Sunday 25 August 2013

नरेंद्र दाभोलकर : दुसरी नोंद । डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकहितवादी

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर आपण एक नोंद 'रेघे'वर केली. दाभोलकरांचं जाणं ज्या धक्कादायक प्रकारे झालं, त्या धक्क्याचा भाग म्हणून म्हणा किंवा आपलीच गरज म्हणून म्हणा, त्यासंबंधी आणखी काही नोंदी करण्याचा प्रयत्न 'रेघे'वर होणार आहे. या प्रयत्नाला एका व्यक्तीच्या डोक्याची मर्यादा असल्यामुळे जरा समजून घ्या. पण हे प्रयत्न आवश्यक वाटतायंत, कारण तात्कालिक तथ्यांच्या बातम्या नि चर्चा करण्यापोटी आपल्या अगदी प्राथमिक शांत विवेकीपणाचाही बोऱ्या वाजल्यासारखं दिसतंय नि कंटाळा येतोय. म्हणून-

तर, दाभोलकरांच्या हत्येसंबंधीच्या बातम्यांमधून, चर्चांमधून 'पुरोगामी महाराष्ट्र' हे शब्द किती वेळा वापरले गेले, हे शोधायला हवं. विवेकवाद, पुरोगामी चळवळ, असेही काही शब्द वापरले गेले. सध्याच्या गदारोळातल्या बातम्यांपुरते आणि चर्चांपुरते हे शब्द कसेही वापरले जाणार आणि आपणही त्या शब्दांचे अर्थ कळवून घेतलेत असंही कदाचित वाटू लागेल. पण शब्दांचे अर्थ खूप वर्षांच्या घडामोडींनी तयार होत असावेत बहुधा. त्यामुळे आपण त्या दृष्टीने काही खटपट करता येते का पाहू. दाभोलकरांवरच्या नोंदीत त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधीचं एक म्हणणं नोंदवलेलं, त्यात त्यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या 'सत्यशोधकी कर्मा'चा उल्लेख केलाय आणि स्वतःला त्या कर्माच्या परंपरेशी जोडून घेतलंय.

या कर्मासंबंधी जरा तपासणी करण्यासाठी आपण आंबेडकरांच्या पत्रकारितेमध्ये जाऊ. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता : १९२० ते १९२८' असा खंड महाराष्ट्र सरकारने २००५ साली प्रकाशित केलेला आहे. त्यावरून आणि थोडीशी स्वतंत्रपणे आपल्याला काही माहिती मिळते. बाबासाहेबांनी १९२०मध्ये 'मूकनायक' असं एक पाक्षिक सुरू केलं होतं. 'मूकनायका'ची सुरुवात करताना आंबेडकरांनी लिहिलेलं : बहिष्कृतांच्या 'अतिबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील. ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे'. 'मूकनायक' लगेचंच बंद पडलं, मग आंबेडकरांनी 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक ३ एप्रिल १९२६ रोजी सुरू केलं. ही दोन्ही फारच कमी काळ सुरू राहू शकलेली पत्रं होती. यातल्या मुख्यत्त्वे 'बहिष्कृत भारत'मधलं लिखाण आपण उल्लेख केलेल्या खंडात आहे.

आता आपण आपल्या वरती नोंदवलेल्या 'सत्यशोधकी कर्म' या शब्दांकडे आणि त्यासंबंधीच्या अर्थाकडे आणि त्याच्या परंपरेकडे येऊ. आंबेडकरांनी 'बहिष्कृत भारत' पाक्षिकाच्या ७ डिसेंबर १९२८च्या अंकापासून लोकहितवादींच्या शतपत्रांचं पुनर्मुद्रण केलं होतं. या पुनर्मुद्रणामागची भूमिका त्यांनी त्याच अंकात स्पष्ट केलेली. ही भूमिका आपल्याला महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या सोबतच्या खंडात मिळते. ही भूमिका आपण खाली नोंदवू, कारण नोंदीच्या सुरुवातीला आपण जे खूप वर्षांच्या घडामोडींनी तयार होणारे अर्थ असं म्हटलं त्याचा काही अंदाज आंबेडकरांनी लिहिलेल्या या मजकुरावरून येऊ शकेल. एकूण रेषा फारच मोठी निघेल, आपण फक्त त्यातला एक बिंदूच नोंदवतोय. मजकूर प्रसिद्ध झाला त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं व काळ सुमारे नव्वद वर्षं मागचा आहे हे लक्षात घेऊन हा मजकूर वाचू. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समिती
या अंकापासून आम्ही सुप्रसिद्ध लेखक गोपाळराव हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांच्या पत्रांचे पुनर्मुद्रण सुरू केलें आहे. सरळ व असंदिग्ध भाषा, सडेतोड विचारसरणी व भरीव व्यवहारज्ञान हे लोकहितवादींच्या लिखाणाचे विशिष्ट गुण आहेत. तत्त्वज्ञानाच्या निष्फळ गप्पांनी व तर्कशास्त्रांच्या शब्दावडंबरी लपंडावांनी लोकांना भुलविण्या-झुलविण्याच्या भरीस लोकहितवादी कधीच पडले नाहीत. आपल्या सामाजिक व्यवहारांतील रोजच्या प्रसंगावर व त्यांच्या मागे असलेल्या भावभावनांवर त्यांनी लिहिले आहे, आणि त्यांचे लिखाण अत्यंत स्पष्टोक्तीपूर्ण, निर्भीड व हृदयस्पर्शी आहे. भूतकालीन 'रामराज्या'पेक्षा आजच्या सामाजिक आचारविचारांतील दोष हेच त्यांच्या लिखाणाचे मुख्य विषय असल्याचे दिसून येईल. लोकमान्यता मिळवायची असेल तर आपल्या दोषांचाही गुण म्हणून उदोउदो करणे व परकियांच्या गुणांनाही दोष म्हणून त्याज्य ठरविणे, हा मार्ग आहे. पण लोकहितवादींनी हा मार्ग कधीच अनुसरला नाही. आपल्या दोषांचे त्यांनी कठोरपणे आविष्करण केले व तसे करताना अमके नाराज होतील अगर तमक्यांची मने दुखावतील याविषयी त्यांनी पर्वा केली नाही.

