Thursday 14 April 2016

आंबेडकर आणि दोषाचं एकक

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या पुस्तकातील एका उताऱ्याचा संदर्भ देऊन त्यात आंबेडकरांनी ‘दोषाचं एकक’ ही संकल्पना कशी मांडलेय, हे अनिकेत जावऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ('फुको आणि आंबेडकर', काळे पांढरे अस्फुट लेख, हर्मिस प्रकाशन, २०११: एक जुनी नोंद). जावरे लिहितात:
आता आपण आंबेडकरांच्या 'हू वेअर द शूद्राज्'मधल्या एका सुंदर आणि फुकोसदृश क्षणाकडे वळू या. ते एका विचित्र कल्पनेबद्दल लिहितात. कदाचित त्या काळच्या न्यायविचारात आणि कायदाव्यवस्थेत ती रूढही असेल. या कल्पनेत आपल्याला आंबेडकरांच्या न्यायाच्या जाणिवेची तीक्ष्णता दिसते. ते सामाजिक न्यायाबद्दल लिहिताना अचानक 'दोषाचे एकक' (unit of guilt)बद्दल लिहितात. या शब्दसमूहाचा अर्थ काय? दोष मोजता येतो काय? दोषाचा जर एकक असेल, असे एककीकरण करता येत असेल, व्यक्तिकरण करता येत असेल तर दोष विभाज्य असला पाहिजे. दोषाची विभागणी कशी करायची?

