Friday 8 March 2013

साहिर लुधियानवी । अश्रूंची गाणी । माधव मोहोळकर

साहिर लुधियानवी (८ मार्च १९२१ - २५ ऑक्टोबर १९८०) यांची आज जयंती. त्यानिमित्त आपण 'रेघे'वर ही नोंद करत आहोत.

साहिर लुधियानवी
***

हिंदी चित्रपटांमधली गाणी आपल्याला कळू शकतात. म्हणजे शब्द सरळ कळू शकतात.

कभी खुद पें कभी हालात पें रोना आया
बात निकली तो हर एक बात पें रोना आया

हे साहिरचं म्हणणं आपल्याला कळू शकतं. मग तो मूळ चित्रपट कसाही असला, त्याचं चित्रीकरण कसंही असलं तरी त्या गाण्याचा अर्थ आपल्यापर्यंत पोचू शकतो.

कौन रोता है किसी और की ख़ातिर ए दोस्त
सब को अपनी ही किसी बात पें रोना आया
 
अशा ओळींमधून शक्य तेवढा अर्थ आपल्यापर्यंत पोचत असतो. त्यातून आपल्याला काही मिळत जातं. पण हे झालं हिंदीपुरतं मर्यादित. उर्दू ज्यांना येत असेल त्यांना साहिरमधला कवी उलगडून शोधायला खरी मजा येईल. पण आपल्याला उर्दू येत नसेल, तरी साधारण हिंदीच्या बळावर थोडीथोडी समजू शकेल, अशी अवस्था असू शकते. अशा अवस्थेत आपल्या मदतीला माधव मोहोळकर येऊ शकतात. त्यांचं 'गीतयात्री' हे पुस्तक 'मौजे'नं काढलेलं. सुंदर पुस्तक. मोहोळकर सोलापूरकडचे. नंतर मुंबईत प्राध्यापक होते. बहुधा 'गीतयात्री' नि 'मोहोळ' अशी त्यांची दोनच प्रकाशित पुस्तकं आहेत. आपली ही नोंद मोहोळकरांपेक्षा साहिरबद्दल अधिक आहे, त्यामुळे लगेचच 'गीतयात्री'मधल्या 'अश्कों में जो पाया है वो गीतों में दिया है...' या साहिरवरच्या लेखाकडे वळू. या लेखात मोहोळकर म्हणतात :

कवी आणि गीतकार ही साहिरची दोन्ही रूपं पुढं पुढं माझ्या मनात नकळत एकमेकांत मिसळून गेली होती. पण त्यानं भावजीवनात पहिल्यांदा अकस्मात प्रवेश केला तो कवी म्हणूनच. हिंदी-उर्दूचं आकर्षण नुकतंच मनात निर्माण झालं होतं असा तो काळ. चोरूनमारून पाहता येतील तितके चित्रपट पाहायचे, एखाद्या हॉटेलात बसून रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत गाणी ऐकायची आणि कुणाकडं तरी बसून मनसोक्त रेडियो ऐकायचा. त्या काळात हैद्राबादला गेलो असताना उन्हाळ्यातल्या एका रात्री सहज रेडियो लावला अन् एका उर्दू कवीचा स्वर कानात आला : ''मेरी महबूब! कहीं और मिला कर मुझसे...''

त्या कवीच्या कवितावाचनात खोटा आवेश नव्हता. जाणूनबुजून केलेले नाटकी चढउतार नव्हते. घोगऱ्या, खालच्या आवाजात तो अगदी सरळपणे कविता वाचत होता. पण त्या सरळपणातही आपण जे सांगत आहोत त्यावरचा त्याचा ठाम विश्वास जाणवत होता. साहिर आपली 'ताजमहाल' कविता वाचत होता. आपल्या प्रेयसीला वारंवार आवर्जून सांगत होता : तू दुसरीकडं कुठं तरी मला भेटत जा... ताजमहालाच्या छायेत प्रेम करावंसं वाटत नव्हतं त्याला. एकमेकांना भेटण्यासाठी संकेतस्थळ म्हणून त्याला ताजमहाल पसंत नव्हता. समोरची बाग, यमुनेचा किनारा, नक्षी कोरलेल्या संगमरवरी भिंती, सुंदर-सुंदर कमानी, या साऱ्यांचं वर्णन करून तो तिला सांगत होता :
ये चमनज़ार, ये जमना का किनारा, ये महल,
ये मुनक्कश दरो-दीवार, ये महराब, ये ताक।
इक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर,
हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक।
          मेरी महबूब! कहीं और मिला कर मुझसे।

उर्दू चांगलं येत नसल्यामुळं कवितेतला शब्द न् शब्द काही कळला नाही, पण कवितेतला भाव मात्र तीरासारखा खोलपर्यंत पोचला. खरं म्हणजे 'शहनशहाच्या मुमताजवरील अमर प्रेमाचं चिरंतन प्रतीक म्हणजे ताजमहाल', असं निबंधात वगैरे लिहायला खूप आवडायचं वय होतं ते. पण साहिरनं ताजमहालविषयीच्या साऱ्या रोमँटिक कल्पनांना हादरा दिला. त्याच्या दृष्टीनं ताजमहाल म्हणजे एका बादशहानं आपल्या संपत्तीचा उपयोग करून गरिबांच्या प्रेमाची केलेली क्रूर थट्टा! ज्यांनी खरोखरच ताजमहाल बांधला ते हजारो शोषित कलावंत जगाला अज्ञातच राहिले. ज्यांनी शहाजहानचं स्वप्न साकार केलं त्यांनीही आपल्या आयुष्यात प्रेम केलं असेलच. त्यांच्या प्रेमाची स्मारकं कुठं आहेत? त्या कबरींवर कुणी दिवा तरी लावला की नाही हेही माहीत नाही :
मेरी मेहबूब! उन्हें भी तो मोहब्बत होगी,
जिनकी सन्नाई ने बख्शी है इसे शक्ले-जमील।
उनके प्यारों के मकाबिर रहे बे-नामो-नमूद,
आज तक उनपे जलाई न किसी ने कंदील।

आपल्याच मनात कुठंतरी खोल-खोल होतं अन् आपल्यालाच माहीत नव्हतं असं काहीतरी साहिर सांगतोय, असं कविता ऐकताना राहून राहून वाटत होतं. पुढं ताजमहालवर बऱ्याच कविता वाचल्या; पण तसं कधी वाटलं नाही. तसं पाहिलं तर सुमित्रानंदन पंतांच्या 'ताज'मध्येही मानवतावादी दृष्टिकोण प्रकट झाला होता :
हाय! मृत्यु का ऐसा अमर, अपार्थिव पूजन?
जब विषण्ण, निर्जीव पड़ा हो जग का जीवन!
स्फटिक सौध में हो शृंगार मरण का शोभन,
नग्न, क्षुधातुर, वासविहीन रहें जीवित जन।

पण पंतांच्या कवितेतील प्रौढ चिंतन आणि संयमशील अभिव्यक्तीपेक्षा साहिरच्या भावुक पोटतिडिकेनं मन अधिक आकर्षून घेतलं होतं. आणि कुसुमाग्रजांच्या 'ताजमहाल'मध्ये तर
कीं कालिंदीवर करण्याला जलकेली
कुणि यक्षलोकिंची रूपगर्विता आली
          त्या नितळ दर्पणीं विवस्त्र होउनि पाही
          निज लावण्याची उसासलेली वेली
यासारख्या एकापेक्षा एक बहारदार उत्प्रेक्षांच्या लडींतच मन गुंतून पडायचं. ताजमहालच्या सौंदर्यवर्णनात कवी इतका रममाण झालेला वाटायचा, की अखेरीस कामांध शहांनी राणीवशात ओढलेल्या 'शत अनामिकांचें त्या हें कबरस्तान' या म्हणण्याचा मनावर फारसा परिणाम व्हायचा नाही. खरं सांगायचं तर त्या शेवटच्या कलाटणीपेक्षा सुरुवातीचं सौंदर्यवर्णनच मन मोहून टाकायचं. साहिर ताजमहालच्या सौंदर्यात स्वतः रमला नाही. आपली प्रतिक्रिया त्यानं तीव्रतेनं व्यक्त केली होती :
इक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर
हम गरीबों की मोहब्बत का उडाया है मजाक!

या ओळींचा त्या काळात मनावर इतका जबरदस्त परिणाम झाला होता की संधी सापडेल तिथं आम्ही त्यांचा उपयोग करत होतो. वर्गातला निबंध असो, इतिहास असो की वक्तृत्वाची चढाओढ असो, श्रोत्यांना जिंकायला तर ते आमचं हुकुमाचं पान होतं. पण पुढं पुढं त्या ओळी जरा भडक वाटायला लागल्या अन् त्या कवितेतल्या दुसऱ्याच ओळींनी पाठपुरावा करायला सुरुवात केली. त्या ओळींत साहिरनं विचारलेला प्रश्न कुणाच्याही हृदयात दीर्घ काळपर्यंत घुमत राहील असा होता :
अनगिनत लोगों ने दुनिया में मोहब्बत की है,
कौन कहता है कि सादिक न थे जज़्बे उनके?
लेकिन उनके लिए तशहीर का सामान नहीं,
क्योंकि वे लोग भी अपनी ही तरह मुफलिस थे।

... असंख्य लोकांनी जगात प्रेम केलंय. कोण म्हणतो, त्यांच्या भावना सच्च्या नव्हत्या? पण त्यांच्याजवळ जाहिरातबाजीची साधनं नव्हती; कारण ते लोकही आपल्यासारखेच कंगाल होते!

