Thursday 21 February 2013

मातृभाषा दिन । युनेस्को । ना. गो. कालेलकर

आज २१ फेब्रुवारी. हा दिवस दर वर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. साजरं काय करतात माहीत नाही, पण 'युनेस्को'च्या घोषणेवरून या दिवसाची सुरुवात झाली. बांग्लादेशच्या निर्मितीआधी पूर्व पाकिस्तानात सुरू झालेल्या भाषिक चळवळीशी संबंधित ही तारीख आहे. पाकिस्तानात केवळ ऊर्दू भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात ही चळवळ सुरू झाली. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या बंगाली मंडळींनी मोर्चा काढला, त्याची आठवण ठेवत 'युनेस्को'ने १९९९ साली या दिवसाला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून निश्चित केलं, अशी माहिती आपल्याला त्यांच्या वेबसाइटवर सापडते.

'युनेस्को'च्या या वेबसाइटवर आपण जाणारच असू, तर तिथं एक टीपणही सापडतं, ते असं आहे -
भाषिक वैविध्य आणि इंटरनेटवरची बहुभाषिकता

संपत्तीनिर्मिती, सामाजिक बदल आणि मानवी विकासात माहिती व ज्ञान यांची भूमिका अधिकाधिक मोलाची बनते आहे. माहिती व ज्ञान यांचं प्राथमिक माध्यम आहे भाषा, त्यामुळे इंटरनेटवर आपली भाषा वापरण्याची संधी जितकी मिळेल त्यानुसार एखादी व्यक्ती उगवत्या ज्ञानाधारित समाजांमधे कशी सहभागी होईल ते ठरणार आहे.

इंटरनेटमुळे विविध भाषांमधे माहिती व ज्ञान यांचं आदानप्रदान करण्याची संधी उपलब्ध झाली. तत्त्वतः, सध्याच्या काळात कोणीही मजकूर तयार करू शकतं आणि उर्वरित जगासमोर ठेवू शकतं आणि प्रतिसाद मिळवू शकतं. तत्त्वतः, इंटरनेट जगातल्या सगळ्या भाषांसाठी खुलं आहे, अर्थात त्यासाठी काही तांत्रिक अटी पूर्ण झालेल्या असाव्या लागतात आणि आवश्यक ते मानवी आणि आर्थिक स्त्रोत उपलब्ध असावे लागतात.

तरीसुद्धा, अनेक भाषा इंटरनेटवर आलेल्या नाहीत. सध्या इंटरनेटच्या जगात प्रचंड मोठी भाषिक दरी अस्तित्वात आहे आणि अनेक भाषांच्या तिथे नसण्यामुळे ही दरी वाढतच जाईल. त्यामुळे प्रत्येकाला बहुभाषिक इंटरनेट उपलब्ध असायला हवं. इंटरनेट आणि त्याच्याशी संबंधित स्त्रोतांपासून वंचित असलेली राष्ट्रं, समुदाय आणि व्यक्ती प्रवाहाबाहेर ढकललल्या जातील, कारण हे स्त्रोत टिकाऊ विकासासाठी महत्त्वाचे घटक आहेत. तुलनेने लहान समुहांकडून बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील लोकांनी आपली अभिव्यक्ती सांस्कृतिकदृष्ट्या अर्थपूर्ण मार्गांनी करण्याची गरज आहे, आणि ती इंटरनेटद्वारे पसरवण्याची गरज आहे. 'डिजिटल दरी'च्या दोन मुख्य बाजू आहेत : एक, प्रत्येकाला इंटरनेट उपलब्ध असणं आणि दुसरी, फक्त आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक पातळीवरच्या दर्जेदार मजकुराचीच नव्हे तर स्थानिक पातळीवरच्या आणि स्थानिक भाषेतल्या दर्जेदार मजकुराची उपलब्धता असणं. इंटरनेट बहुभाषिक आहे आणि इथे सांस्कृतिक वैविध्यही आहे, इथे प्रत्येक संस्कृतीला आणि भाषेला स्वतःची जागा आहे.

