०२ ऑक्टोबर २०१५

बिहारचे गांधी आणि हिंसक मोसमी वारे

आज २ ऑक्टोबर- गांधी जयंती.

शिवाय, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबरला फेसबुक या कंपनीच्या अमेरिकेतील मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी तिथल्या 'वॉल'वर त्यांनी लिहिलं की, 'अहिंसा परमो धर्म:। सत्यमेव जयते'. किती सुंदर, किती आदर्श विचार, किती नैतिकतेचा प्रचार, लाइक लाइक लाइक!

या दोन निमित्तांनी ही नोंद.

ही नोंद थोडी मोठी झालेय. तीन भागांमध्ये केलेय. त्यामुळं वाचकांना आपापल्या वेळेच्या सोईनं तीन टप्प्यांमध्ये वाचावी वाटली तरी तसं करता येईल.
०००

एक

दीड महिन्यापूर्वी, १७ ऑगस्टला दिल्लीत एक पत्रकार परिषद झाली. कोब्रापोस्ट या संकेतस्थळानं आयोजित केलेली. या वेळी 'ब्लॅक रेन' या नावाची सुमारे दीड तासाची एक चित्रफीत दाखवली गेली, असं आपल्याला इंटरनेटवरून कळतं. ही चित्रफीत सहा भागांमध्ये यू-ट्युबवर पाहायला मिळते आणि त्यासंबंधीचा मजकूर कोब्रापोस्टच्या संकेतस्थळावर आहेच.


या चित्रफितीत आपल्याला बिहारमधल्या रणवीर सेनेशी संबंधित अनेक तपशील सांगितले जातात. या सेनेच्या काही सदस्यांची बोलणी त्यांच्याच तोंडून ऐकायला-पहायला मिळतात. बिहारमधील भूमिहार जातीच्या मंडळींची ही सशस्त्र संघटना. सप्टेंबर १९९४मध्ये भोजपूर इथे स्थापन झाली आणि नोव्हेंबर १९९५मध्ये तिच्यावर बंदीही आली. पण विविध पातळ्यांवर संघटनेच्या कारवाया नंतरही सुरू राहिल्या हे त्या राज्यात झालेल्या हत्याकांडांमधून दिसून आलं. 'अखिल भारतीय राष्ट्रवादी किसान संघटन' हा आता या सेनेचा मुखवटा आहे, हेही या चित्रफितीतून कळतं.

रणवीर सेनेनं १९९४ ते २००० या काळात बिहारमधल्या १६ हत्याकांडं घडवली आणि त्यात सुमारे अडीचशे ते तीनशे दलित-आदिवासींना आपले प्राण गमवावे लागले. या विविध हत्याकांडांमध्ये वेगवेगळी भूमिका निभावलेल्या सेनेच्या सदस्यांच्या मुलाखती कोब्रापोस्टनं छुप्या कॅमेऱ्यानं चित्रीत केल्या. शिवाय हल्ला झेललेल्या काही व्यक्तींशीही कोब्रापोस्टच्या प्रतिनिधीनं संवाद साधलेला आहे. त्याशिवाय या संदर्भातील एक सदस्यीय चौकशी आयोगाचे अध्यक्ष- माजी न्यायाधीश अमीर दास यांचीही मुलाखत आहे.  रणवीर सेना आणि काही राजकीय पक्षांमध्ये हितसंबंध आहेत का, याची चौकशी करण्याची जबाबदारी दास यांच्या आयोगावर होती. अनेक अडचणीचे निष्कर्ष दास यांच्या चौकशीतून पुढे येत होते. पण शेवटी २००५मध्ये आयोगाचा गाशा गुंडाळण्यात आला. (दास यांच्याशी साधण्यात आलेला संवादही छुप्या कॅमेऱ्यानं का चित्रीत केला, याबद्दल या चित्रफितीत काही कारण दिलेलं दिसत नाही. रणवीर सेनेच्या बाबतीत छुप्या कॅमेऱ्याचा वापर समर्थनीय ठरत असला, तरी दास यांच्या बाबतीत तसं म्हणता येईल का? दास यांनी आधी काही माहिती लपवली होती आणि ती उघड करायला असा छुप्या कॅमेऱ्याचाच मार्ग फक्त खुला होता, असं काही असल्याचं ही चित्रफीत सांगत नाही. शिवाय दास हे अनेक राजकीय नेत्यांची स्पष्ट नावं घेऊन, रणवीर सेनेशी या नेत्यांचे कसे संबंध होते हे सांगतात. त्यांना दिलेलं चौकशी आयोगाचं काम ते त्यांच्या परीनं नीटच करत होते, असंही चित्रफितीतून दिसतं. आरोपींच्या अपराधाच्या कबुलीची नोंद होण्यासाठी कॅमेऱ्यात ते चित्रीत केलं, हे समजू शकतं. पण दास यांना उघडपणे कॅमेऱ्यावर मुलाखतीची विचारणा केली होती का? त्यासंबंधी ते काय म्हणाले? या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. दास यांनी यापूर्वी आपल्या अहवालाबद्दल तेहेलकाला मुलाखत दिलेली होती, नेत्यांची नावं घेतलेली नसली, तरी त्यांनी बऱ्यापैकी स्पष्ट भाषा वापरलेली आहे. शिवाय हा अप्रकाशित अहवाल काही प्रसारमाध्यमांच्या हातीही लागलेला होताच.)

यातल्या बाथनी टोला आणि लक्ष्मणपूर बाथे या दोन हत्याकाडांबद्दल आपण ओझरती नोंद करू. बाकी तपशील वाचक चित्रफितींमधून समजून घेऊ शकतीलच. आपण नोंदीत चिकटवलेला व्हिडियो हा फक्त या चित्रफितीचा पहिला भाग आहे.

जुलै १९९६मध्ये भोजपूरमध्ये बथानी टोला गावात २१ दलित व मुस्लिमांची भर दिवसा हत्या करण्यात आली. या हत्याकाडांसंबंधीच्या खटल्यात आरा सत्र न्यायालयाने रणवीर सेनेचे सदस्यांपैकी तिघांना देहदंड, तर २० जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पण ऑक्टोबर २०१२मध्ये पटना उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची मुक्तता केली.

बथानी  टोला हत्याकांडासंबंधी एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कॅमेऱ्यासमोर सांगतो:
रणबीर सेना द्वारा जनसंहार पे जनसंहार हो रहा था. आप को हम बतलाए.. तीन (पुलीस) कॅम्प था. सब एक किलोमीटर, आधा किलोमीटर की दुरी पर. रात में नही, दिन में, हत्या हो रहा था. और तीनो कॅम्प देख रहे थे. लोग यहाँ पे भाग कर के जा रहे थे की, भाई, हम लोगो की मदद किजीए. तो बोले, नही करेंगे. जब की, सरे आम पुरे लोग देखा. और हम भी नहीं. ये गाव में अगलबगल के लोग, फिल्म जैसे देख रहे थे. पुलिस देख रही है. और यहाँ पे कत्ले आम हो रहा है.
त्यानंतर, १ डिसेंबर १९९७मध्ये आरवल जिल्ह्यातल्या लक्ष्मणपूर बाथे गावात रणवीर सेनेनं दलित हत्याकांड घडवलं. या हत्याकाडांत ५८ दलितांचा मृत्यू झाला. रात्री दहा वाजता हा हल्ला झाला होता. त्यात २७ स्त्रिया, १६ मुलं, आणि अगदी गर्भातली बालकंही मारून टाकली. 'स्वतंत्र भारताच्या इतिहासातला हा सगळ्यांत लाजीरवाणा दिवस आहे', अशी प्रतिक्रिया तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी तेव्हा दिली होती. या प्रकरणात पटणा सत्र न्यायालयाने ४६ आरोपींपैकी १६ जणांना फाशी आणि दहा जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली. पण पुढे पटणा उच्च न्यायालयाने २०१३मध्ये या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. रात्रीच्या वेळी हल्लेखोरांचे चेहरे ओळखण्याच्या बाबतीत साक्षीदारांच्या साक्षी विश्वासार्ह ठरत नाहीत, असा न्यायालयानं या निकालावेळी म्हटलं होतं!

या हत्याकांडांमध्ये जीव गमावणाऱ्यांमध्ये स्त्रिया आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे, हे तर दिसतंच. त्यासंबंधी बोलताना रणवीर सेनेचा सदस्य रवींदर चौधरी असं म्हणतो की, तुम्हाला पिकलेले आंबे आणायला पाठवलं आणि तुम्ही एखाद्या काठीनं ते पाडायला गेलात, तर दोन पक्क्या आंब्यांसोबत समजा आठ कैऱ्याही खाली पडल्या, तर मग त्याही कापूनच टाकणार ना. तरुणासोबत पोरगं सापडलं तर तेपण साफ करून टाकलं.
दुसरे एक रणवीर सेनेचे आणखी ज्येष्ठ सदस्य सिद्धनाथ सिंग म्हणतात, तो इस तरह की निर्मम हत्या करते हैं, तो हम कहे की हुजूर हमारा इंडिया मे हमारा धर्म जो है वो ऐसा नही बताता है की बुढा को मारिएगा तो पाप नही लगेगा और जवानका को मारेगा तो पाप लगेगा और लडका को मारेगा तब पाप लगेगा, ऐसा कोई धर्म नही, ऐसा कोई कानून नही. आप जवान को मारेगा तभी बीस साल सजा और बुढवा को मारेगा तो दो साल सजा और लडका को मारे तो पचास साल सजा, ऐसा कोई कानून नही है. हत्या हुजूर हत्या होता है, हत्या हत्या है, जो जीव मर गया वो हत्या है, समान सब के लिए है. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनी रणवीर सेनेला आर्थिक मदतीपासून राजकीय संरक्षणापर्यंत काय काय दिलं, हे सगळं सांगताना सेनेचा सदस्य राहिलेला प्रमोद सिंग चित्रफितीत दिसतो. केवळ सिन्हाच नव्हे तर मुरली मनोहर जोशींचाही उल्लेख चित्रफितीत येतो. ही सर्व मदत मिळवताना रणवीर सेनेचे संबंध केवळ भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांशी होते असं नाही, तर माजी पंतप्रधान व जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर यांनीही या रणवीर सेनेला पाठबळ दिलं होतं. रणवीर सेनेच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यात भारतीय सैन्यात काम करणारे त्यांचेच जातबंधू कसे मदत करत होते, भारतीय सैन्याचा 'रिजेक्टेड' शस्त्रास्त्रांचा माल यांच्यापर्यंत कसा पोचत होता, असे अनेक तपशील या चित्रफितीत प्रत्यक्ष रणवीर सेनेच्या सदस्यांच्याच तोंडून ऐकायला मिळतात. यातल्या काही सदस्यांना, वर उल्लेखित हत्याकांडांमध्ये उच्च न्यायालयानं दोषमुक्त केलेलं आहे आणि खटले सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेले आहेत.

लिबरेशन, सप्टेंबर २०१५ । मुखपृष्ठ
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) (लिबरेशन गट) [सीपीआय-एमएल-लिबरेशन], हा मूळचा नक्षलवादी पक्षांमधला एक पक्ष. या पक्षाचं जास्त अस्तित्व बिहारमध्ये आहे. आणि याच पक्षाचा 'मा.ले.' असा उल्लेख चित्रफितीत अनेकदा येतो. या पक्षाच्या माध्यमातून स्थानिक शेतमजूर संघटित होत होते. जमिनीच्या प्रश्नाची पार्श्वभूमी या सर्व घडामोडींना असल्याचं या चित्रफितीतून ओझरतं स्पष्ट होतंच. इथं ज्या सीपीआय-एमएल-लिबरेशन पक्षाचा उल्लेख झालाय, त्याची मुळं नक्षलवादी फाटाफुटींमध्ये आहेत, पण हा पक्ष आता संसदीय मार्गानं चालणारा राजकीय पक्ष आहे. आरा मतदारसंघातून १९८९च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे उमेदवार रामेश्वर प्रसाद विजयी झाले होते. त्या अर्थी, संसदेचे पहिले 'नक्षलवादी' खासदार, असं त्यांचं वर्णन करणारे करतात. तर, रणवीर सेनेनं घडवलेल्या हत्याकांडांच्या प्रदेशात हा राजकीय पक्ष क्रियाशील आहे आणि आता अधिकृतरित्या तो निवडणुकीच्या मार्गांवरून चालतो. काही वेळा बिहार विधानसभेत त्यांचे काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढे उमेदवार निवडूनही गेलेले आहेत. २०१०च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा कोणीच उमेदवार निवडून आला नसला, तरी काही मोजक्या ठिकाणी त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं आकडेवारी सांगते. आणि आता बिहारमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. (मूळ नक्षलवादी चळवळीच्या काळातलं 'लिबरेशन' हे मुखपत्र याच पक्षाकडून चालवलं जातं आता. त्या मासिकानं सप्टेंबर २०१५च्या अंकात 'कोब्रापोस्ट'च्या 'स्टिंग ऑपरेशन'संबंधी पक्षाच्याच कविता कृष्णन यांचा सविस्तर लेख छापला होता.)

रणवीर सेनेचा संस्थापक ब्रह्मेश्वर सिंग याचीही जून २०१२मध्ये हत्या करण्यात आली. हे ब्रह्मेश्वर सिंग 'आयुष्यभर खऱ्या अर्थाने गांधीवादी मूल्यांना धरून चालले', अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार व सध्या केंद्र सरकारमध्ये लघुउद्योग राज्य मंत्री असलेले गिरीराज सिंग यांनी जून २०१२मध्ये दिली होती

या सर्व घटनांमध्ये जातीय राजकारणाचा भाग मोठा आहेच आणि त्याबद्दल थोडासाच तपशील इथं वर नोंदवला गेलेला आहे. रणवीर सेनेनं घडवलेली हत्याकांडं झाली तो बहुतेकसा काळ बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचं/ लालूप्रसाद यादव-राबडी देवी यांचंच राज्य होतं. शिवाय, त्यांच्याच काळात १९९७ साली वर उल्लेख झालेला अमिर दास आयोग स्थापन झाला. नंतर २००५ साली नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल व भारतीय जनता पक्षाचं राज्यात सत्तेवर आलं आणि मग लगेचच हा आयोग बंद करून टाकण्यात आला.

या संबंधी अधिक तपशिलासाठी इच्छुक वाचकांना खालील लेख उपयोगी पडू शकतील. हे लेख बाथनी टोला आणि लक्ष्मणपूर बाथे इथल्या हत्याकांडांसंबंधी पटना उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालांनंतर त्या त्या वेळी आलेले आहेत. बथानी टोलासंबंधीचे लेख २०१२च्या मध्यातले, तर लक्ष्मणपूर बाथेसंबंधीचे लेख २०१३च्या शेवटाकडे प्रसिद्ध झालेले आहेत. तिसऱ्या कप्प्यातले लेख गेल्या महिन्यातले, कोब्रापोस्टच्या वार्ताफितीनंतरचे आहेत. केवळ या दोन हत्याकांडांचीच नाही, तर साधारण या घटनांमागची पार्श्वभूमी स्पष्ट व्हायला या लेखांची मदत व्हावी. यातले काही लेख पत्रकारांचे आहेत. रूढ अर्थानं पत्रकार नसलेल्यांपैकी बेला भाटिया यांनी मध्य बिहारमधल्या नक्षलवादी घडामोडींवर केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. केलं आणि त्यांनी स्थानिकांशी बोलून खोलवर अभ्यास केलेला आहे, त्यामुळं त्यांचा या संदर्भातल्या लेखाचा दुवा जोडला आहे. दिपांकर भट्टाचार्य आणि कविता कृष्णन ही सीपीआय-एमएल-लिबरेशन या पक्षाशी संबंधित आहेत: 

'फ्रंटलाइन' या पाक्षिकातले लेख
-
- बॅक टू बथानी टोला

'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली' या साप्ताहिकातले लेख-
- जस्टिस नॉट व्हेन्जिअन्स- बेला भाटिया
- रणवीर सेना रिव्हिजिटेड- दिपांकर भट्टाचार्य
- डीपली एम्बेडेड इनजस्टिस- संपादकीय टिपण
- नो वन किल्ड देम- संपादकीय टिपण

कोब्रापोस्टच्या निमित्तानं आलेले दोन लेख-
- पब्लिक सिक्रेट्स नाऊ प्रुव्हन- कविता कृष्णन यांचा लिबरेशनमधला लेख
- प्रोसिक्युशन अॅज डिफेन्स- इपीडब्ल्यूचं संपादकीय टिपण
०००

दोन

'लोकसत्ते'मध्ये १ सप्टेंबर रोजी 'सह्याद्रीचे वारे' या सदरात देवेंद्र गावंडे यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता लेखाचं शीर्षक होतं, 'मुख्यमंत्री उद्योगस्नेही, तरीही...'. लेखासोबतच्या 'इंट्रो'तला मजकूर असा:
उद्योगस्नेही धोरण यशस्वीपणे राबवल्याची पावती आता कुठे विदर्भाला मिळू लागलेली असताना, विदर्भाच्या नक्षलग्रस्त सूरजागड भागात खाणउद्योगास अहिंसक विरोधाचे काम नक्षलसमर्थक संघटना करीत आहेत. दुसरीकडे, हा भाग नक्षलग्रस्त राहू नये म्हणून जी काही पावले राज्य सरकारने उचलली, ती पुढे पडलीच नसल्याने हिंसेचा धोका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच  गृह खातेही सांभाळतात, त्यामुळे हे आव्हान थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते..
या लेखावर एक वाचक-पत्र ४ सप्टेंबर रोजी याच वर्तमानपत्रात छापून आलं, ते असं:
‘मुख्यमंत्री ‘उद्योगस्नेही’, तरीही..’ हा १ सप्टेंबरच्या अंकातील देवेंद्र गावंडे यांचा लेख वाचला. लेखाच्या सुरुवातीलाच असं म्हटलंय की, राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढावी म्हणून मुख्यमंत्री सतत प्रयत्नशील आहेत, आणि त्यांच्या प्रयत्नांना ‘सर्व’च स्तरांतून दादही मिळत आहेत, त्यांचे प्रयत्न यशस्वी व्हावेत, अशी ‘सर्वां’ची इच्छा आहेत, इत्यादी. लेखात उल्लेख केलेले हे ‘सर्व’ म्हणजे कोण?

लोहखनिजाचे मोठे साठे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलसमर्थक संघटना स्थानिक जनतेला संघटित करून, ‘पेसा’ कायद्याचा आधार घेऊन उद्योगांना विरोध करत आहेत, असे सरसकट आरोप या लेखात आहेत. या नक्षलसमर्थक संघटना कोणत्या, हे स्पष्ट न केल्यामुळे वाचकांचा असा गैरसमज होऊ शकतो की, या भागात अहिंसक मार्गानेही जे कोणी सरकारच्या ‘उद्योगस्नेही’ धोरणांना विरोध करतायंत ते नक्षलसमर्थकच असावेत! मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गडचिरोली शहरात पेसा कायदा, वनहक्क, भूमीअधिग्रहण कायदा, इत्यादी संबंधी एक राष्ट्रीय परिषद, भारत जन आंदोलन व अखिल भारतीय आदिवासी महासभा या संघटनांच्या पुढाकाराने झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भारिप-बहुजन महासंघ या राजकीय पक्षांचा पाठिंबा या परिषदेला होता. परिषदेच्या शेवटच्या दिवशी पाच हजार ते आठ हजार आदिवासींनी शहरामध्ये एक मोर्चा काढला, त्या मोर्चातली एक घोषणा अशी होती ‘ना लोकसभा ना विधानसभा, सबसे उंची ग्रामसभा’. उद्योग उभारण्यासंबंधी स्थानिकांच्या म्हणण्याला किंमत द्यावी, अशी मागणी करणारे हे हजारो लोक नक्षलवादी नव्हते आणि त्यांनी लोकशाही मार्गाने मोर्चा काढला होता.

मे २०१०मध्ये रिलायन्सच्या अंबानी बंधूंमधल्या, नैसर्गिक वायूविषयीच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी एक निरीक्षण नोंदवलं होतं, ते असं- ‘खाजगी उद्योग व राज्ययंत्रणा यांच्यातील कंत्राटी संबंधांमुळे... राज्ययंत्रणेची लोकांप्रति असलेली कर्तव्यं दुय्यम ठरावीत हे पाहून आम्हाला गोंधळून जायला झालंय... भांडवलशाहीची लुटारू रूपं एकत्र येऊन पहिल्यांदा नैसर्गिक स्त्रोतांसारख्या मर्यादित उपलब्धतेच्या उत्खननक्षम उद्योगांना घेराव घालतात, हे इतिहासात आणि जगभर सिद्ध झालेलं आहे...’  रेड्डी यांचं काहीसं आक्रस्ताळं वाटू शकणारं निरीक्षण संपूर्ण इथं देणं शक्य नाही. पण हा सरकारीच दस्तावेज असल्यामुळे त्यातल्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हरकत नाही! गडचिरोलीतल्या लोहखनिजाचे साठे भाडेतत्त्वावर खाजगी उद्योगांना दिल्याचा उल्लेख आपल्या लेखात आहे. तर, हे स्त्रोत खाजगी उद्योगांना भाडेतत्त्वावर देताना सरकार आदिवासींच्या म्हणण्याला किती महत्त्व देतं? हा प्रश्न या लेखात कुठेच नाही.

