Wednesday 12 December 2012

बाहेर आलेली पेस्ट आता परत ट्यूबमधे कशी घालणार?

'न्यूयॉर्कर'मधून
'न्यूयॉर्कर'ने ऑक्टोबर महिन्यात 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या जैन बंधूंवर लेख प्रसिद्ध केला, त्यात 'आऊटलूक'चे आताचे संपादक कृष्ण प्रसाद यांचं एक विधान दिलंय- 'टूथपेस्ट आता बाहेर आलेली आहे, ती परत आत घालता येणार नाही.'

त्यांच्या या विधानाची पार्श्वभूमी समजण्यासाठी 'न्यूयॉर्कर'मधला पूर्ण लेख वाचावा लागेल.

समीर जैन फार बोलत नाही उघडपणे, पण विनीत जैनांनी त्यात एक विधान केलंय ते असं - 'आम्ही बातम्यांच्या व्यवसायात नाही, तर जाहिरातींच्या व्यवसायात आहोत.'

जैनांनी हे उघडपणे मान्य केलं.

याबद्दल आपण काही वेगळं बोलावं असं नाही. कृष्णप्रसाद यांनी त्यात असंही म्हटलंय की, 'प्रत्येक स्पर्धक सुरुवातीला त्रागा करतो, चिडतो आणि नंतर तेच स्वीकारतो. भाषा कुठलीही असो, भारतीय (माध्यमांच्या) बाजारातल्या प्रत्येकाकडे खूपच कमी पर्याय उरलेत.'

कॅरव्हॅन : कव्हर
'न्यूयॉर्कर'नंतर डिसेंबरमधे 'कॅरव्हॅन'नंही 'मिडिया इश्यू' काढला. त्यातही 'टाईम्स नाऊ'च्या अर्णव गोस्वामींवरच्या कव्हर-स्टोरीबरोबरच, समीर जैन यांच्याबद्दल लेख आहेच. यात गोस्वामींसोबत काम केलेल्या एका संपादकीय सहकाऱ्याने म्हटलंय, 'त्यांना बातम्यांपेक्षा टीव्हीची समज जास्त आहे. दूरचित्रवाणी माध्यमात काय चांगलं ठरेल याची ती समज आहे.' यात असंही एकाचं म्हणणं दिलंय की , 'आता इंग्रजी बातम्यांच्या वाहिन्या पाहा. हळूहळू सगळ्याच 'टाइम्स नाऊ'सारख्या दिसायला लागल्यात.'

जैनांना टाळून पुढे जाता येणार नाही, कारण त्यांच्यामागोमागच इतरांना जावं लागतंय अशी परिस्थिती आहे - हे बहुतेकांनी काढलेलं सार आहे.

'तेहेलका'मधून
झी-जिंदाल प्रकरणाच्या निमित्ताने 'तेहेलका'नेही माध्यमांच्या ह्या घडामोडींसंबंधी कव्हर-स्टोरी केली. जिंदाल यांच्या कोळशाच्या खाणींसंबंधीच्या कथित गैरव्यवहारावर बातम्या प्रसिद्ध न करण्यासाठी झी टीव्हीच्या संपादकांनी जिंदालबरोबर जाहिरातींच्या नावाखाली आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. जिंदालनी छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या व्यवहार उघडकीस आणला. या व्यवहाराच्या दोन्ही बाजू काळ्याच असल्यामुळे सगळंच अवघड.

यात 'तेहेलका'च्या व्यवस्थापकीय संपादिका शोमा चौधरी म्हणतात, 'या प्रकरणावरून बेडकाची एक जुनी रूपककथा आठवते. आपण ज्या पाण्यात पोहतोय, ते संथपणे गरम होतंय याचं भान ठेवलं नाही तर एक वेळ अशी येते जेव्हा आपण पूर्णच भाजून गेलेलो असतो.'

'तेहेलकात'ल्या लेखामधे 'एनडीटीव्ही इंडिया'चे व्यवस्थापकीय संपादक रवीश कुमार यांचं विधान दिलंय- 'या प्रकरणाकडे आपण कसं पाहातो तो मुद्दा नाहीये, तर या प्रकरणानंतर लोक आता आपल्याकडे कसं पाहातायंत हा खरा मुद्दा आहे. पत्रकारितेवर हा आणखी एक काळिमा फासला गेलाय. आधीपासूनच सुरू असलेल्या कुप्रसिद्धीमध्ये याने भरच पडणार आहे. आपण आपल्या 'कन्टेट'मुळे तशीही विश्वासार्हता गमावतो आहोतच. अशा प्रकरणांनी तर आपण पूर्णच उद्ध्वस्त होऊ.'

ही नोंद आपण करतोय ते रवीश कुमारांनी जे उद्ध्वस्तपणाचं म्हटलंय, त्याचा एक उल्लेख राहावा म्हणून. किमान त्याची नोंद करून ठेवावी म्हणून. काही तात्कालिक संदर्भ असतात, त्यापलीकडे जाऊन जी खोलातली म्हणता येतील अशी विधानं आहेत ती आपण इथे नोंदवली. नोंदीत उल्लेख केलेले लेख मुळातून ज्यांनी वाचले असतील त्यांना आणि जे आता वाचतील त्यांना एक प्रश्न : पेस्ट पुन्हा ट्यूबमधे कशी घालायची ते कोणाला माहितेय का?

1 comment: