विषयाची माहिती असणं अर्थातच नाही. पण शंका तर पडायला हवी, शंका पडल्यावर त्याबद्दलचा शोध तर घ्यायला हवा. भागवतांनी ते तर केलेलं नाहीच, पण त्यांच्या अभ्यासाचे विषय मानले जातात अशा बाबतही बरीच ठोकंपंची केली. 

थोरोने अनेक ठिकाणी इतर संस्कृतींमधल्या संहितांचे संदर्भ वापरलेले आहेत. उदाहरणार्थ, “पक्ष्यांशिवायचं घर म्हणजे मीठमसाला नसलेलं अन्न,” असं ‘हरिवंश’ या [प्राचीन हिंदू] संहितेत म्हटल्याचा दाखला तो स्वतःच्या वॉल्डनकाठच्या घराबद्दल बोलताना देतो. भागवतांनी हे वाक्य असं केलंय : "हरिवंश म्हणतो की पक्ष्याशिवाय असलेला आवास म्हणजे मसाल्याशिवायचे अन्न आहे."

'महाभारत' म्हणतो, 'रामायण' म्हणतो, किंवा 'बायबल', 'कुराण' कोणतीही संहिता वा ग्रंथ स्वतः 'म्हणतो', ही शब्दयोजना मराठीत तितकीशी स्वाभाविक नाही (लिंगानुसार काही वेळा 'गीता म्हणते', 'रामायण म्हणतं' वगैरे करतात, ते वेगळं). भागवतांनी 'Harivansa says' याचं साचेबद्ध मराठीकरण केलं. पण असे आक्षेप या लेखात टाळलेत, कारण हे तितकंसं मूलभूत नाही, आणि थोडा व्यक्तिसापेक्ष निवडीचाही प्रश्न असतो. पण इथे आणखी गंभीर शंका येते, त्याचं कारण दोन पानांनंतर सापडतं. 'हरिवंश' ही हरी म्हणजे कृष्णाच्या वंशाशी संबंधित संहिता असल्याचं नावातूनच स्पष्ट आहे, बाकी तपशील इथे बोलायला नको. ही संहिता 'वॉल्डन'च्या मराठी भाषांतरकाराने वाचलेली असेलच, असं नाही. पण आता थोरोने उघडच संहितेचं नाव लिहिल्यावर तरी आपल्याला ते कळतं. मग दोनच पानं पुढे पुन्हा या संहितेतलं अवतरण थोरोने दिलेलं आहे, पण त्यात 'हरिवंश' असा उल्लेख नाही. तिथलं इंग्रजी वाक्य असं : "'There are none happy in the world but beings who enjoy freely a vast horizon,' said Damodara, when his herds required new and larger pastures."

संस्कृत येत नसलं तरी, किमान खुणा तर ओळखता येऊ शकतात. इथे दामोदराच्या कळपांचा उल्लेख आलाय, त्यावरून हा 'दामोदर' म्हणजे गुराखी असल्याचं कळतं, आणि तो कृष्ण असेल का, अशी शंका मनात आल्यावर आपण शोधाशोध करू- इंटरनेटवर ही शोधाशोध केल्यावर हा संदर्भ 'हरिवंशा'तला असल्याचं आपल्याला कळेल. भागवतांनी मात्र या दुसऱ्या उल्लेखावेळी पूर्णपणे वेगळ्याच वंशावळीतला दामोदर उभा केला. त्यांचं भयंकर भाषांतर असं : "जेव्हा त्यांच्या [भटक्या मानवसमूहांच्या] कळपांना नवनवी आणि अधिकाधिक विस्तृत गायराने चरण्यासाठी लागत तेव्हा दामोदराने (अकराव्या शतकातील संस्कृत कवीने) वर्णन केलेल्या स्थितीचा प्रत्यय येणे स्वाभाविकच होते. तो म्हणतो की, "ज्या जीवांना अफाट विस्तारलेल्या क्षितिजांत रमता येते, त्यांच्यासारखे सुखी या जगात अन्य कुणीही नाही" (पान ७२;  इंग्रजी मजकुरात या वाक्याआधी भटक्या समूहांचा उल्लेख आहे, त्याला जोडून पुढे हरिवंशातलं अवतरण येतं, हे कळण्यापुरतं वरती चौकोनी कंस टाकलाय).

इथे तर वाचकांची पूर्ण फसवणूक आहे. दामोदर मिश्र हा अकराव्या शतकातला कवी माळव्यातील भोज राजाच्या दरबारात होता, त्याची 'हनुमान नाटक' ही संहिता प्रसिद्ध आहे (संदर्भ : एक आणि दोन). तो गुराखी नव्हता, किंवा त्याने हे कुरणं-गुरं याबद्दल काही म्हटलेलंही नाही. हे कळण्यासाठी संस्कृत येण्याची गरज नाही. ही ओळ नक्की कशातली आहे हे इंटरनेटमुळे तुलनेने अधिक वेगात कळू शकतं, हेही खरं.  संस्कृत येत असलेल्यांनासुद्धा अशी एखादीच ओळ इंग्रजी भाषांतरात समोर आल्यावर ती अचूकपणे कोणत्या संहितेतली आहे हे लक्षात येईलच असं नाही (इथे तर थोरो संस्कृत संहितेच्या फ्रेंच भाषांतराचं  इंग्रजीकरण करून देतोय). शोध कुठे घ्यावा हे संस्कृत येणाऱ्याला कदाचित लवकर कळू शकेल. इंटरनेटमुळे या शोधाचा फक्त वेग थोडासा वाढतो (वेगामुळे गफलतीची शक्यताही वाढते). हा शोध अभ्यासकांना विचारून, कोश चाळूनही घेता येतो. इथे तर दामोदर गुराखी असल्याचं खुद्द इंग्रजी संहितेतच धडधडीतपणे म्हटलेलं आहे. कृष्णाशी संबंधित स्पष्ट खूण आहे. पण संस्कृतच्या विदुषी मानल्या जाणाऱ्या भागवत काय करतात, तर ती खूण तोडूनमोडून टाकतात. इतकंच नव्हे तर कृष्णाचा उल्लेख अकराव्या शतकातल्या दामोदर मिश्र कवीचा असल्यासारखं कंसात ठोकून देतात आणि त्याच्या तोंडी बेढब वाक्य कोंबतात. यावर खरं म्हणजे टीका तरी काय करणार! 

भागवतांनी केलंय ते भाषांतर अत्यंत कमअस्सल स्तरावरच्या 'एआय टूल'सारखं आहे. विविध भाषांमध्ये पसरलेला प्रचंड 'डेटा' आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला उपलब्ध असतो. पण संगती लावताना, ती मराठीसारख्या (स्थानिक!) भाषेत मांडताना त्याला तांत्रिक भाषेत 'भ्रम' (hallucination) होण्याची शक्यता सतत असते. मग तो इकडचा दामोदर तिकडे टाकू शकतो, शब्दाला शब्द जोडूनच विचार करू शकतो, साचा ओळखून धावू पाहतो, असं थोडं त्याचं होतं. सध्यातरी. पुढे तोही आणखी 'विकास' पावत जाईल तिथे जाईल. भागवतांच्या काळात 'एआय' नव्हतं, पण त्यांनी अत्यंत वाईट अर्थाने काळाच्या पुढे जाणारं, 'एआय'चा खराब वापर केल्यावर होतं तसं, भाषांतर केलं! 'एआय'ला नीट प्रश्न विचारला तर तो दोन दामोदरांमधला भेद सांगू शकतो आणि आणखीही उपयुक्त संदर्भ देऊ शकतो. पण प्रश्न विचारायला हवा हे माणसाला वाटायला लागतं, तो कसा विचारायचा हे समजावं लागतं, माणसाने स्वतंत्रपणेही वाचन करावं लागतं, आणि मग त्याचं उत्तर आणखी चार ठिकाणांवरून तपासावं लागतं. शिवाय, 'एआय'च सगळं करेल असा आपला भ्रम होणार नाही याची काळजीही घ्यायला लागते. थोडक्यात, एक साधन म्हणून त्याचे काही उपयोग होऊ शकतात. पण भ्रमात राहून सगळंच त्याच्या माथी मारलं तर मग ते वरच्या भागवतांच्या परिच्छेदासारखं होऊ शकतं. हा गलथान भ्रम व्हायला 'एआय'चीच गरज आहे असं नाही, तर अनेक संदर्भसाधनांनी संपन्न ग्रंथालयात बसणारा, अनेक भाषा येणारा माणूससुद्धा हे करू शकतो, याची खेदजनक खात्री 'वॉल्डनकाठी विचारविहार' वाचल्यावर पटते. 

मजकूर गाळून लावलेली विल्हेवाट

भाषांतर करताना काही गोष्टी वगळाव्या वाटल्या, तर तसं पुस्तकात सुरुवातीला कुठेतरी नोंदवून करायलाही हरकत नाही. भागवतांनी असं गाळल्याबद्दलची काही सूचना पुस्तकात नोंदवलेली नाही, पण अधूनमधून काही वाक्यं नि परिच्छेद त्या गाळत गेलेल्या आहेत. यातही एखादं वाक्य, किंवा कधी एखादा परिच्छेद अनावधानाने निसटू शकतो. किंवा एखाद्-दोन ठिकाणीच असं करावं वाटल्यामुळे त्याची वेगळी नोंद केली न जाण्याचीही शक्यता असते. पण भागवतांनी या पुस्तकात अनेक ठिकाणी हे केलेलं आहे, आणि त्यातून पूर्ण पुस्तकाची विल्हेवाट लावली आहे.

'वॉल्डन'चं पहिलं प्रकरण सर्वांत मोठं (सुमारे ८० पानं) आहे आणि ते पुस्तकातल्या कथनाची पायाभरणी करतं. या प्रकरणाच्या शेवटी थोरोने फार्सी कवी सादी शिराझी याच्या 'गुलिस्ताँ' या काव्यग्रंथातल्या काही ओळी गद्यरूपात दिलेल्या आहेत (त्या त्याने अर्थातच इंग्रजी किंवा फ्रेंच भाषांतरातून वाचल्या). हे प्रकरण सादीच्या ओळींनी संपतं.  सुमारे दीडशे शब्दांचा हा पूर्ण उतारा भागवतांनी गाळला, त्यामुळे त्यांच्या भाषांतरात मात्र हे प्रकरण आधीच्या परिच्छेदासोबत संपतं. त्या आधीच्या परिच्छेदातली शेवटची वाक्यं इंग्रजीत अशी आहेत : "Do not stay to be an overseer of the poor, but endeavor to become one of the worthies of the world." भागवत याचं भाषांतर असं करतात : "गोरगरिबांचे केवळ निरीक्षक किंवा पर्यवेक्षक होऊन राहू नका. जगातल्या मान्यवरांपैकी एक आपण बनावे म्हणून झटा." इथे 'worthies of the world'चा अर्थ 'जगातील मान्यवर' असा लावणं म्हणजे थोरोच्या आरवणाऱ्या कोंबड्याला मारून टाकून त्याच्यात भुसा भरून मग आणखी रंगीबेरंगी पिसं जोडून वेगळाच बेढब पक्षी एशियाटिक लायब्ररीतल्या वरून काचा असणाऱ्या छान लाकडी कपटात ठेवण्यासारखं आहे.

"गरीबांवर देखरेख करणारा मुकादम व्हायला जाऊ नका, त्यापेक्षा या जगासमोर मोलाच्या जगण्याचा दाखला उभा राहील यासाठी प्रयत्न केलेला बरा"- असं किंवा आणखी कसंही या वाक्याचं भाषांतर करता येईल. भागवतांनी गाळलेल्या सादीच्या उताऱ्यातली, म्हणजेच थोरोने प्रकरण संपवण्यासाठी वापरलेली ओळ काय आहे, ते पाहिलं की कोंबड्याचा खून झाल्याबद्दल खात्रीच पटेल. ती ओळ मराठीत अशी आहे : "तुमच्याकडे मुबलक संपत्ती असेल तर खजुराच्या झाडासारखे उदार व्हा. पण तुमच्याकडे असं देण्यासारखं काही नसेल तर सुरूच्या झाडासारखे आझाद व्हा, स्वतंत्र माणूस व्हा."

