Wednesday 26 June 2013

पाऊस : वाचा, पाहा, ऐका

पाऊस कोणाला कसा दिसेल सांगता येत नाही किंवा पावसात कोणाला काय कसं दिसेल सांगता येत नाही. नारायण सुर्वे यांना सरळ पावसाळा आला की काय दिसलं ते त्यांनी 'पावसाळा' नावाच्या कवितेत असं लिहून ठेवलंय :
तुझा उन्मत्त गडगडाट
हाकवित आणतोस किरमिजी, राखी रंगाचे
गुबगुबीत कळप
ओढताना आसूड कडाडतोस
उगारतोस गिलोटीन विजेचे,
दुभंगतात तेही; खालचे रस्ते
रोंरावत धावतो पूर गटारावरून, तुंबतात
घरे, रस्ते, फुगतो समुद्र.
वर येतो सगळा दबलेला गाळ
आणि माझ्या डोळ्यांत पेटतो जाळ
आता ह्या वाटेवरून
दोन पोरांना धरून
ती कशी जाईल?
***
सुर्व्यांच्या कवितेच्या शेवटी दिसणारं प्रश्नचिन्ह उभं राहील एवढा पाऊस आत्ताच्या मोसमात अजून मुंबईत झालेला नाहीये बहुधा. नाहीतर अजून रस्ते असे मोकळे दिसले नसते.

फोटो : स्टीव्ह मॅकरी : मान्सून

फोटो स्टीव्ह मॅकरी यांनी काढलेला आहे. आणि जुना आहे, आत्ताचा नाही, त्यामुळे फसू नका. आणि रस्ते मुंबईतले आहेत, उत्तराखंडमधले नाहीत, त्यामुळेही फसण्यात पॉइन्ट नाही.

सुर्व्यांच्या कवितेतला प्रश्न उत्तराखंडमध्ये उभा राहीला नि हजारेक लोकांना वाट काढता आली नाही. मग अशा मृत्यूंच्या आकड्यांच्या बातम्या आल्या. प्रश्न नक्की काय आहे ते आपल्याला कळू शकत नाही. त्यामुळे त्यावर बोलण्यातही पॉइन्ट नाही.

पाऊस पडला नि पडतोय एवढंच आपल्याला कळू शकतं. आणि नुसतं पाहाणं नि ऐकणं एवढंच आपण करू शकतो.

आता पाहा नि ऐका : ओव्हर टू यू सत्यजित राय-


(Regh found this video on you-tube, but embedding was disabled for this particular video, so readers couldn't watch it here in the post itself and were required to go to the source video to watch. Now we have downloaded the you-tube video (giving courtesy to the source video) and uploaded it here for this post through blogger's video uploading service. Of course all the genuine acknowledgement should go to the original source that is Satyajit Ray.)

Monday 24 June 2013

वसंत तुळपुळे जन्मशताब्दी : एक नोंद

वसंत तुळपुळे
(२० मे १९१३ - १८ ऑक्टोबर १९८७ )
वसंत तुळपुळे यांच्याबद्दल फारशी माहिती नसेल त्या वाचकांसाठी सुरुवातीलाच त्यांच्या प्राथमिक ओळखीचं एक टिपण देऊ :

वसंत तुळपुळे यांचा जन्म २० मे १९१३ रोजी पुणे येथे झाला. शालेय शिक्षण पुण्यात. मुंबईत सिडनहॅम कॉलेजात बी.ए., बी.कॉम. आणि एलएल.बी. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते 'फुल टायमर' कार्यकर्ता होते. १९३५पासून पुण्यात ट्रेड युनियनचे काम ते पाहत होते. १९३६च्या आसपास कम्युनिस्ट पक्षाचं सदस्यत्त्व घेतलं. पक्षातल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून ते नगरला काम करण्यासाठी गेले.  १९३९ - १९४८ तिकडेच. त्या काळात कोपरगावात दुसऱ्या महायुद्धाविरोधात भाषणं दिल्यामुळे दीड वर्षं तुरुंगवास. १९४१ साली तुरुंगातून सुटका. त्यानंतर महागाईविरोधात परिषदा, साखर कामगार संघटनेची उभारणी, खेडोपाडीच्या शेतकऱ्यांचं संघटन, वगैरे कामं केली. १९४२च्या भारत छोडो आंदोलनात कम्युनिस्टांचा पक्षीय धोरण म्हणून सहभाग नव्हता. ते न पटलेल्या मंडळींना नंतर पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे कारवाईला सामोरं जावं लागलं. तुळपुळ्यांनाही या कारवाईत १९४४ साली पक्षातून काढून टाकलं. मग फेब्रुवारी १९४६मध्ये पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची धरपकड झाली, त्यात पुन्हा तुळपुळ्यांना तुरुंगात जायला लागलं. दरम्यान, पुन्हा पक्षधोरणांना विरोध केल्यामुळे पक्षाबाहेर. १९४८ साली शेतकरी कामगार पक्षाच्या बांधणीत सहभाग. १९५२मध्ये पुन्हा कम्युनिस्ट पक्षात. गोवामुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ - हे सगळं मग पुढे इतर डाव्या लोकांप्रमाणे सुरळीत. ट्रेड युनियनमधलं कार्य बराच काळ सुरू होतं. पक्षाच्या राज्य कमिटीवरही विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. १९६४ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षातून फुटून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) वेगळा झाल्यानंतर बरीच समीकरणं बदलली. नि त्यामुळे वैयक्तिक राजकीय पदाबद्दल फारसा रस नसलेल्या तुळपुळ्यांना राजकीय कार्यकर्तेपणापासून तुलनेने लांब राहात वेगळ्या कामात मन गुंतवता आलं. १८ ऑक्टोबर १९८७ साली मृत्यू.