जुन्या घातक रूढी, जरीपुराण्या टाकाऊ कल्पना व समजुती, धार्मिक दुराग्रह, व ढोंगीपणा इत्यादी विषयांवरही लोकहितवादींनी सडेतोड लेख लिहिले आहेत; व ते सर्वांना मार्गदर्शक होतील असेच आहेत. सर्व ठिकाणी सत्यान्वेषी बुद्धी व सारासार विचारशक्ती जागृत पाहिजे, ही लोकहितवादींची मुख्य शिकवण आहे. लोकहितवादींची परंपरा जर महाराष्ट्रात चालली असती तर आपले सामाजिक प्रश्न आजच्या इतके सोडविण्याला कठीण होऊन बसले नसते. पण दुर्दैवाने टिळक-चिपळूणकर परंपरा टाळ्यांच्या कडकडाटांत पुढे आली, व लोकहितवादींची धिम्मी व कार्यक्षम परंपरा मागे पडली. याचे परिणाम आजवर महाराष्ट्राने भोगले आहेत, व अजूनही त्यांतून त्याची सुटका झाली नाही. असो, लोकहितवादींनी ७५ वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजच्या परिस्थितीतही उपयुक्त असेच आहेत. आमच्या वाचकांना ते मार्गदर्शक होतील असे वाटल्यावरूनच आम्ही तत्प्रकाशनाचे कार्य सुरू केले आहे.
***
लोकहितवादी (१८ फेब्रुवारी १८२३-९ ऑक्टोबर १८९२) : मराठी विश्वकोशातली नोंद.

5 comments:

  1. What about Shahane's scathing comments on Lokahitwadi in Napeksha ? He hasn't spared Tilak either.

    ReplyDelete
    Replies
    1. Anonymous,

      Thanks for commeting. I am trying to put forward my argument.

      Shahane says this in Napeksha (lokvangmaya griha, April 2005, page no. 15) :
      तर आता आपण आधुनिक मराठी वाङ्मयाकडे वळू. लोकहितवादी हे आपल्याला भेटणारे पहिले गृहस्थ. त्यांच्यापासून एक नवीनच वृत्ती मराठी समाजात येऊ घातली. त्यांच्या लिखाणात प्रखर विचार आहेत असा एक दावा केला जातो. तो खोडून काढण्यात मला तरी काहीच स्वारस्य नाही. इथे आपण फक्त एकाच वस्तुस्थितीची नोंद करून घेऊया की, कीर्केगार्डच्याच काळात लोकहितवादींनी लिखाण केले आहे. कीर्केगार्डपासून युरोपमध्ये विचारांच्या क्षेत्रात एक नवीनच वृत्ती आली. कीर्केगार्डने तर्कबुद्धीला प्रचंड धक्का देणारे लिखाण हेतुपुरःसरच केले आणि आमच्या लोकहितवादींनी मात्र सबंध विचाराचा पाया केवळ बुद्धीनेच घातला जावा अशी धडपड केली. कीर्केगार्डच्या काळात लोकहितवादींनी लिहिले ही निदान आता तरी क्रूर थट्टाच वाटते.

      I don't understand how we can compare a Christian, God believing, existentialist writer from Denmark to a Brahmin Marathi writer living in a British colony! And interestingly Shahane has no interest in critisising Lokhitwadi's writing in detail and by considering the social context. He only turns towards Europe and refers to Kierkegaard. Why? I don't know. Would it be fair if somebody critisised Kierkegaard and asked him if he had read Tukaram's abhangs which were written two hundred years before and why did he repeat roughly and partially the same argument in mid 19th century?

      I am not going in detail of what Shahane says about Tilak because I agree with most of his comments on Tilak. Tilak was more of a political leader.


      Delete
    2. धन्यवाद, एक रेघ.

      या वर बहुधा कधी तरी नंतर सविस्तर.

      ब्लॉग उत्तम आहे.

      Delete
  2. hello regh..just read both the posts & comments . Interesting discussion. I wonder what do you think of Sawarkar & his books (in social context, not political)...i had opportunity to listen to mr dabholkar's interview couple of times in which he was very appreciative of savarkar's works, namely x-kirane, vidnyan-nishth nibandh....

    ReplyDelete
    Replies
    1. Aditya,

      Though I have read few of Savarkar's articles separately, I have not read Savarkar's books that you mention, so I am not in a position to comment. Sorry. And thanks for commenting.

      Delete