०९ मार्च २०१३

ह्युगो चावेझ, बराक ओबामा आणि एक पुस्तक

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचं ५ मार्चला निधन झालं.

ज्यांना त्यांच्याबद्दल प्राथमिक माहिती हवी असेल त्यांना हे चार लेख वाचता येतील. (यात प्रत्येक प्रकाशनाचा आपापला पक्षपातीपणा आहे, पण तरी-) : एकदोनतीन (मराठी)। चार

याशिवाय चावेझ यांच्या निधनाच्या निमित्ताने आपण 'रेघे'वर काय नोंद करणार, असं कोणाला वाटलं असेल, तर आपण एका पुस्तकाबद्दल ही नोंद करणार आहोत. पुस्तक साधंसुधं नाही. सध्याच्या काळात 'बेस्टसेलर' ठरणाऱ्या पुस्तकांपैकीही हे पुस्तक नव्हतं. पण एप्रिल २००९मधे ते अचानक 'बेस्टसेलर' ठरलं. काही क्षणांमधे त्याचा 'बेस्टसेलर'पणाचा प्रवास झाला. 'अॅमेझॉन' या वेबसाइटच्या क्रमवारीत ते ५४हजारांहून खालच्या क्रमांकावर होतं आणि एका दिवसात ते दुसऱ्या क्रमांकावरचं खपाऊ पुस्तक ठरलं. कसं? तर त्यासाठी तुम्हाला हा फोटो पाहावा लागेल.

बराक ओबामा, पुस्तक आणि ह्युगो चावेझ (फोटो - इथून)
एप्रिल २००९मधे अमेरिकी राष्ट्रांच्या परिषदेदरम्यान चावेझ यांनी ओबामा यांना एक पुस्तक दिलं. ते पुस्तक देतानाचा हा फोटो. (त्याचा व्हिडियोही पाहाता येईल). या पुस्तकाचं नाव : 'ओपन व्हेन्स ऑफ लॅटिन अमेरिका'. एदुआर्दो गॅलिनो यांनी लिहिलेलं. मूळ पुस्तक स्पॅनिश भाषेतलं आणि चावेझनी ओबामांना दिलेली प्रत स्पॅनिशच होती.

काय आहे या पुस्तकात आणि चावेझनी ते ओबामांना का दिलं असेल? आणि एकूणच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि लॅटिन अमेरिकी राष्ट्रं यांच्या संबंधांच्या संदर्भात या पुस्तकाचा काही संबंध आहे का? एका लॅटिन अमेरिकी राष्ट्राच्या अध्यक्षाने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या अध्यक्षाला हे पुस्तक भेट देण्यातला मजबूत अर्थ काय असेल? या कृतीचा आणि पर्यायाने चावेझ कशाचं प्रतीक ठरत होते याचा शोध घ्यायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला ह्या पुस्तकात शिरावं लागेल.

'आम्ही शांतता राखलेय
मूर्खपणाच्या जवळपास जाणारी'

 - या दोन ओळी एका 'क्रांतिकारी जाहीरनाम्या'तल्या. हा जाहीरनामा १६ जुलै १८०९चा. या ओळी देऊन 'ओपन व्हेन्स ऑफ लॅटिन अमेरिका'मधे वाचकाचं स्वागत केलं जातं.

ही शांतता म्हणजे वसाहतवादी शक्तींविरोधात उर्वरित जगाने राखलेली असं आपल्याला आपसूक पुढच्या पुस्तकातल्या मजकुरावरून कळून येतं. कारण, पुढच्या पुस्तकभर पसरलेला मजकूर आहे तो आपला इतिहास आपण सांगत जाणारा. इथे 'आपण' म्हणजे लॅटिन अमेरिकी. पाचशे वर्षांची पिळवणूक आणि वसातवादी सत्तांना सहन केलेला प्रांत. चिली, व्हेनेझुएला, बोलिव्हिया, पेरू, कोलंबिया, अर्जेन्टिना, उरुग्वे, ब्राझील, क्युबा, इत्यादींनी बनलेला. गॅब्रिएल गार्सिआ मार्क्वेझ, ऑक्ताव्हिओ पाझ, आताचा रॉबर्तो बोलॅनो या लेखक मंडळींचा प्रांत (अधिक वाचन असलेले लोक यात आणखी नावांची, योग्य उच्चारांसह भरही घालू शकतील). काही बाबतीत आपल्याशी जुळणारा इतिहास असलेला, आणि 'तिसऱ्या जगा'तला प्रांत. त्यामुळे तिथली मंडळी जेव्हा 'आपण' असं म्हणतील तेव्हा आपण भारतीय उपखंडातली मंडळीही क्वचित त्यात सामील होऊ शकतो. आणि वसाहतवादी इतिहासाकडे पाहण्याच्या संदर्भात तर होऊच शकतो.

आपण इतिहासाचे विद्यार्थी किंवा जाणकार नसू तरीसुद्धा हे पुस्तक आपण वाचू शकतो. 'रेघे'वर इतिहासाशी संबंधित थेट नोंद करावी एवढं त्यातलं ज्ञान आपल्याकडे नाही, पण आपण सामान्य वाचक म्हणून हे पुस्तक वाचू शकतो म्हणूनच 'रेघे'वर त्याबद्दल नोंद होऊ शकतेय. लॅटिन अमेरिकी नावांचे उच्चार आपण मूळाबरहुकूम करू शकूच असं नाही, तरीही आपल्याला हे पुस्तक वाचता येतं. 'रेघे'वरच्या या नोंदीत आपण उच्चारांपेक्षा पुस्तकातल्या आशयाकडे पाहूया.

खरं तर इतिहासाशी संबंधित हे पुस्तक असलं तरी पत्रकारी कौशल्य आणि गोष्ट सांगण्याचं कौशल्य या दोन पायांवर उभं राहून त्यात इतिहासाची आठवण जागवलेली आहे. याचमुळे 'रेघे'वर त्याची नोंद होऊ शकते.

उरुग्वीयन असलेले एदुआर्दो मूळचे पत्रकार आणि त्यांनी १९७० हे वर्ष संपतानाच्या तीन महिन्यांमधे 'ओपन व्हेन्स ऑफ लॅटिन अमेरिका' या ग्रंथाचं लेखन करून टाकलं. त्यापूर्वीची चार वर्षं त्यांना संदर्भ शोधण्यात घालवावी लागली. हा साधारण काळ असा होता जेव्हा क्युबामधे कॅस्ट्रो सत्तेवर होते, पण चिलीमधलं लोकशाही मार्गाने निवडून आलेलं साल्वादोर आयेंदे यांचं सरकार उलथून तिथे जनरल ऑगस्तो पिनोशेत यांची सत्ता अमेरिकेच्या कृपेने वावरू लागली होती. त्यातून संपूर्ण खंडामधे अस्थिरतेचं वातावरण होतं. उरुग्वेमधेही ही अस्थिरता होती, त्याचा परिणाम म्हणून एदुआर्दो यांनाही देश सोडावा लागला, मग कालांतराने सरकार बदललं आणि त्यांना परतही येता आलं, वगैरे इतिहासात आपण आत्ता जाण्याचं कारण नाही. फक्त इसाबेल आयेंदे पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगतात ते एक वाक्य लक्षात ठेवू : '(एदुआर्दो यांना).. माझ्या माहितीतल्या इतर कोणाहीपेक्षा लॅटिन अमेरिका अधिक जवळून माहिती आहे. आणि या माहितीचा वापर करून ते इथल्या लोकांची स्वप्नं, निराशा, आशा, अपयश यांच्या कथा जगाला सांगत आहेत.'

फेबर अँड फेबर आवृत्ती, २००९
पुस्तकाच्या मुख्य मजकुराची सुरुवात या वाक्याने होते :

राष्ट्रांमधल्या श्रमविभागणीचा अर्थ काही राष्ट्रं जिंकण्यामधे कुशल असतात तर काही हरण्यामधे.

या वाक्यानं सुरू झालेलं हे पुस्तक इतिहास 'हरलेल्या' लॅटिन अमेरिकेच्या अंगाने सांगत जातं. संपत्तीनिर्मिती, तिचा साठा, त्यातून निर्माण होणारी आर्थिक दरी, यामध्ये तथाकथित महासत्तांचा हात यांची मांडणी एदुआर्दो करतात. हे करताना ते आकडेवारी देतात, तथ्यांचा तपशील देतात. त्यात क्वचित केवळ तथ्यांची मालिकाच वाचल्यासारखंही वाटतं, पण मधेच ते एकदम विधान वजा शेरा करून आपल्या तथ्यांच्या मालिकेला वाचनीय करून टाकतात.

ख्रिस्तोफर कोलंबसाने या खंडावर पाऊल ठेवलं तिथपासून सुरू झालेल्या स्थानिकांच्या पिळवणुकीची नोंद करून एदुआर्दो इतिहासाची मांडणी करत जातात. तटस्थपणापेक्षा आपल्यावर अन्याय करणाऱ्यांना जाब विचारण्याच्या पद्धतीने ते इतिहास सुनावत जातात. यात आकडेवारीचीही रांग आहेच. उदाहरणार्थ, सतराव्या शतकाअखेरच्या फ्रेंच कागदपत्रांवरून आपल्याला समजतं की, स्पेनकडे त्याच्या वसाहतींपैकी केवळ पाच टक्के व्यापाराचाच ताबा होता. त्यांच्या वसाहतींपैकी जवळपास एक तृतीयांश व्यापार डच व फ्लेमिश लोकांच्या हातात होता, एक चतुर्थांश भाग फ्रेंचांकडे, इंग्रजांकडे एक दशांश व काही भाग जर्मनांकडे होता. लॅटिन अमेरिका ही युरोपीयनांचा धंदा ठरली होती.

आत्ता जे प्रांत सर्वाधिक दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत, तेच इतिहासात सर्वांत जास्त नागरीकरण झालेले आणि सुबत्ता अनुभवलेले होते, असा संदर्भ देऊन एदुआर्दो बोलिव्हियातल्या पोटोसी या शहराचं उदाहरण देतात. मोठ्या प्रमाणात चांदी राखून असलेली इथली जमीन आणि इथली माणसं दोघांच्या विल्हेवाटीची सुरुवात वसाहतवादी काळात झाली आणि पूर्ण पिळून काढून इथून वसाहतवादी मंडळी निघून गेली तेव्हा मागे राहिलं ते दारिद्र्य. (गेल्या वर्षी ऑगस्टमधे बोलिव्हियाच्या सरकारने कॅनडीयन कंपनीच्या मालकीच्या एका खाणीचं राष्ट्रीयीकरण करून टाकलं, हे या पार्श्वभूमीवर पाहाता येईल.)

या वसाहतवादी पिळवणुकीविरोधात उभ्या ठाकलेल्या बंडखोरांचे दाखलेही एदुआर्दो देत जातात. यात पेरूमधल्या थुपाक आमरू याचं उदाहरण देताना एदुआर्दोंनी थुपाकला पकडल्यानंतरचा एक प्रसंग सांगितला आहे. थुपाकने आपल्या सहअपराध्यांची नावं सांगितली तर त्याला सोडून देण्यात येईल, असं आश्वासन घेऊन एक स्पॅनिश अधिकारी त्याच्या तुरुंगात गेला, त्यावर थुपाक म्हणाला की, 'तुझ्या आणि माझ्याशिवाय यात कोणीच सहअपराधी नाही. तू, दमनकर्ता म्हणून आणि मी स्वातंत्र्यवादी म्हणून मरून जाऊयात.' 

इतिहासासोबत सध्याच्या परिस्थितीतल्या तथ्यांचीही मांडणी एदुआर्दो करतात आणि त्यातून लॅटिन अमेरिकेच्या पिळवणुकीचं एक चित्र उभं करतात. जगातील तांब्याच्या साठ्यांपैकी काही मोठे साठे (सुमारे एक तृतीयांश) चिलीमधे अँडीज् पर्वताच्या उतारावर आहेत. चिलीतील हे तांबं अनेकदा सोनं, चांदी आदी धातूंना सोबत राखून असतं, त्यामुळे इथल्या तांब्याच्या उत्खननाला भाव आहे. आणि चिलीत कामगार अतिशय स्वस्तात मइळतात. १९६४ साली केनेकॉट कंपनी अमेरिकेतील आपल्या कामगारांना जितकं वेतन देत होती, त्याच्या एक अष्टमांश वेतनामधे चिलीत खाणकामगार मिळत असत. आणि दोन्ही ठिकाणी कामगारांची उत्पादकता मात्र सारखीच. या कंपन्यांमधील अधिकारी वर्गाचं वेगळंच जग असतं, तिथे फक्त इंग्रजी बोलली जाते. या कंपन्यांच्या मालकीच्या खाणींची तांब्याची उत्पादकता १९४५पासून पन्नास टक्क्यांनी वाढली पण कामगारांची संख्या एक तृतीयांशाने कमी झाली - असं सांगून एदुआर्दो तिथे झालेल्या पिळवणुकीच्या वाढीकडे बोट दाखवतात.

लॅटिन अमेरिका प्रांताच्या नसा कायम खुल्या राहिल्या. सुरुवातीपासून इथली प्रत्येक गोष्ट युरोपात व नंतर अमेरिकेतल्या भांडवलामधे परावर्तित झाली आणि दूरवरच्या सत्ताकेंद्राकडे साठवून ठेवण्यात आली - हे एदुआर्दोंच्या पुस्तकाचं विधान आहे. आणि या विधानाच्या संदर्भात लॅटिन अमेरिकी नेत्यांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला उद्देशून केलेल्या विधानांकडे आणि चावेझ यांच्या असण्याकडे (/नसण्याकडे), लॅटिन अमेरिकेतल्या डाव्या विचारसरणीच्या सरकारांकडे पाहिलं तर पेपरांमधे आलेल्या बातम्यांपलीकडचे आणखी काही संदर्भ आपल्याला इकडून तिकडे पाहाताना उलगडू शकतात आणि एकदम कुठलीही बाजू घेण्याचं आपण टाळू शकतो.
****


पाहुनिया ग्रंथ     करावे कीर्तन।
तेव्हा आले जाण     फळ त्याचे।।
- तुकाराम

०८ मार्च २०१३

साहिर लुधियानवी । अश्रूंची गाणी । माधव मोहोळकर

साहिर लुधियानवी (८ मार्च १९२१ - २५ ऑक्टोबर १९८०) यांची आज जयंती. त्यानिमित्त आपण 'रेघे'वर ही नोंद करत आहोत.

साहिर लुधियानवी
***

हिंदी चित्रपटांमधली गाणी आपल्याला कळू शकतात. म्हणजे शब्द सरळ कळू शकतात.

कभी खुद पें कभी हालात पें रोना आया
बात निकली तो हर एक बात पें रोना आया

हे साहिरचं म्हणणं आपल्याला कळू शकतं. मग तो मूळ चित्रपट कसाही असला, त्याचं चित्रीकरण कसंही असलं तरी त्या गाण्याचा अर्थ आपल्यापर्यंत पोचू शकतो.

कौन रोता है किसी और की ख़ातिर ए दोस्त
सब को अपनी ही किसी बात पें रोना आया
 
अशा ओळींमधून शक्य तेवढा अर्थ आपल्यापर्यंत पोचत असतो. त्यातून आपल्याला काही मिळत जातं. पण हे झालं हिंदीपुरतं मर्यादित. उर्दू ज्यांना येत असेल त्यांना साहिरमधला कवी उलगडून शोधायला खरी मजा येईल. पण आपल्याला उर्दू येत नसेल, तरी साधारण हिंदीच्या बळावर थोडीथोडी समजू शकेल, अशी अवस्था असू शकते. अशा अवस्थेत आपल्या मदतीला माधव मोहोळकर येऊ शकतात. त्यांचं 'गीतयात्री' हे पुस्तक 'मौजे'नं काढलेलं. सुंदर पुस्तक. मोहोळकर सोलापूरकडचे. नंतर मुंबईत प्राध्यापक होते. बहुधा 'गीतयात्री' नि 'मोहोळ' अशी त्यांची दोनच प्रकाशित पुस्तकं आहेत. आपली ही नोंद मोहोळकरांपेक्षा साहिरबद्दल अधिक आहे, त्यामुळे लगेचच 'गीतयात्री'मधल्या 'अश्कों में जो पाया है वो गीतों में दिया है...' या साहिरवरच्या लेखाकडे वळू. या लेखात मोहोळकर म्हणतात :

कवी आणि गीतकार ही साहिरची दोन्ही रूपं पुढं पुढं माझ्या मनात नकळत एकमेकांत मिसळून गेली होती. पण त्यानं भावजीवनात पहिल्यांदा अकस्मात प्रवेश केला तो कवी म्हणूनच. हिंदी-उर्दूचं आकर्षण नुकतंच मनात निर्माण झालं होतं असा तो काळ. चोरूनमारून पाहता येतील तितके चित्रपट पाहायचे, एखाद्या हॉटेलात बसून रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत गाणी ऐकायची आणि कुणाकडं तरी बसून मनसोक्त रेडियो ऐकायचा. त्या काळात हैद्राबादला गेलो असताना उन्हाळ्यातल्या एका रात्री सहज रेडियो लावला अन् एका उर्दू कवीचा स्वर कानात आला : ''मेरी महबूब! कहीं और मिला कर मुझसे...''

त्या कवीच्या कवितावाचनात खोटा आवेश नव्हता. जाणूनबुजून केलेले नाटकी चढउतार नव्हते. घोगऱ्या, खालच्या आवाजात तो अगदी सरळपणे कविता वाचत होता. पण त्या सरळपणातही आपण जे सांगत आहोत त्यावरचा त्याचा ठाम विश्वास जाणवत होता. साहिर आपली 'ताजमहाल' कविता वाचत होता. आपल्या प्रेयसीला वारंवार आवर्जून सांगत होता : तू दुसरीकडं कुठं तरी मला भेटत जा... ताजमहालाच्या छायेत प्रेम करावंसं वाटत नव्हतं त्याला. एकमेकांना भेटण्यासाठी संकेतस्थळ म्हणून त्याला ताजमहाल पसंत नव्हता. समोरची बाग, यमुनेचा किनारा, नक्षी कोरलेल्या संगमरवरी भिंती, सुंदर-सुंदर कमानी, या साऱ्यांचं वर्णन करून तो तिला सांगत होता :
ये चमनज़ार, ये जमना का किनारा, ये महल,
ये मुनक्कश दरो-दीवार, ये महराब, ये ताक।
इक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर,
हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक।
          मेरी महबूब! कहीं और मिला कर मुझसे।

उर्दू चांगलं येत नसल्यामुळं कवितेतला शब्द न् शब्द काही कळला नाही, पण कवितेतला भाव मात्र तीरासारखा खोलपर्यंत पोचला. खरं म्हणजे 'शहनशहाच्या मुमताजवरील अमर प्रेमाचं चिरंतन प्रतीक म्हणजे ताजमहाल', असं निबंधात वगैरे लिहायला खूप आवडायचं वय होतं ते. पण साहिरनं ताजमहालविषयीच्या साऱ्या रोमँटिक कल्पनांना हादरा दिला. त्याच्या दृष्टीनं ताजमहाल म्हणजे एका बादशहानं आपल्या संपत्तीचा उपयोग करून गरिबांच्या प्रेमाची केलेली क्रूर थट्टा! ज्यांनी खरोखरच ताजमहाल बांधला ते हजारो शोषित कलावंत जगाला अज्ञातच राहिले. ज्यांनी शहाजहानचं स्वप्न साकार केलं त्यांनीही आपल्या आयुष्यात प्रेम केलं असेलच. त्यांच्या प्रेमाची स्मारकं कुठं आहेत? त्या कबरींवर कुणी दिवा तरी लावला की नाही हेही माहीत नाही :
मेरी मेहबूब! उन्हें भी तो मोहब्बत होगी,
जिनकी सन्नाई ने बख्शी है इसे शक्ले-जमील।
उनके प्यारों के मकाबिर रहे बे-नामो-नमूद,
आज तक उनपे जलाई न किसी ने कंदील।

आपल्याच मनात कुठंतरी खोल-खोल होतं अन् आपल्यालाच माहीत नव्हतं असं काहीतरी साहिर सांगतोय, असं कविता ऐकताना राहून राहून वाटत होतं. पुढं ताजमहालवर बऱ्याच कविता वाचल्या; पण तसं कधी वाटलं नाही. तसं पाहिलं तर सुमित्रानंदन पंतांच्या 'ताज'मध्येही मानवतावादी दृष्टिकोण प्रकट झाला होता :
हाय! मृत्यु का ऐसा अमर, अपार्थिव पूजन?
जब विषण्ण, निर्जीव पड़ा हो जग का जीवन!
स्फटिक सौध में हो शृंगार मरण का शोभन,
नग्न, क्षुधातुर, वासविहीन रहें जीवित जन।

पण पंतांच्या कवितेतील प्रौढ चिंतन आणि संयमशील अभिव्यक्तीपेक्षा साहिरच्या भावुक पोटतिडिकेनं मन अधिक आकर्षून घेतलं होतं. आणि कुसुमाग्रजांच्या 'ताजमहाल'मध्ये तर
कीं कालिंदीवर करण्याला जलकेली
कुणि यक्षलोकिंची रूपगर्विता आली
          त्या नितळ दर्पणीं विवस्त्र होउनि पाही
          निज लावण्याची उसासलेली वेली
यासारख्या एकापेक्षा एक बहारदार उत्प्रेक्षांच्या लडींतच मन गुंतून पडायचं. ताजमहालच्या सौंदर्यवर्णनात कवी इतका रममाण झालेला वाटायचा, की अखेरीस कामांध शहांनी राणीवशात ओढलेल्या 'शत अनामिकांचें त्या हें कबरस्तान' या म्हणण्याचा मनावर फारसा परिणाम व्हायचा नाही. खरं सांगायचं तर त्या शेवटच्या कलाटणीपेक्षा सुरुवातीचं सौंदर्यवर्णनच मन मोहून टाकायचं. साहिर ताजमहालच्या सौंदर्यात स्वतः रमला नाही. आपली प्रतिक्रिया त्यानं तीव्रतेनं व्यक्त केली होती :
इक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर
हम गरीबों की मोहब्बत का उडाया है मजाक!

या ओळींचा त्या काळात मनावर इतका जबरदस्त परिणाम झाला होता की संधी सापडेल तिथं आम्ही त्यांचा उपयोग करत होतो. वर्गातला निबंध असो, इतिहास असो की वक्तृत्वाची चढाओढ असो, श्रोत्यांना जिंकायला तर ते आमचं हुकुमाचं पान होतं. पण पुढं पुढं त्या ओळी जरा भडक वाटायला लागल्या अन् त्या कवितेतल्या दुसऱ्याच ओळींनी पाठपुरावा करायला सुरुवात केली. त्या ओळींत साहिरनं विचारलेला प्रश्न कुणाच्याही हृदयात दीर्घ काळपर्यंत घुमत राहील असा होता :
अनगिनत लोगों ने दुनिया में मोहब्बत की है,
कौन कहता है कि सादिक न थे जज़्बे उनके?
लेकिन उनके लिए तशहीर का सामान नहीं,
क्योंकि वे लोग भी अपनी ही तरह मुफलिस थे।

... असंख्य लोकांनी जगात प्रेम केलंय. कोण म्हणतो, त्यांच्या भावना सच्च्या नव्हत्या? पण त्यांच्याजवळ जाहिरातबाजीची साधनं नव्हती; कारण ते लोकही आपल्यासारखेच कंगाल होते!

प्रेम करायला लागणारं भावनाप्रधान मन तर जवळ होतं, पण सुखी, ऐषआरामाचं आयुष्य मात्र नव्हतं अशा साऱ्याच तरुणांना साहिर हा आपला कवी वाटला होता...
 (पान ११७-११९)

मोहोळकर बोलत असताना खरंतर आपण साहिरवर वेगळं काय बोलणार असं होतं. तेवढं आपलं त्याबद्दलचं ज्ञान नाही. आपण एक सामान्य प्रेक्षक किंवा वाचक म्हणून पाहिलं तर फक्त भारावून जाता येतं. मोहोळकरांसारखे लोक मदत करतात आणि त्या भारावण्यामागचं लॉजिक थोडंसं स्पष्ट करतात. पण थोडंसंच, कारण ह्याबाबतीत पूर्ण स्पष्टता अशी काही गोष्ट असू शकणं अवघड आहे. आणि बरं हे की, केवळ कवी असण्याच्या स्थितीबद्दल भारावण्याऐवजी आपण साहिरच्या शब्दांनी भारावून जातोय. कवी असणं म्हणजे जे असेल ते साहिरच्या शब्दांना माहीत असतं. पण बहुतेकदा पोकळ शब्दच आजूबाजूला वावरत असतात आणि त्यामुळे कवीही बरेचदा पोकळ असण्याची शक्यता वाढते, आताच्या फेसबुकादींच्या शब्दचुकार, स्वप्रसिद्धीच्या काळात ही शक्यता अधिकच, त्यामुळे आपल्या स्थितीचा गवगवा जास्त, पण शब्दांची स्थिती बिकट अशी परिस्थिती होते.

