Friday 4 October 2013

खटपट-खटपट-खटपट । म. वा. धोंड जन्मशताब्दीनिमित्त नोंद

मधुकर वासुदेव धोंड
(४ ऑक्टोबर १९१४ - ५ डिसेंबर २००७)
[फोटो: 'सकाळ'च्या ग्रंथालयातून]
म. वा. धोंड यांचं जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या एका पुस्तकाबद्दलची ही नोंद. हे पुस्तक म्हणजे बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांचा अर्थ शोधत शोधत धोंडांनी लिहिलेल्या लेखांच्या संग्रहाचं - तरीहि येतो वास फुलांना! हे पुस्तक तसं अनेकांना माहिती असलेलं आणि बाजारात मिळणारं, त्यामुळे आपण असं काय वेगळं नोंदवणार त्याबद्दल! पण असं काही नाही, आपण नोंदवतोय यातच आपल्यापुरतं त्याचं वेगळेपण असू शकतं. आणि हेही धोंडांकडूनच आपल्याला शिकायला मिळू शकतं. म्हणजे मर्ढेकरांच्या कवितांवर एवढं आत्तापर्यंत लिहिलं गेलंय तर आपण पुन्हा कशाला त्या कवितांचे आणखी अर्थ शोधत बसा, असा विचार न करता धोंडांनी जी अतिशय खटपट केली त्यातून या पुस्तकातले लेख तयार झालेले दिसतात. मुळात हे सगळं कशाला, याचं तसं साधं पण अनुत्तरित उत्तर धोंडांनीच या पुस्तकाच्या सुरुवातीच्या पानावर दिलंय, ते असं :
या आधी अनेकांनी मर्ढेकरांच्या कवितांवर भाष्ये केली
आणि आता मीही करीत आहे. -
तरीहि येतो वास फुलांना!
वास्तविक, कविता आपल्याला कळली नाही तर ती आपल्याकरता नाही, असं मर्ढेकरच सांगून गेले. पण हे वाचकांना सांगूनही धोंडांना काही ते जसंच्यातसं मान्य करवत नाही. ते त्यांच्या ताकदीनुसार पहिल्या भेटीत दुर्बोध वाटलेल्या कवितेचा वेध घेत जातातच. मग त्यासाठी मर्ढेकरांचं खाजगी आयुष्य, कविता जेव्हा लिहिली गेली असेल तेव्हाच्या काळातल्या घडामोडी असे संदर्भ तपासतात आणि कवितेचा अर्थ लावतात. हे करण्यामागचं त्यांचं म्हणणं असं आहे :
माणूस दुसऱ्याशीच नव्हेत, तर स्वतःशीच बोलतो तेव्हा त्याला काहीना काही संदर्भ असतोच असतो- अगदी ठार वेड्याच्या बडबडीलाही. भावकविता ही स्वयंभू, स्वतंत्र व स्वयंपूर्ण मानली, तरी ती संदर्भहीन कधीच नसते; असू शकत नाही. .. केवळ कवितेवरूनच तिचा संदर्भ कळणे अशक्य असते, तेव्हा तिचा परिसर धुंडावा लागतो आणि हा परिसर मर्यादित करण्यासाठी तिचा रचनाकाल लक्षात घ्यावा लागतो. .. कवितेचा रचनाकाल निश्चित केल्यावर कवितेचा संदर्भ तत्कालीन परिस्थितीशी असणार हे मानून ती जाणून घेता येते. ही परिस्थिती सार्वजनिक किंवा वैयक्तिक असू शकते. सार्वजनिक परिस्थिती समकालीनांना ठाऊक असतेच; उत्तरकालीनांना ती इतिहासादी ग्रंथांवरून जाणून घेता येते. वैयक्तिक परिस्थिती जाणून घेण्याचे एकमेव साधन म्हणजे कवीचे चरित्र.
कवितेचा अर्थ शोधण्यासंबंधीचं हे मत सरसकट पटण्यासारखं नसेलही. कारण मुळात कोण किती संदर्भ तपासत बसणार? (याचं एक उत्तर - असे संदर्भ तपासत बसता येत नसतील तर मग धोंडांचं पुस्तक वाचावं). आणि कवितेचा काळ आपल्या आवाक्यापलीकडचा कधीचा तरी असेल तर मग काय करायचं? आणि मुळातच लिहिण्याची प्रेरणा काळाचा आवाका ओलांडण्याची असेल, तर मग मुद्दाम सक्तीने काही अशा संदर्भांमध्ये संबंधित लेखनाचे अर्थ शोधावेत काय? या प्रश्नांची सरसकट उत्तरं असणं जरा अवघडच आहे, त्यापेक्षा व्यक्तिसापेक्ष मतंच असतील, आणि तेच बरं. म्हणजे तुम्हाला वाटलं की, असे अर्थ शोधून कविता जास्त कळू / आकळू शकते, आणि असे अर्थ शोधण्याएवढा वेळ, उत्साह व तसा शोधक कल तुमच्याकडे असेल तर तुम्ही तसा शोध घेऊ शकता. अर्थात, याचीही काही सक्ती करण्यात मजा नाही. शिवाय, कविता वाचताना नाही म्हटलं तरी ती कधी लिहिली गेली याचा साधारण अंदाज घेऊनच ती वाचली जातेच की. त्यामुळे तसा तिच्या लिहिलं जाण्याचा काही एक काळ आपण ठरवतोच, पण परत आपल्या काळातही तिचे काही अर्थ आपल्याला सापडतात, वगैरे गोष्टी होत जातात. 

