Saturday, 30 March 2013

रानडे इन्स्टिट्यूट : लायब्ररी । आजची रद्दी व उद्याचा काळ

ही नोंद पक्षपातीपणाने केलेली आहे. पण हा कोणाचं नुकसान करणारा पक्षपातीपणा नाही. एका अर्थी भावनिक भूमिका घेऊन होत असलेली ही नोंद आहे. शिवाय, त्यात 'रेघे'संबंधी एक मुद्दा आहेही, पण त्यावर स्पष्टपणे काही बोलता येणार नाही.
***

ह्या नोंदीची सुरुवात आजच्या 'लोकसत्ते'मधे गिरीश कुबेरांनी 'आठवावं असं काही...!' या शीर्षकाखाली 'बुक-अप!' या त्यांच्या सदरामधे लिहिलेल्या लेखातून झाली. हॅरॉल्ड इव्हान्स यांच्या 'गुड टाइम्स, बॅड टाइम्स' या पुस्तकाबद्दल कुबेरांनी लिहिलंय. आपण पुस्तक वाचलेलं नाही, पण हा लेख मुळातून वाचता येईल.

आपला विषय थोडा वेगळा आहे.

या लेखात कुबेर सुरुवातीला एक असं म्हणतात : मग पुण्यात पत्रकारितेची पदवी घेत असताना रानडे इन्स्टिट्यूटच्या वाचनालयात हॅरॉल्ड इव्हान्स यांचं हे पुस्तक हाताळायला मिळालं. चांगली पुठ्ठ्याच्या बांधणीची काळ्या कागदावर सोनेरी अक्षरानं नावं लिहिलेली प्रत होती. अत्यंत आदरणीय अशी. त्या पुस्तकाला हात लावला तरी लेखकाचं वजन कळेल अशी. वाचायचा प्रयत्न केला, पण फारसं काही तेव्हा त्यातलं कळलं नाही.

आणि शेवटाकडे एक असं म्हणतात : वर्तमानपत्र जरी एक दिवसापुरतं असलं तरी चांगला, लिहिता संपादक काळाला पुरून उरतो तो असा..
***


रानडे इन्स्टिट्यूटच्या ज्या लायब्ररीचा उल्लेख कुबेरांच्या लेखात आलाय, त्या संदर्भात तिथे शिकून गेलेल्या एका विद्यार्थ्याने आपल्याकडे एक मजकूर आधी पाठवलेला. तो आपण आज इथे नोंदवूया. वाचनाच्या सोईसाठी बहुधा इथे ओळी मोडलेल्या असाव्यात, पण हा गद्य मजकूर आहे.


लायब्ररी : एक
लायब्ररीत पेपर खूप पडलेत
रद्दीचे गठ्ठेच्या गठ्ठे
प्रत्येक महिन्याचा गठ्ठा सुतळीने बांधलेला
फक्त कामापुरते लोक आता ते गठ्ठे सोडतात
त्यातल्या बातम्या नाहीतर फोटो कापतात
आणि स्वतःच्या कामाला घेऊन जातात
पण बाकी त्या पेपरांकडे कोणाचं लक्ष नाही
म्हणजे लक्ष देऊन उपयोग नाहीच म्हणा
त्याच्यात सगळ्या शिळ्या बातम्या
म्हणजे छापल्या तेव्हा शिळ्या नव्हत्या
पण मग हळूहळू शिळ्या होत गेल्या
आता रोज नवंनवं काहीतरी घडतंच की
मग काहीतरी जुनं होणारच की

ते पेपर लायब्ररीत पडलेत म्हणून
नाहीतर रद्दीवाल्याकडे तरी गेले असते
पण आता ते इथे साठून ऱ्हाणार
ह्या लायब्ररीची परंपराच आहे ती
अनेक गोष्टी साठवून ठेवायच्या
मग त्या कामाच्या नसल्या तरी
कित्येक पुस्तकं, ज्ञानकोश, विश्वकोश, डिक्शनऱ्या
पीएचडीचे थिसीस, डेझर्टेशनं असं सगळं
जुनाट लाकडी कपाटांमध्ये
तिथे धूळ खात पडलंय
पेपरसुद्धा धूळ खातात
पण त्यांना कपाटात ठेवलेलं नाही
एका कोपऱ्यात पडून ते कपाटांबाहेरची धूळ खातात

पावसाळ्यात एक कुत्रा येतो
आणि त्या गठ्ठ्यांवर झोपतो
इतर वेळी तो बाहेर कुठेही झोपतो
पण पावसाळ्यात इथे येतो
आणि शांतपणे त्या पेपरांवर झोपतो
तसे पावसाळ्यात ते गठ्ठे कुबट होतात
पण कुत्र्याला त्या कुबटपणाचा फारसा त्रास होत नसावा
कारण तो शांतपणे त्या पेपरांवर झोपलेला असतो.
(रविवार, २४ जानेवारी २०१०)
***



लायब्ररी : दोन
लायब्ररीच्या दगडी भिंती
त्या भिंतींमधे
शंभर वर्षं बसून राहिलेले
अनेक दगड
प्रत्येक दगड वेगवेगळा
वेगवेगळा ओबडधोबडपणा असणारा

ऊन पाऊस वारा
अनेक वेळा आले नि गेले
दगड आपले जसेच्या तसे
जागच्या जागी
दगडांवर साचलेत
धुळीचे कण
असंख्य कण म्हणता येणार नाहीत
कारण मोजायचे तर मोजता येतील
पण काम अवघड होईल
आणि मोजून उपयोग काय

दगडांवरच्या त्या धुळीच्या कणांमध्ये
अनेक शब्दांचे कण
माणसांच्या तोंडून बाहेर पडलेले
मोबाईलमधून बाहेर पडलेले
पुस्तकांमधून बाहेर पडलेले
वेगवेगळ्या अर्थांनी वापरलेले
एकमेकात अडकून
धुळीत एकत्र झालेले
अनेक शब्दांचे कण

प्रत्येक दगडाच्या ओबडधोबडपणात
अडकलेला ओबडधोबड अर्थ
कधी कधी दिसणारा
पण दिसला तरी
अस्पष्ट दिसणार
सपाट स्पष्टता नाही

दगडांना हात लावला की
हाताला धूळ लागते
धूळ झटकली की
शब्द खाली पडतात 
(७ फेब्रुवारी २०१०)
***


एका कादंबरीतला ओबडधोबड मजकूर :

दगडी इमारतीच्या मागच्या बाजूच्या भागात लायब्ररीची छोटी जागा आहे. चौकोनी काचांची दारं असलेली पंधरा बुटकी जुनाट लाकडी कपाटं – तीन जरा मोठी लोखंडी कपाटं – कपाटांमधून एक छोटासा बोळ – उजवीकडे वळून एक दगडी पायरी – डावीकडे एक छोटीशी खोली – तिथे जरा मोठं टेबल, चारपाच खुर्च्या – एका कोपऱ्यात एक बंद लाकडी दार – दगडी पायरीच्या उजवीकडे थोडा लांब बारका बोळ – डावीकडच्या भिंतीत मोठ्या लाकडी चौकोनी धुरकट काचांच्या खिडक्या – त्याच भिंतीत लांबच्यालांब काळा कडाप्पा लावलेला टेबलासारखा वापरायला – बाकी इकडेतिकडे सातआठ खुर्च्या – तिकडेइकडे आठसात पेपर – वरती एक बंद एक चालू असे दोन पंखे – पंख्यांच्या वर आणि उरलेल्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये कोळीष्टकं.

२००८चा ऑगस्ट होता. आणि तो डिपार्टमेन्टच्या अंधाऱ्या लायब्ररीत. बाहेर पाऊस पडेल असं वातावरण होतं. बाहेरच्या झाडांच्या फिकट सावल्या कडाप्प्यावर. लोकसत्ता – सकाळ – इंडियन एक्सप्रेस – प्रभात – नवाकाळ – टाईम्स ऑफ इंडिया – नवभारत टाईम्स – केसरी – महाराष्ट्र टाईम्स – डीएनए – हिंदुस्तान टाईम्स – फ्री प्रेस जर्नल – एशियन एज – हिंदू -  हे पेपर त्या दिवशीचे वाट्टेल तसे पसरलेले. दुपारी तीनपर्यंत ते खूपच अस्ताव्यस्त होऊन जातात. जुन्या पेपरांची उंच रद्दी कडाप्प्याच्या एका कोपऱ्यात.
----------
‘इकॉनॉमिस्ट’मधे वाचकांच्या पत्रव्यवहारात चे गव्हेराला एकाने bloodthirsty satan म्हटलेलं. एवढं काय गरज नव्हती. पण ठिकाय. इकॉनॉमिस्टसुद्धा शेवटी एक वर्तमानपत्रच होतं, आठवड्याला येणारं. दोनशे रुपये किंमतीत बारका अंक. गुडलक चौकातल्या स्टॉलवर किती अंक संपतात माहीत नाही. पण लायब्ररीत एक अंक न चुकता येतो, पांढऱ्या फोल्डरमधून.

इकॉनॉमिस्ट – टाईम – साधना – आऊटलूक – इंडिया टुडे – न्यूजवीक – फ्रंटलाईन – समाज प्रबोधन पत्रिका – अर्थबोध पत्रिका – नॅशनल जिऑग्राफिक – असे कित्येक अंक. वाचणारे वाचतात, न वाचणारे वाचत नाहीत. लायब्ररी आहे म्हणून असं नाही पण पत्रकारितेचा आणि वाचनाचा संबंध आहे असं एक आपलं म्हणण्यासारखं होतं. पण तसं म्हणण्यात अर्थ नव्हता, तरी दसनूरकर तसं म्हणतात.

काहीही असलं तरी हे असं सगळं लायब्ररीत येऊन साठत होतं. तो चे गव्हेराला शिव्या घालणारा अंक असाच कधीतरी २००८च्या पावसाळ्यातल्या एका महिन्यातल्या कुठल्यातरी आठवड्यातला. असं सगळं येऊन साठत होतं. काही नंतर कधीतरी रद्दीतपण जात असेल. काही कोणी घरी नेत असेल ते तिकडे. बाकी उरलेलं सगळं धुळीसारखं लायब्ररीत.

चांगलं आहे पण. लायब्ररीची ही सगळी धूळ आणि बाकी सगळं हे चांगलंच आहे. म्हणजे इकॉनॉमिस्ट, टाईमवाले एकाच बाजूचा बोंगा वाजवतात किंवा असा प्रत्येक छापील गोष्टीचा एकेक एकतर्फी बोंगा असतो हे सगळं खरंच. पण तरी लायब्ररी शांत आहे.
-----------

तो लायब्ररीत चाललेला. आत गेल्यावर उजवीकडच्या काचेच्या कपाटात एक 'एम. एन. रॉय' नाव एम्बॉस केलेला निळं बाईन्डिंग, कव्हर गेलेला खंड आहे, त्याची जागा कधीही हलत नाही, पण लक्ष जाईल एवढा आणि असा तो गप तिथे असतो. त्याच्यावर आडवं नेमकं आज संजय संगवईचं 'द रिव्हर अँड लाईफ' आहे, आकाशी रंगाचं, आकडे – मुद्दे – नर्मदेचं पाणी – धरण. त्याच्या बाजूला उभं गिचमिडीत अक्षरात नाव लिहिलेलं कुठल्यातरी कम्युनिकेशन थियरीचं पुस्तक आहे. अशा पुस्तकांची प्रचंड गिचमिड त्या कपाटात आहे, पण ती सोडून इतर पुस्तकं थोडी मधेच उपटलेली आहेत. खालच्या कप्प्यातल्या डाव्या कोपऱ्यात 'इंडिया – अ मिलियन म्युटिनीज नाऊ' असं व्ही. एस. नायपॉल सांगत होता आणि त्यातल्या मधल्या प्रकरणातून आधीचा सुरुवातीचा नामदेव ढसाळ म्हणाला की, 'स्वातंत्र्य हे कोणत्या गाढवीचं नाव आहे'. त्याच कप्प्यात खरं म्हणजे फिडेल कॅस्ट्रोचं छोटं ते 'माय अर्ली इयर्स'सुद्धा आहे. असायला काय कुठेही काहीही असू शकतं. 'अर्ली इयर्स'ला प्रस्तावना 'वन हन्ड्रेड इयर्स'च्या मार्खेजची. समोर गुलाबी सन्मायका लावलेल्या टेबलावर लोकसत्ता आणि एशियन एज एकमेकांशेजारी.

त्याने होते ते दोन पेपर घेतले नि तो आत गेला. आधीच कोणी ना कोणी येऊन वेगवेगळे पेपर आणलेले, ते होते कडाप्प्यावर, काही नीट घड्या, काही विस्कटलेले. बाकी अजून आतमधे कोणी नव्हतं. तो बसला. समोर खिडकीतून विचित्र प्रकाश, बाहेर हलणारी झाडं. थोडा वारा आला तेव्हा त्या कोपऱ्यातला पडायला आलेला एक पेपर पडला. खिडकीला लागलेली कोळ्याची जाळी हलली. ऊन हललं. थंड थोडं.
***

Thursday, 28 March 2013

मुख्य प्रवाहातील माध्यमं असतात तशी का असतात? : नोम चोम्स्की

This is a Marathi translation of Noam Chomsky's original essay titled 'What Makes Mainstream Media Mainstream' published in October 1997 issue of Z Magazine. The essay is a transcribed and probably an edited version of the talk Chomsky delivered at Z Media Institute in June 1997. The Marathi translation of Chomsky's essay is published here with the kind permission from Michael Albert of Z Communications. This note in English on a Marathi journal Regh is just to acknowledge the source in such a way that people from Z Communications can identify it. This is not something that they demanded from Regh, but I thought it to be a more courteous way of acknowledging the source.

नोम चोम्स्की
चौऱ्याऐंशी वर्षांचे श्रेष्ठ विचारवंत नोम चोम्स्की अमेरिकेतल्या 'मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मधे पन्नास वर्षांहून अधिक काळ भाषाशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अमेरिकेच्या जागतिक दादागिरीविरोधात आवाज उठवणारे भाष्यकार म्हणूनही ते ओळखले जातात. त्यामुळे भाषाशास्त्राशिवाय जागतिक राजकीय चापलुसी, युद्धखोरी, माध्यमव्यवहार यांच्यावरही त्यांनी लेखन केलेलं आहे. 'रेघे'वर आत्ता जो लेख मराठीतून प्रसिद्ध होतोय तो 'झेड मॅगझिन'च्या ऑक्टोबर १९९७च्या अंकात पहिल्यांदा प्रसिद्ध झाला होता. विविध दृष्टिकोन वाचकांसमोर ठेवणं हा 'रेघे'चा दृष्टिकोन असल्यामुळे चोम्स्कींचा दृष्टिकोन त्यावरही शंका विचारण्याचा आपला अधिकार कायम ठेवून वाचूया. या लेखातली तिरप्या ठश्यातली अक्षरं 'रेघे'ने काही संदर्भ स्पष्ट होण्यासाठी भर घातलेली आहेत.




मुख्य प्रवाहातील माध्यमं असतात तशी का असतात?
- नोम चोम्स्की


मी माध्यमांबद्दल लिहितो त्याचं एक कारण असं की, मला एकूणच बौद्धिक व्यवहारांमध्ये रस आहे आणि अशा व्यवहारांमधला अभ्यासाला सर्वांत सोपा भाग आहे तो म्हणजे माध्यमं. माध्यमं रोज प्रसिद्ध होतात. त्यांची तुम्ही व्यवस्थित तपासणी करू शकता. माध्यमांचं कालचं रूप आणि आजचं रूप यांची तुलना करता येते. माध्यमांकडून कुठल्या गोष्टीला उचललं जातं आणि कुठली गोष्ट दाबली जाते याचा नि त्यातल्या एकूण घटकांची रचना कशी असते याबद्दलचा पुरेसा पुरावाही उपलब्ध असतो.

अभ्यासकांचं विश्व किंवा वैचारिक मतमांडणी करणारी पत्रं ('जर्नल' या अर्थी) यांच्यामध्ये आणि माध्यमांमध्ये (वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्या या अर्थी) फारसा फरक नाही, असं मला वाटतं. काही अधिकच्या मर्यादा माध्यमांना पडतात हे खरं, पण तरी त्यांच्यात फार मोठा मूलभूत फरक नाही. माध्यमं संवाद साधतात, म्हणूनच लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यात 'कधी हे तर, कधी ते' अशी निवड करत सहज वावरतात.

तुम्ही माध्यमांच्या व्यवस्थेकडे पाहिलंत, किंबहुना जिच्याबद्दल जाणून घ्यायचंय अशा कुठल्याही व्यवस्थेकडे पाहिलंत, तर त्यातल्या अंतर्गत रचनेबद्दल काही प्रश्न विचारावे लागतात. विस्तृत सामाजिक पार्श्वभूमीवर त्या विशिष्ट व्यवस्थेबद्दल काही जाणून घ्यावं लागतं. सत्तेच्या आणि अधिकाराच्या इतर व्यवस्थांशी तिचा संबंध कसा येतो? माहितीच्या या व्यवस्थेतील प्रमुख लोकांचं अंतर्गत रेकॉर्ड तुम्हाला सुदैवाने सापडलं, तर त्यातून ते काय करू पाहातायंत याचा अंदाजही येऊ शकतो (एका अर्थी ही एक सैद्धांतिक व्यवस्थाच असते). हे रेकॉर्ड म्हणजे जनसंपर्कासाठी वाटली जाणारी पत्रकं नव्हे. तर, त्या (व्यवस्थेतील) प्रमुख व्यक्ती त्यांच्या भविष्यातील कृतीविषयी आपापसात काय बोलतात याचा तपशील म्हणजे आपण म्हणतोय ते 'रेकॉर्ड'. यासंबंधी खूप रोचक दस्तावेजीकरणही आत्तापर्यंत झालेलं आहे.

माध्यमांचं रूप समजून घेण्यासाठी माहितीचे हे मुख्य स्त्रोत आहेत. वैज्ञानिक लोक ज्या पद्धतीने एखाद्या अणूच्या गुंतागुंतीच्या रचनेचा अभ्यास करतील, त्या पद्धतीने तुम्हाला या माध्यमविषयक माहितीचा अभ्यास करावा लागेल. आधी तुम्ही रचनेचा अंदाज घेता आणि मग या रचनेवरून माध्यम-उत्पादन कसं असेल यासंबंधी काही गृहीतक मांडता. त्यानंतर तुम्ही माध्यम-उत्पादनाचा अभ्यास करता आणि आपल्या मूळ गृहीतकाशी ते ताडून पाहता. माध्यम विश्लेषण म्हणजे हेच असतं : माध्यम-उत्पादन नक्की कसं आहे याचा काळजीपूर्वक अभ्यास करणं आणि माध्यमांचं रूप व रचनेबद्दलच्या साहजिक धारणांशी ते जुळतं का हे पाहणं.

आता आपल्याला काय दिसतं? पहिली गोष्ट म्हणजे विविध माध्यमं विविध गोष्टी करतात. उदाहरणार्थ, मनोरंजन / चित्रपटसृष्टी, दूरचित्रवाणी मालिका, इत्यादी गोष्टी.. किंवा बहुसंख्य वृत्तपत्रंही हेच करतात. ही व्यवस्था प्रचंड मोठ्या वाचक / प्रेक्षकांसाठी कार्यरत असते.

याशिवाय माध्यमांचा आणखी एक विभाग असतो : उच्चभ्रू माध्यमं. यांना काही वेळा 'अजेंडा' घडवणारी माध्यमं म्हणूनही संबोधलं जातं, कारण त्यांच्याकडे मोठी साधनसाम्राज्य असतात, आणि उर्वरित मंडळी जिच्या अंतर्गत कार्यरत असतात ती नियमांची चौकटही हीच माध्यमं निश्चित करतात. यात साधारणपणे 'न्यूयॉर्क टाइम्स' आणि 'सीबीएस' (अमेरिकेतील मोठी वृत्तवाहिनी कंपनी) यांचा समावेश करता येईल. यांचा ग्राहक हा मुख्यत्त्वे वरच्या वर्गातला असतो. 'न्यूयॉर्क टाइम्स' वाचणाऱ्यांपैकी - म्हणजे श्रीमंत असलेले, किंवा राजकीय वर्ग म्हणून गणले जाणारे लोक - काही जण राजकीय व्यवस्थेच्या समकालीन घडामोडींमध्येही गुंतलेले असतात. एका अर्थी ते कोणत्या ना कोणत्या प्रकारचे 'व्यवस्थापक' (मॅनेजर) असतात. ते राजकीय व्यवस्थापक असतील, किंवा व्यावसायिक व्यवस्थापक (कॉर्पोरेट क्षेत्रातले) असतील, किंवा विद्यापीठीय प्राध्यापकांच्या रूपातील व्यवस्थापक असतील, किंवा लोकांच्या विचारांना व दृष्टिकोनांना दिशा देणाऱ्यांपैकी असतील, म्हणजे पत्रकार असतील.

उर्वरित मंडळी ज्यात काम करतात अशी नियमांची चौकट ही उच्चभ्रू माध्यमं घालून देतात, हे मी आधीही नमूद केलेलं आहे. तुम्ही 'असोसिएट प्रेस' या वृत्तसंस्थेकडे पाहिलंत, तर साधारण दर दिवशी दुपारनंतर काही काळात तिथे एक सूचना प्रसिद्ध केली जाते : 'संपादकांसाठी सूचना - उद्याच्या 'न्यूयॉर्क टाइम्स'मध्ये खालील बातम्या पहिल्या पानावर प्रसिद्ध होणार आहेत.' हे करण्यामागचं कारण असं की, तुम्ही डायटन किंवा ओहियो अशा कुठल्यातरी ठिकाणी एखाद्या स्थानिक वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत असाल आणि कुठली गोष्ट 'बातमी' आहे याचा अंदाज बांधण्यासाठी आवश्यक स्त्रोत तुमच्याकडे नसतील किंवा तुम्हाला त्याबद्दल फार विचारही करायचा नसेल, तर ही सूचना तुम्हाला कोणत्या 'बातम्या' आहेत ते सांगते. मग या बातम्या तुमच्या एकूण पानातील स्थानिक घडामोडींशिवायच्या उरलेल्या जागेत, वाचकांचं लक्ष वळवण्यासाठी वापरात येतील. उद्या ज्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जायला हवं असं 'न्यूयॉर्क टाइम्स'ला वाटतं त्या बातम्या तुम्ही तुमच्या वृत्तपत्राच्याही पहिल्या पानावर लावता. डायटन, ओहियो इथे तुम्ही संपादक म्हणून काम करत असाल तर तुम्हाला दुसरा पर्यायही नसतो, कारण तुमच्याकडे तेवढे स्त्रोत नसतात. तुम्ही हे तत्त्व पाळलं नाहीत आणि बड्या वृत्तपत्रांना नकोशा वाटणाऱ्या बातम्या तुम्ही देत असाल, तर त्याबद्दल तुमची लवकरच कानउघडणी होऊ शकते. 'सॅन होजे मर्क्युरी न्यूज' या वृत्तपत्राबाबत जे घडलं ते याचं उत्तम उदाहरण ठरेल. [निकारागुआतून कोकेनची तस्करी 'सीआयए'पुरस्कृत (सेन्ट्रल इंटेलिजन्स एजन्सी : अमेरिकी गुप्तचर संस्था) बंडखोरांमार्फत अमेरिकेत केली जाते, या काळ्याबेऱ्या व्यवहारावर प्रकाश टाकणारी 'डार्क अलायन्स' ही लेखमाला ऑगस्ट १९९६मध्ये 'सॅन होजे मर्क्युरी न्यूज' या वृत्तपत्रामध्ये चालवण्यात आली होती. पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार गॅरी वेब यांच्या या लेखमालेविरोधात उजव्या विचारसरणीच्या वर्तमानपत्रांनी काहूर उठवलं. अखेर त्या वर्तमानपत्राने आपली 'चूक' झाल्याचं जाहीर करून टाकलं. प्रत्यक्षात कालांतराने या लेखमालेचं पुस्तकही आलं आणि नंतर काही वृत्तपत्रांनी या लेखमालेतील तपशील खरा असल्याचंही वेळोवेळी सांगितलं. पण तोपर्यंत मूळ वातावरण निवळून गेलं होतं]. तर, सत्तेच्या खेळामध्ये तुमच्यावर मर्यादा सांभाळण्यासाठी दबाव आणला जाण्याचे अनेक मार्ग असू शकतात. तुम्ही साचा तोडायचा प्रयत्न केलात, तर तुम्ही फार काळ टिकू शकणार नाही. ही (माध्यमांची) चौकट एकदम व्यवस्थित पद्धतीने चालते, अर्थात एकूण सत्तेच्या रचनेचाच तो एक भाग असल्यामुळे त्यातल्या या गोष्टी साहजिकच म्हणायला हव्यात.

खरी जनमाध्यमं एका अर्थी लोकांचं लक्ष विचलित करण्यातच गुंतलेली असतात. 'त्यांना काहीतरी दुसरं करू दे, आम्हाला त्रास देऊ नका' (यात 'आम्ही' म्हणजे हा सगळा सत्तेचा खेळ चालवणारे लोक). उदाहरणार्थ, लोकांना व्यावसायिक क्रीडाप्रकारांमध्ये गुंगवून ठेवा. व्यावसायिक क्रीडाप्रकारांच्या किंवा लैंगिक खेळांच्या वार्तांकनामध्ये किंवा तारेतारका नि त्यांच्या समस्या अशा कुठल्यातरी गोष्टींमध्ये प्रत्येकाला गुंतवून ठेवायचं. गुंतवून ठेवायला काहीही चालतं, फक्त ते गंभीर असायला नको! कारण, गंभीर गोष्टी या बड्या धेंडांसाठी असतात. 'आम्ही' देऊ त्याकडे लक्ष! असा हा व्यवहार असतो.

'अजेंडा' ठरवणारी ही उच्चभ्रू माध्यमं नक्की असतात कशी? 'न्यूयॉर्क टाइम्स' किंवा 'सीबीएस' असं आपण मगाशी म्हटलं. यात पहिला मुद्दा असा की, त्या मोठ्या स्तरावर कार्यरत असलेल्या, मोठा फायदा मिळवणाऱ्या कंपन्या असतात. आणखी महत्त्वाचा मुद्दा असा की, ती माध्यमं त्यापेक्षा मोठ्या कंपनीशी संबंधित तरी असतात किंवा अशा कंपनीच्या मालकीचीच असतात. उदाहरणार्थ, जनरल इलेक्ट्रिक ('एनबीसी' या माध्यम कंपनीमध्ये 'जनरल इलेक्ट्रिक'चा ४९ टक्के समभाग होता) किंवा वेस्टिंगहाउस ('वेस्टिंगहाउस इलेक्ट्रिक' या कंपनीची 'वेस्टिंगहाउस ब्रोडकास्टिंग' ही माध्यम कंपनी आहे). खाजगी अर्थव्यवस्थेच्या क्रूर रचनेत वरच्या वर्गामध्ये असलेल्या या कंपन्या. बड्या कंपन्या या मूलतः क्रौर्य, उतरंड यांच्यासह वरतून नियंत्रित होणाऱ्या अवस्थेतच अस्तित्त्वात असतात. त्या जे करतात ते तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्हाला तिथून निघून जावं लागतं. मुख्य प्रवाहातली माध्यमं ही या मोठ्या व्यवस्थेचा केवळ एक भाग आहेत.

अशा माध्यमांच्या संस्थात्मक रचनेविषयी काय सांगता येईल? खरंतर त्यात काही फारसा फरक असत नाही. सरकार, इतर कंपन्या, किंवा विद्यापीठं अशा उर्वरित सत्ताकेंद्रांशी माध्यमांचा संवाद सुरू असतो आणि संबंध जोडलेले असतात. माध्यमं ही एक सैद्धांतिक व्यवस्था असल्यामुळे त्यांची विद्यापीठीय व्यवस्थेशी बोलणी होतात. उदाहरणार्थ, तुम्ही दक्षिणपूर्व आशिया वा आफ्रिकेविषयी काही बातमी करत असाल, तर तुम्ही एखाद्या मोठ्या विद्यापीठातील संबंधित विषयाच्या तज्ज्ञाकडे जाणं अपेक्षित असतं आणि तो तुम्हाला काय लिहावं यासंबंधी मार्गदर्शन करेल. या बाहेरच्या संस्थाही माध्यमांच्या व्यवस्थेला साजेशा असतात.

उदाहरणार्थ, विद्यापीठ ही स्वतंत्र संस्था असत नाही. त्यात काही स्वतंत्र वृत्तीची माणसं जरूर असतील आणि हे माध्यमांच्या व्यवस्थेलाही लागू होतं, किंवा बड्या कंपन्यांनाही हे लागू होतं, किंबहुना फॅसिस्ट सरकारांनाही हे लागू होईल. पण संस्थात्मक पातळीवर मात्र या रचना बांडगुळासारख्या असतात. खाजगी मत्ता, निधी उपलब्ध करून देणाऱ्या बड्या कंपन्या, सरकारं (ही पुन्हा कंपन्यांशी एवढी जवळीक साधून असतात की त्यांच्यात भेद करणंच अवघड व्हावं), अशा बाह्य सहकार्यावर माध्यमं अवलंबून असतात. या रचनेमधील ज्या लोकांना त्यात मिसळून जाता येत नाही, जे ती रचना स्वीकारत नाहीत, त्यांना त्यातून बाहेर पडावं लागतं. डोक्याला ताप देणारी आणि स्वतंत्रपणे विचार करणारी माणसं गाळण्यासाठी विविध यंत्रणा आहेत. तुमच्यापैकी जे लोक महाविद्यालयांमधून शिकून आले असतील त्यांना याची कल्पना असेलच की, महाविद्यालयांमध्ये अनुरूपता आणि आज्ञाधारकपणा यांना प्रोत्साहन दिलं जातं; तुम्ही या नियमांचं पालन केलं नाहीत तर तुम्ही त्रासदायक ठरता. या गाळणीतून बाहेर आलेली माणसं अगदी प्रामाणिकपणे (खोटेपणा करून नव्हे, तर खरंच प्रामाणिकपणे) समाजातील सत्ताव्यवस्थांनी उभ्या केलेल्या श्रद्धांच्या व स्वभावांच्या चौकटीत सामावून जातात. हार्वर्ड किंवा प्रिन्स्टन अशा उच्चभ्रू शिक्षणसंस्था घ्या किंवा एखादं लहानसं महाविद्यालय घ्या, सगळे सामाजिकीकरणाच्या तयारीत असतात. हार्वर्डसारख्या ठिकाणी बराच वेळ शिक्षणपद्धतीच्या शिष्टाचारांमध्येच जातो. उदाहरणार्थ, उच्च वर्गाचा सदस्य म्हणून कशी वर्तणूक ठेवावी, योग्य विचार कसे करावेत, इत्यादी.


पेंग्वीन, २००८ आवृत्ती
१९४०च्या दशकात लिहिली गेलेली जॉर्ज ऑर्वेलची 'अॅनिमल फार्म' ही कादंबरी तुम्ही वाचली असेल. सोव्हिएत युनियनवरची विडंबनात्मक भाष्य करणारी ही कादंबरी खूप गाजली. सगळ्यांना ती आवडली. पण ऑर्वेलने 'अॅनिमल फार्म'ला लिहिलेली प्रस्तावना दाबली गेली, हे नंतर प्रकाशात आलं. साधारण तीस वर्षांनी ती प्रसिद्ध झाली. त्याच्या कागदपत्रांमध्ये कोणाला तरी ती सापडली. 'अॅनिमल फार्म'ची प्रस्तावना कशाबद्दल होती, तर 'इंग्लंडमधल्या वाङ्यमयीन सेन्सॉरशिप'बद्दल. याशिवाय सोव्हिएत युनियनच्या एकपक्षीय हुकूमशाहीचं विडंबन करणारी ही कादंबरी आहे हेही त्यात स्पष्ट केलेलं होतं. पण इंग्लंडमधली परिस्थिती काही फारशी वेगळी नाही असं ऑर्वेलने म्हटलं होतं. आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचा गळा धरणारी 'केजीबी' (रशियन गुप्तचर संस्था) नाहीये हे खरं, पण इथल्या घडामोडींचा शेवटही साधारण तसाच असतो, असं त्याने म्हटलं होतं. स्वतंत्र कल्पना मांडणारे आणि 'चुकीचा' विचार करणारे लोक संपवले जातात.

ऑर्वेल त्या प्रस्तावनेत संस्थात्मक रचनेबद्दल खूपच कमी बोलतो, फारतर दोनेक वाक्यं. 'हे का होतं?' असा त्याचा प्रश्न आहे. याचं एक उत्तर हे आहे की, माध्यमं अशा श्रीमंत व्यक्तींच्या मालकीची असतात, ज्यांना लोकांपर्यंत काही विशिष्ट गोष्टीच पोचवणं आवश्यक वाटत असतं. ऑर्वेल पुढे असंही म्हणतो की, तुम्ही उच्चभ्रू शैक्षणिक व्यवस्थेतून शिकून निघता तेव्हा, ऑक्सफर्ड विद्यापीठामधून शिकून बाहेर पडता तेव्हा, ‘काही गोष्टी बोलणं योग्य नसतं, काही विचार करणं योग्य नसतं’ हे शिक्षण तुमच्या जाणिवेत उतरलेलं असतं. सामाजिकीकरणाची ही भूमिका उच्चभ्रू संस्था पार पाडतात आणि तुम्हाला त्यामध्ये जमवून घेता आलं नाही, तर तुम्ही सर्वसाधारणपणे बाहेर फेकले जाता. ऑर्वेलच्या या दोन वाक्यांमधून पुरेसं चित्र स्पष्ट होतं.

तुम्ही जर माध्यमांवर टीका केलीत आणि म्हणालात की, हे पाहा अँथनी लुईस (२७ मार्च १९२७ – २५ मार्च २०१३. पुलित्झर पुरस्कार विजेते विचारवंत व पत्रकार. अमेरिकेत कायदे पत्रकारितेचा पाया यांनी घातला.) काय म्हणतायंत किंवा अमुक एक व्यक्ती पाहा काय लिहितेय, तर माध्यमं चिडतात. ती म्हणतील, 'आम्ही काय लिहावं हे आम्हाला कोणी सांगायला नको. आम्हाला जे वाटतं ते आम्ही लिहितो. दबाव आणि मर्यादांच्या व्यवहाराबद्दल जे बोललं जातंय ती बकवास आहे. आम्ही कधीच दबावाखाली नसतो.' हे अगदीच खरं आहे, पण मुळात आपल्याला काय लिहावं हे कोणी सांगू नये अशा अवस्थेला येऊन 'योग्य' तेच लिहिण्याच्या स्थितीपर्यंत माध्यमांमधली ही मंडळी पोचलेली असतात. समजा एखादी व्यक्ती महानगर डेस्कला कामाला असेल आणि तिने नको त्या बातम्यांचा पाठपुरावा केला असता तर ती व्यक्ती ज्या पदापर्यंत पोचली असेल तिथपर्यंत पोचूच शकली नसती. या पदावरून मात्र ती व्यक्ती तिला हवं ते बोलू शकते! विद्यापीठांमधल्या तात्त्विक विद्याशाखांमधील शिक्षकगणांबद्दलही साधारण हेच सांगता येईल. हे सगळेच सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून तयार झालेले असतात.

आता, या सगळ्या व्यवस्थेकडे पाहिल्यानंतर बातमी कशी असावी अशी तुमची अपेक्षा आहे? ते तर अगदीच साहजिक आहे. समजा, 'न्यूयॉर्क टाइम्स' घेतला, तर ती एक कंपनी आहे आणि ती एक उत्पादन विकते. त्यांचं उत्पादन असतो तो ‘वाचक-प्रेक्षकवर्ग’. तुम्ही वर्तमानपत्र विकत घेता त्यातून मालक कंपन्यांना पैसा मिळत नाही. वर्तमानपत्र तर ते इंटरनेटवर मोफतही उपलब्ध करून देऊ शकतील. उलट, तुम्ही वर्तमानपत्र विकत घेता तेव्हा ते त्यांच्या खिशातलाच पैसा खर्च करत असतात. पण 'वाचक-प्रेक्षकवर्ग' हे उत्पादन असतं. संपन्न लोक - म्हणजे वर्तमानपत्रांमधून लिहितात तेच लोक म्हणा ना, समाजातील उच्च वर्गातील निर्णयक्षम लोक, हे ‘उत्पादन’ असतात. मालक कंपनीला हे उत्पादन बाजारात विकायचं असतं आणि हा बाजार म्हणजे 'जाहिरातदार' (हा पुन्हा वेगळाच धंदा आहे). दूरचित्रवाणी असो की वर्तमानपत्र, किंवा दुसरं काहीही, ते वाचक-प्रेक्षकवर्गच विकत असतात. आपला वाचक-प्रेक्षकवर्ग कंपन्या एकमेकांना विकत असतात. उच्चभ्रू माध्यमांचा हाच मोठा व्यवसाय आहे.

यावर आता काय होऊ शकतं अशी तुमची अपेक्षा आहे? या परिस्थितीत माध्यम-उत्पादनाचं रूप कसं असेल? अजून वेगळा कोणताही अंदाज न बांधता साधारण काय गृहीतक मांडता येईल? अगदी साधी गोष्ट ही की, माध्यमांमधून जे उत्पादित होतं ते (म्हणजे काय दाखवलं जाणार आहे आणि काय दाखवलं जाणार नाहीये हे)  खरेदीदार आणि विक्रेते यांच्या, संस्थांच्या आणि त्याभोवतीच्या सत्ताव्यवस्थांच्या हितसंबंधांना धरून असेल. असं झालं नाही तर तो एक चमत्कार ठरेल.

यापुढचं काम अवघड असणार आहे. आपण अंदाज बांधतोय त्याप्रमाणे हे काम सुरू असतं का, हे तुम्ही तुमच्यापुरतं ठरवू शकालच. या साध्या गृहीतकासंबंधी वाचण्यासारखं बरंच साहित्य उपलब्ध आहे. आणि अनेक अवघड शंकांनाही ते पुरून उरलेलं आहे. निष्कर्षांवर एवढं टिकून राहणारं दुसरं कोणतंही गृहीतक तुम्हाला सामाजिक शास्त्रांमध्ये सापडणार नाही. आणि यात तसं काही आश्चर्य वाटावं असं नाही, कारण ज्या पद्धतीने सगळ्या शक्ती कार्यरत आहेत, त्या पार्श्वभूमीवर असं नाही झालं तरच आश्चर्य वाटेल.

हा सगळा विषय निषिद्ध ठरवला जातो ही बाबही तुमच्या लक्षात येईल. तुम्ही केनडी स्कूल ऑफ गव्हर्नमेन्ट किंवा स्टॅनफोर्ड अशा एखाद्या ठिकाणी गेलात आणि पत्रकारितेचं किंवा राज्यशास्त्राचं शिक्षण घेत असाल, तर असे प्रश्न तुमच्यापुढे येण्याची शक्यताच नाही. म्हणजे फारशी माहिती नसणाऱ्यालाही लक्षात येऊ शकेल असं गृहीतक प्रत्यक्षात सर्वांपुढे मांडण्याची मात्र परवानगी नसते आणि त्यासंबंधीच्या पुराव्यांचीही चर्चा होऊ शकत नाही. याचाही अंदाज तुम्ही बांधू शकता. संस्थात्मक रचनेकडे पाहिलं तर तुम्ही म्हणाल की, हे लोक स्वतःला कशाला उघडं पाडून घेतील? ते काय करू लागलेत याचं टीकात्मक विश्लेषण करण्याची मुभा का देतील? याचं साधं उत्तर ते अशी मुभा देणार नाहीत आणि देत नाहीत, हे आहे. ही ठरवून घातलेली 'सेन्सॉरशिप' आहे असं नाही. तुम्ही फक्त तिथपर्यंत पोचत नाही इतकंच. यात डावे (म्हणजे ज्यांना ‘डावे’ समजलं जातं ते) आणि उजवे दोघंही आले. तुम्ही पुरेसे सामाजिक होऊन, प्रशिक्षित होऊन तयार होत नाही तोपर्यंत, म्हणजे काही स्वतंत्र विचार बाळगणंच तुम्ही सोडून देत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे पोचू शकत नाही. अशा प्रक्रियेत पहिल्या पातळीवरच्या अंदाजांवर चर्चाही करायची नाही याचा अंदाज तुम्ही दुसऱ्या पातळीवर पक्का करून टाकता.

लक्ष द्यायला हवी अशी शेवटची गोष्ट म्हणजे ही सर्व प्रक्रिया ज्या सैद्धांतिक चौकटीमध्ये चाललेली असते ती चौकट. माध्यमं, जाहिराती, विद्यापीठीय समाजशास्त्रं अशा माहितीव्यवस्थेतले उच्चपदस्थ एकमेकांसाठी लिहीत असतात तेव्हा त्यांना याची जाणीव असते का की, या माहितीच्या प्रवाहाचं पुढे काय होणार आहे? दर क्रमिक वर्षाच्या आरंभी दिल्या जाणाऱ्या गोडबोल्या भाषणांबद्दल नाही म्हणत, तर ही मंडळी जेव्हा एकमेकांसाठी लिहितात तेव्हा त्याबद्दल सर्वसामान्य लोकांचं-वाचकांचं म्हणणं काय असतं याचा विचार करतात का?

या प्रश्नाच्या उत्तराकडे बघण्याचे तीन प्रवाह आहेत. एक, जनसंपर्क (पब्लिक रिलेशन्स - पीआर) क्षेत्र, व्यावसायिक प्रचाराचं मुख्य क्षेत्र. तर, 'पीआर' क्षेत्रातील बडे लोक याबद्दल काय सांगतात? दुसरा प्रवाह म्हणजे संपादकीय पानांवरती लेख लिहिणारे, विचारवंत, 'पब्लिक इंटलेक्चुअल' म्हणून ओळखले जाणारे लोक, लोकशाहीच्या रचनेबद्दल वगैरे पुस्तकं लिहिणारे, अशांना याबद्दल काय वाटतं? तिसरा प्रवाह आहे तो विद्यापीठीय मंडळींचा, विशेषकरून संपर्क व माहितीच्या रचनेशी संबंधित विद्याशाखांमधील लोकांचं याबद्दल काय म्हणणं आहे?

या तीन प्रवाहांतील मंडळी काय म्हणतायंत? ढोबळमानाने सांगायचं तर त्यांचं म्हणणं असतं की, सर्वसामान्य जनता म्हणजे 'निष्काळजी आणि लु़डबुडे परके' असतात. त्यांना सार्वजनिक प्रक्रियांमधून दूरच ठेवायला हवं, कारण ते मूर्ख असतात, ते यात सामील झाले तर ते गोंधळ घालतील. त्यांचं काम 'बघे' असणं आहे, 'सहभागी' होणं नाही.

त्यांना अधूनमधून मतदान करण्याची मुभा आहे. पण नंतर त्यांनी घरी जावं आणि फुटबॉल किंवा त्यांना काय हवं ते पाहत बसावं. पण काहीही झालं तरी या 'निष्काळजी आणि लुडबुड्या परक्यां'नी फक्त 'बघे' असावं, 'सहभागी' होऊ नये. सहभागी व्यक्ती 'जबाबदार' असतात. यात तुम्ही हा प्रश्न विचारू शकत नाही की, तुम्ही 'जबाबदार' व्यक्ती आहात तर अमुकतमुक व्यक्तीला तुरुंगात का डांबलंय? याचं उत्तरही साहजिकच असतं. याचं उत्तर हे की, ‘जबाबदार’ व्यक्ती सत्तेला शरण गेलेली आणि आज्ञाधारक आहे आणि तुरुंगात डांबलेली व्यक्ती स्वतंत्र विचारांची असेल कदाचित. पण मुळात हा प्रश्नच कोणी विचारणार नाही. त्यामुळे काही हुशार व्यक्तींनी हा खेळ चालवणं अपेक्षित आहे आणि तुम्ही त्यातून बाहेर पडणं अपेक्षित आहे. एका लेखातील विधान द्यायचं तर, 'लोक आपल्या हितसंबंधांना सगळ्यांत चांगलं जोखू शकतात, या लोकशाही तत्त्वा'ला तुम्ही शरण जाणं अपेक्षित नाही. (अवतरणचिन्हांमधलं विधान हेरॉल्ड लासवेलचं आहे). लोक आपल्या हितसंबंधांना ओळखू शकत नाहीत, हे काम त्यांच्यासाठी कोणीतरी दुसऱ्याने करावं लागतं!

हे लेनिनवादाच्या जवळ जाणारं आहे. आम्ही तुमच्यासाठी गोष्टी करतो आणि आम्ही त्या सगळ्यांच्या हितासाठी करतोय, वगैरे. म्हणूनच कदाचित पूर्वीपासून उत्साही स्टॅलिनवादी असलेल्या लोकांना अमेरिकी सत्तेचं समर्थक होणं आणि उलट अमेरिकी समर्थक असण्यापासून स्टॅलिनवादी होण्यापर्यंत भूमिका बदलणं सोपं जातं आलंय. एका भूमिकेपासून दुसऱ्या भूमिकेवर लोक खूप पटकन बदलत राहू शकतात. मला अशी दाट शंका आहे की, मुळात या भूमिका एकच आहेत. म्हणजे तुम्ही भूमिका बदलतच नाहीयात खरं तर. तुम्ही फक्त सत्ता कुठे आहे याचा वेगळा अंदाज बांधताय. कधी तुम्हाला वाटतं, ती इथे असेल; कधी वाटतं, तिथे असेल. यातून तुम्ही भूमिका निश्चित करता.

हे सगळं कसं तयार होत आलं याचा इतिहास खूपच रोचक आहे. साधारण पहिल्या महायुद्धामध्ये (१९१४-१९१८) यातील बऱ्याच गोष्टींची सुरुवात झाली. ते एक मुख्य वळण मानता येईल. जगातील अमेरिकेचं स्थान तेव्हापासून बदलून गेलं. अठराव्या शतकातच अमेरिका हे जगातील सर्वांत श्रीमंत राष्ट्र होतं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ब्रिटनमधल्या उच्च वर्गांनाही एवढ्या गुणवत्तेचं जीवनमान, आरोग्यमान राखता आलं नव्हतं. बाकीच्या देशांबद्दल तर बोलायलाच नको. अमेरिका अतोनात श्रीमंत होती आणि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ती जगातील सर्वांत मोठी अर्थसत्ता बनली. पण तेव्हाही ती जगाच्या पटावरची मोठी खेळाडू नव्हती. कॅरेबियन बेटं, आणि पॅसिफिकचा काही भाग अमेरिकेच्या खात्यात जमा होता, पण त्यापलीकडे काही त्यांची पोच नव्हती.

पहिल्या महायुद्धादरम्यान चित्र बदललं. आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान तर यात आणखी बरेच बदल झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जवळपास जग हस्तगत केलं. पहिल्या महायुद्धापासून अमेरिका कर्जबाजारीपणाकडून कर्ज देणाऱ्या भूमिकेत गेली. ब्रिटनसारखं मोठ्या प्रमाणावर नाही, पण जगाच्या नकाशावर पहिल्यांदाच अमेरिकेचं अस्तित्त्व प्रकर्षाने जाणवू लागलं. हा पहिला बदल. इथून पुढे आणखी बदल होत गेले.

पहिल्या महायुद्धादरम्यान पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांनी अत्यंत नियोजित प्रचारतंत्र (प्रॉपगॅन्डा) अवलंबलं. ब्रिटिशांचं माहिती मंत्रालय होतं आणि अमेरिकेला युद्धात ओढण्यासाठी त्यांना ते आवश्यकच होतं, अन्यथा ते भयानक संकटात सापडले असते. त्यामुळे 'हुनां'च्या (हून : जर्मनांना ब्रिटीश व अमेरिकींकडून वापरलं जाणारं अशिष्ट संबोधन. संदर्भ : युरोपातील काही टोळ्यांचा) कारवायांपासून विविध गोष्टींसंबंधी फसवा प्रचार सुरू ठेवण्यात हे मंत्रालय कार्यरत होतं. अमेरिकी विचारवंतांवर त्यांच्या प्रचारतंत्राचा मुख्य रोख होता. कारण हेच लोक त्यांच्या त्यांच्या व्यवस्थेत त्याचा प्रसार करू शकणार होते. या प्रचारतंत्राचा चांगलाच परिणाम झाला. ब्रिटिशांच्या या माहिती मंत्रालयातील कागदपत्रांनुसार (यातील अनेक कागदपत्रं आता उपलब्ध झाली आहेत), त्यांचं लक्ष्य होतं ते अख्ख्या जगाचं नियंत्रण करण्याचं, त्यातील लहानसा भाग होता, अमेरिकेचं नियंत्रण. भारतातील लोकांना काय वाटतंय याला त्यांच्या लेखी काहीच किंमत नव्हती. अमेरिकी विचारवंतांना ब्रिटीश प्रचार स्वीकारायला लावण्यात ब्रिटिश सरकारचं माहिती मंत्रालय भलतंच यशस्वी झालं. त्यांना त्याचा अभिमानही वाटला. कारण त्यांचा जीव त्यामुळे वाचला होता. अन्यथा ते पहिलं महायुद्ध हरले असते.

अमेरिकेत त्यांना साथीदारही मिळाला. युद्धविरोधी पार्श्वभूमीवर १९१६ साली वुड्रो विल्सन अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. अमेरिका हा शांतताप्रिय देश होता. नेहमीच! परदेशी युद्धांमध्ये लढण्यात त्यांना रस नव्हता. त्यामुळे पहिल्या महायुद्धालाही अमेरिकेचा विरोध होता. वास्तविक वुड्रो विल्सन युद्धविरोधी भूमिकेमुळेच निवडून आले होते. 'विजयाशिवाय शांतता' ही त्यावेळची घोषणा होती. पण त्यांचा मूळचा विचार युद्धात उतरण्याचा होता. त्यामुळे शांतताप्रिय जनतेला जर्मनविरोधी माथेफिरू बनवून सर्व जर्मनांना मारण्यापर्यंत त्यांचं मन कसं वळवायचं, हा प्रश्न होता. यासाठी प्रचार आवश्यक होता. त्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या इतिहासातील पहिली आणि मोठ्या प्रमाणात चालणारी एकमेव प्रचारसंस्था उभी केली. 'सार्वजनिक माहिती समिती' असं तिचं (ऑर्वेलच्या कादंबरीत शोभेलसं) नाव होतं, तिला 'क्रिल आयोग' म्हणूनही ओळखलं जायचं. या संस्थेच्या अध्यक्षाचं नाव होतं क्रिल. जनतेला उन्मादासाठी उद्युक्त करण्याचं काम या आयोगाकडे होतं. हेही चांगलंच जमून आलं. काही महिन्यांतच जनतेत उन्माद निर्माण झाला आणि अमेरिका युद्धात सामील झाली.

या यशाने अनेक लोक प्रभावित झाले. यातून प्रभावित झालेला, आणि ज्याचा भविष्यात मोठा परिणाम दिसून आला असा, एक इसम होता अॅडॉल्फ हिटलर. 'माइन काम्फ'मध्ये तो शेवटी काहीसं समर्थन करून म्हणतो की, ‘जर्मनी पहिलं महायुद्ध हरलं कारण ते प्रचाराची लढाई हरलं. ब्रिटीश आणि अमेरिकेच्या प्रचारतंत्राशी ते स्पर्धाही करू शकले नाहीत.’ पण आता आपली स्वतःची प्रचारयंत्रणा असेल, असं हिटलर लिहितो आणि दुसऱ्या महायुद्धात हे दिसून आलं. हिटलरशिवाय या प्रचारतंत्राने प्रभावित झालेले लोक होते ते अमेरिकेतल्या व्यावसायिक क्षेत्रातले. त्यांच्यापुढे त्या काळात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. देश अधिकृतरित्या अधिक लोकशाही होत होता. अधिक लोकांना मतदानाचा अधिकार मिळत होता, वगैरे. देश श्रीमंतही होत होता आणि त्यात अनेक लोक सहभागी होऊ शकत होते, स्थलांतरितांची संख्याही वाढत होती.

यावर काय करायचं? कारण अशा वाढत्या लोकशाहीच्या परिस्थितीत खाजगी कंपूत व्यवहार सुरू ठेवणं अवघड जाईल. तर मग त्यावर उपाय म्हणजे, तुम्हाला लोकांच्या विचारांवर नियंत्रण आणावं लागेल. तेव्हा जनसंपर्क तज्ज्ञ होते, पण जनसंपर्क क्षेत्र असं वेगळं अस्तित्त्वात नव्हतं. उद्योगपती (जॉन डी.) रॉकफेलर यांची प्रतिमा अधिक चांगली दिसावी यासाठी तेव्हा एका व्यक्तीला नेमण्यात आलं होतं. पण विशेष क्षेत्र म्हणून जनसंपर्क यंत्रणेचा उदय पहिल्या महायुद्धानंतर झाला. हा खास अमेरिकी शोध होता. यात मुख्यत्त्वे क्रिल आयोगातील लोकांचा समावेश होता. किंबहुना जनसंपर्क क्षेत्रातला मुख्य इसम एडवर्ड बर्नेस हा थेट क्रिल आयोगातूनच आला होता. त्याने नंतर लगेचच एक पुस्तक लिहिलं : 'प्रॉपगॅन्डा'. खरं तर 'प्रॉपगॅन्डा' या संकल्पनेला तेव्हा नकारात्मक भाव नव्हता. पण दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीच्या संदर्भात वापरण्यात आल्यानंतर या शब्दाने नकारात्मक रूप घेतलं आणि त्याचा निषिद्धपणाचा प्रवास सुरू झाला. आधी 'प्रॉपगॅन्डा' म्हणजे केवळ माहिती किंवा तत्सम गोष्ट, एवढाच अर्थ होता. तर, बर्नेसने १९२५च्या आसपास 'प्रॉपगॅन्डा' हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखक पहिल्या महायुद्धात शिकलेल्या धड्यांवरून काही मांडू पाहतोय, हे स्पष्ट केलेलं आहे. 'सैन्य ज्याप्रमाणे शरीरांचं संघटन करत त्याप्रमाणे लोकांच्या मनांचंही संघटन करणं शक्य आहे', हे म्हणणं मांडून बर्नेस सुरुवात करतो. मूर्ख लोक योग्य मार्गावर राहावेत यासाठी अल्पसंख्याक बुद्धिमानांनी मनांच्या संघटनाचं तंत्र अवलंबावं, असं बर्नेस म्हणतो. आताच्या काळात आपल्याकडे याची आणखी नवीन तंत्र आहेत.

आयजी पब्लिशिंग, २००४ आवृत्ती
बर्नेसलिखीत 'प्रॉपगॅन्डा' ही जनसंपर्क क्षेत्राची मुख्य माहितीपुस्तिका आहे. बर्नेस हा त्यातला एक प्रकारचा गुरू आहे. रूझवेल्ट / केनडी या अमेरिकेच्या अध्यक्षांचा तो विश्वासार्ह अनुयायी होता. ग्वाटेमालामधल्या लोकशाही सरकारला उलथवून टाकण्यासाठी अमेरिकेच्या पाठिंब्याने घडवून आणण्यात आलेल्या बंडासाठी त्याने जनसंपर्क यंत्रणा राबवली होती.

बर्नेसला १९२०च्या दशकाच्या अखेरीस प्रसिद्धी देणारी मोठी कृती होती ती महिलांना सिगरेट प्यायला प्रोत्साहित करण्यासाठी त्याने केलेला प्रचार (‘टॉर्चेस ऑफ फ्रिडम’ या नावाने ही जाहिरात मोहीम ओळखली जाते). त्याकाळी महिला सिगरेटी ओढत नसत आणि याने 'चेस्टरफिल्ड' या कंपनीसाठी मोठी प्रचारमोहीमच सुरू केली. ही तंत्रं आता तुम्हाला माहितीची आहेत : मॉडेल किंवा चित्रपट तारेतारका तोंडात सिगरेट पकडून उभ्या असणार, वगैरे. याबद्दल बर्नेसचं प्रचंड कौतुक झालं. आणि जनसंपर्क क्षेत्रातलं तो मोठं व्यक्तिमत्त्व ठरला, त्याचं पुस्तक यासंबंधीचं माहितीपुस्तक ठरलं.

क्रिल आयोगातील दुसरा माणूस होता वॉल्टर लिपमान. अमेरिकेतील पत्रकारितेमध्ये (इथे मी गंभीर पत्रकारितेबद्दल बोलतोय. खरोखरचं वैचारिक लेखन) सुमारे अर्धशतक मानाचं स्थान कमावून असलेला लिपमान. १९२०मध्ये पुरोगामी ठरतील असे लोकशाहीचा पुरस्कार करणारे निबंध त्याने लिहिले. तोही 'प्रोपगांडा' तंत्राचा उघड वापर करत होता. लोकशाहीमध्ये सहमतीचं उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग कन्सेन्ट) ही नवीन कला आहे, असं तो म्हणायचा. 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेन्ट' हा शब्दप्रयोग त्याचा आहे. एडवर्ड हरमान आणि मी तो आमच्या पुस्तकाच्या शीर्षकात वापरला, पण त्याचं मूळ लिपमान आहे. त्याचं म्हणणं आहे की, आपण लोकांची सहमती उत्पादित करू शकतो आणि त्यांना लोकशाही व्यवहारात सहभागी होण्याचा अधिकृत मार्ग असला तरीसुद्धा आपण सांगू तेच ते करतील यासाठी त्यांच्या निवडी व स्वभाव यांची रचना आपण ठरवू शकतो. यातूनच खरी लोकशाही तयार होईल. ती 'योग्य' पद्धतीने चालेल! प्रचारयंत्रणेचे धडे राबवण्याचा हा प्रकार होता.

अशा गोष्टींमधूनच विद्यापीठीय सामाजिकशास्त्र, राज्यशास्त्र बाहेर येतात. संज्ञापन आणि विद्यापीठीय राज्यशास्त्राचा उगम ज्याच्यापासून झाला असं मानलं जातं, तो हेरॉल्ड लासवेल (१३ फेब्रुवारी १९०२ – १८ डिसेंबर १९७८. श्रेष्ठ अमेरिकी राजकीय विचारवंत). त्याने केलेलं मोठं काम होतं ते प्रचारतंत्राचा अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक. लोकशाही तत्त्वांना शरण न जाण्यासंदर्भात प्रचारयंत्रणेसंबंधीचं जे विधान आपण नोंदवलं ते ग्लासवेलचं. मुख्यतः महायुद्धाच्या काळातील अनुभवांवरून बोलायचं तर, अशा अनुभवांमधून राजकीय पक्षांनीही (विशेषकरून कॉन्झर्व्हेटीव पक्षाने) धडे घेतले. त्यांचीही कागदपत्रं आता उपलब्ध आहेत, त्यातून असं लक्षात येतं की, त्यांनीही ब्रिटीश माहिती मंत्रालयाचं यश मान्य केलं होतं. देश अधिकाधिक लोकशाही होतोय आणि आता तो खाजगी कंपू राहणार नाही, याची जाणीव त्यांना होत होती. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार राजकारण हे राजकीय युद्ध व्हायला हवं होतं. त्यासाठी पहिल्या महायुद्धादरम्यान उत्तम कामगिरी केलेल्या प्रचारयंत्रणेच्या मदतीने लोकांच्या विचारांवर नियंत्रण मिळवायला हवं.

हा झाला सैद्धांतिक भाग आणि तो संस्थात्मक रचनेशी जुळतो. गोष्टी कशा व्हायला हव्यात यासंबंधीचे अंदाज यातून ठोस स्वरूपात पुढे येतात. हे अंदाज सिद्धही झालेले आहेत. पण हे निष्कर्षही चर्चेत आणण्यास मुभा नाही. आता हे सगळं मुख्य प्रवाहात साहित्यरूपात उपलब्ध आहे, पण ते फक्त आतल्या लोकांसाठी. तुम्ही महाविद्यालयात जाता तेव्हा लोकांची मनं कशी नियंत्रित करावी यासंबंधीची पुस्तकं वाचणार नाही.

तसंच जेम्स मॅडिसन (४ मार्च १८०९ – ४ मार्च १८१७. अमेरिकी घटनाकार व चौथा राष्ट्राध्यक्ष) घटना परिषदेमध्ये काय म्हणाला तेही तुम्ही वाचणार नाही. नवीन व्यवस्थेचं मुख्य लक्ष्य 'धनाढ्य अल्पसंख्यांचं बहुसंख्यांपासून रक्षण करणं हे आहे' असं तो म्हणाला होता आणि ही व्यवस्था आपलं लक्ष्य व्यवस्थित पूर्ण करेल अशीच तिची रचना असावी लागते. घटनात्मक व्यवस्थेची सुरुवात ही अशी आहे, त्यामुळे तिचा कोणी अभ्यासही करत नाही. तुम्ही खूपच प्रयत्न करून शोध घेतलात तरच काही सापडेल अन्यथा विद्यापीठीय चौकटीत याला जागा नाही.

संस्थात्मक पातळीवर माध्यमांची व्यवस्था कशी काम करते, त्यामागे कोणती तत्त्वं असतात, ती कशाप्रकारे राबवली जातात, याचं मला दिसणारं हे ढोबळ चित्र आहे. 'परक्या निष्काळजी लुडबुड्यां'कडे निर्देश करणारा आणखीही भाग आहे. यात मुख्यत्त्वे कोणत्या ना कोणत्या मार्गाने लक्ष विचलित करत राहणं हा मुख्य मुद्दा असतो. यावरून मला वाटतं, (माध्यमांच्या व्यवस्थेतून) आपल्या हाताला काय लागेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकाल.

Tuesday, 26 March 2013

थँक्स मायकल । रेघ : एक टप्पा

'झेड कम्युनिकेशन्स' ही मॅसेच्युसेट्स (अमेरिका) इथली माध्यमसंस्था तुमच्या माहितीची असेल तर तुम्हाला लगेच हे सांगायला हरकत नाही की, 'रेघे'वर आता 'झेड-नेट' व 'झेड-मॅगझिन' या दोन प्रकाशनांमधला मजकूर योग्य ते सौजन्य दाखवून आपण प्रकाशित करणार आहोत, त्यासाठी आवश्यक परवानगी आपण त्यांच्या संपादकांकडून घेतलेली आहे. त्यांचे सह-संस्थापक व सह-संपादक मायकल अल्बर्ट यांनी 'रेघे'ला ही परवानगी देत असल्याचं कळवलंय, त्यामुळे आता अधूनमधून त्यांच्या मदतीने आपण काही मजकूर इथे नोंदवू. हा मजकूर कोणाचा असू शकतो, तर रॉबर्ट फ्रिस्क, नोम चोम्स्की, जॉन पिल्जर या नि अशाच काही महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मंडळींचा असू शकतो. हे लोक 'झेड-नेट'हून 'रेघे'द्वारे आपल्यापर्यंत आता अधिकृतरित्या पोचू शकतील.

केवळ एका लहानशा ई-मेलला सहज प्रतिसाद देत मायकल यांनी 'रेघे'ला त्यांच्या प्रकाशनांमधले लेख मराठीत अनुवादित करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल आपण आधी मायकल यांना 'थँक्स' म्हणूया. स्वतःच्या नावावर पंधराएक प्रकाशित पुस्तकं असलेल्या मायकल यांनी केवळ परवानगीच दिली असं नव्हे तर 'आमच्यासाठीही ही मोठी गोष्ट असेल' असं म्हटलं. एकूण चांगलं झालं.


मायकल अल्बर्ट आणि लिडिया सार्जन्ट या दोघांनी १९८६मधे 'झेड कम्युनिकेशन्स'ची स्थापना केली. तेव्हाच त्यांनी 'झेड मॅगझिन' या मासिक नियतकालिकाचीही सुरुवात केली. त्यानंतर १९९५ साली 'झेड-नेट', १९९८ साली 'झेड व्हिडियो' असा या संस्थेचा प्रवास होत आलेला आहे. याशिवाय 'झेड-बुक्स' असाही त्यांचा उपक्रम आहे. थोडक्यात सांगायचं तर, माध्यमांच्या बाजारापासून अंतर राखून चालणाऱ्या पर्यायी माध्यमांच्या प्रवाहांची गरज भागवण्याचे अनेक प्रयत्न जगभर सुरू असतात, त्यातला 'झेड कम्युनिकेशन्स' हा एक प्रयत्न आहे.




'झेड-नेट' व 'झेड-मॅगझिन' या दोन्ही ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणापासून माध्यमांच्या व्यवहारापर्यंत विश्लेषणाच्या पातळीवरचा मजकूर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होतो. अनेक मुलाखती, लेख यांच्या मदतीने जागतिक घडामोडींच्या प्रकाशात न येणाऱ्या बाजू 'झेड'च्या माध्यमातून वाचकांपुढे आणल्या जातात हे कोणीही तपासून घेऊ शकतं. मोठ्या प्रमाणावर स्वतंत्रपणे काम करणारी पर्यायी माध्यमांची एक व्यवस्था 'झेड-कम्युनिकेशन्स'वाल्यांची आहे.

'रेघे'पुरतं आपण 'झेड-नेट' व 'झेड मॅगझिन' यांनी प्रकाशित केलेला मुख्यत्त्वे माध्यमांसंबंधीचा मजकूर मराठीमधे अनुवादित करू, असं सध्या ठरवलंय. यात काही प्रमाणात जागतिक घडामोडींमधले काही इतर दृष्टिकोन वाचकांपुढे ठेवायलाही त्यांची मदत होईल. पण त्यांच्याकडून इथे येणारा मजकूर मुख्यतः माध्यमांविषयीचा असेल. आणि 'झेड'मधले लोक डाव्या विचारसरणीकडे झुकलेले आहेत, हे वाचक म्हणून काहींच्या लक्षात येऊ शकेल, किंवा या नोंदीमधे चिकटवलेल्या त्यांच्या 'लोगों'मधील विधानंही काही 'विरोध', 'बदल' अशा गोष्टींबद्दल बोलू पाहातायंत. कदाचित संस्थात्मक पातळीवर मोठी रचना करायला अशी विधानं आवश्यक असतील, पण 'रेघे'वर आपण असं काही करत नाही.



'रेघे'साठी काही मजकूर तयार करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काही लोकांशी बोलून आपण अनेक प्रयत्न केले, पण त्यात काही फारसं जमून आलं नाही. आता 'झेड-कम्युनिकेशन्स'शी ही एक ढोबळ सहकार्याची बोलणी पक्की झाल्यामुळे वेगळा मजकूर येण्याच्या पातळीवर 'रेघे'ला मदत होईल. अधिक वेगळे दृष्टिकोन वाचकांपर्यंत पोचवण्याच्या प्रवासात एक वेगळा टप्पा आता येईल, असं दिसलं म्हणून आणि मायकल यांचे विशेष आभार मानणं आवश्यक आहे म्हणून ही नोंद.

Friday, 22 March 2013

कादंबरीकार । पत्रकार । अनिरुद्ध बहल

अनिरुद्ध बहल
शेजारच्या या फोटोकडे पाहून हा माणूस कसा असेल असं तुम्हाला वाटतं? कोणीतरी साधा भोळा इसम दिसतोय हा तर. एका अर्थी हा इसम साधा असला तरी तितकासा भोळा नाही, हे आपल्याला कळू शकतं. पण त्यासाठी या इसमाच्या कामाची तपासणी करावी लागेल.

सध्याचं 'तेहेलका' साप्ताहिक जेव्हा केवळ वेबसाइटच्या रूपात सुरू होतं तेव्हा त्यांनी संरक्षण मंत्रालयातला भ्रष्टाचार उघडकीस आणला. त्यामध्ये जे मुख्य दोन पत्रकार सामील होते त्यातले एक अनिरुद्ध बहल आणि दुसरे मॅथ्यू सॅम्युअल. २००१ साली हे 'स्टिंग ऑपरेशन' करण्यात आलं. 'ऑपरेशन वेस्ट-एन्ड' या नावाने ते गाजल्याचं काहींना आठवत असेल. अस्तित्त्वातच नसलेला शस्त्रांचा प्रकार अस्तित्त्वात नसलेल्या शस्त्रनिर्मिती कंपनीकडून विकत घ्यावा, यासाठी या दोघांनी तेव्हाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील मंडळींच्या गाठीभेटी घेतल्या. अर्थात, शस्त्र आणि कंपनी हे दोन्ही बनावट आहे याची काडीचीही कल्पना न आल्यामुळे लाच स्वरूपात पैसे घेऊन हा व्यवहार वरकरणी होऊन गेला. आणि त्यातून संरक्षण मंत्रालयातला भ्रष्टाचार उघड झाला. हे सगळं गुप्त कॅमेऱ्यांमधे रेकॉर्ड झाल्यामुळे पुढे भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण, समता पक्षाच्या अध्यक्षा जया जेटली (तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निकटवर्तीय), काही सैन्याधिकारी या सगळ्यांचा कमी-अधिक बोऱ्या वाजत गेला. दहा वर्षांनी २०११मधे लक्ष्मण यांना दोषी घोषितही करण्यात आलं. हा व इतर तपशील आता अनेकदा चर्चिला गेला आहे.

आपण ह्या 'स्टिंग ऑपरेशन'चा उल्लेख केला तो अनिरुद्ध बहल यांच्या संदर्भात आणि त्यांच्याबद्दल आणखी काही खुलासा व्हावा यासाठी. याच अनिरुद्धनी पुढे संसदेत प्रश्न विचारण्यासाठी कसा पैसा घेतला जातो याबद्दलचं 'स्टिंग ऑपरेशन'ही (ऑपरेशन दुर्योधन, २००५) केलं. या 'कॅश-फॉर-क्वेश्चन' प्रकरणात अकरा खासदारांना आपली खासदारकी गमवावी लागली. हे ऑपरेशन अनिरुद्धनी 'कोब्रा पोस्ट' या त्यांनी २००३ साली सुरू केलेल्या वेबसाइटच्या माध्यमातूनच केलं होतं.

आता आपण २०१३ सालामधे आलो. आठवड्याभरापूर्वी याच अनिरुद्धनी काय केलं तेही कदाचित तुमच्या वाचनात आलं असेल. अगदी थोडक्यात सांगायचं तर, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक या बँकांमधल्या अधिकाऱ्यांकडे एका राजकीय नेत्याचा एजन्ट असल्याचं भासवून 'कोब्रा-पोस्ट'चा प्रतिनिधी गेला व त्याने आपल्याकडची काळ्या पैशाच्या रूपातली नकद रक्कम पांढऱ्या रूपात आणण्यासाठी काय करता येईल, याची विचारणा केली. त्यावर या बँकांमधल्या अधिकाऱ्यांनी आपली सर्वसामान्य खातेधारकांसाठी असलेली प्रक्रिया धाब्यावर बसवून चाललेल्या व्यवहारांची माहिती या 'एजन्टा'ला दिली आणि पॅन कार्डापासून कुठल्याच फुटकळ गोष्टींमधे न अडकवता आपण काळ्या पैशाला पांढरं करण्यासाठी कशी मदत करू शकतो, आपल्या योजनांमधे कसे पैसे गुंतवता येतील, बेनामी खातं कसं काढता येईल, याचा पाढा वाचला. हा पाढा म्हणजे आत्ताचं 'ऑपरेशन रेड स्पायडर'. यासंदर्भात काही बातम्या येऊन आता हे प्रकरण शांत झालेलं दिसतंय. संस्थात्मक पातळीवर जेव्हा मोठ्या प्रमाणातल्या पैशाचा व्यवहार (अफरातफरीचाही) असेल तेव्हा ग्राहकाची पुरेशी तपासणी न करता, केवायसी (नो युवर कस्टमर) नियमावली धाब्यावर बसवून व्यवहार केले जातात का? की, 'कोब्रा पोस्ट'ने उघडकीस आणलेले व्यवहार सुट्या घटना म्हणूनच झाल्या आहेत आणि संस्थात्मक प्रक्रियेतली छुपी पद्धत म्हणून त्यांचा संबंध जोडता येणार नाही? असे काही प्रश्न यातून विचारले जाऊ शकतात. यावर 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने (आरबीआय) कालच आपलं उत्तर दिलेलं आहे. या तीनही बँकांचा संस्थात्मक पातळीवर अशा व्यवहारामधे सहभाग नसल्याचं 'आरबीआय'ने स्पष्ट केलंय. काही व्यवहारांच्या पातळीवरच्या आरोपांवरून या बँकांमधे प्रक्रियात्मक भ्रष्टाचार असेल हे सिद्ध होत नाही, इत्यादी युक्तिवाद यासंदर्भात 'आरबीआय'ने केलेला आहे. त्यामुळे आता हे प्रकरणच वरकरणी संपल्यात जमा आहे. या प्रकरणात गुंतलेल्या अधिकारी वर्गावर निलंबनाची कारवाई झाल्याच्याही बातम्या येऊन गेल्या आहेत.

यानिमित्ताने खरोखरच्या सामान्य असलेल्या नागरिकांच्या मनात काही प्रश्न येऊ शकतात : एप्रिल २०११मधे भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरोधात 'दुसरं स्वातंत्र्ययुद्ध' झालं होतं, त्याचं नेतृत्त्व आता कुठे असेल? एकूण गुंतागुंत गृहीत धरली तरी राजकीय क्षेत्राच्या तुलनेत कॉर्पोरेट क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराविरोधात बोलणं कमी का असतं? मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी हे प्रकरण फारसं उचललं का नसावं?
***

आता आपण नोंदीच्या दुसऱ्या भागात मुख्यत्त्वे अनिरुद्ध बहल या इसमाभोवतीच काही बोलणार आहोत.

'ऑपरेशन रेड स्पायडर'संबंधी मराठीतून आलेल्या बातम्यांमधून आपल्याला काय समजू शकतं?

तर,

'सकाळ'च्या मते 'कोब्रा पोस्ट' हे एक मासिक आहे आणि अनिरुद्ध बहल हे त्यात काम करणारे पत्रकार आहेत.

'लोकसत्ते'च्या मते, हा एका वृत्त-संकेतस्थळाचा प्रमुख असलेला कोणीतरी पत्रकार आहे. ('कोब्रापोस्ट.कॉम' या वृत्तविषयक संकेतस्थळाचा प्रमुख असलेल्या अनिरुद्ध बहल या पत्रकाराने राजधानीत बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत आपण संबंधित बँकांच्या शाखांचे अनेक तासांचे चित्रीकरण केल्याचाही दावा केला.)

'महाराष्ट्र टाइम्स'च्या बातमीत ''कोब्रा पोस्ट'चे पत्रकार अनिरुद्ध बहल हे एका राजकीय नेत्याचे एजंट म्हणून या बॅंकांकडे गेले होते. त्यांनी काही ब्लॅक मनी व्हाइट करण्याची विनंती केली. तेव्हा पॅन किंवा केवायसी (नो युवर कस्टमर) क्रमांकाची मागणी न करता त्यांचे पैसे बँकेत स्वीकारले गेले. त्यातूनच या रॅकेटचा पर्दाफाश झाला' असं म्हटलंय.

या बातम्या तपशिलातून वाचता येतीलच. आणि त्यातील गोंधळही स्पष्ट होईल. एक तर, 'सकाळ'च्या संदर्भात 'कोब्रा पोस्ट' हे मासिक नाही हे स्पष्ट करावं लागेल. 'लोकसत्ते'ने 'पीटीआय'च्या बातमीचं भाषांतर केलंय, त्यातून अनिरुद्ध बहल हा कोणीतरी नवखा पत्रकार असल्याचं वाटू शकतं. आणि 'महाराष्ट्र टाइम्स'च्या बातमीत तपशिलाच्याच काही चुका आहेत. उदाहरणार्थ, ''केवायसी' क्रमांक' असली काही गोष्ट अस्तित्त्वात नाही, इत्यादी. भाषेबद्दल काहीच बोलायला नको.

वृत्तसंस्थेकडून आलेल्या बातम्या उप-संपादकीय पातळीवर भाषांतरित करताना प्रत्येक बातमीचा विषय आपल्याला मुळातून माहीत असण्याची शक्यता नाही, हे मान्य केलं तरी एकदम वेगळ्या विषयावरच्या बातमीचा तपशील इंटरनेटवर पाच मिनिटांच्या योग्य शोधाद्वारे थोडा अधिक पक्का करता येऊ शकतो, हे तत्त्व सांभाळलं तर आपलं काम करायलाही मजा येते आणि वर्तमानपत्राची किंमत देणाऱ्या वाचकांची किंमतही ठेवली जाते हे उप-संपादकीय मत नोंदवून पुन्हा अनिरुद्ध बहल नावाच्या कादंबरीकार-पत्रकाराकडे वळूया.

पहिली गोष्ट, अनिरुद्ध बहल यांच्यासंबंधी अत्यंत तपशिलावर लेख इंग्लंडच्या 'इंडिपेंडन्ट'मधे वाचता येईल.

आता तुम्ही 'न्यूजलाँड्री'वरच्या मुलाखतीचा हा व्हिडियो पाहू शकता :


अनिरुद्ध बहल हा माणूस मूळचा कादंबरीकार. 'बंकर थर्टीन', 'द एमिसरी' अशा त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत आणि त्या आपण वाचलेल्या नाहीत. तरी त्यांच्या मूळचा कादंबरीकार असण्याचा आणि त्यांच्या पत्रकारितेचा गंमतीशीर संबंध आहे, असं तेच म्हणतात म्हणून ही नोंद.

आपण आधी नोंदवलेल्या 'कॅश फॉर क्वेश्चन' प्रकरणात अनिरुद्धनी खासदारांना विचारण्यासाठी दिलेल्यातले उदाहरणादाखल दोन प्रश्न कसे होते पाहा :

1) Has the Railway Ministry placed any order for purchase of the Yossarian Electro Diesel engine from Germany? Is the ministry aware that the Tom Wolfe committee report in Germany has halted its induction into the Eurorail system?

कच्चं भाषांतर : जर्मनीकडून योसेरियन इलेक्ट्रो डिझेल इंजिन विकत घेण्यासंबंधी कोणता व्यवहार रेल्वे मंत्रालयाने केला आहे का? हे इंजिन युरोपीय रेल्वे यंत्रणेमधे सामावून घेण्याची प्रक्रिया जर्मनीतल्या टॉम वूल्फ समितीने सादर केलेल्या अहवालामुळे खंडित झाल्याची कल्पना मंत्रालयाला आहे का? 

2) Has the government given sanction for the seed trial of Salinger Cotton of Monsanto? If so, has a report been prepared on Catch-22 cotton so far?

कच्चं भाषांतर : मोन्सान्तो कंपनीच्या सॅलिंजर कापसाच्या बियाण्याच्या चाचणीला सरकारने परवानगी दिली आहे का? जर असेल, तर कॅच-२२ कापसासंबंधीचा अहवाल तयार झाला आहे का?

या प्रश्नांमधे अनिरुद्ध बहलांमधला कादंबऱ्यांचा वाचक सर्जनशील होतो. 'कॅच २२' ही गाजलेली अमेरिकी कादंबरी, तिच्यातला कॅप्टन युसेरियन, कादंबरीकार टॉम वूल्फ, 'कॅचर इन द राय'वाला जे. डी. सॅलिंजर यांची नावं वाट्टेल तशी वापरून हा माणूस त्या वरकरणी निरर्थक प्रश्नांमधे मसाला भरतो. याला आपले खासदार फशी पडले हे विशेष!

हे तपशिलातल्या गंमतीचं उदाहरण झालं, याशिवाय आपल्या कादंबरीकार असण्यातली लेखनाची आवड आणि पोटासाठी कमाईची गरज जिथे भागवता येईल त्या पत्रकारितेत अनिरुद्ध आले असं ते वरच्या व्हिडियो मुलाखतीत सांगतात. कादंबरीकाराच्या कल्पनाविश्वातून त्यांना 'अंडर-कव्हर' गोष्टी शोधायची आवड लागलेय का? कादंबरीकाराच्या विश्वातली रोमहर्षकता ते आपल्या पत्रकारितेतही शोधत असतील का? या रोमहर्षकतेचाच भाग म्हणून आणि लोकांच्या वागण्यातला बनावटपणा बाहेर काढण्यासाठी बनावट मुलाखतकार बनून 'व्ही टीव्ही'साठी त्यांनी (मुख्यत्त्वे) सेलिब्रिटींच्या मुलाखतींचा 'द टोनी बी शो' केला असेल का? कथानक कुठल्याही काळातलं असलं तरी कादंबरी समकालीन संदर्भांच्या संदर्भात लिहिलेली असण्याची शक्यता मोठी असते, हे गृहीतक पुढे ठेवलं तर पत्रकारितेतल्या मूल्यांशी तिची काही प्रमाणात सांगड बसते का?

मजेशीर प्रश्न आहेत.

याशिवाय एक प्रश्न वरती दिलेल्या व्हिडियोत पाहता येईल. 'ऑपरेशन वेस्ट-एन्ड'चं श्रेय मुख्यत्त्वे 'तेहेलका'चे संपादक म्हणून तरुण तेजपाल यांना मिळाल्यासंदर्भात बोलत असताना 'न्यूजलाँड्री'कडून हा प्रश्न येतो : ''अशा वातावरणात सत्त्व असलेल्यांपेक्षा जे स्वतःला बाजारात मांडू शकतात तेच लोक यशस्वी होतात?''

बहल : पण हे जगाच्या सुरुवातीपासूनच अस्तित्त्वात असलेलं तथ्य नाहीये का?

याच प्रश्नात जराशी भर घातली गेल्यानंतर बहल पुढे म्हणतात, ''आता दूरचित्रवाणीवरच्या बातम्यांकडे पाहा. पत्रकारितेतलं अ-आ-ई माहीत नसलेल्या निवेदकांनासुद्धा तिथे महत्त्व दिलं जातं. मी कधी कधी माध्यमशिक्षण देणाऱ्या संस्थांमधे व्याख्यानाला जातो. तिथली परिस्थिती पाहून वाईट वाटतं. बहुतेकांना टीव्हीवर अँकर व्हायचं असतं. त्यांना पत्रकारितेसाठी आवश्यक सचोटी, उत्कट तळमळ, पाच 'डब्ल्यूं'विषयी (का-कधी-कुठे-कसं-कोणी) त्यांना काहीच देणंघेणं नसतं. त्यांना फक्त प्रसिद्ध व्हायचं असतं.''
***

प्रश्न : कादंबरीकाराला / लेखकालाही प्रसिद्ध व्हायचं असतं. पण तो सत्त्वासह प्रसिद्ध होऊ इच्छितो का? म्हणजे सत्त्व सोडून प्रसिद्धीसाठी प्रसिद्धी यापेक्षा कादंबरीकाराला अपेक्षित प्रसिद्धी हे काहीतरी वेगळं असेल का?

