नवी दिल्लीतल्या 'इंडिया हॅबिटॅट सेंटर'मध्ये नुकताच एक चित्रपटांचा उत्सव झाला. या उत्सवाचा विषय होता वहिदा रेहमान यांचे चित्रपट. वहिदा रेहमानबद्दल फारसं काही बोलायला नको आपण उगीचच.
एक या पोस्टच्या निमित्ताने आपल्या इतर ब्लॉगची थोडी जाहिरात करू. भाऊ पाध्यांवरच्या ब्लॉगची लिंक 'रेघे'वर उजव्या बाजूच्या समासातल्या 'इतर काही गोष्टीं'मध्ये आहे. त्यातल्या एका पोस्टमध्ये भाऊ स्वतःची ओळख करून देतायंत. त्यात आपल्या आवडत्या गोष्टी ते अशा सांगतात- ''बीअर, टेबल-टेनिस आणि वहिदा रेहमान या आवडत्या गोष्टी. (दुर्दैवाने या तिन्ही गोष्टींपर्यंत माझा हात पोहोचूं शकणार नाहीं.)'' जाहिरात एवढीच.
'द हिंदू'वाल्यांनी त्यांच्या आजच्या 'शनिवारच्या मुलाखती'मध्ये वहिदाबाईंची मुलाखत घेतलेय.
बघा हे तुम्हाला कसं वाटतंय. मुलाखतीतला थोडासा भाग भाषांतर करून खाली दिलाय. आपला हातही एका मर्यादेपलीकडे पोचू शकणार नसला तरी, वहिदा रेहमान तर तुम्हाला माहितीच असेल...
***
![]() |
वहिदा रेहमान |
- तशी मी पहिली नव्हते. माझ्या आधी नर्गीस आणि गीता बाली यांनीही नाट्यमय शैलीच्या बंधनं तोडली होती. हां, माझा अभिनय शैलीबद्ध नव्हता. मी कायम संयमित अभिनय करायचे, कदाचित मी कधीच अभिनयाचं शिक्षण घेतलं नव्हतं म्हणून असेल. मला वाटायचं की, सगळ्यांत चांगला मार्ग मी ते जाणवून घ्यावं नि करून टाकावं. आणि जेव्हा तुम्ही ते जाणवून घेता तेव्हा भावना नैसर्गिकपणे दिसू लागतात. गुलाबो (प्यासा) लोकांना आवडली आणि मला वेगवेगळ्या भूमिका मिळायला लागल्या. मला जर कथा आवडली तर माझ्यासमोर दृश्य कसं असेल ते उभं राहायचं, हे पात्र असेल आणि मला हे करायचंय हे स्पष्ट व्हायचं. एखादं पात्र साकारण्याचे काय परिणाम होतील याचा मी कधी विचार केला नाही.
तुम्ही साकारलेल्या अनेक भूमिका त्या काळात 'सुरक्षित' मानल्या जात नव्हत्या.
चांगल्या कलाकाराला कोणत्याही प्रकारची भूमिका साकारता यायला हवी असा माझा दृष्टिकोन होता. 'गाईड' माझ्या हृदयात कायमचा बसलाय त्याचं कारण हे आहे की, रोझी हे खूप प्रगल्भ पात्र होतं. तिचं लग्न मार्कोशी झालेलं आणि तरी ती राजूबरोबर 'लिव्ह-इन रिलेशनशिप' स्वीकारते. अनेक निर्मात्यांनी ती नकारात्मक भूमिका असल्याचं म्हटलं, माझ्या कारकिर्दीच्या त्या टप्प्यावर चुकलेलं पाऊल असल्याचं सांगत मी ते करू नये असंही काहींनी सुचवलं, पण माझ्यासाठी भूमिका ही भूमिका होती. पण कधीकधी आपलं व्यक्तिमत्त्व आड येतं हे खरं. म्हणजे, तुम्ही जर मी जर मीनाकुमारीला या भूमिकेसाठी विचारणा केली असतीत तर तिने त्यासाठी पूर्ण प्रयत्न केला असता, पण ते ती महान अभिनेत्री आहे म्हणून; पण तिला ही भूमिका शोभली नसती. तसंच, जर कोणी मला 'मनोरंजन'मध्ये (झीनत अमान) भमिकेसाठी विचारलं असतं तर मी ते करू शकले नसते. मला 'साहिब, बिबी और गुलाम'मध्ये बिबीची भूमिका करायची होती, पण गुरदत्तना मी त्या भूमिकेसाठी खूप लहान वाटले. मी त्या कपड्यांमध्ये फोटोशूटही करून घेतलं होतं, पण नंतर तेच बरोबर होते ते मला पटलं. नंतर दिग्दर्शक अब्रार अल्वी जब्बाची भूमिका घेऊन आले. तीही मला आवडली. गुरुदत्तनी ती दुय्यम भूमिका असल्याकडे निर्देश केला, पण मी त्यांचं ऐकलं नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर.. 'साहिब, बिबी और गुलाम' जेवढा छोटी बहूसाठी आठवला जातो तितकाच जब्बासाठीही आठवला जातो.
राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांना पुढे आणण्यात तुमचा वाटा मोठा होता.
- 'खामोशी' आधीच बंगालीमध्ये बनला होता आणि तो हिंदीमध्ये पुन्हा बनवला जावा अशी माझी इच्छा होती. मी हेमंत कुमार (निर्माता-संगीतकार) यांना विचारलं, पण ते म्हणाले की, ह्या अभिनेत्रीची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात कोणीही प्रस्थापित अभिनेता काम करायला धजणार नाही. त्यांचं म्हणणं बरोबर होतं, कारण सगळ्याचं मोठ्या नावांनी नकार दिला. त्यानंतर मी विचारलं, तुम्ही राजेश खन्नाला संधी देऊन का बघत नाही? मी फक्त 'आखरी खत' पाहिला होता आणि त्याचे डोळे खूपच बोलके असल्याचं मला वाटलं होतं. पण तो नवखा असल्याचं हेमंत कुमारांचं म्हणणं होतं. मी म्हटलं, एकेकाळी मीसुद्धा नवखीच होते आणि मी देवआनंदच्या चित्रपटातून पदार्पण केलं. अशी राजेश खन्नाची निवड झाली. अमिताभ बच्चनचं सांगायचं तर, मी त्याच्याबरोबर 'रेश्मा और शेरा'मध्ये काम केलं होतं; त्यात त्याची भूमिका मुक्या पात्राची होती. त्या चित्रीकरणादरम्यान मला लक्षात आलं की, तो डोळ्यांनी खूप बोलतो. त्याच वेळी त्याने 'भूवन शोम'साठी निवेदन केलं. हा मुलगा भन्नाट असल्याचं मला जाणवलं. चांगला अभिनेता होण्यासाठी आवश्यक दोनही गुण त्याच्याकडे होते : आवाज आणि अभिव्यक्तीही. हा मुलगा खूप पुढे जाईल असं मी सुनील दत्तला म्हटलं होतं.
***
पिया तोसे नैना लागे रे...