Wednesday 30 January 2013

काही 'धार्मिक' बातम्या आणि नरहर कुरुंदकर

पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला ठेवलं तर भारतातले २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना धडा शिकवतील, असं वक्तव्य 'ऑल इंडिया मज्लिस ए इत्तिहाद अल- मुस्लीमीन' या आंध्रप्रदेशातील पक्षाचे हैदराबादेतून तिथल्या विधानसभेवर गेलेले आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केलं. त्यानंतर धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली, हा सर्व तपशील घडल्याला आता महिना उलटलेला आहे. यासंबंधी 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली'मधलं संपादकीय वाचून अधिकची काही माहिती मिळू शकेल. बाकी, 'विकिपीडिया'वरही काही सापडू शकेल.

या घटनेनंतर त्या संदर्भात व अशा पद्धतीच्या विविध आडव्यातिडव्या वक्तव्यांविषयी टीव्ही चॅनलांवर चर्चाही झालेल्या आहेत. वर्तमानपत्रांमधे लेखही आलेले आहेत. आता आपण जरा पूर्वीच्या हैद्राबादी निजामाच्या संस्थानाचा भाग असलेल्या, आताच्या मराठवाड्यात नांदेडमधे होऊन गेलेल्या नरहर कुरुंदकरांची आठवण जागवूया.

का?

अशा वक्तव्यांमागचा इतिहास पडताळून पाहाणं का आवश्यक आहे ते कळावं म्हणून. 

वरच्या ओवेसींच्या वक्तव्याबद्दल बोलायचं, तर हैद्राबाद संस्थान भारत राष्ट्रात विलीन झालं तो लढा जवळून पाहिलेल्या आणि लहान वयात शक्य होईल तेवढ्या प्रमाणात त्यात सहभागी झालेल्या कुरुंदकरांनी त्यांच्या 'जागर' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत काय नोंदवलंय ते पाहाणं महत्त्वाचं ठरू शकेल.
भारताच्या इतर प्रांतातील लढ्यापेक्षा हैद्राबाद संस्थानातील लढ्याचे स्वरूप निराळे होते. तो केवळ लोकशाही स्वातंत्र्याचा आणि जनतेच्या बाजूने संस्थानिकाच्या विरुद्धचा लढा नव्हता. त्या लढ्याचा आशय कितीही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी तो मुस्लिम जातीयवादाच्या एका प्रबल केंद्राविरुद्ध चालू असणारा हिंदू प्रजेचा लढा होता, ही गोष्ट नाकारता येणारी नव्हती. कै. सिराजुल हुसेन तिरमिजी, हुतात्मा शौयेबुल्लाखान, कोप्पल येथील चार-पाच मुस्लिम सहकारी, लढ्याच्या शेवटच्या काळात लढ्यात सहभागी झालेल्या सात मुस्लिम नेत्यांची नावे कितीही उच्चारवाने घोषित केली तरी हैद्राबाद संस्थानातील खालपासून वरपर्यंतचा संपूर्ण मुस्लिम समाज हैद्राबाद संस्थान भारतातून वेगळे रहावे, स्वतंत्र रहावे, या मताचा होता, ही गोष्ट लपणे शक्य नव्हते. आमच्या डोळ्यांसमोर वस्तुस्थितीचे चित्र स्पष्टपणे उभे होते. अशा अवस्थेत १४-१५ वर्षांच्या मुलालासुद्धा काँग्रेस संघटनेची अधिकृत भूमिका खोटी आणि चुकीची आहे, हे जाणवतच होते.
त्या वेळच्या काँग्रेसची अधिकृत भूमिका अशी होती की, मुस्लिम लीग आणि हैद्राबाद संस्थानातील 'इत्तेहादूल मुसलमीन' यांसारख्या संघटना वरिष्ठवर्गीय मुस्लिम भांडवलदारांच्या व जमीनदारांच्या संघटना असून त्या परकीय सरकारच्या तालावर नाचणाऱ्या इंग्रजधर्जिण्या संघटना आहेत, पण सर्वसामान्य मुसलमान असा नाही. तोही देशावर प्रेम करणारा, राष्ट्रीयत्वाचे आव्हान पोहोचणारा, स्वातंत्र्याला उत्सुक असणारा असा समाज आहे. लीगचा आवाज हा मुसलमानांचा प्रातिनिधिक आवाज नव्हे. मोठमोठ्या नेत्यांनी ही अधिकृत भूमिका अनेक पुराव्यांनी तपशीलवार समजावून सांगितली, तरी आम्हांला पटणे शक्य नव्हते. मुस्लिम समाज व जनता या संघटनेत आहे; या संघटनेचे नेते वरिष्ठवर्गीय असतील, पण त्यांच्याच मागे मुस्लिम समाज आहे, हे सत्य आम्ही नाकारू शकत नव्हतो, सर्वसामान्य मुस्लिम माणूस धार्मिक राष्ट्रवादी राजकारणाचा भाग आहे व होता.

(जागर, पान १०-११)

हैद्राबादचा हा इतिहास लक्षात घेतला तर तिथे ओवेसींचा पक्ष काय करू शकतो, कशाचा फायदा उपटवू शकतो आणि कोणत्या वक्तव्यातून काय घडवू शकतो ते स्पष्ट होईल.
***

ओवेसींच्या वक्तव्य एकीकडे झाल्यानंतर भारताचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वक्तव्य केलं की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष भगव्या दहशतवादाला खतपाणी घालतायंत. शिद्यांच्या वक्तव्याचं स्वागत पाकिस्तानातल्या 'जमात-उद-दावा' या दहशतवादी संघटनेचा संस्थापक (आणि मुंबईवरच्या '२६/११' हल्ल्यांचा सूत्रधार) हफीझ सईद याने केलं. यापूर्वीही अशी वक्तव्यं होत आल्येत. आणि होत राहातीलही. यातल्या कुठल्याही मुद्द्यावर टीव्हीवर झालेल्या चर्चांमधे इतर वक्तव्यांचे दाखले देण्यात आले. त्यामुळे हा गुंता एकमेकात किती घुसलाय हे समजू शकतं.

या सर्व विधानबाजीसंबंधी थोडीफार 'सेक्युलर' स्पष्टीकरणं कुरुंदकरांच्या वरती उल्लेख केलेल्या पुस्तकात सापडतील.

कशी?

हे समजून घेण्यासाठी त्यांचा हा परिच्छेद पाहूया-
हिंदूंचा जातीयवादसुद्धा नीट समजून घेतला पाहिजे. जनसंघ, आर.एस.एस., हिंदुमहासभा असल्या प्रकारच्या पक्षांतच हिंदू जातीयवाद असतो, असे नाही. तसे असते, तर फार बरे झाले असते! भारतीय निवडणुकीत सर्व सेक्युलर पक्षांना मिळून ७० टक्क्यांच्या आसपास मतदान होत असते. हिंदू जातीयवाद्यांचे सर्वांत मोठे समूह निधर्मीपणाचा बुरखा पांघरून सेक्युलर पक्षांतच ठाण मांडून बसलेले आहेत! म्हणून मुस्लीम जातीयवादाविरुद्ध झगडण्याचा कोठलाही कार्यक्रम पुढे रेटणेच कठीण झाले आहे. कोठलाही प्रश्न उपस्थित झाला, की हिंदू जातीयवाद दोन-तीन सोज्ज्वळ भूमिका घेत असताना दिसतो. पहिली सोज्ज्वळ भूमिका सर्व धर्म सारखेच आहेत, हे तुणतुणे वाजवीत सर्व धर्मांची तोंडभर स्तुती करण्याची आहे. म्हणजे कोणत्याही धर्माबाबत धर्मचिकित्सेची किंवा धार्मिक गुलामगिरीविरुद्ध झगडण्याची गरजच बाजूला झटकून टाकता येते! दुसरी तितकीच सोज्ज्वळ भूमिका धर्माविषयी काहीच न बोलता सर्व जातीयवाद्यांशी तडजोडी करण्याची आहे. या तडजोडीची आत्मघातकी चढाओढ मशावरतला पाठिंबा देण्यात साम्यवादी व समाजवादी पक्षांनी जी एकमेकांवर ताण केली, तेथे दिसून येते. तिसरी सोज्ज्वळ भूमिका हृदयपरिवर्तनाची आहे. मुस्लिम समाजाबाबत कोणताही प्रश्न निघाला की, 'हा प्रश्न मुसलमानांना समजावू सांगा, त्यांना पटू द्या, त्यांना मागणी करू द्या म्हणजे सोडवू,' असे सांगण्यात येते. हा पदर झटकण्याचा एक प्रकार आहे!
(पान १७७)
***

'सामना'चे दिवंगत संपादक किंवा सध्याचे अस्तंगत होत असलेले संपादक काय म्हणतात ते वाचून मुस्लीम धर्माबद्दल मतं बनवणं काही बरं नाही. पण त्याबरोबरच सगळे धर्म सारखेच आहेत असं म्हणत भाबडी भूमिका घेणंही फारसं बरं नाही. हे फक्त मुस्लीम धर्माला लागू नाही, हिंदू असो, ख्रिस्ती असो किंवा इतर कोणी. सबगोलंकारीपणाऐवजी, त्या-त्या संदर्भात काही समजून घेता येईल का, असा प्रयत्न बरा वाटतो. सबगोलंकारीपणाने मूळ प्रश्नाची तड लागत नाही. किंबहुना अशी भूमिका एकूणच जातीयवादाला पूरक ठरते, असं कुरुंदकरांचं म्हणणं आहे. या त्यांच्या म्हणण्यातलं तथ्य महाराष्ट्रातही नुकतंच दिसून आलंच, चिपळूणला झालेल्या जानेवारीच्या मध्यात झालेल्या ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात.

साहित्य संमेलनासंदर्भात कुरुंदकरांचं म्हणणं कसं लागू होतं, हे स्पष्ट होण्यासाठी आधी त्यांचं म्हणणं सांगूया-
हिंदू मनाला कोणते परिवर्तन मानवतच नाही. ज्या वेळी हिंदू समाजात पुरोगामी विचार निर्माण झाले, त्या वेळी हिंदू समाजातही पुरोगामी शक्तींना फारसा पाठिंबा नव्हता. सतीबंदी मागणारे, इंग्रजी शिक्षण मागणारे मूठभर, पाचपन्नास लोक होते. याविरोधी तक्रार करणाऱ्यांचे अर्ज व प्रस्थापित मूल्यांना पाठिंबा देणाऱ्यांचे अर्ज हजारो सह्यांनी भरलेले होते. हा आपलाच इतिहास विसरून जाऊन सेक्युलर बुरख्यातले हिंदू नेते मुस्लिम बुरख्याच्या बाबतीत मात्र हृदयपरिवर्तनाच्या गोष्टी बोलतात! मुस्लिम समाजात परिवर्तन होत नाही, याचे मुख्य कारण हे आहे की, हिंदू समाजातील सेक्युलर नेतृत्वही परंपरेने चालत आलेल्या परंपरावादी नेत्यांच्याच हातात आहे! आणि या परंपरावाद्यांना कर्मठ मुस्लिमांशी हातमिळवणी करणे मतदानाच्या दृष्टीने सुरक्षित वाटते. परिवर्तनविरोधी स्थितीवादी असणारा हिंदू जातीवादी मुस्लिम जातीयवादाचे संरक्षण करतो, --

(पान १८०)

कुरुंदकरांच्या पुस्तकातल्या वरच्या परिच्छेदातलं शेवटचं वाक्य साहित्य संमेलनामधे लागू पडलं.

कसं?

तर, ब्राह्मण व हिंदुत्त्ववादी जातीयवादाने मुसमुसलेल्या संयोजकांनी मराठी लेखक आणि मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या घरापासून सुरू होणारा ग्रंथदिंडीचा मार्ग स्थानिक मुस्लिम टोळक्याच्या विरोधापायी बदलून टाकला.
***

'जागर' : प्रकाशक - देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. : किंमत - दोनशे रुपये.
कुरुंदकरांच्या राजकीय लेखांचा हा ग्रंथ आहे. साधारण १९६७पासून पुढच्या दोन वर्षांत हे लेख लिहिले गेल्याचा अंदाज प्रस्तावनेवरून बांधता येतो. एकूण पुस्तकाची पानं २६३ आहेत. त्यात चाडेचार पानं भरणारी १२० संदर्भग्रंथांची यादी आहे.

आपण वरच्या मजकुरात जे दाखले दिले ते या ग्रंथातल्या तिसऱ्या विभागातले आहेत. त्यात 'सेक्युलॅरिझम् आणि इस्लाम', 'धर्मग्रंथ-अनुयायी-जीवन', 'राजकीय शोध व बोध' अशी तीन प्रकरणं आहेत.

हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशा कोणत्याही धर्माबद्दल काहीएक स्पष्ट आणि संदर्भावर आधारित मांडणी या लेखांमधून आहे. मतभेदांना जागा आहे.

Saturday 26 January 2013

भारतीय प्रजासत्ताकातील भाषा व आकाशवाणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने तयार केलेली भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. तेव्हापासून सुरू असलेला हा प्रजासत्ताक दिन.

भारतीय राज्यघटना इंग्रजीतून इथे वाचता येईल
राज्यघटनेचा सतरावा भाग आहे - 'अधिकृत भाषा'. त्यातला तपशील मुळातून वाचता येईल, आपण फक्त त्या भागाच्या शेवटाकडे दिलेल्या 'विशेष सूचनां'चा आशय इथे आधी नोंदवूया - (कायदेशीर भाषेमधे हे केलेलं नाही, पण आशय चुकवलेला नसावा. कलमांचे क्रमांक आधीच्या प्रकरणांपासून सुरू होऊन आलेले असल्याने मूळ घटनेत वेगळे आहेत. इथे या नोंदीपुरते त्यांना क्रमांक दिलेले आहेत.)
१) तक्रार निवारणासाठी वापरण्याची भाषा - संघराज्याच्या किंवा राज्याच्या एखाद्या अधिकाऱ्याकडे किंवा प्रशासकीय विभागाकडे तक्रार दाखल करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला संघराज्यात किंवा राज्यात वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेचा वापर करता येईल.
२) प्राथमिक पातळीवर मातृभाषेतून शिक्षणाची सुविधा - भाषिक अल्पसंख्याक गटाच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक पातळीवर मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी पुरेशा सुविधा देण्यासाठी प्रत्येक राज्य व स्थानिक प्रशासनाने प्रयत्नशील असावे. अशा सुविधांसाठी तरतूद करण्यासाठी आवश्यक वाटल्यास राष्ट्रपती कोणत्याही राज्याला संबंधित आदेश देऊ शकतात.
३) भाषिक अल्पसंख्याक गटांसाठी विशेष अधिकारी - अ) भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक राष्ट्रपतींनी करावी.
ब) राज्यघटनेने भाषिक अल्पसंख्याकांना दिलेल्या अधिकारांसंबंधीच्या प्रकरणांची चौकशी करणं हे विशेष अधिकाऱ्याचं काम असेल. या प्रकरणांसंबंधी राष्ट्रपतींनी केलेल्या सूचनेनुसार त्यांना वेळोवेळी माहिती पुरवणं हेही या अधिकाऱ्याचं काम असेल. राष्ट्रपतींनी हे अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांना व संबंधित राज्यांच्या सरकारांना पाठवावेत.
४) हिंदी भाषेच्या विकासासाठी सूचना - भारताच्या मिश्र संस्कृतीतील सर्व घटकांना अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून हिंदी वापरता येईल एवढा या भाषेचा प्रसार व विकास व्हावा यासाठी प्रोत्साहन देणं हे संघराज्याचं कर्तव्य आहे.

प्रशासकीय पातळीव इंग्रजीला डच्चू देऊन हिंदीचा वापर वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत आणि ते पाच वर्षांमधे प्रत्यक्षात यावेत असंही घटनेतील या भागामधे लिहिलेलं आहे.
***

'एथ्नोलॉग' हे जगभरातल्या सुमारे सात हजार भाषांची आकडेवारी प्रकाशित करणारं प्रकाशन आहे. त्यात नवीन आवृत्तीनुसार भर घालण्याचं काम ते लोक करत असतात. त्यांची मदत घेऊन आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळी, मराठी, मैतेई, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलगू, ऊर्दू - या बावीस राष्ट्रीय भाषांची भाषकसंख्या, कुठे कुठे त्या बोलल्या जातात आदी तपशील आपल्याला पाहाता येऊ शकतो. सरकारने अधिकृतरित्या सूचीत घेतलेल्या या भाषा आहेत.
***

आता आपण 'आकाशवाणी'कडे वळू.
तुम्ही रेडियोवरच्या बातम्या ऐकता का?
'ऑल इंडिया रेडियो'ने त्यांच्या वेबसाइटवर भारतातील राष्ट्रीय भाषांमधली वार्तापत्रं ऐकण्याची सोय करून दिलेली आहे. उदाहरणार्थ, कोणाला नागपूर केंद्रावरच्या संध्याकाळी पावणेसातच्या बातम्या ऐकायच्या असतील, तर त्या वेबसाइटवर जाऊन ऐकता येतात. भारतात नक्की कुठल्या भाषांमधे बातम्या सांगितल्या जाऊ शकतात आणि ऐकल्या जाऊ शकतात आणि त्या कशा सांगितल्या जातात हे ऐकण्यासाठी आपण ह्या वेबसाइटवर जाऊ शकतो. मिझोरममधे रेडियोवर कोण काय ऐकत असेल, हे तुम्हाला नागपुरात ऐकता येऊ शकेल. आणि या बातम्यांचा मजकूरही त्यांनी उपलब्ध करून दिलाय. एकूण ज्या मिश्र संस्कृतीचा उल्लेख राज्यघटनेतल्या भाषांविषयीच्या विभागात केलेला दिसतो, त्या मिश्र संस्कृतीची झलक इथे ऐकता येते.


***

Thursday 24 January 2013

तोंडाला सुटलेला फेस

वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर दिसणाऱ्यांना एकदम तुच्छ लेखण्याचं किंवा एकदम 'हिरो' करण्याचं टाळून आपण ही नोंद वाचण्याचा प्रयत्न करूया. माध्यमाच्या म्हणून असलेल्या मर्यादा आणि इतर अनेक मर्यादांमधे गोष्टी घडत असल्याचं लक्षात घेऊन ही नोंद वाचूया. 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली'च्या सरत्या आठवड्यातल्या अंकात आलेल्या संपादकीय टीपणाचं हे भाषांतर आहे. या मताची 'रेघे'वर एक नोंद व्हावी एवढाच हेतू.
***

गेले काही दिवस पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्यासंदर्भात भारत सरकारकडे एकाच वेळी कठोर आणि गोंधळलेल्या मागण्यांची संख्या वाढत असल्याचं दिसतंय. जम्मूमधे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने दोन भारतीय जवानांना मारून शिरच्छेद केल्याच्या पार्श्वभूमीवर या मागण्या होत आहेत. मुळात हे कृत्य अत्यंत क्रूर होतं आणि शस्त्रसंधी असूनही खऱ्या अर्थाने कधीच पूर्णपणे न थांबलेल्या संघर्षाच्या आगीत तेल ओतण्याचं काम पाकिस्तानी सैन्याच्या या नीच पातळीवरच्या जाणुनबुजून केलेल्या कृत्याने झालं. शस्त्रसंधीच्या करारामुळे नियंत्रण रेषेवरच्या चकमकींची संख्या कमी झाल्याचं आणि नागरिकांना सुटकेचा निश्वास टाकण्यासाठी पुरेसा अवकाश मिळत असल्याचं चित्रं वर्तमानपत्रांमधल्या बातम्यांमधून दिसत असलं तरी भारत व पाकिस्तान या दोन्ही बाजूंच्या सैन्यांनी या कराराचा विविध वेळी भंग केला आहे.

पाकिस्तानबरोबरच्या वेळोवेळी होणाऱ्या वाटाघाटींमधे कधी चुका करत कधी सामोपचार साधत, गेल्या दोन वर्षांत भारत सरकारने सकारात्मक पावलं उचलत दोन्ही देशांमधले संबंध सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले होते. अजून बरंच काही करता आलं असतं आणि अजूनही करता येईल; दोन्ही देशांमधल्या संबंधांमधल्या सुधारणेचा वेग फारसा उत्साहवर्धक नसला तरी दिशा सकारात्मक आहे. भारतात पाकिस्तानी क्रिकेट संघाला खेळण्यासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय, वृद्धांसाठी व्हिसाच्या अटींमधे शिथीलता आणण्याचा निर्णय, आणि व्यापारवृद्धी यांमुळे संबंध सुधारणेसाठी मदत झाली. यामुळे सीमेवरचं सैन्य कमी करणं, दोन्ही देशांमधल्या लोकशाही आणि पुरोगामी गटांना प्रोत्साहन देणं या गोष्टीही शक्य झाल्या असत्या. भारत - पाकिस्तान संबंध म्हणजे फक्त दोन सार्वभौम राष्ट्रांमधले संबंध नाहीत, तर त्यामागे सांप्रदायिकता, फाळणी, विश्वासघात व द्वेषाच्या भावना असे अनेक संदर्भ आहेत. ते फक्त परराष्ट्र संबंध नाहीत तर देशांतर्गत राजकारणावर परिणाम करणारे हे अतिशय दुर्मीळ स्वरूपाचे आणि अनेकदा भयंकर वाटतील असे संबंध आहेत.

भारतातल्या सार्वजनिक वर्तुळांमधे पाकिस्तानचा उल्लेख कधीच फक्त एक परका देश म्हणून येत नाही, तर अनेकदा स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे भारतातील सांप्रदायिकतेच्या समस्येच्या संदर्भात हा उल्लेख असतो. भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार अनेकदा भारतीय मुस्लिमांच्या संदर्भात पाकिस्तानचा उल्लेख करतात. नुकतीच एक बातमी होती की, मुंबईतल्या एका वस्तीमधे वीजबिलावर पत्ता म्हणून 'छोटा पाकिस्तान' असं लिहिलेलं आढळलं होतं!

या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांनी भारतीय सैन्यांच्या हत्येची व त्यातील एकाच्या शिरच्छेदाची बातमी उचलून धरली. केवळ बातमी देण्यापुरती ही घटना उरली नाही तर सतत आणि ठरवून गर्दीला उचकवण्यासाठी त्याचा वापर झाला. केवळ एखादी किंवा काही थोड्या वाहिन्या याला जबाबदार आहेत असं नाही. उलट अगदीच थोडे अपवाद वगळता, वृत्तवाहिन्या आणि दूरचित्रवाणी पत्रकार लोकांना भडकावण्यामध्ये एकमेकांशी स्पर्धा करताना दिसत होते. अर्धवट बातम्या, अर्धसत्य कथन, पूर्ण खोटेपणा, चर्चांसाठी बेजबाबदारपणे बोलणाऱ्या 'मत घडवणाऱ्यां'ची आणि 'तज्ज्ञां'ची काळजीपूर्वक केलेली निवड हे सगळं रसायन एकत्र करण्यात आलं, जेणेकरून दर संध्याकाळी घरांच्या दिवाणखान्यामधे (आणि पुढे जाऊन रस्त्यांवर) रागाचा पारा ठराविक पद्धतीने वाढत जाईल; परिणामी, प्रेक्षकांची संख्याही वाढेल. आत्ताच्या संदर्भापुरतं बोलायचं तर गंभीर, पण लहानसा प्रश्न वृत्तवाहिन्यांनी एकहातीपणे राष्ट्रीय उन्मादात बदलून टाकला. पाकिस्तानी हॉकी खेळाडूंवर हल्ला करण्यासाठी जमलेल्या शिवसेनेपासून एकाच्या बदल्यात दहा पाकिस्तानी शिरं घेऊन येण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराजांपर्यंत - उजव्या पक्षांनी व राजकीय नेत्यांनी, वाहिन्यांनी आधीच वाढवलेला हा मुद्दा उचलला.

वृत्तवाहिन्यांच्या या वागणुकीसंदर्भात अनेक कारणं दिली जातात. उपलब्ध जागेपेक्षा वृत्तवाहिन्यांची संख्या वाढल्यामुळे जाहिराती मिळवण्याची स्पर्धाही वाढली, त्यामुळे प्रेक्षकसंख्या वाढवण्याची स्पर्धाही वाढली, यातूनच प्रेक्षकांना आपल्याच वाहिनीवर खिळवून ठेवण्यासाठी सनसनाटी बातम्या तयार करण्याची गरज वाढली. दूरचित्रवाणीवरच्या वृत्तवाहिन्यांची स्पर्धा फक्त एकमेकांसोबत नाहीये, तर मनोरंजनपर कार्यक्रमांना वाहिलेल्या वाहिन्या, क्रीडाविषयक वाहिन्या, अगदी दूरचित्रवाणीव्यतिरिक्तचे कार्यक्रम या सगळ्यांसोबत वृत्तवाहिन्यांची स्पर्धा सुरू आहे. वृत्तवाहिन्यांवरचे हे दबाव फक्त भारतातच आहेत असं नाही. विविध ठिकाणच्या माध्यमसंस्कृतींनी तिथले संदर्भ लक्षात घेऊन त्यावर उपाय शोधले. पण भारतीय दूरचित्रवाणी माध्यमाने आंधळ्या अभिमानाप्रदर्शनाचा मार्ग निवडल्याचं दिसतंय. १९९९मधल्या कारगील युद्धाच्या वेळी पहिल्यांदा या व्यवसायिक डावपेचाची झलक दिसली, पण २००८मधल्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यावेळी भारतातले दूरचित्रवाणी पत्रकार उन्मादी वार्तांकनाचा पुरेपूर फायदा उठवताना दिसले. या व्यावसायिक डावपेचामधे न टाळता येण्याजोगं काहीच नाही. ज्यांनी ते सुरू केलंय त्यांना त्याची जबाबदारी घ्यावीच लागेल.

अनेक लोकांनी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांच्या या घडवून आणलेल्या उन्मादाने बाधित होऊन पाकिस्तानी हॉकी खेळाडूंना माघारी पाठवणं, वृद्ध व्यक्तींना व्हिसामधे सवलती देण्याचा निर्णय पुढे ढकलणं, यांमुळे भारत सरकारने आपलं परराष्ट्र धोरण वृत्तवाहिन्यांच्या भयंकर उन्मादाला बळी दिल्याचं दिसलं. या 'डेड एन्ड'मधून सुटकेचा कोणताही सोपा मार्ग नाही. माध्यमांचं सरकारकरवी नियंत्रण करणं हेही भयानक आणि अस्वीकारार्ह आहे, पण त्याचबरोबर माध्यमांनी उजव्या गटांना आक्रस्ताळेपणात माघारी टाकणं हेही भयानक आहे. माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारी आणि कॉर्पोरेट दबाव नसलेले दुसरे काही नवे मार्ग असू शकतील का? की, आपण दूरचित्रवाणीवरच्या वृत्तवाहिन्या म्हणजे मनोरंजनपर ('बिग बॉस'सारखे 'रिअॅलिटी शो' दाखवणाऱ्या) वाहिन्या आहेत असं समजून त्यांच्याकडे पाहायला हवंय?
***

वरच्या मजकुरासारखंच मत व्यक्त करणारा संपादकीय मजकूर 'बिझनेस स्टँडर्ड'मधेही आला होता.
***

TV Heads (ग्राफिटी : बँक्सी । विकिपीडियावरची नोंद)
***

Monday 21 January 2013

जॉर्ज ऑर्वेलच्या डायरीतली एक नोंद

जॉर्ज ऑर्वेल
जॉर्ज ऑर्वेल (जन्म - २५ जून १९०३.) मृत्यू - २१ जानेवारी १९५०.

जॉर्ज ऑर्वेलच्या डायरीतल्या १९३८ ते १९४२ या काळातल्या नोंदी पुस्तकरूपात प्रसिद्ध झालेल्या आहेत. (संपादक - पीटर डेव्हिसन). या नोंदी 'ऑर्वेल डायरीज्' या ब्लॉगवरही अधिकृतपणे उपलब्ध आहेत. त्यातलीच ही एक ('बीबीसी रेडियो'वरच्या कामाच्या संदर्भातली) नोंद, १५ ऑक्टोबर १९४२ची.