या प्रश्नांना आंबेडकरांकडे उत्तर आहे. त्यांचे म्हणणे संक्षेपात असे आहे: अशा घटनेचा विचार करा की एक शूद्र, ब्राह्मणी किंवा इतर सामाजिक संकेत पाळत नाही. किंवा अधिक सोप्या शब्दात सांगायचे झाले तर असे: कल्पना करा, तुम्ही शाळेत शिक्षक/ शिक्षिका आहात. वर्गात गेल्यावर तुमच्या असे लक्षात येते की कुणी तरी विद्यार्थ्याने फळ्यावर काही तरी अश्लील लिहिलेले आहे. तुम्ही मुलांकडे वळून म्हणता 'कोणी लिहिलंय हे?' तुम्हाला या कृतीला जबाबदार असणारी व्यक्ती हवी आहे. पण मुले काही सांगत नाहीत. बराच प्रयत्न केल्यानंतर तुमचा हमखास उपाय काय असणार? तुम्ही म्हणता की ज्याने हे लिहिलेय त्याने कबूल केले नाही तर सर्व वर्गाला शिक्षा करीन. आता तुमचे दोषाचे एकक म्हणजे संपूर्ण वर्ग! एक व्यक्ती पायात चप्पल तशीच ठेवून मंदिरात आत जाते आणि पाहा! एक वस्ती जाळली जाते, एखादे कुटुंब नष्ट करण्यात येते.
यानंतर जावऱ्यांनी 'हू वेअर द शूद्राज्'मधल्या एका उताऱ्याचं भाषांतर दिलंय. काही विशिष्ट शूद्र राजांशी झालेल्या संघर्षात ब्राह्मण समूहाचं प्रत्युत्तर संपूर्ण शूद्र समूहाला दिलेलं होतं, परिणामी ब्राह्मणांनी अनेक (धर्मशास्त्रीय) क्लृप्त्या लढवून शूद्र हा वर्ण ‘खाली’ ढकलला- असं आंबेडकरांचं म्हणणं. त्यासंबंधी जावऱ्यांनी ‘शूद्र पूर्वी कोण होते?’मधला जो परिच्छेद दिलाय, त्यातला काही भाग असा:
“... हा संघर्ष प्राचीन भूतकाळात झाला, जेव्हा जीवन हे कृती आणि विचाराने आदिवासी होते, आणि नियम असा होता की जमातीतल्या एका व्यक्तीने जे केले ते संपूर्ण जमातीने केले असे समजायचे. सर्व प्राचीन समाजांमध्ये जमात किंवा समाज हेच एकक होते, व्यक्ती हे नव्हे, परिणामतः एका व्यक्तीचा दोष हा पूर्ण समाजाचा दोष होता, आणि पूर्ण समाजाचा दोष हा त्या समाजातील प्रत्येक आणि एकूणएक व्यक्तींचा दोष होता. हे सत्य जर ध्यानात ठेवले तर असे म्हणणे साहजिकच आहे की ब्राह्मणांनी त्यांचा द्वेष फक्त काही राजांपुरता मर्यादित ठेवला नाही, तर पूर्ण शूद्र समाजापर्यंत वाढवला आणि उपनयनाचा प्रतिरोध सर्व शूद्रांना लागू केला”. (आंबेडकरांच्या या मूळ इंग्रजी उताऱ्याचं भाषांतर जावऱ्यांचं. 'आदिवासी'ऐवजी 'जमातीय' असा शब्द कदाचित अधिक रास्त झाला असता. 'आदिवासी' शब्द इथे अप्रस्तुत वाटतो).
जावरे पुढं म्हणतात:
आंबेडकरांच्या वर्णनात हे स्पष्ट आहे. न्यायाचे, न्यायव्यवस्थेतले एकक व्यक्ती हेच आहे, किंवा व्यक्तींचे गट असेच आहे. परंतु समाजात वापरले जाणारे न्यायाचे एकक म्हणजे संपूर्ण जात हे आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने सामाजिक संकेत मोडले तर संपूर्ण जातीला शिक्षा होते. [...] न्यायव्यवस्थेत-कोर्ट-कचेऱ्यात- न्यायाचे एकक व्यक्ती हेच आहे, आणि बराच काळ तसेच राहिले आहे. परंतु आपल्या समाजात व्यक्ती हे एकक नक्कीच नाही.
मोठ्या सामाजिक-राजकीय घडामोडी तर सुरूच असतात, आपण इथं या नोंदीपुरतं रोजच्या जगण्याच्या पातळीवरच बोलू शकतो. त्यातही आपण आपल्या आसपासाकडे बघण्यासाठी कोणतं एकक वापरतो? माणूस सोडून बाकीच्या जीवांसाठी तर असं एकेकट्याचं एकक क्वचितच वापरलं जातं. पाळीव प्राणी असेल घरात, तर त्याला काही नाव देऊन त्याला 'स्वतंत्र' एकक मिळतं, किंवा गोठ्यातल्या गाईला ती संधी मिळेल; पण बाकी कबुतरानं आपल्या खिडकीत शी केली, तर ती एका विशिष्ट कबुतरानं अशी केलेली नसते, सगळ्या कबुतरांना त्याचा साहजिकपणे दोष जातो. किंवा मुंग्या, डास वगैरे मंडळींचं एककही त्यांचा अख्खा वंश एवढंच असतं आपल्या लेखी. बाकीच्या जीवांचं खूपच झेपण्यापलीकडचं होईल, पण माणसांपुरतं तरी एकक व्यक्तीचं असावं, असं जमेल का, असा आंबेडकरांच्या मांडणीतला अर्थ आपल्याला कळतो.

व्यक्ती आणि समाज यांच्यातल्या द्वंद्वाचा उल्लेख त्यांच्या लिखाणात कुठंकुठं सापडतो आणि त्यातून हा दोषाच्या एककाचा मुद्दा कसा आणखी खोलात शोधता येईल, हे अभ्यासकांचं काम आहे. आपण इथं पत्रकारी नोंदी करतो, तर आंबेडकरांनी त्यांच्या 'बहिष्कृत भारत' या वर्तमानपत्रामध्ये १५ जुलै १९२७ रोजी एका लेखात मांडलेलं मत नोंदवू, ते असं:
समाजाच्या अस्तित्वासाठी समाजबंधने जरी आवश्यक असली तरी व्यक्तीच्या परिपोषाला अशी बंधने बाधक होतात. जोपर्यंत समाजाचे मत आणि व्यक्तीचे मत यांत एकतानता असते, तोपर्यंत लढा उत्पन्न होत नाही. परंतु जेव्हा समाजाच्या मतांत आणि व्यक्तीच्या मनांत भिन्नता दिसून येते तेव्हा ओढाताण सुरू होते, आणि व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य जर प्राप्त झाले नाही तर त्याचे नैतिक परिणाम उभयतांवर सारखेच अनिष्ट होतात. त्यातल्यात्यात सामाजिक बंधनाने व्यक्तीचा कोंडमारा झाला म्हणजे ज्या गोष्टी मनापासून कराव्याशा वाटतात, परंतु त्या समाज उघडपणे करू देत नाही, त्याच गोष्टी मनुष्य छपवून करावयास लागतो. अशा प्रकारची सवय माणसास एकदा जडली म्हणजे तो सहजच दांभिक वृत्तीचा, दुहेरी वर्तनाचा, असत्य बोलणारा, अप्रामाणिक मनुष्य बनतो.
('व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही तर त्याचे नैतिक परिणाम व्यक्ती व समाज यांच्यावर सारखेच अनिष्ट होतात', डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता: १९२० ते १९२८, डॉ. आंबेडकर लेखन व भाषणे खंड १९, महाराष्ट्र शासन, २००५: पान १९९).