आपण साहिरबद्दल बोलत होतो आणि मोहोळकरांच्या साक्षीने बोलत होतो. जग ही एक तमाम लोकांच्या सोयीने तयार झालेली गोष्ट आहे आणि अशी सोईसोईनेच ती चालत राहाते. सोईसोईनेच तिथले व्यवहार होतात. मुळात सगळ्या गोष्टी म्हणजे निव्वळ व्यवहारच बनलेल्या असतात आणि नैतिकतेचा व्यवहार, प्रामाणिकपणाचा व्यवहार, समंजसपणाचा व्यवहार, स्तुतीचा व्यवहार, कवितेचा व्यवहार, प्रेमाचा व्यवहार इत्यादी. असे हे झुंडींचे व्यवहार असतात. 'व्यवहार' या शब्दाचा आपण इथे घेतलेला अर्थ आहे तो 'सोईने केलेली कृती'. त्यामुळे साहिरच्या कवितांच्या ओळी 'सुविचारा'सारख्या 'शेअर' केल्या जातील व्यवहार म्हणून. ते सगळं जगात एकीकडे सुरू राहणार हे अगदीच पक्कं असलं तरी साहिरसारखे लेखक या सगळ्यावर आपल्यापुरती शब्दांनी मात करून ठेवतात :

ये  महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया
ये इंसान के दुश्मन समाजों की दुनिया
ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।


हर इक जिस्म घायल, हर इक रूह प्यासी
निगाहों में उलझन, दिलों में उदासी
ये दुनिया है या आलम-ए-बदहवासी
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

यहाँ इक खिलौना है इसां की हस्ती
ये बस्ती हैं मुर्दा परस्तों  की बस्ती
यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

जवानी भटकती हैं बदकार बन कर
जवान जिस्म सजते है बाज़ार बन कर
यहाँ प्यार होता है व्योपार  बन कर
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है
वफ़ा कुछ नहीं, दोस्ती कुछ नहीं है
जहाँ प्यार की कद्र कुछ नहीं है 
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

जला दो इसे फूक डालो ये दुनिया
मेरे सामने से हटा लो ये दुनिया
तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।


पण जग काही हटवलं जात नाही, आणि त्या जगाच्या व्यवहारांमधेच साहिरसारख्यांचे शब्द कायम असतात. जगाच्या बोगसपणाच्या जाणिवेची तीव्रता जितकी जास्त तितका शब्दांचा मजबूतपणा जास्त. साहिरच्या बाबतीत असे मजबूत शब्द आले कुठून याचं मोहोळकरांनी त्यांच्या मतानुसार आपल्याला सांगितलेलं उत्तर 'गीतयात्री'मधे संपूर्ण वाचता येईल. तूर्तास, गुरुदत्तच्या 'प्यासा'च्या संदर्भात या उत्तराचे धागे मोहोळकर कसे उलगडतात ते पाहू :

कवीचं मन आणि भोवतालचं जीवन यांतील विसंगती समर्थपणे शब्दांतून व्यक्त करू शकेल असाच गीतकार हवा होता 'प्यासा'साठी. नुसताच गीतकार नव्हे तर कवी वाटेल असा गीतकार! गीत लिहिणारा, पण ते गीत कविताही आहे याची जाणीव ठेवणारा. कवी विजय गातोय ते गाणं नाही तर अनुभूतीची कविता आहे, जिवंत कविता आहे, जातिवंत कविता आहे असं वाटायला लावणारा. गुरुदत्तला नुसता गीतकार नको होता, नुसता कवीही नको होता. त्याला हवा होता गीतकार कवी! पहिल्यांदा कवी, गीतकार नंतर. कवी विजयनं सामान्य गीतं गायली असती तर श्रेष्ठ कवी म्हणून तो विश्वासार्ह वाटला नसता. आणि तो श्रेष्ठ कवी जर वाटला नसता तर त्याच्या उपेक्षेचंही काही वाटलं नसतं. साहिरशिवाय दुसरा कोणीही गीतकार कवी विजयसाठी लिहू शकणार नाही हे गुरुदत्तनं ओळखलं होतं. साहिरजवळ कवी विजयचं मन होतं अन् ते जीवनही तो जगला होता. मग 'प्यासा'सारख्या चित्रपटात कवि-नायकासाठी लिहिताना त्याची प्रतिभा साहजिकच फुलून आली. गीतकार कवीत नकळत मिसळून गेला. त्याच्यासाठी त्याला वेगळं काही लिहावंच लागलं नाही. साहिरनं जे काही लिहिलं ती आत्माभिव्यक्तीच होती. 'ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है'मधली शोषित-दलित मानवजातीविषयीची आत्मीयता आणि 'इसको ही जीना कहते हैं तो यूँ ही जी लेंगे'मधली असफल प्रेमजीवनातली दारुण निराशा...

सुरुवातीपासून साहिरच्या कवितेत हेच दोन सूर लागले.
 (पान १५१)

यापुढेही मोहोळकर काही सांगतात. साहिरच्या कवितेतले हेच दोन सूर अनेक तरुण-तरुणींच्या हृदयाला भिडले. कारण जगात साहिरसारखंच हृदय असणारी, निष्ठा असणारी माणसं काही कमी नव्हती. आणि तो एकटाच काही जगावर नाराज नव्हता. त्याच्यासारखेच अनेक जण जगावर रुष्ट होते, असं ते म्हणतात.

पण तरी केवळ हृदयातली निष्ठा पुरेशी असते का हो? नसावी. कदाचित साहिरचे शब्द समजून घेण्यापुरतीच ती पुरेशी असेल, पण साहिर होण्यासाठी त्यापलीकडचंही काही लागत असेल का? हृदयातल्या निष्ठेचं आणखी काहीतरी करावं लागत असेल का? तर, याचं उत्तर 'होय' असं असावं.

नोंदीचा शेवट मात्र मोहोळकरांच्या आणि साहिरच्या शब्दांनीच व्हायला हवा :

अश्रूंतून जे मिळालं ते साहिरनं आपल्या गीतांतून, काव्यातून दिलं. जगाची तक्रार असो वा नसो, आपण तर त्याच्यावर प्रेम केलं. त्याच्या दोषांसह. ऐकलेली गाणी मधुर असतात; न ऐकलेली त्याहून मधुर. साहिरनं छेडलेले दोन्ही सूर अंतःकरणाला स्पर्श करून गेले. सुखदुःखांत साथ देऊन गेले. पण तारांवरून निसटून गेलेले सूर ऐकायला मिळाले नाहीत याची हुरहूर मनात आहेच:

अश्कों में जो पाया है वो गीतों में दिया है
इस पर भी सुना है कि ज़माने को गिला है
जो तार से निकली है वो धुन सबसे सुनी है
जो साज़ पे ग़ुजरी है वो किस दिल को पता है
(पान १५१-१५२)


मुखपृष्ठ : पद्मा सहस्त्रबुद्धे । मौज । रू. १५०/-

***

०४ मार्च २०१३

'प्रतिमान' या हिंदी पत्राच्या प्रकाशनासंबंधीचं टिपण

- आदित्य निगम

आदित्य निगम दिल्लीमधल्या 'सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्' (सीएसडीएस) या संस्थेसोबत काम करतात. त्यांनी 'काफिला'वर लिहिलेल्या 'लीपिंग अक्रॉस अ ट्रबल्ड हिस्ट्री - लाँच ऑफ प्रतिमान' या लेखाचा मराठी अनुवाद त्यांच्या परवानगीने 'रेघे'वर नोंदवून ठेवतो आहे. भाषा आणि माध्यमं यांच्यासंदर्भात काही मुद्दे या लेखातून हाताशी लागू शकतात, म्हणून ही नोंद. 
या अनुवादात 'जर्नल' या इंग्रजी शब्दासाठी 'पत्र' हा मराठी शब्द वापरला आहे.



'प्रतिमान'संबंधीचं प्रसिद्धीपत्रक
'प्रतिमान - समय, समाज, संस्कृती' या नवीन हिंदी संशोधन पत्राच्या आरंभाचा प्रकाशन सोहळा २८ फेब्रुवारी २०१३ रोजी 'सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्, दिल्ली' इथे पार पडला. अनेक अर्थांनी हा कार्यक्रम ऐतिहासिक मानला पाहिजे. हिंदी आणि उर्दू यांच्यात दीर्घकाळ टिकून असलेल्या दरीचा त्रासदायक इतिहास व हिंदुस्तानी भाषेची हरवलेली परंपरा या पार्श्वभूमीवर 'प्रतिमान'च्या प्रकाशन समारंभात झालेलं विख्यात उर्दू अभ्यासक व कवी शमसूर रहमान फारुकी यांचं व्याख्यान ऐतिहासिक ठरणारं होतं. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या त्या इतिहासात बुडी मारण्याचा प्रयत्न म्हणजे एका अर्थी अप्रस्तुत आणि क्वचित उर्मटही समजला जाऊ शकतो, कारण उर्दू आणि हिंदी दोन्ही भाषांच्या शुद्धतेबाबत आग्रही असलेल्या संरक्षक मंडळींच्या विरोधात जाणारी ही कृती ठरते. या कृतीतून स्पष्ट झालेली गोष्ट हीच की, भाषा म्हणजे तथाकथित संरक्षक दाखवतात ती नसून सर्जनशीलता आणि आदानप्रदान व्यवहार यांमधून प्रवाहित होत असते तीच भाषा असते.

या कार्यक्रमात फारूकी यांनी 'उर्दू आदबी रवायत की सच्ची त्रिवेणी' या विषयावर बोलण्याचं ठरवलं हे सयुक्तिकच होतं. आपल्या अप्रतिम व्याख्यानात फारूकी यांनी उर्दू काव्य व सौंदर्यशास्त्रीय परंपरेतील तीन प्रवाह (त्रिवेणी) - अनुक्रमे अरबी, पर्शियन व संस्कृत- उलगडून दाखवले. अदृश्य असूनही 'अस्तित्त्वा'त असलेल्या सरस्वती नदीला अलाहाबादमधे गंगा नि यमुना या नद्या सामील होतात, त्या संगमाच्या 'त्रिवेणी'चं रूपक वापरण्यामागे कदाचित फारूकी यांनाही सध्या अदृश्य असलेल्या पण महत्त्वाच्या संस्कृत काव्य परंपरेकडे लक्ष वेधायचं असावं.

अनुकरण व प्रतिनिधित्त्वामध्ये व्यग्र असलेल्या ग्रीक व पाश्चात्त्य परंपरांविरोधात युक्तिवाद करत फारूकी यांनी असं म्हणणं मांडलं की, अरबी किंवा अधिक प्रमाणात पर्शियन आणि संस्कृत परंपरांनी कला / कविता यांच्याकडे त्यांच्या निर्मितीने तयार होणाऱ्या अर्थासंदर्भात व प्रभावासंदर्भात पाहिलं. पर्शियन, उर्दू आणि क्वचित अरबी कवितेच्या प्रांतातून आणि आनंदवर्धन, अभिनवगुप्त व कुंतक या मध्ययुगीन थोर काश्मिरी सौंदर्य अभ्यासकांच्या विचारधारांमधून फारूकी सहजी विहरत होते.
सामाजिक शास्त्रांचा अभ्यास हिंदी भाषेमध्ये व्हावा यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील असलेल्या आमच्यासारख्यांसाठी तर हा कार्यक्रम खूपच महत्त्वाचा होता. दोन्ही बाजूंकडच्या सनातनी विचारांना ओलांडण्यापलीकडेही काही गोष्टी आमच्या कामाचा भाग आहेत, भाषेचं जे रूप आपल्यापर्यंत आलंय त्या रूपाला समोरासमोर आव्हान देणं हा या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गेल्या दहा वर्षांमधे 'सीएसडीएस'च्या भारतीय भाषा उपक्रमांतर्गत (मुख्यत्त्वे अभय दुबे यांच्या एकहाती परिश्रमामुळे) अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आणि 'दिवान-ए-सराई'सारखी काही पुस्तकं 'सराई' उपक्रमाखाली सिद्ध झाली. या प्रवासात एकेका शब्दावर, संकल्पनांवर अनेक वाद, अनेकदा उग्र भांडणं झाली, अनुवादाच्या कृतीविषयीही मोठे वाद या कालावधीत झाले. 'प्रतिमान' हे पत्र फुटीरतावादी भाषिक कलह टाळून स्पष्ट भूमिका घेणार आहे. हिंदी, हिंदुस्थानी, उर्दू यांच्या विविध शैली व विविध बोलींचा उत्सव म्हणजे 'प्रतिमान'.