इंग्लंडमधे लहानसा भारत रुजवल्यासारखं झालंय. काही आठवडे आमची मराठी वार्तापत्रं कोठारी नावाचे एक लहान चणीचे गृहस्थ भाषांतरीत करत आणि वाचतही. हा गुबगुबीत मनुष्य बुद्धीमान होता आणि माझ्या अंदाजानुसार खरोखरचाच फॅसिस्टविरोधी होता. 'बीबीसी'मधे कर्मचारी भरती करणाऱ्या अधिकाऱ्यांना (ह्या प्रकरणात मला वाटतं, एम१५ला) अचानक एके दिवशी लक्षात आलं की कोठारी कम्युनिस्ट आहेत किंवा होते, विद्यार्थी चळवळीत सक्रीय होते; त्यामुळे त्यांना काढून टाकण्याचा आदेश आला. इंडिया हाऊसमधे काम करणारा जथा हा राजकीयदृष्ट्या 'ठीक' असलेला तरुण कोठारींच्या जागी भरती करण्यात आला. या भाषेत भाषांतरकार सापडणं इतकं सोपं नाहीये. जे भारतीय मातृभाषा म्हणून ही भाषा बोलतात ते इंग्लंडमधे असताना ती विसरतात असं दिसतं. काही आठवड्यांनी माझ्या सहायक, मिस् चितळे, दबकत माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की, अजूनही वार्तापत्रं कोठारीच लिहीत आहेत. जथा ती भाषा वाचू शकत असला तरी लिहिण्याबाबतीत मात्र त्याची प्रगती नव्हती, त्यामुळे कोठारीच त्याच्यासाठी लिहीत होते. मानधनही त्या दोघांमधे विभागलं जात होतं. आम्हाला दुसरा सक्षम भाषांतरकार मिळाला नाही, त्यामुळे कोठारींचं काम सुरूच ठेवण्यात आलं होतं आणि अधिकृतरित्या आम्हाला त्याबद्दल काही माहीत नव्हतं. भारतीय लोक सापडतील तिथे अशा गोष्टी होतच राहणार.
***

टीपा -
१) एम१५ : ब्रिटिश गुप्तचर संस्था, ऑर्वेलवरही लक्ष ठेवत असे असं कागदपत्रं सांगतात.
२) मराठी विभाग - 'बीबीसी'ची प्रक्षेपण सेवा १९४०च्या दरम्यान काही पौर्वात्य भाषांमधे निवडक प्रमाणात सुरू करण्यात आली. मराठीही त्यात होती.
३) मिस् चितळे : वेणू चितळे. (जन्म - २८ डिसेंबर १९१२. मृत्यू - १ जानेवारी १९९५). 'बीबीसी'मधे सुमारे पाच वर्षं नोकरी. इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध करणाऱ्या पहिल्या मराठी महिला. त्यांच्याबद्दल 'लोकसत्ते'त आलेले दोन लेख - एकदोन. त्यांचा एक फोटो.
४) दुसऱ्या महायुद्धाचा साधारण कालावधी : १९३९ - १९४५.
***

ऑर्वेलच्या काही पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या 'पेंग्विन'वाल्यांनी 'जॉर्ज ऑर्वेल दिना'निमित्त बाजारात आणल्यात. त्यातल्या 'नाइन्टीन एटी-फोर'चं मुखपृष्ठ असं आहे-

मुखपृष्ठ : डेव्हीड पीअरसन

हुकूमशाही (किंवा खरंतर कुठल्याही) राजवटीतल्या (किंवा समाजातल्या / संस्थेतल्या) 'सेन्सॉरशिप'ला पीअरसननी असं मुखपृष्ठावर आणलंय. त्यामुळे पुस्तकाचं आणि लेखकाचं काळ्या ठशातलं नाव काळ्या रंगाच्या पट्टीवरतीच असल्यामुळे दिसतंय - न दिसतंय अशा परिस्थितीत ठेवलंय. त्यासंबंधी 'क्रिएटीव्ह रिव्ह्यू'.
***
आपल्याला आजूबाजूला काय दिसतंय?

Friday 18 January 2013

दिवाकर, असा का तुम्ही आमचा छळ मांडलाय्?

नाट्यछटाकार दिवाकर (शंकर काशीनाथ गर्गे) यांची आज जयंती.
जन्म - १८ जानेवारी १८८९. मृत्यू - १ ऑक्टोबर १९३१.

'विकिपीडिया'वरची दिवाकरांवरची नोंदही बऱ्यापैकी आहे. त्यातून काही अधिकची माहिती हवी असल्यास मिळू शकेल.
***


नाट्यछटा म्हणजे काय?
नाटकाचा तो अति-लहान किंवा सोपा प्रकार नव्हे किंवा ते कथेचे किंचित् नाट्यीकरणही नव्हे. एकीकडे नाटक, नाटिका आणि दुसरीकडे कादंबरी, कथा पाहून या प्रकाराला त्याचे स्वतंत्र, वेगळे अस्तित्त्व दिसते; आणि ते आंग्ल कवी रॉबर्ट ब्राउनिंग यांच्या 'मोनोलॉग' या काव्यप्रकाराच्या वाचनाने १९१३ साली हेरून दिवाकरांनी पहिली नाट्यछटा लिहिली ती 'महासर्प'.

- विजय तेंडुलकर 
('नाट्यछटा' एका आवृत्तीच्या प्रस्तावनेतून. 'रेघे'वर नोंदीसाठी संदर्भ - समग्र दिवाकर - संपादक : सरोजिनी वैद्य. पॉप्युलर प्रकाशन)

तेंडुलकरांनी १९१३ या वर्षाचा केलेला उल्लेख चुकीचा असावा, कारण 'महासर्प' १८ सप्टेंबर १९११ या तारखेला लिहिली गेल्याची नोंद आहे. : रेघ.
***

ही दिवाकरांची एक नाट्यछटा :

असे केल्याशिवाय जगात भागत नाही!

''...माझे मोठे भाग्य, यात काही शंका नाही! नाहीतर, आपल्यासारख्या थोर लोकांची कोठून गाठ पडायला! - अहो कशाचे, कशाचे! आम्ही कसले कवी! कोठे एका कोपऱ्यात लोळत पडलो आहोत झाले! नाही खरेच! परवाची आपली कविता फारच बहारीची होती बोवा! फारच छान! एक्सलंट! अहो आधी नाव पाहूनच थक्क झालो! 'माझे अंधार अजीर्ण।' वा! किती सुंदर! - नाही, ते आले लक्षात. आहे कविता एकंदर आत्म्यालाच उद्देशून! पण त्यातल्या त्यात या दोन ओळी तर मला फारच आवडल्या! काय पहा! -  हां बरोबर, - 'अजीर्णामुळे। जीव कळवळे।।' काय बहार आहे यात! शब्द सोपे असून किती खोल, गंभीर अर्थ! - काय म्हणता! इतका खोल अर्थ आहे का? शाबास! 'प्रेमभंगामुळे हृदय पिळवटून डोळ्यांतून खळखळा वाहिलेल्या अश्रूंचे अजीर्ण!' क्च! काय विलक्षण मिस्टिक कविता आहे हो! टेरिबल! फारच प्रतिभा अफाट! माझे समजा हो! - कोणती? - कोणती बरी माझी कविता आपल्याला अतिशय आवडली? हां, हां! ती होय? गेल्या मस्तकमंजनातील चहादाणीवरील! अस्से! - हो, तीसुद्धा आहे आत्म्यालाच धरून! - बरे आता रस्त्यात नको - केव्हा? उद्या सकाळी येऊ आपल्या घरी? - ठीक आहे - हं: 'अहो रूपम् अहो ध्वनिः' चालले आहे जगात! म्हणे 'आपली चहादाणीवरील कविता अतिशय आवडली!' हः हः कमाल आहे बोवा या लोकांची! इतकी भिकार कविता की, मला स्वतःलासुद्धा आवडत नाही! 'माझी चहादाणी। साखरपाणी।। अधण येई सळसळा। अश्रू येती घळघळा।।' हः हः यंवरे कविता! पण चालले आहे की नाही! भेंडीरमणाने उठावे बटाटेनंदनाची स्तुती करावी! बटाटेनंदनाने पुढे यावे, भेंडीरमणाची वाहवा करावी! मनात परस्परांना त्यांची कविता मुळीच आवडत नसते! पण जगात याने त्याला शेली म्हणावे, उलट त्याने याला कीट्स म्हणावे! चालला आहे सपाटा! बरे असे केल्याशिवाय जगात भागत नाही! अहो नाही तर, आपली खरी मते सांगून जगात तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे की नाही? रिकामा जीवाला ताप! जाऊ द्या!...''

२२ मे १९१३

('समग्र दिवाकर'मधून. पान क्रमांक ५१-५२)

***

फेसबुक : मराठी साहित्य : मराठी साहित्य संमेलनं : माध्यमं : व इतर अनेक गोष्टी : यांना ही नोंद अर्पण.

सदानंद रेग्यांनी दिवाकरांवर लिहिलेल्या 'गर्गेसाहेब' या कवितेच्या सुरुवातीला कंसात लिहिलं होतं : (काहीही कारण नसताना आज तुमची आठवण झाली. असा का तुम्ही आमचा छळ मांडलाय्?)

'रेघे'वर दिवाकरांची आठवण आली त्याचं कारण आज त्यांची जयंती आहे हे. आणि वरती जे नोंद अर्पण केलेल्या गोष्टी लिहिल्यात तेही एक कारण सांगता येईल.
***


शंकर काशीनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर

***

Tuesday 15 January 2013

दुःख नाही, पण कंटाळा येतो

'तीन पैशाचा तमाशा'मधून मराठी नाटकांशी संबंध आलेले नि रॉक गायक असलेले नंदू भेंडे यांची मुलाखत निखील वागळे यांनी नुकतीच 'ग्रेट भेट'मधे घेतली. मराठीतले पहिले 'रॉकस्टार' अशी त्यांची ओळख वागळ्यांनी करून दिली. (१९७०च्या दशकातल्या घडामोडी-) 'तीन पैशाचा तमाशा'संबंधी ज्यांना माहिती असेल त्यांना 'एक चिमुकली होती खोली' आठवू शकेल किंवा त्यांचं इंग्रजीतलं नाटकही आठवू शकेल. नाटक, संगीत याबद्दल काही आपल्याला आत्ता बोलायचं नाहीये. त्यात काय कमी-जास्त असेल ते वेगळं. पण ही नोंद करण्याचं कारण हे आहे - 

तुम्ही २५ वर्षं आधी जन्माला आलात असं वाटतं का, या वागळ्यांच्या प्रश्नावर भेंडे हसत सकारात्मक उत्तर देतात. मग वागळे विचारतात की, याचं दुःख वाटतं का? त्यावर भेंडे हसत दुःख वाटत नसल्याचं सांगतात. त्यानंतर अशाच गप्पा होत जातात, त्यात पुन्हा संदर्भ येतो तेव्हा भेंडे म्हणतात की, '... मला कंटाळा आला.' त्यावर वागळे पुन्हा आधीचा संदर्भ देऊन म्हणतात की, म्हणजे दुःख नाही, पण कंटाळा आला, वैताग आला. यावर भेंडे हसतात आणि म्हणतात, हो, वाईटबिईट वाटलं नाही, दुःख नाही, पण कंटाळा आला.

- हे आजच्या नोंदीचं कारण.

वागळ्यांनी पकडलेला पॉईन्ट आणि भेंड्यांचं त्यावरचं हसत हसत उत्तर हे दोन्ही मजेशीर आहे.

एकूण आयुष्यातला कंटाळा ही गोष्ट जरा बाजूला ठेवली, तर फक्त मराठीपुरता असा काही कंटाळा आहे काय की जो जरा लक्ष दिलं तर आपसूक चढू शकतो?
असेल.
त्यावर बोलायचाही कंटाळा आलाय.

मासिकं, साप्ताहिकं. वर्तमानपत्रांचंही साधारण तसंच. त्यांचे स्वतःविषयीचे समज-गैरसमज. रेघेची सुरुवात यासंबंधीच्या कंटाळ्यातून झालेली असल्यामुळे ही नोंद केली. जोपर्यंत हा कंटाळा आहे तोपर्यंत रेघ चालू राहील अशी अपेक्षा करायला पाहिजे.
***

किती हा मठ्ठ चिखल, ही दलदल निलाजरी
किती हे ठाय कंटाळे, विटाळ, ही पारोसी

किती ही मठ्ठ मढवण, गढवण ही रोगणे
असे हे खेटते दिवस, आळस ही माखणी

सांकलेली रब्-रब् सांधी असैल जडावण
थकलेली बुर्-बुर् बसकण, जख्खड ही अळणी

चूळ भरून टाकावं जग

- मनोहर ओक
(मनोहर ओकच्या ऐंशी कविता, लोकवाङ्मय गृह, पान क्रमांक वीस)
***

जाऊ दे, आता गाणं ऐका-


Saturday 12 January 2013

a building

This small piece is sent for Regh by Anand Manavi. The accompanying photograph is an addition by Regh.


It's more confusing to think about the confusing emotions that the building brings into the mind.
It makes you nostalgic.
This particular nostalgia makes you sentimental. 
Why does it make you sentimental?
Probably its stone walls have some haunting feature.
Or may be the thought of the hands that have touched the walls over the years brings in the sentimental touch.
Or may be the thought that you could never touch the hands that you saw touching the walls makes the whole thing sentimental.
Somebody may laugh over the sentimentalism of the thought, but that is what the building does to you. You can't stop it.
"Sorry, My Lord, but I can't stop it."
Photo  : Regh

Thursday 10 January 2013

काश्मीरसंबंधीची बातमी व आइन्स्टाईनचं पत्र

काश्मीरमधल्या ताज्या घडामोडींसंबंधी 'द हिंदू'मधे आलेल्या प्रवीण स्वामी यांच्या बातमीचा गोषवारा :

११ सप्टेंबर २०१२ या दिवशी सत्तर वर्षांच्या रेष्मा बी व त्यांचे पती इब्राहिम लोहार यांनी आपल्या मुलांसोबत उर्वरित आयुष्य घालवण्याच्या हेतूने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गुप्त रितीने प्रवेश केला. सीमेवर माणसांची बेकायदेशीर ये-जा करण्यास सहाय्य केल्यासंबंधी चौकशीला सामोरं जावं लागू नये म्हणून काही वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलांनी व नातवंडांनी पाकव्याप्त काश्मीरमधे मुक्काम हलवला होता. त्यानंतर बरीच वर्षे रेष्मा बी व त्यांचे पती भारतीय हद्दीतील चरोंदा इथेच राहात होते, पण आता शेवटच्या काळात मुलांसोबत राहाण्याची ओढ वाटून ती दोघं तिकडे गुप्त रितीने रवाना झाली.

या घटनेमुळे सावध होत गावकऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या चरोंदा भागात बंकर बांधणी सुरू केली.

भारत व पाकिस्तान यांच्यातील २००३च्या शस्त्रसंधी करारातील अटींचा भंग या बांधकामामुळे होत असल्याची सूचना पाकिस्तानी सैन्याने ऑक्टोबरमधे केली. परंतु भारतीय सैन्याने या बांधकामाच्या बाबतीत माघार घेण्यास नकार दिला. 

यानंतर पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. यात भारतीय सैन्याची हानी झाली नाही, पण मोहम्मद शफी खताना (वय - २५ वर्षं), शहिना बानो (वय - २० वर्षं) आणि नववीत शिकणारा एक विद्यार्थी लिआकत अली यांचा मृत्यू झाला.

यानंतर गेल्या वर्षअखेरीस अनेक वेळा या नवीन बंकरकडे जाणाऱ्या सैन्यावर अनेक वेळा गोळीबार होत होता. यावर ६ जानेवारीला रात्री भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात एक पाकिस्तानी सैनिक ठार झाला तर एक गंभीररित्या जखमी झाला. या दिवशी भारतीय सैन्याने सावनपत्र भागातील आपल्या तळावर हल्लाही केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे, पण तो भारतीय सैन्याने फेटाळलाय.

यानंतर पाकिस्तानी सैन्यानेही आणखी आक्रमक पावित्रा घेतला आणि नंतर ८ जानेवारीला दोन भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा गोष्टी पूर्वीही झालेल्या आहेत, गेल्याच वर्षीही अशीच एक घटना घडली होती, त्यात करनाह इथे दोन भारतीय सैनिकांची गळा चिरून हत्या करण्यात आली आणि नंतर भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात अनेक पाकिस्तानी सैनिकांचे प्राण गेले.

काही वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एकीकडे लढाई सुरू असताना दुसरीकडे सौहार्दाचे कार्यक्रम सुरू आहेत असंही घडलेलं आहे. सप्टेंबर २००९मध्ये ईदनिमित्त पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना मिठाई दिली, त्यावेळी कृष्ण घाटी परिसरात व पारगवाल भागात दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये गोळीबार सुरू होता.

- असं बातमीत म्हटलेलं आहे.  
***
 

अल्बर्ट आइन्स्टाईन
पहिलं महायुद्ध (१९१४-१९) झाल्यानंतर आणि दुसरं महायुद्ध (१९३९-४५) व्हायच्या आधी (१९३१-३२च्या दरम्यान) अल्बर्ट आइन्स्टाईनने सिग्मंड फ्रॉईडला (सार्वजनिक कारणांसाठी) पाठवलेलं पत्र :

श्री. फ्रॉईड यांस,

लीग ऑफ नेशन् आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलेक्च्युअल को-ऑपरेशन (पॅरिस) यांनी मला सूचना केली की, माझ्या मतानुसार एखादी समस्या निवडून त्यावर मोकळेपणाने मत मांडण्यासाठी मी एखाद्या व्यक्तीला निमंत्रित करावं. या सूचनेचं स्वागत करत चालू परिस्थितीत मानवी संस्कृतीला असलेल्या सगळ्यांत भयंकर समस्येवर तुमच्याशी चर्चा करण्याची संधी घ्यायचं मी ठरवलं. समस्या अशी आहे : युद्धाच्या संकटापासून मानवाची सुटका करण्याचा काही मार्ग आहे का? आधुनिक विज्ञानातील प्रगतीनंतरच्या काळात मानवी संस्कृतीच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेली ही समस्या आहे हे आता सर्वज्ञात आहे. आणि यावर उपाय शोधण्यासंबंधात कितीही उत्साह दाखवून झाला असला तरी उपायाचे सर्व प्रयत्न दुःखद रितीने मोडून पडले.

या समस्येवर व्यावसायिकतेने आणि व्यावहारिकतेने उपाय शोधण्याची कामगिरी ज्यांच्यावर आहे त्या लोकांना या बाबतीतली स्वतःची अकार्यक्षमता तीव्रतेने जाणवायला लागलेय. आणि त्यामुळेच काहीसं लांबून समस्येकडे पाहिल्यामुळे येणारा दृष्टीकोन ज्यांना लाभलाय अशा विज्ञानात गढलेल्या व्यक्तींकडून मतं मागवावीत असं या लोकांनी ठरवलं असावं असं मला वाटतं. माझ्यापुरतं बोलायचं तर, माझ्या विचारांची सर्वसाधारण प्रक्रिया मानवी इच्छाशक्ती आणि भावनांच्या काळोख्या जागांबद्दल काही शोधू शकत नाही. त्यामुळे या समस्येबाबत काही प्राथमिक प्रश्नांबद्दल माहिती करून घेण्यापलीकडे मी फार काही करू शकत नाही. म्हणूनच माणसाच्या भावनांबद्दलच्या तुमच्या ज्ञानाचा काही प्रकाश या समस्येवर पडावा आणि त्यातून काही उपायांची पूर्वतयारी करता येते का ते पाहावं या हेतूने मी लिहीत आहे. काही मानसिक अडथळे असे आहेत की जे सामान्य माणूस आपल्या पातळीवर काही प्रमाणात सोडवू शकेल, पण त्यातील आंतरसंबंध व गुंतागुंत त्याच्या लक्षात येईलच असं नाही; पण तुम्ही यावर काही मार्ग काढू शकाल. कदाचित राजकारणाच्या काहीसं बाहेरच असलेले हे अडथळे मार्गी लावण्यासंबंधी तुम्ही काही सुचवू शकाल.

राष्ट्रवादाच्या पूर्वग्रहापासून सुटकेच्या दृष्टीने आणि या समस्येच्या वरकरणी प्रशासकीय बाजूला तोंड देण्यासाठी मला एक उपाय दिसतो : आंतरराष्ट्रीय मतांनुसार एक न्यायिक संघटना उभारावी जिच्यामार्फत राष्ट्रांमधील संघर्षांमधे मध्यस्थी केली जाईल. या संघटनेच्या सूचनांचे पालन प्रत्येक देशाला बंधनकारक असेल, प्रत्येक वादावर या संघटनेने दिलेला निर्णय अमलात आणावा लागेल, तिने दिलेला निकाल मान्य करावा लागेल. पण इथे मला आणखी एक अडथळा दिसतोय : ही माणसांचीच संघटना असणार, त्यामुळे निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी तिची स्वतःची ताकद कमी पडण्याची शक्यता आहे आणि मग बाहेरच्या शक्तींचा दबाव वाढेल. या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागेल; कायदा आणि सत्ता अपरिहार्यपणे हातात हात घालूनच चालतात. (पण) न्यायिक निर्णय आदर्श न्यायाच्या जवळपास जाऊ शकतात, अर्थात ज्या समुदायाच्या मागणीवरून हा न्याय दिला जातो त्याने त्याच्याशी बांधील असणं यासाठी गरजेचं आहे. सध्या तरी निर्विवाद निकाल देऊ शकेल अशा आंतरराष्ट्रीय संघटनेचं अस्तित्त्व कुठे दिसत नाहीये. त्यामुळे मी माझं पहिलं म्हणणं मांडतो : आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रत्येक राष्ट्राची काही प्रमाणात विनाअट शरणागती - कृतीस्वातंत्र्यासंबंधीची (अधिक तपशिलात, सार्वभौमत्त्वासंबंधीची) - आवश्यक आहे. अशा सुरक्षेसाठी याशिवाय दुसरा मार्ग असू शकत नाही.

गेल्या दशकात यासंबंधी करण्यात आलेले सर्व प्रयत्न प्रामाणिक असूनही अपयशी ठरले यावरून त्यांना अयशस्वी करणारे काही गंभीर मानसिक मुद्दे यामध्ये आहेत हे निश्चित. यातील काही मुद्दे शोधणं अवघड नाही. प्रत्येक राष्ट्रामधल्या सत्ताधारी वर्गामध्ये असलेली सत्तेची अभिलाषा राष्ट्रीय सार्वभौमत्त्वाला पडणाऱ्या कोणत्याही मर्यादेचा स्वीकार करणार नाही. राजकीय सत्तेची ही भूक बहुतेकदा दुसऱ्या एका गटाच्या मदतीने वाढीला लागते; हा दुसरा गट केवळ आर्थिक आकांक्षा बाळगणाऱ्यांचा असतो. प्रत्येक देशामध्ये लहानसा आणि निश्चित लक्ष्य असलेला असा गट असतोच, या गटात सामाजिक भान सुटलेल्या अशा व्यक्ती असतात ज्या युद्ध म्हणजे शस्त्रांचं उत्पादन आणि विक्री एवढंच पाहू शकतात. आपलं वैयक्तिक हित आणि वैयक्तिक मत्ता वाढविण्याचा भाग म्हणूनच ते अशा घडामोडींकडे पाहातात.

पण एकूण घडामोडींचा अंदाज येण्यासाठी हे वास्तव समजून घेणं म्हणजे फक्त पहिलं पाऊल आहे. त्यामागोमाग दुसरा प्रश्न उभा राहातो : या लहानशा गटाला बहुसंख्याकांची इच्छा वळवणं कसं शक्य होतं? आणि हे बहुसंख्याक म्हणजे असे लोक, ज्यांच्यावर युद्धाचा गंभीर परिणाम होणार असतो. (बहुसंख्याकांबद्दल बोलताना मी अशा सैनिकांबद्दलही बोलतोय ज्यांनी हल्ला हा संरक्षणाचा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे या विश्वासाने युद्ध हे त्यांचं व्यवयासायाचं माध्यम म्हणून स्वीकारलेलं आहे.) याचं एक साधं उत्तर असं असू शकतं की, अल्पसंख्याक वर्ग (आत्ताच्या समस्येसंदर्भात, सत्ताधारी वर्ग) शैक्षणिक संस्था आणि माध्यमं ताब्यात ठेवून असतो, अनेकदा तर धर्मपीठंही त्याच्याच हाताखाली असतात. यामुळे त्या वर्गाला बहुसंख्याकांच्या भावना संघटित करण्याची आणि त्यांचा वापर करण्याची ताकद मिळते.

अर्थात हे उत्तरही पूर्ण उपायाकडे नेत नाही. यातून आणखी एक प्रश्न उपस्थित होतो : हे वर्ग लोकांना एवढं उसळवू कसं शकतात? अगदी आपला जीव देण्याचीही तयारी असण्याइतकी तीव्र भावना कशी निर्माण करू शकतात? याचं एकच उत्तर असू शकतं : माणसाला आतूनच द्वेष आणि विध्वंसाची हाव आहे. सुरळीत काळात ही भावना सुप्त स्वरूपात असते, पण काही विशिष्ट वेळी ती उचल खाते. अशी भावना कार्यरत आहे असं म्हणून ती सार्वजनिक मानसिकतेवर लादणं सोपं आहे, पण इथेच सगळ्यात गुंतागुंतीचा मुद्दा आहे आणि त्याबद्दलच आपल्याला बोलायचंय. मानवी भावनांचा तज्ज्ञच त्याबद्दल बोलू शकेल.

यातूनच आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे आलोय. द्वेष आणि विध्वंसाच्या भावनेपासून दूर नेण्यासाठी माणसाची मानसिक उत्क्रांती नियंत्रित करता येईल अशी काही शक्यता आहे का? यात मी फक्त तथाकथित असांस्कृतिक लोकांबद्दल बोलतोय असं अजिबातच नाहीये. उलट अनुभव असं सांगतो की, तथाकथित 'विचारवंत' अशा विध्वंसक वृत्तीमध्ये जास्त सहभागी असतात, कारण त्यांचा जमिनीवरच्या खडतर जीवनाशी थेट संबंध नसतो, ते मुख्यत्त्वे छापील पानांतून अशा परिस्थितीशी संबंध ठेवून असतात.

समारोप करताना मला सांगावंसं वाटतं की, आत्तापर्यंत मी राष्ट्रांमधल्या युद्धांबद्दलच बोललो. पण मला माहीत आहे की, आक्रमक भावना इतर पातळ्यांवरही आणि इतर परिस्थितींमध्येही कार्यरत असते. (उदाहरणार्थ, यादवी युद्ध. धार्मिक - वांशिक कारणांनी उसळणारे दंगे). पण माणसा-माणसामधल्या सर्वांत क्रूर आणि मोठ्या स्तरावरच्या या वादावरती बोलण्याचं मी मुद्दामहूनच ठरवलं. कारण कदाचित इथेच आपल्याला सशस्त्र युद्ध अशक्य करण्याचा मार्ग सापडू शकेल.

या तातडीच्या समस्येवर उपायाच्या दृष्टीने तुमच्या लिखाणात काही उत्तरं सापडतील असं मला वाटतं. पण तुमच्या काही नवीन संशोधनाच्या प्रकाशात तुम्ही जगाच्या या समस्येवर काही भाष्य केलंत तर ते आपल्या सगळ्यांनाच उपकारक ठरेल. यातूनच कदाचित नवीन आणि फलदायी कृतींची सुरुवात होऊ शकेल.

आपला विश्वासू,
ए. आइन्स्टाईन

('व्हाय वॉर?' या पुस्तिकेतून)

***

टीप : आइन्स्टाईनच्या या पत्रानंतर सहा वर्षांनी दुसरं महायुद्ध घडून गेल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली (१९४५).
***

काश्मीर. (फोटो : स्टीव्ह मॅकरी - मॅकरींनी कॅमेऱ्यात गोठवलेलं काश्मीर)

***

Friday 4 January 2013

आल्बेर काम्यू : ४ जानेवारी

आल्बेर काम्यूचं अपघाती निधन झालं ती तारीख ४ जानेवारी १९६०. आजही चार जानेवारी.
शिवाय ७ नोव्हेंबर १९१३ला जन्मलेल्या काम्यूचं जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. अशी निमित्तं साधून ही नोंद. खरं पाहाता, काम्यूसंबंधी नोंद करायला वेगळं निमित्त असायलाच हवंय असंही नाही.
***

'द मिथ ऑफ सिसिफस' या पुस्तकाच्या परिशिष्ट वजा विभागात असलेल्या 'समर इन अल्जेअर्स' या लेखातल्या शेवटच्या भागाचं हे बेकार मराठी भाषांतर-

एखाद्या विशिष्ट प्रदेशाबद्दल जवळीक वाटणं, एखाद्या विशिष्ट मानवी समूहाबद्दल आत्मीयता वाटणं, आपल्या मनाला शांती मिळेल अशी कुठलीतरी जागा आहे याची सतत जाणीव असणं - या सर्व एका मानवी आयुष्यातील काही अटळ गोष्टी आहेत. आणि तरी हे पुरेसं नाही. पण काही विशिष्ट क्षणी सगळं या अध्यात्मिक घरासाठी आतूर झालेलं असतं. 'आपण तिथे परत जायला हवं. जायलाच पाहिजे.' प्लोटिनसला ज्या संघटनाची ओढ होती त्याचा शोध पृथ्वीवर घेण्यात काही गैर आहे काय? इथे संघटन सूर्य आणि समुद्राच्या रूपात पाहायला मिळतं. यातला कटुपणा आणि भव्यता सामावून असलेल्या शरीराच्या जाणिवेतून मनही त्याबद्दल संवेदनशील असतं. मला एवढं कळलंय की, कोणताही अलौकिक आनंद इथे नाहीये, दिवसांच्या येण्याजाण्याव्यतिरिक्त कोणतीही अनंतता नाहीये. या क्षुल्लख आणि आवश्य गोष्टी किंवा ही सापेक्ष सत्यंच मला हलवून सोडतात. इतरांच्या दृष्टीने जी 'आदर्श' सत्यं आहेत, ती समजावून घ्यावीत इतकं आत्मबळ माझ्याकडे नाही. म्हणजे एखाद्याने जनावर असावं असं नाही, पण देवदूतांच्या आनंदात मला काही अर्थच वाटत नाही. मला एवढंच माहितेय की हे आकाश माझ्यापेक्षा जास्त काळ टिकणार आहे. माझ्या मरणानंतर जे सुरू राहाणार आहे ते सोडून कशाला मी अनंतता म्हणू? म्हणजे एखादा प्राणी ज्या परिस्थितीत आहे तिथेच तो समाधानी आहे अशा प्रकारचं चित्र मी रंगवत नाहीये. तो वेगळाच मुद्दा आहे. माणूस असणं हे इतकं सोपं नाहीये, निखळ माणूस असणं तर अजिबातच सोपं नाहीये. निखळ असणं म्हणजे त्या अध्यात्मिक घराचा पत्ता सापडणं - जिथे जगाशी असलेला संबंध समजावून घेता येईल न् जिथे दोन वाजताच्या सूर्याच्या हिंसक धडधडीसोबत नाडीचे ठोके जुळून येतील. आपली मूळ भूमी जेव्हा निसटण्याच्या बेतात असते तेव्हाच तिची जाणीव होते. स्वतःच्याच बाबतीत अवघडलेल्या परिस्थितीत असलेल्यांसाठी त्यांना नाकारणारीच भूमी त्यांची मूळ भूमी असते. मला फार क्रूरपणे किंवा अवास्तवपणे बोलायचं नाहीये. पण शेवटी, ह्या आयुष्यात मला नाकारणारी गोष्टच पहिल्यांदा मला मारत असते. आणि त्याच वेळी जगण्याला एकदम उंचीवर नेणारं जे काही घडतं ते जीवनाची विसंगतता (अब्सर्डिटी) वाढवतं. अल्जेरियातल्या उन्हाळ्यात मला कळलं की, व्यथा सहन करण्यापेक्षा दुःखदायक अशी एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे आनंदी माणसाचं आयुष्य. पण त्यात बनावटपणा नसल्यामुळे त्यातूनच अधिक उदात्त आयुष्याचा मार्ग सापडू शकतो.

खरं तर बहुतेक जण जीवनाबद्दलच्या प्रेमाचं ढोंग करतात, कारण त्यांना प्रेमापासूनच दूर पळायचं असतं. मौज करण्याचं आणि 'अनुभवांमधे मिसळून जायचं' कौशल्य ते कमावू पाहातात. पण ही फसगत आहे. विषयासक्त होण्यासाठी दुर्मीळ व्यावसायिकता असावी लागेल. माणसाचं जीवन मनाच्या मदतीशिवाय पूर्ण होतं. ते त्याच्यात्याच्या पुढे-मागे होण्यातून, एकाच वेळी एकाकीपणा आणि गर्दीच्या असण्यातून ते पूर्ण होतं असतं. बेल्कोर्ट भागातली ही माणसं काम करताना पाहिली, कोणतीही दूषणं न लावून घेता आपल्या बायकांचं आणि मुलांचं रक्षण करताना पाहिली, की आपल्याला मनातल्या मनात लाज वाटू शकते. मला या गोष्टींबद्दल कोणतीही भ्रामक कल्पना करवत नाही. मी बोलतोय त्या जीवनांमधे फारसं प्रेम नाही. फारसं काही उरतही नाही. पण त्यांनी किमान कशापासून पळ तरी काढलेला नाही. काही शब्दांचे अर्थ मला कधीच कळू शकलेले नाहीत, उदाहरणार्थ - 'पाप'. पण तरी (तोच शब्द वापरून मी म्हणेन की) या लोकांनी जीवनाविरोधात पाप केलेलं नाही. जीवनाविरोधात काही पाप असेल तर ते जीवनाबद्दल निराशा वाटण्यात फारसं नाही, तर दुसरं काहीतरी जीवन असेल याची आशा लावून बसण्यात आणि या जगण्यातल्या उदात्ततेकडे पाठ फिरवण्यात आहे. या लोकांनी बनावटपणा केलेला नाही. कोणतीही आशा नसली तरी ते विशीत असल्यासारखे उत्साहात आहेत. त्यातल्या दोघांना मरताना मी पाहिलंय. ते भ्यायलेले पण शांत होते. पँडोराच्या खोक्यातून ग्रीकांनी मानवजातीची सर्व दुःख बाहेर काढली, सगळ्यात शेवटी त्यांनी आशेला बाहेर काढलं, सर्वांत भीतीदायक दुःख. असलं दुसरं प्रतीक मला माहीत नाही, सर्वमान्यतेला मान न देता सांगायचं तर आशा म्हणजे पळवाट आहे. आणि जगणं म्हणजे पळवाट नाही.

अल्जेरियातल्या उन्हाळ्याचा हा धडा आहे. पण मोसम आता बदलतोय, उन्हाळा संपत आलाय. सप्टेंबरमधे पाऊस सुरू होतो; इतक्या कष्टांनंतर पृथ्वीच्या पहिल्या अश्रूंसारखा तो मोकळेपणाने येतो. जणूकाही या प्रदेशाला नाजूकपणाचाही अनुभव द्यायला हवा असा त्याचा हेतू आहे. त्याच मोसमात अल्जेरियाभर कॅरोब वृक्षांचं पांघरूण प्रेमाचा सुंगध घेऊन पडलेलं असतं. उन्हाळ्याचा ताप सोसलेली पृथ्वी संध्याकाळी किंवा पावसानंतर निवांतपणा अनुभवत असते. आणि परत माणूस आणि पृथ्वीच्या संमीलनाचे वारे वाहू लागतात आणि मग जगातलं खरं सशक्त प्रेम आपल्यात जागृत होतं : क्षणभंगूर आणि उदात्त.

***

विलास सारंग  त्यांच्या 'सिसिफस आणि बेलाक्वा' या सुंदर पुस्तकातल्या काम्यूबद्दलच्या सुंदर लेखात सुरुवातीला काय म्हणतात तेवढंच पाहू आणि थांबू-

आल्बेर काम्यू : 'होय' आणि 'नाहीं' यांमध्ये

संपूर्ण जीवनाला आपण 'होय' म्हणतो की 'नाही' म्हणतो हा कुठल्याहि जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा पहिला आणि अखेरचा प्रश्न.                                                                                                  - कार्ल यास्पर्स

मी जें प्रायोगिक तत्त्वज्ञान जगतों तें सर्वव्यापी शून्यवादाची शक्यता जमेस धरतें. परंतु याचा अर्थ असा नव्हे कीं तें नकारात्मकच राहातें. उलट तें दुसऱ्या टोकाकडे जाऊ पाहातें-- वजाबाकी, अपवाद आणि निवड यांचा आश्रय न घेता संपूर्ण जीवनाला दिलेल्या एका डायोनिशियन होकाराकडे.                                             - नीत्शे

आपल्या वाङ्मयीन जीवनाच्या प्रारंभींच लिहिलेल्या कांहीं ललित निबंधांमध्यें काम्यू आपल्या मातृभूमीचें - अॅल्जीरियाचे - चित्र उभें करतो. निळें आकाश, निळा समुद्र आणि रखरखीत भूमी ही अॅल्जीरियाची संस्कृती. निसर्गाच्या कुशींत वाढलेल्या अॅल्जीरियन लोकांचें जिणें साधें, ओबडधोबड परंतु तीव्र आहे. जीवनाचा उपभोग घेणें हें त्यांचें एकमेव ध्येय. पण शारीरिक सुखोपभोगांवर पैज मारणाऱ्या या माणसांचें जीवन क्षणभंगुर आहे. निसर्ग त्यांच्यावर सुखाचा वर्षाव करतो, परंतु तोच एकाएकीं सारें हिरावून नेतो. बुद्धीला तुच्छ लेखून शरीराचा धर्म बनविणारें अल्जीरियन जीवन अर्थशून्य का? या मानवी जातीला भूतकाळ नाहीं, परंपरा नाहीं आणि तरीही तिचें जीवन व्यर्थ नाहीं. या लोकांच्या जीवनांत नांवाजण्याजोगें कांहीं नाहीं : 'परंतु निदान त्यांनीं कांहीं टाळण्याचा प्रयत्न केला नाही.' स्वर्गीय सुखाच्या, अनंताच्या खोट्या प्रलोभनांना ते बळी पडलेले नाहींत. ते जाणतात फक्त 'हातानें स्पर्श करतां येतील अशीं सत्यें.' म्हणूनच त्यांचें जीवन आहे 'क्षणभंगुर आणि भव्य.'

काम्यूनें उभारलेलें हें चित्र वास्तव सृष्टींतील अॅल्जीरीयाशीं कितपत जुळतें हा प्रश्न गौण आहे. काम्यूच्या दृष्टींत अॅल्जीरियन भूमि ही विश्वाची छोटी आवृत्ती बनते. मानवी स्थितीचे प्रतीक ठरते.
***

'सिसिफस आणि बेलाक्वा' या पुस्तकाचा आणखी तपशील पाहण्यासाठी - प्रास प्रकाशन - या लिंकवर एकदम तळात पाहा.

