03 August 2025

'मराठमोळ्या माधुरीचं मराठी' ऐकणारे एंगूगींचं म्हणणं ऐकतील का?

माधुरी 'राजश्री मराठी' या यूट्यूब वाहिनीवरून;
एंगूगी यांची प्रतिमा 'विकिमीडिया कॉमन्स'वरून

'मराठमोळ्या माधुरी'चा विरोधाभास

समजा, अभिनेते भरत जाधव यांची मुलाखत एखाद्या मराठी यू-ट्यूब वाहिनीवर असेल तर 'मराठमोळ्या भरतचंही मराठी ऐकावंसं वाटतं' असा संबंधित व्हिडिओचा मथळा आपल्याला बघायला मिळेल का? शक्यता वाटत नाही. साधारणपणे कोणत्यातरी परकेपणाचा, दुरावलेपणाचा, काहीएका अंतराचा किंवा मराठी अवकाशाबाहेरचा संदर्भ असतो, तेव्हा एखाद्या मराठी गोष्टीच्या वर्णनात 'मराठमोळे'पणाचा ठळक उल्लेख येतो. उदाहरणार्थ, 'मराठमोळ्या दिव्या देशमुखने रचला इतिहास : बुद्धिबळाच्या विश्वचषकात विजय!' ही अलीकडची बातमी. इथे स्पर्धा आंतरराष्ट्र्रीय पातळीवरची होती आणि ती जॉर्जियात झाली, ही पार्श्वभूमी असल्यामुळे नागपूरच्या बुद्धिबळपटूचं यशाचं वर्णन करताना मराठमोळेपणाचा संदर्भ स्वाभाविकपणे मनात येतो आणि नोंदवला जातो. इथे दिव्या यांचं महाराष्ट्राशी अजून असलेलं नातं आणि तरीही दूर अंतरावरच्या प्रदेशात, एका आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी यश मिळवलं, याचा आनंद साजरा करताना 'मराठमोळं' हे विशेषण जुळतं. पण 'मराठमोळे लिओ वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदी' (एबीपी माझा, २ जून २०१७), ही काही वर्षांपूर्वीची बातमी पाहिली तर काय म्हणता येईल? वराडकरांचं आडनाव आणि वडिलांच्या बाजूने कौटुंबिक इतिहास तेवढा महाराष्ट्राशी जोडलेला आहे, बाकी व्यक्तीशः लिओ यांच्यात 'मराठमोळं' काही नाही. किंबहुना, मुंबईत डॉक्टरकी शिकून १९६० साली भारतातून इंग्लंडला नि मग आयर्लंडला गेलेल्या त्यांच्या वडिलांनाही आता मराठीत बोलता येत नाही. ते ज्या ठिकाणी राहत आले तिथले झाले, हे स्वाभाविक. पण मग आपण त्यांचं वर्णन नुसतं 'मूळचे मराठी वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदी' असं वस्तुस्थितीपुरतं करत नाही. त्यात प्रत्यक्षात नसलेलं 'मराठमोळे'पण आणतो.

या पार्श्वभूमीवर आता नोंदीच्या सुरुवातीला चिकटवलेली प्रतिमा पाहता येईल. त्यात माधुरी दीक्षित या अभिनेत्रीची 'बकेट लिस्ट' या मराठी चित्रपटानिमित्त महाराष्ट्रातच मुलाखत होत असताना तिचं 'मराठमोळं' असणं अधोरेखित केलंय. या 'मराठमोळ्या' व्यक्तीचं मराठी बोलणं स्वाभाविक न उरता त्यात काहीतरी विशेष आहे, 'ऐकावंसं वाटतं' असं वेगळं आहे, असं मथळ्यात सुचवलंय. काहीएक सांस्कृतिक दुरावा गृहित धरल्याशिवाय हा मथळा शक्य नाही. माधुरी दीक्षित आधी महाराष्ट्रात राहात असल्या तरी दीर्घ काळ हिंदी चित्रपटांमध्ये काम करत होत्या, अमेरिकेत कार्यरत असलेल्या मराठी पुरुषाशी लग्न झाल्यावर त्या अमेरिकेत गेल्या, मग आता गेली काही वर्षं  सहकुटुंब मुंबईत स्थायिक होऊन एका मराठी चित्रपटात अभिनय, दोन मराठी चित्रपटांची निर्मिती, काही महाराष्ट्रीय उत्पादनांच्या जाहिराती- असं मराठीपण त्यांच्या सार्वजनिक व्यवहारात दिसतंय. त्यामुळे इतक्या वर्षांच्या सांस्कृतिक अंतरांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आताच्या बातमीत 'मराठमोळे'पणा अधोरेखित केला जातो. शिवाय, त्यांच्याबाबतीत प्रत्यक्ष बोलण्यात स्वाभाविक न राहिलेली मराठी भाषा 'ऐकत राहावी', इथपर्यंत बातमीतून सुचवलं जातं. या विरोधाभासाचं खापर माधुरी दीक्षित यांच्यावर फोडण्यापेक्षा मराठी सार्वजनिक व्यवहाराचा अंदाज त्यातून बांधावा, असं वाटतं. यात एकीकडे काही मराठी मानल्या जाणाऱ्या बाह्य खुणा ठळक करायची हौस आहे, पण सहज-स्वाभाविक मराठी वावर मात्र नाही.

वर्ल्डव्ह्यू पब्लिकेशन्स, २००७ [१९८१]
नोंदीच्या सुरुवातीच्या प्रतिमेत दुसरी व्यक्ती आहे एंगूगी (न्गुगी) वा थ्योंगो. केनियातले एंगूगी सुरुवातीला इंग्रजी भाषेत साहित्य लिहू लागले, इंग्रजीचे प्राध्यापक तर ते होतेच. पण केनियात राज्य करून गेलेल्या वसाहतवाद्यांची भाषा वापरून आपण काहीतरी गमावतोय आणि आपण कोणासाठी लिहितोय तेही स्पष्ट होत नाही, अशा जाणिवेतून त्यांनी इंग्रजी लेखन (खासकरून कल्पित साहित्याचं इंग्रजीतून लेखन) सोडून दिलं आणि ते स्वतःच्या गिकुयू या मातृभाषेत लिहू लागले. त्यांना आधीही आंतरराष्ट्रीय म्हणता येईल अशी प्रसिद्धी मिळाली होतीच, अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये ते साहित्यही शिकवत आले होते, आणि पुढेही गिकुयूतील कादंबऱ्या स्वतःच इंग्रजीत भाषांतरित करून त्यांनी समतोल टिकवून ठेवला, पण स्वतःच्या मूळ अवकाशाशी जोडून घेणं, आपल्या स्वतःच्या म्हणता येईल अशा ओळखीवरचा ताबा निसटू न देणं, हे त्यांना आवश्यक वाटलं. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरी मनाच्या पातळीवरचं वासाहतिक पारतंत्र्य मात्र कायम राहतं, हे पारतंत्र्य नंतरही विविध जागतिक वर्चस्वाच्या व्यवहारांमुळे टिकवलंही जातं, याला प्रतिकार करण्याची इच्छाही त्यांना पुन्हा गिकुयूकडे घेऊन गेली. त्यांच्या या सर्व प्रवासाचा आणि त्यामागच्या विचारांचा दस्तावेज  'डिकलोनायझिंग द माइंड : द पॉलिटिक्स ऑफ लँग्वेज इन आफ्रिकन लिटरेचर' (वर्ल्डव्ह्यू पब्लिकेशन्स, २००७) या पुस्तकाच्या रूपात वाचायला मिळतो. इंग्रजी वापरण्यामुळे आपल्याला कोणत्या विरोधाभासांना सामोरं जावं, हेही त्यात त्यांनी नोंदवलंय. पुढे गिकुयूतून लिहायची निवड केल्यावर एंगूगी यांना अनेक गोष्टी पणालाही लावाव्या लागल्या. त्यांच्या काही कृतींमुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तरीही ते अखेरपर्यंत- म्हणजे अगदी अलीकडे, २८ मे २०२५ रोजी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी निधन होईपर्यंत त्यांच्या भूमिकेला धरून बोलत राहिले. या पुस्तकात एका ठिकाणी एंगूगी लिहितात :
लोकांच्या संपत्तीचं नियंत्रण करणं - म्हणजे लोक कशाचं उत्पादन करतायंत, काय उत्पादन करतायंत, आणि त्याचं वितरण कसं होतंय याचं नियंत्रण करणं-, हे वसाहतवादाचं खरं उद्दिष्ट होतं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, लोकांच्या वास्तव जगण्याच्या भाषेचा संपूर्ण प्रांत ते नियंत्रित करू पाहत होते. वसाहतवादाने संपत्तीच्या सामाजिक उत्पादनावरचं हे नियंत्रण लष्करी मोहिमांद्वारे आणि त्यानंतर राजकीय हुकूमशाहीद्वारे लादलं. पण वसाहतवाद्यांच्या वर्चस्वाचा सर्वांत महत्त्वाचा प्रदेश वसाहतींमधील लोकसमूहांचं मानसिक विश्व हा होता. हे मानसिक नियंत्रण संस्कृतीच्या माध्यमातून प्रस्थापित करण्यात आलं. यातून लोकांचं स्वतःविषयीचं आकलन आणि त्यांचे जगाशी असणारे संबंध नियंत्रित केले गेले. मानसिक नियंत्रण नसेल तर आर्थिक नि राजकीय नियंत्रण कधीही पूर्ण किंवा परिणामकारक होऊ शकत नाही. एखाद्या लोकसमूहाच्या संस्कृतीचं नियंत्रण करणं म्हणजे इतरांच्या संदर्भात स्वतःची ओळख निश्चित करताना हे लोक जी काही साधनं वापरत असतील त्या साधनांचं नियंत्रण करणं. (पान १६)
'मराठमोळ्या' राजकारणातला विरोधाभास

'मराठमोळे'पणाच्या काही उल्लेखांमध्ये विरोधाभास का निर्माण होतो आणि तो विरोधाभास 'स्वतःची ओळख निश्चित करण्या'शी संबंधित कसा आहे, हे वरच्या भागावरून स्पष्ट होईल असं वाटतं. या विरोधाभासाची अनेक रूपं आपल्याला आपल्या राजकारणात आणि समाजकारणात दिसतात. अलीकडे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या (स्टेट बोर्ड) शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी ही भाषा सक्तीची किंवा अप्रत्यक्ष सक्तीची करण्यावरून बराच वाद झाला, त्या वेळी हा विरोधाभास दिसलाच. 

मराठी माध्यमाच्या शाळांपुरतं बोलायचं तर, पहिलीपासून (खरंतर नवीन शैक्षणिक धोरणानुसार, बालवाडीपासूनच) इंग्रजी भाषा हा विषय आहे, आणि पाचवीपासून हिंदी हाही विषय येतो. इंग्रजी पहिलीपासून सुरू करण्यात आली, त्यामागे काही व्यावहारिक कारणं होती (त्यावर आपण नोंदीत पुढे बोलूच); पण हिंदीच्या पहिलीपासून होणाऱ्या अप्रत्यक्ष सक्तीमागची कारणं कोणती, हेतू कोणते, उद्दिष्टं कोणती, याबद्दल अनेकांना रास्त शंका वाटत आली आहे. महाराष्ट्र शासनाने १६ एप्रिल २०२५ रोजी हिंदी अनिवार्य करणारा निर्णय जाहीर केला, त्यावर विरोध झाला. त्यामुळे १७ जूनला त्यात 'दुरुस्ती' करून हिंदीशिवाय इतर काही भारतीय भाषाही पहिलीपासून शिकता येतील असं शासननिर्णयात नमूद करण्यात आलं, पण त्यातल्या चमत्कारिक अटी बघता व्यवहारात ती अप्रत्यक्ष हिंदीसक्तीच होईल, हे लक्षात घेऊन याही निर्णयाला विविध स्तरातून विरोध झाला. मग राज्य सरकारने निर्णय मागे घेतला नि त्रिभाषासूत्राबद्दल विचारविनिमय करायला एक समिती नेमली. या समितीचा अहवाल तीन महिन्यांनी येईल, असं कळतं. पण त्याआधीच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुढील विधान ऐकायला मिळालं :
पण एक गोष्ट निश्चित सांगतो की, तीन भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच... त्रिभाषासूत्र शंभर टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करू माझा सगळ्यांत जास्त विरोध कशाला असेल तर, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, भारतीय भाषांना विरोध मी सहन करणार नाही.(मुंबई तक, १६ जुलै २०२५)
पाचवीपासून आधीच लागू असलेलं त्रिभाषासूत्र पुन्हा लागू होणार म्हणजे त्याआधी कधीतरी होणार, असा निकाल मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकलेला आहे. आता समिती फक्त कितवीपासून हे सूत्र लागू होणार, हे ठरवेल, असा त्याचा अर्थ निघतो. त्यांच्या वरच्या विधानातला उत्तरार्ध ढोंगीपणाचा आहे. आत्ताच्या वादातला मुख्य मुद्दा मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदीची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सक्ती कशाला, असा होता. इंग्रजीला पायघड्या, इतर भारतीय भाषांना विरोध, हे मुद्दे इथे आणणं दिशाभूल करणारं आहे. इतर भारतीय भाषा शिकवणं ही खरंतर भारतासारख्या देशात स्वागतार्ह बाब ठरू शकते. तसं करायचं तर पाचवी-सातवीपासून प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने विविध भाषांशी ओळख करून घेण्याची काही सोय करून देणं, त्या निर्णयांबाबतीत तज्ज्ञांशी सल्लामसलत करणं, आदी गोष्टी करता येतील. ते न करता फक्त हिंदीला पाचवीऐवजी पहिलीपासून स्थान देणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या एकसाची राष्ट्रीयत्वाशी सुसंगत धोरण अनेकांना स्वाभाविकपणे धोकादायक वाटलं. हा एकसाची अस्मितेचा वसाहतवादच होऊन जातो. एकच वंशसांस्कृतिकता (एथ्निसिटी), एकच राष्ट्रवादी मूल्यधारणा, त्याला सोयीच्या एकाच भाषिक, धार्मिक धारणांना अधिक प्राधान्य (दाखवण्यापुरतं तरी), मग त्यासोबत येणारी नियंत्रणं- यात इतर अस्मितांशी निगडीत संघर्ष तीव्र होत जाताना दिसतात. 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, २०२४
विशेष म्हणजे खुद्द फडणवीस यांची मुलगी दहावीची परीक्षा पास झाल्याच्या बातम्या काही महिन्यांपूर्वी आल्या, तेव्हा ती मुंबईतल्या कॅथेड्रल स्कूल या ख्रिस्ती मिशनरी शाळेतून सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकून दहावी झाल्याचं कळतं. सीबीएसई शाळांमध्ये इंग्रजी पहिली भाषा, हिंदी दुसरी भाषा आणि महाराष्ट्रातली प्रादेशिक भाषा म्हणून मराठी ही तिसरी भाषा असते. या इंग्रजीला पायघड्या आहेत की नाही? अगदी अलीकडे, २२ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांच्या हस्ते गडचिरोलीत लॉयड मेटल्स कंपनीच्या पुढाकाराने सुरू झालेल्या एका सीबीएसई शाळेचं उद्घाटन झालं. मुंबईत आणि महाराष्ट्रात बंद पडणाऱ्या मराठी शाळांची मोजदाद करायची तर वेगळा लेख लागेल.  राज्यकर्त्यांची धोरणंच मराठीसारख्या (आणि गोंडी, भिलोरी, गोरमाटी, इत्यादींसारख्या) भारतीय भाषांविरोधात जाणारी आहेत!

