Sunday 1 May 2016

रेघेचे दोन आर्थिक संसार

एक

मराठवाडा साहित्य परिषद. पहिली आवृत्ती: १९७७
'मराठी भाषेचा आर्थिक संसार' ही अशोक केळकरांची एक सुंदर पुस्तिका आहे. 'पुस्तिका सुंदर आहे' आणि 'अनुष्का शेट्टी सुंदर आहे' या वाक्यांमधे फरक असतो, तो आपल्याला आपसूक समजून येतो. आपण जे पहिलं वाक्य लिहिलंय त्यात 'सुंदर पुस्तिका' याचा अर्थ तुम्ही कसा घेतलात? पुस्तिकेतला आशय, केळकरांचे विचार, मांडणीची पद्धत अशा काही गोष्टींशीच तो सुंदरपणा जोडलात ना? म्हणजे स्पष्ट-अस्पष्टपणे तसा तो आपसूक जोडला गेला असेल. आपणही त्याच अर्थानं ते लिहिलं. पण 'अनुष्का शेट्टी सुंदर आहे' या वाक्यातलं सुंदरपण तिच्या दिसण्याशी संबंधित आहे. तेही पुस्तिकेतल्या आशयाएवढं सुंदर वाटणं शक्य आहेच. पण तिचा स्वभाव किंवा वागणं असा बाकीचा आशय, ही नोंद लिहिणाऱ्याच्या प्रत्यक्ष अनुभवात असणं शक्य नाही, हा अंदाजही आपल्याला आपसूक येतो. किंवा काहींना अनुष्का शेट्टी हे नाव माहीत नसेल तरी ती कोणीतरी स्त्री असेल आणि ही नोंद लिहिणारा पुरुष असेल, त्यामुळं मग आपसूक तो तिला का सुंदर म्हणत असेल, याचा काही अस्पष्ट अंदाज बांधला जातो. तर, 'सुंदर' हा शब्द बाहेरच्या नुसत्या दिसण्याशी किंवा आतल्या मजकुराशी/त्याच्या अर्थाशी असा दोन्ही अंगांनी जोडता येतो. पण 'पुस्तिका देखणी आहे', असं म्हटलं असतं तर कदाचित असं झालं नसतं. देखणेपणा तसा दिसण्याशीच संबंधित राहतो. 'सुंदर' या शब्दाचा अर्थ मात्र तसा व्यापक आहे. हे शब्द आणि अर्थाचं जे आपसूक रसायन आपल्या डोक्यात तयार होतं, त्याबद्दलच केळकरांची ही ९४ पानांची भारी पुस्तिका आहे. इथं 'भारी' म्हणजे काय तेही आपसूक आपल्याला कळून जातं.

आपण भाषाविज्ञानाचे विद्यार्थी नसलो, विद्यापीठीय परिभाषेशी आपली फारशी ओळख नसली, व्याकरणाचीही फारशी माहिती नसली, तरीही ही पुस्तिका आपल्याशी संवाद साधणारी आहे. ही नोंद लिहिणाऱ्याशी ती म्हणूनच संवाद साधू शकली. सार्वजनिक व्याख्यानांची ही पुस्तिका असल्यामुळंही कदाचित ही व्यापकता आली असेल, किंवा केळकरांच्या लिहिण्यात थोडं असं व्यापकपण सुटंही होतं असेल, ते आपल्याला त्यांच्या 'रुजुवात' या पुस्तकातूनही जाणवतं. औरंगाबादला डॉ. ना.गो. नांदापूरकर स्मारक व्याख्यानमालेत १-२-३ मार्च १९७६ या दिवसांमध्ये केळकरांनी ही तीन व्याख्यानं दिलेली. पुस्तिकेत छापलेल्या प्रकाशनाच्या तपशिलावरून कळतं की, १९७७ साली या पुस्तिकेची पहिली आवृत्ती छापण्यात आली, ती अर्थातच एक हजार प्रतींची होती. आणि ही नोंद लिहिणाऱ्यानं १ मे २०१२ रोजी एका दुकानात पाच कप्प्यांच्या एका कपाटात खालून दुसऱ्या कप्प्यात एक गठ्ठा पाहिला. सहज पाहिलं तेव्हा तो गठ्ठा या पुस्तिकेचा असल्याचं दिसलं. दहाएक प्रतींचा गठ्ठा होता असेल, त्यातली एक विकत घेतली, तेव्हा ती पंचवीस रुपयांना मिळाली. आजही १ मे आहे, हा निव्वळ योगायोग समजूया.

या पुस्तिकेत केळकरांनी भाषेला पहिल्यापासूनच सरळ चिन्हव्यापार म्हणून पाहिलेलं आहे आणि वाचकांनाही त्याच अंगानं तिच्या काही अंगांचा उलगडा करून दाखवलेला आहे. भाषा ही एका व्यापक चिन्हव्यापाराचा एक अवयव फक्त आहे, आणि आता २०१६ साली या चिन्हव्यापाराचं स्वरूप कितीतरी जास्त व्यापक झाल्यासारखं आहे, त्यामुळं ही पुस्तिका वाचणं अजूनच सुंदर वाटतं.

यात सुरुवातीलाच एका ठिकाणी केळकर म्हणतात:
[...] चिन्हव्यापाराचे स्वरूप समजायचे तर तो ज्याच्याशी संबद्ध आहे तो अर्थव्यापार आपल्याला समजावून घ्यायला हवा. अर्थव्यापार हा एकंदर जीवनव्यापारावरच आधारलेला आहे. जीवनव्यापार समजावून घ्यायचा तर विश्वाचे दोन भाग पाडावे लागतात. एक जीव, दुसरा म्हणजे उरलेले विश्व. त्यातल्या त्यात त्या जिवाला स्थलकाल दृष्टीने जवळ ठरणारा त्याचा परिसर. तो जीव आणि त्याचा परिसर ह्यांमध्ये सदोदित घडामोड, क्रिया-प्रतिक्रिया चालू असते. ही घडामोड म्हणजेच त्या जिवाचे जगणे. जीव आणि त्याचा परिसर ह्या दोहांमध्ये जी आपण सीमारेषा ओढली त्या सीमारेषेच्या बाहेरच्या अंगाला आपण उभे राहिलो तर आपण म्हणून की, जिवाची अखंड घालमेल, चळवळ चालू आहे, आपण त्याचे आचरण पाहतो आहोत. आचरण आणि अनुभव ह्या जीवनव्यापाराच्या दोन बाजू आहेत. जीवनव्यापार समजावून घेणे म्हणजे परिसर, अनुभव, आणि आचरण ह्यांमध्ये जी जी घटिते घडत असतात त्यांच्यामध्ये संगती, कार्यकारणभावाची साखळी शोधणे. परिसर आणि अनुभव, अनुभव आणि आचरण, आचरण आणि परिसर असे दुवे जुळत जातात आणि जीव जगतो. मानव व इतर वरच्या श्रेणीमधले जे जीव आहेत त्यांच्या बाबतीत केवळ हे दुवे जुळत नाहीत तर हे दुवे शोधले जातात. जसजसे हे दुवे सापडत जातील आणि बांधले जातील तसतसा जीवनात अर्थ भरत जातो. चिन्हव्यापाराचा हा आदिम आधार आहे. (पान ४-५)
रेघेची सुरुवात आपण बिरबल-बादशहाच्या गोष्टीनं केलेली, त्यातून थोडंसं अडखळत आता आपण जे काही दुवे जोडत असतो ते केळकरांच्या या परिच्छेदाशी खूप जुळलेले वाटले. माणसाला वरच्या श्रेणीत बसवण्याचा त्यातला भाग थोडा बाजूला ठेवला, तर बाकीचे सगळे शब्द आता आपण इथं रेघेवर नोंदवतोय, याचं कारणही काही दुवे जुळवणं एवढंच आहे. ही नोंद लिहिणाऱ्यासाठी हे कारण वैयक्तिक असेल. तुम्हाला वाचक म्हणूनही ते बरं वाटत असेल, तर ते या भाषेमुळं शक्य होतंय, त्यामुळं तिच्या मर्यादांसकट आपल्याला ती सुंदर वाटायला लावतेय, हा रेघेचा पहिला आर्थिक संसार आहे.