इंटरनेटवरचं सांस्कृतिक वैविध्य आणि बहुभाषिकता यांमुळे विविधतापूर्ण, समन्यायी, खुल्या आणि सर्वसमावेशक ज्ञानाधारित समाजांना प्रोत्साहन मिळेल, अशी खात्री 'युनेस्को'ला वाटते. सर्वांगीण भाषविषयक धोरण आखण्यास, स्त्रोत पुरविण्यास आणि इंटरनेट आदी माध्यमांसह भाषिक वैविध्य व बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक मदत पुरवण्यासाठी 'युनेस्को' आपल्या सदस्य राष्ट्रांना उत्तेजन देते. याचाच भाग म्हणून 'युनेस्को' स्थानिक भाषांना डिजिटल जगतात स्थान मिळण्याला पाठिंबा देते. इंटरनेटवर आणि इतर जनसंवादाच्या माध्यमांमधे स्थानिक भाषांमधे मजकूर तयार व्हावा, यांबरोबरच डिजिटल स्त्रोत विविध भाषांमधे उपलब्ध व्हावेत यासाठीच्या प्रयत्नांनाही 'युनेस्को'चं कायमच प्रोत्साहन राहील.

या टीपणात माहिती आणि ज्ञान हे वेगळे शब्द वापरलेत, ते चांगलं आहे. 'स्थानिक' भाषा हा मात्र थोडा गुळगुळीत शब्दप्रयोग वाटतो आणि त्याचं समर्थन कसं केलं जाईल तेही समजत नाही. याशिवाय, टीपणातली इंटरनेटबद्दलची भूमिका काहीशी अतिरंजित वाटू शकते, कारण कितीही म्हटलं तरी हे सगळं 'सॉफ्टवेअर'च्या पातळीवरचं स्वातंत्र्य, वैविध्य असतं; त्याचं 'हार्डवेअर' ज्यांच्या हातात आहे त्यांची शक्ती बऱ्याच गोष्टी नियंत्रित करते. पूर्व पाकिस्तानचा बांग्लादेश झाला त्यासाठी एक अख्खं युद्धही व्हावं लागलं. त्यामुळे एकूण इंटरनेट ह्या माध्यमाबद्दल बोलताना काही गोष्टींबाबत सावधपणा बाळगावा लागेल. 'समाजनिर्मिती' असं म्हणताना हा सावधपणा असावा असं वाटतं, बाकी 'युनेस्को'ने आवश्यक तिथे 'तत्त्वतः' असा शब्द वापरून पुरेशी काळजी घेतलेली आहे. अर्थात स्वातंत्र्याच्या अशा सॉफ्टवेअराधारित गोष्टींमधूनही खूपच गोष्टी बाहेर पडत असतातच आणि त्यांचं महत्त्वही असतंच. याशिवाय ज्यांचं महत्त्व आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने आठवायला पाहिजे अशा एका माणसाला आता 'रेघे'वर बोलवूया. या माणसाचं नाव आहे ना. गो. कालेलकर (११ डिसेंबर १९०९ - ३ मार्च १९८९ ).

माहिती आणि ज्ञानातला फरक अधोरेखित करत राहाण्यासाठी कालेलकरांसारख्या ज्ञानी भाषाशास्त्रज्ञाची आठवण आपण ठेवायला पाहिजे. कालेलकरांचं ज्ञान डेक्कन कॉलेजात आणि मराठी, इंग्रजी, फ्रेंच अशा भाषांमधून कुठे ना कुठे उरलेलं असेलच. त्यातलं आपल्यापर्यंत सहज पोचू शकेल असं ज्ञान तीन पुस्तकांमधे साठवलेलं आहे - 'भाषा आणि संस्कृती', 'भाषा : इतिहास आणि भूगोल', 'ध्वनिविचार'. ही तीनही पुस्तकं 'मौज प्रकाशना'नं प्रकाशित केलेली आहेत.

आत्तापुरतं आपण 'भाषा आणि संस्कृती'मधलं कालेलकरांचं म्हणणं पाहूया.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कालेलकर म्हणतात :
आज आपल्या देशात अनेक प्रश्न आहेत आणि त्याबाबत तीव्र मतभेदही आहेत. भाषा हा त्यांतला एक प्रश्न आहे. म्हणून तिचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. भाषेच्या प्रश्नाला दोन बाजू आहेत : शास्त्रीय व व्यावहारिक किंवा सामाजिक. पहिली बाजू भावनावश न होता अभ्यासता येते. भाषेचे ध्वनी, त्यांचं वर्गीकरण, त्यांचा वापर, व्याकरण, व्याकरणातील वर्ग, त्यांची संदर्भानुसार होणारी रूपे, वाक्यातली मांडणी, व्युत्पत्ती, भाषेचा पूर्वेतिहास, तिचे मूळ, तिच्यात घडलेले परिवर्तन, तिच्यावर घडलेला इतर भाषांचा परिणाम, आधुनिक प्रगती सामावून घेण्याची तिची क्षमता, इत्यादी गोष्टी पहिल्या प्रकारात येतील. तर तिचे प्रमाण रूप, तिचा विविध क्षेत्रांतील उपयोग, तिची परिभाषा, तिचा शिक्षणक्षेत्रात उपयोग, तिचे लेखन, तिची लिपी, तिचा वापर वाढवण्यासाठी करायचे उपाय, तिचा इतर भाषांशी संबंध, इत्यादी प्रश्न पुष्कळदा अत्यंत वादग्रस्त बनतात.
भाषेच्या वापरासंबंधीचा दृष्टिकोण वास्तववादी असला पाहिजे. तिची स्थानिक, वर्गनिष्ठ, संदर्भनिष्ठ, व्यवसायनिष्ठ, जातिनिष्ठ रूपे लक्षात घेऊन शुद्धाशुद्धता, उच्चनीचपणा, इत्यादी कालबाह्य आणि समाजविरोधी कल्पना टाकून दिल्या पाहिजेत. सर्वांनी एकत्र येऊन समरसतेने करायच्या गोष्टी कोणत्या आणि ज्यात ढवळाढवळ करणे योग्य नाही अशा गोष्टी कोणत्या हे समजण्याची दृष्टी विद्यार्थ्याला येईल असे आपले शिक्षण असले पाहिजे.
जग विज्ञानयुगाच्या दिशेने प्रगती करत असले तरी आपले शिक्षण अजून अज्ञानयुगातच आहे याची जाणीव आपली पाठ्यपुस्तके वाचून होते. इतिहास, भाषा, इतकेच नव्हे तर विज्ञानविषयावरली पुस्तकेसुद्धा याला अपवाद नाहीत. याला कारण या पाठ्यपुस्तकांची भाषाच नसून ती निर्माण करणाऱ्या लेखकांची संकुचित वृत्ती, सामाजिक जीवनाचे अज्ञान आणि सरकारी धोरणाचा पाठपुरावा करण्यासाठी चाललेली धडपड.

खरोखरचंच काही शिकायचं असेल तर शाळेतून बाहेर आल्यानंतर आणि त्यानंतर कॉलेजात जाऊन आल्यानंतर दहा-पंधरा वर्षांत क्रमिक पुस्तकांमधून शिकलेलं बरचंसं 'अनलर्न' करणं ही आपल्याकडे खूप कष्टाची कामगिरी बनते. आणि ते बरचंसं स्वतःचं स्वतःच करावं लागत असणार, पण तसं ते होतही नसावं म्हणून मग आपण एकूण कालेलकर म्हणतात तसे अज्ञानयुगात राहात असू.

तरीही अर्थात सगळ्यांचे सगळे व्यवहार सुरूच असतात. ते कुठल्या पातळीवरून चालतात हे तपासलं जात नसलं तरी व्यवहार चालूच असतात. त्याबद्दलही कालेलकरांचं म्हणणं आहे. पान २९वर ते म्हणतात :
भाषेचे काम व्यवहार चालू ठेवणे हे आहे, तेव्हा बदलत्या व्यवहाराबरोबर तिलाही परिवर्तनक्षम असावे लागते. साधनाचे श्रेष्ठत्व ते अधिकाधिक पूर्ण आणि उपयुक्त असण्यात आहे. म्हणजे ते गतिशील असेल किंवा गतिशील बनण्याला लागणारे धर्म त्यात असतील तरच ते टिकू शकेल. नाही तर टाकून द्यावे लागेल. समाजाची गतिशीलता भाषेला झेपली नाही तर ती भाषा मृत्युपंथाला लागली आहे असे अवश्य समजावे.
पण असे होत नाही. आपल्यात असणारी अपूर्णता भाषा अनेक मार्गांनी भरून काढण्याचा प्रयत्न करते. जुन्या संकेतांना नवे अर्थ देऊन, नवे संकेत बनवून किंवा उसने घेऊन आणि काही ठिकाणी तर आवश्यकतेच्या तीव्रतेनुसार परभाषेचा उपयोग करूनदेखील.
'एक भाषा एक समाज' हे तत्त्व नित्य व्यवहाराच्या पातळीवर खरे असले तरी सामाजिक गरजेच्या वरच्या पातळीवर कित्येकदा ते अपुरे पडते. दोन भाषा वापरू शकणारे वर्ग हीसुद्धा समाजाचीच गरज आहे. पूर्वी आपल्याला धर्मशास्त्रे जाणणाऱ्या संस्कृतज्ञ पंडितांची गरज होती, आज शास्त्रीय वाङ्मयात संपन्न असलेल्या भाषांचे ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञांची आहे.
देशाभिमानाच्या भरात आणि पुरातन संस्कृतीचे पुनरुज्जीवन व्हावे म्हणून चाललेल्या कोलाहलात एवढी एकच गोष्ट न विसरण्याचा आपण प्रयत्न करू या.
कालेलकरांच्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती ऑगस्ट १९६२मधे प्रकाशित झाली नि तिसरी मार्च १९९९मधे. पंचाहत्तर रुपयांच्या या पुस्तकात कालेलकर ज्या ज्ञानाबद्दल वरच्या परिच्छेदात बोलून गेलेत आणि त्याबद्दल न विसरण्याचा प्रयत्न करण्यासंबंधी आपल्याला सांगून गेलेत, ते आपण लक्षात ठेवलंय का? नसावं. तरीही गंमत अशी की नुसत्या बोलण्याच्या पातळीवर राहिलेल्या गोष्टी 'विसरल्या'चं नाटक करता येतं, पण लिहून ठेवलेलं असलं की त्याची लक्षात आणून देत राहाण्याची ताकद वाढते, या ताकदीच्या बळावरचं कालेलकरांचं वरचं ज्ञान आपण आजही पसरवू शकतो.
अनुभव व्यक्त करणे, जुने ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोचवणे, नवे ज्ञान शोधून काढून ते पुढे उपयोगी पडेल अशा रीतीने त्याचा संचय करणे, या गोष्टी समाजजीवनाला आवश्यक आहेत. ज्ञानगंगेचा प्रवाह अखंड चालू ठेवण्याची आणि समाजजीवन प्रगमनशील बनवण्याची ही कामगिरी भाषेला पत्करावी लागते. बदलत्या जीवनप्रवाहाचे आणि अखंड वाढत राहाणाऱ्या ज्ञानभांडाराचे चित्र रेखाटण्याच्या दृष्टीने नवे संकेत, नवे प्रयोग आणि नवे संदर्भ शोधून काढावे लागतील. तसे झाले तरच सुदृढ आणि चिरस्थायी परंपरा निर्माण होऊ शकते आणि याच कारणामुळे प्रगती इच्छिणाऱ्या प्रत्येक समाजाची भाषा बदलत्या परिस्थितीला योग्य अशा दिशेने जाऊन या परिस्थितीला अनुकूल असे रूप धारण करत असते. 
