Thursday 17 September 2020

पेद्रो आणि पद्मा

हे चित्र पद्मा सहस्रबुद्धे यांनी काढलेलं आहे
'माचीवरला बुधा' या गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरीत, पान १९, मॅजेस्टिक प्रकाशन, जुलै २००८


पद्मा सहस्रबुद्धे यांनी अनेक मराठी पुस्तकांची मुखपृष्ठं तयार केली, अनेक पुस्तकांच्या मजकुरासोबत जाणारी रेखाटनं काढली. त्यातलंच एक वरती दिलं आहे. ते 'माचीवरला बुधा' या कादंबरीतलं असलं, तरी तिच्यापासून सहज वेगळंही होणारं आहे. वेगळं, असं का?

गेली ४५ वर्षं अर्जेन्टिनातील टुकुमान डोंगररांगांमध्ये एका गुहेत राहणाऱ्या पेद्रो लुका नावाच्या इसमाबद्दल एक छोटीशी फिल्म मॅथ्यू ऑर्सेल यांनी तयार केली. ती 'अल-जझीरा'वर १ जुलै २०२० रोजी प्रसिद्ध झाली आहे. मुळात त्यांना पेद्रो यांच्यावर माहितीपट करायचा होता, त्यासाठी ते जून २०१८मध्ये पॅरिसहून टुकुमान भागात येऊन काही चित्रीकरण करून गेले होते. त्याचाच पुढचा भाग चित्रित करण्यासाठी ते आता २०२०च्या पहिल्या तिमाहीत अर्जेन्टिनाला आले, पण ब्वेनस एअरिझमधे ते उतरले आणि कोरोनाच्या साथीसंदर्भातल्या टाळेबंदीची घोषणा झाली. त्यामुळे त्यांना काही दिवस तिथेच एका फ्लॅटमधे अडकून पडावं लागलं आणि विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर पॅरिसला परतावं लागेल, असंही त्यांना कळलं. त्यामुळे त्यांनी मूळ माहितीपटाऐवजी 'दोन विलगीकरणांची कहाणी' सांगायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी पेद्रो यांच्या परिसरात चित्रित केलेला आधीचा भाग वापरला आणि पेद्रो यांच्या एका नातलगाच्या मदतीने आत्ता काही चित्रीकरण करवून घेतलं. मग या दोन्हीतून ही सुमारे १५ मिनिटांची व्हिडिओ रूपातली कहाणी तयार झाली. यात त्यांनी पेद्रो यांचं जगणं आणि आता कोरोना-काळामध्ये शहरी मानवी वसाहतींवर गुदरलेलं जगणं यांची तुलना केलेली दिसते. मॅथ्यू यांनी 'अ टेल ऑफ टू आयसोलेशन्स' या शीर्षकाचा लेखही 'अल जझीरा'च्या संकेतस्थळावर लिहिला आहे.  

पेद्रो यांनी पस्तिशीतून चाळिशीत जायच्या आधीच मधल्या काळात असा दूर जाऊन एकट्याने राहण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. गो. नी. दांडेकरांच्या बुधा चऱ्हाटे यांनी वय झाल्यानंतर आठवणीपोटी पुन्हा राजमाचीवरल्या आपल्या गावाकडे परतायचा निर्णय घेतलेला आहे. विविध कारणांमुळे चऱ्हाटे कुटुंबियांना (बुधाच्या वडिलांच्या पिढीत) उपजीविकेसाठी मुंबई गाठावी लागली, तिथे हमाल म्हणून, गिरणीकामगार म्हणून काम करत ते जगले. ही ओझरती पार्श्वभूमी आहे. कामातून निवृत्त झालेला बुधा त्याच्या मुलासोबत नि सुनेसोबत चाळीत राहतोय, इथूनचा काळ कादंबरीत येतो. 'होता होता बुधाच्या दुसऱ्याही डोळ्याला कमी दिसायला लागलं. काडीचं काम होईना. नुसतं बसून राहायचं. भिव्याला अजून मुलं झाली नव्हती. चाळीतली सगळी माणसंही आपापल्या कामावर जात. मग बुधानं काय करावं दिवसभर. [...] दिवसाचा सगळा वेळ जसा त्याला खायला उठायचा. मग बुधा नेसत्या धोतराचं टोक पांघरून झोपून राहाचा. पडल्या पडल्या त्याला सगळं जुनं आठवायचं...' (ही शेवटची तीन टिंब मुळाबरहुकूम. पान १३)

आपल्या बालपणाची, जुन्या काळाची आठवण येत राहणं- हा भाग बुधाच्या माचीवर परतण्याचं एक कारण म्हणून ठळकपणे येतो. 'असं बुधाला फार फार आठवायचं. आठवण येताच त्याचं मन मुंबईच्या धकाधकीतून उठायचं, अन् माचीवर जाऊन तिथं भटकत राहायचं. शेवरीच्या कापसाच्या म्हाताऱ्या उडतात तसं. तो अस्वस्थ व्हायचा. झोपलेला असला तर उठून बसायचा. बसला असला, तर हिंडायला लागायचा. मुंबईचा गदारोळ तर त्याच्या ओळखीचा झालेला. पाकातल्या आवळ्यासारखा बुधा त्यांच्यात मुरलेला. पण बाळपणीचा सुखाचा काळ आठवताच त्याला त्या गलबल्याची शिसारी यायची. ती त्याच्या म्हाताऱ्या मुद्रेवरही स्वच्छ दिसायची.' (पान १६).

पुन्हा माचीवर आल्यानंतरही: 'अगदीच क्वचित त्याला मुंबईची आठवण होई. एकदा मुलाला पाहावंसं वाटे.' (पान ३९), किंवा 'त्याला मुंबईची किती तरी माणसं आठवली. गोरी गोरी पान. कापराच्या भावल्यांसारखी. नाजुक कपडे. साजुक बोलणं. जपून हसणं. हळूच बोलणं. अरे हुडूत! हे देवानं दिलेलं रान पाहा म्हणावं! आरडा की मोठमोठ्यानं! कोण तुम्हाला काय म्हणतंय्! हसा. खिदळा. कष्ट करा. मग खा पोटभर.' (पान ४५). गावात उपजीविकेची साधनंच उरली नाहीत, या कारणामुळे मुंबईचा रस्ता धरावा लागलेल्या चऱ्हाटे कुटुंबातला बुधा मुंबईत आयुष्य घालवतो, कामगार म्हणून जगतो, पण म्हातारपणी त्याला शहरातल्या 'गोऱ्या, साजुक, नाजुक' लोकांच्या तुलनेत गावचं आयुष्य बरं वाटतं, असं दांडेकरांचं म्हणणं आहे. यातला आणखी विरोधाभास त्यांनी शोधलेला नाही, सूचितही केलेला नाही. चऱ्हाट्यांना गाव का सोडावं लागलं, याचं एक कारण सुरुवातीला देऊन झालं. बुधा परत माचीवर येतो, याचीही काही कारणं दिली जातात, ती वर आली आहेत. बुधाचे वडील मुलाबाळांसह मुंबईला आले आणि बुधा सुट्टीच्या काळात वडिलांसोबत गावात जायचा, तेवढाच. शिवाय, त्याला मुंबईत स्वीकारावा लागलेला पेशा बघता 'बालपणाचा काळ' आणि 'सुट्टीचा काळ' किती असेल, याचा अंदाज बांधता यावा. रूढार्थाने तो गावात 'मुंबईकर' ठरेल. तर अशा या बुधाच्या मनामध्ये 'गोरी गोरी, नाजुक, साजुक माणसं' विरुद्ध 'कष्ट करून रान पिकवून खिदळणारं गाव' असा दुहेरीपणा कसा निर्माण झाला, याचा थांग इथे लागत नाही. असा दुहेरीपणा मनात नसतो असं नाही. पण कामगार म्हणून त्याच शहरी अवकाशात जगलेल्या, गावाने उपजीविका दिली नाही म्हणून कसंबसं मुंबईत मर्यादित जागेत जीवन काढलेल्या कष्टकरी माणसाच्या मनातलं गाव आणि लेखक श्री. गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर यांच्या मनातला गाव यांच्यात काही सरमिसळ झाली असावी, अशी शंका येते. त्यामुळे उपजीविका नसताना गाव सोडावं लागणं आणि मग गावात कष्ट करून पोटभर खाता येईल असं काही वर्षांनी- तेही म्हातारपणी वाटणं- यातला पेच शोधला जात नाही. हा पेच बुधा या पात्राने त्याच्या मनाने-विचाराने सोडवावा, असं नव्हे. पण लेखकानेही हा पेच हाताळल्याचं दिसत नाही. त्यामुळे, आठवणी-वर्तमान यांचं आणि शहर-गाव यांचं द्वंद्व सोपं होतं. शेवटी म्हातारपणी गतकाळाकडे परत जायची ओढ म्हणून बुधा माचीवर जातो, त्यासोबत कादंबरीचा लेखकही तिथे जातो. निसर्गाची तपशीलवार सुंदर वर्णनही करतो. त्या तपशिलांची जाण त्याला आहे. तपशिलांसह पण तपशिलांपलीकडे जाऊन काही म्हणता येईल का?

पद्मा सहस्रबुद्धे यांनी केलेली अनेक पुस्तकांची मुखपृष्ठं आणि आतली रेखाचित्रं अशी तपशिलांपलीकडे जात काही मांडू पाहतात, असं वाटतं. त्यांना निमित्त त्या पुस्तकाने दिलेलं असतं, हे खरं. पण खुद्द त्यांची चित्रं मात्र त्यापलीकडे जाऊ शकतात. ए. वि. जोशी यांची 'काळोखाचे अंग' (मौज प्रकाशन) नावाची कादंबरी आहे. त्यावरही मुखपृष्ठातून सहस्रबुद्धे यांनी उभा केलेला काळोखाचा अर्थ बराच गहिरा होत जाणारा वाटतो. सध्या आपण बुधासंदर्भात बोलू. सहस्रबुद्धे यांचं जे चित्र नोंदीच्या सुरुवातीला दिलंय, ते पेद्रो लुका यांनाही लागू होतं. पण पेद्रो यांचा दूर डोंगरात जाऊन राहण्याचा निर्णय आठवणीतून, किंवा गतकाळाच्या ओढीने झालेला नाही, तो वर्तमानातला निर्णय आहे. ते पस्तिशी ओलांडत होते, तेव्हाच त्यांनी हा निर्णय घेतला आणि आता ते ऐंशी पार करून गेले, तरीही ते त्यानुसार राहत आहेत. या पंधरा मिनिटांच्या फिल्ममध्ये काही मर्यादित धागेदोरे सापडतात, त्यानुसार पेद्रो यांनी शहरापासून, किंबहुना कोणत्याही मानवी वसाहतीपासून दूर जाण्याचं असं कारण दिलेलं आहे: "शहरात इंजिनांचा गोंगाट असतो, खूप त्रास होतो, अजून काय, खूप गरम होतं. त्यापेक्षा इथे थंड आहे, मोकळी हवा आहे, सगळं शांत आहे." मॅथ्यू यांनी पाठवलेल्या इतरही काही प्रश्नांची उत्तरं पेद्रो देतात, ती अशी:

गुहेत का राहता? तर: "धोका टाळायला. लोकांसोबत राहून काही समस्या उद्भवायला नकोत म्हणून. मला डोंगरातल्या जनावरांची तितकीशी भीती वाटत नाही, पण आपल्यासारख्याच लोकांची वाटते, त्यांचा काही कुठला वाईट उद्देश असेल, त्याची भीती वाटते."

तुम्हाला कधी कशाबद्दल चुकचुकल्यासारखं वाटतं का? "नाही, मला असं काही वाटत नाही".

नंतर पेद्रो असं म्हणतात: "जगापासून दूर इथे आपल्यासमोर अध्यात्मिक वाट खुली होते, हे कोणाला पटेल का. मी घरांपासून, रस्त्यांपासून दूर आहे, याचं अतिशय सुख वाटतं. आपण सगळे एकाच समूहाचा भाग आहोत. जगण्याचा आपल्या सर्वांचा उद्देश सारखाच आहे. आपण सगळेच माणूस आहोत. आपण एकमेकांकडे दुर्लक्ष करता कामा नये."

गुहेतल्या कोनाड्यात मेणबत्ती लावलेली आहे. तिथे ते हात जोडून उभं असल्याचंही दिसतं. ईश्वरावर पेद्रोंचा विश्वास असावा. वरच्या काही वाक्यांमधून त्यांचा हा कल दिसतो. त्यांना एकटेपणा हवा वाटत असला, तरी जगापासून तुटलेपणाची भावना त्यांच्यात नसावी, असं साधारण त्यांच्या वाक्यावरून दिसतं. बाकी, त्यांची मतं पटतात किंवा नाही, ते प्रत्येकाला आपापलं ठरवता येईल. पण त्यांनी केलेली निवड वर्तमानातली आहे. ते तरुण असताना आणि आता म्हातारे असतानाही त्यांनी प्रचलित मानवी सभ्यतेच्या बरीचशी विरोधात जाणारी ही निवड केल्याचं दिसतं. त्यात स्मरणरंजन नाही, स्वप्नरंजनसुद्धा नाही, गतकातरतासुद्धा नाही. रोजच्या व्यावहारिकतेमधून पळवाट म्हणून , थोडंसं मनोरंजन म्हणून या गोष्टी वापरल्या जाण्याची शक्यता असते. ते तितपत ठीकही असेल कदाचित. पण पेद्रो यांनी रोजच्या व्यवहारापासून पळ काढलेला नाही, त्यांनी या व्यवहाराचाच वेगळा पर्याय निवडलेला आहे. त्यामुळे त्यांच्या समोरचा प्रश्न नि त्याचं उत्तर तितकंसं सोपं नसावं. बाकी, पद्मा सहस्रबुद्धे यांच्या चित्रातली काळ्या-पांढऱ्या चौकटीबाहेर जाणारी आकृती पेद्रोचीही असणं शक्य आहे. आता ही पंधरा मिनिटांची फिल्म:


No comments:

Post a Comment