केंद्र सरकारच्याच नियोजन आयोगाने एप्रिल २००८मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात पुढील मत नोंदवलेलं होतं, ‘आदिवासी आणि राज्ययंत्रणा यांच्यातला अंतर्विरोध तीव्र झाल्यामुळे अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे... लोकांच्या जगण्याशी नि उदरनिर्वाहाशी संबंधित विविध समस्यांकडे लक्ष देण्यातलं राज्ययंत्रणेचं अपयश, अपुरेपण आणि तिची अन्यायकारक भूमिका यांमुळे नक्षलवादी कारवायांना (पाय पसरायला) अवकाश मिळाला.’

वर दिलेले दोन दाखले सरकारी यंत्रणेतूनच आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर तरी ‘नक्षलसमर्थक’ असल्याचा आरोप होणार नाही कदाचित. उद्योगांना होणाऱ्या (आंधळ्या किंवा डोळस) विरोधाचा मुद्दा निव्वळ नक्षलवाद्याच्या धोक्याशी जोडणं हेच धोकादायक आहे. भारत सरकारच्या मालकीचे नैसर्गिक स्त्रोत खाजगी उद्योगांना दिले जाताना साट्यालोट्याचे व्यवहार होतात का? आदिवासीबहुल भागांमध्येच हे स्त्रोत मुबलक प्रमाणात असतील, तर त्यांचं उद्योगात रूपांतर करताना आदिवासींच्या भूमिकेला महत्त्व दिलं जातं का? आदिवासींच्या इलाक्यातली ही श्रीमंती आपण लुटणार की त्यांना त्याबद्दल काय म्हणायचंय याला थोडीतरी किंमत देणार? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याऐवजी नक्षलवादाच्या धोक्याला केंद्रस्थानी आणणं म्हणजे साप समजून भुई धोपटण्याचा प्रकार आहे. आणि ती भुईही आदिवासींच्या  मालकीची आहे!
(हे वरचं पत्र रेघेनं पाठवलेलं)

या पत्रावर प्रतिक्रिया म्हणून आणखी एक पत्र, ११ सप्टेंबरच्या अंकात आलं, त्यात असं म्हटलं होतं:
‘सहय़ाद्रीचे वारे’ सदरातील ‘मुख्यमंत्री उद्योगस्नेही, तरीही..’ हा देवेंद्र गावंडे यांचा लेख (१ सप्टेंबर) व त्यावरील ‘आदिवासीस्नेही कधी व्हायचे?’ ही प्रतिक्रिया (लोकमानस, ४ सप्टेंबर) वाचली. ‘गडचिरोली जिल्हय़ात नक्षलसमर्थक संघटना जनतेला संघटित करून ‘पेसा’ कायद्याचा आधार घेऊन उद्योगांना विरोध करीत आहेत’ या मुद्द्यावर पत्रलेखकाचा रोष आहे. बस्तर-गडचिरोलीसारख्या माओवादग्रस्त भागांपासून बऱ्याच दूर पुण्यासारख्या शहरात असल्याने पत्रलेखकास माओवादी संघटनेच्या क्रूर हिंसाचाराचा अनुभव आलेला नसावा. जंगलात बंदूक घेऊन फिरणारा हाच फक्त माओवादी, अशा चुकीच्या समजुतीतून हे पत्र लिहिले गेले आहे असे वाटते. सशस्त्र दलम हे फक्त एक चतुर्थांश भाग आहेत, तर तीन चतुर्थांश माओवादी शहरी भागात शस्त्राशिवाय काम करीत आहेत, याची कदाचित पत्रलेखकास जाणीव नसावी. तरुण, स्त्रिया, आदिवासी, दलित या समाजघटकांमध्ये माओवादी फ्रंट संघटना कशा बांधाव्यात, त्यांची गोपनीय कार्यपद्धती, त्यांचे उद्देश, याचा मुद्देसूद ऊहापोह या संघटनेने त्यांच्या ‘स्ट्रॅटेजी अ‍ॅन्ड टॅक्टिक्स ऑफ इंडियन रिव्होल्यूशन’ आणि ‘अर्बन परस्पेक्टिव्ह’ या त्यांच्या कागदपत्रांमध्ये केलेला आहे. माओवादाबद्दल असलेल्या प्रचंड अज्ञानामुळे शहरांमधील असंख्य ‘भाबडे’ विचारवंत, कार्यकर्ते हे आज माओवादी फ्रंट संघटनांमध्ये काम करीत आहेत. दुर्दैवाने याची या अभावित समर्थकांना जाणीवही नाही.

माओवाद्यांच्या ‘मायावी’ प्रचाराला बळी पडून चंद्रपूर येथील अनेक कॉलेज युवक-युवती शेवटी अजाणतेपणाने माओवाद संघटनेत भरती झाले व स्वत:चे आयुष्य बरबाद करून बसले. पुणे आणि परिसरांत ‘फुले-आंबेडकर’ यांच्या नावाच्या आडून प्रचार व जलसे करणाऱ्या ‘कला-मंच’च्या नादी लागून कासेवाडी झोपडपट्टीतील काही तरुण-तरुणी आजही गडचिरोली-बस्तरमधील माओवादी सशस्त्र दलममध्ये काम करत आहेत, हेही कदाचित पत्रलेखकास माहिती नसावे.

‘पेसा’ कायद्याच्या आडून गडचिरोलीत सामान्य जनतेला संघटित करण्याचा कार्यक्रम राबविणाऱ्या संघटनेतील ‘सूत्रधारा’चे हिंसक माओवादी संघटनेशी असलेले घनिष्ठ संबंध जर शहरी समर्थकांना समजले, तर त्यांना जबर मानसिक धक्का बसेल. ज्या मोर्चाचा उल्लेख प्रस्तुत पत्रात आहे, त्यात सहभागी व्हावे म्हणून माओवाद्यांनी आदिवासींवर कशा प्रकारे प्रचंड दबाव टाकलेला होता, याचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. कधी बंदूक, तर कधी आदिवासींचा मोर्चा असे करण्याऐवजी हे माओवादी, आदिवासी विकासासाठी अहिंसक मार्गाने सरळ रस्त्यावर का उतरत नाहीत, हा प्रश्न मला त्या वेळेला पडला होता. सामान्य जनतेचे जीवनमान उद्ध्वस्त करून ‘सरकार’ नावाच्या यंत्रणेने फक्त भांडवलदारांच्या हितासाठीच काम करावे या मताचा मी मुळीच नाही, परंतु माओवाद्यांसारखी ‘पाशवी’ संघटना मजबूत होऊ नये, असे मात्र माझे ठाम मत आहे.

आदिवासी भागांतील शाळा बंद पाडणे, निष्पाप आदिवासींचे कुऱ्हाडीने हातपाय तोडून तुकडे करणे, या प्रकारांविरोधात कोणीही का बरे कधीच आवाज बुलंद करीत नाही? माओवाद्यांनी एकटय़ा गडचिरोलीत १९ दलितांची क्रूर हत्या केलेली असताना कोणीही त्याविरोधात का बरे आंदोलन करीत नाही? हिंसक साम्यवादाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रखर विरोध केलेला आहे. आजचे माओवादी व त्यांच्या ‘मायावी’ फ्रंट संघटना आपल्या देशाची राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘भाबड्या’ शहरी विचारवंत व कार्यकर्त्यांनी वेळीच सावध व्हावे म्हणून हा लेखनप्रपंच.
– प्रा. धम्मदीप मेश्राम, दिघोरी, नागपूर
पहिलं पत्र ज्यानं पाठवलं होतं, त्याचा पत्ता लोकसत्तेनं स्वतःहून 'पुणे' असा टाकल्यामुळं दुसऱ्या पत्रलेखकानं त्याचा वापर करून मूळ मुद्द्याला बगल द्यायची संधी मिळवलेय. त्यामुळं पहिल्या पत्रलेखकानं पुन्हा एक पत्र लिहिलं, ते न छापून आलेलं पत्र असं:
मूळ मुद्द्याला बगल!
देवेंद्र गावंडे यांच्या 'सरकार उद्योगस्नेही, तरीही' (१ सप्टेंबर) या लेखावरच्या 'आदिवासी स्नेही कधी व्हायचं?' (४ सप्टेंबर) या माझ्या प्रतिक्रियेवरची प्रतिक्रिया (प्रा. धम्मदीप मेश्राम: 'भाबड्या' शहरी लोकांनी सावध व्हावे, ११ सप्टेंबर) वाचली. माझ्या पत्रात कुठेच माओवादी हिंसेबद्दल 'भाबडं' किंवा भाबडं नसलेलं समर्थन नव्हतं. सरकारच्या उद्योगस्नेहाला होणारा प्रत्येक विरोध माओवादी हिंसेशी नेऊन जोडणं आदिवासींच्या मुळावर येणारं आहे, असा माझ्या पत्राचा सारांश; त्यासाठी सरकारच्याच दोन दस्तावेजांचे दाखले दिलेले होते. त्यावर काहीही न बोलता प्राध्यापक मेश्राम यांनी 'शहरी लोक' अशा एका ढोबळ संकल्पनेखाली काही बेछूट विधानं केली आहेत. निव्वळ पुण्यातून एखाद्यानं पत्र लिहिलं म्हणून तो तिथंच बसून असतो आणि त्याला गडचिरोली किंवा बस्तरमधली काही माहिती तिथं जाऊन घेताच येत नसेल, अशा 'भाबड्या' दृष्टीने मेश्राम यांनी पत्र लिहिलेलं 'असावं'. (वास्तविक पत्रासोबत 'पुणे' हा पत्ता मी दिलेला नव्हता, तो माझा सध्याचा पत्ता नसेल तर?). पण त्यावर बोलण्यातच मतलब नाही. एवढं व्यक्तिगत जाण्याची गरज नाही आणि त्यामुळे त्या मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याची इच्छाही नाही. फक्त, उद्योगांच्या उभारणीत स्थानिकांना, म्हणजे बस्तर-गडचिरोलीच्या बाबतीत आदिवासींना त्यांचं म्हणणं मोकळेपणानं मांडण्याची संधी असायला हवी, एवढाच माझ्या पत्राचा हेतू होता. तोही भाबडाच ठरणारा असावा, हे मान्य! कदाचित, आदिवासींच्या मतांचं काही मोठ्या स्तरावरचं सर्वेक्षण लोकसत्तेनं केलं तर मग सरकारचा उद्योगस्नेह, माओवादी हिंसा, याबद्दलची खरी मतं समोर यायला मदत होईल.
या पत्रांवरून आपोआप वाचकांना काय ते स्पष्ट होईलच. मूळ मुद्द्यावर बोलण्याऐवजी पुन्हा 'माओवादी हिंसा' हा विषयच केंद्रस्थानी आणून, त्यात आणखी पहिल्या पत्रलेखकावरही शिक्का मारायचा प्रयत्न नागपूरच्या पत्रलेखकानं केलेला आहे. मूळ लेख आणि नागपूरहून आलेलं पत्र दोन्हीत आणखीही साम्य आहे, ते म्हणजे कोणतीही तथ्यावर आधारलेली माहिती न देता अनेक गोष्टींकडे नुसती बोटं उठवलेली आहेत, शिवाय त्यातही खूप विरोधाभास आहेत. सूरजागडला प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊच शकत नाही, असं म्हणायचं आणि तिथंच शेकडो आदिवासी उद्योगांच्या बाजूने एकेकाळी रस्त्यावर उतरल्याचा उल्लेख करायचा. त्यातही कुठला काळ, गावांचा किमान ढोबळ तपशील काय, यातली काहीही माहिती द्यायची नाही.. मूळ परिषदेच्या आयोजकांबद्दल स्पष्ट न बोलता परिषदेला जाण्यासाठी कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी नक्षलवाद्यांनी दबाव टाकल्याचा उल्लेख फक्त करायचा.. शिवाय हिंसक माओवाद्यांशी कोणाचे संबंध आहेत ते सगळं आपल्याला माहितीच आहे, असं नुसतं सूचित करून ठेवायचं पण कोणत्याच संघटनेचं, परिषदेचं, व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही, किमान तपशीलही द्यायचा नाही.. पुण्यातल्या माणसाला गडचिरोलीचं कळणार नाही असं म्हणायचं आणि स्वतः मात्र नागपुरातून पुण्यातल्या कासेवाडी झोपडपट्टीतला सगळा तपशील कळल्यासारखं लिहायचं.. काही ठिकाणी माहितीच्या स्त्रोताचं नाव देता येत नाही, हे खरं; पण इथं या मंडळींनी माहितीपेक्षा आरोप आणि मतांचा भडीमार केलेला आहे.. हिंसेचं वर्णन तर विकृत म्हणावं असं केलेलं आहे, कुऱ्हाडीनं हातपाय तोडणं हे असं नुसतं इथं मधेच कुठल्याही संदर्भाशिवाय एकतर्फी नोंदवणं म्हणजे हिंदी चित्रपटांसारखा भडक प्रकार आहे.. ज्या परिसरात नुसतं काळं-पांढरं काही बघता येत नाही, शिवाय कोणाचेही कुणाशीही संबंध असू शकतात, तिथं इतक्या सहजी निकाल लावणं आणि पुरावे न देता सहज मतं देणं बरोबर नाही, असं वाटतं.

इथं एक उदाहरण नोंदवू. छत्तीसगढमधल्या बस्तर लोकसभा मतदारसंघात १९९८पासून भा.ज.प.चाच उमेदवार निवडून येतो आहे. माओवाद्यांचा प्रभाव सर्वाधिक असलेल्या या इलाक्यातल्या निवडणुकांमध्ये कोणाच्या बाजूनं मतदान व्हावं हे कोण ठरवतं? जो-तो नागरिक आपल्या मनानं स्वतंत्रपणे ते ठरवतो का?  यासंबंधीचं हे उदाहरण. आत्ता फक्त समजा-- एका माजी माओवादी नेत्याला मध्य भारतातल्या एका गावचा सरपंच फोन करतो आणि विचारतो की, आम्ही कोणाला मतदान करू? मग तो माजी नेता सरपंचाला सांगतो की, अरे, आता मी चळवळीशी संबंधित नाहीये, गेली पाच वर्षं तर नाहीच, त्यामुळं आता तुला मी सांगू शकत नाही!-- हे रेघेनं माहिती मिळवलेलं उदाहरण आहे. माओवादी नेत्याच्या आयुष्यातल्या काही घडामोडींमुळं तो चळवळीपासून दूर गेला, ही माहिती दरम्यानच्या काळात सरपंचाला न झाल्यामुळं त्यानं या माजी नेत्यालाच मतदानाविषयीचा सल्ला मागितला होता. हीच परिस्थिती प्रत्येक गावाची असते, असा या उदाहरणाचा अर्थ नाही. पण अशी परिस्थिती या निवडणुकांवर प्रभाव पाडत असते. यामागे माओवादी पक्षाचं त्या त्या वेळचं डावपेचात्मक धोरण असेल त्यानुसार ते ठरवतील, आर्थिक व्यवहार असतील, अशा कित्येक स्थानिक मुद्द्यांचा संदर्भ याला असतो, हे तिथल्या लोकांकडून कळतं. मग अशा निवडणुकीत भा.ज.प.चा उमेदवार निवडून येत असेल, तर अख्ख्या भा.ज.प.वर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला जातो काय?

वर उल्लेख झालेल्या परिषदेचा संदर्भ रेघेवर मागे आलेला आहे. त्या परिषदेच्या आयोजकांमधली एक संघटना होती भारत जन आंदोलन. ही संघटना भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या बी.डी. शर्मा यांनी स्थापन केलेली विख्यात संस्था आहे. आदिवासी समस्यांवर ही संघटना १९९२पासून मध्य भारतात काम करतेय. ही संघटना किंवा इतरही आयोजक संस्थांबद्दल माओवादी असण्याचा आरोप कोणी अजून केलेला नाही. तसा आरोप करायलाही हरकत नाही, पण पुराव्यानं तो करायला हवा. किंवा अशा संघटनांमध्ये कोणी ना कोणी माओवादी घटक कार्यरत असणंही या इलाक्यात शक्य असतंच. पण म्हणून अख्ख्या परिषदेवर शिक्का मारणं बरोबर नाही. आणि आपण रेघेवर मागंही एकदा नोंदवल्यानुसार आयोजक कोणीही असलं नि त्याला अगदी माओवाद्यांचं समर्थनही असलं, तरी तिथं आलेले हजारो आदिवासी लोक हे 'हिंसक माओवादी' असतात का? गडचिरोली शहराच्या मुख्य चौकातून जाणाऱ्या या मोर्चातल्या ज्या लोकांशी रेघेनं संवाद साधला त्यावरून आपण एवढंच नोंदवू शकते, की असं एवढं सरसकट शिक्के मारणं बरोबर नाही. थेट तीव्र नक्षलग्रस्त नसलेल्या भागांमधून आलेले लोकही इथं आपलं म्हणणं मांडून गेले. त्यातल्या काहींना माओवाद्यांपासून अंतर राखण्यासाठी किती खटाटोप करावा लागतो, वगैरे तपशील इथं काही मंडळींमध्ये अनौपचारिकपणे बोललाही गेला. तर, अशा ठिकाणी आयोजकांना सोडून देऊ, मोठमोठ्या वक्त्यांना सोडून देऊ, जनरल पब्लिकच म्हणणं समजून घ्यायचं की नाही? शिवाय हा फक्त एका परिषदेचा नि मोर्च्याचाही मुद्दा नाहीये. त्याबद्दल आपण नोंदीच्या शेवटाकडं थोडंसं नोंदवण्याचा प्रयत्न करू.

बरं जाता जाता, लोकसत्तेतला मूळ लेख आणि नागपूरहून आलेल्या पत्रातला सूर एवढा सारखा कसा काय, याबद्दल 'भाबडं' आश्चर्य मात्र वाटून घेऊ नका बरं का! या पूर्वी नोव्हेंबर २०१४मध्ये नगरमधल्या जवखेडा दलित हत्याकांडासंबंधी एक सत्यशोधन समिती घटनास्थळी गेली होती. त्यासंबंधीही 'लोकसत्ते'त अशीच तथ्यांशिवायची बातमी आली होती. त्यावर मग समितीतल्या सदस्यांना खुलासा करावा लागला होता: ‘जवखेडा हत्याकांडप्रकरणी नक्षलवाद्यांकडून दलितांना चिथावणी देणे सुरू, राज्यात दंगली घडविण्याचा कट?’ या  मथळ्यासह २ नोव्हें. २०१४ रोजी ‘रविवार लोकसत्ता’ आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर ठळकपणे जे वृत्त नागपूरच्या विशेष प्रतिनिधीने दिले आहे, ते आम्हा खालील सत्यशोधन समितीमधील सदस्यांना व सत्यशोधन समितीला नाहक बदनाम करण्यासाठी अत्यंत खोडसाळपणे प्रसिद्ध केले आहे. त्या वृत्ताचा आम्ही समितीचे सर्व सदस्य जाहीर निषेध करीत आहोत. आपल्या वृत्तात जे बिनबुडाचे आरोप व विपर्यास माहिती दिली आहे त्याचा तपशीलवार खुलासा करीत आहोत. रंगनाथ पठारे, जतीन देसाई, सुबोध मोरे, वगैरे मंडळी या समितीची सदस्य होती आणि त्यांचा हा खुलासा वाचकांच्या पत्रव्यवहारात छापून आला, त्या खुलासारूपी पत्राखाली लोकसत्तेची संपादकीय टीप अशी होती: या बातमीतील अप्रस्तुत उल्लेखाबाबत दिलगिरी व्यक्त करतानाच, हा वाद येथे थांबवणे उचित ठरेल. म्हणजे दिलगिरीही खुल्या मनानं दिलेली नाही, वाद थांबवणं 'उचित' होईल या निकालासह दिलेली दिलगिरी आहे. वाद म्हणजे काय, तर एक बातमी आणि त्यावरचं खुलाशाचं पत्र, संपलं! एवढ्याशा देवाणघेवाणीला झटपट 'वाद' म्हणायचं, हे ठीक. त्यात तो थांबवावा वाटत असेल, तरी ठीक. पण मग 'हा वाद इथेच थांंबवत आहोत', एवढंच वाक्यही पुरलं असतं. पण त्यात उचित-अनुचितचा निकाल आपणच द्यायची घाई प्रसारमाध्यमांनी करायला हवी की तथ्यावर आधारलेल्या माहिती खेळायला अधिकाधिक मोकळा अवकाश द्यायला हवा?

या सोबत हेही नोंदवायला पाहिजे की, लोकसत्तेमधे येणारं 'लोकमानस' हे वाचकांच्या पत्रव्यवहाराचं सदर इतर मराठी वर्तमानपत्रांमधल्या अशा सदरांपेक्षा जास्त जागा व्यापणारं आणि विरोधी सुरांना बऱ्यापैकी जागा देणारं असतं.
०००

तीन

या नोंदीच्या पहिल्या दोन भागांमधला एक धागा आपण या तिसऱ्या भागात पुढं नेणार आहोत. तो धागा हिंसेशी संबंधित आहे. फाटकन या सगळ्यावर मत देण्याची रेघेची कुवत नाही, त्यामुळं आपल्या क्षमतेनुसार आधीच्या दोन भागांना जोडणारी काही तथ्यं नोंदवता येतायंत का, याचा पत्रकारी प्रयत्न करू.

चारू मुजुमदार आदींनी स्थापन केलेला मूळ जो नक्षलवादी पक्ष, सीपीआय (एमएल), त्याची फाटाफूट झाल्यानंतर जे अनेक छोटे-मोठे पक्ष आहेत, त्यातला सी.पी.आय (एमएल)- लिबरेशन हा एक. हा पक्ष आता संसदीय मार्गावर चालणारा पक्ष आहे, हे नोंदीच्या पहिल्या भागात आलं आहेच. दुसऱ्या भागात सरसकटपणे नक्षलवादी-माओवादी असा उल्लेख होणारा पक्ष आहे तो- कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी). २००४मध्ये काही नक्षलवादी गटांनी एकत्र येऊन स्थापन केलेला हा पक्ष संसदीय मार्गानं चालण्याच्या विरोधातला. आपल्या नोंदीचा हा तिसरा भाग, आधीच्या दोन भागांप्रमाणेच फक्त पत्रकारी भूमिकेतला आहे. हे मुद्दाम नोंदवावं लागतंय. स्वतःचं मत देण्याची घाई करण्याऐवजी मूळ प्रदेशांमधल्या लोकांच्या (कुठल्याच नेत्यांच्या नव्हे, तर जनरल पब्लिकच्या) म्हणण्याला अधिक अवकाश मिळावा, एवढ्यापुरताच हा छोटासा प्रयत्न चाललाय. आणि रेघेवर सुरुवातीपासून त्यातल्या त्यात फक्त याच विषयासंबंधी आपल्याला असा प्रयत्न करता आलाय. हाही आपला दावा नाहीच, फक्त या विषयावर बोलताना काही खुलासे आवश्यक आहेत, असं अनुभवामुळं लक्षात आलंय, तेवढ्यापुरतंच हे स्पष्टीकरण. बाकी, वाचकांना 'उचित-अनुचित' काय ते ठरवता येईलच.

या नोंदीच्या पहिल्या भागात आपण हिंसेच्या थैमानाबद्दल पाहिलं-ऐकलं आणि वाचलं. दुसऱ्या भागात सरकारच्या उद्योगविषयक धोरणाच्या संदर्भात पुन्हा हिंसेचा मुद्दा आल्याचं वाचलं. या दोन्हीत हिंसेचा एक भाग मार्क्सवादी/साम्यवादी/नक्षलवादी विचारांशी जोडलेला दिसतोय. आणि एक भाग, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेशी जोडलेला दिसतोय. प्रसारमाध्यमांमध्ये मध्य भारतातल्या माओवादी हिंसेच्या बातम्या हल्ली, म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००६ साली नक्षलवादाला 'देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वांत मोठा धोका' म्हटलं तेव्हापासून वाढलेल्या आहेत.  पण अर्थातच या घडामोडी त्यापूर्वीपासून सुरू आहेत. एकदम पूर्वी, म्हणजे 'नक्षलवादी' हा शब्द अस्तित्वात येण्यापूर्वीही या घडामोडी होत्याच. आंध्र प्रदेशात, आता नव्या तेलंगण राज्यात कम्युनिस्ट चळवळीची बरीच खळबळ सुरुवातीपासून आहे. आणि 'प्रेमपंथ अहिंसेचा' असं म्हणणाऱ्या विनोबांना याच तेलंगणमधल्या एका गावात भूदान चळवळीची कल्पना सुचली होती.

'भूदाना'ची ही कल्पना आपल्याला कशी सुचली, याबद्दल विनोबांनी इंग्रजी लेखक-पत्रकार आर्थर कोस्लरला तो भारतात आला असताना काही सांगितलं होतं. ते कोस्लरनं नोंदवून ठेवलंय:
(१८ एप्रिल १९५१ रोजी तेलंगणातल्या पोचमपल्ली या गावात विनोबा गेले होते). त्या गावातल्या अस्पृश्यांनी त्यांची व्यथा विनोबांना सांगितली. किमान उदरनिर्वाहासाठी किती जमीन तुम्हाला लागेल, असं विनोबांनी या मंडळींना विचारलं. त्यावर थोडी का-कू करून उत्तर आलं, 'ऐंशी एकर'.

(यावर विनोबा कोस्लरला म्हणाले) 'त्यांना ही ऐंशी एकर जमीन सरकारनं द्यायला हवी, असं मला वाटत होतं. पण या मार्गानं काहीच लोकांना जमीन मिळेल, पण मूळ समस्या काही सुटणार नाही, असं मला वाटलं. त्यामुळं मी मग गावातल्याच लोकांशी बोलणं काढलं नि विचारलं की, हे आपले भाऊ भुकेनं मरू नयेत यासाठी त्यांना जमीन देऊ इच्छितंय का? मग एक माणूस पुढं आला आणि त्याने शंभर एकर जमीन देऊ केली.'

त्या माणसाचं नाव होतं व्ही.आर. रेड्डी. तो एक छोटा जमीनदार होता आणि त्याच्या नातलगांपैकी कोणी लोक कम्युनिस्ट झाले होते.

'त्या रात्री मी झोपायसाठी आडवा झालो, पण मला झोपच येईना. मी त्या प्रसंगाबद्दल विचार करत होतो. मला आज काय झालंय? एक माणूस पुढं येतो काय आणि कोणतीही जोरजबरदस्ती नसताना शंभर एकर जमीन दान करतो काय. यामध्ये काही दैवी संकेत आहे काय? मी गणितीही असल्यामुळं, भारतातल्या भूमिहीन लोकांना किती जमीन लागेल याची आकडेमोड लगेच सुरू केली. आणि माझ्या असं लक्षात आलं की, एकंदर वाटपासाठी पाच कोटी एकर जमीन लागेल. म्हणजे भारतातील एकूण सुपीक जमिनीपैकी एक षष्ठांश. एवढी जमीन लोक देऊ करतील या कल्पनेवर माझा विश्वास बसत नव्हता. त्या कल्पनेनं डोक्यात ठाण मांडलं होतं, पण मी ती स्वीकारायला तयार नव्हतो. माझ्या मनानं या कल्पनेला विरोध करायचा प्रयत्न केला. त्यामुळं मी द्विधा मनस्थितीत होतो. पण मी शंका घेतली आणि प्रेमाच्या नि देवाच्या ताकदीवर विश्वास ठेवला नाही, तर मला अहिंसेवरचा माझा विश्वास सोडून द्यावा लागेल नि साम्यवाद्यांचा हिंसक मार्ग स्वीकारावा लागेल, असं माझ्या आतला आवाज मला सांगत होता. अशा वेळी आपण शांत नाही बसू शकत. एक तर या मार्गानं नायतर त्या मार्गानं जायला लागणारच. देव बालकाच्या पोटात भूक घालतो आणि मातेच्या स्तनामध्ये दूध ठेवतो. त्यामुळं आपण देवाच्या नावानं भिक्षा मागितली, तर प्रतिसाद मिळणारच.'
(तिरपा ठसा रेघेचा)

देव आणि प्रेम यांच्यावरच्या विश्वासामुळं आपण हिंसेपासून दूर राहू शकलो, असं विनोबा म्हणतायंत. तर, सध्याच्या काळात 'देव' रुपर्ट मरडॉकच्या, म्हणजे माध्यमसम्राटांच्या घरात राहातो की काय, अशी शंका रेघेवरच्या गेल्या महिन्यातल्या नोंदीत अनिकेत जावऱ्यांनी नोंदवलेय. जावऱ्यांची शंका १९९७ सालातली आहे. तेव्हापासून आता अनेक लोकल मरडॉक तयार झालेले आहेत. मराठीतही असे मरडॉक आहेतच. शिवाय गुगल, फेसबुक हे एकदमच जगभर पसरलेले नवीन मेंबर आहेत. तर या देवांवर ठेवायचा का विश्वास? थोडासा तरी ठेवायलाच लागेल, कारण इंटरनेट देवाच्या देवळात गुगल-ब्लॉगर बडव्यानं जागा दिल्यामुळंच आपण रेघ ओढतोय. विनोबांची दुसरी श्रद्धा 'प्रेम' या तशा बेभरवश्याच्या गोष्टीवर आहे. आपल्याला इथं भूदान चळवळीवरच्या परिणामांबद्दल मत द्यायचं नाही, कारण त्याबाबतीत रेघेची माहिती तितकी पुरेशी नाही. भूदान चळवळीचा जोर का ओसरला? तिचा मुळात नक्की काय काय परिणाम झाला? यावर अभ्यासकांचं काही सापडलं तर आपण पुढं कधी तरी रेघेवर ते आणायचा प्रयत्न करू.

सध्या, विनोबांनी हिंसा आणि अहिंसा या दोन मार्गांचा विचार ज्या संदर्भात केलाय तो संदर्भ आपल्याला महत्त्वाचा आहे. हा संदर्भ जमिनीचा आहे, म्हणजेच 'जल, जंगल, जमीन' यांपैकी एक. म्हणजेच नोंदीच्या पहिल्या भागातला वाद आणि दुसऱ्या भागातला वाद काही ना काही प्रमाणात या संदर्भाशी जोडलेले आहेत. कायदा करून काही गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत, त्यासाठी लोकांच्या मनातच कायतरी बदलायला लागेल, असा एक विनोबांचा भूदानाबद्दलचा सूर जाणवतो. सज्जनांनी आपलं सारं लक्ष गुण-विकासावर केंद्रित केलं पाहिजे. समाजरचनेच्या फंदात पडणं म्हणजे नसता अहंकार ओढवून घेणं होय. अहिंसा, सत्य, संयम, संतोष, सहकार, इत्यादी यम-नियमांची निष्ठ दृढ करणं, हे गुण आपल्या नित्याच्या व्यवहारात उत्तरोत्तर प्रकट होतील असं करणं, एवढंच आपलं काम आहे. एवढं केलं म्हणजे बाकीचं सारं आपोआप होईल. मुलाला दूध पाज हे आईला सांगावं लागत नाही. दुःख झालं म्हणजे रडावं हे लहान मुलाला शिकवावं लागत नाही. वात्सल्य असू दे, दूध आपोआप पाजलं जाईल. दुःख असू दे, सहजच रडलं जाईल, असं विनोबांचं म्हणणं. (विनोबा, साम्यवाद की साम्ययोग, पान ८ ते ११, परंधाम प्रकाशन, पवनार.)

आईच्या दुधाचा संदर्भ दोनदा आला पाहा. याच्या बरोब्बर उलटं म्हणणं माओवादी पक्षाचं आहे. अख्ख्या साम्यवादी विचारसरणीबद्दल वाद घालणारे घालू शकतात. इथं आपण फक्त नोंदीत उल्लेख आलेला माओवादी पक्षच गृहीत धरलेला आहे. सध्या भारतात जी राजकीय व्यवस्था आहे ती सशस्त्र मार्गांनी उलथवून टाकणं, एवढा एकच मार्ग त्यांना मुख्यत्वे दिसतो आहे. पण हे सगळं निव्वळ एवढंच नाही. नोंदीत वर एका पत्रात या पक्षाच्या काही कागदपत्रांचा उल्लेख झालेला आहे. यातला एक 'अर्बन परस्पेक्टिव्ह' हा दस्तावेज घेतला, तर त्यात नुसतं गोपनीय कार्यपद्धतीबद्दल लिहिलेलं नाही. देशातला कोणता भाग शहरीकरणाच्या दिशेनं कसा कसा जातोय, त्यामध्ये श्रमजीवी वर्गाच्या बाबतीत काय पोकळी तयार होणार आहे, वगैरे तपशील या दस्तावेजात सुरुवातीला दिलेला आहे. मग अहमदबाद-पुणे पट्टा, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू- असा नीट शहरीकरणाचा विचार करून त्यात कोणत्या समस्यांमुळं कुठं पोकळी तयार होणार आहे, ती व्यापून काढायची संधी आपल्याला कशी आहे, याचा आराखडा या दस्तावेजात आहे. तर, समस्यांमुळं तयार होणारी पोकळी, हा मुद्दा विचारात न घेता नुसतं सुटं 'माओवादी हिंसे'कडं पाहता येणार नाही, असं वाटतं. आता सध्याच्या पंतप्रधानांनी तर देशात शंभर 'स्मार्ट सिट्या' उभारण्याची घोषणा केलेय. महाराष्ट्रातही अमरावती, औरंगाबाद, बृहन्मुंबई, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे ही दहा शहरं यात आहेत. प्रत्येक शहराला शंभर कोटी रुपये केंद्र सरकार दर वर्षी देणार आणि शिवाय स्थानिक प्रशासन काही कोट रुपये उभे करणार, वगैरे तपशील या संदर्भातल्या बातम्यांमध्ये आला होता. तर आता 'अर्बन परस्पेक्टिव्ह' आणखी बदलला असणार, हे साहजिक आहे. तरी शहरांमधे मुख्य धारेतल्या प्रसारमाध्यमांचे ग्राहक असतात, त्यामुळं माहितीच्या प्रवाहाला थोडा तरी अवकाश असतो. पण नोंदीच्या पहिल्या दोन भागांमध्ये उल्लेख आलेल्या ग्रामीण किंवा आदिवासी भागांमधल्या संदर्भांचं काय करायचं?

नोंदीच्या पहिल्या भागाबद्दल थोडं परत बोलू. बथानी टोला हत्याकांडासंदर्भात भोजपूर जिल्ह्याचे न्यायदंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचं निलंबन करावं व महसूल मंडळाकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशा काही मागण्या करत सीपीआय-एमएल-लिबरेशन या पक्षाचे नेते सप्टेंबर १९९६मध्ये उपोषणाला बसले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या. 'हा लोकशाही शक्तीचा विजय आहे', अशा शब्दांत तेव्हा पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती. (संदर्भ: इपीडब्ल्यू, २ नोव्हेंबर १९९६). एखादा नक्षलवादी पक्ष उपोषण करतोय, हे चित्र याच पक्षाला त्याच्या आधीच्या रूपात पटलं नसतं. पण कालांतरानं बदल झालेला दिसतोय. या बदलाबद्दलही अनेक मतमतांतरं असतीलच. असे बदल झालेले डावे पक्ष हे आत्ताच्या माओवादी पक्षाला अर्थातच कमअस्सल वाटतात. शिवाय सीपीआय-एमएल-लिबरेशन या पक्षाला त्यांचा इतिहास सोबत घेऊनच वागावं लागत असल्यामुळं आरोप-प्रत्यारोप सुरूच राहणार. पण एका 'हिंसक' नक्षलवादी पक्षाच्या बाबतीत झालेला बदल इथं नोंदवला.

आता माओवादी पक्षाच्या आणखी एका दस्तावेजाकडं वळू. पक्षाच्या गोंदिया-गडचिरोली विभागानं सप्टेंबर २०१३मध्ये पक्षांतर्गत वितरणासाठी काढलेल्या हिंदी सर्क्युलरमधले दोन उतारे पाहा:
आदिवासींबद्दल चांगली भावना राखून असलेली आपली एक मित्र संघटना आहे. आदिवासींच्या सोबत उभं राहून इमानदारीनं लढण्याची त्यांची इच्छा असते, व्यवस्था परिवर्तनाच्या गोष्टीही ते बोलतात, पण त्यांचे हे सगळे विचार सनदशीर चौकटीत होत असतात. लोकसंघर्षाच्या मर्यादेपर्यंतच त्यांचा विचार जाऊ शकतो. आणि अखेरीस त्यांचा हा विचार गांधीवादामध्ये जाऊन मिसळतो. त्यांना आदिवासींमध्ये वर्गसंघर्ष दिसत नाही. सशस्त्र संघर्षाशिवाय व्यवस्थेत परिवर्तन शक्य नाही, ही गोष्ट ते स्वीकारत नाहीत. त्यांच्यातल्या वर्गदृष्टीच्या अभावामुळंच हे होतं. (पण) आपल्याला त्यांना गांधीवादातल्या अहिंसेच्या पैलूचीच आठवण करून द्यायची आहे. राज्यसंस्थेच्या हिंसेला टीकात्मक विरोध करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे.
...
आपल्याकडं जगातला सगळ्यांत चांगला विचार असल्याचा गर्व आपल्याला झाला आहे. आपल्याएवढा त्याग कोणी केलेला नाही, आपण पवित्र आहोत, आपल्या मार्गाशिवाय दुसरा कुठलाच मार्ग जनतेच्या मुक्ततेसाठी योग्य ठरणारा नाही, अशी घमेंड आपल्यात निर्माण झालेली आहे. आपलाच मार्ग बरोबर आहे, हे खरंच. पण काही मित्र आपल्या विचारांशी पुरेसे परिचित झालेले नसतात, आपल्याएवढा त्याग करण्यासाठी तयार नसतात.. अशा वेळी आपण आपल्या विचारांबद्दल घमेंड बाळगली, तर असे मित्र आपल्या जवळ येण्यापूर्वीच आपल्यापासून दूर जातात. चांगल्या विचाराचा अहंकार वाईट परिणाम घडवू शकतो, हे आपण लक्षात ठेवायला हवं. आपण स्वतःला संत-महात्मा समजणं बरोबर नाही. समर्पित भावनेचा राजकीय कार्यकर्ता म्हणूनच स्वतःकडं पहावं.
आपण या नोंदीत आधी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, त्यात काही संघटनांमध्ये माओवादी घटक असणं शक्य आहे, काही परिषदांच्या आयोजनातही ते असू शकतात, वगैरे नोंदवलंय. तर ते तसं होणं साहजिक का आहे, हे या उताऱ्यांवरून कळू शकतं. शेवटी हा पक्ष संसदीय राजकारण करत नसला, तरी तात्पुरते काही मित्र, काही तात्पुरते शत्रू याच पद्धतीनं राजकीय डावपेच लढवतो, त्यामुळं काही वेळा कुठल्या ना कुठल्या घडामोडीत प्रस्थापित लोकशाही चौकटीतही असे घटक येऊन-जाऊन राहणारच. त्यातही ज्या आदिवासी भागांमध्ये प्रसारमाध्यमांचा काहीच झोत पोचत नाही, तिथं माणसांना साधं जगतानाही प्रत्येक वेळी कोणाशी संबंध ठेवायचा, याच्या निवडीचं स्वातंत्र्य असेलच असं नाही. तर, अशा वेळी लगेच शिक्के घेऊन बसणं वर्तमानपत्रांना किंवा वृत्तवाहिन्यांना आणि त्यांच्या ग्राहकांनाही नैतिक मतांची कारंजी उडवायला सोईचं असेल, पण ते बरोबर नाही, असं वाटतं.

माओवाद्यांच्या या सर्क्युलरमध्ये गांधीवाद्यांना अहिंसेची आठवण करून देण्याचा उल्लेख आहे. आणि हा गांधीवाद फक्त सरकारी हिंसेच्या संदर्भातच आठवावा, अशी अपेक्षाही दिसतेय. त्यापेक्षा अधिक आठवण ठेवू नये, अशी सूचना ते याच सर्क्युलरमधे एका ठिकाणी देतात. काही व्यक्तींच्याद्वारे गांधीवादी आणि उत्तर-आधुनिकतावादी असे वर्गसंघर्षाच्या विरोधातले विचार पसरवले जात आहेत.. अशी तक्रारही या सर्क्युलरमधे आहे. तर, आपल्या सोईनं काही विचार आठवले जावेत, अशी माओवादी पक्षाची साहजिकपणे राजकीय अपेक्षा आहे. तेवढ्यापुरती का होईना अहिंसा आठवणीत ठेवावी असं माओवादी पक्षाला वाटतंय, एवढं तरी खरं!

