Tuesday 30 April 2013

सैलीचा हँग-ओव्हर व प्रामाणिक लेखनाचा एक नमुना

 मुखपृष्ठ : अंजलीन इला मेनन यांच्या
कन्डोलिम (१९८५, ४८ X ३६) - या चित्राचा भाग
श्रीकांत सिनकर हे नाव ज्यांना माहीत असेल, त्यांना ते बहुधा पोलीस चातुर्यकथा नि तश्याच पद्धतीच्या कादंबऱ्यांच्या संदर्भात माहीत असण्याची शक्यता जास्त आहे. पण सिनकर हे त्यापलीकडेही काही लिहून गेले. याचा एक दाखला आपल्याला यापूर्वी 'रेघे'वरच्या एका नोंदीत दिसला आहे, तो 'निवडक अबकडइ'तल्या एका लेखासंबंधी. पण आता हा दाखला अधिक ठळकपणे, एका पुस्तकातूनही आपल्याला सापडू शकतो. हे पुस्तक आहे 'सैली : १३ सप्टेंबर'. हा खरं म्हणजे व्यक्तिचित्रणपर पाच लेखांचा संग्रह आहे, पण सिनकरांच्या मते हा कथासंग्रह आहे, किंवा वाचकाला असंही वाटतं की, लेखक आपल्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्तींच्या सोबतीने घालवलेल्या काळाची नि त्यातल्या आनंदाची, चुकांची प्रामाणिक कबुली या लिखाणातून देतोय, म्हणजे आत्मकथनासारखं काहीतरी दिसतंय. तर साधारण असं हे सगळंच असलेला मजकूर या पुस्तकात आहे. आणि या सगळ्या मजकुराचा एक अतिशय चांगला नि महत्त्वाचा गुण आहे तो प्रामाणिकपणा. 

या पुस्तकाची पहिली आवृत्ती फेब्रुवारी १९८१मध्ये पुण्याच्या 'रविराज प्रकाशना'तर्फे आली होती. त्यानंतर आता तीस वर्षांनी दुसरी आवृत्ती (एका लेखाची भर टाकून) 'लोकवाङ्यमय गृहा'ने काढलेय. 

'न्यूयॉर्कचा जगन', 'दत्तू बॉयलर', 'सैली : १३ सप्टेंबर', 'जिन 'जिमलेट'' आणि 'सुंदर सावली सापडली' असे पाच लेख आहेत या पुस्तकात. यात 'न्यूयॉर्क' म्हणजे मटक्याचा अड्डा, दत्तू बॉयलर हा एका दारूच्या गुत्त्यावरचा पोऱ्या असलेला आणि नंतर दुसरीकडे मॅनेजर झालेला गडी, सैली म्हणजे सिनकरांनी जिच्यावर मनापासून प्रेम केलं नि जिच्याशी लग्न करण्याची त्यांची इच्छा होती अशी वेश्या. सिनकरांचं अनुभवविश्व हे असं होतं. पण केवळ त्यातल्या अनुभवविश्वाला भुलून आपण हे पुस्तक चांगलं आहे असं म्हणत नाहीयोत, तर अनुभव कोणताही असला तरी तो सांगण्यातला लेखकाचा प्रामाणिकपणा हा गुण अतिशय महत्त्वाचा, असं मानून आणि तो गुण या पुस्तकात मुबलक प्रमाणात आहे म्हणून ही नोंद करतोय. शिवाय इतर कोणत्या गोष्टीपेक्षाही 'लिहिण्याचं काम' हा 'रेघे'चा अगदीच महत्त्वाचा भाग असल्यामुळे ही आणि अशा नोंदी 'रेघे'वर आपण करत आलोय नि करत राहू शक्यतो.

तर सैली... ह्या पुस्तकातल्या फक्त 'सैली : १३ सप्टेंबर' या लेखाबद्दलच आपण बोलूया. कारण पुस्तकाचा सगळ्यात सुंदर भाग हाच आहे, असं मला वाटतं. आणि त्याबद्दल बोललं की बाकीच्या लेखांचाही अंदाज येऊ शकतो. 

सैली ही नेपाळी वेश्या होती. सिनकरांच्या आयुष्यात ती आली. किंवा खरं तर सिनकर तिच्या आयुष्यात गेले असं म्हणणं जास्त बरोबर आहे. तर हे दोघंही एकमेकांच्या आयुष्यात आले. आणि त्यांनी एकमेकांवर मनापासून प्रेम केलं. हे 'मनापासून' म्हणजे इतकं की ते सगळं ह्या लेखात सारखं वाचकाच्या मनालाही धक्का देईल इतकं. १९६४ साली सैली नि सिनकर एकमेकांच्या आयुष्यात आले आणि १९७१ साली त्यांचं प्रकरण संपलं. हे प्रकरण म्हणजेच हा लेख.

सिनकरांच्या लिखाणात आपण असं असं जगलो याचं फुशारक्या मारणारं वर्णन नाही, आपण असं जगलो म्हणून बाकीचे जगतात ते भुक्कड आहे असला आव नाही. (तरी सिनकरांबद्दल जे तुरळक लोक बोलतील ते मात्र असंच बोलतील. त्यांनी अधोविश्वाबद्दल लिहिलं वगैरे, याचाच गवगवा होईल आणि त्यांच्यावर काहीतरी शिक्का बसवला जाईल. अधोविश्वाबद्दल लिहिलं हे एक वैशिष्ट्य आहेच, पण त्यातले प्रामाणिकपणासारखे इतर गुण असतील, ते शोधायला हवेत. पण आपण एखादं वैशिष्ट्यच फक्त बोलल्यामुळे लेखक म्हणून त्यांच्याबद्दल अधिकचं काही बोलणं थांबेल. आणि असली वरवरची वैशिष्ट्यं आपल्यातही आहेत असंही काही लोकांना वाटत राहील. ठीकच तेही).

जे आहे ते आहे, जे झालं ते झालं - असं साधारण सिनकरांचं दिसतं. अशाच जगण्यात त्यांचं सैलीवर प्रेम बसलं. वास्तविक वेश्यावस्तीत ज्या कामासाठी जातात त्या कामासाठीच सिनकर गेलेले, पण सैलीच्या बाबतीत त्यांना जे वाटायला लागलं ते केवळ एवढ्या कामापुरतं उरलं नाही. आणि नुसतं हे शारीरिक काम तर सिनकर तसंही बाहेर मैत्रिणींच्या संगतीत भागवू शकत होते, असं तेच सांगतात. पण सैलीची गोष्टच वेगळी होती. तिच्यासोबत संसार मांडणंच सिनकरांच्या मनात होतं, पण सैलीने या प्रस्तावाला दाद दिली नाही :
नवीन आवृत्तीत बाळ ठाकूरांच्या रेखाचित्रांचीही
जोड लेखांना दिलेय. त्यातली सैली.
कोणत्या भाषेत नि कोणत्या शब्दांत या मूर्ख मुलीला समजावू की माझ्याबरोबर लग्न करण्यात तुझं भलं आहे? मी तिला नेहमी म्हणायचो, मी जगाची पर्वा करत नाही. जेव्हा मी असं ठरवतो, तेव्हा सर्व गोष्टींचा सर्व बाजूंनी मागचा-पुढचा विचार केलेला असतो. माझ्या डोक्यात किडा वळवळत होता, तो हाच की अगोदर लग्न करून मग कादंबरी लिहायची. सैली वेश्या आहे म्हणून मला तिचा उद्धार करायचा नव्हता. उद्धार वगैरे गोष्टी मला समजल्याच नाहीत. मला एक आणि एकच कळत होतं, सैली हीच माझ्या जीवनातील यशस्वी जोडीदारीण होऊ शकते. सेक्सचा काहीच प्रश्न नव्हता. सेक्सपेक्षा जास्त जमल्या होत्या एलिमेंट्स गेल्या सहा वर्षांत! दोन उदाहरणं देतो :
एकदा अचानक आजारी पडलो. तीन दिवस सैलीकडेच होतो. काही फ्ल्यू वगैरे असेल. पण बाई घाबरली. फॉकलंड रोडवरील बहुतेक सर्व वेश्या नजीकच्या 'गोल देवळा'पाशी असलेल्या डॉक्टर मंडळींकडे उपचारासाठी जातात आणि तिथून परतताना त्या देवळात जात. मी आजारी असताना ती म्हणाली,
''तुम जल्दी ठीक हो जाओगे!''
''कैसे?''
''मैने मंदिर में भगवान की प्रार्थना की है।''
मी मंद स्मित केलं. मी देवळात जात नाही. माझ्या विचारी बुद्धीला जाणं शोभणारं नाही. मी बरा होईन तो कुणा एम.बी.बी.एस. डॉक्टरच्या ट्रिटमेंटनेच होईन हे मला कळतंय. प्रार्थनेने तर अजिबात बरा होणार नाही. पण तरीही कुठेतरी असं भोळंभाबडं रूप जवळ असावं, कायमचं असावं, असं मला नेहमीच वाटायचं.
दुसरं उदाहरण इथे देत नाही. पण अशा काही गोष्टी जुळल्या नि त्यामुळे सिनकरांनी सैलीशी लग्न करायचं ठरवलं. अर्थात सैलीला सिनकरांबद्दल प्रेम वाटत असूनही तिला लग्न करण्यासाठी तयार होता येईना. का? माहीत नाही. पण लग्न काही झालं नाही. अर्थात लग्न करायचं ठरल्यावर सिनकर कुठेतरी त्याबद्दल बोलले नि मग झाली चर्चा सुरू :
... मग माझ्या लग्नाची चर्चा गावभर सुरू झाली. जो तो विचारायचा, ''हे खरंय?'' मी म्हणायचो, ''हो हे खरं आहे.'' एकदा लायब्ररीत बसलो असताना एका विद्वान गृहस्थांनी मला संदर्भ विभागातून बाहेर काढलं.
''द्या, द्या, तुमची एक सिगरेट!''
मला या गाडीचा पुढचा सिग्नल समजला होता. आम्ही खाली भटाच्या बाकावर चहा घेऊ लागलो... आणि मग त्यांच्या स्टाइलमध्ये ते, ''तो हा कोण तो आपला परवा भेटला होता, काय त्याचं नाव...''
''ठीक आहे. नाव सोडून द्या! म्हणत काय होता तो?''
''म्हणजे तसं तो म्हणत होता, हं... काय बरं...''
''तो हेच म्हणत असेल की मी एका नेपाळी वेश्येबरोबर लग्न करतोय!''
''अं... हो... असंच काहीतरी!''
''काहीतरी नाही. ते खरं आहे.''
आपल्या विद्यार्थ्यांवर प्राणापलीकडे प्रेम करणारे हे मध्यमवर्गीय विद्वान प्राध्यापक ज्यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे.. आता ते हाताने डोकं खाजवू लागले.
''मी जर लग्न केलं तर तुम्ही याल ना?''
''हो, हो, येईन ना!''
''मग सर...'' मी सिगरेट पेटवीत म्हणालो, ''मी टॅक्सी थांबवतो. चला, येता माझ्याबरोबर फॉकलंड रोडवर? मी तुमची आणि तिची आत्ताच ओळख करून देतो.''
सरांना घाम फुटला. ''नाही. मी आलो असतो पण आता लेक्चर आहे...'' वगैरे म्हणून गायब!
चर्चांमध्ये जसे वरचे प्रोफेसर भेटतात तसेच कार्यकर्ता प्रकारातले लोकही आहेत. पण सिनकरांना त्यांच्यातही इंटरेस्ट दिसत नाहीये :
एका प्रसिद्ध युवक संघटनेचा कार्यवाह येऊन भेटला. ''हे तू फार चांगलं करतोयस. असं धाडस कोणी दाखवत नाही.'' मनात म्हटलं, ''मग तू दाखव!'' तो पुढे असंही म्हणाला, ''तू लग्न करच. आमची संघटना तुला संपूर्ण सहकार्य करील.''
मी म्हणालो, ''मित्रा, आभारी आहे. तुमच्या संघटनेचं संपूर्ण सहकार्य लाभावं म्हणून काही मी सहा वर्षं घालवली नाहीत. मी जेव्हा या प्रकरणात पडलो तेव्हा तुमची संघटना जन्मली पण नव्हती. आणि कधीकाळी एक संघटना जन्मणार आहे, आणि ती आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहे; तेव्हा आपण वेश्येबरोबर लग्न करावं, असा विचार काही माझ्या डोक्यात आलेला नव्हता.''
मी जे करणार होतो ते पूर्णपणे माझ्या जबाबदारीवर करणार होतो. पुढील बऱ्यावाईट परिणामांची पूर्ण जबाबदारी माझीच होती. माझ्या खाजगी जीवनात कोणत्याही सामाजिक संघटनेचा स्पर्श किंवा राजकीय रंग मला नको होता.
असं होतं सिनकरांना सैलीबद्दल जे वाटत होतं ते. त्यात आपल्याला वाटतंय त्याची जाणीव फक्त होती, बाकी त्यातून काही दाखवू पाहावं असला हेतू नाही. हे दाखवेगिरी न करण्याच्या भूमिकेमुळे सिनकरांचं या पुस्तकातलं लेखन तरी सुंदर झालंय.

एखाद्या सभ्य माणसाला कशाबद्दल बोलताना सर्वाधिक आनंद होईल? < उत्तर : स्वतःबद्दल. < बरंय, तर मग मीही स्वतःबद्दलच बोलत जाईन. : या दस्तयेवस्कीच्या 'नोट्स फ्रॉम अंडरग्राउन्ड' कादंबरीतल्या शब्दांचा आणि त्या कादंबरीचाही संदर्भ 'रेघे'वर मागे एकदा माध्यमांसंबंधी येऊन गेलाय. हे किती ठिकाणी जुळतंय बघा! सिनकरांनीही या पुस्तकात स्वतःबद्दलच लिहिलंय. पण तरी ते 'फेसबुक'वरती असतं तसं नैतिकतेच्या प्रदर्शनासारखं होत नाही. याचं कारण काय? तर आपण आधी म्हटलंय तेच : प्रामाणिकपणा.

