Thursday 23 August 2012

आठवड्याचा बाजार भरलाच नाही..

छत्तीसगढमधल्या नारायणपूर जिल्ह्यातल्या ओर्छा इथं आठवडा बाजारादरम्यान संरक्षण दलाच्या जवानांनी गावकऱ्यांना मारहाण केली. त्यापूर्वी नक्षलवाद्यांनी याच बाजारात एका जवानाला ठार मारलं. या गदारोळात पंचक्रोशीतले आठवडा बाजार काही दिवस भरलेच नाहीत नि गावकऱ्यांच्या पोटांचा खोळंबा झाला इतकंच. त्यासंबंधी तेहेलकात आलेल्या बातमीवजा लेखाच्या काही भागाचं हे भाषांतर-


छत्तीसगढ : नारायणपूर जिल्ह्यातल्या ओर्छा इथे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. स्थानिकांच्या मनात पोलीस आणि नक्षलवादी दोघांचीही भीती आहे. जंगलाच्या कायद्याने हा परिसर चालवला जातो. एक ऑगल्टला नक्षलवाद्यांनी गर्दी झालेल्या बाजारात घुसून छत्तीसगढ सशस्त्र दलाच्या (छत्तीसगढ आर्म्ड फोर्स - सीएएफ) एका जवानाला ठार केलं नि पळून गेले. हा बाजार पोलीस स्टेशनापासून हाकेच्या अंतरावर आहे. वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत, प्रत्युत्तर म्हणून जवानांनी आदिवासींवर आणि बाजारातील विक्रेत्यांवर हल्ला केला. त्यांनी आदिवासींवर नि विक्रेत्यांवर गोळीबार केला, बंदुकीच्या दस्त्याने लोकांना मारलं, बाजारातील दुकानं लुटली आणि गाड्यांना आग लावून टाकली.

ओर्छामध्ये १ ऑगस्टला आठवडा बाजारात छत्तीसगढ सशस्त्र दलाच्या जवानांनी अंदाधुंदी माजवली. (फोटो सौजन्य- अनिल मिश्रा / तेहेलका)
अभुजमाड - बस्तरमधला ४,४०० चौरस किलोमीटरचा परिसर, टेकड्या आणि गडद जंगलांनी वेढलेला, बाहेरच्या जगासाठी एक कोडं असलेला. अनुसूचित माडिया आदिवासी जमातीचं या जंगलांमध्ये वास्तव्य आहे. या परिसरातील २३७ गावांमध्ये माडिया लोक राहातात आणि प्राथमिक गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी ते ओर्छा इथे भरणाऱ्या आठवडा बाजारावर अवलंबून असतात. पण ८ ऑगस्टला लंका, आदेर, गोलेगल, तोंदाबेडा, तुतुली, आसनार, जुआदा, जगुंडा, ओर्छामेता, मार्देल अशा गावांमधून मैलांची पायपिटी करून आठवडा बाजारासाठी आलेल्या गावकऱ्यांना रिकाम्या हातांनी परत जावं लागलं.. कारण बाजार भरलाच नव्हता.

जिल्हा पोलीस दलातील ६६ जवान आणि छत्तीसगढ सशस्त्र दलाची एक तुकडी ओर्छा पोलीस स्टेन आणि कॅम्पाच्या परिसरात तैनात केली गेलेय. या परिसरातील आठवडा बाजारांमधले सोने-चांदीचे विक्रेते मनोज सोनी म्हणाले, ''गावकऱ्यांसारखेच कपडे घालून माओवादी ओर्छा बाजारात येतात हे सगळ्यांना माहीत आहे. पोलीसही त्यांना ओळखतात, पण माओवादी आणि पोलिसांच्यात एक अलिखित करार आहे - पोलीस माओवाद्यांना पकडत नाहीत आणि माओवादी ओर्छा पोलीस स्टेशन आणि कॅम्पावर हल्ला करत नाहीत. त्यामुळे जवान शस्त्रांशिवाय बाजारात येतात.''

पण, सार्केगुडा हिंसाचाराच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी २६ जुलैला काढलेल्या मोर्चावेळी सुरक्षा दलांनी गावकऱ्यांना मारहाण केली. प्रत्युत्तरादाखल १ ऑगस्टला गावकऱ्यांच्या वेषातील नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे जवान आनंद राठोड यांना कुऱ्हाडीने ठार मारलं. राठोड त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह बाजारात आले असताना दुपारी तीन वाजता ही घटना घडली.

या घटनेची बातमी इतर जवानांपर्यंत पोचली तेव्हा ते बाजारात आले आणि त्यांनी गावकऱ्यांना आणि विक्रेत्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. 'जवान कॅम्पातून बाहेर आले आणि पुढचे दोन तास ते बंदुकींमधून गोळ्या झाडत होते. त्यांनी बाजारात लुटमार केली, दिसेल त्याला क्रूरपणे मारहाण केली. काही जखमी व्यक्ती लांबच्या गावातून आले होते. सध्याच्या पावसाळी दिवसांत त्या ठिकाणी जाणं अवघड असतं, काही जण या गंभीर जखमांनी जीवालाही मुकले असतील. किमान बाजार गावकरी आणि विक्रेते पोलिसांच्या या क्रूर कृत्याने गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांनी बायका-पोरांनाही सोडलं नाही', ओर्छाच्या सरपंच चमिला बाई सांगत होत्या.

जंगलात ३१ किलोमीटर आत असलेल्या तुतुली गावातले सन्नू आणि बुधू प्रचंड पावसातून चालत आठवडा बाजारात आले तेव्हा निराश होते. त्यांच्याकडे तांदळाचा अजिबात साठा नाहीये आणि बाजार उघडत नाही तोपर्यंत त्यांना झाडांच्या मुळांवर भूक भागवावी लागणार आहे. त्यांनी सांगितलं की, परवाच्या हाणामारीत मुरुमवाडा गावातल्या वट्टे कुंजमच्या डोक्याला जबरदस्त मार बसलाय, पण त्याचे कुटुंबीय त्याला डॉक्टरांकडे न्यायला तयार नाहीयेत. कारण हॉस्पीटलमधे जायचं तर जंगलाबाहेर पडावं लागेल आणि त्यात त्यांना पोलिसांची भीती वाटतेय.

ओर्छामधले एक दुकानदार बिर्जुराम चौधरी यांचा डावा पाय पोलिसांच्या मारहाणी फ्रॅक्चर झाला, त्यामुळे त्यांना आता चालता येत नाहीये. नक्षलवाद्यांनी जवानाला कधी मारलं तेही आपल्याला माहीत नसल्याचं ते म्हणतात. 'एकदम गोळीबार सुरू झाला आणि बाजारातील वातावरण दंगलीसारखं झालं. भातबेडा गावच्या लालूला जवान मारत होते ते मी पाहिलं. त्याच्या डोक्याला मार बसलाय. नंतर त्यांनी मला धरलं आणि बेशुद्ध पडेपर्यंत मारलं', आपला डावा पाय दाखवत चौधरी सांगतलं. ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांना त्यांचं दुकान लुटलं गेल्याचं लक्षात आलं.

रेशन न मिळाल्यामुळे अभुजमाडमधल्या सरकारी शाळाही या घटनेनंतर बंद आहेत. या घटनेचे साक्षीदार असलेले शाळा-शिक्षक जयसिंग कर्मा आणि लंकेश्वर सलाम म्हणाले, ''बाजारातील सगळी वाहनं जवानांनी उद्ध्वस्त केली. मोटरसायकलींच्या पेट्रोलच्या टाक्या त्यांनी कुऱ्हाडींनी फोडल्या, टायरांवर गोळ्या झाडल्या, एक मिनी-ट्रक आणि एक गाडी जाळली.'' गुदादी इथल्या सरकारी आश्रम शाळेत तांदळाचा दाणा नसल्यामुळे शाळेतील शिपाई कमलुराम उसेन्दी चिंताग्रस्त आहेत. पन्नास मुलांची पटसंख्या असलेल्या या शाळेसाठी तांदूळ आणायला ते बाजारात गेले होते.

बाजारात हैदोस घातल्यानंतर जवानांनी ओर्छा गावावरही हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या किशन लवात्रे यांनी त्यांची जवानांनी उद्ध्वस्त केलेली मोटारसायकल दाखवली. त्यांनी पोलीस स्टेशनजवळच्या झेरॉक्स दुकानाचीही नासधूस केली. याचं तर ओर्छा पोलीस स्टेशनमधील इन्स्पेक्टर एन. एल. घ्रितलहरे यांनासुद्धा आश्चर्य वाटलं. 'पोलीस स्टेशनमधली अनेक कामं या दुकानाच्या माध्यमातून होतात. दुकानाचा मालक भानुरामने गोंधळ सुरू झाल्याचं दिसल्यावरच दुकान बंद केलं होतं, पण त्यांनी कुलूप तोडून लुटमार केली', असं त्यांनी सांगितलं. त्यांनी जेव्हा जवानांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा जवानांनी शिवीगाळ केली नि त्यांना भ्याड ठरवलं. 'बांगड्या घाल आणि खोलीत बसून राहा', असं त्यांनी घ्रितलहरेंना सांगितलं. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात पाच तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या घटनेत १४ गावकरी आणि चार जवान जखमी झाले असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, विक्रेत्यांनी नुकतीच एक बैठक घेतली असून २० ऑगस्टला सुरू झालेल्या आठवड्यात परिसरातील काही ठिकाणी आठवडा बाजार भरवावा असं त्यांनी ठरवलंय.

2 comments:

  1. परिस्थिती खूप गंभीर आहे.

    ReplyDelete
  2. pavsana zodala ani sarkarna marla tar janar konakade ,ashich hi avasta aahe.

    ReplyDelete