Thursday 10 September 2020

हाक अयोध्येची आणि टाकीबंद स्मृती

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. इसवी सन १५२८मध्ये इथलं मूळचं राम मंदिर बाबराच्या हुकुमावरून उद्ध्वस्थ करण्यात आलं, असं म्हणत देशातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन उभारलं, त्या कार्यक्रमाची सांगता ६ डिसेंबर १९९२ रोजी त्या ठिकाणी असलेली बाबरी मशीद पाडून झाली. यानंतर उभ्या राहिलेल्या न्यायालयीन खटल्याचा अंतिम निकाल ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानुसार वादग्रस्त अडीचेक एकराच्या जागेवर ट्रस्टद्वारे राम मंदिर उभारण्यास सांगण्यात आलं, आणि मशिदीसाठी दुसरी पाच एकरांची जमीन उपलब्ध करून द्यावी, असं न्यायालयाने सांगितलं. न्यायालयीन विजय पुरेसा वाटला नाही, म्हणून कदाचित पंतप्रधानांच्या उपस्थितीत ५ ऑगस्टचा विजयोत्सवासारखा पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. विविध दूरचित्रवाणी-वाहिन्यांवरून, समाजमाध्यमांवरून, आपापल्या मोबाइलांवरून अनेकांनी या उत्सवाला पूरक छायाचित्रं, व्हिडिओ असं सगळं फिरवलं. 

बाबरी मशीद पाडली, त्यासंबंधीच्या प्रकरणात अजून कोणालाही शिक्षा झालेली नाही. असा खटला सुरू असतानाही त्यामागच्या घडामोडींना अधिकृतता देण्याचा, किंबहुना भारताच्या स्वातंत्र्यचळवळीइतक्याच या घडामोडी महत्त्वाच्या होत्या, असा एक इतिहासच रचण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी भाषणातून केला. पण या सगळ्याची सुरुवात खूप आधीपासून झाल्याचं आपण जाणतोच. या सगळ्याबद्दल बरंच काही बोललं गेलेलं आहे, अनेक रास्त गोष्टीही बोलल्या गेल्या आहेत आणि अजूनही काही ना काही बोललं जाताना दिसतं. त्यातले मुद्दे गृहीत धरून इथे काही नोंदवायचा प्रयत्न केला आहे. 

आधुनिक प्रतीक

पाच ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधानांनी पुढील विधानं केली:
"साथीओं, श्री राम का मंदिर, हमारी संस्कृती का आधुनिक प्रतीक बनेगा. और मैं जान बुझकर यहाँ आधुनिक शब्द का प्रयोग कर रहां हूं. हमारी शाश्वत आस्था का प्रतीक बनेगा. हमारी राष्ट्रीय भावना का प्रतीक बनेगा. और ये मंदिर करोडोंं करोड लोगों की सामूहिक संकल्पशक्ती का भी प्रतीक बनेगा. ये मंदिर आनेवाली पिढींओं को आस्था, श्रद्धा, और संकल्प की प्रेरणा देता रहेगा."
'आधुनिक' हा शब्द पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक वापरला आहे. आधुनिक हा शब्द 'अधुना' या शब्दावरून आल्याचं आपल्याला कळतं. 'अधुना' म्हणजे 'आत्ताचं', 'या क्षणाचं'. तर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आता पंतप्रधान असलेल्या या व्यक्तीच्या लेखी आपल्या सर्वांच्या 'आज'चं प्रतीक म्हणजे हे राम मंदिर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद आणि त्यांच्या इतर कमी-अधिक महत्त्वाच्या संघटनांच्या पुढाकाराने पूर्णत्वाला गेलेलं हे प्रतीक आहे. त्यांची 'काल'च्या खऱ्या-खोट्या वास्तवाविषयीची/अवास्तवाविषयीची, इतिहासाविषयीची कल्पना आपल्या 'आज'च्या वास्तवावर प्रभाव गाजवणार, गाजवते आहे, याचा हा बहुधा सर्वाधिक अधिकृत स्थानावरून झालेला उच्चार होता.

रामायण हे कथन अनेक ठिकाणी पसरलेलं आहे, त्याच्या अनेक आवृत्त्या आहेत, विविध दृष्टिकोनांमधून या कथनाची पुनर्रचना विविध ठिकाणी झाल्याचं सापडतं, इत्यादी सर्व तपशील आपल्याला इतरत्र वाचायला मिळतो. हे कथन वेगवेगळ्या आणि काही वेळा परस्परविरोधी दृष्टीने मांडलं गेलेलं आहे, एवढं तरी आपल्याला कबूल होऊ शकतं. यातल्या एकाच कथनाला एकसाची स्वरूपात अधिकृतता देण्याचा प्रयत्न अयोध्येतल्या 'राम मंदिरा'ने होईल. एका अर्थी हा हिंदू लोकांच्या, किंवा हिंदू प्रदेशात वावरलेल्या विविध लोकांच्या बोलण्याचालण्यातला 'राम' नव्हेच. अधिक मुख्यप्रवाही झालेल्या रामायणामध्ये रावण हा खलनायक असला तरी त्याची पूजा करणारे, रावणाचा मुलगा मेघनाद याची पूजा करणारे, रामावर टीका करणारे, रामावर टीका न करणारे पण अशी टीका झाली तर ऐकून घेणारे- असे विविध समूहसुद्धा आहेत- ही जाणीव या घडामोडींमध्ये दडपली जाईल. (उदाहरणादाखल दोन बातम्या: आदिवासी संस्कृतीच्या मेळघाटात मेघनाथ यात्रेची धूम, लोकमत, २४ मार्च २०१९ । महिषासुरावर भुरळ घालणारी देवी म्हणून दुर्गेकडे पाहणारी एक परिघीय जमात- असूर, इंडियन एक्सप्रेस, ८ डिसेंबर २०१६. आपण जाणीवपूर्वक इथे बातम्यांचे संदर्भ दिले आहेत. पण या विषयाबाबत आपापल्या इच्छेनुसार विविध संदर्भ तपासता येतील).

प्रतीक, पाणी आणि परंपरा

अनिकेत जावरे यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे:
ब्राह्मणी आणि दलित परंपरेत व प्रतिगामी विचारात भारतीय हिंदू परंपरा अचल कशी आहे, याचा आग्रह स्पष्टपणे दिसून येतो. एका परंपरेत हजारो वर्षं चालत आलेले मौखिक व इतर ज्ञान, पावित्र्य, शुचिता इत्यादी, तर दुसऱ्या परंपरेत तितक्याच वर्षांचे शोषण, अत्याचार इत्यादी. हीच अनैतिहासिक प्रतिमा सामाजिक विचारविश्वात आणि व्यवहारात आजही सापडते. 
('मराठी दलित काव्य : एक पुनर्विचार', काळे पांढरे अस्फुट लेख
हर्मिस प्रकाशन, पहिली आवृत्ती- १ एप्रिल २०११: पान ६)

परंपरा प्रवाही असते, याकडे पाठ फिरवून 'आज'चं होणं बरं नाही, असा याचा अर्थ आपल्याला लावता येतो. निसर्गातल्या वाहत्या पाण्याचं रूपक परंपरेला लावणं बरं असावं. एका कादंबरीत पुढील ओळी सापडतात:  कधीकधी टाकीत, बाटलीत, बादलीत पाणी साठवायला लागतं गरजेनुसार. पण सारखं तसंच ठेवून दिलं तर कसं होईल पाण्याचं? तसंच गोष्टीचंही. खुली नि खुळी राहील तितकंच बरं.

आपण पिण्यासाठी पाणी साठवतो, ती वेगळी गोष्ट. साठवलेलं पाणी वापरतो, पितो, यातून त्यात प्रवाहीपणा राहतोच. पण पंतप्रधानांनी मांडलेलं प्रतीक आज कसं वापरायचं आहे? गांधींना अपेक्षित असलेलं रामाचं प्रतीक त्यांच्या दृष्टीने आज वापरण्यासारखं होतं. आंबेडकरांच्या लेखी 'रामा'चं प्रतीक आज वापरण्यासारखं नव्हतं, तसं आवाहनच त्यांनी केलं, बावीस प्रतिज्ञांमध्येही त्याचा उल्लेख केला आणि हिंदू धर्म सोडला. या व्यतिरिक्त काही समूह पूर्वीपासूनच रामाच्या विरोधी असलेली प्रतीकं वापरत आलेली आहेत, पूजनीय मानत आलेली आहेत, हे आपण वर नोंदवलं आहेच. पण मोठा समूह राम हे प्रतीक वापरतो, त्यांनी काय करायचं, हा प्रश्न रूढ सेक्युलर, पुरोगामी, डाव्या, इत्यादी विविध प्रवाहांनी कितपत हाताळला, हेही परत विचारात घेता येईल, असं वाटतं. या प्रवाहांमध्येही बरेच फरक आहेत, पण तो आत्ताचा विषय नाही. पण राम हे प्रतीक वापरणारा समूहसुद्धा एकसाची नाही. याचा एक दाखला म्हणून ट्विटरवरचा ५ ऑगस्टचा एक छोटा संवाद नोंदवूया:

राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक सुहास पळशीकर यांना ५ ऑगस्ट रोजी ट्विटरवर एका व्यक्तीने 'जय श्रीराम सर' असं म्हटलं, त्यावर पळशीकर लिहितात: 'नाही, मराठी परंपरेत "रामराम" म्हणतात, त्याबद्दल न्या. रानड्यांनी पूर्वीच लिहिले आहे.' यानंतर पळशीकरांनी रानड्यांच्या 'धर्मपर व्याख्याने' या पुस्तकातला लहानसा उतारा दिला आहे, तो असा- रानडे लिहितात: 'तुम्ही रस्त्यात भेटला तर नम्रतादर्शक नमस्कार किंवा रामराम करावा इत्यादि विहीत आहे; ते करू नये असे कोणी म्हणणार नाही. पण फलाण्याने नुस्ता नमस्कार केला, किंवा सलाम केला की जय गोपाळ म्हटले इत्यादि पोकळ व द्वेष वाढवणारे वितंडवाद... मात्र नकोत. त्यांच्या योगे नम्रता वाढण्याचा उद्देश एका बाजूस राहून आपण जय होतो, अभिमानाचे दास बनतो...' 

यातले रानडेही अनेकदा ब्राह्मणी छावणीचं अंशतः प्रतीक ठरतात, कधी एखाद्या लोकप्रिय मराठी मालिकेतले नायक असतात आणि गांधी व जिना यांच्या तुलनेत रानड्यांच्या दृष्टिकोनाची पाठराखण करत आंबेडकरांनी लिहिलेला निबंधही आपल्यासमोर असतो. 

थोडक्यात, भारतासारख्या अनेक नद्या असलेल्या, अनेक परंपरा असलेल्या, बहुप्रवाही भूभागामध्ये एकाच टाकीत पाणी साठवून, ते तुंबवून त्या टाकीवर आपला शिक्का मारणं, ही कृती 'अभिमानाचे दास' बनवणारी आहे. आणि 'गर्व से कहों हम हिंदू है' या अयोध्येतील आंदोलनामधल्या एकसाची घोषणेतून तेच होत आलेलं आहे. आता 'हिंदू' शब्दासोबत 'राष्ट्रवादी' हा शब्द अधिक ठोसपणे जोडला गेला आहे आणि 'प्राउड नॅशनलिस्ट', 'राष्ट्राभिमान' असे शब्दप्रयोग अधिक बटबटीतपणे होताना आपण ऐकतो-पाहतो आहोत. पंतप्रधानांच्या भाषणातही 'अभिमानाचे दास' होण्याची अप्रत्यक्ष हाक होतीच.

टाकीत बंद पाणी

मोरया प्रकाशन। मुखपृष्ठ: मनोज चौधरी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी संलग्न 'तरुण भारत' (बेळगावचा 'तरुण भारत' नव्हे) या वर्तमानपत्राचे संपादक राहिलेले चं. प. भिशीकर यांनी 'हाक अयोध्येची' या नावाची एक पुस्तिका लिहिली होती. २० सप्टेंबर १९९० रोजी प्रकाशित झालेल्या या पुस्तिकेमध्ये राम मंदिर आंदोलनासाठी आवश्यक भावना जागवणारा बराच ऐवज नोंदवलेला आहे. परकीय आक्रमणं, त्यात विशेषतः बाबराच्या आज्ञेने काय घडलं, इत्यादी तपशील या पुस्तिकेत आहे. त्यात 'प्रास्ताविका'मध्ये भिशीकर म्हणतात:
"माझी अशी दृढ श्रद्धा आहे की आपले राष्ट्र सध्या एका संक्रमण काळातून जात आहे आणि अखंड व एकात्म स्वरूपांत त्याचा नवा तेजस्वी आविष्कार आता अगदी अटळ आहे. तो अगदी समीप आहे. या देशाचा प्राचीन काळपासूनचा इतिहास सांगतो की शासनसत्ता ही राष्ट्राची प्राणनाडी नसून अध्यात्मिक अधिष्ठानावर निर्माण झालेली श्रेष्ठ संस्कृतिधारा हेच त्याचे जीवननिधान आहे. अंधाऱ्या कालखंडात धर्मपुरुष भ्रांत समाजात चेतना फुंकतात, मार्ग दाखवितात, आघात झेलतात आणि राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा मार्ग प्रशस्त करतात.

अयोध्येतील राममंदिराच्या निमित्ताने नेमके हेच घडत असल्याचे आपण पाहात आहोत. दि. ३० ऑक्टोबरला रामजन्मभूमीवर श्रीराम मंदिराच्या प्रत्यक्ष उभारणीला प्रारंभ होणार असा गंभीर शंखनाद धर्मसंसदेतील साधुसंतांनी आणि धर्माचार्यांनी केला व राष्ट्रांत चैतन्याची लहर पसरली. शासनाच्या मर्जी-नामर्जीची चिंता न करता साऱ्या राष्ट्रवादी शक्ती आता या महान् संकल्पामागे एकवटल्या आहेत. 'अयोध्येची हाक' म्हणजेच राष्ट्रीय चैतन्याला हे आवाहन- देशाच्या कानाकोपऱ्यातील अखेरच्या हिन्दूपर्यंत पोचविण्याचा भगीरथ प्रयत्न चालू आहे. "
भिशीकरांच्या वाक्यांमधलेच अनेक शब्द स्वाभाविकपणे तीस वर्षांनी पंतप्रधानांच्या भाषणातही जसेच्या तसे सापडतात, हे स्वाभाविकच आहे. भिशीकरांना अपेक्षित असलेला 'संकल्प'च पंतप्रधांच्या भाषणात 'संकल्पशक्ती' म्हणून अवतरलेला आहे, दोघांनीही या राममंदिराला राष्ट्राशी जोडलेलं आहे. पण भिशीकरांच्या या वाक्यांमध्ये एक महत्त्वाचा उल्लेख दोनदा आलेला आहे: 'शासनसत्ता ही राष्ट्राची प्राणनाडी नसून अध्यात्मिक अधिष्ठानावर निर्माण झालेली श्रेष्ठ संस्कृतिधारा हेच त्याचे जीवननिधान आहे', आणि 'शासनाच्या मर्जी-नामर्जीची चिंता न करता साऱ्या राष्ट्रवादी शक्ती आता या महान् संकल्पमागे एकवटल्या आहेत'. 

शासन- ढोबळ अर्थाने बोलायचं तर लोकशाही मार्गाने आलेलं सरकार- ही गोष्ट अध्यात्मिक अधिष्ठानापेक्षा कमी मानणं, आणि त्याहीपुढे जाऊन या शासनाच्या मर्जी-नामर्जीची चिंता न करता आपला कार्यक्रम पुढे रेटणं, हा या सर्व संकल्पशक्तीचा पाया त्यांनी नोंदवला आहे. पण आता हेच तत्त्व मानणाऱ्या विचारसरणीचं शासन आल्यावर मात्र सरकारविरोधी असलेले सूर सरसकटपणे राष्ट्रविरोधी, किंवा नक्षलवादी असल्याचा शिक्का मारला जाताना आपण पाहतोय.