कवितेचा अर्थ शोधण्याचा धोंडांचा मुख्य रस्ता एखादी कविता लिहिली जाताना कवीच्या खाजगी आयुष्यात आणि त्या काळात ज्या घडामोडी घडल्या त्यांच्या शोधामधून जातो. मर्ढेकरांच्या बाबतीत आपण या रस्त्याला का लागलो याचं त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण असं आहे :
मर्ढेकरांची कविता म्हणजे माझ्या लेखी त्यांची 'शिशिरागमा'नंतरची कविता. 'शिशिरागम' मी कधीच समरसून वाचला नाही; पुढे वाचवेल असेही वाटत नाही.

१९४३पासून मर्ढेकरांच्या कविता जसजशा प्रसिद्ध होत गेल्या, तसतशा वाचीत गेलो. काही सहज समजल्या, काही प्रयासाने उमगल्या, तर काही अखेरपर्यंत दुर्बोधच राहिल्या. त्या दुर्बोधतेने मला अस्वस्थ केले. मी मराठीचा प्राध्यापक असूनही मला त्या कळू नयेत, हे अपमानास्पद वाटले. त्याहून बलवत्तर कारण म्हणजे त्यांतील प्रतिमांनी मला खूळ लावले. परंतु, त्या काळी मनाला नाना छंद होते, एकाच फंदात गुंतून राहण्याची वृत्ती नव्हती. कालांतराने ही अस्वस्थता जुनाट होत होत प्रकृतीचाच भाग बनून गेली. दुर्बोधता हे मर्ढेकरांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण होऊन राहिले; त्यांची एखादी कविता सहज कळली, तर स्वतःला चिमटा घेऊ लागलो.

१९९२ साली डॉ. विजया राजाध्यक्ष यांचा 'मर्ढेकरांची कविता' हा द्विखंडात्मक प्रबंध हाती आला आणि चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी दुर्बोध वाटलेल्या कविता आता तरी उलगडतील, या आशेने तो वाचायला घेतला. परंतु, त्यांच्या भाष्याने दुर्बोध कविता उलगडण्याऐवजी अधिकच दुर्बोध झाल्या; एवढेच नव्हे तर पूर्वी सुबोध वाटलेल्या कविताही दुर्बोध होऊ लागल्या. मग टिपा, परिशिष्टे, इत्यादींकडे वळणे प्राप्त झाले. या कवितांवरीलच नव्हे, तर समग्र मर्ढेकरांवरील इतरांचे लेख वाचून काढले. कुणाचा कुणाशी मेळ बसत नव्हता आणि तरीही प्रत्येक आपल्या अभिप्रायावर ठाम होता. मीच करंटा निघालो. 'सारे धन्वंतरी प्राज्ञ । मीच रोगी' असा प्रत्यय येऊ लागला.

परंतु, मर्ढेकरांच्या पकडीतून इतक्या सहजी स्वतःची सुटकाही करून घेता येईना. वेळी-अवेळी त्यांच्या कवितांतील चरण आठवू लागले, त्यांतील प्रतिमा दिसू लागल्या. सकाळी नऊच्या सुमारास गाड्यांतून, स्कूटरवरून वा पायी लगबगीने पण उत्साहात कामावर निघालेली माणसे दिसू लागली की, निरुद्योगीपणे आपणच काय ते घरात बसून राहिलो आहोत याची जाणीव होऊन, 'गळ्यागळ्यांतुन सूर उसळतो । उरांच लटके लटके वाघुळ'; समोरच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पलीकडच्या इमारतीत गेलेली विजेची, टेलिफोनची वा केबलची तार मधल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर दिसली की, 'आकाशांतिल अधोरेखितें'; दिवेलागणीच्या वेळी इमारतीखालून कुणी आई लेकराला साद घालून पुढे गेली की, 'हंबरून गाय गेली । वासराला', असा प्रतिमांनी छळ मांडला.

- आणि या छळवादातूनच तोवर दुर्बोध वाटलेल्या काही कविता अकल्पितपणे उलगडत गेल्या; संपूर्णपणे नव्हेत, तर काहीशा. संपूर्ण उलगडा होण्यासाठी बरेच काही करावे लागले - खूप वाचावे लागले, स्वतःशीच वाद घालावा लागला, विचारपूर्वक मांडलेला व्यूह विस्कटून टाकावा लागला, नव्याने मांडणी करावी लागली, असे बरेच काही. यांतून ज्या कवितांचा समाधानकारक अर्थ लागत गेला, त्यांच्यावर लिहीत गेलो. त्या गेल्या सहा वर्षांतील लेखांचा हा संग्रह. 
ज्या भूमिकेतून धोंडांनी हे केलं, त्याबद्दल आदर वाटून आपण ही नोंद करतोय. म्हणजे व्यक्तिगत शेरेबाजी हे मराठी साहित्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे की काय, असं वाटू लागावं अशी परिस्थिती सारखी असतेच, तरीही धोंडांनी एखाद्या कवीच्या कवितेच्या व्यवच्छेदक लक्षणाचा (मर्ढेकरांच्या बाबतीत प्रतिमांचा) उलगडा करण्यासाठी कवीचं व्यक्ती म्हणून असलेलं चरित्र धुंडाळावं नि आपल्यापुरत्या काही गोष्टी स्पष्ट करू पाहाव्या ही किती सुंदर गोष्ट आहे! आणि धोंडांबद्दल एक असंही वाटतं की, समजा आपल्याला त्यांचा कवितेचा रस्ता शोधण्यासाठीचा असा रस्ता मान्य नसेल, तरीही ते ज्या पद्धतीने मांडणी करतात ती आपसूक एक स्वतंत्र गद्य रचनाच ठरते. अर्थातच, तिचा पाया मर्ढेकरांची कविता आहे. पण त्यात धोंड स्वतःच्या आयुष्यातले, आपल्या वाचनातले, कवीच्या आयुष्यातले असे संदर्भ टाकून काही एक अर्थ वाचकासमोर ठेवू पाहतात. हे वरच्या त्यांच्या परिच्छेदातूनही स्पष्ट होतंय. आणि हे बरं आहे. तसंही प्रत्येक वाचक आपल्या डोक्यात काहीतरी अर्थ उभा करतोच की नाही, धोंड असाच स्वतःच्या डोक्यातला अर्थ मांडतात, त्यासाठी त्यांनी अर्थातच अधिकचे काही संदर्भ मुद्दाम तपासलेले असतात. शिवाय या आधी कोणी काढलेले अर्थ तथ्याला धरून नसतील तर ते सहजपणे खोडत जाणं हाही भाग ते करतात. पण कुठे कसला आव आणलेला नाही. त्यामुळेच काही कविता कळत नसल्याची कबुली देण्याएवढा खरेपणाही त्यांच्यात आहे. नायतर असं कोणी उघड्यावर बोलतं काय!

आणि असलं कोणी उघड्यावर बोलत नसेल तर मग धोंडांनी केली तसली खटपट करणं दूरच. त्यामुळे ह्या आपल्यापासून दूर गेलेल्या खटपटीच्या आठवणीत धोंडांच्या एकाच पुस्तकाबद्दलची ही नोंद झाली.

राजहंस प्रकाशन । १८ एप्रिल १९९९


तरीहि येतो वास फुलांना,
तरीहि माती लाल चमकते;
खुरट्या बुंध्यावरी चढून
तरीहि बकरी पाला खाते
- बा. सी. मर्ढेकर

4 comments:

  1. अनिरुद्ध जी. कुलकर्णी यांच्या एका इंग्रजी नोंदीचा मराठी अनुवाद 'रेघे'वर मागे प्रसिद्ध झाला होता, त्यामध्ये धोंड यांचा उल्लेख, त्यांचं एक पत्र असं काही वाचायला मिळू शकतं - कुठली सीता, कुठला राघव?

    ReplyDelete
  2. लोकसत्तेच्या २८ सप्टेंबर २०१४ रोजीच्या पुरवणीत म. वा. धोंड यांच्यावर एक लेख आलाय, त्याच्या इंट्रोमधे म्हटलंय की, धोंड यांचे जन्मशताब्दी वर्ष ४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. म्हणजे २०१४-१५ हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष असावं, असा समज त्या इंट्रोमधून होतो.

    पण आपल्या माहितीनुसार धोंड यांची जन्मतारीख ४ ऑक्टोबर २०१४ आहे, म्हणजे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष ४ ऑक्टोबर २०१३ला सूरू झालं, आणि २०१३-१४ हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष. असो. कदाचित आपलंही चुकलं असेल. पण वर्षभरापूर्वी इथं नोंद झाल्यामुळं फोटोचा उपयोग त्यांना झाला, हेही काही कमी नाही. मूळ फोटो दैनिक सकाळच्या लायब्ररीतून बाहेर पडलेला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. पण आपल्या माहितीनुसार धोंड यांची जन्मतारीख ४ ऑक्टोबर २०१४ आहे
      I guess typo : 1914 instead of 2014

      Delete
    2. होय. टाइप करताना चुकलं असावं. प्रतिक्रिया संपादित करता येत नसल्यामुळं वर तो बदल करता येत नाही. २०१४ऐवजी १९१४.

      Delete