म्हणजे, त्या वाऱ्यावर उडणाऱ्या म्हातारीप्रमाणे व्यक्ती समाजापासून तुटलेल्या अवस्थेत असावी, असं आंबेडकरांचं म्हणणं दिसत नाही. पण तरी व्यक्तीची तिची तिची ओळख फक्त जन्मजात पारंपरिक ओळखीवर आधारलेल्या एककाची राहू नये, असं त्यांचं म्हणणं दिसतंय. जातीचं तर झालंच, पण बाकी अनेक ओळखींच्या बाबतीत हे लागू होऊ शकतं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याच घडामोडींशी हे जोडून पाहता येतंच. अगदीच प्रत्येक वेळी आपल्याला व्यक्तीच्या एककानं वागणं-पाहणं शक्य नाही. म्हणजे बोलताना 'लोक' असा शब्द न वापरता कोण कुठं बोलू शकतं? कधीतरी ते होतंच. आपलं व्यक्ती असणं ठसवताना आपण असं बाकीचे 'लोक' म्हणतो तो भाग वेगळा. सामाजिक अभ्यासासांठीही तसं सामूहिक एकक आवश्यक राहतंच. पण सर्वसाधारणपणे दोष वगैरे देताना तरी हे एकक असं सरसकट वापरू नये, असं आंबेडकरांच्या चष्म्यातून आपल्याला दिसतं. बाहेर देशाच्या न्यायव्यवस्थेसमोर किमान कागदावर तरी व्यक्तीचं एकक असल्याचं वरच्या उताऱ्यांमधून आपल्याला कळतं, पण आपल्या मनातल्या न्यायव्यवस्थेसमोर तसं होतं का? हा प्रश्न आज आंबेडकरांच्या १२५व्या जयंती निमित्तानं नोंदवून ठेवू.

डॉ. बाबासाहेब आंंबेडकर
[१४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६]

टीप: 'हू वेअर द शूद्राज्'मधला आंबेडकरांचा मूळ परिच्छेद असा:
“We have no direct evidence, but there would be nothing unnatural in supposing that in these conflicts with the Brahmins, the whole Shudra community, not merely a few Shudra kings, was involved. This conflict, it must be remembered, has taken place in the ancient past when life was tribal in thought and in action, and when the rule was that what was done by one individual belonging to the tribe was deemed to be done by the whole tribe. In all ancient societies the unit was the tribe or the community and not the individual, with the result that the guilt of the individual was the guilt of the community and the guilt of the community was the guilt of every individual belonging to it. If this fact is borne in mind, then it would be quite natural to say that the Brahmins did not confine their hatred to the offending kings, but extended it to the whole of the Shudra community and applied the ban against Upanayana to all the Shudras.