विशेष म्हणजे 'कोणत्याही सरकारचं प्रस्थापित सरकार- निवडणुकांच्या आधारे विधिमंडळांमध्ये पोचलेलं सरकार' विशिष्ट निमसरंजामी-निमभांडवली वर्गाचंच असतं, आणि ते उलथवल्याशिवाय खरं स्वातंत्र्य मिळणार नाही, असं भारतातल्या माओवादी पक्षाचं म्हणणं आहे. त्यांच्यावर बंदीही आहे. त्यांनी प्रस्थापित सरकारांविरोधात सशस्त्र युद्धच पुकारलेलं आहे. पण मग भिशीकरांच्या म्हणण्यात वेगळं काय आहे? त्यांना सरकार उलथवायचं नाहीये, पण एका विशिष्ट उद्दिष्टासाठी ही चौकट न मानायची त्यांची तयारी आहे. त्यांच्या तथाकथित अध्यात्मिक अधिष्ठान मानणाऱ्या विचारसरणीनेही हिंसक मार्गाने, रूढ शासनाच्या कायद्याचा भंग करतच आपला कार्यक्रम पूर्णत्वास नेला, बाबरी मशीद पाडली आणि आता त्या कृतीला गैर न मानता, या हिंसक मार्गाचा अप्रत्यक्ष गौरवच आपल्या शासनातील सर्वांत अधिकारी पदावरच्या व्यक्तीने ५ ऑगस्टला केला. या मार्गाला, त्यामागच्या धारणांना अप्रत्यक्ष अधिकृतता देण्याचा हा समारंभ पार पडला.

या पार्श्वभूमीवर नक्षलवादी असल्याचा आरोप झालेल्या किंवा दोष सिद्ध झालेल्या सर्वसामान्य आदिवासींपासून महानगरांमधल्या बुद्धिजीवींपर्यंत अनेकांना तुरुंगात डांबलं जातं, हे कसं पाहायचं? आपल्याला कोणाचे विचार पटतात, हा मुद्दा इथे नाही. पण कोणी माओवादाचं समर्थक असेल, तरी त्या व्यक्तीला तुरुंगात डांबण्यासाठीचा आधार हे शासन कुठून मिळवणार? महानगरी अवकाशातल्या घडामोडींचा किमान आवाज होतो, पण कानाकोपऱ्यात जीव आणि जीवन गमावणाऱ्या आदिवासी लोकांवर (मग काही अपरिहार्यतांमुळे त्या लोकांचा संबंध हिंसेशी आला असेल तरीही) कारवाया करण्याचं समर्थन कशाच्या बळावर केलं जातं? हा नुसता या एका विचारसरणीपुरता किंवा हिंसेपुरता मुद्दा नाही. या संदर्भातली गुंतागुंत नोंदवायचा प्रयत्न आपण रेघेवरच्या काही नोंदींमध्ये केला होता. (पाहा: एवढं एकसुरी एकरेषीय! आणि दोन टोकांदरम्यानचं अंतर). फक्त फरक इतकाच की, सध्याच्या रूढ लोकशाही मार्गाने माओवादी सत्तेत येण्याची शक्यता नाही, किंबहुना त्यांना डावपेच म्हणूनही ते मान्य नाही आणि कोणत्याही मार्गाने का होईना पण सत्तेत येणं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला शक्य झालेलं आहे. यात रूढ लोकशाही चौकटीचीही मर्यादा दिसते का, याचा विचार करता येईल, असं वाटतं.