हे दुवे का जोडायचे, किंवा का जोडावेसे वाटतात, याची कारणं शोधत राहणं- हा या संसारातला एक नेहमीचा भाग आहेच. यातलं एक कारण केळकरांच्या पुस्तिकेत सापडलं, ते असं:
प्राचीन चीनमधील विचारवंत, समाज आणि संस्कृती यांचा समीक्षक कुंग फु-त्स (ज्याला साहेब कन्फ्यूशिअस म्हणतो) ह्याला त्याच्या एका शिष्याने विचारले की, वेई प्रांतातील राज्याच्या कारभाराची सूत्रे जर गुरुजींच्या हाती आली तर ते प्रथम कोणते पाऊल उचलतील? गुरुजी म्हणाले: "पी येह चंग मिंग हु." (म्हणजे बहिणाबाई चौधरींच्या भाषेत सांगायचे तर कशाले काय म्हनवा आनी कशाले काय म्हनू नहीं ह्याबद्दल शिस्त आणणे). (पान ६६)
केळकर जी शिस्त म्हणतायंत, ती शुद्ध-अशुद्ध, पुस्तकी व्याकरण, प्रमाण-अप्रमाण भाषा अशा अर्थानं नाही, हे तर झालंच. शिवाय, ही शिस्त सत्ताधाऱ्यांनी प्रजेला लावणं, हा मुद्दा बाजूला ठेवू. आपलं आपल्याला या दुव्यांमधल्या सुसंगतीचं काही वाटतं का, हा आपल्यापुरता नोंदवण्यासारखा मुद्दा आहे. कुठल्याही चिन्हाला काही संदर्भ असतात, त्या संदर्भांना सोडून चिन्ह वापरलं तर ती बेशिस्त होते, नि संवादच कोलमडतो असं साधारण केळकरांचं म्हणणं आहे. हे संदर्भ म्हणजे साचा नसतो, प्रवाही-बदलतं असं हे प्रकरण असतं. पण आता चिन्हांचा वावर प्रचंड वाढलेल्या काळात हे संदर्भ शोधायचे कसे, दुवे जोडायचे कसे, असं आपल्याला वाटू शकतं. फेसबुकवरचं 'लाइक' बटन, त्यात अलीकडं त्यांनी घातलेली आणखी काही भावनांची भर हे याचं अगदीच लहानसं उदाहरण आहे. 'राष्ट्र', 'राजकारण', 'विचारवंत', 'पत्रकारिता', 'इव्हेंट', 'मार्केटिंग', 'यश', 'पुरस्कार', 'बंडखोरी'- अशा बहुधा असंख्य चिन्हांच्या बाबतीत असा अस्पष्ट दुव्यांचा व्यापार सुरू असतो. प्रसारमाध्यमं तर यावरच उभी असतात. तर,  हा व्यापार चालवणारे कोण असतात? आपल्याला कितीही वाटत असलं, तरी त्यावर आपला अधिकार किती असतो आणि काही ठराविक लोकांच्या व्यापारी गणितांचा अधिकार किती असतो? हे प्रश्न आपल्याला तपासावेसे वाटतात. यात काही वेळा आपले-आपण काही बिंदू टिपतो, तर काही वेळा इतरांचे (पटलेले/न पटलेले/रोचक वाटलेले) असे बिंदू टिपतो, या अर्थी या नोंदी म्हणजे टिपणं आहेत. इथं २०१०पासून नोंदवली गेलेली रेघेची सुरुवात व्यक्तिगत पातळीवर २००८च्या शेवटाकडं झालेली होती,  त्यामुळं तेव्हापासूनची सात-आठ वर्षं धरली, तर आपण अशा या काही नोंदी किंवा टिपणं इथं करत आलोय.

दोन
पैशाची भक्ती आता एखादा धर्म म्हणवण्याएवढ्या थराला पोचलेली आहे, हे त्याच्या लक्षात आलं नि काळ पुढं जात गेला तसं अधिकच प्रकर्षानं हे त्याला जाणवत गेलं. किंवा बहुधा आपल्याकडे सोपवण्यात आलेला हाच एकमेव खरा धर्म आहे- खराखुरा जाणवणारा धर्म. देवाच्या जागी आता पैसा आहे. सत् आणि असत् यांना आता काही अर्थ राहिलेला नाही. अर्थ फक्त अपयश नि यश यातच आहे. म्हणूनच बहुधा 'चला झाली राव कायतरी भरपाई'सारखे गहन महत्त्वाचे शब्दप्रयोग वापरात आले असतील.
- जॉर्ज ऑर्वेल ('किप द अॅस्पिडिस्ट्रा फ्लाइंग'मधून भाषांतरित).
गॉर्डन कॉमस्टॉक या मुख्य पात्राच्या संबंधीचे विचार. 

२६ जानेवारी २०१६ रोजी रेघेच्या पानावरच्या उजव्या समासात निधी भरायचा एका पर्याय वाचकांसमोर ठेवला होता. निधीसंकलनासाठी मंच उपलब्ध करून देणाऱ्या एका संकेतस्थळाद्वारे ही सोय केली. त्यात पंधरा हजार रुपये असं लक्ष्य ठेवलेलं होतं आणि निधीसंकलनासाठीचा कालावधी सरळ डिसेंबर २०१६पर्यंतचा देऊन ठेवला होता. पर्यायाची तपासणी करण्यासाठी पहिले शंभर रुपये आपणच त्यात भरून पाहिले, आणि त्यानंतरचा निधी वर्षभरात जमा झाला तर झाला, असं मनात धरलं होतं. यात फारशी अपेक्षा ठेवलेली नव्हती, त्यामुळं अनपेक्षितपणे तीन महिन्यांच्याही आत हा सगळा निधी भरला गेला, हे थोडं आश्चर्यकारक वाटलं. तर १० एप्रिललाच हा निधी पूर्ण जमा झाला. साधारण अठरा वाचकांनी या निधीत विविध रकमांचा सहभाग नोंदवल्याचं दिसतं. एकूण १५,००० रुपयांपैकी १,५०० रुपये संबंधित संकेतस्थळाच्या कामाचं शुल्क (१० टक्के) म्हणून वजा, २१० रुपये सेवा कर (१४ टक्के) वजा, ७.५० रुपये स्वच्छ भारत कर (०.५ टक्के) वजा, असं गणित होऊन रेघेच्या बँक खात्यात १३,२८२.५० रुपये इतकी रक्कम जमा झाली. याशिवाय काही वाचकांनी सुटी रक्कम जमा केलेली (यातली काही रक्कम जानेवारीपूर्वीची आहे), ती एकूण मिळून बरोब्बर सात हजार आहे. म्हणजे सगळं मिळून साधारण चार महिन्यांमधे सुमारे वीस हजार रुपये इतका निधी रेघेच्या नावावर जमा झाला.

हे आपण कशाला केलं?

ब्लॉग म्हणजे मूळचे शब्द वेब-लॉग, म्हणजे महाजालावरची वही ही. तर लिहिणारा वहीत लिहू शकतो, वर्तमानपत्रात, साप्ताहिका-मासिकांमधे, खास दिवाळी अंकांमधे, असं कुठं जमेल तिथं लिहू शकतो. रेघेवर आपण लिहितो त्याला पत्रकारी भाषेत 'स्फुट' म्हणता येईल. त्यासाठीचा सोपा शब्द आहे 'फुटकळ'. अशा काही नोंदी आपण करतो. आणि आपल्याला हे करायला मजा येते, आनंद वाटतो. मराठीतल्या ज्या छापील माध्यमांशी संपर्क आला त्यात हा आनंद रेघ लिहिणाऱ्याला वाटलेला नाही. लिहिण्याचा म्हणून आनंद असतो त्याला तसा कोणी हे हात लावू शकत नाहीत, पण लिहिल्यानंतर ते छापून येणं नि त्यासंबंधीचा मराठीतला व्यवहार भीषण खालावलेला आहे, असं आपलं मत आहे. यासाठीची काही उदाहरण रेघेवरच्या काही नोंदींमधेही कुठं ना कुठं आहेत. त्यावर फार इथं आत्ता बोलावं वाटत नाहीये. आणि हे वैयक्तिक मत आहे, असं म्हणून तुम्ही सोडूनही देऊ शकता.

'ब्लॉगर' हीसुद्धा 'गुगल' या कंपनीची सेवा आहे. त्यांच्या मनात आलं तर ते काही सेकंदात हा आपला पत्ता कापू शकतात, हे आहेच. त्यावर उपाय करण्याएवढी तांत्रिक ताकद रेघेकडं आत्ता नाही. शिवाय यात आर्थिक ताकदही महत्त्वाची ठरत असेल थोडी तरी. आणि ताकदीपेक्षाही या बाबतीत वेगळा काही पत्ता उभारण्याची गरज आणि आकांक्षा आपल्यात नाही. तसंही आपला पत्ता गुगलवाले कापतील असं नाही. पण शेवटी आपण त्यांची मोफत सेवा वापरून हे लिहितोय, एवढं तर आहेच. तरी, ब्लॉगलेखनात अधिक मोकळीक आहे. इथं शब्दांसोबत इतर चिन्हांचा वापरही अधिक नीटपणे करता येतो. म्हणजे लेखकाच्या लिहिण्याची साधनं वाढतात, हे सुंदर वाटतं. कुठले शब्द वापरावेत, यासंबंधी संपादकीय कमजोरीचा अडथळा नाही. मुख्य प्रवाहातल्या छापील माध्यमांसारखी तथाकथित प्रतिष्ठा अजून इथं नसल्यामुळं कोणाच्या फार काही अपेक्षा नसतात, उणिवाही वाचक उघडपणे बोलू शकतात, प्रतिक्रिया म्हणून नोंदवू शकतात, त्यामुळं अधिक खुलेपणा आहे. वर्तमानपत्रांसारखं माध्यम लाखो लोकांपर्यंत पोचतं, मराठी मासिकं-साप्ताहिकंही पाचशेपासून पाच हजारांच्या आसपास वाचकांपर्यंत पोच असलेली दिसतात, तेवढी पोच मराठीत तरी ब्लॉग या माध्यमाची अजून नाही, हे खरं. पण हा मुद्दा लिहिण्याच्या आनंदाएवढा महत्त्वाचा वाटत नाही. अगदीच महत्त्वाचा नाही असं नाही. पण ब्लॉगमधे शब्दांसोबतच इतर चिन्हव्यवहारही लेखकाच्या आर्थिक संसारात आणता येतो, ही सुंदर गोष्ट या बऱ्याच गोष्टींना पुरून उरणारी आहे.