('कॉ. वसंतराव तुळपुळे, कॉ. मालिनीबाई तुळपुळे' या मालिनीबाई तुळपुळे व सक्षम कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि 'लोकवाङ्मय गृहा'ने प्रकाशित (मार्च २०१०) केलेल्या पुस्तिकेच्या मदतीने ही ओळख करून दिली आहे.)

लोकवाङ्मय गृह
कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते वसंत तुळपुळे, हा झाला एक भाग. पहिल्या प्राथमिक ओळखीत आपण त्यांच्या राजकीय कार्यकर्ता असण्याबद्दल थोडक्यात बोललो. आपली नोंद त्याबद्दल फारशी नाही. आपली नोंद आहे ती अनुवादक वसंत तुळपुळे यांच्याबद्दलची. १९६४ सालापासून त्यांना दुसऱ्या कामांमध्ये मन गुंतवला आलं, असं जे वरती म्हटलं ती कामं मुख्यत्त्वे अनुवादाबद्दलची होती. अर्थात त्यांच्या अनुवादक असण्यात त्यांच्या पहिल्या ओळखीमागची भूमिका आहेच. त्यामुळे त्यांनी केलेले सर्व अनुवाद डाव्या विचारसरणीच्या मजकुराचे आहेत. मार्क्सचं 'पॅरिस कम्यून', 'गोथा कार्यक्रमावरील टीका', लेनिनचे 'मार्क्सचे सिद्धांत', 'डावा कम्युनिझम: एक बालरोग', 'शासनसंस्था आणि क्रांती', 'मार्क्स आणि एंगल्सचे धर्मविषयक विचार', मार्क्सचे 'तत्त्वज्ञानाचे दारिद्र्य', अशी तुळपुळ्यांनी केलेल्या अनुवादांची यादी आपल्याला सापडले. यादी सापडली तरी ती अनुवादित पुस्तकं सापडतील असं नाही. कारण, ती मराठीत आहेत! पण तरी दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं तुळपुळ्यांनी अनुवादित केलेलं 'पुराणकथा आणि वास्तवता' हे पुस्तक अजून मिळतं. ते आपल्या वाचनात आलेलं नसल्यामुळे त्याबद्दल बोलण्याऐवजी आपण तुळपुळ्यांच्या सगळ्यात मजबूत कामाकडे वळू. हे मजबूत काम म्हणजे कार्ल मार्क्सच्या 'दास कॅपिटल' या ग्रंथाचा तुळपुळ्यांनी केलेला अनुवाद.

लोकवाङ्मय गृह. आवृत्ती : ६ ऑक्टोबर २०११
मार्क्सच्या 'दास कॅपिटल' या ग्रंथाच्या तीन खंडांचा अनुवाद  तुळपुळ्यांनी केला. 'भांडवला'च्या या तीन अनुवादित खंडांच्या एकत्रित पानांची संख्या साधारण अडीच हजार आहे. आणि ज्यांनी इंग्रजीतून किंवा मराठीतून किंवा कुठल्याही भाषेतून यातल्या एखाद्या मूळ खंडाची काही पानं वाचण्याचा प्रयत्न तरी केला असेल त्यांना हा मजकूर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत नेणं किती अवघड आहे याचा अंदाज येईलच. मुळात त्याचं वाचन हीच एक एवढी अवघड गोष्ट आहे, त्यात ते वाचून पचवणं आणि त्याचा मराठीत अनुवाद करणं, हे महाकाय काम तुळपुळ्यांनी केलं. आणि हे सगळं मराठीत आणण्याचं काम तुळपुळ्यांनी अगदी नेटकेपणाने केलेलं आहे, हे इंग्रजी खंडाशी त्यातला तपशील पडताळून पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं. मराठी वाचकाला कळण्याच्या दृष्टीनेही हा अनुवाद सुटसुटीत आहे आणि मुळातल्या मजकुराशी इमान राखलेलं आहे. (तपशील पडताळण्याचं किंवा अनुवादाबद्दल निरीक्षणं नोंदवण्याचं काम आपण सध्यातरी फक्त पहिल्या खंडाच्या संदर्भातच करू शकतोय, कारण त्याच्याच वाचनाचा अनुभव आपल्याला आहे. पण त्यावरून एकूण अनुवादाचा अंदाज यावा). पहिल्या खंडाच्या पानांची संख्या आहे नऊशे आठ! आकाराने आणि आशयाने या खंडांचं वजन मजबूत आहे. शिवाय, उपयोग-उपयुक्तता, वर्क-लेबर, किंमत-मूल्य अशा कित्येक शब्दांमधले अर्थांचे फरक समजून घेणं, पाच-सहा ओळींची मूळ वाक्यं मराठीत आणताना ती उथळ होणार नाहीत याची काळजी घेणं, काळाच्या संदर्भांचं भान ठेवणं, एवढ्या मोठ्या पसाऱ्यातला एखादा तपशील गाळला जाणार नाही याच्याकडे लक्ष ठेवणं, कित्येक तळटीपा, मूळ लिखाणातली उपहासाची शैली, किंवा एखादी गोष्ट सोपी करून सांगताना मार्क्सने लावलेलं आवश्यक पाल्हाळ - असं सगळं मुळाबरहुकूम करण्यासाठी खूप काळजी घेऊन तुळपुळ्यांना हे काम करावं लागलं असणार. आणि ते त्यांनी केलं. आपल्या नोंदीत आहेत त्यापेक्षा वेगळी निरीक्षणं कदाचित कोणाला सापडू शकतील. पण तुळपुळ्यांच्या कामाच्या चोखपणाबद्दल बहुधा शंका नसावी.

तुळपुळ्यांची आठवण काढताना आपण आणखीही एक बारीक आठवण ठेवायला हवेय, आणि त्यासाठी आपल्याला राम बापट (११ नोव्हेंबर १९३१ - २ जुलै १९१२) यांना बोलवायचंय. बापट यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय :
''एखाद्या सिद्धांताचा अभ्यास करणे ही एक 'एन्गेजमेन्ट' असते. त्या सिद्धांताला भिडावे लागते, संघर्ष करावा लागतो. सिद्धांत बाजूला ठेवून जगता येत नाही. सिद्धांत रचणारे मार्क्स, वेबर, गिडन्स यांसारखे विचारवंत आपल्या विचारांना त्रिकालाबाधित सत्य मानत नाहीत. त्यांच्या मते हवे ते घ्यावे, बाकीचे सोडून द्यावे. परंतु घेताना व सोडताना त्याची कारणमीमांसा द्यावी. याला 'थिअरी' करणे असे म्हणतात.''
('राज्यसंस्था, भांडवलशाही आणि पर्यावरणवाद'. लोकवाङ्मय गृह. २०१३)

बापट यांचं म्हणणं समजून घ्यायला खूपच गोष्टी समजावून घ्यायला लागतील. हे सगळं समजावून घेण्यासाठी आवश्यक सामग्री मराठी भाषेतून उपलब्ध असावी असं तुळपुळ्यांना वाटल्यामुळे असेल, शिवाय त्यांच्या राजकीय निष्ठांचाही भाग असेल, शिवाय त्यांच्याकडे तेवढी भाषिक ताकद होती हेही असेलच, अशा सगळ्यामुळे तुळपुळ्यांनी हे अनुवाद केले असावेत. त्या सामग्रीचं वाचन करण्यासाठी आपण तुळपुळ्यांच्या राजकीय निष्ठांच्या जवळचं असण्याची काहीच गरज नाही. खरंतर तसं नसणंच बरं. पण तुळपुळ्यांनी केलेल्या कामाची किमान आठवण ठेवणं एवढं तरी काम आपण करावं, असं वाटलं म्हणून तुळपुळ्यांच्या आत्ताच्या २० मे रोजी संपलेल्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण 'रेघे'वर ही नोंद करून ठेवली.

बाकी, तुळपुळ्यांच्या श्रम-शक्तीतून तयार झालेल्या 'भांडवल'च्या तीन खंडांच्या या भाषिक क्रय-वस्तूचं उपयोग-मूल्य मराठीच्या संदर्भात किती आहे, याचा पत्ता मार्क्सलासुद्धा लावता येणार नाही - असा ज्योक समजा कोणी केला तर आपण हसायचं की रडायचं?

Tuesday 18 June 2013

जंगलनामा व उत्तराशिवायचा प्रश्न

परवाच्या रविवारी 'लोकसत्ते'च्या 'लोकरंग' पुरवणीतील एका लेखामध्ये आपल्याला ही वाक्यं सापडतात : ''नक्षलवाद ही आजची अतिशय ज्वलंत राष्ट्रीय समस्या आहे. त्यावरचं मराठीतलं पहिलं पुस्तक साधनानं प्रकाशित केलं. हे इतर कुठल्याही प्रकाशकाला सुचलं नाही. अजूनही या विषयावर मराठीत लेखन होण्याची नितांत गरज आहे''.

या वाक्यांमध्ये 'साधना प्रकाशना'च्या ज्या पुस्तकाचा उल्लेख आहे त्याचं नाव 'नक्षलवादाचे आव्हान : दंडकारण्यातील अस्वस्थ वर्तमान'. देवेंद्र गावंडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक.

पण हे नक्षलवादावरचं मराठीतलं पहिलं पुस्तक नसावं. कारण या पुस्तकाची पहिली आवृत्ती ८ जुलै २०११ची आहे. तर 'सुगावा प्रकाशना'ने जुलै २००९मध्ये 'जंगलनामा' हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. हे अनुवादित पुस्तक आहे, आणि आपण बोलतोय त्या लेखात कदाचित मुळातून मराठीत लिहिलेलं पुस्तक अपेक्षित असेल, अशीही शक्यता आहे. याशिवाय, हेमंत कर्णिक यांचं 'कोंडी आदिवासींची आणि नक्षलवाद्यांची' असं एक पुस्तक आपल्याला सापडतं. ते वाचनात आलेलं नसल्यामुळे त्याच्या प्रकाशन तारीखेचा अंदाज नाही. याशिवायही काही मराठी पुस्तकं उडत उडत दिसतात, पण त्याबद्दल काही माहिती आपल्याकडे आत्ता इथे नोंदवायला नाही.

लेखातील सूचनेनुसार या विषयावर अजून लिखाण व्हायला हवंय, आणि त्यात लेखात उल्लेख केलेल्या पुस्तकाबरोबर आणखी दोन पुस्तकांच्या उल्लेखाची भर टाकावी हा नोंदीचा एक हेतू. कर्णिकांचं पुस्तक वाचनात आलेलं नसल्यामुळे त्याबद्दल या नोंदीत काही बोलता येणार नाही. आपण 'जंगलनामा'बद्दल एक बारीक नोंद करू. एकशेचौऱ्याऐंशी पानांचं आणि दीडशे रुपये किंमतीचं हे पुस्तक मूळ पंजाबीत लिहिलेलं. सतनाम या लेखक-पत्रकाराचं हे पुस्तक आता इंग्रजीतही आलेलं आहे. मराठीतील अनुवादासंबंधीचा पहिला गुन्हा हा की, मूळ लेखकाचा उल्लेखही अख्ख्या कव्हरवर कुठेही नाही.

'जंगलनामा' ह्या पुस्तकात काय आहे, याचं पहिलं स्पष्टीकरण नावाखालच्या ओळीतच आहे, 'बस्तरच्या जंगलात'. सतनाम हे डाव्या विचारांच्या चळवळीतले एक ज्येष्ठ गृहस्थ आहेत आणि त्यांना नक्षलवादी चळवळीविषयी आणि आता 'इंडियन कम्युनिस्ट पार्टी-माओइस्ट' यांच्या नेतृत्त्वाखाली जे काही चाललंय त्याबद्दल पूर्ण आस्था आहे, जिव्हाळा आहे. ह्या दृष्टिकोनातून सतनाम बस्तरच्या जंगलात गेले, तिथे माओवादी बंडखोरांसोबत त्यांनी दोनेक महिने काढले आणि तिथला बंडखोरांचा जीवनक्रम, त्यांच्यासोबतच्या बोलण्यातून उलगडलेले संदर्भ यांची एकत्रित मांडणी सतनाम यांनी या पुस्तकात केलेली आहे. हे कशाप्रकारचं पुस्तक आहे याचा अंदाज सतनाम पुस्तकाच्या सुरुवातीलाच 'मनोगता'मधे देतात :

सुगावा प्रकाशन
'जंगलनामा' हे काही जंगलाबद्दलचे संशोधनपर पुस्तक नाही; तसेच ही कल्पनाशक्तीच्या भरारीने निर्माण केलेली, अर्धी सत्य आणि अर्धी काल्पनिक अशी एखादी साहित्यकृती नाही. बस्तरमधील जंगलातील क्रियाशील कम्युनिस्ट गरीलांचे दैनंदिन जीवन आणि तेथील आदिवासींच्या जीवन-परिस्थितीचे हे वर्णन आहे, जे मी माझ्या जंगलयात्रेच्या दरम्यान बघितले. वाचक याला एखाद्या डायरीची पाने किंवा मग प्रवासवर्णन म्हणू शकतील. यातील पात्रे हाडामांसाची बनलेली खरीखुरी माणसे आहेत, जी आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवू पाहात आहेत. सरकारकडून बंडखोर आणि अटकपात्र ठरविलेली ही पात्रे नवीन युग, नवीन जीवन साकार करू पाहात आहेत. इतिहासात त्यांच्यासाठी काय वाढून ठेवले आहे हे तर येणारा इतिहासच सांगू शकेल; पण इतिहासाला ते कोणते वळण लावू पाहत आहेत हे त्यांच्या शब्दांतच मांडले आहे. आपल्या ध्येयासाठी जिवाची बाजी लावायला तयार असलेली ही मंडळी कशाप्रकारचे जीवन जगत आहेत याचा अंदाज वाचक हे पुस्तक वाचून सहज लावू शकतील.
- सतनाम
ऑक्टोबर २००३

