Tuesday 1 December 2015

तीन मावश्यांच्या मृत्यूची कहाणी

इंदूर - नगर
पहाटेच केव्हा तरी जाग आली, म्हणजे अंधारातच एक दिवा फिरताना दिसतो. त्याच्याही आधीची गोष्ट.
- हा रघू दंडवत्यांच्या 'मावशी' या कथेचा 'उपोद्घात' आहे. मग कथा सुरू होते इंदुरातल्या मावशीच्या आठवणी सांगत, नंतर मावशीसोबत कथा नगरला येते. तिथंही अशीच वाक्यं येतात-
मावशी पहाटेच केव्हा उठायची, त्याचा कुणाला पत्ताच लागायचा नाही. पहाटेच केव्हातरी जाग आली म्हणजे अंधारात एक दिवा फिरताना दिसायचा. तोंडानं काहीतरी म्हणत मावशी अंघोळ उरकून घ्यायची आणि पहाटेच पूजेला बसायच्या आधी मला अभ्यासाला उठवायची.
अंधारात पूजेसाठीचा दिवा घेऊन जाणारी मावशी अंधारात एवढी मिसळलेली असावी की दिसूच नये. या कथेच्या 'उपसंहारा'त मावशी वारल्याचं पत्र येतं आणि नंतर मग कथा संपतेच. ही कथा 'अथर्व' या अनियतकालिकाच्या एकमेव अंकात आली होती. १९६१ साली. बहुधा ती कुठल्या पुस्तकात आलेली नाही. आपण इथं नोंदवली ती वाक्यं म्हणजे अंधारात फिरणारा दिवाच फक्त. अख्खी मावशी अंधारात.
.

मॅक्सिको

पेंग्वीन, १९६९. मुखपृष्ठ मांडणी: जर्मनो फॅसेटी
मूळ चित्र: दिएगो रिव्हेरा
आपण असेच रस्त्यानं जात असतो. रस्त्याकडेला कोणीतरी जुनी पुस्तकं विकत बसलेलं असतं. आपण सहज थांबतो. एक छोटंसं मळलेलं पुस्तक असतं. त्याच्यावर नाव असतं, 'अ डेथ इन द सांचेझ फॅमिली'. नावात मृत्यू बघून पुस्तक पाहावंसं वाटतं. लेखकाचं नाव- ऑस्कर लेवीस. कव्हरवरचं चित्रही खिन्न वाटवणारं असतं. त्यातही बहुधा कोणीतरी मरून पडल्यावर लोक जमलेत. आपल्या माहितीतलं नसतं पुस्तक, म्हणून आपण उचलतो. दीडेशेहून थोड्या कमीच पानांचं. मग अजून पुढून-मागून कव्हर पाहिल्यावर, आस-पास पाहिल्यावर आपल्याला कळतं की 'सोशालॉजी/अँथ्रपॉलॉजी/लिटरेचर' असा पुस्तकाच्या विषयाचा विभाग मागं छोट्या शब्दांत नोंदवलाय. आणि मॅक्सिकोतल्या एका गरीब कुटुंबाचा अभ्यास करून लेखकानं हे पुस्तक लिहिलंय. लेखक अमेरिकेतल्या कुठल्या विद्यापीठात मानवशास्त्राचा प्राध्यापक राहिलेला असतो हे त्यात लिहिलंय. बाकी, अमेरिकेच्या 'नॅशनल इंडियन इन्स्टिट्यूट'शी आणि 'फोर्ड फौंडेशन'शी लेखकाचा संबंध राहिल्याचं तिथंच माहितीत लिहिलंय. मग आपण नेटवर सर्च मारतो 'oscar lewis'. आणि मग त्यानं मॅक्सिकोतल्या गरीब वस्त्यांमध्ये जाऊन केलेला अभ्यास, त्यातून काढलेली अशीच सांचेझ कुटुंबासंबंधीची बाकीची पुस्तकं, वगैरैची जरा जास्त माहिती मिळते. मग आणखी शोधल्यावर 'कल्चर ऑफ पॉवर्टी' ही त्यानं मांडलेली संकल्पना दिसते. जगभरातल्या गरीबांमध्ये काही सांस्कृतिक साम्य असतं. दारिद्र्यनिर्मूलनाचे कार्यक्रम राबवूनही गरीबी संपत नाही, कारण काही विशिष्ट मूल्यदृष्टी दारिद्रयाच्या संस्कृतीत असते नि ती(तीही/तीच?) या सगळ्यांत अडथळा ठरते, असा या मांडणीतला सूर असल्याचं 'विकिपीडिया' सांगतो. मग त्यावर कोणीकोणी टीका केलेले लेखही सापडायला लागतात. आणि मग हा माहितीचा प्रवाह थांबतच नाही. 'गरीब हे गरीब असतात त्यामागं त्यांच्या परिस्थितीतल्या मूल्यांचा(ही/च) हातभार असतो', असा आशय या संकल्पनेत आहे, त्यामुळं अमेरिकेच्या भांडवली आक्रमणमाला पूरक अशी या माणसाची मांडणी आहे, असं कोणी म्हणतं. लेवीस यांचा संबंध ज्या संस्थांशी आलाय, त्यावरून पुन्हा मग शंकेला आणखी जागा मिळते. शिवाय म्हणणं तितकं ठोसही वाटत नाही. ही मांडणी कालबाह्य झाल्याचं कुठंतरी म्हटलेलं असतं. कुठंतरी म्हटलेलं असतं, आता या सगळ्याला परत महत्त्व आलंय. असं साधारण तासभरात नेटवर फिरून आपल्याला कळलं की आपण एवढा परिच्छेद लिहू शकतो. पण याला काहीच अर्थ नाही. मानवशास्त्र किंवा समाजशास्त्र यासंबंधी मुद्दाम कशामुळं आपण ते पुस्तक घेतलेलं नसतं. आपल्याला त्यातली काही माहितीच नसते तर कशाला उगाच. आपला तर कदाचित 'सांचेझ' हा उच्चारही चुकीचा असेल. पण तरीही आपण ते पुस्तक वाचण्याला अर्थ राहातो कायतरी. पुस्तकात काही स्पष्ट शास्त्रीय मांडणी नाहीये. एक प्रस्तावना आहे आणि कुटुंबातल्या तीन व्यक्तींची तीन भागांमध्ये तीन-तीन प्रथमपुरुषी कथनं आहेत. शिवाय आर्थिक माहितीचं पाच पानी परिशिष्ट आहे. विश्लेषणापेक्षा वर्णन  आहे. मावशीच्या मृत्यूची माहिती आपल्याला कशी मिळाली, मग आपण तिथं कसे पोचलो, इथपासून शेवटचे विधी उरकण्यापर्यंत कुटुंबातील काही सदस्य आपापली कथनं करतात, म्हणजे लेखकानं ती ऐकून लिहिलीत, असं स्वरूप आहे. मावशीचा मृत्यू कॅन्सरनं उपचाराविना झालेला असतो. आपण ते पुस्तक साहित्य म्हणून वाचलं तर त्यातल्या मजकुरातून माहितीच्या प्रवाहापेक्षाही (किंवा त्याच्यासोबत, असं म्हणू) जिवंत कायतरी आपल्यापर्यंत पोचू शकतं. आणि एवढं वीस रुपयाला स्वस्तात सहज रस्त्यात पुस्तक मिळालेलं असतं तर ते वाचायला हरकत नाही ना. शिवाय साहित्य म्हणजे सगळ्या सहित असत असेत तर त्यात कालबाह्य नि कालसुसंगत, चांगलं नि वाईट, बोगस नि अस्सल, शास्त्र नि अशास्त्र, जिवंत नि मृत, सगळ्याला जागा असायला-ठेवायला काय हरकत आहे. शेवटी मॅक्सिको शहरातल्या एका झोपडपट्टीत १९६२च्या नोव्हेंबरात सांचेझ कुटुंबात एक मावशी वारली होती, हे जास्त खरं आहे. माहिती मरत नसली तरी माणसं मरतात, आणि कायमचीच मरतात. त्यामुळं माहितीपेक्षा माणसं खरी आणि बरीसुद्धा.

या पुस्तकात वारलेल्या मावशीचं नाव आहे ग्वादलूप:
ग्वादलूप जगली तशीच वारली. औषधं नाहीत, न संपणारी वेदना ठणकत, पोटात भूक, हॉस्पिटलमध्ये जायला बसच्या तिकिटासाठी पैसे कसे जमवायचे, घरभाडं कसं द्यायचं याचा विचार करत सतत, आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जगणं आणण्यासाठी अनेक करूण कामांमध्ये गुंतलेली. काहीच मूल्यवान वस्तू मागं ठेवलेल्या नाहीत. काही धार्मिक वस्तू आणि भाड्याची बारकी जागा एवढंच (मावशीचं मृत्यूनंतर उरलेलं सामान).
तर मॅक्सिकोतल्या या मावशीचा मृत्यू असा झाला.

रत्नागिरी

आनंद मानवी नावाचे रत्नागिरीचे एक लेखक एप्रिल २०१५ मध्ये वारले. त्यांचा 'लाल भिंतीतले कोनाडे' हा कथासंग्रह नागपूरच्या 'सुखगंधा प्रकाशना'नं प्रकाशित केला होता. पहिली आवृत्ती जुलै १९८७ मधली आहे. हा कथासंग्रह आता बाजारात उपलब्ध नाही. या कथासंग्रहात 'झोपाळ्यावरची मावशी' नावाची एक सुंदर गोष्ट आहे. या कथेतली मावशी पूर्ण वेडी आहे. म्हणजे खरोखरच वेडी. शाळेबिळेत जायचा प्रश्नही न येण्याएवढी वेडी. बाकी जग शहाणं-सुज्ञ असतं बहुधा, तशी ही मावशी नाही. ही देवाची पूजा करणारीही मावशी नाही. ही झिरंबवली गावातल्या एका घरात ओटीकडच्या पडवीत झोपाळ्यावर बसून राहणारी वेडी मावशी आहे. पाच फुटापेक्षाही कमी उंची असलेली. तिच्या वेडेपणाचा उत्सवच आहे या गोष्टीत. या कथेच्या शेवटी साधारण छप्पन वर्षांची ही मावशी वारलेली असते. तिच्या मृत्यूचं कारण हा काही फार माहिती घेण्याजोगा विषयच नसतो. पण बहुधा हार्टअटॅकनं गेली असावी, म्हणतात लोक, असं कथेत म्हटलंय. आपण हा कथेचा शेवट आपल्या नोंदीच्या शेवटी नोंदवू:
मावशी वेडी होती, त्यामुळं तिचं आयुष्य हसत गेलं. ती क्वचित रडलीही. पण बहुतांश आयुष्य हसण्यात गेलं, कारण ती ठार वेडी होती. आजीच्या चपला नव्हत्या, तशाच मावशीच्याही चपला नव्हत्या. तिचं सगळं हसरं आयुष्य झिरंबवलीतल्या घरात, पडवीत नि अंगणातच गेलं. त्या पलीकडं नाहीच फारसं. जास्तीत जास्त मागच्या समुद्रापर्यंत कधी गेली असेल. सातासमुद्रापार जायची ओढ तिला नव्हती. त्यामुळं समुद्रासारख्याच तिच्याकडंही चपला नव्हत्या. तीही समुद्रासारखी तिथल्यातिथंच आयुष्यभर पडून होती. हसण्याच्या भरत्या-ओहोट्या सुरू असायच्या. आणि ती गेली तेव्हा समुद्र रिकामा झाला.
०००

सावलीचा मृत्यू (फोटो: रेघ)

Monday 12 October 2015

पुरस्कार: स्वीकार आणि नकार

कन्नड साहित्यिक एम.एम. कलबुर्गी यांची हत्या आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात दादरी इथं गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून झालेली अखलाख या मुस्लीम व्यक्तीची हत्या, हे अगदी अलीकडचे प्रसंग. या व इतर काही प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर काही साहित्यिकांनी 'साहित्य अकादमी' या सरकारस्थापित स्वायत्त संस्थेचे पुरस्कार परत केल्यासंबंधीच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये येत आहेत. स्वतः कलबुर्गींना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता; त्यामुळं अकादमीनं या संदर्भात काहीच भूमिका न घेतल्याची टीका झाली. मराठी वृत्तवाहिन्यांवर यासंबंधी चर्चा झाल्या का, ते कळलं नाही. पण कदाचित तशा चर्चा झाल्या असतील किंवा आता होतीलही. काही वर्तमानपत्रांमध्ये यासंबंधी लेख वा वाचकांची पत्रं अशा प्रकारचा मजकूर आलेला दिसला. यामध्ये साधारण दोन बाजू ऐकू आल्या: ज्यांनी पुरस्कार परत केले ते 'निवडक नैतिकता' पाळतात किंवा ज्यांनी पुरस्कार परत केलेले नाहीत ते तर बहुधा प्राथमिक पातळीवरचेही 'नैतिक' नाहीत. रेघेच्या कानापर्यंत आलेल्या मतांवरून या दोन ढोबळ बाजू नोंदवल्या आहेत.

ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले, त्यांनी आत्ताच का केले? आधी अमुकतमुक झालं असताना त्यांनी पुरस्कार परत का केले नाहीत? एखाद्या लेखिकेनं १९८४च्या शीखविरोधी दंगलींनंतर काँग्रेसचं सरकार असताना पुरस्कार स्वीकारला आणि आता 'हिंदुत्ववादी' मोदी सरकारचा निषेध करत पुरस्कार परत दिला, हा दुटप्पी नैतिकतेचा प्रकार नाही का? एखादी व्यक्ती साहित्य अकादमीतलं पद सोडते, पण अकादमीचा पुरस्कार परत करत नाही, हे कसं काय? एखादी व्यक्ती साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करते, पण सरकारने दिलेला 'पद्मश्री' सन्मान परत करत नाही, हे कसं काय?... असे अनेक प्रश्न पुरस्कार परत करणाऱ्यांवर टीका करताना काहींनी विचारलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं द्यायची की नाही हे ज्यांना उद्देशून प्रश्न विचारलेत, त्यांनी ठरवायचं आहे. ज्यांनी पुरस्कार परत केले त्यांना देशात सध्या घडणाऱ्या घडामोडींचा निषेध करण्यासाठी एक प्रतिक्रिया म्हणून अशी कृती करावी वाटली, त्यांनी ती केली- असं या घटनांबद्दलचं रेघेचं आकलन आहे. पुरस्कार परत करताना सन्मानचिन्हच नव्हे, तर पुरस्काराची रक्कमही परत करणार असल्याचं यांपैकी काहींनी म्हटलं आहे. पैसे परत करणं, ही गोष्ट ज्याच्यात्याचा आर्थिक परिस्थितीवरही अवलंबून आहे. तर ही कृती अशा पद्धतीनं करणं त्यांना योग्य वाटलं असेल, तर त्यांना तसं करायची मोकळिक असायला हवी- असं वाटतं. त्यांच्या कृतीविरोधात होणारी सरकारसमर्थकांची किंवा इतरही कोणाची आक्रस्ताळी टीका बरोबर नाही, असं वाटतं.

पण रेघेची नोंद पुरस्कार परत न करण्यासंबंधीची आहे. 

'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन', असं तुकाराम म्हणाले होते. यातलं युद्ध खरं म्हणजे कोणत्याही माणसाला लढावं लागू शकतं, पण आत्ता या नोंदीपुरतं आपण लेखकाच्या युद्धाचा विचार करू. तुकाराम म्हणतायंत तो युद्धाचा प्रसंग कोणी आपल्याला सांगितलेला नसतो. तो आतूनच वाटायला हवा. जगाशी नि मनाशी चालू असलेल्या या युद्धावरचा तोडगा म्हणून तुकोबांनी कविता लिहिली असेल. त्यांची ती कृती होती. 'लिहिणं ही कृतीच अशा रोजच्या युद्धाच्या प्रसंगाशी संबंधित आहे', हे वाक्य लिहिण्याची रेघेची लायकी आहे असं आपल्याला वाटत नाही, पण ते लिहिलंच नाही, तर ते बाहेर येईल कसं, त्यामुळं लिहिलं. 

ही रेघ ओढणाऱ्या व्यक्तीचा अशा एक-दोन पुरस्कारांशी आपसूक संबंध आल्यामुळं त्यालाही साहजिकपणेच या संदर्भात काही लोकांनी काही गोष्टी विचारल्या, सल्ले दिले, कोणी अप्रत्यक्षपणे टीका केली. हे सगळं साहजिक आहे. यावर आता मनापासून वाटलं म्हणूनच आपण ही नोंद करतोय. 

आत्ता देशात घडत असलेल्या काही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार परत करणं ही लेखकाची नैतिक जबाबदारी आहे, आणि कोणी ती पार पाडत नसेल, तर त्याला जाब विचारण्याची जबाबदारी आपल्यावर आहे- असा काही लोकांचा सूर दिसला. ज्याला त्याला आपला सूर लावायची मुभा आहे. त्यामुळं फेसबुक, किंवा व्हॉट्स-अॅप, किंवा ट्विटर, किंवा जिथं बोलायचा अवकाश आहे, तिथं सर्वसाधारणपणे नैतिक सूर लावले जातातच. हे सर्वसाधारणपणे सार्वजनिक पातळीवर, बाहेरच्या जगाशी संवादी किंवा विसंवादी अशा प्रकारचं चालू असतं. तिथं प्रचंड नैतिक बोलणं आवश्यक असतं बहुतेक. कुठल्याही समारंभात जसं औपचारिक चांगलंचुंगलंच वागलं जातं, तसं. मग कोणी व्यक्ती साहित्य अकादमी मिळालेल्या मराठी लेखकांची यादी देऊन असंही विचारू शकते की, 'हे कधी परत करणार पुरस्कार?' या यादीतले काही लेखक आता मेलेले आहेत, हेही अशी यादी प्रसिद्ध करणाऱ्याला माहीत नसलं तरी चालतं. कारण शेवटी त्याचा प्रश्न सगळ्यांना भिडणारा नि 'नैतिक' असतो!

हे आपण मराठीत लिहितोय, म्हणून फक्त मराठीचा संदर्भ घेऊ. मराठी भाषेत साहित्याला, लेखकाला मुळात किंमत काय आहे, हे कळण्यासाठी वरचं यादीचं प्रत्यक्षात घडलेलं उदाहरण दिलं. लेखक जिवंत असला किंवा मेलेला असला, तरी इथं फारसा फरकच पडत नाही. तुम्ही काय लिहिलंय, यावरून काहीच ठरत नाही. तुम्ही रोजच्या युद्धाच्या प्रसंगातून काही उभं करताय का, याची कोणाला फारशी पडलेली नाही. एखाद्या कादंबरीत, कवितेत, कथेत लेखकानं राज्ययंत्रणा, प्रस्थापित संस्कृती याबद्दल त्याच्या कुवतीनुसार काहीतरी बोलण्याचा प्रयत्न कदाचित केला असेल, तर त्यावर इथं काहीच बोललं जाणार नाही. पण आता अमुकएक युद्धाचा प्रसंग सुरू आहे त्यात तुम्ही कसं लढावं, याचे तात्पुरते सल्ले मात्र दिले जातील. 

रेघेला आपण नैतिक समजत नाही. या सगळ्या मुद्द्यावर बोलणारे लोक खरोखरच स्वतःच्या कृतीचा नि बोलण्याचा नि त्यातल्या विरोधाभासाचा विचार करतात का, याचा पत्ता नाही. पण करत असतील. 'लोक' असं म्हटल्यावर सरसकटीकरण होतं. त्यामुळं बहुतेक जण जेवढं नैतिक बोलतात तेवढं खरोखरंच वागत असतील, असं मान्यच करू. नैतिकतेच्या पातळ्या काय असतील, राज्ययंत्रणेचे पुरस्कार म्हणजे काय, पुरस्काराची रक्कम ही पुरस्काराचाच भाग असेल तर ती परत द्यायची की कसं, ते परवडत नसेल तर मग फक्त सन्मानचिन्ह परत करणं कितपत बरोबर आहे, वगैरे मुद्दे मोठे आहेत. शिवाय, राज्ययंत्रणा ही गोष्ट लेखक-पुरस्कार वगैरेपलीकडे आपल्या सगळ्यांशी कशी जोडलेली आहे, हा त्यातला एक मुद्दा. हे सगळे विषय एका नोंंदीचे नाहीत.

एवढ्या सगळ्या मुद्द्यांचा विचार आपण करू शकत नाही. फक्त विषयांतर वाटेल असा एक मुद्दा इथं नोंदवू. रेघेवर दोन ऑक्टोबर रोजी आपण एक नोंद केली होती. बिहारमधली दलित हत्याकांडं, मध्य भारतातील आदिवासी भागातील हिंसा, या संदर्भात ही नोंद होती. सध्याच्या भारतीय जनता पक्षाचा व इतरही काही सरकारांचा संदर्भ त्यात होता. साधारण सहा हजार शब्दांची ही नोंद होती. एवढी मोठी नोंद ब्लॉगवर वाचणं अनेक वाचकांना सोईचं नसणार, याची कल्पना असूनही आपण ती नोंद केली. त्यामागं काही नैतिक भूमिका नव्हती, त्यामागं अपराधभाव होता. आदिवासींपुरतं बोलायचं, तर हा एक समूह सध्याच्या प्रस्थापित व्यवस्थेत काय भोगतोय, याचा एक मामुली बिंदू त्या नोंदीत होता. ही ब्लॉगवरची फुटकळ नोंद होती. ती फारशी वाचली जाणार नसूनही करावी वाटली म्हणून केली. अशा विषयावर कोणाला मराठीत कादंबरी लिहावी वाटली, तरी ती फारशी वाचली जाणार नसूनही लिहायला लागेल. ही तक्रार नाही. पण जे जाणवतंय ते असं आहे.

तर, अशा पार्श्वभूमीवर पुरस्कार परत करणं ही कृती ज्यांना योग्य वाटली, त्यांनी ती केली. त्यांना एका विशिष्ट भूमिकेकडे लक्ष वेधण्यासाठी हीच कृती योग्य वाटली. ती त्यांची निवड आहे. त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. पण अशी निवड नि नैतिकता असं थेट समीकरण मांडणं सोपं वाटलं तरी पुरेसं आहे असं वाटत नाही.

पण अलीकडच्या काळात कोणी कशावर नि काय भूमिका घ्यावी, हे प्रसारमाध्यमं-समाजमाध्यमं यांच्या तणावातूनच निश्चित होतं का? अशी शंका येते. लेखकाची भूमिका इतकी सोपी असू शकते, असं वाटत नाही. प्रसारमाध्यमांमधून गदारोळ उठणाऱ्या नैतिकतेचं माहीत नाही, पण तिथं उल्लेखही न होणाऱ्या अपराधभावाबद्दल मात्र आपण बोलू शकतो. त्यासाठी ब्लॉग हेच प्रसारमाध्यम त्यातल्यात्यात परवडणारं आणि कमी आडपडदा असलेलं आहे, म्हणून इथं ही नोंद. वास्तविक आता चाललेला गदारोळ असा झालाय की, मूळ मुद्दा दूर राहिला नि पुरस्कार परत देणं किंवा न देणं हाच चर्चेचा विषय होत जाईल.

आपण रेघेवर यापूर्वीही जमेल त्या नि शक्य असेल त्या प्रसंगांबद्दल काही नोंदी केलेल्या आहेतच. त्यामुळंच साहित्य अकादमीचा पुरस्कार घेत असताना आपल्याला अपराधी वाटलं. आदिवासी समूह खलास होत असतो, तेव्हा त्यात किंचित तरी आपलाही हातभार लागत असतो, याचंही आपल्याला अपराधी वाटतं. फाशीच्या दोन प्रसंगांसंबंधी रेघेवर आपण नोंदी केलेल्या, त्याही अपराधीभावामुळंच. अशा कित्येक गोष्टींबद्दल रोजच्यारोज अपराधी वाटतं. हे अपराधीपण, वरची नैतिक मतं देणाऱ्यांमुळं आलेलं नाही, तर रोजच्या युद्धाच्या संदर्भात आलेलं आहे. ते युद्ध फक्त लेखकाशीच संबंधित असतं असं नाही, न लिहिणाऱ्या लोकांमधल्याही काहींना ते लढावं लागतंच. ते युद्ध टिपण्याची रेघेची कुवत आहे का, माहीत नाही. तरीही आपण ही नोंद केली. आणि त्यासोबतच २०१४चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार स्वीकारताना केलेलं एक अपराधीपणाचं भाषण, इथून पुढं कोणाला वाचावं वाटलं तर जोडलं आहे. या भाषणात काही प्रसंगांचा उल्लेख आला आहे, त्या प्रसंगांमध्ये अलीकडच्या आणि पलीकडच्या अनेक भीषण प्रसंगांची भर टाकता येईल. त्या प्रसंगांचा निषेध करताना आपला त्यातला सहभाग विसरला जाऊ नये म्हणून अपराधभाव. (हा अपराधभाव हे काही लेखनाशी संबंधित एकमेव किंवा मूलभूत कारणही नसावं, पण लेखनानुभवाच्या काठावर तरी हात मारल्यासारखं).
०००

प्रतिसाद न मिळालेलं पत्र
-    
(मेघालयची राजधानी शिलाँग इथे १०-११ फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या साहित्य अकादमी युवा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये केलेलं भाषण.)
-

लेखक म्हणूनचे माझे अनुभव मी सांगावेत, असं मला सुचवण्यात आलंय. अख्ख्या लेखन प्रक्रियेच्या खोलात जाणं बहुतेक माझ्या क्षमतेच्या बाहेरचं काम आहे. किमान आत्ता या क्षणी तरी तो शोध घेणं मला शक्य नाही. त्यामुळं मी काही काळापूर्वी साहित्य अकादमीलाच लिहून पाठवलेलं एक छोटं पत्र वाचून दाखवतो. त्यामुळं किमान माझ्या लेखनानुभवाच्या आजूबाजूला तरी हात मारून काही शोधता येईल, असं वाटतं.

पत्र असं होतं-
प्रिय श्रीमान/श्रीमती,

काही दिवसांपूर्वी ‘स्क्रोल’ या संकेतस्थळावर मी एक रिपोर्ट वाचला- ‘साहित्य अकादमीच्या कार्यक्रमामध्ये एका दलित कवीची मुस्कटदाबी’ (हाउ ए दलित पोएट वॉज ब्राउबिटन इन्टू सायलेन्स अॅट ए साहित्य अकादमी इव्हेन्ट) असं त्याचं शीर्षक होतं. साहित्य अकादमीनं १६ नोव्हेंबर २०१४ रोजी नागरकोएल, तामिळनाडू इथं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तामीळ कवी एन.डी. राजकुमार यांच्याशी गैरवर्तणूक करण्यात आल्याचा घटनाक्रम या रिपोर्टमध्ये नोंदवला होता. हा रिपोर्ट एस. आनंद यांनी लिहिला होता. त्यांच्याच ‘नवयान’ या प्रकाशनानं राजकुमार यांच्या इंग्रजीत अनुवादित झालेल्या कवितांचा संग्रह प्रकाशित केला आहे. ‘नवयान’च्या संकेतस्थळावर राजकुमार यांचा त्या कार्यक्रमातील अनुभव त्यांच्याच शब्दांत देण्यात आलाय, त्यात ते लिहितात-

‘‘१६ नोव्हेंबर २०१४ रोजी, राष्ट्रीय ग्रंथ सप्ताहादरम्यान, मी राहतो त्याच ठिकाणी- नागरकोएलमध्ये साहित्य अकादमीच्या पुस्तक प्रदर्शनादरम्यान बोलण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आलं होतं. विषय होता- ‘माझी कविता आणि मी’. साहित्य अकादमीबद्दल मला प्रचंड आदर असल्यामुळं, मी निमंत्रण स्वीकारलं आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. कार्यक्रमाचं निवेदन करताना आदरणीय आयझॅक सॅम्युअल नायगम (नागरकोएलमधल्याच स्कॉट ख्रिश्चन महाविद्यालयातील तामीळ विभागातील शिक्षक) यांनी माझी ओळख करून देताना सांगितलं की, ‘कन्नदसन, मु. मेहता, वैरमुथू, इत्यादींच्या परंपरेतील जादुई कवी एन. डी. राजकुमार आता आपल्यासमोर मनोगत मांडणार आहे.’ त्यानंतर ते त्यांच्या जागी जाऊन बसले.

मी व्याख्यानाच्या सुरुवातीलाच म्हणालो, ‘आदरणीय आयझॅक सॅम्युएल नायगम यांनी माझी ओळख करून देताना कन्नदसन, मु. मेहता व वैरमुथू (हे सर्व तामिळमधील आदरणीय आजी-माजी कवी आहेत) यांच्या परंपरेतच माझा उल्लेख केला. परंतु मी नम्रपणे हे सांगू इच्छितो की, मी स्वतःला त्याच साहित्यिक परंपरेतला मानत नाही. मी पूर्णपणे वेगळ्या साहित्यिक मार्गावरून चालतो आहे. मला त्यांच्या साहित्यिक कामाबद्दल काहीही मत द्यायचं नाही. असो. आता मी मला देण्यात आलेल्या विषयावर विचार मांडतो..’ तेवढ्यात प्रेक्षकांमधले पाच लोक उठले आणि त्यांनी अद्वातद्वा भाषेत माझ्या विरोधात घोषणा करत माझं बोलणं मधेच तोडलं. पाचांपैकी एकानं मला मूठ वळून दाखवली. धमकी दिल्यासारखं बोट रोखून धरत तो मला म्हणाला की, कन्नदसन यांचा ‘अपमान’ केल्यावर आता तू सभागृहातून सुरक्षितपणे बाहेर कसा जाशील.. त्याच्यासोबतचे इतर चौघेही उठले नि मला धमकावू लागले. परिणामी मला माझं व्याख्यान सुरू करता येईना.

मी कन्नदसन यांच्यावर टीका केली नाही. मी त्यांच्याबद्दल वेगळं काही बोललोही नाही. फक्त मी त्यांच्या परंपरेत बसत नाही एवढंच मत नोंदवलं. शिवाय मला देण्यात आलेल्या विषयावर मला बोलू द्यावं, अशी विनंती शांत सुरात मी केली. पण तरीही ते माझ्याविरोधात धमकावणीच्या सुरातच बोलत होते. मला बोलताच येऊ नये इतका गोंधळ ते घालत होते. त्यानंतर मी कार्यक्रमाच्या संयोजकांना विनंती केली की, त्यांनी मला बोलता येईल इतपत वातावरण कायम ठेवण्यासाठी उपाययोजना करावी. पण त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांकडं दुर्लक्ष केलं, उलट मंचावर येऊन मला धरून खाली बसवलं.’’


या कथनातील घटनाक्रमात तथ्य असेल तर- साहित्य अकादमीच्या मंचावरून राजकुमार यांना अशा प्रकारची गैरवागणूक मिळावी हे अतिशय दुःख देणारं आहे.

मी स्वतःला फारसा नैतिक माणूस मानत नाही. पण एक व्यक्ती जी नैतिकता पाळू शकणार नाही, ती पाळण्याची क्षमता एका संस्थेमध्ये असू शकते, असा विश्वास वाटतो. आणि इथं साहित्य अकादमीसारख्या संस्थेचा संदर्भ आहे. राजकुमार यांनीही तिच्याबद्दल मोठा आदर असल्याचं म्हटलं आहे. तर मग या घटनाक्रमाबद्दल साहित्य अकादमीनं स्वतःची वेगळी बाजू असल्यास ती मांडायला हवी, आणि त्यासंदर्भात राजकुमार यांच्याशी बोलायला हवं. ‘नवयान’च्या संकेतस्थळावर राजकुमार यांच्या कथनानंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात साहित्य अकादमीनं माफी मागावी अशी मागणी करण्यात आलेय.

साहित्य अकादमीतील कोणाशीही माझी व्यक्तिगत पातळीवर ओळख नाही किंवा नवयान प्रकाशन वा राजकुमार यांच्याशीही माझा व्यक्तिगत परिचय नाही, पण साहित्य अकादमीचा पुरस्कारार्थी म्हणून ही मेल पाठवणं ही मला माझी जबाबदारी वाटली.
माझं पत्र इथं संपतं. हे पत्र साहित्य अकादमीचे सचिव (२६ नोव्हेंबर २०१४) व अध्यक्ष (१९ डिसेंबर २०१४) अशा दोन्हींना अकादमीच्या संकेतस्थळावर दिलेल्या त्यांच्या अधिकृत ई-मेल पत्त्यावर मी पाठवलं. दरम्यानच्या काळात, ३१ डिसेंबर २०१४पूर्वी हे भाषण लिहून पाठवण्यासंबंधीची सूचना माझ्यापर्यंत आली, जेणेकरून अकादमी भाषण छापून घेऊन पुरस्कार सोहळ्याच्या वेळी (१०-११ फेब्रुवारी २०१५) त्याच्या प्रती वितरीत करू शकेल. ती मेल इथं उपस्थित सर्वांना फॉरवर्ड करायचा हा प्रयत्न म्हणजे हे भाषण. समस्या सोडवण्याचा मार्ग शब्दांच्या वाटेवरून सापडू शकतो, यावर विश्वास ठेवण्यापलीकडं एका लेखकाकडं दुसरा कुठला पर्याय आहे! अक्षरांवरची नि शब्दांवरची श्रद्धा कायम राहावी या पलीकडं एक लेखक करतो तरी काय?

हे भाषण लिहून काढण्यापूर्वी मी राजकुमार यांचा काही मोबाइल नंबर वगैरे मिळतोय का ते शोधण्याचा प्रयत्न केला. या मुद्द्यावर काही नवीन घडामोड झाली आहे काय, हे विचारता येईल म्हणून. त्यासाठी मी ‘नवयान’ला संपर्क केला. या विषयावर पुढं काहीच झालेलं नाही, असं त्यांनी कळवलं, पण राजकुमार यांचा नंबर मिळवण्याचा माझा प्रयत्न मात्र यशस्वी झाला नाही (हे भाषण लिहेपर्यंत तरी. पण नंतर काही दिवसांनी ‘नवयान’कडून राजकुमार यांचा नंबर मिळाला. त्यावर त्यांना संपर्क साधला, पण आमच्या दोघांनाही कळेल अशी कुठलीच एक भाषा निघाली नाही, त्यामुळं फारसं बोलता आलं नाही). दरम्यान, ‘नवयान’च्या संकेतस्थळावरच्या माफीची मागणी करणाऱ्या निवेदनावर सही केलेल्यांपैकी एक, आणि मला ज्यांच्याबद्दल आदर वाटतो, अशा एका व्यक्तीला मी संपर्क साधला. या मुद्द्यावर आणखी तिसऱ्याच व्यक्तीकडून खातरजमा करून घ्यावी, एवढाच हेतू. हे सगळं करून झाल्यावर आता मी हे पत्र तुमच्यासमोर का वाचतोय, याबद्दल मी निश्चिंत झालोय.

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशात आपण राहतो. आपण राहतो त्या या देशातली ‘नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्स’ एका कार्यक्रमात वीसेक भाषांमधल्या लेखकांना पुरस्कार देते. या देशाचा नुसता भौगोलिक पसारासुद्धा अचंबित करणारा आहे. आपण एकच इतिहास राखून आहोत का किंवा आपल्यामध्ये काही सांस्कृतिक साम्य आहे काय, याबद्दल मला खात्री नाही. काही प्रमाणात असेल, पण त्याबद्दल खात्रीनं काही सांगावं अशी माहिती माझ्याकडं नाही. पण, आपण हा भूगोल मात्र आपापसात वाटून घेतलेला आहे, एवढं नक्की. आपल्याकडच्या काही कागदपत्रांवरून आपण भारत नावाच्या देशाचे नागरीक आहोत, हे सिद्ध होतं, एवढ्यापुरतं तरी नक्की. पण मग यामुळं, या देशात होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अन्यायाबद्दलचा किंवा दडपशाहीबद्दलचा अपराधीपणा वाटून घ्यायची जबाबदारीही आपल्यावर येते का? भूगोल नि देशाची मर्यादा इथं नोंदवतोय त्याचं कारण एवढंच की हा भूगोल नि त्यावर पसरलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतींचा उत्सव साजरा करणाऱ्या एका राष्ट्रीय संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला ह्या उत्सवाचा आदर आहे आणि त्याचा भाग होण्याचा आनंदही वाटतोय, पण त्यासोबतच अपराधीही वाटतंय. आनंद कशाचा, तर अपराध भाव तुमच्यासोबत वाटून घ्यायला मला किमान शब्द तरी वापरता येतायंत, याचा. पण त्याच वेळी दुःखी पण वाटतं, कारण ह्या शब्दांना काही प्रतिसाद मिळत नाही.

वरती लिहिलेल्या पत्रामध्ये जो काही घटनाक्रम सांगितलाय त्याबद्दलचा अपराधीभाव मला जाणवला, म्हणून मुळात ते पत्र लिहिलं. पण असं स्वतःबद्दल अपराधी वाटावं अशी ती एकच घटना आहे असंही नाही. यापेक्षा अधिक गंभीर कित्येक घटना आहेत. आपण इथं शिलाँगमध्ये (मेघालय) साहित्याचा उत्सव साजरा करतोय आणि शेजारच्या मणीपूर राज्यात, शस्त्रांपेक्षा माणसांवर जास्त विश्वास दाखवावा, या मागणीसाठी ४२ वर्षांच्या इरोम शर्मिला गेली १४-१५ वर्षं उपोषण करतायंत. सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीला सहानुभूतीनं प्रतिसाद देण्याऐवजी आपण तिला जबरदस्तीनं अन्न भरवत राहतो. त्याच राज्यात दहाएक वर्षांपूर्वी मनोरमा देवी या तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. त्या प्रकरणातले आरोपी सशस्त्र दलांमधले होते, त्यामुळं न्याय मिळाला नाहीच. इथं पण माणसांपेक्षा शस्त्रांवरचा विश्वास दिसून आला. या दोन उदाहरणांवरून आपली राज्ययंत्रणा कशावर विश्वास ठेवते हे कळून येतं. दुसरीकडं, काही काळापूर्वीच सत्तरेक आदिवासींना आसाममधल्या बंडखोरांनी मारून टाकल्याची घटनाही ताजी आहे, प्रस्थापित राज्ययंत्रणेवर विश्वास नसलेल्या या मंडळींनाही माणसांपेक्षा शस्त्रांना प्राधान्य द्यावंसं वाटतं. पण हे तर युद्ध सुरू आहे नि मग लोक मरणारच, असा युक्तिवाद करून प्रत्येक वेळी आपली सुटका होऊ शकत नाही. हा युक्तिवाद दोन्ही बाजूंनी केला जाऊ शकतो आणि प्रत्येक वेळी त्यात काही तथ्य असतंच असं नाही. आणि लोक जर मरायचेच असतील, तर मग उपोषणाला बसलेल्या एका स्त्रीला बळजबरीनं अन्न कशाला भरवायचं?

माझ्या माहितीतल्या या काही घटना सांगितल्या, पण अशी दुःखद उदाहरणं अर्थातच कित्येक असतील. शिवाय हे भाषण लिहीत असताना, आपल्या या उत्सवाचं ठिकाण आणि या घटनांची ठिकाणं जवळजवळ असल्याचं साहजिकपणे मनात आलं, म्हणून त्यांच्याबद्दल बोललं गेलं. पण अन्यायाला भूगोलाची मर्यादा असण्याचं कारण नाही. त्यामुळं भूतकाळातल्या नि वर्तमानकाळातल्या, जगाच्या कुठकुठल्या कोपऱ्यात अशा कित्येक घटना असतील, ज्यांच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. पण अशा घटनांसंबंधीच्या माझ्या अपराधीपणाची तरी माहिती मला आहे. किंवा असं म्हणूया की, या अपराधभावातला माझा वाटा काय आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न मी करतोय.

साहित्य अकादमीच्या नागरकोएलमधल्या कार्यक्रमात जे काही झालं, त्यासंबंधीचा अपराधभाव- अकादमीच्या युवा साहित्य पुरस्काराचा स्वीकार करत असतानाच  मी तुमच्यासोबत वाटून घेतोय. किमान आता तरी अकादमी त्या संदर्भात काही हालचाल करेल, अशी आशा आहे.

हा अपराधभाव- लेखकाचा अपराधभाव फक्त एका घटनेपुरता मर्यादित नाही. अन्यायासारखाच तोसुद्धा भूगोलाच्या नि संस्कृतीच्या मर्यादा ओलांडतो. या अपराधभावामुळंच हा लेखक दुःखी होतो. आणि हा अपराधभाव व्यक्त करण्याची क्षमता असल्याचा त्याला आनंदही होतो. कारण ह्या क्षमतेमुळं कधी तरी हा अपराधभाव संपेल अशी शक्यता तरी राहते. पण त्यापूर्वी त्या अपराधभावामागचं कारण तपासायचा प्रयत्न करायला हवा. लिहिण्याचा पर्याय स्वीकारून मी अपराधभावामागचं कारण तपासायचा प्रयत्न करतो. हा पर्याय टिकावा अशी आशा करावी असं मला वाटतं, पण या पर्यायाला माणसासारखं जबरदस्तीनं अन्न भरवून तो जगेल काय, याविषयी शंका वाटते. सध्याच्या हायपर-कनेक्टेड नि माध्यमप्रेमी जगात, लेखकाचे शब्द ऐकलेच जात नसतील आणि त्यांना केवळ पुरस्कार मिळत असतील, तर मग ते बळजबरीनं अन्न भरवण्यासाखंच आहे. पण शब्दांच्या बाबतीत अशा बळजबरीच्या भरवण्याला मर्यादा पडते. हे शब्द, ही अक्षरं मरू नयेत, अशी आशा मला आहे.

हा अपराधभाव मी तुमच्यासोबत वाटून घेतोय, कारण आपण हे सगळं असणंच वाटून घेतोय आणि त्या दरम्यान आपल्याला काय वाटतं हे आपण भाषेचा वापर करून एकमेकांसमोर मांडू शकतो, व्यक्त करू शकतो. खरं तर, अक्षरांच्या नि शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या ह्या महान कलेचा उत्सव आपण इथं साजरा करतोय. पण ह्या वाटून घेण्यातून काही परिणाम होतो काय? व्हावा, अशी आशा मला वाटते. आशा वाटते, कारण मला लिहीत राहायचंय. आणि मी लिहितो, म्हणून मला आशा वाटते.
०००
(‘अ लेटर, अ रायटर अँड लेटर्स’ या इंग्रजी मजकुरावरून लेखकानंच मराठी भाषांतर केलं.)
०००

Sunday 9 August 2015

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस । एक प्रसिद्धी-पत्रक

देशातली ८० टक्के खनिजं व ७० टक्के वनं आणि इतर नैसर्गिक स्त्रोतांची श्रीमंती राखून असलेल्या बहुतेकशा प्रदेशांवर आदिवासी मंडळी राहतात. शिवाय, याच प्रदेशात ९० टक्के कोळशाच्या खाणी आहेत.
  
- द आदिवासी क्वेश्चन: इश्यूज ऑफ लँड, फॉरेस्ट अँड लाइव्हलीहूड, संपादक- इंद्रा मुन्शी. 
(इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमधल्या निवडक लेखांचा संग्रह).

आदिवासी मंडळींची अवस्था येत्या काळात काय होणार आहे, याची कल्पना वरच्या आकडेवारीवरून आपल्याला येऊ शकते. आपल्याला म्हणजे होऊ घातलेल्या महासत्तेतल्या विकसनशील नागरिकांना. आपण दर वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिवस साजरा करतो, नंतर १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस पण साजरा करतो. आता अलीकडं २१ जूनला आपण जगासोबत आंतरराष्ट्रीय योग दिवस पण साजरा केला. या दिवसांचे योग चांगले असल्यामुळं ते साजरे पण जोमानं होतात, पण असाच आणखी एक दिवस आज होता: आंतरराष्ट्रीय मूलनिवासी/आदिवासी दिवस. या दिवसाच्या निमित्तानं ही नोंद होते आहे.


एक

परिवर्तनाचा वाटसरू । १६-३० एप्रिल २०१५
भारत जन आंदोलन आणि अखिल भारतीय आदिवासी महासभा या दोन संघटनांनी गडचिरोली शहरात २२-२३ मार्च २०१५ रोजी 'जनसंघर्षांच्या राष्ट्रीय परिषदे'चं आयोजन केलं होतं. या परिषदेच्या बातम्या मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये साहजिकपणेच आल्या नाहीत. काही वर्तमानपत्रांच्या स्थानिक पुरवण्यांमध्ये उद्घाटनाच्या सत्राची बातमी-फोटो आला होता. या परिषदेच्या समारोपाच्या दिवशी सुमारे पाच हजार ते आठ हजार आदिवासींचा मोर्चा निघाला. 'लोकसभा ना विधानसभा, सबसी उंचा ग्रामसभा', 'मावा माटे, माटे सरकार, मावा नाटे, मावा राज' अशा घोषणा देत निघालेल्या या मोर्चा आदिवासी मंडळी ढोल, नगारे वाजवत सामील झाली होती, कोणी सायकलवर होते, कोणी स्पीकरवर घोषणा देत होते, इत्यादी. या परिषदला प्रत्यक्ष उपस्थित राहून तिथं दिसलेलं नोंदवणारा एक रिपोर्ट 'परिवर्तनाचा वाटसरू' या पाक्षिकाच्या एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात आला होता. परिषदेत दिसलेलं बरं-वाईट त्यात नोंदवलेलं होतं. एका 'राष्ट्रीय' परिषदेनंतरचा हजारो आदिवासी मंडळींचा एक मोर्चा त्यात कॅमेऱ्याला आवश्यक दृश्यबाजी असूनही मराठी वृत्तवाहिन्यांसाठी बातमीचा विषय झाला नाही. वर्तमानपत्रांना तो राज्यस्तरीय बातमीचाही विषय वाटला नाही. या परिषदेत वेगवेगळ्या टप्प्यावर सहभागी असलेल्या व्यक्तींमध्ये डॉ. आनंद तेलतुंबडे, प्रकाश आंबेडकर, वृंदा करात, इत्यादी चांगल्यापैकी प्रसिद्ध नावंही होती. तर अशी ही परिषद झाली नि गेली. तेव्हा आदिवासींचा एक मोर्चा आला नि गेला. आज आदिवासींचा दिवस म्हणून त्याचं निमित्त करून आपण काही महिने आधीच्या एका प्रसंगाचा हा उल्लेख फक्त केला. भूसंपादन कायदा, वनहक्क कायदा, पेसा कायदा ['पंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम'।वाचा: मिलिंद बोकिलांचा लेख.] इत्यादी मुद्द्यांवर कमी-अधिक चर्चा करण्याचा प्रयत्न हा या परिषदेचा एक उद्देश होता. 

[या संबंधीच्या बातम्या मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांमध्ये का येत नसाव्यात, याचा अंदाज बांधण्यासाठी रेघेवरची ही नोंद चाळता येईल : एक आठवडा + पाच हजार आदिवासी = किती बातम्या?]


दोन

आता आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस होता. या वर्षी या दिवसाचा 'स्पॉटलाइट' आदिवासींच्या आरोग्यावर असेल, असं 'संयुक्त राष्ट्र संघटने'नं म्हटलं होतं. त्या निमित्तानं सरचिटणीस बान की-मून त्यांच्या पदाला साजेशा आशावादानं म्हणतात, 'जगातील आदिवासी लोकांच्या या आंतरराष्ट्रीय दिवसाच्या निमित्तानं मी जागतिक समुदायाला आवाहन करतो की, हे लोक मागे पडू नयेत याची खबरदारी आपण घेऊया. अधिक चांगला आणि न्याय्य भविष्यकाळ घडवण्यासाठी आदिवासी लोकांचं आरोग्य सुधारावं व त्यांचं कल्याण व्हावं याकरता आपण सर्व प्रयत्न करूया.'

आपण या नोंदीच्या सुरुवातीला नोंदवली ती आकडेवारी बऱ्याच गोष्टींसाठी उपयोगी असलेल्या कच्च्या मालाची आहे. तो कच्चा माल कोणाच्या मालकीचा? त्यातून कल्याण कोणाचं होणार? कल्याण ज्यांचं कोणाचं होईल ते लोक कच्च्या मालाच्या मालकांना काय देणार? की कच्च्या मालाच्या मालकांना संपवून सरळ आपण गुपचूप तो माल घेऊन टाकायचाय? असे काही प्रश्न या विषयाशी संबंधित अभ्यासक, पत्रकार इत्यादींनी बोलण्यासारखे आहेत. हे प्रश्न सगळ्यांशीच संबंधितही आहेत, कारण त्या कच्च्या मालाची पक्की फळं सगळ्यांना कमी-अधिक प्रमाणात हवी असतात. तर त्या कच्च्या-पक्क्या फळांची चर्चा करायचं एक निमित्त आजच्या आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवसानं दिलं होतं. त्यासंबंधी काही चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये झालेली तुम्हाला दिसली का? रेघेला दिसली नाही. (काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक प्रसिद्धी-पत्रक काढल्याची बातमी तेवढी दिसली).

अशी काही चर्चा करायचा प्रयत्न गडचिरोलीतल्या धानोरा तालुक्यात आज झाला. भारत जन आंदोलन जिल्हा समिती (गडचिरोली) व धानोरा तालुक्यातील ग्रामसभांच्या वतीने आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यासंबंधी प्रशासनानं काही परवानगी नाकारल्याची बातमी 'पीटीआय'नं काल दिली होती. यासंबंधीचं प्रसिद्धी-पत्रक रेघेकडे भारत जन आंदोलनाच्या प्रतिनिधीने पाठवलं. तसंच आज झालेल्या कार्यक्रमाचं प्रसिद्धी-पत्रकही रेघेकडे आलं, ते आपण नोंदीच्या या भागात नोंदवतो आहोत.

या प्रसिद्धी-पत्रकात सुरुवातीला असा आरोप करण्यात आला आहे ('पीटीआय'ची बातमी याच संदर्भातली आहे):
जिल्हा प्रशासनाने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३७.(१) व (३) लागू केल्याचे कारण दाखवून कार्यक्रमाला लाउड स्पीकर मंजुरी नाकारली होती. व आज सकाळपासून पोलीस कार्यक्रम स्थळी येऊन आयोजक व जमलेल्या लोकांना ‘तुम्ही कार्यक्रम घेऊ शकत नाही. सगळे आपआपल्या गावी निघून जा’ अश्याप्रकारे धमकावू लागले. ‘कार्यक्रमाची मंजुरी नाही असे लिखित आदेश दाखवा’ अशी विचारणा जेव्हा आयोजकांनी केली तेव्हा पोलिसांनी काढता पाय घेतला. पोलिसांनी आदिवासी बहुल कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड तालुक्यातील कार्यक्रमांना मंजुरी नाकारली पण जिल्ह्याच्या ठिकाणी झालेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यक्रम मात्र सुरळीत जोरदार आवाजात सुरू होता.
त्यानंतर या प्रसिद्धी-पत्रकात धानोरा तालुक्यात झालेल्या सदर कार्यक्रमातील वक्त्यांच्या भाषणांचा तपशील आहे, तो असा:
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना महेश राऊत म्हणाले की, “कोलंबस व इतर साम्राज्यवादी लोकांनी आदिवासी जनतेवर केलेल्या शोषणाचा विरोध म्हणून आपण आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करतो. हा दिवस साजरा करणे म्हणजे आदिवासींची अस्मिता, अस्तित्व व खऱ्या स्वतंत्राचा संघर्ष करणे होय. आपल्या जल-जंगल-जमीन व संसाधनांची मालकी स्थापित करणे होय. राणी दुर्गावती, बाबुराव शेडमाके, बिरसा मुंडा आणि आम्हा आदिवासींचा संघर्षशील इतिहास जिवंत ठेवणे होय”. प्रमुख भाषणात माजी आमदार व भारत जन आंदोलनाचे गडचिरोली जिल्हा संयोजक  हिरामण वरखडे म्हणाले, “जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या देशाला इथल्या मूळनिवासी आदिवासींची संख्या विचारली, तेव्हा आपल्या भारताच्या सरकारने इथे कोणी मूळनिवासी नाहीत असा अहवाल पाठविला आणि त्यांनी इथल्या आदिवासींचे अस्तित्वच नाकारले. आज आपण आपल्या अधिकारासाठी पेसा कायदा, वन हक्क कायदा, पाचवी अनुसूची यांची प्रभावी अंमलबजावणी करून गाव-गणराज्य ग्रामसभा व्यवस्था मजबूत करणे गरजेचं आहे. आपली संस्कृती, प्रथा, परंपरा, आपली संसाधने यांचे रक्षण करणे गरजेचं आहे तेव्हा कुठे आपले अस्तित्व टिकून राहील”. पोलीस विभागाच्या दडपशाहीचा व वर्तमान सरकारने चालविलेल्या आदिवासी विरोधी धोरणांचा धिक्कार करताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार म्हणाले, “वर्तमान भाजपा सरकार आदिवासीच्या अधिकारांना हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जमीन अधिग्रहण कायदा, महाराष्ट्र ग्रामवन नियम, कोळसा व इतर खदान कायदे हे आदिवासींकडून त्यांच्या जंगल जमिनी लुटण्यासाठी लागू करीत आहे. ह्या शोषक बाबींचा आपण जोरदार विरोध करणे गरजेच आहे. आदिवासींनी आपल्या अस्तित्वा साठी एकजूट होऊन, संगठीत होऊन संघर्ष करावा”. अॅडव्होकेट जगदीश मेश्राम यांनी जिल्हा प्रशासन व पोलीसांच्या आदिवासी विरोधी भूमिकेचा निषेध केला “आदिवासींनी एकत्र येऊन आपल्या अधिकारासाठी संघर्ष करणे आज सरकारला नको आहे, फक्त आम्ही योजनांसाठी रांगेने सरकारी कार्यक्रमात सहभागी व्हावे पण आपले स्वताचे कार्यक्रम करू नये असेच सरकारला वाटते म्हणूनच त्यांनी आज ग्रामसभांद्वारे आयोजित आदिवासी दिवस कार्यक्रमाला अडचणी निर्माण केल्या”. पेसा कायदा, वन हक्क कायदा व आदिवासी अधिकारांच्या बाबतीत माधो कुमोटी, महादू नरोटे, छायाताई पोटावी, बावसू पावे, जास्वंदा आदी प्रमुख व्यक्त्यांनी मार्गदर्शन केले. गडचिरोली जिल्ह्यात येऊन ठेपलेला विस्थापनाचा धोका, आदिवासींवर वाढते अन्याय व अत्याचार या विरोधात आदिवासींची व इतर जनतेची सामूहिक एकता निर्माण करून संघर्ष करण्याच्या निर्धार करण्यात आला. आदिवासींचे अधिकार, अस्मिता, अस्तित्व व स्वातंत्राच्या मुद्यांवर विशेष ठराव सदर कार्यक्रमात पारीत करण्यात आला. 
कार्यक्रमात मंजूर झालेल्या ठरावाची प्रतही भारत जन आंदोलनाच्या प्रतिनिधीनं रेघेला दिली आहे, ती अशी:

९ ऑगस्ट २०१५- “आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस” ठराव
दिनांक ९ ऑगस्ट २०१५  “आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस” कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील, धानोरा तालुक्यातील, किसान भवन धानोरा येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमात खालील ठराव पारीत केल्या गेलेत.
१. आज ९ ऑगस्ट २०१५ ला धानोरा येथे आयोजित “आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस” कार्यक्रमाला अडथळा आणण्यासाठी प्रशासनाने कलम ३७. (१) व (३) लागू करून कार्यक्रमाला मंजुरी नाकारली. सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमाला काही अडचण नाही पण सामान्य लोकांना मंजुरी नाकारणे, ह्या दुपट्टी धोरणांचा आम्ही धिक्कार करतो.
२. भारत सरकारने आपल्या देशात मूळनिवासी आदिवासी नाहीत असा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाला पाठवून आदिवासीचे अस्तित्व नाकारले आहे. आम्ही सरकारच्या ह्या आदिवासीविरोधी नीतीचा निषेध करतो व भारतातील संपूर्ण आदिवासींचा मूळनिवासी दर्जा प्रस्थापित करण्यात यावा.
३. लघु वनउपजांवरील ग्रामसभेच्या अधिकारांना मान्यता देवून, वन-उपजांवर संपूर्ण स्वामित्व मिळवण्याच्या संघर्षांना मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला. पेसा कायदा व वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
४. आदिवासी क्षेत्रातील शिक्षण, आरोग्य व्यवस्था संपूर्णपणे कोलमडून गेली आहे. आदिवासींना रोजगाराच्या संधी कमी केल्या जात आहेत. आदिवासींच्या अधिकारच शिक्षण व आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात यावी.
५. आदिवासी क्षेत्रांसोबातच इतरही क्षेत्रांत स्थानिक मातृभाषेमध्ये प्राथमिक शिक्षणाचा मिळायला हवे आणि सर्व आदिवासींच्या मातृभाषांना संविधानिक दर्जा देण्यात यावा व आदिवासी समुदायाचा संघर्षशील इतिहास, समतावादी सांस्कृतिक व्यवस्था पाठ्यक्रमात समाविष्ट करण्यात यावी.
६. गाव-गणराज्य ग्रामसभेच्या सर्वोच्च अधिकारांना कायम करणे आणि वन व्यवस्थेला अधिक लोकतांत्रित बनविण्यासाठी संघर्ष मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.
७. खासगीकरण, भांडवशाहीला वाढवणारे आणि फक्त कॉर्पोरेट लुटीसाठी श्रम, पर्यावरण आणि प्राकृतिक संसाधन व आदिवासी कायद्यांमध्ये शोषक बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियांचा विरोध करण्यात आला. आणि जन विरोधी कायदे, धोरण यांच्या विरोधात संघर्ष मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
८. जनसहमतीला नाकारणाऱ्या जमीन अधिग्रहणाला आम्ही विरोध करतो. जमीन अधिग्रहण कायदा, २०१३ च्या शेतकरी विरोधी व अन्य गैर-लोकतांत्रिक तरतुदींना आम्ही ख़ारीज करतो. आणि सध्याच्या सरकारने प्रस्तावित केलेल्या जमीन अधिग्रहण अध्यादेश २०१४  मध्ये पुन्हा अधिक जनविरोधी धोरणे बनवण्याच्या प्रयत्नांचा आम्ही धिक्कार करतो आणि प्रस्थावित अध्यादेश नाकारतो. ह्या सोबतच जनविरोधी कोळसा खासगीकरण कायदा, खनिज संपत्तीचे दहन करणाऱ्या कायद्यांचा विरोध करण्यात आला.
९. कॉर्पोरेट दलाली व गैरकानुनी प्रयत्नापासून सरकारने दूर व्हावे आणि ग्रामसभेच्या सहमतीशिवाय कोणत्याही कंपनी किंवा प्रकल्प, परियोजनेकरिता दिलेलं जंगल व जमीन रद्द करून लोकांना वापस करण्यात यावी.

या ठरावातील तीन, सहा, आठ क्रमांकाच्या मुद्द्यांवर चर्चा करणं किती महत्त्वाचं आहे, हे नोंदीच्या सुरुवातीला दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट व्हावं. मतभेद होऊ शकतील, पण या मुद्द्यांवर चर्चा तरी व्हायला हवी. चर्चेसाठी या लोकांचा आवाज लाउड करणार कोण, हाही एक प्रश्न आहे. कार्यक्रमात लाउड-स्पीकर वापरायचा नाही आणि तरीही जो काही कार्यक्रम होईल त्याचा आवाज लाउड करण्यात प्रसारमाध्यमांना इंटरेस्ट नाही, अशा या म्यूट मंडळींसाठीचा आजचा दिवस होता. आणि आता सहा दिवसांनी येईल तो दिवस लाउड-स्पीकरचा असेल.

आज धानोऱ्यात झालेल्या या कार्यक्रमादरम्यानचे भारत जन आंदोलनाच्या प्रतिनिधीनंच रेघेकडे पाठवलेले दोन फोटो:

कार्यक्रमात लाउड स्पीकरशिवाय उपस्थितांशी संवाद साधताना वक्ते

हजारो आदिवासी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती, असे भारत जन आंदोलनाचं प्रसिद्धी-पत्रक सांगतं.

Thursday 30 July 2015

फाशी- जॉर्ज ऑर्वेल

मुंबईमधल्या १९९३ सालच्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेनन याला आज सकाळी साडेसहा वाजता नागपूरमधील तुरुंगात फाशी देण्यात आलं. त्या निमित्तानं ही नोंद आहे. संदर्भ वेगळे वाटतील, गुन्ह्यांचा तपशील वेगळा वाटेल, मुद्दा एकच. आत्ताच हे कशाला, असा प्रश्न ज्यांच्या मनात येईल, त्याचं उत्तर म्हणूनच हा लेख मराठीत नोंदवला आहे. कारण हे कधीही असंच असणारं.

जॉर्ज ऑर्वेल (१९०३-१९५०) हा ‘ब्रिटिश इम्पीरियल पोलिस सेवे’चा भाग म्हणून ब्रह्मदेशात काम करत असताना एका भारतीय कैद्याला दिलेली फाशी त्यानं प्रत्यक्ष पाहिली होती. त्या अनुभवावर त्यानं लिहिलेला लेख १९३१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्याचा हा अनुवाद. (मूळ इंग्रजी लेख इथे वाचता येईल.)
 ***

किंकाळी: एडवर्ड मंक यांचं प्रसिद्ध चित्र [इथून]
ही ब्रह्मदेशातली घटना आहे. पावसाळी सकाळ होती. टिन फॉइलच्या पिवळ्या दिव्याचा फिकट प्रकाश कारागृहाच्या उंच भिंतींवर लटकत होता. प्राण्यांच्या पिंजऱ्यांप्रमाणे मोठे गज लावलेल्या कोठड्यांबाहेर उभे राहून आम्ही वाट पाहत होतो. प्रत्येक कोठडी दहा बाय दहा फुटांची होती. एक साधी कॉट आणि पिण्याच्या पाण्याचं भांडं सोडल्यास ती जवळजवळ रिकामीच होती. काही कोठड्यांमधे काळपटलेली माणसं गुडघे मुडपून बसलेली होती. फाशीची शिक्षा ठोठावलेले हे लोक. येत्या आठवड्यात किंवा दोन आठवड्यांत त्यांची शिक्षा अमलात येणार होती.

एका कैद्याला बराकीतून बाहेर काढण्यात आलं. बारीकसा हिंदू मनुष्य होता. पूर्ण भादरलेले केस, अस्पष्ट पाणीदार डोळे, त्याच्या शरीराच्या आकाराशी न जुळणाऱ्या जाडजूड मिशा असा तो कैदी. त्याच्या मिशा चित्रपटातल्या विनोदी पात्राप्रमाणे वाटत होत्या. पहाऱ्यासाठी असलेले सहा उंच भारतीय वॉर्डर फाशीसाठीच्या खांबापर्यंत घेऊन जायला त्याला तयार करत होते. दोघंजण संगीनधारी बंदुका घेऊन उभे होते, तर बाकीचे त्याला हातकड्या घालून, त्या एका साखळीत अडकवून, साखळी आपल्या कमरेच्या पट्‌ट्यांना बांधण्यात गुंतले होते. त्याचे हात त्याच्या शरीराला घट्ट बांधण्यात आले. वॉर्डर त्याच्या खूप जवळ उभे होते आणि त्यांचे हात त्याच्याभोवती एवढ्या काळजीपूर्वक फिरत होते की तो तिथं खरंच आहे ना याची ते खात्री करतायंत असं वाटावं. कधीही पाण्यात उडी मारून परत जाईल असा जिवंत मासा हातात घेतल्यावर माणूस कसा वागतो तसंच ते चित्र होतं. पण तो जवळपास विरोध न करताच उभा होता, दोऱ्यांभोवती तो हळुवारपणे हात गुंडाळत होता. जणू काय चाललंय याचा त्याला पत्ताच नव्हता.

आठ वाजले. दूरवरच्या बराकींमधे बिगुल वाजलेला दमट हवेतून ऐकू आला. आमच्यापासून दूरवर उभं राहून हातातल्या काठीने जमिनीवरच्या दगडांना उदासपणे उडवत असलेल्या तुरुंग अधीक्षकांनी आवाजाच्या दिशेने तोंड फिरवून पाहिलं. पांढऱ्याया पडत चाललेल्या मिशा असलेले ते एक सैनिकी डॉक्टर होते. ‘‘फ्रान्सिस, जरा पटकन आटप रे बाबा!’’ ते किरकिरत्या आवाजात ओरडले. ‘‘एव्हाना तो मेलेला असायला हवा होता. आणि अजूनही तूच तयारीत नाहीस?’’

फ्रान्सिस हा तुरुंगप्रमुख. पांढरा गणवेश नि सोन्याच्या कडांचा चष्मा घातलेला दक्षिण भारतीय. तो हात हलवत म्हणाला, ‘‘होय, होय सर.. सगळं ठीक झालंय आता. जल्लादही तयार आहे. आपण निघायला हवं.’’

‘‘बरंय, मग उरक आता. हे काम आटपेपर्यंत बाकीच्या कैद्यांना जेवण मिळणार नाही.’’

आम्ही वधस्तंभाच्या दिशेने वळलो. कैद्याच्या दोन्ही बाजूंना दोन वॉर्डर बंदुका घेऊन होतेच. शिवाय त्याच्या आणखी जवळून चालणाऱ्या दोन वॉर्डरांनी त्याला हाताला नि खांद्याला धरलं होतं. एकाच वेळी ते त्याला ढकलतायंत नि आधारसुद्धा देतायंत असं वाटत होतं. आमच्याबरोबर असलेले न्यायदंडाधिकारी आणि इतर अधिकारी त्यामागून चालत होते. दहाएक मीटरचं अंतर चालून झालं असेल तेवढ्यात एकदम कोणत्याही आदेशाशिवाय किंवा सूचनेशिवाय हा जथ्था थांबला. एक विचित्र घटना झाली होती. कधी कोणास ठाऊक, पण एक कुत्रा आवारात आला होता. मोठमोठ्यानं भुंकत तो आमच्यापर्यंत आला. एवढी सगळी माणसं एकत्र बघून भेदरलेला तो शेपटी हलवत भोवताली फिरू लागला. त्याला कोणी थांबवण्यापूर्वीच त्यानं अचानक कैद्याकडे झेप घेतली आणि उडी मारून त्याचा चेहरा चाटण्याचा प्रयत्न केला. उरलेले सगळेचजण स्तब्ध होऊन पाहत राहिले. कुत्र्याला पकडायलाही पटकन कोणी पुढं होईना.

‘‘ह्या साल्या कुत्र्याला कोणी आत येऊ दिलं?’’ अधीक्षक चिडून म्हणाले. ‘‘कोणी तरी पकडा रे त्याला!’’

जथ्थ्यातून बाहेर पडून एक वॉर्डर कुत्र्याच्या मागे लागला, पण तो त्याच्या हाती येईना. एका तरुण युरोपीय अधिकाऱ्यानं दगड मारून कुत्र्याला हटवायचा प्रयत्न केला; पण त्यानं दगडांचा मारा चुकवला आणि तो परत आम्ही उभे होतो तिथं आला. तुरुंगाच्या भिंतींमध्ये त्याच्या भुंकण्याचा आवाज घुमत होता. हा जणू फाशीपूर्वीच्या प्रक्रियेचाच काही तरी भाग असावा अशा पद्धतीने कैदी कोणत्याही कुतूहलाविना हे सगळं पाहत होता. काही मिनिटांनी कुत्र्याला कोणी तरी पकडलं. त्याच्या तोंडाभोवती माझा रुमाल अडकवून आम्ही पुढं निघालो.

वधस्तंभापासून चाळीस मीटरच्या आसपास मी कैद्याची काळपट पाठ पाहिली. तो माझ्या समोरच चालत होता. तो हात बांधलेल्या अवस्थेत, जरा अवघडून बऱ्यापैकी हळू पावलं टाकत होता. प्रत्येक पावलाबरोबर त्याचं मांस आणि हाडांची हालचाल स्पष्ट दिसत होती नि ओल्या मातीवर त्याची पावलं स्पष्ट उठत होती. त्याला दोघादोघांनी धरून ठेवलेलं असतानाही एकदा वाटेत आलेला खड्डा चुकवण्यासाठी तो जरा बाजूला होऊन पुढं गेला.

सुदृढ आणि शुद्धावस्थेत असलेल्या माणसाला संपवणं म्हणजे काय ते त्या क्षणापर्यंत मला कधीही अजिबातच जाणवलेलं नव्हतं. तो कैदी खड्डा चुकवण्यासाठी जरा बाजूला सरला तेव्हा मला ते गूढ उकललं. पूर्ण जोमानिशी सुरू असलेलं जीवन मधेच तोडून टाकण्यातली गफलत माझ्यासमोर स्पष्ट उभी ठाकली. हा माणूस मरत नव्हता. आम्ही जसे जिवंत होतो तसाच तो जिवंत होता. त्याच्या शरीराचे सगळे भाग व्यवस्थित काम करत होते. जठर अन्न पचवत होतं, त्वचा स्वतःची निगा राखत होती, नखं वाढत होती... आपसूकपणे हे सगळं सुरू होतं. तो वधस्तंभावर चढण्यासाठी उभा राहील. एक दशांश सेकंदात तो हवेत उडी घेऊन खाली पडेल त्या क्षणीही त्याची नखं वाढत असतील. खालची खडी नि बाजूच्या राखाडी भिंती हे सगळं तो पाहत होता आणि तरी त्याचा मेंदू तर्काधिष्ठित विचार करू शकत होता. खालच्या खड्‌ड्याची जाणीव त्याला होती. तो आणि आम्ही सगळे एकत्र चालणारी माणसं होतो. पाहत होतो, ऐकत होतो, जाणून घेत होतो. एकच जग समजून घेत होतो. आणि दोन मिनिटांत, एका क्षणात आमच्यातला एकजण गेलेला असणार होता. एक मन कमी होणार होतं, एक जग कमी होणार होतं.

वधस्तंभ तुरुंगाच्या मुख्य इमारतीपासून जरा बाजूच्या लहानशा जागेत अनेक शोक पचवत उभा होता. तीन बाजूंनी विटांच्या भिंती असलेली ती एक शेडवजा जागा होती. वर एक लाकडी फळी होती. त्यावर दोन बाजूंना मोठे बीम होते आणि त्यामधून एक बार गेलेला नि त्याला दोरी लटकत होती. तुरुंगाच्या पांढऱ्या गणवेशात उभा असलेला जल्लाद, केस पांढरे होत आलेला एक कैदीच, खटक्याचा दांडा असलेल्या यंत्राजवळ उभा होता. आम्ही तिथं गेलो तसा तो आमच्यासमोर खाली झुकला. फ्रान्सिसच्या सूचनेनुसार कैद्याला आधीपेक्षाही जवळून पकडून असलेल्या दोघा वॉर्डरांनी त्याला जवळपास ढकलून वधस्तंभापर्यंत नेलं. पायऱ्यांवरून ते त्याला वर घेऊन गेले. त्यानंतर जल्लाद वर चढला आणि त्यानं दोरी कैद्याच्या मानेभोवती घट्ट केली.

आम्ही पाचेक मीटरच्या अंतरावर उभे राहून बघत होतो. वधस्तंभाभोवती वॉर्डरांचं एक वर्तुळच बनलं होतं. आणि फास पक्का केल्यावर लगेच कैदी रडून देवाचं नाव घेऊ लागला. मोठ्या आवाजात सलग तो ‘राम, राम, राम, राम’ उच्चारू लागला. गडबडीत आणि भीतीनं केलेल्या प्रार्थनेसारखं ते उच्चारण नव्हतं. स्थिर, ताल असलेलं, घंटा वाजते तशा पद्धतीनं तो देवाचं नाव एकसंधपणे घेत होता. तिकडे कुत्र्यानं दबलेल्या आवाजात रडणं सुरू केलेलं ऐकू येत होतं. जल्लाद अजून वधस्तंभावरच उभा होता. पिठाच्या पोत्याप्रमाणे वाटणारी एक लहानशी कॉटनची पिशवी त्यानं आणली आणि ती कैद्याच्या चेहऱ्यावर घातली. त्या कापडामुळे अडलेला पण तरीही सतत येणारा ‘राम, राम, राम, राम’ उच्चारणाचा आवाज सुरूच होता.