मराठीत, कविता हा सर्वोच्च वाङ्मयप्रकार आहे, कथा हा क्षुद्र वाङ्यमप्रकार आहे, कविता म्हणजे सगळ्यापेक्षा सर्वोच्च अशी काही थोर गोष्ट आहे, लेखकाची (दिखाऊ) नैतिकता असते, (जाहिराती नि कविता एकत्र लिहूनही) कवी मंडळी बाजारपेठेच्याविरोधात असतातच, साठोत्तरी-नवदोत्तरी अशा कवींच्या पिढ्या असतात- अशा कित्येक गोष्टी बोलल्या जातात. यातून हाताला काय लागतं, माहीत नाही. समाजातल्या इतर सर्वांची एक वयानं ठरलेली पिढी असते, त्यातही काही श्रेणी लावून लेखक-कवींची वेगळी पिढी लावणं सोईचं जात असावं. पण हे सगळं कंटाळवाणं वाटतं. साहित्यापुरतं बोलायचं तर, छापील माध्यमांमधून ही कंटाळवाणी परंपराही आपसूक जास्त प्रमाणात साचलेली असते, तो अडथळाही ब्लॉगलेखनात नाही. नैतिकता, बाजारपेठविरोध, वाङ्यमप्रकाराचा सर्वोच्चपणा या गोष्टी इतक्या सोप्या वाटत नाहीत, एवढंच बोलून हे सोडून देऊ. पण यापासून दूर असण्याची मोकळीक ब्लॉगलेखनात मिळते, हेही सुंदर वाटतं.

पण समजा एखाद्याला कादंबरी लिहिण्याचीही आवड नि सवय असेल, तर त्यानं ब्लॉगही लिहावा का? कादंबरीतून वास्तव-अवास्तव अधिक गुंतागुंतीसह, अधिक व्याप वाढवून मांडता येत असेल, तर ब्लॉगसारख्या गोष्टीत वेळ का घालवावा? या प्रश्नांचं ठोस उत्तर माहीत नाही. पण हे लेखन कादंबरीलेखनाला पूरक ठरणारं लेखन असतं, असं छोटंसं मत नोंदवू. ही मतं शेवटी वैयक्तिकच राहतात आणि खरं तर ज्याचा त्याचा लिहिण्याचा कल असतो, एवढंच उत्तरही पुरेल. या वहीतली एकेक नोंद आपण सोईसाठी सुटी लिहितो आणि सुटी एकेक नोंद वाचतो, पण एकत्र मिळून या सगळ्या नोंदींची रचना नक्की काय करू पाहते? त्यातून काही सर्जनशील समाधान लेखकाला मिळतं का? वाचकालाही तसं वाटतं का? हे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. लेखकाला यात सर्जनशील आनंद मिळतोय, एवढं उत्तर ठामपणे देता येईल. एकाच नोंदीपुरतं बघितलं तर वेगळं वाटेल, पण एकूण मिळून पाहिलं तर ही वही म्हणजे एखाद्या कादंबरीकाराला पुरवणी-टिपणांसारखी वापरता येऊ शकते. वाचकांना काय वाटतं, ते वाचकच सांगू शकतील.

पुस्तक रूपात छापलं तर गोष्ट वेगळी, पण बाकी छापील माध्यमांमधून केलेलं असं स्फुट/फुटकळ लिखाण सुटं-सुटं असतं. ते एकत्र कात्रणांसारखं ठेवलं तर कदाचित एकसंधता जाणवू शकते. इथं मात्र आपसूकच ते एकसंधपणे या वहीत नोंदवलं जातं, हाही या रचनेचा चांगला भाग वाटतो. म्हणजे इथं या नोंदी-टिपण-निबंध वजा लेखनालाही एकसंध रचनेसारखं असण्याची सोय आहे. चुकाही समजायला बरं जातं, बरं-वाईट एकत्र राहतं.

तर, म्हणून आपण रेघ चालवतो आणि ती चालवण्यासाठीचं आपलं कारण पहिल्या आर्थिक संसाराचंच आहे, पण त्यासोबत दुसरा आर्थिक संसारही थोडासा जोडून ठेवलेला आहे. पैसा ही गोष्ट सगळ्यांना लागते, सगळ्यांकडे तो कमी-अधिक असतो, आणि ऑर्वेलच्या कादंबरीत नोंदवलं गेलंय ते आता मोठ्या प्रमाणात जाणवतंही. त्यासंबंधीचा रेघ लिहिणाऱ्याचा मार्ग सुटा वेगळा एक आहेच, ही नोंद वाचणाऱ्यांप्रमाणे त्याचंही त्याबाबतीतलं काहीएक गणित आहेच, त्यात रेघेचा हा निधी खूप मोठा आधार वगैरे नाही, त्याचं दुसरं गणित व्यवस्थित सुरू आहे, पण तरीही हा इथला निधीचा प्रयोग आपण करत राहणारोत. त्यात यश-अपयश असं काहीच होणार नाहीये. आणि ही धार्मिक रुढी म्हणूनही समासात नोंदवली जाणार नाहीये. उलट त्यातली धार्मिकता कमी करता आली इथल्यापुरती तरी बरं. चार महिन्यांत वीस हजार, म्हणजे महिन्याला पाच हजार अशी या निधीतली सरासरी भर आहे. नियमितपणे आपण हा पर्याय समासात ठेवून दिला, तर कायम या वेगानं रक्कम जमा होणार नाही, हे तर आहेच. दुसरं म्हणजे, कित्येक लोकांचं महिन्याचं उत्पन्न पाच हजारांपर्यंतही नसतं आणि काही लोकांचा दिवसाचा किंवा एक वेळच्या जेवणाचा खर्चही एवढा किंवा यापेक्षा जास्त असतो, आणि अशी माणसं एकमेकांपासून एखाद्या किलोमीटर अंतराच्या अवकाशातही नांदत असतात, हे या धर्माचं खतरनाक रूप कोणालाही पाहायला मिळू शकतं. त्यामुळं आपण यात काही यश-अपयश शोधू शकतही नाही. पण इथल्या लेखनाला पूरक गोष्ट म्हणून या निधीचं काही उभं करायचा प्रयत्न तरी आपण करत राहू. तिथेच वाचकांना त्यांच्या इच्छेनुसार-मतानुसार क्रेडिट-डेबिट कार्ड-ऑनलाइन बँकिंग अशा मार्गांनी रेघेच्या निधीत भर टाकता येईल. 'पे-यू-मनी' या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता ही कायमस्वरूपी वर्गणीची पिशवी समासात अडकवलेली राहील. त्यासाठी आपण आधीही आवाहन असं वेगळं काही केलं नव्हतं, आणि आताही तसं आवाहन म्हणून काही नाही. (मोबाइलवर रेघ वाचणाऱ्यांना उजवीकडचा समास दिसत नाही).

उपसंहार

पहाटे लवकर संडासला जायला लागलं, तर कुठं जायचं लांब, म्हणून रोज रात्री न जेवता झोपणारा एक इसम रेघेच्या ओळखीचा आहे. त्याच्याकडं जेवण्यापुरते पैसे तर असतातच, पण घर नसल्यामुळं आणि वयामुळं काही तडजोडी कराव्या लागतात. संडास-झोप इत्यादी बाबतीतल्या या तडजोडी आहेत. नोकरीचं वय आता ओसरलं असलं तरी त्याचा त्याचा म्हणून पैशांचा काही हिशेब असतो, तो आधीच्या आर्थिक बचतीद्वारे बरोबर साधला जातो. ही नोंद लिहीत असताना हा इसम शब्दशः एक मिनिटाच्या (पायी लागणारा वेळ) अंतरावर बसलेला आहे. 

दुसरीकडं रेघेच्या ओळखीची दोन वर्षांची एक मुलगी गेल्या काही काळात, 'टटटटटट, तततततत, त्ती... (हत्ती), दलाप (जिराफ), त्त्या (आत्त्या), एपीबदेतूयू... (हॅपी बर्थ डे टू यू)', वगैरे शब्द तिच्या तिच्या व्याकरणानं बोलू लागतेय. दोन-तीन आठवड्यांच्या अंतरात ती जुनं व्याकरण कोलमडवून, नवं व्याकरण उभं करू शकते. तिचा चिन्हांचा अर्थव्यापार प्रचंड धगधगता आहे. ही नोंद लिहीत असताना ही मुलगी बारा तासांच्या (बसनं लागणारा वेळ) अंतरावर आहे.

वरच्या दोन परिच्छेदांमधे नोंदवलेली वाक्यं म्हणजे काही महान माहिती नाही, बातमी नाही, मराठीत ज्याला वैचारिक लेखन म्हणतात ते नाही, फेसबुक-व्हॉट्सअॅपवरची संवेदनशील पोस्टही नाही. या वाक्यांचा काहीच व्यावहारिक, आर्थिक उपयोग नाही. आपल्या आजूबाजूच्या असंख्य तीव्र संदर्भांमधले हे दोन संदर्भ आहेत, एवढंच खरं आहे. जमलंच तर ते जोडण्यासाठीचा तिसरा संदर्भ म्हणून रेघ मारायचा प्रयत्न आपण करत असतो.
०००

लहानपणी मी आत्मसात केलेली जीवनदृष्टी पूर्णपणे सोडून देण्याची क्षमता माझ्यात नाही, आणि तशी इच्छाही मला होत नाही. मी जिवंत असेन तोपर्यंत लेखनशैलीबद्दल, या भूमीबद्दल माझ्या तीव्र भावना कायम राहू देत; (विविध) घन वस्तू व निरुपयोगी माहितीच्या रद्दीतून मला आनंद मिळवता येत राहू दे. माझं हे अंग लपवण्यात काहीच अर्थ नाही. माझ्यात मुरलेल्या आवडीनिवडी आणि सध्याच्या युगानं आपल्या सर्वांवरच लादलेल्या मूलतः सार्वजनिक स्वरूपाच्या- अव्यक्तिगत क्रिया यांच्यात संगती शोधणं हे (माझं) काम आहे.
- जॉर्ज ऑर्वेल ('व्हाय आय राइट' या निबंधातून भाषांतरित)


निरुपयोगी वस्तूंमधली संगती । पेंग्वीन, २००९ । १३५० रुपये
मुखपृष्ठ छायाचित्र: जॉन हिंड । रचना: जिम स्टॉडर्ट

Thursday 14 April 2016

आंबेडकर आणि दोषाचं एकक

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या पुस्तकातील एका उताऱ्याचा संदर्भ देऊन त्यात आंबेडकरांनी ‘दोषाचं एकक’ ही संकल्पना कशी मांडलेय, हे अनिकेत जावऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ('फुको आणि आंबेडकर', काळे पांढरे अस्फुट लेख, हर्मिस प्रकाशन, २०११: एक जुनी नोंद). जावरे लिहितात:
आता आपण आंबेडकरांच्या 'हू वेअर द शूद्राज्'मधल्या एका सुंदर आणि फुकोसदृश क्षणाकडे वळू या. ते एका विचित्र कल्पनेबद्दल लिहितात. कदाचित त्या काळच्या न्यायविचारात आणि कायदाव्यवस्थेत ती रूढही असेल. या कल्पनेत आपल्याला आंबेडकरांच्या न्यायाच्या जाणिवेची तीक्ष्णता दिसते. ते सामाजिक न्यायाबद्दल लिहिताना अचानक 'दोषाचे एकक' (unit of guilt)बद्दल लिहितात. या शब्दसमूहाचा अर्थ काय? दोष मोजता येतो काय? दोषाचा जर एकक असेल, असे एककीकरण करता येत असेल, व्यक्तिकरण करता येत असेल तर दोष विभाज्य असला पाहिजे. दोषाची विभागणी कशी करायची?

या प्रश्नांना आंबेडकरांकडे उत्तर आहे. त्यांचे म्हणणे संक्षेपात असे आहे: अशा घटनेचा विचार करा की एक शूद्र, ब्राह्मणी किंवा इतर सामाजिक संकेत पाळत नाही. किंवा अधिक सोप्या शब्दात सांगायचे झाले तर असे: कल्पना करा, तुम्ही शाळेत शिक्षक/ शिक्षिका आहात. वर्गात गेल्यावर तुमच्या असे लक्षात येते की कुणी तरी विद्यार्थ्याने फळ्यावर काही तरी अश्लील लिहिलेले आहे. तुम्ही मुलांकडे वळून म्हणता 'कोणी लिहिलंय हे?' तुम्हाला या कृतीला जबाबदार असणारी व्यक्ती हवी आहे. पण मुले काही सांगत नाहीत. बराच प्रयत्न केल्यानंतर तुमचा हमखास उपाय काय असणार? तुम्ही म्हणता की ज्याने हे लिहिलेय त्याने कबूल केले नाही तर सर्व वर्गाला शिक्षा करीन. आता तुमचे दोषाचे एकक म्हणजे संपूर्ण वर्ग! एक व्यक्ती पायात चप्पल तशीच ठेवून मंदिरात आत जाते आणि पाहा! एक वस्ती जाळली जाते, एखादे कुटुंब नष्ट करण्यात येते.
यानंतर जावऱ्यांनी 'हू वेअर द शूद्राज्'मधल्या एका उताऱ्याचं भाषांतर दिलंय. काही विशिष्ट शूद्र राजांशी झालेल्या संघर्षात ब्राह्मण समूहाचं प्रत्युत्तर संपूर्ण शूद्र समूहाला दिलेलं होतं, परिणामी ब्राह्मणांनी अनेक (धर्मशास्त्रीय) क्लृप्त्या लढवून शूद्र हा वर्ण ‘खाली’ ढकलला- असं आंबेडकरांचं म्हणणं. त्यासंबंधी जावऱ्यांनी ‘शूद्र पूर्वी कोण होते?’मधला जो परिच्छेद दिलाय, त्यातला काही भाग असा:
“... हा संघर्ष प्राचीन भूतकाळात झाला, जेव्हा जीवन हे कृती आणि विचाराने आदिवासी होते, आणि नियम असा होता की जमातीतल्या एका व्यक्तीने जे केले ते संपूर्ण जमातीने केले असे समजायचे. सर्व प्राचीन समाजांमध्ये जमात किंवा समाज हेच एकक होते, व्यक्ती हे नव्हे, परिणामतः एका व्यक्तीचा दोष हा पूर्ण समाजाचा दोष होता, आणि पूर्ण समाजाचा दोष हा त्या समाजातील प्रत्येक आणि एकूणएक व्यक्तींचा दोष होता. हे सत्य जर ध्यानात ठेवले तर असे म्हणणे साहजिकच आहे की ब्राह्मणांनी त्यांचा द्वेष फक्त काही राजांपुरता मर्यादित ठेवला नाही, तर पूर्ण शूद्र समाजापर्यंत वाढवला आणि उपनयनाचा प्रतिरोध सर्व शूद्रांना लागू केला”. (आंबेडकरांच्या या मूळ इंग्रजी उताऱ्याचं भाषांतर जावऱ्यांचं. 'आदिवासी'ऐवजी 'जमातीय' असा शब्द कदाचित अधिक रास्त झाला असता. 'आदिवासी' शब्द इथे अप्रस्तुत वाटतो).
जावरे पुढं म्हणतात:
आंबेडकरांच्या वर्णनात हे स्पष्ट आहे. न्यायाचे, न्यायव्यवस्थेतले एकक व्यक्ती हेच आहे, किंवा व्यक्तींचे गट असेच आहे. परंतु समाजात वापरले जाणारे न्यायाचे एकक म्हणजे संपूर्ण जात हे आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने सामाजिक संकेत मोडले तर संपूर्ण जातीला शिक्षा होते. [...] न्यायव्यवस्थेत-कोर्ट-कचेऱ्यात- न्यायाचे एकक व्यक्ती हेच आहे, आणि बराच काळ तसेच राहिले आहे. परंतु आपल्या समाजात व्यक्ती हे एकक नक्कीच नाही.
मोठ्या सामाजिक-राजकीय घडामोडी तर सुरूच असतात, आपण इथं या नोंदीपुरतं रोजच्या जगण्याच्या पातळीवरच बोलू शकतो. त्यातही आपण आपल्या आसपासाकडे बघण्यासाठी कोणतं एकक वापरतो? माणूस सोडून बाकीच्या जीवांसाठी तर असं एकेकट्याचं एकक क्वचितच वापरलं जातं. पाळीव प्राणी असेल घरात, तर त्याला काही नाव देऊन त्याला 'स्वतंत्र' एकक मिळतं, किंवा गोठ्यातल्या गाईला ती संधी मिळेल; पण बाकी कबुतरानं आपल्या खिडकीत शी केली, तर ती एका विशिष्ट कबुतरानं अशी केलेली नसते, सगळ्या कबुतरांना त्याचा साहजिकपणे दोष जातो. किंवा मुंग्या, डास वगैरे मंडळींचं एककही त्यांचा अख्खा वंश एवढंच असतं आपल्या लेखी. बाकीच्या जीवांचं खूपच झेपण्यापलीकडचं होईल, पण माणसांपुरतं तरी एकक व्यक्तीचं असावं, असं जमेल का, असा आंबेडकरांच्या मांडणीतला अर्थ आपल्याला कळतो.