जगणं मोलाचं व्हायला हवं, स्वतंत्र व्हा, बाकी जगाची मान्यता गेली खड्ड्यात- हे कुठे आणि 'जगातील मान्यवरांपैकी एक बनण्यासाठी झटा' हे कुठे!

'वॉल्डनकाठी विचारविहार' या पुस्तकाची दुसरी आवृत्ती २०२१ साली आली. ती मीना वैशंपायन यांनी संपादित केली. वैशंपायन यांनी भागवतांच्या साहित्यावर पीएच.डी. केलेय, त्या स्वतः एशियाटिक लायब्ररी मानद उपाध्यक्ष होत्या. दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत वैशंपायन म्हणतात : "अनेक ठिकाणी बाईंनी त्या, त्या मूळ शब्दाची अर्थच्छटा जाणून घेत योग्य शब्दांचा वापर केला आहे. शिवाय कितीतरी शब्द बोलीभाषेतील किंवा ग्रामीण लोकांच्या वापरात असणारे वापरलेले आहेत." यावर काय बोलणार! या पुस्तकात कुठल्या ग्रामीण लोकांची भाषा वापरलेय, ते संपादिकेलाच माहीत! 'पहाटे अगदी लवकर' असा उल्लेख असेल तिथे भागवतांनी 'पंच पंच उषःकाली' असं लिहिलंय, बाकी 'दोहले, मंथले' हे वर दिलंच; गोठ्याची घरावर सावली पडू शकते, ही यांची ग्रामीण प्रतिमा! अशी किती उदाहरणं नोंदवायची. शिवाय, इथे फक्त पहिल्या शंभर पानांमधलीच प्रातिनिधिक उदाहरणं दिली आहेत. हे पुढे आणखी दोनशे-सव्वादोनशे पानं सुरू राहातं. 

तरी 'वॉल्डनकाठी विचारविहार'ची आधीची आवृत्तीही खपली, आताची नवीन आवृत्तीही खपतच आलेय. त्यातून शेवटी सगळे मान्यवर होऊन राहिले- लेखक, भाषांतरकार, संपादक, प्रकाशक आणि अर्थातच सुजाण मराठी वाचकही! 

फक्त इतरांना जाग आणण्यासाठी आरवायचं का?

दुर्गा भागवत

आता जरा भाषांतरित संहितेबाहेर येऊन भाषांतराच्या काळाकडे पाहून थांबू. दुर्गाबाईंचं भाषांतर १९६५ साली प्रकाशित झालं. मराठी अनियतकांची चळवळ तेव्हा जोमात होती. त्याच्या दोन वर्षं आधी, १९६३मध्ये अशोक शहाणे यांनी 'आजकालच्या मराठी साहित्यावर 'क्ष' किरण' हा लेख लिहून दाणादाण उडवली. १९६८ साली भालचंद्र नेमाडे यांचा 'हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो का?' हा तसाच जहाल लेख प्रसिद्ध होऊन गाजला. शहाणे, नेमाडे, असे लोक, किंवा दुसरीकडे 'नवी क्षितिजे'सारखं वैचारिक नियतकालिक काढलेले विश्वास पाटील, नाना जोशी किंवा थोडं नंतरच्या पिढीतले (कालांतराने दलित पँथरचे सहसंस्थापक झालेले) राजा ढाले, इत्यादी मंडळी एशियाटिक लायब्ररीत येऊन-जाऊन-बसून असायची. दुर्गाबाईंसकट यातल्या अनेकांनी मराठी साहित्यातल्या अनेकांवर वेळोवेळी जहाल टीका केली. ढाल्यांनी 'चिमणे, चिमणे! दार उघड!' या १९६८ सालच्या नर्मविनोदी ढंगातल्या लेखात साठीच्या जवळ आलेल्या दुर्गाबाईंचं वर्णन 'अँग्री यंग वूमन' असं केलं होतं (पुढे चार-पाच वर्षांतच ढाल्यांच्या जहाल विधानांनी मात्र दुर्गाबाई दुखावल्या!) एका अर्थी ही मंडळी म्हणजे तेव्हाचे आरवणारे कोंबडेच होती. पण एकमेकांना जाग आणण्यासाठी ते फारसे आरवले नाहीत, हेही खरं आहे. 

'वॉल्डनकाठी विचारविहार'सारखं पुस्तक या वर्तुळाबाहेरच्या कुणी लिहिलं असतं आणि चुकून ते या मंडळींच्या वाचनात आलं असतं, तर त्या काळात त्यांनी पुस्तकासोबत संबंधित लेखक-व्यक्तीलाही रद्दीत जमा केलं असतं. पण दुर्गा भागवतांबाबत असं झालं नाही. कालांतराने राजा ढाले आणि दुर्गा भागवत यांचे काही विधानांवरून वाद झाले, पण ते दुर्गाबाईंच्या मुख्य कामाशी संबंधित नव्हतं, त्यामुळे त्यांच्या विदुषीपणाच्या नावलौकिकावर त्यातून ओरखडा उमटला नाही. दुर्गाबाईंनी मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून इरावती कर्व्यांपर्यंत काही लोकांच्या विद्वत्तेवर शंका घेणारी शेरेबाजी केली. त्यात तथ्यांना धरून टीका नव्हती. 'वॉल्डनकाठी विचारविहार'बद्दलचे मुद्दे खुद्द भागवतांच्या विद्वत्तेविषयी गंभीर शंका निर्माण होतील, असे आहेत. दुर्गाबाईंच्या इतर काही बाबतीतल्या कामाचं महत्त्व मान्य करूनही या शंका मांडायला नि मान्य करायला हरकत नाही. नाहीतर, सुरुवातीला उल्लेख केलेल्या बुजगावण्यांपुढेच झुकत बसल्यासारखं होईल.

काही जुन्या नोंदी :

नवीन नोंदींच्या माहितीसाठी : 

ऐच्छिक वर्गणीसाठी :
  

२४ ऑगस्ट २०२६

राखणदार यात्रा : देरसू ते बारसू

देरसू

सूर्य उगवला. एखाद्या सजीवाप्रमाणे आधी त्याची एक कडा पाण्यावर डोकावत आली, आणि मग पूर्ण सूर्य क्षितिजावर दिसू लागला. मग स्वर्गापर्यंत चढत जाण्याचा त्याचा रोजचा प्रवास सुरू झाला.

"किती सुंदर दिसतंय!" मी भारावून म्हणालो.

"हा सगळ्यांत महत्त्वाचा माणूस. तो गेला की बाकीचं सगळं जाणार", देरसू म्हणाला. थोडं थांबून तो पुढे बोलायला लागला : "पृथ्वीही माणूस..." ईशान्येकडे बोट करून म्हणाला- "तिचं डोकं तिथे", मग नैऋत्येला बोट करून म्हणाला- "पाय तिकडे." मग म्हणाला- "आग नि पाणी ताकदीची माणसं. आग नि पाणी गेले की सगळ्या गोष्टी गेल्या.. सगळं संपलं."

रेखाचित्र: व्लादिमीर आर्सेन्येव्ह (बहुतेक)
[वादळ सुटलेलं तेव्हा] देरसू म्हणाला, "का चिडलाय? आपण त्याला दुखावलं का?"

"कोणाला?" कझाक सैनिकांनी विचारलं.

देरसू म्हणाला, "त्याला रस्कीमधे (रशियन भाषेत) काय म्हणतात ते मला ठाऊक नाही. तो लहान देव, लहान माणूस, डोंगर सगळा जिवंत आहे. तो वारा फुंकू शकतो, झाडं मोडू शकतो. आम्ही त्याला कांगू म्हणतो."

कॅप्टन व्लादिमीर आर्सेन्येव्ह या रशियन लष्करी अधिकाऱ्याला १९०२च्या दरम्यान सायबेरियाच्या वाळवंटातील काही भागांचे नकाशे तयार करायला पाठवण्यात आलं. त्याच्यासोबत मोजक्या सैनिकांचं पथकही होतं. या प्रवासात त्यांना देरसू उझाला हा नानई जमातीतला माणूस भेटला. जंगलात शिकार करून तो गुजराण करायचा. देरसूची सृष्टीविषयीची नि सभ्यतेविषयीची दृष्टी आर्सेन्येव्हवर भुरळ घालणारी ठरली. मग त्याने देरसूसोबत घालवलेल्या दिवसांविषयी पुस्तक लिहिलं, त्यातून वरचे दोन प्रसंग नोंदवले (इंग्रजी भाषांतर : माल्कम बर, १९४१, ई. पी. डटन अँड कंपनी. रेखाटनही याच आवृत्तीतलं). जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांनी १९७५ साली या पुस्तकावर तयार केलेला ‘देरसू उझाला’ हा चित्रपट प्रसिद्ध आहे. परंपरा आणि आधुनिकता, गाव आणि शहरं, निसर्ग आणि माणूस यातल्या द्वंद्वावर (किंवा परस्परावलंबित्वावर) भाष्य करणारं देरसूचं कथन कोकणात अलीकडे निघालेल्या ‘राखणदार यात्रे’च्या निमित्ताने आठवतं.

राखणदार यात्रा आणि मुंबईचा विस्तार

गेली सुमारे दोनेक वर्षं मुंबईपासून तळकोकणापर्यंत ‘शाश्वत कोकण परिषदे’ने काही परिसंवाद घेतले. पश्चिम किनारपट्टीला लागून असलेल्या या प्रदेशात येऊ घातलेल्या विविध विकासप्रकल्पांविषयी स्थानिक पातळीवर चर्चा घडवून आणणं, हा यामागचा उद्देश. प्रत्येक ठिकाणी परिसंवादांचे निमंत्रक वेगवेगळे राहिले असले आणि यामागे कोणतीही एक विशिष्ट संस्था वा संघटना नसली तरी, काही व्यक्तींचा गट त्यात कळीची भूमिका निभावताना दिसतो. यात मुंबईपासून सिंधुदुर्गापर्यंत ठिकठिकाणची मंडळी सहभागी आहेत. याच गटाच्या वतीने अलीकडे ‘राखणदार संघ’ नावाचा एक मंच स्थापन करण्यात आला. या मंचाच्या वतीने १३ जूनपासून ‘राखणदार यात्रा’ हा उपक्रमाची सुरुवात झाली.

राखणदार यात्रेचा पहिला टप्पा गोवा-कर्नाटक सीमेवरील कणकुंबी या गावापासून सिंधुदुर्गातील बांदा शहराजवळच्या सोनुर्ली या गावापर्यंत होता. त्यानंतर दुसरा टप्पा जुलै महिन्यात रेडी ते तळाशीळ या सिंधुदुर्गातील गावांदरम्यान झाला. तिसरा टप्पा १५ ते १७ ऑगस्ट असे तीन दिवस मुणगे (तालुका- देवगड, जिल्हा- सिंधुदुर्ग) ते बारसू (जिल्हा-रत्नागिरी) या गावांदरम्यान पार पडला. यातील तिसऱ्या टप्प्यात तिसऱ्या दिवशी पूर्ण वेळ या यात्रेसोबत प्रवास करून लिहिलेला हा वृत्तान्त आहे. 

राजापूर तालुक्यातील आडिवरे इथे यात्रेकरूंनी आदल्या दिवशी रात्री मुक्काम केला होता. त्यामुळे तिसऱ्या दिवसाची सुरुवात या गावातील महाकाली मंदिरात दर्शन घेऊन आणि नारळ वाढवून झाली. ‘कोकणी रानमाणूस’ या यू-ट्यूब चॅनलद्वारे लोकप्रियता लाभलेले प्रसाद गावडे, गेली सुमारे वीस वर्षं या कोकण पट्ट्यातील विविध पर्यावरणविषयक प्रश्नांवर काम करत आलेले सत्यजित चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते शशी सोनावणे, लेखक अविनाश उषा वसंत, वन्यजीव संवर्धनासंबंधी काम करणारे मल्हार इंदुलकर, योगेश कांबळे, विनीत विचारे, यांच्यासोबतच इतरही पंधराएक मंडळी या वेळी हजर होती. यात्रेच्या निरनिराळ्या टप्प्यांवर, निरनिराळ्या दिवशी यात इतरही व्यक्ती सहभागी होत आल्या. 

