इतर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इतर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२८ जुलै २०१२

परिणामांची पर्वा नाही केली कधी : वहिदा रेहमान

नवी दिल्लीतल्या 'इंडिया हॅबिटॅट सेंटर'मध्ये नुकताच एक चित्रपटांचा उत्सव झाला. या उत्सवाचा विषय होता वहिदा रेहमान यांचे चित्रपट. वहिदा रेहमानबद्दल फारसं काही बोलायला नको आपण उगीचच.

एक या पोस्टच्या निमित्ताने आपल्या इतर ब्लॉगची थोडी जाहिरात करू. भाऊ पाध्यांवरच्या ब्लॉगची लिंक 'रेघे'वर उजव्या बाजूच्या समासातल्या 'इतर काही गोष्टीं'मध्ये आहे. त्यातल्या एका पोस्टमध्ये भाऊ स्वतःची ओळख करून देतायंत. त्यात आपल्या आवडत्या गोष्टी ते अशा सांगतात- ''बीअर, टेबल-टेनिस आणि वहिदा रेहमान या आवडत्या गोष्टी. (दुर्दैवाने या तिन्ही गोष्टींपर्यंत माझा हात पोहोचूं शकणार नाहीं.)'' जाहिरात एवढीच.

'द हिंदू'वाल्यांनी त्यांच्या आजच्या 'शनिवारच्या मुलाखती'मध्ये वहिदाबाईंची मुलाखत घेतलेय.

बघा हे तुम्हाला कसं वाटतंय. मुलाखतीतला थोडासा भाग भाषांतर करून खाली दिलाय. आपला हातही एका मर्यादेपलीकडे पोचू शकणार नसला तरी, वहिदा रेहमान तर तुम्हाला माहितीच असेल...
***

वहिदा रेहमान
तुम्ही जेव्हा चित्रपटसृष्टीत आलात तेव्हा तत्कालीन नाट्यमय शैलीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न केलेल्या पहिल्यावहिल्या कलाकारांपैकी तुम्ही एक होतात.
- तशी मी पहिली नव्हते. माझ्या आधी नर्गीस आणि गीता बाली यांनीही नाट्यमय शैलीच्या बंधनं तोडली होती. हां, माझा अभिनय शैलीबद्ध नव्हता. मी कायम संयमित अभिनय करायचे, कदाचित मी कधीच अभिनयाचं शिक्षण घेतलं नव्हतं म्हणून असेल. मला वाटायचं की, सगळ्यांत चांगला मार्ग मी ते जाणवून घ्यावं नि करून टाकावं. आणि जेव्हा तुम्ही ते जाणवून घेता तेव्हा भावना नैसर्गिकपणे दिसू लागतात. गुलाबो (प्यासा) लोकांना आवडली आणि मला वेगवेगळ्या भूमिका मिळायला लागल्या. मला जर कथा आवडली तर माझ्यासमोर दृश्य कसं असेल ते उभं राहायचं, हे पात्र असेल आणि मला हे करायचंय हे स्पष्ट व्हायचं. एखादं पात्र साकारण्याचे काय परिणाम होतील याचा मी कधी विचार केला नाही.

तुम्ही साकारलेल्या अनेक भूमिका त्या काळात 'सुरक्षित' मानल्या जात नव्हत्या.
चांगल्या कलाकाराला कोणत्याही प्रकारची भूमिका साकारता यायला हवी असा माझा दृष्टिकोन होता. 'गाईड' माझ्या हृदयात कायमचा बसलाय त्याचं कारण हे आहे की, रोझी हे खूप प्रगल्भ पात्र होतं. तिचं लग्न मार्कोशी झालेलं आणि तरी ती राजूबरोबर 'लिव्ह-इन रिलेशनशिप' स्वीकारते. अनेक निर्मात्यांनी ती नकारात्मक भूमिका असल्याचं म्हटलं, माझ्या कारकिर्दीच्या त्या टप्प्यावर चुकलेलं पाऊल असल्याचं सांगत मी ते करू नये असंही काहींनी सुचवलं, पण माझ्यासाठी भूमिका ही भूमिका होती. पण कधीकधी आपलं व्यक्तिमत्त्व आड येतं हे खरं. म्हणजे, तुम्ही जर मी जर मीनाकुमारीला या भूमिकेसाठी विचारणा केली असतीत तर तिने त्यासाठी पूर्ण प्रयत्न केला असता, पण ते ती महान अभिनेत्री आहे म्हणून; पण तिला ही भूमिका शोभली नसती. तसंच, जर कोणी मला 'मनोरंजन'मध्ये (झीनत अमान) भमिकेसाठी विचारलं असतं तर मी ते करू शकले नसते. मला 'साहिब, बिबी और गुलाम'मध्ये बिबीची भूमिका करायची होती, पण गुरदत्तना मी त्या भूमिकेसाठी खूप लहान वाटले. मी त्या कपड्यांमध्ये फोटोशूटही करून घेतलं होतं, पण नंतर तेच बरोबर होते ते मला पटलं. नंतर दिग्दर्शक अब्रार अल्वी जब्बाची भूमिका घेऊन आले. तीही मला आवडली. गुरुदत्तनी ती दुय्यम भूमिका असल्याकडे निर्देश केला, पण मी त्यांचं ऐकलं नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर.. 'साहिब, बिबी और गुलाम' जेवढा छोटी बहूसाठी आठवला जातो तितकाच जब्बासाठीही आठवला जातो.

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांना पुढे आणण्यात तुमचा वाटा मोठा होता.
- 'खामोशी' आधीच बंगालीमध्ये बनला होता आणि तो हिंदीमध्ये पुन्हा बनवला जावा अशी माझी इच्छा होती. मी हेमंत कुमार (निर्माता-संगीतकार) यांना विचारलं, पण ते म्हणाले की, ह्या अभिनेत्रीची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात कोणीही प्रस्थापित अभिनेता काम करायला धजणार नाही. त्यांचं म्हणणं बरोबर होतं, कारण सगळ्याचं मोठ्या नावांनी नकार दिला. त्यानंतर मी विचारलं, तुम्ही राजेश खन्नाला संधी देऊन का बघत नाही? मी फक्त 'आखरी खत' पाहिला होता आणि त्याचे डोळे खूपच बोलके असल्याचं मला वाटलं होतं. पण तो नवखा असल्याचं हेमंत कुमारांचं म्हणणं होतं. मी म्हटलं, एकेकाळी मीसुद्धा नवखीच होते आणि मी देवआनंदच्या चित्रपटातून पदार्पण केलं. अशी राजेश खन्नाची निवड झाली. अमिताभ बच्चनचं सांगायचं तर, मी त्याच्याबरोबर 'रेश्मा और शेरा'मध्ये काम केलं होतं; त्यात त्याची भूमिका मुक्या पात्राची होती. त्या चित्रीकरणादरम्यान मला लक्षात आलं की, तो डोळ्यांनी खूप बोलतो. त्याच वेळी त्याने 'भूवन शोम'साठी निवेदन केलं. हा मुलगा भन्नाट असल्याचं मला जाणवलं. चांगला अभिनेता होण्यासाठी आवश्यक दोनही गुण त्याच्याकडे होते : आवाज आणि अभिव्यक्तीही. हा मुलगा खूप पुढे जाईल असं मी सुनील दत्तला म्हटलं होतं.
***

पिया तोसे नैना लागे रे...

२२ जुलै २०१२

आपणसुद्धा अमिताभ बच्चन

- श्रीकांत सूर्यवंशी

'रानडे इन्स्टिट्यूट'च्या कॅन्टिनमध्ये चहाबरोबर श्रीकांत जे बोलता बोलता बोलला ते हे.
बोललेलं कागदावर उतरवता येतं का बघ, अशी विनंती श्रीकांतला केली. त्याने ती मान्य केली नि टीपण लिहिलं. ते टीपण इकडे 'रेघे'वर आणून बसवलं- असं या टीपणाचं स्वरूप आहे. गप्पांना जे रूप असू शकतं, ज्या पद्धतीने त्या गप्पांचा प्रवास होतो त्याच पद्धतीने हा मजकूर मुद्दामहून लिहिला आहे. खरंतर झाल्या त्या गप्पाच अशा होत्या. त्यामुळे समोरचा बोलताना तुम्ही जसं ऐकत असाल तसंच हा मजकूर ऐका..
नि चहा मागवा लवकर-
***

आपण असेच्या असे दुसऱ्याच्या शरीरात घुसू शकलो तर बदल होईल.
म्हणजे 'बदल' याचा आपला अर्थ आपल्या सारखंच जग असावं.
तसं तर होऊ शकत नाही.

बदल म्हणजे काय?
चांगल्या अर्थानं नि स्वतःच्या आनंदासाठी, सुखासाठी, शांततेसाठी मला माझ्या वागण्यातली एखादी गोष्ट बदलावी असं वाटतं.
का?
कारण- त्यातला फोलपणा कळतो. त्याची निरुपयुक्तता कळते (स्वतःसाठीची आणि जगासाठीची). त्याच्या मर्यादा कळतात. अजून अनेक कारणं असू शकतात.
हे कळल्यावर आपल्या 'अनुभवाचे बोल' दुसऱ्याला सांगितले तर ते कळतीलच असं नाही. ते कळण्यासाठी काय करावं लागेल?
'कंट्रोल सी - कंट्रोल व्ही' आपल्याला का लागू होत नाही?

'हम जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती है'
अमिताभ बच्चन - आजच्या काळातलं आदर्श व्यक्तिमत्त्व.
तर, आपल्या दृष्टीने आपण 'अमिताभ बच्चन'च असतो. म्हणजे 'अमिताभ बच्चन' म्हटल्यावर आपल्या मनात जे येईल अत्युच्च कायतरी, तर तसेच आपण सगळेच असतो स्वतःसाठी. त्यामुळे आपल्यासारखं जग व्हावं असं वाटतं. पण तसं होत नाही ना..
अशा ठिकाणी कॉपी-पेस्ट होऊ शकत नाही.

आता, 'फेसबुक' घ्या.
माणसाचं असणं
हसणं
राहाणं
वागणं
बोलणं
खाणं
सगळं हरपून 'फेसबुक'वर असतात म्हणे.
हा बालिशपणा आहे का? म्हणजे मोठ्या माणसानं लहान मुलासारखं वागणं.
पण परत एकदा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक समजांचा भाग. आपण आपलं मत दुसऱ्यावर लादू शकत नाही. म्हणजे आपण आपला 'अमिताभ बच्चन'पणा दुसऱ्यांवर लादू शकत नाही.

मग अशा परिस्थिती आपण / मी कसं वागायचं?
आपल्याला जमेल तसं वागायचं का?
आपलं आपलं राहायचं का?
आपल्याला आवडेल तसं राह्यचं का?
तर ते आपलं आपणच ठरवावं.

जगाला शहाणं करण्यासाठी आपण जन्मलो नसून, आपण आपलं शहाणं झालं तरी या जन्माचं काही तरी केलं / झालं / होईल असं मानायला हरकत नाही.
(इथं 'शहाणं' म्हणजे काय, याचा प्रत्येकानं त्याच्या त्याच्या पद्धतीनं विचार करावा आणि ठरवावं.)

आणि इथं आपण आपली अक्कल पाजळणाऱ्यांपैकी एक आहोत का? का तसे होत आहोत, हेही तपासणं गरजेचं ठरेल.
निघतो मी.

२० जुलै २०१२

संस्कृती, शेती नि सुट्ट्या

- प्रा. सोपान बोराटे, भुसावळ

हल्लीच्या युवक पिढीबद्दल एक तक्रार अशी की, त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल काही वाटतच नाही. आपले सण, उत्सव हल्ली विसरले जातायेत. आपलं गाव, आपली माणसं याबद्दल त्यांना आत्मियताच वाटत नाही.
वरवर पाहता ही तक्रार खरी वाटेलही. पण हे असं का होतंय याचा विचार केला तर आपलं नेमकं कुठे चुकतंय ते लक्षात येईल.

यांत्रिकीकरणाचा एक अपरिहार्य परिणाम असा होतो की, त्यामुळे समानता निर्माण होते, विविधता नष्ट होते. परिणामतः ज्यांना यांत्रिकीकरणाचे फायदे हवे आहे, त्यांना विविधता म्हणजेच स्वतःचे खासपण, वेगळेपणा त्यांची इच्छा असो अथवा नसो सोडून द्यावेच लागते. इथे आपण हे विसरतो की, दर दहा-बाहा मैलांवर भाषा बदलते, भाषा बदलली की संस्कृती बदलते, संस्कृती बदलली की चालीरिती बदलतात. अशा बदललेल्या माणसांसाठी त्यांच्यातील माणूसपण जपून विविधता सांभाळावी लागते. पण हल्ली तसे होतंच असं नाही.

आधुनिकतेच्या नावाखाली, जागतिकीकरण, उदारीकरणाच्या नावाखाली आम्ही संगणकाच्या माध्यमातून समानता आणू पाहातोय. त्यातील एक साधे उदाहरण म्हणजे सर्वत्र (सध्या राज्यभर आणि उद्या-परवा कदाचित संपूर्ण देशात) सुट्ट्या समान असतील. सर्व शाळा एकाच दिवशी सुरू होतील, एकाच दिवशी बंद होतील. सध्या याचा परिणाम असा दिसतोय की, स्थानिक संस्कृतीचा विचार करता जेव्हा सुटी हवी तेव्ही ती नसते. परिणामी विद्यार्थी जेव्हा घरात, गावात तो सण-उत्सव साजरा करण्यासाठी, त्याची पूर्वतयारी करण्यासाठी घरात हवा तेव्हा तो शाळा-महाविद्यालयात असतो. परिणामी संस्कृतीचा संस्कार त्याच्यावर पुरेसा होत नाही.

कधी कधी सुटी हवी असे विद्यार्थ्यांना वाटते, पण नियमात नसते. मग विद्यार्थी 'कॉमन ऑफ' घेतात. परिणामी शाळा भरते पण उपयोग शून्य!

फोटोचे हक्क 'रेघे'कडेच आहेत.
मग, हे टाळण्यासाठी असं काही करता येईल का? ज्यामध्ये एक समान सूत्र असं असेल की, वर्षातून किती दिवस शैक्षणिक संस्थांचे शैक्षणिक कामकाज चालावे हे शासन ठरवेल आणि कोणत्या सुट्ट्या गरजेच्या हे स्थानिक प्रशासन (ग्राम शिक्षण समिती, तालुका शिक्षण समिती, जिल्हा शिक्षण समिती) ठरवेल आणि त्याच सुट्ट्या घेतल्या जातील. नियमानुसार असणाऱ्या पण अनावश्यक सुट्ट्या टाळल्या जातील. आणि आवश्यक असणाऱ्या पण नियमात नसणाऱ्या सुट्ट्या दिल्या जातील. अशा सुट्ट्यांचे प्रमाण जास्त असावे; मात्र वर्षाचे, प्रत्येक सत्राचे एकूण अध्यापनाचे दिवस पूर्ण भरायलाच हवेत. त्यामुळे स्थानिक गरजाधारित सुट्ट्या घेता येतील. विद्यार्थ्यांना संस्कृतीशी जोडता येईल. त्यांना त्यांची संस्कृती समजेल. तिचा आदर राखणे जमेल.

भारत हा कृषिप्रधान देश म्हणतात. पण शाळा आणि शेतीचे वेळापत्रकच असं असतं की, जेव्हा शेतीत मनुष्यबळाची गरज तेव्हा शेतकऱ्याची तरुण मुलं शाळेत, परीक्षेच्या पूर्वतयारीत व्यस्त असतात. मुलांना शेतीकामात गुंतवावे तर अभ्यास होत नाही आणि अभ्यास करत राहिले तर शेती कामाला माणसं मिळत नाहीत. (साधारण गहू, ज्वारीची सुगी आणि दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा यांचा विचार करावा.) मग माझ्या शेतीतले काम माझे नाही, माझ्यासाठी नाही. मी दुसरीकडे नोकरी शोधायची आणि घरात, शेतीत सालदार मिळवण्यासाठी धडपड चालू! परिणामी हल्ली एक भयावह चित्र खेड्यांमध्ये दिसेल - एकीकडे शासनाकडे नोकरी मागणारी, बेरोजगार भत्ता मागणारी सुशिक्षितांची फौज दिसेल आणि त्याच वेळी शेतीकामाला मजूर मिळत नाही म्हणून अगतिकपणे यांत्रिकीकरणाकडे वळणारा शेतकरी दिसेल. परिणाम? औषधीकरण, रासायनिक शेती - जिचे दुष्परिणाम सध्या आपण भोगतोय. म्हणून सेंद्रीय शेतीचा ओढा वाढतोय.

हे टाळण्यासाठी आमच्या परीक्षा, समारंभ, सत्रसमाप्ती शेतीच्या सुगीच्या हंगामाशी निगडीत करता येईल का? त्यामुळे शेतकऱ्यांना खरी मनुष्यबळाची गरज असताना शेतकऱ्यांची शिकणारी मुलं शेतीकामासाठी घरात उपलब्ध होतील, तरीही त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. हल्ली फेब्रुवारी, मार्च, एप्रिल विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा हंगाम तर, पालक-शेतकऱ्यांचा शेतीचा हंगाम. दोघंही एकमेकांना इच्छा असूनही मदत करू शकत नाहीत. आणि उन्हाळ्यात सुगीही संपते आणि अभ्यासही! मग दोघंही मोकळे!

***
प्रा. सोपान बोराटे,
मानसशास्त्र विभाग,
श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालय,
भुसावळ.