'हिंसक' माओवाद्यांना अहिंसेचा उल्लेख का करावा वाटला, ते आपण पाह्यलं. आता 'अहिंसक' विनोबांना हिंसेचा उल्लेख का करावा वाटला, ते पाहू. विनोबा एका ठिकाणी म्हणतात:
क्रांतीसाठी हिंसक साधने वापरलीच पाहिजेत, हिंसेशिवाय क्रांती होऊच शकत नाही, असे कम्युनिस्ट मानतात; तसे आम्ही मानीत नाही. हिंदुस्थानसारख्या देशात आणि लोकशाही राज्यात हिंसक साधनांचा अवलंब न करता केवळ बॅलट-बॉक्सच्या बळाने राज्य-क्रांती घडवून आणता येईल असा आम्हाला विश्वास वाटतो. त्यासाठी लोकमत तयार करायला पाच-पंचवीस वर्षे लागली तरी आम्हाला हरकत वाटणार नाही. आम्ही धैर्याने लोकमत तयार करीत राहू. पण समजा, सत्ताधारी पक्षाने निवडणुकीचे पावित्र्य राखले नाही, आणि सत्तेच्या जोरावर निवडणुकी लढविल्या गेल्या तर अशा प्रसंगी साधन-शुद्धीचा आग्रह राखणे म्हणजे सतत मार खात राहणेच होईल. म्हणून अगतिकपणे केवळ विशिष्ट प्रसंगापुरता अन्य साधनांचा अवलंब करणे आम्हाला गैर वाटत नाही. आम्हाला तो नैमित्तिक धर्म वाटतो. वाटल्यास तुम्ही आपद्-धर्म म्हणा, पण अधर्म म्हणू नका, एवढीच आमची विनंती आहे. तेवढ्याने शाश्वत मूल्ये ढासळण्याचे कारण नाही. नैमित्तिक कारणापुरता स्क्रू ढिला करून घेतला तर मागाहून चांगला कसता येईल. सत्तांतर झाल्याबरोबर शाश्वत मूल्ये अधिकच पक्की करून घेऊ. हलवून खुंटा बळकट करावा म्हणतात, तसेच हे समजा. अहिंसेच्या लाभासाठीच हा हिंसेचा तात्पुरता अवलंब आहे. एरवी अहिंसा दुरावेल. झाड जोराने वाढण्यासाठीच आपण त्याची कापकूप करतो की नाही? झाडाच्या मुळावर घाव घालणे वेगळे आणि फांद्यांची छाटाछाट करणे वेगळे. भांडवलवाद, साम्राज्यवाद, जाति-वंशवाद, हे सारे अहिंसेच्या मुळावरच घाव घालीत असतात. कम्युनिस्टांच्या सर्रास हिंसेच्या तऱ्हेमुळे, त्यांचाही घाव अहिंसेच्या मुळावरच बसतो. जरी त्यांचा तसा उद्देश नसतो, तरी फलितार्थ तोच निघतो. म्हणून आम्ही तसल्या प्रकाराला संमती देऊ शकत नाही. पण विशिष्ट गुणांच्या निष्ठेच्या नावाने सबंध समाजाची प्रगती रोखून धरणे, आणि गरीब लोकांची गांजणूक दीर्घ काळ चालू देणे ही आम्हाला अतिरेकी गुण-निष्ठा वाटते. शिवाय परचक्राच्या निवारणासाठी आणि अंतर्गत बंडाळी मोडण्यासाठी शस्त्र-बल वापरावे लागले तर त्याची गणना हिंसेत न करता तो दंड-धर्म समजावा, असे आमचे म्हणणे आहे. एवढे अपवाद वगळता बाकी सर्व प्रसंगी अहिंसक साधनांचा आग्रह राखणे अत्यंत योग्य आहे, असे आम्ही समजतो.
(साम्यवाद की साम्ययोग, पान ११-१२)
(तिरपा ठसा रेघेचा)

हिंसेला निमित्तापुरती जागा करून देणारे विनोबा, हा हिंसेचा निर्णय चूक आणि बरोबर आहे का ते कसं ठरवतील? आतला आवाज आणि दैवी संकेत, यावर अवलंबून हा निर्णय घेतला तर मग अवघडच होईल. त्या तुलनेत माओवाद्यांना त्यांच्यापुरती स्पष्टता असल्याचं दिसतं, भासवलं तरी जातं. त्यांच्या बाबतीत त्यांचीच स्पष्टता खरी असल्याचा अहंकार तयार होऊ शकतो, याचा उल्लेख आलाच आहे. विनोबांनी समाजरचनेच्या फंदात पडण्यासंबंधीच्या अहंकाराचा उल्लेख केलेला आहे, माओवादी सर्क्युलरमध्येही अहंकाराचा उल्लेख सापडतात. म्हणजे मूळ मुद्द्यात कुठंतरी लिंक जुळतेय. हिंसा-अहिंसा हे त्यानंतरचे धोरणांचे प्रश्न आहेत. त्याबद्दल मतभेद होऊ शकतात, काळाकाळानं धोरणं बदलत जाऊ शकतात, त्या त्या ठिकाणची परिस्थिती बदलत जाते, तसं लोकांचं समर्थनही कमी-अधिक होत जातं, बंदुकीच्या वापराचीही एक लिमिट राहतेच, वगैरे मुद्दे गडचिरोली किंवा बस्तरमध्येही स्थानिकांच्या बोलण्यात रेघेला जाणवले.

सीपीआय-एमएल-लिबरेशनच्या नेत्यांना काही कारणानं का होईना उपोषण करावं लागलं. त्यांचं राजकीय काम ज्या भागात आहे, तिथं काही प्रमाणात तरी अशा प्रकारच्या मार्गांना अवकाश असल्यामुळंच हे शक्य झालं, हे साहजिक आहे. असा अवकाश बस्तरच्या जंगलात नाही. आपण रेघेवर आधी नोंदवल्याप्रमाणे हजारो आदिवासींच्या मोर्च्याचीही जर माध्यमरूपी देवाघरी दाद लागत नसेल, तर मग उपोषण करून काय होईल? त्या उपोषणाचा परिणाम कोणावर होईल? या सर्व संदर्भात इंग्रजी लेखिका अरुंधती रॉय जे काही लिहितात त्यातलं बहुतेकसं रेघेला पटत नाही. बंदूक हातात घेतलेली सोळा-सतरा वर्षांच्या गोंड आदिवासी मुलांच्या नजरा बघून एखाद्या रॉकबँडच्या कट्टर चाहत्यांच्या डोळ्यांमधली चमक रॉय यांना आठवू शकते. अशी अनेक करुण ठिकाणं निव्वळ शैलीवर दडपून न्यायची त्यांच्या लिखाणाची पद्धत असल्यासारखं वाटतं. पण तरी त्यांनी २०११मध्ये मांडलेला एक मुद्दा नोंदवण्यासारखा आहे, तो असा: 'तुम्ही जंगलातल्या एखाद्या गावात राहणारे आदिवासी असाल आणि आठशे सीआरपी जवान तुमच्या गावात येऊन वेढा घालून राहिले, जाळपोळ करू लागले, तर तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? अशा वेळी तुम्ही उपोषणाला बसणं अपेक्षित आहे का? भुकेली माणसं उपोषणाला बसू शकतात काय? अहिंसा हे एक प्रकारचं नाट्य असतं. त्यासाठी प्रेक्षक असावा लागतो. पण प्रेक्षकच नसतील तर तुम्ही काय करू शकता?'

रॉय यांनी उल्लेख केलेली परिस्थिती गडचिरोलीत तुलनेनं कमी प्रमाणात आणि बस्तरमधल्या काही भागांमध्ये जास्त तीव्रतेनं अगदी रेघेनंही पाहिलेली आहे. कोणाला काहीच कोणत्याच बाजूचं बोलता येणार नाही, अशी ही परिस्थिती असते. अशा वेळी झालेल्या हिंसेचाच फक्त गवगवा करून मूळ मुद्द्याला बगल द्यायची का, हे ठरवायला लागेल.

नोंदीच्या पहिल्या भागात जातीय संदर्भ आणि जमिनीचा प्रश्न- हा महत्त्वाचा मुद्दा होता. दुसऱ्या भागात नैसर्गिक स्त्रोत, आदिवासींच्या जमिनी- हा मुख्य मुद्दा होता. या मुद्द्यांची योग्य दखल न घेता फक्त हिंसेची दखल घेतली तर प्रसारमाध्यमांचाही हिंसेत सहभाग असल्यासारखं होत नाही का? कोब्रापोस्टच्या वार्तांकनात जे काही तथ्य किंवा त्रुटी असतील त्यासकट ही माहिती आपल्यापर्यंत पोचली का? ही पत्रकार परिषद देशाच्या राजधानीत झाली होती. अशा अवस्थेत गडचिरोलीत किंवा बस्तर-दांतेवाडामधे निघालेल्या मोर्च्यांची काय बात! त्यामुळं हिंसा-अहिंसेचे मुद्दे कुठंही सहज फेकणं गैर ठरेल असं वाटतं. नोम चोम्स्की म्हणतात तसं:
विवेकबुद्धी शाबुत असलेला कोणताही माणूस हिंसा आणि दहशत यांचं समर्थन करणार नाही. विशेषतः क्रांतिउत्तर राज्ययंत्रणेच्या दहशतीसंबंधी बोलायचं तर, निर्दय अनिर्बंध सत्ताधीशाच्या हातात अशी राज्ययंत्रणा गेल्यामुळे क्रौर्याची सीमा ओलांडली गेल्याची एकाहून अधिक उदाहरणं (इतिहासात) आहेत. अर्थात, प्रदीर्घ काळ दबून राहिलेले लोक जेव्हा त्यांच्या जुलूमकर्त्यांच्या विरोधात लढू पाहतात किंवा स्वातंत्र्य आणि सामाजिक पुनर्बांधणीच्या दिशेनं वाटचाल करू पाहतात, तेव्हा होणाऱ्या हिंसेचा तत्काळ धिक्कार करण्याची घाई कोणतीही समजूतदार व माणुसकी असणारी व्यक्ती करणार नाही.
('लँग्वेज अँड फ्रिडम', द इसेन्शिअल चोम्स्की, पान ८०. द न्यू प्रेस प्रकाशन/पेग्वीन बुक्स इंडिया)

चोम्स्कींचं मत जनरल स्वरूपाचं आहे. माओवाद्यांच्या राजकारणाच्या बाबतीत हे फक्त काही घटना-प्रसंगांपुरतं उरत नाही, तर एक दीर्घकालीन धोरण म्हणून ते या मार्गाचा अवलंब करत असतात. त्यामुळं त्याची मर्यादा ओलांडली जातेच. आणि दुसरीकडे देशाच्या सरकारला तसाही विविध पातळ्यांवर सशस्त्र दलांचा वापर करावा लागत असतोच, त्यामुळं त्यांच्या मर्यादाभंगाची उदाहरणं शहरांमधेही दिसतातच, तर जिथलं बाहेर कोणालाच काही दिसणार नाही अशा ठिकाणी ती किती तीव्रपणे दिसतील याचा अंदाज यावा. निव्वळ देशाच्या चलनी नोटांवर गांधींचं चित्र छापल्यानं सुटणारा हा प्रश्न नाही. पण त्यातल्या त्यात माध्यमांनी एकाच हिंसेबद्दल बोलणं बरोबर नाही, एवढं तरी आपल्याला नोंदवता येईल. माओवादी हिंसा करतात का? होय, करतात. फक्त प्रस्थापित सरकारच्या सशस्त्र दलांसोबतच्या युद्धातच नाही, तर अनेकदा मर्यादा ओलांडून सर्वसामान्य लोकांचाही जीव जातो. त्यात कधीकधी नंतर चुकीची कबुली देणारी पत्रकंही प्रसिद्ध करतात. पण त्यानं मेलेला परत येत नाही. आणि भारत सरकार हिंसा करतं का? होय, करतं. सरकार स्थापण्यासाठी निवडणुका लढवणारे पक्ष काय करू शकतात ते नोंदीच्या पहिल्या भागात आलेलं आहेच. ते सध्या प्रस्थापित असल्यामुळं चुकीची कबुली वगैरे द्यायची गरज नाहीच! काहीही झालं तरी मेलेले काही परत येतच नाहीच, पण जिवंत असल्यांचं म्हणणं तरी आपण नोंदवू शकतो.

तर, आता आपण चोम्स्की किंवा अशा वर उल्लेखलेल्या कोणाही मंडळींपेक्षा जास्त लक्ष द्यावं अशा गडचिरोलीतल्या एका व्यक्तीचं म्हणणं उदाहरणादाखल नोंदीच्या शेवटाकडं नोंदवू. ही व्यक्ती म्हणजे एक पंचविशीजवळ आलेला प्राथमिक शिक्षक. स्वतः आदिवासी असलेल्या या मनुष्याच्या जवळच्या नात्यातल्या एका व्यक्तीला माओवादी पक्षाचा भाग बनावं लागलेलं आहे, तर हा स्वतः आणखी काही उच्चशिक्षण घेऊ पाहतोय. त्याचा साहजिकपणेच या सर्व घडामोडींशी सर्वांत प्रत्यक्ष सामना होतो. तर ही व्यक्ती म्हणते:
'त्यांचं (नक्षलवाद्यांचं) नाही बरोबर वाटत. पण कधी कधी.. त्यांनी सूरजागडच्या वेळी जे केलं, ते बरोबर वाटतं. असं कधी कधी त्यांचं पटतं.'
ज्या वृत्तपत्रीय लेखाचा संदर्भ नोंदीतल्या दुसऱ्या भागाला आहे, त्या लेखाच्या 'इंट्रो'त उल्लेख आलेला हाच तो सूरजागडचा खाणप्रकल्प. हा तरूण प्राथमिक शिक्षक गडचिरोलीचा आहे म्हणजे फक्त तिथेच थांबलेला आहे असं नाही. काही झालं तरी तो बंदूक हातात घेणार नाहीयेच. तर मग त्याच्या आणि अशा तिथल्या अनेक मतांना जागा करून द्यायचं काम मुख्य धारेतली प्रसारमाध्यमं करतायंत का? एवढाच एक भाबडा प्रश्न. या विषयावर काहीही नोंदवलं तरी अपुरंच वाटेल, असं वाटूनही एवढी ही पत्रकारी नोंद केली. अपुरेपण असेल तर ते रेघेचं.

या विषयावर रेघेवर यापूर्वी केलेल्या काही नोंदी:
- जीव देऊ, पण जमीन नाही (३१ ऑगस्ट २०१२)
०००

गडचिरोलीत एका ठिकाणी (फोटो: रेघ/शेळी)

०२ सप्टेंबर २०१५

ख़बर वहीं जगजानी हैं

प्रॉब्लेम काय आहे? 

समजा, तुम्ही वयाची पन्नाशी ओलांडलेली आहे. आणि तुमच्या तरण्या मुलीचं कोणातरी मुलासोबत लफडं आहे, असं तुमचा एक शेजारी तुमच्या घरात सांगतो. घरात तुमच्यासोबत आणखीही लोक आहेत- बायको, तरूण मुलगा, तुमचा धाकटा भाऊ, भावाची बायको, त्यांचा शाळकरी मुलगा, असे कोण ना कोण लोक. तर अशा घरात मग आता या मुलीच्या प्रकरणानं वातावरण तापलंय. पोरगी कॉलेजात जाऊन काय हेच करते काय, तोंडात शेण घातलं- टाइपचं काही ना काही बोललं जातंय, समजा. मग कोणीतरी सुचवतं की, त्या पोरग्यालाच जाऊन दम द्यायला पायजे. मग तसं ठरतं. वर दम द्यायला जाताना आपणच एक हवालदारपण घेऊन जायचं ठरतं. तर मग असे तुम्ही, तुमचा भाऊ, तुमच्या बायकोचा भाऊ, तो काल पोरीच्या लफड्याची बातमी सांगून गेलेला शेजारचा तरणा पोरगा, असे सगळे लोक त्या मुलीच्या प्रियकराच्या खोलीत जातात. घुसतातच, म्हणा. आणि त्याची कॉलर पकडतात, दोन-तीन झापडा मारतात. हा पोरगा मुलीवर प्रेम तर करतोय ओ, पण तो काय हिरो नाहीये हिंदी पिक्चरचा, त्यामुळं तो एवढ्या लोकांना नि हवालदाराला बघून बावचळतो नि रडायलाच लागतो सरळ. आता काय? आता काय करणार दम द्यायला गेलेले लोक. किंवा तुम्ही असे दम द्यायला गेलात, तर तुम्ही काय कराल?


तुम्ही काय कराल ते तुम्हालाच ठरवता येईल. पण, सेम अशाच प्रसंगात आपले हे बाऊजी काय करतात बघा. त्यांना तसं आधीपासूनच एवढं आवेशात त्या पोराला धमकवायला जाण्यात इंटरेस्ट नसतो, पण लोक बोलतात म्हणून ते जातात. आणि समोर मग पोरगा रडायला लागल्यावर मात्र ते जरा स्वतःला सावरतात नि ज्येष्ठतेचा दाब आणत बाकीच्यांना खोलीबाहेर जायला सांगतात. मग त्या पोराला जरा धीम्यानं समजावतात. तर, तो पोरगा खरंच प्रेम करत असतो ओ त्यांच्या मुलीवर. म्हणजे सिरियसली त्याला तिच्याशी प्रेम आणि मग लग्न असं सगळं रितसर करण्यात इंटरेस्ट असतो, असं त्यांना जाणवत असेल, समजा. आणि मग प्रॉब्लेम काय आहे? हा प्रश्न बाऊजींना पडतो.

हा पोरगा सरळ-साधा दिसतोय, म्हणजे त्याचा काही प्रॉब्लेम असेलसं दिसत नाही. शेजारचा कोणतरी उडाणटप्पू आपल्या घरात येऊन कायतरी सांगतो नि आपण विश्वास ठेवून टाकतो. आणि मुलीशी तर आपण याबद्दल नीट बोललेलोच नाहीये, आणि ती त्या मुलाबद्दल काय वाटतं ते खरंच सांगतेय. म्हणजे तिचाही प्रॉब्लेम असेलसं वाटत नाही. मग प्रॉब्लेम काय आहे?


झूठ और सच
 
बाऊजी म्हणजे समजा, जुन्या दिल्लीतला एकदम मध्यमवर्गीय माणूस. वर दिसतायंत ना रडणाऱ्या मुलासमोर उभे, लोकरीची टोपी घातलेले, तेच, समजा. (आणि दुसऱ्या फोटोत दिसतेय आरशात, म्हणजे आरशासमोर ती त्यांची सुंदर मुलगी). तर, हे बाऊजी काय करतात? ते घरी जातात, रात्री बायकोला थोडं समजवायचा प्रयत्न करतात. तर, ती पुन्हा त्यांच्यावर डाफरते. म्हणते, 'हां हां, तुम्हीच बिचारे, तुमची मुलगी बिचारी, तो मुलगा बिचारा, बाकी सगळे येडेच आहेत ना घरातले!' असा या बाऊजींचा प्रयत्न फसतो. आणि मग ते रात्री काय विचार करत असतील काय माहीत, पण सकाळी उठल्यावर त्यांना लक्षात येतं की, लोक तर कायपण थोपवत असतात आपल्यावर आणि आपण जातो त्यावर विश्वास ठेवत.. हम लोगों के साथ कितना बडा धोका हुआ है. मार मार के मार मार के, दुनिया भर का झूठ हमारे अंदर ठूस दिया है. और उसी झूठ को अपना सच समज रहे है...

हा तसा एकदम सर्वसामान्य नोकरदार माणूस. त्यामुळं त्याला तर चकितच व्हायला होतं. म्हणजे इतकी वर्षं आपण असंच लोकांचंच ऐकलेलं खरं मानत आलो. हे सगळं बाऊजी सकाळी उठल्यावर आपल्या घरच्यांनाही सांगायचा प्रयत्न करत असतात. पण कोण ऐकणार ओ एवढं. कोणाची आंघोळीची घाई असते, कोणाला बाकीची आवराआवर असते, त्यात या बाऊजींचा भाऊ सकाळी सकाळी पेपर वाचत बसलेला असतो. त्यावर पण बाऊजी म्हणतो, फिर झूठ सुभे सुभे. बकवास है ये. खबर नही है ये. खबर वही होती है जो हम आँखो से देखते है, कानों से सुनते है. बाकी सब बकवास. 














असं सकाळी उठल्या उठल्या वेड्यासारखं वागायचं म्हणजे आधी काय घरचे दुर्लक्षच करतात. नायतरी हा जरा ढिसाळच प्राणी आहे, तर आज कायतरी आलं असेल डोक्यात, असं बाकीच्यांना वाटतं. पण ते तसं तेवढ्यापुरतं नसतं. बाऊजी अगदी मनावरच घेतात हे खरं-खोट्याचं. म्हणजे कोणतरी शेजारचा पोरगा येतो नि आपल्या मुलीबद्दल कायतरी सांगतो, तर आपण विश्वास ठेवतो. हे रोज पेपरात कायतरी छापतात नि आपण त्यावर बातमी म्हणून विश्वास ठेवतो. असं या बाऊजींना सगळ्याच गोष्टींबद्दल वाटायला लागतं. आणि एकदम टोकालाच जाऊन पोचतात ते. जगभर कुठं ना कुठं प्रवासासाठी तिकीट वगैरे काढून देण्याची सोय करणाऱ्या कंपनीत ते कामाला असतात. तर रोजच्यासारखं ऑफिसात जाऊन बसल्यावर त्यांना कोणातरी कस्टमरचा फोन येतो, त्याला अॅमस्टरडॅमचं तिकीट काढून हवं असतं. बाऊजी समोर कम्प्युटरवर बघतात, तिकीट उपलब्ध असतं. मग तो माणूस जायची-यायची वेळ विचारतो. तर त्यावर हे बाऊजी म्हणतात, 'ते मी नाही सांगू शकत, मी तिथं गेलो नाहीये ना कधी, मग तिथं जायला किती तास लागतात, तिथं बर्फ पडतोय की नाही, हे मी कसं कायतरी खोटं सांगू?'

असं होतं या बाऊजींचं. त्यांच्या डोक्यात आलेला सच-झूठचा तर्क ते एकदम टोकालाच नेतात. त्यांच्या त्यांच्या परीनं जसजसं उलगडत जातं तसतसं बोलत जातात. म्हणजे कोणी त्यांना विचारलं समजा, की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, हे तरी तुम्हाला मान्य आहे ना? तर, त्यावरही बाऊजींकडून उत्तर मिळेल, 'असतील'.  रोज रोज पेपरांमधून, टीव्हीवरून, व्हॉट्स-अॅपवरून, रेडियोवरून, फेसबुकवरून आणि कुठून कुठून या ज्या माणसाचं पंतप्रधान म्हणून नाव ऐकू येतं, त्याबद्दलही खात्री वाटू नये, अशा पातळीला जाऊन पोचतात हे बाऊजी! 

तुमचं असं होतं का? एवढं नाही, समजा. पण, याकूब मेननला दिलेली फाशी चूक की बरोबर, हे समजायच्या आत ब. मो. पुरंदरे यांना दिलेला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार चूक की बरोबर, हा प्रश्न. फाशी नि पुरस्कार तसे एकाच पारड्यात तोलता येणार नाहीत. याकूब तर आता परत येऊच शकणार नाही, आणि पुरंदऱ्यांचा पुरस्कारही आता देऊन झाला. पण या दोन्ही घडामोडींमध्ये न्याय मिळाला का? तुमचं उत्तर काय? दोन पर्याय आहेत: हो किंवा नाही? हो, असेल तर उजवा डोळा मारा. नाही, असेल तर डावा डोळा मारा. यातलं काहीच करायचं नसेल, तर पुन्हा दोन पर्याय आहेत. एक- दोन्ही डोळे बंद करा आणि झोपा. किंवा दुसरा पर्याय- दोन्ही डोळे उघडून 'आँखो देखी' हा (रजत कपूर दिग्दर्शित) हिंदी चित्रपट पाहता येईल. त्याच चित्रपटावरून आत्तापर्यंतची नोंद केली आपण. त्यातल्या बाऊजींचं पुढं काय होतं, ते त्या चित्रपटात पाहून समजेल. ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहा, कानांनी ऐका. आपण रेघेच्या विषयातलं फक्त इथं नोंदवलं.

खरं तर हे बाऊजींचं म्हणणं असं टोकाला नेत गेलं, तर मग घड्याळातल्या वेळेलाही अर्थ नाही, कारण घड्याळात काटे काहीही दाखवतील, पण तितकेच वाजलेत कशावरून? किंवा आपल्याच खोलीत बघितलं, तर पृथ्वीचं गोलपणसुद्धा जाणवत नाही, त्यामुळं पृथ्वीही गोल नाहीच बहुतेक. किंवा 'वाघ डरकाळी फोडतो', या वाक्यातला डरकाळी फोडलेला वाघही आपण पाहिलेलाच नाही, मग कदाचित तो 'म्याँव' करत असेल असंही असेल. असं हे तर्कट वाढत जाऊ शकतं. मग अमुक शब्दाला अमुकच अर्थ का, इथपर्यंत येऊन पोचलं, की मग बोलती बंद. कारण अमुक शब्दाला अमुक अर्थ, बाकीचे लोक तसंच बोलतात म्हणूनच येतो ना. तर बाकीच्या लोकांवर विश्वासच ठेवला नाही, तर हे शब्द-अर्थाचं गणित बरोबर येणंच अवघड. असं 'आँखो देखी'तल्या बाऊजीचं होतं थोडा वेळ. शेवटी पाच इंद्रियांवर तरी किती विसंबून राहणार!

मग आता आपण समाज-माध्यमांवर विसंबून काही हाती लागतंय का पाहू या. समजा, तुम्ही कोल्हापुरात राहाताय. तर गेल्या महिन्यात शहरात चोरांचा सुळसुळाट झाल्याचा व्हॉट्स-अॅप मेसेज तुम्ही वाचला असाल. एक साखर कारखाना बंद झालाय नि तिथून शेकडो बिहारी कामगार बेरोजगार झालेत, ते टोळक्यानं लोकांवर झडप घालून चोऱ्या करतायंत, असा मेसेज वाचला होतात का? वाचून विश्वास ठेवलात का? मग कारखाना कुठला होता सांगा बरं? किंवा हे तर सोडा, छोट्यामोठ्या शहरांमधलं. भारत देशाचं जे इंग्रजी नाव आहे 'इंडिया', ते कशावरून आलं माहितेय का? हे बघा:


म्हणजे ज्या देशाच्या सिंधू का हिंदू संस्कृतीचं कौतुक ऐकू येतं नि इंडसबिंडस सिव्हिलायझेशनांच्या गप्पा होतात, तर त्याच्या नावामागं इतका सोपा तर्क आहे, ही माहिती व्हॉट्स-अॅपवरून मिळू शकते. यावर कोणी म्हणू शकतं, की असले मेसेज आम्हाला नाही येत, आम्ही फक्त कामाचे/ वैचारिक असे ग्रुपच जॉइन केलेत. किंवा कोणी असंही म्हणेल की, एवढं कोण विश्वास ठेवतं काय असल्या मेसेजांवर! तर असं म्हणणारे म्हणू शकतातच, पण मेसेजवर विश्वास ठेवणारे विश्वास ठेवतात, हेसुद्धा आहेच. काही दिवसांपूर्वीच, ही नोंद लिहिणाऱ्याला एकानं असं सांगितलं की, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, हिंदुस्तान टाइम्स या सगळ्या वर्तमानपत्रांचे मालक मुस्लीम आहेत! अनुक्रमे जैन, गोएंका, बिर्ला अशा नावांचे मालक असलेल्या या पेपरांबद्दलची ही माहिती संबंधित व्यक्तीला व्हॉट्स-अॅपवरूनच मिळाली होती, आणि त्याला खऱ्या मालकांची नावं सांगूनही पटलं नाही. पण यावरही कोणी म्हणेल, हे असे अपवाद आहेत! तर, तसं म्हणायला हरकत नाही, पण आपण इथं नोंदवून ठेवलं.

काळं आणि पांढरं

बरं, ज्या माणसाच्या निमित्तानं आपण नोंद करतोय तो हा कोण बाऊजीफाऊजी, त्याची काय अक्कल, काय बुद्धी- असंही कोणी म्हणू शकतं. शिवाय रेघेचीही काय बुद्धी, सारखं माध्यमांना नावं ठेवायची, आपली काय अक्कल नाही साधी! असं हे बुद्धीचं स्तोम फार जाणवतं का तुम्हाला आजूबाजूला? सोशल-मीडियामधून किंवा एकूणच असं बुद्धी-माहिती-ज्ञान यांची फार हवा जाणवते का? ढोबळ प्रश्न आहे, बाऊजीसारख्या माणसाला पडेल असा. म्हणजे दुर्लक्षही करता येईल असा. पण मग आपण एका पुस्तकाची मदत घेऊ. त्या पुस्तकाकडे तरी दुर्लक्ष करणं बरोबर नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या अनिकेत जावरे यांचं 'काळे पांढरे अस्फुट लेख' हे १३१ पानांचं आणि १४० रुपयांचं पुस्तक आहे. २०११ साली प्रकाशित झालेलं. या पुस्तकात एक लेख आहे, 'माध्यमे, प्रसार आणि प्रसारमाध्यमे' असा. त्यात जावरे एका ठिकाणी म्हणतात:
हर्मिस प्रकाशन, पहिली आवृत्ती: १ एप्रिल २०११
मुखपृष्ठ: अनिकेत जावरे, गिरीश सहस्रबुद्धे
शिक्षणाचा उपयोग वर्तमानपत्र वाचण्यासाठीच होणार असेल तर निरक्षर, वन्य जीवन परवडले. वृत्तपत्रातील 'वर्तमान' संध्याकाळपर्यंत भूतकाळ आणि विस्मृतीत गडप होणारेच असावे लागते. रोज एक वेळ जग किती विस्तृत, चमत्कारिक आणि भयावह आहे याची स्वतःला आठवण करून देण्याची गरज निर्माण होण्यासाठी एक विशिष्ट ज्ञानसमाजव्यवस्था कारणीभूत आहे. दूरदेशी काय घडले हे रोज आणि त्वरित जाणून घेण्याची आवश्यकता; आणि जाणून घेतले तर त्या माहितीचा दैनंदिन जीवनात काही उपयोग असतो यावर विश्वास ठेवणे- तोही दरेक दिवशी- कठीण आहे. बातम्या पसरवण्याची वर्तमानपत्री लेखनशैली अशीच असावी लागते की आजची बातमी उद्या वाचली जाणार नाही. बातमीच्या ताजेपणाला (ताजेपणाच्या रूपकाचे विश्लेषण इथे करत नाही) इतके महत्त्व का असते? ज्ञान प्रसारणाचा हा कोणता प्रकार आहे की जो दुसऱ्या दिवशी बेचव ठरतो? 'त्वरित' प्रक्षेपण पाहण्यात विशेष काय असते? ते अधिक 'सत्य' का भासते? 'ऑनलाइन' संपादन, कॅमेऱ्याचे मर्यादित दृष्टिकोन यामुळे असे प्रक्षेपण तितकेच संपादित असते जितके मणि कौलचे किंवा स्पीलबर्गचे सिनेमे. पण एक खोटे, दुसरे सत्य ठरते.

अर्थातच वृत्तपत्रे आपण सत्यान्वेषी आहोत असे गर्वाने सांगणार; पण एका पी. साइनाथच्या 'व्हॉक्स पॉप्युली'मुळे सर्व वृत्तपत्रव्यवहार सत्यान्वेषी ठरत नाही. वृत्तपत्रातली भाषा हा वेगळा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे तिच्या मध्यमतेविषयी इथे फक्त इशारा करतो.

टीव्हीमुळे तर 'प्रत्यक्ष' या शब्दाचा अर्थ व त्याचे दार्शनिक लागेबांधे आणि आमचा आणि सत्याचा संबंध नष्ट होण्यापर्यंत आले आहे. जे वास्तव अन्यथा अगोचर असते ते काही सेकंद-मिनिटांच्या फरकाने दृष्टिगोचर करण्यात आपणही फार मोठे तांत्रिक यश मिळवले. पेपर आणि चहा जसे एकमेकांची चव वाढवतात, तसेच टीव्ही आणि रोजचा वरणभात एकमेकांना सुसह्य करतात. शिवाय 'स्वाभिमान', 'हम लोग' अशा जवळीक साधणाऱ्या नावांच्या मालिका पाहून टीव्ही बंद करण्याचा हा अधिकार गाजवण्याची क्षमता पुनःपुन्हा वापरल्याने असे भासते की आपण अधिकारी आणि टीव्ही ही वस्तू आपला सेवक. प्रत्यक्षात वस्तुस्थिती उलट असते.

प्रसारमाध्यमांचा प्रसार म्हणजे प्रसारण यंत्रांचा विस्तृत आणि विकसित क्रय-विक्रय. आता या क्रय-विक्रयात जे काही घडते, ते सर्वच दुष्ट असते असे नव्हे. परंतु माध्यमांतून होणाऱ्या ज्ञानव्यवहाराची कठोर परीक्षा करणे अतिशय निकडीचे आहे. अन्यथा पश्चिमेत जो प्रकार घडला तो येथेही घडेल. 'सत्य', 'वास्तव', 'प्रत्यक्ष' या शब्दांचे त्यांच्या अर्थांशी असलेले संबंध बदलले आहेत. या बदलांची नोंद घेऊन त्यांचे वर्णन आणि विश्लेषण करणे हे बुद्धिजीवी आणि बुद्धिवाद्यांचे कर्तव्य आहे. अशा विश्लेषणांची एक तात्पुरती सुरुवात करण्याचा प्रयत्न इथे केला आहे. प्रसारमाध्यमांद्वारेच हा प्रयत्न करता येतो हा अंतर्विरोध आपल्याला जागीच थांबवणारा नसून चालना देणारा आहे.
(पान ८३-८४)  
[लेख मुळात 'अभिव्यक्ती' या नियतकालिकाच्या ऑक्टोबर-डिसेंबर १९९७च्या अंकात प्रकाशित]

हा लेख मूळ १९९७ सालचा आहे, तेव्हापासून आता प्रसारमाध्यमांचा व्यवहार कित्येक पटींनी वाढलाय, पण लेखातलं निरीक्षण त्याला लागू होतयंच. जावऱ्यांच्या या लेखात 'अगोचर' असा शब्द आलाय, त्याचा शब्दकोशातला एक अर्थ आहे: 'ज्ञानेंद्रियांनी समजून येत नाही ते'. असं 'अगोचर' कायतरी टीव्हीवरून एकदम दृष्टीगोचर होतं, म्हणजे डोळे या इंद्रियातून आपल्या आत येतं. आणि अर्थातच कान या इंद्रियातून पण येतं. तर हे एवढं सगळं येतं आपल्या आत, ते बरेचदा नुसतं काळं नि पांढरं होऊन येतं, त्यातल्या मधल्या सगळ्या राखाडी छटा प्रसारमाध्यमांमधून येतंच नाहीत! बाऊजी बोअर झाला त्याचंही कारण हेच असेल का? जावऱ्यांच्या निरीक्षणातही चांगलाच राग दिसतोय, तोही म्हणूनच आला असेल काय?

कळलं ते काय? 

जावऱ्यांच्या पुस्तकातल्या एकाच लेखातला निव्वळ एकच उतारा सुटा देऊन आपण थोडा त्या पुस्तकावर अन्याय करतोय, असं वाटतंय. पुस्तक थोडं विद्यापीठीय शैलीतलं आहे, त्यामुळं त्या प्रवाहातलं कोणी त्याबद्दल लिहील, असं आपण पाहणार होतो, पण नेहमीप्रमाणे ते जमवता आलं नाही. तर, आपण थोडं नोंदवू. आणि ते नोंदवणं बाऊजींच्या वाटण्याला धरूनही आहे.

आपल्याला काही वादबिद असल्या फंदात पडायचं नसेल, तरी जावऱ्यांच्या पुस्तकातले 'उत्तर-आधुनिकतावादा'वरचे दोन लेख वाचण्याजोगे आहेत. उत्तराधुनिकता, उत्तर-आधुनिकता, आधुनिकोत्तर- असे शब्द वर्तमानपत्रांमधल्या पुस्तक परीक्षणांमधून किंवा जनरलही एखाद्या लेखातून आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांच्याही वाचनात आलेले असू शकतात. तर, त्या शब्दांशी, त्यांच्या अर्थाशी संवाद साधणारे दोन लेख या पुस्तकात आहेत. या तीन शब्दांपैकी 'उत्तर-आधुनिकता' हा शब्द योग्य असल्याचं काही स्पष्टीकरण जावरे देतात, ते असं:
पूर्व आणि उत्तर-मीमांसेतील जो फरक, तोच आधुनिकवाद आणि उत्तर-आधुनिकतावादात. पण हा मुद्दा एवढ्यावर संपवून चालत नाही, कारण संस्कृतोद्भव मराठीत आणखी एक शब्द उत्तरादाखल आहे: 'उत्तरादायित्व' म्हणजे उत्तरादायी, जबाबदार असणे, ऋणी असणे, इत्यादी. 'उत्तर'-आधुनिकच्या 'उत्तर'चा प्रश्न असा सोडवता येतो. आपले सर्व आयुष्य कुणाच्या तरी नंतर (उत्तर) असते, कुणीच नाही तर आदम आणि हव्वा (किंवा फारच आग्रह असेल तर मनू आणि इला) आपल्या आधी असतातच, आणि भाषाही असतेच. मानवाच्या आधी भाषा? देव कुठली भाषा बोलतो? मराठी? दिव्यागिर्वाण भारती? का इंग्रजी?

देव सध्या कुठे राहतो? अमेरिकेत? की प्रच्छन्न स्वरूपात रूपर्ट मडॉकच्या घरी?[..] 
(पान ६९)

इथंही आपण या पुस्तकातला एक छोटासा तुकडाच तोडला. जावऱ्यांचे हे लेख नुसती ओळख करून देणारे नाहीत, तर त्यातल्या मुद्द्याशी संवाद करणारे आहेत. या पुस्तकातले बाकीचे लेखही असेच आहेत. त्यातले सगळे विषय रेघेच्या कक्षेतले नाहीत. शिवाय काही वेळा पुस्तकातल्या भाषेमुळं अडखळायला झालं. हा पुस्तकातल्या भाषेचा दोष असण्यापेक्षा, रेघेची वाचण्याची मर्यादा असण्याचीच शक्यता जास्त आहे. पण तरी त्यासंबंधीचं एक उदाहरण नोंदवू. जावऱ्यांच्या पुस्तकात 'फुको आणि आंबेडकर' असा एक सुंदर लेख आहे. यातल्या मिशेल फुकोबद्दल काही बोलण्याएवढी रेघेची माहिती नाही. पण आंबेडकरांबद्दल एक मुद्दा जावरे मांडतात, तो असा:
राज्यव्यवस्थेला आपण न्याय देऊ शकत नाही हे राज्यव्यवस्थेच्या यंत्रणेतूनच कबूल करायला लावताना आंबेडकरांनी वाटते त्यापेक्षा अधिक विलक्षण कायदेशीर कृती केली नाही काय?
(पान ३६)

हा मुद्दा निव्वळ रोचक नाही, तर डॉ. आंबेडकरांबद्दल काही अधिक खोलवर गोष्ट मांडणारा आहे, असं वाटतं. फक्त ते वाक्य सर्वसामान्य वाचक म्हणून आपण असं वाचलं- 'आपण न्याय देऊ शकत नाही, हे राज्यव्यवस्थेला तिच्या यंत्रणेतूनच कबूल करायला लावताना आंबेडकरांनी केलेली कृती, वाटते त्यापेक्षा अधिक विलक्षण कायदेशीर नाही काय?' मूळ वाक्यापेक्षा हे आपल्या मनातलं वाक्य अधिक सोपं झाल्यासारखं वाटलं. पण या बाबतीत वाचक म्हणून आपली चूक झाली असण्याचीही शक्यता आहे. यात आणखीही काही चूक सापडली नि वाचकांनी प्रतिक्रियेत नोंदवली तर जास्त कळण्याच्या दृष्टीनं बरं जाईल. आत्ता कळलं ते इथं नोंदवलं. वाचकाच्या कळण्याबद्दलही जावऱ्यांचंच एक म्हणणं नोंदवू:
न लिहिल्या गेलेल्या पुस्तकांमधलं काही ना काही प्रत्येक (नव्या) पुस्तकात यायचं राहून गेलेलं असतं. पीएच.डी.चे प्रबंध, कविता आणि बहुतेकशा भाषिक कृतींच्या बाबतीत हे खरं आहे. त्यामुळंच लोक पुस्तकं वाचतात- जे आपल्या हातून निसटलेलं असतं, ते वाचण्यासाठी; आणि त्या अर्थी हे पुस्तक वाचनीय आहे. बहुतेक वेळा होतं तसंच, वाचकांना लेखकाच्या हेतूपेक्षा वेगळ्या रितीने या पुस्तकाचं आकलन होऊ शकतं.
(प्राची देशपांडे यांच्या 'क्रिएटिव्ह पास्ट्स: हिस्टॉरिकल मेमरी अँड आयडेन्टिटी इन वेस्टर्न इंडिया १७००-१९६०' या पुस्तकाच्या जावऱ्यांनी लिहिलेल्या परीक्षणातून, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, २८ नोव्हेंबर २००९.
मूळ इंग्रजी मजकुराचं साधारण भाषांतर इथं नोंदवलंय).

मराठीत नीट जमलं नसेल, तर मूळ इंग्रजी वाक्यंही नोंदवूया: 
Every book misses something from the books that were not written. This is true of Ph.D. dissertations, poems and most linguistic utterances. That is the reason people read books- to read what one misses, and in this sense this book is readable. As in most cases, readers may understand the book differently from what is intended by the author.
***

आता इथं नोंद संपतेय. कंटाळा आला का वाचताना. मग शीर्षकातलं गाणं ऐकून थांबू- खबर वहीं जगजानी है, आँख देखी तो मानी है.

०९ ऑगस्ट २०१५

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस । एक प्रसिद्धी-पत्रक

देशातली ८० टक्के खनिजं व ७० टक्के वनं आणि इतर नैसर्गिक स्त्रोतांची श्रीमंती राखून असलेल्या बहुतेकशा प्रदेशांवर आदिवासी मंडळी राहतात. शिवाय, याच प्रदेशात ९० टक्के कोळशाच्या खाणी आहेत.
  
- द आदिवासी क्वेश्चन: इश्यूज ऑफ लँड, फॉरेस्ट अँड लाइव्हलीहूड, संपादक- इंद्रा मुन्शी. 
(इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमधल्या निवडक लेखांचा संग्रह).

आदिवासी मंडळींची अवस्था येत्या काळात काय होणार आहे, याची कल्पना वरच्या आकडेवारीवरून आपल्याला येऊ शकते. आपल्याला म्हणजे होऊ घातलेल्या महासत्तेतल्या विकसनशील नागरिकांना. आपण दर वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिवस साजरा करतो, नंतर १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस पण साजरा करतो. आता अलीकडं २१ जूनला आपण जगासोबत आंतरराष्ट्रीय योग दिवस पण साजरा केला. या दिवसांचे योग चांगले असल्यामुळं ते साजरे पण जोमानं होतात, पण असाच आणखी एक दिवस आज होता: आंतरराष्ट्रीय मूलनिवासी/आदिवासी दिवस. या दिवसाच्या निमित्तानं ही नोंद होते आहे.


एक

परिवर्तनाचा वाटसरू । १६-३० एप्रिल २०१५
भारत जन आंदोलन आणि अखिल भारतीय आदिवासी महासभा या दोन संघटनांनी गडचिरोली शहरात २२-२३ मार्च २०१५ रोजी 'जनसंघर्षांच्या राष्ट्रीय परिषदे'चं आयोजन केलं होतं. या परिषदेच्या बातम्या मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये साहजिकपणेच आल्या नाहीत. काही वर्तमानपत्रांच्या स्थानिक पुरवण्यांमध्ये उद्घाटनाच्या सत्राची बातमी-फोटो आला होता. या परिषदेच्या समारोपाच्या दिवशी सुमारे पाच हजार ते आठ हजार आदिवासींचा मोर्चा निघाला. 'लोकसभा ना विधानसभा, सबसी उंचा ग्रामसभा', 'मावा माटे, माटे सरकार, मावा नाटे, मावा राज' अशा घोषणा देत निघालेल्या या मोर्चा आदिवासी मंडळी ढोल, नगारे वाजवत सामील झाली होती, कोणी सायकलवर होते, कोणी स्पीकरवर घोषणा देत होते, इत्यादी. या परिषदला प्रत्यक्ष उपस्थित राहून तिथं दिसलेलं नोंदवणारा एक रिपोर्ट 'परिवर्तनाचा वाटसरू' या पाक्षिकाच्या एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात आला होता. परिषदेत दिसलेलं बरं-वाईट त्यात नोंदवलेलं होतं. एका 'राष्ट्रीय' परिषदेनंतरचा हजारो आदिवासी मंडळींचा एक मोर्चा त्यात कॅमेऱ्याला आवश्यक दृश्यबाजी असूनही मराठी वृत्तवाहिन्यांसाठी बातमीचा विषय झाला नाही. वर्तमानपत्रांना तो राज्यस्तरीय बातमीचाही विषय वाटला नाही. या परिषदेत वेगवेगळ्या टप्प्यावर सहभागी असलेल्या व्यक्तींमध्ये डॉ. आनंद तेलतुंबडे, प्रकाश आंबेडकर, वृंदा करात, इत्यादी चांगल्यापैकी प्रसिद्ध नावंही होती. तर अशी ही परिषद झाली नि गेली. तेव्हा आदिवासींचा एक मोर्चा आला नि गेला. आज आदिवासींचा दिवस म्हणून त्याचं निमित्त करून आपण काही महिने आधीच्या एका प्रसंगाचा हा उल्लेख फक्त केला. भूसंपादन कायदा, वनहक्क कायदा, पेसा कायदा ['पंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम'।वाचा: मिलिंद बोकिलांचा लेख.] इत्यादी मुद्द्यांवर कमी-अधिक चर्चा करण्याचा प्रयत्न हा या परिषदेचा एक उद्देश होता. 

[या संबंधीच्या बातम्या मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांमध्ये का येत नसाव्यात, याचा अंदाज बांधण्यासाठी रेघेवरची ही नोंद चाळता येईल : एक आठवडा + पाच हजार आदिवासी = किती बातम्या?]


दोन

आता आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस होता. या वर्षी या दिवसाचा 'स्पॉटलाइट' आदिवासींच्या आरोग्यावर असेल, असं 'संयुक्त राष्ट्र संघटने'नं म्हटलं होतं. त्या निमित्तानं सरचिटणीस बान की-मून त्यांच्या पदाला साजेशा आशावादानं म्हणतात, 'जगातील आदिवासी लोकांच्या या आंतरराष्ट्रीय दिवसाच्या निमित्तानं मी जागतिक समुदायाला आवाहन करतो की, हे लोक मागे पडू नयेत याची खबरदारी आपण घेऊया. अधिक चांगला आणि न्याय्य भविष्यकाळ घडवण्यासाठी आदिवासी लोकांचं आरोग्य सुधारावं व त्यांचं कल्याण व्हावं याकरता आपण सर्व प्रयत्न करूया.'

आपण या नोंदीच्या सुरुवातीला नोंदवली ती आकडेवारी बऱ्याच गोष्टींसाठी उपयोगी असलेल्या कच्च्या मालाची आहे. तो कच्चा माल कोणाच्या मालकीचा? त्यातून कल्याण कोणाचं होणार? कल्याण ज्यांचं कोणाचं होईल ते लोक कच्च्या मालाच्या मालकांना काय देणार? की कच्च्या मालाच्या मालकांना संपवून सरळ आपण गुपचूप तो माल घेऊन टाकायचाय? असे काही प्रश्न या विषयाशी संबंधित अभ्यासक, पत्रकार इत्यादींनी बोलण्यासारखे आहेत. हे प्रश्न सगळ्यांशीच संबंधितही आहेत, कारण त्या कच्च्या मालाची पक्की फळं सगळ्यांना कमी-अधिक प्रमाणात हवी असतात. तर त्या कच्च्या-पक्क्या फळांची चर्चा करायचं एक निमित्त आजच्या आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवसानं दिलं होतं. त्यासंबंधी काही चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये झालेली तुम्हाला दिसली का? रेघेला दिसली नाही. (काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक प्रसिद्धी-पत्रक काढल्याची बातमी तेवढी दिसली).

अशी काही चर्चा करायचा प्रयत्न गडचिरोलीतल्या धानोरा तालुक्यात आज झाला. भारत जन आंदोलन जिल्हा समिती (गडचिरोली) व धानोरा तालुक्यातील ग्रामसभांच्या वतीने आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यासंबंधी प्रशासनानं काही परवानगी नाकारल्याची बातमी 'पीटीआय'नं काल दिली होती. यासंबंधीचं प्रसिद्धी-पत्रक रेघेकडे भारत जन आंदोलनाच्या प्रतिनिधीने पाठवलं. तसंच आज झालेल्या कार्यक्रमाचं प्रसिद्धी-पत्रकही रेघेकडे आलं, ते आपण नोंदीच्या या भागात नोंदवतो आहोत.

या प्रसिद्धी-पत्रकात सुरुवातीला असा आरोप करण्यात आला आहे ('पीटीआय'ची बातमी याच संदर्भातली आहे):
जिल्हा प्रशासनाने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३७.(१) व (३) लागू केल्याचे कारण दाखवून कार्यक्रमाला लाउड स्पीकर मंजुरी नाकारली होती. व आज सकाळपासून पोलीस कार्यक्रम स्थळी येऊन आयोजक व जमलेल्या लोकांना ‘तुम्ही कार्यक्रम घेऊ शकत नाही. सगळे आपआपल्या गावी निघून जा’ अश्याप्रकारे धमकावू लागले. ‘कार्यक्रमाची मंजुरी नाही असे लिखित आदेश दाखवा’ अशी विचारणा जेव्हा आयोजकांनी केली तेव्हा पोलिसांनी काढता पाय घेतला. पोलिसांनी आदिवासी बहुल कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड तालुक्यातील कार्यक्रमांना मंजुरी नाकारली पण जिल्ह्याच्या ठिकाणी झालेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यक्रम मात्र सुरळीत जोरदार आवाजात सुरू होता.
त्यानंतर या प्रसिद्धी-पत्रकात धानोरा तालुक्यात झालेल्या सदर कार्यक्रमातील वक्त्यांच्या भाषणांचा तपशील आहे, तो असा:
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना महेश राऊत म्हणाले की, “कोलंबस व इतर साम्राज्यवादी लोकांनी आदिवासी जनतेवर केलेल्या शोषणाचा विरोध म्हणून आपण आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करतो. हा दिवस साजरा करणे म्हणजे आदिवासींची अस्मिता, अस्तित्व व खऱ्या स्वतंत्राचा संघर्ष करणे होय. आपल्या जल-जंगल-जमीन व संसाधनांची मालकी स्थापित करणे होय. राणी दुर्गावती, बाबुराव शेडमाके, बिरसा मुंडा आणि आम्हा आदिवासींचा संघर्षशील इतिहास जिवंत ठेवणे होय”. प्रमुख भाषणात माजी आमदार व भारत जन आंदोलनाचे गडचिरोली जिल्हा संयोजक  हिरामण वरखडे म्हणाले, “जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या देशाला इथल्या मूळनिवासी आदिवासींची संख्या विचारली, तेव्हा आपल्या भारताच्या सरकारने इथे कोणी मूळनिवासी नाहीत असा अहवाल पाठविला आणि त्यांनी इथल्या आदिवासींचे अस्तित्वच नाकारले. आज आपण आपल्या अधिकारासाठी पेसा कायदा, वन हक्क कायदा, पाचवी अनुसूची यांची प्रभावी अंमलबजावणी करून गाव-गणराज्य ग्रामसभा व्यवस्था मजबूत करणे गरजेचं आहे. आपली संस्कृती, प्रथा, परंपरा, आपली संसाधने यांचे रक्षण करणे गरजेचं आहे तेव्हा कुठे आपले अस्तित्व टिकून राहील”. पोलीस विभागाच्या दडपशाहीचा व वर्तमान सरकारने चालविलेल्या आदिवासी विरोधी धोरणांचा धिक्कार करताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार म्हणाले, “वर्तमान भाजपा सरकार आदिवासीच्या अधिकारांना हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जमीन अधिग्रहण कायदा, महाराष्ट्र ग्रामवन नियम, कोळसा व इतर खदान कायदे हे आदिवासींकडून त्यांच्या जंगल जमिनी लुटण्यासाठी लागू करीत आहे. ह्या शोषक बाबींचा आपण जोरदार विरोध करणे गरजेच आहे. आदिवासींनी आपल्या अस्तित्वा साठी एकजूट होऊन, संगठीत होऊन संघर्ष करावा”. अॅडव्होकेट जगदीश मेश्राम यांनी जिल्हा प्रशासन व पोलीसांच्या आदिवासी विरोधी भूमिकेचा निषेध केला “आदिवासींनी एकत्र येऊन आपल्या अधिकारासाठी संघर्ष करणे आज सरकारला नको आहे, फक्त आम्ही योजनांसाठी रांगेने सरकारी कार्यक्रमात सहभागी व्हावे पण आपले स्वताचे कार्यक्रम करू नये असेच सरकारला वाटते म्हणूनच त्यांनी आज ग्रामसभांद्वारे आयोजित आदिवासी दिवस कार्यक्रमाला अडचणी निर्माण केल्या”. पेसा कायदा, वन हक्क कायदा व आदिवासी अधिकारांच्या बाबतीत माधो कुमोटी, महादू नरोटे, छायाताई पोटावी, बावसू पावे, जास्वंदा आदी प्रमुख व्यक्त्यांनी मार्गदर्शन केले. गडचिरोली जिल्ह्यात येऊन ठेपलेला विस्थापनाचा धोका, आदिवासींवर वाढते अन्याय व अत्याचार या विरोधात आदिवासींची व इतर जनतेची सामूहिक एकता निर्माण करून संघर्ष करण्याच्या निर्धार करण्यात आला. आदिवासींचे अधिकार, अस्मिता, अस्तित्व व स्वातंत्राच्या मुद्यांवर विशेष ठराव सदर कार्यक्रमात पारीत करण्यात आला. 
कार्यक्रमात मंजूर झालेल्या ठरावाची प्रतही भारत जन आंदोलनाच्या प्रतिनिधीनं रेघेला दिली आहे, ती अशी:

९ ऑगस्ट २०१५- “आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस” ठराव
दिनांक ९ ऑगस्ट २०१५  “आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस” कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील, धानोरा तालुक्यातील, किसान भवन धानोरा येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमात खालील ठराव पारीत केल्या गेलेत.
१. आज ९ ऑगस्ट २०१५ ला धानोरा येथे आयोजित “आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस” कार्यक्रमाला अडथळा आणण्यासाठी प्रशासनाने कलम ३७. (१) व (३) लागू करून कार्यक्रमाला मंजुरी नाकारली. सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमाला काही अडचण नाही पण सामान्य लोकांना मंजुरी नाकारणे, ह्या दुपट्टी धोरणांचा आम्ही धिक्कार करतो.
२. भारत सरकारने आपल्या देशात मूळनिवासी आदिवासी नाहीत असा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाला पाठवून आदिवासीचे अस्तित्व नाकारले आहे. आम्ही सरकारच्या ह्या आदिवासीविरोधी नीतीचा निषेध करतो व भारतातील संपूर्ण आदिवासींचा मूळनिवासी दर्जा प्रस्थापित करण्यात यावा.
३. लघु वनउपजांवरील ग्रामसभेच्या अधिकारांना मान्यता देवून, वन-उपजांवर संपूर्ण स्वामित्व मिळवण्याच्या संघर्षांना मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला. पेसा कायदा व वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
४. आदिवासी क्षेत्रातील शिक्षण, आरोग्य व्यवस्था संपूर्णपणे कोलमडून गेली आहे. आदिवासींना रोजगाराच्या संधी कमी केल्या जात आहेत. आदिवासींच्या अधिकारच शिक्षण व आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात यावी.
५. आदिवासी क्षेत्रांसोबातच इतरही क्षेत्रांत स्थानिक मातृभाषेमध्ये प्राथमिक शिक्षणाचा मिळायला हवे आणि सर्व आदिवासींच्या मातृभाषांना संविधानिक दर्जा देण्यात यावा व आदिवासी समुदायाचा संघर्षशील इतिहास, समतावादी सांस्कृतिक व्यवस्था पाठ्यक्रमात समाविष्ट करण्यात यावी.
६. गाव-गणराज्य ग्रामसभेच्या सर्वोच्च अधिकारांना कायम करणे आणि वन व्यवस्थेला अधिक लोकतांत्रित बनविण्यासाठी संघर्ष मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.
७. खासगीकरण, भांडवशाहीला वाढवणारे आणि फक्त कॉर्पोरेट लुटीसाठी श्रम, पर्यावरण आणि प्राकृतिक संसाधन व आदिवासी कायद्यांमध्ये शोषक बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियांचा विरोध करण्यात आला. आणि जन विरोधी कायदे, धोरण यांच्या विरोधात संघर्ष मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
८. जनसहमतीला नाकारणाऱ्या जमीन अधिग्रहणाला आम्ही विरोध करतो. जमीन अधिग्रहण कायदा, २०१३ च्या शेतकरी विरोधी व अन्य गैर-लोकतांत्रिक तरतुदींना आम्ही ख़ारीज करतो. आणि सध्याच्या सरकारने प्रस्तावित केलेल्या जमीन अधिग्रहण अध्यादेश २०१४  मध्ये पुन्हा अधिक जनविरोधी धोरणे बनवण्याच्या प्रयत्नांचा आम्ही धिक्कार करतो आणि प्रस्थावित अध्यादेश नाकारतो. ह्या सोबतच जनविरोधी कोळसा खासगीकरण कायदा, खनिज संपत्तीचे दहन करणाऱ्या कायद्यांचा विरोध करण्यात आला.
९. कॉर्पोरेट दलाली व गैरकानुनी प्रयत्नापासून सरकारने दूर व्हावे आणि ग्रामसभेच्या सहमतीशिवाय कोणत्याही कंपनी किंवा प्रकल्प, परियोजनेकरिता दिलेलं जंगल व जमीन रद्द करून लोकांना वापस करण्यात यावी.

या ठरावातील तीन, सहा, आठ क्रमांकाच्या मुद्द्यांवर चर्चा करणं किती महत्त्वाचं आहे, हे नोंदीच्या सुरुवातीला दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट व्हावं. मतभेद होऊ शकतील, पण या मुद्द्यांवर चर्चा तरी व्हायला हवी. चर्चेसाठी या लोकांचा आवाज लाउड करणार कोण, हाही एक प्रश्न आहे. कार्यक्रमात लाउड-स्पीकर वापरायचा नाही आणि तरीही जो काही कार्यक्रम होईल त्याचा आवाज लाउड करण्यात प्रसारमाध्यमांना इंटरेस्ट नाही, अशा या म्यूट मंडळींसाठीचा आजचा दिवस होता. आणि आता सहा दिवसांनी येईल तो दिवस लाउड-स्पीकरचा असेल.

आज धानोऱ्यात झालेल्या या कार्यक्रमादरम्यानचे भारत जन आंदोलनाच्या प्रतिनिधीनंच रेघेकडे पाठवलेले दोन फोटो:

कार्यक्रमात लाउड स्पीकरशिवाय उपस्थितांशी संवाद साधताना वक्ते

हजारो आदिवासी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती, असे भारत जन आंदोलनाचं प्रसिद्धी-पत्रक सांगतं.

३० जुलै २०१५

फाशी- जॉर्ज ऑर्वेल

मुंबईमधल्या १९९३ सालच्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेनन याला आज सकाळी साडेसहा वाजता नागपूरमधील तुरुंगात फाशी देण्यात आलं. त्या निमित्तानं ही नोंद आहे. संदर्भ वेगळे वाटतील, गुन्ह्यांचा तपशील वेगळा वाटेल, मुद्दा एकच. आत्ताच हे कशाला, असा प्रश्न ज्यांच्या मनात येईल, त्याचं उत्तर म्हणूनच हा लेख मराठीत नोंदवला आहे. कारण हे कधीही असंच असणारं.

जॉर्ज ऑर्वेल (१९०३-१९५०) हा ‘ब्रिटिश इम्पीरियल पोलिस सेवे’चा भाग म्हणून ब्रह्मदेशात काम करत असताना एका भारतीय कैद्याला दिलेली फाशी त्यानं प्रत्यक्ष पाहिली होती. त्या अनुभवावर त्यानं लिहिलेला लेख १९३१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्याचा हा अनुवाद. (मूळ इंग्रजी लेख इथे वाचता येईल.)
 ***

किंकाळी: एडवर्ड मंक यांचं प्रसिद्ध चित्र [इथून]
ही ब्रह्मदेशातली घटना आहे. पावसाळी सकाळ होती. टिन फॉइलच्या पिवळ्या दिव्याचा फिकट प्रकाश कारागृहाच्या उंच भिंतींवर लटकत होता. प्राण्यांच्या पिंजऱ्यांप्रमाणे मोठे गज लावलेल्या कोठड्यांबाहेर उभे राहून आम्ही वाट पाहत होतो. प्रत्येक कोठडी दहा बाय दहा फुटांची होती. एक साधी कॉट आणि पिण्याच्या पाण्याचं भांडं सोडल्यास ती जवळजवळ रिकामीच होती. काही कोठड्यांमधे काळपटलेली माणसं गुडघे मुडपून बसलेली होती. फाशीची शिक्षा ठोठावलेले हे लोक. येत्या आठवड्यात किंवा दोन आठवड्यांत त्यांची शिक्षा अमलात येणार होती.

एका कैद्याला बराकीतून बाहेर काढण्यात आलं. बारीकसा हिंदू मनुष्य होता. पूर्ण भादरलेले केस, अस्पष्ट पाणीदार डोळे, त्याच्या शरीराच्या आकाराशी न जुळणाऱ्या जाडजूड मिशा असा तो कैदी. त्याच्या मिशा चित्रपटातल्या विनोदी पात्राप्रमाणे वाटत होत्या. पहाऱ्यासाठी असलेले सहा उंच भारतीय वॉर्डर फाशीसाठीच्या खांबापर्यंत घेऊन जायला त्याला तयार करत होते. दोघंजण संगीनधारी बंदुका घेऊन उभे होते, तर बाकीचे त्याला हातकड्या घालून, त्या एका साखळीत अडकवून, साखळी आपल्या कमरेच्या पट्‌ट्यांना बांधण्यात गुंतले होते. त्याचे हात त्याच्या शरीराला घट्ट बांधण्यात आले. वॉर्डर त्याच्या खूप जवळ उभे होते आणि त्यांचे हात त्याच्याभोवती एवढ्या काळजीपूर्वक फिरत होते की तो तिथं खरंच आहे ना याची ते खात्री करतायंत असं वाटावं. कधीही पाण्यात उडी मारून परत जाईल असा जिवंत मासा हातात घेतल्यावर माणूस कसा वागतो तसंच ते चित्र होतं. पण तो जवळपास विरोध न करताच उभा होता, दोऱ्यांभोवती तो हळुवारपणे हात गुंडाळत होता. जणू काय चाललंय याचा त्याला पत्ताच नव्हता.

आठ वाजले. दूरवरच्या बराकींमधे बिगुल वाजलेला दमट हवेतून ऐकू आला. आमच्यापासून दूरवर उभं राहून हातातल्या काठीने जमिनीवरच्या दगडांना उदासपणे उडवत असलेल्या तुरुंग अधीक्षकांनी आवाजाच्या दिशेने तोंड फिरवून पाहिलं. पांढऱ्याया पडत चाललेल्या मिशा असलेले ते एक सैनिकी डॉक्टर होते. ‘‘फ्रान्सिस, जरा पटकन आटप रे बाबा!’’ ते किरकिरत्या आवाजात ओरडले. ‘‘एव्हाना तो मेलेला असायला हवा होता. आणि अजूनही तूच तयारीत नाहीस?’’

फ्रान्सिस हा तुरुंगप्रमुख. पांढरा गणवेश नि सोन्याच्या कडांचा चष्मा घातलेला दक्षिण भारतीय. तो हात हलवत म्हणाला, ‘‘होय, होय सर.. सगळं ठीक झालंय आता. जल्लादही तयार आहे. आपण निघायला हवं.’’

‘‘बरंय, मग उरक आता. हे काम आटपेपर्यंत बाकीच्या कैद्यांना जेवण मिळणार नाही.’’

आम्ही वधस्तंभाच्या दिशेने वळलो. कैद्याच्या दोन्ही बाजूंना दोन वॉर्डर बंदुका घेऊन होतेच. शिवाय त्याच्या आणखी जवळून चालणाऱ्या दोन वॉर्डरांनी त्याला हाताला नि खांद्याला धरलं होतं. एकाच वेळी ते त्याला ढकलतायंत नि आधारसुद्धा देतायंत असं वाटत होतं. आमच्याबरोबर असलेले न्यायदंडाधिकारी आणि इतर अधिकारी त्यामागून चालत होते. दहाएक मीटरचं अंतर चालून झालं असेल तेवढ्यात एकदम कोणत्याही आदेशाशिवाय किंवा सूचनेशिवाय हा जथ्था थांबला. एक विचित्र घटना झाली होती. कधी कोणास ठाऊक, पण एक कुत्रा आवारात आला होता. मोठमोठ्यानं भुंकत तो आमच्यापर्यंत आला. एवढी सगळी माणसं एकत्र बघून भेदरलेला तो शेपटी हलवत भोवताली फिरू लागला. त्याला कोणी थांबवण्यापूर्वीच त्यानं अचानक कैद्याकडे झेप घेतली आणि उडी मारून त्याचा चेहरा चाटण्याचा प्रयत्न केला. उरलेले सगळेचजण स्तब्ध होऊन पाहत राहिले. कुत्र्याला पकडायलाही पटकन कोणी पुढं होईना.

‘‘ह्या साल्या कुत्र्याला कोणी आत येऊ दिलं?’’ अधीक्षक चिडून म्हणाले. ‘‘कोणी तरी पकडा रे त्याला!’’

जथ्थ्यातून बाहेर पडून एक वॉर्डर कुत्र्याच्या मागे लागला, पण तो त्याच्या हाती येईना. एका तरुण युरोपीय अधिकाऱ्यानं दगड मारून कुत्र्याला हटवायचा प्रयत्न केला; पण त्यानं दगडांचा मारा चुकवला आणि तो परत आम्ही उभे होतो तिथं आला. तुरुंगाच्या भिंतींमध्ये त्याच्या भुंकण्याचा आवाज घुमत होता. हा जणू फाशीपूर्वीच्या प्रक्रियेचाच काही तरी भाग असावा अशा पद्धतीने कैदी कोणत्याही कुतूहलाविना हे सगळं पाहत होता. काही मिनिटांनी कुत्र्याला कोणी तरी पकडलं. त्याच्या तोंडाभोवती माझा रुमाल अडकवून आम्ही पुढं निघालो.

वधस्तंभापासून चाळीस मीटरच्या आसपास मी कैद्याची काळपट पाठ पाहिली. तो माझ्या समोरच चालत होता. तो हात बांधलेल्या अवस्थेत, जरा अवघडून बऱ्यापैकी हळू पावलं टाकत होता. प्रत्येक पावलाबरोबर त्याचं मांस आणि हाडांची हालचाल स्पष्ट दिसत होती नि ओल्या मातीवर त्याची पावलं स्पष्ट उठत होती. त्याला दोघादोघांनी धरून ठेवलेलं असतानाही एकदा वाटेत आलेला खड्डा चुकवण्यासाठी तो जरा बाजूला होऊन पुढं गेला.

सुदृढ आणि शुद्धावस्थेत असलेल्या माणसाला संपवणं म्हणजे काय ते त्या क्षणापर्यंत मला कधीही अजिबातच जाणवलेलं नव्हतं. तो कैदी खड्डा चुकवण्यासाठी जरा बाजूला सरला तेव्हा मला ते गूढ उकललं. पूर्ण जोमानिशी सुरू असलेलं जीवन मधेच तोडून टाकण्यातली गफलत माझ्यासमोर स्पष्ट उभी ठाकली. हा माणूस मरत नव्हता. आम्ही जसे जिवंत होतो तसाच तो जिवंत होता. त्याच्या शरीराचे सगळे भाग व्यवस्थित काम करत होते. जठर अन्न पचवत होतं, त्वचा स्वतःची निगा राखत होती, नखं वाढत होती... आपसूकपणे हे सगळं सुरू होतं. तो वधस्तंभावर चढण्यासाठी उभा राहील. एक दशांश सेकंदात तो हवेत उडी घेऊन खाली पडेल त्या क्षणीही त्याची नखं वाढत असतील. खालची खडी नि बाजूच्या राखाडी भिंती हे सगळं तो पाहत होता आणि तरी त्याचा मेंदू तर्काधिष्ठित विचार करू शकत होता. खालच्या खड्‌ड्याची जाणीव त्याला होती. तो आणि आम्ही सगळे एकत्र चालणारी माणसं होतो. पाहत होतो, ऐकत होतो, जाणून घेत होतो. एकच जग समजून घेत होतो. आणि दोन मिनिटांत, एका क्षणात आमच्यातला एकजण गेलेला असणार होता. एक मन कमी होणार होतं, एक जग कमी होणार होतं.

वधस्तंभ तुरुंगाच्या मुख्य इमारतीपासून जरा बाजूच्या लहानशा जागेत अनेक शोक पचवत उभा होता. तीन बाजूंनी विटांच्या भिंती असलेली ती एक शेडवजा जागा होती. वर एक लाकडी फळी होती. त्यावर दोन बाजूंना मोठे बीम होते आणि त्यामधून एक बार गेलेला नि त्याला दोरी लटकत होती. तुरुंगाच्या पांढऱ्या गणवेशात उभा असलेला जल्लाद, केस पांढरे होत आलेला एक कैदीच, खटक्याचा दांडा असलेल्या यंत्राजवळ उभा होता. आम्ही तिथं गेलो तसा तो आमच्यासमोर खाली झुकला. फ्रान्सिसच्या सूचनेनुसार कैद्याला आधीपेक्षाही जवळून पकडून असलेल्या दोघा वॉर्डरांनी त्याला जवळपास ढकलून वधस्तंभापर्यंत नेलं. पायऱ्यांवरून ते त्याला वर घेऊन गेले. त्यानंतर जल्लाद वर चढला आणि त्यानं दोरी कैद्याच्या मानेभोवती घट्ट केली.

आम्ही पाचेक मीटरच्या अंतरावर उभे राहून बघत होतो. वधस्तंभाभोवती वॉर्डरांचं एक वर्तुळच बनलं होतं. आणि फास पक्का केल्यावर लगेच कैदी रडून देवाचं नाव घेऊ लागला. मोठ्या आवाजात सलग तो ‘राम, राम, राम, राम’ उच्चारू लागला. गडबडीत आणि भीतीनं केलेल्या प्रार्थनेसारखं ते उच्चारण नव्हतं. स्थिर, ताल असलेलं, घंटा वाजते तशा पद्धतीनं तो देवाचं नाव एकसंधपणे घेत होता. तिकडे कुत्र्यानं दबलेल्या आवाजात रडणं सुरू केलेलं ऐकू येत होतं. जल्लाद अजून वधस्तंभावरच उभा होता. पिठाच्या पोत्याप्रमाणे वाटणारी एक लहानशी कॉटनची पिशवी त्यानं आणली आणि ती कैद्याच्या चेहऱ्यावर घातली. त्या कापडामुळे अडलेला पण तरीही सतत येणारा ‘राम, राम, राम, राम’ उच्चारणाचा आवाज सुरूच होता.

जल्लाद पायऱ्यांवरून खाली उतरला आणि खटक्याच्या दांड्याजवळ येऊन दांडा हातात धरून उभा राहिला. मिनिटं जाताना कळत होती. कैद्याचं रडणं आणि ‘राम, राम, राम, राम’ उच्चारणं सलग सुरूच होतं. मान खाली वळवून उभे असलेले अधीक्षक हातातल्या काठीनं जमिनीवर रेघा ओढत होते. बहुतेक ते हुंदक्यांची मोजदाद करत असावेत नि कैद्याला काही ठराविक आकड्यांपर्यंत रडण्याची मुभा त्यांनी दिली असावी. पन्नास किंवा शंभर हुंदके असं काही तरी. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता. काही बंदुकांवरच्या संगिनी हलत होत्या. टोप चढवून फळीवर उभ्या असलेल्या त्या माणसाचे हुंदके आम्ही ऐकत होतो. प्रत्येक हुंदका म्हणजे आयुष्याचा आणखी एक क्षण. आमच्या सर्वांच्या मनांमधे हाच विचार होता : मारा आता त्याला लवकर, संपवा हे! तो घाणेरडा आवाज संपवा!

अचानक अधीक्षकांनी निर्णय पक्का केला आणि मान वर करून हातातल्या काठीनं सूचना करत ते जोरानं ओरडले, ’’चलो!’’

त्यानंतर एकदा जोरदार आवाज झाला आणि नंतर मृतप्राय शांतता पसरली. कैदी संपला होता, दोरी तिची तिची फिरत होती. कुत्र्याला आम्ही सोडून दिलं आणि तो एकदम धावत वधस्तंभाच्या पाठीमागे गेला. तिथं पोचल्यावर मात्र तो मागेच थांबला, भुंकला आणि मग बाजूच्या कोपऱ्यात जाऊन बसला. तिथून तो आमच्याकडे भीत भीत पाहत होता. वधस्तंभाभोवती फेरी मारून आम्ही कैद्याच्या देहाकडे पाहिलं. पायांची टोकं सरळ खाली वळलेल्या अवस्थेत तो हळूहळू फिरत लटकत होता, दगडाप्रमाणे स्तब्ध.

अधीक्षकही आपल्या काठीसह तिथं आले. त्यांनी शरीराला काठीनं टोचलं. शरीर थोडं फिरलं. ‘‘तो ठीक आहे.’’ अधीक्षक म्हणाले. वधस्तंभापासून दूर जाऊन त्यांनी मोकळा निःश्वास सोडला. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण अचानक निघून गेला होता. मनगटातल्या घड्याळाकडे बघून ते म्हणाले, ‘‘आठ वाजून आठ मिनिटं. आजच्या सकाळपुरतं इतकं बास. चला, देवाचे आभार मानू.’’

बंदुकांवरच्या संगिनी काढून वॉर्डर निघून गेले. कुत्रा शांत होता. आपण चुकीचं वागल्याची समज असल्यासारखा तो त्यांच्या मागून निघाला. आम्हीही निघालो. फाशी यार्डातून, दोषी कैद्यांना पकडून असलेल्या कोठड्यांना ओलांडून तुरुंगाच्या केंद्रभागात आलो. लाठ्या घेऊन असलेल्या वॉर्डरांच्या देखरेखीखाली इतर कैदी नाश्ता करत होते. लांबच लांब रांगांमधे ते खाली बसले होते. प्रत्येकाच्या हातात अॅल्युमिनियमची थाळी होती. दोन वॉर्डर भात भरलेल्या बादल्या सरकवत कैद्यांना वाढत होते. फाशीनंतर आता हे घरगुती हलकफुलकं वातावरण दिसत होतं. काम संपल्यामुळं आम्हालाही सुटल्यासारखं वाटत होतं. गाणं म्हणावं किंवा सरळ पळत सुटावं किंवा दाबजोर हसावं अशा चित्रविचित्र भावना मनात यायला लागल्या. एकदम सगळेचजण आपापसात कुजबुजू लागले.

माझ्या शेजारून चालत असलेला युरेशियन मुलगा आम्ही आलो तिकडे पाहत सूचक हास्य करून म्हणाला, ‘‘तुम्हाला माहितेय सर, माझ्या मित्रानं (म्हणजे मघाशी मृत झालेला माणूस) जेव्हा त्याची याचिका फेटाळण्यात आल्याचं ऐकलं तेव्हा तो कोठडीतल्या जमिनीवर मुतला होता- भीतीनं.’’ हे बोलून लगेच तो मुलगा म्हणाला, ‘‘सर, ही घ्या एक सिगरेट माझ्याकडून. ही चांदीची पेटी तुम्हाला आवडली नाही का सर? बॉक्सवाल्याकडून घेतली, दोन रुपये आठ आण्याला. क्लासी युरोपियन स्टायलीची आहे.’’

अनेक लोक हसले... कशाला? कोणालाच ते माहीत नव्हतं बहुतेक.

अधीक्षकांबरोबर चालणारा फ्रान्सिस कलकल करत बोलत होता. ‘‘तर मग सर, सगळं समाधानकारकपणे पार पडलं. एका झटक्यात आटोपलं. प्रत्येक वेळी असं नाही होत ना! मी ऐकलंय, काही वेळा डॉक्टरला वधस्तंभाखाली जावं लागतं नि कैदी मेलाय की नाही याची खात्री करायला त्याचे पाय ओढून बघावे लागतात. फारच चुकीचं होतं ते मग.’’

‘‘हां, ते हलवत बसणं ना? फारच वाईट असतं ते’’, अधीक्षक म्हणाले.

‘‘अहो सर, कैद्यानं रोखून धरलं तर याहून वाईट गत होते. एक माणूस एकदा मधल्या खांबाला पकडून राहिला. तुम्हाला पटणार नाही, पण त्याला बाजूला करायला सहा वॉर्डर लागले. त्याचा प्रत्येक पाय धरून तीन-तीन वॉर्डर ओढत होते. आम्ही त्याची समजूतही घातली, ‘मित्रा, तू आम्हाला जो काही त्रास देतोयंस त्याचा विचार कर की!’ पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता! फारच त्रासदायक ठरला तो!’’

अचानक मला लक्षात आलं की मी खूपच मोठ्यानं हसत होतो. प्रत्येकजणच हसत होता. अधीक्षकही दबून हसत होते. ‘‘तुम्ही सगळे बाहेर येऊन एकेक ड्रिंक घेतलंत तर चांगलं होईल. गाडीमध्ये मी व्हिस्कीची एक बाटली राखून ठेवलीय. त्यावर आपलं भागेल.’’ अधीक्षक म्हणाले.

तुरुंगाच्या गेटच्या मोठ्या कमानीखालून आम्ही रस्त्यावर आलो. ‘‘त्याचे पाय ओढावे लागले.’’ अचानक एक ब्रह्मदेशी अधिकारी ओरडला नि जोरजोरात हसायला लागला. मग आम्ही सगळेच पुन्हा हसायला लागलो. त्या वेळी फ्रान्सिसने सांगितलेला प्रसंग खूपच मजेशीर वाटला. आम्ही एकत्र दारू प्यालो. स्थानिक आणि युरोपीय सगळेच खेळीमेळीनं प्यालो. मेलेला माणूस शंभर मीटर दूर पडला होता.

२४ जून २०१५

शेवटचा पावसाळा (बहुतेक)

कोणी किती पावसाळे बघितलेत यावर माणसांमध्ये काही तरी ठरवतात. जास्त पावसाळे म्हणजे जास्त अनुभव, असं मोजमाप असावं. त्या मोजमापानं रेघेचा हा पाचवा पावसाळा आहे. रेघेच्या या पत्त्यावर दिसणाऱ्या नोंदी २०१० ऑक्टोबरपासून आहेत, त्यामुळं २०११पासूनचा पावसाळा धरला, तर हा २०१५चा पाचवा पावसाळा. (खरी तर रेघेच्या प्रवासाची सुरुवात २००८च्या शेवटाकडं नि २००९च्या सुरुवातीला अशी झालेली आहे, त्यामुळं तिच्यापुरता २००९चा पावसाळाही गृहीत धरायला हवा. मग दोन पावसाळे आणखी वाढतील. पण सध्या इथले पाचच मोजू.)

पाच-सात पावसाळे म्हणजे फारसे नाहीत, पण तरी आता बहुतेक हा रेघेचा शेवटचा पावसाळा आहे असं दिसतंय, त्यामुळं त्या निमित्तानं ही नोंद होतेय. शेवटचा पावसाळा असं का म्हटलं? तर, आता रेघेवर नोंद करावी असं वाटत नाहीये. मुद्दे नाहीत असं नाही, पण अनेक गोष्टी आधी जुळवून आणणं शक्य होत होतं ते आता होत नाहीये. मग अर्धवट कायतरी करण्यापेक्षा थांबलेलं बरं, असं वाटलं. सध्यातरी, हा शेवटचा पावसाळा असं वाचकांना कळवतो आहे. आलीच काही पुन्हा झड, तर सुरू करू. पण सध्या थांबा.

शिवाय, आपण मुळात प्रसारमाध्यमांबद्दल काही नोंदी करण्याचा हेतू समोर ठेवलेला. त्याला धरून गेल्या पाच वर्षांत बऱ्यापैकी नोंदी झाल्या. सुरुवातीला थोडी अडखळ जाणवतेय, पण मग बरं चाललं होतं. यातून माध्यमांच्या व्यवहारातला काही थोडासा तरी पॅटर्न स्पष्ट झाला असेल, तर बरं. दरम्यानच्या काळात, क्रमानं तेहेलका, झेड मॅगझिन, द हूट अशा नियतकालिकं-संकेतस्थळांशी थोडीशी हातमिळवणी करून काही भाषांतरित मजकूर इथं आणला गेला. त्यामध्ये जेवढं करायचं होतं, ते सगळं जमलं नाही. हे पर्याय आणखी चांगल्या पद्धतीनं वापरता आले असते, तर रेघेच्या या प्रयत्नाला आर्थिक पाठबळाचा प्रश्नही सुटला असता, पण ते जमवता आलं नाही. पण पर्याय चाचपले हे एक चांगलं झालं, असं वाटत. 

साहित्याविषयी काही दस्तावेज स्वरूपातलं काम रेघेला समांतर असं सुरू होतं. आणि रेघेवरही सुरू होतं. त्याबद्दल आपण इथं वेगळ्या नोंदी केल्या नाहीत कधी. पण त्या दस्तावेजाचा उपयोग झाल्याचं अधूनमधूून दिसत होतं. चिपळूणला मराठी साहित्य संमेलन झालं त्यावेळी हमीद दलवाईंच्या घरावरून दिंडी नेण्यासंदर्भात काही  वाद झाला. त्यावेळी आलेल्या बातम्यांमध्ये अनेकदा या दस्तावेजातल्या फोटोंचा फायदा झालेला दिसला. अलीकडं 'गांधी मला भेटला'च्या निमित्तानं वसंत गुर्जरांचा जो फोटो माध्यमांमधून मुख्यत्त्वे आला, तोही इथलाच. मध्यंतरी भाऊ पाध्यांचा रेघेवर नोंदवलेला लेख एका मासिकानं स्वतःहून मागितला. त्यांची त्यांना याबद्दल माहिती होऊन रेघेचा उपयोग झाला, हे बरं झालं. याशिवायही इथले काही फोटो आपसूक पसरलेले दिसले. मुळात हे दस्तावेज तयार करताना कुठून ना कुठून कात्रणांसारखं जमा करून ठेवण्याचा प्रयत्न होता. त्या त्या वेळी आपल्याला ज्या व्यक्तींबद्दल कात्रणं जमा करावी वाटली, ती जमा करून ब्लॉगवर चिकटवली, एवढाच प्रयत्न. यात मराठी साहित्यातल्या राजकारणापेक्षा व्यक्तिगत आवडनिवडीचा भाग होता. त्यामुळं भाऊ पाध्ये, अशोक शहाणे, कमल देसाई, श्री. दा. पानवलकर, हमीद दलवाई, सदानंद रेगे, तुळसी परब, वसंत दत्तात्रेय गुर्जर असे ब्लॉग केले. आपण कात्रणं जमवल्यासारखं म्हटलं असलं, तरी प्रत्यक्षात इथं टायपिंग करण्यापासून, ज्यांचा मजकूर आहे त्यांची परवानगी घेण्यापर्यंत इतर अनेक खटपटींमध्ये वेळ गेला. यात फोटो जमवण्यात, मजकूर मिळवण्यात, ज्यांची मदत झाली त्याची नोंदही तिथं तिथं केली आहे. एकूण हा वेळ चांगला गेला आणि त्याचा बऱ्यापैकी उपयोग झाला असं वर्तमानपत्रांमधले किंवा इतर ब्लॉगवर दिसणारे फोटो बघून वाटतं. हे चांगलंच झालं.  पण काही वेळा इथला मजकूर योग्य ते शब्द गाळून, म्हणजे पूर्वप्रसिद्धी कळणार नाही, अशा रितीनं पसरवलाही गेला. काही वेळा त्याचा प्रसार होत आपल्याच रेघेच्याच ई-मेल पत्त्यापर्यंतही आला. काही वेळा या ब्लॉगांच्या घडवणीचं श्रेय वेगळ्याच स्वरूपात वेगळ्याच व्यक्तीच्या नावावर दिलेलंही दिसलं- एक दोन. हे आश्चर्यकारक नसेल फारसं, पण उबग आणणारं आहे.

प्रतिक्रियांबद्दल बोलायचं, तर नोंदींखाली तशा फारशा नोंदवल्या गेल्या नाहीत, पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या वाचकांकडून रेघ वाचली जात असल्याचं कळावं इतपत प्रतिक्रिया आल्या. पत्रकारांपुरतं बोलायचं तर, सोलापुरात एखाद्या वर्तमानपत्रात उप-संपादक/बातमीदार असलेल्या व्यक्तीपासून मुंबईत वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या पॉप्युलर व्यक्तीपर्यंत वाचक असावेत, किमान अधूनमधून ते रेघ चाळत असावेत, असं वाटण्यासारख्या प्रतिक्रिया आल्या. पत्रकारितेबाहेरच्या वाचकांबद्दल- इतिहास, वगैरे गोष्टींमध्ये संशोधन करणाऱ्या कोणाकोणापासून ते नागपुरात प्राध्यापक असलेल्या कोणाकोणापर्यंत तरी अशा बऱ्यापैकी प्रतिक्रिया अधूनमधून आल्या. व्यक्तींची नावं लिहिण्यापेक्षा ठिकाणं सांगायची तर रेघेच्या वाचकांमधलं कोणी कुठल्यातरी परदेशात, किंवा कोलकाता, मुंबई, सोलापूर, नागपूर, नाशिक, नगर, रत्नागिरी अशा कुठं ना कुठं असल्याचं कळावं एवढं काम या प्रतिक्रियांनी केलं. यातल्या काही प्रतिक्रिया टिंगल स्वरूपातल्याही होत्या, आणि बऱ्यापैकी सकारात्मकसुद्धा होत्या. एकूण मिळून हेही बरं वाटलं. 

रेघेवर ठरवलेलं असूनही न करता आलेल्याही काही नोंदी होत्या. नोम चोम्स्की यांचा 'मुख्यप्रवाही माध्यमं असतात तशी का असतात?' हा लेख आपण मराठीत इथं नोंदवला, पण त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट या पुस्तकाबद्दलची नोंद राहिलीच. काही जुन्या नियतकालिकांमधल्या निवडक लिखाणाच्या खंडांसंबंधी- द बेस्ट ऑफ क्वेस्ट, निवडक माणूस- नोंदी करायची बऱ्यापैकी तयारी करूनही त्या नोंदी झाल्या नाहीत. आणखीही काही मराठी पुस्तकं होती, पण ते जमवता आलं नाही. परत पावसाची झड आली तरच हे शक्य होईल. 

आणखी एक पूर्वीपासून असेलही कदाचित, पण सध्या प्रसारमाध्यमं एवढी वाढूनही, काही ठराविक गोष्टींचा, काही ठराविक व्यक्तींचा व्हॉल्यूम मोठमोठा होत जातो आणि अनेकांचा म्यूट होत जातो, असं वाटलं. अशा म्यूट व्यक्तींच्या आधारानं आपण रेघ चालवायचा प्रयत्न करत होतो. पत्रकारितेत म्यूट होऊन काम करत राहिलेले असतील किंवा बाहेरही आपापलं काम करताना दुसरं काहीतरी निसटल्यामुळं म्यूट झालेले असतील- या लोकांमुळंच रेघ सुरू झाली आणि सुरू राहिली. वरती आपण काही प्रतिक्रिया आल्याचं म्हटलंय, त्यात काही ज्येष्ठ आणि समाजात जास्त ओळखले जाणारे असे लोक आहेतच, त्यांच्या प्रतिक्रियांनाही महत्त्व आहे, पण या म्यूट राहिलेल्या कितीतरी प्रतिक्रिया रेघेला आधार देत होत्या. क्वचितच कधीतरी बोलून या प्रतिक्रिया आल्या असतील, बाकी म्यूट. या प्रतिक्रियांमध्ये अजिबात ढोंग नव्हतं, हे सगळ्यांत सुंदर. अशा बोलक्या आणि म्यूट प्रतिक्रिया देणाऱ्या सगळ्यांचे आभार. त्यांच्याच उल्लेखानं ही नोंद संपवू. 
***

काही ठराविक नोंदी सारख्या जास्त वाचल्या जात असलेल्या म्हणून दिसत राहिल्यानं, त्याच त्याच परत वर दिसतात. त्यावर थोडासा तोडगा म्हणून इथं काही निवडक नोंदींची यादी जोडून ठेवूया. म्हणजे कदाचित काही म्यूट झालेल्या नोंदीही अधूनमधून बोलत्या राहतील.-
***

म्यूट मान्सून (फोटो : स्टीव्ह मॅकरी)

१५ मे २०१५

गांधी मला भेटणार होता, पण दुर्दैवानं आपल्याकडं वेळ फार थोडा आहे!

गांधी मला
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या १० x १२च्या खोलीत
६ x २ १/२च्या बाजल्यावर
भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेव्हा तो म्हणाला-
सत्यापासून सौंदर्य वेगळे असू शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे. त्या सत्याच्या द्वारा मी सौंदर्य पहातो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात
असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
सत्य हे वज्राहुनही कठोर आणि कुसुमाहूनही कोमल आहे
- या ओळींपासून सुरू होणाऱ्या 'गांधी मला भेटला' या वसंत दत्तात्रेय गुर्जरांच्या कवितेवरची बंदी आता सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवली आहे. (न्यायालयाच्या निकालाची प्रत) कवितेच्या ज्या प्रकाशनावरून (बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन, औरंगाबादचं 'बुलेटिन') न्यायालयात खटला सुरू होता, त्या प्रकाशनाचे प्रकाशक म्हणून लातूरचे देविदास तुळजापूरकर यांना न्यायालयात माफी मागावी लागली आणि मग खटला मिटला, असं यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून कळतं. (शिवाय, मुळात कवितेपेक्षाही या सगळ्या घडामोडींना समांतर असा आणखी एक संदर्भ असल्याचंही बोललं जातं. बँक ऑफ महाराष्ट्रनं विजय मल्ल्या यांच्या 'किंगफिशर' या कंपनीला दिलेल्या कर्जाच्या व्यवहारामध्ये काळंबेरं असल्याचा आरोप २०१२ साली झाला होता. हा आरोप तुळजापूरकर यांच्या 'जागलेपणा'मुळं झाला असल्याच्या संशयावरून बँकेनं वेगळी कुरापत काढून या कवितेवरून त्यांच्यावर कारवाईची तयारी केल्याची बातमीही दोन वर्षांपूर्वी 'द हिंदू' या वर्तमानपत्रात आली होती. (सुधारीत माहिती- संघटनेने संपाची हाक दिल्यावर या कारवाईचा धोका टळल्याची माहिती तुळजापूरकर यांनी फोनवरच्या बोलण्यात रेघेला दिली.) अर्थात, कवितेवर खटला सुरू झाल्यानंतर बराच काळ गेल्यावरची ही घडामोड आहे आणि आपण आपल्या बळावर त्याचा आणखी काही तपास करू शकलेलो नाहीयोत, त्यामुळं त्यावर काही बोलता येणार नाही. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियनच्या नियतकालिकात कविता छापून आली तेव्हा तुळजापूरकर त्याचे संपादन करत होते व संघटनेची प्रशासकीय जबाबदारीही त्यांच्याकडं होती. ही संघटना ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनला संलग्न आहे, त्यामुळं खटला शिखर संस्थेतर्फे चालवला जात होता).

सध्या, प्रकाशकांची या खटल्यातून मुक्तता झाली असली, तरीही या कवितेतून गांधीजींची बदनामी झालेली नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी कवी वसंत गुर्जर यांच्यावरच असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. आणि त्यासंदर्भातील पुढील कामकाजासाठी खटला लातूरमधल्या सत्र न्यायालयाकडं वर्ग केला आहे. यासंबंधी काही तपशील पुढील बातम्यांमधून मिळू शकतो: महाराष्ट्र टाइम्सलोकमत लोकसत्ता डीएनए.

वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या (आणि वर ज्यांच्या लिंक दिल्या आहेत त्या सर्व) बातम्यांमध्ये कवीला अजूनही यासंबंधी पूर्ण दिलासा मिळाला नसल्याचं म्हटलं असूनही वृत्तवाहिन्यांमध्ये मात्र खटला संपून चर्चा सुरू झालेल्या दिसल्या. १४ मे रोजी दोन वाहिन्यांवर यासंबंधी रात्रीच्या चर्चा झालेल्या दिसतात. आणखी कुठं असल्यास या नोंदीत दुरुस्ती करावी लागेल. यातल्या 'जय महाराष्ट्र' या वाहिनीनं विषय काय ठेवला, तर: का होते महापुरूषांची बदनामी?

'जय महाराष्ट्र'च्या फेसबुक पानावरून

या चर्चेच्या शेवटी, साहित्यिकांनीही महापुरुषांची बदनामी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, या आशयाचं वाक्य संबंधित अँकरांनी म्हटलं, पण या चर्चेचा व्हिडिओ इंटरनेटवर आपल्याला न सापडल्यामुळं त्याबद्दल आपण अधिक काही इथं नोंदवत नाहीयोत. तरीही मुळात चर्चेच्या विषयावरूनही एवढं स्पष्ट होतंच की, 'गांधी मला भेटला' या कवितेनं बदनामी झाल्याचं न्यायालयाचं मत मान्य करून, मग अशी एकुणातच महापुरुषांची बदनामी का होते, असा काही जाब विचारण्याची जबाबदारी वाहिनीनं अंगावर घेतलेली आहे.

'एबीपी माझा' वाहिनीवर यासंबंधी झालेल्या चर्चेतही काही गोष्टी कळतात. एक तर, कवितेचं नाव 'गांधी मला भेटला होता' असंही असू शकेल, असं मधे मधे पडद्यावर दिसणाऱ्या शब्दांवरून कळत होतं. शिवाय, या चर्चेचं शीर्षक होतं- 'कवितेच्या वादात 'गांधी' हरले की जिंकले?' हे तसं फारच महत्त्वाकांक्षी शीर्षक आहे, त्यामुळं आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना त्याचं उत्तर मिळू शकत नाही, हेही या चर्चेतून कळलं. 

कविता अश्लील-बीभत्स असण्यासंदर्भात, या चर्चेतील सहभागी व्यक्तींपैकी महेश केळुसकर, या कवितेच्या बाजूनं काही म्हणणं मांडतात. दुसरे, समर खडस शेवटी उपरोधानं म्हणतात की, आपण तुकारामाचे अभंगही कोर्टात नेऊ, ते अभंगही बॅन करू, भैरप्पांच्या पर्व कादंबरीत श्रीकृष्णापासून अनेक लोक गोमांस खाताना दाखवले आहेत, अशी एक आपण यादी करू व ते सगळं बॅन करू आणि मग टिनटिन, फॅन्टम अशाच पुस्तकांचा प्रसार करूया.

यू-ट्युबवरील व्हिडिओतील चित्र : एबीपी माझा वाहिनी

आणि त्यानंतर चर्चेचा शेवट करताना अँकर व्यक्ती म्हणाली की, ''आपल्याकडे वेळ फार कमी आहे दुर्दैवाने, परंतु अत्यंत हा मोठा विषय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार, त्यामधला बॅलन्स आपल्याला साधायचा आहे, अनेक मुद्दे आपल्या मान्यवरांनी मांडले होते, अनेक कवितांचा आणि लेखांचा दाखला आपल्याला देण्यात आला, खरं तर दुसरा मुद्दा असाही असू शकतो की यातले काही अभंग किंवा कविता शालेय पाठ्यपुस्तकातसुद्धा नाहीयेत, हेसुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीये, त्यामुळे जे आपल्या मान्यवरांनी मुद्दे मांडलेले आहेत ते त्यांच्या त्यांच्या परीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, योग्य की अयोग्य याविषयी वेगळी चर्चा होऊ शकते, आजच्या या चर्चेसाठी आपल्याला या सर्व मान्यवरांनी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार, माझा विशेषमधे आज इथेच थांबतोय, बघत राहा एबीपी माझा.''

तर, आधीच्या एका मान्यवरांनी ज्याबद्दल उपरोधानं काही बोलू पाहिलं, त्यावर पाणी फिरवून पुन्हा आपल्याला असंच सांगण्यात येतं की, 'काही साहित्य शालेय पाठ्यपुस्तकातसुद्धा नसतं, याकडं आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही!' यावरून काय सिद्ध होतं ते आपल्याला कळू शकत नाही. शालेय पाठ्यपुस्तकात येईल, असंच साहित्य असायला हवं, असा काही सूर आहे काय, तेही कळत नाही. आणि मुळात सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी मांडलेले मुद्दे त्या त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत आणि योग्य की अयोग्य यावर वेगळी चर्चा करता येईल, त्यामुळं मुद्दा लटकता ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे, यावरच आजची चर्चा थांबू शकते. तुम्ही पाहात राहा--

आता आज जशा वृत्तवाहिन्या आहेत, तशा काही ही कविता कवीनं लिहिली तेव्हा नव्हत्या, तरीही कवीनं कवितेचं दुसरं कडवं काय लिहिलं पाहा:
गांधी मला
आकाशवाणी मुंबई ब केंद्राच्या
५३७.६ किलोसायकल्सवर
गांधीवंदना या कार्यक्रमात भेटला
तेव्हा तो बोलला-
महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या
आणि ते कसास न उतरल्यास त्याचा त्याग करा
आकाशवाणीच्या निवेदिकेनं सांगितलं-
गांधीवंदना हा कार्यक्रम आपण
६ वाजून ५५ मिनिटं ते ७ वाजून २ मिनिटंपर्यंत
तांत्रिक बिघाडामुळे ऐकू शकला नाहीत
त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत
म्हणजे या सगळ्या माध्यमांच्या व्यवहारातलं तांत्रिक महत्त्व तेव्हा कवीच्या डोक्यात गच्चकन घुसलं असेल असंही असेल. शेवटी कवी पडला १० बाय १२च्या खोलीत राहणारा सर्वसाधारण इसम. यात निवेदिकेचा दोष नाही. काही असेल प्रॉब्लेम तर मूळच्या रचनेत असेल. हेच वृत्तवाहिन्यांना पण लागू होईल का? रचनेचं काही शोधावं वाटलं, तर बरं. नायतर व्यक्तिगत अँकरांची टिंगल केल्यासारखं होईल, आपला तो हेतू नाही, पण तसं ओझरतं होत असेल तर ती रेघेची चूक. तर, हे सगळ्या विषयांवर तांत्रिक पातळी कायम ठेवण्याचं काम आता एवढं वाढलंय,  नि इकडं कवितेवर बंदी येतेय म्हणजे पाहात राहा आता-

आपण ज्याला कडवं असं म्हटलं, तसे ओळींचे चाळीस पुंजके या कवितेत आहेत. त्यातले दोन उदाहरणादाखल आपण दिले. वास्तविक आजूबाजूच्या वास्तवातून काही घटना पाहिल्या की त्यातला एकेक पुंजका वाचकांना आठवत जाऊ शकतो. काही नावं बदलतील, काही तपशील बदलतील, उदाहरण म्हणून हा अठ्ठाविसावा पुंजका पाहा:
गांधी मला
आम जनताकी संपत्ती असलेल्या पृथ्वीवर
बेवारस मुलांच्यात नवरा-बायकोचा खेळ करताना भेटला
तेव्हा तो म्हणाला
निधर्मी देशकी क्या पहचान!
छोडो चड्डी मारो गांड!
हा पुंजका तसा अजूनही कायम आहे. आत्ता परवाच नाही का देशाचे पंतप्रधान छत्तीसगढमधल्या बस्तरमधे जाऊन आले. आणि मग देशाची प्रगती, कोळशाच्या खाणी, असे काही मुद्दे निधर्मी बातम्यांमध्ये आले. चर्चा तर ऐकल्याच असतील तुम्हीही. तर हा पुंजका जसाच्या तसाच लागू होईल.

आणि त्या नंतरचा हा एकोणतिसावा पुंजका:
गांधी मला
हाजी मस्तानच्या साम्राज्यांत दिसला
तेव्हा त्यानं चक्क पंचा सोडला
त्याच्या पंच्यावर मी कधीच गेलो नाही
पंचा काय धोतर काय नि पटलून काय
सत्याचे प्रयोग कशातूनही होतात
हो
अगदी कवितेतूनसुद्धा
परवा 'दीवार' नावाचा चित्रपट लागला होता एका वाहिनीवर, तर त्यात मधे मधे काही पूरक माहिती सांगत-दाखवत होते, त्यात या चित्रपटातील हिरो अमिताभ बच्चन यांची अलीकडची काही मुलाखत थोडी थोडी दाखवत होते, त्यात मुलाखत घेणारी व्यक्ती अमिताभ यांना म्हणते, 'तुमच्या या व्यक्तिरेखेवर हाजी मस्तान साहेब यांचा प्रभाव असल्याचं म्हणतात, तर त्याबद्दल...' मग त्याबद्दल बोलणं होतं. असं आहे. मस्तान साहेबांचे प्रयोग किती महत्त्वाचे ठरलेत पाहा. आणि हे काय कवितेतून करतात काय माहीत!

आणि मग रोजच्यासारखे अग्रलेख वाचले कीसुद्धा ही कविता कोणाला आठवू शकते. कवितेतला एकोणचाळिसावा पुंजका पाहा ना:
गांधी मला
अत्र्यांच्या शिवशक्तीत
गांधीवर अग्रलेख लिहिताना दिसला
गांधीत अग्रलेख लिहिताना दिसला
गांधीत आम्ही ईश्वराचे दर्शन घेतले
धन्य झालो
अब्जावधी वर्षात आता ईश्वर पृथ्वीवर येणार नाही
स्वदेशी राहा-स्वदेश बना
असं म्हणून त्यांनी देशीला जवळ केलं
तर, अत्र्यांचे पत्रकारितेतले प्रयोगही अजून टिकून आहेत. म्हणजे हजार वर्षांना पुरून उरेल असा आत्मविश्वास, जमेल तेवढी समोरच्याला व्यक्तिगत पातळीवर हलक्यात काढणारी भाषा, हे सगळं कायम आहे. फक्त वृत्तपत्रंच नाही, तर वृत्तवाहिन्यांनीही ते प्रयोग कायम ठेवलेत असं आपलं १० बाय १२ मत आहे. आणि रेघेचा विषय आहे म्हणून सारखं ते आठवत असेल. पण ते तितकंसं महत्त्वाचं नाही. मुद्दा आहे तो, आता कवीवरचा आरोप अजूनही कायम आहे, त्यावर काही मत आहे काय आपलं? तर, रेघेपुरतं मत एवढंच की, या कवितेत गांधीजींची बदनामी झालेली नाही आणि ही कविता बीभत्स किंवा अश्लील नाही. न्यायालयानं निकाल दिलाय म्हणून आणि कवीला अडचणीत आणणं बरोबर नाही म्हणून, आपण ही कविता इथं पूर्ण देत नाहीयोत. तरीही आपल्या सगळ्यांना वाचक म्हणून यावर काही बोलता यावं एवढ्यापुरतं दाखला म्हणून काही पुंजके जोडलेत, त्यातून काही कायदेभंग झाला असेलच, तर तो सविनय आहे.

तर, या सगळ्या चर्चेच्या शेवटी मग गांधीजींचं काय झालं? ते कवीला भेटले असा दावा केलाय कवीनं, तर मग आपल्याला भेटणार होते, असं नोंदीच्या शीर्षकात लिहिलंय त्याचं काय झालं?
गांधीबाबा राजघाटावर
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या
खांद्यावर हात ठेवून म्हणाला-
देव मेला आहे देवमाणूसही मेला आहे
आता सैतानांच्या विश्वात मेलेल्या देवाला मुक्ती नाही
आणि देवमाणसाला तर नाहीच नाही
असं सगळं असताना, आत्तापर्यंत या खटल्यात मानसिक काही त्रास झाला असला तरी कवीला आर्थिक आणि शारीरिक तोशीस पडलेली नाही, असा उल्लेख आपण मागं एका नोंदीत केला होता. आता कधी लातूरच्या कोर्टात सुनावणी होईल तेव्हा कवीला आपल्या कवितेचं समर्थन करायला जावं लागेल, तोपर्यंत तुम्ही गुर्जरांना याबद्दल काही विचारलंत, तर ते म्हणतील- हो हो सगळं ती संघटनाच बघतेय (बँक कर्मचारी संघटना), तर आता ते सांगतील, वकील सांगतील तेव्हा कोर्टात जायला लागेल, तोपर्यंत काय नाय काय नाय त्रास. आणि हसतील!