Thursday 3 January 2013

मुक्ताबाईच्या निबंधातला काही भाग

सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त ज्या मुलीचा निबंध देण्याची इच्छा होती, असं मागच्या नोंदीत म्हटलंय, त्या निबंधातला निवडक भाग धनंजय कीर यांनी लिहिलेल्या 'महात्मा जोतीराव फुले' (पान ४७-४८, पॉप्युलर प्रकाशन) या चरित्रग्रंथात आहे, तिथून तो इथे नोंदवतो आहे.

चौदा वर्षांची मुक्ताबाई नावाची मुलगी हा निबंध लिहिते आहे. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शाळेत ती तीन वर्षं शिकत होती.
***

ब्राह्मण लोक असें म्हणतात कीं, वेद तर आमचीच मत्ता आहे. आम्हीच त्याचें अवलोकन करावें. तर यावरून उघड दिसतें कीं, आम्हांस धर्मपुस्तक नाहीं. जर वेद ब्राह्मणासाठीं आहेत तर वेदाप्रमाणे वर्तन करणें हा ब्राह्मणांचा धर्म होय. जर आम्हांस धर्मासंबंधीं पुस्तक पाहण्याची मोकळीक नाहीं तर आम्ही धर्मरहित आहों असें साफ दिसतें कीं नाहीं बरे? तर हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हांस कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्याच्यासारिख्या रीतीनें अनुभव घेऊं.

इमारतीच्या पायांत आम्हांस तेलशेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा क्रम चालविला होता. त्या समयी महार अथवा मांग यातून कोणी तालीमखान्यापुढून गेला असता गुलटेंकडीच्या मैदानांत त्याच्या शिराचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी, तर विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार? कदाचित् कोणास वाचता आलें आणि तें जर बाजीरावास कळलें तर तो म्हणे कीं, हे महारमांग असून वाचतात. तर ब्राह्मणांनी का त्यांस दप्तराचे काम देऊन त्यांच्या ऐवजी धोकट्या बगलेंत मारून विधवांच्या हजामती करीत फिरावें की काय? असें बोलून तो त्यास शिक्षा करी.

हा जुलूम विस्तारानें लिहूं लागलें तर मला रडूं येते. या कारणास्तव भगवंतानें आम्हावर कृपा करून दयाळू इंग्रजी सरकारास येथें पाठविलें. आणि या राज्यांतून आमचीं दुःखें निवारण झालीं तीं अनुक्रमाने पुढें लिहितें. किल्लाच्या पायांत घालण्याची बंदी झाली. आमचा वंशही वाढत चालला. महारमांग यांतून कोणी बारीक पांघरूण पांघरलें असतां ते म्हणत कीं, त्यांनीं चोरी करून आणलें. हें पांघरूण तर ब्राह्मणांनीच पांघरावें. जर महारमांग पांघरतील तर धर्मभ्रष्ट होतील असें म्हणून ते त्यांस बांधून मारीत. पण आतां इंग्रजांच्या राज्यांत ज्यास पैसा मिळेल त्यांनीं घ्यावें. उच्च वर्गांतील लोकांचा अपराध केला असतां मांगाचे किंवा महाराचें डोकें मारीत होते ती (चाल) बंद झाली. जुलमी बिगार बंद झाली. अंगाचा स्पर्श होऊं देण्याची मोकळीक कोठें कोठें झाली. गुलटेकडीच्या बाजारांत फिरण्याची मोकळीक झाली.
***

तयास मानव म्हणावे का?

सावित्रीबाई फुले (चित्र : इथून)
सावित्रीबाई फुले. जन्म - ३ जानेवारी १८३१. (मृत्यू १० मार्च १८९७)
सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांची एक कविता-

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुध्दी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?

दे रे हरी पलंगी काही
पशुही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार काही
तयास मानव म्हणावे का?

पोरे घरात कमी नाही
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का?

सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का?

दुसर्‍यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सद्गुण नाही
तयास मानव म्हणावे का?

ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का?

बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का?

पशुपक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वांनाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का?
***

'महार मांगांच्या दुःखाविषयी' हा निबंध सावित्रीबाई व जोतिबा फुले यांच्या शाळेत शिकणाऱ्या मुक्ताबाई या चौदा वर्षांच्या मुलीने लिहिला. १८५५मधे. त्याची प्रत आत्ता माझ्या हाताशी नाहीये, खरं म्हणजे तो निबंध आजच्या निमित्ताने इथे नोंदवायचा होता.

Tuesday 1 January 2013

गोंगाटाच्या गुंगीवरचा उतारा

''अशा या गोंगाटात कान किटलेले असताना आपणास नव्या वर्षाचे स्वागत करावयाचे आहे. अशा वेळी नव्या वर्षी तरी परिस्थिती सुधारावी अशी आशा असणे काही गैर नाही. परंतु एकंदर वातावरण पाहता परिस्थिती सुधारली नाही तरी ती अधिक बिघडू नये इतकीच अपेक्षा ठेवणे शहाणपणाचे.''
'लोकसत्ते'च्या आजच्या संपादकीयामधला शेवटचा परिच्छेद वर दिला आहे. आपण 'रेघे'वरच्या एका नोंदीचं नाव आधीचं ठरवलं होतं, ते असं होतं - 'गोंगाटाच्या गुंगीवरचा उतारा'.

'लोकसत्ते'मधून
आजपासून २०१३ वर्ष सुरू होतंय, त्यानिमित्त लिहिलेल्या 'लोकसत्ते'च्या अग्रलेखाचं शीर्षक 'तीन तेरा की' असं आहे. जागतिक आर्थिक संकटांची पार्श्वभूमी हा लेखाचा मुख्य भाग, त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडचं राजकीय चित्र कसं भकास आहे हा या लेखाचा शेवटाकडचा भाग आणि 'अडीच शहाणे' नेते लोकांशी संवाद कसे साधत नाहीत असा उल्लेख करून वर दिलेल्या परिच्छेदाने लेख संपतो.

या लेखातल्या गोंगाटाच्या संदर्भामधे आपल्याला भर घालायच्येय.

त्यांनी तसाही कुठल्यातरी गोंगाटाचा उल्लेख केलाय तर त्याचं निमित्त साधून आपण 'रेघे'वर ही लहानशी नोंद करूया. आपण ज्या गोंगाटाबद्दल बोलतोय तो माध्यमांचा गोंगाट आहे. तो आपण रोज अतिरेकी चर्चा नि बातम्यांच्या माध्यमातून अनुभवतो आहोतच. या गोंगाटाची आपसूक गुंगी चढते आणि मग ती कधी तात्कालिक मोर्चाच्या रूपात नायतर फेसबुकवरती बाहेर येत असते. त्यावर आपल्याला काहीच बोलायचं नाही. पण 'रेघे'चा प्रयत्न आहे की या गुंगीवर उतारा असायला पाहिजे. म्हणजे काय? तर इकडेतिकडे गोंगाट चाललाय बाळ ठाकरेंच्या निधनाबद्दल, तर आपण शांतपणे इथे त्या गोंगाटाच्या दुसऱ्या बाजूच्या काही नोंदी टाकूया.
गुडबाय ठाकरेसाहेब, तुम्ही मला प्रेम करायला शिकवलंत! - जावेद इक्बाल
बाळ ठाकरे, भांडवलदार आणि श्रमिक गरीब - विद्याधर दाते
अशा त्या दोन नोंदी त्यावेळी आपण केल्या. नंतर बलात्काराच्या घटनेवेळीसुद्धा आपण र. धों. कर्व्यांसंबंधीच्या नोंदीत आणि दुसऱ्या एका नोंदीत इथे असा प्रयत्न केला.
या शिवाय माध्यमांसंबंधी आपण काही नोंदी केलेल्या आहेत, त्यातली एक, 'बाहेर आलेली पेस्ट आता परत ट्यूबमधे कशी घालणार?' आणि दुसरी, 'कुमार केतकरांना गहिवरून का आलं?'
अगदी काफ्कासंबंधीची नोंद हासुद्धा या उताऱ्याचाच भाग होता.

आता हे लिहिल्यावर हेही सांगायला हवं की, असं करणं 'रेघे'वर प्रत्येक वेळी शक्य होईल असं नाही. मर्यादा खूपच आहेत. किमान काही माणसांनी एकत्र येऊन हे केलं पाहिजे, एकहाती अशा गोष्टी डोकं उठवू शकतात. एका डोक्याला असूनअसून किती गोष्टींवर बोलायचं असणार, किती गोष्टींमधे रस असणार आणि प्रत्येक वेळी तसं असावंसं वाटतंच असं पण नाही, मग मर्यादा येतात. पण असा उतारा असायला हवा आणि मराठीत तो छापील पातळीवर कुठेच सापडत नाही, तर किमान इंटरनेटच्या पातळीवर असा उतारा असायला हवा असं म्हणणं नोंदवावं इतक्यापुरतीच ही नोंद. खरं म्हणजे 'रेघे'चा एकूण हेतूच या म्हणण्याची थोडीशी तरी नोंद व्हावी हा आहे. आणि आपण खूपच थोडासा तो प्रयत्न केला, तसं ते वाढवायला हवं. त्या पलीकडे आपला काही दावा नाही, नायतर या नोंदीनंतरच रेघ बंद पडायची नि आपण तोंडघशी पडायचो.

कधी छापील व टीव्हीवरच्या माध्यमांना विरोध तर कधी पूरक असं काहीतरी करणं ही समांतर प्रक्रिया सध्याच्या गोंगाटात असायला हवी. म्हणजे 'रेघे'वरची एखादी नोंद कुठेतरी छापून आली वेगळी बाजू म्हणून किंवा इथल्या एका नोंदीमुळे छापील माध्यमातल्या (किंवा टीव्हीवरच्या) कोणाला काही सुचलं, काही सापडलं, तर ते बरं! - असं ते व्हायला हवं. असलं काही होईल याची फारशी आशा नसली तरी नोंद करायला काय जातंय?

बाकी गोंगाट वाढतच जाणार आहे, 'रेघे'ची मात्र खात्री नाही.