सतनाम यांचा हेतू इतका सरळ आहे, त्यामुळे त्यात शंकेला जागा नाही. म्हणजे आपल्यासोबत असलेल्या चाळिशीपर्यंत पोचलेल्या आदिवासी माणसाला रेल्वे कशी असते हे माहीत नाही आणि तो माओवादी 'नव-लोकशाही'च्या निर्मितीसाठी शस्त्र घेऊन का लढतोय? किंवा इथले अर्ध्याहून अधिक मृत्यू मलेरियाने होतायंत, यावर केवळ काही महिन्यांसाठी बाहेरून येणारा सेवाभावी डॉक्टर करून करून काय करू शकेल? 'सध्याच्या परिस्थितीत आदिवासी औषधांची किंमत देऊ शकत नाहीत म्हणून त्यांना आरोग्यसेवा उपलब्ध नाही' असं सतनाम लिहितात. पण माओवादी नियंत्रणाखालच्या परिसरामध्येही ही परिस्थिती अशीच का आहे? तिथेही औषधाच्या किंमतीवरच आरोग्यसेवा अवलंबून आहे का? आणि असेल तर तसं का आहे? असे प्रश्न ते मांडतही नाहीत आणि त्यामुळे उत्तरं शोधण्याची गरजही उरत नाही. हेच प्रश्न आरोग्याशिवाय अनेक बाबतीत विचारता येतील. प्रस्थापित लोकशाही सरकार क्रूरपणे वागतं आणि आत्ता बंडखोर असलेलं माओवादी सरकार आदिवासींना सहानुभूती दाखवतं, वगैरे मुद्दे पुस्तकात येतात, पण त्याची किमान तपासणी त्यात नाही. म्हणून मग पुस्तकाचा ब्लर्बही असा आहे :
श्रीकांत आणि त्याच्या सारख्यांचे जग हे एक वेगळेच जग आहे. एक लहानसे जग, जे त्यांनीच निर्माण केले आहे, ते सर्वत्र पसरू पाहत आहेत. मी अनेक वेळा विचार केला की, इतक्या छोट्या शक्तीच्या आधारे ते सर्वत्र कसे पसरू शकतील? एक छोटीशी शक्ती लाखो करोडो लोकांवर प्रभाव कसा पाडू शकेल? पण त्यांचा विश्वास आहे की हे अशा प्रकारेच होईल. इतिहास अशा प्रकारेच पुढे जाईल. ते स्वतःला एका नव्या भविष्याचे बीज मानतात. ते बीज उगवत आहे, ज्याची भविष्यात वाढ होऊन विशाल वृक्षात रूपांतर होणार आहे. त्यांच्या समुद्रासारखा अथांग आत्मविश्वास आहे. त्यांच्या आत्मविश्वासाची ही परीक्षा आहे. हा आत्मविश्वास असा की जो कोणत्याही अडचणींवर मात करण्यासाठी सदैव तयार असतो. त्यांच्याकडे इतिहासातील अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ते या उदाहरणांमध्ये एका उदाहरणाची भर घालू इच्छितात. आमचे ध्येय सर्वोच्च आहे. मानवतावादी आहे असे ते म्हणतात. मानवी इच्छा आकाशांच्या नुसार आहेत. ध्येयाचे पावित्र्य आणि अटळतेमुळे त्यांना मृत्यूच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिम्मत मिळाली आहे. ते मृत्यूची पर्वा करत नाहीत. म्हणून आयुष्य समाधानात जगत आहेत. हे जगणेही मोठे आश्चर्यकारक आहे. जेवण चांगले नाही, आजारापासून संरक्षण नाही, सुख नाही, सोयी-सवलती नाहीत. वेगळ्याच प्रकारचे अन्न. आज चूल इथे तर उद्या तिथे. परवा कुठे ते ठाऊक नाही. कदाचित उपाशीही रहावे लागेल. असे हे लोक, अशी त्यांची स्वप्ने आणि असे त्यांचे जीवन.

असा हा 'जंगलनामा' आहे. गावंडे यांच्या 'नक्षलवादाचे आव्हान' या पुस्तकामध्ये जे येतं ते साधारपणे वृत्तपत्रांमधल्या बातम्यांमधून जे येतं ते. या माहितीत साधारणपणे 'आव्हान' म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते वरकरणी दिसतं तेच. म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणावर तो वरकरणी भागच येतो, असं वाटतं. पण तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करावं असं नाही, म्हणजे माहितीच्या पातळीवर या पुस्तकातून हाताला खूप गोष्टी लागू शकतात. आणि विषयाची एकूण गुंतागुंत लक्षात घेता एक टप्पा म्हणून ह्या पुस्तकाला महत्त्व असावं. शिवाय, 'नक्षलवादाचे आव्हान' ह्या पुस्तकात माओवादी प्रवक्ते आझाद यांचा लेख, नक्षलवादावर संशोधन प्रकल्प केलेल्या बेला भाटीया यांचा लेख, असाही ऐवज आहे. हे दोन्ही 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'मधले ऐवज आहेत. दुसऱ्या बाजूला 'जंगलनामा'मधली पर्यायी-माहितीही वरकरणी दिसते तशीच आहे. उलट, ह्या पुस्तकातली माहिती जास्तच अशा प्रकारातली आहे. त्यामुळे अशा करूण परिस्थितीत वाचकांनी काय करावं? हा पुन्हा आपल्याला उत्तराशिवायचा प्रश्नच सापडला. अशा प्रश्नांना उभं करण्यातूनच काही उत्तर निघतं का, असा प्रयत्न आपण 'रेघे'वर आपल्या मर्यादेत करतो आहोत. ही नोंद हाही त्याचाच भाग.

Tuesday 11 June 2013

साने गुरुजी : माध्यमं

साने गुरुजी
साने गुरुजी : २४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५०

साने गुरुजींनी 'साधना' साप्ताहिकाचा पहिला अंक १५ ऑगस्ट १९४८ रोजी प्रसिद्ध केला. या अंकातल्या संपादकीयातला शेवटचा भाग 'रेघे'वर आज साने गुरुजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नोंदवूया. मूळ पूर्ण संपादकीय इथे सापडेल.
***





