Friday 27 March 2015

मी हासतो लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला!

पाऊस मी म्हणत होता.
टीव्हीवरचा अँकर सारखं मी मी करत होता.
- असे वाक्प्रचारांचे वाक्यात उपयोग केले जातात.

शिवाय, 'मी हासतो लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला' अशी एक म्हणही आहे.

आणि नुकतंच 'मी मराठी लाइव्ह' या नावाचं एक मराठी दैनिकही सुरू झालेलं आहे. 'मी मराठी' ही वृत्तवाहिनी ज्यांनी काही काळापूर्वी विकत घेतली, ते ‘समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड’चे अध्यक्ष महेश मोतेवार यांनी हे वर्तमानपत्रही सुरू केलेलं आहे. तेच त्याचे सल्लागार संपादकही आहेत. २७ फेब्रुवारी २०१५ रोजी, मराठी भाषा दिवसालाच हे वर्तमानपत्र सुरू झालं. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर इत्यादी उपस्थित होते, त्या कार्यक्रमात मोतेवार म्हणाले, 'सत्याची कास धरीत, अडचणींवर मात आणि दुसऱ्याचा विचार केला की, परमेश्वरही आपल्या पाठीशी उभा राहून यश देतो याचा अनुभव मी घेतला आहे. आपल्या शेतकऱ्यांना जोडधंदा मि‌ळाला पाहिजे, महिला बचत गट सशक्त झाल्या पाहिजेत यासाठी मी प्रयत्नशील राहिलो. त्यामुळेच मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. आता ‘मी मराठी लाइव्ह’च्या माध्यमातून पुन्हा लोकांशी जोडला गेलो आहे. समृद्धीपासून सुरू झालेला हा प्रवास ‘मी मराठी’च्या माध्यमातून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पोहोचला पाहिजे.'

दुसऱ्याचा विचार मी केला, हे बोलणं महत्त्वाचं असतं. 

याच 'समृद्ध' कंपनीविरोधात चिटफंड घोटाळ्याचे अनेक आरोप यापूर्वी झालेले अनेकांना आठवत असतील. आठवणीला तजेला देण्यासाठी- १) चाळीसगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भातली 'सकाळ'मधे आलेली एक बातमी. २) भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंबंधी केलेल्या आरोपाची 'एबीपी माझा'वरची बातमी ३) 'समृद्ध जीवन फूड्स'च्या व्यवहारात गफलत आढळल्यामुळं कंपनीनं गुंतवणूकदारांकडून ठेवी घेऊ नयेत, असे आदेश 'सेबी'ने (सिक्युरिटीज् अँड एक्सेन्ज बोर्ड ऑफ इंडिया) दिले होते. ४) या कंपनीविरोधात आलेल्या तक्रारींची पोलिसांनी जी काय दखल घेऊ पाहिली त्यासंबंधी लोकसत्तेत आलेली बातमी. ५) शिवाय, आता क्रिकेट विश्वचषक सुरू आहे, तर त्या संदर्भात- चार वर्षांपूर्वी भारतानं ही स्पर्धा जिंकली तेव्हा भारतीय संघातील सर्व खेळाडूंना समृद्ध जीवन कंपनीनं प्रत्येकी एक 'टाटा मान्झा' गाडी भेट दिली होती.

चाळीसगावच्या 'सकाळ'च्या बातमीत म्हटलंय, ''---लांडगे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, समृद्ध जीवन फूड्‌स इंडिया लि. या पुण्याच्या कंपनीने पशुधनाची स्कीम सुरू केली. हिरापूर व ब्राह्मणशेवगे (ता. चाळीसगाव) शिवारात कंपनीतर्फे सुमारे २८३ एकर जागा खरेदी करण्यात आली होती. शाखा उद्‌घाटनाच्यावेळी मोठा कार्यक्रम घेतल्याने या कंपनीने अल्पावधीतच परिसरातील शेतकऱ्यांना आपलेसे केले. त्यामुळे कंपनीकडे बहुतांश ठेवीदार हे शेतकरी होते. ठेवीदाराने पैसे दिल्यानंतर त्याच्या पैशातून कंपनीतर्फे म्हैस अथवा बकरी विकत घेतली जाईल. ती म्हैस अथवा बकरी प्रजनन योग्य झाल्यावर संबंधित ठेवीदाराला ती परत करण्यात येईल किंवा तिच्या किमती एवढी रक्कम देण्यात येईल, असे सांगून कंपनीने परिसरातील हजारो शेतकऱ्यांकडून पैसा गोळा केला. यावेळी कंपनीने शेतकऱ्यांशी तसा करार केल्यामुळे अल्पावधीतच विश्‍वास संपादन होत गेला. प्रत्यक्षात मात्र म्हैस किंवा बकरीचे संगोपन कंपनीने न करता दुसऱ्या शेतकऱ्यांकडून केले. त्याचे दूध मात्र कंपनी घेत होती. यातून मिळणाऱ्या नफ्याची कुठलीच नोंद केली जात नव्हती. जनावराचे दूध देणे बंद झाल्यानंतर भाकड जनावर गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला दिले जायचे. करारानुसार गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला दुसरा पर्यायच नसायचा.--''

तर, असं आहे. तरीही मी मराठी. आणि प्रत्येक बातमीतला मी.

मी मराठी लाइव्ह : ११ मार्च २०१५ रोजीच्या मुंबई आवृत्तीचं पहिलं पान

स्वतःच्या नाकाला काय लागलंय त्याबद्दल चाचपत केलेली ही नोंद आहे. 'मी मराठी लाइव्ह' हे वर्तमानपत्र मी मी म्हणत सुरू झालंय. हरकत नाही. (मालकांच्या इतिहासामुळं ह्या वर्तमानपत्रात संपादकीय नोकरी करणाऱ्यांबद्दलही लोक संदर्भाशिवाय टिंगल वजा बोलतील कदाचित. पण सगळ्यांनाच नाक आहे, हे आपण कसं विसरणार. मालकाबद्दल बोलणं आपल्याला महत्त्वाचं वाटतंच. त्याचसोबत निव्वळ कोणाची नोकरी कुठं आहे, एवढ्यावरून लगेच काही निष्कर्ष काढणं बरोबर वाटत नाही. पत्रकारी कामावरून, विरोधाभासावरून काही बोलायचं असेल, तर गोष्ट वेगळी. हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे. आपल्याला न सुटलेला. शिवाय शेंबूड न येणारं एकही नाक आपल्या पाहण्यात आलेलं नाही. आरशातही नाही. फक्त शेंबूड येतो हे उघड मान्य तरी करायला हरकत नाही. आणि अगदी नाक कापलंच जाऊ नये, म्हणून रेघोट्या मारायच्या). तर, हे वर्तमानपत्र सुरू करण्याच्या कार्यक्रमात पत्रकारितेतले दिग्गज, नेते इत्यादी होते, पण 'मी मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या बातमीत ज्यांचं मनोगत प्रामुख्यानं छापलंय, ते आहेत मालक आणि म्हणून सल्लागार संपादक असलेले मोतेवार. शेवटी त्यांचं प्रोफाइल घडवण्याचाही मुद्दा असणार. आणि इकडं आपणही आपापल्या प्रोफाइलांवर/पडद्यांवर मी मी म्हणतोय. हरकत नाही. थोडं शेरा वजा बोलायचं तर, आपण प्रोफाइलवर जसं थोडं सामाजिक, कलात्मक, राजकीय, इत्यादी शेअर करतो नि मुख्यत्त्वे नैतिक प्रोफाइल घडवतो, तसंच जास्त पैसेवाल्या मंडळींना हे असं प्रोफाइल घडवण्यासाठी सरळ एखाद्या चॅनलमधे किंवा पेपरात गुंतवणूक करायची शक्यता प्रत्यक्षात आणता येते. मग रिलायन्सची आयबीएनमधली गुंतवणूक नि मोतेवारांचं 'मी मराठी' म्हणणं, हे साधारण त्याच प्रकारचं वाटतं. पण मग जनमाध्यमं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रांच्या ठिकाणी तरी 'मी'च्या बाहेरचं काय तरी कळणं अपेक्षित असायला हवं का? पण तिथंही परत मीच मीच केलं, तर मग कसं काय होईल! किंवा कदाचित प्रत्येक बातमीत 'मी'ची गुंतवणूक कशी आहे, असा काही 'मी मराठी लाइव्ह'च्या टॅगलाइनचा अर्थ असेल. किंवा कदाचित आपल्याला त्याचा अर्थ कळलाच नसेल.

दोन वर्षांपूर्वी, ९ एप्रिल २०१३ रोजी आपण रेघेवर एक नोंद केली होती- दस्तयेवस्कीचं टिपण आणि माध्यम नियंत्रित माणूस. रशियन कादंबरीकार दस्तयेवस्कीच्या 'नोट्स फ्रॉम अंडरग्राउन्ड' या छोट्याशा कादंबरीतल्या छोट्याशा भागाचा अनुवाद नोंदवायचा प्रयत्न त्यात होता. त्या नोंदीचा शेवट असा होता:
तरीही पुढे बोलायचं तर - एखाद्या सभ्य माणसाला कशाबद्दल बोलताना सर्वाधिक आनंद होईल?

उत्तर : स्वतःबद्दल.

बरंय, तर मग मीही स्वतःबद्दलच बोलत जाईन.
म्हणून 'मी मराठी लाइव्ह'ची सभ्य टॅगलाइन आहे तशी आहे का? असेल. चला, काढा रूमाल आता! हसलात तरी चालेल, पण आपापला रूमाल आपापल्या सोबत ठेवायला हवा.

***

आतली हवा दिसत नाही, तोपर्यंत बरंय!
मुंबई :२१ मार्च २०१५ (फोटो: रेघ)

Friday 13 March 2015

एक शिवी आणि भाऊ पाध्यांचा 'बगीचा'

रामोशी गेटच्या बाजूने भवानी पेठेत घुसल्यावर डाव्या बाजूला प्लायवूड, फर्निचर वगैरेची दुकानं आहेत. उजवीकडे जुनाट चाळीसारख्या लाकडी इमारती आहेत. रस्ता छोटासाच आहे.

दुपारी दीडच्या सुमारास नेहमीसारखीच डाव्या उजव्या बाजूंनी माणसं येत जात होती. काही रस्त्याच्या मधून चालत होती. असं सगळं सुरळीत सुरू होतं, तर मधेच एक मोठा आवाज आला, ''ए... भेन्चोद''. आवाजाकडे लक्ष गेलं तर एक मध्यमवयीन मनुष्य दिसला. तोही चालत होता. करड्या रंगाची पॅन्ट, मळलेला हाफ शर्ट, असा नेहमी दिसेल असा तो माणूस होता. पाच- दहा सेकंद गेली तर पूर्ण जोर काढून, गळ्याच्या शीरा ताणलेल्या, त्या माणसाने परत आरोळी ठोकली, ''ए... मादरचोद". नंतर पुढे आलो आणि बाकीचं सगळं सुरळीत चालू होतं.

या दृश्यात कोणताही अतिरंजितपणा नाही. खरोखर दिसलेली गोष्ट. 
(मार्च २०१०मधलं हे दृश्य या रेघेवर आलेलं नसल्यामुळं आता २०१५च्या मार्चमधे इथं नोंदवून ठेवूया)
__________________

भाऊ पाध्यांच्या 'बगीचा' या कथेची सुरुवात:

रोज संध्याकाळी टिळक ब्रिजवरून एक माणूस जातो. अगदी सामान्य इसम. कुटुंबवत्सल. तसा काही खास विशेष नाही. चारचौघात खपून जाण्यासारखा! संध्याकाळी कचेऱ्यांतून घरी परतणाऱ्यांची गर्दीही टिळक ब्रिजवर बेसुमार असते. त्या गर्दीमध्ये कुणाचं त्या इसमाकडे लक्षही जात नाही.

पण चालता चालता तो मध्येच दणकून ओरडतो, "केकू दमाणिया की मा. . की च्यूत!" तेव्हा त्याच्या आजूबाजूची माणसं दचकतात. सारे जण त्याच्याकडेच चौकसपणे पाहू लागतात! त्यांच्या नजरा जणू त्याला विचारीत असतात, 'कोण ओरडलं आता?- तुम्ही का?' पण त्या इसमाला त्याची दखलही नसते. तो नाकासमोर पाऊल उचलत असतो अगदी थंडपणे. अगदी निर्विकारपणे.

रोजचाच हा प्रकार!

त्या माणसाच्या मनावर काहीतरी परिणाम झाला असावा म्हणा, किंवा त्याला वेड लागलं असावं म्हणा, म्हणून तो असा वागतो.- म्हणजे तो रोज संध्याकाळी टिळक ब्रिजवरून नेमाने जातो आणि कुणालाही कल्पना नसताना, अगदी अकल्पितपणे, 'केकू दमाणिया' या नावाच्या कुणा पारशाला अगदी तारस्वरात तीच इरसाल शिवी देतो. यापलीकडे तो कधीही वावगा वागत नाही. त्याचा कधी कुणाला उपद्रव होत नाही. काही वेडेवाकडे प्रकार नाहीत. चाळे नाहीत! अगदी सदगृहस्थाला साजेशी चालचलवणूक.