Tuesday 5 April 2016

दबा धरून बसलेली वर्तमानाची झाडं

'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'च्या ५ डिसेंबर २०१५ रोजीच्या अंकात 'रायटिंग द प्रेझेन्ट' हा लता मणी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात एका ठिकाणी मणी यांनी म्हटलेलं की:
आपण जिची तीव्र इच्छा धरलेय ती गोष्ट आधीच अस्तित्त्वात आहे, किंवा अस्तित्त्वात नसेल तरी काही काळानं ती अस्तित्त्वात येईल, अशी बतावणी करणं ही सत्तेची लबाडी असते. भविष्याची एक विशिष्ट संकल्पना वर्चस्व गाजवते; आणि तिच्या आगमनासाठीची रंगभूमी एवढंच वर्तमानाचं स्थान उरतं. या दृष्टीत भूतकाळ अवशेषांनी भरलेला असतो, वर्तमान बिनमहत्त्वाचं असतं आणि भविष्य ही एकच गोष्ट महत्त्वाची असते. पण, आपल्याला कितीही नको असलं तरी आपण वर्तमानात जगत असतो. वर्तमानातच भूतकाळ जगला जातो, त्याची पुनरावृत्तीही होते, त्याची कल्पना आणि पुनर्कल्पना केली जाते, त्यावर टीका केली जाते आणि त्याला स्वीकारलंही जातं. आणि या वर्तमानावरच भविष्याला लादलं जातं. त्यामुळं वर्तमानाकडं लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं.
'थिअरी' या गोष्टीविषयी काही बोलावं, त्याच्या कक्षा रुंदावाव्यात, असा हेतू मणी यांनी लेखात नोंदवलाय. त्या स्वतः विद्यापीठीय क्षेत्रातल्या आहेत. इंग्रजीतला 'theory' हा शब्द 'theoria' या शब्दातून आलाय नि त्याचा अर्थ 'निरीक्षणाची कृती' असा आहे, असंही त्यांनी लेखात म्हटलंय. या निरीक्षणाचं वर्तमानाचं भान जागं ठेवण्यासाठी कला इत्यादी गोष्टींचा काही हातभार लागू शकतो का, असा एक धागा त्यांच्या लेखात दिसतो. इतरही काही धागे आहेत आणि त्यावर काही मतभेदही होऊ शकतील. आपल्याला त्यातल्या एकाच धाग्याला जोडून नोंद करायची आहे.

मणी यांनी या त्यांच्या शोधाचा भाग म्हणून दोन 'चलत्-चित्र-कविता' निकोलास ग्रान्डी यांच्यासोबत तयार केलेल्या आहेत. या प्रयोगांची माहिती त्यांनी वरच्या लेखात दिलेय. ग्रान्डी कॅमेऱ्यासोबत काही करू पाहणारे, तर मणी शब्दांसोबत काही करू पाहणाऱ्या. शब्दांची आणि प्रतिमांची एवढी गर्दी उडालेल्या आजच्या जगात या दोघांमधलं नातं तपासावं, त्यात काही प्रयोग करावेत, अशी त्यांची इच्छा त्यांनी नोंदवलेय. आणि त्यातून 'नॉक्टर्न-१' व 'नॉक्टर्न-२' या चलत्-चित्र-कविता तयार झाल्या. ('नॉक्टर्न'ला थेट मराठी प्रतिशब्द/पर्यायी शब्द माहीत असल्यास कळवा. थोडंसं 'रात्रसंगीत' असं काही त्यात येऊ शकेल कदाचित). यातली पहिली कविता खाली पाहता येईल.




या सुमारे पाच मिनिटांच्या चलत्-चित्र-कवितेत रात्रीच्या वेळी शहराच्या परिसरातील काही झाडं-झुडपं अंधुक-स्पष्ट दिसतात, काही किड्यांचे, पक्ष्यांचे किंवा काही माणसांच्या कुजबुजीचे आवाज ऐकू येतात, काही संगीताचे आवाज कानावर पडतात. आणि 'every tree a forest' हे शब्द एकसलग नाही, तर कधी एक शब्द, कधी दोन, कधी एकत्र ओळ असे दिसतात. आपल्या आसपास अस्तित्त्वाची अनेक चिन्हं जागी असतात. सुंदरपणाची किंवा रूढी म्हणून खपवली जाणारी, किंवा आता 'नव-उदारमतवादी' जगात मागास वा बिनमहत्त्वाची ठरणारी, अशी अनेक चिन्हं आसपास वावरत असतात. त्यांना समजून घेणं म्हणजे सूक्ष्म पातळीवरच्या सांस्कृतिक बदलांना समजून घेणं ठरेल, असं साधारण मणी यांचं मत दिसतं. हे सगळं आता आपण जरा बाजूला ठेवू. आणि मणी यांच्या ओळीबद्दल बोलू.

'प्रत्येक झाड (असतं) एक वन', असं मणी यांच्या ओळीचं भाषांतर करता येईल. आणि ती इंग्रजीत वाचतानाच आपल्याला मनोहर ओकांच्या 'झाड' कवितेची सुरुवात आठवू शकेल:
झाड
हे झाड नसतं
एक जंगल
(मनोहर ओकच्या ऐंशी कविता, लोकवाङ्मय गृह)

ओकांच्या कवितेतली मधली ओळ बाजूला काढली तर 'झाड (असतं) एक जंगल' असं होऊ शकेल, पण ते सांगताना झाडाला एक 'नसतेपण' त्यांनी जोडलंय. मणी यांनी तसं न करता झाडाचं वन असणं अधोरेखित करू पाहिलंय. पण तरी या दोन अर्थांमधे काहीतरी समांतर सापडल्यासारखं वाटतंच. आणि मग सदानंद रेग्यांच्या कवितेत-
झाडे आहेत उभी
दबा धरून कैदी श्वासासारखी...
(गंधर्व, पॉप्युलर प्रकाशन)

पण याचा आणि वर्तमानाचा काय संबंध? मणी यांच्या लेखाशी काय संबंध? या प्रश्नांच्या उत्तराचा अंदाज बांधण्यासाठी एखादं उदाहरण घेता येईल. मणी यांनी त्यांच्या लेखात एक रस्ता रुंदीकरणाचं उदाहरण दिलंय, ते जसंच्या तसं न घेता आपण तसंच थोडं जवळपास जाणारं नोंदवू-

म्हणजे समजा की, एखाद्या चौकात रस्त्याच्या कडेला फुटपाथवर मोठंच्या मोठं खोड दिसतंय. आपण त्या चौकातून गाडीनं-गाडीतून तर अनेकदा गेलोय, क्वचित चालतही गेलोय, बहुधा तिथं मोठं झाड असल्याचं आपल्याला कळलं असेल किंवा नसेल, आणि अचानक एखाद्या दिवशी सावली खूप कमी दिसली, तर मग कदाचित आपल्याला लक्षात येईल की, फांद्यांची काही काटछाट झालेय. किंवा कदाचित कधीतरी अख्खं झाडही रस्ता रुंदीकरणासाठी हटवावं लागू शकेल. त्यासाठी मग कायद्याचा अडसर. आता समजा की, ते चिंचेचं झाड आहे. दोनशे वर्षं जुनं. म्हणजे हा चौक चौक होण्याआधीपासूनच ते तिथं असणार, तर तरीसुद्धा आपल्याला ते लक्षात आलं नव्हतं, असं होऊ शकतं की नाही? किंवा आपण रोज एखाद्या विद्यापीठात जाताय, तिथं मुख्य इमारतीचं बांधकाम सुरू असलेलं आपल्याला दिसतं, पण समोरच कठड्याजवळ असंच शेकडो वर्षं वय असलेलं एक चिंचेचं झाड खलास होत असलेलं कदाचित दुर्लक्षित होऊ शकतं. चिंचेचं झाड तरी खूप मोठं. पण इतर असे अनेक तपशील वर्तमानात वावरत असतात, पण ते वर्तमानात जाणवतात असं नाही, आपण जाणवून घेतोच असं नाही. मणींना यात अनेक गोष्टी अपेक्षित आहेतसं दिसतं- 'विकास' म्हणजे काय, याचं उत्तर अनेकदा असं भविष्याला वर्तमानावर लादून काढलेलं असतं. देशानं 'महासत्ता' होणं, किंवा अमुक एक आत्मघातकी दहशतवादी कृत्य केल्यावर स्वर्गात जाण्याची शाश्वती, किंवा आपण अमुकएक जीवनशैली स्वीकारणं, यासंबंधीचे अनेक निर्णय असे होत असण्याची शक्यता आहे. किंवा अनेकदा एखाद्या जुन्या संकेतावरची टीका बदलत बदलत टिंगलीसारखी होत जाते आणि भविष्याला वर्तमानावर लादते. भविष्याचा अंदाज घेणं, हे वेगळं; असा अंदाज अजिबात न घेता काही करणं अवघड आहे, पण भविष्याविषयी काही ठोस साचा ठरवून त्यासंबंधीच्या वर्तमानातल्या कामकाजाचं समर्थन करणं, हे थोडं गोंधळाचं ठरतं, असं या लेखातून वाटतं. आणि याच्या दुसऱ्या टोकाला म्हणून पूर्ण भूतकाळाकडं तोंड वळवण्याचाही भाग होतो. त्याचाही एक साचा ठरवून तो वर्तमानावर लादला जातो. तर या पूर्ण भासवल्या जाणाऱ्या काळांचं प्रवाहीपण वर्तमानात थोडंसं जाणवू शकतं.