साधना
स्वराज्य आले. गांधीजी मागील वर्षी म्हणाले, ''स्वराज्य आले म्हणतात, मला तर ते दिसत नाही. भाऊ भावाचा गळा कापीत आहे. हे का स्वराज्य? स्वराज्य म्हणजे का माणुसकीचा अस्त, संस्कृतीला तिलांजली?'' स्वराज्याच्या महान साधनाने आपण मानव्य फुलवायचे आहे. संस्कृती समृद्ध करायची आहे. त्यासाठी अखंड साधना हवी. जीवन अनेकांगी आहे. जीवनाच्या क्षेत्रात, सर्व व्यवहारांत आपण साधकाच्या वृत्तीनेच वागण्याची धडपड केली पाहिजे. यालाच पुरुषार्थ म्हणतात. उत्तरोत्तर अधिक चांगले होण्याची खटपट करणे. एका अमेरिकन लेखकाने 'पुन्हा धर्माकडे' म्हणून एक सुंदर अनुभवजन्य पुस्तक लिहिले आहे. त्यांत त्याने 'बेटरिझम' असा शब्द योजिला आहे. 'बेटरिझम' म्हणजे माणसाने मी चांगला होईन, अधिक चांगला होईन, हा ध्यास घेणे. चांगले कसे होता येईल? जीवन अधिक समृद्ध, अंतर्बाह्य संपन्न कसे करता येईल? 'मी आणि माझे' हे तुणतुणे दूर करून दुसऱ्यांच्या सुखदुःखाचा जेव्हा आपण विचार करू, सेवा करू, अधिक लोकांशी मिसळायला लागू; तेव्हा दुसऱ्याचे चांगले ते घेऊ, सर्वांचे स्वागत करू, अधिक चांगले होण्याचा मार्ग लाभेल. भारतीय जनतेला हे शिकायचे आहे. येथे अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक जातिजमाती, अनेक धर्म यांचा संगम आहे. विनोबाजी दिल्लीला गांधीजींच्या चौथ्या मासिक श्राद्धदिनी म्हणाले, ''रामराज्याचे वर्णन तुलसीदासांनी पुढीलप्रमाणे केले आहे :
वैर न कर काहू सन कोई    राम-प्रताप विषमता खोई
वैराचा अभाव आणि विषमता नसणे, ही रामराज्याची दोन लक्षणे होत. हीच व्याख्या गांधीजींनीही केली होती. पण त्यांनी पाहिले, की तिला क्वचितच तुलना असेल. हे पाहून स्वाभाविकच गांधीजी दुःखी राहात. स्वराज्याची ही दोन्ही लक्षणे पूर्णपणे आपण सिद्ध केली पाहिजेत. हिंदुस्थानात इतके विविध समाज राहात आहेत; ते मित्र-भावाचा पाठ शिकण्यासाठी आहेत, असे आपण समजावे. आपल्या उदार संस्कृतीचा हा बोध जर आपण घेतला तर वैरभावही नाहीसा होईल आणि विषमताही नष्ट होईल.''

वैरभाव नि विषमता नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे. हे साधना साप्ताहिक या ध्येयाने जन्मत आहे. किती तरी दिवसांपासून हे साप्ताहिक निघेल निघेल म्हणून मित्र वाट पाहात होते. मध्यंतरी सायंदैनिक 'कर्तव्य'च क्षणभर जन्माला आले. ते बंद करून त्याचेच प्रातःदैनिक करण्याची आकांक्षा होती. स्वतःचा छापखाना असल्याशिवाय दैनिक काढणे अशक्य. म्हणून त्या खटपटीला लागलो. कसाबसा छापखाना उभा केला आहे. परंतु दैनिक आज नीट सुरू करण्याइतकी शक्ती नाही. तेव्हा सध्या साप्ताहिक 'साधना' सुरू करून समाधान मानीत आहे. हे जर स्वावलंबी झाले, छापखानाही जरा वाढला, सुरळीत चालू लागला, साधनसामुग्री जर वाढली तर 'कर्तव्य' दैनिक केव्हा तरी सुरू करण्याची मला तळमळ तर आहे. तोवर मित्रांनी या साप्ताहिकालाच आधार द्याव, नि प्रभूने आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना आहे.

साधनेचे स्वरूप
या साप्ताहिकाचे स्वरूप कसे असेल? निरनिराळ्या भाषांतील मोलवान प्रकार येथे तुम्हांला दिसतील. भारतातील प्रांतबंधूंची येथे प्रेमाने ओळख करून देण्यात येईल. देशातील नि जगातील नाना संस्कृतींचे रंग नि गंध तुम्हांला दाखवण्यात येतील, देण्यात येतील. नाना धर्मांतील सुंदरता, उदात्तता यांची येथे भेट होईल. शेतकरी, कामगार, यांच्या जगातही आपण येथे वावरू. त्यांचे प्रश्न चर्चू, त्यांची स्थिती समीक्षू. शिक्षणाच्या क्षेत्रातही आपण जाऊ. मुलांच्या संगतीत रमू. ती आपल्याला गोष्टी-गंमती सांगतील; आपण त्यांना सांगू. समाजात अनेक अज्ञात माणसे सेवा करून समाजवृक्षाला ओलावा देत असतात. त्यांच्या हकीगती येथे येत जातील. कधी येथे प्रश्नोत्तररूप महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा आढळेल. गंभीर विषयांवरचे निबंध येतील. सुंदर गोष्टी वाचायला मिळतील. कधी आपण साहित्याच्या मंदिरात दर्शनाला जाऊ, कधी विज्ञानाला पराक्रमी कथा ऐकू. कधी निर्मळ समाजवादाचे उपनिषद वाचू. मनात कितीतरी आहे. जेवढे जमेल तेवढे करीन. ते गोड करून घ्या. 'कर्तव्य' लवकर बंद पडले. 'साधना' साप्ताहिकाची तरी काय शाश्वती? प्रभूची इच्छा प्रमाण. ज्याला दोन दिवसच सेवा करता आली, त्याची तेवढीच गोड माना. असे नका म्हणू, हे आरंभशूरत्व आहे. म्हणा, की ही धडपड करतो. राहवत नसते म्हणून माणूस धडपड करतो; परंतु कोणी काही म्हणतो. आशेने 'साधना' साप्ताहिक आज स्वातंत्र्याच्या प्रथम वाढदिवसाच्या सुमुहूर्ताने मी सुरू तर करीत आहे. जोवर शक्ती असेल तोवर 'साधना' टिकेल. आसक्ती कशाचीच नको.