प्रामाणिकपणामुळेच सिनकर सैलीबद्दल झालेल्या आपल्या चुकांचीही जबरदस्त कबुली देतात. आणि ही कबुली अशी नाहीये की ती एकदा करून झाली की आपल्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटेल. उलट आपल्यालाही हा काय वेडेपणा चाललाय असं वाटून राग येऊ लागेल. म्हणजे सैलीने सिनकरांच्या दारू पिण्याबद्दल केलेल्या तक्रारीचा राग डोक्यात घालून निव्वळ एका क्षणाच्या दारूच्या नशेत हा माणूस पोलीस स्टेशनात जाऊन सैलीविरोधात खोटी तक्रार देतो. कसली तर, आपण रस्त्यावरून जाताना ह्या बाईने वरतून 'शुक शुक' करून पाणी फेकल्याची. पोलीस येऊन सैलीला उचलतात. नंतर सिनकरांना शुद्ध येते तेव्हा ते पोलिसांना आपलं साधं भांडण झालेलं नि त्याचा राग म्हणून आपण असली तक्रार केल्याचं सांगतात नि तक्रारीचा भाग मिटतो. पण सैली पुन्हा सिनकरांना जवळ करत नाही कधीच :
माझ्या उभ्या आयुष्यात मी कोणाविरुद्ध तक्रार नोंदवली नव्हती. नोंदवली ती पहिलीच! चक्क सैलीविरुद्ध!! तीही निखालसपणे खोटी!! माझ्याविरुद्ध मीच तक्रार नोंदवल्यासारखं झालं मला. वास्तविक ड्यूटी-ऑफिसरने माझ्या कानफटात मारून किंवा किमान माझी कानउघाडणी करून मला अगोदरच हाकलून दिलं असतं तर ते मला जास्त बरं वाटलं असतं.
अधिकारी तक्रार लिहून घेत असताना सैली माझ्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती. मी अवाक् होऊन तिची नजर टाळू लागलो. कसेबसे शब्द उच्चारत सैली सावकाश म्हणाली,
''तेरी कसम लेकर कहती हूँ...''
माझं हृदय धडधडू लागलं.
''इसके बाद मेरे पास कभी गलती से भी मत आना राजा!''
सैलीने केलेला अंतिम वार मी सहन करू शकत नव्हतो. तक्रार आठ मिनिटांत नोंदवून झाली. पण या एकाच तक्रारीने आठ वर्षांच्या आमच्या एलिमेंट्स खसकन तुटल्या. सैलीकडे परत जायचं नाही? ही कल्पनाच मला सहन होत नव्हती. त्यापेक्षा कोणतीही सक्तमजुरी भोगायला मी तयार होतो. सैली सावकाश बोलली होती. पण तिच्या प्रत्येक शब्दामागचा ठाम निर्धार मलाच समजला होता.
सैलीचा निर्धार कायम राहिला आणि सैली सिनकर याचं प्रकरण कायमचं तुटलं. सिनकरांच्या चुकीमुळे तुटलं याचा आपल्याला राग येऊ शकतो. आणि येतोच. पण आपली चूक एवढ्या ढळढळीतपणे सांगणाऱ्या माणसाला आता करणार तरी काय? हा माणूस तसा त्याच्या हयातीतच यशस्वी झाला होता. हिंदीतही पोलीसकथा लिहिल्यामुळे, मराठीतही कथा-कादंबऱ्यांचा नियमित पुरवठा केल्यामुळे पैसाही मिळत होता. पण तेवढं पुरेसं नव्हतंच अर्थात :
१९६४ साली सैली अठरा वर्षांची होती आणि मी चोवीस वर्षांचा होतो तेव्हा आमची पहिली भेट झाली. आणि १९७१ साली ती पंचवीस वर्षांची असताना आणि मी एकतीस वर्षांचा असताना आमची ताटातूट झाली. आयुष्यातील ठरावीक आठ वर्षांचा हा इतिहास! लोक म्हणायचे, ''हे तुमचं फ्रस्ट्रेशन लाइफ सुरू आहे.'' खरोखरच गाढव होते हे लोक. सैलीचे माझे संबंध सुटले आणि माझं फ्रस्ट्रेशन लाइफ सुरू झालं. १९७१ साली जितकं नाव नव्हतं त्याच्या दसपट मिळवलं. पण निराश होतोय. पाहिला नाही एवढा पैसा पाहिला आणि तेवढाच उधळून लावला. हे फ्रस्ट्रेशन लाइफ. आज तर मी कुठल्या कुठे आहे. अजूनही असं वाटतं की तिची साथ मिळाली असती तर आणखीन कुठच्या कुठे गेलो असतो. पंख कापलेल्या पक्ष्यासारखी अवस्था झाली एवढं मात्र खरं!
असा आहे हा चाळीसेक पानांचा लेख. लेखाच्या शीर्षकात १३ सप्टेंबर ही तारीख का आहे? तर ही सैलीची जन्मतारीख होती म्हणून. आणि ह्या दिवशी सिनकर आणि सैली न चुकता 'नॉव्हेल्टी' किंवा 'नाझ'ला पिक्चर पाह्यला जायचे म्हणून. १९७१नंतरचा कोणताच १३ सप्टेंबर सिनकरांसाठी आधीच्या आठ वर्षांसारखा नव्हता. आठ वर्षं... :
१९६४ ते १९७१ हा आठ वर्षांचा सैलीचा माझा सहवास! बरोबर आठ वर्षांनी आमची ताटातूट झाली. मी आठ वर्षं मन जबरदस्त घट्ट केलं, कोणी करू शकणार नाही एवढं केलं. १९७९! मला पाहायचं होतं, या आठ वर्षांत सैली कशी झाली आहे? कशी दिसते आहे? कशी बोलते आहे? कशी वागते आहे? कारण आता मी तिला जो भेटणार होतो तेव्हा ती असणार तेहतीस वर्षांची आणि मी आहे एकोणचाळीस वर्षांचा!
अठरा वर्षांची सैली पण मी पाहिली आणि तेहतीस वर्षांची पण पाहिली.
सैली मला म्हणाली होती - जेव्हा 'तुम ना जाने' गाण्याच्या बाबतीत मी तिला विचारलं होतं तेव्हा - ती म्हणाली होती, ''मैं समझी तुम पुना में खो गया!''
आज गेली आठ वर्षं सैली हेच गाणं गुणगुणत असेल का? 'तुम न जाने किस जहाँ में खो गये!' आणि समजा, गुणगुणत असेल तर ती काय समजत असेल? मी कुठे कुठे 'खो गया' म्हणून?
... १९७२नंतर रश्मी दिवाणचा (सिनकरांचा मित्र) पत्ता नाही. तो जिवंत आहे. मला का भेटत नाही, मला माहीत नाही...
आज मी जिवंत आहे. सैली जिवंत आहे. रश्मी जिवंत आहे. पण माझ्या हृदयात फक्त माझेच ठोके पडताहेत आणि मी ते एकटाच ऐकतोय!
... मधे काय घडेल सांगता येत नाही. पण बरोबर आणखीन आठ वर्षांनी सैलीकडे जाण्याचा गंभीर विचार मी आत्तापासूनच करतोय. ती तारीख असेल...
१३ सप्टेंबर १९८७!
... तेव्हा मी असेन सत्तेचाळीस वर्षांचा आणि सैली एकोणचाळीस वर्षांची!
सिनकर आता नाहीत. सैलीबद्दल आपल्याला काही माहिती असू शकत नाहीत. पण सैलीबद्दल सिनकरांनी लिहिलेलं आपल्याला वाचायला मिळू शकतं. यात आत्तापर्यंत आपण अनेकदा बोललोय तो वेडेपणा आहे. तो मुद्दामहून आणलेला नाही, त्या वेडेपणात झिंग आहे तीसुद्धा मुद्दामहून आणलेली नाही. ते सगळंच प्रामाणिकपणातून आलेलं असावं. हे प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा फार होतंय असं वाटतंय ना? पण ते आहेच ह्या पुस्तकात. म्हणजे या पुस्तकातल्या शेवटच्या 'सुंदर सावली सापडली' या लेखात सिनकर एकदा असंही म्हणतात पाहा (हे अधोबिधोलोक पाहिलेले सिनकर आहेत) : 'चाकू, सुरे, तलवारी, अॅसिड किंवा रिव्हॉल्वर घेऊन जरी कुणी अंगावर आला, तरीही माझ्या शक्तीच्या कुवतीप्रमाणे (खरं म्हणजे कोणीही फुंक मारून मला खाली पाडावं) मी प्रतिकार करीन किंवा करण्याचा प्रयत्न करीन. पण मी इथे प्रामाणिकपणे सांगतो की मी इंजेक्शनला महाभयानक घाबरतो. खूप वेळा जेव्हा मी या गोष्टीचा विचार करतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं, एक सुई टोचल्यामुळे माणूस मरत नाही. परंतु कोणीतरी आपल्याला सुई टोचतं आहे आणि आपण काडीचाही प्रतिकार करू शकत नाही हेच माझं इंजेक्शन या संदर्भातलं मत असावं.' असंय हे सिनकरांचं. म्हणजे हा 'सुंदर सावली'चा लेख आहे तो त्यांच्या लग्नाची कथा सांगणारा. त्यात त्यांनी आपल्या होऊ घातलेल्या पत्नीला काय वाचायला द्यावं, तर 'सैली : १३ सप्टेंबर' हे पुस्तक, (म्हणजे त्याची पहिली आवृत्ती). त्याबद्दल ते लिहितात : 'मी स्वतः लिहिलेलं एक पुस्तक - ज्या पुस्तकात मी माझ्या आयुष्यातील काही ठळक घटना मांडल्या आहेत, ते पुस्तक - मी तिला वाचायला दिलं. पुस्तकाचं नाव 'सैली : तेरा सप्टेंबर'. एका रात्रीत तिने पुस्तक वाचून संपवलं. मला पूर्ण खात्री होती, आता मी हिच्या मनातून जास्तीत जास्त उतरणार. पण घडलं वेगळंच. आमची जेव्हा भेट झाली तेव्हा ती म्हणाली, ''तू खूप प्रामाणिक आहेस. आता मात्र मी नक्कीच तुझ्याबरोबर लग्न करणार!' असंय हे सिनकरांचं. प्रामाणिकपणाचा पुन्हा 'शो' उभा करता आला असता आणि तो उर्वरित जगात केला जातोच. पण शोबाजी न करता नुसतं असणं हे ह्या पुस्तकात आहे. आता हेही कमी म्हणून की काय, अजून एक याच लेखातलं उदाहरण देतो (हे प्रामाणिकपणाबद्दल शेवटचं) : 'सबंध जगाचा भार माझ्यावर असला तरी तो एकवेळ चालेल, पण माझा भार वाळूच्या कणावरही नसावा, हा माझा प्रामाणिक दृष्टिकोन आहे.'

बाकी सिनकरांचं इतर काही तुम्ही वाचाल किंवा नाही, ते प्रत्येकाच्या आवडीचं असेल किंवा नाही, हे सगळंच वेगळं. पण 'सैली'चा 'हँग-ओव्हर' काही काळ तरी राहील याची ग्यारंटी.

कादंबरी. पहिली आवृत्ती : ऑगस्ट १९८१

Sunday 21 April 2013

वेश्यावस्तीतली आई आणि फोटोग्राफर मुलगा । दोन कविता

एखाद्या सभ्य माणसाला कशाबद्दल बोलताना सर्वाधिक आनंद होईल? < उत्तर : स्वतःबद्दल. < बरंय, तर मग मीही स्वतःबद्दलच बोलत जाईन. : या दस्तयेवस्कीच्या 'नोट्स फ्रॉम अंडरग्राउन्ड' कादंबरीतल्या शब्दांचा आणि त्या कादंबरीचाही संदर्भ 'रेघे'वर मागे एकदा माध्यमांसंबंधी येऊन गेलाय.

एका पातळीवर माध्यमं आता व्यक्तीला जोडली जातायंत आणि 'स्वतः'भोवती फिरतायंत. पण स्वत:बद्दल काय बोललं की आनंद होईल ते आधी ठरवूनच माध्यमातून ते व्यक्त केलं जात असावं. किंवा काय बोलल्यावर लोकांकडून आपल्याला आनंद मिळेल तेही आधी ठरवलं जात असेल. 

शंकर सरकार
शंकर सरकारने स्वतःबद्दल आणि स्वतःच्या आईबद्दल फोटोग्राफीच्या माध्यमातून बोलताना आतमधून काय ठरवलं  असेल त्याची कल्पना आपल्याला येऊ शकत नाही. शंकरची आई वेश्याव्यवसाय करत असे. 

कविता सरकार यांना ओडिशातल्या माल्कनगिरीमधून कोलकात्यातल्या सेठबागान परिसरात आणलं गेलं आणि या 'रेड लाइट एरिया'  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात त्यांना शरीरविक्री करावी लागली. त्या ओडिशात असतानाच शंकरचा जन्म झाला होता. अगदी सुरुवातीची वर्षं तो ओडिशातच होता. पण तीन वर्षांचा असताना तो आपल्या आईच्या शोधात आजीच्या सोबत कोलकात्यात आला. दोन महिन्यांच्या शोधानंतर त्यांना कविता यांचा पत्ता सापडला. मोठं होत जाताना शंकरला आपली आई आणि तिचा व्यवसाय यांच्याबद्दल मनात गोंधळाची भावना निर्माण होत गेली. ही भावना त्याने तपासायला सुरुवात केली ती कॅमेऱ्याच्या लेन्समधून आणि त्यातून त्याला आईशी नव्यानं भावनिक बांध जोडता आला.

साधारण २००० सालच्या आसपास सेठबागान परिसरातल्या मुलांना फोटोग्राफीच्या मदतीने व्यक्त होता यावं यासाठी  'युनिसेफ'ने उपक्रम राबवला. त्यात सहभागी झालेल्या शंकरने तेव्हापासून आपल्या आईचे फोटो काढायला सुरुवात केली. आता शंकर बावीस वर्षांचा आहे. त्याच्या छायाचित्रांची प्रदर्शनं देशात आणि परदेशातही भरून गेली. आता त्याची आई वेश्याव्यवसाय करत नाही.

शंकरचे फोटो आपल्याला 'गल्ली'वरती 'फेसिंग वन्स ओन' या शीर्षकाखालच्या फोटोमालिकेत पाहता येतील. काही फोटो 'रेघे'वरच्या नोंदीत वापरण्यासंबंधी आपण केलेल्या विचारणेला शंकरने आनंदाने परवानगी दिल्यामुळे खाली त्याचे काही फोटो देतो आहे.


शंकरची आई, सेठबागान परिसरातील इमारतीजवळ उभी असताना, जानेवारी २०००



''माझ्या आईशेजारी झोपलेला इसम माझे वडील नाहीत. मी त्यांना 'काका' म्हणतो.''
जानेवारी २०००




''आई आणि काकांनी आयुष्य असं सोबतीनं घेतलं होतं.''


शंकरही आपल्या आईला विकतोय, असे आरोप त्याच्यावर केले जातात. पण त्याच्या आईचा त्याला पाठिंबा आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो फोटोंच्या माध्यमातून ही गोष्ट सांगतो, कारण त्याला माहीत असलेली हीच सगळ्यांत मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट त्याला अजूनही कधी कधी स्तब्ध करून सोडते. ('तेहेलका'मधला लेख). कविता सरकार आता कापडनिर्मिती कारखान्यात काम करतात.