सरकारने हिंदी अनिवार्य करण्यासंबंधीचा पहिला शासननिर्णय एप्रिल महिन्यात काढला, पण त्याआधीच मार्च महिन्यात 'राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे'ने शिक्षकांसाठीचं एक मार्गदर्शन-पुस्तक छापलं. त्यात पहिलीतही हिंदी ही तिसरी भाषा गृहित धरून मार्गदर्शन केलंय. ही पुस्तकं अजूनही शाळांकडे आहेतच. त्यामुळे तात्पुरता मागे घेतलेला निर्णय परत पुढे येण्याची भीती काही जण वर्तवतायंत ती खरीच आहे.

राज्य सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय तात्पुरता मागे घेतल्यानंतर या निर्णयाला विरोध करणाऱ्यांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे उद्धव ठाकरे यांचा एक विजयी मेळावा मुंबईत ५ जुलैला झाला. 'आवाज मराठीचा' असं त्या वेळी स्टेजच्या मागे लिहिलं होतं. खुद्द ठाकरेबंधूंची मुलं इंग्रजीत शिकली यावर काही जण आक्षेप घेतात, त्याबद्दल प्रत्युत्तर देताना या वेळी राज ठाकरे म्हणाले, "कोणी कुठे शिक्षण घेतलं त्याचा काय संबंध! ... तुमचा कडवटपणा तुम्ही शिक्षण कुठे घेतलं याच्यावर नसतो, तो तुमच्या आतमध्ये असावा लागतो."
 
राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरेबंधूंची मिळून चार मुलं बॉम्बे स्कॉटीश स्कूल या सीबीएसई बोर्डाच्या, ख्रिस्ती मिशनरी संस्थेच्या शाळेत शिकली आहेत. पण मराठीविषयीचा 'कडवटपणा' हा काही शालेय माध्यमाशी संबंधित प्रश्नच नाही, असं राज ठाकरे बिनधास्त म्हणू शकतात, त्यावर शेकडो लोक टाळ्याही वाजवतात. हा विरोधाभास 'मराठमोळ्या माधुरीच्या मराठी'सारखाच आहे. यात स्वतःच्या भाषेविषयीचा सहजभाव नाही तर कडवट भावच आहे. त्यात मग 'खळखट्याक' राजकारणाला प्राधान्य मिळतं. मे २००८ मध्ये अशाच 'कडवट' कार्यकर्त्यांनी  'बॉम्बे स्कॉटीश स्कूल'च्या पाटीवरच्या 'बॉम्बे' शब्दाला काळं फासून तिथे 'मुंबई' लिहिलं, त्या वेळी तिथे राज ठाकरे यांची धाकटी मुलगी आणि उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा शिकत होते (टाइम्स ऑफ इंडिया, मे २००८). त्याच्या आदल्या वर्षी शिवसेनेने 'बॉम्बे' शब्द असलेल्या संस्थांविरोधात मोहीम राबवली होती, पण त्यातून बॉम्बे स्कॉटीश शाळेला सूट देण्यात आली, असं कळतं. हा विरोधाभासही फक्त टाळ्या किंवा कानाखाली वाजवून समजून घेतला की आपण 'मराठमोळे' होतो!

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालील शिवसेना पक्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेची धुरा गेली पंचवीस वर्षं सांभाळतोय. गेल्या दहा वर्षांत एकट्या मुंबईत महानगरपालिकेच्या शंभराहून अधिक मराठी शाळा बंद पडल्या (हिंदुस्तान टाइम्स, १३ मे २०२५). त्यावर उपाय म्हणून आधीच्या राज्य सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेच्या काही शाळांना सीबीएसईशी जोडण्यात आलं. म्हणजे त्या शाळांचं रूपांतर मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमात झालं! हे स्वतःहून अभिमानास्पद असल्याप्रमाणे त्यांनी जाहीर केलं (फेसबुक, १५ डिसेंबर २०२१ची पोस्ट). खुद्द राज्य सरकारचं पाठ्यपुस्तक मंडळ सक्षम करण्यापेक्षा एखाद्या केंद्रीय किंवा तथाकथित आंतरराष्ट्रीय पाठ्यपुस्तक मंडळाशी शाळा जोडणं, त्यातली इंग्रजी-हिंदी-मराठी ही उतरंड मान्य करणं, याचा हा अभिमान होता.

मुंबई महानगरपालिका ही भारतातली सर्वांत श्रीमंत नगरपालिका आहे. महाराष्ट्र हे राज्यही सकल घरेलू उत्पन्नाच्या निकषावर देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. एकीकडे इतकी आर्थिक श्रीमंती, इतकं भांडवल असलेल्या या प्रदेशातल्या स्थानिक भाषांची अवस्था कायम रड असल्यासारखी का, या प्रश्नाचं काही अंशी उत्तर एंगूगी यांच्या वर नोंदवलेल्या अवतरणात आहे : "मानसिक नियंत्रण नसेल तर आर्थिक नि राजकीय नियंत्रण कधीही पूर्ण किंवा परिणामकारक होऊ शकत नाही. एखाद्या लोकसमूहाच्या संस्कृतीचं नियंत्रण करणं म्हणजे इतरांच्या संदर्भात स्वतःची ओळख निश्चित करताना हे लोक जी काही साधनं वापरत असतील त्या साधनांचं नियंत्रण करणं." एखाद्या लोकसमूहाकडील इतक्या भांडवलाचं नियंत्रण करताना भाषेच्या माध्यमातून नागरिकांच्या मनांचं, आपल्या मूल्यसाठ्याचं नियंत्रण करणंही संबंधितांना आवश्यक वाटतं, मग त्यातून हा एक प्रकारचा नवा वसाहतवाद किंवा साम्राज्यवाद कार्यरत राहतो.

इंग्रजी माध्यमाचा विरोधाभास

कूमी कपूर या पन्नासहून अधिक वर्षं इंग्रजी पत्रकारितेचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी अलीकडे 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये 'इन्साइड ट्रॅक' या त्यांच्या सदरातून मुंबईतल्या हिंदी-मराठी वादावर टिप्पणी केली (इंडियन एक्सप्रेस, १३ जुलै २०२५). 'मराठा लेटकमर' या शीर्षकाखाली त्या म्हणतात, "माझा जडणघडणीचा बहुतांश काळ मुंबईत गेला असला तरी माझी मराठी अगदी बेताचीच आहे, ही शरमेची बाबही मला कबूल करायला हवी." त्यानंतर त्या मुंबईच्या बहुसांस्कृतिक इतिहासाविषयी लिहितात, इतर भाषक लोकही मुंबईत मोठ्या प्रमाणात असल्याचं नोंदवतात, आणि खुद्द बाळ ठाकऱ्यांच्या अनेक मुलाखती आपण इंग्रजीतच कशा घेतल्या हेही लिहितात! मुंबईचा बहुसांस्कृतिक वारसा नाकारता येणार नाही आणि रस्त्यावर येता-जाता कोणालाही मराठी बोलता येतेय की नाही यावरून कानाखाली वाजवणं हेही बरोबर नाही. पण कपूर यांचा लेख एवढं बोलून थांबत नाही. 'मराठी माणूस प्रत्यक्षात मुंबईमध्ये उशिराने स्थलांतरित झाला,' असा दावा त्या करतात. पुढच्या वाक्यात मुंबईतल्या बेटांवरचे मूळ रहिवासी कोळी मच्छिमार नि आगरी शेतकरी असल्याचं नोंदवतात, पण हे लोक कोणत्या भाषेत बोलत आले, हे मात्र नोंदवत नाहीत! या मूळ रहिवाशांची भाषा मराठी (ती तथाकथित प्रमाण मराठीच असायला हवी असं नाही) असेल तर, मग मराठी माणूस मुंबईत 'लेटकमर' कसा ठरतो! महाराष्ट्रातच नव्हे सगळ्या भारतात बहुतांश प्रांत बहुसांस्कृतिक आहेत, मुंबईतल्या पैशामुळे बहुसांस्कृतिकतेची रूपं वेगवेगळ्या तऱ्हेने आणि ठळकपणे दिसतात, पण तो इथला मुद्दा आहे का? 

लेखाच्या शेवटी कपूर लिहितात, इंग्रजीत बोलणं हा वसाहतवादाचा दुष्परिणाम असल्याचं म्हणणं ही सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची राजकीय फॅशन आहे, पण "बहुतांश भारतीयांसाठी इंग्रजी ही आकांक्षेची आणि महत्त्वाकांक्षेची भाषा आहे. आपल्या मुलांना खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवता यावं आणि शिकवण्यांची फी भरता यावी म्हणून आपण जास्त कमाईसाठी काम करतो, असं माझ्याकडचे जवळपास सर्वच घरगुती मदतनीस (घरगडी, मोलकरणी!) मला अभिमानाने सांगत आले आहेत!"

आपल्या घरात काम करायला येणाऱ्या लोकांना त्यांची मुलं इंग्रजीत शिकवण्यासाठी जास्त काम करावं लागतं, हे ती माणसं 'अभिमानाने' सांगतायंत, असं कपूर यांच्यासारख्या इतक्या ज्येष्ठ पत्रकाराला वाटतं, याचा संबंधही एंगूगींच्या अवतरणाशी जोडता येईल. 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये प्रदीर्घ काळ लेखन करत आलेल्या कपूर यांच्या वाचनात याच वृत्तसमूहाचा 'लोकसत्ता' हा मराठी पेपर येत नसणार, नाहीतर आठवडाभर आधी तिथे आलेली पुढील बातमी कदाचित त्यांच्या नजरेसमोरून गेली असती :

लोकसत्ता, ५ जुलै २०२५

पंच्याहत्तरी ओलांडलेले अंबादास पवार शेतजमिनीच्या मशागतीसाठी बैलांऐवजी स्वतःच्या खांद्यावरून जू ओढत असल्याचा व्हिडिओ जुलै महिन्याच्या सुरुवातीला समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणावर फिरला. मग त्यांना कोणी ट्रॅक्टरची मदत केली, कोणी कर्ज भरायला मदत केली, इत्यादी बातम्या येत राहिल्या. त्यातच ठाकऱ्यांचा विजयी मेळावा झाला त्याच दिवशी आलेल्या वरील बातमीत अंबादास पवार म्हणतात :
शेतीचं जमवून आणू हो, पण दोन नातवांच्या इंग्रजी शाळेचं शुल्क देण्यामुळे हैराण झालो. ... इंग्रजी शाळेचं शिक्षण काही परवडत नाही.
कूमी कपूर यांना त्यांच्या घरातील कामगार जी गोष्ट अभिमानाने सांगतायंत असं वाटत होतं, त्या गोष्टीचा प्रत्यक्षात त्या व्यक्तींना जाच होत असण्याची शक्यता आहे, हे प्रातिनिधिक 'जू' त्यांना झेपत नसण्याची शक्यता आहे! 

आधीच शेतीमुळे दयनीय आर्थिक अवस्था अनुभवणाऱ्या अंबादास पवार यांच्या कुटुंबियांना स्वाभाविकपणे त्यांच्या घरातली पुढची पिढी इंग्रजीतून शिकावीशी वाटते, किमान इंग्रजी शिक्षणाने आपल्या मुलांना रोजगाराची संधी मिळेल, त्यातून किमान स्थैर्य येईल, ही आशा स्वाभाविकच आहे (काहींच्या बाबतीत ते घडतही असतं; पण प्रमाणानुसार हे पाहायला हवं). ही अशी विरोधाभासाने ग्रासलेली दयनीय परिस्थिती निर्माण करण्यात राजकीय नेते, पत्रकार-विचारवंत-तज्ज्ञ यांच्यासारखे बुद्धिजीवी, आणि अर्थातच आर्थिक नाड्या हातात असणारे वर्ग, तसंच 'मराठमोळे'पणाच्या फक्त बाह्य खुणांमध्ये मश्गूल मध्यमवर्ग यांचा अधिक हातभार असल्याचं दिसतं. पण शेवटी अंबादास पवार यांची समस्या तर खरी आहे, पण त्यावर इंग्रजी माध्यम हा उपाय आहे की इंग्रजी ही एक भाषा म्हणून शिकवून त्या समस्येवर उपाय शोधता येईल, या प्रश्नाला धरून पुढच्या भागाकडे जाऊ.

मराठी शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी हाही विरोधाभासच का?

साधना, १५ जानेवारी २०००
राज्यातील मराठी शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी हा एक विषय म्हणून लागू करण्याचा निर्णय २००० साली लागू झाला. त्या वेळीसुद्धा वाद झाला होता. या वादाच्या विविध बाजू धुंडाळण्याचं काम 'साधना' साप्ताहिकाच्या १५ जानेवारी २००० रोजीच्या अंकात करण्यात आलं. त्यात तत्कालीन शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांची हरी नरके यांनी घेतलेली सविस्तर मुलाखत, भाषावैज्ञानिक अशोक केळकर यांचा पहिलीपासून इंग्रजीच्या निर्णयाला विरोध करणारा लेख, सरकारच्या निर्णयाचं समर्थन करणारा शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर यांचा लेख, इत्यादी मजकूर आहे. या तिघांचाच मजकूर पूर्ण वाचण्यासारखा आहे. 

या निर्णयाची घोषणा नोव्हेंबर १९९९मध्ये करण्यात आली आणि जून २०००मध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून तो लागू झाला. दरम्यानच्या काळात येणाऱ्या उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना यासंबंधी आवश्यक प्रशिक्षण देणं, इत्यादी गोष्टी मोरे यांच्या मुलाखतीत नोंदवलेल्या आहेत. शाळांशी संबंधित आवश्यक आकडेवारीपासून इतरही मुद्दे त्यांनी नोंदवले आहेत. त्यांचे काही मुद्दे असे: 
  • मातृभाषेमुळे कोणत्याही विषयाचं आकलन लवकर होतं. त्यामुळे प्राथमिक स्तरावर मातृभाषेतूनच शिक्षण मिळणं आवश्यक आहे. 'इंग्रजी माध्यमातून शिक्षण' आणि 'इंग्रजी इतर विषयांप्रमाणेच एक विषय म्हणून अभ्यासणं' यात गल्लत करता कामा नये. आम्ही माध्यम म्हणून नव्हे तर भाषा म्हणून हा निर्णय घेतलेला आहे..
  • इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले कोणत्या आर्थिक व सामाजिक स्तरातील असतात याचा शोध घेतल्यास असे आढळून येते की, इंग्रजी माध्यमवाले म्हणजे समाजातले उच्चवर्णीय ठरतात. इतर भाषिक आपोआपच हलके ठरतात. हा दृष्टिकोन बदलायचा असेल तर इंग्रजीचे फॅड दूर करावे लागेल. मात्र ते 'इंग्रजी हटाव'ने दूर होईल का? इंग्रजीच्या अध्ययनामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व येईल व सर्व ज्ञान आपोआप प्राप्त होईल असा माझा भ्रम व दावा नाही. तरीही इंग्रजी भाषा हा एक विषय इयत्ता पहिलीपासून सुरू केल्यास विद्यार्थ्यांना तो अतिशय उपयोगी ठरून त्यांच्या पालकांची सध्या होणारी पिळवणूक थांबेल आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास यातून त्यांची स्पर्धेत टिकून राहण्याची पात्रता उंचावेल. ही नवीन वर्णव्यवस्था मोडून काढून सर्व क्षेत्रांत मराठी भाषिक आघाडीवर रहावेत, म्हणून आम्ही ही उपाययोजना करीत आहोत.
  • एवढा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी मी या क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी तपशीलवार साधकबाधक चर्चा केलेली आहे. या निर्णयाचे होणारे सारे परिणाम अभ्यासून मगच विचारपूर्वक पावले टाकलेली आहेत. शिक्षण तज्ज्ञांबरोबरच शेतमजूर, मोलकरणी, हमाल, टॅक्सी-ड्रायव्हर, कामगार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांतल्या अनेकांशी मी स्वतः बोललो असता त्यांनी या निर्णयाचे खुल्या दिलाने स्वागत केले आहे. महाराष्ट्रात या निर्णयाचे सर्व स्तरांतून व्यापक स्वागत तर काही प्रमाणात विरोधी सूर असे सर्वसाधारण चित्र आहे. ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यातल्या काही 'सद्हेतूने' दिलेल्या आहेत, तर काही 'सहेतुक' आहेत, अर्थात मी सर्वांचे स्वागत करतो. त्यांचा आदरपूर्वक अभ्यास करूनच मी पुढे जाईन. कालच आम्ही या संदर्भात अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त केलेली आहे. राज्याच्या सर्व भागांतील या विषयातील नामवंत तज्ज्ञ या समितीत असून, 'संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद' हे या समितीचे अध्यक्ष आहेत. २३ नामवंत तज्ज्ञांची ही समिती ३१ जानेवारी २००० पर्यंत इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम तयार करील व तोच जून २००० पासून कार्यान्वित होईल.
पहिलीपासून हिंदी नको, मग इंग्रजी कशी चालते? यात विरोधाभास नाही का? असे प्रश्न मराठीसंबंधी काम करणाऱ्या काही मंडळींनी पूर्वीही विचारले आहेत. इंग्रजीसंबंधीचा हा निर्णय जगाच्या बदललेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने झालेला आहे. या बदलाची चिकित्सा वेगळी करता येईल. पण सध्या जे काही समोर आहे त्यात एखाद्या मुला-मुलीला आयटीआयचा कोर्स करायचा असेल किंवा आयआयटीमध्ये जायचं असेल, तरी इंग्रजीची किमान ओळख व्हावी लागते. ही ओळख मराठी शाळांमध्ये पाचवीपासून होत होती (त्याआधी आठवीपासून होत होती), पण त्यापेक्षा ती ओळख पहिलीपासूनच झाली तर एक भाषा म्हणून मराठी अवकाशातली मुलं इंग्रजीला बिचकणार नाहीत, अशा उद्देशातून हा निर्णय झाल्याचं मोरे म्हणतात. मीना चंदावरकर यांनी याच भूमिकेतून पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचं समर्थन केलं आहे. त्यातले मुद्दे मोरे यांच्याशी जुळणारे आहेत आणि चंदावरकरांनी स्वतःच्या अनुभवातील काही निरीक्षणांची आवश्यक जोडही त्याला दिली आहे..

अक्षरलेखन : र. कृ. जोशी, मॅजेस्टिक, १९८३
या आवृत्तीचं मुखपृष्ठ सापडलं नाही
या निर्णयाला विरोध करणारे तीन लेख वरील अंकात आहेत, त्यातला भाषावैज्ञानिक अशोक केळकर यांचाच लेख महत्त्वाचा आहे. 'साधना'तल्या लेखाव्यतिरिक्त 'वैखरी' (मॅजेस्टिक बुक स्टॉल, १९८३) आणि 'मध्यमा' (मेहता पब्लिशिंग हाऊस, १९९६) या त्यांच्या इतर दोन पुस्तकांमध्ये या मुद्द्यावरचं त्यांचं लेखन आलंय, त्याचेही संदर्भ इथे विचारात घेऊ. त्याआधी, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून असण्याची आवश्यकता इतर अनेकांप्रमाणे केळकरांनीही अर्थात नोंदवलीच आहे. पण पुढे-पुढे शिक्षणातल्या विषयांच्या वैविध्यानुसार इतर भाषाही स्वीकारण्याबद्दल ते मांडणी करतात, ती स्वतंत्रपणे वाचण्यासारखी आहे. आत्ता एकाच मुद्द्यापुरतं बोलू.

पहिलीपासून इंग्रजी हा विषय शिकवण्याला विरोध करताना केळकरांनी 'साधना'तल्या लेखात मांडलेला एक मुद्दा असा : "स्वभाषेचा पाया पक्का व्हायच्या आधीच दुसरी भाषा घुसवणे म्हणजे लहान वयात मुलांवर ताण पडणे, स्वभाषेचा पाया कच्चा राहणे, आणि इंग्रजीचा पायाही कच्चा राहणे अशा तिहेरी अन्यायाला आमंत्रण देणे आहे." 

पण १९८९ साली केळकरांनी लिहिलेला दुसरा एक लेख या संदर्भात पाहायला हवा. 'महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रातील मराठी भाषेचे स्थान' या विषयावर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी एक बैठक बोलावली होती (पवारांच्या नेतृत्वाखालील विद्या प्रतिष्ठानाने बारामतीत १९७२ सालीच इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली, हेही एक जाताजाता लक्षात ठेवता येईल! पण किमान मुख्यमंत्री असताना तरी ही बैठक बोलावली, एवढं आहे). या बैठकीसमोर तीन टिपणं ठेवली होती. त्या टिपणांना प्रतिसाद देत केळकरांनी लिहिलेला लेख 'मध्यमा' या त्यांच्या पुस्तकात समाविष्ट आहे. यात ते लिहितात :
[बैठकीत तज्ज्ञांसमोर विचारार्थ ठेवलेल्या टिपणांपैकी] टिपण क्रमांक, १..मध्ये सुचवलेला बदल ('पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणात इंग्रजी हा फार तर विषय म्हणून ठेवावा. पण माध्यम म्हणून अजिबात राहू देऊ नये') रास्त आणि सध्याच्या विपरीत अवस्थेशी जरुरीपुरतेच जमवून घेणारा म्हणून व्यवहार्य वाटतो.
मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणात इंग्रजी हा फार तर विषय म्हणून ठेवावा, पण माध्यम म्हणून अजिबात राहू देऊ नये, हा बदल रास्त आणि सध्याच्या विपरीत अवस्थेशी जरुरीपुरतेच जमवून घेणारा म्हणून व्यवहार्य वाटतो- असं विधान १९८९ साली करणाऱ्या केळकरांना २००० साली मात्र पहिलीपासून इंग्रजी शिकवली गेल्यास मराठीचाही पाया कच्चा राहील असं वाटतं, हे कसं?  विविध कारणांमुळे अवस्था विपरीत आहे, हे ते मान्य करतात. या परिस्थितीशी जरुरीपुरतं जमवून घेण्यासाठी पहिल्या इयत्तेपासून इंग्रजी आणली तर ते 'व्यवहार्य' असल्याचंही मान्य करतात. मग २००० साली त्यांचा आक्षेप नक्की कोणत्या आधारावर आहे. याबद्दलचे त्यांचे आक्षेप भाषाविज्ञानाच्या अंगाने जाणारे नाहीत, तर मुख्यत्वे आपल्या एकंदर शैक्षणिक संस्थांच्या कमकुवत कसाशी संबंधित आहेत. ते मुद्दे स्वतंत्रपणे रास्त असले तरी ते केवळ भाषाविषयांना लागू होणारे नाहीत; आपल्या एकंदर शिक्षणव्यवस्थेसंबंधी ते बोलता येईल (खरंतर, याबाबतीत प्रस्तुत लेखकाचं मत टोकाचं आहे, कारण या देशातल्या किंवा परदेशातल्याही आधुनिक शिक्षणव्यवस्थेत व्यक्ती नक्की कुठपर्यंत स्वतंत्र विचार करू शकते, याविषयी शंका वाटत राहते. कागदोपत्री 'जरुरीपुरतं' जमवून घ्यायचा व्यवहार म्हणून ठीक आहे). शिवाय, पुढे केळकरांनी शाळांचा कस अनुमानाच्या आधारे देऊन शिक्षणसंस्थांची वर्गवारी केलेय, त्या वर्गवारीतल्या भयंकर धोकादायक विरोधाभासांवर स्वतंत्रपणे बोलावं लागेल. पण एकदा एखादी गोष्ट व्यवहार्य म्हणून 'जरुरीपुरती' योग्य वाटली असताना अकरा वर्षांनी तिला पूर्ण विरोध करण्याऐवजी केळकरांसारख्या विद्वानाने त्या व्यवहारात दुरुस्त्या सुचवणं अधिक रास्त वाटतं. विशेषतः या अकरा वर्षांच्याच दरम्यान भारताने आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, इतर बऱ्या-वाईट बदलांचा वेग वाढायला सुरुवात झाली, जागतिकीकरणाचा मुद्दा अधिक चर्चेत आला, इत्यादी. म्हणजे भाषेच्या या मुद्द्यातली 'विपरित' परिस्थिती आणखी तीव्र झाली. मग त्यावरच्या व्यावहारिक उपायाचाही आणखी धड विचार त्यांनी तरी करायला हवा होता. [अशोक केळकरांच्या लेखनाविषयी खूप आस्था आणि आदर वाटत असूनही या विशिष्ट बाबतीत त्यांनी सुचवलेल्या काही गोष्टींशी सहमत होता आलं नाही. त्या असहमतीची मांडणी करत गेल्यावर ही नोंद दुपटीने वाढली, शिवाय विषयांतरही होऊ शकतं. त्यामुळे सध्या वरच्या एका मुद्द्यावरून केळकरांच्या मांडणीतील विरोधाभास स्पष्ट होईल, असं वाटतं.]