Monday 3 June 2013

प्रॉपगॅन्ड्याबद्दलचा प्रॉपगॅन्डा : एक प्रदर्शन

'प्रॉपगॅन्डा' या संकल्पनेविषयी आपण 'रेघे'वर मागे काही नोंदी केलेल्या आहेत. एडवर्ड बर्नेसच्या 'प्रॉपगॅन्डा' ह्या पुस्तकाबद्दलही एक नोंद आपण केलेली आहे. आज परत तोच विषय आलाय त्याचं कारण जरा लांबचं आहे. द ब्रिटीश लायब्ररी, ९६ यूस्टन रोड, लंडन... या पत्त्यावर गेल्या शुक्रवारी एक प्रदर्शन सुरू झालंय, त्याचं नाव आहे - 'प्रॉपगॅन्डा: पॉवर अँड पर्स्युएजन'. या प्रदर्शनाच्या निमित्ताने, त्या प्रदर्शनातल्या चारेक चित्रांसकट ही लहानशी नोंद 'रेघे'वर करून ठेवूया.

या प्रदर्शनाबद्दल 'अल-जझीरा'वर आलेल्या लेखात म्हटलंय की, पुरातन काळातल्या ग्रीक सम्राटांची चित्रं कोरलेल्या नाण्यांपासून सध्याच्या सोशल मीडियाच्या काळापर्यंत अनेक पातळ्यांवरचा, सत्ताधाऱ्यांकडून केला जाणारा प्रॉपगॅन्डा या प्रदर्शनात पाहायला मिळतो. अर्थात या संकल्पनेचा केवळ नकारात्मक भाव दाखवणाऱ्याच नव्हे तर सकारात्मक भाव दाखवणाऱ्या वस्तूही या प्रदर्शनात आहेत.

त्यामुळे स्वतःचं शौर्य युद्धभूमीतून रक्तबंबाळपणे दिसेल ते दिसेल, पण हे शौर्य सुंदर पण आहे असं कसं दाखवता येईल, या विचारातून नेपोलियनने काढून घेतलेलं चित्र या प्रदर्शनात आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याबरोबरच आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या अलीकडच्या काळातल्या काही जाहिरात मोहिमांमधली चित्रंही या प्रदर्शनात आहेत. प्रॉपगॅन्डाविषयक काही विधानांची चित्ररूपंही या प्रदर्शनात आहेत. चित्रांशिवाय या प्रदर्शनात व्हिडियोही आहेत, अशी माहिती आपल्याला 'अल-जझीरा'वरच्या लेखातून मिळते.

या प्रदर्शनातली तीन उदाहरणं पाहू.

एक- २००३मध्ये इराकवर अमेरिकेने लादलेल्या युद्धात अमेरिकी सैनिकांना फावल्या वेळात खेळण्यासाठी सद्दाम हुसेन व त्यांच्या सहकाऱ्यांची चित्रं छापलेले पत्ते देण्यात आले होते, हे पत्तेही या प्रदर्शनात आहेत; ही चित्रं पत्त्यांवर छापण्याचा हेतू हा की आपल्या शत्रूंचे चेहरे सतत दृष्टीच्या पट्ट्यात राहावेत. हे पत्ते असे :


दोन-
पहिल्यांदा पहिल्या महायुद्धावेळी, मग तेव्हा दिसलेल्या यशामुळे दुसऱ्या महायुद्धावेळी नि अशा दोन महायशांमुळे व्हिएतनामच्या युद्धावेळी आणि नंतरही काही वेळी वापरण्यात आलेलं 'अंकल सॅम'चं पोस्टरही प्रदर्शनात आहे. सैन्यातल्या भरतीसाठी अमेरिकी नागरिकांना आवाहन करणारं हे पोस्टर तसं आता बरंच प्रसिद्ध झालंय. आणि केवळ युद्धखोरीपलीकडे जाऊन एकूण अमेरिकेच्या विविध पातळ्यांवरच्या जागतिक दादागिरीचं नि प्रभावाचं प्रतीक बनलंय :

तीन- आता दुसऱ्या एका सत्ताधीशाकडे वळू. माओ त्से-तुंग. चीनमध्ये आधी सत्ता काबीज केल्यानंतर १९६६ साली माओ साहेब 'सांस्कृतिक क्रांती' घडवायला निघाले. तेव्हा, म्हणजे त्यांचं वय ७४ वर्षं होतं तेव्हा, रंगवण्यात आलेलं एक पोस्टर या प्रदर्शनात पाहायला मिळेल. १९२२ साली अन्युआन इथे खाणमजुरांच्या संपाचं नेतृत्त्व करून क्रांतीची ज्योत माओ यांनी एकहाती पेटवली, असं सांगणारं तरूण माओंचं हे चित्र. सांस्कृतिक क्रांतीच्या काळात हे चित्र अफाट गाजलं :



हे झाले राजकीय सत्ताधारी लोक आणि त्यांनी विविध साधनं वापरून आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, त्यांच्यावर लादण्यासाठी, त्यांना भुलवण्यासाठी केलेल्या युक्त्या. या सगळ्यात माध्यमांची भूमिका फारच महत्त्वाची. किंबहुना वृत्तमाध्यमं म्हणजे पत्रकारिता असते की प्रॉपगॅन्डा असतो, हे कसं ओळखायचं हा आत्ताच्या काळातल्या गोंधळातला एक महत्त्वाचा मुद्दा.