‘राखणदार यात्रा’ आडिवऱ्यातून वाडा-तिवरे या गावी असलेल्या कांदळवनाच्या दिशेने गेली (या कांदळवनातील गाऱ्हाण्याचा व्हिडिओ.) आणि तिथून जवळच असलेल्या आंबोळगडच्या समुद्रकिनाऱ्यावर उभं राहून यात्रेत सहभागी मंडळींनी राखणदार प्रवृत्तीला साद घालत निसर्ग वाचवण्यासंदर्भात प्रतिज्ञा केली (खालचा व्हिडिओ).

अशा समुद्रकिनाऱ्यांजवळची कांदळवनं, म्हणजेच खारफुटीची जंगलं सागरी जैवविविधता टिकवण्यासोबतच किनाऱ्यावरील रहिवाशांना नैसर्गिक सुरक्षाकवच पुरवतात. महाराष्ट्रातील कांदळवनांमध्ये सुमारे वीस निरनिराळ्या प्रजातींच्या वनस्पती आढळतात. या संदर्भात संवर्धनाकरता महाराष्ट्र शासनाने २०१२ साली ‘कांदळवन कक्ष’ सुरू केला. पण प्रत्यक्षात मुंबईसारखं शहर वाढत जाताना कांदळवनांमधली हजारो झाडं वेळोवेळी कापली जात आली आहेत. 

आंबोळगड समुद्रकिनाऱ्याजवळच्या कांदळवनात प्रार्थना (फोटो : रेघ)

डिसेंबर २०२५मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यावर वर्सोवा-भाईंदर किनारी मार्गासाठी खारफुटीमधली सुमारे ४५ हजार झाडं कापायचा मार्ग मोकळा झाला. या पट्ट्यात येणाऱ्या चारकोप भागातील कोळी लोकांच्या मासेमारीला याचा जबर फटका बसेल, तसंच याचे खुद्द शहरी रहिवाशांवरही विपरित परिणाम होतील, याबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. मुंबईत येणाऱ्या पुरांपासून वाढत्या उष्णतामानापर्यंत विविध समस्यांना कांदळवनाच्या विनाशामुळे आणखी गंभीर रूप येईल, असं ते म्हणतात. (‘The environmental costs of replacing mangroves with a road’, Mongabay India, 21 January 2026). मुंबई उच्च न्यायालयानेही २०१८ साली दिलेल्या एका जनहित याचिकेवरील निकालात, पश्चिम किनारपट्टीवरील कांदळवनं नष्ट होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कांदळवनं नष्ट करणं हे भारतीय संविधानातील अनुच्छेद २१चा भंग करणारं असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. संविधानातील अनुच्छेद २१ अंतर्गत नागरिकांना जीवनाची सुरक्षा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य या मूलभूत अधिकाराची हमी देण्यात आली. न्यायाधीश अभय ओक आणि रियाझ छागला यांनी दिलेल्या सदर निकालात म्हटलं होतं की, “कांदळवनांच्या परिसंस्थेची मानवी जीवनात अत्यंत मूल्यवान भूमिका आहे. अनुच्छेद २१नुसार नागरिकाला अर्थपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार अबाधित राहण्याकरता कांदळवनं टिकवणं आवश्यक आहे. त्यामुळे, कांदळवनांचा विनाश होत असेल आणि त्यांच्या पुनर्स्थापनेसाठी राज्यसंस्थेने पावलं उचलली नाहीत, तर तो अनुच्छेद २१चा भंग ठरेल.”

मुंबई, नवी मुंबई, यानंतर आता रायगड जिल्ह्याच्या दिशेने सुमारे १२४ गावांच्या भागात ‘तिसरी मुंबई’ वसवण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलं आणि त्यानुसार काही ठिकाणी भूसंपादनालाही सुरुवात झाली. ‘तिसऱ्या मुंबई’चं क्षेत्र नवी मुंबईपासून अलीबागपर्यंतचं सुमारे पावणेचारशे चौरस किलोमीटरांचं असल्याचं दिसतं. त्यात मोठ्या प्रमाणात खारफुटीची जंगलं आणि इतर वनक्षेत्रं आहेत. 

मुंबईचा विस्तार शेवटी कोकण किनारपट्टीच्या मुळावर उठेल, अशी भीती राखणदार यात्रेत वेळोवेळी बोलून दाखवण्यात आली. पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराचा आणि तिथे स्थानिकांकडून सुरू असलेल्या विरोधाचाही उल्लेख या वेळी झाला. वाढवण बंदराला केंद्रस्थानी ठेवून ‘चौथी मुंबई’ उभारण्याचीही योजना राज्य सरकारने आखली आहे. सुमारे साडेपाचशे चौरस किलोमीटरांचा हा परिसर असून त्यात १०७ गावांचा समावेश होतो (‘वाढवण बंदराला जोडून आकाराला येणार चौथी मुंबई’, पुढारी, १ डिसेंबर २०२५). 

कोकणी माणूस उपजीविकेसाठी मुंबईवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहात आला आहे. रोजगारासाठी मुंबईच्या दिशेने होणारं स्थलांतर कोकणात सर्रास दिसतं. अशा वेळी मग मुंबईच कोकणात आली तर काय बिघडलं, असा जटिल प्रश्न कोणी विचारू शकतं. पण उपजीविका पुरवायला हवी, तिथे महानगरीकरण पुरवणं, हा उपाय असू शकतो का- या दिशेने चर्चा आवश्यक असल्याचं राखणदार यात्रेदरम्यान स्थानिकांच्या बोलण्यातून जाणवलं. 

विकासाची संकल्पना

“आमचा विकासाला विरोध नाही, पण विकास स्थानिक लोकांच्या गरजा आणि निसर्गपूरक शक्यता लक्षात घेऊन करण्याऐवजी बड्या उद्योगांच्या सोयीने होताना दिसतो. या पार्श्वभूमीवर होणारा विरोध विकास प्रकल्पांना नसून विनाशकारी प्रकल्पांना आहे,” असा मुद्दा सत्यजित चव्हाण यांनी मांडला. वाडातिवरे इथे भंडार पुरुष देवस्थानात गाऱ्हाणं घालताना कोणीतरी ‘कोकणातील विकास प्रकल्पांचं संकट दूर होऊ दे रे म्हाराजा’ असं म्हटलं, तेव्हा त्यात ‘विनाशकारी’ अशी भर घालण्याची आठवण त्यांनी करून दिली.

तबरेझ सायेकर यांच्या कबरीपाशी प्रार्थना (फोटो : रेघ)

राखणदार यात्रेचा पुढील थांबा साखरी नाटे या गावात होता. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यात अग्रेसर असणाऱ्या या गावात मुस्लीम मच्छिमारांची संख्या मोठी आहे. एप्रिल २०११मध्ये अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनावरील पोलिसी गोळीबारात तबरेझ सायेकर या स्थानिक तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या कबरीपाशी राखणदार यात्रेतील सहभागींनी गावकऱ्यांसह प्रार्थना केली. या वेळी ‘राखणदार तबरेझ’ असा उल्लेख करून घोषणाही देण्यात आल्या. यानंतर संवादबैठक झाली.

वाढवण बंदराच्या उभारणीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी शशी सोनावणे म्हणाले, “सध्याच्या विनाशकारी विकास संकल्पनेचा परिणाम सागरी, डोंगरी आणि नागरी अशा तीन पातळ्यांवर होतो. पालघर भागात आदिवासी समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा डोंगर पोखरून समुद्रात भर टाकली जाते. त्याचा फटका समुद्रावर अवलंबून असणाऱ्या मच्छिमारांना बसतो. पुढे समुद्र शहरात घुसून नागरी रहिवाशांवरही परिणाम होतो.”

गावात रंगारी म्हणून काम करणारे फिरोझ म्हणाले, “आत्मनिर्भर भारताबद्दल सध्या बोललं जातं. पण आम्ही आत्ताच आत्मनिर्भर आहोत. आमच्या इथे एखाद्या मच्छिमाराकडे आधी एक जाळं असेल तर आता सहा जाळी झाली आहेत. या जाळं विणण्यातून रोज सहाशे ते साडेसहाशे मजुरी मिळवणारे अनेक लोक आहेत.” रंगारी म्हणूनही पंचक्रोशीत बरंच काम मिळत राहातं, त्यामुळे बाहेर जायची वेळ आली नाही, असं त्यांनी प्रस्तुत लेखकाला सांगितलं. 

एक बुजुर्ग संवादबैठकीमध्ये म्हणाले, “अणुऊर्जा प्रकल्पांच्या बाजूने प्रगत देशांनीही शंभर टक्के कौल दिलेला नाही, मग आमच्यासारख्या लोकांवर हे प्रकल्प का थोपवले जातात? आमची प्रशासनाला एकच सूचना आहे- आमचा विकासाला विरोध नाही. मासे-आंबा-काजू याच्याशी संबंधित प्रकल्प आणलेत तर आम्ही स्वागतच करू. पण आत्ता आमच्या हातात असलेला रोजगार अजून बळकट होईल, असे प्रकल्प न आणता आत्ता हातात असलेला रोजगार काढून मग पर्याय देऊ असं सांगू नका.” 

साखरी नाटे इथे संवादबैठकीनंतर राखणदार यात्रेतील कार्यकर्त्यांनी जेट्टीवर जाऊन गिटारीच्या साथीमध्ये एक गाणं म्हटलं. “गाव सोडूचो नाय, जंगल सोडूचो नाय, माय-माती सोडूचो नाय, लढाई सोडूचो नाय. बिरसा तंट्या हाक मारिता लढाई दर्यासाठी, मच्छिमार यावा, दलित यावा, यावा आदिवासी.” या वेळी मोठ्या लोकांसोबतच शाळकरी मुलंही त्यांच्या आसपास कुतूहलाने जमा झाली होती. हे गाणं ओडिशापासून मध्य भारतातल्या आदिवासी पट्ट्यात हिंदीसदृश रूपात गाजलेलं आहे. इथे त्याला स्थानिक भाषेचा आणि तपशिलांचा साज चढवण्यात आला. राखणदार यात्रेने स्वीकारलेली ‘जल-जंगल-जमीन’ ही घोषणाही अशीच मध्य भारतातील आदिवासी पट्ट्यातून आलेली आणि इथे पहिल्यांदाच ठळकपणे वापरली गेलेली दिसते.   


पुढे राखणदार यात्रा देवाचे गोठणे इथल्या सड्यावर गेली. या सड्यावर दीपकडी (एककांडी) आणि कापरी कमळ ही दुर्मिळ फुलं फुलली होती. यातली दीपकाडी ही वनस्पती केवळ कोकणातच सापडते. नागपंचमीला नागाच्या प्रतिमेसमोर वाहिलं जाणारं हे फूल आहे (१७ तारखेलाही नागपंचमी होती). ‘सडे’ म्हणजे जांभ्या दगडाचे वरवर पाहता ओसाड वाटणारे माळ. पावसात त्यावर काही छोट्या वनस्पती फुलून येतात. इथे उल्लेख देवाचे गोठणे, बारसू, अशा काही गावांमधले सडे कातळशिल्पांमुळेही अलीकडे प्रसिद्धीच्या झोतात आले. इथला जांभा दगड पाणी शोषून जमिनीत मुरवतो, साठवतो आणि त्यातून जलस्त्रोतांना पाण्याचा टिकाऊ पुरवठा होत राहातो. स्वाभाविकपणे बराच जीवनव्यवहार अप्रत्यक्षपणे या सड्यांचे लाभ मिळवत असतो. 

देवाचे गोठणेमधील देवराईत हसळा देवीचं मंदिर आहे. तिथेही राखणदार यात्रेच्या वतीने नारळ वाढवून गाऱ्हाणं घालण्यात आलं. या देवळाशी संबंधित दंतकथा आणि श्रद्धेवर आधारित अनुभवही गावकऱ्यांनी सांगितले. आपापल्या श्रद्धेनुसार या अनुभवांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, पण यातून निसर्गरक्षणाबद्दलचं एक “नैतिक आवाहन” वातावरणात टिकून राहातं, असं मत सत्यजीत यांनी नोंदवलं. आधी या मंदिराचं बांधकाम चिऱ्याचं नि कौलांचं होतं, पण अलीकडे त्यावर आधुनिक गिलावा आणि मेटल टाइलचं छप्पर असं कलम झालेलं दिसतं.