''या सहा बाय सहाच्या खोलीत आम्ही झोपतो, आई जेवण बनवते, आम्ही जेवतो.'' (जुलै २०१०)


''माझी आई कविता सरकार, माझे काका आणि आमचे शेजारी.'' जून २०१२


'मी आणि माझ्या आईमधला कॅमेऱ्याच्या माध्यमातून साधलेला हा संवाद आहे', असं शंकर म्हणतो. आपल्या भावना या फोटोंमध्ये साठवलेल्या आहेत, असं सांगून तो म्हणतो, ''मी लहान असतानापासून आईचे फोटो काढायला सुरुवात केली. हे सगळं मी, आई आणि आम्ही राहतो ती जागा यांनी व्यापलेल्या एखाद्या प्रकल्पामध्ये पूर्णत्वाला जाणार आहे याची मला कल्पना नव्हती.'' ('संडे गार्डियन'मधला लेख.)

शंकरची आई कविता सरकार, त्यांनी पाळलेला पिंजऱ्यातला पोपट आणि एक मुलगी. सप्टेंबर २०११

'फोटोग्राफीचा तुला उमजलेला अर्थ काय?' असा प्रश्न आपण 'रेघे'मार्फत शंकरला विचारला, त्यावर तो म्हणाला, ''फोटोग्राफी हा माझा जग धुंडाळण्याचा मार्ग आहे. आयुष्यभर शिकण्याची भूमिका घेतलेल्यासाठी हे एक शिक्षणाचं सर्वोत्तम साधन आहे. नवीन काहीतरी शिकण्यासारखं कायमच असतं. त्यातली सर्जनशीलता आणि आव्हान मला भावतं.''

शंकरने आपल्याला त्याचे फोटो वापरायची परवानगी दिल्याबद्दल त्याचे आभार मानून नोंदीचा हा भाग संपवू. 'फेसबुक'वर शंकरच्या फोटोग्राफीचं पान : www.facebook.com/shankarsarkarphoto

शंकरने त्याची आई कविता सरकार यांच्यावर फोटोंच्या माध्यमातून केलेली कविता पाहिल्यानंतर आता नामदेव ढसाळांची एक कविता आपण वाचू.

नामदेव ढसाळ : गोलपिठा : पान ४-५


उघडझाप चालूहे

          उघडझाप चालूहे
          झाडे सादळलेली
          लूत पसरलेली दवदारी चौखूर
कुत्रं हुंगतंय भिंत : भिंत डचडचतेय ओलीचिक
या आर्द्रतेत तुम्हांवर फुल्ली मारणं
आत्यंतिक सोयिस्कर
परंतु तुमचे स्थितिस्थापक इतिहास बदलता येत नाहीत
मला माझ्या भल्याबुऱ्यासह
इथल्या कुंडात पडलेली सूर्यचंद्राची प्रतिबिंबं
          अस्खलित व्यभिचारी निघालीयत
या बेदिल हिवलाटेत
तुमच्या गुदमरत्या छात्या मी करतोय स्क्रिनिंग
भाडोत्री रिलेशन्सपेक्षा मी पहातोय
तुम्हाला निकटवर्ती आणि आसपास
तुमचं उतवणी गंगेच्या पाण्याहून पवित्र
बिनखोलीचा माणूस फिरवला जावा शहरभर तसा मी
तुमच्या उंचावत जाणाऱ्या हाडीव्रणावर सपटलोशन
तुम्ही माझ्या आया व्हा
तुमच्या फदफदत्या कुशीत मला निवारा द्या
मी माझे ३।। इंची प्रसरण पसरतोय तुमच्या बेमतलब
सेन्सस करतोय तुमच्या यारांना बाप म्हणून
तुमचे छपरी भडवे माझे खापरपंजोबा
आणि तुमचे लवंडे - काका, मामा, चुलते वगैरे
या जडजंबाल अंधारात तुम्ही पेरून ठेवलीय क्रांतीची ऋचा
तुम्ही ध्वनी सुधारकांचा पहिला आणि शेवटचा
मी नमतोय फक्त तुमच्यापुढे प्रारंभ आणि अस्त
टंकन करतोय तुमचे संभोगशिल्प
मी तुमच्यापुढे स्वच्छ निरागस
अंगावरली मखमल ढाळून
माझ्या क्रिएटिव्ह अंगरख्यांनो
तुमचे अश्रू जुलमी रुस्तमाना करतोय नमूद मी
कारण मंदिर मस्जिद चर्च तुम्ही एका दोऱ्यात ओवलीयत
तुम्हाला गिळत सुटलेलं बदफैली संस्कृतीकरण
लांडंभुंडं पहातोय चिरफाळलेल्या डोळ्यांनी
          खद्र्या मैनांनो
तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी निःपक्ष भाष्यकार
समस्त वारकऱ्यांचा कर्दनकाळ
मी सावरतोय तुमच्या वरंगळलेल्या रक्तबंबाळ धुरा
तुमच्या गांडीचे कानवले कुरतडलेत ज्यांनी
त्यांच्या नाशासाठी मी पिकू घातलीय आढी
तुम्ही छिन्नभिन्न पंखांनी पिसारत या
माझा देहोदय मी मांडलाय रस्त्यात
आणि भिरभिरताहेत माझ्या काळजात
कुणीतरी हागून ठेवलेली ओयासिसं
          उघडझाप चालूहे
          झाडे सादळताहेत
          लूत पसरते चौखूर दवदारी

Tuesday 16 April 2013

भारतीय रेल्वे : मार्क्स । मर्ढेकर । आणि दोन फोटो

भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबईतल्या बोरीबंदर स्टेशनातून (म्हणजे आत्ताच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून) ठाण्याच्या दिशेने धावली. ह्या घटनेची तारीख होती १६ एप्रिल १८५३. या घटनेचं १६०वं वर्षं साजरं करत 'गुगल'ने आज त्यांचा लोगो त्यासंबंधी केलाय :



हे तुमच्या पाहण्यात आलं असेल. 'गुगल'ने हे डुडल केलंयच तर त्या निमित्ताने आपण काही गोष्टी 'रेघे'वर नोंदवून ठेवू.
***

ज्या वर्षी ही रेल्वेगाडी धावली, त्याच वर्षीच्या जुलै महिन्यात कार्ल मार्क्सनी एक लेख लिहिला होता : भारतातील ब्रिटिश सत्तेचे भविष्यातील परिणाम. भारतात वर्षानुवर्षं रुतून असलेली जातिव्यवस्थाधारित श्रमविभागणी रेल्वेच्या व्यवस्थेने येणाऱ्या आधुनिक उद्योगांमुळे संपेल, असं मार्क्सनी या लेखात म्हटलंय. भारताच्या प्रगतीच्या आणि सत्तेच्या आड येत असलेले हे अडथळे आहेत, आणि रेल्वेच्या आगमनाने ते संपतील, असा अंदाज त्यांनी बांधला. हा फोल गेलेला अंदाज बऱ्यापैकी प्रसिद्धही आहे. रेल्वेच्या पसरलेल्या जाळ्याचं अंतर तपासलं तर भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वेयंत्रणा आहे असं आपल्याला सांगितलं जातं. जातिव्यवस्थेची अशी तपासणी केल्यावर काय हाती लागेल? माहीत नाही. तर मार्क्सरावांचा हा अंदाज चुकला.

याच लेखात मार्क्स असंही म्हणतात की, ब्रिटिशांचं भारतातलं (स्वतःच्या फायद्यासाठीचं) साधारण काम, असलेल्या गोष्टी 'उद्ध्वस्थ करणं' आणि नव्यानं 'उभारणी करणं' अशा स्वरूपाचं आहे. यात मग ब्रिटिशांनी आणलेल्या 'फ्री प्रेस'चाही उल्लेख ते करतात. नवनिर्मितीच्या प्रक्रियेतील एक नवा आणि ताकदवान घटक म्हणजे ही स्वतंत्र माध्यमांची व्यवस्था, असं मार्क्स म्हणतात. या अंदाजात काही तथ्य असेल बहुधा. पण त्याचीही तपासणी मात्र वारंवार व्हायला हवी.

अर्थात, मार्क्सनी एवढ्या लांबून भारताबद्दल अंदाज बांधणं जरा धाडसाचंही आहे आणि त्यात त्रुटी तर उघड उघड आहेतच.

तर, आता आपण आपल्या जवळ राहाणारे बाळ सीताराम मर्ढेकर यांनी रेल्वेशी संबंधित किंवा एकूणच काही संबंध जोडून काही म्हटलंय का पाहूया. मर्ढेकरांची 'फलाटदादा फलाटदादा' ही एक कविता आपल्याला इथे देता येईल, पण एकूण 'रेघे'वर आत्तापर्यंत जोडून आणलेला संदर्भ पाहता आपण मर्ढेकरांना दिसणाऱ्या मुंग्यांकडेच पाहूया.

मी एक मुंगी, हा एक मुंगी,
तो एक मुंगी, तूं एक मुंगी,
ही एक मुंगी, ती एक मुंगी,
पांच एथल्या, पांच फिरंगी;

सहस्त्र जमल्या, लक्ष, कोटिही,
अब्ज अब्ज अन् निखर्व मुंग्या;
अनंत अगणित साऱ्या जमल्या-
किती वारुळी, किती लफंग्या!

कुणी डोंगळे काळे काळे;
कुणी तांबड्या, भुरक्या मुंग्या;
कुणि पंखांच्या पावसाळि वा
बेडर ग्रीष्मांतल्या लवंग्या!

सावधान कुणि रांग धरूनी
एकामागुन एक चालती;
कुणी बावळ्या अप्पलपोट्या
मिळेल साखर तेथे चरती;

व्रतस्थ बनती चावा काढित
कुणि; कुणि पाजित मधुरस इतरां
जन्म कंठती; फळविती कुणि अन्
सम्राज्ञीला प्रसन्न चतुरा!

ह्या मुंग्यांतिल एकेकीला
बनेल खाउनि राजा कोण;
पार्थिवतेच्या पराकोटिचें
अपार्थिवाला नेइल लोण?

- आला आला स्वस्त दरावर आला हो आला
हा मुंग्यांचा लोंढा आला! खोला, फाटक खोला!


दहा दहाची लोकल गाडी
सोडित आली पोकळ श्वास;
घड्याळांतल्या कांट्याचा अन्
सौदा पटला दीन उदास.

ह्या नच मुंग्या : हींच माणसें :
असेच होते गांधीजीही,
येशु क्रिस्त अन् कृष्ण कदाचित्
कालिदास अन् टैकोब्राही.

ह्या नच मुंग्या : हींच माणसें,
मनें अनामिक जरि साऱ्यांचीं,
लक्तरलेल्या मिनिटांचा वर
सदैव बुरखा; लाज स्वतःची.

अंगावरती जिरलेले किति
तऱ्हेतऱ्हेचे मादक धर्म;
अन् वासांची त्यांच्या कॉक्-टेल
तर्र झोकुनी फलाटफार्म.

जशि पाप्याची नजर फिरावी
अनोळखीच्या उरावरूनी,
ह्या साऱ्यांची भेकड वृत्ती
वावरते तशि जगण्यामधुनी.

ह्या नच मुंग्या : हींच माणसें :
मायबाप अन् भाऊबहिणी
ह्यांना असती; होतिल आणिक
मुलें मुली अन् पुतण्यापुतणी.

(मर्ढेकरांची कविता, पान ८८-९०)
ही कविता अजून पुढे आहे, पण आपला संदर्भ स्पष्ट करण्यापुरती इतकीच इथे दिली. पूर्ण वाचण्यासाठी मौज प्रकाशनाने काढलेल 'मर्ढेकरांची कविता' हे पुस्तक पाहता येईल. आपल्या तुलनेने लहान संदर्भाच्या नोंदीमध्ये मर्ढेकरांनी अनेक संदर्भांची गर्दीच करून ठेवलेय, असं आपल्याला वाटलं असेल आणि ही कविता वाचून 'शब्द फुटेनासं होणं' अशी काही परिस्थिती आपली झाली असेल तर शब्दांपेक्षा जास्त बोलके असल्याचा दावा ज्यांच्याबद्दल केला जातो ते फोटो पाहणंच बरं. त्यातून कदाचित आणखी संदर्भ स्पष्ट होतील.

रेल्वे आणि पेपर : फोटो पहिला
रघू राय । चर्चगेट रेल्वे स्टेशन (फोटो : 'मॅग्नम'कडून)



रेल्वे आणि पेपर : फोटो दुसरा
फोटो : रेघ

थांबू.

Sunday 14 April 2013

बाबासाहेब आंबेडकर । माध्यमं । धनंजय कीर

पॉप्युलर प्रकाशन
या नोंदीची साधारण तीन निमित्तं आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक सुरू केलं ती तारीख होती ३ एप्रिल १९२६. बाबासाहेबांच्या जयंतीची तारीख आहे १४ एप्रिल. आणि बाबासाहेबांचं आत्तापर्यंतचं बहुधा सर्वांत लोकप्रिय चरित्र लिहिणाऱ्या धनंजय कीर यांचं जन्मशताब्दी वर्ष २३ एप्रिलला संपतंय. ही निमित्तं साधत कीरांनी लिहिलेल्या चरित्राच्या मदतीने आपण आंबेडकरांच्या पत्रकारितेसंबंधी लहानशी नोंद करून ठेवणार आहोत. धनंजय कीर यांच्यासंबंधी एक कच्च्या स्वरूपातली वेबसाइट (http://dhananjaykeer.com) बहुधा धनंजय कीर स्मारक समितीने तयार केली होती. गेल्या काही दिवसांपर्यंत ती होती, पण आज पाहायला गेल्यावर या वेबसाइटच्या पत्त्याचा कालावधी संपल्याची सूचना येतेय. त्यामुळे कीरांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता ही अशी होतेय. मराठी संस्कृतीशी हे सुसंगत आहे.

आंबेडकरांनी 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत' अशी दोन पाक्षिकं वेगवेगळ्या टप्प्यांवर काढली. माध्यमांच्या या व्यवहाराशी आंबेडकरांचा संबंध कसा आला आणि त्यांच्या एकूण माध्यम हाताळणीकडे पाहून आपल्याला काही हातास लागावं इतपतच या नोंदीचा हेतू आहे.


पान क्रमांक ४८वर आंबेडकरांच्या पहिल्या 'मूकनायक' या पाक्षिकासंबंधी कीर काही माहिती देतात :
शाहू महाराजांनी आंबेडकरांना आर्थिक साहाय्य देऊन एक पाक्षिक काढावयास लावले. ते 'मूकनायक' नावाचे पाक्षिक ३१ जानेवारी १९२० या दिवशी त्यांनी सुरू केले. त्या दिवसापासून आंबेडकरांनी त्या मूक समाजाचे नायकत्व स्वीकारले. पांडुरंग नंदराम भटकर यांना आंबेडकरांनी संपादक नेमले होते. ते महार समाजापैकी असून पुण्यातील डी. सी. मिशनमधून त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले होते. त्यांची पत्नी ब्राह्मण समाजापैकी होती. त्यापायी त्यांना बराच छळ सोसावा लागला होता. त्या पाक्षिकावर आंबेडकरांचे संपादक म्हणून नाव नसले, तरी ते आंबेडकरांनी सुरू केलेल्या चळवळीचे मुखपत्र होते, हे अनेकांना माहीत होते. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने तो काळ किती प्रतिकूल आणि कठोर होता ह्याची कल्पना 'केसरी'सारख्या वर्तमानपत्राने 'मूकनायका'बद्दल दोन शब्द लिहिणे तर सोडाच, पण पैसे घेऊन त्याची जाहिरात छापण्याचे नाकारले, ह्यावरून येईल. त्या वेळी टिळक हयात होते.

'बंडाचे निशाण उभारले' या प्रकरणात महाडमधील चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या अधिकारासंबंधी आंबेडकरांनी केलेल्या क्रांतिकारी कृत्याचा इतिहास सांगून कीर पान क्रमांक ८९वर नोंदवतात :
आंबेडकरांवर टिकाकारांचे हल्ले होऊ लागले. वर्तमानपत्रातून आपले मत प्रतिपादन करण्याची नि विरोधकांच्या मतांचे नि टीकेचे खंडन करण्याची आवश्यकता आंबेडकरांना आता तीव्रपणे भासू लागली. म्हणून त्यांनी ३ एप्रिल १९२७ रोजी 'बहिष्कृत भारत' नावाचे पाक्षिक धडाक्याने सुरू केले. ध्येयनिष्ठेने वर्तमानपत्र चालविणाऱ्यांनी वर्तमानपत्रावर निर्वाहाकरिता विसंबून राहू नये, असे आपणास वाटत असल्यामुळे आपण वकिलीचा स्वतंत्र धंदा सुरू केला, असे पहिल्या अग्रलेखात त्यांनी आत्मपरिचयात्मक निवेदन केले होते. समाजसेवकाचा आर्थिकदृष्ट्या कणा ताठ असला, तर तो अधिक सुलभरित्या कार्य करू शकतो, असे यापूर्वीच त्यांचे मत झालेले होते. अस्पृश्य समाजाच्या हिताच्या दृष्टीने देशातल्या घडामोडींकडे लक्ष देऊन त्यांचे गाऱ्हाणे, त्यांची मते नि त्यांच्या प्रतिक्रिया यांची सरकारदरबारी नोंद व्हावी आणि भावी राजकीय सुधारणांच्या वेळी अस्पृश्यांना अधिकार मिळावे या हेतूने हे पाक्षिक त्यांनी सुरू केले होते. त्यांचे पहिले वृत्तपत्र 'मूकनायक' हे बंद पडले होते. ते ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप हे गृहस्थ चालवीत असत. १९२० साली बाबासाहेब लंडनला गेले त्या वेळी त्यांनी ते भटकर ह्यांच्या स्वाधीन केले होते. भटकरांनंतर घोलपांकडे सर्व व्यवस्था सोपविण्यता आली. परंतु अव्यवस्थेमुळे नि वर्गणीदारांच्या कमतरतेमुळे पत्र १९२३ पूर्वीच बुडाले. यास्तव 'बहिष्कृत भारत' नावाची एक प्रकाशनसंस्था स्थापून अस्पृश्यांचे मानवी हक्क प्राप्त करण्यासाठी जागृती केली पाहिजे नि झगडले पाहिजे असे बाबासाहेबांनी ठरविले. त्यासाठी वीस सहस्त्र रुपये निधी गोळा करण्यासाठी रामचंद्र कृष्णाजी कदम, भवानी पेठ, पुणे, यांना १९२४च्या डिसेंबरमध्ये नियुक्त केले होते. दोन वर्षांनी काही निधी जमताच 'बहिष्कृत भारत' पाक्षिक सुरू झाले. मध्यंतरी घोलप हे विधिमंडळाचे नियुक्त सभासद होते. त्यांनी पुन्हा 'मूकनायक' पाक्षिक सुरू केले. परंतु ते पुन्हा बंद पडले.

पुढे पान क्रमांक १३६वर कीर म्हणतात :
बहिष्कृत भारत : पहिला अंक (फोटो : इथून)
'बहिष्कृत भारत' पाक्षिक सुरू ठेवण्यासाठी त्यांनी अस्पृश्य जनतेकडे निधीची मागणी केली होती. आपल्या निवेदनात ते म्हणाले की, 'सरकारने देऊ केलेली, दरमहा अडीच हजारपर्यंत वाढू शकणारी नोकरी, समाजकार्य करण्यास मोकळी असावी म्हणून आपण नाकारली. रूढ धर्माचारांतील नि लोकाचारांतील दोषांचे आविष्कार करण्याचे करण्याचे भयंकर कार्य हाती घेतल्यामुळे देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेला शिव्याशापांचा भडिमार आपण एकसारखा सोशीत आहोत. फार दिवसांच्या मित्रांचा दीर्घ रोष पत्करला. त्यामुळे धंद्यात मिळणाऱ्या त्यांच्या साहाय्यास आपण मुकलो आहो. 'बहिष्कृत भारत'चे रकाने भरून जागृतीचे काम केले व ते करताना आपल्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे व ऐषआरामाकडे न पाहता डोळ्यांच्या वाती केल्या.' परंतु वेळेवर साहाय्य मिळाले नाही. काही महिने 'बहिष्कृत भारत' बंद पडले.

मध्यंतरी २९ जून १९२८पासून त्यांच्या नेतृत्वाखाली समता संघाचे 'समता' पाक्षिक निघू लागले. 'बहिष्कृत भारता'चा दुसऱ्या वर्षीचा पहिला अंक १६ नोव्हेंबर १९२८ या दिवशी निघाला. 'समता' एका शुक्रवारी तर 'बहिष्कृत भारत' दुसऱ्या शुक्रवारी निघे. असे काही महिने चालून पुन्हा १९२९ साली दोन्ही पाक्षिके बंद पडली.

Friday 12 April 2013

आदिवासी : आदिवाणी

लोगो : http://adivaani.org/
आदिवाणी ही एक प्रकाशनसंस्था आहे. गेल्या वर्षीच सुरू झालेली. आत्ताशी त्यांची तीन पुस्तकं प्रकाशित झाल्येत. त्यातलं पहिलं पुस्तक संथाली भाषेतच होतं. पुढची दोन इंग्रजी. या प्रकाशनसंस्थेच्या संस्थापकांपैकी रूबी हेम्ब्रोम आणि जॉय तुडू ही दोन मंडळी मूळची संथाल आदिवासीच असल्यामुळे त्यांनी पहिलं पुस्तक त्या भाषेतून काढलं, पण एकूण 'आदिवाणी' हा भारतभरच्या आदिवासी संस्कृतीच्या वारशाचं दस्तावेजीकरण करणारा, त्या भाषांमधल्या मौखिक साहित्याला व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम ठरावा असं त्यांना वाटतं. या दोघांना मदत करणारी तिसरी व्यक्ती मॅक्सिकन आहे, लुई गोमेझ.

आपण 'रेघे'वर ही नोंद करतोय त्याची तीन कारणं आहेत. १) साहित्य, संस्कृती याबद्दलच्या चर्चा काही वर्तुळं स्वतःपुरती आपल्या विहिरीमधे राहून करत राहतात किंवा एकदम मुख्य प्रवाह असतो, तो त्याच्या विहिरीत बुडबुडत राहतो. याला फारसा पर्याय नसला तरी यापैकी कुठल्याच प्रवाहांमधे नसलेला अप्रकाशित प्रवाहही असतो, तर तो किमान प्रकाशात आला तर बरं, असं वाटतं. आदिवासी साहित्याचा असाच प्रवाह आहे, असं काही लोक सांगतात. आणि बाहेरून कोणी त्याबद्दल सांगण्यापेक्षा आदिवासी मंडळीच तसं म्हणत असतील तर ते ऐकून घेतलं पाहिजे, म्हणून आपण आपल्या विहिरीत ही नोंद करतोय. २) नक्षलवादाबद्दल जी सर्वसाधारण ढोबळ निरीक्षणं, लेख, बातम्या येतात, त्यात मूळ वादाच्या थिअरीशीही फारसं संबंधित नसलेलं आणि ह्या वादाचं प्रॅक्टिकल जिथे चाललंय तिथल्या लोकांशीही फारसं संबंधित नसलेलं असं काहीतरी आपल्या आजूबाजूला माध्यमांमधून सुरू असतं. यातही आपण काही बोलण्यापेक्षा आदिवासी मंडळीच बोलली तर बरं असं वाटत असल्यामुळे ही नोंद 'रेघे'वर करूया. हे बोलणं प्रत्येक वेळी कुठल्यातरी वादाबद्दलच असेल असं नाही, पण किमान लोकांना स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी जागा तरी देणं आवश्यक आहे. 'आदिवाणी'चं दुसरं पुस्तक ज्यांचं आहे ते ग्लाडसन डुंगडुंग झारखंडमधले मानवाधिकार कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी नक्षलवादी समस्येच्या सरकारी आणि माओवादी अशा दोन बाजूंना सोडून आपली आदिवासी बाजू आत्तापर्यंत धोका पत्करून मांडलेली आहे. 'आदिवाणी'ने काढलेल्या त्यांच्या पुस्तकाचं नाव 'व्हूज कंट्री इज इट एनीवे' असं आहे. ३) 'आदिवाणी' हा काही एक निश्चित हेतू घेऊन पर्यायी प्रवाह म्हणून सुरू असलेला प्रयत्न आहे, हेही सध्या बरं दिसतंय. आणि त्यासाठी काही निधी जमवण्याची त्यांची मोहीम सुरू आहे. नुकतीच सुरुवात असल्यामुळे या प्रकल्पाचं पुढे काय होईल याचा अंदाज बांधता येत नाही. त्यांच्या तीन प्रकाशित पुस्तकातील एका पुस्तकाबद्दल वेगळी नोंद 'रेघे'वर करण्याची उमेद आपण बाळगून आहोत. पुस्तक हातात आल्यावर खरं. तूर्तास, 'आदिवाणी'ची ओळख ते त्यांच्या वेबसाइटवर अशी करून देतात :

व्हूज कंट्री इज इट एनीवे
भारतामध्ये साडेआठ कोटीहून अधिक आदिवासी लोक राहतात. ही संख्या आकर्षक दिसते आणि अनेक आदिवासी मंडळींनाही त्यामुळे हुरूप वाटू शकेल. पण त्यांच्याबद्दल तशी आपल्याला काय माहिती आहे? इंटरनेटवर किंवा एखाद्या पुस्तकात आदिवासी जीवनशैलीचं साचेबद्ध अद्भुतरम्य वर्णन केलेलं सापडेल. आम्ही खरंच असे आहोत का, आमच्याबद्दल लिहिलं जातं ते खरोखरच तसं आहे का, याचं आम्हाला राहून राहून आश्चर्य वाटतं.

आदिवासींची एक वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक-राजकीय व सांस्कृतिक ओळख आहे आणि त्यातून त्यांना स्वयंपूर्ण समुदाय म्हणून टिकता आलंय. आदिवासी संगीत, गाणी, नृत्य हे फक्त सरकारी किंवा अन्य नागरी कार्यक्रमांच्या सुरुवातीला किंवा शेवटाला दाखवायची गोष्ट एवढ्यापुरतंच मर्यादित राहतं.

आदिवासी संघर्ष आणि संस्कृतीबद्दल आत्तापर्यंत नेहमी बाहेरच्या म्हणजे मुख्य प्रवाहातल्या इतिहासकारांनीच लिहिलं. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्यामधे आदिवासी नेत्यांनी दिलेलं योगदान बहुतेकसं दुर्लक्षितच राहिलं.

आदिवासी आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला अभिमानाने धरून आहेत, पण त्यांच्या या संपन्न वारशाचं कोणतंही दस्तावेजीकरण उपलब्ध नाही.

सध्याच्या आधुनिकीकरणाच्या आणि औद्योगिकरणाच्या काळात भारतामध्ये लोककलेला बाधा पोहोचण्याची शक्यता लक्षात घेता पारंपरिक मौखिक कथनशैली ही एक मृतप्राय संस्कृती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

'आदिवाणी' हे या परिस्थितीला दिलेलं उत्तर आहे.

आमच्याबद्दल इतरांनी लिहिलं ते समाधानकारक आहे का? आदिवासी संस्कृती, इतिहास, लोककथा, साहित्य याबद्दल विश्वसनीय माहिती हवी असेल तेव्हा आम्ही काय वाचावं?

आम्ही आदिवासींसाठी आणि आदिवासींनी लिहिलेल्या साहित्याचा दस्तावेज करू इच्छितो. कथनाच्या मौखिक रूपांचं दस्तावेजीकरण करू इच्छितो. आदिवासी  लेखक, कवी, संशोधक किंवा या उपक्रमाबद्दल आत्मीयता वाटणाऱ्या सर्वांचा सहभाग 'आदिवाणी'मधे व्हावा अशी इच्छा.

'आदिवाणी'ची आत्तापर्यंतची तीन पुस्तकं ही किंमतीच्या अंगानेही परवडण्याजोगी आणि त्यांच्या हेतूला धरून आहेत. कुठल्याही व्यक्तीचं किंवा संस्थेचं भविष्यात काय होईल हे आपण सांगू शकत नसलो तरी आत्ता जे दिसतंय त्यावरून 'आदिवाणी'चा प्रयत्न दखल घेण्याजोगा वाटतोय. यात कोणाबद्दल खोटी कणव दाखवणं चुकीचंच ठरणार. वरच्या ओळखीत म्हटलंय तसं केवळ 'अद्भुतरम्य' पातळीवरची कणव बाजूला ठेवून किमान सर्वांना व्यासपीठं उपलब्ध असणं तरी आवश्यक आहे, या अंगाने या नोंदीकडे पाहावं. यासंबंधी खरंतर महाराष्ट्रातूनसुद्धा 'ढोल' हे नियतकालिक निघतं त्याचीही नोंद आपण 'रेघे'वर करायला हवेय. पाहू.

जाता जाता शहाद्याचे ज्येष्ठ कवी वाहरू सोनवणे यांची 'स्टेज' ही कविता देऊया :

आम्ही स्टेजवर गेलोच नाही
आणि आम्हाला बोलावलंही नाही.
बोटाच्या इशाऱ्यांनी-
आमची पायरी आम्हाला दाखवून दिली.
आम्ही तिथेच बसलो;
आम्हाला शाबासकी मिळाली.
आणि ‘ते’ स्टेजवर उभे राहून
आमचे दुःख आम्हालाच सांगत राहिले.
‘आमचे दुःख आमचेच राहिले
कधीच त्यांचे झाले नाही...’
आमची शंका आम्ही कुजबुजलो.
ते कान टवकारत ऐकत राहिले
नि सुस्कारा सोडला
आणि आमचेच कान धरून
आम्हालाच दम भरला-
‘माफी मागा; नाही तर..!’

Thursday 4 April 2013

एक वेडा संपादक नि त्याचा अंक : चंद्रकांत खोतांचा 'अबकडइ'

अबकडइ. लोकवाङ्मय गृह. आवृत्ती : २०१२
संपादक : सतीश काळसेकर, अरुण शेवते
मुखपृष्ठ : सतीश भावसार
चंद्रकांत खोत या नावाची साधारण ओळख द्यायची तर १९६०च्या दशकात सुरू झालेल्या अनियतकालिकांच्या चळवळीतल्या दुसऱ्या टप्प्यातल्या मंडळींमधले एक. त्यांनी कविता केल्या, कादंबऱ्या लिहिल्या (आधी अश्लील आणि नंतर अध्यात्मिक!) आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे 'अबकडइ' नावाचा अंक काढला. हा अंक १९७०च्या आसपासच्या अनियतकालिकांच्या घडामोडीतला होता. १९७३पर्यंत तो अनियतकालिक स्वरूपात निघत होता आणि त्या घडामोडी थंडावल्यानंतर त्यांनी याच नावाचा दिवाळी अंक सुरू केला आणि तो त्यांनी १९७३ ते १९९६ अशी चोवीस वर्षं काढला. त्यातली १९७६-७७-७८ अशी तीन वर्षं सोडता दर दिवाळीला 'अबकडइ' निघाला. असे हे 'अबकडइ' दिवाळी अंक स्वरूपातले एकवीस अंक.

आपण 'रेघे'वर आज करतोय ती नोंद खोतांच्या 'अबकडइ'च्या अंकांमधून निवडून काढलेल्या लेखांच्या 'निवडक अबकडइ' या खंडाविषयी. सहाशेचार पानांचा हा खंड आहे.

इतर दिवाळी अंकांपेक्षा 'अबकडइ'मधे असं काय वेगळं होतं, ज्यामुळे आपण एवढं त्याबद्दल विशेष बोलावं? पहिला वेगळेपणा - अनियतकालिकांच्या घडामोडींमधून हा अंक घडलेला असल्यामुळे आधीच्या घडामोडींमधली आपलं म्हणणं मांडण्यातली मोकळीक या अंकामधे उतरलेली. दुसरा वेगळेपणा - या अंकाचा संपादक वेडा होता. आणि आपण आपल्या मनाने त्याला वेडं म्हणायला नकोय, तो स्वतःच स्वतःला वेडं म्हणवून घेतोय.
***


वेडा संपादक

चंद्रकांत खोत नावाच्या संपादकाचा हा वेडेपणा समजून घ्यायला आपल्याला त्याची 'आणि डायरी एका वेड्या संपादकाची' हा लेख वाचायला लागेल. १९८७ चा 'अबकडइ' 'दैनंदिन, रोजनिशी, वासरी-डायरी' विशेषांक म्हणून काढायचा असं निश्चित केल्यानंतर हा संपादक अभिनेत्री तनुजापासून ते समाजवादी नेते मधू दंडवते यांच्यापर्यंत कोणाकोणाच्या डायऱ्यांचा पाठलाग करायला लागतो. आणि या पाठलागाची स्वतःची डायरी लिहून ठेवतो नि तीही मग 'अबकडइ'च्या अंकाचा भाग होते.

५ जानेवारी १९८७ला करून ठेवलेल्या नोंदीत हा संपादक म्हणतो :
....
(एका) लेखात नाडकर्णी यांनी या कलावंतांच्या छोट्या छोट्या मुलाखती घेतलेल्या दिसल्या. त्यातील तनुजाच्या मुलाखतीनं माझं खास लक्ष वेधून घेतलं. 'या नाटकात काम करायचं म्हणजे तुम्हाला दौऱ्यावर वगैरे जावं लागणार' या प्रश्नाला उत्तर देताना तनुजा म्हणते - 'तेच तर माझ्या संमतीचं आणखी एक कारण आहे. मला प्रवासाची खूप आवड आहे. आम्ही सगळे मिळून प्रवास करणार आहोत. सुमारे महिनाभर आमचं एक कुटुंब असणार! शिवाय माझ्या देशातल्या वेगवेगळ्या लोकांना मी या नाटकामुळे भेटणार. एक माणूस म्हणून त्यांच्यात आणि माझ्यात सुसंवाद साधला जाईल. अशी संधी मला कधीच मिळाली नसती. माझ्या या वेगळ्या अनुभवावर मी एक डायरीच लिहिणार आहे.'
इथे 'डायरी'चा उल्लेख वाचून माझे संपादकीय डोळे लकाकले. उत्तम. तनुजापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. डायरी मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. अर्थात तिनं बहुधा डायरी इंग्रजीतून लिहिलेली असणार. मराठी अनुवाद करता येईल का! आपल्या ग. रा. कामतांना मध्यस्थी करायला सांगायला हवे. पाहू या.


(ह्या मूळ नोंदीत सुरुवातीला दोन परिच्छेद आहेत, इथे ते गाळलेत, त्याऐवजी '....' : रेघ )

दिवाळी येईपर्यंत जे जे भेटतील त्यांना बहुधा ह्या माणसाने आपल्या वेडात सामील करून घ्यायचा प्रयत्न केला असणार :
६ फेब्रुवारी १९८७
कामानिमित्त फोर्टमध्ये संध्याकाळी श्री. बेसिल डेव्हिड या माझ्या परिचित वकिलांना भेटायला गेलो. बराच वेगळ वाट पाहावी लागली. ते कुठं तरी कामानिमित्त बाहेर गेले होते.
भेट झाली. त्यांनी माझं अभिनंदन केलं, 'अबकडइ'ला मुंबई मराठी पत्रकार संघाचं पारितोषिक मिळाल्याबद्दल. माझ्या डोक्यात ८७च्या 'अबकडइ'चं स्वरूप भिरभिरत होतंच. मी श्री. डेव्हिड यांना सरळसरळ आमंत्रणच दिलं. डायरीसंबंधी. एका वकिलाची डायरी. येत्या सहा महिन्यांत एखाद्या महत्त्वाच्या केससंबंधी अथवा तशाच विषयावर डायरी लिहायची. त्यातून सबंध घटना वा व्यक्तिमत्त्व उभे राहिले पाहिजे. त्यांना ही अंकाची कल्पना फार आवडली. त्यांनी लिहिण्याचं कबूल केलं.

ही सगळी डायरीच इथे देत बसावं वाटतंय, पण तसं नको. आपल्याला एवढंच नोंदवायला हवंय की, हा संपादक कसा पिसाटून त्या अंकाच्या मागे लागला असेल. आणि त्याने स्वतःच्या किमान कल्पनेला तरी बंधनं घातली नसणार, त्याशिवाय तो मजकुराच्या एवढ्या उड्या मारू शकला नसता. म्हणजे आपल्या ओळखीतल्या वकिलाला किंवा डॉक्टरला सांगणं हा एक भाग. तिथून थेट सत्यजित रायच्या काकांची डायरीही मिळवायची उमेद हा संपादक बाळगून असतो :
२७ मार्च १९८७
सकाळी अलंकार-कमल टॉकीजच्या परिसरात असलेल्या जुनी पुस्तके-मासिके विकणाऱ्याकडून पन्नास पैशाला 'किशोर' मासिकाचा जानेवारीचा अंक विकत घेतला. संध्याकाळी आमच्या घराच्या बाहेर अंगणात बोगन वेलीखाली बसून सहज चाळत बसलो. त्यात 'जेव्हा मी छोटा होतो' या शीर्षकाखाली सत्यजित राय यांच्या बालपणातल्या आठवणीवजा लेखाचा अनुवाद आढळला. उत्सुकतेने वाचला. त्यात एके ठिकाणी त्यांच्या काकांच्या आठवणी आहेत. त्यात खालील मजकुराने माझे लक्ष वेधून घेतलं. 'काम, विश्रांती, खाणे, फिरणे, गप्पा मारणे या सर्व गोष्टी करीत असताना मधून मधून छोटेकाकांचं डायरी लिहिणं चालू असे. त्यांच्यासारखं डायरी लेखन इतर कुणी केलेलं मी पाहिलं नाही. त्यांच्या डायरीत वर्तमानपत्रातील महत्त्वाचे मथळे असत; प्रत्येक तासाला काय घडले याची नोंद असे. काय वाचलं, काय खाल्लं, कोण भेटायला आले, आपण कुणाकडे गेलो, कुठे गेलो, काय पाहिलं - साऱ्या साऱ्या गोष्टींचं विवरण असे. रेल्वेने ते कधी परगावी गेले तर रेल्वेचं इंजिन कोणत्या 'टाईप'चं - कोणत्या 'प्रकारा'चं होतं, हेदेखील ते डायरीत लिहून ठेवीत... छोटेकाका डायरी लिहीत तीही चार रंगांची वेगवेगळी शाई वापरून. लाल, निळी, हिरवी, काळी - एकाच वाक्यात चार रंगांचा वापर झाला आहे, अशी अनेक उदाहरणं छोटेकाकांच्या डायरीत मी पाहिली आहेत. हे चार रंग वापरण्याचे कारण काय ते बरेच दिवस मला समजलं नव्हतं. नंतर समजलं की निसर्गाचं वर्णन हिरव्या शाईनं लिहायचं, विशेष काही असेल तर लाल शाईत लिहायचं, असा त्यांचा नियम होता. उदाहरणार्थ, 'आज खूप पाऊस पडला. माणिकच्या घरी जाता आलं नाही.' यातील पहिलं वाक्य हिरव्या शाईत होतं, दुसऱ्या वाक्यातील 'माणिकच्या घरी' हे शब्द लाल शाईत होते आणि उरलेले काळ्या शाईत...'
सत्यजित राय यांच्या काकांची ही डायरी बंगालीत प्रसिद्ध झाली आहे की काय यासंबंधी चौकशी करायला हवी. अशोक शहाणे नाही तर कलकत्त्याचे श्री. बा. जोशी यांच्याकडे.

पण कधी तरी हा संपादक थकून जाणंही साहजिकच आहे. एवढ्या खटाटोपामागचं कारण स्वतःच स्वतःला अधूनमधून समजेनासं होऊ शकतं :
२६ मे १९८७
नेहमीप्रमाणे निराशेचा झटका. काहीही करावंसं वाटलं नाही. 'अबकडइ' बंद करून टाकावं. आपल्याला हवं ते मटेरिअल गोळा करताना फार त्रास होतो. एक प्रकारची हमालीच झाली. यात क्रिएशन आहे, नाही असं नाही. पण एकंदरीत हमालीच. दुसऱ्यांच्या हजामती करीत फिरणं.
दुर्गाबाईंना भेटायला जायला हवं होतं. बरेच दिवस भेट नाही. त्यांच्याकडून आर्टिकलही मिळवायला हवं.

बास आता हे. दुर्गाबाईंपाशी येऊन आपण वेड्या संपादकाच्या डायरीबद्दल बोलणं थांबवूया. दुर्गाबाईंचा 'अबकडइ'च्या बहुतेक अंकांमधे वावर होता, हे तर आहेच आणि 'निवडक अबकडइ' या खंडाची सुरुवातही त्यांच्याच 'स्यु दुंग पॉ याची कविता' या लेखाने होते. हा लेख लहानसा आहे आणि मला आवडलेला नाही.
***

वेडा मजकूर

'निवडक अबकडइ'मधे एकूण सत्तावीस लेख आहेत. त्यातले काही लेख वगळता, बाकीच्या बहुतेक लेखांबद्दल स्वतंत्रपणे लिहावं असं वाटतंय. त्यातल्या माधव मोहोळकरांच्या 'अश्कों में जो पाया है, वो गीतो में दिया है' या साहिरवरच्या लेखाबद्दल आपण आधीही 'रेघे'वर बोललो आहोत. या लेखाबद्दल खोतांनी सांगितलेली एक गोष्टही इंटरेस्टिंग आहे : 
जुन्या बाजारातून मी बरीच कात्रणं जी साहिरवर होती ती गोळा करून माधव मोहोळकरांना दिली होती. तेव्हा ग्रँटरोड पुलाखाली सिनेमातल्या गाण्यांच्या चोपड्या मिळत. मी साहिरच्या बऱ्याच गाण्याच्या चोपड्या जमा केल्या होत्या. एकदा मी आणि मोहोळकर साहिरला भेटायला गेलो. साहिरला त्या दुर्मीळ चोपड्या मी दिल्या. नवल म्हणजे साहिर थक्क झाला. खुशीत तो उद्गारला - असलाम आलेकुम! कारण त्यावेळी माझ्या डोक्यावर फरची कॅप होती. विशेष म्हणजे त्यातली काही गाणी खुद्द साहिरकडे नव्हती.

साहिरच्या कवितेबद्दल मोहोळकरांना मनापासून प्रेम वाटलेलं जसं त्यांच्या लेखातून दिसतं, तसा दुसरा एक लेख या खंडात आहे तो श्रीकांत सिनकरांचा : 'आनंदे नाचत पंढरीसी जाऊ'. हे लेख निव्वळ मनापासून दाद देण्यासाठीच लिहिलेले आहेत. आणि ही दाद द्यायला काहीही बंधनं नाहीत याचं एक मोठं श्रेय 'अबकडइ'ला द्यायला हवं. नाहीतर पोलीस चातुर्य कथांसाठी प्रसिद्ध असलेले, (एका अर्थी 'पल्प फिक्शन' म्हणता येईल त्या पद्धतीचे लेखक) सिनकर एकदम एखाद्या संगीतकारावर प्रेमापोटी लेख लिहितील काय? पण एकदा लिहायचा म्हटला की सिनकरांसारखी माणसं मनापासून लिहिणार हेही आलंच. त्यांच्या लेखाचा शेवट असा आहे :
पाच जानेवारी! सकाळी पाचला फिरत असतानाच समजलं, आजचा दिवस भयंकर आहे. दोन्ही पाय शाबूत असूनदेखील जणू काही दोन्ही काखेत कुबड्या धरून मी पार्कला फेऱ्या मारीत होतो. असह्य हे होत होतं की नियमितपणे भेटणारी सारी मंडळी चौकशी करत होती ती केवळ माझ्याजवळच. मला किंवा अण्णासाहेबांना दररोज सकाळी एकटं पाहण्याची शिवाजीपार्कला सवय नव्हती.
पाच जानेवारी! सा रे ग म प ध नि सा. माझ्या दृष्टीने हे सूर त्या दिवश रात्री कायमचे लुप्त झाले. आता हे सूर आणि या सुरांपेक्षाही मला नितांत आवडणारं ते लयबद्ध हास्य मी पुन्हा कधीही ऐकणार नाही.
माझ्यासारख्या माणसाच्या आयुष्यात अण्णासाहेबांसारखा एक थोर महापुरुष का यावा, या कोड्याचं उत्तर मला कोणी देईल का?

सी. रामचंद्र महापुरुष होते की नाही, हे आपल्याला माहीत नाही, कारण आपल्याला त्यांच्या संगीताबद्दलच फारशी माहिती नाही. पण तरीही वाचक म्हणून ह्या लेखातला प्रामाणिकपणा एवढा आपल्याला जाणवत राहतो की आपण त्या लेखाच्या प्रेमात पडतोच. या लेखामागचीही खोतांनी सांगितलेली गोष्ट इंटरेस्टिंग आहे :
श्रीकांत सिनकरची ओळख गुन्हेगारी लेखक म्हणून होती. मी ती पुसून टाकली. अॅडव्हान्स मानधनाशिवाय तो लिहीत नसायचा. सी. रामचंद्र हे माझे आवडते संगीतकार होते. त्यांचं निधन झालं तेव्हा मी श्रीकांतला गाठलं. म्हणालो, सी. रामचंद्रांवर तू मला लेख लिहून दे. सी. रामचंद्र श्रीकांतचाही आवडता होता. तो म्हणाला, मी त्याच्यावर लिहायला लागलो तर माझा हात थरथरेल. मी सांगतो, तुम्हीच लिहून घ्या. म्हणालो, ठीक आहे. माझ्या अंकाची छपाई 'अक्षर प्रतिरूप प्रेस', वडाळ्याला होत असे. त्या वेळी साहित्यिकांचे दोन अड्डे होते. एक मौजेचा प्रेस, दुसरा वडाळ्याचा अक्षर प्रतिरूप प्रेस. सी. रामचंद्रांवरचा लेख याच प्रेसमध्ये बसून लिहिला. दुसऱ्या मजल्यावर मालक अरुण नाईक यांच्या केबिनमध्ये रात्री मी आणि श्रीकांत बसत होतो. श्रीकांत लेख सांगताना ढसाढसा रडत होता. अर्ध्या तासाने तो पंधरा मिनिटं विश्रांती घ्यायचा. त्यावेळी म्हणायचा, मी वॉर्मअप घेऊन येतो. एक-एक पान झालं की मी खाली छपाईसाठी पाठवत असे. श्रीकांत थोडा बोबडा बोलत होता. मोठ्या चिकाटीने सी. रामचंद्रांवरचा लेख पूर्ण झाला. हाच तो उत्कृष्ट लेख 'आनंदे नाचत पंढरीसी जाऊ'. अप्रतिम लेख झाला होता. ते दिवस काही औरच होते. एक नशा होती. एक वेडेपण होतं. एक धमाल होती.
आता आपण परत संपादकाच्याच तोंडून वेडेपणाबद्दल ऐकतोय, त्यामुळे तो वेडेपणा आहे हे उघड मान्य करायलाच हवं. ह्या वेडेपणापायी 'अबकडइ'त खूप गोष्टी अशा सापडतात की ज्या वाचल्यावर 'अरे‍! हे असंसुद्धा लिहायचे!' असं वाटतं. म्हणजे त्या फक्त 'अबकडइ'साठी म्हणूनच होऊन गेल्या की काय? उदाहरणार्थ, अंबरीश मिश्रंची 'एका पक्ष्याची गोष्ट' ही कथा, राजा ढाल्यांच्या 'ढाले राजाच्या झेन गोष्टी'. या मंडळींनी पुन्हा अशा प्रकारचं काही लिहिलं नाही. किंवा ते प्रसिद्ध तरी झालेलं दिसलं नाही. मिश्रंनी लिहिलेली ही सुंदर कथा किमान या खंडात आली हे तरी चांगलं झालं. (मी पुन्हा पुन्हा पक्ष्याचीच गोष्ट का सांगतोय? सांगण्यासारख्या तशा खरं तर पुष्कळ गोष्टी आहेत. निस्तेज संध्याकाळी स्मशानात शांतपणे चुडा फोडणाऱ्या नर्तिकेची गोष्ट. किंवा ख्रिस्ताचे अश्रू आपल्या रुमालानं टिपून घेणाऱ्या वेरोनिकाची गोष्ट. किंवा ऑर्फियसची. किंवा शिसवी आयाळ असलेल्या रोमन सैनिकाची. किंवा कवटींच्या माळा गळ्यात अडकवून काळोखवनात हस्तमैथुन करणाऱ्या आदिपुरुषाची गोष्ट. गोष्टी खूप खूप खूप खूपशा आहेत. पण मला एकच ती आठवते. भावते, पक्ष्याची गोष्ट. चंद्रदिव्यासारखी सदोदित मिणमिणत राहते. आत कुठे तरी सुरंगी जखमीसारखी.)

'ढाले राजाच्या झेन गोष्टीं'बद्दल काय सांगणार? त्यांची पहिली गोष्टच सांगूया.
आजतागायत गावात सुकुमारा नावाची मुलगी राहत होती. चंद्राला म्हणते मावळू नकोस नि सूर्याला म्हणते उगवू नकोस : असं तिचं रूप होतं. आसपासच्या धा-वीस खेड्यांत तिच्या रूपाची बोलवा होती. लोकं भाकऱ्या बांधून तिला बघायला यायची. नेहमी लोकांची जत्रा तिच्या भोवती फिरत असायची. तिनं कधी केस विंचरले नाहीत की फुलं माळली नाहीत की ओठ रंगवले नाहीत की आरसासुद्धा कधी ढुंकून पाहिला नाही. लोकांचे चेहरे हाच माझा आरसा, असं ती म्हणायची. आणि लोक जेव्हा तिच्या सौंदर्याची स्तुती करायचे तेव्हा ती ते उडवून लावायची.
म्हणायची :
: साफ खोट्टं! तुम्ही सुंदर आहात म्हणून मी तशीच दिसते.
: छट्! तूच सुंदर.
: मी तर कधीच स्वतःचं रूप पाहिलेलं नाही. तुम्ही हे पाहू शकता : अनुभवू शकता : त्यातला आनंद लुटू शकता : मी मात्र तुमच्या या आनंदात सहभागी होऊ शकत नाही. तर मी सुंदर आहे हे पाहण्यासाठी मला मजपासून अलग होता येईलसं काही तरी सांगा.
पण त्याचं उत्तर कुणाजवळच नव्हतं.
दिवसेंदिवस साबणाच्या जाहिरातीतल्या चेहऱ्यागत तिचा चेहरा उजळत राहिला. लोकांशी गोड गुलगुलीत बोलण्याचा तिला कंटाळा आला. लोकांच्या अधाशी नजरांची किळस आली. एक दिवस ती समुद्राला उद्देशून म्हणाली
: मी सुंदर आहे हे पाहण्यास माझे डोळे निरुपयोगी आहेत. तर कुणी मला आपले डोळे देईल काय?
तर कुणी काहीच बोललं नाही.
असं हरदिवस होत गेलं नि एकदा गर्दीतनं कुणी तरी एका आंधळ्या तरुणाला समोर धरून आणलं.
: काय झालं?
: बाई तुमच्या सौंदर्याची नुसती तारीफ ऐकली नि यानं डोळेच फोडून घेतले. म्हणाला : हजारो डोळ्यांनी जिचं सौंदर्य बाटवलं असेल तेच कृत्य करायला हे डोळे धजतील म्हणून मी असं केलं. नि असं केल्यानंतर म्हणाला -
: आता मला तिच्याकडं घेऊन चला नि हे डोळे वाटल्यास तिला द्या. हे ऐकून ती हसली. म्हणाली,
: मी सुंदर आहे हे आजवर ऐकून होते. आता ते दिसलं आणि माझ्यासारखेच इतरही सुंदर असतीलसं वाटलंवतं ते खोटंच. फक्त हा तरुण अत्यंत सुंदर आहे. याच्याशीच माझं लग्न लावा.
त्या ओबडधोबड तरुणाला शिव्या घालत लोक घरोघर गेले.

श्री. दा. पानवलकरांची 'पिंपळ सळसळला' ही कथा, विलास सारंगांची 'खडकांमधली दुपार' ही कथा अशा गोष्टी या खंडात आहेत. हे असं खूप काही या खंडात आहे. म्हणजे मूळ 'अबकडइ'च्या अंकामधे केवढं असेल!

जयंत पवारांनी घेतलेली 'पासवाला : कृष्णा गोविंद मोहिते' ही मुलाखत पण सुंदर. वरळीच्या स्मशानात एंट्री पास देणाऱ्या मोहित्यांची पवारांनी घेतलेली मुलाखत मुळातूनच वाचण्यासारखी आहे. त्याबद्दल वेगळं काहीच इथे बोलायला नको. नामदेव ढसाळांचा 'दलित पँथरची गणगौळण' हा 'पँथर'च्या घडामोडींचं एक (आणि एकतर्फी) व्हर्जन सांगणारा लेखही अन्यथा कुठेच प्रसिद्ध झालेला नाही आणि तोही रोचक व मुळातून वाचण्यासारखा. स्वतंत्र लेखांशिवाय या खंडात अनुवाद आहेत. डेव्हिड लोच्या आत्मकथनाचा संक्षिप्त अनुवाद, व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या 'ख्रिस्तीन' या लेखाचा अनुवाद - असं किती नि काय सांगायचं..

जर्मन प्रियकरासोबत जर्मनीला निघून चाललेल्या फोरासरोडवरच्या वेश्येची कहाणी सांगणारी एका डॉक्टरची डायरी म्हणजे 'फोरासरोडवरलं रक्तकमळ' हा डॉ. नारायण तेरेदेसाईंचा लेख पण. शांता नावाच्या या बाईंच्या प्रियकराचं नाव 'शीतल'. किमान त्यांनी डॉक्टरांना सांगितलेलं नाव तरी हे आहे. डॉक्टर आपले सारखे प्रामाणिकपणे चकितच होत राहिलेत.
३० जुलै १९८७
शांता डोक्यात गुलाब घालून येते. सहज विचारतो, ''शांता काश्मीरला जातेस काय?''
खरोखरच शांता शीतलबरोबर काश्मीरला जाणार असते. जर्मनीला जाण्याचे ठरलेले असते. कायदेकानून अडवीत असणार. आज ना उद्या ती जर्मनीला जाईलही. दवाखान्याची उधारी देते. पाच रुपये बाकी ठेवते. हीही एक पद्धत आहे. पैसे द्यावयास नाहीत असे नाही. कदाचित डॉक्टरांच्या 'लिस्टात' आपले नाव राहावे अशी पेशंटची इच्छा असावी. शांता एकटी काश्मीरला जाणार असते. शांताला शक्य आहे. तसे 'रिस्कीच' आहे. कोठचा कोण माणूस त्याच्याबरोबर लांबवर जावयाचे. धोका हा आहेच.
अमेरिकेतून नवरदेव भारतात येतात. भारतातील कुलवंत शीलवान वधू घेऊन अमेरिकेत जातात. कित्येकांची तेथे खराब हालत होते. आपणही येथे राहून कायदेशीर त्यांना काही करू शकत नाही. वधूच्या नातेवाइकांना नुसते रडण्याशिवाय गत्यंतर नसते. 'मुलगी दिली तेथे मेली', हेच उद्गार ऐकावयास मिळतात.
शांताची केसच निराळी आहे. नागपाड्यात वेश्याव्यवसायात आई-वडिलांनी लोटली तेव्हाच मेलेली असते. परत संजीवनी घेऊन जिवंत व्हावयाचा हा प्रयत्न असतो तिचा एकटीचाच. भारतीय उच्च परंपरा आहेच. द्रौपदी, सीता ह्यांच्या मदतीला कोणी आले नाही. शांताच्या कोण येणार? असलेला किंवा नसलेला प्रत्यक्ष भगवानच.
आता आपण फक्त एका लेखाचा उल्लेख करून नोंदीचा हा भाग संपवू.

भाऊ पाध्यांचा 'बाबू : बाकी उरलेला समाजवादी!' असा एक लेख या खंडात आहे. भाऊंनी राजकीय घडामोडींसंबंधीही लेख लिहिले आणि बहुधा 'पिचकारी' हा त्यांचा लेखसंग्रह अशाच लेखांचा आहे. पण तो कधी कुठे दिसूही शकलेला नाही. तरीही इथे जो लेख आहे तो वाचून त्यांनी एकूण आपल्या पारदर्शक पाहण्यातून काय चित्रं रंगवली असतील त्याचा अंदाज येऊ शकतो. समाजवादी चळवळीची अवस्था राममनोहर लोहियांनंतर काय झाली असेल आणि मुळात कुठल्याही चळवळ नावाच्या गोष्टीत कार्यकर्ता नावाच्या गोष्टीचं काय होऊ शकतं, त्यातही बहुतेक कार्यकर्त्यांचं नाही तरी प्रामाणिक राहिलेल्या व्यक्तीचं काय होऊ शकतं, त्याचा दाखला या लेखात आहे :
बाबूला एकदा मी सवाल केला, ''बाबू, तू जे जीवन जगलास, त्याचा तुला पश्चात्ताप होतो का कधी?''
तो तत्काळ म्हणाला, ''नाही - गावडे समाजात जन्माला येऊन मी मिलमध्ये जॉबर झालो असतो म्हणजे अस्मान ठेंगणे झाले असते. पण, त्यापेक्षा मी खूप कमावलंय!''
बाबूने जे उत्तर दिलं ते असाच प्रश्न वार्ताहरांनी प्रेमासाठी राज्यत्याग करणाऱ्या इंग्लंडच्या आठव्या एडवर्ड राजाला विचारला असता, त्याने जे उत्तर दिलं होतं, त्या स्टाईलचं!
बाबूने काय साधले - ही स्वतःला पोळून घेण्याची किमया साधून! कदाचित एखाद्याला त्याचं वागणं भलतंच रोमँटिकही वाटेल! त्यापेक्षा या देशामध्ये स्वतःपुरते पाहणे, मला अधिक रोमँटिक वाटते. आपल्याला पाय पसरण्यासाठी अंथरुण नाही. याची कल्पना असताना स्वास्थ्याच्या, गोधडीसाठी चिंध्या जमवण्याशिवाय आम्ही कल्पनादरिद्री माणसे काय करतो आहोत : एकूणच या देशातल्या लोकांच्या लेख सारीच मूल्यं उफराटी झाली आहेत. बाबूसारख्या माणसाच्या जीवनाचा विचार केला म्हणजे, हे नीटपणे लक्षात येते.
***

वेडा अंक

१९७३च्या पहिल्या दिवाळी अंकातले निवेदन

वास्तविक हा अंक म्हणजे 'अबकडइ' या लघुपत्रिकेचे एकूण सहा अंक आहेत. या लघूला गुरुत्व कसे आले? हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. त्याचे उत्तरही माझ्याजवळ आहे. माझ्या एक लक्षात आलं आहे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर अशा प्रकारचा मार्ग तुडवायलाच हवा. आता 'अबकडइ' दर वर्षी दिवाळीत येईल. पुढील अंकांत आमच्या मनासारखा मजकूर देण्याचा खास प्रयत्न होईल.
आमच्या वाचकांस ही दिवाळी, इतकंच नव्हे तर पुढील वर्षातील होळी, गटारी अमावास्या देखील सुखात जावोत.
रेशनिंगच्या तांदूळकी जय!
----------
 'निवडक अबकडइ'मधल्या मुलाखतीतून :
अबकडइ हा एकखांबी तंबू होता. अंकाला खूप मागणी असायची. पाच हजार अंक हातोहात खपत. तरीही आर्थिक चणचण शेवटपर्यंत पाठ सोडत नव्हती. २१ दिवाळी अंकांनंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे भांडवल नव्हतं. अंक बाजारात आला की मी लोकांची बिलं भागवत असे. एजंट लोक ऐन दिवाळीत माझ्या घरी ठाम बसलेले असायचे. पैशासाठी तगादा लावायचे. या अंकाच्या कारकिर्दीत मी एकही दिवाळी नीट पाहिली नाही. अनुभवली नाही. ऐन दिवाळीत टेन्शनमधे असायचो. नंतर नंतर या सगळ्याचा मला वीट आला होता. अंकाला फायदा जाहिरातीतून होत असे. विक्रीतून नव्हे. या जाहिरातींसाठी खूप आटापिटा करावा लागे. अंकाची विक्री उत्तम होती. पण त्यातील पैशाने मी बिलं भागवत असे. शेवटी माझ्या हाती शून्य उरे. या सगळ्यात दम निघायचा. शेवटी १९९६ साली मी 'अबकडइ' बंद करून टाकला. त्यानंतर मोठी गंमत झाली. नंतर मला फोन यायला लागले जाहिरात कंपन्यांकडून. आपके अबकडइ के लिए फुल पेज अॅड रखा है, लेके जाव. कारण अंकाचं नाव झालं होतं. या मंडळींना मी अंक बंद केलाय हे ठाऊक नव्हतं. नंतर मात्र जाहिराती सुरू झाल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी सगळं बंद केलं होतं.
***

वेडा लेखक

अनियतकालिकांच्या घडामोडींमधे सहभागी व्यक्तींमधे 'स्टंटबाजी' नावाची एक गोष्ट दिसते का? असा एक प्रश्न आहे. उदाहरणार्थ, 'फक्त' या अनियतकालिकाच्या अंकाच्या कव्हरवर संपादकांनी स्वतःची करून दिलेली ओळख. त्यात खोतांच्या ओळखीत 'मृत्यूकडे विलक्षण ओढ. मरण बहुधा आत्महत्येत', 'अखिल कवितेत खळबळ उडवून देणारा पहिला कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर' असे उल्लेख आहेत. यातून फायद्यापेक्षा तोटेच होतात आणि ते मूळ कामाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याच्या रूपात होतात. आणि असं लिहिणारे लोक पंच्याहत्तरी गाठून आहेत.

याशिवाय, खोतांच्या आयुष्यात आलेल्या 'सौंदर्याच्या आइटमबॉम्ब'चाही असा अनेकदा उल्लेख होत आलेला आहे. स्वतः तेही मुलाखतींमधून तो उल्लेख करतच राहतात. इतरांचे दोन अधिक दोन म्हणजे चार होतात, पण माझे साडेचार झाले, असं त्यांनी म्हटलेलं आहे. या बॉम्बचा स्फोट खोतांना एवढं उडवून गेला की ते थेट हिमालयात गेले आणि तिथून आल्यावर मुंबईला चिंचपोकळीला दत्ताच्या देवळात बसू लागले. त्यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्या 'अश्लील' होत्या म्हणतात. आणि नंतर ते एकदम अध्यात्माकडे वळले आणि रामकृष्ण परमहंस, साईबाबा अशा मंडळींवर कादंबऱ्या लिहू लागले. या कादंबऱ्या आता उपलब्ध आहेत.

खाजगी गोष्टींबद्दल बोलण्याबद्दल काही आपलं म्हणणं नाही, पण मराठीतल्या आधीच तोकड्या आणि खुज्या असलेल्या वाचनाच्या नि लेखनाच्या जगात मूळ कामाकडे दुर्लक्ष करण्याइतका खाजगी गोष्टींचा गदारोळ होतो का? हाही एक प्रश्न आहे. पण यालाही काही पर्याय नाही.  कदाचित या सगळ्यासकटच मजा असेल.

नव्याने घडलेल्या घडामोडींनुसार खोतांच्या 'उभयान्वयी अव्यय', 'बिनधास्त' आणि 'विषयांतर' या 'अश्लील' कादंबऱ्यांच्या नव्या आवृत्त्या 'डिंपल प्रकाशना'तर्फे बहुधा ११ एप्रिलला अधिकृतरित्या प्रकाशित होणार आहेत.
किमान आता या कादंबऱ्या वाचनासाठी सहजी उपलब्ध तरी होतील. आधी तसं नसल्यामुळे त्या वाचताही आलेल्या नाहीत, त्यामुळे त्याबद्दल बोलणार काय?

पण 'अबकडइ'चं खोतांनी केलेलं काम इतकं महत्त्वाचं आहे की त्याची दखल घेणं हे तरी आपलं काम बनतंच. शिवाय कादंबऱ्यांवरही वाचल्यावर बोलण्यासारखं असेल तर पाहू.

याशिवाय खोत आत्मचरित्रही लिहिणारेत म्हणतात. एकवीस खंडांमधे. त्याचं त्यांनी सांगितलेलं नाव आहे : 'करून करून भागलो आणि देवपूजेला लागलो'
***

टीप : या लेखात वेडेपणा असं जिथे म्हटलंय तिथे ते शहाणपणा असं आहे.
***



चंद्रकांत खोत (फोटो : प्रहार । इथून)

Wednesday 3 April 2013

काळ नावाचं उत्तर, बंद दरवाजा व लक्ष्मण माने

लक्ष्मण माने ज्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, त्या संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमधल्या पाच कर्मचारी महिलांनी माने यांच्यावर बलात्काराचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सध्या माने फरार आहेत, त्यांचा मोबाइल बंद आहे. या प्रकरणी बातम्या, लेख, अग्रलेख असा मजकूर वर्तमानपत्रांमधून येतो आहे. या प्रकरणाचा शेवट काय होणार हे आपल्याला सांगणं शक्य नसलं, तरी माने यांनी 'बंद दरवाजा' या त्यांच्या पुस्तकामागची 'भूमिका' मांडताना काय म्हटलंय, याची लहानशी नोंद आपण करून ठेवूया. हे पुस्तक १९८४ साली 'ग्रंथाली'ने प्रकाशित केलं होतं.

पान क्रमांक अठरावर माने म्हणतात :
बंद दरवाजा
पण चळवळींचा रेटा जसा वाढू लागला तशी आपसातही स्पर्धा सुरू झाली. तू मोठा का मी मोठा, तू नेता की मी नेता अशी हातघाईवर लढाई सुरू झाली. जोवर चळवळ नव्हती तोपर्यंत गल्लीबोळात पडलेले पुढारी ज्यांना कुणी विचारत नव्हते तेही जागे होऊ लागले. राजकीय पुढाऱ्यांनाही या चळवळींची दखल घ्यावी लागली आणि भटक्या विमुक्तांच्यात स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा, आरोप, प्रत्यारोप, भांडणे, मतभेद सुरू झाले. कोण चूक-कोण बरोबर ते काळ ठरवील आणि त्याने त्याच्या कसोटीवर ठरवलेही. पण त्या त्या काळात मनस्ताप व्यायचा तो झालाच. प्रत्येकाला आपला माल खपवायचा असतो. त्याने इतरांना शिव्या दिल्या. शिवाय, गिऱ्हाईक आपल्या दुकानात येत नाही. हळुहळू अशी दुकाने निघू लागली. त्याने आणखी एक गडबड झाली. मला मिळालेले मानसन्मान हे चळवळीला बळ मिळायला एकीकडे उपयोगी पडत होते. मिळणारी प्रसिद्धी एकीकडे चळवळीला शक्ती देत होती तर दुसरीकडे किडक्या मनोवृत्तीच्या समाजामुळे त्यातही अभावग्रस्त समाजामध्ये स्पर्धा ही तशीच सुरू झाली. जे जे 'उपरा' वाचत त्यांना त्यांना ते दुःख आपलेच वाटे. हे झाले त्याचे यश. पण मीही लिहू शकतो म्हणून 'उपरा'च्या नावे बदलून कॉप्या निघू लागल्या, कारण लाखात बक्षिसे मिळत होती. देशी-परदेशी प्रवास, मानमरातब, पैसा, प्रसिद्धी सारे मिळते. हा नवा शोध कार्यकर्त्यांना लागला होता. त्यामुळे आपणही असे लिहू शकतो म्हणून ते स्वप्न पाहू लागले. शेख महंमदासारख्या मलाही लाथा बसू लागल्या. मी मनाशी पक्का निर्णय केला, पाणी उदासले आहे तेव्हा धक्के बसणार, आपण या गदारोळात खाली उतरायचे नाही. त्यामुळे मला अनेकांनी शिव्या दिल्या. जाहीर आणि खाजगीतपण, मी तिकडे लक्ष दिले नाही. त्यांची नोंद घेतली नाही. आरोप-प्रत्यारोप हा चळवळीतल्या राजकारणाचा भाग म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो. माझ्या दृष्टीने काळ हे त्याचे उत्तर होते आणि आजही काळ हेच त्याचे उत्तर आहे. याचा अर्थ मनस्ताप होत नव्हता असे नाही. पण जिथे जन्मला होतो तो उकिरडा उपसणे भाग होते. पळून जाता येत होते. पण पळायचे नाही हा निर्णय पक्का करून कामाला लागलो.
***

सध्या पळून गेलेल्या माने यांचं 'बंद दरवाजा' हे पुस्तक म्हणजे त्याच नावाने त्यांनी 'सकाळ'मधे लिहिलेल्या सदरातील लेखांचं संकलन आहे. बाकी अशा प्रकरणांची उत्तरं बंद दरवाज्याच्या आतच राहत असल्यामुळे सामान्य नागरिक काळ नावाचं उत्तर स्वतःच स्वतःला मिळवून घेतील आणि समाज सुखाने नांदू लागेल.
***

चळवळ म्हणजे वळवळ की कळवळ की जळजळ की मळमळ की खळखळ की पळपळ?

Monday 1 April 2013

३१ मार्च । रेघ । १ एप्रिल

३१ मार्च म्हणजे आर्थिक वर्षाची अखेर. त्यामुळे पैशांसंबंधीचे ताळेबंद काल मांडले गेले असतील. आपण बिनपैशाचा ताळेबंद आज मांडणार आहोत, 'रेघे'चा. आज १ एप्रिल म्हणजे मूर्खांचा - वेड्यांचा दिवस. आणि आपण कालचं निमित्त साधू न शकल्यामुळे आजचंच निमित्त साधू शकतो.

'रेघे'चं छापील स्वरूपात काही करता येईल का, असा विचार होता. पण मराठीत असं छापील स्वरूपात 'रेघे'च्या हेतूने काही करू पाहणं म्हणजे अत्यंत करूण शेवट निश्चित असलेलं काम आहे याची जाणीव अनेकदा झाल्यामुळे केवळ इंटरनेटवरच 'रेघे'चा आत्तापर्यंतचा प्रवास सुरू राहिलेला आहे.

'रेघे'चं नाव 'रेघ' ठेवण्यामागे जी कथा होती ती अशी : (ही कथा मूळची २३ फेब्रुवारी २०१०ची आहे) :
अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे-
नेहमीप्रमाणेच काही विशेष काम नसलेले गोष्टीतले बादशाह अकबर आणि त्याचा प्रधानमंत्री बिरबल यमुना नदीच्या काठावर वाळूमध्ये फेरफटका मारत होते. मधेच वाळूत पडलेली एक काठी बादशाहाने उचलून घेतली आणि ती फिरवत फिरवत तो बिरबलाशी गप्पा छाटायला लागला.

असेच ते चालत होते तर बादशाहाच्या डोक्यात काहीतरी झालं आणि त्याने हातातल्या काठीने वाळूत एक रेघ काढली नि बिरबलाला म्हणाला, ''बिरबला, ही रेघ न खोडता छोटी करून दाखवू शकशील का? बोल आहे काही तुझ्या युक्तीवाल्या डोक्यात?"

नेहमीप्रमाणे बादशहाच्या बालिशपणाला मनातल्यामनात शिव्या घालत बिरबल विचार करायला लागला. अर्ध्या मिनिटातच त्याला आयडिया सुचली पण बादशाहाला स्वतःच्या प्रश्नाच्या काठिण्यपातळीबद्दल लगेच निराश करण्यापेक्षा तो उगीच विचार केल्यासारखं दाखवायला लागला. विचारात पडलेल्या बिरबलाकडे बादशाह विजयी मुद्रेने पाहत होता. चार-पाच मिनिटांनी बिरबलाने बादशाहाच्या हातातली काठी घेतली आणि त्या काठीने बादशाहाच्या रेघेच्या बाजूला समांतर, जास्त लांबीची दुसरी रेघ काढली. आता बिरबलाच्या रेघेपुढे बादशाहाची रेघ छोटी दिसू लागली होती. मग नेहमीप्रमाणे बादशाहाने बिरबलाच्या बुद्धिचातुर्याचं कौतुक केलं नि पुढील गोष्टींना मजकूर मिळावा यासाठी दोघंही पुढील गप्पा छाटायला लागले.
आता बादशाह कोण आहे ते ज्याने त्याने ठरवावं. त्यांच्याबद्दल अधिक लिहून वेळ आणि शब्द खर्च करण्यात अर्थ नाही. पण असे बादशाह सगळीकडे पसरलेले आहेत. जरा आजूबाजूला बघितलं तर दिसतात. आपण बिरबल नाही, एवढं मात्र नक्की. त्यामुळे कोणाची रेघ छोटी करण्यासाठी ही रेघ काढलेली नाही. पण बहुतेक बादशाह प्रचंड खोटारडे आहेत. त्याला तर काही करू शकत नाही, पण आपली एक रेघ मारू शकतो. म्हणून ही 'रेघ'.

न छापून आलेलं मुखपृष्ठ


तर, कोणावर टीका करण्यात वेळ घालवायला नको, म्हणून मराठी साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं, (वाङ्मयीन स्वप्रसिद्धीसाठी) अनियतकालिकांच्या पातळीवर जे अंक निघतात त्यावर आपण फार बोलूया नको. आणि त्यासाठी आवश्यक सर्वेक्षण किंवा असं काही आपल्या हाताशी नाही, त्यामुळे केवळ शेरेबाजी होण्याची शक्यता आहे. आणि बहुसंख्येने ज्या गोष्टी छापल्या जातात त्याला अगदीच चांगल्या अर्थाने तुरळक आणि अतिशय लहान का होईना अपवादही आहेत, याची नम्र जाणीव असल्यामुळे इथे कोणावर टीका करण्यात अर्थ नाही. 'रेघे'च्या एकूण असण्यातूनच काही निरीक्षणं नोंदवली जातील असा मजकूर आपण 'रेघे'वर प्रसिद्ध करायचा प्रयत्न करत असतो, त्यातून जे स्पष्ट होईल ते होवो.

'रेघे'च्या आत्तापर्यंतच्या प्रवासात झालेल्या काही बरं वाटणाऱ्या गोष्टी अशा :

१. काही लोकांनी इथे नोंदवलेल्या पुस्तकांविषयी उत्सुकता दाखवली. असं किमान पंधराएक वेळा झालं. आणि क्वचित एखादवेळा इथे नोंदवलेल्या एखाद्या दुर्मिळ पुस्तकाची झेरॉक्स प्रत कोणी मागून घेतली, असंही झालं.

२. 'रेघे'च्या वाचकांपैकी काही जण इतर वेळी कुठल्याही भाषेतलं 'मॅगझिन' स्वरूपातलं काहीही वाचत नाहीत, पण 'रेघ' ते वाचतात, असं कळलं. म्हणजे इथे प्रसिद्ध झालेलं दुर्गा भागवतांचं भाषण त्यांच्यापर्यंत अन्यथा पोचलं नसतं, पण 'रेघे'वरून पोचलं आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडून ते पूर्ण वाचलं गेलं. अशा एक-दोन प्रतिक्रिया मिळाल्या.

३. चांगल्यापैकी वाचन असलेली काही मंडळी, जी इतर वेळी हल्लीची मराठी नियतकालिकं वाचण्याच्या फंदात पडत नाहीत, ती 'रेघे'वर येतात आणि इथला मजकूर वाचतात, अशा काही प्रतिक्रिया आल्या. हे लोक 'रेघ' हे एक जर्नल / पत्र आहे, या दृष्टीने इथे येऊन वाचत असतील तर चांगलं आहे, असं वाटतं. इथे चांगलं वाचन असलेल्या मंडळींमधे कॉल सेंटरमधे काम करणाऱ्या तरुणापासून सॉफ्टवेअर कंपनीसदृश गोष्टींमधे काही वर्षं घालवलेल्या इंजिनीयर व्यक्तीपर्यंत किमान पाचेक लोक आपल्या समोर आहेत. आणि ते मैत्रीखातर नाही, तर तटस्थपणे 'रेघे'कडे वाचनासाठी वळतात असं त्यांनी सांगितलेलं आहे.

४. वर्तमानपत्रांमधे, टीव्ही चॅनलांमधे काम करणारे काही लोक 'रेघ' अधूनमधून वाचतात, अशा किमान दहा-एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आल्या.

५. 'रेघे'वरचेच प्रकल्प असलेले आठ ब्लॉगही इथल्या नोंदींच्या निमित्ताने अधूनमधून वाचकांकडून चाळले गेले. भाऊ पाध्ये, अशोक शहाणे, कमल देसाई, श्री. दा. पानवलकर, सदानंद रेगे, हमीद दलवाई, तुळसी परब, वसंत दत्तात्रेय गुर्जर - हे ते कात्रणवहीच्या स्वरूपातलं दस्तावेजीकरण असलेले आठ ब्लॉग. या शिवाय कात्रणवही जोडता येईल एवढा ऐवज आपल्याकडे उपलब्ध नसलेल्या काही मंडळींपैकी रघू दंडवते यांच्यावर आपण रेघेवर एक मोठी नोंद दस्तावेज स्वरूपात करून टाकली. शिवाय मनोहर ओक, प्रकाश जाधव यांच्यावर लहानशा अशा नोंदी करून झाल्या.

६. 'रेघे'वर आपण जाणूनबुजून काही मोठ्या (चार हजार - पाच हजार किंवा जास्त) शब्दसंख्येच्या नोंदीही प्रसिद्ध केल्या. आणि वाचकांनी त्या वाचल्या असाव्यात. एखादा मोठा लेख पूर्ण वाचल्यावरच देता येईल अशा प्रतिक्रिया संबंधित लेखांवर आल्या यावरून हे आपलं मोठ्या शब्दसंख्येचं 'रेघे'वरचं बरं चाललंय असं म्हणायला हरकत नाही. मुद्दाम वाढवलेले शब्द नाहीत, पण मुद्दाम शब्द कमी करणं टाळण्यातून या नोंदी आहेत तशा आहेत.

७. याशिवाय, नुकतीच घडलेली नवीन चांगली घटना म्हणजे 'झेड-नेट'वरचा काही मजकूर 'रेघे'साठी मराठीत अनुवादित करण्यासाठी परवानगी त्यांनी आपल्याला दिली. त्यावर स्वतंत्र नोंद केलेली आहेच.

दोनेक नकारात्मक मुद्देही नोंदवूया :

१. फेसबुकवर वैयक्तिक खातं नसलं तरी 'रेघे'चं खातं असावं, अशी सूचना बहुतेक वाचकांनी केल्यामुळे आपण 'रेघे'चं फेसबुकवरचं खातं सुरू ठेवलंय, पण त्याला फारसा प्रतिसाद नाही. एखाद्या व्यक्तीने इथल्या नोंदीची लिंक शेअर केल्यावर काही प्रतिसाद(?) मिळतो, त्याने 'रेघे'पर्यंत काही पोच मिळत नाही. म्हणजे त्या व्यक्तीच्या शेअरिंगने काही नवीन वाचक 'रेघे'ला जोडले जातील अशी आशा फोल ठरण्याचीच बहुतेक उदाहरणं आहेत. ('रेघ' ही व्यक्ती नसल्यामुळे हे होत असेल का?) पण तरीही वाचकाग्रहास्तव फेसबुकवरचं खातं सुरू आहे; ते बंद करावं, असा बारमाही विचार 'रेघे'वर वावरत असतोच.
यानिमित्ताने एक नाट्य(मय) छटा :  
नैतिकता, समाजाभिमुखता, अभिरुचिसंपन्नता, देशप्रेम, स्त्री-पुरुष समानतेचं भान, ज्ञानसंपन्नता, इतर मानवांप्रति असलेली आत्यंतिक प्रेमभावना, कलासक्त वृत्ती, छायाचित्रणकौशल्य, संवेदनशीलता अशा व इतर अनेकविध गुणांचा समुच्चय फेसबुकच्या दैनंदिन समारंभामधे ठायीठायी दिसतो. -- 'पण मला रोज केळ्याची शिकरण आणि मटार उसळ खायला आवडत नाही'. -- म्हणजे काय? -- 'जाऊ द्या तुम्हाला नाही समजायचं'. -- तरी काहीतरी खाणं भाग आहे की नाही? -- 'द्या मग आता आहे ते'.

२. 'रेघ' हे पत्र असल्यामुळे त्यात काही लोकांनी लिहावं असे प्रयत्न सुरू होते. काहींनी स्वतःहून तयारी दाखवली होती, काहींना आपण विचारलं होतं. पण ते जवळपास ९९ टक्के फोल गेल्याचा अनुभव आहे. यात 'रेघ' चालवणाऱ्या व्यक्तीच्या संवादकौशल्याच्या कमतरतेवरच १०० टक्के दोषाचं खापर फोडूया आणि फार काही बोलायचं टाळूया. स्वतःवरच खापर फोडलेलं बरं, दुसऱ्यांना इजा नको. यामुळे एक मर्यादा अशी येते की, आपण 'एकटा जीव सदाशिव' अशा ताकदीवरच इथे नोंदी करू शकतो. कित्येक गोंगाटावरचे उतारे आपण देऊ शकत नाही, काही पुस्तकं माहिती असून अजून वाचनात आलेली नसतात त्यामुळे योग्य निमित्त येऊन जातं पण आपल्या कमतरतेमुळे त्यांची नोंद होऊ शकत नाही, कित्येक गोष्टी माहिती असल्या तरी वेळेच्या गणितात बसवता येत नाहीत. पण आपल्याला असलेली माहितीच द्यावी एवढंच केलं तरी ठीकच. आणि निमित्तं दर वर्षीच येत राहणार त्यामुळे कधीतरी काहीतरी होईलच. 'झेड-नेट'सोबतच्या सहकार्य योजनेमुळे यावर काही उपाय झाल्यासारखी परिस्थिती आहे, पण मुळातूनच 'रेघे'साठी कोणी लिहावं असे आपले प्रयत्न होते. ते आता आपण स्वतःहून कोणाला सांगायचं नाही असं ठरवून टाकलेलं आहे.
***

आपण सुरुवातीला काही निरीक्षण देणार नसल्याचं म्हटलं, तरी एक निरीक्षण नोंदवू. कोणत्याही नियतकालिक / अनियतकालिकाने मजकूर विकावा, हेतू विकू नये. कारण हेतू कायम चांगलाच असला तरी त्यातून चांगला मजकूर उभा राहातोच असं नाही. 'रेघे'वरचा मजकूर चांगला असतो किंवा नाही हे ती मारणाऱ्याच्या मर्यादेवरून ठरेल, पण आपण इथे कोणताही उदात्त हेतू विकत नाही, हेही काही कमी नाही.

'रेघे'वर आपण आपला जर्नल / पत्र चालवण्याचा हेतू फक्त स्पष्ट केलेला आहे. शिवाय, माध्यमं, गोंगाटावरचा उतारा, साहित्य, भाषा याच साधारण विभागांमधे इथे नोंदी प्रसिद्ध होतात, ही मर्यादाही स्पष्ट केली आहे. यापलीकडे आपण विकू मात्र काहीच शकलेलो नाही, त्यामुळे हा सगळा ताळेबंद स्वतःचा खिसा रिकामा करणारा ठरलेला आहे. कधीच टॅली न होणारी ही बॅलन्सशीट आहे. इंटरनेट, वीज यांच्यावरचा खर्च आणि शिवाय एका नोंदीवर स्वतंत्रपणे पुस्तक घ्यावं लागल्याचा खर्च आहे. वेळ आणि डोक्याचा भाग आपण यात धरत नाहीयोत.

ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी 'रेघे'वरच्या काही नोंदी एकत्र करून 'निवडक नोंदीं'ची एखादी पुस्तिका किंवा स्वतंत्र अंक असं काही खाजगी वितरणासाठी छापावं, असा विचार आहे. त्याला चारेक वाचकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पैसे देण्याचीही तयारी दाखवली आहे. पण दाखवलेली तयारी आणि प्रत्यक्षातली तयारी यात एवढा मोठा फरक 'रेघे'ने आत्तापर्यंत अनुभवलाय की, स्वतःचे पैसे घालून असलं काही करू नये एवढा (एकतरी) शहाणपणाचा विचार आपण कायम ठेवलेला आहे. तरी एक इथे नोंदवूया की, ज्यांना 'रेघे'वरच्या काही नोंदी छापील स्वरूपात असल्या तर अधिक गांभीर्याने त्यांच्याकडे पाहिलं जाईल, जे लोक अजून इंटरनेटवरच्या वाचनाला सरावलेले नाहीत त्यांच्यापर्यंत इथला मजकूर पोचेल, त्यातून तुरळक का होईना पण काही आर्थिक निधी उभा राहील, असं वाटत असेल त्यांनी ekregh@gmail.com इथे नुसती नावं देऊन ठेवलीत तरी चालेल. वीसेक नावं जमली की आपण निवडक नोंदींच्या पुस्तिकेची पानं निश्चित करू (साधारण ४०च्या आसपास) आणि खर्च काढू आणि त्याची विभागणी करू. या पुस्तिकेत 'झेड कम्युनिकेशन्स'वरचा मजकूरही छापण्याची परवानगी आहे. आणि इथे 'रेघे'च्या हेतूकडे बघून कोणी आपलं नाव नोंदवू नये तर मजकुराकडे बघून मनापासून वाटलं तरच नाव नोंदवावं. तसं नाही झालं तर, अशी नावं नाही जमली असं समजून आनंदी राहू. 

शिवाय आत्ता आहे त्या स्वरूपात 'रेघ' असण्याचे काही फायदे आहेतच. जे लोक छापील गोष्टींकडे पाहतही नाहीत, ते इथे किमान मजकूर चाळतात, काही त्यातले वाचतातही. वितरणाची काहीच व्यवस्था नसल्याचा वेगळा तोटा या मार्गात होत नाही. जुना सगळा मजकूर एकत्र सापडतो. कुणाला इथलं काही दुसऱ्या कुणाला पाठवावं वाटलं, तर सहज पाठवता येतं. एकूण मिळून काही दस्तावेज तयार होतो. पण छापील गोष्टीशी शारीरिक स्पर्शामुळे जी जोडल्याची भावना असते ती इथे कमी असेल का? पण मग ती या चौकटीमधल्या रंगांमधून, भाषेच्या वापरामधून, चित्रांच्या मांडणीमधून भरून काढता येईल का? पाहू जमेल तसं.

लहान पत्रं, इंटरनेटवरची गप्पांपलीकडे जाऊ शकणारी व्यासपीठं, पुस्तिकारूपी अंक, पुस्तकं अशी माध्यमं सध्याच्या माध्यमांच्या बाजाराबाहेरून काढत राहाणं ही एक आवश्यक बाब आहे, या तथ्यावर विश्वास ठेवून 'रेघे'चा असा हा समांतर प्रवास सुरू आहे. हा पुरेसा नाही याचीही जाणीव ठेवूया.

एकूण आपल्या 'इम्बॅलन्स शीट'चा निष्कर्ष हा की, 'रेघ' हा एक मूर्खपणाचा / वेडेपणाचा व्यवहार आहे. त्यामुळे आपण या नोंदीच्या शीर्षकात कालच्या आर्थिक ताळेबंदाच्या दिवसाचा आणि आजच्या- मूर्खांच्या दिवसाचाही उल्लेख करून ठेवलेला आहे.

आता, आणखी एक गोष्ट सांगून थांबू :

रघुनाथ धोंडो कर्वे संततीनियमन, लैंगिक स्वातंत्र्य यासंबंधी बरंच काही सांगून गेले. ज्या महाराष्ट्रात ते होते तिथे त्यांनी 'समाजस्वास्थ्य' नावाचं मासिक २७ वर्षं चालवलं. आपलं म्हणणं मांडणं, त्याचा प्रसार, हाच उद्देश. कर्वे गेले आणि या मासिकाचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला. त्या अंकाचा मजकूर त्यांनी एकत्र करून ठेवला होता, बाकीची तयारी झाली होती, म्हणून तो अंक येऊ शकला. पण कर्व्यांचं निधन आणि 'समाजस्वास्थ्य'चं निधन हे एकत्रच झालं. 'रेघे'ची पोच कर्व्यांच्या आसपासही नाही हे खरं, शिवाय कर्व्यांची निष्ठा कमालीची होती म्हणून अखेरपर्यंत त्यांनी बाजू लढवली.

पण मराठीत हे आहे ते कारुण्य काय कमीये का? उगा आपण त्यात 'रेघे'ची छापील भर कशाला टाकायची?
***

यही दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यों हैं।
- कैफी आझमी