उत्तर : माहीत नाही.
***


अनिरुद्ध बहल (फोटो - इथून)

Monday, 18 March 2013

फेसबुक : तीन संदर्भ

मौज प्रकाशन । किंमत - ७५ रुपये
आम्ही चेहरा हा चेहरा ठेवत नाही. त्याचा मुखवटा बनवतो. लोकांच्या प्रेरणांप्रमाणे चलाख होऊन तो घडवतो आणि मग तो चढवूनच वावरतो. तो मग इतका घट्ट बसतो की खरा चेहरा कधी दिसतच नाही. आरशातसुद्धा. फोटोतसुद्धा. तो मुखवट्याच्या थडग्याखाली गाडला जातो. एखाद्याच भाग्यवानाला हे थडगे फोडून आपला चेहरा फिरून वर काढणे जमते.

- दुर्गा भागवत (दुपानी, पान २८)
***



OR books
जेकब : आपण जेव्हा रस्ता बांधतो तेव्हा त्यातल्या इंच न् इंचावर पाळत ठेवलेली असावी आणि ते केवळ काही गुप्त गटातल्या लोकांनाच पाहता यावं ही काही गरजेची गोष्ट नसते. पण अशा प्रकारे 'रस्तेबांधणी' इंटरनेटवर होतेय आणि ते रस्ते वापरण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं जातंय. आणि हे रस्ते बांधणाऱ्यांच्याच ताब्यात त्याची सत्ता राहील असं काही नाहीये हे लोकांना समजावणं आवश्यक आहे.

अँडी : आणि काही लोक तर फक्त रस्तेच बांधतात असं नाही. तर ते तिथे चांगली बागबिग उभी करतात आणि बाकीच्यांना तिथे येऊन नागडं होण्याचं निमंत्रण देतात. हे आता म्हणजे आपण 'फेसबुक'च्या विषयाकडे आलो! लोकांना सुखासुखी आपली माहिती उघड्यावर टाकण्यासाठी कसं प्रवृत्त करावं याचं हे उत्तम धंदेवाईक उदाहरण आहे.

(सायफरपंक्स, पान २५)

('विकिलिक्स'चा संस्थापक ज्युलियन असांज व जेकब अप्लबम, अँडी मुलर-मॅगन, जेरेमी झिमरमन या त्याच्या मित्रमंडळींमधील गप्पांच्या स्वरूपातलं हे पुस्तक आहे. मुख्यत्त्वे इंटरनेटवरती ठराविक कंपन्यांची 'मालकी' असल्यामुळे काय होऊ शकतं, त्यावर उपाय काय, आदी गोष्टींबद्दलच्या या गप्पा आहेत.)
***



स्मायली : बँक्सी.

***

Saturday, 16 March 2013

पर्यायी माध्यमं । जॉन पिल्जर

जॉन पिल्जर
जॉन पिल्जर कोण, याची प्राथमिक किंवा तपशिलातली माहिती ज्यांना हवी असेल ती त्यांना त्यांच्या वेबसाइटवर जाऊन सापडू शकेल. तिथे त्यांची पुस्तकं, त्यांनी बनवलेले माहितीपट अशा विविध गोष्टींची माहिती आहे.

इथल्याइथे थोडक्यात सांगायचं तर, १९३९ साली ऑस्ट्रेलियात जन्मलेले पिल्जर इंग्लंडमधे गेली अनेक वर्षं पत्रकार म्हणून वावरतायंत. व्हिएतनामच्या युद्धापासून त्यांनी अनेक युद्धांचं वार्तांकन केलंय. पिल्जर यांनी सुरुवातीला वर्तमानपत्रांमधे काम केलं, शिवाय त्यांना ज्या विषयाचा अधिक खोलवरचा तपशील लोकांसमोर ठेवायचाय त्यासंबंधी ते स्वतंत्रपणे माहितीपटही बनवत आलेत. 'इयर झिरो : द सायलन्ट डेथ ऑफ कम्बोडिया' हा त्यांचा बहुधा पहिला माहितीपट होता. दोन वर्षांमागे त्यांचा 'द वॉर, यू डोन्ट सी' हा माहितीपट गाजला होता. त्यांच्या माहितीपटांचाही तपशील त्यांच्या वेबसाइटवर सापडू शकेल; त्यातील काही तिथे पाहाताही येतील. या शिवाय पिल्जर इंग्लंडमधल्या 'न्यू स्टेट्समन'साठी सदरही लिहितात. 

आपण 'रेघे'वर जी नोंद करतोय ती त्यांनी 'झेड मॅगझिन'ला दिलेल्या मुलाखतीतल्या फक्त तीन प्रश्नोत्तरांची. गेल्या १६ फेब्रुवारीला ती तिथे प्रसिद्ध झाली होती. आता बरोब्बर महिन्याभराने त्यासंबंधी 'रेघे'वर नोंद. वरच्या थोडक्यातल्या ओळखीतूनही वाचकांच्या लक्षात आलं असेल की, मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमधून सांगता न येणाऱ्या गोष्टी पिल्जर सांगू पाहात आहेत. 

एखादं मराठी वर्तमानपत्र फुटपाथवर बसून गजरा विकणाऱ्या व्यक्तीपासून ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीपर्यंत विविध पातळ्यांवर वाचलं जाईल. इंग्रजी वर्तमानपत्र असेल तर विद्यापीठात शिकणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत विविध पातळ्यांवर ते वाचलं जाईल. टीव्ही चॅनलांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांचाही प्रेक्षक असाच विविध पातळ्यांवर लाखोंच्या संख्येने पसरलेला असेल आणि त्यातून जी माहिती प्रसिद्ध होत राहील, तो माहितीचा मुख्य प्रवाह. कारण अधिकाधिक लोकांना तो सहजी उपलब्ध आहे, तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचतो. या मुद्द्याभोवती मुख्य प्रवाहाचं महत्त्व एकदा आपण निश्चित केलं की मग त्यातल्या त्रुटी काढणं हेही एक महत्त्वाचं काम बनतं. आणि आता माध्यमांची जी रचना आहे त्या रचनेत तर (मुख्य प्रवाहात असलेल्यांना आणि नसलेल्यांनाही) ही जागरूकता अतिशयच आवश्यक आहे हे समजून घेऊन आणि त्यासाठी विविध मतं किमान ऐकून घेण्याची ताकद कमावून आपण पिल्जर यांचं म्हणणं काय आहे ते वाचायचा प्रयत्न करूया. 
***

प्रश्न : तुमची पत्रकारिता गेल्या काही वर्षांमधे कशा प्रकारे बदलल्याचं तुम्हाला जाणवतं? विशेषकरून इंटरनेटची वाढ किंवा अलीकडे गुगल, फेसबुक, ट्विटर यांच्या येण्यानं काही फरक पडला असेल तर तो कसा आहे? तुमच्या स्वतःच्या कामासंदर्भात निश्चित केलेली मूलभूत लक्ष्यं आणि पद्धती यांच्यावर कोणता परिणाम झाला किंवा त्यांच्या परिणामकारकतेवर कोणता परिणाम झाला? 'सोशल नेटवर्किंग'चा उदय आणि त्याचा पत्रकारितेवर आणि माहितीच्या प्रवाहावर पडलेला प्रभाव याकडे तुम्ही कसं पाहता?
पिल्जर : रोज सकाळी मी काही ठराविक वर्तमानपत्रं घ्यायचो. आता मी इंटरनेटवर जातो. हा बदल झालाय. गुगल अर्थातच भन्नाट आहे, पण त्यामधे आणि एखाद्या विषयाचा खोलवर अभ्यास करण्यासाठी गुंतवावा लागणारा वेळ, त्यासाठी आवश्यक असलेली धीर धरण्याची वृत्ती आणि कठोर परिश्रम यांच्यामधे फरक आहे. ट्विटर आणि फेसबुक हे तर मुख्यत्त्वे 'स्वतः'बद्दलच्याच गोष्टी आहेत; त्यातून लोकांना स्वतःशीच बोलता येतं आणि बहुतेकदा स्वतः मूर्ख बनता येतं. खरं तर ते आपल्याला एकमेकांपासून अजून विभक्तही करू शकतात : आणि स्मार्ट फोन, तुटक माहिती, फुटकळ मतबाजी यांच्या बुडबुड्यांच्या जगात आपल्याला गुरफटून टाकू शकतात. (त्यापेक्षा) विचार करणं ही जास्त आनंददायी गोष्ट आहे, असं मला वाटतं.

प्रश्न : मुख्य प्रवाहातील माध्यमांमधे सतत वावर असूनही त्यांच्यावर कठोर टीका करणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात. शिवाय पर्यायी माध्यमांचं समर्थनही तुम्ही जोमाने करत आलायंत. पर्यायी माध्यमांशी संबंधित व्यक्तींचं काय चुकलं असं तुम्हाला वाटतं? या माध्यमांना अधिक लोकांपर्यंत पोचणं न जमण्यामागे, संवादाची अधिक मोठी माध्यमं उभी करता न येण्यामागे काय कारणं असतील? त्यांच्या रचनेत, धोरणांमधे, मजकुरामधे काही घोळ असेल का? त्यात काही सुधारणा हवेय का?
पिल्जर : तुमच्या म्हणण्याशी मी सहमत नाही. 'पर्यायी' माध्यमांनी त्यांचा वाचक/प्रेक्षक निर्माण केलेला आहे, त्यांच्यापर्यंत ती पोचतातही आणि त्याचे काही सकारात्मक परिणामही दिसून आलेत. लॅटिन अमेरिकेत कित्येक वस्त्यांमधल्या लोकांना कम्युनिटी रेडियोचं व्यासपीठ मिळालंय. व्हेनेझुएलामधे 'स्वतंत्र' माध्यमांवर (म्हणजे एकाधिकारशाही असलेल्या माध्यमांवर) ह्युगो चावेझ दबाव आणतायंत असा प्रचार करणारे लोक तिथल्या कम्युनिटी रेडियोच्या अभूतपूर्व वाढीकडे पाहात नाहीत. इक्वेडोर, बोलिव्हिया, अर्जेन्टिनामधेही हेच चित्र आहे. अमेरिकेत 'पॅसिफिका रेडियो' हे याचं खूपच प्रेरणादायी उदाहरण ठरेल. डेनिस बर्नस्टनचे कार्यक्रमही यात धरता येतील. इंटरनेटवर 'झेड-नेट' अनेक लोकांपर्यंत पोचतं. शिवाय टॉम फीलीचं 'इन्फर्मेशन क्लिअरिंग हाउस', 'ट्रूथ-आउट', आणि 'द रिअल न्यूज' अशी अनेक उदाहरणं आहेत.

प्रश्न : भविष्यात अधिकाधिक लोकांपर्यंत टीकात्मक व दूरदर्शी मजकूर पोचेल याच्या कोणत्या शक्यता तुम्हाला दिसतात? असं होण्यासाठी पर्यायी माध्यमांमधे कोणत्या सुधारणा करता येतील किंवा मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना त्यांच्या हेतू आणि तर्कसंगतीविरोधात असूनही चांगलं काम करण्यासाठी भाग पाडता यावं यासाठी काय करावं लागेल?
पिल्जर : तथाकथित मुख्य प्रवाहातील माध्यमं आपल्या तर्कसंगतीविरोधात काहीही करणार नाहीत. प्रस्थापित व्यवस्थेचीच एक पुरवणी म्हणून ती असतात; एडमण्ड बर्कनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ते 'चौथा स्तंभ' वगैरे नाहीत. पण ते अखंडही नाहीत. मी माझी पूर्ण कारकिर्द मुख्य प्रवाहात घालवली. माझी जागा आणि माझा कोपरा जपण्यासाठी मला खूप ऊर्जा खर्च करावी लागली. बहुतेकदा ती शब्दशः लढाई असते. पण मी त्यातून मार्ग काढायला शिकलो, कधीकधी कामाचं ठिकाण बदलूनही ते करावं लागलं. तरुण आणि मूल्य मानणाऱ्या पत्रकारांनी मार्ग काढायला शिकणं आवश्यक आहे.

आत्ता आपल्याला तातडीने काय पाहिजे असेल तर ते म्हणजे 'पाचवा स्तंभ'. कॉर्पोरेट माध्यमांच्या एकाधिकारशाहीला आव्हान देऊ शकणारा, लोकांच्या म्हणण्याला व्यासपीठ देऊ शकणारा, टीव्ही - वर्तमानपत्रं - माध्यम शिक्षण देणाऱ्या संस्था यांच्या उद्ध्वस्ततेवर मात करून उभा राहणारा, पत्रकार आणि पत्रकारिता शिकवणाऱ्या शिक्षकांना आपली बोटचेपी भूमिका सोडण्याचं आवाहन करणारा आणि वेगळी दृष्टी देणारा पाचवा स्तंभ. व्यावहारिक पातळीवरून बोलायचं तर नवीन व स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयत्नांना लोकांच्या माध्यमातून निधी पुरवण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. स्कॅन्डेनेव्हियामधे हे यशस्वी झालेलं दिसतंय.
***




- पिल्जर यांच्या वेबसाइटवर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूच्या पट्टीवर हे सापडतं.

संदेशामधील लपलेले हेतू आणि त्याला वेढून असलेली कल्पितं यांची जाणीव न ठेवता केवळ संदेशवाहक म्हणून पत्रकारांनी स्वतःकडे पाहणं पुरेसं नाही : जॉन पिल्जर
***

Wednesday, 13 March 2013

त्या 'गल्ली'च्या निमित्ताने हेन्री कार्तिअर ब्रेसाँ

'गल्ली' (galli.in) हे ऑनलाइन मॅगझिन तुमच्या पाहण्यात आलंय का? नसेल, तर पाहाण्यासारखं आहे.

'Galli is a repository of photo stories from India, made possible by generous contributions from established and emerging photographers from across the world' - अशी इंग्रजीतली या मॅगझिनरूपी छायाचित्र संग्रहालयाची ओळख त्यांनीच करून दिलेली आहे. २०११च्या ऑगस्टपासून सुरू असलेल्या या संग्रहालयात अधूनमधून भर पडत जातेय. भारताशी संबंधित फोटो आणि त्यासंबंधीचा लहानसा मजकूर, अशा स्वरूपात हे काम सुरू आहे.

'माध्यमं' असा एक विभाग आपण 'रेघे'वर करून ठेवलेला आहे. त्यात या 'गल्ली'ची नोंद करून ठेवायला हवी.

फोटोची गंमत अशी की तो पाहिल्यावर आपसूक चित्र उभं राहातं. शब्दांच्या बाबतीत असतं तसं वाचकाला चित्र उभं करायचं काम त्यात नाही. वाचकाच्याऐवजी तिथे प्रेक्षक असतो. तर असं काहीसं काम कमी झाल्यामुळे त्यावर प्रतिसादही तसा संख्येने मोठा येऊ शकतो. आपण 'रेघे'वर तीनेक हजार शब्दांच्या नोंदी टाकून त्या कोण वाचणार आणि त्यावर काय विचार करणार, असं होण्याऐवजी हे फोटोंचं काम अधिक लोकांना पाहायला मजा येऊ शकेल. तेही काही वाईट नाही.

त्यामुळे आत्ता आपण 'गल्ली'बद्दल फार शब्दांमधे बोलण्याऐवजी ज्याला त्याला आपापल्या वेळेच्या सोईनुसार तिथे जाऊन चक्कर टाकून येता येईल एवढ्यापुरती ही नोंद करून ठेवू. आत्ताच्या एक मार्चला त्यांनी विदर्भातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांवरची फोटोमालिका प्रसिद्ध केलेय.
***


'गल्ली'च्या निमित्ताने 'फोटोजर्नलिझम' आणि त्यानिमित्ताने हेन्री कार्तिअर ब्रेसाँ हे साहजिकपणे येणारच.

ब्रेसाँ
फोटो कोणीही काढू शकतं. पण हेन्री कार्तिअर ब्रेसाँ (२२ ऑगस्ट १९०८ - ३ ऑगस्ट २००४) या माणसाने काढलेले फोटो फारच वेगळे. फोटोजर्नलिझममधला हा दादा माणूस ९५ वर्षं पृथ्वी न्याहाळत होता आणि त्यातले काही क्षण आपल्या 'लायका' कॅमेऱ्यात साठवत होता. पहिलं त्याचं एक म्हणणं नोंदवूया :  ''कॅमेरा म्हणजे माझ्यासाठी एकप्रकारची रेखाटन-वही आहे, सहजज्ञान आणि उत्स्फूर्ततेचं एक साधन आहे. कॅमेरा म्हणजे अशा क्षणाचा मास्टर की, जो दृश्यात्मकतेद्वारे एकाच वेळी प्रश्न विचारतो आणि निर्णयही घेतो. जगाला 'अर्थ देण्याच्या' प्रयत्नामधे आपण व्ह्यू-फाइंडरमधून जी फ्रेम निश्चित करतो, त्यात गुंतलेलं असायला हवं. यासाठी एकाग्रता, मनाची शिस्त, संवेदनशीलता आणि भूमितीची समज  हवी. साधनांच्या काटेकोर वापरातूनच आपल्याला भावनांच्या सहजतेपर्यंत पोचता येतं. फोटोग्राफ घेणं म्हणजे.. आपलं डोकं, डोळे आणि हृदय एकाच अक्षात ठेवणं.''
असा अक्ष सापडणं सोपं नाही.


ब्रेसाँच्या गल्लीतला फोटो [फ्रान्स, १९३२ (फोटो : इथून)]

ब्रेसाँचे बरेच फोटो 'मॅग्नम'च्या वेबसाइटवरच्या ब्रेसाँच्या खोलीत जाऊन पाहाता येतील.

''फोटोग्राफी ही एका अर्थी मानसिक प्रक्रिया आहे. आपल्याला काय म्हणायचंय ते स्पष्ट असावं लागतं. आपल्या धारणा काय आहेत, आपल्याला एखाद्या परिस्थितीबद्दल, समस्येबद्दल काय वाटतं, हे स्पष्ट असायला हवं. फोटोग्राफी म्हणजे (ती परिस्थिती) लिहून काढण्यासारखं आहे, तिची चित्रं काढण्यासारखं, रेखाटनं काढण्यासारखं आहे.

फोटोग्राफीमधे सर्जनशील भाग फारच थोडा असतो. चित्रकार तपशील स्पष्ट करू शकतो, लेखकही तसं करू शकतो, पण आपल्याला तो क्षण पकडायला लागतो, तो निर्णायक क्षण, तो असतोच. मी ते पाहिलंय, मी तिथे जाऊन आलोय, मी ते पाहिलंय.'' : असं ब्रेसाँ म्हणून गेले.

शिवाय,

''लोकांचे फोटो काढण्यामध्ये नक्कीच काहीतरी भयानक आहे. एकप्रकारे ते (मर्यादेचं) उल्लंघनच असतं, त्यामुळे त्यात संवेदनशीलता नसेल तर ते असभ्यपणाचं ठरतं'' : असंही ब्रेसाँ म्हणून गेले.

फोटोग्राफी म्हणजे फार काही बोलायला नको. पाहणंच बरं.
***


फोटोग्राफी म्हणजे जगाची 'आय-लेव्हल' पकडणं असतं का?

की, फोटोग्राफी म्हणजे 'मर्यादांचं उल्लंघन' असतं? (फोटो : रेघ)

Monday, 11 March 2013

मनोहर ओक : वीस वर्षं

मनोहर ओक : निधन १० मार्च किंवा ११ मार्च १९९३ : त्यानिमित्त 'रेघे'वर नोंद -

दुर्गा भागवत, 'दुपानी'मधे, पान क्रमांक शंभर : 
मन्या ओक वारल्याची बातमी सतीश काळसेकरने दिली. तुकाराम-बीज टाळून मन्या दहा मार्चला, खाणे-औषध वगैरे सोडून स्वेच्छेनेच हे जग सोडून गेला. एक दिवस मध्ये गेला आणि बारा तारखेला मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका लागली.

आजचा लोकसत्ता, दैनंदिनी प्रकारच्या सदरामधली नोंद : ११ मार्च १९९३ मनोहर ओक यांचे निधन.
***


'झौझंझः' या अनियतकालिकात अंदाजे १९७०च्या सुमारास प्रसिद्ध झालेला मजकूर ('नवाक्षर दर्शन'च्या मदतीने) :
 मनोहर ओक याचा मजकूर

...हे स्थानांची अफरातफर करून राहिलेल्या लेखकांनो! हे लांड्या प्रकाशकांनो! तुमची वेळ भरत चालली; ठेपून चुकली! एक तर तुमचे लांडे उद्योग ताबडतोब बंद करा, नाहीतर - स्वतःच्या पोटव्यासपीठावरून चालवलेली तुमची बडबड, फडफड, चित्-तूप करा- नाहीतर ठोकबंद व्यापार सोडून खुल्ले- रोख आरपार व्हा. नाहीतर जे केलंत त्याबद्दलचं काय? जे न केलंत त्याबद्दलच घ्या! लेखकांचे (अर्थात आधुनिक) लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन बनणे सोडून द्या. पार्ट टाईम जॉब तुम्हाला लांच्छनास्पद आहे. न पेक्षा हेरा! हेरा टिपून एकेक! शिकारी कुत्रे व्हा! सांस्कृतिक मंडळांच्या दलालांनो, पगाराच्या नेच्यावर पुढे डकलणारं तुमचं तट्टू चणे खाऊ द्या. मी म्हणतो चणें! चणचंणित चंद हे बेलपत्रकारांनो, उद्धरा उद्धरा तुमचे सहज अवघ्याची तळी उचला. रडीं, गाणी, गाऱ्हाणीं. चूक, तक्रार आणि विराणीं. हे टुकारांनो! ह्यातून वखारी पिकतात, बुखारी फणफणून द्यात. साजरे होऊ द्यात सण-ताप तुमचे. लेखणीमागे उभे रहा न ढेकणीं. नाहीतर शहाणे व्हा. सिक्युरिटीच्या कडेकोट वेढ्यातील मरण आरास-विचकूं नका कवळी तुमचीं. फोडा तुरुंग नाहीतर हे पाणी तुमच्या नाकातोंडात घुसेल. पायातून गळ्यापर्यंत गळवंड घुसळून येतील भोंवरे. फटाफट कानांचे पडदे फाटतील तुमच्या. टचाटच डोळ्यांची द्राक्षं उडतील नाहीतरी- पाहिजे तर रुद्राक्ष धरा.
***


'अंतर्वेधी' : सुरुवातीचा (पान सात व आठवरचा) मजकूर :

कादंबरी. प्रास प्रकाशन.
मुखपृष्ठ : बाळ ठाकूर
समजा कीं तुम्ही एका हजार पाकळ्या असलेल्या कमळाच्या मध्यभागीं बसलांत. एक एक एकेक पाकळ्यांनी टोकं वळत मोडत-मुडपत मिटत्ये संध्याकाळ. सगळा सांवल्यासांवल्यांचा जमणारा सघन काळोखसमुद्र. वेढणारा अंवतालभंवताल. आणि एकाएकी नादानुसंधान बांधलं जातं, जें असतं तुमच्या जागरतेचं- आवरून बसणारं अवधान वेध घेतं. छिद्रांत जाऊन बुटून मुरूं पाहणारं पाणी. तो सूक्ष्म आवाज. अवघ्या पाण्याचे लोट थोपवून निमूट निमुळतं होऊन अणी एवढ्या छिद्रांत ओपनिंग शोधत सर्वस्व व्यापून टाकणारा गुंजारवभारव.

आणि टक्कन डोळे उघडून तुम्ही बाहेर येतां. एकटक झालेली नजर एकदम पुसली जाते. एकदमच भलत्या प्रदेशांतून भलत्या प्रदेशांत डिपोर्ट केल्यासारखे तुम्ही येऊन पडतां. असं कांहीं दिवस होतं.

पुढं असेच कांही दिवस गेले कीं गुंजारव हळूंहळूं मोठा होणारा. ओंठ मिटून मोठा होणारा फुगा. एक वरल्यावर वावरणारा ढग. निर्लिप्त. कोंडींत प्रेशराइज करणारा आणि - अणी - भुंगा - गाज वाढत, गाजत तुमचं कडबोळं वळून सुरगांठ न सोडवतांच तडक आरपार. तुटकतुटक रेषांचे अनुकार, अनुनाद, दाखव वाजवणारा.

परत येयची खूण तुम्हांला माहीत नसते. तुमच्या गतीची तुम्हाला कल्पनाहि नसते. येतांना भलभलते पदार्थ, वस्तू दिसतात. हांती लागतात. कधींच न पाहिलेल्या वस्तूंचा अजबखाना. एक और तळघर मोकळं झालेलं. लाख सिद्धी-इलमांची भांडारं. जडजड कुलपांच्या अवजड चाव्या. सगळे शिकराव तिथं सुप्त झालेले. एक पसरलेलं वाळवंट. कुठूनहि कुणीकडे रस्ते. सगळ्या निरुद्देश दिशा. चमचमलेले पुंजके. पोरस सफेद, काळे भुजंग, लाल निखर, नीळ-नवले, पिवळेप्रखर. भुळभुळलेले जांभुळे. कुळकुळलेली करड, भरड भरड पडलेली ड्राय पिग्मेंट पावडर. आणि भेलकांडत झोंके खात जागीं गच्च होणारं विमान. अडून उघडतात डोळे. मिट्ट काळोखांत चमचमत्या चांदण्या पसरलेल्या. असे दिवस कांहीं प्रकारचे.

एखादवेळेस असेच तुम्ही पडलां असतां समजा पाकळ्या मिटून बंदी झालेल्या कमळांत आणि रानांतून एका हत्तीनं येऊन देठ पिरगळून कमळ सोंडेंत धरून तें फेंकून दिलं तर - तुम्ही काय कराल?
***



प्रकाशक : लोकवाङ्मय गृह. दुसरी आवृत्ती : १९९९
संपादन : चंद्रकान्त पाटील / तुळसी परब
मुखपृष्ठावरील चित्र : जॉर्जीओ मोरांडी, इटली

माणसानं बोल्लेलं आठवावं पण...

माणसानं बोल्लेलं आठवावं पण
सगळंच आठवलं तर
बोलताच येणार नाही

बोलणं आणि वागणं यांचा
अर्थाअर्थी संबंध नसतो
वाटणं आणि बोलणं आणि वागणं यांचाही

निष्कर्ष काढण्यात आपण
मागे राहतो
आणि आयुष्य फोफाटत पुढे

निष्कर्षही आपमतलबी असतात
मनसुब्याच्या कोषात रेशीम लपेटून

इच्छा आपली असोन द्यावी
अपेक्षेत सक्तीचे गुलाम खिंकाळतात

नजरेच्या पुलावर स्मितं झेलावी
एक बहर दरम्यान विखरून जावी

क्षणाग्रावरून मारावे सूर
आता, नंतर, विसरावे तीर

जे घडलं त्यास तिथेच
मोहर लावावी
जे न घडलं ते
भापवू नाई

हे सर्व म्हणताना
एकटक असावं
मग काय म्हणता याची
पर्वा नाही.

पान ३१
***

मनोहर ओक
चित्र : बाळ ठाकूर ('...ऐंशी कविता'च्या मलपृष्ठावरून)

मनोहर ओक : पुस्तकं -
आयत्या कविता - बाजारात अनुपलब्ध
अंतर्वेधी (कादंबरी) - बाजारात अनुपलब्ध
चरसी (कादंबरी) - बाजारात अनुपलब्ध
मनोहर ओकच्या ऐंशी कविता - बाजारात उपलब्ध
***