'वैचारिक संकटा'बद्दल वारंवार दुःख व्यक्त करत असलेल्या हिंदीसारख्या भाषेत सामाजिक शास्त्रांविषयीचं एक संशोधन पत्र प्रकाशित होणं ही मुळातूनच एक महत्त्वाची घटना आहे. (१९९०च्या दशकात 'हंस' या साहित्यिक नियतकालिकाने हिंदीतील वैचारिकतेबद्दलचा वादाला वाचा फोडली होती आणि नंतर 'हिंदी प्रदेश का वैचारिक संकट' या नावाने हा वाद ओळखला गेला). भारतीय भाषिक वातावरणाशी, मुख्यत्त्वे हिंदी वातावरणाशी ज्यांचा परिचय असेल, त्यांना 'भारतीय भाषा या भावनांच्या अभिव्यक्तीसाठी चांगल्या आहेत, पण वैचारिक कामांसाठी त्यांचा तितकासा उपयोग नाही' हा काही समीक्षकांचा दावा माहीत असेल. भारतीय भाषांमधे झालेलं सामाजिक शास्त्रांसंबंधीचं संशोधकीय काम शोधायला गेलं की हा 'वैचारिकतेचा अभाव' जाणवू लागतो. असं काम फारसं सापडत नाही, हे वेगळं सांगायला नको. हा अभाव त्या भाषेची त्या विषयासंबंधीची 'कमतरता' आहे असं सिद्ध करण्यासाठी वापरला जातो. ज्याप्रमाणे आपली आधुनिकता अपूर्ण आहे, आपला निधर्मीवाद चुकीचा मांडला जातो आणि आपली भांडवलशाहीची कल्पना फोल गेलेय, त्याचप्रमाणे आपल्याला न संपणाऱ्या कमतरतांवरही विश्वास ठेवायला सांगितलं जातं. आमच्या मते, प्रश्न हा नाहीये की, भारतीय भाषांमधे सामाजिक शास्त्रांचा अभ्यास का नाही? तर, प्रश्न हा आहे की, या प्रदेशात सामाजिक विचारधारांची आणि बौद्धिकतेची रूपं कोणती आहेत आणि कोणत्या ठिकाणी असं काम सुरू असतं?

इथे आव्हान दोन पातळ्यांवरचं आहे. पहिलं म्हणजे भारतीय भाषांवर परंपरेतून ज्या विचारधारांचा आणि शैलीचा प्रभाव पडलाय त्यांची ओळख पटवून घेणं. याशिवाय आत्तापर्यंत आपली निष्क्रियता पुरेशी सिद्ध केलेल्या स्वदेशीवादी आणि पाश्चात्त्यविरोधी भूमिकेपासून स्वतःला दूर ठेवणं हे दुसरं आव्हान. त्यामुळे पारंपरिक विचारधारांच्या वैशिष्ट्यपूर्ण रूपांचं भान कायम ठेवून सामाजिक शास्त्रांचं पाश्चात्त्य ज्ञान प्रादेशिक भाषेत आणणं जसं आवश्यक आहे तसंच आपण विविध परंपरांच्या संगमाशी उभे आहोत याचं भान ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. फारूकी यांच्या 'त्रिवेणी'मध्ये तीन परंपरांच्या संगमाचा संदर्भ असेल तर आपण त्यात चौथ्या संदर्भाची भर घातली पाहिजे, आणि तो म्हणजे पाश्चात्त्य संदर्भ. हा चौथा संदर्भ आता शासकाच्या भूमिकेत नाही, तर आपल्या अभ्यासाच्या चौथ्या संदर्भापैकी एक मानावा असा आहे.

'प्रतिमान' या पत्राद्वारे जे करण्याचा मानस आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्रांची तंत्रं आणि अभ्यासपद्धती तर आत्मसात करणं अपेक्षित आहेच, शिवाय विचारधारांच्या रूपांकडे लक्ष देणंही आवश्यक आहे. 'प्रतिमान' ज्या अधिक मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे त्या प्रकल्पांतर्गत गेल्या तीन दशकांमधल्या हिंदी प्रकाशनांचा प्राथमिक अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की, विद्यापीठांबाहेरही यासंबंधी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. विद्यापीठातल्या शिक्षकांनी योगदान दिलं आहेच, पण ते मुख्यत्त्वे लिट्ल मॅगझिनांमधून, चळवळींमधून, सार्वजनिक वादांच्या व्यासपीठांवरून पुढे आलेलं दिसतं.

त्यामुळे भारतीय भाषांमधे सामाजिक शास्त्रांचा गंभीर अभ्यास (समाजचिंतन) करण्याच्या प्रयत्नात मुळात या भाषांमधून यासाठी उपलब्ध असलेली रूपं व मार्गांचा विचार करणं हे अधिक मोठं आव्हान ठरू शकतं. भाषा ही केवळ कल्पनांचं वाहन म्हणून काम करते यावर आमचा विश्वास नाही, सामाजिक शास्त्रांचा केवळ अनुवाद करून कुठल्यातरी कथित वैश्विक अनुभवाच्या छायेखाली काम करत राहण्यावरही आमचा विश्वास नाही. आम्हाला असं वाटतं की भाषा ज्या कल्पनांना आकार देते व त्यांचा प्रसार करते त्या कल्पनांशी ती अनिवार्यपणे जोडलेली असते. वास्तविक पाहाता, एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षांमधे मोठ्या प्रमाणावर सामाजिक व राजकीय विचारांनी थिट्या अभ्यासांना जन्म दिला याचं मुख्य कारण सामाजिक शास्त्रं इंग्रजीकडे सुपूर्त केली गेली हे आहे. सामाजिक शास्त्रांच्या पवित्र जगामधे जे विहरू शकतील त्यांनाच खऱ्या अर्थाने अभ्यासाच्या जगातही प्रवेश करता येईल. हिंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला प्रकाशन व वाचन व्यवहार हा एक संकेत धरला तर त्यातून काही मोठे बदलही दिसण्याची शक्यता आहे. या बदलांच्या प्रक्रियेतून 'सामाजिक शास्त्रं' वेगळी कशी राहतील?

'सीएसडीएस'चा भारतीय भाषा उपक्रम व वाणी प्रकाशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून 'प्रतिमान' हे पत्र दर सहा महिन्यांनी प्रकाशित होईल.

०२ मार्च २०१३

आण्विक धोरण : हितसंबंधांमधला विरोधाभास

- नित्यानंद जयरामन

(नित्यानंद हे कुडानकुलम आण्विक प्रकल्पविरोधी आंदोलनातील चेन्नईस्थित कार्यकर्ता आहेत. त्यांचा हा लेख त्यांनी कालच 'रेघे'कडे पाठवला होता आणि मराठीत तो प्रकाशित व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी त्यांच्या पातळीवर एखाद्या मराठी वर्तमानपत्रात तो छापून यावा यासाठी प्रयत्न केले, पण काही कारणांमुळे ते होऊ शकलं नाही. मूळ इंग्रजी लेख 'एशियन एज'च्या मुंबई आवृत्तीतल्या संपादकीय पानावर आज प्रसिद्ध झाला आहे. मराठी भाषांतर 'रेघे'वर प्रसिद्ध होऊ शकत असल्यास पाहावं असं नित्यानंद यांचं म्हणणं होतं. अन्यथा वाया जात असलेल्या या मराठी भाषांतराला 'रेघे'चं व्यासपीठ द्यायला हरकत नाही, असं वाटल्यामुळे ही नोंद. प्रश्न एवढे गुंतागुंतीचे असतात की त्याच्या अनेक बाजू तपासायला हव्यात. आता ही एक बाजू सध्या आपल्याकडे स्वतःहून व्यासपीठाच्या शोधात आलेली आहे, तर तिला ते देणं एवढ्याच भूमिकेतून आपण ही नोंद 'रेघे'वर करत आहोत.)

आण्विक विधी संघटनेच्या (न्युक्लियर लॉ असोसिएशन - एनएलए) इच्छेनुसार सगळं झालं तर आज (२ मार्च) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय महादेव ठिपसे आणि आण्विक ऊर्जा नियंत्रण मंडळाचे (अॅटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड - एईआरबी) अध्यक्ष एस. एस. बजाज 'एनएलए'च्या दुसऱ्या वार्षिक परिषदेला हजर असतील. भारतात होत असलेल्या या सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवरचा मुख्य विषय आहे : 'भारतातील आण्विक ऊर्जा क्षेत्र : व्यावसायिक संधी आणि कायदेशीर आव्हानं'. या सभेमध्ये 'आण्विक ऊर्जा प्रकल्पांमधे नियंत्रणात्मक सहभाग' या विषयावरच्या परिसंवादात न्यायाधीश ठिपसे अध्यक्षस्थानी असणार आहेत, असं कार्यक्रमपत्रिका सांगते. 'एईआरबी'चे अध्यक्ष एस. एस. बजाज या परिसंवादातील मुख्य व्याख्याते असणार आहेत. आधीच्या नियोजनानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अध्यक्षीय भाषण करणार होते, पण त्यांचं नाव नंतर वगळण्यात आलं.

कुडानकुलम प्रकल्पानंतर लोकांशी संवाद साधण्याच्या विषयासंबंधी या कार्यक्रमात वक्ते बोलणार आहेत. आण्विक ऊर्जा प्रकल्पांना लोकांनी स्वीकारावं यासाठी कोणते मार्ग अवलंबावे यासंबंधीही यावेळी भाषणं होणार आहेत. आण्विक नुकसान कायद्यासंबंधी वादग्रस्त नागरी उत्तरादायित्त्वाच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा होणार आहे. 'एईआरबी'चे अध्यक्ष श्री. बजाज  आणि न्यायमूर्ती ठिपसे यांचा या कार्यक्रमातला सहभाग निश्चित झाला तर त्यातून काही प्रश्न उपस्थित होतात. जैतापूरमधल्या आण्विक ऊर्जा प्रकल्प उभारण्यापासून 'अरेव्हा' कंपनीला कसं रोखावं, या विषयावर कोकण बचाव समितीने परिसंवाद आयोजित केला तर त्याला एखादा न्यायाधीश किंवा 'एईआरबी'चे अध्यक्ष उपस्थित राहू शकतील का? बहुधा नाही.

आण्विक ऊर्जेच्या वादग्रस्त मुद्द्यावरच्या या परिषदेच्या आयोजकांची भूमिका स्पष्ट आहे. भारतात २०५०पर्यंत आण्विक ऊर्जानिर्मिती ४,७८० वॅटपासून पावणेतीन लाख वॅटवर नेण्याचं आश्वासन सरकारने दिलं आहे. या आश्वासनातून निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधींपुढच्या कायदेशीर आव्हानांमधला जोर कमी करण्यासंबंधी काय करता येईल याचा शोध, हा आयोजकांचा हेतू आहे. या परिषदेतील व्याख्यात्यांमधे आण्विक ऊर्जा विभाग, आण्विक ऊर्जा नियंत्रण मंडळ, ऊर्जा संशोधन संस्था, अलस्टॉम, अरेव्हा, एनपीसीआयएल आणि एल अँड टी आदी संस्था-कंपन्यांमधले अधिकारी समाविष्ट करण्यात आले आहेत. आण्विक दुर्घटनांमधे संबंधित कंपनीवर असलेले उत्तरादायित्त्व अति बंधनकारक आहे व आण्विक यंत्रणा पुरवठादारांसाठी अडथळा आहे अशी या सर्वांची स्पष्ट भूमिका आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अणुउद्योगाच्या सर्व समस्यांना उत्तर देण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार सर्व त्या गोष्टी केल्या. भारतातील आण्विक कार्यक्रमाचे निरीक्षक आणि भौतिकशास्त्रज्ञ सुव्रत राजू यांनी म्हटल्याप्रमाणे, 'अमेरिकी हितसंबंधांशी प्रामाणिक राहण्याच्या मार्गात देशांतर्गत राजकीय अडथळे येऊ देत नाही ती सरकारं विश्वसनीय ठरतात.' आण्विक उत्तरादायित्त्व कायद्यावर संसदेत मोठ्या प्रमाणावर वाद झाल्यानंतर आण्विक यंत्रणा पुरवठादारांना उत्तरादायी ठरवणारं कलम कायम ठेवण्यात आलं, पण सरकारने आपली 'विश्वसनीयता' सिद्ध करण्यासाठी कायद्यातील नियमावलीमधे पळवाटा घालून ठेवल्या. या पळवाटा घटनाबाह्य असल्यासंबंधीचा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात चालू आहे.