राममंदिराच्या पायाभरणीनिमित्ताने झालेलं दृश्य सादरीकरण आपण टीव्हीवरून पाहिलं असेल, इंटरनेटवर कुठे पाहिलं असेल, आपल्याच ओळखीपाळखीतल्या अनेकांनी समाजमाध्यमांवरून याचा प्रसार केला असेल. घडणारा कार्यक्रम योग्यच आहे, पंतप्रधानांचं बोलणं हीच राष्ट्रीय अभिव्यक्ती आहे, असा सूर या सर्वांनी मान्य केला, त्याचा प्रसारही केला. हे सर्व 'शासनाच्या मर्जी-नामर्जीची चिंता न करणारे' मानावेत का? तसं असेल तर सध्याच्या तर्कानुसार ते राष्ट्रविरोधीही ठरतात का? तसं ठरत नसेल, तर मग टोकाच्या डाव्या विचारसरणीबद्दल नुसती तोंडी सहानुभूती राखणारे राष्ट्रविरोधी ठरवायचा आधार काय? असे प्रश्न यातून नोंदवता येऊ शकतात. हा मुद्दा एखाद्या विचारसरणीपुरताही नाही. ढोबळ अर्थाने डाव्या विचारसरणीचं प्रभुत्व असलेल्या काही अवकाशांमध्ये पुरेसं डावं नसलेल्या घटकांना दाबलं जातं, किंवा माओवादी वर्चस्व असलेल्या प्रदेशांमधले अंतर्विरोध आणखी गुंतागुंतीचे राहतात, हे सगळं स्वतंत्रपणे तपासता येतंच. (दुर्दैवाने मुख्यप्रवाही पुरोगामी मानले जाणारे घटक, समाजमाध्यमांवर किंवा इतरत्र बोलताना सरसकटपणे काही साचे वापरताना दिसतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने अनेकदा स्वतःचं माओवादी असणं नमूद केलेलं असेल, तरी मग समाजमाध्यमांवरील पुरोगामी घटक मात्र त्या व्यक्तीला केवळ मानवाधिकार कार्यकर्ता किंवा कवी म्हणत राहू शकतात. आणि कोणी ठोस माओवादी नसेल, तरीही ती व्यक्ती विविध प्रासंगिक कारणांमुळे एखाद्या प्रकरणात अडकली, तरी तिच्याकडेही याच मर्यादित दृष्टीने पाहिलं जातं. असं केल्याने सगळं बोलणं अपरिणामकारक आणि मर्यादित वर्तुळांमधे एकमेकांची वाहवा करण्यापुरतं राहतं, असं वाटतं. आपल्या बुद्धिजीवी-साहित्यिक-अकादमिक वर्तुळांपलीकडे उर्वरित लोक आहेत, ते सगळे डावे-उजवे कोणीच नाहीत, किंवा त्यांचे प्रतिगामी-पुरोगामी या बायनरीतल्या चर्चेत विशेष काही प्रत्यक्ष हितसंबंधही नाहीत, हे लक्षात ठेवणं बरं, असं वाटतं. शिवाय, सर्व प्रकारची हिंसा प्रत्यक्ष भोगणारे लोक तर आहेतच, किमान हा हिंसेचा संदर्भ लक्षात ठेवून तरी संवादाची वर्तुळं जाणीवपूर्वक संकुचित करू नयेत. पूर्वीच्या नोंदींमध्ये म्हटल्यानुसार, जे उघड सार्वजनिक स्तरावर बोललं गेलेलं आहे, तथ्य म्हणून समोर आहे, ते कबूल करण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो. ते कबूल करून मग तरीही काही बोलण्यासारखं उरेल ते बोलावं. सत्ताधाऱ्यांनी विशिष्ट साचा वापरून एखादं पाऊल उचललं, तर सत्ताधाऱ्यांचं न पटणाऱ्या मंडळींनी तो साचा न वापरता त्यातले अंतर्विरोध नोंदवणं गरजेचं आहे, असं वाटतं. त्याऐवजी फक्त साच्यावरचं नाव बदलून उपयोग नाही). पण इथे एखाद्या छोट्या प्रदेशावर किंवा काही बुद्धिजीवी वर्तुळांवर नव्हे, तर अख्ख्या देशावर वर्चस्व गाजवणाऱ्या सत्तेचा मुद्दा आहे. शिवाय, धार्मिक राष्ट्रवाद मानणारी ही विचारसरणी प्रचलित लोकशाही मार्गांनी सत्तेवर आली, हा मुद्दाही लोकशाही चौकटीच्या मर्यादा अधोरेखित करणारा राहतो. फक्त एखाद्या विचारसरणीपुरता हा मुद्दा नाहीच, रूढार्थाने डाव्या नसलेल्या दलित संघटनांनाही राष्ट्रविरोधी असल्याचा शिक्का सहन करावा लागतोच, आणि या सगळ्या व्यतिरिक्त विविध छोट्यामोठ्या परंपरा, वेगवेगळी कथनं, वेगवेगळ्या धारणा, वेगवेगळ्या देवदेवता असलेल्या अवकाशाच्या पार्श्वभूमीवर एकसाचीपणा घातक वाटतो, इतकाच मुद्दा आहे. अलीकडेच गणपती उत्सव होऊन गेला. तर या एका देवाचीही विविध रूपं, विविध आवृत्त्या दिसतात, अशा वेळी एकच मूर्ती अधिकृत म्हणून लादली तर काय होईल! (सनातन प्रभात हे वर्तमानपत्र अशी अधिकृतता आणू पाहत असतं, 'श्री गणेश मूर्ती शास्त्रानुसारच असावी' असं पुस्तकही त्यांनी काढलेलं आहे. पण वास्तवात विविध ठिकाणी विविध रूपांमधल्या गणेश मूर्ती अस्तित्वात असल्यामुळे अडचण होत असावी, तरीही पूजनासाठी मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली मूर्तीच आवश्यक आहे, असं ते नमूद करत असतात.)

तर, या ५ ऑगस्टच्या निमित्ताने झालेल्या एकसाची प्रभुत्व गाजवू अभिव्यक्तीची मुळं भिशीकरांनी लिहिलेल्या पुस्तिकेसारख्या अनेक गोष्टींमधून उगवलेली आहेत. ही त्यांची गोष्ट आधी नोंदवल्याप्रमाणे खुली आणि खुळी नाही, ती बंदिस्त आहे आणि त्यात परस्परविरोधी कथनांना जागा नाही. तरीही याच अभिव्यक्तीचा गवगवा केलेल्या वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रं आणि समाजमाध्यमं यांना आपण लोकशाही संवादाचे अवकाश मानत राहतो, हे कसं? की, आपल्याला तेही भाग पडत असतं?  

मनं घडवणारी माध्यमं

प्रकाशक-मुद्रक: दिगंबर द. जोशी, डिसेंबर १९९१
आपण वरती एका पुस्तिकेचा उल्लेख केला, तशीच आणखी एक पुस्तिका पाहण्याजोगी आहे. पुस्तकाचे लेखक कोण ते लिहिलेलं नाही, पण 'ह्या पुस्तकाचे पुनर्मुद्रणाचे अधिकार आचार्य श्री. बाळाराव सावरकर यांनी आम्हाला दिले आहेत. त्यांचे आभारी आहोत.' अशी टीप इम्प्रिन्ट पानावर आहे.

या पुस्तिकेतलं पहिलं वाक्यच असं: 'युरोप अमेरिकेत सर्वांना, झाडूवाल्यापासून राजकारणी नेत्यापर्यंत प्रत्येकाला विख्यात फ्रेंच-ज्युईश द्रष्टा नॉस्ट्राडेमस याची ख्याती माहीत आहे. ४०० वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या या ज्योतिषाला भरपूर लोकप्रियता मिळाली याचे कारण साधे सरळ आहे. नॉस्ट्राडेमस याने केलेली भाकिते सन १५५५मध्ये प्रसिद्ध झाली. गेल्या ४००हून अधिक वर्षात त्याची अनेक भविष्ये काळाच्या कसोटीला पूर्णपणे उतरली. १५५५ पूर्वीच त्याने विसाव्या शतकातली दोन महायुद्धे वर्तविली. त्याने हिटलरचे नावही जवळपास अचूक जाणले. तत्पूर्वी १७९२मध्ये फ्रेंच राज्यक्रांती नॉस्ट्राडेमसच्या द्रष्टेपणाचा खणखणीत पुरावा देअून गेली.' एकंदरितच बहुसंख्याकवादी हिंदू अस्मितेचा वापर राजकारणासाठी करावा वाटत असला, तरी त्यासाठी युरोप-अमेरिकेकडे पाहणं गरजेचं वाटणारी ही वृत्ती आहे. सध्याच्या पंतप्रधानांनीही पदाची सूत्रं हाती घेतल्यावर चारेक महिन्यांदरम्यान अमेरिकेचा ठळक दौरा केला होता (त्याआधी पूर्वेकडचे तीनेक देश झाले असले, तरी अमेरिकादौऱ्याच्या सादरीकरणाशी या आधीच्या दौऱ्यांची तुलनाही शक्य वाटत नाही), तिथे मुलाखती झाल्या, त्यांच्या नावाचा गुंगी आणेल असा जयघोष उपस्थितांनी केला, हे आपण पाहिलं असेलच. अगदी अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही भारतात आले, तेव्हा त्याचा एक प्रेक्षणीय कार्यक्रम केला गेला, हेही आपण जाणतो. थोडक्यात, ही अस्मिता 'आज' आपल्याला नक्की कोणता अभिमान पुरवते, या अभिमानाने कोणते प्रश्न सुटतात, याबद्दलही काहीच कार्यक्रम असल्याचं दिसत नाही. या अस्मितेच्या गवगव्याबाबत काही नकारात्मक बोललं गेलं की, इस्लामी राष्ट्रांचे दाखले दिले जातात, किंवा तथाकथित विकसित राष्ट्रांच्या संदर्भात बढाई मारली जाते. हे सर्व या पुस्तिकेतही आहे.

या पुस्तिकांव्यतिरिक्त विविध चित्रं-छायाचित्रं-व्हिडिओ यांच्या माध्यमातून हे पूर्वीही केलं गेलं आणि आता अधिक जोमाने हे केलं जातंय, त्यावर या नोंदीत वेगळं नोंदवण्यासारखं काही नाही. आपल्या खोलवरच्या जाणिवा गतकालीन ठेवून स्वतःची समकालीन सत्ता टिकवण्यासाठी माध्यमांचा वापर कसा केला जातो, याची ही उदाहरणं आहेत. अशा जाणिवा असलेली मनं दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी पुरेशी खुली असत नाहीत, हे आपण विविध स्तरांवर पाहत असतो. (जुनी नोंद: सेन्सॉरलेली मनं: अर्थातच, दुसरी बाजू लोकांना कशाला कळावयास हवी?)

टाकीबंद स्मृतींची गोष्ट

मिलान कुंदेरा यांच्या 'द जोक' नावाच्या कादंबरीत चेकोस्लोव्हाकियातल्या कम्युनिस्ट राजवटीमध्ये घडणारी एक गोष्ट आहे. दूरचा इतिहास, नजीकचा इतिहास, सत्ताबदल, सामूहिक नि वैयक्तिक स्मृती- इत्यादींच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींमधले संबंध नोंदवणारी ही गोष्ट आहे (खरं तर कोणतीही गोष्ट या पार्श्वभूमीवरच घडत असावी, पण इथे थोड्या ठोसपणे राजकीय सत्तेचा संबंध आहे). आपलंच शहर आपल्याला आपलं न वाटणं, आपल्याला जाणवणाऱ्या / जवळच्या वाटणाऱ्या काही पारंपरिक धारणांना विशिष्ट टाकीत भरलं जाणं, अधिक प्रबळ धार्मिक (ख्रिस्ती) धारणा आणि जमातीय पातळीवरच्या लोकस्मृतींच्या धारणा यांच्यातली गुंतागुंत, या सगळ्या गुंतागुंतीला फाटा देत एकच प्रभुत्वशाली कथन लादू पाहणारे सत्ताधारी- असं काहीएक सूत्र यात दिसतं. या कादंबरीत पहिल्या सहा प्रकरणांमध्ये चार पात्रं आपापल्या दृष्टिकोनातून प्रथमपुरुषी कथनं नोंदवतात, (एक पात्र तीनदा बोलल्यामुळे सहा प्रकरणं) आणि मग सातव्या प्रकरणामध्ये त्यातल्या तीन पात्रांना एकत्र आणून प्रथमपुरुषी कथनं आहेत. तर, ही कथनांची रचनाही खूप नावीन्यपूर्ण नसली, तरी या विशिष्ट संदर्भापुरती त्या प्रस्थापित एकसाचीपणाला छेद देणारी दिसते. आपण इथे बोलतोय ती भारतीय संदर्भातली गोष्ट याहून अधिक गुंतागुंतीची आहे. इथल्या धारणा आणि स्मृतींच्या गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या आहेत, त्यांची संख्याही प्रचंड आहे आणि त्यातले परस्परविरोधी दृष्टिकोनही प्रचंड आहेत. त्यामुळे इथला खुलेपणा आणि खुळेपणा अधिक तीव्र असायला लागेल. 

सत्ताधारी कोण होतं, यावर अनेक गोष्टी अवलंबून राहणंही स्वाभाविक असेल. पण त्यामुळे सत्ताधारी कोण आहेत, आणि त्यांचं काय सुरू आहे याबद्दल जास्त बोललं जाणंही स्वाभाविक मानायला हवं. पण तसं मानलं जात नाही आणि लगेच टोकांवरचे शिक्के मारले जातात. 

पर्मनन्ट ब्लॅक, २०१३ । डिझाइन- अनुराधा रॉय
Cover: "View of Poona, near Bombay"
Illustrated London News, 1875

आता एका पुस्तकाच्या उल्लेखाने नोंद संपवू. प्राची देशपांडे यांनी 'क्रिएटिव्ह पास्ट्स' या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. बखरवाङ्मयापासून ते मराठीतल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांपर्यंत विविध कथनांमधून-कवनांमधून 'महाराष्ट्र धर्मा'ची जडणघडण कशी झाली, त्यावर कोणत्या धारणांचा प्रभाव राहिला, जाणीवपूर्वक कोणता प्रभाव पाडला गेला, असा एक लेखाजोखा या पुस्तकात आहे. हा सगळा विषय आपल्या कक्षेतला नाही आणि नोंदही या मुख्य विषयाबद्दलची नाही. (पुस्तकाच्या विषयाच्या अनुषंगाने अनिकेत जावरे यांनी लिहिलेलं या पुस्तकाचं परीक्षण, राहुल सरवटे यांनी लिहिलेलं परीक्षण). पण साधारणतः आपलं मन, आपल्या स्मृती यांना भावनिक स्तरावर कसं वापरलं जाऊ शकतं, याचा एक दाखला या पुस्तकातल्या तपशिलातून आपल्याला मिळतो. पूर्वीपेक्षा अशा वापरासाठीची साधनं-माध्यमं आता वाढलेली आहेत, अधिक व्यामिश्र झालेली आहेत. डोळे-कान यांना पूर्ण काबीज करणारी साधनं आलेली आहेत. नायक-खलनायकांची, आपल्या दृष्टिकोनांची निर्मिती कशी होत जाते, याचीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चर्चा या  इतिहासलेखनाचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकात येते. समकालीन इतिहासाच्या बाबतीत हा स्मृतींचा खेळ कसा खेळला जातो, हेही तपासण्याजोगं असावं. मानवी मनांना काबीज करणारी, अधिक पोहोच असलेली माध्यमं वरचढ ठरलेल्या काळात हे जास्त गरजेचं वाटतं. (आत्तापर्यंतचा सर्वाधिक पैसे कमावणारा भारतीय चित्रपट ठरलेला 'बाहुबली' इथे उदाहरणादाखल पाहता येईल. एका कल्पित ऐतिहासिक राज्यातली जनता कधी त्यांच्या स्मृतीतला प्रिय राजा म्हणून, तर कधी त्यांना हवा असलेला राजा म्हणून 'बाहुबली, बाहुबली, बाहुबली' किंवा 'बाहुबली जय हो, बाहुबली जय हो, बाहुबली जय हो', असा गुंगी येईल इतका जयघोष करताना दिसते. कॅमेरा त्या जनतेचे डोळे टिपतो, त्या डोळ्यांना आधीच 'बाहुबली'च्या अचाट सामर्थ्याने टिपलेलं असतं, असं आपल्याला प्रेक्षक म्हणून कळतं. बहुधा आपणही प्रेक्षक म्हणून टिपले गेलेले असतो. असाच दुसऱ्या एका शब्दाचा जयघोष अलीकडच्या काळात आपण वेळोवेळी पाहिलेला-ऐकलेला असेलच: 'मोदी, मोदी, मोदी, मोदी, मोदी').

देशपांडे यांनी प्रस्तावनेत एलॉन कॉन्फिनो यांचं एक निरीक्षण नमूद केलेलं आहे, ते इथे आपल्या नोंदी संदर्भात लक्षात घेणं आवश्यक वाटतं. ते निरीक्षण साधारणतः असं आहे: विभिन्न भौगोलिक रचनांमध्ये सामूहिक स्मृती घडवण्यासाठी व त्यांच्या नूतनीकरणासाठी विविध माध्यमांचा वापर कसा झाला, याचं सुलभ दस्तावेजीकरण करून थांबता कामा नये. काही प्रतिरूपं लोकस्मृतींचा भाग होतात, तर इतर प्रतिरूपं लोकस्मृतींचा भाग होत नाहीत, यामागील विविध संदर्भ तपासण्यासाठी सांस्कृतिक इतिहासाची कोटी (कॅटेगरी) म्हणून 'स्मृती'चा वापर अधिक उपयुक्त ठरू शकतो. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, विशिष्ट प्रतिरूपं सामूहिक स्मृतींचा विषय कशी होतात एवढंच तपासण्याऐवजी, असं का होतं तेसुद्धा तपासायला हवं.

हे निरीक्षण रास्त वाटतं. पण एका मर्यादेपलीकडे ते ताणणंही ठीक नाही. 'का' आणि 'कसं' या दोन्ही प्रश्नांना समान महत्त्व द्यावं, एवढ्यापुरतंच हे निरीक्षण आपण समजून घेऊ. 'का' अशा धाटणीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सापडणं काही वेळा अशक्यही असतं. या नोंदीच्या विषयासंदर्भात बोलायचं तर, 'का'चं उत्तर आपल्याला रोजच शोधावं लागत असावं. एकसुरीपणा कसा आहे, हे नोंदवणं हा एक भाग झाला, पण असा एकसुरीपणा आपल्याला का भावतो? प्रतिगामी घटकांनी टाकीबंद स्मृतींचा प्रभावी वापर केला, तर प्रतिगामित्व मान्य नसणाऱ्यांनाही (अपवाद वगळता) टाकीच बांधायची गरज का भासते? स्वतःला व्यक्ती म्हणून काही वेगळं समजण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्यायच्या आधीच विशिष्ट सुरात सूर मिळवण्यामध्ये काही सामूहिक सुरक्षितता लाभते का? कधी ही सामूहिकता खूप मोठी असते, तर कधी आपापल्या छोट्या गटांची असते, पण तग धरून राहण्यासाठी ती गरजेची ठरते, म्हणून हे घडतं का? असे हे 'का'शी निगडित प्रश्न असावेत. टाकीबंद पर्याय रोजच आपल्या समोर येत असतात. दुर्दैवाने पटकन तहान भागवण्यासाठी अशा टाक्या आपण सोयीच्या मानतो, प्रवाही पाण्याला महत्त्व देत नाही.

2 comments:

  1. रेघेच्या निर्मितीची पूर्व-अट बिंदूंची निवड ही आहे. बिंदूंचा कमीजास्त ठळकपणा/पुसटपणा आपला दृष्टिकोन, कथन-शैली, कथन-हेतू (आकलन आणि समर्थ मांडणीच्या जोरावर ही यादी वाढवता सुद्धा येऊ शकते) यावर सरळसरळ आधारित आहे. राम-रामायण-बाबर हे मिथक वर्तमानाचे एक सशक्त नरेटिव्ह उभं करायला वापरलं का जातंय? वर्तमान मुद्दे फिके पडावेत इतकी ताकद या ऐतिहासिक मांडणीत आहे हे आपण बघतोच आहोत. हा आलेला सर्वव्यापी आंधळेपणा आहे का ? की डोळेझाक आहे ? जे महत्व या घटनेला निदान तुमच्या लेखात दिसतंय तेवढं महत्व न देणारा मोदींचा एक मतदारवर्ग असावा अशी शंका येते आहे. जो रंग अयोध्येच्या कार्यक्रमात दिसत होता त्यासारखं एकरंगी व्यक्तिमत्व भाजपच्या सगळ्या मतदारांचं असेल का ? तशी शक्यता एकूणच भारतातली विविधतेची पातळी पाहता कमी वाटतेय. मग 'पर्यायाचा अभाव' या कॅटेगरी मधले भाजपचे मतदार वळवायला सुद्धा जिथे कठीण जातंय तिथे भाजपच्या तगड्या मुद्द्यांचा प्रतिवाद करता येणं लांब राहील असंच दिसतंय. भाजपच्या मतदारांचं यथार्थ विश्लेषण झाल्याशिवाय यशस्वी प्रतिवाद कठीण दिसतंय. कारण हे आता हिंदुराष्ट्र होणार असलं बोलणं, संघाच्या दोऱ्या साप म्हणून बडवत राहणं मोदींच्या पथ्यावर पडतंय.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. भाजपचे मतदार विविधरंगी असण्याची शक्यता किंवा पर्यायांचा अभाव- हे मुद्दे रास्त नाहीत, असं नाही. त्याबद्दल इथे काही मत नोंदवलेलं नाही. पण एक विशिष्ट धार्मिक राष्ट्रवादाची भूमिका सत्तेबाहेर होती, ती आता सत्तेत आलेली आहे, याचा काही परिणाम होतो की नाही, याबद्दलचं इथे बोललं गेलंय असं वाटतं. आणि या परिणामाचे आधीपासूनचे नि आताचे संकेत वातावरणातून मिळत असतील तर त्याचे काही दस्तावेज नोंदवणं (पुस्तिका, चित्रपटांमधलं कथन, इत्यादी), एकरंगी प्रतिमांची निर्मिती करण्याचा प्रयत्न कसा होत आलाय, ते नोंदवणं आणि लोकशाही चौकटीबद्दल काही मुद्दे नोंदवणं (शासनसत्ता ही देशाची नाडी नाही, असं मनामध्ये- संघाच्या बौद्धिकांमध्ये व नोंदीत आलेल्या पुस्तिकांसारख्या दस्तावेजांमध्ये- मानत असताना, राजकीय पातळीवर मात्र शासनसत्ता मिळवण्यासाठी सातत्याने सक्रिय राहून त्यात यशही मिळणं भाजपला शक्य झालं. पण मग प्रस्थापित शासनसत्तेची चौकट न मानणाऱ्या इतर घटकांवर कारवाई करताना नक्की कोणता युक्तिवाद हे लोक करतात, इत्यादी) इतपतच या नोंदीची व्याप्ती आहे. या परिणामाचं मोजमाप केवळ भाजपचे मतदार विविधरंगी आहेत किंवा नाही, यावरून होईल का, याबद्दल शंका वाटते. मतदारांचा उद्देश वेगळा असेल, तरी सत्ताधाऱ्यांचा उद्देश वेगळा असू शकतो. आपल्या प्रतिक्रियेतलं शेवटचं वाक्य सर्वसाधारण मत म्हणून असेल, असं वाटतं. या नोंदीतल्या कोणत्या तपशिलाला ते लागू होतं, याचा अंदाज येत नाही.

      Delete