हे थोडं अस्पष्ट वाटतं. पण ते एकदम सूत्रासारखं ठोस होणंही अवघड आहे. काळांची विभागणी अगदी काटेकोर कप्प्यांमधे करता येणार नाही. (ही विभागणी मणी यांना कशी अपेक्षित आहे, असा प्रश्न आपण त्यांना ई-मेलद्वारे पाठवून ठेवलेला आहे). पण वर्तमानकाळाच्या निरीक्षणाचा मुद्दा बऱ्यापैकी स्पष्ट वाटतो. विशेषकरून रेघेवर वर्तमानपत्रांबद्दल आपण बोलतो तर ते खरंच किती वर्तमानाला धरून असतं, हे तपासण्यासारखं आहे. मणी यांनी वरच्या लेखात एका ठिकाणी म्हटलंय की, गूढ, अनपेक्षितता, स्पष्टता व गुंतागुंत या सगळ्यांना एकाच वेळी सामावून घेऊ शकणाऱ्या शब्द या अपारदर्शक माध्यमात त्यांना रस वाटतो. आणि सध्याच्या युगात जागतिक स्वरूपाचा, घर्षणविरहित संवाद व्हावा यासाठी भाषेला शब्दशः/कोशबद्ध करण्याचा प्रयत्न होतोय, असंही त्यांना वाटतं. त्यामुळे मग या प्रक्रियेत, शब्दाचे त्यांना वाटणारे गुण गळून जातात, असं त्यांना वाटतं. ते गुण अधिकाधिक शोधावेत म्हणून त्यांनी ग्रान्डी यांच्यासोबत हा चलत्-चित्र-कवितांचा घाट घातलेला असावा. 

मराठीत उत्तम कोळगावकर यांची एक कविता आहे:
माती उकरून मुळापर्यंत जाल तर
हाती काहीच येणार नाही

मुळापर्यंत पोचण्याचा रस्ता
फुलातून जातो.

तसं पाहायला गेलं तर माती उकरल्यावरही हाताला काहीतरी लागेलच, मुळं लागतीलच, पण मुळांचा अर्थ त्यात सापडणार नाही, तो कदाचित फुलाकडं बघून सापडेल, असं. मणी यांच्या म्हणण्याचं थिअरीत काय करता येतं, हा आपल्या मर्यादेतला विषय नाहीये. शिवाय वरच्या चलत्-चित्र-कवितांबद्दलही आपल्याला खूप समाधान वाटलं नाही. पण इंटरेस्टिंग वाटलं. आणि हा लेख वाचल्या वाचल्या काही मराठी कवितांच्या भूतकाळात वाचलेल्या ओळी वर्तमानात डोक्यात आल्या, त्या वर्तमानातच परत चाळल्या, आणि ही नोंद करता येईल कधीतरी पुढं, असं वाटलं. लेख डिसेंबरातला आणि नोंद एप्रिलात. ओळी आलेल्या मराठी कविता तर आणखीच जुन्या. दरम्यान, लेख वाचल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये खरोखरच दोन चिंचेची झाडं दिसली, त्यामुळं मग ही नोंद झाली. होतेय ही नोंद. तुम्ही वाचताय. तुम्हाला बाकीची कामंही असतील, त्यात या नोंदीसाठी वेळ काढावा का वाटतोय?

मौज प्रकाशन, २००१. (मुखपृष्ठ: सुभाष अवचट)