आण्विक उत्तरादायित्त्वाचा मुद्दा घालवण्यासाठी कार्यरत असलेल्या परिषदेत एका न्यायाधीशाने व 'एईआरबी'च्या अध्यक्षांनी सहभागी झाल्याने न्यायव्यवस्था व नियंत्रणसंस्था यांच्या निरपेक्ष असण्यावरच शंका उपस्थित होऊ शकते. न्यायाधीशांना आणि 'एईआरबी'च्या अध्यक्षांना स्वतःची मतं असण्याचा अधिकार आहेच, पण आण्विक लॉबीइस्टांच्या व्यासपीठावर ती मांडणं अयोग्यच ठरेल.

आण्विक ऊर्जेसंबंधीचा वाद महत्त्वाचा आहे. पण गढूळ वातावरणात चर्चा होऊ शकत नाही. आण्विक ऊर्जेविरोधात उपोषणाला बसलेले मच्छिमार आणि शेतकरी राष्ट्रविरोधी असल्याचा, त्यांना परदेशांतून निधी येत असल्याचा, ते माओवादी असल्याचा आरोप केला जातो. आण्विक ऊर्जेचा पर्याय स्वीकारताना काळजी घ्यावी अशी मतं मांडणाऱ्या आणि कुडानकुलम प्रकल्पविरोधकांना पाठिंबा देणाऱ्या वैज्ञानिकांना, लेखकांना आणि कार्यकर्त्यांना भारतात येण्यासही बंदी करण्यात येते.

कोलारॅडो विद्यापीठातले विख्यात भूगर्भशास्त्रज्ञ प्राध्यापक रॉजर बिल्हॅम यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात नवी दिल्ली विमानतळावरून परत पाठवण्यात आलं. जैतापूर भागाच्या भूकंपप्रवणतेसंबंधी आपण एक शोधनिबंध लिहिल्यामुळे भारत सरकारने आपल्याला काळ्या यादीत टाकलं असल्याचा आरोप बिल्हॅम यांनी केला होता. गेल्या सप्टेंबरमधे मसाहिरो वतारिदा, शिन्सुके नकाई आणि योगो उनोदा या तीन जपानी कार्यकर्त्यांना चेन्नई विमानतळावरून परत पाठवण्यात आलं. या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्यांना विचारलं की, 'त्यांनी कुडानकुलमसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय निवेदनावर स्वाक्षरी केलेय का, तर मग ते आण्विक ऊर्जाविरोधक आहे'. त्यामुळे त्यांना परत जावं लागलं.

कुडानकुलममधे 'एनपीसीआयएल'च्या आण्विक प्रकल्पाविरोधातील शांततापूर्ण आंदोलन आता दुसऱ्या वर्षात आहे. दोन लाखांहून अधिक लोकांवर तीनशेहून अधिक पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील बहुतेक तक्रारी कुडानकुलममधल्या पोलीस स्थानकातच दाखल आहेत. यातील दहा हजारांहून अधिक आरोपी निनावी आहेत आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा किंवा राष्ट्राविरोधात युद्ध पुकारल्याचा खटला दाखल करण्यात आलाय. आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या व्यक्तींना इदिन्थकराई या गावात जवळपास कोंडण्यात आलंय. या गावात प्रवेश करणं मुश्किल आहे.

दुसरीकडे, आण्विक ऊर्जेचं समर्थन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय 'एनजीओ'ने मुंबईतल्या फाईव्हस्टार हॉटेलात आयोजित केलेल्या परिषदेत भारत सरकार सहभागी होतं. अशा परिस्थितीत आण्विक ऊर्जेसंबंधीच्या निःपक्ष चर्चेत सरकार सहभागी होईल हे दिवास्वप्न आहे. पण किमान न्यायाधीशांनी आणि नियंत्रक संस्थांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्तिगत पातळीवर अशा परिषदांना उपस्थित राहाणं टाळावं अशी अपेक्षा तरी आपण करू शकतो.

०१ मार्च २०१३

एका आझाद इसमाची गोष्ट

अमन सेठी
अमन सेठी सध्या 'द हिंदू'चा आफ्रिकेतला प्रतिनिधी म्हणून काम करतोय. आदिस अबाबाला असतो. आधी त्याने याच वर्तमानपत्रासाठी छत्तीसगढमधेही काम केलेलं आहे. मूळचा दिल्लीतला आहे. २००५पासून 'हिंदू'सोबत आहे. 'अ फ्री मॅन' हे अमनचं पहिलंच पुस्तक. 

'रेघे'वर आपण केवळ पुस्तक परीक्षण असं काही काम ठेवलेलं नाही, आणि खरंतर ही नोंद तशी नाहीही. हे पुस्तक म्हणजे पत्रकारितेशी मजबूत संबंधित आणि पुन्हा स्वतंत्र पुस्तक म्हणूनही सुंदर अशी गोष्ट असल्यामुळे आपण तिची नोंद करतोय, माध्यमं आणि साहित्य अशा दोन्ही विभागात बसणारी. आणि सामाजिक समस्येवर लिहिण्याचा आव आणत स्वतःच्या पोकळ संवेदनशीलतेचं प्रदर्शन करणाऱ्या पत्रकारी लिखाणासारखं हे नाही, तर आपण कुठे आहोत आणि एकूण आपला आसपास कुठे आहे याची पुरेशी जाणीव ठेवून लिहिलेलं हे पुस्तक आहे, असं वाटलं म्हणून त्याची नोंद 'रेघे'वर. मुख्य प्रवाह बाजूला ठेवला तरी स्वतंत्रपणे पत्रकारांना काय करता येण्यासारखं आहे, याची नोंद करणं हाही एक हेतू.
***

भारताला स्वातंत्र्य मिळालं १९४७ साली. त्यानंतर आत्तापर्यंत आपण स्वतंत्रच आहोत. आपण म्हणजे भारतातले नागरिक.
पण एकूणच स्वातंत्र्य म्हणजे काय?
***


मोहम्मद अश्रफ मूळचा बिहारमधल्या पाटण्याचा. पण गेली काही वर्षं तो दिल्लीतल्या सदर बाझार परिसरातल्या बारा टूटी चौकात रोजंदारीवर काम करतोय. त्याला हवं तेव्हा तो काम करतो, अन्यथा बिडी फुंकत, कधी दिवसेंदिवस दारू पीत वेळ काढत राहातो. हेच त्याचं स्वातंत्र्य!
म्हणून पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणाचं नाव 'आझादी'.

अश्रफचं हे स्वातंत्र्य समजून घ्यायला त्या चौकात अमन चार-पाच वर्षं फिरत होता. तिथल्या कामगारांसोबत वेळ घालवत होता. त्यांच्याशी त्याची दोस्तीही जमलेली. पण ही दोस्ती म्हणजेही फारच तकलादू चीज असावी, याचीही जाणीव अश्रफसकट सगळ्यांनाच आहे की काय? कारण सगळे हे कामगार पुन्हा सुटेसुटे एकेकटेच आहेत. मूळचं घर कुठाय, घरी कोण कोण राहातात, लग्न झालंय की नाही, मूळचं ठिकाण सोडून इथे येऊन राहाण्याचं कारण काय, घरी कधी जाता, या प्रश्नांची काही ना काही उत्तरं पुस्तकातून अमन आपल्यापर्यंत पोचवत राहातो. या प्रश्नांमधून हाताशी लागतो तो भयाण एकटेपणा. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे 'अकेलापन'.

ह्या पुस्तकाची चांगली बाजू काय, तर आपण सामाजिक प्रश्न मांडतोय आणि आपल्याला त्याबद्दल किती कळवळा आहे याविषयी लेखकाने कोणताही आव आणलेला नाही. जी आपसूक कळ कोणत्याही जाग्या असलेल्या डोक्यातून उठेल ती पुस्तकात आहे, पण त्यापलीकडे जाऊन अनावश्यक उरबडवेपणा नाही किंवा आपणच तितके संवेदनशील असला बडेजावही नाही. त्यामुळे अमनभाई बारा टूटीचा एक सुटा का होईना भाग बनू शकतो. तो तिथे पुस्तक लिहायला आलाय आणि आपण त्याच्याशी बोलतोय त्याची नोंद पुस्तकात होणार आहे, आपल्याशी त्याचा वास्ता फक्त पुस्तकातल्या नोंदीपुरताच आहे, याची जाणीव अश्रफभाईला आणि चहाची टपरी चालवणाऱ्या काकाला, लल्लू, रेहान, मुन्ना या इतर मंडळींनाही आहे. त्यांनी अमनला तरीही जितक्यास तितकं तरी स्वीकारलंय.

म्हणजे कधीकधी अश्रफ अमनला मूर्खात काढायलाही कमी करत नाही आणि तेही पुस्तकात नोंदवलेलं असतं. कधी ह्या ग्रुपमधल्या एका कामगाराला टीबी होतो, तेव्हा खरं एकटेपणातलं भयाणपण समोर येतं नि मग हॉस्पिटलसाठी आणि उपचारांसाठी अमनला खटपट करायला लागते. ती तो जमेल तेवढी करतोही. पण तरीही तिसरं प्रकरण नावातच सांगतं ती गोष्ट उरतेच : 'लावारिस'.

मग कोणी वेडा होत चाललेला कामगार मनुष्य अखेरीस ठार वेडा होऊन ट्रकमागे नागडा धावताना दिसतो. पण कोणी काही करू शकत नाही.

आपलं शरीर जोपर्यंत ठिकाठाक आहे तोपर्यंत असलेलं हे स्वातंत्र्य आहे. आपल्याला हवं तेव्हा काम करण्याचं. आपल्याला हवं त्याला फाट्यावर मारण्याचं. अमन ज्या ग्रुपमधे रुळलाय तो ग्रुप रोजंदारी करून पैसे कमावतोय, कुणाकडे कायमस्वरूपी नोकरी करण्यात त्यांना रस नाही. कधी रंगाऱ्याचं काम कर, कधी हमाली, असं त्यांनी कामाचं स्वरूप ठेवलंय. हेच त्यांच्या लेखी स्वातंत्र्य आहे.

पण मग बारा टूटीमधे सरकारी कारवाई होऊन अनधिकृत बांधकाम पाडण्याची सुरुवात झाल्यावर ही मंडळी कुठे जातात? राष्ट्रकुल स्पर्धांसाठी चकाचक होऊ घातलेल्या दिल्लीत अशी कोण कोण मंडळी आणखी कुठे स्थलांतरित झाली?

अश्रफ कोलकात्याला आपल्या जुन्या मित्राकडे गेला. दिल्लीला येण्यापूर्वी तो कोलकात्याला होता तेव्हा त्या दोघांनी एकत्र व्यवसाय केला होता, पण नंतर काही कारणाने अश्रफ दिल्लीला गेला. आता तिथून निघून जावं लागल्यामुळे तो कोलकात्याला परत येतो, पण मित्र तर आधीचा फुटकळ व्यवसाय बंद करून व्यवस्थित दुकान सुरू करून आहे, लग्न झालेलं आहे, व्यवस्थित कुटुंब आहे. अश्रफसाठी तो अजनबी ठरतो. चौथ्या आणि शेवटच्या प्रकरणाचं नाव : 'अजनबी'.
***

गुंतागुंतीचं गणित समजावून सांगितल्यासारखं अश्रफने एकदा सांगितलेलं, ''आदर्श काम तेच ज्यात कमाई आणि आझादी यांचा परफेक्ट बॅलन्स असतो.
''काम हे काम असतं कारण त्यात कमाई असते. कमाई नसेल तर ते काम नाही, तो छंद होईल. काही लोक त्याला सेवा म्हणतात. काही लोक त्याला उपक्रम म्हणतील. पण ते काम नक्कीच नाही. काम म्हणजे जे केलं की माणसाला पैसे मिळतात. ते पैसे म्हणजे त्याची कमाई.
''आमच्यापैकी बरेच जण कमाईकडे पाहून काम निवडतात. महिन्याला सहा हजार रुपये! अशा पैशांनी माणूस श्रीमंत होईल. पण एक महत्त्वाची गोष्ट ते गमावतात. कोणती महत्त्वाची गोष्ट?
आझादी, अमन भाई, आझादी.
''आझादी म्हणजे मालकाला बाझवत गेलास असं सांगण्याचं स्वातंत्र्य. मालक फक्त आपल्या कामावर मालकी सांगू शकतो, तो आपल्यावर मालकी सांगू शकत नाही.''

पान १९


अमन : घर बांधत असताना तुम्ही वेळ कसा घालवता?
कामगार : आम्ही काम करतो.
अमन : पण काम करताना तुम्ही कशाचातरी विचार करत असता का?
कामगार : प्रत्येकच जण करतो.
अमन : तुम्ही कशाचा विचार करता?
कामगार : काम करताना मी कामाचाच विचार करतो
.
पान ३७

रात्रीचे दोन वाजलेत आणि माझा फोन वाजतोय. हल्ली अधूनमधून असं होत असतं. बहुतेकदा तो अश्रफच असतो आणि बहुतेकदा तो प्यालेला असतो. जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ रात्रीही चालू असणारा टेलिफोन बूथ आहे.
''अमन सरजी, फोन करायला खूप उशीर झाला नसेल असं मला वाटतं, पण अश्रफला तुम्हाला 'हॅलो' म्हणावं वाटतंय.''
''हॅलो, अश्रफ.''
''हॅलो, अमनभाई. तुम्ही झोपलेलात काय?''
''होय.''
''हां. मी एवढंच सांगायला फोन केला की, काल चौकात एक मुलगी आलेली आणि तिने किती कामगार आहेत ते विचारलं. मी सांगितलं, 'पन्नास', मग तिने सगळ्या कामगारांना रांगेत उभं राहायला सांगितलं. मग तिने प्रत्येकाच्या हातात दहा रुपयांची नोट दिली आणि ती निघून गेली. हॅलो? ऐकताय ना?''
''हो्.''
''खूप उशीर झालाय ना?''
''होय, अश्रफभाई.''
''मला वाटलं तुमच्या अभ्यासासाठी हे तुम्हाला ऐकायला आवडेल म्हणून मी फोन केला. बाकी, आम्ही सगळे आता पीत बसलोय आणि तुमच्याबद्दलच बोलतोय. म्हणून म्हटलं, तुम्हाला फोनच लावावा.''
''होय. बरंच केलंत.''
''गुड नाईट, अमनभाई.''
''गुड नाईट, अश्रफ.''
पान ४६

''तुम्ही हे काय करताय, अमनभाई?''
''काय करतोय, अश्रफभाई?''
''हेच आमच्यासारख्या लोफर लोकांसोबत वेळ आणि पैसा घालवून दारू पिताय. आम्ही तुम्हाला काय शिकवणारोत?''
''मी पुस्तक लिहायचा प्रयत्न करतोय.''
''पण ते कोण वाचेल?''
''माहीत नाही. कदाचित माझे मित्र ते विकत घेतील किंवा दिल्लीतली आणखी काही माणसं घेतील.''
''पण तुम्हाला पैसा मिळेल का?''
''पैसे मी आत्ताही बऱ्यापैकी मिळवलेत.''
''किती पैसे?''
''एक लॅपटॉप घेता येईल इतके.''
''मग ठिकाय.''
सदर बाझारातल्या इतर लोकांप्रमाणे मलाही पैसे कमावता येतायंत याने सुटल्यासारखं वाटून अश्रफ रस्त्याशेजारी झाडाखाली असलेल्या लहानशा मंदिराजवळ थांबला. ''आईशप्पथ, अमनभाई, तुम्ही खूप पैसे कमवाल.''
''तुम्हीसुद्धा कमवाल, अश्रफभाई.''
''आणि लल्लू - तो माझा मिडियम-टाईप मित्र असला तरी तो माझा एकमेव मित्र आहे, अमनभाई. माझा एकमेव मित्र. आणि रेहानसुद्धा.''
''आणि काकासुद्धा.''
''आपण सगळे श्रीमंत होऊ, अमनभाई.''
''होय, अश्रफ, एके दिवशी आपण सगळे श्रीमंत होऊ.''

पान ८०

व्हिन्टेज / रॅन्डम हाउस इंडिया आवृत्ती - २०१२

२७ फेब्रुवारी २०१३

लोकसंस्कृतीच्या अभिव्यक्तीसाठी लहान पत्रं : अनुराधा गांधी

अनुराधा गांधी (फोटो : बीबीसी)
अनुराधा गांधी (२८ मार्च १९५४ - १२ एप्रिल २००८) या नक्षलवादी होत्या. भारत सरकारने बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाच्या केंद्रीय समितीच्या त्या सदस्य होत्या. मुंबईत त्यांचा जन्म झाला आणि कोबाड गांधींशी लग्न झाल्यानंतर ते दोघं नागपूरला आणि नंतर आणखी काही ठिकाणी असे राहात व त्यांचं काम करत होते. १२ एप्रिल २००८ला अनुराधा यांचा मलेरियाने मृत्यू झाला, कोबाड यांना सप्टेंबर २००९मधे पोलिसांनी अटक केली आणि ते सध्या तिहार तुरुंगात आहेत. अनुराधा यांचा ज्या संघटनेशी आणि विचारधारेशी संबंध होता त्याच्याशी आपल्या या नोंदीचा संबंध नसल्यामुळे त्याबद्दल फार काही बोलणं नको. तरी, अनुराधा गांधींच्या निवडक लेखनाचा खंड 'स्क्रिप्टिंग द चेंज' या नावाने प्रसिद्ध झाला आहे; या खंडातला 'स्मॉल मॅगझिन्स : अ सिग्निफिकन्ट एक्सप्रेशन ऑफ द पीपल्स कल्चर' हा लेख आपण 'रेघे'साठी मराठीत भाषांतरित करून ठेवतोय. हा लेख मूळ 'अधिकार रक्षा' या नियतकालिकात जुलै-सप्टेंबर १९८२च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. अनुराधा यांच्या कामाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांचं माध्यमांच्या व्यवस्थेबद्दलचं एक ढोबळ निरीक्षण अशा भूमिकेतून या लेखाकडे पाहाता येईल. ही नोंद 'रेघे'वर येण्यासाठी डॉ. आनंद तेलतुंबडे यांची मदत झाली.

'मॅगझिन' या इंग्रजी शब्दासाठी या मराठी भाषांतरात 'पत्र' हा शब्द वापरला आहे.
***

पल्याकडचे केवळ एक चतुर्थांश लोकच सहजतेने वाचू शकत असले (जनगणनेची आकडेवारी काहीही असू दे), तरी लिखित शब्द हे संपर्काचं आणि विचार मांडण्याचं एक महत्त्वाचं माध्यम मानलं जातं. कारण की, स्वतंत्रपणे पाहिलं तर वाचू शकणाऱ्यांची संख्या खूपच मोठी आहे. आणि यातले काही लोक समाजातल्या आवाज उठवणाऱ्या वर्गापैकी आहेत.

बदलाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या किंवा त्याबद्दल सहानुभूती असलेल्या लोकांकडून चालविल्या जाणाऱ्या प्रकाशनांची मोठी संख्या पाहिली की लिखित शब्दाला असलेलं महत्त्व दिसून येतं. प्रस्थापित व्यवस्था व सरकार आपल्या स्त्रोतांच्या नि वितरणव्यवस्थेच्या बळावर जितकी प्रकाशनं काढते जवळपास तेवढ्याच संख्येने स्वतंत्र प्रकाशनंही अस्तित्त्वात आहेत. याशिवाय कागदाच्या किंमतीसंबंधीची, प्रकाशनांच्या वितरणासंबंधीची, सेन्सॉरशिपसंबंधीची व जाहिराती देण्यासंबंधीची सरकारी धोरणं पाहिली की लिखित शब्दाचं महत्त्व आणखी स्पष्ट होतं.

देशभर, प्रत्येक शहरात, बऱ्यापैकी मोठ्या खेड्यात स्थानिक पातळीवर प्रकाशनं निर्माण होतात. नोंदणी केलेली किंवा नोंदणी न केलेली ही नियतकालिकंदोनेकशेपासून काही हजारांपर्यंत वाचकवर्ग राखून असतात. प्रतिक्रियावादी दृष्टीकोनापासून क्रांतिवादी दृष्टीकोनापर्यंत वेगवेगळ्या बाजूंनी विषयांचा मागोवा विविध भारतीय भाषांमधून प्रकाशित होणारी ही पत्रं घेत असतात. यांतील काही वर्षानुवर्षं चालू राहातात, काही वर्षभरातच बंद पडतात, आणि तरी आपलं प्रकाशन टिकेल यावर आशा ठेवत नवी पत्रं निघतच राहातात. यातली काही प्रकाशनं आता दर्जेदार म्हणून नावाजलीही गेलेयत आणि त्यांचा दीर्घकालीन प्रभावही दिसतो.

देशभर वितरित होणाऱ्या प्रकाशनांपासून दूर असलेल्या या पत्रांमधेच बहुतेकदा लोकांच्या अभिव्यक्तीला स्थान मिळतं. स्थानिक समस्या मांडण्यासाठी ही नियतकालिकं व्यासपीठ बनतात, स्थानिक सर्जनशील लिखाणही इथे पहिल्यांदा छापून येऊ शकतं, तात्त्विक प्रश्नांवरची चर्चा इथे होऊ शकते. सरकारच्या हुकूमशाही धोरणांविरोधातल्या लोक चळवळीचा भाग म्हणून लहान पत्रं उभी राहिल्याचं दिसून येतं.

पण हे म्हणणं तपासूनही पाहायला हवं. केवळ वितरणाच्या संख्येवर विभाग पाडणं बरोबर होणार नाही. यातली काही प्रकाशनं स्थानिक बड्या धेंडांनी आपल्या फायद्यासाठी किंवा सत्तेत असलेल्यांची भाटगिरी करण्यासाठी काढलेली असतात. त्यांचं वितरण कितीही कमी असलं तरी लोकाभिव्यक्तीचं, लोकांच्या खऱ्या सर्जनशील संस्कृतीचं माध्यमं म्हणून अशा प्रकाशनांकडे पाहता येणार नाही. स्थानिक हितसंबंधांमधून अशा प्रकाशनांना पैसा मिळतो, कधी निव्वळ धंद्याच्या भूमिकेतून तर कधी विरोधकाला उघडं पाडण्यासाठी. बडे राजकारणी आपल्या विरोधकांना नामोहरम करून संबंधित प्रदेशात जम बसविण्यासाठी अशा प्रकाशनांना अप्रत्यक्षपणे मदत करत असतात. मोठ्या कंपन्यांनी चालवलेल्या चकचकीत वृत्तपत्रांना समांतर अशीच या प्रकाशनांची संस्कृती असते.

पण लोकसंस्कृतीची प्रभावी अभिव्यक्ती एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या गटाने काढलेल्या लहानमोठ्या शेकडो पत्रांमधून होत असते. लोकसंस्कृतीची ओढा या पत्रांमधे सापडतो आणि प्रस्थापित संस्कृती व राजकारणाला त्यातूनच आव्हान उभं राहातं. चळवळींना मदत करण्यात आणि नवीन साहित्यिक प्रवाह निर्माण करण्यात अशा पत्रांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. प्रत्येक खऱ्या लेखकाला आणि राजकीय कार्यकर्त्याला लिखाण प्रकाशित करणं किती कठीण आहे याची जाणीव असते, प्रस्थापित हितसंबंधांचा दृष्टीकोन आणि साहित्य उचलून धरमाऱ्या प्रस्थापित नियतकालिकांमधे त्यांची प्रामाणिक मतंही छापून येणार नाहीत याची कल्पना त्यांना असते.

म्हणूनच, लेखकांनी काढलेल्या लहान पत्रांमधूनच, कमलेश्वर व धर्मवीर भारती आदींच्या प्रस्थापित साहित्यिक व्यवस्थेला आव्हान दिलं गेलं, त्यातून नवीन प्रवाह निर्माण झाले. मराठीमधे प्रस्थापित व्यवस्थेविरोधात १९७०च्या आसपास रुजून आलेलं दलित साहित्य आणि आंध्रप्रदेशात १९६०मधे निर्माण झालेलं क्रांतिकारी साहित्य यांनाही मोठ्या प्रमाणावर वितरण असलेल्या प्रस्थापित नियतकालिकांमधे जागा मिळाली नव्हती.

त्याचप्रमाणे, अस्तित्त्वात असलेल्या सामाजिक-आर्थिक रचनेला किंवा सरकारच्या धोरण व कृतींच्या गैरलोकशाही रचनेला आव्हान देणाऱ्या राजकीय मतांची आणि कृतींचीही राष्ट्रीय माध्यमांमधे दखल घेतली जात नाही. आणि घेतली गेलीच तर काही असमाजिक तत्त्वांचं कृत्य असल्याप्रमाणे ही मतं रंगविली जातात. कार्यकर्त्यांचा दृष्टीकोन प्रकाशात आणला जात नाही, कारण बहुतेक प्रस्थापित वृत्तपत्रं कारखानदार चालवतात. त्यामुळे क्रांतिवादी साहित्य व समर्पित राजकीय कार्यकर्त्यांची मतं आणि कृती, त्यांच्यामधे चांगल्या आयुष्याची इच्छा निर्माण होण्यासाठी प्रेरणा देणारं साहित्य, यांना लहान पत्रांमधून व्यासपीठ मिळतं.

आर्थिक मदतीची व वितरण व्यवस्थेची कमतरता आणि वाढत्या किंमती यांनी व्यवस्थाविरोधी नियतकालिकांच्या वाढीसमोर मोठी समस्या निर्माण केली आहे. पण एका अर्थी या कमतरताच त्यांची ताकद बनतात. या प्रकाशनांकडे कोणताही ठोस, सुरक्षित आर्थिक स्त्रोत नसतो. क्वचित मिळणाऱ्या जाहिराती, मित्रमंडळींकडून मिळणाऱ्या देणग्या किंवा वर्गण्या यांवरच ही प्रकाशनं मुख्यत्त्वे अवलंबून असतात. त्यात लिहिणाऱ्यांना लेखनाबद्दल पैसे मिळू शकत नाहीत. पण कोणताही मोठा आर्थिक स्त्रोत नसल्यामुळे त्यांना कोणा उद्योजकाच्या किंवा जाहिरातदाराच्या किंवा अगदी सरकारच्या जवळकीत राहाण्याची गरज त्यांना पडत नाही. पत्र काढणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनांनुसार आणि दमनाला तोंड देण्याच्या क्षमतेनुसार त्या पत्रातील लेखनाची ताकद व मजकुराची धाटणी ठरते.

आणीबाणीच्या काळात अशी अनेक पत्रं बंद पाडण्यात आली किंवा सरकारच्या बंदीला तोंड देत ती गुप्तरितीने छापावी लागली. यातले अनेक प्रकाशक सरकारच्या किंवा कोणा बड्या उद्योजकाच्या मागे लागून मजकुरात तडजोड करण्याऐवजी स्वतःच्या आयुष्याची कमाई ओतून आपलं काम करत राहातात. सध्याच्या भारतात लोकशाही लढ्यामध्ये सरकार, सत्ताधारी पक्ष व बडे उद्योजक लोकांचं दमन करणारे ठरत असताना समर्पित पत्रांच्या असण्याचं महत्त्व वाढतं.

नेहमीच्या वितरणव्यवस्थांमधून अशा पत्रांची विक्री होऊ शकत नाही. पण हीसुद्धा त्यांची ताकदच ठरते. त्यांची विक्री वर्गण्यांमधून आणि त्यात गुंतलेल्या व्यक्तींच्या प्रयत्नांमधूनच होते. म्हणजे विक्रीसाठी फक्त संबंधित व्यक्ती अधिकाधिक वाचकांना आपल्या नियतकालिकाकडे वळवू शकण्यात किती यशस्वी होतात यावरच अवलंबून राहावं लागतं. याशिवाय नियमित वर्गणीदारांचा पाठिंबा असतो, हे वर्गणीदार अंकांच्या प्रसिद्धीत क्वचित येणारी अनियमितता आणि इतर माध्यमांच्या प्रसिद्धीच्या उड्यांना न भुलता टिकून राहणाऱ्यांपैकी असू शकतात.

या समर्पित पत्रांना सध्या काही गोंधळांना सामोरं जावं लागतंय. कागद, छपाई, शाई आणि बांधणी - निर्मितीचा - खर्च वाढत असताना अशा प्रकाशनांना अधिक आर्थिक निधी गरजेचा आहे. सरकार आपल्या ताकदीनुसार अशी प्रकाशनं धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करत असतंच. कागदाच्या किंमतीतली आणि टपालखर्चातली वाढ यांमुळे या लहान नियतकालिकांना मोठा फटका बसला आहे. शिवाय, वाचकांचं लक्ष प्रस्थापित प्रकाशनांमधल्या नट-नट्यांच्या नि राजकारण्यांच्या गॉसिपांमुळे विचलित होताना दिसतं. प्रस्थापित व्यवस्थेतला छपाईचा तांत्रिक दर्जा एवढा उंचावत चाललाय की लहान पत्रं आपल्या अपुऱ्या आर्थिक स्त्रोतांद्वारे त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाहीयेत.

राजकारणाशी थेट संबंध नसलेल्या सामान्य वाचकांपर्यंत पोचणं समर्पित पत्रांना खूप अवघड जातंय. केवळ तात्त्विक प्रश्नांशी संबंधित नियतकालिकांच्याबाबतीत या समस्या फारशा नाहीत, कारण त्यांचा एक ठराविक वाचकवर्ग आहे. लहान पत्रांपुढचं मुख्य आव्हान आहे ते चकचकीत, महागड्या माध्यमांमधून वाचकांचं लक्ष वेधून घेणं. मृत परंपरा आणि पिळवणुकीविरोधातील लोकांच्या कृतींना, अभिव्यक्तींना व्यासपीठ देत मजकूर प्रसिद्ध शोधत राहाणं.

अशा समर्पित पत्रांमधे देशातील अनेक बुद्धिमंतांनी लिहिलेलं आहे. समाजबदलासाठी कटिबद्ध असलेल्या आदर्शवादी लोकांच्या त्यागातून अशी पत्रं टिकून राहिली. झोट, हिम्मत, फ्रंटिअर, श्रीयंस कल्पना, पहल, अर्तार्थ, आमुख, सत्यकती, आणि अशी अनेक पत्र यश-अपयशाची उदाहरणं दाखवत उभी आहेत.

छापील माध्यमांवरची बड्या उद्योजकांची आणि सरकारची एकाधिकारशाही जसजशी वाढत जाईल, आणि छपाईचा खर्च जसजसा वाढत जाईल, तसतसं लोकसंस्कृतीला व्यासपीठ देणाऱ्यांपुढची आव्हानं वाढत जातील. अधिकाधिक पत्रकार पिळवणुकीच्या भीतीने किंवा आर्थिक अडचणींपायी नव्हे तर स्वेच्छेने सरकारच्या आदेशांपुढे झुकत आहेत. या पार्श्वभूमीवर या पत्रांमधून लिहू शकतील, त्यांचे वर्गणीदार होतील, त्यांच्या वितरणाला मदत करतील अशा लोकांची गरज वाढते आहे. या लहान पत्रांना टिकायचं असेल आणि वाढायचं असेल, सध्याच्या लोकशाहीविरोधी व्यवस्थेला आव्हान द्यायचं असेल तर आत्तापर्यंत जे फक्त बोलत राहिलेत, त्यांनी अशा पत्रांना कृतीशील पाठिंबा द्यावा लागेल.
पान ४३३ - ४३७
***


संपादन : आनंद तेलतुंबडे व शोमा सेन
प्रकाशक : दानिश बुक्स
***

२६ फेब्रुवारी २०१३

भालचंद्र नेमाडे आणि रा. रा. टीव्ही

भालचंद्र नेमाडे यांना उद्या २७ तारखेला नाशिकमधे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मिळतोय. शिवाय कुसुमाग्रजांच्या जयंतीचा हा दिवस मराठी भाषा दिन म्हणूनही मानला जातो. ह्या दोन गोष्टी उद्या आहेत, त्यांची नांदी म्हणून आज ही नोंद. 'उद्या'ऐवजी 'आज' का? तर एकूणच 'उद्या'ची खात्री नसते म्हणून. म्हणजे काय? तर नोंद वाचून पाहा :

सुरुवातीला हा व्हिडियो पाहूया, टीव्ही चॅनलवरच्या एका लहानशा मुलाखतवजा बातमीचा -


चिपळूणमधे झालेल्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान राज्यभरातल्या लेखकांना 'एबीपी माझा'ने आवडतं लिखाण कोणतं असं विचारलं, त्यात भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' आणि 'हिंदू' यांचं आवडती कादंबरी म्हणून लेखकांनी नाव घेतलंय. मराठी साहित्याची चौकट बदलणारे, कादंबरीलेखनाची नवी शैली निर्माण करणारे नेमाडे यांचं वेगळेपण त्यामुळे पुन्हा एकदा समोर आलंय. - असं आपल्याला सुरुवातीला सांगितलं जातं. त्यानंतर नेमाड्यांशी गप्पा मारूया, असं निवेदक आपल्याला सांगतो. 

यात नेमाडे औंरगाबादला कॅमेऱ्यासमोर बसलेले आहेत, तर निवेदक मुंबईतल्या स्टुडियोत उभा आहे. सुरुवातीला 'कोसला'चं गारूड अजूनही कायम का आहे असं वाटतं, असा प्रश्न विचारला जातो. नंतर 'हिंदू'ची वैशिष्ट्यं विचारली जातात. या सर्वांवर नेमाडे उत्तरं देतात, ती मुळातून ऐकता येतील.

त्यानंतर 'हिंदू'च्या दुसऱ्या भागाबद्दलचा प्रश्न विचारताना निवेदक म्हणतो की, मोठा चाहतावर्ग तुमच्या नवीन लिखाणाची आतूरतेने वाट बघतोय, तर दुसरा भाग कधी येईल?

यावरही नेमाडे काहीसं कथानक स्पष्ट करून 'हिंदू'चा दुसरा भाग 'वंशवृक्ष पारंबी' ह्या वर्षीच येईल असा अंदाज देतात. यात नेमाडे म्हणतात की, तसे कच्चे खर्डे खूप झालेत, ते आत्ताही छापता येतील, पण वाचक हल्ली इतके हुशार झालेत तुमच्यासारखे की त्यांना खराब वाचायला देणं आपल्याला परवडणार नाही. ह्याने इतकं थांबून असं खराब लिहिलं तर न लिहिलेलंच बरं, असं लोक म्हणतील. अनेक थरातले, खेड्यातलेपाड्यातले असे खूप वाचक झालेत. 

यानंतर विनोदाला सुरुवात होते. नेमाड्यांना निवेदक त्यांचं अखिल भारतीय साहित्य संमेलनाबद्दलचं मत विचारतो, त्यावर नेमाडे म्हणतात : आधी आपण त्यावर बोलणं बंद करावं. कारण ते आता अगदी शून्याच्या खाली गेलेलं आहे. याच्यापुढे आणखी खाली ते जाईल असं काही वाटत नाही. लोकांनी त्यावर बोलण्यापेक्षा लिहावं - वाचावं. 

मग नेमाडे आणखी अशीच काही हाणाहाणी करतात, जसं की, साहित्य संमेलनाला जाण्याची अट बहुधा हीच असावी की लिहिलं वाचलं नसेल तरच इथे या, वगैरे.

यावर म्हणजे सगळीच साहित्य संमेलनं बंद केली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का, असं निवेदक विचारतो. त्यावर नेमाडे म्हणतात, लहान संमेलनं हवीत, वगैरे. 