यानंतर यात्रा सोलगाव इथे गेली. तीन वर्षांपूर्वी सोलगाव, बारसू, देवाचे गोठणे, गोवळ, धोपेश्वर, धाऊलवल्ली, इत्यादी गावांनी मिळून ‘रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ या कंपनीच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला यशस्वीरीत्या विरोध केला. (तीन भारतीय सरकारी ऊर्जा कंपन्या आणि आखातातील दोन तेल कंपन्या यांचा हा संयुक्त उपक्रम होता). त्या वेळी पोलीस कारवाईसाठी आले असताना त्यांच्या मार्गात आडव्या झालेल्या स्थानिक स्त्रियांची आणि नागरिकांची छायाचित्रं, तसंच लाठीमाराचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे हा विषय मुख्यप्रवाही माध्यमांमध्ये काही दिवस गाजला. (जुनी नोंद : 'पाडा'तले प्रश्न, पालघर, बारसू आणि पश्चिम पापुआ). त्या आंदोलनाच्या आठवणी जागवून कार्यकर्त्यांनी इथल्या लोकांचे आभार मानले. गावातील गांगेश्वर मंदिरात संवादसभा भरली. “राजापूरच्या जनतेने राखणदार प्रवृत्ती दाखवून विनाशकारी प्रकल्प थोपवून धरले, त्यामुळे ते आमच्यापर्यंत (सिंधुदुर्गात) आले नाहीत. एकदा ही कीड लागली तर ती खालपर्यंत जाईल,” असं प्रसाद म्हणाले. 

सोलगाव इथल्या गांगेश्वर मंदिरातील संवादबैठक (फोटो: रेघ)

या वेळी गावपातळीवर असणाऱ्या रोजगाराच्या शक्यतांबद्दलही मत मांडलं गेलं. वावडिंग या औषधी वनस्पतीची फळं विकून काही स्थानिक लोकांनी २०-३० हजारांपर्यंत उत्पन्न कमावल्याचा अनुभव पंडित नावाच्या ज्येष्ठ व्यक्तीने नमूद केला. या निसर्गपूरक उद्योगांबाबत प्रशिक्षण देऊन जागरूकता निर्माण करायला हवी, अशी सूचना त्यांनी केली. चंद्रकांत बंडबे यांनी गावाच्या परिसरात सत्तर ते ऐंशी प्रजातींच्या औषधी वनस्पती असल्याचं सांगितलं. ते गेली अनेक वर्षं या संदर्भात माहिती गोळा करत आले आहेत. “कोव्हिडच्या वेळी बंडबेकाकांनी या वनस्पतींच्या माध्यमातून गावाचं आरोग्य निरोगी ठेवण्याची मोठी भूमिका निभावली,” असं एका तरुणाने संवादसभेदरम्यान सांगितलं. (याचा अर्थ रोगप्रतिकारक लशी घेतल्या नाहीत, असा नाही). 

बारसू

राखणदार यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचा शेवट संध्याकाळी बारसू (जिल्हा- रत्नागिरी) या गावात झाला. सोलगाव ते बारसू यातलं अंतर तेरा-चौदा किलोमीटरांचं आहे. या रस्त्यावर ‘तथास्तु ग्लोबल व्हेन्चर्स’ या कंपनीने प्रत्येकी सुमारे दोन-अडीच गुंठ्याचे पंचावन्न भूखंड विक्रीला काढले आहेत. त्यांचे ‘सात्त्विक जीवन जगा’, ‘स्वतःमधली शांतता शोधा- दररोज’, अशा आशयाच्या इंग्रजी ओळी असणारे फलक रस्त्याला लागून दिसले (सोबतच्या छायाचित्रात संपर्काचा तपशील खोडला आहे). या प्रकल्पाच्या व्हिडिओ जाहिरातींमध्ये ‘फाइंड यूअर सोल इन सोलगाव’ अशी ओळ आहे! यातून बाहेरगावच्या ‘गुंतवणूकदारां’ना साद घातलेली आहे. पण या परिसरात रिफायनरीविरोधी आंदोलनावेळी घडलेल्या घटना किंवा बारसूत येऊ घातलेला अणुऊर्जा प्रकल्प, या पार्श्वभूमीवर अशा जाहिराती अजाणतेपणी स्वतःचाच उपहास करणाऱ्या वाटतात.

सोलगाव-बारसू रस्त्यावर (फोटो : रेघ)

याआधी राखणदार यात्रा देवगड (जिल्हा- सिंधुदुर्ग) आणि पूर्णगड (जिल्हा- रत्नागिरी) या गावांमधून जाऊन आली. या दोन गावांसह बारसूमध्ये एकूण २५ हजार मेगावॅट क्षमतेचे तीन अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहेत. संसदेने डिसेंबर २०२५मध्ये ‘सस्टेनेबल हार्नेसिंग अँड अ‍ॅडव्हान्समेन्ट ऑफ न्युक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्फॉर्मिंग इंडिया (शांती)” [भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती] विधेयक मंजूर केलं. त्यामुळे अणुऊर्जा क्षेत्रामधील खाजगी गुंतवणुकीला आता मोकळी वाट मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाने मे २०२६मध्ये विविध कंपन्यांशी सामंजस्य करार केले. त्यानुसार, देवगडमध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ही सरकारी कंपनी ७,२०० मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प उभा करेल, रिलायन्स इंडस्ट्रीज पूर्णगडमध्ये तितक्याच क्षमतेचा प्रकल्प उभारेल आणि बारसूमध्ये अदानी पॉवर ६,००० मेगावॅटचा प्रकल्प उभारेल, असं सध्या ठरलं आहे (‘Maharashtra signs MoUs for generating 25,000 MW from nuclear power’, Hindustan Times, 20 May 2025). पण तेलशुद्धीकरण प्रकल्पाला झालेला विरोध बघता भविष्यात असेच प्रकल्प इथे आणले, तर आणखी संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. 

राखणदार यात्रा हळूहळू मुंबईच्या दिशेने सरकत जाणार आहे. आधी सुटे-सुटे संघर्ष अनुभवलेल्या या पट्ट्यात भविष्यातील संघर्षाचं स्वरूप एकसंध असावं, तरच राज्यसंस्था स्थानिक लोकांचं म्हणणं ऐकून घेईल, असं मत दोन्ही संवादबैठकांमध्ये व्यक्त झालं. 

बारसू इथे सापडलेल्या प्रागैतिहासिक कातळशिल्पांपाशी येऊन राखणदार यात्रेचा तिसरा टप्पा संपला. एक माणूस आणि दुतर्फा दोन वाघ, अशा स्वरूपाचं एक कातळशिल्प तिथे आहे. या आकृत्या आपल्या सरासरी उंचीच्या नजरेतून सहजपणे कळत नाहीत. उंचावरून कळतात. पण अजून त्यांचे अर्थ अभ्यासकांना पुरेसे स्पष्ट झालेले नाहीत. या भागातल्या आदिम संस्कृतीच्या या खुणा असल्याचं मानलं जातं. त्याच धारणेला मध्यवर्ती ठेवून इथल्या संस्कृतीमधील ‘राखणदार प्रवृत्ती’ला साद घालण्याचा आपला प्रयत्न असल्याची भावना ‘राखणदार यात्रे’च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

बारसू इथल्या कातळशिल्पापाशी राखणदार यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता

यात्रेची दिशा

पर्यावरणाच्या प्रश्नांवर यात्रा / पदयात्रा काढून लोकसंवाद साधण्याचे प्रयत्न भारतात याआधीही झाले आहेत. गांधीविचारातून प्रेरणा घेऊन (विनोबा भाव्यांचे अनुयायी) सुंदरलाल बहुगुणा यांनी १९८०च्या दशकारंभी काश्मीर ते कोहिमा अशी हिमालयातून एक पदयात्रा काढली. त्याच दशकाअखेरीला महाराष्ट्रात नवापूर ते गोवा अशी ‘पश्चिम घाट बचाव मोहिमे’ची पदयात्राही गाजली. १९९०च्या दशकारंभी आंध्र प्रदेश आणि ओडिशा या दरम्यान ‘वन्य प्रांत चैतन्य यात्रा’ काढण्यात आली. ही चळवळीची रीत गांधीविचारातून आलेली आहे, तसंच त्यातलं संस्कृतीबद्दलचं आवाहनही प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे त्याच विचारातून आलेलं आहे. गाव हे राजकीय-अर्थकारणाच्या केंद्रस्थानी ठेवणं, सांस्कृतिक खुणा राजकीय व्यवहारात धर्म-जातीपलीकडचं प्रतीक म्हणून वापरण्याचा प्रयत्न (गांधींचं ‘रामराज्य’), तसंच उपजीविकेची साधनं परिसरातून शोधण्याला प्राधान्य देणारं अर्थकारण (बुद्धविचारापासून गांधींपर्यंतच्या प्रेरणा सांगणारी ई. एफ. शुमाकर यांचं ‘स्मॉल इज ब्यूटिफूल’ ही मांडणी), इत्यादी सूत्रं त्यात दिसतात.

गांधी हयात असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तींनी यातील काही अंतर्विरोध दाखवले. गांधींचे शिष्य असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंनी देशाचं पंतप्रधानपद स्वीकारल्यावर भिन्न विकासाची वाट चोखाळली. हे सर्व वादविवाद वेगळे दखलपात्रच आहेत. पण या घडामोडींना पाऊण शतकाचा काळ उलटून गेला आहे. तंत्रज्ञानापासून बाजारपेठेपर्यंत अनेक बाबतीत बरेच बदलही झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या अंतर्विरोधांकडे नव्याने पाहण्याची गरज कायमच असते. या नव्याने पाहण्यातसुद्धा अंतर्विरोध नसतात असं नाही. खुद्द राखणदार यात्रेमध्येही काही वेळा असे विचारांचे आणि व्यवहारांचे अंतर्विरोध दिसू शकतील. पण त्यातला सध्याचा मुद्दा अटीतटीचा आहे. कोकण किनारपट्टीत येऊ घातलेल्या अणुऊर्जेपासून खाणकामांपर्यंतच्या विविध प्रकल्पांचा प्रतिकार करणं, हे त्यात स्वाभाविकपणे प्राधान्यावर आहे.

‘शाश्वत कोकण परिषदे’ने २०२४ सालच्या निवडणुकांवेळी चार पानांचा एक जाहीरनामा काढला. त्यात ‘काय नको’ हे सांगताना ‘काय हवं’ याबद्दलही त्रोटक सूचना होत्या. जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असलेला इथला सुमारे ६० ते ७० टक्के भाग ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ असल्याचं माधव गाडगीळ आयोगानेही (२०११) नमूद केलं होतं. त्यामुळे इथे खाणकाम, मोठे ऊर्जाप्रकल्प विध्वंसक ठरतील; त्याऐवजी इथे निसर्गपूरक उद्योजकतेची वाट चोखाळावी, त्याच्या निर्णयप्रक्रियेत स्थानिकांचा अधिक सहभाग असावा, इत्यादी शिफारसी आयोगाने केल्या. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. राखणदार यात्रेची दिशा प्रतिकाराच्या पलीकडे पर्यायी विकासदृष्टीकडेही जाऊ पाहते. आत्ताही त्याबद्दल अनौपचारिकपणे बोललं जात असलं तरी त्याची आणखी सविस्तर मांडणी आवश्यक वाटते. एखादी गोष्ट ‘जतन’ करायची म्हणजे काय करायचं, परंपरेतलं काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं, याचा ‘जतनविचार’ मांडून कदाचित ते शक्य होईल. (असा एक प्रयत्न ‘परंपरेचं अरण्य आणि आधुनिकतेचं अभयारण्य’ या एका भाषांतरित पुस्तकाला जोडलेल्या दीर्घ टिपणात केला- ‘अबुझमाडचे अनुनाद’, नरेन्द्र, पपायरस प्रकाशन, २०२५). वर उल्लेख केलेल्या संभाव्य अंतर्विरोधांची, तसंच विचारसरणीसारख्या मुद्द्यांची दखल त्यात प्रांजळपणे आणि चिकित्सकपणे घेणं उपयोगी ठरेल.

बाकी, देरसूला सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी ‘कांगू’ साद घालत होता, तसा कोकणात ‘राखणदार’ साद घालतो, अशी धारणा आहे. याकडे मिथक म्हणून पाहायचं ठरवलं तरीही ती साद ऐकून त्यावर प्रतिसाद तरी द्यायला हरकत नसावी.

अकिरा कुरोसावा यांच्या चित्रपटातलं दृश्य
हा लेख 'साधना' साप्ताहिकाच्या २९ ऑगस्ट २०२६ रोजीच्या अंकातही प्रकाशित झाला आहे. 

जुन्या पूरक नोंदी-

ऐच्छिक वर्गणीसाठी : 

०१ ऑगस्ट २०२६

'काफ्काचा शेवटचा खटला' : लेखक, अस्मिता, बाजार यांचा गुंता

Picador, 2018. Cover Design : Ami Smithson

फ्रान्झ काफ्का (३ जुलै १८८३ - ३ जून १९२४) हा ज्यू धर्मात जन्मलेला आणि जर्मन भाषेत लिहून गेलेला लेखक जन्मापासून बहुतांश काळ प्राग या चेक भाषकांची बहुसंख्या असणाऱ्या शहरात राहिला. इथल्याइथे तीन निरनिराळ्या ओळखी त्याच्याशी जोडल्या गेल्या. 

काफ्काचं लेखन वाचलेल्यांना त्याच्या चरित्राबद्दलच्या काही प्राथमिक गोष्टी माहीत असतात, पण इतर वाचकांसाठी थोडक्यात असं : काफ्का हयात असताना त्याचं तुलनेने थोडंच साहित्य प्रकाशित झालं. दोन-चार कथासंग्रह, इतकंच. तो अशा प्रकाशनासाठी फारसा उत्सुक नसायचा, याबद्दलच्या आख्यायिका किंवा थोडंफार वस्तुस्थितीतून आलेलं म्हणणं ठिकठिकाणी येत राहातंच. मरण्याआधी त्याने त्याचं मागे उरलेलं सर्व अप्रकाशित लेखन (कथा, कादंबऱ्या, त्याने इतरांना पाठवलेली पत्रं, रोजनिश्या) जाळून टाकावं, अशी सूचना त्याचा घनिष्ठ मित्र मॅक्स ब्रॉड याच्यासाठी लिहून ठेवलेल्या टिपणात केली. पण ब्रॉडने आपल्या मित्राची ही शेवटची इच्छा अंमलात आणली नाही. उलट, त्याने काफ्काची हस्तलिखितं जपून ठेवली, मग त्याचं संपादन करून काफ्काच्या तीन अपूर्ण कादंबऱ्या, कथासंग्रह, रोजनिश्यांचा खंड, पत्रांचे खंड, असं साहित्य प्रकाशित होत राहिलं, इतर भाषांमध्ये जात राहिलं. विविध कारणांमुळे ते पसरलं आणि आधुनिक काळातला एक महत्त्वाचा लेखक म्हणून काफ्काचं स्थान पक्कं झालं. आता वेगवेगळ्या परिस्थितीत त्याची आठवण काढली जाते. कधी वाजवी, तर कधी अवाजवी वर्णनंही केली जातात.

जर्मनीतल्या नाझी फौजांची पावलं तत्कालीन चेकोस्लोव्हाकियापर्यंत पोचली, तेव्हाच (१९३९) ब्रॉडने प्रागचा निरोप घेतला आणि तो तत्कालीन पॅलेस्टाइनमधल्या तेल अवीव्हला जाऊन स्थायिक झाला. त्याच्यासोबत अर्थातच त्याची सर्व साहित्यसंपदा आणि काफ्काची अनेक हस्तलिखितंही तिकडे गेली. कालांतराने इस्राएलची निर्मिती झाली. पुढे ब्रॉडने स्वतःची साहित्यसंपदा त्याची सचिव इस्थर हॉफकडे सोपवली, मग इस्थरच्या निधनानंतर तिची मुलगी इव्हा हॉफकडे या कागदपत्रांचा ताबा आला. इस्थर नि इव्हा दोघीही लहरीपणे वागत असत. त्यांनी व्यक्तिगत आर्थिक लाभाकरता ही कागदपत्रं अधूनमधून विकत आल्याचा आरोप झाला. १९७०च्या दशकात इस्राएली सरकारने पहिल्यांदा या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली. पण तेव्हा न्यायालयाने इस्थर हॉफच्या बाजूने निकाल दिला. दरम्यान, तिने १९८८ साली 'द ट्रायल' या काफ्काच्या कादंबरीचं हस्तलिखित लिलावात काढून जर्मनीतल्या एका अभिलेखागाराला २० लाख डॉलरांना विकलं.

या हस्तलिखितांची मालकी हॉफसारख्या खाजगी व्यक्तीकडे ठेवावी की कागदपत्रांचं महत्त्व लक्षात घेता ती इस्राएली राष्ट्रीय ग्रंथालयाकडे जायला हवीत, असा वाद २००८च्या दरम्यान इस्राएलमधील सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. दरम्यान, जर्मनीतील मरबाख इथल्या साहित्य अभिलेखागाराने या खटल्यात उडी घेतली. मग यात आणखी अस्मितांचे धागे गुंतले. काफ्का धर्माने ज्यू असल्यामुळे ज्यू राज्य म्हणून निर्माण झालेल्या इस्राएलचा त्याच्यावरचा दावा मोठा, असं एका बाजूचं म्हणणं. तर, काफ्का जर्मनमध्ये लिहीत होता आणि जर्मन साहित्यपरंपरेशी त्याची जवळीक होती म्हणून जर्मनीचा त्याच्यावरचा दावा मोठा, असं दुसऱ्या बाजूचं म्हणणं. मग नाझी जर्मनीत ज्यूंचा झालेला छळ लक्षात घेता आता जर्मनीने यावर दावा करणं फिजूूल आहे, असाही सूर न्यायालयाबाहेरच्या वादांमध्ये उमटला. तर, इस्राएलला स्वतःची ज्यूराष्ट्रवादी अस्मिता अधोरेखित करण्यापुरताच काफ्का हवा आहे, प्रत्यक्षात इतकी वर्षं त्यांना काफ्काच्या साहित्यात कधी रस वाटला का नाही, असाही प्रश्न वजा आरोप नोंदवला गेला. 

या खटल्याच्या निमित्ताने एखाद्या लेखकासंदर्भात अस्मितांचे मुद्दे कसे वापरले गेले, अभिलेखागारांचं राजकारण कसं सुरू असतं, त्यातून त्या-त्या समूहाच्या धारणा घडवण्याचे प्रयत्न कसे होत असतात, आणि व्यापक बाजारपेठेचाही संदर्भ यात कसा गुंतलेला असतो, या प्रश्नांचा पसारा बेंजामिन बॅलिंट या इस्राएली पत्रकार-अभ्यासकाने लिहिलेल्या 'काफ्काज् लास्ट ट्रायल : द स्ट्रेंज केस ऑफ अ लिटररी लिगसी' (पिकेडॉर, २०१८) या पुस्तकातून उलगडतो.

काफ्काने स्वतःचं अप्रकाशित लेखन जाळायची सूचना केली असली तरी ती निरपवादपणे स्वीकारायची गरज नाही, असं ब्रॉडचं म्हणणं होतं. काफ्का  स्वतःच्या लेखनाविषयी साशंक असायचा, त्यामागे परिपूर्णतेविषयीचं त्याचं पछाडलेपण कारणीभूत होतं. पण त्याच्याकडून मिळालेल्या गोष्टी छापून आल्यावर त्याला समाधानही वाटायचं, असं ब्रॉडने यावर नमूद केलं आहे. शिवाय, खरोखरच ही कागदपत्रं जाळली जावीत, असं काफ्काला वाटलं असेल तर त्या सूचनेची खरोखर अंमलबजावणी होईल, अशा व्यक्तीसाठी त्याने यासंबंधीचं टिपण लिहून ठेवायला हवं होतं. ब्रॉड आधीपासूनच काफ्काचं साहित्य प्रकाशित व्हावं, यासाठी सतत प्रयत्नशील राहिला होता, त्यामुळे तो हस्तलिखितं नष्ट करण्याची सूचना अंमलात आणणार नाही, याची कल्पना काफ्काला नसेलच का, असाही प्रश्न या निमित्ताने नोंदवला गेला. 
 
स्वतःची अप्रकाशित हस्तलिखितं जाळण्याविषयी काफ्काने ब्रॉडला उद्देशून लिहून ठेवलेलं दुसरं टिपण (सौजन्य- इस्राएली राष्ट्रीय ग्रंथालय)

“माझ्यात आणि ज्यूंमध्ये काय साम्य आहे? माझं तर माझ्याशीही फारसं साम्य नाहीये. मी एका कोपऱ्यात गप्प उभं राहायला हवं नि श्वास घ्यायला मिळतंय यातच समाधान मानायला हवं”- असं विधान काफ्काने १९१४ साली त्याच्या रोजनिशीत केलं होतं. पण तो ज्यू धर्मविचाराचा अभ्यास करत होता. ज्यू समूहात बोलल्या जाणाऱ्या यिडिश भाषेतील लोककथा आणि नाटकं यामध्ये त्याने खूपच रस घेतला, त्याचा त्याच्यावर प्रभावही पडला. तरीही, त्या काळच्या ज्यूराष्ट्रवादी (झायनिस्ट) चळवळीशी त्याची जवळीक नव्हती. तसंच, जर्मन भाषेविषयी दुरावा दाखवणारं विधानही त्याने रोजनिशीत १९११ साली केलं. “मी आईवर (जर्मन शब्द: Mutter- मूटा) करायला हवं तसं आणि मी करू शकलो असतो तसं प्रेम केलं नाही, याचं एकमेव कारण म्हणजे जर्मन भाषेने मला तसं करण्यापासून रोखलं. ज्यू आई म्हणजे काही ‘मूटा’ नव्हे.” ब्रॉडला पाठवलेल्या एका पत्रातही काफ्काने “आपल्या बिगरजर्मन मातांकडून आजही आपल्या कानावर जर्मन भाषाच पडत असते” असं म्हटलं होतं. पण त्याने आयुष्यभर जर्मन भाषेत लिहिलं आणि त्याच्यावर प्रामुख्याने जर्मन लेखकांचा खोलवरचा प्रभाव होता.
 
इतर माणसांप्रमाणे लेखकाच्याही मनात स्वतःच्या ओळखीविषयी किंवा अस्मितेविषयी काही संभ्रम असणं आणि तो त्याच्या लेखनात उमटणं, हे स्वाभाविक मानायला बहुधा हरकत नाही. किंवा मुळातच अस्मिता निरपवादपणे एका साच्यात बसवता येते का, हाही प्रश्न आहेच. मग, स्वतःची व्याख्या व्हायला नको, अशी भूमिका घेतलेल्या काफ्कासारख्या लेखकाचं या अस्मितांच्या खेळात काय होऊ शकतं, याचा लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळतो.
 
राज्यसंस्थांच्या विचारसरणीचा मुद्दाही या प्रकरणात गुंतला होता. उदाहरणार्थ, आधी नाझी जर्मनीच्या नियंत्रणाखाली गेलेल्या चेकोस्लोव्हाकियात दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील कम्युनिस्ट सरकार आलं. त्यांनी काफ्काचं साहित्य प्रतिक्रांतिवादी ठरवून त्यावर बंदी घातली. त्यामुळे काफ्का आयुष्यभर बहुतांश काळ ज्या प्राग शहरात राहिला तिथेच त्याचं साहित्य बराच काळ उपलब्ध नव्हतं. कालांतराने १९९०च्या उंबरठ्यावर चेकोस्लोव्हाकियातलं कम्युनिस्ट सरकार बदललं, मग चेक रिपब्लिक आणि स्लोव्हाकिया हे दोन देश झाले. पण इस्राएलमधल्या कागदपत्रांवरून सुरू झालेल्या खटल्यात चेक रिपब्लिकच्या बाजूने काही हस्तक्षेप झाला नाही. याचा उल्लेख नि साधारण त्यामागचा इतिहास या पुस्तकात तुलनेने अगदीच थोडक्यात आला आहे. या खटल्याचा निकाल २०१६ साली लागला आणि हॉफच्या ताब्यातली कागदपत्रं इस्राएली राष्ट्रीय ग्रंथालयाच्या अभिलेखागारामध्ये जमा करण्यात आली. ती आता ऑनलाइन पाहायला नि वापरायला उपलब्ध आहेत.