एका आदिवासी समूहाच्या भाषेत पाच किंवा सातपर्यंतच अंक मोजण्यासाठीचे शब्द आहेत. त्या समूहाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत याहून अधिक अंकमोजणी गरजेची भासली नाही, त्यामुळे ते स्वाभाविक. त्यात मागास किंवा प्रगत असा मूल्यनिवाडा नको. पण आता सध्याचं गणित शिकावंसं वाटलं तर त्या समूहातल्या मुला-मुलीला पाच वा सातच्या पुढे दुसऱ्या भाषेतले अंक घ्यावे लागतात. तसं मराठीलाही एका ठराविक टप्प्यानंतर गणित किंवा विज्ञान या विषयांसाठी इंग्रजी स्वीकारावी लागते. पण पहिले पाच अंक माझ्या आदिवासी भाषेतून येणं, त्यासोबतचा मूल्यसाठा आणि स्मृतिसंचय माझ्यासोबत असणं आवश्यक आहे की नाही? शेवटी, गणित नि विज्ञान यांचं उपयोजन आपण कोणत्या समाजात आणि संस्कृतीत करतोय याविषयीचं सजग भान कशातून येईल? असे प्रश्न विचारात घेता येतील. त्याहून महत्त्वाचं म्हणजे गणित नि विज्ञान हे सोडूनही बरेच विषय जगात आहेत, त्यासाठी मातृभाषा/स्वभाषा यांचं स्थान किती नि कसं महत्त्वाचं आहे हे अनेकांनी नोंदवलं आहेच. "ज्ञानाची खिडकी इंग्रजीची असली तरी या खिडकीतून पाहणारे डोळे स्वभाषेचेच पाहिजेत. नाहीतर ज्ञानाचे रूपांत माहितीच्या अडगळीत," अशी केळकरांची या मुद्द्यावरची अगदी समर्पक टिप्पणी आहे (मध्यमा, पान २१).

इतरही कारणाने माणूस दुसऱ्या भाषांचा स्वीकार करतो. उदाहरणार्थ, एक साधारण पस्तिशीतला मारवाडी माणूस. त्याला दोन मुलगे नि एक मुलगी. राजस्थानात शेतजमीन आहे, पण कुटुंबातली खायची तोंडं वाढल्यावर जमिनीचा आकार उपजीविकेसाठी पुरेसा न ठरल्यामुळे माणसं इतर राज्यांमध्ये रोजगाराच्या शोधात गेली. हा माणूस, त्याच्याआधी त्याचा भाऊ अशी मंडळी कोकणात आली. कपड्यांच्या दुकानात तो काम करतो. पंधराएक वर्षं होऊन गेली. त्याला मराठी येते, बायकोला मराठी येत नाही, तीनही मुलं मराठी शाळेत शिकतात. शेवटी आपण व्यवसाय ज्या समाजात करतोय तिथली भाषा यायला हवी, इतपत त्यामागचा उद्देश. या शाळेत मुलांना औपचारिक इंग्रजी संभाषणाचं कौशल्य शिकवण्यासाठी प्राथमिक इयत्तांसाठी एक शिक्षिका नेमली. तिला हा मारवाडी मनुष्य म्हणाला, "हे बडं आहे. आता ते टेन्शन नाई. मुलाला इंग्लिश शाळेत घातलं का नाई, आता तो प्रॉब्लेम नाई." या माणसाची मातृभाषा मराठी नसूनही त्याला उपजीविकेच्या कारणामुळे मराठी कामापुरती स्वीकारावी लागते, पण इंग्रजी ही जगात गरजेची होत असल्याचं ओझंही जाणवतं, ते मुलांसाठी हलकं होणार असल्याची शक्यता त्याला दिलासा देते. त्यात अध्यापनाच्या दृष्टीने दुरुस्ती सुचली तर सुचवायला हवीच, पण त्या माणसाच्या जगण्याची दखल घेऊन यावर बोललेलं बरं.

आणखी एक उदाहरण : स्टेट बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरीमध्ये शिकणारा, सात वर्षांचा मध्यमवर्गीय मराठी घरातला एक मुलगा. त्याला विचारलं, "शाळेत इंग्रजी बोलतोस का?" तो म्हणाला, "आमाला शाळेत इंग्लिशच बोलायला लावतात, आणि कसंय ना, टीचर सगळे एकमेकांशी मराठीत बोलतात, मग काय. आमाला इंग्लिश." हे दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा भेटल्यावर मी विचारलं नसतानाही स्वतःहूनच तक्रारीच्या सुरात सांगितलं. ही तक्रार कशाबद्दलची आहे? आपण स्वाभाविकपणे बोलतो ती भाषा, आपले शिक्षक स्वाभाविकपणे बोलतात ती भाषा  शाळेत मात्र अजिबात बोलायची नाही, याला काय म्हणतात? याला पारतंत्र्याचंच एक रूप म्हणता येतं. एंगूगी म्हणतायंत ते मनाचं नियंत्रण यातून होत असतं. "इंडियाने भारतावर राज्य करावे असा हा भयावह अंतर्गत साम्राज्यवाद रुजतो आहे, पाळेमुळे घट्ट करतो आहे," अशी केळकरांची टिप्पणीही इथे आठवते (मध्यमा, पान २१). 

हे पेच 'मराठमोळ्या माधुरीचं मराठी' ऐकून सुटणारे नाहीत. प्रसारमाध्यमं, राजकीय नेते, आणि इतरही अनेक धुरीणांना मराठीच्या केवळ बाह्य बटबटीत खुणा पुरेशा वाटतात. कोणी एकसाची धर्मसांस्कृतिक राष्ट्रवादी (आणि अंतर्गत वसाहतवादी) विचारातून या खुणांचा वापर करतंय, तर कोणी केवळ तात्कालिक अस्मितेच्या राजकारणापुरतं त्याकडे बघतंय. अशा वेळी भाषेसोबत येणारा मूल्यसाठा, सामूहिक स्मृतिसंचय, संस्कृतीसाठी लागणारा संवाद, हे एंगूगींचे मुद्दे कोणी ऐकेल का? [मराठीबद्दल बोलताना अर्थातच मराठी अवकाशात राहावं लागणाऱ्या इतर भाषांबद्दलही बोलायला हवं. त्याबद्दल ९ ऑगस्टच्या नोंदीत काही प्रातिनिधिक उदाहरणांसह बोलायचा प्रयत्न करतो].

30 June 2025

आदिवासी गावाच्या गोष्टीतून विकासाची दृष्टी यावी : मनिष कुंजाम

मनिष कुंजाम हे छत्तीसगढमधील बस्तर भागात गेली जवळपास चार दशकं राजकीय-सामाजिक कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहेत. छत्तीसगढ राज्याची निर्मिती होण्याआधी तत्कालीन मध्य प्रदेश विधानसभेमध्ये ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने (भाकप) दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेले (१९९०-९८). बस्तरमध्ये २०१२ साली सुकमाच्या जिल्हाधिकाऱ्यांचं माओवाद्यांनी अपहरण केलं तेव्हा संबंधित अधिकाऱ्याला सोडवून आणण्यात कुंजाम यांची महत्त्वाची भूमिका होती. तसंच, माओवाद्यांविरोधातील कारवाईचा भाग म्हणून छत्तीसगढ राज्य सरकारच्या सक्रिय पुढाकाराने सुरू झालेल्या वादग्रस्त ‘सलवा जुडुम’विरोधात जनहित याचिका दाखल करण्यांपैकी एक कुंजाम होते (सर्वसामान्य लोकांचीच सशस्त्रं दलं उभी करून माओवाद्यांविरोधात त्यांना लढवण्याचं सलवा जुडुम हे अभियान बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने २०११ साली दिलेल्या निकालात म्हटलं. ही दलं तत्काळ रद्द करावीत, असे आदेश न्यायालयाने दिले). अखिल भारतीय आदिवासी महासभेचे ते अध्यक्ष राहिले आहेत. अलीकडे त्यांनी भाकपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन डिसेंबर २०२४मध्ये ‘बस्तरिया राज मोर्चा’ हा स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला.

गेले वर्षभर केंद्र सरकारच्या पुढाकाराने बस्तरमध्ये माओवाद्यांविरोधात अधिक तीव्र कारवाया होत आहेत. केंद्रीय गृह मंत्र्यांनी मार्च २०२६पर्यंत माओवाद संपवणार असल्याचं जाहीर केलंय. या कारवायांमध्ये काही दिवसांपूर्वी माओवादी पक्षाचे सरचिटणीस बसवाराजू हेही मारले गेले. महाराष्ट्रातही गडचिरोलीत या संदर्भातील कारवाया अधिक वेगाने होताना दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर एकंदर आदिवासी अवकाशातील शांततेच्या शक्यता, सरकारची आणि माओवाद्यांची भूमिका, विकासप्रक्रियेचे परिणाम, याबद्दल कुंजाम यांच्याशी साधलेला हा संवाद.

मनिष कुंजाम

प्रश्न : तुम्ही २०१३ साली सरकार आणि माओवादी यांच्यात शांततेबाबत संवाद व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. तेव्हा काही चर्चा झाली नाही, पण आता माओवादी पक्ष सातत्याने सरकारला शस्त्रसंधीचं आणि चर्चेचं आवाहन करतोय. तर तुमचा आधीच्या प्रयत्नांबाबतचा अनुभव कसा होता आणि अशा चर्चेच्या पुढे काही शक्यता तुम्हाला दिसतात का?

कुंजाम : आम्ही अखिल भारतीय आदिवासी महासभेच्या वतीने मार्च २०१३मध्ये पंधरा दिवस एक पदयात्रा काढून माओवाद्यांना आणि सरकारलाही शांततेसाठी चर्चा करण्याचं आवाहन केलं. पदयात्रेदरम्यान दांतेवाडा, सुकमा, जगदलपूर इथे तीन मोठ्या सभा झाल्या. त्याला स्थानिक लोकांचा मोठा पाठिंबाही मिळाला. पण पदयात्रा काढणारे शांततेबद्दल बोलून ‘जनवादी क्रांती’ कमकुवत करतायत, असा आरोप माओवाद्यांनी त्यावेळी व्यक्तीशः माझ्यावरही केला. त्या वेळी माओवाद्यांची ताकद मोठी होती. वास्तविक तेव्हा त्यांनी काही मागण्या केल्या असत्या तर सरकारलाही त्या मान्य करणं भाग पडलं असतं, असं तेव्हाचं वातावरण होतं. पण तेव्हा आमचं आवाहन त्यांनी ऐकलं नाही. आता माओवादी शांततेच्या चर्चेसाठी विनंती करतायंत, यामागे त्यांची विवशता आहे. आता ते थकलेत आणि सर्वसामान्य लोकांचाही आधीसारखा पाठिंबा त्यांना मिळत नाहीये. शिवाय, बस्तरच्या जागोजागी निमलष्करी दलांच्या छावण्या उभ्या आहेत. 

काहीही असलं तरी, शांततेसाठी चर्चा व्हायला हवी, असंच मला वाटतं. माओवादी चळवळ काही केवळ बस्तरमध्ये नाहीये, त्यामुळे इतर ठिकाणी ती डोकं वर काढू शकतेच. बस्तरमध्येही बराच भाग जंगलांनी व्यापलेला आहे. इकडे करेगट्टाच्या डोंगरांमध्ये सुरक्षा दलांनी कारवाई केली, तेव्हा जवानांना वाट काढण्यासाठी वीस दिवस लागले [बिजापूरजवळच्या डोंगररांगांत मे २०२५मध्ये झालेल्या या कारवाईत तीसहून अधिक माओवाद्यांना सुरक्षा दलांनी मारल्याचं सांगितलं जातं]. या जंगलात अशा अनेक दुर्गम ठिकाणी शस्त्रनिर्मितीचे छोटे कारखाने आहेत, शस्त्रसाठे लपवण्यात आलेत. त्यामुळे केवळ आत्ता माओवाद्यांविरोधात कारवाया करून शांतता निर्माण होणार नाही. माओवाद्यांनी, त्यांच्या नेत्यांनी स्वतःहून शस्त्रं खाली ठेवली तर हे साठे बाहेर येतील, आणि भविष्यात त्यांच्या सशस्त्र कारवायांची शक्यता उरणार नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करायलाच हवी. पुन्हा हिंसा उद्भवू नये, निरपराध लोक मरू नयेत, यासाठी हे गरजेचं वाटतं.

प्रश्न : पण सरकार चर्चेऐवजी सशस्त्र कारवाई करूनच माओवाद संपवण्याच्या पवित्र्यात दिसतंय..

कुंजाम : माओवादीच नाही, तर कोणीही आधी गुन्हेगार असेल संविधानाला मानत नसेल, पण आता तो शस्त्र सोडून संविधानाच्या चौकटीत चर्चा करायला तयार असेल तर, लोकशाही सरकारने त्यांच्याशी चर्चा तर करायला हवी. ईशान्य भारतात आणि काश्मीरमध्ये विविध अतिरेकी गटांशी सरकार चर्चा करतं, मग माओवाद्यांशी चर्चा करायची नाही ही भूमिका घेणं बरोबर नाही. ‘मरा नाहीतर शरण या’, असा सरकारचा पवित्रा चुकीचा आहे. 

माझं तर असं म्हणणं आहे की, सरकारला माओवाद पूर्णपणे संपवायचाच नाहीये. छोट्यामोठ्या माओवादी कारवाया होत राहिल्या तर मग लोकशाही, सांविधानिक, अहिंसक मार्गाने होणारी आंदोलनं चिरडण्यासाठी संबंधित कार्यकर्त्यांवर ‘नक्षलवादी’ असल्याचा शिक्का मारता येतो, ‘यूएपीए’सारखे (बेकायदेशीर कृत्यं प्रतिबंधक अधिनियम) कठोर कायदे वापरून कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबता येतं. झारखंडमध्ये अशी दलं कॉर्पोरेट कंपन्यांच्या पाठिंब्याने टिकवून ठेवलेली आहेत. बस्तरमध्ये मोठ्या प्रमाणात असणारी नैसर्गिक संसाधनं बळकावणं, हेच यामागचं कारण असल्याचं दिसतं. अशा संसाधनांच्या लुटीला सांविधानिक मार्गाने विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर मग माओवादाच्या / नक्षलवादाच्या बहाण्याने कारवाई करता येईल. नक्षलवाद संपला तर इथे इतक्या प्रमाणात उभारलेल्या पोलिसांच्या छावण्या सुरू ठेवण्याचं काही निमित्त उरणार नाही.  

प्रश्न : संसाधनांचा मुद्दा विकासाच्या संकल्पनेशी जोडलेला आहे. आपली विकासाची मुख्यप्रवाही कल्पना जोवर कायम आहे तोवर त्यासाठी लोहखनिजापासून कोळशापर्यंत नि युरेनियमपर्यंत नैसर्गिक संसाधनं लागणार, ती बस्तरसारख्या आदिवासीबहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. मग माओवाद असो वा नसो, हिंसा असो वा नसो, स्थानिक आदिवासी अवकाशाचं शोषण होण्याची शक्यता राहीलच. त्यावर काय करता येईल, असं तुम्हाला वाटतं?

कुंजाम : बस्तरचा हा भाग पाचव्या अनुसूचीमध्ये येतो. इथे पेसा कायदा (पंचायतींचा अनुसूचित क्षेत्रांमध्ये विस्तार अधिनियम, १९९६) लागू होतो. त्यानुसार गौण खनिज आणि लघुवनउपज यासंबंधीचे निर्णय घेण्याचे अधिकार ग्रामसभांना आहेत. शिवाय, राष्ट्रीयकृत खनिजांच्या बाबतीत उत्खनन करायचं असेल तरी स्थानिक ग्रामसभांची संमती घ्यावी लागते. अशा वेळी आदिवासींची या विकासात भागीदारी असायला हवी. 

छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश किंवा कुठेही असो, या सर्व खाणी आणि संसाधनं मुख्यत्वे आदिवासी भागांमध्येच आहेत. मग उत्खनन होतंय त्या ठिकाणच्या आदिवासींची अवस्था काय आहे? त्यांचं काही भलं झालंय का? या खाणप्रकल्पांमधून कंपन्यांना होणाऱ्या नफ्यातला अर्धा वाटा आदिवासींना द्यायला काय हरकत आहे? सरकार मालामाल होतं, मोठमोठे भांडवलदार मालामाल होतायंत, कंपन्या सगळं घेऊन जातायंत, पण आदिवासींना काय मिळालं? हा विकास कोणाचा आहे? देशाच्या विकासासाठी आदिवासी बळी गेले, त्यांनी इतकी संसाधनं दिली, त्या बदल्यात आदिवासींना काय मिळालं? आत्ता फक्त पंधरा-वीस उद्योगपतींच्या दृष्टीने विकास होतोय. तसं कसं चालेल!

आमच्या इथे गावाबद्दलचा एक सामाजिक विचार आहे, त्यामागे एक सांस्कृतिक धारणा आहे. गाव ही एक स्वतंत्रपणे उभी असलेली कहाणी असते, गोष्ट असते. त्याला १९९६ सालच्या पेसा कायद्याने मान्यता दिली. त्यातून ग्रामसभेला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला. त्यामुळे इथल्या विकासाच्या निर्णयांमध्ये गावाचा प्राधान्याने सहभाग असायला हवा. पण प्रत्यक्षात गावाबद्दलच्या विकासाच्या योजना तयार करताना त्यात गावकऱ्यांना सहभागी केलंच जात नाही. आम्ही वेगळी मागणी करतच नाहीयोत, आम्ही या कायद्याची अंमलबजावणी करा, एवढंच म्हणतोय. दिल्लीत किंवा रायपूरला बसून कोणीतरी विकासाचा आराखडा तयार करायचा आणि तो इथे अंमलात आणायचा, असं करून चालणार नाही. तुम्ही प्रशासकीय पातळीवर सल्ला द्या, पण योजना लादू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे.

प्रश्न : अशा प्रकारच्या संसाधनांमुळे उत्पन्न होणाऱ्या संघर्षांवर तुम्ही अहिंसक, सांविधानिक मार्गांनी प्रतिकार करत आला आहात. टाटा, एस्सार, इत्यादी कंपन्यांबाबतीत तुमचे लढे यशस्वीही झाले आहेत. सलवा जुडूमविरोधातला न्यायालयीन लढाही यशस्वी झाला. पण दीडेक वर्षांपूर्वी मध्य भारतात अनेक ठिकाणी सांविधानिक, अहिंसक मार्गाने खाणींविरोधात आंदोलनं झाली, त्याची कोणतीच दखल मुख्यप्रवाही माध्यमांनी घेतली नाही किंवा सरकारनेही त्यावर प्रतिसाद दिला नाही. गडचिरोलीत सूरजागड खाणीविरोधात सुरू असणारं असं आंदोलन सरकारने एके दिवशी कारवाई करून संपवलं. या आंदोलनांना माओवाद्यांनी पाठिंबा दिला होता, हे खरं; पण शेवटी त्यात सहभागी सगळी माणसं काही माओवादी नव्हती, आणि प्रत्यक्ष माणसं लोकशाही मार्गाने काही बोलत होती, त्यावर सरकारने तसा प्रतिसाद द्यायला नको?

कुंजाम : अप्रत्यक्षपणे माओवाद्यांचा संबंध असेल अशा आंदोलनांकडे दुर्लक्ष करणं, त्यातल्या मागण्यांबाबत उदासीन राहणं, यासाठी सरकारला आयतंच निमित्त मिळतं. त्यामुळेच सशस्त्र लढाई थांबवून प्रतिकार करण्याची गरज आहे. गांधीजी निःशस्त्रपणे सरकारला जाब विचारायचेच ना. आम्ही अगदी अलीकडे, २०१९ साली बैलाडिलामधल्या १३ नंबरच्या खाणीचं अडानी कंपनीला मिळालेलं कंत्राट आंदोलन करून रद्द करायला लावलं. [राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ व छत्तीसगढ खनिज विकास महामंडळ यांनी संयुक्तरीत्या हाती घेतलेल्या बैलाडिला डोंगररांगांमधल्या प्रकल्पात खाण-उत्खननाचं कंत्राट डिसेंबर २०१८मध्ये अडानी उद्योगसमूहाला देण्यात आलं. यातील १३ क्रमांकाच्या खाणीत सुमारे २५ कोटी टन लोहखनिज असल्याचा अंदाज आहे. पण त्याच डोंगरावर नंदराज या स्थानिक देवाचं मंदिर आहे, शिवाय या खाणकामासाठी ग्रामसभेची परवानगी बनावटपणे घेण्यात आल्याचा आरोप होता. यावरून सदर खाणीला लोकांनी एकत्र येऊन विरोध केला आणि अखेर खाणीचं काम रद्द करावं लागलं].

शेवटी, आपल्या हातात दुसरं काय आहे? ‘जल-जंगल-जमीन’च्या मुद्द्यावर लोकांनी एकत्र येऊन सरकारला जाब विचारणं, ते अहिंसक मार्गाने करणं, एवढंच आपण करू शकतो.

प्रश्न : तुम्ही इतकी वर्षं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होतात, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्येही होतात. मागच्या विधानसभा निवडणुकीत निवडणूकचिन्ह न मिळाल्याने पक्षनेतृत्वाशी वाद होऊन तुम्ही पक्ष सोडलात. तर, कम्युनिस्ट पक्षाचा एकंदर मानवी व्यवस्थेकडे पाहण्याचा विचारसरणीतून आलेला एक दृष्टिकोन आहे. आता तुम्ही ‘बस्तरिया राज मोर्चा’ हा पक्ष काढला आहे, त्यात बस्तर या स्थानाचा उल्लेख आहे. म्हणजे तुमचा विचारसरणीच्या पातळीवरचा प्रवास कम्युनिझम / मार्क्सवाद यांसारख्या तत्त्वज्ञानाकडून एका स्थानीय दृष्टीकडे झाला, असं म्हणता येईल का? वर्गीय दृष्टीकडून स्थानीय दृष्टी, स्थानीय संस्कृती, या दिशेने झालेला हा बदल आहे का?

कुंजाम : विद्यार्थीदशेत माझ्यावर मार्क्स-लेनिन यांचा प्रभाव पडला. तो विचार तर राहणारच. तो गरीबांच्या बाजूचा विचार आहे. इथे मुख्यत्वे स्थानिक लोकच गरीब आहे. याउलट, गैरबस्तरिया असणारे बाहेरचे लोक, कंत्राटदार, व्यापारी यांचा संसाधनांवर ताबा आहे. ते शोषण करण्यासाठीच इथे आल्यासारखी परिस्थिती आहे. अशा शोषणाविरोधातल्या लढ्याचा इतिहास बस्तरला आहेच. १९१० साली इथे ‘भूमकाल विद्रोह’ झाला. त्या काळी ब्रिटिशांनी इथली जंगलं राखीव करून फक्त काही कंपन्यांना तिथली वनउपज वापरायला परवानगी देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ‘जल-जंगल-जमीन’च्या मुद्द्यावर इथल्या सर्व स्थानिक जाती-जमातींनी एकत्र येऊन उठाव केला. आम्ही तेच करतो आहोत. लोकशाहीच्या अहिंसक मार्गाने करतोय. आधीही हेच करत होतो.

प्रश्न : पण आता तुम्ही पक्षाच्या नावात विशिष्ट स्थानाचा ठळक उल्लेख केलाय [म्हणजे फक्त भारतातला पक्ष म्हणून ‘भारतीय’ असं नावामागे लावणं वेगळं, पण स्थानविशिष्ट संस्कृतीची खूण म्हणून स्थानाचा ठळक उल्लेख वेगळा; बस्तरिया राज मोर्चामधला उल्लेख तसा दिसतो], त्यामुळे तुमच्या राजकारणाची वाट बदलली असं म्हणता येईल का?

कुंजाम : वाट हीच होती. आता अधिक स्पष्टता आली, असं म्हणता येईल.

प्रश्न : बस्तरला स्वायत्त राज्याचा दर्जा द्यावा, अशीही तुमची मागणी आहे. अशीच स्वायत्त भिल्ल प्रदेशाची मागणी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान मध्य प्रदेश इथल्या हद्दीवरील भिल्ल आदिवासी समूह काही काळापासून करू पाहतायंत.

कुंजाम : हो, ही आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. खरं म्हणजे कम्युनिस्ट पक्षाने १९६७-६८ दरम्यान जगदलपूरला किसान सभेच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव मांडला होता. बस्तरला सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावं, अशी मागणी त्या प्रस्तावात केली होती. १९९५-९६ सालीसुद्धा इथे सहावी अनुसूची लागू करण्यासाठी दीर्घ आंदोलन झालं होतं. [भारतीय संविधानातील अनुच्छेद २४४ (१) व (२) यांमध्ये पाचव्या अनुसूचीची व सहाव्या अनुसूचीची तरतूद आहे. देशातील ईशान्य भारत वगळता इतर आदिवासीबहुल प्रदेशांमध्ये पाचवी अनुसूची लागू होते; तिथे ग्रामसभांना इतर अधिकारांसोबतच त्यांच्या क्षेत्रातील संसाधनविषयक निर्णयांबाबत विशेषाधिकार आहेत. सहावी अनुसूची ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोरम इथल्या आदिवासी भागांमध्ये लागू असून तिथे इतर स्वायत्त अधिकारांसोबतच प्रशासकीय अधिकारही स्थानिक पातळीवरील जिल्हा मंडळांकडे असतात. बस्तर पाचव्या अनुसूचीखाली येतं]. खरं म्हणजे पाचव्या अनुसूचीतल्या जिल्हा पंचायतींना सहाव्या अनुसूचीखालील प्रदेशांमधल्या जिल्हा पंचायतींसारखे अधिकार द्यावेत, असं ‘पेसा कायद्या’तच म्हटलं आहे. त्यामुळे स्वायत्ततेचा विस्तार कायद्यातच अपेक्षित आहे.

प्रश्न : तुम्ही स्वायत्ततेविषयी बोललात, बाहेरचे आणि स्थानिक, असा उल्लेख केलात. पण माणसं तर कोणत्या ना कोणत्या कारणाने इकडून तिकडे जातच राहणार. तर या बाहेरच्या लोकांचं स्थान काय, त्यांची इथे काय भूमिका असायला हवी, असं तुम्हाला वाटतं? 

कुंजाम : होय, हा आपल्या सर्वांचा देश आहे. त्यामुळे सर्वांनी इथे यायला हवं. पण आदिवासी भागांचं आदिवासीपण टिकायला हवं. इथला विकास आदिवासींच्या दृष्टीतून व्हायला हवा. फक्त बाहेरून इथे येऊन जमिनी घ्यायच्या, इमारती बांधायच्या, असं करून चालणार नाही. बाहेरून आलेल्यांनी स्थानिक अवकाशाविषयी सहानुभूती आणि संवेदनशीलता राखायला हवी. बाहेरून आलेले सगळेच काही लूट करायला आलेले नसतात, पण अनेक जण तसं करतात, त्यांचा आदिवासींनी विरोध करायला हवा. सरकारं बदलतील, पण काही बाबतीत स्थायी विरोधकाची भूमिका आदिवासींना निभवावी लागेल. तरच आदिवासी समुदायांचं काही हित साधणं शक्य आहे.

प्रश्न : इथे लोक इतकी दशकं रक्तपात अनुभवत आलेत, इतक्या लोकांचे अश्रू इथे वाहत आलेत. त्यामुळे कितीही शांतता आल्याचं म्हटलं तरी इथे एक प्रकारचं युद्धच सुरू होतं, त्या सर्व काळाचा आघात लोकांच्या मनांवर झालेला असतो. त्यावर काय उपाय असू शकतो?

कुंजाम : या सर्व भागात लोकशाही मार्गाने सुरू असलेला लढा आणखी तीव्र करायला हवा. नागरी सुविधांचा विस्तार व्हायला हवा, रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा. तसंच, ‘जल-जंगल-जमीन’चा लढा सुरू राहायला हवा. शेवटी आदिवासींचं अस्तित्वच जमिनीवर, जंगलांवर अवलंबून आहे. त्यांच्याकडून जमीन हिरावून घेतली तर त्यांच्या हातात काय उरेल? त्यामुळे आदिवासींचा विकास आदिवासी दृष्टीतून व्हायला हवा. हाच यावरचा उपाय दिसतो. तशी आमची अपेक्षा तरी आहे. आपण याहून अधिक काय करू शकतो!

तक्रार करणाऱ्यावरच कारवाई

मनिष कुंजाम यांनी तेंदूपत्त्याच्या व्यवहारांमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी जानेवारी महिन्यात केली. तेंदूपत्ता संकलनाचा मोबदला ठेकेदारांच्या वतीने संबंधित संकलकांच्या बँकखात्यात जमा केला जातो. पण बँकखाती नसलेल्यांना रोख रक्कम द्यायची तरतूद आहे. सुकमा जिल्ह्यात अशी सुमारे साडेतीन कोटी रुपयांपर्यंतची रोख रक्कम प्रत्यक्ष तेंदूपत्ता संकलकांकडे न जाता ठेकेदारांनी घश्यात घातली, असा आरोप कुंजाम यांनी केला. या संदर्भात एप्रिल महिन्यात कुंजाम यांच्याच घराची व इतर मालमत्तांची झडती घेण्यात आली. त्यात काही सापडल्याचं पोलिसांनी अधिकृतरीत्या सांगितलेलं नाही. पुढेही पोलिसांकडून काही नोटीस आलेली नाही, असं कुंजाम म्हणाले.

त्याआधी मार्च महिन्यात कुंजाम यांचे सासरे कमलू हिडमा यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. या हत्येची जबाबदारी माओवादी पक्षाच्या कोंटा एरिया कमिटीने घेतली. हिडमा माओवादी पक्षाविरोधात कारवाया करून गाव सोडून गेले आणि मग परत येऊन लोकांना धमकावून काही जमिनी त्यांनी ताब्यात घेतला, असा आरोप माओवाद्यांनी केला.

०००

बस्तरमधील एका गावात. (प्रातिनिधिक फोटो : रेघ)

कुंजाम यांच्याशी बोलणं हिंदीत झालं होतं, तर ते मूळ हिंदी रूप ८ जुलै रोजी 'द वायर हिंदी'वर प्रकाशित झालं : 'आदिवासीयों को स्थायी विपक्ष की भूमिका निभानी होगी : मनीष कुंजाम'

या विषयाच्या आसपासच्या अनेक नोंदी आधी रेघेवर केल्या गेल्या आहेत. त्यातल्या निवडक काही अशा:

। नवीन नोंदींची माहिती आणि ऐच्छिक वर्गणी, 
या तपशिलासाठी उजवीकडचा समास पाहावा।

25 June 2025

'हिंदीसक्ती'बाबत एक निवेदन

सरकार आणि तज्ज्ञ यांना आपण काही बाबतीत आपले प्रतिनिधी म्हणून काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अधिकार देतो. सर्वसामान्य जगण्यात प्रत्येक गोष्ट करायला प्रत्येकाला वेळ असेल असं नाही, तसंच आपापला कलही नसतो. मग या प्रतिनिधी मंडळींनी घेतलेले काही निर्णय आपण मान्य करतो. पण अनेकदा ते जाचक होतं. सरकार किंवा तज्ज्ञ कित्येकदा खोटंही बोलून जात असतात, तेही जाणवतं. मग पालक, नागरिक किंवा सर्वसामान्य माणूस म्हणून काही बोलावं वाटतं. तसं बोलण्यापुरतं हे निवेदन. 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १७ जून २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या शासननिर्णयामध्ये (१६ एप्रिल २०२५ रोजी हिंदी ही पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करणाऱ्या शासननिर्णयातील दुरुस्ती)  पुढील मुद्दा नमूद करण्यात आला आहे : 

"राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल. परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास, त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल. तथापि, हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान २० इतकी असणे आवश्यक राहील. हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता उपरोक्तप्रमाणे विहित किमान २० विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शविल्यास, त्या भाषेच्या अध्यापनाकरिता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल. अन्यथा सदर भाषा ही ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात येईल. सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल."

या मुद्द्यात अनेक गफलती दिसतात, त्या अशा :

  • या शासननिर्णयामध्ये हिंदीची सक्ती नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांपासून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी व प्रवक्त्यांनी केला असला तरी, ही अप्रत्यक्ष पण स्पष्ट स्वरूपाची सक्तीच आहे. यात ‘सर्वसाधारणपणे’ हिंदीला प्राधान्य दिलेलं आहे आणि ते प्राधान्य मोडण्यासाठी कोणी इतर भाषा निवडली तरी त्यासाठी इयत्तेगणिक २० विद्यार्थ्यांचं संख्याबळ उभं करावं लागेल. खेडोपाडीच्या मराठी शाळांची मुळातच कमी असणारी पटसंख्या आणि शहरी भागांमधील मराठी शाळांची रोडावती पटसंख्या लक्षात घेता ही अट अव्यवहार्य आहे. त्यातून अप्रत्यक्षपणे हिंदीच तिसरी भाषा म्हणून शिकणं अनिवार्य होईल.
  • पहिलीच्या स्तरावरील मूल साधारण सहा वर्षांचं असतं. अशा मुलांना एखादी भाषा ‘ऑनलाइन’ पद्धतीने शिकवता येईल, हे वरील शासन निर्णयात गृहित धरलेलं आहे. परंतु, शिक्षणतज्ज्ञांच्या मते, ऑनलाइन शिक्षणावरील भर या वयातील मुलांच्या एकाग्रतेवर विपरित परिणाम करणारा ठरतो. भाषेचं शिक्षण तर अशा रीतीने होणं आणखीच बिकट असतं. त्यामुळेही पुन्हा एखाद्या शिक्षकाकडून कशीबशी हिंदी शिकणंच मराठी शाळांमधील मुलांसाठी सक्तीचं होईल.
  • मराठी शाळांमधील शिक्षकांची कायमस्वरूपी भरती होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना अगदी पाच-सहा हजार रुपयांपर्यंतही कमी पगार आहेत. अशा वेळी या शिक्षकांकडून किती वाढीव कामाची अपेक्षा करता येईल? त्यामुळेही तिसऱ्या भाषेची सक्ती हा अव्यवहार्य मुद्दा ठरतो. आहे त्या परिस्थितीत शिक्षकांना समाधानकारक पगार देऊन अध्ययनाच्या अवकाशात सुधारणं करणं गरजेचं आहे. 
  • महाराष्ट्रातील काही बोलींना ‘बालभारती’च्या पुस्तकांमधून थोडाफार वाव देण्यात आलेला आहे. हा अवकाश आणखी वाढवून कातकरी, अहिराणी, माडिया, भिलोरी, इत्यादी भाषांना / बोलींना औपचारिक प्राथमिक शिक्षणात अधिक वाव दिला तर ते एकंदर मराठी अवकाशासाठी हितकारकच ठरेल, असं वाटतं. व्यवहारात मानखंडना सहन करणाऱ्या या भाषक-समूहांना कदाचित अशा कृतीने किमान आश्वस्त तरी वाटेल. तसं वाटत नसेल तर त्या भाषांची वेगळी पाठ्यपुस्तकंही काढायला हवीत. (असा प्रयत्न १९८४ साली झाला होता- माडिया भाषेबाबत. त्याचा तपशील मिळतो. २०१९लाही माडियाबाबतच असा प्रयत्न झाल्याची बातमी मिळते, पण अधिक तपशील मिळवावा लागेल. पुरेसं मिळालं तर त्याची नोंदही करतो). मराठीशिवाय इंग्रजी भाषा मराठी शाळांमध्ये पहिलीपासून शिकवली जाते. यामागे उपजीविकेपासून सध्याच्या ज्ञानव्यवहारापर्यंतचे, जीवनशैलीचेही विविध सत्तासंबंध असतील; ते मान्य नसले तरीही इंग्रजीची कमी-अधिक व्यावहारिक निकड भासते, त्यामुळे अध्यापनाचं माध्यम म्हणून नव्हे तर एक संवादापुरती तरी भाषा म्हणून इंग्रजी पहिलीपासून आली, तर ते समजून घेण्यासारखं असावं (हे समजून कशाला घ्यायचं, हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल). साधारण या वयात मुलांची भाषा आत्मसात करायची क्षमता जास्त असते, असं भाषेतले नि शिक्षणातले तज्ज्ञ सांगतात. ते रास्त असलं तरी 'हिंदीसक्ती'मागचे राजकीय हेतू लक्षात घेता सदर युक्तिवाद इथे लागू करता येत नाही. पाचवीपासून शिकवली जाणारी हिंदी पहिलीपासून अप्रत्यक्षरीत्या सक्तीची करण्यामागचे सत्तासंबंध कोणते? त्यामागची निकड कोणती? या प्रश्नांची उत्तरं एकसाची राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेकडे जाणारी दिसतात. त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 'हिंदीसक्ती'चं धोरण शंकास्पद ठरतं.
  • उद्योगधंद्यांमुळे महाराष्ट्रात परप्रांतांमधून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे, हिंदी चित्रपटउद्योगाचं केंद्र महाराष्ट्रात आहे, राज्याच्या पूर्वेकडील प्रांतांमध्ये हिंदी भाषेचाही वावर पूर्वीपासून कमी-अधिक प्रमाणात राहिला आहे, मराठी आणि हिंदीमध्ये अनेक साधर्म्यंही आहेत, त्यामुळे ‘सर्वसाधारपणे’ इथल्या माणसांना संभाषणाच्या पातळीवरची हिंदी समजते, वापरता येते, हे आपण रोजच्या व्यवहारात अनुभवतो. त्यामुळे मराठी प्राथमिक शाळांमधील मुलांना हिंदी शिकणं सक्तीचं करणं हे त्यांच्यावरील अभ्यासाचं ओझं विनाकारण वाढवणारं आहे.  
  • हिंदी आल्यामुळे मराठी माणूस दिल्लीत जाऊन आत्मविश्वासाने बोलू शकेल, असे युक्तिवाद सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते माध्यमांमधून करत आहेत. ‘देशात संपर्कसूत्र म्हणून हिंदी भाषा शिकली पाहिजे,’ असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. परंतु, मराठी शाळांमध्ये पाचवी-सहावीपासून तशीही हिंदी शिकवली जाते. अशा वेळी पहिलीपासून हिंदीसक्ती केल्याने तथाकथित ‘संपर्कसूत्रा’ला आणखी बळ मिळेल किंवा दिल्लीत बोलण्यासाठी आणखी 'आत्मविश्वास' मिळेल, हे युक्तिवाद विपर्यस्त आहेत आणि निषेधार्ह आहेत. किंबहुना, हा निर्णय घेताना सरकारने मराठीतही लोकांशी धड संपर्क आणि संवाद ठेवला नसल्याचं दिसतं. पहिलीपासून हिंदी शिकवण्याला दक्षिणेतील राज्यांमधून आधीच विरोध होत आहे. तसंच महाराष्ट्रातही विरोध असल्याचं माहीत असतानाही सरकारने शाळा सुरू होण्याच्या ऐनवेळी हा निर्णय घाईगडबडीत जाहीर केला. त्याबाबतीत वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी विधानं केली (उदाहरणार्थ, तामिळनाडू राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका शिक्षणविषयक केंद्रीय निधी वेळेत मिळावा यासाठीची असतानाही ती याचिका त्रिभाषासूत्रीबद्दलची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि अजून सुनावणी पूर्ण व्हायची असतानाही त्याबाबत न्यायालयाने निकाल दिल्याचाही दावा करून टाकला). 
  • देशात भाषावार प्रांतरचनेचं तत्त्व स्वीकारलेलं असतानाही राज्यस्तरावरील भाषिक धोरणाबाबतचे निर्णय केवळ केंद्रीकरणाच्या भूमिकेतून घेणं हे संघराज्यप्रणालीच्या तत्त्वाचा अवमान करणारं आहे. वास्तविक महाराष्ट्रासारख्या राज्यात इतर प्रांतांमधून उद्योगांसाठी, नोकऱ्यांसाठी येणाऱ्या लोकांना संभाषणाच्या स्तरावर मराठी शिकवण्याचे छोटे-मोठे अभ्यासक्रम सुरू करण्याकरता शासनाने पुढाकार घ्यायला हवा. हे तत्त्व आपल्या संघराज्यप्रणालीशी सुसंगत, न्याय्य आणि व्यवहार्य ठरेल. 