प्रेम करायला लागणारं भावनाप्रधान मन तर जवळ होतं, पण सुखी, ऐषआरामाचं आयुष्य मात्र नव्हतं अशा साऱ्याच तरुणांना साहिर हा आपला कवी वाटला होता...
 (पान ११७-११९)

मोहोळकर बोलत असताना खरंतर आपण साहिरवर वेगळं काय बोलणार असं होतं. तेवढं आपलं त्याबद्दलचं ज्ञान नाही. आपण एक सामान्य प्रेक्षक किंवा वाचक म्हणून पाहिलं तर फक्त भारावून जाता येतं. मोहोळकरांसारखे लोक मदत करतात आणि त्या भारावण्यामागचं लॉजिक थोडंसं स्पष्ट करतात. पण थोडंसंच, कारण ह्याबाबतीत पूर्ण स्पष्टता अशी काही गोष्ट असू शकणं अवघड आहे. आणि बरं हे की, केवळ कवी असण्याच्या स्थितीबद्दल भारावण्याऐवजी आपण साहिरच्या शब्दांनी भारावून जातोय. कवी असणं म्हणजे जे असेल ते साहिरच्या शब्दांना माहीत असतं. पण बहुतेकदा पोकळ शब्दच आजूबाजूला वावरत असतात आणि त्यामुळे कवीही बरेचदा पोकळ असण्याची शक्यता वाढते, आताच्या फेसबुकादींच्या शब्दचुकार, स्वप्रसिद्धीच्या काळात ही शक्यता अधिकच, त्यामुळे आपल्या स्थितीचा गवगवा जास्त, पण शब्दांची स्थिती बिकट अशी परिस्थिती होते.

आपण साहिरबद्दल बोलत होतो आणि मोहोळकरांच्या साक्षीने बोलत होतो. जग ही एक तमाम लोकांच्या सोयीने तयार झालेली गोष्ट आहे आणि अशी सोईसोईनेच ती चालत राहाते. सोईसोईनेच तिथले व्यवहार होतात. मुळात सगळ्या गोष्टी म्हणजे निव्वळ व्यवहारच बनलेल्या असतात आणि नैतिकतेचा व्यवहार, प्रामाणिकपणाचा व्यवहार, समंजसपणाचा व्यवहार, स्तुतीचा व्यवहार, कवितेचा व्यवहार, प्रेमाचा व्यवहार इत्यादी. असे हे झुंडींचे व्यवहार असतात. 'व्यवहार' या शब्दाचा आपण इथे घेतलेला अर्थ आहे तो 'सोईने केलेली कृती'. त्यामुळे साहिरच्या कवितांच्या ओळी 'सुविचारा'सारख्या 'शेअर' केल्या जातील व्यवहार म्हणून. ते सगळं जगात एकीकडे सुरू राहणार हे अगदीच पक्कं असलं तरी साहिरसारखे लेखक या सगळ्यावर आपल्यापुरती शब्दांनी मात करून ठेवतात :

ये  महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया
ये इंसान के दुश्मन समाजों की दुनिया
ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।


हर इक जिस्म घायल, हर इक रूह प्यासी
निगाहों में उलझन, दिलों में उदासी
ये दुनिया है या आलम-ए-बदहवासी
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

यहाँ इक खिलौना है इसां की हस्ती
ये बस्ती हैं मुर्दा परस्तों  की बस्ती
यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

जवानी भटकती हैं बदकार बन कर
जवान जिस्म सजते है बाज़ार बन कर
यहाँ प्यार होता है व्योपार  बन कर
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है
वफ़ा कुछ नहीं, दोस्ती कुछ नहीं है
जहाँ प्यार की कद्र कुछ नहीं है 
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

जला दो इसे फूक डालो ये दुनिया
मेरे सामने से हटा लो ये दुनिया
तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।


पण जग काही हटवलं जात नाही, आणि त्या जगाच्या व्यवहारांमधेच साहिरसारख्यांचे शब्द कायम असतात. जगाच्या बोगसपणाच्या जाणिवेची तीव्रता जितकी जास्त तितका शब्दांचा मजबूतपणा जास्त. साहिरच्या बाबतीत असे मजबूत शब्द आले कुठून याचं मोहोळकरांनी त्यांच्या मतानुसार आपल्याला सांगितलेलं उत्तर 'गीतयात्री'मधे संपूर्ण वाचता येईल. तूर्तास, गुरुदत्तच्या 'प्यासा'च्या संदर्भात या उत्तराचे धागे मोहोळकर कसे उलगडतात ते पाहू :

कवीचं मन आणि भोवतालचं जीवन यांतील विसंगती समर्थपणे शब्दांतून व्यक्त करू शकेल असाच गीतकार हवा होता 'प्यासा'साठी. नुसताच गीतकार नव्हे तर कवी वाटेल असा गीतकार! गीत लिहिणारा, पण ते गीत कविताही आहे याची जाणीव ठेवणारा. कवी विजय गातोय ते गाणं नाही तर अनुभूतीची कविता आहे, जिवंत कविता आहे, जातिवंत कविता आहे असं वाटायला लावणारा. गुरुदत्तला नुसता गीतकार नको होता, नुसता कवीही नको होता. त्याला हवा होता गीतकार कवी! पहिल्यांदा कवी, गीतकार नंतर. कवी विजयनं सामान्य गीतं गायली असती तर श्रेष्ठ कवी म्हणून तो विश्वासार्ह वाटला नसता. आणि तो श्रेष्ठ कवी जर वाटला नसता तर त्याच्या उपेक्षेचंही काही वाटलं नसतं. साहिरशिवाय दुसरा कोणीही गीतकार कवी विजयसाठी लिहू शकणार नाही हे गुरुदत्तनं ओळखलं होतं. साहिरजवळ कवी विजयचं मन होतं अन् ते जीवनही तो जगला होता. मग 'प्यासा'सारख्या चित्रपटात कवि-नायकासाठी लिहिताना त्याची प्रतिभा साहजिकच फुलून आली. गीतकार कवीत नकळत मिसळून गेला. त्याच्यासाठी त्याला वेगळं काही लिहावंच लागलं नाही. साहिरनं जे काही लिहिलं ती आत्माभिव्यक्तीच होती. 'ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है'मधली शोषित-दलित मानवजातीविषयीची आत्मीयता आणि 'इसको ही जीना कहते हैं तो यूँ ही जी लेंगे'मधली असफल प्रेमजीवनातली दारुण निराशा...

सुरुवातीपासून साहिरच्या कवितेत हेच दोन सूर लागले.
 (पान १५१)

यापुढेही मोहोळकर काही सांगतात. साहिरच्या कवितेतले हेच दोन सूर अनेक तरुण-तरुणींच्या हृदयाला भिडले. कारण जगात साहिरसारखंच हृदय असणारी, निष्ठा असणारी माणसं काही कमी नव्हती. आणि तो एकटाच काही जगावर नाराज नव्हता. त्याच्यासारखेच अनेक जण जगावर रुष्ट होते, असं ते म्हणतात.

पण तरी केवळ हृदयातली निष्ठा पुरेशी असते का हो? नसावी. कदाचित साहिरचे शब्द समजून घेण्यापुरतीच ती पुरेशी असेल, पण साहिर होण्यासाठी त्यापलीकडचंही काही लागत असेल का? हृदयातल्या निष्ठेचं आणखी काहीतरी करावं लागत असेल का? तर, याचं उत्तर 'होय' असं असावं.

नोंदीचा शेवट मात्र मोहोळकरांच्या आणि साहिरच्या शब्दांनीच व्हायला हवा :

अश्रूंतून जे मिळालं ते साहिरनं आपल्या गीतांतून, काव्यातून दिलं. जगाची तक्रार असो वा नसो, आपण तर त्याच्यावर प्रेम केलं. त्याच्या दोषांसह. ऐकलेली गाणी मधुर असतात; न ऐकलेली त्याहून मधुर. साहिरनं छेडलेले दोन्ही सूर अंतःकरणाला स्पर्श करून गेले. सुखदुःखांत साथ देऊन गेले. पण तारांवरून निसटून गेलेले सूर ऐकायला मिळाले नाहीत याची हुरहूर मनात आहेच:

अश्कों में जो पाया है वो गीतों में दिया है
इस पर भी सुना है कि ज़माने को गिला है
जो तार से निकली है वो धुन सबसे सुनी है
जो साज़ पे ग़ुजरी है वो किस दिल को पता है
(पान १५१-१५२)


मुखपृष्ठ : पद्मा सहस्त्रबुद्धे । मौज । रू. १५०/-

***

3 comments:

  1. Dwell also on the cover of Moholkar's book....Padma's green is as intriguing as some of Sahir's poetry....

    ReplyDelete
  2. गाण्यातलं काही कळत नाही. पण साहीर वैश्विक मूल्यांविषयी बोलतो..असं वाटतं. म्हणजे तात्पुरतं नाही, कायम राहिलं असं काहीतरी.
    हा खरतरं नुस्त्या 'पल दो पल' चा शायर नव्हताच.
    ''मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फ़िक्र को धुए मे उडता चला गया''
    ''तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा इन्सान कि औलाद है इन्सान बनेगा''
    अशी कितीतरी मोठी यादी देता येईल.

    ReplyDelete
  3. नवीन पुस्तकाच्या माहिती देणा-या या लेखाबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete