०४ जानेवारी २०१३

आल्बेर काम्यू : ४ जानेवारी

आल्बेर काम्यूचं अपघाती निधन झालं ती तारीख ४ जानेवारी १९६०. आजही चार जानेवारी.
शिवाय ७ नोव्हेंबर १९१३ला जन्मलेल्या काम्यूचं जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. अशी निमित्तं साधून ही नोंद. खरं पाहाता, काम्यूसंबंधी नोंद करायला वेगळं निमित्त असायलाच हवंय असंही नाही.
***

'द मिथ ऑफ सिसिफस' या पुस्तकाच्या परिशिष्ट वजा विभागात असलेल्या 'समर इन अल्जेअर्स' या लेखातल्या शेवटच्या भागाचं हे बेकार मराठी भाषांतर-

एखाद्या विशिष्ट प्रदेशाबद्दल जवळीक वाटणं, एखाद्या विशिष्ट मानवी समूहाबद्दल आत्मीयता वाटणं, आपल्या मनाला शांती मिळेल अशी कुठलीतरी जागा आहे याची सतत जाणीव असणं - या सर्व एका मानवी आयुष्यातील काही अटळ गोष्टी आहेत. आणि तरी हे पुरेसं नाही. पण काही विशिष्ट क्षणी सगळं या अध्यात्मिक घरासाठी आतूर झालेलं असतं. 'आपण तिथे परत जायला हवं. जायलाच पाहिजे.' प्लोटिनसला ज्या संघटनाची ओढ होती त्याचा शोध पृथ्वीवर घेण्यात काही गैर आहे काय? इथे संघटन सूर्य आणि समुद्राच्या रूपात पाहायला मिळतं. यातला कटुपणा आणि भव्यता सामावून असलेल्या शरीराच्या जाणिवेतून मनही त्याबद्दल संवेदनशील असतं. मला एवढं कळलंय की, कोणताही अलौकिक आनंद इथे नाहीये, दिवसांच्या येण्याजाण्याव्यतिरिक्त कोणतीही अनंतता नाहीये. या क्षुल्लख आणि आवश्य गोष्टी किंवा ही सापेक्ष सत्यंच मला हलवून सोडतात. इतरांच्या दृष्टीने जी 'आदर्श' सत्यं आहेत, ती समजावून घ्यावीत इतकं आत्मबळ माझ्याकडे नाही. म्हणजे एखाद्याने जनावर असावं असं नाही, पण देवदूतांच्या आनंदात मला काही अर्थच वाटत नाही. मला एवढंच माहितेय की हे आकाश माझ्यापेक्षा जास्त काळ टिकणार आहे. माझ्या मरणानंतर जे सुरू राहाणार आहे ते सोडून कशाला मी अनंतता म्हणू? म्हणजे एखादा प्राणी ज्या परिस्थितीत आहे तिथेच तो समाधानी आहे अशा प्रकारचं चित्र मी रंगवत नाहीये. तो वेगळाच मुद्दा आहे. माणूस असणं हे इतकं सोपं नाहीये, निखळ माणूस असणं तर अजिबातच सोपं नाहीये. निखळ असणं म्हणजे त्या अध्यात्मिक घराचा पत्ता सापडणं - जिथे जगाशी असलेला संबंध समजावून घेता येईल न् जिथे दोन वाजताच्या सूर्याच्या हिंसक धडधडीसोबत नाडीचे ठोके जुळून येतील. आपली मूळ भूमी जेव्हा निसटण्याच्या बेतात असते तेव्हाच तिची जाणीव होते. स्वतःच्याच बाबतीत अवघडलेल्या परिस्थितीत असलेल्यांसाठी त्यांना नाकारणारीच भूमी त्यांची मूळ भूमी असते. मला फार क्रूरपणे किंवा अवास्तवपणे बोलायचं नाहीये. पण शेवटी, ह्या आयुष्यात मला नाकारणारी गोष्टच पहिल्यांदा मला मारत असते. आणि त्याच वेळी जगण्याला एकदम उंचीवर नेणारं जे काही घडतं ते जीवनाची विसंगतता (अब्सर्डिटी) वाढवतं. अल्जेरियातल्या उन्हाळ्यात मला कळलं की, व्यथा सहन करण्यापेक्षा दुःखदायक अशी एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे आनंदी माणसाचं आयुष्य. पण त्यात बनावटपणा नसल्यामुळे त्यातूनच अधिक उदात्त आयुष्याचा मार्ग सापडू शकतो.

खरं तर बहुतेक जण जीवनाबद्दलच्या प्रेमाचं ढोंग करतात, कारण त्यांना प्रेमापासूनच दूर पळायचं असतं. मौज करण्याचं आणि 'अनुभवांमधे मिसळून जायचं' कौशल्य ते कमावू पाहातात. पण ही फसगत आहे. विषयासक्त होण्यासाठी दुर्मीळ व्यावसायिकता असावी लागेल. माणसाचं जीवन मनाच्या मदतीशिवाय पूर्ण होतं. ते त्याच्यात्याच्या पुढे-मागे होण्यातून, एकाच वेळी एकाकीपणा आणि गर्दीच्या असण्यातून ते पूर्ण होतं असतं. बेल्कोर्ट भागातली ही माणसं काम करताना पाहिली, कोणतीही दूषणं न लावून घेता आपल्या बायकांचं आणि मुलांचं रक्षण करताना पाहिली, की आपल्याला मनातल्या मनात लाज वाटू शकते. मला या गोष्टींबद्दल कोणतीही भ्रामक कल्पना करवत नाही. मी बोलतोय त्या जीवनांमधे फारसं प्रेम नाही. फारसं काही उरतही नाही. पण त्यांनी किमान कशापासून पळ तरी काढलेला नाही. काही शब्दांचे अर्थ मला कधीच कळू शकलेले नाहीत, उदाहरणार्थ - 'पाप'. पण तरी (तोच शब्द वापरून मी म्हणेन की) या लोकांनी जीवनाविरोधात पाप केलेलं नाही. जीवनाविरोधात काही पाप असेल तर ते जीवनाबद्दल निराशा वाटण्यात फारसं नाही, तर दुसरं काहीतरी जीवन असेल याची आशा लावून बसण्यात आणि या जगण्यातल्या उदात्ततेकडे पाठ फिरवण्यात आहे. या लोकांनी बनावटपणा केलेला नाही. कोणतीही आशा नसली तरी ते विशीत असल्यासारखे उत्साहात आहेत. त्यातल्या दोघांना मरताना मी पाहिलंय. ते भ्यायलेले पण शांत होते. पँडोराच्या खोक्यातून ग्रीकांनी मानवजातीची सर्व दुःख बाहेर काढली, सगळ्यात शेवटी त्यांनी आशेला बाहेर काढलं, सर्वांत भीतीदायक दुःख. असलं दुसरं प्रतीक मला माहीत नाही, सर्वमान्यतेला मान न देता सांगायचं तर आशा म्हणजे पळवाट आहे. आणि जगणं म्हणजे पळवाट नाही.

अल्जेरियातल्या उन्हाळ्याचा हा धडा आहे. पण मोसम आता बदलतोय, उन्हाळा संपत आलाय. सप्टेंबरमधे पाऊस सुरू होतो; इतक्या कष्टांनंतर पृथ्वीच्या पहिल्या अश्रूंसारखा तो मोकळेपणाने येतो. जणूकाही या प्रदेशाला नाजूकपणाचाही अनुभव द्यायला हवा असा त्याचा हेतू आहे. त्याच मोसमात अल्जेरियाभर कॅरोब वृक्षांचं पांघरूण प्रेमाचा सुंगध घेऊन पडलेलं असतं. उन्हाळ्याचा ताप सोसलेली पृथ्वी संध्याकाळी किंवा पावसानंतर निवांतपणा अनुभवत असते. आणि परत माणूस आणि पृथ्वीच्या संमीलनाचे वारे वाहू लागतात आणि मग जगातलं खरं सशक्त प्रेम आपल्यात जागृत होतं : क्षणभंगूर आणि उदात्त.

***

विलास सारंग  त्यांच्या 'सिसिफस आणि बेलाक्वा' या सुंदर पुस्तकातल्या काम्यूबद्दलच्या सुंदर लेखात सुरुवातीला काय म्हणतात तेवढंच पाहू आणि थांबू-

आल्बेर काम्यू : 'होय' आणि 'नाहीं' यांमध्ये

संपूर्ण जीवनाला आपण 'होय' म्हणतो की 'नाही' म्हणतो हा कुठल्याहि जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा पहिला आणि अखेरचा प्रश्न.                                                                                                  - कार्ल यास्पर्स

मी जें प्रायोगिक तत्त्वज्ञान जगतों तें सर्वव्यापी शून्यवादाची शक्यता जमेस धरतें. परंतु याचा अर्थ असा नव्हे कीं तें नकारात्मकच राहातें. उलट तें दुसऱ्या टोकाकडे जाऊ पाहातें-- वजाबाकी, अपवाद आणि निवड यांचा आश्रय न घेता संपूर्ण जीवनाला दिलेल्या एका डायोनिशियन होकाराकडे.                                             - नीत्शे

आपल्या वाङ्मयीन जीवनाच्या प्रारंभींच लिहिलेल्या कांहीं ललित निबंधांमध्यें काम्यू आपल्या मातृभूमीचें - अॅल्जीरियाचे - चित्र उभें करतो. निळें आकाश, निळा समुद्र आणि रखरखीत भूमी ही अॅल्जीरियाची संस्कृती. निसर्गाच्या कुशींत वाढलेल्या अॅल्जीरियन लोकांचें जिणें साधें, ओबडधोबड परंतु तीव्र आहे. जीवनाचा उपभोग घेणें हें त्यांचें एकमेव ध्येय. पण शारीरिक सुखोपभोगांवर पैज मारणाऱ्या या माणसांचें जीवन क्षणभंगुर आहे. निसर्ग त्यांच्यावर सुखाचा वर्षाव करतो, परंतु तोच एकाएकीं सारें हिरावून नेतो. बुद्धीला तुच्छ लेखून शरीराचा धर्म बनविणारें अल्जीरियन जीवन अर्थशून्य का? या मानवी जातीला भूतकाळ नाहीं, परंपरा नाहीं आणि तरीही तिचें जीवन व्यर्थ नाहीं. या लोकांच्या जीवनांत नांवाजण्याजोगें कांहीं नाहीं : 'परंतु निदान त्यांनीं कांहीं टाळण्याचा प्रयत्न केला नाही.' स्वर्गीय सुखाच्या, अनंताच्या खोट्या प्रलोभनांना ते बळी पडलेले नाहींत. ते जाणतात फक्त 'हातानें स्पर्श करतां येतील अशीं सत्यें.' म्हणूनच त्यांचें जीवन आहे 'क्षणभंगुर आणि भव्य.'

काम्यूनें उभारलेलें हें चित्र वास्तव सृष्टींतील अॅल्जीरीयाशीं कितपत जुळतें हा प्रश्न गौण आहे. काम्यूच्या दृष्टींत अॅल्जीरियन भूमि ही विश्वाची छोटी आवृत्ती बनते. मानवी स्थितीचे प्रतीक ठरते.
***

'सिसिफस आणि बेलाक्वा' या पुस्तकाचा आणखी तपशील पाहण्यासाठी - प्रास प्रकाशन - या लिंकवर एकदम तळात पाहा.

०३ जानेवारी २०१३

मुक्ताबाईच्या निबंधातला काही भाग

सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त ज्या मुलीचा निबंध देण्याची इच्छा होती, असं मागच्या नोंदीत म्हटलंय, त्या निबंधातला निवडक भाग धनंजय कीर यांनी लिहिलेल्या 'महात्मा जोतीराव फुले' (पान ४७-४८, पॉप्युलर प्रकाशन) या चरित्रग्रंथात आहे, तिथून तो इथे नोंदवतो आहे.

चौदा वर्षांची मुक्ताबाई नावाची मुलगी हा निबंध लिहिते आहे. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शाळेत ती तीन वर्षं शिकत होती.
***

ब्राह्मण लोक असें म्हणतात कीं, वेद तर आमचीच मत्ता आहे. आम्हीच त्याचें अवलोकन करावें. तर यावरून उघड दिसतें कीं, आम्हांस धर्मपुस्तक नाहीं. जर वेद ब्राह्मणासाठीं आहेत तर वेदाप्रमाणे वर्तन करणें हा ब्राह्मणांचा धर्म होय. जर आम्हांस धर्मासंबंधीं पुस्तक पाहण्याची मोकळीक नाहीं तर आम्ही धर्मरहित आहों असें साफ दिसतें कीं नाहीं बरे? तर हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हांस कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्याच्यासारिख्या रीतीनें अनुभव घेऊं.

इमारतीच्या पायांत आम्हांस तेलशेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा क्रम चालविला होता. त्या समयी महार अथवा मांग यातून कोणी तालीमखान्यापुढून गेला असता गुलटेंकडीच्या मैदानांत त्याच्या शिराचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी, तर विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार? कदाचित् कोणास वाचता आलें आणि तें जर बाजीरावास कळलें तर तो म्हणे कीं, हे महारमांग असून वाचतात. तर ब्राह्मणांनी का त्यांस दप्तराचे काम देऊन त्यांच्या ऐवजी धोकट्या बगलेंत मारून विधवांच्या हजामती करीत फिरावें की काय? असें बोलून तो त्यास शिक्षा करी.

हा जुलूम विस्तारानें लिहूं लागलें तर मला रडूं येते. या कारणास्तव भगवंतानें आम्हावर कृपा करून दयाळू इंग्रजी सरकारास येथें पाठविलें. आणि या राज्यांतून आमचीं दुःखें निवारण झालीं तीं अनुक्रमाने पुढें लिहितें. किल्लाच्या पायांत घालण्याची बंदी झाली. आमचा वंशही वाढत चालला. महारमांग यांतून कोणी बारीक पांघरूण पांघरलें असतां ते म्हणत कीं, त्यांनीं चोरी करून आणलें. हें पांघरूण तर ब्राह्मणांनीच पांघरावें. जर महारमांग पांघरतील तर धर्मभ्रष्ट होतील असें म्हणून ते त्यांस बांधून मारीत. पण आतां इंग्रजांच्या राज्यांत ज्यास पैसा मिळेल त्यांनीं घ्यावें. उच्च वर्गांतील लोकांचा अपराध केला असतां मांगाचे किंवा महाराचें डोकें मारीत होते ती (चाल) बंद झाली. जुलमी बिगार बंद झाली. अंगाचा स्पर्श होऊं देण्याची मोकळीक कोठें कोठें झाली. गुलटेकडीच्या बाजारांत फिरण्याची मोकळीक झाली.
***

तयास मानव म्हणावे का?

सावित्रीबाई फुले (चित्र : इथून)
सावित्रीबाई फुले. जन्म - ३ जानेवारी १८३१. (मृत्यू १० मार्च १८९७)
सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांची एक कविता-

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुध्दी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?

दे रे हरी पलंगी काही
पशुही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार काही
तयास मानव म्हणावे का?

पोरे घरात कमी नाही
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का?

सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का?

दुसर्‍यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सद्गुण नाही
तयास मानव म्हणावे का?

ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का?

बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का?

पशुपक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वांनाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का?
***

'महार मांगांच्या दुःखाविषयी' हा निबंध सावित्रीबाई व जोतिबा फुले यांच्या शाळेत शिकणाऱ्या मुक्ताबाई या चौदा वर्षांच्या मुलीने लिहिला. १८५५मधे. त्याची प्रत आत्ता माझ्या हाताशी नाहीये, खरं म्हणजे तो निबंध आजच्या निमित्ताने इथे नोंदवायचा होता.

०१ जानेवारी २०१३

गोंगाटाच्या गुंगीवरचा उतारा

''अशा या गोंगाटात कान किटलेले असताना आपणास नव्या वर्षाचे स्वागत करावयाचे आहे. अशा वेळी नव्या वर्षी तरी परिस्थिती सुधारावी अशी आशा असणे काही गैर नाही. परंतु एकंदर वातावरण पाहता परिस्थिती सुधारली नाही तरी ती अधिक बिघडू नये इतकीच अपेक्षा ठेवणे शहाणपणाचे.''
'लोकसत्ते'च्या आजच्या संपादकीयामधला शेवटचा परिच्छेद वर दिला आहे. आपण 'रेघे'वरच्या एका नोंदीचं नाव आधीचं ठरवलं होतं, ते असं होतं - 'गोंगाटाच्या गुंगीवरचा उतारा'.

'लोकसत्ते'मधून
आजपासून २०१३ वर्ष सुरू होतंय, त्यानिमित्त लिहिलेल्या 'लोकसत्ते'च्या अग्रलेखाचं शीर्षक 'तीन तेरा की' असं आहे. जागतिक आर्थिक संकटांची पार्श्वभूमी हा लेखाचा मुख्य भाग, त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडचं राजकीय चित्र कसं भकास आहे हा या लेखाचा शेवटाकडचा भाग आणि 'अडीच शहाणे' नेते लोकांशी संवाद कसे साधत नाहीत असा उल्लेख करून वर दिलेल्या परिच्छेदाने लेख संपतो.

या लेखातल्या गोंगाटाच्या संदर्भामधे आपल्याला भर घालायच्येय.

त्यांनी तसाही कुठल्यातरी गोंगाटाचा उल्लेख केलाय तर त्याचं निमित्त साधून आपण 'रेघे'वर ही लहानशी नोंद करूया. आपण ज्या गोंगाटाबद्दल बोलतोय तो माध्यमांचा गोंगाट आहे. तो आपण रोज अतिरेकी चर्चा नि बातम्यांच्या माध्यमातून अनुभवतो आहोतच. या गोंगाटाची आपसूक गुंगी चढते आणि मग ती कधी तात्कालिक मोर्चाच्या रूपात नायतर फेसबुकवरती बाहेर येत असते. त्यावर आपल्याला काहीच बोलायचं नाही. पण 'रेघे'चा प्रयत्न आहे की या गुंगीवर उतारा असायला पाहिजे. म्हणजे काय? तर इकडेतिकडे गोंगाट चाललाय बाळ ठाकरेंच्या निधनाबद्दल, तर आपण शांतपणे इथे त्या गोंगाटाच्या दुसऱ्या बाजूच्या काही नोंदी टाकूया.
गुडबाय ठाकरेसाहेब, तुम्ही मला प्रेम करायला शिकवलंत! - जावेद इक्बाल
बाळ ठाकरे, भांडवलदार आणि श्रमिक गरीब - विद्याधर दाते
अशा त्या दोन नोंदी त्यावेळी आपण केल्या. नंतर बलात्काराच्या घटनेवेळीसुद्धा आपण र. धों. कर्व्यांसंबंधीच्या नोंदीत आणि दुसऱ्या एका नोंदीत इथे असा प्रयत्न केला.
या शिवाय माध्यमांसंबंधी आपण काही नोंदी केलेल्या आहेत, त्यातली एक, 'बाहेर आलेली पेस्ट आता परत ट्यूबमधे कशी घालणार?' आणि दुसरी, 'कुमार केतकरांना गहिवरून का आलं?'
अगदी काफ्कासंबंधीची नोंद हासुद्धा या उताऱ्याचाच भाग होता.

आता हे लिहिल्यावर हेही सांगायला हवं की, असं करणं 'रेघे'वर प्रत्येक वेळी शक्य होईल असं नाही. मर्यादा खूपच आहेत. किमान काही माणसांनी एकत्र येऊन हे केलं पाहिजे, एकहाती अशा गोष्टी डोकं उठवू शकतात. एका डोक्याला असूनअसून किती गोष्टींवर बोलायचं असणार, किती गोष्टींमधे रस असणार आणि प्रत्येक वेळी तसं असावंसं वाटतंच असं पण नाही, मग मर्यादा येतात. पण असा उतारा असायला हवा आणि मराठीत तो छापील पातळीवर कुठेच सापडत नाही, तर किमान इंटरनेटच्या पातळीवर असा उतारा असायला हवा असं म्हणणं नोंदवावं इतक्यापुरतीच ही नोंद. खरं म्हणजे 'रेघे'चा एकूण हेतूच या म्हणण्याची थोडीशी तरी नोंद व्हावी हा आहे. आणि आपण खूपच थोडासा तो प्रयत्न केला, तसं ते वाढवायला हवं. त्या पलीकडे आपला काही दावा नाही, नायतर या नोंदीनंतरच रेघ बंद पडायची नि आपण तोंडघशी पडायचो.

कधी छापील व टीव्हीवरच्या माध्यमांना विरोध तर कधी पूरक असं काहीतरी करणं ही समांतर प्रक्रिया सध्याच्या गोंगाटात असायला हवी. म्हणजे 'रेघे'वरची एखादी नोंद कुठेतरी छापून आली वेगळी बाजू म्हणून किंवा इथल्या एका नोंदीमुळे छापील माध्यमातल्या (किंवा टीव्हीवरच्या) कोणाला काही सुचलं, काही सापडलं, तर ते बरं! - असं ते व्हायला हवं. असलं काही होईल याची फारशी आशा नसली तरी नोंद करायला काय जातंय?

बाकी गोंगाट वाढतच जाणार आहे, 'रेघे'ची मात्र खात्री नाही.

३१ डिसेंबर २०१२

'न्यूयॉर्कर' : आतून

- अमृता त्रिपाठी

'ओपन' साप्ताहिकातून-

'इन्साइड द न्यूयॉर्कर' हा लेख 'ओपन'मधे आठ डिसेंबरच्या अंकात छापून आला. अमृता त्रिपाठी यांनी 'रेघे'वर हा लेख अनुवादित करून प्रसिद्ध करण्याची परवानगी दिलीच आणि 'ओपन'वाल्यांचीही परवानगी घेऊन दिली. त्रिपाठी 'सीएनएन-आयबीएन' वाहिनीच्या विशेष प्रतिनिधी आहेत. त्यांचे आभार.


(२०१२ हे वर्ष आता संपतंय. अनेक गोष्टींचे बारा वाजलेले आहेत. 'फॅक्ट चेकिंग' अशा नावाची काही गोष्टच नसलेली निरपवाद सर्व छापील माध्यमं जिथे आहेत त्या मराठीत 'फॅक्ट चेकिंग'ला अतोनात महत्त्व देणाऱ्या 'न्यूयॉर्कर'बद्दल अशी नोंद करणं म्हणजे स्वतःचं हसं करून घेणंच आहे, पण ठीक आहे.)
***

ते कार्यालय म्हणजे बुडबुड्यासारखं वाटतं. तिथली शांतता 'टाइम्स स्क्वेअर'च्या इतर गदारोळाशी फारच विसंगत आहे. इथेच काँदे नास्त बिल्डिंगमधे 'द न्यूयॉर्कर'चं कार्यालय आहे.

मी ज्या मजल्यावर आहे, तिथे स्मशानशांतता म्हणता येईल अशी शांतता नसलेला एकच भाग आहे, तो म्हणजे या साप्ताहिकाचा ख्यातनाम तथ्य तपासणी विभाग (फॅक्ट चेकर्स डिपार्टमेन्ट); इथे लोक फोनवर बोलतायंत. साप्ताहिकाचे संपादकीय संचालक हेन्री फायन्डर मला म्हणाले की, ''न्यूयॉर्कर' ही एक 'जिवंत' गोष्ट आहे.' साप्ताहिकाची शैली आणि लेखकांशी होणाऱ्या वादचर्चेविषयी मी विचारलं तेव्हा ते म्हणाले, 'लिहिण्यातल्या अस्पष्टतेच्या मुद्द्यावर विरोध होतो, पण आम्हाला माहितेय की बाकीचे करतात तसं न करणं म्हणजेच खरं लेखक असणं आहे. आणि 'न्यूयॉर्कर' हे फक्त माहिती देणारं साप्ताहिक नसून लेखनाशी संबंधित साप्ताहिक आहे याचाच आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही फक्त माहितीदानाचं काम करत नाही, तर आम्ही विषयांचा मागोवा घेतो.' साप्ताहिकाचे संस्थापक व पहिले संपादक हेरॉल्ड रॉस यांच्या म्हणण्यानुसार अस्पष्टता म्हणजे तथ्य सिद्ध व्हायच्या आधीच ते गृहीत धरल्यासारखं आहे.

न्यूयॉर्कर : पहिला अंक : २१ फेब्रुवारी १९२५
'न्यूयॉर्कर १९२५पासून अस्तित्त्वात आहे आणि या घडीला साप्ताहिकाचे अकरा लाख वर्गणीदार आहेत', फायन्डर सांगतात. आदराने पाहिलं जाणारं व विवेकबुद्धी जागृत असलेलं साप्ताहिक म्हणून न्यूयॉर्कर ओळखलं जातं, अलीकडच्या काळात ते भारदस्तही झालंय. फायन्डर १९९४पासून न्यूयॉर्करसोबत आहेत. १९९७मधे त्यांनी संपादकीय संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. साप्ताहिकाचं संपादकपद टिना ब्राऊन यांच्याकडून डेव्हिड रॅम्निक यांच्याकडे आलं त्याच्या आधी एक वर्षापूर्वीची ही गोष्ट. रेम्निकना विचारलं की, तुमच्या लेखनावर संपादन कोण करतं, तर ते फायन्डर यांच्याकडे निर्देश करतात.

रेम्निक आणि मी या वर्षाच्या सुरुवातीला जयपूरला जाणाऱ्या एका लहानशा विमानात पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी आमचं किंगफिशर एअरलाइन्सच्या समस्येपासून लेखनातल्या करियरच्या संधीपर्यंत आणि रशियातल्या साम्यवादाच्या पाडावापर्यंत विविध विषयांवर बोलणं झालं होतं.

आत्ताच्या वेळी जास्त सूत्रबद्ध बोलणं झालं, पण विषयांचं वैविध्य होतंच. पत्रकारितेबद्दलच्या उदास भविष्यवर्तनाबद्दल तुमचं मत काय आहे, असं विचारून मी सुरुवात केली. ''आपण सगळेच त्याच्याशी संबंधित आहोत, त्याने ग्रस्तही आहोत. चांगल्या-वाईट किंवा अधल्यामधल्या कुठल्याही कारणाने आपण आपल्या कामात अधूनमधून खूष असतो. याचाच भाग म्हणजे आपण अशा गोष्टीत गुंतलेलो असतो, अशा गोष्टी वाचत असतो ज्या कदाचित जगातल्या सर्वोच्च ज्ञानदायी गोष्टी नसाव्यात,'' असं ते सांगत होते. ''पण आमचं साप्ताहिक या गृहिताला वाहिलेलं आहे की सुदैवाने अजूनही खूप लोक असे आहेत ज्यांना खोलवरचं वार्तांकन हवं आहे. किंवा कथात्म साहित्याबद्दल बोलायचं तर खोल भावनिक गुंतवणूक हवी आहे- कारण हे मनुष्याला हवं असतं. केवळ साउन्डबाइट, गुळगुळीतपणा, शब्दकंजुषी, ट्विट, अशा इतर गोष्टींपेक्षा खूप जास्त आम्ही शोधतो.''

''ती आमची गरज आहे'', रेम्निक अजून खोलात जात सांगतात. ''आपल्या माणूस असण्याला ते मदतीचं आहे म्हणून आणि स्वतःला समजून घेण्यासाठी, वरच्या पातळीवर काम करण्यासाठी ते गरजेचं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर ह्या बाबतीत मी आदर्शवादी आहे.'' हे सांगताना ते हेही मान्य करतात की व्यवसायही महत्त्वाचा आहेच आणि साप्ताहिक चालवण्यातली दैनंदिन कामं ही आदर्शवादी असण्यापासून फारच दूर असतात.

रेम्निक स्वतःच सांगतात त्यानुसार त्यांचं मुख्य काम आहे ते संपादकाचं. ''माझा नव्याण्णव टक्के वेळ इथे जातो, साप्ताहिकाचं संपादन करण्यात. मी करतो त्यातली ती सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती चांगल्याप्रकारे करावी असं मला सतत वाटत असतं.'' ''पण मला लिहिण्याचीही खुमखुमी आहेच. मग मी कधीकधी बीचवर जायच्या ऐवजी ही गरज भागवून घेतो. हे असं बोलणं म्हणजे ते तो नवीन शब्द नाही का 'हम्बल-ब्रॅग' (एकप्रकारे विनय दाखवल्यासारखं करून स्वतःची भलामण करणं), तसं ते होतं, पण मला तेच म्हणायचंय. मला त्यात मजा वाटते.''

डेव्हिड रेम्निक
रेम्निक ५३ वर्षांचे आहेत आणि पत्नी व तीन मुलं यांच्यासोबतच्या कौटुंबिक जीवनाबरोबरच उर्वरित दैनंदिन गोष्टीमधली मौजही ते अनुभवतात. ते सब-वेने (ट्रेनचा एक मार्ग) प्रवास करतात हे आता सर्वपरिचित झालंय. त्याबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देणं मात्र त्यांना थोडं कंटाळवाणं झालं असावं. ''लोकांना आश्चर्य का वाटतं ते मला कळत नाही. काही लोक कारने जातात, ते मला हास्यास्पद वाटतं. सब-वे वेगात आणि सहज प्रवास घडवतो. मी एका साप्ताहिकाचा संपादक आहे, 'जनरल इलेक्ट्रिक'चा मालक नाहीये. मी याच मार्गाने जास्त सुखी आहे.''

१९८०च्या दशकाच्या पूर्वार्धात त्यांनी महाविद्यालयातून बाहेर आल्यानंतर रग जिरवण्यासाठी खूप खटपटी केल्या. १९८२मध्ये त्यांनी भारतवारीही केलेली आहे. ''पदवी मिळवल्यानंतर काही काळ मी जपानमधे इंग्रजी शिकवण्यात घालवला, त्यानंतर भारतात काळी काळ निम्नस्तरीय जगणं अनुभवलं आणि मला ते आवडलं.'' कलकत्ता (आताचं कोलकाता), वाराणसी आणि दिल्लीबरोबरच अधूनमधून इतर लहानसहान ठिकाणी ते राहिले. त्यांची पुढची भारतवारी २०१२मधे झाली आणि यावेळी ते दुसऱ्या टोकावर उभे असल्यामुळे कोणे एके काळी दर दिवशी दोन डॉलर देऊन राहिलेल्या हॉटेलमधले दिवस त्यांना आठवले.

रेम्निक गेली दोन दशक गाजत असलेले अमेरिकी पत्रकार आहेत. १९९२मधे ते 'न्यूयॉर्कर'मधे 'स्टाफ रायटर' म्हणून रुजू झाले. या साप्ताहिकात येण्यापूर्वी ते 'द वॉशिंग्टन पोस्ट'सोबत काम करत होते आणि काही काळ मॉस्कोला होते. ''मी रशियाच्या प्रेमातच पडलो होतो, मी रशियन शिकलो आणि तिथे चार वर्षं राहिलो'', असं ते सांगतात. त्याचा अर्थातच फायदा झाला. 'लेनिन्स टॉम्ब : द लास्ट डेज् ऑफ द सोव्हिएत एम्पायर' या त्यांच्या पुस्तकाला १९९४चं अ-कथात्म साहित्याचं पुलित्झर पारितोषिक मिळालं. त्यांनी लिहिलेलं अमेरिकी अध्यक्षांचं 'द ब्रिज : द लाईफ अँड राईज ऑफ बराक ओबामा' हे चरित्र २०१०मधे प्रकाशित झालं. आणि तरीही ते स्वतःला बहुप्रसव लेखक समजत नाहीत.

सेन्सॉरशिपबद्दलचं बोलणं असो की रशियातील त्यांच्या अनुभवाबद्दलचं असो, सलमान रश्दींबद्दल असो की महमूद अहमदिनेजादांबद्दल असो (संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान इराणी अध्यक्ष अहमदिनेजाद यांनी संबोधित केलेल्या संपादकांच्या बौठकीनंतर रेम्निक यांनी त्यांची संभावना 'दुष्ट प्रभावी' व 'रश्दींबद्दल उबग असलेले' अशी केली होती), अशा कुठल्याच विषयावर बोलताना रेम्निक कणभरही कंटाळलेले दिसत नाहीत, पण त्यांना बहुधा आत्तापर्यंत लाखभर विचारला गेलेला प्रश्न पुन्हा विचारला की मात्र ते कंटाळत असावेत, तो प्रश्न म्हणजे - 'तुम्ही हे सगळं एकत्र बांधता कसं?' ''मी गेली चौदा वर्षं या साप्ताहिकाचा संपादक आहे, मी एक पुस्तक लिहिलंय. आणि तसं पुस्तक मी पुन्हा लिहीन अशी मला खात्री नाही. कारण कसंय की, तुम्हाला माहितीच असेल की एकतर हे सगळं खूपच लांबलचक होतं.''

''म्हणून मी साप्ताहिकासाठी लिहितो. कदाचित मी कधीतरी आणखी एखादं पुस्तक लिहीन, ते काय असेल माहीत नाही, कदाचित सहाशे पानांचं असेल'', असं रेम्निक म्हणतात तेव्हा मी हसते, पण ते आणखी तपशिलात जाऊन सांगतात, ''म्हणजे मी काही करायचा प्रयत्न करत नाही. मी इथे काम करतो, घरी जातो, थोडं लिहितो. मी कुत्रे पाळत नाही, मी गावी जात नाही, मला छायाचित्रणाचा वगैरे छंद नाही, मी साधंच ठेवलंय सगळं.''
-----

'न्यूयॉर्कर'च्या तथ्य तपासनीसांपैकी एक रुथ मार्गालिट मला त्यांच्या कार्यालयातला खाजगीतला एक विनोद सांगत होती, ''ते एवढं सगळं कसं काय करू शकतात याबद्दल आम्ही सारखंच बोलत असतो. कोणतरी मला म्हणालं की ते शिंकतात तेही दहा हजार शब्दांत.''

रेम्निक त्यांचे विषय कसे शोधतात? नुकताच प्रसिद्ध झालेला ब्रुस स्प्रिंगस्टीन यांच्यावरचा सतरा हजार शब्दांचा लेख म्हणजे अशीच गंमत होती, असं ते म्हणतात. ''हे साप्ताहिक काही फक्त अफगाणिस्तानातलं युद्ध, घरांची समस्या अशा गोष्टींबद्दलचंच नाही ना असू शकत... या आठवड्यात आम्ही डेट्रॉईटमधल्या एका सुपारी घेणाऱ्या गुंडाबद्दल लेख करतोय... आयुष्य हे दुर्घटना आणि गुंतागुंतींनी भरलेलं असतं, पण त्यात काही 'स्वीट डिश'ही असते, तर तसंच मी माझ्यासाठी ती 'स्वीट डिश' बनवली.''

'स्वीट डिश' बाजूला ठेवली तरी रेम्निक वर्षाकाठी पाच ते चार लहान लेख आणि दोन मोठे लेख लिहितात. त्यांच्या अभ्यासाचे विषय म्हणजे राजकारण आणि रशिया यांच्यासंबंधी हे लिखाण असतं. ''साधारणपणे मी लिहितो, म्हणजे मी लिहितो, पण ती दुर्मीळ गोष्ट आहे... वर्षाला दोन लांबलचक लेख. ते राजकारणाबद्दल असतात, ते सर्वसाधारणपणे तीन ठिकाणांबद्दल असतात - अमेरिका, मध्यपूर्वेत कुठेतरी किंवा रशिया. कारण या ठिकाणांशी मी परिचित आहे,'' रेम्निक सांगतात. ''भारतासारख्या माझ्यासाठी फारशा ओळखीच्या नसलेल्या ठिकाणी जाऊन मी काही जाणून घेईपर्यंत परतीची वेळ झालेली असते. म्हणजे तुम्ही काहीतरी शोधायला खोलात जायला लागता तोपर्यंत घरी परत यायला लागतं. या उलट कॅथरीन बू किंवा स्टीव्ह कॉल किंवा अनेक तरुण भारतीय लेखक मंडळी आहेत - त्यांना कुठे-कसं-कधी जायचं ते पक्कं माहीत असतं. त्यांच्याकडून मला शिकावंसं वाटतं.''

कोणत्या तरुण भारतीय लेखकांनी रेम्निकचं लक्ष वेधून घेतलंय? समंथ सुब्रमण्यम, बशरत पीर आणि अमन सेठी. ''ती (जयपूर लिटररी फेस्टिवलला मारलेली) फेरी खूपच उपयोगी ठरली. भारतात मुरलेले आणि स्वतःचा विषय पूर्णपणे माहीत असलेले असे 'न्यूयॉर्कर'साठी काही लेखक शोधता आले. त्यांच्यासाठी अवघड एवढंच आहे की आमच्यासाठी कसं लिहायचं हे त्यांना शिकायला लागेल,'' ते सांगतात.

म्हणजे हे सोपं होईलसं वाटत नाही. ''हे तसं सुरुवातीला अवघड जातं. मी इथे वर्तमानपत्रातून आलो, तिथे लिखाणाची लांबी खूपच कमी असते. आणि मग लेखकांना वाटतं की, 'अरे वा, मी मोठं लिहू शकतो.' पण तुम्ही एखाद्या विशिष्ट मुद्द्याभोवती लिहिता तेव्हा तुम्हाला एक आराखडा असावा लागतो. ती आता फक्त मातीची झोपडी राहिलेली नसते तर गगनचुंबी इमारत बनलेली असते आणि ती आराखड्याशिवाय बांधलेली असेल, तर ती कोसळते,'' असे रेम्निक सांगतात. ''एखाद्या लेखासंदर्भात कोसळण्याचा अर्थ असतो तो म्हणजे लोक वाचायचं थांबतात, कारण त्यांना लेख नक्की कंटाळवाणा का झालाय नि कुठे गोंधळवणारा झालाय हे काही सांगता येत नाही.''

आणि तरी, या साप्ताहिकाची काही एक विशिष्टच शैली आहे असं रेम्निकना वाटत नाही. ''कुठल्याही गोष्टीसाठी एकच मार्ग असतो असं मला वाटत नाही. एखादी कथा 'न्यूयॉर्कर' शैलीतली असते किंवा एखादा लेख 'न्यूयॉर्कर' धाटणीचा असतो, असं मला वाटत नाही. नायतर तुम्हाला म्हणावं लागेल की नोबोकॉव्ह नायपॉलसारखाच आहे जो की एलिस मन्रोसारखा आहे. असं नसतं ते,'' रेम्निक म्हणतात. ''पण मला वाटतं की, स्पष्टता, नेटकेपणा, तथ्यांमधला काटेकोरपणा, कथनाचा आराखडा या गोष्टी करणं हीसुद्धा काही साधी गोष्ट नाही, त्यांच्यावर प्रभुत्त्व मिळवणं तर पुढचीच गोष्ट.''

रेम्निक यांच्यासोबत काम करणं हा काय अनुभव आहे? याबद्दल मी फायन्डरना विचारलं. ''न्यूयॉर्करमधे काही लेखकांसाठी आम्ही एक शब्दयोजना ठेवलेय - 'सेल्फ-क्लिनिंग ओव्हन'. डेव्हिड रेम्निक हे असेच 'सेल्फ-क्लिनिंग ओव्हन' आहेत. स्वतःच्या आराखड्यातल्या दोषांसंबंधी ते एकदम सजग असतात. पुनर्लेखन करताना, त्यावर संस्करण करताना ते त्या दोषांकडे वळतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे एक सफाईदार अनुभव असतो,'' असं फायन्डर सांगतात. रेम्निक हे स्वतःचे उत्तम टीकाकार आहेत, अशी भरही ते घालतात.

गेलं साधारण वर्षभर 'न्यूयॉर्कर'मधे तथ्य तपासनीस म्हणून काम करत असलेली मार्गालिट म्हणते की, रेम्निक खूप जोर देऊन आपलं म्हणणं मांडतात, आणि आश्चर्यकारकपणे इतर कुठल्याही लेखकाप्रमाणेच एक असल्यासारखं त्यांचं काम होऊन जातं. ''इथे मी ज्या लेखकांसोबत काम केलं त्यांच्यातील एकमेव सर्वोत्कृष्ट असं नाही पण सर्वोत्कृष्टांपैकी एक असे ते लेखक आहेत असं मला वाटतं. आणि मी संपादन किंवा लोकांना सांभाळून घेण्यासंबंधी नाही म्हणत, तर फक्त लिखाण आणि वार्तांकनाचा विचार केला तरी ते खूपच खोलवर जातात. फावल्या वेळात ते फक्त हेच करत असावेत असं वाटतं,'' असं मार्गालिट सांगते. रेम्निक यांची मुख्य भूमिका संपादकाची आहे, याचा संदर्भ देऊन ती म्हणते की, ''त्यांच्याकडे ते नैसर्गिकपणेच येत असावं. वार्तांकनाच्या बाबतीत बोलायचं तर तथ्य तपासनीसांनी भरण्यासाठी त्यांनी काही मोकळ्या जागा ठेवून दिल्यात असं कधीच वाटत नाही. ते सगळंच करतात. ते सगळं वाचायचं आणि ते पक्कं आहे ना हे पाहायचं एवढंच काम आम्हाला उरतं. खरंच.''

साप्ताहिकाचे संपादक असूनही खूप लिखाण करणारे रेम्निक सांगतात की, ''इतर लेखकांच्या स्पर्धेत मी नसेन याची मी सतत काळजी घेतो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी गफलती होऊ शकतात. कधीकधी लोकांना वाटत असेल की काही अधिकची समजून उपयोगी पडत असेल, पण मी लेखकासोबत स्पर्धा करतोय असा समज मी कधीच होऊ देत नाही.''

स्पर्धेचा हा मुद्दा कुतूहल वाढवणारा आहे आणि कोणताही लेखक याबद्दल विचार करेलच. ''काही लोकांना ते थोडेसे धाकदपटशा दाखवणारे वाटतात कारण इतर लेखकांप्रमाणे ते त्रासलेले नि तापलेले नसतात. ते टाइप करतात तेव्हा कीबोर्डकडे बघून हसत असतात अशी अफवाही आहे'', फायन्डर हसत सांगतात. ''रेम्निग हे लेखकाचे संपादक आहे असं तुम्ही म्हणून शकता. आणि ते नक्कीच उपयोगी पडतं. कारण त्यांना त्या व्यवहाराच्या सगळ्या बाजू माहीत असतात. लेखनाच्या, वार्तांकनाच्या आणि मुलाखती घेण्याच्या प्रक्रियेचा त्यांना स्वानुभव असल्यामुळे ते कुठली गोष्ट वगळावी याबाबत खूप जास्त सजग असतात.''

१९९८मधे टिना ब्राऊन यांच्याकडून रेम्निक यांच्याकडे संपादकपदाची सूत्रं आली त्याबद्दल मी विचारलं तेव्हा फायन्डर यांनी मला 'न्यूयॉर्कर'च्या इतिहासाचीच थोडक्यात सफर घडवली. ''एकूण बदल तसे सुरळीत झाले. याचं एक कारण हे आहे की रेम्निकना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कायमच होती. हे साप्ताहिक कायमच एक कात टाकणारं आणि नवनवीन रूपं घेणाऱ्या जीवाप्रमाणे होतं याची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच ते अजून जिवंत आहे, आणि त्याचा प्रभाव टिकून आहे,'' असं फायन्डर म्हणतात. साप्ताहिकाच्या सध्याच्या
न्यूयॉर्कर : २४ सप्टेंबर २००१
बदलाच्या प्रक्रियेचं श्रेयही ते रेम्निकनाच देतात. ''रेम्निक यांची संवेदनशीलता आणि नैतिक दृष्टीची जाणीव, शिवाय गांभीर्य आणि इच्छेची उमेद यातूनच ते स्वतः आणि साप्ताहिकाचा वेगळेपणा कठीण काळाच्या पार्श्वभूमीवरही ठसला,'' '९/११'चा संदर्भ देत फायन्डर सांगतात. याच काळात साप्ताहिकाच्या वर्गणीदारांच्या संख्येने दहा लाखांचा आकडा ओलांडला. यावेळी ते नाव न घेता दुसऱ्या एका 'वंडरफुल सिटी मॅगझिन'बद्दलही बोलले, '९/११'ला भिडण्याऐवजी या मॅगझिनने गृहसजावटीसंबंधी अंक काढला आणि काळासोबत असण्याचा आपला दावा हरवून बसलं.

''याच वेळी 'न्यूयॉर्कर'ने पुढे जाऊन गाजलेलं आर्ट स्पिजेलमन आणि फ्रान्कोइस मूली यांनी तयार केलेलं काळ्यावर काळं मुखपृष्ठ प्रसिद्ध केलं. कित्येक दशकांत पहिल्यांदाच या साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर कार्टून नव्हतं. हा डेव्हिड रेम्निक यांनी घेतलेला निर्णय होता. ते बरोबर आहेत का याविषयी मला सुरुवातीला खात्री नव्हती, पण त्यांचा निर्णय योग्य ठरला. त्या अंकात खूप मोठा लेख होता आणि तो आमच्यातल्या सर्वांत वेगवान आणि सहज लेखकाने लिहिलेला, त्याचं नाव डेव्हिड रेम्निक,'' हे बोलून थोडं थांबून फायन्डर सांगतात, ''...पण अर्थातच यात आजूबाजूच्या सगळ्या लेखकांचाही सहभाग होताच.''

'न्यूयॉर्कर'मधेच ऑक्टोबरमधे प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार (सिटिझन्स जैन - केन औलेटा) त्यांच्या पूर्ण प्रतिपक्ष असलेलं प्रकाशन म्हणजे 'टाइम्स ऑफ इंडिया'. या लेखात 'टाइम्स ऑफ इंडिया' या 'फेनॉमेनन'चा, भारतीय वृत्तपत्रसृष्टीतल्या त्याच्या वर्चस्वाचा, त्यांच्या पत्रकारितेच्या मार्गाचा, 'पुरोगामी विचारधारे'चा वेध घेण्याचा प्रयत्न केन यांनी केलाय.

तथ्याला धरून असण्यासंबंधी आणि वक्तव्याचा विपर्यास न करण्यासंबंधी बोलत असताना रेम्निकनी या लेखाचा उल्लेख केला. ''तुम्ही मायक्रोफोनच्या पलीकडच्या बाजूला असता तेव्हा ते काही अंदाजच बांधता येत नाही असं होऊन जातं. भारतात मी जेव्हा जयपूर लिटररी फेस्टिवलमधे आलो होतो, तेव्हा मी काही मुलाखती दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी जे छापून यायचं त्यातलं काही अचूक असायचं, आणि त्याच दरम्यान मी ओबामांबद्दल दिलेल्या एका व्याख्यानाची जी बातमी 'टाइम्स ऑफ इंडिया'त आली त्यात मी 'एक्स' म्हटलं असेल तर त्यांनी 'वाय' लिहिलं. ते थोडथोडकं इकडेतिकडे नव्हतं, ते थोडंसं चुकलेलं नव्हतं, मी बोललो त्याच्या दुसऱ्या धृवावरती बसल्यासारखं त्यांनी लिहिलं होतं. आणि मला हे कळू शकलं नाही कारण मी जरा भाबड्या समजुतीत होतो... जैन बंधूंविषयी आणि त्यांचं वर्तमानपत्र कसं चालतं त्याविषयी आम्ही नुकताच जो लेख प्रसिद्ध केला तोपर्यंत. हे फारच धक्कादायक होतं.''

'टाइम्स ऑफ इंडिया'चे व्यवस्थापकीय संपादक विनीत जैन यांनी केन औलेटांशी बोलताना केलेल्या एका विधानाचा संदर्भ देऊन रेम्निक म्हणतात, ''ते म्हणाले की, 'आम्ही बातम्यांच्या व्यवसायात नाहीयोत, आम्ही जाहिरातींच्या व्यवसायात आहोत.' आणि संपादकांनाही ते माहीत असेल याची ते खात्री करून घेतात, गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने विक्रीला आहेत... हे मला नवीन होतं, कारण मी भाबडा होतो. आता कदाचित मी कमी भाबडा झालो असेन.''

'टाइम्स ऑफ इंडिया'संबंधी हा लेख करायचं कसं ठरलं याबद्दल मी विचारलं. मला वाटलं की आपल्या वक्तव्याचा एवढा विपर्यास केल्याच्या अनुभवावरून (रेम्निकना) ते सुचलं असेल.

''ते तसं माझ्यामुळेच झालं. केन औलेटा आणि मी नेहमी माध्यमांसंबंधीची आपली समज कशी वाढवावी याबद्दल बोलत असतो... ते तसं साहजिकच आहे... खूप कमी ठिकाणं अशी आहेत, जिथे वर्तमानपत्रांचा व्यवसाय वाढतोय आणि भारताएवढा तर कुठेच तो वाढत नाहीये'' रेम्निक सांगतात.

'न्यूयॉर्कर' वक्तव्यांचे दाखले देताना गांभीर्य दाखवतंच दाखवतं. दंतकथा बनलेल्या इथल्या तथ्य तपासणी विभागात याचे आणखी दाखले मिळतात. याची सुरुवात झाली ती एका चुकांनी लडबडलेल्या लेखामुळे, असं या विभागाचे प्रमुख पीटर कॅन्बी सांगतात. या लेखासंबंधी आणखी तपशिलात जायला ते अनुत्सुक होते. दीर्घ लेखांपासून ते कार्टूनपर्यंत आणि कवितेपर्यंत सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. कार्टूनसंबंधी बोलायचं तर त्यात अनेक तपशील असतात, उदाहरणार्थ, कोटाच्या कुठल्या बाजूची बटणं लावलेली आहेत. किंवा कवितेच्या बाबतीत ऐतिहासिक संदर्भ असू शकतात. जिथे जिथे तथ्य असेल तिथे तिथे ते तपासलं जाऊच शकतं.

'न्यूयॉर्कर'मधे कॅन्बींसह सोळा तथ्य तपासनीस आहेत. कॅन्बी यांनी अर्धवेळ तपासनीस म्हणून काम सुरू केलं. त्यांनी दुसऱ्या एकाबरोबर कामाची विभागणी करून घेतली होती, कारण ते दोघेही स्वतःच्या लेखनावरही लक्ष केंद्रित करू इच्छित होते. कॅन्बी यांनी माया इंडियनांसंबंधी लिहिलेलं 'द हार्ट ऑफ द स्काय : ट्रॅव्हल्स अमंग द माया' १९९२ साली प्रकाशित झालं. १९९४पासून त्यांनी 'न्यूयॉर्कर'सोबत पुन्हा काम सुरू केलं. लेखक असण्याचा आपल्याला कामात नक्कीच उपयोग होतो, असं त्यांना वाटतं. ''इथले बहुतेक लोक, काही प्रमाणात तरी, लेखक होऊ इच्छितात. काही यशस्वी झालेत. काही 'न्यूयॉर्कर'मधे किंवा इतरत्र संपादक झाले. माझ्यासोबत हा खूप हुशार लोकांचा चमू आहे.''

सामान्यज्ञान असलेले आणि भाषेवर प्रभुत्त्व असलेले लोक ते शोधत असतात. ''इथे खूप भाषा आहेत. एका अर्थी आम्ही आमच्या प्रतिष्ठेचे बंदी झालोय. आमच्याकडे सर्वसाधारणपणे सात-आठ भाषा बोलणारे लोक आहेत, फ्रेंच आणि स्पॅनिशपासून जर्मन, मँडरीन, आणि आता तर ऊर्दू बोलणाराही एक आमच्यात आहे. हा काही काटेकोर निकष नाहीये, परदेशांतून आलेल्या लेखांसाठी आम्ही अनुवादकाकडे काम सोपवू शकतो, पण आपल्या जाणिवेचा भाग म्हणून हे वैविध्य उपयोगी पडतं'', कॅन्बी सांगतात.

''या विभागात येणारे लोक साधारणपणे वाङ्मयाचं किंवा इतिहासाचं वगैरे शिक्षण घेतलेले असतात, पण आम्हाला अर्थशास्त्र आणि विज्ञानाची माहिती असलेलेही लोक हवे असतात'', कॅन्बी सांगतात. तपासनीस वेगाने शिकण्याची क्षमता असलेले असावे लागतात, या मुद्द्यावर ते जोर देतात. ''साप्ताहिकाचा बहुतेकसा भाग खूप कमी कालावधीत बांधला जातो. त्यामुळे आमचं वेळापत्रकही भीती वाटावी अशा प्रमाणात बदलत असतं. खूप मोठे आणि गुंतागुंतीचे लेख एक आठवडा उशिराने आले, अंदाजे दहा हजार किंवा बारा हजार शब्दांचे, तर मला त्यासाठी दोन किंवा तीन तपासनीस द्यावे लागतात.''

या लेखांच्या फक्त तपशिलांकडेच लक्ष देण्याचं काम तथ्य तपासनीस करत नाहीत, तर त्यातील मांडणी कशी केलेय याचीही तपासणी करतात. ''हे म्हणजे उलट्या बाजूने वार्तांकन केल्यासारखंच असतं असं मला आता वाटतं. आम्ही एक लेख सुटा करतो, त्याचे घटक वेगळे करतो आणि ते पुन्हा बसवतो, असं ते असतं,'' कॅन्बी सांगतात.

यासाठी घट्ट कातडीचाच माणूस लागतो. ''तथ्य तपासणी ही एक मुळातूनच ताप देणारी प्रक्रिया आहे. खूप लोक तुमच्यावर चिडतात, ते सांभाळावं लागतं. म्हणजे साप्ताहिकाच्या आतल्या लोकांबद्दल नाही म्हणत, अर्थात तेही काही वेळा असतात, पण बाहेरच्या लोकांच्याबाबतीत, आम्ही त्यांना फोन करतो नि त्यांना ज्या गोष्टींबद्दल ऐकायचं नसतं त्याबद्दल त्यांना विचारणा करतो आणि ते खरंखुरं उत्तर देतील याची शाश्वती नसते. हे संवादसुद्धा खूप गुंतागुंतीचे होतात, शोधलेखांमधे तर फारच. हे सगळंच आम्हाला कौशल्याने करावं लागतं,'' कॅन्बी सांगतात.

तथ्य तपासनीसांची विभागीय बैठक शुक्रवारी होते, यावेळी येऊ घातलेल्या लेखांची यादी कॅन्बी देतात. तपासनीस आपल्याला हवा तो लेख कामासाठी निवडतात आणि काही लेख त्या त्या व्यक्तीच्या अभ्यासानुसार तिला दिला जातो. मार्गालिट मूळची इस्राएलची असल्यामुळे ती मध्यपूर्वेसंबंधीच्या लेखांवर काम करते. तिने त्यासंबंधी मला आणखी माहिती दिली - ''माझ्याकडे लेख येतो. मग मी लाल शाईचं पेन घेऊन बसते. मग ज्या गोष्टींमधलं तथ्य मला तपासायला लागेल त्या खाली मी रेषा मारते. प्रत्येकाची काम करण्याची वेगळी पद्धत असेल, मी वेगवेगळ्या स्त्रोतांचे संदर्भ देण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा उपयोग करते, त्यामुळे जेव्हा मी संबंधित व्यक्तीला फोन करते तेव्हा मला लक्षात येतं की लाल किंवा निळा रंग म्हणजे ही बाई किंवा दुसरं कोणीतरी... आणि नंतर आम्ही लेखकाने आमच्याकडे काय पाठवलंय त्याकडे वळतो- त्यांची टीपणं, त्यांच्या संपर्कयाद्या, बातम्यांची कात्रणं, विविध स्त्रोतांकडून त्यांनी घेतलेली माहिती. काही गोष्टी आम्हाला सापडू शकल्या नाहीत, तर आम्ही त्यांना विचारतो, ही आकडेवारी कुठून आली? त्यांनी आमच्याकडे स्पष्ट टिप्पणी पाठवलेली असते. आम्ही टीपणं वाचतो, जेणेकरून ते काय म्हणतायंत ते समजून घ्यावं आणि त्यांनी म्हणणं स्पष्टपणे मांडलंय की नाही ते समजावं. मग आम्ही त्यांच्याशी बोलतो, लेखात उल्लेख केलेल्या प्रत्येकाशी फोनवर बोलतो.''

ई-मेलपेक्षा फोनवर बोलण्याला आपण का प्राधान्य देतो, हे सांगताना मार्गालिट म्हणते, ''आम्ही एखादं वक्तव्य कसं वापरलंय ते पुन्हा कळवत नाही, जेणेकरून 'तो शब्द काढून टाका' किंवा 'हे वापरा' असं काही होऊ नये... आम्ही त्यांना संदर्भ सांगतो, काय बोलताना तुम्ही 'ऑन रेकॉर्ड' होतात ते कळावं इतपत माहिती देतो. यामुळे लेखकाशी त्या व्यक्तीचा वाद होण्याचा संभव राहात नाही. ई-मेलपेक्षा आम्ही फोनवर गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण आम्ही शब्दान् शब्द वक्तव्य काही वाचून दाखवत नाही, त्यामुळे ई-मेलची साखळी तयार करणं आम्हाला परवडत नाही.'' 

वार्ताहरांकडून सुटून गेलेला एखादा प्रश्नही कधीकधी तथ्य तपासनीस विचारतात, कधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांना फोन करतात (त्यांचा उल्लेख लेखात करण्यात येणार नसला तरी), आपण बरोबर मार्गाने चाललोय याची खातरजमा करण्यासाठी हे केलं जातं. दीर्घलेखावर काम करण्यासाठी तथ्य तपासनिसाला दोन किंवा फारतर तीन आठवडे दिले जातात. कधीकधी एका लेखावर दोन किंवा तीन तपासनीस काम करतात, 'डेडलाईन' खूप जवळ आली असेल तर हे करावं लागतं.

तपासनीस लहान असले तरी बदल करतात आणि स्वच्छ मजकूर त्या लेखावर काम करणाऱ्या संपादकाकडे दिला जातो. तो शैलीचे बदल करतो, काही गोष्टी वर-खाली करतो. ''त्यानंतर ते प्रत-संपादकाकडे (कॉपी एडिटर) जातं, ते सगळा मजकूर परत वाचतात. जेव्हा सगळे 'ओके' म्हणतात, मला करण्यासारखं काही उरलेलं नाही असं म्हणतात, तेव्हा मग ते पानावर मांडणीसाठी जातं. त्यानंतर आमची अंतिम बैठक होते. सगळे जण त्या मांडणी झालेल्या पानांसह या बैठकीला येतात. यावेळी शेवटची मतं मांडली जातात,'' मार्गालिट सांगते. दीर्घलेखांसाठी ही अंतिम बैठक असते. ''इथे संपादक, तथ्य तपासनीस, आणि त्या लेखावर काम केलेले सगळे एकत्र बसतात आणि रकान्यांवरून नजर फिरवतात. हे साधारण शेवटाकडे होतं, तोपर्यंत सगळे बदल करून झालेले असतात. कदाचित, कुठे स्वल्पविराम राहिलेला असेल, असं काहीतरी लहानसं असू शकेल किंवा क्वचित काही मोठंही असेल, कोणीतरी अचानक म्हणतं, हा परिच्छेद या भागात बरोबर वाटत नाहीये...''

तथ्य तपासणीची प्रक्रिया खूप प्रभावी असते, पण तरी ती शंभर टक्के बरोबर असू शकत नाही असं कॅन्बी सांगतात. ''आम्ही चुका करत नाही असं नाही, आम्ही चुकतो. ज्या घडामोडी सुरू असतात त्या पाहाता चुका न होणं हे अशक्य आहे. पण तथ्य तपासणीमुळे गद्य अधिक सुबक होतं आणि मांडणीही घट्ट होते. मला वाटतं, 'न्यूयॉर्कर'च्या वार्तांकनावर याचा दोन बाजूंनी परिणाम होतो, एकतर हस्तलिखितातील दोष निघण्याच्या बाजूने आणि दुसरं म्हणजे लेखक जागरूक राहातात कारण त्यांना माहीत असतं की हे तथ्य तपासणीच्या प्रक्रियेतून जाणार आहे, त्यामुळे त्यांना जास्त चांगलं वार्तांकन करावं लागतं, अधिक कष्ट घ्यावे लागतात.''

हे सगळं छापील साप्ताहिकासाठी होतं; इंटरनेटवर जाणाऱ्या गोष्टी एवढ्या पायऱ्या पार करून जात नाही, आणि तिथेच या वर्षी जोनाह लेहररसंबंधीचा किस्सा घडला. 'न्यूयॉर्कर'चा लेखक म्हणून त्याने केलेली ही चूक नव्हती, त्याने त्याच्या ब्लॉगसाठी त्याच्याच आधीच्या एका दुसऱ्या प्रकाशनासाठी लिहिलेल्या लेखातला भाग पुन्हा वापरला, हेही ठीक होतं. पण नंतर प्रकाशात आलं की, त्याने त्याच्या 'इमॅजिन : हाऊ क्रिएटिव्हीटी वर्क्स' या पुस्तकात बॉब डिलनच्या नावावर काही काल्पनिक विधानं खपवलेली आहेत. यातलाच काही भाग 'न्यूयॉर्कर'च्या वेबसाइटवरच्या त्याच्या ब्लॉगमधे त्याने प्रसिद्ध केला होता.

यानंतर त्यांनी लेहररने त्यांच्यासाठी लिहिलेल्या सगळ्याच गोष्टी दोनदा तपासल्या आणि त्यात काही चुका सापडल्या नाहीत, असं फायन्डर सांगतात. ''खूप विश्वासाचं वातावरण असताना असं काही घडलं की सगळंच चिंताजनक होणं साहजिकच आहे. विशेषकरून सध्याच्या इंटरनेटच्या युगात प्रत्येकाला वाटतं की आपल्याला मतंच नाहीत तर स्वतःची वेगळी तथ्यंही आहेत.''

रेम्निकनी मला ई-मेलवर सांगितलं की, ''न्यूयॉर्कर'चे लेखक, संपादक आणि तथ्य तपासनीस हे सगळेच मानवी पातळीवर जेवढं शक्य आहे तेवढं अचूक राहण्याचा प्रयत्न करतात. आम्ही चुका न करण्याचा पराकोटीचा प्रयत्न करतो, तरी त्या होतात. पण बनावट मजकूर तयार करणं ही काही चूक नसते, तो वाचकाचा विश्वासघात असतो. जोनाहबद्दल माझ्या मनात अनेक गुंतागुंतीच्या भावना येतात, अगदी वैयक्तिक सहानुभूतीही वाटते. त्याला मी काहीच करू शकत नाही. पण मला हे साप्ताहिक, तिथली एकात्मता टिकवून ठेवलीच पाहिजे. त्यामुळे ती गोष्ट तिथेच संपली.'
***

काही विशेषनामांचे उच्चार चुकलेले असू शकतात. दुरुस्ती सूचवा.

२८ डिसेंबर २०१२

रस्त्याकडची खिडकी

- फ्रान्झ काफ्का 

(मला जर्मन अजिबातच येत नाही, इंग्रजी पण जनरलच नि मराठी पण सामान्यच. तरी काफ्काची दोन वाक्यांची मूळ जर्मन गोष्ट इंग्रजीत वाचून ती मराठीत करून 'रेघे'वर नोंदवतोय, काफ्काची खरोखरचीच माफी मागून. एवढं लांबून केलेलं भाषांतर ही सगळीच एकूण वादग्रस्त घडामोड आहे. मूळ जर्मन वाक्यं, ती इंग्रजीत किती उतरली, ते मला किती समजलं, त्यातून मराठीत किती उतरलं, त्यात मी माझा शहाणपणा किती केला - या सगळ्या गोष्टींसकट ही नोंद.)


एकाकी आयुष्य जगणाऱ्या त्या माणसाला, क्वचित स्वतःचा कशाशी तरी संपर्क यावा असं वाटलं तर; दिवसातल्या वेळेच्या बदलानुसार, वातावरणातल्या बदलानुसार, कामाचा उरक असेल त्यानुसार, त्याला कोणाचा हात हातात घ्यावा असं वाटलं तर - रस्त्याकडे पाहणारी खिडकी नसेल तर त्याला हे शक्यच होणार नाही. आणि त्याला काहीच नकोय अशी स्थिती असेल नि तो थकलेल्या अवस्थेत खिडकीपाशी गेला, लोकांकडची नजर उचलून आकाशात पाहिलं नि परतला, बाहेर पाहायची इच्छा नाही म्हणून त्यानं डोकं थोडं वर उचललं, तरीसुद्धा रस्त्यावरचे घोडे त्याला ओढू पाहतील गाडीच्या डब्यांच्या आणि कोलाहलाच्या साखळीकडे आणि अखेर मानवी संगतीकडे.

फोटो : रेघ




***

आजचं वर्तमानपत्र वाचता वाचता आपण काफ्का वाचतो आहोत असं जोपर्यंत वाटू शकतं, तोपर्यंत काफ्का ताजाच राहणार : विलास सारंग

मूळ पुस्तक : सिसिफस आणि बेलाक्वा - विलास सारंग.
प्रास प्रकाशन - या लिंकवर गेल्यानंतर एकदम तळात पुस्तकाचं मुखपृष्ठ व प्रसिद्धीचा तपशील सापडेल.
***

काफ्का

२६ डिसेंबर २०१२

एका बलात्कारित व्यक्तीचं मनोगत

'काफिला' या ब्लॉगवरती प्रसिद्ध झालेली ही नोंद, 'काफिला'वाल्यांच्या परवानगीने 'रेघे'वर भाषांतरित करून नोंदवतो आहे. ही नोंद लिहिणाऱ्या निनावी व्यक्तीने स्वतः शारीरिक अत्याचाराला तोंड दिलेलं आहे.
***

बलात्कार होतात त्याचं कारण बहुतेक लोकांना ते काय आहे हेच माहीत नसतं.

अत्याचारित व्यक्तीला ते माहीत असतं असं म्हणणं म्हणजे खूप जास्त गोष्टी गृहीत धरल्यासारखं होईल. याचा एक तत्काळ परिणाम खोल आणि न दिसणाऱ्या जखमेच्या स्वरूपातला असतो. खूप वर्षांच्या समुपदेशनानंतरही त्याने वेदना होतात, भीती वाटते. वैयक्तिक पातळीवरची आणि अस्तित्त्वाच्या पातळीवरची जगातली सगळी ताकद तिथे अपुरी पडते. बहुतेकदा अशा गुन्ह्यांना प्रसिद्धी मिळत नाही. स्त्रियांचं सक्षमीकरण करण्याऐवजी न्यायव्यवस्था इतक्या कमी प्रकरणांमधे न्याय देते की ही व्यवस्था स्वतःच एक मोठी अपराधी ठरते.

अत्याचारितांप्रमाणेच जे दोषी असतात, त्यांनाही त्याबद्दल फारशी माहिती नसते. अटकेशिवाय, अगोचरपणे, निर्लज्जपणे ते मोकाट राहातात आणि यातून त्यांच्या विकृतीला खतपाणी मिळतं. बलात्कार हा लैंगिक कृतीपेक्षा अधिकार गाजवण्याशी संबंधित आहे याची जाणीव त्यांना होईल किंवा होणार नाही.

नेतेमंडळींना यासंबंधी काय करावं हे माहीत नसतं. जगातली सर्वाधिक सजग सरकारंही अशा प्रकरणांमधे खूपच कमी निकाल लावू शकतात.

माध्यमं इतर घडामोडींबद्दल जशी उत्साहात असतात तशीच या घटनेबद्दलही असतात. सगळी वार्तांकनं, कार्यकर्तेगिरी यातून खूपच फुटकळ गोष्टी साधल्या जातात. आणि लगेचच इतर अनेक दुष्ट प्रवृत्तींबद्दल बातम्या सुरू होतात.

बळीचे बकरे शोधून आंदोलक पापक्षालनाचा प्रयत्न करत असतात; कधी ते यशस्वी होतात, बहुतेकदा होत नाहीत. आधीच दळीद्री असलेल्या कायदा व सुव्यवस्थेला ते कामाला लावतात आणि ते उपद्रवी ठरल्यामुळे त्यांच्याविरोधात अश्रुधूराचा वापर केला जातो.

अत्याचारित व्यक्तीला माहीत असतं की ती कधीच पूर्ण बरी होऊ शकणार नाही (तिला शारिरीक जखमांनी किंवा स्वतःच्या हातांनी मरण आलं नाही तरच हा मुद्दा येतो). बलात्काराचा तिच्यावर, तिच्या संबंधांवर, तिच्या स्वतःच्या मुलांवर किती वेगवेगळ्या मार्गांनी परिणाम होतो हे समजायला अनेक वर्षं जावी लागतात. न्यायालयीन निकालामुळे उत्तेजनार्थ बक्षिस मिळाल्यासारखं वाटतं फक्त. अर्थात, जेवढ्या प्रकरणांची नोंद होते त्यापेक्षा अर्ध्याहून कमी प्रकरणांमधे निकाल लागतो असं गेल्या काही वर्षांच्या गुन्हे आकडेवारीनुसार समजतं.

खूपच चिडलेले लोक फाशीची शिक्षा हा एक उपाय म्हणून पुढे करतात, पण त्याने अशा गोष्टी थोपवता येणार नाहीत : उदाहरणार्थ, चार वर्षांच्या बालकावरचा बलात्कार जर कुटुंबातील व्यक्तीकडूनच झाला असेल तर अशा प्रकरणात अत्याचारित (बालक) पूर्णपणे दुर्बलच असतं. लैंगिक भावनेच्या दमनामुळे आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह अशा विकृतीमुळे स्त्रीकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याची पुरुषाची सवय (फाशीच्या शिक्षेने) संपणार नाही. तुरुंगात टाकूनही त्याला त्याच्या गुन्ह्याची जाणीवच होणार नसेल तर काय? आणि त्याच्यानंतरच्या स्त्री-पुरुषांच्या अनेक पिढ्यांनाही ही जाणीव होणार नसेल तर काय? आणि न्याय असा काही होणारच असेल तर इतर कुठल्याही पर्यायाएवढाच फाशीचा पर्याय उपयोगी असेल. एकही राक्षस संपणार नसेल तरी कदाचित त्यामुळे काही लोकांना आनंद होऊ शकेल.

बायका बलात्कारी मुलांचा, वडिलांचा आणि कधीकधी नवऱ्यांचाही बचाव करत राहतील. कुटुंबातीलच अपराधी पुरुषाविरोधात उभं ठाकल्याने सगळ्यांसाठी सगळ्याच गोष्टी बदलून जातील हे त्यांना माहीत असतं आणि जे त्यांना शिकवलेलं असतं त्याच्या हे बरोब्बर उलटं असतं. दुर्लक्ष करणं किंवा नाकारत राहणं हेच बहुतेक दीर्घकाळासाठी सगळ्यांनाच सोईचं असतं. अशा रितीने अन्यायाचं वर्तुळ पूर्ण होतं.

जगात असे पुरुष आहेत ज्यांना स्वतःच्या बायकोबरोबर किंवा मुलींबरोबर कसं वागावं यापेक्षा आपल्या गाडीसोबत किंवा गुरांसोबत कसं वागावं हे जास्त कळतं.

त्यामुळे बलात्कार थांबणार नाहीत हे तसं सुसंगतच आहे.