वर नमूद केलेले मुद्दे विचारात घेता, मराठी शाळांत पहिली ते पाचवी इयत्तांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याची सक्ती महाराष्ट्र सरकारने तत्काळ मागे घेणं गरजेचं आहे. (यासंबंधी विरोध होत असल्यामुळे हिंदीसक्तीबाबत अनेकांशी सल्लामसलत करून आठवड्याभराने अंतिम निर्णय घेणार असल्याचं २३ जून रोजी रात्री मुख्यमंत्री म्हणाले आहेत.)

दी न्यू स्टॅण्डर्ड डिक्शनरी भाग : २-३, संपादक : गं. दे. खानोलकर
(प्रकाशन : केशव भिकाजी ढवळे)

29 March 2025

विस्मृतीच्या विरोधात

पेंग्विन / वायकिंग

बेला भाटिया गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ समाजवैज्ञानिक, मानवाधिकारविषयक खटले लढवणाऱ्या वकील आणि कार्यकर्त्या म्हणून काम करत आल्या आहेत. याला धरून त्यांनी वेळोवेळी लेखन केलं. या तीन दशकांत निरनिराळ्या टप्प्यांवर त्यांनी लिहिलेल्या निवडक पंचवीस दीर्घ लेखांचा सुमारे साडेसहाशे पानी खंड अलीकडेच ‘इंडियाज् फरगॉटन कन्ट्री : अ व्ह्यू फ्रॉम द मार्जिन्स’ या नावाने प्रकाशित झाला. 

पुस्तकात हे लेख ‘विभाजित समाज’, ‘विकासाच्या नावाखाली’, ‘बिहारमधील पेटती वावरं’, ‘बस्तरमधील अविवेकाचं वर्तुळ’ आणि ‘काश्मीर व ईशान्य भारत’ अशा पाच विभागांमध्ये बसवले आहेत. त्यातील पाचवा विभाग सोडला तर पहिल्या चार विभागांचा परस्परांशी अधिक घट्ट संबंध आहे. पहिल्या चार विभागांमधल्या लेखांतून दिसणारी समान सूत्रं साधारणपणे अशी आहेत : जातिव्यवस्थेशी निगडीत जमीनमालकीतली विषमता आणि या विषमतेमुळे आधुनिक राजकीय-आर्थिक अवकाशात उद्भवणारे संघर्ष, जमिनीखालील व जमिनीवरील नैसर्गिक संसाधनांनी संपन्न प्रदेशात बहुसंख्येने राहणारे आदिवासी समुदाय आणि आधुनिक विकासासाठी ही संसाधनं ओरबाडताना होणारी हिंसा, तसंच या सगळ्याशी संबंधित असणारं नक्षलवादी / माओवादी राजकारण व त्यातली हिंसा. या सूत्रांना धरून काही प्रातिनिधिक लेखांबद्दल बोलू.

या पुस्तकात आलेला सर्वांत जुना लेख १९९२ सालचा आहे (तो पुस्तकातील ‘विकासाच्या नावाखाली’ या विभागात येतो). गुजरातेतल्या ग्रामीण भागाने १९८०च्या दशकाअखेरीला तीव्र दुष्काळ सहन केला. या पार्श्वभूमीवर भाटिया यांनी भूजलसाठ्यांच्या वापरामध्ये कसा अन्याय होतो, याकडे लक्ष वेधणारा ‘लश फिल्ड्स अँड पार्च्ड थ्रोट्स’ हा लेख लिहिला. दुष्काळाचा त्या प्रदेशातला इतिहास, जमिनीच्या मालकीमधील जातिनिहाय विषमता, याचा रीतसर अभ्यास करून परत स्थानिक लोकांचं म्हणणं सविस्तरपणे ऐकून लेखाची मांडणी केलेली आहे. या भागातले बडे जमीनदार बोअर मारून मनमानीपणे पाणी खेचत असत. विस्तृत आकारमानाच्या जमिनीवर असा एकतर्फी पाणीवापर वाढल्यामुळे भूजलाचे वाहते स्त्रोत रोडावले आणि आजूबाजूच्या सामूहिक वापरातल्या छोट्या विहिरी आणखी सुकल्या. परिणामी, एकीकडे काही सरंजामी जातींमधील जमीनदारांची शेतं हिरवीगार राहिली तर अल्पभूधारक आणि कनिष्ठ जातीय लोकांचे घसे कोरडे राहिले, असा निष्कर्ष भाटिया नोंदवतात. 

पुस्तकातला सर्वांत अलीकडचा लेख- ‘नो व्हेअर टू हाइड’- २०१९ सालचा आहे (तो ‘बस्तरमधील अविवेकी वर्तुळ’ या विभागात येतो). त्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांदरम्यान छत्तीसगढमधील बस्तरच्या प्रदेशात झालेल्या तीन करुण घटनांकडे हा लेख लक्ष वेधतो. यातील एका प्रसंगात जाळणाकरता लाकूड आणायला जंगलात गेलेल्या तीन स्त्रियांवर पोलीस नेम धरून गोळ्या झाडतात, त्यात एक स्त्री मरण पावते, दोघी कशाबशा वाचतात. दुसऱ्या प्रसंगात माओवाद्यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील प्रदेशात आयोजित केलेल्या क्रीडास्पर्धेकरता स्वयंसेवक म्हणून काम करणारी दहा मुलं-मुली अचानक झालेल्या पोलिसी गोळीबारात मृत्युमुखी पडतात. यातील काही अल्पवयीन, तर काही विशीच्या पुढे-मागे असणारी अविवाहित मुलं होती. पूर्णपणे माओवादी ताब्यातील प्रदेशात एखाद्या क्रीडास्पर्धेच्या आयोजनात निःशस्त्रपणे सहभागी होणं हा गुन्हा ठरतो का, असा प्रश्न भाटिया उपस्थित करतात. शिवाय, या मुलांसमोर दुसरा पर्याय तरी कोणता होता? (ही कथित चकमक फेब्रुवारीत झाली. त्यानंतर महिन्याभराने इंडियन प्रीमियर लीग या खाजगी स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या क्रिकेटस्पर्धेचा बारावा मोसम सुरू झाला. दर वर्षी मार्चमध्ये मनोरंजन आणि खेळ यांचा मिलाफ साधणाऱ्या या आयपीएलची सुरुवात करणारा माणूस, तसंच एका आयपीएल संघाचा मालक ही मंडळी हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारांमधील आरोपी आहेत. पण भारतीय तपाससंस्थांच्या चौकशीला सामोरं न जाता ते परदेशात फरारी झाले. आपण चैनीत जगत असल्याचं ते समाजमाध्यमांवरून आयपीएलच्या भारतीय प्रेक्षकांना कळवत असतात! आपल्याकडे खुल्या लोकशाही उदारमतवादी अवकाशात घडणाऱ्या या क्रीडास्पर्धांमध्ये आपण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी असतो, हे इथे लक्षात घेता येईल). तिसरा प्रसंग याहून करुण आहे. एक आदिवासी माणून रस्त्यात काही माओवादी पत्रकं पडलेली दिसल्याचं पोलिसांना सांगतो. पोलीस त्यालाच दरडावतात आणि ती पत्रकं त्यांच्याकडे आणून द्यायची सूचना करतात. तो परत जातो आणि पत्रकं गोळा करायला लागतो, तर त्यात एका पत्रकाखाली ठेवलेल्या देशी बनावटीच्या बॉम्बचा स्फोट होतो, त्यात तो तरुण मरून जातो. 

बहुतांश लेख विशिष्ट घटनांच्या निमित्ताने लिहिलेले असले तरी, त्याला ताज्या संदर्भांची जोड टिपांमधून दिलेली आहे. शिवाय, हे लेख केवळ एखाद्या घटनेपुरतं मर्यादित न राहता त्यामागील प्रक्रियांचा व परिस्थितीचा सखोल आणि समतोल आढावा घेतल्यामुळे आपल्या अवकाशातील काही जटिल प्रश्नांची प्रातिनिधिक रूपं त्यातून समोर येतात. आपल्या मुख्यप्रवाही माध्यमव्यवहारात विस्मृतीत ढकलले जाणारे हे प्रश्न आहेत.

भाटियांनी नर्मदा नदीवरील सरदार सरोवराच्या बांधकामामुळे झालेल्या विस्थापनावर १९९७ साली लिहिलेला ‘फोर्स्ड एव्हिक्शन्स इन द नर्मदा व्हॅली’ हा दीर्घ लेख या खंडात आहे. अशा प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्यांना नवीन जागा देणं (रिलोकेशन), तिथे त्यांचं पुनर्स्थापन करणं (रिसेटलमेन्ट) आणि मग पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन), अशी प्रक्रिया अपेक्षित असते. यात बहुतेकदा तर प्रक्रिया सुरूच होत नाही, कधी सुरू झाली तर ती नवीन जागा देण्याच्या पायरीपुढे जात नाही, असं त्या अधिकृत आकडेवारीनिशी नमूद करतात. फक्त नवीन जागी नेल्याने विस्थापितांना त्यांचं जगणं पूर्ववत स्थितीपर्यंत आणणं शक्य नसतं; त्यासाठी दीर्घकालीन सहाय्य आवश्यक ठरतं. याच लेखात स्त्रियांना नुकसानभरपाई मिळताना कोणती अडचण येते, याबद्दलचा उल्लेख येतो. पुनर्वसनावेळी प्रौढ मुलग्यांना जमीनमालकीचे हक्क दिले जातील, प्रौढ मुलींना नाही, अशी तरतूद नुकसानभरपाईच्या नियमांमध्ये होती. शिवाय, विधवा स्त्रीला कुटुंबप्रमुख मानलं न गेल्यामुळे त्यांची आणखीच बिकट अवस्था झाली. यातील विधवा स्त्रियांच्या या व इतर अडचणी नोंदवणारा ‘एकाकी’ (१९९७) हा स्वतंत्र लेखही प्रस्तुत खंडात आहे.

राजस्थानातील चक्वाडा गावातील अस्पृश्यतेच्या एका प्रकरणावरचा ‘दलित रिबेलियन अगेन्स्ट अन्टचेबिलिटी इन चक्वाडा’ हा लेख भाटियांनी २००६ साली लिहिला. या गावातील तलावाचे चार घाट सवर्ण जातींच्या वापरासाठी होते, तर ‘बैरवों का घाट’ म्हणून ओळखला जाणारा घाट दलित समुदायांच्या वापराकरता होता. पण वरच्या बाजूला असणारा ‘बैरवों का घाट’ उन्हाळ्यात सुकून जात असे. याचा विरोध म्हणून बैरवा जातीतल्या काही तरुणांनी सवर्णांच्या बाजूने तलावात डुबकी मारली. मग बैरवा समुदायाने सामूहिक प्रतिकार म्हणून घाटांचं जातीय विभाजन मोडून काढायचं ठरवलं. यातून बैरवा हा दलित समुदाय आणि सरंजामदार राहिलेले जाट यांच्यात तणाव निर्माण झाला. अशा वादांमध्ये जातिव्यवस्थेतली अंतर्गत गुंतागुंत कशी वापरली जाते, हेही भाटिया नोंदवतात. या गावात दलितांमध्ये बैरवांचं संख्याबळ जास्त होतं, त्या खालोखाल काही बलाई आणि दोन भंगी अशी दलित कुटुंबं होती. शिवाय, चक्वाडा गाव अनुसूचित जातींकरता आरक्षित असलेल्या मतदारसंघात येतं आणि तिथला आमदार बलाई जातीचा होता, पण त्याने या प्रकरणात जाटांची बाजू घेतली. याशिवाय, अनुसूचित जमातींमध्ये मोडणारा मीना हा समुदाय, तसंच मुस्लीमही बैरवांच्या विरोधात भूमिका घेत आल्याचं लोकांच्या बोलण्यातून समोर येतं. याच चक्वाडा गावात १९३६ साली अस्पृश्यांच्या एका सामूहिक भोजनसमारंभात तूप वाढलं गेल्याची बातमी गावात पसरली तेव्हा सवर्णांनी भोजनसमारंभावर हल्ला चढवला आणि नासधूस केली. त्या संदर्भातील बातमीचा दाखला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘अ‍ॅनाहिलेशन ऑफ कास्ट’ (जातिव्यवस्थेचं उच्चाटन) या १९३६ सालच्या संहितेमध्ये दिला होता, याची मार्मिक आठवण भाटिया करून देतात. त्यामुळे १९३६ ते २००६ या ऐंशी वर्षांमध्ये या मुद्द्यावर नक्की कोणता बदल झाला आणि कोणते बदल अपेक्षेप्रमाणे झालेच नाहीत, याबद्दल वाचक विचारात पडण्याची शक्यता निर्माण होते.