व्यक्ती आणि समाज यांच्यातल्या द्वंद्वाचा उल्लेख त्यांच्या लिखाणात कुठंकुठं सापडतो आणि त्यातून हा दोषाच्या एककाचा मुद्दा कसा आणखी खोलात शोधता येईल, हे अभ्यासकांचं काम आहे. आपण इथं पत्रकारी नोंदी करतो, तर आंबेडकरांनी त्यांच्या 'बहिष्कृत भारत' या वर्तमानपत्रामध्ये १५ जुलै १९२७ रोजी एका लेखात मांडलेलं मत नोंदवू, ते असं:
समाजाच्या अस्तित्वासाठी समाजबंधने जरी आवश्यक असली तरी व्यक्तीच्या परिपोषाला अशी बंधने बाधक होतात. जोपर्यंत समाजाचे मत आणि व्यक्तीचे मत यांत एकतानता असते, तोपर्यंत लढा उत्पन्न होत नाही. परंतु जेव्हा समाजाच्या मतांत आणि व्यक्तीच्या मनांत भिन्नता दिसून येते तेव्हा ओढाताण सुरू होते, आणि व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य जर प्राप्त झाले नाही तर त्याचे नैतिक परिणाम उभयतांवर सारखेच अनिष्ट होतात. त्यातल्यात्यात सामाजिक बंधनाने व्यक्तीचा कोंडमारा झाला म्हणजे ज्या गोष्टी मनापासून कराव्याशा वाटतात, परंतु त्या समाज उघडपणे करू देत नाही, त्याच गोष्टी मनुष्य छपवून करावयास लागतो. अशा प्रकारची सवय माणसास एकदा जडली म्हणजे तो सहजच दांभिक वृत्तीचा, दुहेरी वर्तनाचा, असत्य बोलणारा, अप्रामाणिक मनुष्य बनतो.
('व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही तर त्याचे नैतिक परिणाम व्यक्ती व समाज यांच्यावर सारखेच अनिष्ट होतात', डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता: १९२० ते १९२८, डॉ. आंबेडकर लेखन व भाषणे खंड १९, महाराष्ट्र शासन, २००५: पान १९९).

म्हणजे, त्या वाऱ्यावर उडणाऱ्या म्हातारीप्रमाणे व्यक्ती समाजापासून तुटलेल्या अवस्थेत असावी, असं आंबेडकरांचं म्हणणं दिसत नाही. पण तरी व्यक्तीची तिची तिची ओळख फक्त जन्मजात पारंपरिक ओळखीवर आधारलेल्या एककाची राहू नये, असं त्यांचं म्हणणं दिसतंय. जातीचं तर झालंच, पण बाकी अनेक ओळखींच्या बाबतीत हे लागू होऊ शकतं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याच घडामोडींशी हे जोडून पाहता येतंच. अगदीच प्रत्येक वेळी आपल्याला व्यक्तीच्या एककानं वागणं-पाहणं शक्य नाही. म्हणजे बोलताना 'लोक' असा शब्द न वापरता कोण कुठं बोलू शकतं? कधीतरी ते होतंच. आपलं व्यक्ती असणं ठसवताना आपण असं बाकीचे 'लोक' म्हणतो तो भाग वेगळा. सामाजिक अभ्यासासांठीही तसं सामूहिक एकक आवश्यक राहतंच. पण सर्वसाधारणपणे दोष वगैरे देताना तरी हे एकक असं सरसकट वापरू नये, असं आंबेडकरांच्या चष्म्यातून आपल्याला दिसतं. बाहेर देशाच्या न्यायव्यवस्थेसमोर किमान कागदावर तरी व्यक्तीचं एकक असल्याचं वरच्या उताऱ्यांमधून आपल्याला कळतं, पण आपल्या मनातल्या न्यायव्यवस्थेसमोर तसं होतं का? हा प्रश्न आज आंबेडकरांच्या १२५व्या जयंती निमित्तानं नोंदवून ठेवू.

डॉ. बाबासाहेब आंंबेडकर
[१४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६]

टीप: 'हू वेअर द शूद्राज्'मधला आंबेडकरांचा मूळ परिच्छेद असा:
“We have no direct evidence, but there would be nothing unnatural in supposing that in these conflicts with the Brahmins, the whole Shudra community, not merely a few Shudra kings, was involved. This conflict, it must be remembered, has taken place in the ancient past when life was tribal in thought and in action, and when the rule was that what was done by one individual belonging to the tribe was deemed to be done by the whole tribe. In all ancient societies the unit was the tribe or the community and not the individual, with the result that the guilt of the individual was the guilt of the community and the guilt of the community was the guilt of every individual belonging to it. If this fact is borne in mind, then it would be quite natural to say that the Brahmins did not confine their hatred to the offending kings, but extended it to the whole of the Shudra community and applied the ban against Upanayana to all the Shudras.

Tuesday 5 April 2016

दबा धरून बसलेली वर्तमानाची झाडं

'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'च्या ५ डिसेंबर २०१५ रोजीच्या अंकात 'रायटिंग द प्रेझेन्ट' हा लता मणी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात एका ठिकाणी मणी यांनी म्हटलेलं की:
आपण जिची तीव्र इच्छा धरलेय ती गोष्ट आधीच अस्तित्त्वात आहे, किंवा अस्तित्त्वात नसेल तरी काही काळानं ती अस्तित्त्वात येईल, अशी बतावणी करणं ही सत्तेची लबाडी असते. भविष्याची एक विशिष्ट संकल्पना वर्चस्व गाजवते; आणि तिच्या आगमनासाठीची रंगभूमी एवढंच वर्तमानाचं स्थान उरतं. या दृष्टीत भूतकाळ अवशेषांनी भरलेला असतो, वर्तमान बिनमहत्त्वाचं असतं आणि भविष्य ही एकच गोष्ट महत्त्वाची असते. पण, आपल्याला कितीही नको असलं तरी आपण वर्तमानात जगत असतो. वर्तमानातच भूतकाळ जगला जातो, त्याची पुनरावृत्तीही होते, त्याची कल्पना आणि पुनर्कल्पना केली जाते, त्यावर टीका केली जाते आणि त्याला स्वीकारलंही जातं. आणि या वर्तमानावरच भविष्याला लादलं जातं. त्यामुळं वर्तमानाकडं लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं.
'थिअरी' या गोष्टीविषयी काही बोलावं, त्याच्या कक्षा रुंदावाव्यात, असा हेतू मणी यांनी लेखात नोंदवलाय. त्या स्वतः विद्यापीठीय क्षेत्रातल्या आहेत. इंग्रजीतला 'theory' हा शब्द 'theoria' या शब्दातून आलाय नि त्याचा अर्थ 'निरीक्षणाची कृती' असा आहे, असंही त्यांनी लेखात म्हटलंय. या निरीक्षणाचं वर्तमानाचं भान जागं ठेवण्यासाठी कला इत्यादी गोष्टींचा काही हातभार लागू शकतो का, असा एक धागा त्यांच्या लेखात दिसतो. इतरही काही धागे आहेत आणि त्यावर काही मतभेदही होऊ शकतील. आपल्याला त्यातल्या एकाच धाग्याला जोडून नोंद करायची आहे.

मणी यांनी या त्यांच्या शोधाचा भाग म्हणून दोन 'चलत्-चित्र-कविता' निकोलास ग्रान्डी यांच्यासोबत तयार केलेल्या आहेत. या प्रयोगांची माहिती त्यांनी वरच्या लेखात दिलेय. ग्रान्डी कॅमेऱ्यासोबत काही करू पाहणारे, तर मणी शब्दांसोबत काही करू पाहणाऱ्या. शब्दांची आणि प्रतिमांची एवढी गर्दी उडालेल्या आजच्या जगात या दोघांमधलं नातं तपासावं, त्यात काही प्रयोग करावेत, अशी त्यांची इच्छा त्यांनी नोंदवलेय. आणि त्यातून 'नॉक्टर्न-१' व 'नॉक्टर्न-२' या चलत्-चित्र-कविता तयार झाल्या. ('नॉक्टर्न'ला थेट मराठी प्रतिशब्द/पर्यायी शब्द माहीत असल्यास कळवा. थोडंसं 'रात्रसंगीत' असं काही त्यात येऊ शकेल कदाचित). यातली पहिली कविता खाली पाहता येईल.




या सुमारे पाच मिनिटांच्या चलत्-चित्र-कवितेत रात्रीच्या वेळी शहराच्या परिसरातील काही झाडं-झुडपं अंधुक-स्पष्ट दिसतात, काही किड्यांचे, पक्ष्यांचे किंवा काही माणसांच्या कुजबुजीचे आवाज ऐकू येतात, काही संगीताचे आवाज कानावर पडतात. आणि 'every tree a forest' हे शब्द एकसलग नाही, तर कधी एक शब्द, कधी दोन, कधी एकत्र ओळ असे दिसतात. आपल्या आसपास अस्तित्त्वाची अनेक चिन्हं जागी असतात. सुंदरपणाची किंवा रूढी म्हणून खपवली जाणारी, किंवा आता 'नव-उदारमतवादी' जगात मागास वा बिनमहत्त्वाची ठरणारी, अशी अनेक चिन्हं आसपास वावरत असतात. त्यांना समजून घेणं म्हणजे सूक्ष्म पातळीवरच्या सांस्कृतिक बदलांना समजून घेणं ठरेल, असं साधारण मणी यांचं मत दिसतं. हे सगळं आता आपण जरा बाजूला ठेवू. आणि मणी यांच्या ओळीबद्दल बोलू.

'प्रत्येक झाड (असतं) एक वन', असं मणी यांच्या ओळीचं भाषांतर करता येईल. आणि ती इंग्रजीत वाचतानाच आपल्याला मनोहर ओकांच्या 'झाड' कवितेची सुरुवात आठवू शकेल:
झाड
हे झाड नसतं
एक जंगल
(मनोहर ओकच्या ऐंशी कविता, लोकवाङ्मय गृह)

ओकांच्या कवितेतली मधली ओळ बाजूला काढली तर 'झाड (असतं) एक जंगल' असं होऊ शकेल, पण ते सांगताना झाडाला एक 'नसतेपण' त्यांनी जोडलंय. मणी यांनी तसं न करता झाडाचं वन असणं अधोरेखित करू पाहिलंय. पण तरी या दोन अर्थांमधे काहीतरी समांतर सापडल्यासारखं वाटतंच. आणि मग सदानंद रेग्यांच्या कवितेत-
झाडे आहेत उभी
दबा धरून कैदी श्वासासारखी...
(गंधर्व, पॉप्युलर प्रकाशन)

पण याचा आणि वर्तमानाचा काय संबंध? मणी यांच्या लेखाशी काय संबंध? या प्रश्नांच्या उत्तराचा अंदाज बांधण्यासाठी एखादं उदाहरण घेता येईल. मणी यांनी त्यांच्या लेखात एक रस्ता रुंदीकरणाचं उदाहरण दिलंय, ते जसंच्या तसं न घेता आपण तसंच थोडं जवळपास जाणारं नोंदवू-

म्हणजे समजा की, एखाद्या चौकात रस्त्याच्या कडेला फुटपाथवर मोठंच्या मोठं खोड दिसतंय. आपण त्या चौकातून गाडीनं-गाडीतून तर अनेकदा गेलोय, क्वचित चालतही गेलोय, बहुधा तिथं मोठं झाड असल्याचं आपल्याला कळलं असेल किंवा नसेल, आणि अचानक एखाद्या दिवशी सावली खूप कमी दिसली, तर मग कदाचित आपल्याला लक्षात येईल की, फांद्यांची काही काटछाट झालेय. किंवा कदाचित कधीतरी अख्खं झाडही रस्ता रुंदीकरणासाठी हटवावं लागू शकेल. त्यासाठी मग कायद्याचा अडसर. आता समजा की, ते चिंचेचं झाड आहे. दोनशे वर्षं जुनं. म्हणजे हा चौक चौक होण्याआधीपासूनच ते तिथं असणार, तर तरीसुद्धा आपल्याला ते लक्षात आलं नव्हतं, असं होऊ शकतं की नाही? किंवा आपण रोज एखाद्या विद्यापीठात जाताय, तिथं मुख्य इमारतीचं बांधकाम सुरू असलेलं आपल्याला दिसतं, पण समोरच कठड्याजवळ असंच शेकडो वर्षं वय असलेलं एक चिंचेचं झाड खलास होत असलेलं कदाचित दुर्लक्षित होऊ शकतं. चिंचेचं झाड तरी खूप मोठं. पण इतर असे अनेक तपशील वर्तमानात वावरत असतात, पण ते वर्तमानात जाणवतात असं नाही, आपण जाणवून घेतोच असं नाही. मणींना यात अनेक गोष्टी अपेक्षित आहेतसं दिसतं- 'विकास' म्हणजे काय, याचं उत्तर अनेकदा असं भविष्याला वर्तमानावर लादून काढलेलं असतं. देशानं 'महासत्ता' होणं, किंवा अमुक एक आत्मघातकी दहशतवादी कृत्य केल्यावर स्वर्गात जाण्याची शाश्वती, किंवा आपण अमुकएक जीवनशैली स्वीकारणं, यासंबंधीचे अनेक निर्णय असे होत असण्याची शक्यता आहे. किंवा अनेकदा एखाद्या जुन्या संकेतावरची टीका बदलत बदलत टिंगलीसारखी होत जाते आणि भविष्याला वर्तमानावर लादते. भविष्याचा अंदाज घेणं, हे वेगळं; असा अंदाज अजिबात न घेता काही करणं अवघड आहे, पण भविष्याविषयी काही ठोस साचा ठरवून त्यासंबंधीच्या वर्तमानातल्या कामकाजाचं समर्थन करणं, हे थोडं गोंधळाचं ठरतं, असं या लेखातून वाटतं. आणि याच्या दुसऱ्या टोकाला म्हणून पूर्ण भूतकाळाकडं तोंड वळवण्याचाही भाग होतो. त्याचाही एक साचा ठरवून तो वर्तमानावर लादला जातो. तर या पूर्ण भासवल्या जाणाऱ्या काळांचं प्रवाहीपण वर्तमानात थोडंसं जाणवू शकतं.

हे थोडं अस्पष्ट वाटतं. पण ते एकदम सूत्रासारखं ठोस होणंही अवघड आहे. काळांची विभागणी अगदी काटेकोर कप्प्यांमधे करता येणार नाही. (ही विभागणी मणी यांना कशी अपेक्षित आहे, असा प्रश्न आपण त्यांना ई-मेलद्वारे पाठवून ठेवलेला आहे). पण वर्तमानकाळाच्या निरीक्षणाचा मुद्दा बऱ्यापैकी स्पष्ट वाटतो. विशेषकरून रेघेवर वर्तमानपत्रांबद्दल आपण बोलतो तर ते खरंच किती वर्तमानाला धरून असतं, हे तपासण्यासारखं आहे. मणी यांनी वरच्या लेखात एका ठिकाणी म्हटलंय की, गूढ, अनपेक्षितता, स्पष्टता व गुंतागुंत या सगळ्यांना एकाच वेळी सामावून घेऊ शकणाऱ्या शब्द या अपारदर्शक माध्यमात त्यांना रस वाटतो. आणि सध्याच्या युगात जागतिक स्वरूपाचा, घर्षणविरहित संवाद व्हावा यासाठी भाषेला शब्दशः/कोशबद्ध करण्याचा प्रयत्न होतोय, असंही त्यांना वाटतं. त्यामुळे मग या प्रक्रियेत, शब्दाचे त्यांना वाटणारे गुण गळून जातात, असं त्यांना वाटतं. ते गुण अधिकाधिक शोधावेत म्हणून त्यांनी ग्रान्डी यांच्यासोबत हा चलत्-चित्र-कवितांचा घाट घातलेला असावा. 

मराठीत उत्तम कोळगावकर यांची एक कविता आहे:
माती उकरून मुळापर्यंत जाल तर
हाती काहीच येणार नाही

मुळापर्यंत पोचण्याचा रस्ता
फुलातून जातो.

तसं पाहायला गेलं तर माती उकरल्यावरही हाताला काहीतरी लागेलच, मुळं लागतीलच, पण मुळांचा अर्थ त्यात सापडणार नाही, तो कदाचित फुलाकडं बघून सापडेल, असं. मणी यांच्या म्हणण्याचं थिअरीत काय करता येतं, हा आपल्या मर्यादेतला विषय नाहीये. शिवाय वरच्या चलत्-चित्र-कवितांबद्दलही आपल्याला खूप समाधान वाटलं नाही. पण इंटरेस्टिंग वाटलं. आणि हा लेख वाचल्या वाचल्या काही मराठी कवितांच्या भूतकाळात वाचलेल्या ओळी वर्तमानात डोक्यात आल्या, त्या वर्तमानातच परत चाळल्या, आणि ही नोंद करता येईल कधीतरी पुढं, असं वाटलं. लेख डिसेंबरातला आणि नोंद एप्रिलात. ओळी आलेल्या मराठी कविता तर आणखीच जुन्या. दरम्यान, लेख वाचल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये खरोखरच दोन चिंचेची झाडं दिसली, त्यामुळं मग ही नोंद झाली. होतेय ही नोंद. तुम्ही वाचताय. तुम्हाला बाकीची कामंही असतील, त्यात या नोंदीसाठी वेळ काढावा का वाटतोय?

मौज प्रकाशन, २००१. (मुखपृष्ठ: सुभाष अवचट)

Saturday 20 February 2016

जगदलपूरमधलं घर सोडताना: मालिनी सुब्रमण्यम

बस्तरमधे विविध कारणांनी सशस्त्र संघर्ष सुरू असल्याची माहिती नवीन नाही. पण तिथली माहिती शक्य तितकी सहज उर्वरित ठिकाणी खेळती राहात नाही, हे आपण इथं आधीही नोंदवलेलं आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रकाशझोतात हा प्रदेश (इतरही अनेक प्रदेशांप्रमाणे) येत नाही.

गेल्या वर्षी फेब्रुवारीत रेघेवर 'एक आठवडा + पाच हजार आदिवासी = किती बातम्या?' अशी एक नोंद केली होती. छत्तीसगढमधे प्राथमिक शाळेत आचारीकाम करणाऱ्या मुचाकी हाडमा या ४० वर्षांच्या माणसाला पोलिसांनी उचललं होतं. त्या पूर्वी एका पोलीस खबऱ्याला माओवाद्यांनी मारलं होतं, त्यामध्ये माओवाद्यांंना या माणसानं मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला अटक केली होती. पण हाडमा यांना सोडावं अशी मागणी करत छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यातल्या तोंगपाल पोलीस स्टेशनावर हजारेक आदिवासी मोर्चा घेऊन आले होते. यासंबंधीच्या रिपोर्टबद्दलची ती छोटी नोंद होती. हा मूळ रिपोर्ट 'स्क्रोल' या संकेतस्थळावर मालिनी सुब्रमण्यम यांनी लिहिला होता. सुब्रमण्यम स्वतः बस्तर जिल्ह्यातल्या जगदलपूरमधे राहात होत्या. गेल्या वर्षभरात त्यांनी 'स्क्रोल'साठी या प्रदेशातील घडामोडींचं वार्तांकन केलेलं आपल्याला वाचायला मिळतं. 

आत्ताच्या सात फेब्रुवारीला जगदलपूरमधल्या सुब्रमण्यम यांच्या घरासमोर 'सामाजिक एकता मंच' नावाच्या एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. 'नक्षली समर्थक बस्तर छोडो' अशा घोषणा देण्यात आल्या. आणि त्याच दिवशी रात्री त्यांच्या घरावर दगडफेक झाली. या घटनेत त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली: असं 'इंडियन एक्सप्रेस'मधल्या बातमीवरून कळतं. या सर्व घडामोडींच्या परिणामी आता तीन दिवसांपूर्वीच सुब्रमण्यम यांना त्यांचे पती व दोन मुलींसह जगदलपूरमधलं घर सोडून शहराबाहेर पडावं लागलं आहे. यासंबंधी काल 'स्क्रोल'वरच तिथल्या संपादकीय चमूतल्या सुप्रिया शर्मांचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. (थोडं विषयांतर: 'स्थानिक प्रसारमाध्यमांना/पत्रकारांना गप्प बसवण्यात आलं होतं' असं एक ओझरतं निरीक्षण शर्मांनी नोंदवलंय. पण स्थानिकांपुढचे अडथळे, ताणतणाव, दबाव हे अधिक तीव्र असतात आणि राष्ट्रीय/इंग्रजी मुख्य प्रवाहातल्या वा समांतर प्रवाहातल्या पत्रकारांच्या तुलनेत काहीच पाठबळ नसल्यामुळं स्थानिक पत्रकारांसाठी या गोष्टी जास्तच जीवघेण्याही असतात, असंही त्यात नोंदवायला हवं. यापूर्वी डिसेंबर २०१३मधे 'देशबंधू' या दैनिकाचे पत्रकार साई रेड्डी यांना माओवाद्यांनी ठार मारलं होतं. पोलिसांकडून संतोष यादव या दुसऱ्या एका स्थानिक पत्रकाराला काय गोष्टींना सामोरं जावं लागलं, यासंबंधी सुब्रमण्यम यांनीही लिहिलं होतं.)

या सर्व पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम यांनी केलेलं छत्तीसगढमधल्या या भागाचं वार्तांकन उर्वरित बातम्यांच्या गदारोळात वेगळं ठरणारं होतंच. पण इथून पुढं ते आपल्याला वाचायला मिळणार नाहीये. या संदर्भात सुब्रमण्यम यांच्याशी बोलून काही प्रश्नोत्तर स्वरूपातली नोंद करावी, अशी इच्छा 'रेघे'नं त्यांच्याकडं व्यक्त केली. त्यावर त्यांनी त्यांच्या बाजूनं एक निवेदन 'रेघे'ला पाठवून दिलं. प्रश्नोत्तरांपेक्षा आता आपण हे निवेदन मराठीत भाषांतरित करून इथं नोंदवतो आहोत.

जगदलपूरमधलं घर सोडताना: मालिनी सुब्रमण्यम
असुरक्षितता आणि दहशतीच्या वातावरणामुळं मला जगदलपूर सोडायला भाग पडलं आहे.
सात फेब्रुवारीला संध्याकाळी 'सामाजिक एकता मंच' नावाच्या एका संघटनेनं माझ्या घराबाहेर निदर्शनं केली. 'स्क्रोल-डॉट-इन'साठी मी लिहिलेल्या वृत्तान्तांवर त्यांनी आक्षेप घेतले आणि पोलिसांची प्रतिमा मलीन होईल असं काही मी लिहू नये अशी धोक्याची सूचनाही दिली. त्यानंतर काही तासांनी मध्यरात्री अडीच वाजता, आमच्या परिसरात एक मोटरसायकल आल्याचा आवाज आला. नंतर आमच्या घरावर दगडफेक झाली आणि माझ्या गाडीची मागची काच फोडून टाकण्यात आली.

प्राथमिक माहिती अहवाल नोंदवून घ्यायला पोलिसांनी दोन दिवस लावले. माझ्या तक्रारीच्या समर्थनामधे साक्षीदार म्हणून उभ्या राहिलेल्या माझ्या शेजारी राहणाऱ्या महिलांना तपास अधिकाऱ्यानं धमकावलं. माझ्या अटकेसाठी सामाजिक एकता मंचानं मोर्चे काढले. या संघटनेचे व पोलिसांचे लागेबांधे असल्याचं 'द हूट' आणि 'कॅरव्हॅन'मधे प्रसिद्ध झालेल्या वार्तांकनांवरून स्पष्ट होतं.

'स्क्रोल-डॉट-इन'च्या संपादिका (छत्तीसगढचे) मुख्यमंत्री रमण सिंग यांना भेटल्या आणि या प्रकरणात हस्तक्षेप करायची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. त्यानंतर बस्तरचे पोलीस महानिरीक्षक एस.आर.पी. कल्लुरी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आर.एन. दाश माझ्या घरी आले आणि तपास प्रक्रिया न्याय्य रितीनं पार पडेल व माझं कुटुंब सुरक्षित राहील अशी ग्वाही त्यांनी मला दिली. मी कोणतंही भय न बाळगता माझं काम सुरू करू शकते, असंही ते म्हणाले.

पण तरी सामाजिक एकता मंचानं माझ्याविरोधातली मोहीम सुरूच ठेवली आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, माझ्या घरमालकांना पोलिसांनी पत्र पाठवून रायपूरहून जगदलपूरला बोलावून घेतलं. या पत्रात माझ्याविषयी फसवे दावे करण्यात आले होते.

बुधवारी (१७ फेब्रुवारी) पोलिसांनी माझ्याकडं घरकाम करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं आणि कित्येक तास तिची चौकशी केली. माझ्या घरावर तिनंच दगडफेक केल्याचे आरोप पोलिसांनी केले. माझ्या तक्रारीचा तपास करण्याच्या नावाखाली माझ्याशी संबंधित सर्वांच्या मागं ससेमिरा लावण्याची पोलिसांची भूमिका यातून स्पष्ट होत होती. अखेरीस गुरुवारी दुपारी आमच्या घरमालकानं जागा रिकामी करण्यासाठीची नोटीस पाठवून दिली. त्याच दिवशी संध्याकाळी सामाजिक एकता मंचानं माझ्या वकिलाच्या घराबाहेरही निदर्शनं केली. माझ्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मी जगदलपूर सोडावं, अशी सूचना 'स्क्रोल-डॉट-इन'च्या संपादकांनी मला केली.

गेली पाच वर्षं मी ज्या जागेला स्वतःचं घर मानत होते ती जागा अशी अचानक सोडून जावी लागणं वेदनादायक होतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासनं देऊनही जगदलपूरमधे पत्रकारांविरोधात धमकावणी नि धाकदपटशाहीचा वापर केला जातोय, हेही यातून परत स्पष्ट झालं.

एकीकडं पत्रकारांवरच्या हल्ल्यांसंबंधी राष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत असताना पोलिसांनी कुठल्याही ठिकाणी राहात असलेल्या नागरिकांच्या व पत्रकारांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा करणं वाजवी आहे, असं वाटतं. पण संरक्षण देण्याऐवजी जगदलपूर पोलिसांनी भयग्रस्त परिस्थितीतल्या भयाची तीव्रता वाढवण्याचंच काम केलं. या सर्व परिस्थितीत मला माझ्या कुटुंबासहित माझं घर सोडणं भाग पडलं.
"बस्तरच्या गावांमधल्या लोकांना काय वाटत असेल, याची पुरेपूर कल्पना मला आता आलेय", अशी भावना सुब्रमण्यम यांनी 'स्क्रोल'च्या आधी उल्लेख केलेल्या रिपोर्टमधे व्यक्त केलेय. त्यांच्या निवेदनात उल्लेख आलेली वकील व्यक्ती ही 'जगदलपूर लीगल एड ग्रुप' या चमूचा भाग आहे. इतर राज्यांमधली ही तरूण मंडळीही या भागातील काही खटल्यांमधे आदिवासींच्या बाजूनं वकिली करण्याचा प्रयत्न गेली तीनेक वर्षं करत होती. पण त्यांनाही सुब्रमण्यम यांच्याच प्रकारे जगदलपूर सोडावं लागणार असल्याचं प्रसिद्ध झालेल्या वार्तांवरून कळतं. शिवाय, या चमूचंही एक निवेदन इंग्रजीत प्रसिद्ध झालेलं आहे. जगदलपूर सोडावं लागणार असल्याचं त्यांनी त्यात म्हटलेलं दिसतंय.