पान ११३वर कालेलकर  वरच्या परिच्छेदातलं मत व्यक्त करतात, आता त्यानंतर आपण काही बोलण्याऐवजी त्यांच्या पुस्तकातल्या शेवटच्या लेखातले शेवटचे दोन परिच्छेद देऊन ही नोंदही संपवू.
जीवनातील प्रवृत्तींची भिन्नभिन्न क्षेत्रे स्वतंत्रपणे पाहिली, त्यात कालक्रमवार आलेल्या नवनव्या शब्दांनी नटलेल्या कल्पनांचा आपण विचार करायला लागलो, तर आपली प्रगती किंवा आपल्या समाजजीवनात झालेले परिवर्तन कसकसे होत गेले याची आपल्याला जाणीव होईल. जीवन टिकवणारी, सुसह्य आणि सुदृढ बनवणारी साधने सारखी वाढत असतात; सुधारत असतात, बदलत असतात. सूर्यचंद्रांच्या प्रकाशावर जीवन आखलेल्या माणसाला आज रात्रीचा दिवस करण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे; शिकार करून कच्च्या मांसावर राहण्याचे आणि जमिनीतील कंदमुळे खणून काढून खाण्याचे दिवस जाऊन आज तो अनेक प्रकारचे अन्न उत्पन्न करू शकतो आहे; निसर्गाने दिलेले दोन पाय नेतील त्यापेक्षा अधिक मजल मारू न शकणारा माणूस आज अंतराळात कुठपर्यंत जाऊ शकेल याचा तर्क करणेही कठीण झाले आहे.
साधनसमृद्धीच्या या प्रयत्नांतून होणारी प्रगती संग्रहित करून विनिमयासाठी व्यक्त करू शकणाऱ्या भाषेने त्याला साथ दिलेली आहे. गुहेत राहून तिच्या आसपास फिरणाऱ्या माणसाबरोबर ती जन्माला आली आणि आज विराट विश्वाचे दर्शन घेण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या नवमानवाबरोबर ती तितकीच वाढली आहे. शास्त्रीय संशोधनात अग्रेसर अशा ज्या समाजांतून विश्व पादाक्रांत करण्याचे हे प्रयत्न होत आहेत त्या समाजाची भाषा त्या दिशेने समृद्ध होत पुढे चालली आहे. ज्या समाजांजवळ ही झेप नाही त्यांना या आघाडीवर असलेल्या समाजांच्या भाषा आत्मसात केल्यावाचून गत्यंतर नाही. कारण केवळ आपल्या संस्कृतीच्या साधनावर अवलंबून राहून आजच्या क्रांतियुगात आपला निभाव लागणार नाही. एक नवी विश्वसंस्कृती आपणा सर्वांना एकत्र आणू पाहत आहे. तिचे योग्य ज्ञान होण्यासाठी तिला प्रभावी रीतीने व्यक्त करणारी एखादी तरी भाषा आपल्याला शिकावीच लागेल, कारण जीवनाचे नवे अनुभव स्वतःमध्ये साठवून ते व्यक्त करण्याच्या दृष्टीने आणि ज्ञानमार्गावर मानवाची ज्या वेगाने प्रगती होत आहे तिच्या तुलनेने आज कोणतीही भारतीय भाषा समर्थ आहे असे वाटत नाही.
पान १२०


***

1 comment:

  1. ज्ञानमार्गावर मानवाची ज्या वेगाने प्रगती होत आहे तिच्या तुलनेने आज कोणतीही भारतीय भाषा समर्थ आहे असे वाटत नाही. every one knows this very well but langugage is above all politics...and hence useful!....Kalelkar's books are very good and still very relevant....

    ReplyDelete