कदाचित म्हणूनच साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे तीन दिवसांचा पांढरा हत्ती असं म्हटलं जातं, असं निवेदक म्हणतो त्यावर नेमाडे म्हणतात, हत्ती पण नाही, ती तीन दिवसांची अळीच असते. 

आता या कार्यक्रमात मधे निवेदक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांशीही - नागनाथ कोत्तापल्ले यांच्याशी-  बोलतो. नेमाड्यांकडे लक्ष देऊ नये, असं कोत्तापल्ले म्हणतात. जिवंत समाज असतो तिथे वाद होणार. मिलिटरीमधे एकाने आदेश द्यायचा आणि बाकीच्यांनी मान्य करावं असं होतं, पण समाजात तसं होत नाही, आदी समर्थन करून कोत्तापल्ले काही बोलू पाहातात.

कोत्तापल्लेंनतर लगेचच 'लोकसत्ते'चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांच्याशीही निवेदक संवाद साधतो. कुबेर म्हणतात की, या संमेलनाचा साहित्याशी काहीही संबंध नाही. यासंबंधी 'लोकसत्ते'चा अग्रलेखही वाचता येईल. कारण त्या लेखाचा संदर्भ कुबेर बोलताना देतात.

मधल्या या दोन लहान गप्पांनंतर पुन्हा निवेदक नेमाड्यांकडे येतो आणि साहित्य संमेलनं बंद करायला हवीत, तर साहित्याचा प्रसार कसा करावा याबद्दल विचारणा करतो. त्यावर नेमाडे म्हणतात, की तळागाळात पुस्तकं गेली पाहिजेत, लिहिणं - वाचणं हेच मुख्य करण्यासारखं आहे. मल्याळीमधे पहिल्या आवृत्तीच्या चाळीस हजार प्रती खपतात आणि मराठीत एक-दीड हजार प्रती म्हणजे लाजिरवाणी स्थिती आहे. ती बदलली पाहिजे. कारण वाचणारे आहेत.

या कार्यक्रमात आपल्याला काय सांगण्यात आलं?

तर,

१. नेमाड्यांच्या 'कोसला' आणि 'हिंदू' या अजूनही प्रभाव ठेवून आहेत आणि राज्यभरातून संमेलनाला आलेल्या अनेक लेखकांनी या कादंबऱ्या त्यांच्या आवडत्या असल्याचं सांगितलं.

२. नेमाडे हे साहित्याची चौकट बदलणारे आणि कादंबरीलेखनाची नवी शैली निर्माण करणारे लेखक आहेत.

३.  हल्लीचे मराठी वाचक हुशार झालेले आहेत.

४. 'हिंदू'च्या दुसऱ्या भागाची एक मोठा चाहतावर्ग आतूरतेने वाट पाहातो आहे.

एवढ्या सुंदर माहितीनंतर साधारण सोळा मिनिटांच्या या कार्यक्रमात शेवटी आपल्याला सर्वांत महत्त्वाची माहिती दिली जाते, त्यात निवेदक म्हणतो - भालचंद्र नेमाडे हे कोण आहेत नेमके, ते अतिशय ज्येष्ठ असे लेखक आहेत, नेमके कोण आहेत ते आपण पाहूया? 
त्यानंतर कोसला, बिढार, जरीला, झूल, हिंदू या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांचे उल्लेख, मेलडी हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. हिमाचल प्रदेश सरकारच्या शिफारशीवर गतवर्षी त्यांनी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, अशा पाट्या आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतात .

आणि या पाट्यांबरोबर खाली एक सततची पाटी असते : राहा अपडेट.
***

हे सगळं पाहिल्यानंतर कदाचित काहींना असं कुठेतरी ऐकलेलं आठवू शकेल की, नेमाडे टीव्हीच बघत नाहीत. त्याबद्दल एक म्हणणं सतीश काळसेकरांनी त्यांच्या 'वाचणाऱ्याच्या रोजनिशी'त दिलंय, ते असं :
आताच्या बदललेल्या काळात आणखी एक नवाच ताप आपण स्वतःहून ओढवून घेतला आहे. तो म्हणजे दूरध्वनी आणि त्याची पुढची पायरी, भ्रमणध्वनी, आणखी एक, अखंड चालणारे दूरदर्शन. आपल्यापुरते हे सगळे टाळावे तर ते फक्त आमचे ज्येष्ठ मित्र भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्यांनाच शक्य.
पान २०

नेमाडे टीव्ही पाहत नसले तरी लोकांनी त्यांना टीव्हीवर पाहिलेलं आहे. आणि 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी ६०३ पानांची आहे. या दोन वाक्यांचा एकमेकांशी काय संबंध, असं कोणी विचारू शकेल. तर त्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसावा. किंवा असेलही.
***

आता आपण 'वाचा' या अनियतकालिकात नेमाड्यांनी १९६८मधे लिहिलेल्या 'हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो कां?' या लेखाकडे वळू या. हा लेख नेमाड्यांच्या 'टीकास्वयंवर' या ग्रंथात समाविष्ट केलेला आहे. या लेखाची सुरुवात अशी आहे :
नव्या-जुन्या लेखकांनी व अड्ड्याअड्ड्यांनी एकमेकांचा उथळपणा व अप्रामाणिकपणा सिद्ध करीत राहावे, हे नव्या मराठी साहित्यातले एक आवश्यक दुखणे होऊन बदले आहे. गेल्या दीडशेक वर्षांत इंग्रजीद्वारा आपल्या साहित्याचे पुनरुज्जीवन होण्यापेक्षा पडझडच जास्त झाल्याचे दिसते. पुनरुज्जीवनास लागणारी विद्वत्ता व बुद्धिमत्ता अंगी असणारी निदान एक तरी तेजस्वी लेखकांची टोळी निपजल्याशिवाय साहित्याला उसनवारी पचवून येणारे उमदेपण येत नाही व परंपरा फोफावत नाही, हे आपल्या युगप्रवर्तक म्हणवणाऱ्या व दरवर्षी दिल्लीस जाऊन पद्मश्री घेऊन येणाऱ्या थिट्या लेखकांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे आपल्या समाजात एक तर विद्वत्ता व बुद्धिमत्ता नसावी किंवा असलीच तर अशी माणसे लिहिण्यात रस घेत नसावी, असे म्हणणे भाग आहे. म्हणजे मग लिहिले जाते ते कोणाकडून? तसेच आपल्या साहित्यातला हिणकसपणा आपल्या लेखकांच्या उथळपणातून व अप्रामाणिकपणातून येतो, हे जर खरे असेल तर आपल्या अशा लेखकांना वेळीच त्यांचे दोष का दाखवले जात नाहीत? शिवाय एक प्रकारचे वाङ्मयीन ठोंबेपण मराठीव्यतिरिक्त अन्य भाषांतही कमीअधिक प्रमाणात दिसत आहे असे इतिहास सांगतो, तर ह्या सार्वत्रिक घसाऱ्याचे कारण काय? ह्याच्या अनेक कारणांची स्पष्ट छाननी करण्याचे येथे योजिले आहे.
(टीकास्वयंवर, पान ३३-३४)

आणि या लेखाचा शेवट असा आहे :
लेखक आता आपल्या जाणिवांशी कितपत प्रामाणिक राहू शकेल हा सगळ्यांत मोठा प्रश्न आहे. लेखकाचे जाणवणे हे मानवी समाजाच्या विकासप्राधान्यामुळे व शास्त्रीय दृष्टिकोनामुळे दुय्यम, संकुचित झाले आहे हे तर खरेच, परंतु तो इतर नागरिकांप्रमाणे भौतिकताप्रिय, सुखलोलुप व स्थैर्यलंड झाल्याने अतिशय अप्रामाणिक असू शकेल. हल्लीची मोठमोठी म्हणून गाजलेली पुस्तकेही निव्वळ 'वाचनीय' तेवढी असतात याचेही कारण हेच आहे. जगातल्या आपल्या वाटेला आलेल्या, उरल्यासुरल्या दुःखावर फक्त 'लिहून' तो एरवी सुखाने जगू इच्छितो. साहित्यापेक्षा अर्थातच जीवनाच्या गरजा जास्त महत्त्वाच्या वाटणे बरोबरच आहे. लेखकाचे कार्य फक्त आरशासारखे, जीवन फक्त दाखवण्याचे आहे, असे कोण्या सराईत टीकाकाराने म्हटले की प्रश्न सुटेल असे नाही. साहित्य सुखासुखी मरत असेल तर मरू द्यावे असेही काही लोक म्हणतील, क्वचित एक चादर मैलीसीमाणदेशी माणसं लिहिणारे मोठे लेखक होऊन जातात, नाही असे नाही. परंतु हे मोठे लेखक पूर्वी 'नाइलाजाने' भोगाव्या लागणाऱ्या दुःखावर मोठे होऊन मुंबईत किंवा पुण्यात आपले दैनंदिन जीवन सुरक्षित, सुखकर करून पूर्वीच्या अनुभवावर सफेती फिरवून इतरांसारखे स्टँडर्डने राहात असल्याचे आढळेल. ह्याला जर कोणी कलाकाराचे अधःपतन म्हणणार नाही तर आमचा सगळा लेखच वाया गेला म्हणावयाचा. त्यातून सर्व मानवी समाज भौतिक राहणी उंचावायला विडा उचलून बसलेले; आणि निरोगी, दुःखरहित प्रजेचे डोहाळे सर्वांना लागलेले. दुःखाला सामोरे जाण्याची कुणाची तयारी नाही. तात्पर्य, सांस्कृतिक विकासात भौतिकतेच्या मोहिनीचा एक प्रवाह साहित्यकलेच्या तटावर कायम धडका मारीत आहे आणि त्यातून साहित्य कसे बचावते हे सांगणे मुश्किल आहे.
ह्या कलेचे हे दुर्दैवी अधःपतन थेट होमर-व्यासादिकांपूर्वीपासूनच हळूहळू आपल्यापर्यंत आले की काय हे आज ताडता आले तरी बिनपुराव्याचे आहे. परंतु आज आपल्या युगातील पुराव्यांनी ह्या अधःपतनाचे निदान करता येते. जीवनाचे व सृष्टीचे रौद्र स्वरूप ज्या भाग्यवंतांच्या वाट्याला आले त्यांनाही ते वरदायी अनुभवविश्व परवडत नाही. मोठमोठ्यांची ही दशा, तर निव्वळ मानमान्यता-नावलौकिकासाठी, भांडवल म्हणून पैसा मिळवण्यासाठी, वाचकप्रियतेसाठी, बंडखोरीसाठी, वर्तमानपत्रे-मासिके भरण्यासाठी व इतर अनेक भौतिक कारणांसाठी फक्त लिहिणाऱ्या आपल्या सार्वजनिक दौलतमंद लेखकांकडून किती टक्के प्रामाणिकपणाची अपेक्षा करावी हे सांगण्याचीसुद्धा गरज नाही. त्यातून धंदेबाजी व अड्डेबाजी ही एक परंपराच झाली आहे.
पण सुदैव हे की अजून कुठेतरी लिहिण्याच्या अवस्थेतला खास आदिलेखक व वाचण्याच्या अवस्थेतला अस्सल वाचक ही दोन्ही खिन्न माणसे भौतिकतेच्या युगातही आपल्यात कशीबशी जिवंत आहेत हे जाणवते. एरवी आपण विकासशील मानवी समाजाचे सुखलोलुप नागरिक होत. आदिलेखकाचे तेज क्वचित कुठे नव्या पुस्तकात जाणवेल तेवढेच. एरवी तो उग्र प्रचंड लेखक नाहीसाच होत आहे. आणखी एक वन्य पशु नामशेष होत आहे. निसर्गाला तो नको आहे. त्याचे रक्षण करा व सप्ताह साजरा करा, पोस्टरे लावा व तिकिटे काढा. PRESERVE WILD LIFE.
(पान ४४-४६)

साकेत प्रकाशन
***

उद्याच्या दिवशीचं निमित्त साधून ही नोंद आज केली याचं एक कारण आपण अप-'डेट' राहू इच्छित नाही हे आहे.

आणि तसंही उद्याची खात्री नाही म्हणून आज ही नोंद केली असली तरी आजचा उद्या हा उद्याच्या दिवशी आजच असणार.

धन्यवाद.

वाचत राहा 'रेघ'.