वेलकम/ जगदलपूर रेल्वे स्थानकाजवळची कमान (फोटो: रेघ/ दोनेक वर्षांपूर्वी)

Thursday 7 January 2016

खुनाची गोष्ट पुना पुना

टीव्ही पाहिला असालच किंवा पेपर वाचले असालच, किंवा सोशल मीडियावरून तरी कळलं असेलच की, ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना ट्विटरवरून परवा कोणीतरी एक सल्ला दिला: "तुम्ही लौकर उठून मॉर्निंग वॉकला जात चला श्रीपाल सबनीस". हा सल्ला देणारी व्यक्ती 'सनातन संस्थे'ची वकीलही आहे, व त्यांचं नाव संजीव पुनाळेकर आहे. गोविंद पानसरे यांच्या खुनाप्रकरणातील आरोपीचं वकीलपत्रही पुनाळेकर यांच्याकडेच आहे, असं दिसतं. वकीलपत्र घेण्यात काहीच चूक नाही. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी पानसरे खून खटल्यातील साक्षीदारासंबंधी एक पत्र पोलिसांकडं पाठवलं होतं: "या अल्पवयीन साक्षीदाराला जपा" असा सल्ला त्यात दिलेला होता. आणि काही गाजलेल्या प्रकरणांमध्ये साक्षीदारांची कशी दैना झाली, त्याचीही आठवण करून दिलेली.

दरम्यान, श्रीपाल सबनीसांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी काही वक्तव्य केलं. मोदी पाकिस्तानाला अचानक भेट देऊन आले त्याबद्दल काही त्या वक्तव्यात होतं. त्यात मुळात अर्थ काय होता, हे कळायला मार्ग नाही. पण त्यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला, वगैरे मुद्दे लोकांना आवडले नसावेत असं दिसतं. मग आता हे पुनाळेकर यांचं वाक्य. त्यातही एक अर्थ असा निघाला की, नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या मॉर्निंग वॉकला जात असतानाच झाली, त्या संदर्भातली ही गर्भित धमकीच आहे. पण पुनाळकरांचं म्हणणंही हेच- माझा अर्थ वेगळा होता. सबनीस मोदींबद्दल बोलताना तावातावानं बोलले, चेहरा रूक्ष होता, तर त्यांनी प्रसन्न राहावं असं तब्येतीच्या अंगानं मॉर्निंग वॉकचा सल्ला दिलेला. 

तसाही शब्दांचा नि अर्थांचा संबंध अनेक संबंधांनी लागतो, हे आपल्याला भाषेतले तज्ज्ञ सांगतातच. सबनीसांच्या वाक्यांचा अर्थ लागायला तरी सोपा होता. पण पुनाळेकरांच्या वाक्यांमधल्या शब्दांचा नि अर्थाचा संबंध लावावा म्हणून त्यांचं ट्विटर अकाउन्ट पाहिलं. आणि तिथं एकसलग गोष्टच सापडली. ज्यानं त्यानं आपापले अर्थ काढावेत:

उपोद्घात

पहिला ट्विस्ट
सूरज परमार कोण, तर ठाण्यात स्वतःवर पिस्तुलानं गोळ्या झाडून आत्महत्या केलेला एक बांधकाम व्यावसायिक. ऑक्टोबर २०१५मध्ये ही घटना घडली होती. परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारी यंत्रणा व प्रशासनासंबंधी काही गोष्टी लिहिल्या होत्या, वगैरे तपशील बातम्यांमधून आला होता. (एकदोन). लाच देण्याघेण्याचा संदर्भ त्यात होता, शहरांमधील बेकायदेशील बांधकामांचा संदर्भ त्यात होता, असं बातम्या सांगतात- तो मुद्दा वेगळा. पण परमारांनी स्वतःच स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली, ही घटना आहे, आणि त्यामागं मास्टरमाइंड कोण असेल? परमारांना गोळी घालावी का वाटली, हे कारण वेगळं. पण गोळी त्यांनीच झाडून घेतली असेल, तर 'मास्टरमाइंड' काय असेल? कुठली अलौकिक शक्ती असेल का? अशी ही थ्रिलर अर्थांची गोष्ट दिसतेय.

पण पुनाळेकर यांची आणखी ट्विट वाचत गेल्यावर अधिक स्पष्ट अर्थ लागतो:


म्हणजे 'मास्टरमाइंड' कोण याचा विचार करत आपण उगाच बुद्धी वाया घालवत होतो!

क्लायमॅक्स-१
क्लायमॅक्स- २
तर गोष्टीतली ही क्लायमॅक्सची वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की, भारत देशाच्या केंद्र सरकारची सूत्र भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या हातात गेल्याचा संदर्भ पुनाळेकर यांच्या गोष्टीला आहे. त्यातलं दीडच वर्ष झाल्यावर काही लोक देशात असहिष्णुता असल्याचा गोंधळ माजवतायंत, तो गोंधळ शांत होईलच, कारण गोंधळ करणारी माणसंच मिळणार नाहीत, कारण ती बहुधा दुर्जन असावीत. तर त्याची काळजी 'मास्टरमाइंड'द्वारे घेतली जाईल.

पण 'मास्टरमाइंड'बद्दल आणखी एक ट्विस्ट गोष्टीत आलेला दिसतो:

प्रश्नचिन्ह

म्हणजे 'मास्टरमाइंड' किती अर्थपूर्ण शब्द आहे पाहा. बरं दरम्यान, गोष्टीतल्या शब्दांना अर्थाचा आणखी एक संदर्भ आहे:

पेन! कसलं पेन?

कर्नाटकात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ज्यांचा खून झाला त्या लेखक एम.एम. कलबुर्गींनी काय लिहिलं माहीत नाही, पण त्यांच्याबद्दल या ट्विटगोष्टीत येणारा मजकूर असा: 'लेखणी ही तलवार किंवा बंदुकीपेक्षा ताकदवान असते, असा कलबुर्गींचा विश्वास होता. त्यांच्या शत्रूंना नेमकं याच्या उलट वाटत होतं. यातलं बरोबर कोण, मला माहीत नाही'.

म्हणजे आपण नोंद (पेनानं नाही तरी कीबोर्डानं) लिहिली ती वायाच म्हणायची. पण होतं कसं की, शब्द खूप असतात आजूबाजूला नि अर्थ वेगवेगळे. तर अर्थ त्या शब्दाच्या जवळ आणायचा प्रयत्न करावा, शब्द नि अर्थाचं सहितपण शोधावं, हे साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर तरी करावं, अशी अखिल भारतीय जबाबदारी आता सर्वसामान्य वाचक-प्रेक्षकांवरच पडलेली दिसतेय.

तर ही एक आपल्या काळातली एका नवीन वर्षातली पहिली गोष्ट. दुर्जनांचा विनाश, खून प्रकरणांमागील मास्टरमाइंड, केंद्र सरकारची विचारधारा, नथुराम गोडसे, वगैरे तपशिलांनी सजलेली ही गोष्ट. कुठलीच गोष्ट पहिली नसते, हे तर तुम्हाला माहितीच असेल.


पुरवणी कथा:

.
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या संस्थेच्या नवनियुक्त अध्यक्षांविरुद्ध पुन्हा आंदोलन केलं. हे अध्यक्ष म्हणजे गजेंद्र चौहान आज तिथं येणार आहेत, यावर विद्यार्थ्यांनी आपली नाराजी दाखवली नि पोलिसांनी कारवाई वगैरे करून काही विद्यार्थ्यांना गाड्यांमध्ये भरून नेलं, आता अजून हा घटनाक्रम चालू आहे. तर, याबद्दलही पुना ट्विटगोष्टीत जाऊ, तिथं ऑक्टोबर महिन्यात एफटीआयआयवर काही आक्षेप घेण्यात आला होता. या संस्थेत अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांना फ्रीशिप का नाहीत, असं विचारलंय या ट्विटमधे. आणि संस्थेच्या धोरणासंबंधीच्या प्रश्नाचा जाब विद्यार्थ्यांनाही विचारलाय. पण हे काही पटण्याजोगं नाही. एफटीआयआय ही निमसरकारी संस्था आहे नि तिथं सरकारी धोरणानुसार आरक्षण लागू आहे (अनुसूचीत जातींसाठी १५ टक्के, अनुसूचीत जमातींसाठी ७.५ टक्के व इतर मागास वर्गीयांमधील 'नॉन-क्रिमी लेयर'साठी २७ टक्के, वगैरे) आणि त्यातल्या नियमानुसार सवलत वा शिष्यवृत्तीचा पर्याय विद्यार्थ्यांना मिळतो, असं संस्थेचं संकेतस्थळ 'नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नां'ना उत्तरं देताना सांगतं. म्हणजे उत्तर उपलब्ध असूनही शोधायचं नाही नि प्रश्न विचारायचा!