जल्लाद पायऱ्यांवरून खाली उतरला आणि खटक्याच्या दांड्याजवळ येऊन दांडा हातात धरून उभा राहिला. मिनिटं जाताना कळत होती. कैद्याचं रडणं आणि ‘राम, राम, राम, राम’ उच्चारणं सलग सुरूच होतं. मान खाली वळवून उभे असलेले अधीक्षक हातातल्या काठीनं जमिनीवर रेघा ओढत होते. बहुतेक ते हुंदक्यांची मोजदाद करत असावेत नि कैद्याला काही ठराविक आकड्यांपर्यंत रडण्याची मुभा त्यांनी दिली असावी. पन्नास किंवा शंभर हुंदके असं काही तरी. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता. काही बंदुकांवरच्या संगिनी हलत होत्या. टोप चढवून फळीवर उभ्या असलेल्या त्या माणसाचे हुंदके आम्ही ऐकत होतो. प्रत्येक हुंदका म्हणजे आयुष्याचा आणखी एक क्षण. आमच्या सर्वांच्या मनांमधे हाच विचार होता : मारा आता त्याला लवकर, संपवा हे! तो घाणेरडा आवाज संपवा!

अचानक अधीक्षकांनी निर्णय पक्का केला आणि मान वर करून हातातल्या काठीनं सूचना करत ते जोरानं ओरडले, ’’चलो!’’

त्यानंतर एकदा जोरदार आवाज झाला आणि नंतर मृतप्राय शांतता पसरली. कैदी संपला होता, दोरी तिची तिची फिरत होती. कुत्र्याला आम्ही सोडून दिलं आणि तो एकदम धावत वधस्तंभाच्या पाठीमागे गेला. तिथं पोचल्यावर मात्र तो मागेच थांबला, भुंकला आणि मग बाजूच्या कोपऱ्यात जाऊन बसला. तिथून तो आमच्याकडे भीत भीत पाहत होता. वधस्तंभाभोवती फेरी मारून आम्ही कैद्याच्या देहाकडे पाहिलं. पायांची टोकं सरळ खाली वळलेल्या अवस्थेत तो हळूहळू फिरत लटकत होता, दगडाप्रमाणे स्तब्ध.

अधीक्षकही आपल्या काठीसह तिथं आले. त्यांनी शरीराला काठीनं टोचलं. शरीर थोडं फिरलं. ‘‘तो ठीक आहे.’’ अधीक्षक म्हणाले. वधस्तंभापासून दूर जाऊन त्यांनी मोकळा निःश्वास सोडला. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण अचानक निघून गेला होता. मनगटातल्या घड्याळाकडे बघून ते म्हणाले, ‘‘आठ वाजून आठ मिनिटं. आजच्या सकाळपुरतं इतकं बास. चला, देवाचे आभार मानू.’’

बंदुकांवरच्या संगिनी काढून वॉर्डर निघून गेले. कुत्रा शांत होता. आपण चुकीचं वागल्याची समज असल्यासारखा तो त्यांच्या मागून निघाला. आम्हीही निघालो. फाशी यार्डातून, दोषी कैद्यांना पकडून असलेल्या कोठड्यांना ओलांडून तुरुंगाच्या केंद्रभागात आलो. लाठ्या घेऊन असलेल्या वॉर्डरांच्या देखरेखीखाली इतर कैदी नाश्ता करत होते. लांबच लांब रांगांमधे ते खाली बसले होते. प्रत्येकाच्या हातात अॅल्युमिनियमची थाळी होती. दोन वॉर्डर भात भरलेल्या बादल्या सरकवत कैद्यांना वाढत होते. फाशीनंतर आता हे घरगुती हलकफुलकं वातावरण दिसत होतं. काम संपल्यामुळं आम्हालाही सुटल्यासारखं वाटत होतं. गाणं म्हणावं किंवा सरळ पळत सुटावं किंवा दाबजोर हसावं अशा चित्रविचित्र भावना मनात यायला लागल्या. एकदम सगळेचजण आपापसात कुजबुजू लागले.

माझ्या शेजारून चालत असलेला युरेशियन मुलगा आम्ही आलो तिकडे पाहत सूचक हास्य करून म्हणाला, ‘‘तुम्हाला माहितेय सर, माझ्या मित्रानं (म्हणजे मघाशी मृत झालेला माणूस) जेव्हा त्याची याचिका फेटाळण्यात आल्याचं ऐकलं तेव्हा तो कोठडीतल्या जमिनीवर मुतला होता- भीतीनं.’’ हे बोलून लगेच तो मुलगा म्हणाला, ‘‘सर, ही घ्या एक सिगरेट माझ्याकडून. ही चांदीची पेटी तुम्हाला आवडली नाही का सर? बॉक्सवाल्याकडून घेतली, दोन रुपये आठ आण्याला. क्लासी युरोपियन स्टायलीची आहे.’’

अनेक लोक हसले... कशाला? कोणालाच ते माहीत नव्हतं बहुतेक.

अधीक्षकांबरोबर चालणारा फ्रान्सिस कलकल करत बोलत होता. ‘‘तर मग सर, सगळं समाधानकारकपणे पार पडलं. एका झटक्यात आटोपलं. प्रत्येक वेळी असं नाही होत ना! मी ऐकलंय, काही वेळा डॉक्टरला वधस्तंभाखाली जावं लागतं नि कैदी मेलाय की नाही याची खात्री करायला त्याचे पाय ओढून बघावे लागतात. फारच चुकीचं होतं ते मग.’’

‘‘हां, ते हलवत बसणं ना? फारच वाईट असतं ते’’, अधीक्षक म्हणाले.

‘‘अहो सर, कैद्यानं रोखून धरलं तर याहून वाईट गत होते. एक माणूस एकदा मधल्या खांबाला पकडून राहिला. तुम्हाला पटणार नाही, पण त्याला बाजूला करायला सहा वॉर्डर लागले. त्याचा प्रत्येक पाय धरून तीन-तीन वॉर्डर ओढत होते. आम्ही त्याची समजूतही घातली, ‘मित्रा, तू आम्हाला जो काही त्रास देतोयंस त्याचा विचार कर की!’ पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता! फारच त्रासदायक ठरला तो!’’

अचानक मला लक्षात आलं की मी खूपच मोठ्यानं हसत होतो. प्रत्येकजणच हसत होता. अधीक्षकही दबून हसत होते. ‘‘तुम्ही सगळे बाहेर येऊन एकेक ड्रिंक घेतलंत तर चांगलं होईल. गाडीमध्ये मी व्हिस्कीची एक बाटली राखून ठेवलीय. त्यावर आपलं भागेल.’’ अधीक्षक म्हणाले.

तुरुंगाच्या गेटच्या मोठ्या कमानीखालून आम्ही रस्त्यावर आलो. ‘‘त्याचे पाय ओढावे लागले.’’ अचानक एक ब्रह्मदेशी अधिकारी ओरडला नि जोरजोरात हसायला लागला. मग आम्ही सगळेच पुन्हा हसायला लागलो. त्या वेळी फ्रान्सिसने सांगितलेला प्रसंग खूपच मजेशीर वाटला. आम्ही एकत्र दारू प्यालो. स्थानिक आणि युरोपीय सगळेच खेळीमेळीनं प्यालो. मेलेला माणूस शंभर मीटर दूर पडला होता.

Wednesday 24 June 2015

शेवटचा पावसाळा (बहुतेक)

कोणी किती पावसाळे बघितलेत यावर माणसांमध्ये काही तरी ठरवतात. जास्त पावसाळे म्हणजे जास्त अनुभव, असं मोजमाप असावं. त्या मोजमापानं रेघेचा हा पाचवा पावसाळा आहे. रेघेच्या या पत्त्यावर दिसणाऱ्या नोंदी २०१० ऑक्टोबरपासून आहेत, त्यामुळं २०११पासूनचा पावसाळा धरला, तर हा २०१५चा पाचवा पावसाळा. (खरी तर रेघेच्या प्रवासाची सुरुवात २००८च्या शेवटाकडं नि २००९च्या सुरुवातीला अशी झालेली आहे, त्यामुळं तिच्यापुरता २००९चा पावसाळाही गृहीत धरायला हवा. मग दोन पावसाळे आणखी वाढतील. पण सध्या इथले पाचच मोजू.)

पाच-सात पावसाळे म्हणजे फारसे नाहीत, पण तरी आता बहुतेक हा रेघेचा शेवटचा पावसाळा आहे असं दिसतंय, त्यामुळं त्या निमित्तानं ही नोंद होतेय. शेवटचा पावसाळा असं का म्हटलं? तर, आता रेघेवर नोंद करावी असं वाटत नाहीये. मुद्दे नाहीत असं नाही, पण अनेक गोष्टी आधी जुळवून आणणं शक्य होत होतं ते आता होत नाहीये. मग अर्धवट कायतरी करण्यापेक्षा थांबलेलं बरं, असं वाटलं. सध्यातरी, हा शेवटचा पावसाळा असं वाचकांना कळवतो आहे. आलीच काही पुन्हा झड, तर सुरू करू. पण सध्या थांबा.

शिवाय, आपण मुळात प्रसारमाध्यमांबद्दल काही नोंदी करण्याचा हेतू समोर ठेवलेला. त्याला धरून गेल्या पाच वर्षांत बऱ्यापैकी नोंदी झाल्या. सुरुवातीला थोडी अडखळ जाणवतेय, पण मग बरं चाललं होतं. यातून माध्यमांच्या व्यवहारातला काही थोडासा तरी पॅटर्न स्पष्ट झाला असेल, तर बरं. दरम्यानच्या काळात, क्रमानं तेहेलका, झेड मॅगझिन, द हूट अशा नियतकालिकं-संकेतस्थळांशी थोडीशी हातमिळवणी करून काही भाषांतरित मजकूर इथं आणला गेला. त्यामध्ये जेवढं करायचं होतं, ते सगळं जमलं नाही. हे पर्याय आणखी चांगल्या पद्धतीनं वापरता आले असते, तर रेघेच्या या प्रयत्नाला आर्थिक पाठबळाचा प्रश्नही सुटला असता, पण ते जमवता आलं नाही. पण पर्याय चाचपले हे एक चांगलं झालं, असं वाटत. 

साहित्याविषयी काही दस्तावेज स्वरूपातलं काम रेघेला समांतर असं सुरू होतं. आणि रेघेवरही सुरू होतं. त्याबद्दल आपण इथं वेगळ्या नोंदी केल्या नाहीत कधी. पण त्या दस्तावेजाचा उपयोग झाल्याचं अधूनमधूून दिसत होतं. चिपळूणला मराठी साहित्य संमेलन झालं त्यावेळी हमीद दलवाईंच्या घरावरून दिंडी नेण्यासंदर्भात काही  वाद झाला. त्यावेळी आलेल्या बातम्यांमध्ये अनेकदा या दस्तावेजातल्या फोटोंचा फायदा झालेला दिसला. अलीकडं 'गांधी मला भेटला'च्या निमित्तानं वसंत गुर्जरांचा जो फोटो माध्यमांमधून मुख्यत्त्वे आला, तोही इथलाच. मध्यंतरी भाऊ पाध्यांचा रेघेवर नोंदवलेला लेख एका मासिकानं स्वतःहून मागितला. त्यांची त्यांना याबद्दल माहिती होऊन रेघेचा उपयोग झाला, हे बरं झालं. याशिवायही इथले काही फोटो आपसूक पसरलेले दिसले. मुळात हे दस्तावेज तयार करताना कुठून ना कुठून कात्रणांसारखं जमा करून ठेवण्याचा प्रयत्न होता. त्या त्या वेळी आपल्याला ज्या व्यक्तींबद्दल कात्रणं जमा करावी वाटली, ती जमा करून ब्लॉगवर चिकटवली, एवढाच प्रयत्न. यात मराठी साहित्यातल्या राजकारणापेक्षा व्यक्तिगत आवडनिवडीचा भाग होता. त्यामुळं भाऊ पाध्ये, अशोक शहाणे, कमल देसाई, श्री. दा. पानवलकर, हमीद दलवाई, सदानंद रेगे, तुळसी परब, वसंत दत्तात्रेय गुर्जर असे ब्लॉग केले. आपण कात्रणं जमवल्यासारखं म्हटलं असलं, तरी प्रत्यक्षात इथं टायपिंग करण्यापासून, ज्यांचा मजकूर आहे त्यांची परवानगी घेण्यापर्यंत इतर अनेक खटपटींमध्ये वेळ गेला. यात फोटो जमवण्यात, मजकूर मिळवण्यात, ज्यांची मदत झाली त्याची नोंदही तिथं तिथं केली आहे. एकूण हा वेळ चांगला गेला आणि त्याचा बऱ्यापैकी उपयोग झाला असं वर्तमानपत्रांमधले किंवा इतर ब्लॉगवर दिसणारे फोटो बघून वाटतं. हे चांगलंच झालं.  पण काही वेळा इथला मजकूर योग्य ते शब्द गाळून, म्हणजे पूर्वप्रसिद्धी कळणार नाही, अशा रितीनं पसरवलाही गेला. काही वेळा त्याचा प्रसार होत आपल्याच रेघेच्याच ई-मेल पत्त्यापर्यंतही आला. काही वेळा या ब्लॉगांच्या घडवणीचं श्रेय वेगळ्याच स्वरूपात वेगळ्याच व्यक्तीच्या नावावर दिलेलंही दिसलं- एक दोन. हे आश्चर्यकारक नसेल फारसं, पण उबग आणणारं आहे.


प्रतिक्रियांबद्दल बोलायचं, तर नोंदींखाली तशा फारशा नोंदवल्या गेल्या नाहीत, पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या वाचकांकडून रेघ वाचली जात असल्याचं कळावं इतपत प्रतिक्रिया आल्या. पत्रकारांपुरतं बोलायचं तर, सोलापुरात एखाद्या वर्तमानपत्रात उप-संपादक/बातमीदार असलेल्या व्यक्तीपासून मुंबईत वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या पॉप्युलर व्यक्तीपर्यंत वाचक असावेत, किमान अधूनमधून ते रेघ चाळत असावेत, असं वाटण्यासारख्या प्रतिक्रिया आल्या. पत्रकारितेबाहेरच्या वाचकांबद्दल- इतिहास, वगैरे गोष्टींमध्ये संशोधन करणाऱ्या कोणाकोणापासून ते नागपुरात प्राध्यापक असलेल्या कोणाकोणापर्यंत तरी अशा बऱ्यापैकी प्रतिक्रिया अधूनमधून आल्या. व्यक्तींची नावं लिहिण्यापेक्षा ठिकाणं सांगायची तर रेघेच्या वाचकांमधलं कोणी कुठल्यातरी परदेशात, किंवा कोलकाता, मुंबई, सोलापूर, नागपूर, नाशिक, नगर, रत्नागिरी अशा कुठं ना कुठं असल्याचं कळावं एवढं काम या प्रतिक्रियांनी केलं. यातल्या काही प्रतिक्रिया टिंगल स्वरूपातल्याही होत्या, आणि बऱ्यापैकी सकारात्मकसुद्धा होत्या. एकूण मिळून हेही बरं वाटलं. 

रेघेवर ठरवलेलं असूनही न करता आलेल्याही काही नोंदी होत्या. नोम चोम्स्की यांचा 'मुख्य प्रवाहातील माध्यमं असतात तशी का असतात?' हा लेख आपण मराठीत इथं नोंदवला, पण त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट या पुस्तकाबद्दलची नोंद राहिलीच. काही जुन्या नियतकालिकांमधल्या निवडक लिखाणाच्या खंडांसंबंधी- द बेस्ट ऑफ क्वेस्ट, निवडक माणूस- नोंदी करायची बऱ्यापैकी तयारी करूनही त्या नोंदी झाल्या नाहीत. आणखीही काही मराठी पुस्तकं होती, पण ते जमवता आलं नाही. परत पावसाची झड आली तरच हे शक्य होईल. 

आणखी एक पूर्वीपासून असेलही कदाचित, पण सध्या प्रसारमाध्यमं एवढी वाढूनही, काही ठराविक गोष्टींचा, काही ठराविक व्यक्तींचा व्हॉल्यूम मोठमोठा होत जातो आणि अनेकांचा म्यूट होत जातो, असं वाटलं. अशा म्यूट व्यक्तींच्या आधारानं आपण रेघ चालवायचा प्रयत्न करत होतो. पत्रकारितेत म्यूट होऊन काम करत राहिलेले असतील किंवा बाहेरही आपापलं काम करताना दुसरं काहीतरी निसटल्यामुळं म्यूट झालेले असतील- या लोकांमुळंच रेघ सुरू झाली आणि सुरू राहिली. वरती आपण काही प्रतिक्रिया आल्याचं म्हटलंय, त्यात काही ज्येष्ठ आणि समाजात जास्त ओळखले जाणारे असे लोक आहेतच, त्यांच्या प्रतिक्रियांनाही महत्त्व आहे, पण या म्यूट राहिलेल्या कितीतरी प्रतिक्रिया रेघेला आधार देत होत्या. क्वचितच कधीतरी बोलून या प्रतिक्रिया आल्या असतील, बाकी म्यूट. या प्रतिक्रियांमध्ये अजिबात ढोंग नव्हतं, हे सगळ्यांत सुंदर. अशा बोलक्या आणि म्यूट प्रतिक्रिया देणाऱ्या सगळ्यांचे आभार. त्यांच्याच उल्लेखानं ही नोंद संपवू. 
***

काही ठराविक नोंदी सारख्या जास्त वाचल्या जात असलेल्या म्हणून दिसत राहिल्यानं, त्याच त्याच परत वर दिसतात. त्यावर थोडासा तोडगा म्हणून इथं काही निवडक नोंदींची यादी जोडून ठेवूया. म्हणजे कदाचित काही म्यूट झालेल्या नोंदीही अधूनमधून बोलत्या राहतील.-
***

म्यूट मान्सून (फोटो : स्टीव्ह मॅकरी)

Friday 15 May 2015

गांधी मला भेटणार होता, पण दुर्दैवानं आपल्याकडं वेळ फार थोडा आहे!

गांधी मला
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या १० x १२च्या खोलीत
६ x २ १/२च्या बाजल्यावर
भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेव्हा तो म्हणाला-
सत्यापासून सौंदर्य वेगळे असू शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे. त्या सत्याच्या द्वारा मी सौंदर्य पहातो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात
असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
सत्य हे वज्राहुनही कठोर आणि कुसुमाहूनही कोमल आहे
- या ओळींपासून सुरू होणाऱ्या 'गांधी मला भेटला' या वसंत दत्तात्रेय गुर्जरांच्या कवितेवरची बंदी आता सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवली आहे. (न्यायालयाच्या निकालाची प्रत) कवितेच्या ज्या प्रकाशनावरून (बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन, औरंगाबादचं 'बुलेटिन') न्यायालयात खटला सुरू होता, त्या प्रकाशनाचे प्रकाशक म्हणून लातूरचे देविदास तुळजापूरकर यांना न्यायालयात माफी मागावी लागली आणि मग खटला मिटला, असं यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून कळतं. (शिवाय, मुळात कवितेपेक्षाही या सगळ्या घडामोडींना समांतर असा आणखी एक संदर्भ असल्याचंही बोललं जातं. बँक ऑफ महाराष्ट्रनं विजय मल्ल्या यांच्या 'किंगफिशर' या कंपनीला दिलेल्या कर्जाच्या व्यवहारामध्ये काळंबेरं असल्याचा आरोप २०१२ साली झाला होता. हा आरोप तुळजापूरकर यांच्या 'जागलेपणा'मुळं झाला असल्याच्या संशयावरून बँकेनं वेगळी कुरापत काढून या कवितेवरून त्यांच्यावर कारवाईची तयारी केल्याची बातमीही दोन वर्षांपूर्वी 'द हिंदू' या वर्तमानपत्रात आली होती. (सुधारीत माहिती- संघटनेने संपाची हाक दिल्यावर या कारवाईचा धोका टळल्याची माहिती तुळजापूरकर यांनी फोनवरच्या बोलण्यात रेघेला दिली.) अर्थात, कवितेवर खटला सुरू झाल्यानंतर बराच काळ गेल्यावरची ही घडामोड आहे आणि आपण आपल्या बळावर त्याचा आणखी काही तपास करू शकलेलो नाहीयोत, त्यामुळं त्यावर काही बोलता येणार नाही. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियनच्या नियतकालिकात कविता छापून आली तेव्हा तुळजापूरकर त्याचे संपादन करत होते व संघटनेची प्रशासकीय जबाबदारीही त्यांच्याकडं होती. ही संघटना ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनला संलग्न आहे, त्यामुळं खटला शिखर संस्थेतर्फे चालवला जात होता).

सध्या, प्रकाशकांची या खटल्यातून मुक्तता झाली असली, तरीही या कवितेतून गांधीजींची बदनामी झालेली नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी कवी वसंत गुर्जर यांच्यावरच असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. आणि त्यासंदर्भातील पुढील कामकाजासाठी खटला लातूरमधल्या सत्र न्यायालयाकडं वर्ग केला आहे. यासंबंधी काही तपशील पुढील बातम्यांमधून मिळू शकतो: महाराष्ट्र टाइम्सलोकमत लोकसत्ता डीएनए.

वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या (आणि वर ज्यांच्या लिंक दिल्या आहेत त्या सर्व) बातम्यांमध्ये कवीला अजूनही यासंबंधी पूर्ण दिलासा मिळाला नसल्याचं म्हटलं असूनही वृत्तवाहिन्यांमध्ये मात्र खटला संपून चर्चा सुरू झालेल्या दिसल्या. १४ मे रोजी दोन वाहिन्यांवर यासंबंधी रात्रीच्या चर्चा झालेल्या दिसतात. आणखी कुठं असल्यास या नोंदीत दुरुस्ती करावी लागेल. यातल्या 'जय महाराष्ट्र' या वाहिनीनं विषय काय ठेवला, तर: का होते महापुरूषांची बदनामी?

'जय महाराष्ट्र'च्या फेसबुक पानावरून

या चर्चेच्या शेवटी, साहित्यिकांनीही महापुरुषांची बदनामी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, या आशयाचं वाक्य संबंधित अँकरांनी म्हटलं, पण या चर्चेचा व्हिडिओ इंटरनेटवर आपल्याला न सापडल्यामुळं त्याबद्दल आपण अधिक काही इथं नोंदवत नाहीयोत. तरीही मुळात चर्चेच्या विषयावरूनही एवढं स्पष्ट होतंच की, 'गांधी मला भेटला' या कवितेनं बदनामी झाल्याचं न्यायालयाचं मत मान्य करून, मग अशी एकुणातच महापुरुषांची बदनामी का होते, असा काही जाब विचारण्याची जबाबदारी वाहिनीनं अंगावर घेतलेली आहे.

'एबीपी माझा' वाहिनीवर यासंबंधी झालेल्या चर्चेतही काही गोष्टी कळतात. एक तर, कवितेचं नाव 'गांधी मला भेटला होता' असंही असू शकेल, असं मधे मधे पडद्यावर दिसणाऱ्या शब्दांवरून कळत होतं. शिवाय, या चर्चेचं शीर्षक होतं- 'कवितेच्या वादात 'गांधी' हरले की जिंकले?' हे तसं फारच महत्त्वाकांक्षी शीर्षक आहे, त्यामुळं आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना त्याचं उत्तर मिळू शकत नाही, हेही या चर्चेतून कळलं. 

कविता अश्लील-बीभत्स असण्यासंदर्भात, या चर्चेतील सहभागी व्यक्तींपैकी महेश केळुसकर, या कवितेच्या बाजूनं काही म्हणणं मांडतात. दुसरे, समर खडस शेवटी उपरोधानं म्हणतात की, आपण तुकारामाचे अभंगही कोर्टात नेऊ, ते अभंगही बॅन करू, भैरप्पांच्या पर्व कादंबरीत श्रीकृष्णापासून अनेक लोक गोमांस खाताना दाखवले आहेत, अशी एक आपण यादी करू व ते सगळं बॅन करू आणि मग टिनटिन, फॅन्टम अशाच पुस्तकांचा प्रसार करूया.

यू-ट्युबवरील व्हिडिओतील चित्र : एबीपी माझा वाहिनी

आणि त्यानंतर चर्चेचा शेवट करताना अँकर व्यक्ती म्हणाली की, ''आपल्याकडे वेळ फार कमी आहे दुर्दैवाने, परंतु अत्यंत हा मोठा विषय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार, त्यामधला बॅलन्स आपल्याला साधायचा आहे, अनेक मुद्दे आपल्या मान्यवरांनी मांडले होते, अनेक कवितांचा आणि लेखांचा दाखला आपल्याला देण्यात आला, खरं तर दुसरा मुद्दा असाही असू शकतो की यातले काही अभंग किंवा कविता शालेय पाठ्यपुस्तकातसुद्धा नाहीयेत, हेसुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीये, त्यामुळे जे आपल्या मान्यवरांनी मुद्दे मांडलेले आहेत ते त्यांच्या त्यांच्या परीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, योग्य की अयोग्य याविषयी वेगळी चर्चा होऊ शकते, आजच्या या चर्चेसाठी आपल्याला या सर्व मान्यवरांनी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार, माझा विशेषमधे आज इथेच थांबतोय, बघत राहा एबीपी माझा.''

तर, आधीच्या एका मान्यवरांनी ज्याबद्दल उपरोधानं काही बोलू पाहिलं, त्यावर पाणी फिरवून पुन्हा आपल्याला असंच सांगण्यात येतं की, 'काही साहित्य शालेय पाठ्यपुस्तकातसुद्धा नसतं, याकडं आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही!' यावरून काय सिद्ध होतं ते आपल्याला कळू शकत नाही. शालेय पाठ्यपुस्तकात येईल, असंच साहित्य असायला हवं, असा काही सूर आहे काय, तेही कळत नाही. आणि मुळात सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी मांडलेले मुद्दे त्या त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत आणि योग्य की अयोग्य यावर वेगळी चर्चा करता येईल, त्यामुळं मुद्दा लटकता ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे, यावरच आजची चर्चा थांबू शकते. तुम्ही पाहात राहा--

आता आज जशा वृत्तवाहिन्या आहेत, तशा काही ही कविता कवीनं लिहिली तेव्हा नव्हत्या, तरीही कवीनं कवितेचं दुसरं कडवं काय लिहिलं पाहा:
गांधी मला
आकाशवाणी मुंबई ब केंद्राच्या
५३७.६ किलोसायकल्सवर
गांधीवंदना या कार्यक्रमात भेटला
तेव्हा तो बोलला-
महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या
आणि ते कसास न उतरल्यास त्याचा त्याग करा
आकाशवाणीच्या निवेदिकेनं सांगितलं-
गांधीवंदना हा कार्यक्रम आपण
६ वाजून ५५ मिनिटं ते ७ वाजून २ मिनिटंपर्यंत
तांत्रिक बिघाडामुळे ऐकू शकला नाहीत
त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत
म्हणजे या सगळ्या माध्यमांच्या व्यवहारातलं तांत्रिक महत्त्व तेव्हा कवीच्या डोक्यात गच्चकन घुसलं असेल असंही असेल. शेवटी कवी पडला १० बाय १२च्या खोलीत राहणारा सर्वसाधारण इसम. यात निवेदिकेचा दोष नाही. काही असेल प्रॉब्लेम तर मूळच्या रचनेत असेल. हेच वृत्तवाहिन्यांना पण लागू होईल का? रचनेचं काही शोधावं वाटलं, तर बरं. नायतर व्यक्तिगत अँकरांची टिंगल केल्यासारखं होईल, आपला तो हेतू नाही, पण तसं ओझरतं होत असेल तर ती रेघेची चूक. तर, हे सगळ्या विषयांवर तांत्रिक पातळी कायम ठेवण्याचं काम आता एवढं वाढलंय,  नि इकडं कवितेवर बंदी येतेय म्हणजे पाहात राहा आता-

आपण ज्याला कडवं असं म्हटलं, तसे ओळींचे चाळीस पुंजके या कवितेत आहेत. त्यातले दोन उदाहरणादाखल आपण दिले. वास्तविक आजूबाजूच्या वास्तवातून काही घटना पाहिल्या की त्यातला एकेक पुंजका वाचकांना आठवत जाऊ शकतो. काही नावं बदलतील, काही तपशील बदलतील, उदाहरण म्हणून हा अठ्ठाविसावा पुंजका पाहा:
गांधी मला
आम जनताकी संपत्ती असलेल्या पृथ्वीवर
बेवारस मुलांच्यात नवरा-बायकोचा खेळ करताना भेटला
तेव्हा तो म्हणाला
निधर्मी देशकी क्या पहचान!
छोडो चड्डी मारो गांड!
हा पुंजका तसा अजूनही कायम आहे. आत्ता परवाच नाही का देशाचे पंतप्रधान छत्तीसगढमधल्या बस्तरमधे जाऊन आले. आणि मग देशाची प्रगती, कोळशाच्या खाणी, असे काही मुद्दे निधर्मी बातम्यांमध्ये आले. चर्चा तर ऐकल्याच असतील तुम्हीही. तर हा पुंजका जसाच्या तसाच लागू होईल.

आणि त्या नंतरचा हा एकोणतिसावा पुंजका:
गांधी मला
हाजी मस्तानच्या साम्राज्यांत दिसला
तेव्हा त्यानं चक्क पंचा सोडला
त्याच्या पंच्यावर मी कधीच गेलो नाही
पंचा काय धोतर काय नि पटलून काय
सत्याचे प्रयोग कशातूनही होतात
हो
अगदी कवितेतूनसुद्धा
परवा 'दीवार' नावाचा चित्रपट लागला होता एका वाहिनीवर, तर त्यात मधे मधे काही पूरक माहिती सांगत-दाखवत होते, त्यात या चित्रपटातील हिरो अमिताभ बच्चन यांची अलीकडची काही मुलाखत थोडी थोडी दाखवत होते, त्यात मुलाखत घेणारी व्यक्ती अमिताभ यांना म्हणते, 'तुमच्या या व्यक्तिरेखेवर हाजी मस्तान साहेब यांचा प्रभाव असल्याचं म्हणतात, तर त्याबद्दल...' मग त्याबद्दल बोलणं होतं. असं आहे. मस्तान साहेबांचे प्रयोग किती महत्त्वाचे ठरलेत पाहा. आणि हे काय कवितेतून करतात काय माहीत!

आणि मग रोजच्यासारखे अग्रलेख वाचले कीसुद्धा ही कविता कोणाला आठवू शकते. कवितेतला एकोणचाळिसावा पुंजका पाहा ना:
गांधी मला
अत्र्यांच्या शिवशक्तीत
गांधीवर अग्रलेख लिहिताना दिसला
गांधीत अग्रलेख लिहिताना दिसला
गांधीत आम्ही ईश्वराचे दर्शन घेतले
धन्य झालो
अब्जावधी वर्षात आता ईश्वर पृथ्वीवर येणार नाही
स्वदेशी राहा-स्वदेश बना
असं म्हणून त्यांनी देशीला जवळ केलं
तर, अत्र्यांचे पत्रकारितेतले प्रयोगही अजून टिकून आहेत. म्हणजे हजार वर्षांना पुरून उरेल असा आत्मविश्वास, जमेल तेवढी समोरच्याला व्यक्तिगत पातळीवर हलक्यात काढणारी भाषा, हे सगळं कायम आहे. फक्त वृत्तपत्रंच नाही, तर वृत्तवाहिन्यांनीही ते प्रयोग कायम ठेवलेत असं आपलं १० बाय १२ मत आहे. आणि रेघेचा विषय आहे म्हणून सारखं ते आठवत असेल. पण ते तितकंसं महत्त्वाचं नाही. मुद्दा आहे तो, आता कवीवरचा आरोप अजूनही कायम आहे, त्यावर काही मत आहे काय आपलं? तर, रेघेपुरतं मत एवढंच की, या कवितेत गांधीजींची बदनामी झालेली नाही आणि ही कविता बीभत्स किंवा अश्लील नाही. न्यायालयानं निकाल दिलाय म्हणून आणि कवीला अडचणीत आणणं बरोबर नाही म्हणून, आपण ही कविता इथं पूर्ण देत नाहीयोत. तरीही आपल्या सगळ्यांना वाचक म्हणून यावर काही बोलता यावं एवढ्यापुरतं दाखला म्हणून काही पुंजके जोडलेत, त्यातून काही कायदेभंग झाला असेलच, तर तो सविनय आहे.

तर, या सगळ्या चर्चेच्या शेवटी मग गांधीजींचं काय झालं? ते कवीला भेटले असा दावा केलाय कवीनं, तर मग आपल्याला भेटणार होते, असं नोंदीच्या शीर्षकात लिहिलंय त्याचं काय झालं?
गांधीबाबा राजघाटावर
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या
खांद्यावर हात ठेवून म्हणाला-
देव मेला आहे देवमाणूसही मेला आहे
आता सैतानांच्या विश्वात मेलेल्या देवाला मुक्ती नाही
आणि देवमाणसाला तर नाहीच नाही
असं सगळं असताना, आत्तापर्यंत या खटल्यात मानसिक काही त्रास झाला असला तरी कवीला आर्थिक आणि शारीरिक तोशीस पडलेली नाही, असा उल्लेख आपण मागं एका नोंदीत केला होता. आता कधी लातूरच्या कोर्टात सुनावणी होईल तेव्हा कवीला आपल्या कवितेचं समर्थन करायला जावं लागेल, तोपर्यंत तुम्ही गुर्जरांना याबद्दल काही विचारलंत, तर ते म्हणतील- हो हो सगळं ती संघटनाच बघतेय (बँक कर्मचारी संघटना), तर आता ते सांगतील, वकील सांगतील तेव्हा कोर्टात जायला लागेल, तोपर्यंत काय नाय काय नाय त्रास. आणि हसतील!

Monday 4 May 2015

निळ्या डोळ्यांची मुलगी

गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये प्रकाशित झालेल्या एका कादंबरीबद्दलची ही नोंद. आज बौद्ध पौर्णिमा आहे, हे निमित्त ठरवलेलं नव्हतं, पण थोडंसं ते जुळून आलंय आपसूक.

गोदा प्रकाशन, औरंगाबाद । मुखपृष्ठ: सरदार जाधव

एक

उल्का चाळके कोण आहे? तिची स्टोरी काय आहे? – या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, तर शिल्पा कांबळे यांनी लिहिलेली नि गोदा प्रकाशनानं प्रकाशित केलेली ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी वाचावी लागेल. ही कादंबरी म्हणजे उल्का चाळके या बौद्ध मुलीची गोष्ट आहे.

इथं सुरुवातीला थोडं वेगळं बोलू. गौतम बुद्ध नावाच्या माणसानं आपलं म्हणणं वेगवेगळ्या गोष्टी सांगूनच मांडलं. म्हणजे मुद्दाम असं काही सिद्धांत मांडलाय, असं केलं नाही, तर गोष्टी सांगत गेला. त्यातून समोरच्यानं बोध करून घ्यावा. म्हणजे गोष्ट सांगण्याचं महत्त्व इतकं आहे! सिद्धांतांना महत्त्व नाही असं नाही, पण गोष्ट कशी किती खोलवर समोरच्यापर्यंत पोचते याचा एक दाखला बुद्धानं दाखवून दिला. असा दाखला आपापल्या परीनं लेखक घडवत असतात. साहित्य ही अशी गोष्ट आहे. ती आपल्याला आपल्या परिसराबद्दल, समाजाबद्दल असं कायतरी सांगते, जे एखादा काटेकोर अभ्यास-अहवाल सांगू शकत नाही. हे म्हणणं मान्य केलं तर मग ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी आपल्याला काय सांगते?

उल्का चाळके या मुलीची शाळकरी वयापासून ते लग्नाच्या वयाची तरुणी होईपर्यंतची गोष्ट ही कादंबरी सांगते. या मुलीचा बाप दारूबाजीत कामातून गेलेला. या नवऱ्याची दारू त्याच्या बायकोच्या, म्हणजे उल्काच्या आईच्या जीवावर उठली तेव्हा आईनं पोरीला घेऊन मुंबई गाठली. इथून उल्काची गोष्ट सुरू होते..

सहावीत असलेल्या उल्काला तिच्या शाळेतल्या ढगेबाई ‘डायरी ऑफ अॅन फ्रँक’ हे पुस्तक वाचायला देतात. त्या पुस्तकानं प्रभावित होऊन उल्कासुद्धा रोजनिशी लिहायचं ठरवते नि आपल्या रोजनिशीला ‘सुबी’ असं नाव देते. आपल्या आईच्या वडिलांच्या घरात राहत असलेली उल्का आपली सगळी दुःखं, सुखं सुबीला सांगत राहते. शाळेतल्या, घरच्या, इतर बाहेरच्या घडामोडी असं सगळं त्यात येतं. उदाहरण म्हणून ६ डिसेंबर १९८७ रोजीची तिच्या रोजनिशीतली ही नोंद पाहा :
प्रिय सुबी,
काल आमच्या कॉलनीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाणदिनाचा कार्यक्रम होता. सकाळपासूनच घरातील माणसे किचनमध्ये खुडबूड करीत बसली होती. एका मोठ्या पातेल्यात बेसन बनवले होते. एका गोणीत भाकरी बांधून ठेवल्या होत्या. रात्री हे जेवण टेम्पोमध्ये भरून दादरला पाठवले. बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांनी जेवण पाठवले होते. मैथलीने तिचा बिस्कीटचा डबा आम्हाला दिला. तिच्या घरातून कुणी जेवण पाठवले नाही. आज आजी, भाऊ, मये आम्ही सगळे जण ट्रेनने दादरला गेलो. तिकडच्या गर्दीला बघून मी खूप घाबरले. मला मयेने ट्रेनमधून खाली ओढले. त्यात माझ्या ड्रेसची ओढणी ट्रेनमध्ये राहिली. आम्ही दर्शन घ्यायला चौपाटीवर गेलो. तिकडे तर ट्रेनपेक्षा जास्त माणसे होती. इतक्या माणसांना शाळेत अगणित म्हटले असते. समुद्र इतका मोठा असतो. मला पहिल्यांदाच कळाले. सर्व किनाऱ्यावर खूप लोकांनी शी केली होती. समुद्राचे पाणी अंगावर येईल आणि आपल्या पोटात घाण जाईल असे मला वाटते. मी मम्मीला विचारले, ‘‘आपण इथे कशाला आलो?’’ मम्मी डोळे पुसीत म्हणाली, ‘‘आजच्या दिवशी बाबा गेले. त्यांची पूजा करायला आलो.’’ मयेला रडताना बघून मला पण खूप रडायला आले. म्हणून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मी या डायरीच्या पानावर लावला आहे.
तुझी उल्का
६ डिसेंबर १९८७
उल्काच्या आईच्या डोळ्यांत आलेलं पाणी कशामुळं होतं? या प्रश्नाच्या उत्तराचा तपास करायचा असेल तर कादंबरी मुळातून वाचावी लागेल. उल्काची आई कुठकुठल्या परिस्थितीत मुलीला लहानाचं मोठं करते, शिकवते, घडवते हा भाग कादंबरीत आहेच. त्या दुःखानं आईच्या डोळ्यांत पाणी येत असेलच. पण त्याशिवायही डोळ्यात पाणी उभं राहतं. आपल्या दुःखात कोणीतरी आधाराला सतत आहे, या जाणिवेतूनही ते येत असेल. बाबासाहेबांनी दिलेल्या या जाणिवेनं गहिवरूनही ते होत असेल. हा आधार काटेकोर स्पष्टीकरण करून सांगता येत नाही. आईच्या डोळ्यांत पाणी येण्याएवढा तो मोलाचा आहे, याचं आणखी काय स्पष्टीकरण द्यायला हवं?

आईचं दुःख हा एक भाग झाला, शिवाय उल्का हीसुद्धा एक बाई आहे. एका बाईला मुंबईसारख्या शहरात जगताना कशाकशाला सामोरं जावं लागतं, ती आपल्या आसपासच्या जगाला कसं समजून घेते, हेही या कादंबरीत आहे. यात प्रेमप्रकरणांमधेच गुंतत राहून भिरभिरत गेलेली नि पोट पाडणारी जवळची मैत्रीण आहे, सासू-नवऱ्यानं गर्भ पाडायला लावल्यामुळं उस्कटून गेलेली शेजारची बाई आहे, बाई नसूनही पुरुषांना प्रेमात पाडून पैसे कमावणारी तृतीयपंथीय सुमन आहे. या कादंबरीतल्या बायका एका साच्यातल्या नाहीत. प्रत्येकीचं आपापलं जग आहे. कोणी आत्मविश्वासानं जगतंय, तर कोणाचा जगण्यावरचाच विश्वास उडालाय. कोणी मीरा नावाची मुलगी आपल्या वाया जाण्याचं खापर आपल्या पळून गेलेल्या आईवर फोडते नि म्हणते, ‘आईनं मरून जावं, पण पळून जाऊ नये’. कोणी एक भय्याणीन दुःखाला कोळून प्यालेली- प्रियकरानं दगा दिल्यामुळं त्याला विसरायचा प्रयत्न करणाऱ्या उल्काला एकदा ही भैय्यीण म्हणते, ‘अगर भूलना इतना आसान होता तो याद नामका कोई शब्दही न होता’. कोणी एक राणी आहे- ‘मॅडयॅम, मी पण बोलते बघा. यॅ- यॅ, बी, शी, डी, ई मलाबी शिकवा इंग्लीश. मीबी पैसे देईन तुम्हाला’, असं म्हणत उल्काकडे इंग्रजी शिकायला येणारी. शिवाय ज्या वातावरणात उल्का वाढतेय त्या वातावरणाचं वर्णन करणारे शब्द पण कसे आहेत पाहा – ‘संध्याकाळची लोकल पकडणाऱ्या विचारहीन प्रकाशासारखा’ घड्याळाचा काटा, ‘गिलावा दिलेल्या सिमेंटच्या ओट्यासारखी’ घट्ट मैत्री, कुठूनच मदत मिळाली नाही तर ‘बिनशिटीच्या कुकरसारखं’ झालेलं आयुष्य, ‘कॉलसेंटर’ झालेली झोप, ‘शेअरमार्केटसारखा पडलेला’ धरमशेठचा चेहरा. असं सगळं जिवाची मुंबई करणारं वातावरण उल्काच्या आजूबाजूला आहे. आणि या वातावरणात उल्काला सांभाळणारी, दहा बाय दहाच्या खोलीत मुलीला इंजीनियरींगपर्यंत शिक्षण घ्यायला पाठिंबा देत राहणारी, टी.बी. होऊनही तगणारी आई आहे- वैजयंता. या वैजयंतेची आई, म्हणजे उल्काची आजी, आता दूर गावीच आहे. तिथून बिचारी सारखी आपल्या पोरीला पत्रं पाठवत राहते. तीही या कादंबरीत मधे मधे येत राहतात. उदाहरणार्थ, हे शेवटचं पत्र पाहा :
वजयंता,
खूप दिवस पत्र टाकलं नाही म्हणून काळजी करू नकोस. माज्या दोन्ही डोल्यात फूल पडलंय. तरी मला अंधूक अंधूक दिसतंय. झालय असं ज्या पारध्याच्या पोराकडून मी पत्र लिवून घ्यायचे तो देवाघरी गेला. त्याच नाव शिवाजी. पाटलाच्या वावरात चोरी झाली, तशी पारध्यांची आणि मराठ्यांची गावात जुंपली. पोरांनी शिवाजीला ढकलला. तो दगडाला डोकं लागून मेला. गावात पोलीस जीप आली होती. पण पारध्यांना काय न्याव मिळाला नाय. आता हा कुंभारणीचा भाचा सुट्टीत आलाय त्याच्याकडून पत्र लिवून घेते. तुझ्या तब्येतीला आराम पडावा म्हणून सोमाच्या पुतणीकडून झाडपाला पाठवते. तो रोज अनशापोटी खा. उल्काला सांग पायरीनं राहत जा. शेजारीपाजाऱ्यांशी गोड बोलत जा. जमाना खूप उलटा आलाय माणसाच्या जीवाचा कुणाला अप्रूप रायल नाही.
-    तुझी आई
तर अशा आजीची नात उल्का उलट्या जमान्यातही जगतेय. जातीमुळं आणि बाई असण्यामुळं समाजात जगताना पडलेली बंधनं ढिली करू पाहतेय. तिची गोष्ट या कादंबरीत आहे.  पण जात किंवा बाईपण याबद्दल  गोष्टीत जे काही असेल, ते आत्मविश्वासानं आल्यासारखं वाटलं. म्हणजे वरच्या-खालच्या जाती, स्त्री-पुरुष, याबद्दलचा सूर स्पष्टीकरणाचा किंवा गोंधळलेला नाहीये. कुठल्याही जातीतल्या नि लिंगातल्या माणसानं लिहिलं, तरी असा सूर कुठंतरी येऊ शकतो, म्हणजे फक्त उल्काची जात आणि बाई असणं याच्याशी हे संबंधित नाहीये. फक्त त्या निमित्तानं हे नोंदवलं. (हे खरं म्हणजे नोंद लिहिणाऱ्यानं स्पष्टीकरण दिल्यासारखं झालं! पण त्यातून मुद्दा स्पष्ट व्हायला मदत होईल- का). तर, त्यामुळं गोष्टीत एकसुरीपणा नाही वाटत. 

दोन

उल्का चाळके ज्या बंधनांमधून बाहेर यायचा प्रयत्न करतेय, त्या बंधनांचं आकलन करून घ्यायला तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चष्मा- त्यांनी दिलेली दृष्टी- महत्त्वाची वाटतेय. या दृष्टीतूनच तिचा एका सामाजिक संघटनेशीही संबंध येतो. आंबेडकराइट पीपल फॉर जस्टिस अशा संस्थेची शाखा असलेली ‘आक्रोश’ ही ती संघटना. या संघटनेच्या निमित्तानं उल्काला आणखी एका अनुभवविश्वाची ओळख होते. इथंही पुरुषी वर्चस्व आहे, छोटीमोठी राजकारणं आहेत, तरीही उल्का आता बाहेरच्या जगात शिकून मजबूत झालेली आहे. ती सगळं पाहते, टाळायचं ते टाळते, टीका करायची त्यावर टीका करते, स्वतः स्वतःला तपासत राहते. यात एकदा तिला ‘दलित ब्राह्मण’ म्हणून हिणवणारा एक मार्क्सवादी युवक भेटतो. याआधी तिनं फी-माफीचा फॉर्म भरताना ‘सरकारी ब्राह्मण’ ही निंदा ऐकलेली असते, पण हे आणखी एक नवीन काय, म्हणून ती त्या तरुणाचं ऐकून घेते. तो आपलं ज्ञान पाझळत तिला स्वतःच्या ज्ञानाबद्दल कमीपणा वाटायला लावतो. आणि मग घरी गेल्यावर उल्काला एक कविता सुचते, त्याची सुरुवात अशी-
प्रिय मार्क्स,
    तू मला ओळखत नाहीस
    पण मी तुला ओळखते
    तुझा जन्म जर्मनीचा
    वंशाने ज्यू   
    जेनी बायको
    एंजल्स मित्र
    आणि हेगेल गुरू
    ही तुझी जुजबी माहिती

    आता माझ्याबद्दल ऐक
मी कु. उल्का बा. चाळके.
वय वर्षं बावीस.
धर्माने बौद्ध, पूर्वीची महार, ढोर, चांभार, ढक्कलवार
किंवा कोळी, न्हावी, कोष्टी, गावित, कातकरी, वडार
किंवा वाणी, गोसावी, जोशी
शेवटी धनगर, बामन, सोनार
ही माझी जुजबी माहिती.
मार्क्सला आपल्या दुःखाची खोलवर कल्पना नसल्याची भावना उल्का या कवितेत नंतर मांडते. पण त्यात तक्रारीचा सूर नाही. मार्क्स भारतापासून एवढा दूर राहत होता, त्यामुळं त्याला इथलं आकलन पूर्णपणे झालं नाही, असं तिला वाटतं. धर्माबद्दलचं मार्क्सचं मतही पटत नाही, तेही ती कवितेत सांगून टाकते. बाबासाहेबांना ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ असं म्हणायचं होतं की ‘बुद्ध व कार्ल मार्क्स’ असं म्हणायचं होतं- यावर विचारवंत, पत्रकार-संपादक, नेते किंवा तशी कोणी मंडळी वाद घालत राहतीलही कदाचित. पण उल्का पडली सामान्य मुलगी. ती तिच्या स्तरावर हा प्रश्न सोडवून टाकते, नि कवितेच्या शेवटी म्हणते :
प्रिय मार्क्स,
तू बाबांना भेटायला हवं होतंस
नको रे,
काठमांडूच्या भाषणाला इतकं
मनाला लावून घेऊ नकोस.
त्यांनाही थेट तुझ्यासारखं वाटायचं
स्वातंत्र्य, लोकशाही, मानवमुक्ती, समता.
त्यांनीही टाकली होती,
पोरेबाळे तुझ्यासारखी उपाशी-तापाशी तत्त्वासाठी
पण मार्क्स,
तुझी-त्यांची भेट झाली असती
म्हणजे सुटाबुटातले बाबासाहेब
हातात पुस्तक घेतलेले
धारदार आवाजाचे
अस्सल इंग्लिश बोलणारे
सडेतोड मुद्दे मांडणारे बाबा,
खरं सांगते तुलाही इंप्रेस करून गेले असते.
डोळ्यावरचा चष्मा काढत
तुझ्या खांद्यावर हात ठेवत
हसत हसत बोलले असते,
‘मि. मार्क्स, तू इथे जन्मला असतास
तर थेट माझ्यासारखा वागला असतास.
मी जर्मनीत जन्मलो असतो
तर थेट तुझ्यासारखा वागलो असतो.’
उल्का चाळके तिच्यापुरता हा जो निष्कर्ष काढते तो तसा सामान्य माणसं काढतील असा. म्हणजे इंग्लिश बोलणारे बाबासाहेब मार्क्सला इंप्रेस करतील असंही त्यात येऊ शकतं मग! उल्काकडं इंग्रजी शिकायला येणाऱ्या राणीचाही निष्कर्ष हाच असू शकतो. सिद्धांतांपेक्षा आपल्या जगण्यातून, व्यवहारातून उल्काला जे काही वाटलं त्यातून काढलेला हा निष्कर्ष. त्यात काही कमी-जास्त असेल, तर ती तिच्या अनुभवातून सुधारेल ना मग. तो तिचा निर्णय. ही कादंबरी आपल्याला अशा सर्वसामान्यांच्या जगण्यातून निघालेले निष्कर्ष सांगते. असे सर्वसामान्यांचे निष्कर्ष सांगणं हे काम साहित्य/गोष्टीतून असं सहजपणे होत असेल, तर मग ते किमान समजून घ्यायला तरी ही कादंबरी वाचायला हरकत नाही.

निळ्या डोळ्यांची मुलगी- शिल्पा कांबळे, गोदा प्रकाशन, पानं- १८८, किंमत- २५० रुपये.

Thursday 23 April 2015

अशोक केळकरांनी नोंदवलेली पुस्तक प्रकाशनाची हकिगत

आज आंतरराष्ट्रीय पुस्तक दिवस आहे. इंग्रजी नाटककार शेक्सपिअर, स्पॅनिश लेखक सर्व्हांटिस अशा कोणाकोणाच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आणि आणखी काही लेखकांच्या जयंतीच्या निमित्तानं हा दिवस पुस्तकांचा म्हणून साजरा केला जातो, असं संयुक्त राष्ट्र संघटनेचं संकेतस्थळ सांगतं. या निमित्तानं ही नोंद होतेय.

अशोक केळकर (२२ एप्रिल १९२९-२० सप्टेंबर २०१४)
छायाचित्र: 'रुजुवात'च्या मलपृष्ठावरून/कुमार गोखले
शिवाय, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भाषावैज्ञानिक आणि समीक्षक अशोक केळकर यांचं निधन झालं होतं, त्याबद्दल आपण रेघेवर काही करू शकलो नव्हतो. काही करायलाच हवं अशी सक्ती नव्हती. तरी संबंधित विषयातल्या कोणा व्यक्तीकडून केळकरांबद्दल काही मजकूर रेघेवर आणायचा प्रयत्न होता, पण ते जमलं नाही. अजूनही जमलेलं नाही. पण आज, पुस्तक दिवसाच्या या नोंदीला मात्र केळकरांच्या आठवणीचंही निमित्त आहे. असं का बरं?

तर, केळकरांच्या निवडक लेखनाचं 'रुजुवात' (पहिली आवृत्ती- २००८) हे लोकवाङ्मयगृहातर्फे प्रकाशित झालेलं एक पुस्तक आहे. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता २०१० साली. (शिवाय, त्यापूर्वी, २००२मध्ये केळकरांना पद्मश्री सन्मानही मिळालेला). या पुस्तकातल्या लेखकाच्या मनोगतात केळकर काय म्हणतात हे जागतिक पुस्तक दिवशी आपण नोंदवायला हवं. मगच मराठीत हा दिवस साजरा केल्यासारखं होईल. या मनोगतामध्ये केळकरांनी या पुस्तकाच्या प्रकाशनासंबंधीची हकिगत सांगितलेय तेवढाच भाग इथं नोंदवला आहे. केळकर राहत होते ते पुणे शहर, त्यांचा प्राध्यापकीचा पेशा, साहित्यातल्या काही मंडळींशी असलेली आपसूक ओळख, शिवाय मूलभूत कामामुळं नावाला असलेलं वजन, या सगळ्या पार्श्वभूमीवरही त्यांना हा अनुभव आलेला आहे. शिवाय याच पार्श्वभूमीवर त्यांनी वापरलेले मराठी वाङ्मयजगत्, वाचकांची पिढी असे शब्द पाहायला हवेत असं वाटतं. या शब्दांचा अर्थ नक्की काय आहे, हे रेघेला समजू शकलेलं नाही, आणि त्यामुळं केळकरांनी या गोष्टींबद्दल जी अपेक्षा व्यक्ती केलेय, तीही आपल्याला अजून तरी नीट समजून आलेली नाही, एवढं नोंदवू. म्हणजे हे शब्द वापरल्यावर जेवढा आकार अपेक्षित आहेसं वाटतं, त्या तुलनेत खरा आकार काय आहे, हे कळेनासं होतं. रेघेची मर्यादा असेल ही. तरी पण एकूण पुस्तक प्रकाशनाबद्दल केळकरांनी जे नोंदवलंय, ते आपण इथं वाचू. बाकी, वाचकांनाही याबद्दल काही वेगळं म्हणायचं असेल, तर प्रतिक्रियेला जागा आहेच.

तर, केळकर (२००८मध्ये) म्हणतात:
ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या पत्नी शीलवती यांना एका प्रसंगी असे वाटून गेले की, 'मीच हे सांगितले पाहिजे' आणि तेच त्यांनी आपल्या आत्मनिवेदनपर पुस्तकाला (१९६९) नाव दिलं. मलाही सध्या असेच वाटतेय की मलाच ते सांगितले पाहिजे.

तुमच्यापैकी काही जणांना आठवेल की १९८३ साली मी आपल्या साहित्य, कला, साहित्याची भाषा या विषयांवरच्या लेखसंग्रहाची पूर्वसूचना 'रुजवात' या नावाने दिली होती. तसे म्हटले तर पुस्तक केव्हाच तयार होते, पण नंतर बराच उशीर झाला हे खरे. त्याबद्दल विचारणाही होत राहिली. या उशिराची जशी कारणे आहेत तसे परिणामही आहेत. ही कारणे आणि परिणाम केवळ व्यक्तिगत नाहीत तर सार्वजनिकही आहेत.

सतीश काळसेकरांच्या एका टिपणामुळे हे माझ्या ध्यानात आले. ते लिहितात (लोकवाङ्मयगृहाच्या वाङ्मयवृत्त पत्रिकेतील त्यांचा 'वाचणाऱ्याची रोजनिशी' हा स्तंभ, ऑगस्ट २००५) : ''अनेकदा त्या त्या काळासाठी महत्त्वाचे लेखन नियतकालिकांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत येते, पण ते योग्य त्या तत्परतेने ग्रंथबद्ध होत नाही. त्यामुळे बाहेरचे वाचक त्या लेखनाला मुकतात.'' (मला तर दिसते की नियतकालिकांच्या वाचकांनाही असे लेखन दखलपात्र वाटत नाही!) समीक्षात्मक आणि सर्जनात्मक अशी दोन्ही प्रकारची उदाहरणे काळसेकर देतात. ''यात दोष कुणाचा- प्रकाशकांनी तत्परता न दाखवल्याचा, लिहिणाऱ्यांना ग्रंथरूप आणण्यात उदासीनता असल्याचा की वाचकांची मागणी नसल्याचा, यावर आता चर्चा कामाची होणार नाही.'' असेही ते पुढे म्हणतात. का बरे अशी चर्चा कामाची होणार नाही? पुढच्यास काय ठेच लागली हे कळून मागचा शाहणा होणार नाही का? म्हणूनच तर प्रस्तुत पुस्तकाच्या संबंधीची हकिगत जरा मोकळेपणाने पण थोडक्यात सांगायचे योजले आहे.

माझे भाषा, साहित्य, कला याविषयीचे चिंतन मराठी भाषेत वाचकांपर्यंत जरा उशिराच पोचायला लागले- म्हणजे माझ्या चाळिशीच्या जवळपास. (इंग्रजीतले साहित्य, कला विषयीचे लेखनही त्याच सुमारास वाचकांपर्यंत पोचले. मात्र इंग्रजीतला भाषाविषयक पहिला लेख १९५७ साली बाहेर पडला- म्हणजे डॉक्टरेट मिळून माझी लांबलेली विद्यार्थीदशा उरकण्याच्या वर्षभर अगोदरच). माझे काही मराठी लेख बाहेर पडल्यावर मौज प्रकाशनातर्फे श्री. पु. भागवतांनी त्यांचे पुस्तक काढण्यात रस दाखवला. मी त्यावर म्हटले : वैज्ञानिक आणि समीक्षात्मक अशा भिन्न वळणाचे आणि भाषा आणि साहित्य-कला अशा भिन्न विषयांवरचे हे लेखन आहे, थोडा समान वाचकवर्ग सोडला तर बाकीचा बराचसा वेगवेगळा आहे, तेव्हा सगळ्या लेखांचा एकत्र संग्रह काढणे व्यवहार्य होणार नाही, बरे, दोन संग्रह काढायचे तर तेवढा ऐवज जमेपर्यंत थांबावे लागेल. भागवतांना ते पटले. नंतर ऐवज जमला. तेवढ्यात मॅजेस्टिक प्रकाशनाचे केशव कोठावळे मला म्हणतात : ललित आणि धार्मिक या सुरक्षित पुस्तकांखेरीज वैचारिक पुस्तकेही काढण्याच्या विचारात आम्ही आहोत, तुमच्या भाषाविषयक लेखांचा संग्रह काढण्यात आम्हाला रस आहे. १९८३मधे वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार पुस्तक निघालेही. (त्याला चार पारितोषिके मिळूनही माफक किमतीतली ५००ची आवृत्ती संपवायला मराठी वाचक आणि ग्रंथालयांनी तब्बल सतरा वर्षे घेतली!) साहित्य, कला, साहित्याची भाषा विषयक लेखसंग्रहाची मुद्रणप्रत पाहिल्यावर भागवतांच्या मनात आले : केळकर, तुमच्या मनात तशी योजना नसावी, पण तुमची एक सुसंगत भूमिका असल्यामुळे हे लेख जणू काही एका ग्रंथाची प्रकरणे वाटतात, थोडे संपादन करून एक सलग प्रकरणशः ग्रंथ नाही का होणार? मला ही कल्पना पटली, पण ती तडीला जायची नव्हती.

निवांतपणे अध्ययन, चिंतन करायला मी तेव्हा मोकळा नव्हतो. अध्यापन, संशोधन, मार्गदर्शन, चर्चा, व्याख्याने, लोकशिक्षण, संस्थागत जीवन असे माझे उद्योग भरात आले होते. लेखन चालूच होते. तेही भाषा, साहित्य, कला, चिन्हव्यवहार, संलग्न तत्त्वविचार अशा विविध विषयांवर आणि इंग्रजी, मराठी, हिंदी या त्रिभाषासूत्रानुसार. त्यामुळे संकल्पित ग्रंथसंपादनाला काही हात लागेना. दुसरी एक अडचण होती. भूमिकेच्या सातत्यामुळे अशा लेखांना जसा प्रकरण-संदर्भ असतो तसा त्या त्या वेळच्या वाचकसंवादामुळे अशा लेखांना एक प्रसंग-संदर्भही लाभलेला असतो. त्यामुळे लेखांना संपादनासाठी हात लाववेना. लेखांचा ताजेपणा जाऊन एक सुरक्षित पाठ्यपुस्तक तयार करायचे माझ्या मनातही नव्हते. प्रकरणशः ग्रंथाचा बेत मी मनात सोडून दिला, तरी भागवतांना तसे सांगायला माझी जीभ रेटेना आणि भागवतांना स्वतःहून माझी अडचण असल्याचे काही ओळखेना. थोडक्यात सांगायचे म्हणजे मी आणि भागवत दोघेही चकलो आणि चुकलोही. एवढ्यात काही अंतर्गत अडचणींमुळे मौज प्रकाशनाने मला वचनमुक्त केले.

मग मी हरिभाऊ मोट्यांकडे लेखांची फाइल घेऊन गेलो. (कृष्णाबाई-बाळूताई या खरेमास्तरांच्या मुली माझ्या वडिलांच्या लोभातल्या विद्यार्थिनी असल्यामुळे ओळख होती.) त्यांनी आठवडाभर फाइल ठेवून घेतली, नंतर ते म्हणाले : मला समीक्षाक्षेत्रातले फार कळते असे नाही, पण मी नेहमी वेगळ्या लेखनाच्या शोधात असतो तसे हे नक्कीच आहे. सध्या माझ्या हातात एक पुस्तक आहे, दीडदोन महिन्यांत मी त्यातून मोकळा होईन, मग ताबडतोब तुमचे पुस्तक हाती घेऊ. दुर्दैवाने तेवढ्यात मोट्यांचे निधन झाले (१९८२). मोट्यांनी पुस्तक स्वीकारले यात मी भरून पावलो. इकडे मौजेची अंतर्गत अडचण दूर झाली आणि त्यांनी पुन्हा रस दाखवला. पण प्रकरणशः ग्रंथाचा बेत तर मी सोडून दिलेला. इकडे नवीन लेखांची भर पडत गेल्याने पुस्तकाचे आकरमान आटोपसर न राहता क्रमाने वाढतच राहिले. नंतर माझ्या एका लोभातल्या विद्यार्थ्यामार्फत देशमुख आणि कंपनीने रस दाखवला, पण त्यांना लेखांची संख्या कमी करून पाहिजे होती- जे मला लेखनाची तार्किक वीण ध्यानात घेता पटण्यासारखे नव्हते. पॉप्युलर प्रकाशनानेही रस दाखवला, पण नंतर माझ्या स्मरणपत्राला त्यांनी उत्तरही पाठवले नाही, त्यांचा विचार बदलला असावा. मराठी प्रकाशनव्यवहार पुढे पूर्वीइतका पारदर्शक राहिला नाही त्याची ही सुरुवात तर नव्हती? नंतर माझ्या त्या विद्यार्थ्याने पद्मगंधा प्रकाशनाच्या अरुण जाखड्यांना विचारले. ते म्हणाले : समीक्षेची दोन-तीन पुस्तके मी नुकतीच काढली आहे, तेव्हा वर्षभर तरी आणखी एक जोखमीचे पुस्तक मी घेणार नाही. त्यांचा हा प्रांजळपणा मला खरोखरी आवडला.

पुस्तकाची घोषणा झाल्यापासून वाचकांची अधूनमधून त्याबद्दल चौकशी चालूच होती. दिवस चालले होते. वाचकांच्या पिढ्या उलटत गेल्या. काहींनी तर मला भाषातज्ज्ञ या कप्प्यात बंदिस्त केले. काहींनी मी मराठीत पुरेसे समीक्षात्मक लेखन करीत नाही अशी तक्रार केली. काहींनी तर स्पष्टच म्हटले : या इंग्लिश साहित्याच्या अभ्यासकांची मराठी समीक्षेत लुडबूड हवी कशाला? मी पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल उदासीन झालो नाही, पण उदास मात्र झालो. या काळ्या ढगाला एक चंदेरी अस्तर होते. (इंग्रजी म्हणीतले silver lining म्हणजे piping किनार नव्हे तर अस्तर. उंच डोंगरावरून किंवा उंच उडणाऱ्या विमानातून हे विलोभनीय दृश्य तुम्ही पाहिले आहे का?) एक तर, नंतरच्या पिढ्यांची माझ्या अनलंकृत आणि 'घट्ट' भाषेबद्दल तक्रार नव्हती- जशी ती आधीच्या पिढ्यांची नक्कीच होती. ('घट्ट' हा धनंजयराव गाडगिळांनी आमच्या पिढीला दिलेला शब्द.) त्याहून म्हणजे नव्या पिढीतल्या एकाने जरा वैतागूनच म्हटले : दिलीप चित्रे, अशोक केळकर, राम बापट, भा. ल. भोळे यांचे समीक्षात्मक व वैचारिक लेखन पुरेशा प्रमाणात आणि वेळच्या वेळी पुस्तकरूपाने प्रकाशित न झाल्यामुळे आमच्या पिढीचे फार नुकसान झाले आहे.
काही दिवसांपूर्वी दुसऱ्या काही निमित्ताने काळसेकरांचे एक पत्र आले, त्याच्या शेवटी एक लहानसा ताजा कलम होता : आपल्या पुढच्या लेखनाच्या संग्रहाचे काम कुठे अडत आहे? कुठे अडत आहे हे मी त्यांना सांगितल्यावर लोकवाङ्मयगृहाने त्याचे प्रकाशन मनावर घेतले, आणि ही प्रकाशनपूर्वी कहाणी संपते. ती प्रातिनिधिक आहे का?

यात दोष कुणाचा? इथे 'दोष ना कुणाचा' असे म्हणण्याची सोय नाही. दोष म्हणायचा तर प्रकाशकांची उदासीनता, लेखकांची अ-तत्परता, आणि आपल्या वाचन-संस्कृतीचा एकारलेपणा असा संमिश्र आहे. मराठी वाङ्मयजगत् भारतात त्यातल्या त्यात पुढारलेल्यांपैकी एक आहे असे म्हणायचे तर आपल्यासमोरचे हे उदाहरण फारसे उत्साहजनक नाही. जेव्हा पुस्तक प्रकाशित होते तेव्हा या त्रयीत आणखी दोन घटक हिशोबात घ्यावे लागतात. त्यांतला एक वितरक- उत्तर भारतात लुटारू पद्धतीने या त्रयीचे शोषण करणारा पापग्रह असे त्याचे वर्णन माझ्या कानांवर आले आहे, मराठी वाङ्मयजगतामधली वितरणासंबंधीची स्थिती काय आहे याची मला कल्पना नाही. राहता राहिला पाचवा घटक म्हणजे ग्रंथपरीक्षण लिहिणारा, पारितोषिकाच्या निवडसमितीचा सदस्य इत्यादी. या घटकाला कितपत महत्त्व आहे याबद्दल मला शंका आहे. हा घटक जेव्हा प्रकाशकाचा सल्लागार म्हणून काम करतो तेव्हा त्याला थोडेबहुत महत्त्व असावे.

पुस्तक प्रकाशित होऊनदेखील दुर्लक्षित कसे राहते याचा माझा एक अनुभव या संदर्भात सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. प्राचीन भारतीय साहित्यमीमांसेविषयी एक-दोन मराठी पुस्तके वाचली. (शाळेत संस्कृतऐवजी फ्रेंच भाषा घेतली होती त्यामुळे थेट संस्कृतपर्यंत पोचण्याचा प्रश्न नव्हता.) पण विशेष प्रभाव पडला नाही. नंतर दि. के. बेडेकर आणि ग. त्र्यं. देशपांडे यांच्या लेखनामुळे तिकडे गंभीरपणे पाहू लागलो- विशेषतः तिच्यामधल्या रससिद्धांताकडे. मल लक्षात आले की बेडेकर आणि देशपांडे यांचे विवेचन परस्परपूरक आहे, त्यांचा एकत्र विचार करणे जरुरीचे आहे. त्याप्रमाणे मी एक दीर्घ लेख लिहिला. सुरेंद्र बारलिंगे त्यांच्या नेहमीच्या उत्साहात पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे परामर्श हे नवीन नियतकालिक काढत होते. त्याच्या पहिल्या अंकात लेख छापून आला. त्याच कंपोजवरून लेखाची प्राचीन मराठी साहित्यमीमांसा : एक आकलन नावाची पुस्तिकाही पाठोपाठ निघाली. बेडेकरांचे इतक्यात निधन झाले, पण देशपांड्यांना मी ती दाखवू शकलो. ते म्हणाले : बेडेकरांचे लेखन वाचल्यावर माझ्या पुस्तकाची फेरमांडणी करावी लागेल हे माझ्या लक्षात आले, पण मध्यंतरी मी वैदिक संशोधनात गुरफटून गेलो, माझ्या पुस्तकात किरकोळ सुधारणा करण्याखेरीज मी काही करू शकलो नाही याची रूखरूख होती. तुझ्या पुस्तिकेने ती दूर झाली, त्याबद्दल शाबास! नंतर देशपांडेही निधन पावले. या पुस्तकेची कुणकूण लागल्यावर हिंदीभाषक आणि गुजरातीभाषक यांनी तिचे अनुवाद करवले. हिंदी अनुवादाला मध्यप्रदेश साहित्य अकादेमीने पुरस्कार दिल्याची बातमी आली. यावर मराठीच्या काही प्राध्यापकांनी मला विचारले : तुम्ही हे पुस्तक अगोदर मराठीत का लिहिले नाही? आता बोला! मूळ मराठी पुस्तक अर्थात् अजूनही दुर्लक्षित आहे. (म. वा. धोंडांचे त्याच्याकडे लक्ष गेले, त्यांना ते आवडले आणि त्यांनी एका पारितोषिकाच्या निवड समितीत असताना त्याची शिफारसही केली, पण उपयोग झाला नाही. धोंड मला सांगतात : इतर सदस्यांनी त्यांनी बरोबर नेलेले पुस्तक उघडलेही नाही, केवळ नव्वद पानांच्या चोपड्याला काय बक्षीस द्यायचे हा त्यांचा अभिप्राय). मला आता राग येत नाही की वाईट वाटत नाही.
मराठी वाङ्मयजगत् पुढारलेले असेल, पण ते परवापरवापर्यंत स्वतःतच मश्गूल असे. इंग्रजी आणि संस्कृतखेरीज इतर लेखनाशी कुणाला फारसा संपर्क ठेवावासा वाटत नाही. ज्या मराठी मंडळींचा असा संपर्क असतो त्यांनी मराठी वाङ्मयजगताशी संपर्क ठेवावा असे वाटेलच असे नाही, किंबहुना त्यांना मराठी वाङ्मय फारशा गांभीर्याने घ्यावेसे वाटत नाही. इंग्रजी शिकवणाऱ्या वासुदेव बळवंत पटवर्धनांची (१८७०-१९२१) परंपरा पुढे क्षीण झाली. गेल्या एक-दोन वाङ्मयीन पिढ्यांमध्ये या दशेत थोडा बदल होत आहे अशी चिन्हे आहेत.
पुढच्यास काय ठेच लागली हे कळून मागचा शाहणा व्हावा या हेतूनं केळकरांनी ही चर्चा केल्याचं म्हटलंय. असं काही झालेलं दिसतंय काय? मुद्दा जुनाच आहे, म्हणतील काही लोक, पण त्यावर काही चर्चा पुढं गेलेली आहे काय? तसं काही होत नाही तोपर्यंत मराठी वाङ्मयजगत्, वाचकांची पिढी या शब्दांचे अर्थ ढोबळ पातळीवर तरी निश्चित कसे करायचे?