'अल-जझीरा'वरच्या ज्या लेखाचा संदर्भ आपण दिलाय, त्यात जॉन पिल्जर यांचं एक विधान दिलंय : ''आता आपण बातम्या लावल्या आणि त्यांचे स्त्रोत पाहिले, तर आपल्याला असं लक्षात येतं की सरकारकडून, हितसंबंध गुंतलेल्यांकडून आणि महत्त्वाच्या नि अधिकारी पदावरच्या व्यक्तींकडून जे सांगितलं जातं ते वरवरती दिसतं तसंच (पत्रकारांनी) घेतलेलं असतं. मी ज्याला आधुनिक सूक्ष्म प्रॉपगॅन्डा असं म्हणेन त्याचा मुख्य स्त्रोत (वृत्तमाध्यमं) हा आहे.'' ['रेघे'वर यापूर्वी पिल्जर येऊन गेलेले आहेत].

पिल्जर ज्या सूक्ष्म प्रॉपगॅन्ड्याबद्दल बोलतायंत, त्यात आणि आपण वरती जी चित्रं पाहिली त्यातल्या प्रॉपगॅन्ड्यामध्ये काहीसा फरक आहे. म्हणजे सरकारी जाहिराती या सरळच काही सांगू पाहत असतात आणि ते तुलनेने स्पष्ट असतं. पण आपण ज्या गोष्टी बातम्या म्हणून वाचायला जातो, त्या गोष्टी प्रॉपगॅन्डा म्हणून कोणी हितसंबंधांसाठी, आर्थिक संबंधांसाठी पेरलेली माहितीच असेल तर काय करायचं?

हे एकूण माध्यमांबद्दलचं किंवा पत्रकारितेचंही समजा बाजूला ठेवलं, तरी स्वतःकडेच पाहिल्यावर काय दिसतं? फेसबुकवर झुकेरबर्ग आणि कंपनीने दिलेल्या फुकटच्या सल्ल्याला फशी पडून आपण कशाकशाला 'लाइक' करतो आणि मुळात आपल्याला हा सल्ला कशाला देतात हे लोक, असा काही विचार केला तर मग असं दिसतं की, आपण सगळेच ह्या प्रॉपगॅन्ड्यात सामील आहोत. आपण आपली खाजगी माहिती एका खाजगी कंपनीला देतो, ती माहिती आणखी हितसंबंध असलेल्यांना पुरवली जाते आणि मग आपल्यापर्यंत पोचतो प्रॉपगॅन्डा.

याशिवाय अनेक प्रकार सांगता येतीलच. आपण नाही का, आपल्या नैतिकतेचा नि अभिरुचीसंपन्नतेचा नि मानवतेचा नि अजून कशाकशा वृत्तीचा प्रॉपगॅन्डा करत सोशल मीडियावर! त्यासाठी असतातच तयार पुरवलेली चिन्हं. तर हे सगळं असं आहे.  म्हणजे कसं, ते अमेरिकी राज्यशास्त्रज्ञ हेरॉल्ड लासवेलनी ऑगस्ट १९२७ सालच्या त्यांच्या 'द थिअरी ऑफ पॉलिटिकल प्रॉपगॅन्डा' या नावाच्या पाच पानी लेखातही सांगितलेलं आहे. या लेखात लासवेल यांनी केलेली प्रॉपगॅन्ड्याची व्याख्या अशी : प्रभावी चिन्हांचा (सहेतूक) वापर करून सामूहिक वृत्तीचं व्यवस्थापन म्हणजे 'प्रॉपगॅन्डा'. या विधानाचंही एक ग्राफिक स्वरूपाचं काही चित्र आपण बोलतोय त्या प्रदर्शनात आहे. त्यात लासवेल यांच्या मूळ लेखानुसार विधान थोडं वाढवून घेतलेलं असावं. [लासवेल यांचाही संदर्भ 'रेघे'वर यापूर्वी नोम चोम्स्कींच्या लेखात येऊन गेलाय]. तर, लासवेल यांचं हे विधान दुकानांमधल्या काचेच्या कपाटांमध्ये उभ्या असतात तसल्या माणसांच्या पुतळ्यावरती दिलेलं दिसतंय. कदाचित 'व्यक्ती'भोवती फिरणाऱ्या माध्यम व्यवहारामुळे ते तसं केलं असण्याची शक्यता आहे :

फोटो : क्रिएटिव्ह रिव्ह्यू

तर असं हे प्रॉपगॅन्ड्याबद्दलचा प्रॉपगॅन्डा करणारं प्रदर्शन नि त्याचा प्रॉपगॅन्डा करणारी ही नोंद. सतरा सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे. ज्यांना शक्य असेल त्यांना जाऊन येता येईल. अठरा वर्षांवरच्या व्यक्तीसाठी प्रवेश शुल्क आहे नऊ पौंड. आणि त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मोफत प्रवेश.
***

लटिके हासे   लटिके रडे। लटिके उडे   लटिक्यापे।।
लटिके माझे   लटिके तुझे। लटिके ओझे   लटिक्याचे।।
लटिके गाये   लटिके ध्याये। लटिके जाये   लटिक्याचे।।
लटिका भोगी   लटिका त्यागी। लटिका जोगी   जग माया।।
लटिका तुका   लटिक्या भावे। लटिका बोले   लटिक्यांसवे।।
- तुकाराम
***