काफ्काचं लेखन ही एक क्रयवस्तूही असल्यामुळे मग तिला पुस्तकांच्या बाजारात, विद्यापीठांच्या बाजारात कसं अधिकाधिक मूल्य प्राप्त होत गेलं, तेही या पुस्तकातून सूचित होतं. पण दुर्दैवाने या पुस्तकावरही अशा बाजाराचा प्रभाव पडल्याचं जाणवतं. आटोपशीर, सखोल पत्रकारी वृत्तान्तासारखं हे पुस्तक होऊ शकलं असतं. पण त्याला मधेच अकादमिक डूब द्यायचा प्रयत्न करणाऱ्या टिपा अर्धवटपणे जोडलेल्या आहेत. टिपा जोडण्यात अर्थातच काही गैर नाही, पण एकाच परिच्छेदात तीन जणांची अवतरणं आली असतील तर त्यातल्या एकाच अवतरणाचा स्त्रोत टिपेमध्ये द्यायचा, बाकीची अवतरणं तशीच लटकती ठेवायची- असा प्रकार या पुस्तकात जवळपास सर्वच प्रकरणांमध्ये आहे. उदाहरणार्थ, दुसऱ्या प्रकरणात मॅक्स ब्रॉड, स्टिफन झ्वाइग, रायनर स्टाख आणि खुद्द काफ्का यांची अवतरणं येऊन जातात, पण पहिली टीप मात्र काफ्काच्या नंतर आलेल्या एका पत्रातल्या उद्धृताची आहे. इतर अवतरणंही मुळात चुकीची नाहीत, पण संदर्भ न देता आलेली आहेत. त्यापेक्षा टिपा वगळून मग नुसत्या दीर्घ लेखासारखं लिहून एकत्र संदर्भसूची देऊनही चाललं असतं. काहीतरी एक संगती स्वीकारायला हवी होती.

तसंच या पुस्तकात काही ठिकाणी दिशाभूल करणारं विषयांतर किंवा अनावश्यक तपशीलही आहेत. एक प्रातिनिधिक उदाहरण : तेराव्या प्रकरणात ऑस्ट्रियन (जर्मनमध्ये लिहिणारा, ज्यू) लेखक स्टिफन झ्वाईग याने ब्राझीलमध्ये हद्दपारीचं जिणं जगताना आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. "पॅलेस्टाइनला पोचू न शकलेल्या दुर्दैवी ज्यू हद्दपार माणसांवर गुदरलेल्या सांस्कृतिक आपत्तीची व्याप्ती" झ्वाईगच्या आत्महत्येमुळे मॅक्स ब्रॉडला जाणवली, असं बॅलिंट म्हणतात. ब्रॉड आणि झ्वाईग चांगले मित्र होते. हा तपशील दिल्यावर मग पॅलेस्टाइनला जाऊ न शकलेल्या इतर काही कलावंतांविषयी बॅलिंट सविस्तर बोलायला लागतात. पण मुळात झ्वाईग हा पॅलेस्टाइनमध्ये इस्राएलची निर्मिती करू पाहणाऱ्या ज्यूराष्ट्रवादाविरोधात होता, त्याने नाझी राजवटीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वतःहून ब्राझीलला जायची निवड केली आणि युरोपाविषयीची त्याची ओढ शेवटपर्यंत कायम होती. ब्राझीलमधल्या वास्तव्याला धरून त्याने 'ब्राझील : अ लँड ऑफ द फ्यूचर' असं पुस्तक लिहिलं. हे सगळं लक्षात घेतलं तर, "पॅलेस्टाइनला पोचू न शकलेल्या दुर्दैवी हद्दपार ज्यू" माणसांच्या संदर्भात त्याचा दाखला देणं रास्त आहे का? यात 'दुर्दैवा'चा उल्लेख लेखकाच्या किंवा ब्रॉडच्या दृष्टिकोनातून असेल तर मग तसं स्पष्ट म्हणायला हवं. नाहीतर, झ्वाईगचा इथे असा उल्लेख विसंगत आणि दिशाभूल करणारा ठरतो. असे दाखले आणखीही आहेत. पुस्तकाची लांबी वाढवण्यासाठी हे झालं असेल का, अशी शंका येते. हा प्रकार इंग्लंडमधल्या आवृत्तीसोबतच अमेरिकी आवृत्तीतही आहेत. 

काही टायपिंगच्या चुका, किंवा वाक्यरचना कमी-अधिक बिघडणं, किंवा कधी छपाई कमी-अधिक होणं, या गोष्टी पुस्तकांच्या व्यवहारात स्वाभाविकपणे होतात.  दुरुस्त करायचा प्रयत्न केला तरी, कधी राहून जातात. या पुस्तकात तसंही बरंच आहे. उदाहरणार्थ, दहाव्या प्रकरणात पहिल्या महायुद्धावेळी ब्रॉड पंचवीस वर्षांचा असल्याचा उल्लेख येतो. लगेच पुढच्या वाक्यात त्या वेळी तो तीस वर्षांचा उसल्याचा उल्लेख येतो. त्याचा जन्म १८८४चा, आणि पहिलं महायुद्ध १९१४ साली सुरू झालं, त्यामुळे दुसरा उल्लेख बरोबर. अशा चुका अनावधानाने किंवा कधी नजरचुकीने होऊ शकतात (या नोंदीतही अशा चुका असू शकतील). मराठीत एका पुस्तकामागे एक-दोनच माणसं कसंबसं हे सगळं करत असतात, पण इंग्रजीत प्रकाशनाआधी दोन-चार प्रकाशनसंस्थांमधल्या किमान चार-पाच किंवा अधिक मंडळींच्या नजरेखालून या पुस्तकाचा मजकूर  गेला असेल, तरी आहे हे असं आहे.

Bombay Poets Archive, Cornell University Library
तरीसुद्धा या पुस्तकाचा विषय समजून घेण्यासारखा आहे. तो चार बाजूंनी मांडण्याचा लेखकाचा प्रयत्नही साहित्यिक पत्रकारितेचा नमुना म्हणून दखलपात्र आहे. त्यामुळे समजा याचं मराठी भाषांतर करायचं झालं, तर वरच्या गोष्टी जमतील तितक्या संपादित करून ते करता येऊ शकेल. कशाला करायचं मराठी भाषांतर? या प्रश्नाचं छोटं समर्थन असं : कॉर्नेल विद्यापीठाच्या ग्रंथालयात 'बॉम्बे पोएट्स अर्काइव्ह' असा विभाग करून त्यात १९६०च्या पुढे-मागे जोमाने लिहित्या झालेल्या, मुख्यत्वे अनियतकालिकांच्या चळवळीशी नातं सांगणाऱ्या काही मराठी आणि भारतीय इंग्रजी कवींची कागदपत्रं जतन करून ठेवलेली आहेत. भारतात ती कुठे गेली असती माहीत नाही, त्यामुळे अभ्यासकांच्या प्रयत्नातून ती तिथे गेली हे एका अर्थी बरंच म्हणता येईल. यात दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, चंद्रकांत पाटील या मराठी मंडळींचीही कागदपत्रं आहेत. या अर्काइव्हच्या मुखपृष्ठावरची एक ओळ अशी : "बॉम्बे हे समुद्रकिनाऱ्यावरचं विख्यात शहर. चित्रपट, व्यावसायिक हिंदी चित्रपट ही या शहराची सर्वांत प्रसिद्ध निर्मिती राहिली आहे, आणि या चित्रपट उद्योगाचं बॉलिवूड हे नावही बॉम्बे शब्दाचा संकेत देणारं आहे. 'मुंबई' हे ठिकाण तुलनेने अलीकडचं आणि बहुधा कमी उदारमतवादी ठिकाण आहे. विसाव्या शतकाच्या मध्यावर या शहराचा पोत बदलू लागला." [१३ ऑगस्टची भर : ही नोंद प्रसिद्ध केल्यानंतर काही दिवसांनी कॉर्नेल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 'मुंबई'विषयीचं वाक्य काढून दुरुस्ती केलेली दिसली. त्यामुळे हा मुद्दा आता फक्त एकंदर संदर्भापुरताच पाहावा. शिवाय, मराठी नि भारतीय इंग्रजी कवींची ही कागदपत्रं टिकून राहण्यासाठी अभ्यासकांनी केलेला प्रयत्न म्हणून त्याचं स्वतंत्र महत्त्व आहेच].
 
वर उल्लेख आलेल्या तीन कवींव्यतिरिक्त नामदेव ढसाळ, भाऊ पाध्ये, वसंत गुर्जर, मनोहर ओक, तुळसी परब अशा तत्कालीन कित्येक कवी-लेखकांच्या लेखनात 'मुंबई'च आली. आज जयंती असणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांची 'मुंबईची लावणी' किंवा त्यांनी लिहिलेला 'मुंबईचा गिरणी कामगार' हा पोवाडा, त्याआधी पठ्ठे बापूरावांनी लिहिलेली 'मुंबईची लावणी', किंवा त्याही आधी गोविंद नारायण माडगांवकरांनी १८६३ साली लिहिलेलं 'मुंबईचें वर्णन', सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू असणाऱ्या नारायण सुर्वे यांच्या कवितांमधली गिरण्यांची मुंबई, या सगळ्याचं ठिकाण कोणतं होतं? बॉम्बे की मुंबई? हा दीडेक शतकाहून अधिकचा शब्दवापराचा इतिहास (आणि सर्वसामान्य लोकव्यवहारातला मुंबई या शब्दाचा वापर) बाजूला ठेवून उपरोल्लेखित मजकुरात मुंबई हे तुलनेने अलीकडचं आणि कमी उदारमतवादी ठिकाण ठरवलेलं आहे. 'बॉम्बे पोएट्स'च्या यादीत येणाऱ्या अरविंद कृष्ण मेहरोत्रा, आदिल जस्सावाला, इत्यादींसारख्या कवींचं 'बॉम्बे'सुद्धा या मराठी लोकांशी मोकळेपणाने देवाणघेवाण करत उभं राहिलं. त्यामुळे त्यात बॉम्बे येणं वाजवीच. पण त्यासाठी मुंबई अनुदार ठरवण्याची गरज नाही. 
 
शिवसेनेच्या सरकारने १९९५ साली ब्रिटिशकालीन बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई केलं. पण शहराच्या नावाचा मुद्दा शिवसेनेच्या तथाकथित 'भूमिपुत्रां'च्या आक्रमक राजकारणाशीच जोडून पाहणं, अपुरंच. कॉर्नेल विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील वरचा उल्लेख अशी जोड सुचवणारा दिसतो (किंवा विसाव्या शतकाच्या मध्यात शहराचा पोत बदलू लागल्याचं त्यांना वाटलं, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाशीही ती जोड घातलेली असू शकेल). हा भाषाभिमानाचा मुद्दा नाही, ऐतिहासिक वापराच्या दृष्टीनेही तो उल्लेख चुकीचा आहे.  मुंबईतल्या विविध समूहांचं वर्णन माडगांवकरांच्या पुस्तकातही होतं आणि नंतरच्या मराठी साहित्यातही ते कमी-अधिक प्रमाणात उमटलं. त्यामुळे मुंबईसह बॉम्बे, बम्बई हेही अवकाश त्यात राहिलेच आहेत. अशा कोणा कवींच्या कागदपत्रांचा संग्रह अमेरिकी विद्यापीठात 'बॉम्बे पोएट्स'च्या एका नावानिशी राहिला, तरी काही गैर नाही. पण त्यातल्या अंतर्गत अस्मितांच्या सरमिसळीशी सुसंगत ओळख समोर मांडण्याऐवजी चमत्कारिक उतरंड कल्पून मुंबईला खालच्या स्थानावर ढकलणं अनैतिहासिक आहे. उदार-अनुदार जे काही असेल ते मुंबई नि बॉम्बे या नावांनी ओळखल्या गेलेल्या एकाच शहरातलं आहे (त्यावर टीका करायलाही हरकत नाही, पण ती मराठीतला मुंबई हा शब्दप्रयोग खालच्या स्थानी कल्पून करायला नको, असं वाटतं. तसं मग बॉम्बे नावावरही अनेक हेत्वारोप करता येतील. मग ते तसंच सुरू राहील). संस्कृतीचं जतन आणि सादरीकरण कसं होत असतं, आणि त्यात लेखक-कवी, अस्मिता, बाजार यांचा गुंता कसा प्रभाव पाडतो, याचा हा एक आपल्या जवळचा दाखला.

दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज लेखन प्रेरणा दिवस जाहीर केला, आता तो दर वर्षी साजरा होईल. मुंबई महानगरपालिका कधीपासूनच जगातल्या सर्वांत श्रीमंत नगरपालिकांमध्ये गणली जाते. मराठीच्या नावाने राजकारण तर काही दशकं सुरू आहे. अलीकडे मराठी भाषा अभिजात असल्याचा सरकारी शिक्काही मारण्यात आला. मराठी राज्यगीतही आता वेळोवेळी वाजवलं जातं. पण उत्सवी भपकेबाजपणापलीकडे स्वतःच्या सांस्कृतिक वारशाबद्दलची आपली जाणीव साधारण कुठे आहे, याचा अंदाज 'काफ्काचा शेवटचा खटला' या पुस्तकानिमित्ताने आणि आजच्या प्रेरणादायी दिवसानिमित्ताने बांधता येऊ शकतो.

काफ्काची पत्रं : इस्राएली राष्ट्रीय ग्रंथालय । इतर चिन्हं नि चित्रं इंटरनेटवरून । मांडणी : रेघ

२४ जुलै २०२६

रत्नागिरीतील मोर्च्याचा सचित्र वृत्तान्त

'झुरळांच्या काळात राजकारणाची भुरळ आणि जिज्ञासा' या नोंदीत कॉक्रोच जनता पार्टी आणि त्या संदर्भात पुढे घडत गेलेल्या घटनांबद्दल काही बोलणं झालेलं आहे. या घडामोडींबद्दल गेले काही दिवस विविध मंडळी विविध मंचांवर आपापल्या दृष्टीने काही अंदाज बांधतच आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंस्था असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनीच हे आंदोलन लोकांच्या संतापाला थोडीशी वाट मिळावी म्हणून उभं केलं आहे- अशा कटकारस्थानाची शंका व्यक्त करणारे लोक एकीकडे आहेत. मग, विविध विरोधी पक्षांनीही या आंदोलन पाठिंबा दिला आणि शेवटी प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने पाठिंबा दिला, त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आता या आंदोलनाला योग्य वळण देतील, अशा दिशेने बोलत जाणारे आहेत! काँग्रेस आणि राहुल गांधी या मुद्द्यांवर आधीपासूनच बोलत होते, त्यांना टाळून 'कॉक्रोच जनता पार्टी'ला आणि त्याचे संस्थापक अभिजीत दिपके श्रेय देणं चुकीचं आहे, असाही काहींचा  सूर दिसतो. दिल्लीतील आंदोलनात सोनम वांगचुक यांच्या व्यतिरिक्त डाव्या विद्यार्थी संघटनांचे काही विद्यार्थीही उपोषणाला बसले, तिथल्या आंदोलनात डाव्या संघटनांचा पाठिंबा ठळकपणे दिसला, त्यामुळे या संघटनांचा सहभाग अधोरेखित करणारेही लेख आलेत. तसंच, दुसरीकडे भाजप आणि पंतप्रधान यांच्या समर्थनार्थही बोलणारे आहेत. उदाहरणार्थ, पेपर फोडणाऱ्यांबरोबरच पेपर विकत घेणारे दोषी नाहीत का, आपण व्यक्ती म्हणून नैतिक वागलो तर देश नैतिक होईल, तोवर अशा आंदोलनांच्या समर्थनार्थ 'सोशल मीडिया स्टेटस'वर बोलणं म्हणजे दिखाऊ देशभक्ती आहे, वगैरे स्वरूपाचं पुन्हा 'स्टेटस'च ठेवणारेही आहे. यू-ट्यूबवरच्या वाहिन्यांपासून सुट्या-सुट्या व्यक्तींच्या समाजमाध्यमांवरच्या कृतींपर्यंत हा गदारोळ दिसतोय.

आधीच्या नोंदीत म्हटल्याप्रमाणे, हाच शेवटी 'सार्वजनिक चर्चावकाश' असेल, तर त्याची उकल करायचा प्रयत्न करायला हवा. ही उकल करण्यासाठीचे शब्द केवळ आक्रस्ताळे असून पुरणार नाहीत, त्यासाठी जमलं तर काही संकल्पनाही समजून घ्यायला हव्यात, असं त्या नोंदीतलं म्हणणं. पण या संकल्पनांची सांगड 'सर्वसामान्य' अवकाशातल्या म्हणण्याशी घातली तर एकंदर सार्वजनिक चर्चावकाशाचा कानोसा घेतल्याचं म्हणता येईल. नाहीतर नुसतं साचेबद्ध संकल्पनांचं बोलणं होतं. त्यामुळे ही नोंद आधीच्या नोंदीला पूरक, पण रस्त्यावरच्या अवकाशाची दखल घेणारी आहे. लोक काय म्हणतायंत, हे शक्य तितकं तटस्थपणे नोंदवायचा पत्रकारी पातळीवरचा हा प्रयत्न आहे. 

दिल्लीत २० जुलै रोजी संसदेच्या दिशेने मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. या कठोर कारवाईच्या निषेधार्थ रत्नागिरी इथे २३ जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी दीड या वेळेत एक मोर्चा काढण्यात आला (या वृत्तान्तातील सर्व फोटो आणि व्हिडिओ या मार्गावर काढलेले आहेत). जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन निषेधाचं निवेदन देण्यात आलं. 'शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचा'च्या वतीने या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), थोडंफार काँग्रेस, अशा विरोधी पक्षांची मंडळी; समाजवादी विचारसरणीचे शिक्षणसंस्थांचे संचालक, त्यांचा कर्मचारीवर्ग, विद्यार्थी; काही मुस्लीम मोहल्ल्यांमधील नागरिक- यांची ठळक उपस्थिती होती (कोणाचेही झेंडे त्यात नव्हते). पण या व्यतिरिक्त स्वयंप्रेरणेनेच यात दाखल झालेले इतर संस्थांमधले विद्यार्थी आणि नागरिकसुद्धा लक्षणीय प्रमाणात होते. त्यामुळे मोर्चा अपेक्षेपेक्षा खूपच मोठा निघाल्याचं मत ठिकठिकाणी व्यक्त होताना दिसलं. केवळ काही पक्षांच्या नि संस्थांच्या सहभागाने हे घडलं नसतं. एक हजारांच्या आसपास लोक यासाठी येतील, असा अंदाज मोर्च्याची सुरुवात झाली तिथे तैनात असलेल्या एका पोलिसाने अनौपचारिक बोलण्यात वर्तवला. पण प्रत्यक्षात अडीच हजार ते तीन हजार लोक या मोर्च्यासाठी हजर होते.

या मोर्च्याने शहरातील मारुती मंदिरच्या चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुमारे सव्वादोन ते अडीच किलोमीटरची वाटचाल तुलनेने शांततेने केली. क्वचित काही वेळा पंतप्रधानांच्या नावाने एकदम थेट शिवराळ घोषणा देण्यात आल्या, तेव्हा पोलिसांनी आणि आयोजकांनीही सूचना करून या घोषणा शमवण्याचा प्रयत्न केला. (तरीही, तुरळकपणे काही मंडळी मधेच अशा घोषणा देत राहिली). पण त्याहून मोठ्या प्रमाणात घोषणा लोकशाही, हुकूमशाही, शिक्षणाचं क्षेत्र, लोकांशी संवाद न साधणाऱ्या सरकारची वृत्ती, अशा सूत्रांना धरून होत्या. याच सूत्रांसंबंधी विविध प्रकारचे फलक मोर्चेकरी तरुण-तरुणींनी हातात धरलेले होते. त्याचे दाखले इथे चिकटवलेल्या छायाचित्रांवरून मिळतील.

मोर्चेकरी तरुणी (फोटो : अश्विनी कांबळे)


लोकमत, २३ मे २०२६ (पुणे आवृत्ती)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलनी यांच्या नावांना धरून 'मेलडी' असा एक हॅशटॅग समाजमाध्यमांवर चालतो. आंतरराष्ट्रीय बैठकांमधील त्यांच्यातल्या स्नेहाचं सूचन करणारा हा हॅशटॅग आणखी अधोरेखित करत खुद्द मोदींनी मेलनी यांना 'मेलडी' या चॉकलेटचं पाकीटच मे २०२६मध्ये भेट दिलं, त्याचा फोटो स्वतः सोशल मीडियावर टाकला, त्याबद्दल दोघं हसत बोलले. याला धरून त्या चॉकलेटच्या मालककंपनीने त्याच महिन्यात पेपरांमध्ये पानभर जाहिरातीसुद्धा केल्या. उदाहरणार्थ, शेजारी चिकटवलेल्या जाहिरातीत 'भारताने जगाला एक प्रश्न भेट केला आहे' असं सांगत पंतप्रधानांचं नाव घेत त्यांचे आभार मानलेले आहेत. शिवाय, 'आता जगही ह्यात सहभागी झालं आहे,' अशी जोडही दिली आहे. एका अर्थी राजकीय अवकाशातल्या वक्तव्यं / कृती किती उथळ पातळीला जाऊ शकतात, आणि त्यातून राजकीय व्यक्ती स्वतःचंच विडंबन कसं करू शकतात, याचा हा नमुना होता.

त्यामुळे या घडामोडींची टर उडवणारीही काही पोस्टरं कालच्या मोर्च्यात होती. "न्याय? (तो कुठे मिळणार आहे!) मेलडी हवी तर सांगा" असं इंग्रजी पोस्टर घेतलेला (आणि सोबत काही मेलडी ही चॉकलेटंही वाटणारा) मोर्चेकरी तरुण राजापूर या दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणावरून रत्नागिरीत केवळ या मोर्च्यासाठी आला होता. वातावरण बऱ्यापैकी पावसाचं होतं, सकाळी बराच पाऊस पडून गेला होता, तरी बसने प्रवास करून हा तरुण रत्नागिरीपर्यंत आला. त्यामुळे त्याला विचारलं, "एवढ्यासाठी आलात का?" तर तो म्हणाला, "एवढ्यासाठी!" विद्यार्थ्यांच्या मागण्या बरोबर आहेत, सरकारने त्यासंबंधी कार्यवाही करायला हवी, असं त्याचं म्हणणं होतं. या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांशी सरकारने संवाद न साधता पोलिसी कारवाई केली, यामुळे तो अस्वस्थ होता. कोणत्याही संघटनेशी थेट संबंध नसतानाही केवळ स्वतःच्याच इच्छेपोटी तो या मोर्च्यात सहभागी झाला. 
  

"मेलडी खा, पण देशाचं भवितव्य खाऊ नका" अशीही घोषणा काही पोस्टरांवर होती :

मोर्चेकरी विद्यार्थिनी (फोटो : अश्विनी कांबळे)

वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या नावाने घोषणा दिल्या जात होत्या. काहींच्या हातात संविधानातील उद्देशिका होती, काहींनी या आंदोलनाच्या निमित्ताने 'संविधान वाचवा'चाही नारा दिला. 'संविधान वाचवा, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवा', अशाही घोषणांचे फलक दिसत होते. एकूण मिळून विद्यमान सरकारी व्यवस्था अपेक्षेनुसार (म्हणजे संविधानात म्हटलंय त्यानुसार) काम करत नसल्याची धारणा सूचित करणारी ही विधानं होती. मोर्च्याच्या वाटेत आंबेडकरांचा पुतळा लागतो, तिथेही काही मिनिटं मोर्चा थांबवून आंबेडकरांच्या पुतळ्याला हार वगैरे घालून घोषणा देण्यात आल्या.




आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चेकरी (फोटो : रेघ)

मोर्चेकरी तरुण (फोटो : रेघ)
शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ही दिल्लीतील आंदोलनातली मागणी ठिकठिकाणी मोर्चेकऱ्यांनी हातात धरलेल्या फलकांवर लिहिलेली होती, घोषणांमध्ये ती दिली जात होती. एका मंत्र्यासाठी सरकार इतकी जोखीम का उचलतंय, असाही प्रश्न मोर्चेकऱ्यांच्या बोलण्यात आला. यासंबंधीची पोस्टरंही पॉप्युलर कल्चरमधल्या काही खुणांचा वापर करणारी होती. 'तू झूठा मैं मक्कार' या चित्रपटाचा संदर्भ देत पंतप्रधान आणि शिक्षण मंत्र्यांची टर उडवणारं पोस्टर; किंवा 'माझ्या आधीच्या प्रियकराला/प्रेयसीला (नातं तोडण्यासंबंधीचा इशारा) वेळीच कळला, पण शिक्षण मंत्र्यांना मात्र (पद सोडण्यासंबंधीचे) इशारे कळेना झालेत' असं सुचवणारं पोस्टर, इत्यादी या मोर्च्यात पाहायला मिळालं.

तानाशाही सें आझादी, भ्रष्टाचार सें आझादी, इत्यादी घोषणाही या वेळी दिल्या जात होत्या. (याचा व्हिडिओ रेघेच्या यूट्यूबवरच्या पानावर दिला आहे). काही वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 'आझादी'ची घोषणा वादग्रस्त ठरली. पण ती घोषणा (काश्मीर इत्यादी संदर्भात) देश फोडण्याशी संबंधित नसून विविध समस्यांपासून 'आझाद' होण्याशी संबंधित असल्याचं अधोरेखित करत रत्नागिरीतील कालच्या मोर्च्यात ती घोषणा दिली जात होती.

मोर्चेकरी विद्यार्थी (फोटो : रेघ)

अकरावीत शिकणाऱ्या एका मुलीने सोनम वांगचुक यांचं छायाचित्र असलेलं पोस्टर हातात घेतलं होतं. तिच्या मते, वांगचुक यांच्यासारखा संशोधक उपोषणाला बसतो आणि फारसं शिक्षण नसलेला माणूस शिक्षण मंत्री होतो, हे बरोबर नाही. पंधरा-सोळा वर्षांच्या मुलीचं हे मत आहे, इतपत लक्षात घेऊन तिचं म्हणणं रेघेच्या यूट्यूबवरच्या पानावर पाहता येईल. ही मुलगी तिच्या आईसोबत मोर्च्यात सहभागी झाली होती. दुसरी एक, शिक्षण पूर्ण झालेली आणि आता नोकरी करणारी फार्मसिस्ट तरुणी रजा घेऊन तिच्या वडिलांसोबत या मोर्च्यात सहभागी व्हायला आली होती. तिने स्वतः आधी वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेशपरीक्षा (नीट) दिलेली होती, तसंच तिच्या भावानेही ही परीक्षा दिली आणि तो सध्या वैद्यकीय शिक्षण घेतो आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांना समर्थन द्यावं, असं आवाहन तिने केलं. 

या मोर्च्यामध्ये सहभागी नसलेली, पण त्या रस्त्यावरून कॉलेजला जाणारी चार-पाच अकरावीतल्या मुलं-मुली दिसली. त्यातल्या एका मुलाला या मोर्च्याबद्दल मत विचारलं. तो म्हणाला, "मुद्दा बरोबर आहे. त्या मुलांचं नुकसान झालं. काहींनी आत्महत्या केल्या. मग त्यावर कारवाई तर व्हायला हवी. असं घडायला नको"

दुसरे एक पन्नाशी ओलांडलेले गृहस्थ काही सामान घेऊन चालत जात होते. ते म्हणाले, "आपले लोक थोडे कमी दिसतायंत (मोर्च्यामध्ये मुस्लिमांच्या तुलनेत हिंदूंची संख्या कमी असल्याचा संदर्भ)." असं मत मोर्च्यात सहभागी एका शिक्षिकेनेही व्यक्त केलं. तसंच, दोन आंबेडकरी संघटनेचे तरुण मोर्च्यात मधे मुस्लीमबहुल गटाच्या भागात आले, तेव्हा तेही हेच म्हणाले ("आपण दोघेच दिसतोय इथे!"). मग ते थोडं पुढे जाऊन मोर्च्याच्या अधिक मिश्र भागात चालू लागले. या भागातील मुस्लीम महिलांचं बुरखा वापरण्याचं प्रमाण आणि मुस्लीम पुरुषांचा विशिष्ट पायजमा, मोठा कुर्ता आणि गोल टोपी घालण्याचं प्रमाण दोन-तीन दशकांपूर्वी अत्यल्प होतं- पण दरम्यानच्या काळात ते वेगाने आणि प्रचंड वाढलं आहे- त्याचा एक परिणाम असा होतो की, मुस्लीम व्यक्तींची संख्या पोशाखातील सारखेपणामुळे सार्वजनिक ठिकाणी अधिक उठून दिसते. या प्रदेशातील मुस्लीम समूहामधले अंतर्गत बदल (त्यातले प्रभाव आणि मर्यादा), हा या नोंदीचा विषय नाही. पण या मोर्च्यासंदर्भात आलेल्या बातम्यांमध्येही मुस्लिमांची उपस्थिती अधोरेखित केलेली आहे आणि काही मोर्चेकऱ्यांच्या बोलण्यातही हे आलं (त्यातला सूर शत्रुभावी नव्हता. आजूबाजूला काय दिसतंय याबद्दल ते बोलत होते), म्हणून फक्त इथे हा मुद्दा नोंदवला आहे. केवळ पोशाखामुळे उपस्थिती जास्त दिसत नव्हती, उपस्थिती तुलनेने जास्त होती, पण पोशाखामुळे ती आणखी उठून दिसली.

दीड वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्च्याच्या आयोजकांनी निवेदन नेऊन दिलं. तिथेच मग सामूहिकरीत्या राष्ट्रगीत म्हणून मोर्च्याची सांगता झाली.


मोर्चा पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतले दोन जण एकमेकांशी बोलत होते. त्यांच्या बोलण्यात एकंदर उदासीनता दिसत होती. त्यामुळे "प्रत्येक जण आपापल्या फायद्याचं बघतो", असं म्हणून त्यातला एक जण निघूून गेला. त्या-त्या वेळी सत्तेवर येणाऱ्या सरकारांबद्दलचा त्याचा शेरा होता. वर उल्लेख आलेले पन्नाशी ओलांडलेले गृहस्थ म्हणाले, "मी गेली पस्तीस वर्षं खाजगी शाळेत नोकरी करतोय (शिपाई म्हणून). माझं काय झालं? सरकारला एवढं या मुलांचं ऐकून घ्यायला काय होतंय! कामं नकोत द्यायला माणसांना!"

मोर्च्याच्याच रस्त्यावर एका ठिकाणी बीएस.सी. झालेला पंचविशीतला तरुण फळांचं दुकान चालवतो. सगळं शांत झाल्यावर, संध्याकाळी त्याला या मोर्च्याबद्दल मत विचारलं. तो म्हणाला, "बरोबर आहे ना. एका माणसासाठी सरकारपण का अडून बसलंय? मोर्चा बराच मोठा होता. अपेक्षेपेक्षा मोठा होता. दहा-बारा वर्षं असंच वागतायंत. काय एका माणसाला राजीनामा द्यायला सांगितलं तर!" या आंदोलनात गेले काही दिवस विरोधी राजकीय पक्षही उतरताना दिसतात, पण राजकारण्यांना सोडून द्या, त्याआधी महिनाभर मुलं मागणी करत होती, तेव्हा का ऐकलं नाही, असा प्रश्न त्याने नोंदवला.
पंतप्रधानांनी काल मध्यरात्री एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकला- पेपरफुटीसंदर्भात जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील, आणि यासंबंधी अधिक कठोर कारवाईसाठीची तरतूद करणारं विधेयक संसदेत मांडलं जाईल, इत्यादी गोष्टी या अडीच मिनिटांच्या व्हिडिओत ते बोलले. वांगचुक यांनी यानंतर काही वेळाने केंद्रीय मंत्र्यांच्या हजेरीत उपोषण सोडलं. मग त्यांच्या नावाचा उल्लेख करत परत पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर काही आश्वासनपर विधान प्रसिद्ध केलं. विरोधी पक्षांचे विविध नेतेही जंतर-मंतरवर ये-जा करत आहेत, तसंच देशभरात ठिकठिकाणी कमी-अधिक तीव्रतेची आंदोलनं होत असल्याच्या बातम्या आहेत. पुढेही काही ना काही घडत राहील. यातूनही अर्थ-अनर्थ लावले जातील. पण हा फक्त नेत्यांच्या वागणुकीचा किंवा वैयक्तिक लहरीपणाचा मुद्दा नाही.

इथे आपण केलेला प्रयत्न लोकांमध्ये विशिष्ट आंदोलनाबद्दल कोणते पडसाद उमटतात, ते समजून घेण्याचा आहे. या आंदोलनांबद्दल कोणत्या भाषेत बोलावं आणि ऐकावं, याबद्दलचा हा प्रयत्न होता. या आंदोलनाला विशिष्ट चेहरा नाही, दीर्घ काळ प्रस्थापित झालेलं नेतृत्व नाही, विशिष्ट विचारसरणी नाही- त्यामुळे बहुधा विश्लेषक किंवा पत्रकार आपापला आशय त्यात भरत राहतात. कॉक्रोच जनता पार्टीच्या दिपके यांनी त्यांची विचारसरणी म्हणून 'गांधी-आंबेडकर' यांची नावं घेतली आणि ते खरंही असेल, तरी ते एक व्यक्तिगत विधान उरतं. किमान या संदर्भात तरी त्यांच्या निमित्ताने सुरू झालेल्या आंदोलनाच्या एकंदर विचारसरणीचं ते विधान ठरेलच असं नाही. (वांगचुक हेही एक निमित्त असल्यासारखे यात दिसतात. काल त्यांनी उपोषण सोडलं तरी त्यामुळे या घडामोडींवर थेट काहीच परिणाम झाला नाही, हा याचा एक दाखला म्हणता येईल. त्यांच्या वैयक्तिक निर्णयांबद्दलचे तर्कवितर्कही सुरूच राहिले आहेत). व्यापक स्तरावर संघटना, तिची विचारसरणी, त्यानुसार होणारी उभारणी- असा या आंदोलनाचा प्रवास नाही. पेपरफुटीसारख्या एका विशिष्ट मुद्द्याच्या निमित्ताने राज्यसंस्थेविरोधातला रोष वेगवेगळ्या तऱ्हेने उत्स्फूर्तपणे व्यक्त करणारं हे आंदोलन दिसतं. 

शिक्षणाचा आणि रोजगाराचा प्रश्न इतर अनेक सामाजिक चिरफळ्यांना पुरून उरत असल्यामुळे लोक यात उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसतात. याचा शेवट काय होईल, त्याबद्दल भाकित वर्तवणारी ही नोंद अर्थातच नाही.  पण आधी नोंदवल्याप्रमाणे, लोकशाही व्यवस्थेचं रूप कसं असायला हवं, त्यातील राज्यसंस्थेने उत्तरदायित्व राखलं नाही तर त्याचा कोणता परिणाम होऊ शकतो, याबद्दलचे प्रश्न अत्यंत ठळकपणे या आंदोलनाच्या निमित्ताने आपल्या सार्वजनिक अवकाशात विचारले जात आहेत. लोक आपापल्या परीने त्यावर काही उत्तरं देत आहेत, आपापली मतं मांडत आहेत, हेच रत्नागिरी इथल्या कालच्या मोर्च्यातही दिसलं. अशा घडामोडींबाबत त्या घडत असताना बरीच उत्तेजीत विधानं होतच असतात. पण त्या विधानांपलीकडे काही थांग लावायचा प्रयत्न आधीच्या नोंदीत आणि या वृत्तान्तात केला. 
मोर्च्याच्या आसपास पोलीस कर्मचारी तैनात होतेच. तसंच मोर्च्यापाठोपाठ बरीच सामग्री असणारी पोलिसांची गाडी संथपणे जात होती. त्यातल्या सामग्रीचा वापर करायची वेळ आली नाही.