भाटिया यांनी बिहारमधील नक्षलवादी चळवळ या विषयावर २००० साली केम्ब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. त्यानंतर गेली दोन दशकं त्या मुख्यत्वे छत्तीसगढमधील बस्तरच्या परिसरावर लेखन करत आल्या. गेल्या दहा वर्षांपासून तर त्या तिथेच राहात आहेत. साधारण १९९५ साली त्यांनी पीएच.डी.चा क्षेत्राभ्यास सुरू केला तेव्हापासून आतापर्यंतचे काही निवडक लेख प्रस्तुत खंडातील तिसऱ्या व चौथ्या विभागात संकलित झालेले आहेत. आधी नोंदवलेली सूत्रं इथेही आहेत, पण इथे त्या सूत्रांचा पट वेगळा आहे- या भागांमध्ये गेली काही दशकं नक्षलवादी/माओवादी राजकारण उलगडत आलं. १९६७ सालापासून सुरू झालेल्या या चळवळीची सतत अनेक शकलं होत आली, कधी काही गट एकत्र येऊन संयुक्त आघाड्या झाल्या, आणि अखेर बिहार-झारखंड परिसरात अधिक बळकट असलेला माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर आणि तेलंगण-छत्तीसगढ हद्दीवरील भागात अधिक प्रभाव राखणारा पीपल्स वॉर हे दोन गट २००४ साली एकत्र येऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) स्थापन झाला. या संदर्भातील भाटियांच्या लेखनाचा विस्तार महत्त्वाच्या माहितीपर तपशिलापासून ते काही गुंतागुंतीच्या नैतिक प्रश्नांपर्यंत होतो. 

बिहारमध्ये १९९६ साली बथानी टोला आणि १९९७ साली लक्ष्मणपूर बाथे या ठिकाणी झालेली भीषण दलित हत्याकांडांवर भाटियांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन लिहिलेले दोन दीर्घ लेख सदर पुस्तकात आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी : लिबरेशन) हा ‘माले’ किंवा ‘लिबरेशन’ म्हणून अधिक परिचित असलेला नक्षलवादी गट आणि रणबीर सेना ही सरंजामी जातींची संघटना यांच्यातील संघर्षाचा परिणाम या हत्याकांडांच्या रूपात दिसून आल्याचं साधारणपणे मानलं जातं. पण ही संघर्षाची तात्कालिक ठिणगी पाडणारी कारणं असतात. प्रत्यक्षात जमीनमालकीतली आणि इतर संसाधनांमधली विषमता, तसंच जातिव्यवस्थेतील असमतोलाची या विषमतेला मिळणारी जोड,  हीच कारणं इथे दिसतात. पण भाटियांच्या लेखात उल्लेख येणाऱ्या गुजरात व राजस्थान इथल्या प्रदेशांमध्ये अशा समस्यांवरचा प्रतिकार सांविधानिक मार्गांनी झाला. तर, बिहारच्या या विशिष्ट भागांमध्ये या कारणांच्या निमित्ताने नक्षलवादी गटांनी सशस्त्र प्रतिकाराचाही मार्ग अवलंबला. त्याचे बरे-वाईट दोन्ही परिणाम दिसून आल्याचं भाटिया नोंदवतात. एकीकडे, अशा हिंसेतून सरंजामी व्यवस्थेला तडाखा बसतो आणि तिला काही प्रमाणात तरी नमतं घ्यायला लागतं, सरकारकडून आणि पारंपरिक व्यवस्थेकडूनही आधार न लाभणाऱ्या कनिष्ठ जातवर्गीय समुदायाला आपलंही भलं होईल असा आत्मविश्वास वाटू लागतो. पण माओवादी तत्त्वज्ञानातली नेत्यांना अपेक्षित असणारी साम्यवादी दिशेची ‘क्रांती’ आणि जनसमुदायाला हवा असणारा व्यावहारिक ‘बदलाव’ यात मुळातच अंतर असतं. तरी, एकदा सुरू झालेलं ‘हिंसेचं चक्र’ शेवटी निरपराधांनाही चिरडत जातं, इत्यादीही कंगोरे भाटियांनी नोंदवले आहेत. (‘लिबरेशन’ने कालांतराने सशस्त्र मार्ग सोडून देऊन संसदीय राजकारणात प्रवेश केला. अलीकडच्या काळात या पक्षाला लक्षणीय यश मिळालं. २०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकीत ‘महागठबंधन’चा भाग असलेल्या या पक्षाने १९ जागा लढवल्या, त्यातल्या १२ जागांवर त्यांनी विजय मिळवला. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने त्यांना तीन जागा दिल्या, त्यातल्या दोन जागांवर ते विजयी झाले).

या पुस्तकात जवळपास सर्वच लेखांमध्ये प्रचलित रचनेच्या आणि सरकारच्या हिंसेचे दाखले समोर येतात. अशा वेळी ही व्यवस्थाच उलथवू पाहणाऱ्या ‘क्रांतिकारक हिंसे’कडे कसं पाहायचं, हा प्रश्न भाटियांनी ‘ऑन रिव्होल्यूशनरी व्हायलन्स’ या २००६ सालच्या लेखात हाताळला आहे. एखाद्या अन्याय्य अवकाशात पीडित व्यक्तीकडून वा समुदायाकडून तात्कालिक उद्रेक म्हणून होणाऱ्या हिंसेचा सहानुभूतीने विचार करायला हवा. पण दीर्घकालीन धोरण म्हणून माओवादी पक्षाकडून होणाऱ्या हिंसेबाबत मात्र अशी भूमिका घेता येत नाही, असा भाटियांचा निर्वाळा आहे. या संदर्भात त्यांनी तीन आयाम नोंदवले आहेत. १) ‘व्यावहारिक’: प्रगत शस्त्रांच्या व तंत्रज्ञानाच्या बाबतीत राज्यसंस्थेशी स्पर्धा करणं भूमिगत पक्षाला अवघड जातं; त्यात बरंच भौतिक बळ आणि मनुष्यबळ खर्ची पडतं. २) ‘नैतिक’: सशस्त्र संघर्ष विशिष्ट ‘लक्ष्यां’पुरता मर्यादित राहत नाही, त्यात निष्पापांचा बळी जातो- कोणाला पोलिसी खबरी असल्याच्या संशयावरून मारलं जातं किंवा चकमकींमध्ये अनेकांचे हकनाक जीव जातात. (रस्त्यावरची पत्रकं उचलावी लागलेल्या तरुणाच्या मृत्यूचा उल्लेख आधी आला आहे- पोलिसांच्या बेफिकीरीमुळे त्याचा बळी गेला, तसंच रस्त्यावर विशिष्ट ‘लक्ष्य’ ठेवून बॉम्ब लावणाऱ्यांकडेही या घटनेचा दोष जातोच). ३) ‘राजकीय’: सशस्त्र मार्गामुळे संघटनात्मक पातळीवर लोकशाही उरत नाही. आपण लोकांच्या वतीने राजकारण करत असल्याचा दावा केला तरी सशस्त्र कारवाया सर्वसामान्य लोकांना माहिती देऊन व त्यांच्या संमतीने करता येत नाहीत, त्यामुळे आपला ‘पक्ष’ हेच ‘लोक’ ठरण्याचा धोका निर्माण होतो. अशी मीमांसा भाटियांनी केली आहे. पण यात त्या ‘विचारसरणी’ हा मुद्दा चर्चेला घेत नाहीत. त्यांनी नोंदवलेल्या सर्व आयामांना विचारसरणीची घट्ट चौकट आहे. तुम्ही एखाद्या मृत्यूकडे सार्वत्रिक स्वरूपाची मानवी शोकांतिका म्हणून पाहत असाल, पण मी माझ्या विचारसरणीच्या मार्गातली ती एक दुर्दैवी आनुषंगिक हानी मानत असेन, तर मला तुम्ही समजावणार कसं? (हे अर्थातच उजव्या कट्टर ‘राष्ट्रवादी’ विचारसरणीलाही लागू होतं. अनेक अन्याय्य कारवायांचं ‘राष्ट्रीय सुरक्षे’च्या नावाखाली समर्थन करणं, नैसर्गिक संसाधनांना ‘राष्ट्रीय संपत्ती’ मानून मग त्यांचा सोयीस्कर अपहार करणारे साट्यालोट्याचे व्यवहार करणं, इत्यादीही त्यात येतं. अशा वेळी अमूर्त 'राष्ट्र' वरचढ असल्याचं दाखवलं जातं आणि मूर्त 'लोक' विस्मृतीत ढकलले जातात).

या विषयांवरील संवाद अधिक खुल्या अवकाशात व्हायला हवा. तशा संवादासाठी बेला भाटिया यांच्यासारख्या व्यक्तींचा उपयोग होऊ शकतो. पण राज्यसंस्थेच्या हिंसेसोबतच माओवादी हिंसेवरही टीका करणाऱ्या भाटियांनाच ‘नक्षलसमर्थक’ ठरवून काही गटांनी २०१७ साली बस्तरमधील त्यांच्या घरावर हल्ला चढवला. ‘शहरी नक्षलवादा’बद्दलचे शेरेही त्यांच्यावर बसत असतात. अशा वातावरणात लोकशाही संवादाचा व राजकारणाचा विस्तार कसा होईल?

या खंडातील पाचवा भाग मुख्यत्वे भारतीय राष्ट्राच्या सीमेमधील दोन प्रदेशांच्या स्वायत्तताविषयक मागण्यांशी संबंधित आहे. त्यातील एक लेख मेघालयात २००६ साली झालेल्या एका विद्यार्थी आंदोलनावरील पोलिसी गोळीबारासंदर्भातला आहे. एक लेख २०१० साली काश्मीरमध्ये झालेल्या सुरक्षा दलांच्या कारवायांबद्दलचा आहे. तर २०१०-११मधील दोन लेख नागा राष्ट्रीयत्वाच्या मागण्यांशी निगडीत आहेत. भारतीय राज्यसंस्थेला हे प्रश्न हाताळण्यात अपयश आलं, आणि अनेक अन्याय होत आले आहेत हे खरं आहे. ‘मुख्यभूमी’वरील भारतीय माध्यमांमध्ये या सगळ्याच घडामोडी केवळ ‘फुटीरतावादी’ या सदराखाली ढकलल्या जातात, हेही खरं आहे. त्यामुळे हे राजकीय प्रश्न मानले जाण्याऐवजी सुरक्षेचे प्रश्न मानले जाण्याकडे सर्वसामान्य कल दिसतो. अशा वेळी स्थानिक लोकांच्या भावना समजून घेण्याच्या दृष्टीने भाटियांचे लेख उपयुक्त आहेत. पण या समस्यांच्या पार्श्वभूमीला फक्त स्वयंनिर्णयनाचा मुद्दा असल्याचं भाटियांच्या प्रास्ताविकातून समोर येतं, ते मात्र अपुरं आहे. काश्मीरच्या बाबतीत भारतीय स्वातंत्र्यावेळची ऐतिहासिक परिस्थिती, आताचे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे व अर्थकारणाचे संदर्भ त्यांच्या लेखात आलेले नाहीत. तसंच, पारंपरिक अस्मिता आणि आधुनिक राष्ट्रचौकट यांच्यात सांगड घालणं, हे ईशान्येतील जमातींसाठी एक आव्हान असल्याचं याच प्रदेशातल्या इतर पत्रकार-अभ्यासकांनी नोंदवलं आहे. एकाच अस्मितेवर राष्ट्रचौकट उभारायचा प्रयत्न झाला तर त्या प्रदेशातील इतर समूहांच्या अस्मिता दडपल्या जाण्याचा धोका असतो, तसंच वगळणुकीला वाव देणाऱ्या ऐतिहासिक अस्मितेच्या बळावर आजचं नागरिकत्व धड उभं राहण्याची शक्यता कमी असते, असे मुद्दे त्यात येतात. हे लक्षात घेतलं तर, दुसरीकडे, व्यामिश्र पारंपरिक अस्मिता असलेल्या भारतासारख्या राष्ट्रात बहुसंख्याक एकसाची अस्मिता रेटणं त्या राष्ट्रचौकटीसाठीच किती धोकादायक असू शकतं, हेही जाणवतं (पण ते हिंदुत्ववादी राजकारण करणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. याचं प्रत्यंतर अलीकडे मणिपूरमधील हिंसाचारावेळी दिसलं). 

एखाद्या घटनेमागची ऐतिहासिक प्रक्रिया पडताळणं, आकडेवारीसदृश पुरावे शोधणं आणि त्या परिसरातल्या लोकांचं म्हणणं गोळा करणं- यासाठी भाटियांनी घेतलेले कष्ट प्रत्येक लेख वाचताना जाणवतात. पुस्तकाच्या प्रस्तावनेत आणि उपसंहारामध्ये त्यांनी वाचलेल्या सर्जनशील साहित्याचेही उल्लेख येतात. त्यांनी निवडलेले सूक्ष्मदर्शी तपशील, वर्णनाची ओघवती शैली, यातून हे लेखन वाचकाला गुंतवून ठेवतं. उदाहरणार्थ, एखादा प्रदेश उद्ध्वस्त होतो, तेव्हा मानवी अवकाशासोबतच तिथल्या पक्ष्यांची घरटीही उद्ध्वस्त होतात. अशाच एका लिप्पी पक्ष्याच्या घरट्यातली प्रवेशवाट कोणत्या दिशेला आहे यावरून संभाव्य पावसाची वा वावटळीची दिशा स्थानिक लोक ओळखत असत. पण विस्थापनासोबत हे पारंपरिक ज्ञानही कसं विस्मृतीत जातं, याचं वर्णन एका लेखात आहे. 

‘अंतिम सत्य केवळ विवेकाच्या बळावर सांगता येत नाही, त्यामुळे शेवटी प्रत्येक वाचकाने आपापलं विचारस्वातंत्र्य वापरायला हवं.' असं भाटिया उपसंहारामध्ये नम्रपणे नोंदवतात. तर, हे विचारस्वातंत्र्य वापरणंच विस्मृतीत जाऊ नये, अशी आशा टिकवायला कदाचित हे पुस्तक उपयोगी पडण्याची शक्यता आहे.

या लेखाचं संक्षिप्त रूप, संपादकांच्या शीर्षकासह 'लोकसत्ता'मध्ये २९ मार्च २०२५ रोजी प्रकाशित झालं.