त्या माणसाचं नाव भास्कर राणे. मुंबईतल्या सटोडियांच्या लहरीनुसार चालणाऱ्या एका कापड गिरणीमध्ये तो कारकून होता. गिरणीतला कारकून म्हणजे त्याची जात ओळखलीच असेल तुम्ही! शिक्षण जेमतेम एस. एस. सी. पर्यंत. स्वभावात भयानक लाचारी व लुबरेपणा. मूळ पगार थोडा आणि महागाई भत्ता फार. यामुळं सदा बोनसवर लक्ष, पण कामगारांच्या संपात कामावर हटकून हजर राहणार. आपल्या गिरणीपलीकडे बाह्य जगाची काही माहिती नाही. षोक मटण-सागुती खाण्याचा आणि दारूचा. त्यामधेच त्याची सारी लाचारी, मनस्ताप आणि उपेक्षा बुडवून टाकावी. राहाणार शिवाजी पार्कच्या अद्ययावत परिसरात. गणपत वाण्याच्या जुन्या मोडकळीस आलेल्या दोन खोल्यांच्या गाळ्यात. भाडं रुपये बारा. आजच्या जागेच्या टंचाईमध्ये त्याला सुदैवी मानणारे लोक निघतीलच. शेजार- त्याच्यासारख्या- गिरणीबाबूंचा. त्याचं कुणाशीही वाकडं नाही. तो कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. अगदी सरळमार्गी.

त्याचा ताप फक्त त्याच्या बायकोला. आताच तिचं सातवं बाळंतपण झालं.

भाऊ पाध्ये
__________________

वरच्या दोन मजकुरांमधून परस्पर संबंध स्पष्ट होतोयच, तरीही पुढचा मजकूरही योग्य वाटला तर पाहावा.

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी भाऊ पाध्यांच्या कथेसंबंधी लिहिलंय. त्यातल्या 'बगीचा' या कथेसंदर्भातील भागामधला हा निवडक अंश:

'बगीचा' ही भाऊ पाध्यांच्या 'कठीण' पण निर्विवादपणे श्रेष्ठ कथांपैकी एक. ही कथा 'कठीण' असण्याचे एक कारण तिच्यातील घडणाऱ्या घटनांमध्ये प्राधान्याने असणारे योगायोग. हे योगायोग अतिमानवी शक्तींमुळे घडणारे आहेत, असे लेखकाने दाखवले असते, त्यांचा संबंध दैवाशी किंवा कर्माशी किंवा इतर परंपरागत समजुतींशी लावला असता तर ती इतकी 'कठीण' राहिली नसती. भाऊ पाध्यांनी असे अतिमानुष शक्तीवादी, दैववादी, नियतीवादी भाष्य आपल्या निवदानात येऊ दिलेले नाही. तसेच लेखक म्हणून प्रेषितवजा किंवा उपदेशकवजा भूमिकेतून कथावस्तूची राजकीय अथवा नैतिक चिकित्साही केलेली नाही. एखादी वास्तवात घडू शकेल अशी पण अतिवास्तव वाटतील अशा भयंकर योगायोगांमुळे अंगावर शहारे आणणारी गोष्ट जाणकार शेजाऱ्यापाजाऱ्याच्या माहितगार स्वरात सांगावी अशा रीतीने 'बगीचा' ही कथा सांगण्यात आलेली आहे.

भास्कर राणे ह्या मुंबईच्या गिरणीत कारकून असलेल्या आणि दादरला एका चाळीत राहाणाऱ्या एका इसमाच्या 'नशिबा'ची ही कहाणी आहे. भास्कर राणे सात पोरांचा बाप असून तरीही तो आपल्या बायकोचं, अनूचं गर्भारपण टाळण्याच्या बाबतीत मख्ख आहे. जसजशी त्याच्या पोरांत भर पडत गेली तसतशी त्याच्या संसाराची दुर्दशा होत गेलेली आहे. पण याची त्याला पर्वा नाही. भास्कर राणेला त-हेत-हेचे गुलाब कुंडीत वाढवायचा शौक आहे. चाळीत राहूनही आपला हा शौक त्याने जोपासला आहे. एक दिवस केकू दमाणिया नावाचा पारशी गृहस्थ सपत्नीक भास्कर राणेचा पत्ता शोधात त्याच्या चाळीत येतो. हे पारशी जोडपं गुलाबाचं शौकीन असून 'रोझ सोसायटी'चं सभासद आहे. 'रोझ सोसायटीत'च्या वार्षिक गुलाब स्पर्धेत भाग घेण्यासाठी भास्कर राणेचे गुलाब खरेदी करायला ते आलेलं आहे. पैशाच्या मोहानं भास्कर राणे आपला कुंड्यांमधला बगीचा केकू दमाणियाला विकतो. पण बगीचा विकून मिळवलेला पाचशे रुपयांचा चेक ज्या दिवशी वटवतो त्याच दिवशी भास्करची मुलगी साधना हिला मोटारची ठोकर बसून तिच्या पायाचं हाड मोडतं. ह्या प्रकारात ते पाचशे रुपये केव्हाच खर्चून जातात. यानंतर भास्कर आपल्या पुन्हा नव्यानं गरोदर असलेल्या बायकोसकट आपल्या सर्व मुलांना जिवंत जाळून टाकण्यासाठी रात्री खोलीला बाहेरून कुलूप लावून आग लावतो. दोन मुलींसह गरोदर अनू त्यात भाजते. बाकी पोरं वाचतात. मरण्यापूर्वी पोलिसाला जबानी देऊन अनू आपल्या नवऱ्याची खुनाच्या संभाव्य आरोपातून सोडवणूक करते. त्यानंतर वेड लागलेला भास्कर केकू दमाणियाला शिव्या घालत आणि सरतेशेवटी पारशी कॉलनीतल्या त्याच्या घराच्या खिडकीवर मध्यरात्री धोंडा भिरकावत वारंवार घिरट्या घालत राहातो.

'बगीचा'चं कथानक थोडक्यात वर सांगितल्याप्रमाणे आहे. ह्या कथानकात अशक्य काहीच नाही: असंभवनीयसुद्धा वस्तुत: काहीच नाही. फक्त बगीचा विकताच भास्कराच्या मुलीला अपघात होणे आणि त्यानंतर लवकरच त्याने स्वत:चा संसारच जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करणे हा एक प्रकारचा योगायोग आपल्यावर ह्या एकूण प्रकाराची संगती लावण्याची जबरदस्ती करतो. नेमकं हेच 'कठीण' आहे. आपल्याला ही संगती लावता येत नाही. पण भास्करने ही संगती स्वत:पुरती लावलेली आहे. त्याने ह्या सर्व प्रकाराला केकू दमाणियाला जबाबदार धरलेला आहे. जर दमाणियाने भास्करचा बगीचा खरीदला नसता तर भास्कर आणि त्याचं कुटुंब टिकून राहिलं असतं काय?

. . . महत्त्वाची गोष्ट म्हणजे भास्कर राणे हा चारचौघातला आणि चारचौघांसारखा माणूस एक पात्र म्हणून भाऊ पाध्ये आपल्यापुढे निर्माण करतात आणि त्याच वेळी त्याला ते हे 'बगीचा'चं अफलातून परिमाण देऊन टाकतात. प्रत्येक मानवी व्यक्तीला असलं काही एक अद्भुत परिमाण असतं हेही ते ह्यातून सूचित करतात. मुंबईच्या अफाट मानवी गर्दीकडे निव्वळ लोकसंख्येचा एक एकसंध पहाड म्हणून भाऊ पहात नाहीत. लोकसंखेच्या ह्या अभंग आणि अभेद्य भासणाऱ्या डोंगरात त्यांनी विविध चेहऱ्यामोहऱ्यांची, वैशिष्ट्यपूर्ण चरित्रांची आपली पात्रं खोदून अजरामर करून ठेवलेली आहेत. भास्कर राणे, त्याची बायको अनू, त्यांची मुलंबाळं ही अशीच पात्रं आहेत. रस्त्यात चालताना अचानक ओरडणाऱ्या एखाद्या वेड्याला पाहून यापुढे आपल्याला भास्कर राणे आठवेल. वर्तमानपत्रात बातम्या वाचताना एखादं कुटुंब आगीत जळाल्याचं वाचून आपल्याला अनू आणि तिची मुलं आठवतील. शहरी लोकसंखेच्या दाटीवाटीत प्रचंड मानवी तपशील लपलेले आहेत याची भाऊ पाध्ये आपल्याला सतत जाणीव करून देतात. स्वत:च्या माणुसकीची अस्वस्थ करणारी जाणीव ह्यातूनच आपल्याला होते आणि हा भाऊ पाध्यांचा मानवतावादी कलावंताचा स्पर्शच होय.
 __________________

जाड ठसा रेघेचा.
 __________________

भाऊ पाध्यांच्या 'थालीपीठ' या कथासंग्रहाची नवीन आवृत्ती शब्द पब्लिकेशनने काही काळापूर्वी प्रकाशित केली, हे आणखी एक निमित्त या नोंदीसाठी शोधता येईल-

 __________________

रेघेवरचा एक जुना प्रकल्प- bhaupadhye.blogspot.com
 __________________

साधारण अशा प्रकारच्या या पूर्वीच्या दोन नोंदी-
कोसळणाऱ्या इमारती, कोसळणारी माणसं नि 'वैतागवाडी'
एक एस्टी व पानवलकरांची एक कथा